जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
मराठी चित्रपटांचे दिग्दर्शक, कथालेखक व पटकथाकार अशी ख्याती असलेल्या दिनकर पाटील यांनी शंभरापेक्षाही अधिक चित्रपटांसाठी संवाद लिहिले यामध्ये “जय मल्हार”, “सांगत्ये ऐका”, “बेल-भंडारा”, “शिकलेली बायको”, “बाळ माझं नवसाचं”, “सुधारलेल्या बायका”, “पाटलाची सून”, “फटाकडी”, “कुंकवाचं लेणं”, “गुणवंताची कन्या”, “मोसंबी नारंगी”, असे एकाहून एक दर्जेदार चित्रपटांचा समावेश असून पन्नासाहून अधिक चित्रपटांचे दिग्दर्शन देखील पाटील यांनी केले.यामाध्ये काही उल्लेखनीय चित्रपट म्हणजे “रामराम पावणं”, “शारदा”, “पाटलाचं पोर”, “मूठभर चणे”, “कुलदैवत”, “उमज पडेल तर”, “प्रेम आंधळं असतं”, “मल्हारी मार्तंड”, “कामापुरता मामा”, “धन्य ते संताजी धनाजी”, “काळी बायको”, “कोर्टाची पायरी”, “जोतिबाचा नवस”, “पैजेचा विडा”, “भामटा”, “भटकभवानी”, “शिवरायाची सून ताराराणी”; तर हिंदीत “मंदीर”, आणि “घरबार”च्या दिग्दर्शनाची धुरा दिनकर पाटील यांनी सांभाळली होती.
बगळ्यांची माळ फुले अजुनि अंबरात असे सर्वांच्या ओठी असलेले गीत लिहिणारे कविवर्य वामन रामराव कांत म्हणजेच वा. रा. कांत यांची पुण्यतिथी ८ सप्टेंबर रोजी झाली.
आशयगर्भ आणि भावतरल कविता लिहिणाऱ्या कविवर्य कांतांनी दोन पारतंत्र्यं पाहिली ती म्हणजे एक इंग्रजांचं व दुसरं कांत कुटुंब जिथं रहात होतं, त्या मराठवाडा भूमीवरचं निजामांचं जुलमी पारतंत्र्य. जिथं मराठी भाषा बोलण्यासही बंदी होती. अशा परिस्थितीतही कांतांचं काव्यलेखन स्वतःच्याच स्फूर्तिदायक व स्वातंत्र्यांचं स्फुल्लिंग उजळीत समृद्ध होत होतं. पारतंत्र्यातच प्रसिद्ध झालेला कविवर्य कांतांचा 'रुद्रवीणा' हा काव्यसंग्रह त्यावेळेस मराठवाड्यातच नाही तर उभ्या महाराष्ट्रात लक्षवेधक ठरला. 'रुद्रवीणा' या कवितासंग्रहात कांतांच्या कवितेतील राष्ट्रीय ओजस्वीपणा व प्रणयगीतातील सोज्वळ हळुवारपणा अन् भावमधुर शब्दशैली वाचकांचं लक्ष वेधून गेली. त्यानंतर आयुष्याच्या अखेरीपर्यंत कवी कविवर्य कांतांनी मराठी सारस्वताची सेवा केली. मात्र मराठी सारस्वताने त्यांची काहीशी उपेक्षाच केली.
वा. रा. कांत हे मात्र महाराष्ट्राच्या साहित्यपटावर प्रसिद्धीपरांगमुखच राहिले. साठ संवत्सरांच्या आपल्या काव्यप्रवासात कांतांनी एकूण 14 काव्यसंग्रह लिहिले. त्याशिवाय 10 अनुवादि्त ग्रंथ, 11 नाट्यकाव्यं, 2 नाटकं. कांतांनी साहित्याचे अनेक प्रकार हाताळले. त्यांनी आपल्याच कवितेवर प्रयोग करून 'दोनुली' हा कवितासंग्रह एका वेगळ्याच काव्यबंधात रसिकांसमोर ठेवला. पण या काव्यप्रकाराची काव्यसमीक्षकांनी हवी तशी दखल घेतली नाही. कदाचित या काव्यप्रकारामुळे मराठी साहित्यात काही मूल्यात्मक भर पडली नसेल, पण या कवितासंग्रहाने मराठी काव्यप्रांतात मौलिक अधिष्ठान दिलं आहे हे विसरता कामा नये. मराठी काव्यसमीक्षकांनी माझ्या कवितेची योग्य दखल घेतली नाही, अशी खंत कांतांनी अखेरच्या दिवसात बोलून दाखवली होती. वार्धक्याने हताश झालेल्या कांतांची या आजारपणातही काव्यलेखनाची उमेद शाबूत होती. तिथेच आपल्या शब्दांना त्यांनी बजावून सांगितलं होतं - 'मी पंगू झालो म्हणून तुम्ही अपंग होवू नका माझ्या शब्दांनो!' ज्या राजकीय, सामाजिक वातावरणात कांत आपला जीवनप्रवास करीत होते त्याचे प्रतिबिंब त्यांच्या कवितेत सतत प्रकर्षानं परावर्तीत होत होते. फक्त राष्ट्रीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय घटनांचे भान हा कांतांच्या कवितेचा, प्रतिभेचा खास पैलू होता. स्व. जयप्रकाश नारायण यांनी तेव्हा चालविलेल्या चळवळीवर लिहलेली कविता- पांढरे शुभ्र वादळ, महात्मा गांधींवरील 'राजघाट' ही कविता वा चीनमध्ये झालेल्या सामाजिक लढ्याच्या संदर्भात चीनच्या भिंतीवर तैयानमेन चौकात झालेल्या रक्तरंजनावर लिहिलेली 'भिंतीला फुटले पंख' ही कविता - एकंदरीत या सगळ्याच कविता तत्कालीन सामाजिक व्यथांचा उद्घोष करणाऱ्या आहेत. व्हिएतनाम व बांगलादेश येथील सामाजिक दुरावस्था व शोषणावरही कांतांनी प्रहार केला आहे. क्रांतिदर्शी, प्रकाशपूजन, देहभान जागवून बेभान करणारी कांतांची कविता ही अगदी भावतरल, संवेदनशील व हळुवारही होती. जीवनातील सौंदर्य, सुखदुःख, प्रीतिचवियोग, मृत्यू आदी जीवनानुभवांना सजीवपणे प्रकट करीत कांतांची कविता वाचकांना खचीतपणे अंतःर्मुख करणारी आहे. अन् ही कविताच कांतांच्या पारदर्शक व्यक्तिमत्त्वाची प्रमाण होतं. शब्द माझा धर्म / शब्द माझे कर्म / शब्द हेच वर्म / ईश्वराचे असं म्हणणारे कांत आपल्या अखेरच्या कवितासंग्रहात 'मावळते शब्द'मध्ये लिहतात -
'जे शोधित होतो जीवनात दिन-रात
ते नाही सापडले कधीही शब्दात
शब्दातूनी शब्दच फिरूनी हाती आला
दोन्हीतूनी अंती अर्थ गळूनिया गेला
कविताही काय अंती एक निसटणे
लाटांची लीला गळ टाकोनी बसणे -'
आपल्या साठ वर्षांच्या काव्यलेखनानंतरही कांतांची ही गळ टाकून बसण्याची अन्कबवितेची मासोळी गळातून निसटून जाण्याची व्यथा म्हणजेच अजूनही सर्वपूर्ण कविता हाती लागायची आहे ही अतृप्ती दाखवनते. विचारांची परिपक्वता, प्रतिभेची प्रगल्भता व व्यापक मानवतावादी दृष्टि्कोन या कलागुणांवर आरुढ असलेली कांतांची कविता पुढे जीवनानुभूतीचं गहिरेपण घेऊन विशाल पण तितकीच व्यापक अन् गहनखोल जलाशयासारखी आहे. काठावर बसून या जलाशयावरचे तरंगच तितके आपल्याला पहायला मिळतील.
मराठी वाङ्मयाच्या उत्तुंग क्षितिजावर कांतांनी शब्दांचं नवीन आकाश उभं करण्याबरोबरच मराठी कवितेस समृद्ध केलं. निदान कांतांच्या जन्मशताब्दीच्या वर्षात तरी या वास्तवाचा मराठी समीक्षकांनी व साहित्य रसिकांनी मोकळ्या व उदात्त मनाने स्वीकार करायला हवा आहे. प्रा. डॉ. उषा जोशींनी 'पंचधारा'च्या कांत विशेषांकात कांतांच्या कवितेबद्दल आदरभाव व्यक्त करीत असताना लिहिलं आहे- 'कांतांच्या काव्यरचनेत अनेक विभ्रम तसेच रचनेचे अनेकविध बंध आहेत. त्यांच्या विशिष्ट भाववृत्तीतून निर्माण झालेली कविता सदैव सतेज, टवटवीत, रसरशीत आहे. त्यांच्या कवितेची तुलना कुणा इतर कवीबरोबर करावी हा एकदम धोकादायक व निसरडा प्रांत आहे. कांतांची कविता ही अलौकिक सौंदर्याचे वरदान घेवून आलेली आहे. ती चिरतरुण, सुंदर व गुणसंपन्न आहे.' डॉ. उषा जोशींचं कांतांबद्दलचं, त्यांच्या कवितेबद्दलचं मत सर्वथा बरोबर आहे. कारण स्वतः कविवर्य कांतांना शंभर वर्षांनंतर आपल्या कवितेचं भाकीत माहित होतं. म्हणूनच आपल्या आयुष्याच्या अखेरच्या पर्वात कांत म्हणतात -
दिव्याचे तेज डोळ्यांचे वेज कोण तिथे जाळीत आहे
शंभर वर्षांनंतर कोण माझी कविता वाचीत आहे?
-माझी उन्हे मावळली आहेत
माझी फुले कोमेजली आहेत
कालचा प्रकाश कालचा सुवास मात्रा वेलांटीत शोधीत आहे
शंभर वर्षांनंतर कोण माझी कविता वाचीत आहे?
आजची फुले आजच्या उन्हात
पाखरांचा शब्द पिकला रानात
माझी कविता तिथे वाचा जिथे ती दिनरात घडत आहे
शंभर वर्षांनंतर कोण माझी कविता वाचीत आहे?
वा.रा कांत* यांचे ८ सप्टेंबर १९९१ रोजी निधन झाले.
-- संजीव वेलणकर, पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.मु.वा कांत / म.टा
गीता बाली यांचे नाव हरकिर्तन कौर. गीता बाली यांनी वयाच्या १२ व्या वर्षीच फिल्मी करिअरला सुरुवात केली होती. १९५० च्या दशकात त्या स्टारसुध्दा झाल्या होत्या. त्यांच्या चाहत्यांच्या यादीत मा. शम्मी कपूर यांचे सुध्दा नाव सामील आहे. १९५५ मध्ये शम्मी कपूर यांनी घरच्यांना न सांगता गीता बाली यांच्याशी लग्न केले होते. कारण आपले घरचे या लग्नाला परवानगी देणार नाही याची शम्मी कपूर यांना भिती होती. शम्मी कपूर गीता बाली यांना एका चाहत्याप्रमाणे पसंत करत होते, असे शम्मी यांनी एका मुलाखतीत सांगितले होते. ते गीता यांच्यापेक्षा वयाने लहान होते, परंतु चार महिन्यांच्या भेटीने आणि बोलण्याने एकमेकांच्या प्रेमात पडले होते. शम्मीकपूर यांना भेटण्यापूर्वी गीता यांनी पृथ्वीराज कपूर आणि राजकपूर यांच्यासोबत काम केले होते.
राजकपूर यांच्यासोबत त्यांनी 'बांवरे नैन' आणि पृथ्वीराज कपूर यांच्यासोबत 'आनंदमठ' सिनेमात दिसल्या होत्या. मुलींनी किंवा सूनांनी सिनेमात काम करू नये असा कपूर कुटुंबातील नियम होता. परंतु गीता बाली यांनी शम्मीकपूर यांच्यासोबत लग्न केल्या नंतर सुध्दा सिनेमांत काम चालू ठेवले. गीता बाली यांचे मा. भगवान यांच्या सोबतचे खूप चित्रपट गाजले. त्यांचा शेवटचा सिनेमा १९६३ मध्ये आलेला 'जब से तुमको देखा है' होता. बोनी कपूर,अनिल कपूर व संजय कपूर यांचे वडील सुरेंद्र कपूर मा.गीता बाली यांचे सेक्रेटरी होते.मा.गीता बाली यांचे २१ जानेवारी १९६५ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट
दत्तात्रेय व्यंकटेश केतकर हे ज्ञानेश्वरीचे अभ्यासक होते. त्यांचा जन्म २८ ऑक्टोबर १८९० रोजी झाला.
'जान्हवी टीकेसह ज्ञानेश्वरी' , ' जिज्ञासोद्यान (ज्ञानेश्वरीतील शब्दसंशोधन)', 'ज्ञानेश्वर - ५५ दुर्गम स्थलांचे अर्थ' ही पुस्तके, तसेच वडील ज्योतिषाचार्य व्यं. बा. केतकर यांचे चरित्र त्यांनी लिहिले.
## Dattatrey Vyankatesh Ketkar
चंद्रकांत रघुनाथ गोखले यांचा जन्म ७ जानेवारी १९२१ रोजी मिरज येथे झाला. हे मराठी नाट्यअभिनेते व चित्रपट अभिनेते आणि गायक होते. मराठी अभिनेत्री कमळाबाई गोखले या यांच्या आई होत्या. यांचे पुत्र मा.विक्रम गोखले हेदेखील अभिनेते आहेत. यांनी वयाच्या नवव्या वर्षी ’पुन्हा हिंदू’ या नावाच्या मराठी नाटकाद्वारे अभिनयक्षेत्रात पदार्पण केले. ७ दशकांहून अधिक काळाच्या कारकिर्दीत यांनी साठाहून अधिक मराठी नाटकांतून व साठाहून अधिक मराठी चित्रपटांतून अभिनय केला आहे. त्यांनी भूमिका केलेल्या नाटकांपैकी भावबंधन,राजसंन्यास, पुण्यप्रभाव, बेबंदशाही, राजे मास्तर, बॅरिस्टर, पुरुष ही प्रमुख नाटके होत. मराठीशिवाय त्यांनी काही हिंदी चित्रपटांमधूनदेखील भूमिका रंगवल्या. मा.चंद्रकांत गोखले हे गायकही होते. त्यानी ख्याल गायकीचे शिक्षण घेतले होते. गदिमा लिखीत, सुधीर फडके यांनी संगीत दिलेल्या गीतरामायण या गीत काव्यातील १० व्या गीताचे (चला राघवा चला'चे) गायन चंद्रकांत गोखले यांनी केले होते. मा.चंद्रकांत गोखले यांचे २० जुन २००८ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- विकिपीडिया
मृणाल सेन यांचे मूळ नाव माणिकबाबू; पण ‘मृणालदा’ या नावानेच ते चित्रपटसृष्टीत ओळखले जात. त्यांचा जन्म १४ मे १९२३ रोजी फरिदपूर (बांगला देश) येथे झाला. मृणाल सेन यांच्या मातोश्री सूरजूबाला सेन स्वातंत्र्य चळवळीच्या मोठमोठय़ा सभांतून देशभक्तीपर गीत गायच्या. बिपिनचंद्र पाल यांचं त्यांच्यावर मुलीसारखं प्रेम होतं. मृणाल सेन यांचे वडील दिनेशचंद्र सेन हे वकील होते. ते कमाईतला मोठा हिस्सा क्रांतिकारकांना शस्त्रांसाठी पैसा पुरवायला द्यायचे. चित्तरंजनदास, नेताजी बोस अशी दिग्गज मंडळी फरीदपुरात त्यांच्याकडेच उतरायची. अशा वातावरणाचा योग्य तो परिणाम होऊन वयाच्या सातव्या वर्षी मृणालकांती दिनेशचंद्र सेनने पोलिसांच्या तोंडावर ‘वंदे मातरम’ नारा घुमवला आणि काही तास पोलीस ठाण्याची हवा चाखली..
त्यांचे माध्यमिक शिक्षण फरिदपूर येथे झाले. पुढे कोलकात्यामधील स्कॉटिश कॉलेजात त्यांनी भौतिकशास्त्राचे अध्ययन केले. या काळात त्यांचा संबंध कम्युनिस्ट पक्षाशी व पक्षाच्या सांस्कृतिक कार्यक्रमांशी आला. मात्र ते पक्षाचे सदस्य झाले नाहीत. तसेच ‘इप्टा’ (इंडियन पीपल्स थिएटर असोसिएशन) या संघटनेशी ते संबंधित होते (१९४३–४७). दरम्यान चित्रपटाच्या सौंदर्यशास्त्रावरील ब्लादिमीर नेल्सन यांचे सिनेमा अॅतज ग्राफिक्स आर्ट हे पुस्तक त्यांच्या वाचनात आले. तेव्हापासून त्यांची चित्रपटविषयक आस्था आणि रुची वाढीस लागली. सुरुवातीला काही काळ पत्रकारिता व वैद्यकीय प्रतिनिधीची नोकरी केल्यानंतर कोलकात्यामधील एका चित्रपट स्टुडिओत ध्वनितंत्रज्ञ म्हणून त्यांनी काम केले. येथपासूनच त्यांच्या चित्रपटकारकीर्दीस सुरुवात झाली.
मृणाल सेन यांनी १९५५ मध्ये रात भोरे (द डॉन ) हा पहिला बंगाली चित्रपट दिग्दर्शित केला; मात्र तो यशस्वी ठरला नाही. त्यानंतरच्या नील आकाशेर नीचे (अंडर द ब्लू स्काय, १९५८) या चित्रपटाने ते सर्वसामान्य लोकांमध्ये परिचित झाले; तर त्यांचा बैशे श्रावण (१९६०) हा चित्रपट व्हेनिस चित्रपटमहोत्सवात दाखवला गेल्याने त्यांना आंतरराष्ट्रीय कीर्ती मिळाली. पुढील काळात पुनश्च५ (ओव्हर अगेन, १९६१), प्रतिनिधी (द रेप्रिझेन्टेटिव्ह, १९६४), आकाशकुसुम (अप इन द क्लाउड्स, १९६५) आणि माटीर मानिष (मॅन ऑफ द सॉइल, १९६६) हे चित्रपट त्यांनी निर्माण केले. त्यानंतर शासकीय अनुदानातून कमी खर्चात बनविलेल्या भुवन शोम (१९६९) या हिंदी चित्रपटाने त्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरांवर मानाचे स्थान मिळवून दिले.
मृणाल सेन यांचे नेटके कलात्मक दिग्दर्शन, उत्पल दत्त व सुहासिनी मुळ्ये यांचा प्रमुख भूमिकांतला उत्कृष्ट अभिनय, हलकाफुलका निरागस विनोद, अर्थगर्भ संहिता, अमिताभ बच्चन यांनी सूत्रधार म्हणून दिलेला उसना आवाज अशा अनेक गुणवैशिष्ट्यांमुळे हा चित्रपट भारतीय सिनेसृष्टीत युगप्रवर्तक ठरला. ह्या चित्रपटापासून भारतातील वास्तवदर्शी चित्रपटचळवळीला चालना मिळाली, तसेच सेन यांच्या कारकीर्दीला नवे वळण लाभले. पुढील काळात सेन यांनी राजकीय पार्शभूमी असलेले सामाजिक आशयाचे चित्रपट बनविण्यास सुरुवात केली. त्यामुळे मार्क्सवादी कलावंत अशी त्यांची ख्याती झाली. या काळातील कोलकात्यामधील राजकीय अस्थिरतेस व अनागोंदीच्या स्थितीस मध्यमवर्गीय समाजाची उदासीन, निष्क्रिय वृत्ती कारणीभूत असल्याची त्यांची भूमिका होती. त्याचे प्रभावी दर्शन त्यांनी कोलकाता शहरावरील शोकात्म चित्रपटांतून घडवले. उदा., इंटरव्ह्यू (१९७१), कोलकाता ७१ (१९७२) आणि पदातिक (द गूरिला फायटर, १९७३) इत्यादी. हे चित्रपट व त्यांमागील त्यांची मध्यमवर्गीय समाजाला दोषी ठरवण्याची भूमिका त्या काळात काहीशी वादग्रस्त ठरली. १९७९ नंतर त्यांच्या चित्रपटाचा रोख बदलला. चित्रपटातील सामाजिक वास्तवाच्या चित्रणाऐवजी मानवी अंतर्मनाच्या चित्रणाकडे ते वळले. आपल्या एकूण कारकीर्दीत त्यांनी सु. २८ चित्रपट, १४ लघुपट व ५ अनुबोधपट निर्माण केले. सेन यांनी चित्रपटमाध्यमाचा वापर कुशलतेने व समर्थपणे केला. केवळ एकाच पठडीतील साचेबद्ध चित्रपट न बनविता त्यांनी सातत्याने नवनवीन प्रयोग केले. त्यांच्या चित्रपटांतून अस्तित्ववाद, मार्क्सवाद, जर्मन अभिव्यक्तिवाद, इटालियन नववास्तववाद अशा विविध विचारसरणी व शैली यांचा प्रत्यय येतो.
त्यांच्या चित्रपटांचे शेवट हे प्रेक्षकांना अंतर्मुख व्हावयास भाग पाडणारे, अगदी अनपेक्षित आणि वेगळे असतात. चित्रपटांच्या माध्यमातून त्यांनी औपरोधिक विनोदाच्या साहाय्याने ग्रामीण भारताचे वास्तववादी दर्शन घडविले. कोलकाता शहरावरील शोकात्म चित्रपटांमध्ये त्यांनी नवीन चित्रीकरणशैलीचा प्रयोग करून तुकड्यातुकड्यांतून आविष्कृत होणाऱ्या निवेदनपध्दतीचा वापर केला. मध्यमवर्गीयांची नैतिकतेबद्दल असणारी मनोवृत्ती आणि तिच्या विविध सूक्ष्म पैलूंचे दर्शन त्यांनी इक दिन प्रतिदिन (अँड क्वाएट रोल्स द डे, १९७९) आणि खारिज (द केस इज क्लोज्ड, १९८२) या चित्रपटांतून घडविले. त्यांच्या अस्तित्ववादी आशयसूत्र असलेल्या खंडहर (द रुइन्स, १९८३) या चित्रपटाची पटकथा इंग्रजीत पुस्तकरूपात उपलब्ध आहे (१९८४). कोरस (१९७४) या त्यांच्या चित्रपटात पाश्चिमात्य प्रभावाखालील उद्योगजगताचे अतिवास्तववादी शैलीत चित्रण आहे, तर मृगया (१९७६) या हिंदी चित्रपटात ब्रिटिश राजवटीच्या वर्चस्वाखालील आदिवासी जमातीचे चित्रण आहे. या चित्रपटात मिथुन चक्रवर्तीने साकारलेली आदिवासी नायकाची भूमिका राष्ट्रीय पारितोषिक विजेती ठरली. त्यांनी बंगालीशिवाय अन्य भाषांतही चित्रपट निर्माण केले. त्यांत भुवन शोम व एक अधुरी कहानी (१९७२) हे हिंदी चित्रपट; माटीर मानिष हा ओडिया चित्रपट; ओका ऊरी कथा (अ व्हिलेज स्टोरी, १९७७) हा तेलुगू चित्रपट आदींचा समावेश होतो. अशा बहुभाषिक चित्रपटांमुळे राष्ट्रीय पातळीवर दिग्दर्शक म्हणून त्यांची प्रतिमा प्रस्थापित झाली.
सामान्य प्रेक्षकांना रुचणारे राजकीय विषयांवरचे बुध्दिवादी चित्रपट काढल्याने त्यांना भारतीय चित्रपटांच्या इतिहासात मानाचे स्थान प्राप्त झाले. अशा नव्या वळणाच्या राजकीय चित्रपटांच्या प्रवाहाचे ते प्रवर्तक मानले जातात.
मृणाल सेन यांच्या अनेक चित्रपटांना आंतरराष्ट्रीय चित्रपटमहोत्सवांमध्ये विविध पारितोषिके मिळाली. कान्स, बर्लिन, व्हेनिस, मॉस्को, कार्लोव्ही व्हेरी, माँट्रिऑल, शिकागो, कैरो इ. चित्रपटमहोत्सवांतून त्यांचे चित्रपट गौरविण्यात आले. भुवन शोम, इक दिन प्रतिदिन आणि अकालेर सान्धने (इन सर्च ऑफ फॅमिन, १९८०) या चित्रपटांसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाची पारितोषिके मिळाली. तसेच भारत सरकारतर्फे पद्मभूषण (१९८१), भारतीय चित्रपटसृष्टीतील दादासाहेब फाळके हा सर्वोच्च पुरस्कार (२००४) हे त्यांना लाभलेले अन्य पुरस्कार होत. ते संसदेच्या सभागृहाचे सन्माननीय सदस्यही होते (१९९८–२००३). फ्रान्स सरकारने त्यांना कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ आर्ट्स अँड लेटर्स या फ्रान्समधील सर्वोच्च पुरस्काराने गौरविले (१९८५). रशियन सरकारनेही ऑर्डर ऑफ फ्रेंडशिप या किताबाने त्यांना सन्मानित केले (२००१). अनेक विद्यापीठांनी त्यांना डॉक्टरेट ही मानद पदवी बहाल केली.
त्यांनी ऑलवेज बीइंग बॉर्न हे आत्मचरित्र लिहिले (२००४). त्यांना विविध आंतरराष्ट्रीय चित्रपटमहोत्सवांतून जीवन गौरव पुरस्कार देण्यात आले (२००८; २००९; २०१२). मृणाल सेन यांचे ३० डिसेंबर २०१८ रोजी निधन झालं.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
मुंबईतील श्री. गाडगे महाराज मिशनच्या धर्मशाळा असोत, वा मेळघाटातील कुपोषणग्रस्त मुलांसाठी अन्नदान, कृष्ठरोग्यांची सेवा असो वा गाडगेबाबांनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्यासाठीचे अन्नदान... अमरावतीच्या नागरवाडीचे बापूसाहेब देशमुख यांचे अशा विविध क्षेत्रातील सेवाकार्य गेली ४० वर्षे अखंड सुरु आहे. वंचितांची सेवा करा रे, हा संत गाडगेबाबांचा संदेश त्यांनी अंगात भिनवला आहे.
वंचितांच्या सेवेचा पाईक
आधुनिक मुलांच्या गोष्टींव्यतिरिक्त ताम्हनकरांनी अंकुश, अविक्षित, नारो महादेव, नीलांगी अशा ऐतिहासिक धाटणीच्या कथाही लिहिल्या होत्या.
अप्पासाहेब पटवर्धन हे प्रसिद्धीपासून अलिप्त राहिले होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यात गोपुरी आश्रम आहे. कोकणचे गांधी म्हणून प्रसिध्द असलेल्या आप्पासाहेब पटवर्धन यांनी या आश्रमाची स्थापना केली. परिसरातील युवकांना हाताशी धरुन येथे त्यांनी गोबर ग्रॅस प्रकल्प सुरु केला.
त्यांनी लिहिलेले ‘पंडिता रमाबाईंचे चरित्र’ हे चरित्र लिखाणाचे एक उत्तम उदाहरण आहे. त्यांचे लिखाण स्त्रीवादी आणि वास्तववादी होते. ज्योत्स्ना देवधर यांच्या कथांतून आपल्याला स्त्रीच्या वाट्याला येणारी दु:खे, वेदना, तिच्या जीवनातील कारुण्य यांचे चित्रण पहायला मिळते.
Copyright © 2025 | Marathisrushti