(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • अनिल बिस्वास – चित्रपट संगीताचे आद्यपीठ

    या संगीतकाराला भारतीय संगीताची प्रचंड आवड होती आणि त्यासाठी कुठलीही लोककला आत्मसात करण्यास त्यांनी मागेपुढे पाहिले नाही. त्यामुळे, एक फायदा झाला, त्यांच्या गाण्यात सुश्राव्यता तर आलीच पण लोकसंगीतातील “टिकाऊपणाचा” जो अंगभूत गुण असतो, त्या गुणाचा, या संगीतकाराने केलेल्या गाण्यांना फायदा आपसूकच मिळाला.

  • ज्येष्ठ सतार वादक अब्दुल हलीम जाफर खान

    भारतीय चित्रपट सृष्टीतील गाणी आपल्या सतार वादनाने अजरामर करणारे सदाबहार व्यक्तिमत्त्व म्हणजेच ज्येष्ठ सतारवादक उस्ताद अब्दुल हालीम जाफर खान. उस्ताद अब्दुल हलीम जाफर खाँ यांच्यासाठी सतार ही त्यांची सखी होती, प्रेयसी होती आणि प्रेयसही होती. प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचूनही ते अगदी सामान्य जीवन जगले.

  • मराठी रंगभूमीवरील लोकप्रिय गायक नट श्रीपाद नेवरेकर

    श्रीपाद नेवरेकर यांनी इनायत हुसेनखॉं व खादिम हुसेनखाँ यांच्याकडे अनेक वर्षे शास्त्रोक्त गायनाचे शिक्षण घेतले. त्यांचा जन्म ३ जुलै १९१२ रोजी झाला. गंधर्व नाटक मंडळीत प्रवेश केल्यानंतरच त्यांच्या नावाचा खरा बोलबाला झाला. त्या काळात त्यांनी बालगंधर्व आणि गणपतराव बोडसांसारख्या प्रसिद्ध नटांबरोबर विविध पुरुष भूमिका केल्या. त्यांपैकी स्वयंवरातील भीष्मक, द्रौपदीमधील दुर्योधन, सौभद्रातील कृष्ण, एकच प्यालातील रामलाल, मृच्छकटिकातील चारुदत्त आणि संशयकल्लोळमधील आश्विनशेट या त्यांच्या लोकप्रिय भूमिका होत्या; तर स्वयंवरातील ‘जा भय न मम मना’, मृच्छकटिकातील ‘रजनीनाथ हा नभी उगवला’, सौभद्रातील ‘बहुत दिन नच भेटलो सुंदरीला’, एकच प्याल्यातील ‘वसुधातल रमणीय सुधाकर व्यसनघनतिमिरी’, शारदेतील ‘बिंबाधरा मधुरा’ आणि संशयकल्लोळ मधील ‘कर हा करी धरिला शुभांगी’ ही त्यांनी गायलेली पदे श्रोत्यांच्या मनाची पकड घेणारी होती. गंधर्व नाटक मंडळी बंद झाल्यानंतर ठेकेदारांनी आयोजित केलेल्या नाट्यप्रयोगात ते त्यांच्या लोकप्रिय भूमिका वारंवार करीत असत; परंतु प्रकृतीच्या अस्वास्थ्यामुळे ते पुढे नाट्यव्यवसायातून निवृत्त झाले. १९७३ साली गोव्याच्या संगीत अकादमीत सुगम संगीताचे शिक्षण म्हणून त्यांची नेमणूक झाल्यामुळे ते पणजी येथे स्थायिक झाले व सुगम संगीताचे शिक्षक म्हणून त्यांनी १९७६ सालापर्यंत काम केले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ:- इंटरनेट

  • अनिल मेहता

    साहित्य अकादमी पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य परिषद पुरस्कार, फेडरेशन ऑफ इंडिअन पब्लिशर्स यांच्या वतीने दिला जाणारा ‘एक्सलन्स इन बुक प्रॉडक्शन’ पुरस्कार असे अनेक पुरस्कार मेहता पब्लिकेशनच्या पुस्तकांना लाभले आहेत.

  • ऐश्वर्या नारकर

    व्यावसायिक रंगभूमीवर त्यांचं पहिलं नाटक ‘ गंध निशिगंधाचा ‘ हे होतं. पुढे त्यांनी अनेक नाटकांमध्ये आपल्या अभिनयाचं गारुड , रसिक प्रेक्षकांच्या मनावर केलं. त्यातील सध्या चर्चेत असलेलं सोयरे सकळ ह्या नाटकात त्यांनी दुहेरी भूमिका साकारल्या आहेत.

  • मीनाकुमारी

    मीनाकुमारी एक शायरां (उर्दू कवयित्री) सुध्दा होत्या हे खूप जणांना माहित नसेल.

    त्यांचे काव्यातलं नाव (तखल्लुस) होतं नाझ. उर्दू शायरीसाठी वरदान ठरणारी दुःखाची देणगी त्यांना व्यक्तिगत जीवनातही भरपूर लाभली होती, असं म्हणतात.
    हे दोन शेर मा.मीनाकुमारी यांचे

    आगाज तो होता है, अंजाम नहीं होता
    जब मेरी कहानीमें, वो नाम नहीं होता.....
    हंस हंस के जवॉं दिलके हम क्यों न चुने टुकडे
    हर शख्स की किस्मत में ईनाम नहीं होता....

    ती म्हणते, माझी प्रेमाची कहाणी सांगायला (अथवा लिहायला) मी सुरुवात (आगाज) तर करते; पण ते नाव वगळून माझी कहाणी पुढे जाऊच शकत नाही; व तिचा शेवटही (अंजाम) होऊ शकत नाही.
    पण तरीही ते नाव ती कवितेत गुंफत नाही. ते नाव तिला अव्यक्तच ठेवावंसं वाटतं. कारण, प्रेमातील वफादारीला( विश्वास) बाधा येऊ नये. एकवेळ कहाणी ‘अधूरी’ राहिली तरी चालेल !

    दुस-या शेरात तिनं म्हटलंय्,
    -----हृदयाचे झालेले तुकडेही हसत हसत गोळा करायला काय हरकत आहे? प्रत्येकाच्याच नशिबात, प्रेमासाठी प्रतिप्रेमाचं बक्षीस (ईनाम) मिळणं लिहिलेलं नसतं !....

    हाही ख-या प्रीतीचा आणकी एक गुण ! जे मिळेल ते स्वीकारायचं. ज्या व्यक्तीवर आपण प्रेम केलं तिच्याकडून आपल्याला प्रेम मिळालंच पाहिजे, असा हट्ट का असावा? ते दान मिळणार नाही हेही स्वीकारायचं. असं निरपेक्ष प्रेम करता आलं पाहिजे...

    प्रेमाची अपेक्षा करता येईल असं एकच ठिकाण आहे; तिथं आपलं प्रेम रुजू होईल व त्याला प्रेमाच्या रूपाने उत्तरही मिळेल; ते ठिकाण म्हणजे...ईश्वर !!

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३

  • स्वातंत्र्य चळवळीचे इतिहासकार – वसंत गोविंद पोतदार

    वसंत गोविंद पोतदार यांना संगीत दिग्दर्शक सी.रामचंद्र यांनी १९६२ साली स्वतःचे सहाय्यक म्हणून काम करण्यासाठी मुंबईत आणले.पु.ल. देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोतदार यांनी ‘वंदे मातरम्’च्या क्रांतिगाथेवर भारतभर हिंडून एकपात्री प्रयोग केले.

  • महेंद्र नारायण भावसार

  • पं. कृष्ण गुंडोपंत गिंडे उर्फ के. जी. गिंडे

    पं. गिंडे यांचा जन्म कर्नाटक राज्यात बेळगाव जवळ बैलहोंगल येथे झाला. त्यांनी लहान वयातच संगीतात रूची दाखविण्यास सुरुवात केली व पुढे आपले सारे आयुष्य संगीताला वाहून घेतले. ते श्रीकृष्ण नारायण रातंजनकर यांच्याकडे वयाच्या अकराव्या वर्षी गाणे शिकू लागले. त्यासाठी त्यांनी लखनौ येथे प्रयाण केले व रातंजनकरांच्या घरातील एक सदस्य बनले. तिथे ते मॉरिस कॉलेजातील व्ही. जी. जोग, एस. सी. आर. भट, चिन्मय लाहिरी अशा संगीताभ्यासात बरेच पुढे असलेल्या विद्यार्थ्यांच्या सहाय्याने संगीत अध्ययनात प्रगती करू लागले. वयाच्या सोळाव्या वर्षापर्यंत गिंडे यांनी संगीताच्या क्षेत्रातही बरीच प्रगती केली होती व माध्यमिक शाळेचा अभ्यासक्रमही पूर्ण केला होता. हळूहळू पं. गिंडे रातंजनकरांच्या मदतनीसाची भूमिका निभावू लागले. त्याच जोडीला त्यांचे संगीत क्षेत्रातील ज्ञान व उमजही वाढत होती. त्यांनीआकाशवाणीवर व वेगवेगळ्या संगीत महोत्सवांत आपल्या गायनाचे कार्यक्रम करण्यास सुरूवात केली. तसेच आपले सहाध्यायी व शिक्षक एस. सी. आर. भट यांच्या जोडीने ते ध्रुपद शैलीत जुगलबंदीही करू लागले. १९५१ मध्ये त्यांनी मुंबई येथील भारतीय विद्या भवन येथे शिक्षकाची नोकरी स्वीकारली. १९६२ मध्ये ते वल्लभ संगीत विद्यालयाचे प्राचार्य पदी नियुक्त झाले. एक उत्तम शिक्षक, विद्वान, गायक व संगीत रचनाकार अशा विविध भूमिका त्यांनी निभावल्या. त्यांनी कोलकाता येथील आयटीसी संगीत संशोधन अकादमीतही ज्ञानदानाचे कार्य केले. त्यांची भारतीय शास्त्रीय संगीताविषयीची सप्रात्यक्षिक व्याख्याने प्रचंड लोकप्रिय होती. पं. गिंडे यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार व महाराष्ट्र गौरव पुरस्कार अशा दोन पुरस्कारांनी गौरविण्यात आले.त्यांच्या साठाव्या वाढदिवसा निमित्त आयोजित समारंभास पं. भीमसेन जोशी, कुमार गंधर्व व पु. ल. देशपांडे अशा संगीत साहित्य क्षेत्रातील प्रभृतींनी आपली उपस्थिती लावली होती. के. जी. गिंडे १३ जुलै १९९४ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे
    संदर्भ:- इंटरनेट

  • दर्जेदार काव्य रचना करणारे कवि राजा बढे

    कळीदार कपूरी पान’, ‘चांदणे शिंपीत जाशी’, ‘जय जय महाराष्ट्र माझा’ अशा दर्जेदार काव्य रचना करणारे कवि राजा बढे यांचा जन्म १ फेब्रुवारी १९१२ रोजी झाला. राजा बढे हे नावाप्रमाणंच राजा-माणूस होते. राजा बढे हे नामवंत गीतकाव्य आणि भावकाव्य लिहिणारे कवी... रुबाबदार,प्रसन्न व्यक्तिमत्त्व, राजस छबी, कुसुमकोमल भावनांना शब्दबद्ध करणारा, कोमलवृत्तीचा हा प्रतिभासंपन्न कवी, पण मनात देशभक्तीचा स्फुलिग सांभाळणारा राष्ट्रप्रेमी म्हणजे राजा बढे. आजच्या पिढीला कदाचित राजा बढे हे नावसुद्धा माहीत नसेल. परंतु ज्यांच्या गीतांची सुदैवाने चिरफाड न होता त्यावर रिमिक्सचा मुलामा चढलेला नाही, अशी गीते राजा बढे यांच्या नावावर आहेत. राजा बढे यांचे जन्म नागपूरचा. प्राथमिक शिक्षण छिंदवाडा येथे तर माध्यमिक शिक्षण नागपूरच्या टिळक विद्यालयात झाले.

    १९३५ मध्ये त्यांनी पंजाब मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण केली. पुण्याच्या दैनिक ‘सकाळ’ मध्ये संपादकीय विभागात त्यांनी नोकरी केली. नागपूरच्या दैनिक ‘महाराष्ट्र' मध्ये एक वर्ष ते सहसंपादक होते. त्याचवेळी ‘वागीश्वरी'च्या संपादक मंडळात ते कार्यरत होते. पुढे साप्ताहिक ‘सावधान' मध्ये मावकर-भावे यांच्यासोबत त्यांनी कार्य केले. दरम्यान कॉलेज करून पदवी प्राप्त करण्याचा त्यांचा प्रयत्न अपुरा राहिला. त्यांनी बरचसं स्फुटलेखन "कोंडिबा' या टोपणनावानं केलं. वयाच्या सतरा-अठरा वर्षांपासूनच कविता लिहू लागले. नवकवींच्या काव्यसंग्रहात राजा बढे यांच्या कवितांना विशेष स्थान असे. 'ओहोळ' हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह. कवितांची आवड जोपासणाऱ्या बढे आई-वडिलांच्या निधनानंतर मोठा भाऊ म्हणून लहान भावंडांची जबाबदारी, पालनपोषण यातच सर्वस्व मानून स्वत: अविवाहित राहिले.

    १९४० च्या आसपास चित्रपट व्यवसायात त्यांनी प्रवेश केला. ‘सिरको फिल्म्स' मध्ये दोन वर्ष त्यांनी कामे केली. १९४२ मध्ये ते "प्रकाश स्टुडिओ'त रुजू झाले आणि त्यांनी "रामराज्य' चित्रपटाची गाणी लिहिली. महेश कौल सोबत ‘अंगुरी' चित्रपटात काम केले. पुढं १९४४ मध्ये ते मराठी रंगभूमीकडं वळले. आळतेकर यांच्या "लिट्‌ल थिएटर्स'च्या "कलेसाठी सारस्वत' नाट्यप्रयोगात त्यांची भूमिका होती. ‘संत बहिणाबाई,' ‘गळ्याची शपथ' या चित्रपटांसाठी त्यांनी गीतलेखन केले. १९५६ ते १९६२ या कालखंडात ते आकाशवाणीवर ‘निर्माता' म्हणून कार्यरत होते. आपल्या वाङ्मयीन अभिरुचीला पोषक ठरतील, अशा व्यवसायांसी धरसोड ते आयुष्यभर करीत राहिले, तरी आपले कवित्व ते सतत सांभाळून होते. "चांदणे शिंपीत जाशी, चालता तू चंचले', "दे मला गे चंद्रिके प्रीती तुझी', "प्रेम केले काय हा झाला गुन्हा?' इत्यादी सुरेल भावगीतं त्यांनी लिहिली. स्त्रियांचे मनोभाव आकर्षकरीत्या शब्दबद्ध करण्यात बढे सिद्धहस्त होते. "वाट कशी चुकले रे', "कधी न पाहिले तुला', "होशी तू नामानिराळा', "काय कोणी पाहिले,' "मला मोहू नका' इत्यादी गीतांमधून व्याकुळता, विरहार्तता, मीलनातुरता असे मनोभाव त्यांनी नाट्यपूर्ण रीतीनं चितारले आहेत. संस्कृत काव्याचा त्यांचा चांगला अभ्यास होता. आपली भाषा अलंकृत करण्याची क्षमता त्यांच्यात असली तरी संस्कृत शब्दांच्या भाराखाली ती दडपली जाणार नाही, याचं भान बढे यांच्या गीतांमध्ये दिसतं.

    बढे यांचा उर्दू शायरीचाही अभ्यास होता. त्या पद्धतीच्या भावाविष्काराचा ढंग आणि कल्पनाविलासाची पद्धत बढे यांनी त्यांच्या काही गझलसदृश भावगीतांमध्ये अंगीकारली. स्वातंत्र्यवीर सावरकर हे बढे यांचं परमदैवत होतं. दिग्दर्शक विजय भट यांच्या 'रामायण' चित्रपटाकरिता स्वातंत्र्यवीर सावरकरांनी गीतकार म्हणून राजा बढे यांचे नाव सुचविले. या चित्रपटातील 'सृजनहो परिसा रामकथा, जानकी जीवन विरह व्यथा' हे बढे यांनी लिहिलेले गीत काळजाचा ठाव घेणारे ठरले. त्यानंतर महात्मा विदूर, गळ्याची शपथ अशी काही चित्रपटांसाठी गीतलेखन त्यांनी केले. हे करीत असताना व्यावसायिक हेतू त्यांनी कधीच ठेवला नाही. धोतर, कुडता असा वेष आणि वरण-भात प्रिय असणाऱ्या बढेंच्या लेखी पैशाला फारसे महत्त्व नव्हते. कामाला महत्त्व देणाऱ्या बढेंच्या अनेक भावगीतांमधून कवीच्या भावना हळुवार प्रकट होतात आणि मनाला विलक्षण आनंद देऊन जातात. म्हणूनच लता मंगेशकर, आशा भोसले बढे यांच्या गीतांवर प्रेम करीत. ‘हसताच नार ती अनार मनी फुले' ही बढे यांची गजानन वाटवे यांनी गायिलेली, ‘हसतेस अशी का मनी' लता मंगशकरांनी गायलेली, तर ‘चांदणे शिपीत जा' ही आशा भोसले यांनी गायिलेली गीतरचना , कुमार गंभर्वांनी ‘प्रेम केले काय हा झाला गुन्हा' ही बढे यांची गायिलेली रचना लोकप्रिय झाली. राजा बढे हे कट्टर हिदुत्ववादी होते. स्वा. सावरकर हे त्यांचे दैवत होते. त्यांचे राष्ट्रप्रेम त्यांच्या ‘क्रांतिमाला' या संग्रहातून वेळोवेळी दिसून येते. त्यात २१ कविता आहेत. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळातील देशभक्तिपर गीते आहेत.

    प्रत्यक्ष सावरकरांनी ‘प्रस्तावनेत' ‘‘आपण स्वत:च नामवंत, सुप्रतिष्ठित प्रतिभासंपन्न साहित्यिक असल्याने, माझ्या प्रस्तावनेची गरज नाही'' असे गौरवोद्गार काढले आहेत. १९३५ ते १९५९ दरम्यानच्या सामाजिक-राजकीय घडामोडींचे पडसाद यात आहेत. ‘विस्मृतीत गुंफलेली क्रांतिमाला', ‘गगनात आज जो चंद्र सुखे मिरवावा । ते तेज घेऊनी करिती काजवे कावा । तो बाबू गेनू, कोतवाल उरलेले । विसरलो अनामिक किती बळी गेलेले', ‘सुजला सुफला देश आमचा', ‘हिमालय थिजला । थिजला धीरचा । गंगा सिधुतुनी वाहतो प्रवाह रुधिराचा' अशा सर्वच कवितांमध्ये मंगल पांडे, हुतात्मा फडके, चाफेकर, सेनापती बापट अशा क्रांतिवीरांची नावे गुंफून त्यांना विस्मृतीत टाकल्याचे दु:ख व्यक्त केले आहे. ‘घडू दे पुन्हा एकदा भारत' मधून सावरकरांच्या दिव्य देशभक्तीचा गौरव केलेला असून, ‘नवोन्मेषशाली कवींच्या कवे' असे सावरकरांना संबोधले आहे. राजा बढे यांनीच. १९६४ साली मुंबईत बढे यांच्या पुढाकाराने प्रथमच कथाकथनचा कार्यक्रम झाला, या कार्यक्रमात पु. ल. देशपांडे, गदिमा यांनी प्रथमच कथा कथन केल्या होत्या.

    मुंबई आकाशवाणीवरच्या नोकरीनंतर बढे यांनी छोटे छोटे माहितीपट करून दिले. नंतर बंधू बबनराव यांच्या मदतीनं त्यांनी "स्वानंद चित्र' ही संस्था उभी केली आणि "रायगडचा राजबंदी' हा संभाजीमहाराजांच्या जीवनावरील चित्रपट काढला. गीत, गझल याप्रमाणेच ‘चारोळी' हा रचनाप्रकार बढे यांनी हाताळला. ‘कोंडिबा' हे टोपण नाव वापरून काही राजकीय वात्रटिका त्यांनी लिहिल्या... त्या मुंबईच्या ‘विविधवृत्त' साप्ताहिकातून प्रकाशित झाल्या होत्या. राजा बढे हे केवळ कवी नव्हते. काव्याखेरीज ‘किती रे दिन झाले,' ही पत्रमय कादंबरी; ‘स्वप्नगंधा',‘चतुर किती बायका,' ‘ही रात सवत बाई,' ‘पेचप्रसंग,' ‘अशी गंमत आहे' अशी पाच नाटके त्यांनी लिहिलीत... तरी बढेंची ओळख कवी म्हणूनच कायम राहिली. "गर्जा महाराष्ट्र माझा' हे महाराष्ट्रगीत म्हणजे कविवर्य राजा बढे यांच्या काव्यप्रतिभेचा परमोच्च बिंदू होय. १९६० साली संयुक्त महाराष्ट्राची घोषणा झाली. या विजयानिमित्त बढे यांच्या या रचनेची ध्वनिमुद्रिका "एचएमव्ही'नं तयार केली.

    शाहीर साबळे यांच्या खड्या आवाजातील आणि संगीतकार श्रीनिवास खळे यांचा स्वरसाज असलेल्या या गीताने महाराष्ट्राची थोरवी सातासमुदापार पोहोचवली.. संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर ठिकठिकाणी कार्यक्रमांत ऐकवलं जाणारं हे गीत आजही तितकंच ताजं, टवटवीत आहे. राजा बढे यांना पान खायची भारी हौस होती. याच पानावर त्यांनी 'कळीदार कस्तुरी पान' लावणी लिहिली. ती सुलोचना चव्हाण यांनी अशा ठसक्यात गायिली की, भल्याभल्यांना पानाचा मोह आवरायचा नाही. पण अनेकांना ती राजा बढे यांनी लिहिली आहे, हे माहित पण नसेल.
    त्यांनी एक कविता स्वतःविषयीच लिहिली... ते दोन "राजां'चं वर्णन होतं.
    तेव्हा आणि आता...
    एक राजा -
    टोपी किंचित उंच, नीट कलती बाजूस डोकावित
    खासे धोतर, पायघोळ अगदी, टाचेवरी लोळत..
    ओठांनी रसरंग फेकित सदा या मंगलाचे धडे
    आहे काय म्हणुन काय पुसतां? तो हाच राजा बढे..

    दुसरा राजा -
    टोपी सोडून, मुंबईस फिरतो, आता सदा बोडखा
    बंगाली डगला, न पालट दुजा, खाक्या जुना सारखा..
    आहे तोच विडा, अजूनही तसे, ते मंगलाचे सडे
    जैसा नागपुरात, आजही तसा, तो हाच राजा बढे..
    ज्येष्ठ दिवंगत कविवर्य वा. रा. कांत यांनी बढे यांच्याविषयी म्हटलं आहे:-
    "आपल्या कवितेचा धर्म ओळखून शेवटपर्यंत मनाला आल्हाद देणाऱ्या कविता लिहिण्याचं ‘चांद्रव्रत' त्यांनी निष्ठेनं पार पाडलं, यातच त्यांची थोरवी आहे....हा कवी जन्मभर चांदणं शिंपीत जगला आणि चांदणं शिंपीत शिंपीत अचानक निघून गेला. ह्या "चांद्रव्रती'ची आठवण विझणं अशक्य!!'' राजा बढे यांचे ७ एप्रिल १९७७ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट