(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • आनंद दिनकर कर्वे

    ग्रामीण उपयोजीत तंत्रज्ञानाचे एक गाढे अभ्यासक आणि दोनदा अॅश्डेन पुरस्कारप्राप्त (२००२ आणि २००६) भारतीय शास्त्रज्ञ

  • नामवंत व्हायोलीनवादक श्रीधर पार्सेकर

    श्रीधर पार्सेकर हे व्हायोलीन जगतातील मूलभूत कला-सौंदर्य मूल्यांचा शोध घेणारे प्रतिभावंत होते. श्रीधर पार्सेकर यांनी १९४८ मध्ये, व्हायोलीन हे वाद्य शिकू इच्छिणाऱ्या साठी ‘स्वरनिनाद’ ही पुस्तिका लिहिली होती. ‘पार्सेकर आणि व्हायोलीन’ यात अभेदच होता, असे ‘पुलं’म्हणत असत.

  • मराठी चित्रपट संगीत आणि भावगीत गायिका मालती पांडे

    मालती पांडे यांच्या घरात संगीताचे वातावरण होते. त्यांचा जन्म १९ एप्रिल १९३० रोजी झाला. लहानपणापासूनच गाण्याच्या स्पर्धेत भाग घेणाऱ्या मालती पांडे यांनी त्रिवेदी सर व नाशिकचे भास्करराव घोडके यांच्याकडे शास्त्रीय संगीताचे धडे घेतले. किशोरवयातच त्या गाण्याच्या बैठकी करू लागल्या. महाविद्यालयात असताना ''घराबाहेर ''या नाटकातील त्यांच्या भूमिकेचे खूप कौतुक झाले. त्यामुळे प्रभातच्या ''आगे बढो''साठी सुधीर फडके यांनी मालती बाईना बोलावले. ''वेद मंत्राहून आम्हा वंद्य वन्दे मातरम'',''पुढचे पाउल पुढेच टाका'',''त्या तिथे पलीकडे'',हि त्यांची चित्रपटातील गीते खूप गाजली.मालती बाईनी आपल्या आत्मकथनात लिहिले आहे कि ''त्या तिथे पलीकडे ''हे गीत लतादीदींना इतके आवडले कि एका जाहीर कार्यक्रमात त्यांनी ते गायिले होते.

    कोलंबिया कंपनीने त्यांची पहिली ध्वनिमुद्रिका काढली.राजा बढे व संजीवनी मराठे यांचे काव्य तर संगीत होते ''गजाननराव वाटवे यांचे.''ये पिकवू अपुले शेत मंजुळे'',''आला स्वप्नांचा मधुमास''अशी ती दोन गीते होती. ''कुणीही पाय नका वाजवू'',''वळणावरून वळली गाडी''ही वाटवे यांनी स्वरबद्ध केलेली तर ''खेड्यामधले घर कौलारू'',''या कातर वेळी ''हि अनिल भारती यांनी लिहिलेली आणि मधुकर पाठक यांनी स्वरबद्ध केलेली मालतीबाईंची गाणी खूप गाजली. आजही त्यांचे ''या कातर वेळी''हे गीत मनाला वेड लावते. मालतीबाईंच्या स्वरातील कातरवेळ अनामिक हुरहूर लावून जाते तर मालती पांडे यांची गाणी आठवायला सुरुवात झाली की लपविलास तू हिरवा चाफा सुगंध त्याचा छपेल का?

    प्रीत लपवुनी लपेल का? हे गाणे अग्रक्रमाने येते. मालती पांडे यांचे गाणे गीताच्या अर्थाला धरून गाणे असे. फार वर्षांपूर्वीच्या दूरदर्शनवरील एका मुलाखतीत गायिका मालती पांडे म्हणाल्या होत्या, ‘प्रीत लपवुनी लपेल का? हा अनुभव तुमचा, माझा, प्रत्येकाचा आहे. मालती पांडे यांचे २७ डिसेंबर १९९७ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • द्वारकानाथ कोटणीस

    डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांचा जन्म १० ऑक्टोबर १९१० रोजी सोलापूर येथे झाला. डॉ.कोटणीस यांचे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले या शहराचे घट्ट नाते होते. डॉ.कोटणीसांचा जन्म वेंगुर्ल्यात झाला नसला, तरीही कोटणीस कुटुंब हे मूळचे वेंगुर्ल्याचे असून अनेक वर्षे ते वेंगुर्ल्यातच राहत होते. डॉ.द्वारकानाथ कोटणीस यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण काही काळ वेंगुर्ल्यातील रा.कृ.पाटकर हायस्कूलमध्ये झाले. तेथेच त्यांच्या भावी आयुष्याची पायाभरणी झाली असे आज अभिमानाने सांगितले जाते. वडील शांताराम यांच्या नोकरीच्या निमित्ताने कोटणीस कुटुंबीय नंतर सोलापुरात स्थायिक झाले, मात्र त्या कुटुंबाचे वेंगुर्ल्याशी असलेले ऋणानुबंध मात्र कधीच तुटले नाहीत. वेंगुर्ले येथील बॅ.खर्डेकर रोडलगतच असलेले“कोटणीस हाऊस” हे डॉ.कोटणीस यांचे मूळ घर. हे घर स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळात “काँग्रेस हाऊस”म्हणून ओळखले जाई. त्या काळात महात्मा गांधी, डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्यासारखे अनेक प्रमुख नेते या “कोटणीस हाऊस”मध्ये मुक्कामाला येत असत. डॉ.द्वारकानाथ कोटणीस यांचे काका काही वर्षे वेंगुर्ले नगरपालिकेचे उपाध्यक्षही होते.

    डॉ.कोटणीस यांच्या पत्नी डॉ.को-चिंग-लान यांनी जीवनाच्या अखेरपर्यंत वेंगुर्ल्याशी ऋणानुबंध उत्तमरित्या जपले होते. वेंगुर्ले आणि एकूणच परिसरातील सार्वजनिक आरोग्याची दैनावस्था पाहून त्या सद्-गतीत होत. ही दैनावस्था दूर करण्यासाठी आपण काही तरी केले तरच आपल्या पतीच्या ऋणातून आपला देश(चीन) काही प्रमाणात मुक्त होईल असे त्यांना वाटे. डॉ.कोटणीस या महान माणसाच्या सेवाभावी वृत्तीचे गोडवे आजही चीनमध्ये गायले जातात.

    १९३६ मध्ये त्यांनी आपले वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले. दुसर्याय महायुद्धात जपानने चीनवर आक्रमण केलेले असताना या महायुद्धात जपानने चीनवर केलेल्या हल्ल्यात चीनच्या जखमी सैनिकांचे खूप हाल झाले. चीन सरकारच्या विनंतीवरून पंडित जवाहरलाल नेहरूंनी चीनच्या मदतीसाठी पाच डॉक्टरांचे मदत पथक पाठविले होते. या मदत पथकाचे प्रमुख होते डॉ. द्वारकानाथ कोटणीस. डॉ. कोटणीस चीनला गेले होते. तेथे त्यांनी वैद्यकीय मोहिमेत भाग घेऊन चार वर्षे रुग्णसेवा केली.वैद्यकीय क्षेत्रातले त्यांच्या हाताचे कौशल्य मात्र चीनच्या भूमीवर जखमी झालेल्या प्रचंड चीनी सैनिकांच्या शुश्रुषेसाठी उपयोगी पडले. कित्येक सैनिकांना औषधपाणी केले, कित्येकांच्या वेदना दूर केल्या तर अनेकांना मृत्यूच्या दाढेतून त्यांनी आपल्या शल्य कौशल्याने ओढून आणले. हे सर्व करीत असताना सैनिकांना वाचविण्याची पराकाष्ठा, अतिश्रम, दूषित हवामान, खाण्यापिण्याची आबाळ आणि वेळ काळ न पाळल्यामुळे त्यांची प्रकृती खालावत चालली होती. परंतु त्याही अवस्थेत स्वतःकडे लक्ष न देता आपले कर्तव्य पार पाडण्यात कोटणीस गुंतलेले होते. कोटणीसांनी तेथील चिनी नर्सिंग प्रशिक्षिका को चिंग लान यांच्याशी विवाह केला. चीनच्या हेबेई प्रांतात कुटाँग खेडे आहे. तेथे डॉ. कोटणीस यांच्या स्मृतीरूपात जुने हॉस्पिटल जतन केले आहे. त्यांची खोली जतन केली आहे. या खेड्यात प्रवेश केल्यानंतर चौकातच डॉ. कोटणीसांचा अर्धपुतळा आहे. त्यांच्या कृतज्ञतेसाठी चीनमध्ये आजही त्यांचे भव्य स्मारक उभे आहे. डॉ. कोटणीस यांनी देश जाती, धर्म याबंधनाच्या पलीकडे जात मानवतेची खऱ्या अर्थानं पूजा केली असं म्हणनं काही वावगे ठरणार नाही. चित्रमहर्षी व्ही. शांताराम यांनी १९४६ साली “डॉ.कोटनीस की अमर कहाणी” हा हिंदी चित्रपट तयार करून डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांच्या चीनमधील मानवतावादी कार्याचा साऱ्या भारतवासियांना परिचय करून दिला. हा चित्रपट जगभर गाजला. डॉ. कोटणीसांचा जीवनप्रवास ‘काळी आई’ हा माहितीपट पण अतिशय सुंदर आहे. चिनी भाषेत डॉ. कोटणीसांना काळी आई असे संबोधले जाते. त्यावरूनच माहितीपटाला नाव दिलेले आहे.
    देवदूत' ही डॉ. संजीव शहा यांनी डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांच्यावरील चरित्रपर कादंबरी लिहिली आहे. या कादंबरीत डॉ. कोटणीस यांनी अनंत हालअपेष्टा सोसून तेथील रुग्णांसाठी जे अथक परिश्रम केले, ती कहाणी तशी सर्वश्रुत आहे. या कादंबरीत बरेच तपशील वाचावयास मिळतात. त्याचप्रमाणे डॉ. कोटणीस यांच्या बालपणापासूनचे स्वभावाचे पैलूही कळतात. लेखकाने परिश्रमपूर्वक आवश्यक ती माहिती गोळा केली आहे. कॅंटन, चांगशा, हॅंको, वूहान असा या वैद्यकीय पथकाचा खडतर प्रवास. अपुर्याण साधनांनिशी, युद्धाच्या छायेत रुग्णांवर उपचार, ठिकठिकाणी स्वागत, वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्धी हे सारे डोळ्यांपुढे साकार होत जाते. कोमिटांग सरकार आणि कम्युनिस्ट यांच्यातील दुराव्यामुळे निर्माण झालेल्या अडचणींचेही चित्रणही येथे येते. औषधाच्या अॅम्प्यूलमध्ये डिस्टिल वॉटर भरण्याचा काळाबाजारही होत होता. भारतीय डॉक्टर आठव्या पलटणीत काम करत होते. ती कम्युनिस्ट नेत्यांच्या प्रभावाखाली होती. पुढे माओ, चौ एन लाय यांच्याशी डॉक्टरांच्या गाठीभेटी झाल्या. ते त्यांच्या व्यक्तिमत्त्वाने प्रभावित झाले. सामान्य चिनी जनता मोठया जिद्दीने, जिवावर उदार होऊन स्वातंत्र्यलढयात उतरलेली पाहून डॉक्टरांच्या मनात भारतीय स्वातंत्र्य लढयासाठी आपल्या या निरीक्षणांचा, अनुभवाचा कसा फायदा करून देता येईल, असे विचार येत. ते तेथील नेत्यांशी चर्चा करीत. दुर्दैवाने डॉक्टरांचा चीनमध्येच मृत्यू झाला.

    ४ नोव्हेंबर १९३९ ला डॉ. कोटणीस, डॉ. अतल, डॉ. बसू हे येनानकडून सिआन मार्गे च्यू तेह यांच्या आठव्या पलटणीच्या सरसेनापतींच्या प्रमुख ठाण्याकडे निघाले. ते २१ डिसेंबर १९३९ ला मुक्कामाला पोचले. वाटेत बर्फाच्छादित डोंगर, अवघड वळणे या प्रवासाचे वर्णन वाचण्यासारखे आहे. किती प्रतिकूल परिस्थितीत, मानवतावादी दृष्टिकोनातून भारतीय डॉक्टर रुग्णसेवा करीत होते, ते वाचून मन थक्क होते. नवखा देश, नवखी माणसे, हवामान प्रतिकूल, मृत्यूची सदैव छाया, सुरवातीला भाषेची अडचण या सगळ्या परिस्थितीत गनिमी काव्याने जखमी सैनिकांवर उपचार करणे, शस्त्रक्रया करणे हे केवढे मोठे आव्हान होते! डॉ. कोटणीस दुसरे बेथ्यून झाले. त्यांना काळी ई हा प्रेमाचा किताब मिळाला. को चिंग लान ही ध्येयवादी, प्रेमळ, समविचारी पत्नी मिळाली. पण तिला छोटया इंग व्हा या आपल्या मुलाला सोडून जगाचा निरोप घ्यावा लागला. डॉ. कोटणीस यांचा ध्येयवेडा, शिस्तप्रिय पण प्रेमळ स्वभाव, समर्पण वृत्ती विविध प्रसंगांतून मनावर ठसते. हे यश लेखकाचे आहे. पुस्तकात छान छायाचित्रेही आहेत. त्यातून हा इतिहास मनात जागा होण्यास मदत होते. सरळ साध्या शैलीतील ही कादंबरी वाचनीय आहे. मा.डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांचे ९ डिसेंबर १९४२ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • दिलखुलास – प्रवीण दवणे

    प्रवीण दवणे… वक्ते, साहित्यिक, मराठीचे अध्यापक आणि एक मनमोकळं व्यक्तिमत्त्व. जे त्याच्या छायाचित्रातून जाणवत राहते…

    पासष्टहून अधिक पुस्तकांसाठीचं लिखाण, अनेक कवितासंग्रह, नाटकांचं लिखाण, तब्बल सवाशेहून अधिक मराठी चित्रपटांसाठीची गीतरचना, अडीचशेहून अधिक कॅसेटस्साठी दोन हजांहून अधिक भावगीतं आणि भक्तिगीतांचं लिखाण, सतत दौऱयावर राहून दर्दी प्रेक्षकांची गर्दी खेचणाऱया कार्यक्रमांचा सूत्रधार आणि सुमारे चार दशकं मराठीचे खमके अध्यापक म्हणून ओळख मिळवलेले आणि कुसुमाग्रजांची एक वेगळीच जवळीक लाभलेला तसंच त्यांच्या नवनवीन कविता खुद्द ज्यांनी त्यांना वाचून दाखवल्या तो भाग्यवान साहित्यिक म्हणजे प्रवीण दवणे.

    ते साहित्य क्षेत्रात येण्यासाठीचा टर्निंग पॉइंट ठरला तो त्यांच्या शाळेत साजरा केला गेलेला शिक्षक दिन. डोंबिवलीतील स. वा. जोशी हायस्कूलला अकरावीला असताना त्यांनी शिक्षक दिनानिमित्त दहावीच्या वर्गासाठी मराठीचा तास घेतला होता. त्यांच्या शिकवणीचं विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी भरभरून कौतुक केलं आणि इथेच त्यांना त्यांच्यात लपलेल्या सुप्त गुणांची वेगळी अशी ओळख झाली. त्यांनी मराठीचा ध्यासच घेतला आणि पुढे साहित्याचा वसाच जपण्याचं कार्य त्यांनी हाती घेतलं.

    बघता बघता त्यांच्या लिखाणाला गती आली आणि वयाच्या विसाव्या वर्षी त्यांनी ‘मंथन’ ही पहिली कादंबरी लिहिली. या कादंबरीच्या लिखाणानंतर त्यांनी मागे वळून पाहिलंच नाही. ‘दिलखुलास’, ‘परीसस्पर्श’, ‘प्रकाशाची अक्षरे’, ‘रे जीवना!’, ‘सावर रे’, ‘शब्दमल्हार’, ‘सूर्यपूजक कुसुमाग्रज’ अशा पासष्टहून अधिक पुस्तकांसाठीचं लिखाण त्यांनी केलं. आर्ताचे लेणे, आनंदाचे निमित्त, भूमीचे मार्दव, दत्ताची पालखी, एक कोरी सांज असे अनेक कवितासंग्रह त्यांचे आजवर प्रसिद्ध झाले आहेत तर आई परत येते, प्रिय पप्पा अशा अनेक नाटकांसाठीचं लिखाणदेखील त्यांनी केलं आहे. सावर रे, दिलखुलास, लेखनाची आनंदयात्रा, वय वादळ विजांचं हे त्यांचे कार्यक्रम आजही दर्दी रसिकांची गर्दी खेचतंय.
    मराठी साहित्यात आपला वेगळा असा ठसा उमटवलेल्या प्रवीणजींचं एक वेगळं पोर्ट्रेट मला टिपण्याची संधी मिळाली. त्यासंबंधित त्यांच्याशी बोलून मी ठरल्याप्रमाणे त्यांच्या घरी गेलो.

    घरात शिरताचक्षणी लगेचच लक्ष वेधून घेत ते त्यांच्या यशाचा आलेख सांगणाऱया कित्येक ट्रॉफीजची केलेली आरासवजा मांडणी. शेकडो पारितोषिकांनी नटलेली ही मांडणी प्रवीणजींच्या यशाचा आलेख स्पष्ट सांगतात. अनेक सिनेमांची छायाचित्रं असलेली, नामांकित संस्थांची नावं असलेली, अनेक नामांकित आणि मानाच्या अशा पुरस्कारांनी सजलेल्या या ट्रॉफीज नुसत्या पुनः पुन्हा बघत राहाव्या अशाच. याच ट्रॉफीजच्या पुढय़ात प्रवीणजींना उभं राहण्याची मी विनंती केली आणि यशाच्या या खुल्या शिदोरीसोबत त्यांचे काही मुद्दाम ब्लॅक अँड व्हाईट फोटो मी टिपले. कृष्णधवल छायाचित्रांनी त्यांचा हा इतिहास आणखीनच जिवंत वाटत होता. हे फोटो टिपत असतानाच माझ्या मनात एक प्रश्न डोकावत होता. प्रवीणजी त्यांचं लिखाण कुठे बरं करत असतील या प्रश्नाचं उत्तर थेट त्यांनीच मला दिलं. त्यांनी मला त्यांच्या लिखाणाच्या खोलीत नेलं.

    या खोलीत त्यांचं एक लिखाणाचं टेबल होतं. मागून मंद प्रकाश डोकावत होता, तर टेबल ज्या भिंतीला लागून ठेवलं होतं त्यावर एक बोर्ड होता. या बोर्डावर प्रवीणजींना ऊर्जा देणाऱया देवदेवतांची छायाचित्रं होती. टेबलाच्या एका बाजूला अनेक कागदं तर खिडकीवर एका कोपऱयात लिखाणाचं साहित्य आणि इतर बाबी विखुरलेल्या होत्या. हे सारं चित्र प्रवीणजींसोबत कॅमेऱयात कैद करण्यासाठी मी प्रवीणजींना त्यांच्या खुर्चीवर बसण्याची विनंती केली आणि त्यांनीही लगेचच हातात लेखणी घेऊन नेमकं ते कसं लिखाण करतात त्याची एक झलकच मला दाखवली.

    गेली अनेक दशकं सतत आपल्या लिखाणातून आपला वेगळा असा आदर्श नव्या पिढीसमोर घालून दिलेल्या साहित्यिकाचं असं पोर्ट्रेट टिपायला मिळणं हे माझ्यासाठी सोन्याहून पिवळंच असं होतं.

    प्रवीणजींचा हा फोटो माझ्यासाठी विशेष महत्त्वाचा होता. हा फोटो नैसर्गिक कसा वाटेल याकडे माझा कल होता आणि म्हणूनच ड्रमॅटिक लाइटिंग न करता नैसर्गिक प्रकाशात हा फोटो कसा टिपता येईल यासाठी मी झटत होतो. हा फोटो टिपताना त्यांच्या मागून खिडकीतून येणारा मंद प्रकाश आणि खोलीत असलेला प्रकाश यांचा ताळमेळ जुळत नसल्याने मागून येणाऱया प्रकाशाचा छायाचित्रणाला त्रास होत होता.

    खिडकी बंद केली तर प्रकाशाचा स्रोत अडवला जाईल आणि फोटो नैसर्गिक येणार नाही. आणि खिडकी उघडी ठेवली तर त्यातून येणाऱया प्रकाशाचा ग्लेअर छायाचित्रात येईल अशी परिस्थिती होती. अगदी क्षणार्धात यावर तोडगा काढून या फोटोसाठी फ्लॅश म्हणजेच अनैसर्गिक लाइट वापरण्याचं मी ठरवलं. फ्लॅश लाइटची तीव्रता बाहेरून येणाऱया प्रकाशाशी मिळतीजुळती ठेवून प्रकाशयोजना केली आणि हा नैसर्गिक वाटेल असा फोटो टिपण्यात मला यश आलं. दिलखुलास साहित्यिकाचा दिलखुलास अंदाज या दिवशी मी कॅमेराबद्ध केला.

    धनेश पाटील
    dhanauimages@gmail.com

  • आधुनिक भारतातील एक सर्वश्रेष्ठ गुप्तहेर

    जून १९८४.

    ठिकाण: अमृतसर, पंजाब.

    शीख धर्मियांचे सर्वोच्च श्रद्धास्थान असलेल्या हरमिंदर साहिब मंदिराच्या आसपासचं वातावरण जबरदस्त तणावपूर्ण बनलं होतं. शीख दहशतवादी जर्नेलसिंग भिंद्रावाले आणि त्याच्या सुमारे २०० साथीदारांनी हरमंदिरसाहेबवर अवैधरीतीने कब्जा केला होता आणि त्यांना हिसकावून लावण्यासाठी भारतीय लष्कराने Operation Blue Star चे नियोजन केले होते. पण दहशतवाद्यांची संख्या, त्यांची ठिकाणं याविषयी भारतीय लष्करास फारशी माहिती नव्हती. सुवर्ण मंदिराच्या अवाढव्य परिसरात ठोस माहितीशिवाय जाणे हा मूर्खपणा ठरला असता, पण दहशतवाद्यांनी सुवर्णमंदिराचा सर्व परिसर सील केला असल्याने आत जाण्याचा मार्गच नव्हता. एवढ्यात एक पाकिस्तानी गुप्तहेर सुवर्णमंदिरात शिरला. त्याला आत सहज प्रवेश मिळाला कारण तो अमृतसरमधे गेले ७ महिने गुप्तपणे रहात होता आणि त्याने दहशतवाद्यांचा विश्वास जिंकला होता. रात्री तो बाहेर आला आणि थेट Operation Blue Star चे मेजर जनरल ब्रार यांच्या office मधे पोचला. त्याने दहशतवाद्यांच्या जागा, त्यांची संख्या, एवढंच नव्हे तर सुवर्ण मंदिराचा संपूर्ण नकाशाच ब्रार यांच्याकडे सोपवला. या अमूल्य माहितीच्या आधारेच हे Operation यशस्वी झाले. नंतर समजले की ज्याने ही माहीत पुरवली तो पाकिस्तानी गुप्तहेर नव्हताच, तो होता भारतीय गुप्तहेर संघटना RAW चा अधिकारी ... "अजितकुमार डोभाल "

    भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल हे एक अचाट आणि अफाट व्यक्तिमत्त्व आहे. केरळ केडरचे IPS अधिकारी असलेले डोभाल हे प्रथमदर्शनी सामान्य सरकारी अधिकार्यासारखेच दिसतात, पण त्यांच्या डोळ्यातली अद्भुत जरब आणि ऒठांवरचं गूढ हसू पाहताच समजतं की हे काहीतरी वेगळं पाणी आहे. भारताचे सर्वश्रेष्ठ गुप्तहेर असा लौकिक असलेल्या या नावाभोवती गेल्या ४५ वर्षात गूढतेचं एक अद्भुत वलय तयार झालंय ज्यामध्ये असंख्य कथा गुंफल्या आहेत... काही वास्तविक, काही अकल्पित तर काही कल्पनातीत!!

    डोभाल सर्वप्रथम १९६४ साली प्रकाशात आले ते त्यांच्या मिझोराममधील यशस्वी कामगिरीमुळे. लालडेंगा याच्या नेतृत्वाखालील मिझो नेशनल फ्रंटने ईशान्य भारतात दहशतवादी कारवाया सुरू केल्या होत्या आणि सरकारच्या चर्चेचे प्रस्ताव ते सतत फेटाळून लावत होते. डोभाल तिकडे गेले आणि लालडेंगाच्या सहा महत्त्वाच्या साथीदारांना आपल्या बाजूस वळवले. लालडेंगा नाक मुठीत धरून शरण आला, एवढंच नव्हे तर सरकारच्या सर्व अटी मान्य करून मुख्य प्रवाहात सामील झाला. एकेकाळी अशक्य वाटणारी ही गोष्ट डोभालांनी लीलया साध्य करून दाखवली. सिक्कीमचे भारतातील विलीनीकरणाचे अत्यंत अवघड कामही त्यांनी अगदी अलवार करून दाखवले.

    १९७४ साली अणूस्फोट घडवून भारत एक अण्वस्त्रसंपन्न राष्ट्र बनले. पाकिस्तानचा जळफळाट झाला आणि त्यानेही अण्वस्त्रे बनवण्यासाठी जीव तोडून प्रयत्न सुरू केले. या काळात डोभाल एकदमच गायब झाले. तब्बल ७ वर्षं त्यांचा ठावठिकाणा काही मोजक्या लोकांनाच ठाऊक होता. नंतर समजलं की डोभाल चक्क पाकिस्तानातील लाहोर शहरात रहात होते. या ७ वर्षात त्यांनी पाकिस्तानच्या अण्वस्त्र कार्यक्रमात प्रचंड अडथळे आणले आणि सर्व गुपिते भारतीय गुप्तहेरयंत्रणांना पुरवली. या ७ वर्षात एखादी छोटीशी चूकही त्यांच्या जीवावर बेतली असती, पण हा महान देशभक्त आपल्या प्राणांची पर्वा न करता हे अतिधोकादायक काम सतत ७ वर्षे करत राहिला. या काळात त्यांनी पाकिस्तानात RAW चे मजबूत जाळे विणले आणि कसलाही पुरावा मागे न ठेवता भारतात परत आले. ही बातमी सामान्य जनतेपर्यंत पोचली नाही, पण ती सर्व देशांच्या हेरगिरी संघटनांना समजली आणि पाकिस्तानच्या ISI संघटनेची सर्व जगात चांगलीच छी-थू झाली. तेव्हापासून डोभाल हे ISI चे क्रमांक १चे शत्रू बनले.

    १९९०च्या दशकात काश्मीरमध्ये दहशतवादी कारवायांना सुरूवात झाली होती. हा दहशतवादी आवाक्याबाहेर जाऊ लागला आहे हे लक्षात येताच केंद्र सरकारला पुन्हा एकदा डोभाल यांची आठवण झाली. काश्मीरमधील हा धर्माधिष्ठीत दहशतवादी केवळ शस्त्रबळाने चिरडल्यास तात्पुरते यश मिळेल पण त्याचे दूरगामी परिणाम अत्यंत वाईट असतील हे डोभाल यांनी ओळखले आणि एक वेगळीच चाल खेळली. काश्मिरीमधील गावागावातून दहशतवादी संघटनांमधे सहभागी झालेल्या तरुणांवर त्यांनी बारीक नजर ठेवली आणि या तरूणांचा brainwash करण्यास सुरूवात केली. यासाठी त्यांनी सर्व मार्ग वापरले. अशा brainwash केलेल्या तरुणांची एक दहशतवादविरोधी संघटना उभी करून त्यांनी पाकप्रणीत दहशतवादास तोडीसतोड प्रत्युत्तर दिले. दहशतवादी बनलेले हजारो तरूण पुन्हा मुख्य प्रवाहात सामील झाले. पुढे पाकिस्तानच्या नाकावर टिच्चून काश्मीरमध्ये विधानसभेच्या निवडणूका पार पडल्या आणि सर्व जगाने आश्चर्याने तोंडात बोटे घातली. भारतीय सैन्य, BSF, काश्मीर पोलीस आणि इतर सुरक्षादले यांच्यामध्ये काटेकोर समन्वय साधून डोभाल यांनी एक अत्यंत कार्यक्षमता यंत्रणा उभी केली. या यंत्रणेचा success rate ९९% आहे, म्हणजे १०० पैकी ९९ दहशतवादी कारवाया या होण्याआधीच थांबवल्या जातात. त्यांच्या या अतुलनीय कामगिरीमुळे डोभाल याना 'कीर्तीचक्र' हा पुरस्कार देण्यात आला. विशेष म्हणजे हा पुरस्कार फक्त लष्करी अधिकारी अथवा सैनिकांना मिळतो. गेल्या ७० वर्षात हा पुरस्कार मिळालेले डोभाल हे एकमेव पोलिस अधिकारी आहेत.

    २००४ साली वाजपेयी सरकारचा पराभव झाला आणि डोभालांनी निव्रुत्ती घेतली. पण या काळातही RAW, IB, NIA या संघटनांचे प्रमुख त्यांचे मार्गदर्शक घेतच राहिले.

    2014 साली मोदी सत्तेवर आले आणि त्यांनी पहिला महत्त्वाचा निर्णय घेतला जो त्यांनी आधीच मनाशी ठरवला होता- अजित डोभाल भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार बनले.

    गेल्या वर्षभरात मोदी सरकारने राष्ट्रीय सुरक्षा आणि परराष्ट्र धोरणासंदर्भात घेतलेल्या प्रत्येक महत्वाच्या निर्णयावर डोभाल यांची छाप दिसते. भारताचे पाकसंबधाचे सर्व निर्णय डोभालच घेतात असं म्हटलं जातं. गेल्या वर्षी सप्टेंबरमधे पाकिस्तानने वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन केले होते. त्यावेळी पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्याची जबाबदारी मोदींनी डोभालांवर सोपवली. डोभालांनी अत्यंत निर्दयपणे कारवाई करून पाक सीमेचा इंचन् ईंच अक्षरशः भाजून काढला. इकडे भारत सर्व जगाला ओरडून सांगत होता की पाकिस्तान आमचं भयंकर नुकसान करतोय, पण वास्तवात मात्र भारताने पाकिस्तानचे चौपट नुकसान केले होते. पाकिस्तानसाठी हा तोंड दाबून बुक्क्यांचा मार होता, कारण भारतानं आम्हाला झोडपलं असं जर त्यांनी जाहीर केलं असतं तर पाकिस्तानात त्यांच्या लष्कराची नाचक्की झाली असती. काही दिवसांपूर्वी भारतीय लष्कराच्या १८ जवानांना मारणाऱ्या मिझो दहशतवाद्यांना म्यानमारच्या सीमेत घुसून मारण्याची जी कारवाई लष्कराने केली त्याचे सूत्रसंचालनही डोभाल यांनीच केले होते. पाकिस्तानविरुद् त्यांनी offensive defense हे धोरण राबवले आहे. आपले संरक्षण मजबूत ठेवायचे आणि शत्रूवर गुप्तपणे सतत वार करत रहायचे अशा या धोरणास मोदींचा पूर्ण पाठिंबा आहे. दाऊदपासून ते हाफिज सईदपर्यंत भारताचे सर्व शत्रू डोभालांना प्रचंड घाबरतात. डोभालांनी NSA पदाची सूत्रे हाती घेताच ISI ने दाऊद आणि हाफिज सईदची सुरक्षा तिपटीने वाढवली असं म्हणतात.

    भारतातील सामान्य जनतेस डोभाल यांच्याविषयी फारशी माहिती नाही, पण पाकिस्तानी लष्कर, ISI, सर्व राजकीय पक्ष, इतकंच नव्हे तर जनताही डोभाल यांचा प्रचंड तिरस्कार करते. पाकिस्तानच्या प्रत्येक वृत्तपत्रात डोभाल यांच्या विरोधातील लेख नियमितपणे छापले जातात, इलेक्ट्रॉनिक मेडीयामधे त्यांच्याविरोधात गरळ ऒकली जाते, इतकंच नव्हे तर ट्विटरवर अशी शेकडो पेजेस आहेत ज्यावर केवळ डोभालविरोधातील लिखाणच केले जाते. पाकिस्तानातील बलुचिस्तान आणि वजिरीस्तान या भागातील पाकविरोधी दहशतवादी संघटनांचे संचालन डोभाल करतात अशी पाक सरकारची पक्की खात्री आहे. पाकिस्तानला सळो की पळो करून सोडलेल्या तेहरीक ए तालिबान पाकिस्तान या संघटनेचे डोभाल हेच बाप आहेत असं पाकिस्तानातील सामान्य जनतेसही वाटतं. हा माणूस पाकिस्तानात कुठेही काहीही करु शकतो अशी भिती पाकिस्तानला वाटते. काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात बोलताना डोभाल यांनी एक विधान केलं होतं. ते म्हणाले होते की जर पाकिस्तानने पुन्हा २६/११ सारखा हल्ला केला तर त्यांना कदाचित बलुचिस्तान गमवावा लागेल. या एका वाक्याने संपूर्ण पाकिस्तानात अक्षरशः वादळ निर्माण केले होते. पाकविरोधी सर्व संघटनांचे डोभाल हेच संचालक आहेत हा समज अधिकच ठाम झाला. पण आजवर पाकिस्तानला डोभाल यांच्याविरूद्धचा एकही पुरावा मिळालेला नाही.

    भारत आणि पाकिस्तानमधे NSA स्तरावरील बोलणी व्हावीत असा निर्णय मोदी-शरीफ भेटीत काही दिवसांपूर्वी घेण्यात आला. शरीफ यांना हा अगदी साधा आणि निरूपद्रवी निर्णय वाटला आणि त्यांनी मोदींसमवेत तो जाहीरही करून टाकला. पण पाकिस्तानात परत जाताच लष्कराबरोबरच त्यांची चांगलीच कानउघाडणी केली. डोभालांशी चर्चा करायची आहे हे ऐकून पाकिस्तानचे NSA सरताझ अझीझही पुरते गडबडून गेले. पाक मिडियामधेही या निर्णयाची यथेच्छ खिल्ली उडवण्यात आली. अजित डोभालसमोर सरताज अझीझ टिकूच शकत नाहीत हे सत्य पाक मिडियाने आधीच मान्य केले होते. या चर्चेदरम्यान डोभाल यांना देण्यासाठी तीन डोसीयर पाकने तयार केली होती ज्यामध्ये भारत हा पाकिस्तानातील दहशतवाद्यांना कसे प्रोत्साहन देतो याचे पुरावे देण्यात आले होते. गंमत म्हणजे या तीनपैकी एक डोसीयर केवळ डोभालांविषयी होते!!

    देशाच्या सुरक्षेसाठी आयुष्यभर झटणारा हा महान देशभक्त वयाच्या सत्तरीतही संपूर्ण जोमाने कष्ट करतोय, दहशतवाद रोखण्याचे नवनवीन उपाय शोधून काढतोय, भारतीय हेरसंघटनांना अधिकाधिक मजबूत आणि कार्यक्षम करण्यासाठी जीवाचं रान करतोय.
    कसलाही गाजावाजा न करता गेली ५० वर्षे अविरतपणे देशसेवा करणाऱ्या आणि देशाच्या शत्रूंना नामोहरम करणाऱ्या अजितकुमार डोभाल यांना मानाचा मुजरा.

    --उल्हास हरी जोशी, मोः-9226846631
    ( श्री. जयंत दामले यांच्या सौजन्याने)

  • संगीत हाच ध्यास बाळगणारे शब्दसुरांचे जादूगार सुधीर फडके

    संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावणा-या ग. दि. मां.च्या ‘गीतरामायण’चे गायक व संगीतकार म्हणून या क्षेत्रात ते ‘संगीत शिरोमणी’ म्हणून प्रसिद्धीस आले. त्यांचा जन्म २५ जुलै १९१९ रोजी झाला. तो त्यांना लाभलेला परमेश्वरी प्रसाद होता. त्या प्रसादामागे ग. दि. मां.च्या प्रतिभेचा वरदहस्त होता. या कार्यक्रमात अन्य गीतांचा सामावेश त्यांनी कधीच केला नाही. त्यांचे संपूर्ण महाराष्ट्राला मंत्रमुग्ध करणारे हे गीतरामायण १९५५ साली रेडियोवर सुरू झाले.

    बाबूजींचा सुरेल आवाज, स्पष्ट उच्चार व नेमके स्वराघात यामुळे ते संगीतातील बावनकशी सोन्याचे खणखणीत नाणेच होते. दरम्यान, त्यांनी सुमारे ५६ गाणी असलेल्या गीतरामायणाचे १,८०० प्रयोग देश व विदेशात केले. त्यांच्या कारकीर्दीतील सर्वोच्च क्षण म्हणजे त्यांनी १९६० च्या दशकात स्वरबद्ध केलेले 'गदिमां'चे गीत रामायण. गीत रामायणाचे कार्यक्रम तेव्हा रेडियोवर (All India Radio) वर्षभर प्रसारित होत होते.

    गीत रामायणाने रसिक श्रोत्यांवर, अगदी सामान्यातल्या सामान्य माणसालाही वेड लावले. का नाही लावणार? एकतर ही रामायणातील गीते आपल्या बोली भाषेतली, नवरसांनी ओतप्रेत भरलेली, मधुर चालींची, कमालीची भावोत्कट. भारतीय जीवन मूल्यांची महती सांगणारी, मनुष्य जीवनातले आदर्श कसे असावेत याचा धडा देणारी, चांगले व्यक्तिमत्त्व घडण्यासाठी प्रेरणा देणारी गीते. शिवाय बाबूजी म्हणजे सुधीर फडके यांच्या स्वर्गीय संगीत, सुरेल चाली आणि दैवी आवाजामुळे ही रामायणातली गाणी साक्षात रामकथेतील प्रसंग, पात्रे आणि घटनाक्रम यांचे मूर्तिमंत चित्र डोळ्यासमोर उभे करतात.

    कवीच्या शब्दातील भावना जशाच्या तशा रसिकांपर्यंत पोहोचवण्याच काम त्यांनी केलं आहे. त्यांनी गोवा मुक्ती संग्रमातही भाग घेतला होता. आपल्या कारकीर्दीच्या अखेरीस त्यांनी 'वीर सावरकर' या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनावरील हिंदी चित्रपटाच्या निर्मितीत लक्ष घातले होते. हा चित्रपट जनतेकडून जमा केलेल्या वर्गणीतून निर्माण करण्यात आला होता.

    बाबूजींनी पार्श्वगायन केलेला व संगीत दिलेला हा शेवटचा चित्रपट. या चित्रपटाच्या निर्मितीसाठी सुधीर फडके यांनी अफाट श्रम केले. या सर्व इतिहासाची माहिती देणारे पुस्तक - प्रभाकर मोने यांनी लिहिले आहे.

    पुस्तकाचे नाव - स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपट - एक शिवधनुष्य सुधीर फडके हे 'राष्ट्रीय स्वयंसेवक संघा'त जवळजवळ ६० वर्षे कार्यरत होते. तसेच अमेरिकेमध्ये 'इंडिया हेरिटेज फाउंडेशन'च्या स्थापनेमागे त्यांचीच प्रेरणा होती.

    सुमारे ५० वर्षे संगीतसृष्टी गाजवणारे बाबूजी माणूस म्हणून श्रेष्ठच होते ते त्यांच्या अभिजात संगीतप्रेमामुळेच! सुधीर फडके यांचे २९ जुलै २००२ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर

    ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर यांचा जन्म १५ डिसेंबर १९३५ रोजी झाला. ‘छबीदार छबी मी तोऱ्यात उभी’, ‘एक लाजरा न्‌ साजरा’, ‘काय बाई सांगू’, ‘गोड गोजिरी लाज लाजरी’, ‘खेळ कुणाला दैवाचा कळला’, ‘शालू हिरवा’, ‘मुंगळा’, ‘मै तो आरती उतारू रे’ यासारखी असंख्य गीते आपल्या मधुर आवाजाने अजरामर करणाऱ्या उषाताई मंगेशकर यांचा संगीत प्रवास अलौकिक असाच आहे. लता मंगेशकर, आशा भोसले, ह्यांच्या बरोबरीने "उषा मंगेशकर" अशी स्वतंत्र मोहोर उमटविणाऱ्या उषाताईंनी अनेक एकलगीते, द्वंद्वगीत बालगीतं, भक्तीगीतं गायली आहेत आणि ठसकेबाज लावण्याही म्हणल्या आहेत. आरंभीच्या काळात त्यांचा गायनाकडे कल नव्हता.

    मंगेशकर कुटुंबीय मुंबईत आल्यावर उषाताईंनी मणिपुरी नृत्याचे धडे घेतले. पुढील काळात ‘सुरेल कला केंद्र’च्या कार्यक्रमात गाणे म्हणण्याची संधी मिळाली. त्या कार्यक्रमात ‘बैजू बावरा’ चित्रपटातील शमशाद बेगम आणि लता मंगेशकर यांनी गाजवलेले द्वंद्वगीत त्यांनी गायले. त्यातील शमशाद बेगम यांचा गाण्यातील भाग हा मीनाताई मंगेशकर गायच्या व लतादीदींनी गायलेले शब्द हे उषाताई गायच्या.

    उस्ताद बडे गुलाम अली खाँसाहेबांचे पट्टशिष्य पं. तुलसीदास शर्मा यांच्याकडे उषाताईंनी शास्त्रीय गायनाचे शिक्षण घेतले. उषाताई मंगेशकर आणि मीना खर्डीकर या दोघींनी संगीत दिलेला, १९९४ मध्ये प्रसिद्ध झालेला "पुन्हा एकदा" अल्बम, खूप गाजला होता, झिम्मड घाई, रात बहरली, सोन कंगनी, भिर भिर उडते, मायेच्या माहेरा ही गाणी खूप लोकप्रिय झाली. मीना खर्डीकर आणि उषाताई ह्यांचा अजून एक संयुक्त संगीताचा उपक्रम म्हणजे "लोक गणपती" ध्वनिफीत होय. विशेष म्हणजे "बाला मै बैरागन" ही आशाताई भोसले ह्यांच्या स्वरातील गाजलेल्या गाण्यांची ध्वनिफीत, ज्याच संगीत ह्या दोघींनी दिलं होतं.

    मराठी, हिंदीसह गुजराती व नेपाळी भाषेतही गायन केलेल्या उषाताईंनी भक्तीगीत, भावगीत, लोकसंगीतापासून ते चित्रपट संगीतापर्यंतच्या सर्व प्रकारांत आपली सुरेल मोहोर उमटवली. लतादीदी आणि आशा भोसले यांची असंख्य गाणी रसिकांच्या ओठांवर रुळली आहेत. महाराष्ट्रामध्ये त्यांना "उषाताई" म्हणतात तर आसाममध्ये "उखादिदी" संबोधतात, गुजराथमध्ये "उषाबेन" ह्या सुप्रसिद्ध नावाने त्या लोकप्रिय आहेत.

    उषाताई मंगेशकर यांची मोजकीच गाणी रसिकांना माहीत आहेत. उषाताई मंगेशकर यांना खरी प्रसिद्धी मिळाली ते जय संतोषी माँ या चित्रपटातील काही गाण्यांनंतर मे तो आरती उतारु रे या गाण्यांसाठी त्यांना फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट स्त्री गायिका पुरस्कारासाठी नामांकन करण्यात आले. नंतर त्यांचे मुंगळा हे गाणे व पिंजरा या चित्रपटातील गाणी तर लोकांच्या मनात अजून ही घर करून आहेत. त्यांनी दुरदर्शनसाठी फुलवंती या संगीत नाट्याची निर्मितीसुद्धा केली होती. "पवनाकाठचा धोंडी" "जैत रे जैत ह्या चित्रपटांची निर्मिती उषाताईंनी केलीय.

    उषा मंगेशकर यांना मेहंदी अॅवॉर्ड, वेस्ट बंगाल क्रिटिक अॅवॉर्ड, सूरसिंगार अॅवॉर्ड, रोटरी अॅवॉर्ड, असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत. उषाताई उत्तम चित्रकारसुद्धा आहेत. अगदी लहानपणापासून त्यांना चित्रकलेत रुची होती. कोल्हापूरला चित्रकार बाबूराव पेंटर शेजारी राहायचे. स्वत: माई मंगेशकर यांची चित्रकला उत्तम होती, त्या उत्तम रांगोळ्या काढायच्या. मुंबईत आल्यावर उषाताईंची चित्रकला अभिनेता-निर्माता राज कपूर यांनी पाहिली. त्यांनी उषाताईंची चित्रे कलादिग्दर्शक एम. आर. आचरेकर यांना दाखविली.

    आचरेकर व उषाताईंची भेट घडविली. आचरेकरांनी त्या चित्रांना दिलखुलास दाद दिली. उषाताईंनी सुर्यकांत मांढरे ह्यांचेकडून पावडर पेंटिंग शिकून घेतले. जलरंग आणि तैलरंग ह्या दोहोंमध्येही उषाताईंनी त्यांची करामत सिद्ध केलीय. पोर्ट्रेट हा तर उषाताईंचा हातचा विषय. त्यांनी चितारलेल्या डोळ्यातील भाव रसिकांना खिळवून ठेवतो. डोळ्यापासून रेखाटनाला प्रारंभ करून अवघं चित्रं भावपूर्ण करण्याचं कसब उषाताईंच्या हातात सामावलं आहे. अनेक पोर्ट्रेट त्यांनी साकारली आहेत. अनेक ध्वनिमुद्रिकांची वेष्टणं उषाताईंच्या कुंचल्यातून साकारलेली आहेत.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

    उषा मंगेशकर यांची हिंदी मराठी गाणी.
    https://www.youtube.com/watch?v=gaihS2h3p88
    https://www.youtube.com/watch?v=pMg_ig8RDnA
    https://www.youtube.com/watch?v=o9YgSspKNoA

  • आद्य महिला नाटककार हिराबाई पेडणेकर

    त्यांच पहिलं नाटक “जयद्रथ विडंबन” हे १९०४ मध्ये प्रकाशित झाल. हे एक संगीत नाटक होत. या नाटकातील पदे तत्कालीन टीकाकारांनी उचलून धरली. त्यांच दुसरे नाटक “दामिनी” हे १९१२ मध्ये प्रसिद्ध झाल. हे नाटक केशवराव भोसले यांच्या ललितकलादर्श या कंपनीने रंगमंचावर आणले. अशाप्रकारे हिराबाई या पहिल्या महिला नाटककार बनल्या.

  • केशव निवृत्ती कासार

    केशव निवृत्ती कासार

    ठाणे शहरातील ख्यातनाम चित्रकारांपैकी एक नाव म्हणजे केशव निवृत्ती कासार. चित्रकलेतील आपल्या वेगळ्या शैलीनं समस्त कला वर्तुळात आपला वेगळा ठसा केशव कासार यांनी उमटवला. पॉटरी, सिरॅमिक, लॅंडस्केप, पेंटींग, टेराकोटा, शिल्पकला ही त्यांची वैशिष्ट्ये होत.<