जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
हिंदी चित्रपटसंगीताचा सुवर्णकाळ ज्याला म्हटलं जातं त्याची सुरुवात नौशादजींनी केली. त्यांचा जन्म २५ डिसेंबर १९१९ रोजी झाला. नौशादजींनी १९४२ च्या शारदा पासून १९६८ च्या संघर्ष पर्यंत २६ वर्षात ५ हिरक महोत्सवी रतन, अनमोल घडी, बैजू बावरा, मदर इंडिया आणि मुघल-ए-आझम, १२ सुवर्णमहोत्सवी आणि तब्बल ३५ रौप्यमहोत्सवी चित्रपटाना संगीत दिले. त्यांच्या हिरक महोत्सवी चित्रपटांची नावं बघीतली तर पहिले दोन चित्रपट आणि बैजू बावरा हे केवळ आणि केवळ नौशादजींच्या संगीताने तारले होते. हिंदूस्थानी शास्त्रीय संगीतातला असा एकही राग नाही ज्यावर आधारित नौशादजींचं एकतरी गाणं नाही.
पण नौशादजींच्या संगीतातून रफी यांना वेगळा काढणे केवळ अशक्य आहे. रफीच्यां आवाजाच्या रेंजचा, त्याच्या क्लासिकल वरील हुकुमतीचा, वेगवेगळे प्रयोग करण्याच्या तयारीचा सर्वात जास्त आणि अप्रतिम वापर जर कुणी केला असेल तर तो नौशादजींनीच. हिंदी चित्रपट संगीतातले काही ठळक आणि वेगळे प्रयोग करण्याचं श्रेय मात्र नौशादजींकडेच जातं. खरंतर शास्त्रिय संगीत हाच त्यांचा पाया असला तरी याही क्षेत्रातले बर्मनदादा, शंकर जयकिशन यासारख्या समांतर संगीतकारांची स्पर्धा त्यांना होतीच. पण या सर्वातूनही आपला बाज न बदलता वर्षानू वर्ष टिकून रहाणे या साठी मेहनत आणि सृजनशिलतेची आवश्यकता असते.
पं. पलूस्कर आणि खाँसाहेब आमिरखान यासारख्या दिग्गजांना बैजू बावरा साठी केवळ साडे-सहा मिनीटांच्या जुगलबंदीसाठी तयार करणे, हिंदी चित्रपट संगीतकारांना दारातही उभे न करणार्या खाँसाहेब बडे गुलाम अली खान यांच्याकडून मुघल-ए-आझम साठी चक्क दोन बंदिशी गावून घेणे, महेंद्र कपूर सारख्या गुणी गायकाला पहिली संधी देणे ही नौशादजींची कमाल होती. बैजू-बावरा हा चित्रपट तर त्यांनी अक्षरश: निर्धाराने केवळ आपल्या संगीताच्या जोरावर हिरक-महोत्सवी केला. या चित्रपटाचे निर्माते जरी प्रकाश भट असले तरी या चित्रपटाची खरी निर्मीती नौशादजींचीच होती. आपल्या मित्रासाठी त्यांनी दिलेले हे योगदान होते. त्यांनी काही चित्रपटांची निर्मितीही केली. उडन खटोला हे त्यातले ठळक नाव.
गुलाम मोहम्मद यांनी काही काळ त्यांच्या सहाय्यकाची भुमिका केली होती. त्यामुळेच पुढे स्वतंत्र संगीतकार म्हणून गुलाम मोहम्मद यांनी संगीत दिलेल्या पाकिजाचे पार्श्वसंगीत गुलाम मोहम्मद यांच्या निधनानंतर नौशादजींनी पुर्ण केलं. पाकिजा न पाहिलेल्यांना या पार्श्वसंगीताची गंमत कदाचित कळणार नाही. कारण चित्रपटाच्या संगीताच्या एल.पी. रेकॉर्डस, कॅसेटस, सी.डी.ज वर जितकी गाणी आहेत तितकीच किंबहून थोडी जास्तच गाणी या पार्श्वसंगीतात लपली आहेत जी केवळ चित्रपट पाहतानाच ऐकायला मिळतात. पण नौशादजींच्या प्रयोग करण्याच्या हौसेमुळे काही वेळेला त्यांचं संगीत हे केवळ ऐकायला छान आणि म्हणायला कठिण बनलं.
सामान्य संगीतरसिकांना काहीसं अडचणीचं भासू लागलं. रफीला देखील याचा काही वेळेला त्रास झाला. उदा. बैजू बावरा मधलं "ओ दुनिया के रखवाले" गाताना ताण असह्य होऊन रफीच्या नाकाचा घुळणा फुटला आणि रक्त वाहू लागलं. पण त्याही स्थितीत त्याने ते गाणं पुर्ण केलं. तिच गोष्ट मुघल-ए-आझम मधल्या "जिंदाबाद ऐ मुहोब्बत जिंदाबाद" या गाण्याची. नौशाद यांचे ५ मे २००६ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट
अभिनेते, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर यांचा जन्म २१ मे १९५६ रोजी चेंदणी कोळीवाडा येथे झाला.
डॉ.जयप्रकाश घुमटकर हे ठाण्याच्या शैक्षणिक साहित्यिक, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात गेली चाळीस वर्षे सातत्याने कार्यरत आहेत. चाळीस वर्ष साहित्याच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे कार्य संपूर्ण महाराष्ट्रात व देशभरामध्ये ते करीत असतात. साहित्यातील विविध विषय आपल्या लेखणीद्वारे परखडपणे हाताळणारे जयप्रकाश यांनी हे अनेक नामवंत साहित्यिकांमधून आपले वेगळेपण सिद्ध केले आहे.
जयप्रकाश यांना शालेय जीवनापासूनच अभिनयाची आवड होती, त्यांनी १९७४ मध्ये ठाण्यात कलासरगम या नाट्यसंस्थेत प्रवेश घेतला, अभिनयाचे धडे गिरविण्यास सुरुवात केली आताचे सुप्रसिद्ध नाट्य सिने दिग्दर्शक कुमार सोहोनी, विजय जोशी यांच्या सोबत अनेक नाटकात काम केली.
त्यामध्ये काका किशाचा,जाळ्यात गावलाय मासा आदी गाजलेल्या नाटकात काम केली, त्यानंतर १९७५ ते १९८० च्या काळात त्यांनी ‘माधुरी थिएटर्स’ नावाची स्वता:ची नाटक कंपनी स्थापन केली आणि लेखक दिग्दर्शक श्याम फडके, काका रणदिवे यांच्या सोबत बिन पैशांचा तमाशा, बाई बिगर भानगड नाही, पै पै आणि पै, बायको उडाली भुर ही नाटके रंगमंचावर आणली आणि ती त्याकाळी ती गाजली सुद्धा. १९८१ मध्ये जयप्रकाश यांनी चित्र प्रकाश ही फिल्म कंपनी स्थापन करून डोमकावला या चित्रपटाची निर्मिती करण्यास सुरुवात केली होती
पण हा चित्रपट पूर्ण होऊ शकला नाही आणि त्यांचे २२ लाख रुपये अक्षरशः डब्यात गेले आणि ते आर्थिक खड्यात गेले, पण त्यांनी आत्महत्या केली नाही, नैराश्यावर मात करून पुन्हा नव्या उमेदीने उभे राहिले. त्यानंतर त्यांनी ‘भानामती’ या चित्रपटाची निर्मिती केली, याचे दिग्दर्शन व मुख्य सरपंचाची भूमिका सुद्धा यात त्यांनी केली होती. यावेळेस मात्र हा चित्रपट पूर्ण होऊन व खूप गाजला, यात पैसे मिळून १९८१ झालेले आर्थिक नुकसान भरून निघाले.
आपल्याला चित्रपट निर्मिती का जमली नाही, आर्थिक फटका का बसला यावरती कुढत न बसता त्यांनी १९८१ ते २००० पर्यंत चित्रपट क्षेत्राचा अभ्यास करून, नवीन चित्रपट निर्मात्यांना आर्थिक फटका बसू नये,, ते खड्डयात जाऊ नये यावर मार्गदर्शन करण्यासाठी ’चित्रपट कसा काढावा’ या नावाने एक पुस्तक लिहिले, या पुस्तकाला त्यांचे मित्र सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते सदाशिव अमरापूरकर आणि ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबल यांची प्रस्तावना लाभली आहे. या पुस्तकाला त्यांना राज्यपातळीवरचा पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे या पुस्तकाच्या अनेक आवृत्या निघून त्याचा लाभ नवीन चित्रपट निर्मात्यांना झाला आहे.
चित्रपट कसा काढावा?, या सोबतच तऱ्हेवाईक नातेवाईक, विचित्र विश्व, विद्रोही जोतिबा, गोलघुमट-कोळीवाडा ते नौपाडा-एक प्रवास, साहित्य संमेलनाध्यक्ष निवडणूक-लेखाजोखा असे अनेक विविध विषय त्यांनी आपल्या लेखणीद्वारे परखडपणे हाताळले आहे. यापूर्वी त्यांनी लिहिलेल्या युगपुरुष-डॉ. बाबासाहेब आंबेडकर-शोध आणि बोध या प्रबंधाला तर राष्ट्रीय पातळीवरचा दिल्लीचा सर्वोच्च दलित साहित्य अकादमी पुरस्कार सुद्धा लाभला होता. त्यानंतर प्रकाशित झालेल्या बुध्दधम्माच्या वाटेवर या पुस्तकाने तर साहित्य वर्तुळात प्रचंड खळबळ उडवून दिली होती. या पुस्तकालाही त्यांना दिल्लीचा सर्वोच्च दलित साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. सर्वोच्च दलित साहित्य अकादमी पुरस्कार दोन वेळा लाभलेले ते साहित्य क्षेत्रातील एकमेव लेखक आहेत असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. आत्मकथनपर त्यांनी लिहिलेल्या गोलघुमट-कोळीवाडा ते नौपाडा-एक प्रवास या पुस्तकाने तो काळ विशेष गाजवला होता. त्यामुळेच त्यांना सर्वत्र गोलघुमट या नावाने ओळखले जाऊ लागले. त्यामुळे की काय त्यांनी काव्य क्षेत्रात गोलघुमट हे नाव धारण केले आहे. त्यापैकी त्यांचे गाजलेले कवितासंग्रह पानगळीची सळसळ, टवाळकी, खिल्ली, पोपटपंची आणि प्रेमासाठी वाट्टेल ते हे काव्यसंग्रह प्रकाशित झाले आहेत. या काव्यसंग्रहामधील त्यांच्या संविधान, गुलाम,वळवळणारे किडे,चोरावर मोर, चौकीदार, पुन्हा येईन, सोंगाड्या या कवितांनी तर महाराष्ट्रभर धुमाकूळ घातला होता. डोंबिवली येथे झालेल्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची निवडणूक सुद्धा त्यांनी लढवली होती. पण त्यांना अपयश आले होते. पण अपयशाने खचून न जाता त्यांचा साहित्य प्रवास आजही सुरू आहे. निवडणूकीच्या राजकारणात त्यांच्यावर पुणे येथे काही लोकांनी शाईफेक हल्ला सुद्धा केला होता. साहित्य संमेलनाध्यक्षाच्या निवडणूकीच्या राजकारणावर प्रकाशझोत टाकण्यासाठी त्यांनी साहित्य महामंडळाच्या राजकारणावरती बऱ्या वाईट घटनांवर एक पुस्तक लिहिले होते त्या पुस्तकाचे नाव होते साहित्य संमेलनाध्यक्ष निवडणूक-लेखाजोखा. त्यामुळे की काय अध्यक्षपदाची निवडणूक पध्दती बंद होऊन नियुक्ती पद्धती सुरू झाली असे साहित्य वर्तुळात बोलले जाते. त्या वर्षापासूनच साहित्य महामंडळाने निवडणूक पध्दती बंद करून घटक संस्थांकडून नावे मागवून अध्यक्षपदाच्या नियुक्तीची प्रथा (वशिलेबाजीने) पुन्हा सुरू करण्यात आली. सध्या गद्य आणि पद्य असे दोन्ही विषय ते समर्थपणे हाताळत आहेत.
बुवाबाजी, लांडी लबाडी करणारे,भोंदू साधू, पुजारी तसेच अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या लोकांवर परखड भाष्य करणारे"बा"मन हे खळबळजनक पुस्तक लवकरच प्रकाशनाच्या वाटेवर आहे. ऑक्टोबर २०२१ मध्ये झालेल्या मराठी साहित्य मंडळ या सरकारमान्य प्रख्यात संस्थेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी ते बिनविरोध निवडून आले आहेत. जयप्रकाश यांनी अभिनेते म्हणून होणार सून मी त्या घरची, वैरी मंगळसूत्राचा,महिमा काळभैरवाचा, आमदार माझ्या खिशात, भक्ती नागनाथाची, धाव रे विठ्ठला,एक डाव सत्तेचा आणि भानामती या चित्रपटात अभीनय केला आहे. आणि आता त्यांचा "चमेलीबाईचा खून कोणी केला?"हा नवीन चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे.
डॉ. जयप्रकाश घुमटकर यांनी घुमटकर क्लासेस, घुमटकर इंजिनिअरिंग कॉलेज आदी शिक्षण संस्थांमार्फत ५०,००० हजारांच्यावर विद्यार्थ्यांना शिकविले आहे. तसेच त्यांना आपल्या पायावर उभे राहणे शिकवून त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास विविध अंगांनी सुद्धा केला आहे. तसेच त्यांचे कित्येक विद्यार्थी देशात आणि परदेशात उच्च स्थानावर कार्यरत आहेत.
जयप्रकाश यांना आत्तापर्यंत महाराष्ट्र जनमुद्रा पुरस्कार, ठाणे जिल्हा साहित्यरत्न पुरस्कार, साहित्यभूषण पुरस्कार, साहित्य साधना पुरस्कार, ठाणे महानगरपालिकेचा ठाणे गौरव पुरस्कार तसेच महाराष्ट्र जीवन गौरव पुरस्कार असे विविध पुरस्कार त्यांना आत्तापर्यंत लाभलेले आहेत. विशेष म्हणजे महाराष्ट्र जर्नलिस्ट फाउंडेशन या प्रख्यात संस्थेच्या महाराष्ट्रातील तमाम पत्रकारांतर्फे त्यांना नुकताच महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार सुद्धा प्रदान करण्यात आला.
एक अष्टपैलू व्यक्तीमत्व असलेल्या डॉ.जयप्रकाश घुमटकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.
-- संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
लक्ष्मीकांत बेर्डे या नावाने मराठी चित्रपटसृष्टीत दीड ते दोन दशकं अक्षरश: धूमाकुळ घातला. त्यांचा जन्म ३ नोव्हेंबर १९५४ रोजी झाला. विनोदाचे अत्यंत अचुक टायमिंग असणारा हा अभिनेता. पण केवळ विनोदी अभिनेता असे त्यांचे वर्णन करणे त्यांच्यावरचा अन्याय ठरेल. वास्तविक अनेक गंभीर भूमिकांमधूनही त्यांनी आपली सशक्त अभिनयक्षमता दाखवून दिली. मात्र, एकूणच त्यांच्या विनोदी भूमिकांमुळे त्यांच्यावरचा विनोदी अभिनेत्याचाच शिक्का कायम राहिला. लक्ष्मीकांत बेर्डे यांना खरा 'ब्रेक थ्रू' मिळाला तो 'टुरटुर' या नाटकाने. हे पहिलेच नाटक जबरदस्त हीट ठरले. त्यानंतर शांतेचे कार्ट चालू आहे, बिघडले स्वर्गाचे द्वार, कार्टी चालू आहे ही नाटकेही यशस्वी ठरली. मग लक्ष्मीकांत बेर्डे यांनी मागे वळून पाहिलेच नाही.
नाटके करता करता त्यांनी चित्रपटात प्रवेश केला. तेथेही ते प्रचंड यशस्वी ठरले. 'लक्ष्या' या नावाने अबालवृद्धांमध्ये त्याची लोकप्रिय पसरली. त्यांची जोडी जमली ती महेश कोठारे यांच्यासमवेत. कोठारेंचा चित्रपट अन लक्ष्या नाही असे सहसा घडलेच नाही. कारण कोठारे व बेर्डे म्हणजे व्यावसायिक यशाची हमखास खात्री अशी ओळख निर्माण झाली होती. त्याचबरोबर या दोघांचा चित्रपट म्हणजे मनोरंजनाची शंभर टक्के हमी हे समीकरणही रूढ झाले होते. धुमधडाका, धडाकेबाज, थरथराट ते आताच्या 'झपाटलेला'पर्यंत ते कायम होते. सचिनबरोबरही 'बनवाबनवी'सह अनेक चित्रपट केले. त्यांना अभिनयाची नैसर्गिक देणगी मिळाली होती. विनोदाचे त्यांचे टायमिंग अचुक होते. प्रेक्षकांच्या समोर आल्यानंतर त्यांना ताब्यात घेऊन टाकण्याची त्यांची शैली अनोखी होती. त्यांच्या लोकप्रियतेला 'कॅश' करण्यासाठी 'चल रे लक्ष्या' मुंबईला सारखा चित्रपटही निघाला. अशोक सराफ व लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या जोडीने याच काळात धुमाकूळ घातला.
वास्तविक या दोन्ही कलाकारांचे ट्युनिंग अतिशय चांगले जमले होते. मात्र, त्याचा चांगला उपयोग फार कमी दिग्दर्शकांना करता आला. त्यांच्या चित्रपटांनी मराठी मनांचे मनोरंजन करीत अनेकांना आयूष्यातील तणाव, दुःख विसरायला लावून आनंदाचे कारंजे फूलविले. मराठीत प्रसिध्दीच्या लाटेवर स्वार असतांनाच त्यांना हिंदीत चांगल्या निर्मिती संस्थांच्या ऑफर्स आल्या. राजश्री प्रॉडक्शनचा मैने प्यार किया हा त्यातीलच एक. यात लक्ष्मीकांतने सलमान खानच्या मित्राची भूमिका अगदी छान निभावली. याशिवाय अनेक हिंदी चित्रपटात त्यांनी भूमिका केल्या. पण अभिनयाचा कस लागेल अशी भूमिका त्यांनी हिंदीत क्वचितच मिळाली.
मराठीत अशा भूमिका त्यांना मिळाल्या, पण त्याही अगदी थोड्याच. ज्येष्ठ साहित्यिक पु. ल. देशपांडे यांनी लिहिलेल्या 'एक होता विदुषक' या गंभीर नाटकातील भूमिकेने कलक्ष्मीकांतच्या अभिनयक्षमतेवर शिक्कामोर्तब झाले. अगदी अलीकडच्या काळात त्यांनी पुन्हा रंगभूमीवर लेले विरूद्ध लेले आणि सर आले धावून या नाटकाद्वारे बऱयाच वर्षांनी पाऊल ठेवले. पण ही नाटके फार चालली नाहीत. अनेक दूरचित्रवाणी मालिकांमधूनही त्यांनी एक काळ गाजवला. असा हा हरहुन्नरी कलाकार चाहत्यांना शेवटपर्यंत हसवत राहिला. लक्ष्मीकांत बेर्डे यांचे १६ डिसेंबर २००४ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
रणजी स्पर्धेत खेळणारे लोकसभेचे ते एकमेव खासदार होते. फतेहसिंग गायकवाड हे १९५७ ते १९६२, १९६२ ते १९६७, १९७१ ते १९७७ व १९७७ ते १९८० पर्यत कांग्रेस पक्षाचे बडोद्याचे सांसद होते. भारतातील टीव्हीवर समालोचन करण्याचा पहिला मानही त्यांना जातो.
आज ९ ऑक्टोबर
आज संगीतकार रवींद्र जैन यांची पुण्यतिथी
जन्म:- २८ फेब्रुवारी १९४४
भावमधूर संगीताची कास कायम धरत भाषा कुठलीही असो, सहजी लोकांच्या ह्रदयाला भिडेल अशा संगीतातून त्या भावना पोहोचवणे ही संगीतकार मा.रवींद्र जैन यांची खासियत होती. अभिनेता राज कपूर यांनी रवींद्र जैन यांना खूपच मदत केली. ‘राम तेरी गंगा मैली’, ‘दो जासूस’, ‘हिना’ अशा राज कपूरच्या चित्रपटांना जैन यांनी संगीत दिले. राजश्री प्रॉडक्शन आणि रवींद्र जैन यांचे एक समीकरण बनले होते. याशिवाय, सुजाता, सुखम सुखकरम, आकाशा थिंटे निरम अशा प्रादेशिक चित्रपटांनाही त्यांनी संगीत दिले. हिंदी चित्रपटांमध्ये जम बसत असताना रवींद्र जैन यांनी एक वेगळा प्रयोग करत धार्मिक चित्रपट आणि मालिकांच्या गीतांना संगीत देण्यास सुरुवात केली. ‘वनरात्री’, ‘गोपाल कृष्ण’, ‘जय करोली माँ’, ‘हर हर गंगे’ अशा चित्रपटांना त्यांनी संगीत दिले. रामायण, श्रीकृष्ण, साईबाबा, श्री ब्रह्मा विष्णू महेश, द्वारकाधीश, जय गंगा मैय्या, वीर योद्धा पृथ्वीराज चौहान अशा मालिकांना त्यांनी संगीत दिले आणि मालिकांची गीतेही बरीच गाजली. दाक्षिणात्य गायक येसुदासला हिंदी चित्रपटसृष्टीत ब्रेक देण्याचे संपूर्ण श्रेय रवींद्र जैन यांना जाते. ओ गोरिया रे, बीती हुअी रात की, गोरी तेरा गाव अशी रवींद्र जैन यांनी संगीत दिलेली गाणी येसूदास यांनी गायली. त्यांनी संगीत दिलेल्या गाण्यांमध्ये सचिन आणि रंजीतावर चित्रित झालेले ‘अखियों के झरोकोंसे..’ हे गाणे खूप लोकप्रिय ठरले. विरोधाभास एवढाच की दोन्ही डोळ्यांनी अंध असणाऱ्या या संगीतकाराने आपल्या संगीतामधून कधीच आपली वेदना जाणवू दिली नाही. सत्तरच्या दशकातील हिंदी चित्रपटांमधून रविंद्र जैन यांनी अनेक हळूवार भावगीतांमधून सुरांची पखरण केली. प्रत्येक संगीतकाराचा आपला एक आवडता गायक किंवा गायिका असते. जैन यांच्या संगीताचे नाते जोडले गेले ते गायक येसूदास यांच्याशी.. किंबहूना दक्षिणेकडच्या या गायकाला हिंदी चित्रपटांमध्ये आणणाऱ्या जैन यांचे त्यांच्याशी इतके घट्ट नाते होते की जर आपल्याला दृष्टी मिळालीच तर पहिले येसूदास यांचा चेहरा पहायला आवडेल, अशी भावना त्यांनी व्यक्त केली होती. मा.रवींद्र जैन यांना ‘पद्मश्री’ पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते. बदलत्या काळानुसार त्यांनी आपल्या संगीतात बदल केला तरी त्यांनी संगीत दिलेल्या गाण्याची गोडी सुरेख होती. संगीतकार जैन यांनी फक्त चित्रपटांमधील गीतांना नव्हे तर प्रायव्हेट अल्बम, गझल, पौराणिक मालिकांनाही त्यांनी दिलेल्या संगीताला वेगळे महत्त्व होते. मा.रवींद्र जैन यांचे ‘दिल की नजर से’ हे शायरीवर आधारित पुस्तक प्रकाशित झाले आहे. शायरीवर पुस्तक लिहिणारे ते पहिले संगीतकार आहेत.*मा.रवींद्र जैन* यांचे ९ ऑक्टोबर २०१५ रोजी निधन झाले. आपल्या समुहा तर्फे मा.रवींद्र जैन यांना आदरांजली.
संजीव वेलणकर पुणे.
संदर्भ:- इंटरनेट
मा.रवींद्र जैन यांची गाजलेली गाणी
’आजसे पहेले आजसे जादा
’गोरी तेरा गाव बडा प्यारा
जब दिप जले आना
’राम तेरी गंगा मैली,
सुन सायबा सुन
१९२८ च्या सुमारास भास्करबुवा बखले यांनी त्यांना महाराष्ट्रात आणले. त्यानंतरची दहा वर्षे ते गंधर्व नाटक मंडळीत होते. बालगंधर्वाचा सुरेल आवाज आणि तिरखवाँची भावनाकूल अशी सुसंवादी साथ यांमुळे नाटकातील पदे रंगून जात.
अभिनेता हा चितनशील विचारवंत असला पाहिजे हे शंभू मित्रा यांचे मत डॉ. श्रीराम लागू यांना तंतोतंत लागू पडते. १६ नोव्हेंबर १९२७ ला सातारा येथे त्यांचा जन्म झाला. एम. बी. बी. एस. झाल्यावर वैद्यकीय व्यवसाय सुरू केला. परंतु शालेय जीवनापासून त्यांचा नाटकाकडे ओढा होता.
१८९२ साली त्यांची मुंबई विश्वविद्यालयाचे पहिले भारतीय कुलगुरू म्हणून नियुक्ती झाली.
विजया मेहता यांचा जन्म ४ नोव्हेंबर १९३४ रोजी झाला.
विजया मेहता या पूर्वाश्रमीच्या विजया जयवंत होत. जवळच्याच नात्यांतील नलिनी जयवंत, शोभना समर्थ व त्यांच्या कन्यका नूतन, तनुजा यांच्यामुळे मोहमयी हिंदी चित्रसृष्टीशी जवळचा संबंध येऊन देखील त्यांची भावनिक जवळीक मात्र सतत मराठी रंगसृष्टीशी राहिली. मा.दुर्गा खोटे यांचा मुलगा हरीन खोटे यांच्याशी विवाह झाल्यावर देखील हिंदी चित्रपटांच्या मायाजालामध्ये न गुरफटण्याचा निर्णय त्यांनी कायम ठेवला हे पहाता ‘आपल्या मराठी रंगभूमीचे नशीब बलवत्तर‘ असेच म्हणावयास हवे. साठ सत्तरच्या दशकांत तेंडुलकर, खानोलकर, एलकुंचवार व इतर समकालीन संवेदनक्षम नाटककारांची, नाट्यक्षेत्रातील तत्कालीन प्रचलित रुढींना सुरुंग लावून आणि प्रमाण मानल्या गेलेल्या प्रस्थापित संकेतांची चौकट नाकारुन वा प्रसंगी धुडकावून देऊन प्रयोगशीलतेला प्राधान्य देणारी, नवनवीन नाटकेएकांकिका ‘रंगायन‘ वा अन्य माध्यमांतून मंचावर आणण्यात बाईंचा आणि त्यांच्या जोडीने अरविंद देशपांडे, सुलभा देशपांडे, माधव वाटवे, कमलाकर सारंग, श्रीराम लागू या त्यांच्या सहकाऱ्यांचा अत्यंत मोलाचा वाटा होता. ‘रंगायन‘ संस्था व त्या अनुषंगाने एक चोखंदळ प्रेक्षकवर्ग सुध्दा उभारुन प्रायोगिक एकांकिकानाटकांची चळवळ त्या काळात त्यांनी दहाबारा वर्षे जोमाने चालवली. सतत काहीतरी नवीन करण्याचा देण्याचा ध्यास घेतलेल्या मा.विजया मेहता प्रायोगिक समांतर रंगभूमीने त्या काळात अक्षरशः झपाटल्या गेल्या. मात्र पुढे दुर्दैवाने जेव्हा ‘रंगायन‘ अंतर्गत बेबनाव मतभेदांमुळे फुटली तेव्हा प्रायोगिकतेच्या चौकटीतच कायम रहाण्याच्या विचारांचे गाठोडे ओझे ऊराशी न बाळगता व्यावसायिक रंगभूमीवर सुध्दा तितक्याच ताकदीने व उत्साहाने त्या परत कार्यरत झाल्या व स्थिरावल्या. वैयक्तिक जीवनात सुध्दा, लग्नानंतर अवघ्या पाच वर्षांतच पदरात दोन लहान मुलं असताना पतिनिधनाचा प्रचंड आघात सोसून व त्यामुळे आयुष्याला मिळालेली विलक्षण कलाटणी पचवून, बाई न खचता परत कंबर कसून उभ्या राहिल्या. पुढे कालौघात फरोख मेहता यांच्याशी पुनर्विवाह करुन त्या पुनश्च स्थिरस्थावर झाल्या. ‘श्रीमंत‘, ‘मादी‘, ‘एक शून्य बाजीराव‘, ‘अजब न्याय वर्तुळाचा‘, ‘पुरुष‘, ‘बॅरिस्टर‘, ‘महासागर‘, ‘हमीदाबाईची कोठी‘, ‘वाडा चिरेबंदी‘, ‘हयवदन‘, ‘सावित्री‘ अशी अनेक लक्षणीय नाटकेएकांकिका तसेच ‘पेस्तनजी‘, ‘रावसाहेब‘, ‘स्मृतिचित्रे‘ अशा अनेक लक्षवेधी चित्रकृती बाईंच्या रेखीव बांधीव दिग्दर्शनाने फुलल्या फुलवल्या. केवळ अर्थकारणाच्या म्हणजेच ‘गल्ल्याच्या गणिता‘च्या दृष्टीने पाहिल्यास यातील बरीचशी चांगलीच तरली तरारली फोफावली असली तरी क्वचित काही बुडाली फसली देखील. मात्र यातील प्रत्येक कृतीवर आपला असा एक वैशिष्ठ्यपूर्ण कलात्म ठसा उमटवून दिग्दर्शनाच्या क्षेत्रात आपले निर्विवाद वर्चस्व बाईंनी निश्चितच प्रस्थापित केले. बाईंनी स्वतःची अशी एक स्वतंत्र पठडी वा घराणं निर्माण केलं. मराठी नाट्यक्षेत्रातील आजचे अनेक आघाडीचे व प्रथितयश कलाकार त्या काळात बाईंच्या हाताखाली हळूहळू जडतघडत गेले. विक्रम गोखले, उषा नाडकर्णी, नाना पाटेकर, रिमा लागू, भक्ती बर्वे, प्रदीप वेलणकर, सुकन्या कुलकर्णी, उदय म्हैसकर, नीना कुलकर्णी अशा अनेक अभिनय निपुण कलाकारांची एक अख्खी नवीकोरी फळी त्यांच्या कुशल दिग्दर्शकीय हातातून तयार झाली. ‘संध्याछाया‘ मधील परदेशस्थ पुत्राच्या विरहाने झुरणारी प्रेमळ कुटुंबवत्सल नानी असो वा ‘बॅरिस्टर‘ मधील केशवपन केलेली आलवण नेसलेली भावनेच्या कोंड माऱ्याने घुसमटणारी मावशी असो किंवा ‘हमीदाबाईची कोठी‘ मधील कोठी संस्कृतीतील गायकी परंपरेचा ऱ्हास असहाय्यपणे पहाणारी हमीदाबाई असो अथवा ‘वाडा चिरेबंदी‘ मधील पति निधनानंतर कोसळणारी नाती व वाड्याचं ढासळणारं गतवैभव पचवणारी विधवा आई असो बाईंनी मात्र समोर हाती आलेल्या भूमिकेला केवळ न्याय आणि संपूर्ण न्यायच दिला. गोळीबंद संवादफेक, हवा तो परिणाम नेमका साधण्यासाठी संवादांतील लयीवर आणि प्रसंगी शब्दविरामांवर देखील दिलेला भर, चेहऱ्यावर पसरलेले अस्सल हावभाव आणि अचूक देहबोली यातून व्यक्तिरेखा नेमकी पकडून प्रत्ययकारक पणे जिवंत उभी करण्याकडे त्यांचा कटाक्ष दिसून येतो. भारत सरकारने १९८७ मध्ये मा.विजया मेहता यांना ‘पद्मश्री‘ प्रदान करुन त्यांच्या रंगकार्याचा यथोचित गौरव केला. याचबरोबर त्यांना ‘संगीत नाटक अकादमी पुरस्कार‘, ‘कालिदास सन्मान‘, ‘तन्वीर सन्मान‘, ‘विष्णुदास भावे सुर्वणपदक‘, महाराष्ट्र शासनाचा ‘नटवर्य प्रभाकर पणशीकर पुरस्कार‘, ‘नाट्यदर्पण पुरस्कार‘, चतुरंग प्रतिष्ठानाचा ‘जीवनगौरव पुरस्कार‘, ‘रावसाहेब‘मधील भूमिकेसाठी राष्ट्रीय फिल्म पारितोषिक, एसएनडीटी विद्यापीठाची डॉक्टररेट, इचलकरंजी मराठी नाट्य संमेलनाध्यक्षपद असे अनेक सन्मान किताब मानमरातब मिळाले आहेत ‘झिम्मा : आठवणींचा गोफ‘ हे मा.विजया मेहता यांचे आत्मचरित्रपर पुस्तक त्यात त्यांच्या या प्रतिभेचीप्रगल्भतेची चुणूक पुन्हा एकदा दिसून येते. १९५१ सालापासून ते आजतागायत नाटकासाठी रंगभूमीसाठी आयुष्य वेचलेल्या बाईंच्या आणि रंगभूमीच्याही अनेक स्थित्यंतरांतून घडलेल्या रंगयात्रेचा हा सफरनामा या पुस्तकात आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Copyright © 2025 | Marathisrushti