जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
अटलजींनी देशाला सामर्थ्यवान करण्यावर भर दिला. १९९८ मध्ये वाजपेयी सरकारने जमिनीखाली पाच अणुचाचण्या केल्या. त्या जगाला, खासकरून अमेरिकेला हादरविणाऱ्या ठरल्या. कारण भारताने अमेरिकेच्या हेरगिरी उपग्रहाला चुकवून त्या पार पाडल्या होत्या.
३० ऑक्टोबर १९६६ रोजी ‘धि गोवा हिंदू असोसिएशन’ निर्मित, वसंत कानेटकर लिखित व मो. ग. रांगणेकर दिग्दर्शित ‘लेकुरे उदंड जाली’ नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग मुंबईच्या रवींद्र नाटय़ मंदिरात सादर झाला.या घटनेस एक्कावन्न वर्षे पूर्ण झाली. मराठी रंगभूमीवरील या आगळ्या नाटकाला संगीत पं. जीतेंद्र अभिषेकी यांनी खूप उत्तम प्रकारे नाटकातील सर्व गाण्यांच्या चाली बांधल्या होत्या. ताल, सूर व शब्द सगळे कसे चपखल बसवले होते. या नाटकातील मुक्तछंदातल्या संवादांना आणि छंदाला प्राधान्य असलेल्या गोव्यातल्या किरिस्तावांच्या तियात्रा या नाट्यप्रकारातल्या संगीताचा बाज त्यांनी वापरला होता.
वसंत कानेटकर यांनी ‘मूल नसलेले दाम्पत्य’ हा गंभीर सामाजिक विषय अतिशय वेगळ्या पद्धतीने हाताळला होता. विषय गंभीर असला तरी त्याची मांडणी हलक्याफुलक्या पद्धतीने करण्यात आली होती. नाटक हलकेफुलके, गाणी असणारे असले तरी त्याचा मूळ विषय प्रेक्षकांपर्यंत सुंदर पणे पोहोचला. श्रीकांत मोघे व मा कल्पना देशपांडे हे मुख्य कलाकार होते.
‘लेकुरे उदंड जाली’ या नाटकाचा पुनरुज्जीवित प्रयोग २५ मे १९७३ रोजी झाला. मूळ नाटकातील श्रीकांत मोघे यांच्यासह अन्य काही कलाकार या प्रयोगातही होते. मूळ प्रयोगात ‘मधुराणी’ची भूमिका कल्पना देशपांडे करत होत्या. पुनरुज्जीवित झालेल्या ‘लेकुरे..’मध्ये ही भूमिका मा.दया डोंगरे यांना मिळाली. गिरगावातील साहित्य संघ मंदिरात या पुनरुज्जीवित नाटकाचा पहिला प्रयोग झाला. ‘धि गोवा हिंदू असोसिएशन’नेच हे नाटक दीर्घकालावधीनंतर पुन्हा एकदा नव्याने रंगभूमीवर सादर केले होते. भोलाराम आठवले (धटिंगण गुरुजी), बाबा महाडिक (डॉ. अष्टपुत्रे), प्रकाश इनामदार (गोरा), प्रवीण पाटील (मारोतराव), मोहनदास सुखटणकर (दासोपंत), कुमुद दामले (सोनुताई), श्रीपाद जोशी (व्यंकटराव), विजया धनेश्वर (तिलोत्तमा) आदी कलाकार नाटकात होते. सुरुवातीच्या प्रयोगात मंदाकिनी भडभडे या ‘सोनुताई’ करत होत्या, तर विठ्ठल पणदूरकर हे ‘दासोपत’ करत होते.
दया डोंगरे या नाटकाची आठवण सांगताना म्हणतात.
शिवाजी मंदिरच्या प्रयोगाच्या वेळची एक आठवण आहे. नाटकात –
‘मी बोलले तर होते वाईट,
पण आहे का यांना त्याचे काही,
तुम्ही माहेरचे म्हणूनच सांगते बाई
यांना माणसांची पारखच नाही..’
असे एक गाणे होते. शिवाजी मंदिरच्या त्या प्रयोगाला काहीतरी गडबड झाली आणि गाणे सुरू झाले आणि रेकॉर्डरमधून वायर निघाली. गाणे अचानक थांबले आणि मी क्षणभर ‘ब्लँक’ झाले. पण लगेचच पुढचे शब्द मी म्हणायला सुरुवात केली. त्याच वेळी तिकडे ध्वनिमुद्रित संगीत सुरू झाले. मी त्याचा अंदाज घेऊन पुढचे गाणे त्या ‘ट्रॅक’वर जुळवून घेऊन म्हटले. वसंत कानेटकर, सी. रामचंद्र, पं. जीतेंद्र अभिषेकी, दिलीपकुमार, वैजयंतीमाला अशा मान्यवरांनी आमचा हा ‘लेकुरे’चा प्रयोग पाहिला. नाटकाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या नाटकाबाबतची एक विशेष बाब आहे. अमेरिकेत न्यूयॉर्क, वॉशिंग्टन, फिलाडेल्फिया, शिकागो, बोस्टन, डेट्रॉईट, टोरांटो या ठिकाणी आमच्या ‘लेकुरे’चे प्रयोग झाले. सातासमुद्रापार गेलेल्या या पहिल्या मराठी नाटकात मी होते याचा मला विशेष अभिमान आणि आनंद आहे. या दौऱ्यासाठी कोणीही प्रायोजक नव्हता. आम्ही सर्व कलाकारांनी स्वत:च्या पदरचे पैसे घालून हा दौरा ठरवला होता.
येण्या-जाण्याचा खर्च आम्हीच करणार होतो. प्रयोगाची तांत्रिक व्यवस्था आम्ही कलाकारच सांभाळणार होतो. तेथील काही मराठी मंडळींकडून आमची निवासाची आणि जेवणखाणाची व्यवस्था केली जाईल असे आश्वासन देण्यात आले होते. पण तिकडे गेल्यावर हे आश्वासन पूर्ण होऊ शकले नाही आणि आमची भलतीच पंचाईत झाली. ठरल्याप्रमाणे आम्ही पहिला प्रयोग केला आणि पुढचे प्रयोग करायचे की नाही, यावर चर्चा झाली. पण सर्वानुमते प्रयोग करायचे ठरले. आमचा सगळा खर्च भागविण्यासाठी प्रत्येक प्रयोगानंतर आम्ही प्रेक्षकांमध्ये ताट फिरवत होतो. त्यात जे पैसे जमा व्हायचे ती रक्कम प्रयोगातील सर्व कलाकारांमध्ये समान वाटप केली जायची. त्यामुळे कमावणे तर सोडाच; पण गमावण्याची वेळ आली होती. प्रयोगादरम्यान एका अमेरिकन महिलेने आम्हा सगळ्या कलाकारांना तिच्या घरी जेवायला बोलावले आणि चक्क श्रीखंड-पुरीचे जेवण करून घातले. हा अपवाद करता आमच्या या अमेरिकन दौऱ्याचा अनुभव विदारक होता. नंतर सुयोग’ नाटय़संस्थेतर्फे १९९५-९६ च्या सुमारास ‘लेकुरे उदंड जाली’ हे नाटक पुन्हा एकदा नव्याने रंगमंचावर सादर केले. यात मा.प्रशांत दामले आणि सुकन्या कुलकर्णी-मोने प्रमुख भूमीका केल्या होत्या.
प्रशांत दामले यांनी एका मुलाखतीत सांगीतले आहे. त्यात जी गाणी होती ती जुन्या काळची आणि अवघड होती. त्याचबरोबर त्यातले पल्लेदार संवादही महत्त्वाचे होते. त्या नाटकाच्या एका प्रयोगाला पु. ल. देशपांडे आणि पंडित जितेंद्र अभिषेकी आले होते. त्यांच्यासमोर प्रयोग करताना आणि त्यांनी चाल लावलेली गाणी म्हणताना मला दडपण आलं होतं, पण मी प्रयोग नेमकेपणानं केला. पुलं. आणि अभिषेकी बुवांनी प्रयोग संपल्यानंतर माझं कौतुक केलं, तो क्षण मी कधीच विसरणार नाही.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
२००४ मध्ये विम्बल्डन जिंकल्यानंतर मारिया शारापोवाने २००८ मध्ये अमेरिकन ओपन आणि २०१० मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा जिंकल्या. मग २०१२ आणि २०१४ मध्ये फ्रेंच स्पर्धा जिंकून तिने विविध कोर्टवरील बहुपैलुत्व सिद्ध केले. सेरेना किंवा व्हीनसच्या तुलनेत तिने फार ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकलेल्या नाहीत. मात्र, मारिया शारापोवा केवळ एक प्रसिद्ध टेनिसपटू नाही. ती आता जगातील एक अव्वल सेलेब्रिटीही बनलेली आहे.
७०-८० च्या दशकात फारूक शेख यांनी आपला वेगळा ठसा उमटवला होता. नुरी, शतरंज के खिलाडी, चष्मे बद्दुर, गरम हवा इत्यातदी चित्रपट गाजले. ‘क्लब ६०’ हा त्यांचा शेवटचा चित्रपट होता.
त्यांनी १९७४ मध्ये रेल्वे कामगारांसाठी लढा दिला. मुंबईत कामगारांसाठी लढा देताना मुंबई बंद करून दाखवली होती. आणीबाणीच्या काळात त्यांनी सरकारविरोधात रान उठवले होते. त्यांना शोधण्यासाठी सरकारने जंग जंग पछाडले होते. मात्र जॉर्ज यांनी वेशांतरे करून लढा सुरूच ठेवला होता. २५ जून १९७५ रोजी आणीबाणी लागू करण्यात आली होती.
मुविंग आऊट या वेब सिरीज मधून तिने वेब दुनियेत पदार्पण केलं आणि प्रेक्षकांची मन जिंकून घेतली. अभिज्ञा भावेच्या मुव्हिंग आऊट या वेबसीरिजला देखील खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर त्याचा दुसरा सीझनदेखील प्रदर्शित करण्यात आला.
सुयोग नाटसंस्था सुधीर भट आणि गोपाळ अलगेरी यांनी १ जानेवारी १९८५ रोजी स्थापन केली. ‘मोरूची मावशी’ या आचार्य अत्रेलिखित पहिल्याच नाटकाने हजाराहून अधिक प्रयोगांचा विक्रम केला होता. या नाटयसंस्थेच्या माध्यमातून ८० पेक्षा जास्त नाटके, १६ हजाराहून अधिक प्रयोग आणि हजार प्रयोगांचा टप्पा ओलांडणा-या आठ नाटकांची निर्मिती त्यांनी केली. सुयोग नाटयसंस्थेच्या माध्यमातून त्यांनी एकाहून एक सरस विक्रमी नाटकांची निर्मिती केली.
पद्मा गोळे या मराठी कवयित्री ‘पद्मा’ ह्या नावाने काव्यलेखन करत असत. त्यांचा जन्म १० जुलै १९१३ रोजी झाला. त्यांचा पहिला कवितासंग्रह प्रीतिपथावर हा १९४७ साली प्रकाशित झाला. कविता संग्रहांशिवाय त्यांनी रायगडावरील एक रात्र, स्वप्न, नवी जाणीव या नाटिकाही लिहिल्या. त्यांनी लिहिलेली वाळवंटातील वाट नावाची कादंबरीही प्रकाशित झाली. याशिवाय स्वप्न (१९५५), समिधा (१९४७), नीहार (१९५४), स्वप्नजा (१९६२) व आकाशवेडी(१९६८) हे त्यांचे काव्यसंग्रह. प्रितिपथावर ह्या त्यांच्या पहिल्या काव्यसंग्रहावर तांब्यांचा प्रभाव असला,तरी अनुकरणाचा हा टप्पा लवकरच ओलांडून त्यांच्या कवितेने पृथगात्म रूप धारण केले.
स्वतःच्या उत्कट अनुभवांशी प्रामाणिक राहिल्याने त्यांची कविता परिपक्व आणि समृद्ध होत गेली. एका संवेदनाशील, अंतर्मुख स्त्रीमनाचे विविध विलोभनीय आविष्कार त्यांच्या कवितेत आढळतात. त्यांच्या रसिक,चिंतनशील आणि स्वप्नदर्शी व्यक्तिमत्त्वाचा प्रत्यय त्यांतून येतो. स्निग्ध सूर,संपन्न निसर्ग प्रतिमा आणि शालीन संयम ही त्यांच्या कवितेची काही लक्षणीय वैशिष्ट्ये! स्वप्नजा या त्यांच्या काव्यसंग्रहाला महाराष्ट्र राज्य शासनाचे प्रथम पारितोषिक मिळाले, तसेच त्यांच्या रायगडावरील एक रात्र व इतर नाटिका या बालनाट्यांच्या पुस्तकालाही महाराष्ट्र राज्य शासनाचे पारितोषिक मिळाले आहे. पद्मा गोळे यांचे १२ फेब्रुवारी १९९८ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
चित्रपटांची संपूर्ण दुनिया ग्लॅमरभोवती फिरते त्यामुळे अनेकदा पुरस्कारांवर प्रमुख नट-नटय़ांचीच नावे कोरली जातात आणि चरित्र अभिनेते त्यापासून वंचित राहतात. पी. सावळाराम पुरस्कारांमध्ये शुभा खोटेंचे नाव येणे हे त्यामुळे चकित आणि आनंदित करणारे आहे. पावणेदोनशे चित्रपटांमध्ये आणि अनेक टी.व्ही. मालिकांमध्ये तसेच इंग्रजी रंगभूमीवर सातत्याने वैविध्यपूर्ण भूमिका साकारणाऱ्या शुभा खोटे यांच्या अभिनय प्रतिभेचे खरे तर कधीच गांभीर्याने विश्लेषण झाले नाही.
अनेकदा अभिनेते प्रसिद्धीकडे गांभीर्याने पाहत नाहीत आणि प्रसार माध्यमांचेही डोळे कायम प्रमुख अभिनेत्यांकडेच लागलेले असतात. शुभा खोटे यांनी अगदी सुरुवातीला नायिका, सहनायिका म्हणून काही चित्रपट केले; परंतु त्याची कारकीर्द खरी गाजली ती चरित्रनायिका अथवा विनोदी अभिनेत्री म्हणून. किंबहुना विनोदी अभिनेत्यांच्या प्रभावळीत स्वत:चे असे स्वतंत्र स्थान मिळवू शकलेल्या काही मोजक्या अभिनेत्रींमध्ये शुभा खोटेंचे नाव अव्वल क्रमांकावर आहे. क्रीडाक्षेत्रात मनापासून रमत असलेल्या किशोरवयीन शुभा खोटेचे एक छायाचित्र पाहून निर्माता-दिग्दर्शक अमिया चक्रवर्ती यांनी तिला ‘सीमा’ या चित्रपटात भूमिका दिली. १९५५ साली आलेल्या या चित्रपटात शुभा खोटे कॉलेज कन्यका म्हणून सायकल चालविताना दिसल्या. शुभा खोटेंच्या विनोदी शैलीत सांगायचे झाले तर ‘सीमा’नंतर त्यांची अभिनयक्षेत्रातील वाटचाल ‘सायकल’ सारखीच झाली. म्हणजे नायिकेसारखी ‘मोटरगाडी’ची कारकीर्द तिच्या वाटय़ाला आली नाही. अर्थात शुभा खोटेंनी स्वत:ला अगदी सुरुवातीपासूनच वैविध्याची चटक लावली.
‘पेईंग गेस्ट’मध्ये त्यांनी चक्क खलनायिका साकारली होती. परंतु आपली ही व्यक्तिरेखा पडद्यावर पाहण्याची त्यांची स्वत:चीच हिंमत झाली नाही. १९५७ साली प्रदर्शित झालेला हा चित्रपट शुभा खोटेंनी १९८० नंतर कधीतरी व्हिडीओवर पाहिला म्हणतात. १९५९ साली प्रदर्शित झालेला एल. व्ही. प्रसाद यांचा ‘छोटी बहन’ हा चित्रपट शुभाबाईंच्या अभिनय कारकीर्दीतला खरा ‘टर्निग पॉईंट’ म्हणावा लागेल. मेहमूद, शुभा खोटे आणि धुमाळ ही धमाल ‘तिकडी’ किंवा ‘त्रिकूट’ याच चित्रपटापासून जन्माला आले आणि पुढील जवळपास दोन दशके त्यांनी संगीतमय प्रेमपटांमध्ये धमाल उडविली. शुभा खोटे आणि मेहमूद यांची प्रेमकथा आणि शुभाच्या वडिलांच्या भूमिकेत धुमाळ. धुमाळ सतत या दोघांच्या पाळतीवर, अशी ‘हमखास हास्यकथा’ त्यात असे. ससुराल, दिल एक मंदिर, दिल तेरा दिवाना, भरोसा, जिद्दी अशा अनेक चित्रपटांमध्ये प्रेमाची ही लपवाछपवी रंगली. त्यातूनच ‘मै तेरे प्यार मे क्या क्या न बना दिलवर’ सारखी धमाल गाणी जन्माला आली. चित्रपटाच्या मुख्य कथानकातले ताण-तणाव सुसह्य करण्याचे काम या तिघांनी चोख बजावले.
नर्स, शेजारीण, आई, मैत्रिण, ख्रिश्चन शेजारीण, शाळेची मुख्याध्यापक, मुलींच्या वसतीगृहाची प्रमुख अशा अक्षरश: शेकडो व्यक्तिरेखा शुभा खोटेंनी १९७० नंतरच्या शंभरेक चित्रपटांमधून साकारल्या. परंतु त्यात लक्षात राहिली ती ‘एक दुजे के लिये’मधली ‘सपना’ची अर्थात रती अग्निहोत्रीची प्रेमद्वेष्टी आई. वासूनं पाठवलेली चिठ्ठी सपनाची आई जाळून टाकते, तेव्हा त्या पत्राची राख कॉफीत घालून सपना ती कॉफी पिऊन टाकते. तेव्हा ‘सपनाची आई’ म्हणून शुभा खोटेंनी दिलेला ‘लूक’ केवळ अवर्णनीय म्हणावा लागेल. चित्रपटांमधील भूमिकांचा वेग मंदावल्यावर शुभा खोटेंनी मराठी चित्रपट निर्मितीचाही प्रयत्न करून पाहिला. १९६७ साली ‘चिमुकला पाहुणा’ या मराठी चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शनही शुभा खोटे यांनी केले. अर्थात एकाच चित्रपटात ही मोहीम थंडावली आणि नंतरच्या काळात शुभा खोटेंनी इंग्रजी रंगभूमीकडे मोर्चा वळविला.
भरत दाभोळकर यांच्या अनेक ‘हिंग्लीश’ नाटकांमध्ये ‘देशी विनोद’ करणाऱ्या व्यक्तिरेखा त्यांच्या वाटय़ाला आल्या. दरम्यानच्या काळात दूरचित्रवाणीवर विनोदी मालिकांचा सुकाळ झाला त्यातही त्यांनी अनेक व्यक्तिरेखा साकारल्या. परंतु गेली काही वर्षे त्या सवयीने आणि सरावाने भूमिका साकार करीत आहेत. आजही शुभा खोटेंचे नाव घेतले की, संगीतमय प्रेमकथांचा हिंदी चित्रपटांचा जमाना डोळ्यांपुढे येतो. धुमाळच्या ‘संरक्षणाखाली’ खोलीत बंद असलेली उपनायिका शुभा खोटे आणि तिच्या वियोगात ‘ऊर बडवीत’, ‘प्यार की आग मे तनबदन जल गया’ म्हणणारा मेहमूद. त्या सर्व मनोरंजक क्षणांसाठी आपण शुभाजींचे ऋणी आहोत!
अब मुद्दत बाद सुना है की दिन रात लिख रहा है
संभालकर- चिडीयों के जवाब, खोल दिया है उसने बीचोंबीच आकाश के, मँझरात एक डाकघर
हिंदीतील ज्येष्ठ कवी चंद्रकांत देवताले यांच्या ‘पत्थर फेंक रहा हू’ या गेल्या वर्षी प्रकाशित झालेल्या काव्यसंग्रहातील ही कविता त्यांच्या प्रतिभेचा आणि अनोख्या प्रतिमा योजनांचा अविष्कार घडवते.
अन्य भाषांतील दर्जेदार साहित्याचा मराठी अनुवाद करण्याची परंपरा काही वर्षांत ‘पॉप्युलर’ झाल्याने मराठी रसिकांनी देवतालेंच्या प्रतिभेची केव्हाच दखल घेतली आहे. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचा ‘कुसुमाग्रज राष्ट्रीय साहित्य पुरस्कार’ देवतालेंना शनिवारी नाशिकमध्ये देण्यात आला. त्यापूर्वी हिंदीतील ज्येष्ठ कवींनी एकत्र येऊन सुरू केलेला पहिला ‘कविता समय’ हा पुरस्कारही त्यांना देण्यात आला. वयाची पंच्याहत्तरी गाठलेल्या देवतालेंना आजवर अनेक पुरस्कार लाभले आहेत. मात्र हे पुरस्कार त्यांच्यासाठी विशेष महत्त्वाचे आहेत.
भूखंड तप रहा है, पत्थर की बेंच, इतनी पत्थर रोशनी आदी ११ काव्यसंग्रह गाठीशी असणाऱ्या या कवीला सन्मानित करावे, असे साहित्य अकादमीला अद्याप वाटले नाही. हा कवी खरं तर ज्ञानपीठ पुरस्काराच्या योग्यतेचा. महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशाच्या सीमेवरील जौसखेडा येथे जन्म झालेले देवताले मराठीला मावशीची बोली मानतात. मराठी कवितेतील नवे-जुने प्रवाह त्यांना ज्ञात आहेत. नामदेव ढसाळ, चंद्रकांत पाटील आणि कै. दिलीप चित्रे यांच्याशी त्यांची घनिष्ठ मैत्री. त्यामुळेच चित्रेंच्या काही कविता त्यांनी हिंदीत नेल्या तर देवतालेंच्या कविता चंद्रकांत पाटील यांनी ‘तिची स्वप्ने’ या काव्यसंग्रहाद्वारे मराठीत अनुवादीत केल्या आहेत. हे कमी म्हणून देवताले यांनी संत तुकारामांच्या दीड एकशे अभंगांचा अनुवाद हिंदीत येऊ घातला आहे.
मराठीशी असलेल्या या जवळीकीमुळे चव्हाण विद्यापीठाने केलेला गौरव देवतालेंना सुखावून गेला असेल. शासकीय महाविद्यालयाच्या प्राचार्यपदावरून निवृत्त झालेला हा कवी डाव्या विचारसरणीशी बांधिलकी मानतो. स्त्रीच्या विविध भूमिका-नाती आणि प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करणारा सर्वसामान्य माणूस देवतालेंच्या कवितांच्या केंद्रस्थानी असतो आणि म्हणूनच त्यांचा हात आजही लिहीता आहे. हिंदीतील शीर्षस्थ कवी गजानन माधव मुक्तीबोध यांना केवळ गुरूस्थानी न मानता त्यांच्या काव्यावर पीएचडी करण्याची कामगिरी देवतालेंनी केली आहे.
आधुनिकतेच्या रेटय़ात हरवत चाललेला साधेपणा या कवीला अस्वस्थ करतो आणि त्यामुळेच ते तुमच्या-आमच्यातील होऊन जातात. शासकीय महाविद्यालयामध्ये प्राध्यापकीपासून प्राचार्यपदाचा अनुभव घेतलेल्या या कविचे सभोवतालच्या सामाजिक बदलांबाबत अखंड चिंतन सुरू असते. या चिंतनाला उपजत प्रतिभेची जोड मिळते आणि अस्वस्थ करणाऱ्या शब्दांच्या लडी उलगडत जातात. या चिंतनामुळेच वयाच्या या टप्प्यावरही त्यांची सृजनशीलता अखंडपणे टिकून आहे. याच अस्वस्थतेमुळे लेखणी म्यान करून वयाच्या ज्येष्ठतेची साथ घेऊन मोठेपणा वसूल करणे त्यांना मान्य नाही. विचार ठासून मांडणारे विचारवंत व्यक्तीगत पातळीवर दांभिकही असतात.
आत्मपरिक्षणाचे त्यांना वावडे असते. देवताले मात्र स्वत:ला ही संधीही देत नाहीत. सर्वसामान्य माणूस सर्वार्थाने सबल होण्याचे स्वप्न पहाणाऱ्या या कवीला याच सर्वसामान्यांपासून आपण लांब गेल्याची जाणीव आहे, हे त्यांचे वेगळेपण!
Copyright © 2025 | Marathisrushti