जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
लता मंगेशकर यांच्याविषयी माहिती असलेल्या आणि नसलेल्याही माहितीचा संग्रह..
जन्म - सप्टेंबर २८, इ.स. १९२९ ; इंदोर, मध्य प्रदेश (ब्रिटिश काळातील मध्य भारत एजन्सी)
व्यक्तिगत माहिती
धर्म हिंदू
नागरिकत्व भारतीय
मूळ गाव - मंगेशी, गोवा
भाषा - मराठी
पारिवारिक माहिती
आई - माई मंगेशकर
वडील - मास्टर दीनानाथ मंगेशकर
बंधू-भगिनी - आशा भोसले, उषा मंगेशकर, हृदयनाथ मंगेशकर, मीना खडीकर
संगीत साधना गुरू - मास्टर दीनानाथ मंगेशकर
संगीत कारकीर्द
पार्श्वगायन, सुगम संगीत
कारकिर्दीचा काळ - इ.स. १९४२ पासून
गौरव
विशेष उपाधी - गानकोकिळा
पुरस्कार - भारतरत्न(२००१)
लता मंगेशकर या भारताच्या महान गायिका आहेत. त्या भारताच्या हिंदी चित्रपटसृष्टीच्या ख्यातनाम गायक-गायिकांपैकी एक आहेत. हिंदी संगीतविश्वात त्यांना 'लता दीदी' म्हणून ओळखले जाते.
लता मंगेशकरांच्या कारकिर्दीची सुरूवात इ.स. १९४२ मध्ये झाली आणि ती कारकीर्द सहा दशकांपेक्षा अधिक काळ टिकून आहे.
त्यांनी ९८० पेक्षा अधिक हिंदी चित्रपटांची गाणी गायली असून, विसाहून अधिक प्रादेशिक भारतीय भाषांमध्ये (प्रामुख्याने मराठी) गायन केले आहे.
लता मंगेशकरांचे कुटुंब संगीतासाठी प्रसिद्ध असून, सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले, उषा मंगेशकर, मीना मंगेशकर आणि ख्यातनाम संगीतकार-गायक हृदयनाथ मंगेशकर ही त्यांची सख्खी भावंडे आहेत.
लता मंगेशकरांचे वडील मास्टर दीनानाथ मंगेशकर हे मराठी नाट्य-संगीताचे प्रसिद्ध गायक होते.
भारताचा सर्वोच्च पुरस्कार 'भारतरत्न' प्राप्त होणार्या गायक-गायिकांमध्ये लता दीदी या दुसर्या गायिका आहेत..
लता मंगेशकर हे नाव 'गिनेस बुक ऑफ़ वर्ल्ड रेकॉर्ड्स' मध्ये इ.स. १९७४ ते इ.स. १९९१ च्या कालावधीत सर्वात जास्त ध्वनिमुद्रणांच्या (रेकॉर्डिंग्स) उच्चांकासाठी नमूद झालेले आहे.
लता मंगेशकरांचा जन्म मध्य प्रदेश (ब्रिटिश काळात सेंट्रल इंडिया एजन्सी)च्या इंदूर शहरात शीख मोहल्ला येथे एका महाराष्ट्रीय गोमंतक कुटुंबात झाला.
त्यांचे पाळण्यातले नाव हृदया.
त्यांचे वडील पंडित दीनानाथ मंगेशकर हे शास्त्रीय गायक तसेच नाट्यकलावंत होते. लता ही आपल्या आई-वडिलांचे सर्वात ज्येष्ठ अपत्य.
आशा, उषा, मीना आणि हृदयनाथ ही त्यांची लहान भावंडे.
लताला पहिले संगीताचे धडे आपल्या वडिलांकडूनच मिळाले. वयाच्या पाचव्या वर्षी तिने वडिलांच्या संगीत नाटकांमध्ये बाल-कलाकार म्हणून कामाची सुरुवात केली.
इ.स. १९४२ मध्ये लता अवघ्या १३ वर्षांची होती, तेव्हा वडील हृदयविकाराने निवर्तले. तेव्हा मंगेशकरांचे एक आप्त तसेच नवयुग चित्रपट कंपनीचे मालक - मास्टर विनायक ह्यांनी लताच्या परिवाराची काळजी घेतली. त्यांनी लताबाईंना गायिका आणि अभिनेत्री म्हणून कामाचा प्रारंभ करून दिला.
लताने नाचू या गडे, खेळू सारी मनी हौस भारी हे सदाशिवराव नेवरेकरांनी बसवलेले गाणे वसंत जोगळेकरांच्या किती हसाल (इ.स. १९४२) ह्या मराठी चित्रपटासाठी गायले, पण हे गाणे चित्रपटातून वगळले गेले. मास्टर विनायकांनी लताबाईंना नवयुगच्या पहिली मंगळागौर (इ.स. १९४२) ह्या मराठी चित्रपटात एक छोटी भूमिका दिली. ह्या चित्रपटात त्यांनी नटली चैत्राची नवलाई हे दादा चांदेकरांनी स्वरबद्ध केलेले गीत गायले. इ.स. १९४५ मध्ये जेव्हा मास्टर विनायकांच्या कंपनी-कार्यालयाचे स्थानांतर मुंबईस झाले, तेव्हा लताबाई मुंबईला आल्या. त्या उस्ताद अमानत अली खाँ (भेंडीबाजारवाले) ह्यांच्याकडून हिंदुस्तानी शास्त्रोक्त संगीत शिकू लागल्या. त्यांनी वसंत जोगळेकरांच्या आपकी सेवामें (इ.स. १९४६) ह्या हिंदी चित्रपटासाठी पा लागूं कर जोरी हे गाणे गायले (दत्ता डावजेकर हे त्या गाण्याचे संगीतकार होते).
लता आणि आशा (बहीण) यांनी मास्टर विनायकांच्या पहिल्या हिंदी चित्रपटात (बडी माँ - इ.स. १९४५) नूर जहाँ सोबत छोट्या भूमिका केल्या. त्या चित्रपटात लताने माता तेरे चरणोंमें हे भजन गायले.
मास्टर विनायकांच्या दुसर्या हिंदी चित्रपटाच्या (सुभद्रा - इ.स. १९४६) ध्वनिमुद्रणाच्या वेळेस लताबाईंची ओळख संगीतकार वसंत देसाई यांच्याशी झाली.
इ.स. १९४७ मध्ये भारताच्या फाळणीनंतर उस्ताद अमानत अलीखाँ भेंडीबाजारवालें यांनी नवनिर्मित पाकिस्तानला देशांतर केले, तेव्हा लतादीदी उस्ताद अमानत खाँ(देवासवाले) यांचेकडून शास्त्रोक्त संगीत शिकायला लागल्या. उस्ताद बडे गुलाम अली खान साहेबांचे शिष्य पंडित तुलसीदास शर्मांकडूनही लताबाईंना तालीम मिळाली.
इ.स. १९४८ मध्ये मास्टर विनायकांच्या मृत्यूनंतर संगीतकार गुलाम हैदरांनी लताबाईंचे मार्गदर्शन केले. त्या काळात हिंदी चित्रपटांमध्ये नूरजहाँ, शमशाद बेगम आणि जोहराबाई(अंबालेवाली), ह्यांसारख्या अनुनासिक आणि जड आवाज असलेल्या गायिका जास्त लोकप्रिय होत्या.
ग़ुलाम हैदरांनी लताजींची ओळख तेव्हा शहीद (इ.स. १९४८) ह्या हिंदी चित्रपटावर काम करीत असलेले निर्माते शशिधर मुखर्जींशी केली, पण मुखर्जींनी लताचा आवाज "अतिशय बारीक" म्हणून नाकारला. तेव्हा हैदरांचे थोड्या रागात उत्तर होते - येणार्या काळात निर्माते आणि दिग्दर्शक लताचे पाय धरतील आणि आपल्या चित्रपटांसाठी गाण्याची याचना करतील. हैदरांनी लतादीदींना मजबूर (इ.स. १९४८) ह्या चित्रपटात दिल मेरा तोडा हे गाणे म्हणण्याची मोठी संधी दिली.
सुरूवतीला लता आपल्या गाण्यात तेव्हाच्या लोकप्रिय असलेल्या नूरजहाँचे अनुकरण करीत असे, पण नंतर लताने स्वतःच्या गाण्याची एक आगळी शैली बनवली. त्या काळात हिंदी चित्रपटांतल्या गाण्यांचे गीतकार प्रामुख्याने मुस्लीम कवी असत, त्यामुळे गाण्यांच्या भावकाव्यात भरपूर हिंदुस्तानी शब्द असत. एकदा सुप्रसिद्ध अभिनेता दिलीपकुमार यांनीन लताच्या हिंदी/हिंदुस्तानी गाण्यातील "मराठी" उच्चारांसाठी तुच्छतादर्शक शेरा मारला, तेव्हा लताने शफ़ी नावाच्या मौलवींकडून हिंदुस्तानी उच्चारांचे धडे घेतले.
लोकप्रिय चित्रपट महल(इ.स. १९४९)चे आयेगा आनेवाला हे गाणे लताच्या कारकिर्दीला एक महत्त्वाचे वळण देणारे ठरले. (गाण्याचे संगीतकार खेमचंद प्रकाश होते, तर चित्रपटात गाणे अभिनेत्री मधुबालाने म्हटले होते.)
१९५० च्या दशकात लताने ज्या संगीत दिग्दर्शकांनी स्वरबद्ध केलेली गाणी गायिली, अशा नामांकित संगीतकरांची नावे - अनिल विश्वास, शंकर-जयकिशन, नौशाद, सचिन देव बर्मन, सी. रामचंद्र, हेमंत कुमार मुखोपाध्याय, सलिल चौधरी, खय्याम, रवी, सज्जाद हुसेन, रोशन, मदन मोहन, कल्याणजी आनंदजी, वसंत देसाई, सुधीर फडके, हंसराज बहल आणि उषा खन्ना. (सुप्रसिद्ध संगीतकार ओ.पी. नय्यर हे असे एकमेव अपवाद होते ज्यांनी आपल्या रचनांसाठी लताऐवजी आशा भोसले यांना प्राधान्य दिले.)
संगीतकार नौशाद यांच्या दिग्दर्शनाखाली बैजू बावरा (इ.स. १९५२), मुग़ल-ए-आज़म (इ.स. १९६०) आणि कोहिनूर (इ.स. १९६०) ह्या चित्रपटांसाठी लताने शास्त्रोक्त संगीतावर आधारित काही गाणी गायिली. लताने नौशादांसाठी गायिलेले पहिले गाणे हे जी.एम.दुर्राणींसोबतचे द्वंद्वगीत छोरेकी जात बडी बेवफ़ा आहे. सुप्रसिद्ध संगीतकार जोडी शंकर-जयकिशन यांनी तर आपल्या जवळजवळ सर्व चित्रपटांच्या(विशेषतः राज कपूरनिर्मित) गाण्यांच्या गायिका म्हणून लताचीच निवड केली. अशा चित्रपटांमध्ये आग, आह, (इ.स. १९५३), श्री ४२० (इ.स. १९५५) आणि चोरी चोरी (इ.स. १९५६) यांचा समावेश आहे. इ.स. १९५७ पर्यंत सचिन देव बर्मन आपल्या बहुतेक चित्रपटगीतांच्या प्रमुख गायिका म्हणून लताची निवड करीत, उदा. सज़ा (इ.स. १९५१), हाउस नं. ४४, (इ.स. १९५५) आणि देवदास (इ.स. १९५५). पण इ.स. १९५७ ते इ.स. १९६२ च्या काळात बर्मनदादांनी लतादीदी ऐवजी गीता दत्त आणि आशा भोसले ह्या गायिकांना घेऊन आपली सर्व गाणी बसवली.
इ.स. १९५० च्या दशकात लताबरोबर अतिशय लोकप्रिय गाणी बनवणार्यांपैकी एक सलिल चौधरी होते. लतादीदीला "सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका" म्हणून सर्वप्रथम फ़िल्मफ़ेयर पारितोषिक सलिल चौधरींनी स्वरबद्ध केलेल्या आजा रे परदेसी ह्या मधुमती (इ.स. १९५८) मधील गीतासाठी मिळाले.
१९६०च्या दशकात लता मंगेशकर निर्विवादपणे हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रथम श्रेणीच्या पार्श्वगायिका ठरल्या. ह्या काळात लताने जवळजवळ सर्व संगीतकारांबरोबर गाणी ध्वनिमुद्रित केली. त्यांपैकी अनेक गाणी अजरामर झाली. १९६० मध्ये प्यार किया तो डरना क्या हे मुग़ल-ए-आज़म (इ.स. १९६०) चे नौशादने संगीतबद्ध केलेले आणि मधुबालावर चित्रित गाणे तुफान लोकप्रिय झाले. हवाई-धरतीचे अजीब दास्ताँ है ये हे शंकर-जयकिशन दिग्दर्शित आणि दिल अपना प्रीत पराई (इ.स. १९६०) मध्ये मीना कुमारी वर चित्रित गाणेही अतिशय प्रसिद्ध झाले.
इ.स. १९६१ मध्ये लताने सचिन देव बर्मन यांचे साहाय्यक जयदेव यांसाठी अल्ला तेरो नाम हे भजन गाण्याचे पाऊल उचलून बर्मनदादांसोबत पुन्हा वाटचाल सुरू केली.
इ.स. १९६२ मध्ये लताने बीस साल बाद चित्रपटातील कहीं दीप जले कहीं दिल ह्या हेमंत कुमार मुखोपाध्याय-दिग्दर्शित गाण्यासाठी दुसरा फिल्मफेअर पुरस्कार पटकावला.
२७ जून, इ.स. १९६३ ला, भारत-चीन युद्धानंतर एका कार्यक्रमात लताबाईंनी कवी प्रदीप लिखित आणि सी. रामचंद्र यांनी संगीतबद्ध केलेले ऐ मेरे वतन के लोगों हे देशभक्तिपर गीत भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या उपस्थितीत गायले. तेव्हा लताच्या सुमधुर कंठातून युद्धात देशासाठी प्राण देणार्या जवानांना श्रद्धांजली वाहणारे ते गीत ऐकून पंडितजींच्या डोळ्यात अश्रू उभे झाले.
इ.स. १९६३ मध्ये सचिन देव बर्मन यांव्याबरोबर पुन्हा गाणे सुरू केल्यानंतर लताने गाईड (इ.स. १९६५) मधील आज फिर जीनेकी तमन्ना है, पिया तोसे नैना लागे रे, गाता रहे मेरा दिल हे (किशोर कुमार सोबतचे द्वंद्वगीत) तसेच ज्युवेल थीफ़ (इ.स. १९६७) मधील होटोंपे ऐसी बात यांसारखी बर्मनदादांची अनेक लोकप्रिय गाणी म्हटली.
इ.स. १९६० च्या दशकात लतादीदीने मदनमोहन ह्या आपल्या आवडत्या संगीतकाराची अनेक गाणी म्हटली. अशा गाण्यांमध्ये अनपढ (इ.स. १९६२) चे आपकी नज़रोंने समझा, वो कौन थी (इ.स. १९६४) ची लग जा गले, नैना बरसे तसेच मेरा साया (इ.स. १९६६) चे तू जहां जहां चलेगा ह्या सुरेल गाण्यांचा विशेष उल्लेख होतो.
१९६० च्याच दशकात लक्ष्मीकांत प्यारेलाल ह्या नवोदित संगीतकार-जोडीची जवळ-जवळ सर्व गाणी लतानेच म्हटली. लता मंगेशकरच्या गाण्यांमुळेच ही जोडी हिंदी चित्रपटसंगीतक्षेत्रात अजरामर झाली. पारसमणी (इ.स. १९६३) ह्या लक्ष्मी-प्यारे जोडीच्या पहिल्या-वहिल्या चित्रपटातली लताची गाणी अतिशय लोकप्रिय ठरली. लतादीदीने मराठी सिनेमांसाठी अनेकानेक गाणी गायिली. त्यांनी ज्या नामांकित संगीतकारांबरोबर काम केले, त्यांमध्ये हृदयनाथ मंगेशकर, वसंत प्रभू, श्रीनिवास खळे आणि सुधीर फडकेंचा विशेष उल्लेख करायला हवा. लतादीदीने स्वतः 'आनंदघन' ह्या टोपणनावाने मराठी गाणी स्वरबद्ध करून गायिलेली आहेत. १९६० आणि १९७० च्या दशकांमध्ये लताने संगीतकार सलिल चौधरी आणि हेमंतकुमारांची बांगला भाषेतली गाणीही म्हटली आहेत.
लता मंगेशकरने (मुकेश, मन्ना डे, महेंद्र कपूर, मोहम्मद रफी आणि किशोर कुमार यांसारख्या त्या काळातील सर्व प्रसिद्ध गायकांबरोबर युगलगीते गायिली आहेत.
अभिजात संगीतात उस्ताद अमीरखाँ आणि उस्ताद बडे गुलामअली हे त्यांचे आवडते गायक आहेत.
लेखन
लता मंगेशकर यांनी लिहिलेल्या लेखांचा संग्रह ग्रंथाली प्रकाशनाने सन १९९५च्या आसपासच्या वर्षी प्रसिद्ध केला होता. त्याचे संपादन मधुवंती सप्रे यांनी केले होते. पुढे हे पुस्तक मिळणे कठीण झाले. जयश्री देसाई यांच्या पाठपुराव्यामुळे ’मैत्रेय प्रकाशन’ने ’फुले वेचिता’ या नावाने ते पुस्तक पुनर्मुद्रित केले आहे.
लता मंगेशकर यांचे व्यक्तिचित्रण करणारे ’स्वरयोगिनी’ नावाचे पुस्तक मधुवंती सप्रे यांनी लिहिले आहे. त्या पुस्तकाच्या परिशिष्टात लता मंगेशकरांनी गायिलेल्या चित्रपटगीतांची यादी आहे.
The Voice of a Nation (मूळ लेखक पद्मा सचदेव; अक्षय गाणे-मराठी अनुवाद : जयश्री देसाई)
ऐसा कहाँ से लाऊँ (हिंदी- पद्मा सचदेव)
लतादीदी आणि माझ्या कविता (सुचित्रा कातरकर)
लतादीदी : अजीब दर्शन हैं यह (मूळ लेखक : हरीश भिमाणी-हिंदी); (लतादीदी-मराठी अनुवाद : अशोक जैन.)
In search of Lata Mangeshkar. (इंग्रजी - हरीश भिमाणी)
Lata in her own voice (नसरीन मुन्नी कबीर)
लता मंगेशकर (चरित्र)- राजू भारतन
लता मंगेशकर गंधार स्वरयात्रा (१९४५- १९८९)- संपादन:विश्वास नेरूरकर
गाये लता, गाये लता- डॉ.मंगेश बिच्छू. प्रकाशक- पल्लवी प्रकाशन
हे रत्न भारताचे - लता मंगेशकर (लेखक : रेखा चवरे)
मोगरा फुलला (संपादक : रेखा चवरे)
सप्तसुरांच्या पलीकडे : लता मंगेशकर (हरीश भिमाणी)
लता मंगेशकर - संगीत लेणे (मोरया प्रकाशन)
संकलन - अमित कुलकर्णी
संदर्भ - विकिपिडिया, विविध वेबसाईटस व पुस्तके
`बहु असोत सुंदर संपन्न` हया सुप्रसिध्द महाराष्ट्रगीताचे ते जनक आहेत. साधारणपणे 1920 पर्यंतच्या त्यांच्या जीवनाचा आढावा त्यांनी आपल्या आत्मवृत्तात (1935) घेतला आहे. भारतीय ज्योतिर्गणित (1913) हया ग्रंथातून त्यांच्या ज्योतिर्गणितविषयक व्यासंगाचा प्रत्यय येतो.
चिंतामणराव कोल्हटकर यांचे वडील हे वर्तमानपत्र लेखक आणि वक्ते होते. त्यांचा जन्म १२ मार्च १८९१ रोजी नेवरे रत्नागिरी येथे झाला.चिंतामण कोल्हटकरांच्या वयाच्या सातव्या वर्षीच त्यांच्या वडिलांचे निधन झाले. लहानपणी अभ्यासात अधिक गती नसल्याचे पाहून काही वर्षे त्यांनी पिढीजात असलेली शेती केली. सातारा येथे ‘तुकाराम’ या नाटकात त्यांनी ‘मंबाजी’ची भूमिका साकारून (१९०७) रंगभूमीवर प्रवेश केला. नाट्याचार्य कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर याचं बोट धरून ते महाराष्ट्र नाटक मंडळीत आले आणि १९१८ मध्ये दीनानाथ मंगेशकर, कृष्णराव कोल्हापुरे यांच्या समवेत स्थापन केलेल्या ‘बळवंत संगीत नाटक मंडळी’पर्यंतचा साराच इतिहास मोठा संघर्षमय, रोमांचकारी आणि अद्भुत असाच आहे. कोल्हटकर १९११ मध्ये महाराष्ट्र नाटक मंडळीत दाखल झाले आणि पुढच्याच वर्षी ते भरत नाटक मंडळीत गेले. १९१४ साली ते किर्लोस्कर नाटक मंडळीत आले. तेथे त्यांना प्रसिद्धी मिळाली. १९१८ मध्ये त्यांनी दीनानाथ मंगेशकरांच्या भागीदारीत त्यांनी बलवंत नाटक कंपनी काढली. त्यानंतर त्यांनी नाट्यक्षेत्रात अनेक प्रकारची कामे केली.
कोल्हटकरांनी भूमिका केलेली पुण्यप्रभाव, राजसंन्यास, भावबंधन, इ. नाटके खूप गाजली. वेड्यांचा बाजार हे राम गणेश गडकरी यांचे अपूर्ण नाटक त्यांनी पूर्ण केले. राम गणेश गडकरी, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, इतिहाससंशोधक वासुदेवशास्त्री खरे, वीर वामनराव जोशी, अशा अनेक नामवंत नाटककारांकडून त्यांनी नाटके लिहून घेतली आणि मोठ्या दिमाखात रंगभूमीवर आणली. चिंतामणराव कोल्हटकर आणि मास्टर दीनानाथ मंगेशकर यांनी आपल्या बळवंत संगीत मंडळीतर्फे उत्तमोत्तम नाट्यकृती सादर केल्या आणि गद्य आणि पद्य यांचा अपूर्व साक्षात्कार रंगभूमीवर घडवला. १९३३ च्या सुमारास मराठी संगीत रंगभूमीला प्रेक्षकांचा प्रतिसाद कमी झाला. तेव्हा चिंतामणरावांनी चित्रपटांत काम करायला सुरुवात केली. त्यांची वसंतसेना या चित्रपटातली शकाराची भूमिका गाजली. मा.चिंतामणराव कोल्हटकरांनी बळवंत संगीत मंडळीचे बळवंत पिक्च र्समध्ये रूपांतर केले. पण त्यांना या व्यवसायात प्रचंड खोट बसली. कोर्टकचेर्यास, नामुष्की आणि पदरी आलेलं प्रचंड अपयश पाहून आणि आपल्याच कंपनीत नोकर म्हणून काम करावे लागण्यासारखी मानहानी झाल्याने ते चित्रपट व्यवसायातून बाहेर पडले आणि परत नाटकाकडे वळले. चिंतामणरावांनी पुढे त्यांनी गंगाधरपंत लोंढे यांच्या राजाराम संगीत मंडळीत प्रवेश केला आणि परत नाटकांतून कामे करायला सुरुवात केली. पुढे ते मो.ग. रांगणेकरांच्या नाट्यनिकेतनमध्ये गेले.
अखेरीस त्यांनी ललित कला कुंज नावाची स्वतःची नाटक मंडळी काढली. या कंपनीनेच पु.ल. देशपांडे यांना उदयास आणले. कोल्हटकरांनी मराठीबरोबरच हिंदी आणि उर्दू नाटकांतही भूमिका केल्या. पुण्यप्रभाव या नाटकातील त्यांच्या भूमिकेबद्दल त्यांचा मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी सत्कार केला होता. त्यांचे विविधढंगी काम पाहून जवाहरलाल नेहरूंनी त्यांना बहुरूपी म्हणून नावाजले होते. त्यामुळेच चिंतामणरावांनी आपल्या आत्मचरित्राला बहुरूपी हे नाव दिले आहे. त्यांनी लिहिलेल्या माझे नाटककार या पुस्तकात तत्कालीन नाट्यलेखकांच्या व्यक्तिरेखा वर्णिल्या आहेत. त्यांनी लिहिलेले पुण्यावतार हे पाच-अंकी नाटक १९६६ मध्ये मुंबईच्या आंतरनाट्य या संस्थेने रंगमंचावर आणले होते. जवळजवळ ५० वर्षे त्यांचा रंगभूमीवरील कलाकारांशी कधी नाटककार म्हणून, कधी नट म्हणून तर कधी दिग्दर्शक म्हणून संबंध येत गेला. त्यांचा मुलगा मा.चित्तरंजन कोल्हटकर हे सुद्धा नाट्यअभिनेते होते. चिंतामणराव यांच्या नात आणि मा.चित्तरंजन कोल्हटकर यांची ज्येष्ठ कन्या, मा.विनीता करमरकर यांनी मा.चिंतामण कोल्हटकर यांचे बलवंत चिंतामणी या नावाने चरित्र लिहिले आहे. मा.विश्राम बेडेकर, मा.पु.ल. देशपांडे, मा.चंद्रकांत गोखले, मा.वसंत शिंदे, मा. शांता जोग हे सर्व मा.चिंतामण कोल्हटकर यांचे नाट्यक्षेत्रातले शिष्य म्हणून पुढे नावारूपाला आले. मा.चिंतामणराव कोल्हटकर १९४६ साली अहमदनगर येथे भरलेल्या ३५ व्या, आणि १९४९ मध्ये कोल्हापूर येथे भरलेल्या ३६व्या नाट्यसंमेलनांचे अध्यक्ष होते. त्यांच्या या रंगभूमीच्या सेवेबद्दल राष्ट्रपतींच्या हस्ते सुवर्णपदक देऊन भारत सरकारने त्यांचा सन्मान केला होता. चिंतामणराव कोल्हटकर यांचे २३ नोव्हेंबर १९५९ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
चिंतामणराव कोल्हटकर यांनी कामे केलेली नाटके
आंधळ्यांची शाळा, आशीर्वाद, एकच प्याला, कमला, काकाची शशी, कांचनगडची मोहना, जग काय म्हणेल, झुंझारराव, तानसेन, तुकाराम, तोतयाचे बंड, त्राटिका, द्रौपदी, नेकजात मराठा, पाणिग्रहण, पुण्यप्रभाव, प्रेमध्वज, बेबंदशाही, ब्रह्मकुमारी, भाऊबंदकी, भाग्यवान, भावबंधन, माते तुला काय हवंय?,
मानाजीराव, मानापमान, रणदुंदुभी, राजमुकुट, राजसंन्यास, विद्याहरण, वैजयंती, शिवसंभव, संन्यस्त खड्ग, संशयकल्लोळ, सोन्याचा कळस, स्वयंसेवक, हॅम्लेट, हाच मुलाचा बाप, हिरवा चुडा.
आजचं नवं नाव… धनश्री काडगावकर. केवळ अभिनयातच नव्हे तर फोटोशूटही तितक्याच मेहनतीने आणि प्रामाणिकपणे करण्यात तिची कामाशी समर्पित वृत्ती दिसून येते..
बघताच क्षणी फ्रेश लूक वाटावा, कोणतेही भाव लीलया व्यक्त करणारा बोलका चेहरा असावा आणि जिच्या चेहऱयावर कोणताही प्रयोग केला तर तो हमखास यशस्वी ठरेल इतका फोटोजेनिक असावा अशा चेहऱयाची मॉडेल फोटोग्राफरसाठी पर्वणीच ठरते. धनश्री काडगावकर हे याचे उत्तम उदाहरण. धनश्रीचा चेहरा बोलका आहे, कोणतेही दडपण झुगारून तो व्यक्त होतो आणि म्हणूनच धनश्रीचे फोटो उत्तम येतात, हे मी ठामपणे सांगू शकेन. धनश्री काडगावकर हे अल्पावधीतच नावारूपाला आलेलं मराठी इंडस्ट्रीतलं खणखणीत नाव.
शूटसाठी कॉस्च्यूम, मेकअप, हेअर काय असेल आणि फोटोचे रेफरन्स धनश्रीला आधीच माहीत होते. त्यामुळे शूटच्या वेळी काही तासांतच धनश्री तयार झाली. पारंपरिक वेशभूषा, त्यावर मराठमोळा साजशृंगार, कलाकुसरीने सजलेले दागिने आणि धनश्रीचा मोहक चेहरा हे सारं मी कॅमेराबद्ध करत होतो. शूटची गरज असलेले फोटो मी आधी टिपले. नंतर त्याच कॉस्च्यूममध्ये फुल लेंग्थ, हेडशॉटस् असे काही फोटो घेतले, तर नंतर ड्रमॅटिक लाइटिंग करून काही फोटो टिपण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक वेळी धनश्रीचा लोभस चेहरा मला टिपता आला. हे ठरलेलं शूट संपवायला आम्हाला साधारणपणे तीन – साडेतीन तास गेले. आमचं पॅकअप होणार तितक्यात मी धनश्रीला पारंपरिक वेषभूषेतल्या शूटपेक्षा निराळं शूट करण्याची कल्पना बोलून दाखवली.
धनश्रीचा चेहरा मॉडर्न लूकमध्ये अधिक चांगला दिसेल असं मला सारखं वाटत होत. धनश्री खरं तर थकली होती. पुढे मेकओव्हर करावा लागणार होता. मेकअप, हेअर हे सारं पुन्हा वेगळ्या धाटणीचं करावं लागणार होतं. तशी त्या शूटची गरज होती. आधीच्या शूटच्या थकव्यामुळे तिचा चेहरा या शूटसाठी तयार नव्हता. आपण पुन्हा नंतर कधीतरी शूट करू असं ती एक-दोनदा बोललीही. मात्र तिच्याही डोक्यात विचारांची चलबिचल सुरू असल्याचं मला लक्षात आलं. म्हणून मी सेटवरच्या लाईट्स, कॅमेरा न काढता ते तसंच ठेवायला सांगितलं. धनश्रीचा विचार काही क्षणांतच बदलला आणि आम्ही ब्रेक घेऊन पुढच्या शूटच्या तयारीसाठी लागलो.
या नव्या मेकओव्हरची गरज वेगळी होती. धनश्रीचा लूक मॉडर्न होता. आधी धनश्री पारंपरिक वेशभूषेत…साडीत होती, तर आता ती लॉन्ग गाऊनमधे, ग्लॅमरस लूकमधून समोर येणार होती. मेकअप, हेअर अगदी वेगळंच होतं. या सगळ्याला न्याय देता यावा अशी लाइटिंगची, फोटोशूटची माझ्यावर जबाबदारी होती. धनश्री तासाभरात मेकअपरूममधून बाहेर आली अन् तिचं रूपडं पाहण्याजोगंच होतं. धनश्रीचा पेहराव, हेअर आणि मेकअप यातून ती मराठमोळी प्रियांका चोप्रा वाटावी अशीच समोर आली होती. इतका तिचा चेहरा प्रियांका चोप्राशी मिळता जुळता वाटत होता.
आम्ही शूटला सुरुवात केली. धनश्रीच्या चेहऱयावर स्मितहास्य होतं. जणू काही हे पहिलंच शूट असावं. आधीच्या शूटचा थकवा नाही, चेहऱयावर दमलेले भाव नाहीत, किंबहुना त्याचा मागमूसही नाही. हसऱया चेहऱयाची धनश्री इथे मला टिपता आली, तर नंतर मादक चेहरा, स्वाभिमानी, गंभीर चेहऱयाची असे वेगळे हावभाव असलेली धनश्री मला टिपता आली. चेहऱयावर वेगळे भाव काही सेकंदांचा वेळ न दडवता धनश्रीला व्यक्त करता येत होते. धनश्री इथेच वेगळी आहे. कॅमेरा फ्रेंडली आणि फोटोजेनिकही.
प्रत्येक शूटचं लाइटिंग वेगळं होतं. तशी त्याची गरजही होती. एका फोटोशूटच्या वेळी नेमके किती लाईट्स लागतात? तर कितीही! म्हणजे अगदी एका लाईटपासून सात ते आठ. फोटोशूट करताना चेहऱयावर टाकण्यासाठी सगळ्यात आधी प्रकाशाचा स्रोत म्हणजेच लाईट ठरतो. मॉडेल मेकअप करत असताना मिळालेल्या वेळेत बाहेर स्टुडिओत या सगळ्याची तयारी करणं सोपं जातं. म्हणजे मॉडेलला विनाकारण यासाठी थांबावं लागत नाही. फोटोग्राफरसोबत उत्तम सहायक टीम असेल तर त्याची व्यवस्था लावणं हे स्टुडिओत सहज शक्य होतं. आम्ही धनश्रीचं हे मॉडर्न लूकमधलं शूट आयत्यावेळी ठरवलं होतं, परंतु शूटची कल्पना डोक्यात इतकी भिनली होती आणि तगडी सहायक टीम असल्याने हे शूट काही तासांतच आम्हाला संपवता आलं.
धनश्रीचा चेहरा नेमका कशात जास्त चांगला दिसतो? पारंपरिक वेशभूषेत की मॉडर्न लूकमध्ये याचं उत्तर आजही देणं तसं कठीण आहे. धनश्रीचा चेहरा दोन्हीला समान न्याय देणारा आहे. फोटो कितीही वेळा जरी पाहिले तरी एकदा वाटतं पारंपरिक वेशभूषेत धनश्री अधिक खुलते. मात्र मग मॉडर्न लूक पाहिला की, इथे ती अधिक भावते. जेव्हा जेव्हा या फोटोंचा उल्लेख होतो तेव्हा तेव्हा हे चक्र असंच सुरू होतं आणि नेमकं उत्तर देणं कठीण जातं. धनश्रीचा चेहरा बोलका आहेच. मात्र तिचा स्वभाव परिस्थितीला जुळवून घेणारा, मदतशीर आणि म्हणूनच धनश्रीसोबत फोटोशूट करणं हा नेहमीच अविस्मरणीय अनुभव ठरतो.
धनेश पाटील
dhanuimages@gmail.com
विलास वसंत खोले हे समीक्षक व “शोध” या संस्थेचे संस्थापक-संचालक आहेत.
आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर इंजिनीयरिंगच्या क्षेत्रात संशोधन करून त्याचा उपयोग सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी करण्याची तळमळ अभावानेच दिसते. गलेलठ्ठ पगाराची नोकरी मिळवण्यासाठीच उच्च शिक्षण घेण्याचा विचार अनेकजण करतात. पण ठाण्यात खोपट परिसरात राहणारा मदन तळदेवकर त्यास अपवाद ठरावा.
चाळीस वर्षांवरील गायकांसाठीच्या झी सारेगमपच्या पर्वाच्या उपविजेत्या अनुजा वर्तक या ठाणे शहराला अभिमान वाटणार्या व्यक्तींमधील एक ! कल्याण गायन समाज येथे पं. वसंतराव गोसावी यांच्याकडे वर्तक यांनी शास्त्रीय संगीताचे प्राथमिक शिक्षण घेतले.
काही संगीतकारांच्या मनात काही राग हे कायमचे वस्तीला आलेले असतात आणि त्यांचे प्रारूप, त्यांच्या स्वररचनांमधून आपल्याला सारखे जाणवत असते. खैय्याम यांच्याबाबत हे विधान काहीसे ठामपणे करता येईल. "पहाडी" सारखा लोकसंगीतातून स्थिरावलेला राग, त्यांच्या गाण्यांतून बरेचवेळा डोकावत असतो, अर्थात चालींचे वेगळेपण राखून. काहीवेळा त्यांच्यावर टीका देखील झाली परंतु एखाद्या रागावर अनन्वित श्रद्धा असेल तर त्याच रागातून किती छटा दाखवता येतात आणि आपले बुद्धिकौशल्य मांडता येते, याचे सुंदर उदाहरण म्हणून खैय्याम यांचे नाव घ्यावेच लागेल.
संस्कारक्षम काळात पंडित अमरनाथ यांच्याकडे शागिर्दी केली आणि आपला कलासंगीताचा पाया घोटवून घेतला. याचे फायदा पुढे जेंव्हा चित्रपटसृष्टीत यायचे ठरविले तेंव्हा तिथे आधीच कार्यरत असलेले पंडित अमरनाथ आणि त्यांचे बंधू - हुस्नलाल/भगतराम यांना साथ करणे क्रमप्राप्तच ठरते. त्याचबरोबरीने विख्यात कवी फैझ-अहमद-फैझ यांच्या संगतीने काव्याचा अभ्यास करून घेतला. याचा पुढे हिंदी चित्रपट सृष्टीत कार्यरत होताना, निश्चित फायदा झाला असणार . अर्थात एकूण कारकिर्दीकडे नजर टाकल्यास, एकूण ५० एक चित्रपटांना संगीत रचना करणे, हे काही प्रचंड कार्य नव्हे परंतु जे चित्रपट केले, त्याच्यावर स्वतः:ची नाममुद्रा उमटवली, हे विशेष म्हणायला लागेल.
"शामे गम की कसम' सारखे गाणे कारकिर्दीच्या सुरवातीच्या काळात देऊन, त्यांनी स्वतः:ची ओळख जगाला करून दिली. त्यांनीच एकेठिकाणी म्हटल्याप्रमाणे, गाण्यात कुठलेही पारंपरिक तालवाद्य वापरले नसून, "डबल बेस" आणि "स्पॅनिश गिटार" सारख्या स्वरिक वाद्यांकडून ताल पुरवला गेला. या रचनेने, खैय्याम विशेष प्रसिद्धीस आले. असे म्हणता येईल.
काही मूल्यमापन करायचे झाल्यास, १) मोठा वाद्यवृंद वापरानेवा वाद्यांचा हात राखून उपयोग करणे. वरील गाणे - शामे गम की कसम", "कहीं एक मासूम लडकी" किंवा " आज बिछडे है" ही गाणी ऐकताना आपल्याला प्रत्यय येईल. यांत वाद्य गदारोळ नाही, संगीत आणि शब्द दोन्ही आपल्या मनात झिरपत जातात आणि त्याचबरोबर एक शांत भाव. कदाचित याच सांगीत काटकसरीमुळे असेल पण तलतचा नाजूक स्वरकंप किंवा भूपिंदर सिंगचा मृदू गणोच्चार मनात ठसतो. २) याच संदर्भात एक आणखी बारकावा विचारात घ्यावासा वाटतो. काही अपवाद वगळता त्यांनी छेडण्याची तंतुवाद्ये आणि पियानो यांच्या माध्यमातून दीर्घ सुरावटीचे आकृतिबंध विणण्यावर भर दिला. उदाहरणार्थ "जीत लेंगे बाझी हम तुम" या रचनेत महत्वाचा गीतारंभ फक्त पियानोवर सोपवला आहे. तसेच पहाडी रागावरील "बहारो मेरा जीवन भी संवारो" या गाण्यात सतार इत्यादी वाद्ये दीर्घ आणि आवाहक स्वरबंध निर्माण करतात.
एक आश्चर्याची बाब - समान स्वरबंध त्यांनी काही गाण्यात सहजपणे वापरले आहेत. "कभी कभी मेरे दिल में" आणि " सिमटी हुई ये घडिया" किंवा "परबतो के पेडो पर" आणि "बहारो मेरा जीवन भी संवारो" तसेच "फार छिढी रात" आणि "आयी झंजीर" ही गाणी आलटून, पालटून स्वरसाम्यासाठी तपासावीत. खैय्याम यांना सुरावटीच्या नाविन्याची अप्रूप नाही, असे नाही. कारण सुरांची समानता ज्या गीतांत जाणवते त्या गीतांत देखील ते सूक्ष्म बदल करीतच असतात. परंतु कदाचित आशय-सुरावट यांच्या दरम्यान एक अतूट नाते असते, यावर त्यांचा गाढा विश्वास असावा.
खैय्याम यांना खरी अमाप लोकप्रियता मिळाली ती "उमराव जान" चित्रपटाच्या संगीताने. त्यांच्या कारकिर्दीतील सर्वोच्च अढळ असे स्थान. त्यामुळे गझल हे त्यांचे मर्मस्थान होय, असे विधान करता येऊ शकते. एक प्रकारची तीव्र अकर्मण्यता किंवा अक्रियाशीलता, काहीतरी मूल्यवान हरपले आहे याचे दाट दु:ख आणि संयमित शृंगार या आणि अशा भावतरंगाना त्यांचा अंगभूत प्रतिसाद असतो. वर उल्लेख केल्याप्रमाणे, या चित्रपटातील गाण्यांत छेडण्याच्या वा गजाने ध्वनित होणाऱ्या वाद्यांचा आवाहक वापर आहे. त्यामुळे मुजरा नृत्ये असूनही त्यात एक आदबशीर शृंगार अवतरलेला आहे. "दिल चीझ क्या" या गीतांत बिहाग रागातील भावस्पर्शी सुरावट आढळते. "इन आँखो की मस्ती" या गाण्यात तर भूप रागाचा तिरोभाव अतिशय मनोरमपणे सादर केला आहे. असाच प्रयत्न त्यांनी "जिंदगी जब भी" या गीतात गौडसारंग रागापासून दूर सरकत साधला आहे. सांगीतदृष्ट्या प्रदर्शन न करता, आमच्या कर्तृत्वाकडे पहा असे गर्जून न सांगता ही गीते आपला भाव-परिणाम सिद्ध करतात. मानसिक किंवा भावनिक आशयाबरोबर हातात हात घालून चालू शकेल असा सांगीत अवकाश निर्माण करा, अशी गझलची मागणी असते. त्याचा नेमका प्रत्यय या स्वररचनेतून अनुभवायला मिळतो.
मोजका वाद्यमेळ आणि संयत गायन, याच्या साहाय्याने रचनासंबद्ध निश्चितता सादर करण्याची कामगिरी सर्वांनाच जमत नाही. खैय्याम यांना ते जमले आहे याचा सहज प्रत्यय येतो आणि हेच खैय्याम यांचे खरे यश.
- अनिल गोविलकर
मदनलाल पुरी यांनी १९४० ते १९८० पर्यंतच्या ४० वर्षांत ३०० पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये कामे केली. त्यांचा जन्म १९१५ रोजी लाहोर येथे झाला. अनेक प्रकारचे खलनायक रंगवले. वर्षाला जवळपास आठ चित्रपट पडद्यावर आले. मोठा भाऊ चमनलाल आणि धाकटा अमरीश पुरीही आपल्या भूमिकांनी चित्रपट क्षेत्रात स्थिर झाले होते. मदन पुरी यांचा पहिला चित्रपट ‘अहिंसा’. त्यानंतर त्याने मागे वळून पाहिले नाही, हे वर्षाला आठ या समीकरणाने लक्षात येतेच; पण या यादीमध्ये स्मगलर, छोटा-मोठा दादा, काका, कपटी मामा, चर्चमधील फादर, कोणाचा तरी भाऊ, करप्ट पोलिस ऑफिसर, अशा विविध भूमिका असल्या तरी हे पात्र आतल्या गाठीचे किंवा संधीसाधू नक्कीच असणार, अशी प्रेक्षकांची खात्री असे. त्याच्या ४० वर्षांच्या कार्यकाळात, घवघवीत ३०० सिनेमांमधून विविध भूमिका यशस्वीपणे निभावल्या आहेत.
'आई मिलन की बेला' , 'मिस्टर एक्स', हावडा ब्रिज ,कन्हैया ,चायना टाऊन ,जिद्दी , वक्त इ. आणी इतरही शंभरेक सिनेमांमधे लहानमोठ्या नकारात्मक भूमिकांमधून खलनायक म्हणून गाजला. मदन पुरी चं व्यक्तित्वच असं होतं कि तो सुटाबुटात आला तरी उच्चवर्गीय, गर्भश्रीमंत असल्या कॅटेगिरीत शोभायचा नाही ,मात्र 'गल्लीतील मवाली , रिवॉल्वर ऐवजी चाकू, सुरा हातात बाळगणारा मुहल्ल्याचा दादा , भुरटा चोर अश्या भूमिकांमधे छान शोभायचा!! मदन पुरी यांनी सुरुवातीला नायक म्हणून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले असले तरी जिवलग मित्र देव आनंद यांच्या सांगण्यावरून त्यांनी खलनायकी भूमिका करण्यास सुरुवात केली आणि तिथेच त्यांना नशिबाने साथ दिली. त्यानंतर अनेक खलनायकी भूमिका केल्याने त्यांना खच्चून प्रसिद्धी मिळाली. मधल्या काळात काही वेगळ्या भूमिकाही त्याने केल्या. पण ३०० हून जास्त चित्रपटांमधील ‘दीवार’, ‘दुल्हन वही जो पिया मन भाये’, ‘उपकार’, ‘चोर मचाये शोर’, ‘पूरब पश्चिम’, ‘राधा और सीता’, ‘झूठा’, ‘स्वयंवर’, ‘बेनाम’, ‘अमर प्रेम’, ‘आराधना’, ‘कटी पतंग’ या त्याच्या काही लक्षणीय म्हणता येतील अशा भूमिका.
हिंदी चित्रपटसृष्टीतील अशा तीन खलनायकांच्या घरात जन्माला आलेल्या लेफ्टनंट कर्नल कमलेश पुरी यांनी ‘माय फादर-द व्हिलन’ हे पुस्तक लिहिले आहे. ‘एकदा मी माझ्या बाबांचा टीव्हीवर लागलेला चित्रपट पाहत बसलो होतो. नातवंडे बाजूला खेळत असल्याने त्यांना मी बोलावून चित्रपटातला तो माणूस कोण?, असे विचारले. मात्र त्यांनी माझ्या बाबांना ओळखलेच नाही. त्याक्षणी जाणीव झाली की मदन पुरींना त्यांची पतवंडेच ओळखत नसतील तर यापुढील पिढी काय ओळखणार? या एकाच जाणिवेने मी बाबांच्या आठवणी संग्रहित करण्यास सुरुवात केली आणि आज त्या पुस्तक रूपात तुमच्यासमोर मांडतो आहे, अशा शब्दांत मदन पुरींचे थोरले सुपुत्र कर्नल कमलेश पुरी यांनी या पुस्तक लिखाणामागची पाश्र्वभूमी सांगितली. बाबांची लोकप्रियता इतकी होती की एकदा मी त्यांचा चित्रपट पाहण्यासाठी सिनेमागृहात गेलो होतो. त्यावेळी सहाजिकच बाबांची खलनायकाची भूमिका असल्याने त्यांचा प्रवेश झाल्यानंतर मागे बसलेल्या एका गृहस्थाने चांगल्याच शिव्या हासडल्या.
त्यावर थोडं संतापूनच ‘जरा तमीज से बठो’ अशी प्रतिसूचना मी त्या गृहस्थाला केली. त्यावर त्या गृहस्थाने ‘क्या वो तुम्हारा बाप लगता है?’, असा प्रश्न विचारला. यावर मनातल्या मनात हसण्याशिवाय आपल्याकडे पर्याय नव्हता. शेवटी ते वास्तव स्वीकारून शांतपणे चित्रपट पाहिल्याचे कमलेश पुरी यांनी सांगितले. मदन पुरी यांचे निधन १३ जानेवारी १९८५ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट/विनोद गोरे
१९३६ मध्ये बॉंम्बे टॉकीज प्रॉडक्शनच्या जीवन नैय्या, या चित्रपटात त्यांनी पहिल्यांदा काम केले. त्यांचा जन्म १३ ऑक्टोबर १९११ रोजी झाला. बॉलिवूडमधल्या दर्जेदार अभिनेत्यांपैकी ते एक होते. १९३६ सालच्या जीवन नैया या पहिल्याच चित्रपटाने नायक म्हणून लोकप्रिय केल्यानंतर त्याने तब्बल अर्धा डझन सिनेमात देविका राणीचा नायक म्हणून काम केलं. या व्यतिरिक्त ते इतर अभिनेत्रींसमोरही अनेक सिनेमांत हीरो म्हणून चमकले. वय झाल्यावर मोठमोठ्या हीरोंना निष्टूरपणे बाजूला सारणार्याम या चित्रपटसृष्टीत आपल्याला अभिनेता म्हणून टिकून रहायचं आहे, हीरोगिरी नाही करता आली तरी चालेल हे अशोक कुमार यांनी वेळीच ठरवलं होतं. त्यामुळे राज कपूर - देव आनंद - दिलीप कुमार या तीन दिग्गजांसमोर पन्नासच्या दशकात टिच्चून उभं राहिल्यानंतर नायक म्हणून असलेल्या आपल्या मर्यादांची संपूर्णपणे जाणीव असलेल्या अशोक कुमार यांनी अगदी सहज हातातले पिस्तुल आणि सिगारेट टाकून काठी आणि पाईप कधी घेतले ते समजलंच नाही.
दादामुनींच्या बाबतीत दूरदर्शनवर केलेल्या कामगिरीचा उल्लेख केलाच पाहिजे. 'हम लोग' मालिकेच्या प्रत्येक भागाची प्रेक्षक जितक्या उत्कंठेने वाट बघत असत, तेवढीच उत्सुकता त्या भागाच्या शेवटी दादामुनींच्या त्या भागावर केलेल्या छोट्याशा भाष्याची आणि त्यांच्या त्या विशिष्ट प्रकारच्या हातवारे करत वेगवेगळ्या भाषेत 'हम लोग' म्हणण्याचीही असे. शम्मी कपूरबरोबर लग्नाच्या वरातीच्या पार्श्वभूमीवर केलेली पान परागची जाहिरातही प्रचंड लोकप्रिय झाली होती. सुमारे सहा दशकं त्यांनी बॉलिवूडवर आपल्या अभिनयाने भुरळ पाडली. या काळात त्यांना अनेक पुरस्काराने सन्मानित केले गेले. भारतीय चित्रपटांमधील त्यांच्या कामासाठी भारत सरकारने १९८८ मध्ये अशोक कुमार यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने व १९९८ मध्ये पद्म भूषण पुरस्काराने सन्मानित केले. अछुत कन्या, किस्मत, परिणीता, चलती का नाम गाडी, आशीर्वाद, छोटी सी बात, मिली, खुबसुरत, खट्टा मीठा, मि. इंडिया हे मा.अशोक कुमार यांचे गाजलेले चित्रपट.
रेल गाडी रेल गाडी हे बॉलिवूडमधील पहिले रॅप गाणे त्यांनीच गायले आहे. अशोक कुमार यांचे १० डिसेंबर २००१ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Copyright © 2025 | Marathisrushti