जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
सलिल चौधरी यांचे वडील आसाममधील चहाच्या मळ्यांमध्ये डॉक्टर म्हणून काम करीत. सलिल चौधरी यांचे बालपण चहाच्या मळ्यांच्या निसर्गरम्य परिसरात गेले. त्यांचा जन्म १९ नोव्हेंबर १९२२ रोजी झाला. ब्रिटीश मालकवर्गाच्या सहवासामुळे आणि जात्याच आवड असल्यामुळे सलिलदांच्या वडिलांनी पाश्चात्य संगीताच्या ध्वनीमुद्रिकांचा प्रचंड संग्रह केला होता. कुशाग्र बुद्धीमत्ता आणि ग्रहणशीलता असल्यामुळे कुठल्याही गुरूच्या मार्गदर्शनाशिवायच ते स्वरमालिका शिकले एवढेच नव्हे तर ऐकलेले किंवा सुचलेले स्वर लिपीबद्ध करू लागले. पियानो, हार्मोनियम व व्हायलिनसारखी पाश्चात्य वाद्ये आणि बासरी सारखी भारतीय वाद्येदेखील ते आपल्या स्वतःच्या प्रयत्नानेच वाजवायला शिकले.
संगीताच्या क्षेत्रात अशी एकट्याने वाटचाल सुरू असतांना त्यांच्या मनावर साम्यवादी विचारांचा प्रभाव पडत होता. गरीब मजूरांना एकत्र आणून त्यांच्या समस्यासाठी लढा देणे वगैरे गतिविधींना सुरुवात झाली. पुढील काळात ते संगीताकडे वळले नसते तर खचितच राजकीय पुढारी झाले असते, किंवा कदाचित प्रसिद्ध साहित्यिकही झाले असते. त्यांनी गाणी लिहिली तसेच कथा सुद्धा लिहिल्या आणि त्या चांगल्या गाजल्या. त्यांनी लिहिलेली नाटके बंगाली रंगभूमीवर आली आणि लोकप्रिय झाली. बंगाली भाषेतील चित्रपटांसाठी कथा व गाणी लिहिली ती सुद्धा यशस्वी झाली. बंगाली चित्रपटक्षेत्रात त्यांचे नांव झाले. ती पाहून तिचे हिंदीत रूपांतर करण्यासाठी स्व.बिमल रॉय यांनी सलिल चौधरी यांना मुंबईला पाचारण केले आणि या कथेवर आधारित 'दो बीघा जमीन' हा चित्रपट करण्यासाठी ते मुंबईला आले. हा चित्रपट चांगला गाजला.
बिमल रॉय यांचे कुशल दिग्दर्शन व बलराज साहनी यांनी विलक्षण ताकदीने साकारलेली त्यातली प्रमुख भूमिका तर लक्षात राहिलीच. पण सलिल चौधरींची कथा, त्यांनी दिलेले प्रभावी पार्श्वसंगीत आणि त्यातील 'धरती कहे पुकारके ... मौसम बीता जाये' हे गाणे खूप गाजले. त्यानंतर अनेक वर्ष ते बिमलदांच्या बरोबर राहिले. ‘मधुमती’ची सगळीच गाणी परत परत, ऐकावीत अशी. ‘आजा रे परदेसी’, ‘सुहाना सफर’ आणि ‘दिल तडप तडप के..’ ‘घडी घडी मेरा दिल धडके’, रफी साहेबांचे दर्द-भरे ‘टूटे हुवे ख्वाबों ने’ आणि ‘दैया रे दैया रे चढ गयो पापी बिछुवा..’ ‘जागो मोहन प्यारे’ ‘ओ सजना बारखा बहार आई..’, ‘जा रे उड जा रे पंछी..’ ‘ना जिया लागे ना..’,ही गाणी ऐकल्यावर वाटते की सगळ्या गायकांना सलीलदांनी नावीन्यपूर्ण पद्धतीनेच हाताळले आहे. स्वतःच्या चालीबद्दल काटेकोर असणारा संगीतकार म्हणजे सलील चौधरी. सलील चौधरी यांचे ५ सप्टेंबर १९९५ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
सलील चौधरी यांची गाणी
https://www.youtube.com/watch?v=gSBO-VSTKrk
https://www.youtube.com/watch?v=TXBNME2EtXk&t=9s
https://www.youtube.com/watch?v=LP8Ma5Kb3JA&t=46s
अमृतसरच्या एका गावातून रोज एक फकीर गाणी म्हणत जायचा आणि त्याच्या मागे मागे एक चिमुरडा फकीरच्या पाठोपाठ तीच गाणी म्हणत त्याचा पाठलाग करायचा. फकीर कुठे आराम करण्यासाठी थांबला तर त्या वेळात त्या गाण्यांचा सराव हा चिमुरडा करायचा, हे अगदी रोज घडायचं. एक दिवस या छोट्या मुलाला ती गाणी म्हणताना त्या फकिराने ऐकलं, त्याला कडेवर उचलून घेत त्याला म्हणाला, बाळा... तू एक दिवस खूप मोठा गायक होशील..
हा चिमुरडा म्हणजेच हिंदी चित्रपट संगीताचा सर्वोत्कृष्ट आणि जगातल्या उत्तम गायकांमध्ये ज्यांचं नाव घेतलं जातं, असे मोहम्मद रफी... आजचा तानसेन, फरिश्ता, शापित गंधर्व अशा कितीतरी नावांनी जग रफींना ओळखतं. आपल्या चार दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी त्या काळच्या प्रत्येक मोठ्या संगीतकाराबरोबर काम केलं. शास्त्रीय असूदेत नाहीतर देशप्रेमाची गाणी नाहीतर कव्वाली, भजन असूदेत नाहीतर गझल, त्यांनी प्रत्येक मूडची गाणी म्हटली पण रफी जर सर्वात लोकप्रिय असतील तर ती प्रेम गीतं आणि युगलगीतांसाठी. त्यांनी त्या त्या काळच्या प्रत्येक मोठ्या कलाकारासाठी गाणी म्हटली आणि जॉनी वॉकरसाठी तर रफी वेगळा आवाज काढायचे. किती आणि काय लिहिणार रफींबद्दल ! जेवढं लिहू तेवढं कमीच...
त्यांच्या उदारतेचे अनेक किस्से सांगितले जातात. या रुपेरी सृष्टीत त्यांनी अनेकांना मदत केली, एवढंच नाही तर कोणीही असूदेत अगदी कोणीही त्यांच्याकडे मदतीच्या अपेक्षेने आलेला कधीच रिकाम्या हाताने परत जात नसे. रस्त्यावरच्या भिकाऱ्यांच्या हातावरही काही ठेवल्याशिवाय ते पुढे जात नसत. अशा अतिशय दानी, मृदू स्वभावी, गोड गळ्याचा शापित गंधर्व, माझा देव १९८० साली आजच्याच दिवशी या इहलोकला सोडून पैगंबरवासी झाला. अनेक अनेक लोकांसाठी हा मोठा धक्का होता आणि तो ही अनपेक्षितपणे बसलेला. शेवटी त्यांना जेव्हा रुग्णालयात नेलं तेव्हा त्यांना अत्यवस्थ अवस्थेत बघून त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचेही हातपाय गळाले. त्यांना जेव्हा मृत घोषित करण्यासाठी डॉक्टर त्यांच्या घरच्या लोकांजवळ आले तेव्हा म्हणाले, माझे प्राण देऊनही मी रफींना वाचवू शकलो असतो तर मी ते ही केलं असतं. वैद्यकीय शास्त्र एवढंही पुढारलेलं नाही, नाहीतर मी रफीसाहेबांचा गळा जतन करून ठेवला असता. डॉक्टर रफींचे मोठे चाहते होते.
या चित्रपटसृष्टीत प्रत्येकाचा एक काळ असतो. जेव्हा एक तारा उगवतो, तेव्हा हळूहळू जुने तारे अस्ताला जात असतात. असंच थोडंफार घडलं जेव्हा किशोर कुमार या चित्रपटसृष्टीत आला. चित्रपट संगीत हळूहळू बदलत होतं. मेलडीचा काळ सरत होता, बदलत्या चित्रपटसंगीताबरोबर हळूहळू रफींबरोबर किशोर युग यायला लागलं. रफींचं एक साम्राज्य होतं आणि त्याला टक्कर देण्यासाठी किशोर सज्ज होता पण ही स्पर्धा फक्त व्यावसायिक स्तरावर होती, व्यक्तिगत जीवनात हे दोघे अतिशय चांगले मित्र होते. आपली जागा कोणीतरी घेऊ पहात आहे म्हणत रफींनी कधीही किशोरचा दुस्वास केला नाही, उलट किशोरला आपला लहान भाऊ मानलं आणि किशोरनेही आपल्याला मिळणाऱ्या यशाचा माज रफींसमोर कधीही दाखवला नाही, किशोरच्या मनातही या भावना कधीच नव्हत्या. या दोघांच्या घट्ट मैत्रीचे अनेक किस्से सांगितले जातात. रफी गेल्याची बातमी जेव्हा पसरली आणि ती किशोरच्या कानावर आली तेव्हा तडक किशोरने रफींचं घर गाठलं. त्या वेळी रफींच्या घरी येणारं पहिलं जर कोणी असेल तर तो होता किशोर कुमार. रफींच्या पार्थिवाजवळ बसून किशोर कित्येक तास रडत होता, अगदी जनाजा उठेपर्यंत... ही माणसंच वेगळी होती. हे असं प्रतिस्पर्ध्यांमधलं प्रेम हल्ली बघायला नाही मिळत.
रफींच्या घराजवळ एक विधवा बाई रहायची. तिला दर महिन्याला ठराविक दिवशी एका निनावी व्यक्तीकडून मनी ऑर्डर मिळायची. दर महिन्याला अगदी न चुकता हे घडायचं. एकदा सलग दोन तीन महिने तिला ही मनी ऑर्डर मिळाली नाही. तिने डाकघरात जाऊन चौकशी केली. तेव्हा तिला कळलं की आपल्या शेजारी राहणारे मोहम्मद रफी तिला दर महिन्याला पैसे पाठवायचे. ती बाई हे कळल्या कळल्या तिथे पोस्टातच ढसाढसा रडायला लागली.
ही अशी लोकं सारखी सारखी जन्माला येत नाहीत, फार क्वचित. कुठे एखाद्या गंधर्वाला शाप मिळतो आणि तो शाप भोगायला त्याला मृत्युलोकात यावं लागतं.
प्रा. रमेश तेंडुलकर हे माणूस म्ह्णून खूप साधे आणि मनाने खूप मोठे होते. अत्यंत साधी रहाणी आणि आपल्या घरी येणारा माणूस कितीही साधा असला तरी त्याचे त्यांच्या घरी अगत्याने स्वागत होत असे. त्याचे चिरंजीव नितीन तेंडुलकर उत्तम कवी, लेखक आहेत. त्याचप्रमाणे त्याचा मुलगा सचिन तेंडुलकर हा भारताचा गाजलेला क्रिकेटपटू आहे. तर त्यांचे दुसरे चिरंजिव नितीन तेंडुलकर हे देखील वडिलांप्रमाणे लेखन करतात, कविता करतात.
संगीताच्या क्षेत्रात भावगीत या प्रकाराला अमाप लोकप्रियता मिळवून देणारे भावगीत गायक गजाननराव वाटवे यांचे २०१७ हे जन्मशताब्दी वर्ष.त्यांचा जन्म ८ जून १९१७ रोजी झाला.‘वारा फोफावला’, ‘गगनी उगवला सायंतारा’ आणि ‘यमुनाकाठी ताजमहाल’ यांच्या लोकप्रियतेची कल्पना आज एकविसाव्या शतकात करता येणं अशक्य. गजानन वाटवे यांनी मराठीतील अनेक कवितांना सुंदर चाली लावून प्रथम भावगीताचा प्रकार लोकांपर्यंत नेला. आणि त्यांच्या या प्रयत्नाला लोकांनी एवढा प्रचंड प्रतिसाद दिला की, पुढे बराच काळ वाटवे म्हणजे भावगीत हे समीकरण झाले. गजानन वाटवे यांच खास वैशिष्टय़ म्हणजे कवितांना सुंदर चाली लावून त्या रेकॉर्ड व पुस्तकांतून त्यांनी घराघरांत व गल्लोगली लोकप्रिय केल्या. गजानन वाटवे यांच्या भावगीतांना कवितांतून जन्म मिळाला. प्रथमच कवितांना चाल लावली जाते व ती गोड गळ्याने म्हटली जाते हे रसिकांच्या ध्यानात आले. वाटवे यांचा हा प्रयत्न सुरुवातीलाच एवढा गाजला व त्याला एवढी प्रचंड लोकप्रियता मिळाली. त्याकाळी गजानन वाटवेंचे भावगीत गायनाचे स्वतंत्र कार्यक्रम होऊ लागले गजानन वाटवेंची भावगीतातील कारकीर्द म्हणजे भावगीतांचा सुवर्णकाळ होता. ‘गगनी उगवला सायंतारा’, ‘चंद्रावरती दोन गुलाब’, ‘राधे तुझा सल अंबाडा’, ‘दोन ध्रुवांवर दोघे आपण’, ‘गेला दर्यापार घरधनी’, ‘आई तुझी आठवण येते’, ‘गर्जा जयजयकार’, ‘ती पाहा ती पाहा बापूजींची प्राणज्योती..’ अशा अनेक रचनांतून ‘वाटवे-युग’ निर्माण झाले, गाजले. अनेक नामवंत कवींच्या कविता त्यांनी अत्यंत आत्मीयतेने गायल्या. भावाविष्काराचा परमोच्च बिंदू ते साधत आणि त्याचमुळे अनेक वर्षे रसिकांच्या मनावर या साऱ्या गीतांचा पगडा होता. आपल्या कार्यक्रमात ते स्वत: लावलेल्या चालीच बहुधा ते म्हणत. त्यामुळे प्रत्यक्ष गाताना हवे ते बदल ते करून घेत. त्यामुळे त्यात ठराविकपणा येत नसे. प्रत्येक वेळी ते काव्य नवीनच वाटे.
लोकांच्या आग्रहास्तव त्यांनी कधी लावण्या, नाटय़संगीत, सिनेसंगीत इतर काही प्रकार त्यांच्या कार्यक्रमात आणले नाहीत. द्वंद्वगीते नाहीत. साधेसुधे शब्द, साध्यासुलभ चाली यांचं जणू मनोमीलन त्यावेळच्या भावगीतात झालं आहे. दुधात साखर पडावी अशी भावगीतं पानफुटीसारखी जमून गेली आहेत की या भावगीतातील शब्दासाठी चाल जन्माला आली की चालीसाठी शब्द जन्माला आले, अशा गोड संभ्रमात भावगीतांचे रसिक पडतात, मनात घर करणारी व ओठावर रेंगाळणारी ही गोड गोड भावगीते महाराष्ट्राचे एक सांस्कृतिक वैशिष्टय़ झाले. हा सांस्कृतिक ठेवा अवीट आहे. खरं तर या साध्या कविता होत्या, त्यांना गजानन वाटवेंनी सहज सुलभ चाली लावल्या. आश्चर्य म्हणजे गजानन वाटवे कवितेतील एकाही शब्दाचा बदल न करता त्यांना सुंदर चाली लावलेल्या आहेत. मात्र एक काळ गजानन वाटवे यांनी गाजवला होता, हे मात्र नक्की. कवी मनमोहन यांच्या ‘राधे तुझा सैल अंबाडा’ आणि राजा बडे लिखित ‘नका मारू खडा शिरी भरला घडा’ या गीतांनी पुण्या-मुंबईत खळबळ उडवून दिली. दोन्ही गीतं अश्लील असल्याचं शिक्कामोर्तब संस्कृतीरक्षकांनी केले होते. रेडिओने दोन्ही गाण्यांवर बॅन टाकला. त्याकाळच्या लोकप्रिय सिनेमातल्या गाण्यांच्या रेकॉर्डस्पेक्षाही अधिक विक्री या दोन प्रायव्हेट गाण्यांच्या रेकॉर्ड्सने केली. गजानन वाटवे यांच्या स्वरातलं भावदर्शन ही त्याकाळच्या तरुण पिढीची गरज होती. स्वातंत्र्यपूर्व काळापासून थेट साठच्या दशकातील सुरुवातीपर्यंत गजाननरावांच्या भावगीतांनी मराठी मनावर अधिराज्य गाजवलं. गांधी हत्येनंतर महंमद रफीचं‘सुनो सुनो ए दुनियावालों बापू की अमर कहानी’ ऐकून गजाननरावांनी कवी मनमोहन यांना गांधीजींच्या जीवनावर कविता लिहिण्याची विनंती केली. तुफान लोकप्रियता हे ‘गजानन वाटवे’ या नावासरशी जणू घट्ट चिकटलं होतं. गजानन वाटवे यांचे २ एप्रिल २००९ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ.इंटरनेट
गजानन वाटवे यांची काही गाणी
https://www.youtube.com/watch?v=pYqBj-cduu8
https://www.youtube.com/watch?v=u8LD6_Q4OKQ
https://www.youtube.com/watch?v=C316cQP3EYI
https://www.youtube.com/watch?v=Zdfh5gVMA60
https://www.youtube.com/watch?v=8EJxW0rNF7k
स्नेहप्रभा प्रधान यांचे दहा वर्षांपर्यंतचे त्यांचे बालपण नागपूर, पुणे, मुंबई, कलकत्ता, लाहोर आणि अन्य शहरांत गेले. परिणामी १८ वर्षाच्या होईपर्यंत त्यांना चार भाषा अस्खलित बोलता येऊ लागल्या. त्यांना कुत्र्या-मांजराचे आणि अन्य प्राण्यांचे खूप प्रेम होते. आपण डॉक्टर बनावे अशी त्यांची फार इच्छा होती. पण त्यांना कॉलेजमध्ये जाण्याचे सुख मिळाले नाही. वडिलांनी कुटुंबाचा त्याग केलाआणि स्नेहप्रभा प्रधानांची सर्व जबाबदारी त्यांच्या सतत आजारी असणाऱ्या आईवर पडली. अशा वेळी त्यांचे कुटुंबस्नेही व बॉम्बे टॉकीजचे चित्रपट निर्माते चिमणभाई देसाई मदतीला धावले आणि स्नेहप्रभा प्रधानांची चित्रपटांतील अभिनयाची कारकीर्द सुरू झाली. त्या आधी स्नेहप्रभा प्रधान या मो.ग. रांगणेकर यांच्या नाट्यनिकेतन या नाट्यसंस्थेच्या नाटकांतून कामे करीत असत. पहिली मंगळागौर या चित्रपटात लता मंगेशकर यांनी स्नेहप्रभा प्रधान यांच्या धाकट्या बहिणीची भूमिका केली होती.
स्नेहप्रभा प्रधान यांना १९४० मध्ये प्रकाशित झालेल्या ’सजनी’, ’सिव्हिल मॅरेज’ आणि ’सौभाग्य’ या चित्रपटांत चिमणभाई देसाईंच्या ओळखीमुळे कामे करायला मिळाली. त्याच वर्षी किशोर शाहू यांच्या नायिका म्हणून स्नेहप्रभा प्रधान यांना बॉम्बे टॉकीजच्या ’पुनर्मिलन’ या चित्रपटात भूमिका मिळाली. चित्रपटात त्यांनी गायलेले ’नाचो नाचो प्यारे मन के मोर’ हे गाणे अफाट गाजले. किशोर शाहू त्यांच्या प्रेमात पडले, त्यांचे लग्न झाले पण ते लग्न जेमतेम एक वर्ष टिकले.
नंतर त्यांची घट्ट मैत्री जुळली ती डॉ. शिरोडकर यांच्यासोबत. १९५० च्या सुमारास स्नेहप्रभा प्रधान यांचे डॉ. शिरोडकरांशी लग्न झाले, आणि त्या मुंबईत स्थिरावल्या. त्यांनी पुढची काही वर्षे मराठी नाट्यसेवेसाठी व इतर सामाजिक कार्यासाठी खर्च केली. स्नेहप्रभा प्रधान मात्र शेवटपर्यंत स्वतंत्र, पुरोगामी आणि बिनधास्त जीवन जगल्या. शेवटची वर्षे ४० वर्षे मात्र, त्यांनी आपले जीवन प्रसिद्धिपराङ्मुखपणे व शांतपणे व्यतीत केले. स्नेहप्रभा प्रधान यांनी पुनर्मिलन, पहिली मंगळागौर ,सजनी, सिव्हिल मॅरेज, सौभाग्य या चित्रपटात कामे केली.
स्नेहप्रभा प्रधान यांचं आत्मवृत्त "स्नेहांकिता‘ वाचण्यासारखे आहे. ७ डिसेंबर १९९३ रोजी स्नेहप्रभा प्रधान यांचे निधन झाले.
स्नेहप्रभा प्रधान यांनी लिहिलेली पुस्तके
पळसाला पानं तीन (ललित लेखसंग्रह)
रसिक प्रेक्षकांस सप्रेम (स्नेहप्रभा प्रधान यांच्या भूमिकांचे विश्लेषण करणारे लेख)
सर्वस्वी तुझाच (नाटक)
स्नेहांकिता (आत्मचरित्र).
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ.इंटरनेट
आत्ता पर्यत तब्बल ६५० चित्रपटांसाठी हजारोंच्या संख्येने गीतांचे लेखन करणारा आणि तरीही अंतरंगात कुठे तरी कातर, हळव्या मनाचा कवी अशीच गीतकार समीर अंजान पाण्डेय ऊर्फ शीतल पांडे'' उर्फ मा.समीर यांची ओळख. त्यांचा जन्म २४ फेब्रुवारी १९५८ रोजी झाला.ज्येष्ठ गीतकार मा.अंजान हे समीर यांचे वडील. इंडस्ट्रीचा बेभरवशीपणा अनुभवला असल्याने मा.अंजान यांनी मा.समीर यांच्या गीतकार होण्याला विरोध केला. पण समीर यांचा पिंड कवी मनाचाच असल्याने घरच्या विरोधाला जुमानता तो प्रकट होत राहिला. बँक अधिकारी म्हणून करिअरची सुरुवात केलेल्या मा.समीर यांनी बॉलिवूडमध्ये करिअर करायचे या उद्देशाने त्यांनी बँकेतील सुरक्षित नोकरी सोडली आणि सिनेक्षेत्रात गीतकार म्हणून पाऊल टाकले. सुरुवातीला त्यांनी ‘बेखबर’, ‘इन्साफ कौन करेगा’, ‘जबाब हम देंगे’, रखवाला’, ‘महासंग्राम’ आदी चित्रपटांसाठी गाणी लिहिली. मात्र या गाण्यांमुळे त्यांना यश व प्रसिद्धी मिळाली नाही. सातत्याने संघर्ष केल्यानंतर अखेर १९९० मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘आशिकी’ चित्रपटातील गाण्यांनी समीर यांना प्रसिद्धी मिळवून दिली. ‘सांसो की जरुरत है जैसे’, ‘मै दुनिया भूला दुंगा’, ‘नजर के सामने जिगर के पास’ ही गाणी प्रचंड लोकप्रिय झाली. चित्रपट रसिक व श्रोत्यांवर आपल्या शब्दांनी गारूड करणाऱ्या समीर यांनी आपल्या कारकिर्दीत शंभरहून अधिक संगीत दिग्दर्शकांसोबत काम केले आहे. अन्नू मलिक, आदेश श्रीवास्तव, इलया राजा, ए.आर. रहेमान, जतीन ललित, दिलीप सेन-समीर सेन, नदीम-श्रवण, राजेश रोशन, शंकर एहसान-लॉय आदी संगीतकारांबरोबर समीर यांची जोडी जमली. ‘आँखे’, ’आशिकी’, ’कभी खुशी कभी गम’, ‘कुछ कुछ होता है’, ‘कुली नंबर वन’, ‘जुर्म’, ‘तेरे नाम’, ‘दबंग-२’, ‘दिल है की मानता नही’, ‘दिवाना’, ‘देवदास’, ‘धडकन’, ‘धूम’, ‘फिजा’, बेटा’, ‘बोल राधा बोल’, ‘राजाबाबू’, ‘राजा हिंदुस्थानी’, ‘रावडी राठोड’, ‘शोला और शबनम’, ‘सडक’, साजन’, ‘सावरियाँ’, ‘हम है राही प्यार के’, ‘हीरो नंबर वन’, अशा अनेक चित्रपटांसाठी मा.समीर यांनी लिहिलेली गाणी लोकप्रिय झाली आहेत. मा.समीर यांनी मराठी आणि भोजपुरी चित्रपटांसाठीही गाणी लिहिली आहेत. मा.समीर यांनी फेब्रुवारी २०१६ पर्यंत ६१७ चित्रपटांसाठी ३ हजार ४०० गाणी लिहिली आहेत. सर्वाधिक गाणी लिहिल्याबद्दल त्यांचे नाव ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ मध्ये नोंदले गेले आहे. या आधीचे रेकॉर्ड गीतकार मा.आनंद बक्षी यांचे होते; त्यांनी ६२४ चित्रपटांसाठी ३ हजार २०० गाणी लिहिली होती. मा.समीर यांना आपल्या समूहाकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
समीर यांची काही गाणी
आए हो मेरी जिंदगी में
आखों ने तुम्हारी
आपके प्यार मे हम
घुंगट की आड से
चाहा है तुझको
जो हाल दिल का
तुम्हे अपना बनाने की कसम खाई है
तेरी उम्मीद तेरा इंतजार
धीरे धीरे से मेरी जिंदगी में आना
धूम मचा ले धूम
दिल ने दिल से क्या कहा
दिल है के मानता नही
देखो जरा देखो
आज काव्यतीर्थ हणमंत नरहर जोशी तथा कवी सुधांशु यांची पुण्यतिथी. कवी सुधांशु यांचे १८ नोव्हेंबर २००६ ला निधन झाले.
कवी सुधांशु यांचा जन्म ६ एप्रिल १९१७ रोजी झाला. त्यांनी आध्यात्मिक (प्रामुख्याने दत्तविषयक) आणि मुलांसाठीची अनेक पुस्तके त्यांनी लिहिली आहेत.
१९३७ पासून सुधांशु यांनी काव्यलेखनास प्रारंभ केला. त्यांच्या कविता किर्लोस्कर, स्त्री, मनोहर आदी मासिकांतून प्रसिद्ध होत होत्या. या कवितांचे पुढे पुस्तकरूपाने संग्रह झाले. मराठी कवी कुंजविहारी यांनी ह. न.जोशी यांना सुधांशु हे नाव दिले, आणि पुढे त्याच नावाने ते ओळखले जाऊ लागले. कवी सुधांशु यांच्या गीत दत्तात्रयाचे कार्यक्रम श्रीक्षेत्र औदुंबर येथे पहिल्यांदा, नंतर मिरजेच्या अण्णाबुवा मठात आणि नंतर इतर अनेक ठिकाणी झाले. भारत गायन समाजात आणि नंतर अन्यत्र पुण्यात झालेल्या कार्यक्रमांना मास्टर कृष्णराव, श्री (ना.र.)मारुलकरबुवा, संजीवनी खेर आदी संगीतज्ज्ञांबरोबरच पंडित महादेवशास्त्री जोशी, भा.द. खेर, सरदार आबासाहेब मुजुमदार यांसारख्या रसिक साहित्यिकांची उपस्थिती होती. या दत्तगीतांचे गायक सांगलीचेच बाळ कारंजकर होते. तबल्याची साथ रामभाऊ चिपळूणकरांनी केली होती.
कवी सुधांशु यांनी आयुष्यभर खादीचे कपडे घातले. त्यांच्या अंगावर सतत एक शाल असे. सुधांशूंनी भारताच्या १९४२ सालच्या स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला होता. आपल्या स्वातंत्र्यगीतांतून आणि पोवाड्यांतून त्यांनी तंत्रसैनिकांना स्फूर्ती दिली. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यांनी स्वत:ला ग्रामसुधारणेला वाहून घेतले. १९६० मध्ये ते अंकलखोप या गावाचे सरपंच म्हणून बिनविरोध निवडून आले आणि १९६५ पर्यंत त्या पदावर राहिले. त्याच सुमाराला गावाला स्वच्छतेचा आणि व्यसनमुक्तीचा पुरस्कारही मिळाला.
कवि सुधांशु दत्ताचे पुजारी होते आणि ते पौरोहित्यही करीत. औदुंबर येथे सदानंद साहित्य मंडळाची स्थापना करून कवी सुधांशूंनी १९३९ पासून ग्रामीण मराठी साहित्य संमेलन भरविण्यास सुरुवात केली. दरवर्षी मकर संक्रातीला होणाऱ्या या औदुंबर ग्रामीण साहित्य संमेलनाला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील साहित्यरसिक येतात, व आजही अध्यक्ष आणि फाजिल मानपानांविना हे संमेलन पार पडते. १९७४ मध्ये त्यांना ‘पद्मश्री’ किताब मिळाला होता.
कवी सुधांशु यांनी अनेक मराठी भावगीते लिहिली आहेत. आर. एन. पराडकर आणि माणिक वर्मा यांनी गायलेली त्यांची गाणी अजून लोकांच्या मनात आहेत. ‘दत्त दिगंबर दैवत माझे’, ‘देव माझा विठू सावळा’ या गीतांचे कवी कवी सुधांशुच.
-- संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०७१३३
संदर्भ. इंटरनेट
नाट्यसिने अभिनेत्री व लेखिका स्नेहप्रभा प्रधान यांचे स्नेहांकिता हे आत्मचरित्र गाजले, वादग्रस्तही ठरले
वासुदेव चाफेकर व त्यांचे बंधु हे आद्य भारतीय क्रांतिकारकांमध्ये गणले जातात.
पुण्याचे स. प. महाविद्यालय, मुंबईचे रुईया आणि खालसा महाविद्यालय येथे भौतिकशास्त्राचे अध्यापक.
विज्ञान प्रसारकांच्या पहिल्या पिढीतील एक प्रतिनिधी. विज्ञान प्रसार सुलभपणे करण्यासाठी लेख, पुस्तके, जाहीर भाषणे, आकाशवाणी यावर कार्यक्रम आणि मराठी विज्ञान परिषदेत संस्थात्मक काम केले.
(जन्म १९१५ मृत्यू १९९०)
माहितीस्त्रोत - (म.वि.प.चा.) विज्ञानतंत्रज्ञान कोष
Copyright © 2025 | Marathisrushti