(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

  • वि. ना. देवधर

    एकापेक्षा अधिक परिचितांचे आकस्मिक मृत्यू एकाच दिवशी घडावेत हा कुयोग अलीकडच्या काळात परवाच्या मंगळवारी दुसऱ्यांदा घडून आला. दीनदयाळ शोध संस्थानचे संस्थापक नानाजी देशमुख आणि रा. स्व. संघाचे भूतपूर्व बौद्धिक विभाग प्रमुख डॉ. श्रीपती शास्त्री गेले तेव्हा फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवडय़ात पहिल्यांदा, आणि ज्येष्ठ गायक कै. सुधीर फडके यांच्या पत्नी ललिता फडके आणि ज्येष्ठ पत्रकार वि. ना. देवधर यांचे निधन झाले तेव्हा दुसऱ्यांदा.

    देवधर लोकसत्ता परिवाराला जवळचे होते, कारण ज्येष्ठ सहसंपादक या नात्याने त्यांनी आपल्या वृत्तपत्र कारकीर्दीतली काही वर्षे ‘लोकसत्ता’त व्यतीत केली होती. देवधर तसे मूळचे पुण्याचे, शालेय शिक्षण सुरू असतानाच त्यांचा वृत्तपत्र व्यवसायाशी संबंध आला तो वृत्तपत्राचे गठ्ठे पोचवण्याच्या निमित्ताने. लेखनाची आवड असल्याने आणि श्री. म. माटे यांच्याकडे लेखनिक म्हणून उमेदवारी केली असल्याने लेखणीला आणि भाषेला जे वळण लागले होते, त्याच्याच आधाराने देवधर बातमीदारीत आले. ‘दैनिक भारत’ आणि ‘केसरी’त त्यांनी बातमीदारी सुरू केली आणि त्याच अनुभवावर मुंबईतून ‘महाराष्ट्र टाइम्स’ सुरू होताच देवधर तिथे रुजू झाले.

    आर्थिक आणि राजकीय विश्लेषण ही देवधरांच्या बातमीदारीतली खासियत राहिल्याने काही काळ मुंबईत विधिमंडळाचे आणि नंतर दिल्लीत संसदेचे रिपोर्टिग त्यांनी केले. ‘राजधानीतून’ हे त्यांचे दिल्लीच्या बातमीदारीविषयीचे लेखन गाजले. त्याने दिल्लीच्या बातमीदारीचा एक नवा पायंडा पाडला. देवधर राजकीय विश्लेषण जेवढे निष्पक्षपणे आणि मार्मिक करीत, तेवढेच ते पडद्यामागच्या घटनांवर, बातमीमागच्या बातमीवर तिरकस आणि खोचक शैलीत लिहीत. ‘भेळ-शहाळी’ हे त्यांचे सदर त्यामुळेच अनेकांच्या स्मरणात राहिले. आणीबाणी उठताच देवधर ‘महाराष्ट्र टाइम्स’ सोडून पुण्याच्या ‘तरुण भारत’मध्ये संपादक म्हणून रुजू झाले.

    अवघ्या पाच वर्षांच्या तिथल्या कारकीर्दीत त्यांनी आपल्या समर्थ लेखणीने जनसामान्यांवर ‘तरुण भारत’चा वेगळाच ठसा उमटवला. देवधर हिंदुत्ववादी होते, पण त्यांचे हिंदुत्व हिंदुत्ववादी विचारधारेबाहेरच्या वाचकालाही मोहित करीत राहिले. देवधर हिंदुत्वाच्या विचारधारेत वाढले, आपल्या विचारांशी, निष्ठांशी आयुष्यभर घट्ट राहिले, त्या विचारधारेतल्या मुखंडांनी त्यांची अवहेलनाही केली. स्वाभाविकपणेच त्यांच्याशी मतभेदही झाले, पण तरीही त्यांनी ध्येयवादावरची अतूट निष्ठा मात्र ढळू दिली नाही. विचारधारेचे, चळवळीचे पुरस्कर्तेपण त्यांनी जपले, पण ते जपताना बातमीचे, लेखणीचे पावित्र्य कुठेही कमी होऊ दिले नाही. सरकारी सवलती उपटणे, बातमीच्या पाटय़ा टाकणे, गोट गाठणे, कार्बन कॉपी जर्नालिझम करणे या वाटांना देवधरांची पत्रकारिता जाणे शक्यच नव्हते.

    अभ्यासू वृत्ती जोपासत, व्यासंगाची सवय राखत, बातमीचे पावित्र्य जपत देवधरांनी, पत्रकारिता धर्माचे पालन केले. पत्रकार संघटनांमध्येही देवधरांनी काम केले. देवधरांची पत्रकारिता गतिमान होती, अष्टावधानी होती. निवृत्तीनंतरही देवधर पत्रकारितेतच सक्रिय राहिले आणि अन्य वृत्तपत्रांकरिता स्तंभलेखन, अग्रलेख लेखन करीत राहिले. प्रकृतीने साथ दिली असती तर पत्रकारितेच्या अध्यापनाबरोबरच नव्या पिढीतील पत्रकारही ज्ञानी, कृतिशील आणि बहुआयामी बनावेत यासाठी ते कार्यरत राहिलेले दिसले असते.

    यशवंतराव चव्हाणांच्या एका पत्रकार परिषदेत केवळ त्यांना आलेल्या दूरध्वनीवरून देवधरांनी शोधून काढलेली यशवंतराव चव्हाण संरक्षणमंत्री होणार असल्याची बातमी, त्यांच्या निरीक्षण, विश्लेषण क्षमतेचे कौशल्य दाखवणारी ठरली होती. ती बातमी देणारे ते पहिलेच मराठी पत्रकार ठरले होते. पत्रकार परिषदेदरम्यान आलेला तो दूरध्वनी सुरू असताना देवधरांनी टिपलेले चव्हाणांच्या मुद्रेवरचे भाव, चव्हाणांनी दूरध्वनीवरूनच दिलेली मोघम उत्तरे, त्यांची देहबोली, त्यांच्या बोलण्यात आलेला ‘संरक्षण’ हा एकमेव शब्द यावरूनच देवधरांनी बेधडकपणे यशवंतराव संरक्षणमंत्री होऊ घातले असल्याचा अंदाज वर्तवला होता आणि तो अचूक ठरला होता. अशी अचूक निष्कर्षशक्ती असणाऱ्या देवधरांनी नुकतेच ८१ व्या वर्षांत पदार्पण केले होते.

    प्रकृती साथ देत नव्हती, पण प्रकृती अशी एकाएकी दगा देईल असेही वाटत नव्हते, अशा क्षणीच त्यांचे जाणे झाले आहे. ते खचितच धक्का देणारे आहे.

  • मराठी संपादक पां. वा. गाडगीळ

    पां . वा . गाडगीळ हे पहिले मराठी संपादक आहेत. जे प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाचे संचालक होते. दिल्लीला जाणं-येणं त्यांना न झेपणारं होतं. तरीसुद्धा प्रेस कौन्सिलची एकही बैठक गाडगीळसाहेबांनी कधीही चुकवली नाही. बैठक एका दिवसाचीच असायची. त्या बैठकीला समितीच्या सदस्याला निवासस्थानाहून यायला गाडी असायची. गाडगीळ त्यावेळच्या महाराष्ट्र सदनात राहायचे. प्रेस कौन्सिलचे कार्यालय समोरच्याच फुटपाथवर त्यावेळी होते . त्यावेळी प्रेस कौन्सिलतर्फे आलेली गाडी ते परत पाठवायचे आणि चालत जायचे आणि चालत परत यायचे.

  • कवी मधुकर जोशी

    संगीतकार दशरथ पुजारी यांनी मधुकर जोशी यांची बरीचशी गीतं एच.एम.व्ही.त रेकॉर्ड केली होती. ती आठवण सांगताना संगीतकार दशरथ पुजारी आपल्या पुस्तकात म्हणतात त्यावेळी काही लोकांचा थोडासा गैरसमज झाला होता की, इतर इतके चांगले कवी असताना तुम्ही मधुकर जोशींचीच गाणी का घेता? त्यांना असं वाटणं स्वाभाविक होतं. त्यावेळचे एक नामवंत कवी मला म्हणाले, “पुजारी, तुमचे मधुकर जोशी हे ठरलेले कवी आहेत. तुम्ही दुसर्या कवीला संधी देत नाहीत. हा काय प्रकार आहे? मी एवढंच सागितलं, “प्रकार दुसरा-तिसरा काही नसून मला त्यांची गीतं आवडतात. त्यांचे शब्द साधे, सुटसुटीत, अर्थाला धरून- दादरा, केरवा, रूपकच्या मीटरमध्ये छान बसवलेले असतात. एका मात्रेचंही कमी-जास्त होत नाही. शिवाय काव्य पाहिल्याबरोबर जेव्हा संगितकाराला चाल चटकन सुचते ते काव्य फार चांगले, असे मी समजतो.” त्यांचं एक काव्य त्यावेळी फार लोकप्रिय होतं.

  • कुटुंब रंगलंय काव्यात’ चे विसूभाऊ बापट

    मराठी साहित्य आणि साहित्यकारांना तसेच रसिकांना माहीत नसलेल्या हजारो कविता प्रा.बापटांनी मुखोद्गत केल्या आहेत. विविध वयोगटातील रसिक प्रेक्षकांना आनंद मिळेल याचे भान ठेवून प्रा.बापटांनी ह्या दुर्मिळ कवितांवर स्वरसाज चढविला.

  • सुप्रसिद्ध लेखिका योगिनी जोगळेकर

    गायिका, कवयित्री, नाटककार व सुप्रसिद्ध लेखिका योगिनी जोगळेकर यांचा जन्म ६ ऑगस्ट १९२५ रोजी पुणे येथे झाला.

    योगिनी जोगळेकर यांनी बी.ए.पर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यावर १९४८ ते १९५३ या काळात त्यांनी शिक्षिका म्हणून नोकरी केली. तसेच 'राष्ट्रसेविका समिती'च्या माध्यामातून त्यांनी अनेक वर्ष सामाजिक कार्यही केले. याच काळात त्यांनी विविध कथा, कादंबरीतून स्त्रीविषयक लेखन केले. त्यांचे काही काव्यसंग्रह व नाटकेही प्रसिद्ध झाली.

    पंडित भास्करबुवा बखले यांच्या जीवनावर "" या सम हा "" आणि राम मराठे यांच्या जीवनावर राम प्रहर"" या चरित्रांचे त्यांचे लेखन वेगळे ठरले.

    वयाच्या आठव्या वर्षापासून योगिनीबाई शंकरबुवा अष्टेकर यांचेकडे संगीत शिकत होत्या. त्यानंतर योगिनी जोगळेकर यांनी राम मराठे यांचे शिष्यत्व पत्करले. आकाशवाणी व खाजगी बैठकीबरोबरच योगिनी जोगळेकर यांनी "पहिली मंगळागौर या चित्रपटासाठी पार्श्वगायन केले.

    आकाशवाणीवरील गीतरामायणाच्या प्रथम प्रसारणात विरूप झाली शूर्पणखा, ही दाशरथीची कृति सूड घे त्याचा लंकापति हे गाणे योगिनी जोगळेकर यांनी गायले होते.

    योगिनी जोगळेकर यांनी "राम प्रहर " हे राम मराठे यांच्या जीवनावर चरित्र लेखन केले होते.

    योगिनी जोगळेकर यांचे निधन १ नोव्हेंबर २००५ रोजी झाले.

    त्यांची गीतसंपदा

    मधुर स्वरलहरी या ------- सखे बाई सांगते मी -----हरीची ऐकताच मुरली -----हे सागरा नीलांबरा
    सखे बाई सांगते मी नवनवल गे
    गमते मना मृदु भावना
    हृदयींची शतजन्मींृची गे
    स्वप्नाीत तयाशी प्रहर प्रहर बोलते
    या मनोरथातुनी योजनभर विहरते
    गमते मना सुख साधना
    हृदयींची शतजन्मींाची गे
    नित्‌ प्रीत उमलतसे
    माला मी गुंफितसे
    भक्ति ज्योति तेवतसे
    मन हसे, तन हसे, मधुरसे"

    -- संजीव वेलणकर
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

  • वेदनेचा सुरेल अविष्कार – मदनमोहन

    आपल्याकडे‘यशस्वी’ म्हणून गणना करताना व्यावहारिक यश हाच एकमेव निकष वापरला जाऊन त्यानुसार गुणवत्ता ठरवली जाते. अर्थात, व्यावहारिक यशाकडे संपूर्ण कानाडोळा करणे तसे चूकही आहे; पण तोच एकमेव निकष मानणे तितकेसे योग्य नाही. परंतु हाच निकष आजवर सर्रास लावल्याने हिंदी चित्रपट क्षेत्रातील अनेक गुणवान संगीत दिग्दर्शकांवर अन्याय झालेला आहे. मदनमोहन हे त्यातील एक ठळक नाव.

    मदनमोहन यांच्या सर्वंकष संगीताचा विचार करायचा झाल्यास, काही बाबी ठळकपणे नोंदवाव्या लागतील. मदनमोहन यांची प्रतिभा ‘गीतधर्मी’ होती. याचाच वेगळा अर्थ असा लावता येईल की शब्दांच्या अर्थाव्यतिरिक्त पण त्याच्या आधारे आशयाचे विविध तरंग निर्माण करण्याची ताकद, त्यांच्या संगीत रचनेतून प्रतीत होत होती. यामध्ये, कवितेतील आशयाबरोबर सांगीतिक रचनादेखील समांतर अस्तित्व दाखवत असते. तरीही दोन्ही घटकांचा अत्यंत सुनियोजित मेळ घातलेला असतो. यावरूनच, मदनमोहन यांच्या संगीतात गझलेला का महत्त्व आले, हे अधोरेखित व्हावे. गीतधर्मी संगीतकार हे नेहमीच लयबंधापेक्षा सुरावटीकडे आणि त्याच्या प्रवाही चलनाकडे अधिक झुकतात. लयबंधाच्या किंवा तालांच्या ठळक वापरातून जी गतिमानता प्रत्ययास येते, तिच्यापेक्षा स्वररंगातील सूक्ष्म भेद दाखवून आकारास येणारी गतिमानता, असे संगीतकार नेहमी पसंत करतात.

    उदाहरणादाखल ‘नैना बरसे’ हे गाणे घेऊया. एक प्रणयगीत म्हणून ऐकताना, नेहमीच्या गझल रचनेचा वापर न करता संगीतकाराने गीताची पारंपरिक धाटणी अंगीकारली आहे; पण तरीही ‘मुखडा’ समोर ठेवत असल्याचा भास निर्माण करून एकदम सुरावटीत बुडी मारणारे चलन, तसेच एकामागोमाग येणार्‍या कडव्यांची पट्टी बदलून केलेले गायन पण तरीही नकळत मूळ पट्टीकडे येणे! पट्टीच्या कानसेनांचे लक्ष वेधून घेणारे आहे.’
    दुसरा विशेष असा सांगता येईल, अशा संगीतकारांच्या गाण्याचे मुखडे गुणगुणत राहावे, असे असतात. तसेच द्रुतगती किंवा गुंतागुंतीच्या पण उत्स्फूर्त वाटणार्‍या संगीतात वाक्यांशासाठी चालीत मुबलक जागा सोडलेल्या असतात. त्यामुळे त्यांच्या गाण्यात ‘गायकी’ अंग फार ठळकपणे दिसून येते. मुळात मदनमोहन यांच्यावर उत्तर भारतीय पण लखनवी परंपरेचा प्रभाव असल्याने उपशास्त्रीय संगीताकडे ओढ असणे स्वाभाविक ठरते. गझलेचे वर्णन करताना, ‘भोगवादाचा मनोज्ञ आविष्कार’ या शब्दात केले जाते, आणि याचाच अप्रतिम आविष्कार मदनमोहन यांच्या संगीतात दिसून येतो. कुठलीही समृद्ध गझल काव्य म्हणून ध्यानात घेतली तर त्यात उत्कटता, अभावित सौंदर्यवादी धक्का देण्याची प्रवृत्ती आणि कुठल्याही भावनेचा ‘अर्क’ शोषून घेण्याची शोधक वृत्ती आढळते. त्यामुळे जेव्हा आपण मदनमोहन यांच्या रचना ऐकतो, तेव्हा यावरील गुणवैशिष्ट्यांचा आपल्याला नेहमीच प्रत्यय येतो.
    जवळपास 30 वर्षांहून अधिक काळ चित्रपटसृष्टीत मोलाचे योगदान देऊनही ज्या थोड्या संगीतकारांना अजिबात व्यावसायिक यश प्राप्त झाले नाही, अशा अत्यंत दुर्दैवी संगीतकारांत मदनमोहन यांचा समावेश करावा लागतो. जरा बारकाईने बघितले तर कारकीर्दीच्या सुरुवातीला ‘हमारे बाद अब महफ़िल में’, किंवा ‘दुखियारे नैना’सारखी विलक्षण ताकदीची गाणी देणारा संगीतकार, अगदी आयुष्याच्या अखेरीस ‘बैया ना धरो’ किंवा ‘आज सोचा तो आंसू भर आये’ अशी त्याच तोलामोलाची गाणी देऊ शकला. हा माणूस किती प्रतिभावंत होता, याची ही चार गाणी साक्ष द्यायला पुरेशी आहेत. वास्तविक बघता, सांगीतिक रचनेच्या दृष्टिकोनातून वर निर्देशिलेल्या पहिल्या दोन गाण्यांच्या रचना आणि नंतरच्या दोन गाण्यांच्या रचना, यात तसा फारसा फरक नाही!! वेगळ्या शब्दांत मांडायचे झाल्यास, रचनेचा मूलभूत ‘ढाचा’ बराचसा मिळताजुळता आहे; पण फरक आहे तो वाद्यसंगीताचा आणि गायकीचा!
    गझल गायकीत जो भोगवादाचा अर्क असतो, त्याचे नितांत रमणीय दर्शन मदनमोहन यांच्या रचनेतून दिसून येते. हाताशी आलेल्या काव्यातील दडलेला आशय तितक्याच समर्पक सुरांतून व्यक्त करण्याची अद्भुत ताकद, या संगीतकाराच्या रचनेतून वारंवार दिसून येते. याआधी उल्लेख केल्याप्रमाणे गाण्याची रचना करताना ‘धून’ अशी तयार करावी, की त्यातून प्रत्येक वेळी नवीन सांगीतिक वाक्यांश प्रत्ययाला यावेत आणि त्यामुळे, मूळ चालीचे सौंदर्य अधिक विस्तीर्ण व्हावे. मदनमोहन यांची गाणी नेहमी इथे इतरांपेक्षा वेगळी होतात. चित्रपटात जेव्हा केव्हा उठवळ प्रसंगाला साजेसे गाणे करायची वेळ आली, तेव्हा मदनमोहन यांनी केलेल्या रचना केवळ कर्तव्यभावनेने केलेल्या आणि बर्‍याच रुक्ष वाटतात!! आपली प्रवृत्ती अशा गाण्यांना साजेशी नाही, याची पुरती जाणीव मदनमोहन यांना होती आणि त्यामुळे अशी गाणी बांधताना, त्यातील जो उत्स्फूर्तपणा असतो, त्याचा मदनमोहन यांच्या ठायी लवलेश नसतो. कदाचित म्हणूनही या संगीतकाराच्या वाट्याला व्यावसायिक या संज्ञेत बसणारे फारसे चित्रपट आले नसावेत!!
    अर्थात, प्रत्येक संगीतकाराची जशी बलस्थाने असतात, तसे तोकडेपणदेखील असते. तद्वत हॉटेलमधील नृत्यगीतांत वा त्या सदृश गाण्यांत, मदनमोहन अजिबात रमलेले दिसत नाहीत. त्याचबरोबर बलस्थाने विचारात घेता, गझलसदृश गाण्यांत मात्र मदनमोहन एकमेवाद्वितीय! अशा गाण्यांत त्यांच्या प्रतिभेच्या उत्तुंग आविष्काराचे दर्शन घडते. वास्तविक संगीताचे शास्त्रशुद्ध शिक्षण न घेतादेखील, ‘यमन’सारख्या चित्रपट संगीतात वारंवार वापरल्या जाणार्‍या रागात, ‘जारे बदरा बैरी जा’, ‘जिया ले गयो जी मोरा सांवरिया’सारख्या अवीट गोडीची ‘तर्ज’ तयार करणे, हे येर्‍यागबाळ्याचे काम नोहे! मदनमोहन यांच्या गाण्यात दुसरे खास वैशिष्ट्य दिसून येते, ते गाण्याच्या चालीसोबत रुणझुणणारा वाद्यमेळ. गायक/गायिकेने जिथे स्वर सोपवला आहे, तिथून वाद्यसंगीताच्या मदतीने तीच लय अधिक विस्तारित करत जायचे, हा या संगीतकाराचा अत्यंत मनोहारी खेळ!! बर्‍याच गाण्यांत हा खेळ आपल्याला अनुभवायला मिळतो. जसे, रस्मे उल्फत को निभाये, तुम जो मिल गये हो... इत्यादी अनेक गाण्यांतून माझ्या म्हणण्याचे वाचकांस प्रत्यंतर येऊ शकेल.
    सुरुवातीला मी जे म्हटले, आपल्याकडे एखाद्या कलाकाराची बूज तो जिवंत असताना फारशी राखली जात नाही, आणि ती व्यक्ती गेल्यानंतर तिचे गोडवे गाण्याची मात्र अहमहमिका लागते!! मदनमोहन यांच्या बाबतीत नेमके असेच घडत आहे. म्हणूनच कदाचित, आजही या संगीतकाराचे नाव रसिक गौरवाने घेत असावेत!!
    - अनिल गोविलकर

  • धर्मवीर आनंद दिघे

    बाळासाहेबांचं वक्तृत्व आणि व्यक्तिमत्वाकडे आनंद दिघे आकर्षित झाले होते. बाळासाहेबांची त्यांच्यावर मोहिनी होती. त्यामुळे त्यांनी उभं आयुष्य शिवसेनेसाठी काम करायचं ठरवलं आणि सत्तरच्या दशकात शिवसेनेचा एक सामान्य कार्यकर्ता म्हणून काम सुरू केलं. त्यांच्या कामात इतकं झपाटलेपण होतं की त्यांनी लग्नसुद्धा केलं नव्हते.

  • मराठी नाट्यसृष्टीतील ज्येष्ठ नाट्यनिर्माते सुधीर भट

    सुयोग नाटसंस्था सुधीर भट आणि गोपाळ अलगेरी यांनी एक जानेवारी १९८५ रोजी स्थापन केली. त्यांचा जन्म १३ जून १९५१ रोजी झाला. या नाटयसंस्थेच्या माध्यमातून ८० पेक्षा जास्त नाटके, १६ हजाराहून अधिक प्रयोग आणि हजार प्रयोगांचा टप्पा ओलांडणा-या आठ नाटकांची निर्मिती त्यांनी केली. सुयोग नाटयसंस्थेच्या माध्यमातून त्यांनी एका लग्नाची गोष्ट, कबड्डी कबड्डी, चार दिवस प्रेमाचे, मोरुची मावशी अशा एकाहून एक सरस विक्रमी नाटकांची निर्मिती केली. नाटकांच्या तारखा वाटपात प्रचंड उलाढाल करणारे निर्माते म्हणून सुधीर भट नेहमीच चर्चेत राहिले. त्यांचे सुरुवातीला मोरुची मावशी हे नाटक प्रचंड गाजले. ‘ती फुलराणी’, ‘तरुण तुर्क म्हातारे अर्क’, ‘एका लग्नाची गोष्ट’, ‘चार दिवस प्रेमाचे’, ‘हीच तर प्रेमाची गंमत आहे’ या नाटकांना सुध्दा प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद दिला. मराठी नाटक सातासमुद्रापार युरोप, अमेरिकेत नेण्यासाठी त्यांनी बरेच प्रयत्न केले. त्यांच्या नाटकांना परदेशातही उत्तम प्रतिसाद मिळाला.

    जुन्या नाटकांचे पुनरुज्जीवन, नाटकांचे परदेश दौरे, नवे विषय हाताळणे आणि नाट्यप्रयोगांचे विक्रम ही त्यांची वैशिष्ट्ये होती. नटांची अत्यंत काळजी घेणारे, इंटिरियर डिझायनिंग करणारे, उत्तम खवय्ये आणि तेवढ्याच प्रेमाने खाऊ घालणारे म्हणून भट प्रसिद्ध होते. "मोरूची मावशी‘ हे नाटक प्रचंड गाजले. मात्र, "गांधी विरुद्ध गांधी‘ या नाटकाने व्यवसायात त्यांना खोट दिली. पण ते कधीच मागे हटले नाहीत. विजय चव्हाण, सुनील बर्वे, प्रशांत दामले यांची कारकीर्दही त्यांनी उभी केली.

    सुधीर भट यांचे निधन १४ नोव्हेंबर २०१३ रोजी झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • मेधा पाटकर

  • वाचकप्रिय ब्लॉगर व लेखक भाऊ तोरसेकर

    भाऊ तोरसेकर हे सुप्रसिद्ध ज्येष्ठ पत्रकार, वाचकप्रिय ब्लॉगर व लेखक असून स्थानिक राजकारणापासून ते आंतरराष्ट्रीय घडामोडींवर सडेतोड भाष्य करण्यात त्यांची हातोटी आहे.