जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
१९६० ते १९७२ या काळात मराठी रंगभूमीवर संगीत नाटक परंपरेचे पुनरुज्जीवन घडून आले. या काळात नाट्यसंगीताला नवसंजीवन देणाऱ्या प्रमुख गायक-नटांमध्ये प्रसाद सावकार हे अग्रणी होते. त्यांचा आवाज भरदार व श्रवणमधुर, वाणी स्वच्छ व शुद्घ आणि गायकीत आवश्यक त्या करामती, ताना व हरकती असल्याने त्यांच्या गाण्यांची श्रोत्यांवर सहज छाप पडते. छोटा गंधर्व यांना त्यांनी श्रवणगुरू मानले.
September 16, 2019
कंपनी कायद्याच्या क्षेत्रात चंद्रशेखर ऊर्फ बाबूराव रेळे यांचे नाव मोठे असले तरीही संगीताच्या क्षेत्रातील त्यांचे योगदान तेवढेच मोलाचे असल्याची माहिती कायद्याच्या क्षेत्रातील फार थोडय़ा लोकांना असेल. आज मुंबईत राहणाऱ्या सव्वा कोटी लोकांपैकी कितीजण अस्सल मुंबईकर असतील, हे शोधावेच लागेल.
पण बाबूराव रेळे यांच्या पूर्वजांचा जो काही ज्ञात इतिहास उपलब्ध आहे, तो पाहता, मूळचे मुंबईचे असे जे काही थोडे लोक आज असतील, त्यात त्यांच्या कुटुंबाचा समावेश करावा लागेल. मुंबईतील खंबाला हिल भागातील जायफळाची बाग बाबूरावांच्या पणजोबांच्या मालकीची होती. त्यामुळे घरून काही मिळवण्यासाठी काही करण्याचा आग्रह असण्याची शक्यता नव्हती. पण रेळेंनी आपले सारे आयुष्य संपन्नपणे जगण्यासाठी अगदी लहान वयातच प्रयत्नांना सुरुवात केली होती. जे मनापासून आवडते, ते करण्यासाठी कष्ट पडत नाहीत, हे त्यांना लवकर उमगले असावे. त्यामुळेच त्यांनी कायद्याचा अभ्यास सुरू करण्याच्या कितीतरी अगोदर, तेव्हा मुंबईत नव्याने सुरू झालेल्या प्रो. बी. आर. देवधर स्कूल ऑफ म्युझिकमध्ये १९३५ मध्ये, म्हणजे वयाच्या आठव्या वर्षीच आपले नाव दाखल करून टाकले होते. आपल्याला संगीताची विशेष आवड आहे आणि ती जोपासण्यासाठी शास्त्रशुद्ध शिक्षण घेणे आवश्यक आहे, याची जाण त्यांच्या दोन्हीकडच्या आजोबांना होती. १९३६ मध्ये याच संगीत शाळेत दाखल होण्यापूर्वी कुमार गंधर्व नावाच्या मुलाने साऱ्या देशात आपल्या अपूर्व गायनाने ख्याती मिळवली होती. बाबूराव आणि कुमारजी यांच्यातील मैत्रीचे धागे इतके घट्ट झाले की, हे दोघेही एकमेकांशिवाय राहणे अशक्य झाले. संगीतातील आनंद निर्माण करण्याच्या प्रज्ञेचा कुमारांनी केलेला अपूर्व प्रयोग घडत असताना त्यांच्या अगदी जवळ असे जे काही थोडेचजण होते, त्यात बाबूरावही होते. संगीताकडे पाहण्याची त्यांची दृष्टी वैज्ञानिकाची होती. ही दृष्टी प्रो. बी. आर. देवधर यांच्याकडूनच मिळाली असणार हे नक्की! कारण देवधर मास्तर हे केवळ संगीत शिक्षक नव्हते, ते संगीताबद्दल मूलगामी चिंतन करणारे होते. त्यामुळे ग्वाल्हेर गायकीचे ज्येष्ठ कलावंत विष्णू दिगंबर पलुस्कर यांच्याकडे संगीत शिकल्यानंतरही त्यांनी आपली दृष्टी सतत विस्फारित ठेवली. इतर घराण्यांचे गाणे ऐकायलाही दुरापास्त असताना देवधर मास्तर आपल्या विद्यार्थ्यांसाठी अनेक नामवंत कलावंतांचे कार्यक्रम आयोजित करत असत. कुमारजी आणि बाबूराव यांच्याकडे संगीताकडे पाहण्याची जी वेगळी नजर होती, त्याचे मूळ इथे आहे. बाबूरावांनी आयुष्यभर कायद्याच्या क्षेत्रात काम केले, पण त्यांचे सुखनिधान संगीत हेच राहिले. मैफली गवई व्हायचे नाही, असे काही त्यांनी ठरवले नव्हते. पण त्यांनी मैफली करण्यापेक्षा संगीतावर चिंतन करणे अधिक पसंत केले आणि संगीतावर ग्रंथ लिहिले. ‘स्वरप्रवाह’ हे संगीतातील थाट पद्धतीचे विश्लेषण करणारे त्यांचे पुस्तक महत्त्वाचे ठरले आहे. कायद्याच्या क्षेत्रात काम करीत असतानाही त्यांनी संशोधन करून पीएच.डी. संपादन केली. ‘स्वरप्रवाह’ हा या संशोधनाचाच ग्रंथ. बाबूरावांनी स्वत: काही बंदिशींच्या रचनाही केल्या होत्या. अशा सुमारे सव्वाशे बंदिशींचा ‘गुंजन’ हा संग्रहही त्यांनी प्रकाशित केला होता. कुमार गंधर्व यांच्या अपूर्व मैत्रीचा ठेवा उलगडून दाखवणारे ‘कुमार माझा सखा!’ हे पुस्तकही नुकतेच प्रकाशित झाले आहे. आयुष्याच्या संध्याकाळी गाता गाता मृत्यू यावा असे संगीताच्या क्षेत्रात काम करणाऱ्या कलावंताचे एक स्वप्न असते. बाबूरावांच्या बाबतीत ते सत्यात उतरले. संगीतावर व्याख्यान देत असतानाच त्यांना मृत्यूने निमंत्रण दिले. त्यांच्या निधनाने विसाव्या शतकाच्या पूर्वार्धातील संगीताच्या इतिहासाचा साक्षीदार आपल्यातून निघून गेला आहे.
August 5, 2017
सुभाष गुप्ते हे लेगस्पिनचे बादशहा. ३६ कसोट्यांमधून १४९ बळी मिळविलेले सुभाष गुप्ते हे आंतरराष्ट्रीय क्षितिजावरील सर्वाधिक चमकदार फिरकीपटूंपैकी एक होते. फलंदाजाने आक्रमक रूख़ अंगिकारल्यास मात्र गुप्ते काहीसे धास्तावतात असेही निरीक्षण या संघातील खेळाडूंनी नोंदविलेले आहे.
December 11, 2021
काव्यसुर्य मंगेश पाडगावकर यांच्या सौभाग्यवती यशोदा पाडगावकर यांनी “कुणास्तव कुणीतरी“ हे २००० रोजी प्रकाशित झालेल्या दर्जेदार आत्मचरित्राद्वारे साहित्यचिश्वात ओळख व किर्ती प्राप्त केली. त्यांच्या विलोभनीय लेखनकौशल्यांद्वारे त्यांनी त्यांच्या जीवनात त्यांना आलेले अनुभव, व त्यांचे पती मंगेश पाडगांवकर गुणदोषांवर अचूक टिपणी यांची सुरेख गुंफण साधीत, या आत्मवृत्ताला एका वेगळ्याच उंचीवर नेवून ठेवले आहे.
January 14, 2015
कोणत्याही शुभसमारंभाचे दोन महत्वाचे भाग : भोजन हे रुचकर व संयोजन हे नीटनेटके झाले पाहिजे हा विचार त्यांच्या मनात सतत बळावत होता. भाऊ जोशी व गोखले काका यांनी एकत्र येऊन त्यावेळी ५०५० रुपये भांडवलावर “शुभसमारंभाचे संयोजक” या व्यवसायास सुरुवात केली.
January 2, 2022
लहानपणापासूनच अतिशय हुशार आणि अंगी ज्ञानलालसा असल्यामुळे मॅट्रिकच्या परीक्षेत बॅरिस्टर नाथ पै हे चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण झाले. त्यांचा जन्म २५ सप्टेंबर १९२२ रोजी झाला. विद्यार्थी दशेतच स्वातंत्र्य चळवळीत घेतलेल्या सहभागामुळे त्यांनी तुरुंगवास भोगला होता. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असतांनाही, आर्थिक मदत मिळवून ते बॅरिस्टर होण्यासाठी इंग्लंडला गेले होते. बॅ. पै यांचे मराठी व इंग्रजीवर कमालीचे प्रभुत्व होतेच, शिवाय ते उत्तम जर्मनही बोलत असत.
इंग्लंडमध्येच असताना त्यांचे समाजावादी विचारवंत नेत्यांशी संबंध जुळून आले. त्यामुळे त्यांच्या विचारांवर समाजवादी विचारांचा प्रभाव होता. पुढे त्यांनी प्रसमाजवादी पक्षाचे नेतेपण स्वीकारले. उत्कृष्ट वक्तृत्वकला आणि कोणत्याही गोष्टीचा चिकित्सक अभ्यास करण्याची वृत्ती या गुणांवर भारतीय संसदेत एक उत्कृष्ट संसदपटू म्हणून त्यांनी नाव मिळवले. भारतीय घटनेवर त्यांचा सखोल अभ्यास होता. त्यामुळे संसदीय कामकाज आणि त्यातील बारकावे याबद्दल त्यांचे ज्ञान वाखाणण्यासारखे होते. त्यांचे पाठांतर उल्लेखनीय होते. मराठी, हिदी, संस्कृत आणि इंग्रजी या भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते. स्वातंत्र्यपूर्व काळात भूमिगत चळवळीत काम करणार्या नाथ पै यांनी स्वातंत्र्योत्तर काळात साराबंदी आणि सीमाप्रश्नावर आंदोलन उभे केले.
निर्भयपणा, स्पष्टवक्तेपणा आणि अभ्यासू वृत्ती असलेला सुसंस्कृत राजकारणी म्हणून बॅरिस्टर नाथ पै प्रसिद्ध होते. महाबळेश्वर येथे भरलेल्या १९७० च्या मराठी साहित्य संमेलनाचे ते उद्घाटक होते. संसदेतील त्यांची अनेक भाषणे गाजली. त्यांची भाषणे ऐकण्यासाठी पं नेहरू सभागृहात येऊन बसत. कोकणातील राजापूर मतदार संघातून ते १९५७, ६२ व ६७ अशा तीन निवडणुकांत प्रजा समाजवादी पक्षाच्या तिकिटावर लोकसभेत निवडून आले. आज अस्तित्वात असलेली 'कोकण रेल्वे'ची मूळ कल्पना त्यांनीच संसदेत 'किनारपट्टी रेल्वे' म्हणून मांडली होती. बॅरिस्टर नाथ पै यांचे १८ जानेवारी १९७१ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
October 3, 2017
"बोला अमृत बोला...‘, "आला खुशीत समिंदर...‘ "क्षण आला भाग्याचा...‘ यांसारख्या मधाळ गीतांनी एकेकाळी मराठी रसिकांच्या आयुष्यात आनंदाचे मळे फुलविणाऱ्या ज्योत्स्ना भोळे या पूर्वाश्रमीच्या दुर्गा केळेकर. त्यांचा जन्म ११ मे १९१४ रोजी झाला. बालपणापासून त्यांना गायनाची व अभिनयाची आवड होती.
ज्योत्स्ना भोळे यांना रंगभूमीवरील पहिल्या अभिनेत्रीचा मान मिळाला. ज्योत्स्नाबाईंना अभिनया प्रमाणे आवाजाची दैवी देणगी होती. वयाच्या १८ व्या वर्षी त्यांनी प्रथम ‘आंधळ्यांची शाळा’ या नाटकात भूमिका केली. या नाटकाचा प्रथम प्रयोग दि. १ जुलै १९३३ रोजी मुंबईच्या रिपन थिएटरमध्ये झाला. या नाटकात त्यांनी नायिकेची म्हणजेच बिंबाची भूमिका केली.या नाटकाचे मुंबई व पुणे येथे शंभराहूनअधिक प्रयोग झाले. कंठसंगीतासाठी इतर गायिकांपेक्षा अगदी वेगळा असा खास आवाज होता. विवाहानंतर १९३३ साली त्यांचे पती केशवराव भोळे यांनी ‘नाट्यमन्वंतर’ ही संस्था काढली. या संस्थेने अनेक नाटकांचे प्रयोग केले.
‘अलंकार’ नाटकात वत्सलेची, ‘आराधना’त देवकीची, ‘आशिर्वाद’मधील सुमित्रा, ‘एक होता म्हातारा’तील उमा, ‘कुलवधू’ मधील भानुती, ‘कोणे एके काळी’ मधील कल्याणी, ‘धाकटी आई’ मधील वीणा,‘भूमिकन्या सीता’मधील सीता, ‘रंभा’तील सुगंधा, ‘राधामाई’ मधील राधा तर‘ विद्याहरण’ मधील देवयानी अशा अनेक नाटकातील त्यांच्या भूमिका गाजल्या. या नाटकातील पदे त्यांनी गाऊन अजरामर केली. १ मे १९६० रोजी संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेच्या दिवशी शिवाजीपार्क येथे झालेल्या कार्यक़्रमात त्यांनी कै. श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांचे ‘बहु असोत सुंदर संपन्न की महा प्रियअमुचा एक महाराष्ट्र देश हा’ हे गीत गाऊन एक इतिहासच रचला.
यागीताला शंकरराव व्यास यांनी संगीतबद्ध केले. या गीताने महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कै. यशवंतराव चव्हाण भारावले.ज्योत्स्नाबाईंना अभिनय, गायन याबरोबर साहित्याचीही आवड होती.त्यांनी ‘आराधना’ या नाटकाचे लेखन केले. त्या अनेक वर्षे ‘महाराष्ट्र कल्चरलसेंटर’च्या अध्यक्षा होत्या. १९९९ साली त्यांना महाराष्ट्र शासनाचा ‘लतामंगेशकर पुरस्कार’ तर पुणे महानगरपालिकेतर्फे ‘बालगंधर्व पुरस्कार’असे अनेक पुरस्कार मिळाले. अनुबंध प्रकाशन या संस्थेने त्यांचे आत्मचरित्र ‘तुची ज्योत्स्ना भोळे’ हे प्रकाशित केले आहे.
ज्योत्स्ना भोळे यांचे निधन ५ ऑगस्ट २०११ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
ज्योत्स्ना भोळे यांची गाणी
https://www.youtube.com/watch?v=ytNtDJ9Yq38
August 5, 2017
नाटककार, कथाकार आणि पटकथाकार म्हणून सर्वांना परिचित असलेलं नाव म्हणजे मधुसूदन कालेलकर.
मधुसूदन कालेलकर यांचा जन्म २२ मार्च १९२४ रोजी झाला. त्यांचे मॅट्रिक पर्यंतचे शिक्षण वेंगुर्ले या गावी झाले. त्यानंतर त्यांनी मुंबईत वास्तव्य केले.
साहित्य हा त्यांचा आवडता विषय होता तर नाटकाविषयी प्रेम होते. अखेर जमलं या मराठी चित्रपटासाठी त्यांनी विनोदी कथा लिहिली आणि तो चित्रपट चांगलाच गाजला. राजा नेने ह्यांच्या हाताखाली काम करून त्यांनी चित्रीकरण आणि पटकथा लेखन यांचा अनुभव मिळविला. त्यानंतर फिल्मिस्तान या संस्थेत त्यांना सेवा करण्याची संधी मिळाली.
त्यांची पटकथा असलेले एकाहून एक दर्जेदार चित्रपट यशस्वी होऊ लागले आणि सिद्धहस्त पटकथा लेखक म्हणून त्यांचा लौकिक झाला. एका मागोमाग एक असे त्यांचे ७५ पेक्षा जास्त चित्रपट प्रदर्शित झाले. आलिया भोगासी, पहिले प्रेम, पतिव्रता, सप्तपदी, ह्याला जीवन ऐसे नांव, हा माझा मार्ग एकला इ. अनेक गाजलेले चित्रपट त्यांच्या नावावर आहेत.
चित्रपटाबरोबर प्रेक्षकांची आवड ओळखून त्यांनी विपूल नाट्यलेखन केले. १९६३ साली दिल्या घरी तू सुखी रहा हे रंगभूमीवर आलेले नाटक खुपच गाजले. त्यानंतर त्यांनी लिहिलेली बरीच नाटकं यशस्वी झालीत. शंभराच्यावर त्यांचे प्रयोग झाले.
स्वातंत्र्य लढ्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी लिहिलेले उद्याचे जग हे कालेलकरांचे पहिले नाटक. एकंदर तीसच्या वर त्यांची नाटकं प्रदर्शीत झाली. त्यात त्यांनी अनेक विषय हाताळले आहेत. कौटुंबिक, गंभीर, विनोदी आणि सामाजिक सुद्धा. अपराध मीच केला, दिवा जळू दे सारी रात, आसावरी, ही वाट दूर जाते, अबोल झालीस कां, कल्पवृक्ष कन्येसाठी, चांदणे शिपीत जा, या घर आपलंच आहे, नाथ हा माझा, डार्लिंग डार्लिंग, हे फुल चंदनाचे, अमृतवेल, शिकार, आणि माधवराव पेशव्यांच्या जीवनावर आधारित ही श्रींची इच्छा ही सर्व त्यांची लोकप्रिय अशी नाटकं. सहज भाषा आणि पकड घेणारे संवाद त्यामुळे ही नाटकं चित्ताकर्षक ठरली.
मधुसूदन कालेलकर यांचे १७ डिसेंबर १९८५ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
January 3, 2017
मराठीतील किंग ऑफ कॉमेडी पर्सन व मराठी चित्रपट सृष्टीतील सुपर स्टार अभिनेते भरत जाधव यांचा जन्म १२ डिसेंबर १९७३ रोजी झाला.
भरत जाधव हे मराठी रंगभूमी आणि चित्रपट क्षेत्रातील एक अग्रगण्य नाव. भरत जाधवचा जन्म लालबाग – परळ परिसरात झाला. तिथेच भरत जाधवचं बालपण गेले. भरत जाधव यांनी शाहिर साबळे यांच्या मार्गदर्शना खाली "लोकधारा" मधून आपली अभिनय यात्रा सुरु केली.
भरत जाधव यांनी आपल्या आजवरच्या कारकिर्दीत जवळपास ८५ चित्रपट, आठ दूरचित्रवाणी मालिका केल्या तरी नाटकांमुळे ते अधिक लक्षात राहिला आहेत. गिरणी कामगारांच्या जीवनावर प्रकाश टाकणारे सीरियस ‘अधांतर’ नाटक असो किंवा ‘ऑल द बेस्ट’, ‘श्रीमंत दामोदरपंत’, ‘आमच्यासारखे आम्हीच’, ‘ढॅण्ट ढॅण’ आणि ‘सही रे सही’ ही कॉमेडी नाटके. भरत जाधव यांची भूमिका नेहमीच ‘फ्रेश’ वाटली. पूर्वीचे ‘सही रे सही’ आणि आताचे ‘पुन्हा सही रे सही’ नाटक त्याच्या नाटय़ कारकिर्दीतील मैलाचा दगड ठरले. या नाटकाचे हजारो प्रयोग झालेत.
तब्बल १५ वर्षे हे नाटक सलगपणे सुरू आहे. ‘सही रे सही’ या नाटकात भरत जाधवने गलगले, कुरियर घेण्यासाठी आलेला माणूस, श्रीमंत म्हातारा व वेडसर मुलगा अशा चार भूमिका केल्या आहेत. या नाटकाचे एका वर्षात ५६५ प्रयोग झाले होते. त्यासाठी त्याची नोंद गिनीज बुकमध्ये झाली होती. ‘सही रे सही’ या नाटकाचे ‘अमे लई गया, तमे रही गया’ या नावाने गुजराती भाषेत प्रयोग झाले. त्यात शर्मन जोशीने प्रमुख भूमिका केली होती. गुजराती ‘सही रे सही’ नाटकाचे २० महिन्यांत ३५० प्रयोग झाले होते. एखाद्या नाटकाचे इतके प्रयोग होणे, हे गुजराती रंगभूमीवर प्रथम घडले होते.
‘सही रे सही’ नाटकाचे ‘हम ले गये, तुम रह गये’ या नावाने हिंदीत भाषांतर झाले. हिंदी नाटकात जावेद जाफरीने प्रमुख भूमिका साकारली होती. भरत जाधव निर्मिती क्षेत्रात असून 'भरत जाधव एन्टरटेन्मेंट' या नावाने कार्यरत आहे. मराठी चित्रपटसृष्टी बॉलीवूडइतकी श्रीमंत नसली तरी मराठीतला सुपस्टार भरत जाधवने सर्वप्रथम स्वत:ची व्हॅनिटी व्हॅन विकत घेऊन आद्य नटाचा मान मिळवला आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
भरत जाधव यांची प्रमुख नाटके- सही रे सही, श्रीमंत दामोदर पंत, ऑल द बेस्ट, आमच्या सारखे आम्हीच
भरत जाधव यांची चित्रपट- श्रीमंत दामोदर पंत, खो खो, फेकमफाक, नो एंट्री पुढे धोका आहे, डावपेच, क्षणभर विश्रांती, रिंगा रिंगा, शिक्षणाच्या आयचा घो, जावई बापू जिंदाबाद, गलगले निघाले, साडे माडे तीन, मुंबईचा डबेवाला, मुक्काम पोस्ट लंडन, हय़ांचा काही नेम नाही, बकुळा नामदेव घोटाळे, नाना मामा, माझा नवरा तुझी बायको, नामदार मुख्यमंत्री गणप्या गावडे, चालू नवरा भोळी बायको, जत्रा, खबरदार, पछाडलेला, सरीवर सरी, हाऊसफुल्ल, नव-याची कमाल, बायकोची धमाल, खतरनाक, वास्तव, हसा चकटफू.
October 29, 2019
एन. चंद्रा हे मुळचे गोव्याचे, एन.चंद्रा यांचे पूर्ण नाव चंद्रशेखर नार्वेकर, रोजगारासाठी एन.चंद्रा यांचे वडील मुंबईत गेले व तिथेच स्थायिक झाले.
एन चंद्रा हे मराठी मध्यमवर्गीय कुटुंबातील. त्यांचा जन्म ४ एप्रिल १९५२ रोजी झाला.एन चंद्रा यांची आई बृहन्मुंबई महानगरपालिकेत क्लार्क तर वडील फिल्म सेंटर लॅबमधील ब्लॅक अँड व्हाइट डिपार्टमेंटचे प्रमुख. आईला प्रवासाची अत्यंत आवड. शालेय शिक्षण पूर्ण केल्यावर त्यांनी सायन्स साइडला कॉलेजात प्रवेश घेतला व नंतर वडिलांच्या मदतीने फिल्म सेंटर लॅबमध्ये त्या काळातील प्रसिद्ध चित्रपट संकलक वामन भोसले व गुरुदत्त यांचा सहाय्यक म्हणून संकलन डिपार्टमेंटमध्ये नोकरी केली. त्यादरम्यान वामन भोसले ‘मेरे अपने’ या गुलजार दिग्दर्शित चित्रपटाचं संकलन करीत होते व एन चंद्रा त्यांना सहाय्य करीत होते.
एडिटिंगच्या काळात बऱ्याचदा गुलजार साहेब लॅबमध्ये येत असत. ‘मेरे अपने’चं एक शेडय़ुल सुरू होतं तेव्हाचा हा प्रसंग. शॉटची सर्व तयारी झाली. गुलजारनी ‘स्टार्ट साऊण्ड’ असं म्हटलं परंतु शॉट सुरू होण्यापूर्वी क्लॅप द्यावा लागतो तो क्लॅपर बॉयने दिलाच नाही. ‘अरे, क्लॅपर बॉय कुठे आहे?’ अशी सेटवर शोधा शोध सुरू झाली. तर क्लॅपर बॉय सेटवर नव्हता व क्लॅपही नव्हता. काही क्षणांतच कळलं की क्लॅपर बॉय स्टुडिओच्या कँटीनमध्ये ज्युनिअर आर्टिस्ट मुलीशी गप्पा मारत बसला आहे. बस्स्, हे कळल्यावर गुलजार यांच्या रागाचा पारा इतका चढला की त्यांनी त्याच क्षणी क्लॅपर बॉयची हकालपट्टी केली. ही गोष्ट ‘फिल्म सेंटर’मध्ये एन चंद्रा यांच्या कानावर आल्यावर त्यांनी गुलजार यांना क्लॅपर बॉय म्हणून काम करण्याबाबत विचारायचं ठरवलं. व ते गुलजार यांना क्लॅपर बॉयचे काम करू लागले.
‘मेरे अपने’नंतर गुलजार यांनी ‘परिचय’ हा चित्रपट सुरू केला. त्यात एन चंद्रा यांनी गुलजार यांचे असिस्टंट म्हणून काम केले. नंतर एन चंद्रा यांनी १०-११ वर्षे गुलजार यांच्या बरोबर ‘आंधी’, ‘कोशिश’, ‘खुशबू’, ‘मौसम’, ‘किनारा’, ‘किताब’, ‘नमकीन’, आदी चित्रपट केले.
एन. चंद्रा यांनी चित्रपटसृष्टीत संकलक, दिग्दर्शक, निर्माता, कथा व पटकथा लेखक अशा विविधांगी भूमिका पार पाडल्या आहेत. त्यांचे सामाजिक, राजकीय निरीक्षण सूक्ष्म असून ते परिणामकारकरित्या कथा, पटकथेत गुंफतात. त्यामुळे त्यांचे सुरवातीचे प्रतिघात, अंकुश, तेजाब हे चित्रपट आजही अपील होतात.
एन चंद्रांची खरी ओळख म्हणजे ‘अंकुश’ हा चित्रपट. वर्तमानकालिन सामाजिक परिस्थितीचा योग्य वापर करून त्याचा कुशल उपयोग चंद्रांनी चित्रपटात केला.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
एन. चंद्रा यांनी दिग्दर्शित केलेले चित्रपट
प्रतिघात, अंकुश, तेजाब, नरसिंहा, तेजस्विनी, युगांधर, हमला, बेकाबू, वजूद, स्टाईल, एक्सक्यूज मी, शिकारी, कगार-लाईफ ऑन द एज
Chandrashekhar Narvekar, N. Chandra
April 15, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti