(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

  • माधवराव शिंदे

    राजमाता विजयाराजे शिंदे यांचे चिरंजीव माधवराव शिंदे यांनी राजकारणात प्रवेश करत १९७१ मध्ये गुना लोकसभा मतदारंसघातून निवडणूक लढवली आणि जिंकली. त्यानंतर १९८४ पर्यंत ते गुनातून खासदार म्हणून निवडून आले.

  • चिंतामणी त्र्यंबक खानोलकर ऊर्फ आरती प्रभू

    शाळेत असल्यापासून आरती प्रभू या नावानेच कविता करत होते आणि त्यांची पहिली कविता श्री. पू. भागवत यांनी सत्यकथेत छापली होती. त्यांचा जन्म ८ मार्च १९३० रोजी कुडाळ येथे झाला. आरती प्रभू यांच्या आईंचे कुडाळला ‘विणा गेस्ट हाऊस ’होतं, आणि खानावळ होती. कोकणातील गावी त्यांच्या मातोश्री खानावळ चालवीत. तेथे गल्ल्यावर बसुन मा.आरती प्रभू कविता करत. त्यांच्या खानावळीत जेवायला येणार्या काही मंडळींनी त्यांच्या कवितेचे काही कागद चोरून त्या कविता आरती प्रभू या नावाने 'मौज' मधे छापण्यास पाठवुन दिल्या. मौज' च्या अंकात आपल्या कविता प्रकाशित झाल्याचे बघून मा.आरती प्रभू बावरून गेले. प्रथम लोणावळ्याच्या वसतीगृहात ते नोकरीला होते. बहुतेक त्यावेळीच त्यांनी कर्जतला जागा घेतली. लोणावळ्याची नोकरी सुटली. मग काही वर्षे त्यांनी आकाशावाणीत नोकरी केली. ते काही वर्षे युनिव्र्हसिटीत होते, मात्र कुठल्याच नोकरीत त्यांनी स्वत:ला अडकवून घेतलं नव्हतं. नोकरी सोडताना आपल्या कुटुंबाचे अथवा स्वत:चे त्यांना भान नसायचे. त्यांच्यातील कवी निसर्गात आकंठपणे बुडालेला होता. त्यामुळे त्यांच्या बहुतेक सर्व कवितांमध्ये निसर्गच चित्रित केलेला असत. अशा त्यांच्या या कवितांचा कवितासंग्रह जोगवा मौज प्रकाशनाने प्रकाशित केला. क्षणात प्रतिभेचे तेजनृत्य तर क्षणात विक्षिप्त स्वभावाची कतृत्त्वावर मात, असा नियतीचा सतत चाललेला खेळ त्यांना सातत्याने अनुभवावा लागला. श्री. पु. भागवत, मंगेश पाडगांवकर, मधु मंगेश कर्णिक, विजय तेंडुलकर यांच्यासारख्या प्रतिभावंत मित्रांनी खानोलकरांच्या प्रतिभेचा चमत्कार ओळखून त्यांना सतत मदत केली. त्यांच्या गीतांना चाली लावण्यासाठी स्वतः हृदयनाथ मंगेशकर पुढे आले आणि या दोन प्रतिभावंताच्या किमयेतून ‘ये रे घना', ‘नाही कशी म्हणू तुला’सारखी गीते अमर झाली. सतत कवितेच्या धुंदीत वावरणारा या माणूसाने ‘रात्र काळी घागर काळी’ सारखी कादंबरी लिहिली ‘ माकडाला चढली भांग ’नाटकाला त्यांना अंत्र्याकडून शाबासकीही मिळवली. आधुनिक नाटककारांबद्दल काही माहिती नसताना केवळ अभिजात प्रतिभेने ‘एक शून्य बाजीराव’ सारखे त्यांनी नाटक लिहिले आणि रंगायन सारख्या संस्थाने ते रंगभूमीवर आणले. कोंडूरा या त्यांच्या कादंबरीचा विषय अजब होता आणि त्या कादंबरीवर मा. सत्यजित रे यांना पण चित्रपट काढवा असे वाटते. त्याच्या चानी या कादंबरी ही मा.व्ही.शांताराम यांना मोहात टाकते व ते चानी हा चित्रपट काढतात. त्यांचे अजब न्याय वर्तुळाचे या नाटकाचे प्रयोग जर्मनी पण झाले. "नक्षत्रांचे देणे" साठी त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार देखील मिळाला. आरती प्रभू यांचे २६ एप्रिल १९७६ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

    आरती प्रभू यांच्या कन्या सौ. हेमांगी नेरकर यांच्याशी साधलेल्या संवादातून आरती प्रभू यांचे व्यक्तिमत्त्व प्रहार मधील लेख वाचण्यासाठी क्लिक करा.

    http://prahaar.in/%E0%A4%A8%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%AD%E0%A4%B2/

  • अभिनेत्री एलिझाबेथ टेलर

    लिझ टेलरचे सौदर्य हाही एक चमत्कार म्हणा किंवा त्यावेळी चर्चेचा विषय होता. ‘ ‘ क्लियोपात्रा ‘ मधील गालिच्यांमधून होणारी तिची ‘ एन्ट्री ‘ आजही कोणीही जाणकार विसरू शकत नाही.

  • ज्येष्ठ अभिनेते चित्तरंजन कोल्हटकर

    कॅमेऱ्यासमोर आपण उभे राहिलो, की आपल्यासारखा दुसरा कलाकार कुणी नाही, हा शांता आपटे यांचा गुरुमंत्र जपणारे चित्तरंजन कोल्हटकर हे सर्वार्थाने महान रंगकर्मी होते. त्यांचा जन्म १५ जानेवारी १९२३ रोजी अमरावती येथे झाला.

    घराणेशाहीचा वरदहस्त लाभलेले, नटश्रेष्ठ मा.चिंतामणराव कोल्हटकर यांचे सुपुत्र चित्तरंजन कोल्हटकर यांनी वडिलांचा अभिनयाचा वारसा तितक्याच सामर्थ्यांनं तब्बल ६० वर्षे मराठी रंगभूमीवर चालविला. वडिलांच्या ‘बलवंत संगीत नाटक मंडळी’मुळे नाटकाचा वारसा चित्तरंजन कोल्हटकर यांच्याकडे आला असला तरी चिंतामणरावांना मात्र प्रारंभी आपल्या मुलाने नाटकात यावे असे मुळीच वाटत नव्हते. त्याने उत्तम शिक्षण घेऊन बॅरिस्टर व्हावे आणि राष्ट्रकार्य करावे, अशी त्यांची मनोमन इच्छा होती. त्यासाठीच त्यांनी देशभक्त बॅ. चित्तरंजन दास यांच्या नावावरून आपल्या या मुलाचे नाव ‘चित्तरंजन’ ठेवले होते. परंतु चित्तरंजनने बॅरिस्टर व्हावे, ही त्यांची इच्छा फलद्रुप होऊ शकली नाही. चित्तरंजन कोल्हटकरांनी प्राथमिक शिक्षण घेतले आणि ते पोटापाण्यासाठी नोकरी शोधू लागले. मुंबईत अॅीम्युनिशन फॅक्टरीत त्यांना नोकरी मिळालीही. परंतु तिथे त्यांच्यावर चोरीचा आळ घेतला गेल्याने स्वाभिमानी चित्तरंजननी नोकरीसह मुंबईही सोडली. त्यांना सैन्यात भरती व्हायचे होते. परंतु उंची आणि वजनात मार खाल्ल्याने तिथे त्यांची डाळ शिजली नाही. मुलाचे कुठेच काही जमत नाही, हे पाहिल्यावर त्याला बेकार बसू देणे धोक्याचे आहे, हे ओळखून चिंतामणरावांनी त्यांना आपल्या नाटक कंपनीत प्रॉम्प्टरचे काम दिले. नाटक कंपनीचे मालक असलेल्या दुसऱ्या कुणा बापाने मुलाला एखाद्या नाटकात मुख्य नट म्हणून उभे केले असते. परंतु चिंतामणरावांनी तसे केले नाही. त्यामुळे एक झाले- अनेक नाटकांत प्रॉम्प्टर म्हणून काम केल्याने आणि प्रॉम्प्टरला सबंध नाटकभर दक्ष राहावे लागत असल्याने चित्तरंजनना अनेक नाटके मुखोद्गत झाली. त्याच वेळी वडिलांच्या नाटकांच्या तालमींतून हजर राहिल्याने त्यांची नाटक बसविण्याची पद्धत, संवादफेकीचं तंत्र, रंगमंचीय व्यवहारांतील मेख, बडय़ा नटांच्या अभिनयातील खाचाखोचा यांचे प्रत्यक्षाप्रत्यक्ष शिक्षण त्यांना मिळत गेले. तरीही चिंतामणरावांनी त्यांना नाटकात घेण्याचे मनावर घेतले नाही. परंतु एके दिवशी काही अडचणीमुळे ‘भावबंधन’मधील बावळट मोरूचे काम करण्याची संधी चिंतामणरावांनी चिरंजीवांना दिली. त्या छोटय़ा कामात चित्तरंजननी हुकमी हशे वसूल करून वडिलांचा विश्वास सार्थ ठरवला. आणि तेव्हापासून कंपनीच्या नाटकांतून चित्तरंजनना छोटय़ा छोटय़ा भूमिका मिळू लागल्या. पण वसंत शिंदे, जयराम शिलेदार यांच्यासारखे बडे नट कंपनीत असेतो चित्तरंजनना कधीही मोठी भूमिका मिळाली नाही. या नटांनी कंपनी सोडल्यावर ‘युद्धाच्या सावल्या’त मारवाडी, ‘भावबंधन’मधील घन:श्याम, ‘पुण्यप्रभाव’मध्ये नुपूर अशा महत्त्वाच्या भूमिका चित्तरंजन यांच्याकडे आपसूक चालत आल्या. विनोदी आणि गंभीर अशा दोन्ही भूमिका चित्तरंजन एव्हाना लीलया पेलू लागले होते. याच काळात बोलपटांमुळे नाटकाच्या व्यवसायावर विपरीत परिणाम झाला आणि चिंतामणरावांची नाटक कंपनी बंद पडली. चित्तरंजन यांच्यावर बेकारीची कुऱ्हाड कोसळली. तेव्हा नाइलाजाने ते मुंबईच्या नाटकांतून ‘नाइट’वर कामे करू लागले. याच दरम्यान त्यांना ‘गरिबांचे राज्य’ या बोलपटात एक छोटीशी भूमिका मिळाली आणि त्यांचा चित्रपटक्षेत्रात प्रवेश झाला. या चित्रपटातले त्यांचे काम भालजी पेंढारकरांना इतके आवडले, की त्यांनी ‘मी दारू सोडली’ या त्यांच्या चित्रपटात चित्तरंजनना घेतले. आणि इथून त्यांचे चित्रपटसृष्टीत बस्तान बसले. यशस्वी खलनायकी भूमिकांबरोबरच काही चित्रपटांतून त्यांनी नायकाची कामेही केली. ‘सौभाग्य’, ‘मोहित्यांची मंजुळा’, ‘मुरळी मल्हारीरायाची’, ‘थांब लक्ष्मी कुंकू लावते’, ‘रायगडचा राजबंदी’, ‘अशी रंगली रात’ आदी चित्रपटांतील त्यांच्या भूमिका वाखाणल्या गेल्या. शारीरिक उंचीची उणीव त्यांनी अभिनयाने भरून काढली. गोरेपान देखणे व्यक्तिमत्त्व, घारे डोळे आणि सहजाभिनयाबरोबरच सळसळता उत्साह यामुळे त्यांच्याकडे भूमिका चालून येऊ लागल्या. एव्हाना सिनेमाचा रूपेरी पडदा त्यांनी आपलासा केलेला असला तरी स्वत:ला रंगभूमीचा विसर त्यांनी कधीही पडू दिला नाही. दोन्हीकडे त्यांचा मुक्त संचार सुरू झाला. तत्कालीन नाटकांतून पल्लेदार संवाद, भाषेची चित्तचमत्कारिक आवर्तने, स्वच्छ, सुस्पष्ट वाणी यांना मागणी होती. चित्तरंजन कोल्हटकर या सगळ्यांत ‘बाप’ होते. पल्लेदार वाक्ये उच्चारताना भल्याभल्यांचा अभिनय सटपटे आणि अभिनयाकडे जास्त लक्ष दिले की तोंडची वाक्ये घरंगळत. पण चित्तरंजन याला अपवाद होते. ‘भावबंधन’मधील त्यांचा घन:श्याम आजही रसिकांच्या स्मरणात आहे. ‘एकच प्याला’तील ‘सुधाकर’ आणि ‘तळीराम’ या दोन्ही भूमिकांवर त्यांनी अशीच आपली नाममुद्रा उमटविली. कुठल्याही भूमिकेच्या अंतरंगात शिरण्यात चित्तरंजन वाकबगार होते. रंगभूमीवर सहज वावर असलेल्या हाताच्या बोटांवर मोजता येतील अशा कलावंतांमध्ये चित्तरंजन कोल्हटकरांचा अंतर्भाव करावा लागेल. ते एकदा का रंगमंचावर अवतरले, की नाटक सहजी कवेत घेत. ‘नाटय़संपदा’चे ‘अश्रूंची झाली फुले’ हे अत्यंत गाजलेले नाटक रंगभूमीवर येत असताना एका मोठय़ा अनर्थातून चित्तरंजननीच वाचविले. त्याचे झाले असे : ‘नाटय़संपदा’ची तत्पूर्वीची दोन-तीन नाटके कोसळल्याने संस्था अडचणीत आली होती. त्यामुळे ‘अश्रूंची झाली फुले’ हे नाटक संस्थेसाठी जीवनमरणाचा विषय झाले होते. या नाटकासाठी सरकता रंगमंच बनवण्यात आला होता. परंतु पहिल्याच प्रयोगाच्या वेळी तांत्रिक अडचणींमुळे तो रंगमंच सरकेचना. त्याची दुरुस्ती करून तो चालू करण्याचे सगळे प्रयत्न फोल ठरले. तशात प्रयोगाला जसजसा उशीर होऊ लागला, तसतसे प्रेक्षकही अस्वस्थ होऊ लागले होते. शेवटी प्रयोग आहे त्या परिस्थितीत सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. पहिलीच एन्ट्री चित्तरंजन कोल्हटकरांची होती. रंगमंचावरील आयत्या वेळच्या अडचणीमुळे दुसरा तिसरा नट कदाचित हेलपाटला असता; परंतु चित्तरंजननी सहज एन्ट्री घेतली आणि काही क्षणांतच प्रयोगातील ताण नाहीसा झाला. नाटक मार्गी लागले. या नाटकाने पुढे उत्तम धंदा केला आणि ‘नाटय़संपदे’ला कर्जातून बाहेर काढले. कुणाच्याही अडीअडचणीला धावून जाणे, हा चित्तरंजन कोल्हटकरांचा स्वभावच होता. ‘गारंबीचा बापू’मध्ये डॉ. काशीनाथ घाणेकरांचा ‘बापू’ लोकांनी डोक्यावर घेतला होता. घाणेकरांचा करिष्माच तसा होता. काही कारणांनी घाणेकरांनी चांगले चाललेले हे नाटक अचानक सोडले आणि निर्माते मोहन वाघांसमोर यक्षप्रश्न उभा राहिला : डॉ. घाणेकरांच्या जागी ‘बापू’ म्हणून कुणाला उभे करायचे? या भूमिकेवर त्यांची एवढी जबरदस्त छाप होती, की त्यांच्या जागी कुणा ऐऱ्यागैऱ्याला प्रेक्षक स्वीकारणे शक्यच नव्हते. मोहन वाघांनी चित्तरंजनना या भूमिकेसाठी विचारलं. दुसऱ्या नटाने गाजवलेली भूमिका सहसा कुणी नट स्वीकारीत नाही. कारण त्याची आधीच्या नटाशी तुलना होते आणि त्याने कितीही जीव तोडून काम केले तरी ते प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत नाही. पण चित्तरंजन कोल्हटकरांनी हे आव्हान स्वीकारले आणि डॉ. घाणेकरांची आठवणही येऊ न देता आपल्या पद्धतीने ही भूमिका रसिकांच्या गळी उतरविली. रंगभूमीवरील अव्यभिचारी निष्ठा हे चित्तरंजन कोल्हटकरांचे व्यवच्छेदक लक्षण होते. ते शेवटपर्यंत आपल्या ‘वरद रंगभूमी’ या संस्थेद्वारे सक्रीय होते. साठहून अधिक वर्षांच्या प्रदीर्घ नाटय़-कारकिर्दीत त्यांनी वाटय़ाला आलेल्या प्रत्येक भूमिकेत जीव ओतला. ‘मुद्राराक्षस’ या नाटकातील आर्य चाणक्याची भूमिकाही त्यांनी नव्या रंगभाषेच्या शोधात निघालेल्या मंडळींबरोबर तितक्याच सहजतेने केली. ‘वरद रंगभूमी’तर्फे त्यांनी आपल्या हातखंडा भूमिका असलेल्या ‘एकच प्याला’, ‘भावबंधन’, ‘पुण्यप्रभाव’ आदी नाटकांची निर्मिती केली. शेवटपर्यंत आपल्याला रंगभूमीची सेवा करता यावी, ही त्यांची इच्छा होती. त्यानुसार ते शेवटपर्यंत सक्रीय राहिले. या प्रवासात विष्णुदास भावे पुरस्कारासह अनेक मानसन्मान त्यांच्याकडे चालत आले. नाटय़संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांना लाभले. पुणे नाटय़ परिषदेच्या स्थापनेत त्यांचा सिंहाचा वाटा होता. मा.चित्तरंजन कोल्हटकरांना दीनानाथ मंगेशकर पुरस्कारही देण्यात आला होता. त्यांना सिनेमांतील आणि नाटकांसाठी विष्णुदास भावे पुरस्कार, शासनाचा चिंतामणराव कोल्हटकर पुरस्कार, छत्रपती शाहू पुरस्कार, अल्फा गौरव पुरस्कार, नानासाहेब फाटक जीवनगौरव पुरस्कार अभिनयासाठी विविध पुरस्कार प्राप्त झाले. अनेक सामाजिक संस्थांशी ते निगडित होते. हिंदुत्ववादाचा वसा त्यांनी अभिमानाने मिरवला. रंगभूमीच्या भल्यासाठीच्या मागण्या घेऊन ते शासनाकडे जात आणि त्या पदरात पडेतो त्यांचा पाठपुरावा करीत. आपल्या नाटय़कर्तृत्वाने शासन दरबारी दबदबा निर्माण करणाऱ्या ज्येष्ठ रंगकर्मीमध्ये चित्तरंजन कोल्हटकर अग्रस्थानी होते. मा.चित्तरंजन कोल्हटकर यांचे २५ ऑक्टोबर २००९ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ :- विकिपीडिया / प्रशांत देसाई

  • पं. प्रभाकर कारेकर

    पं. प्रभाकर कारेकर यांनी तीन दशकांहून अधिक काळ शास्रीय संगीत क्षेत्रात बहुमोल योगदान दिले आहे. मूळचे गोव्याचे असलेले कारेकर आग्रा आणि ग्वाल्हेर घराण्याच्या शैलीची साधना करतात.

  • सुनीता देशपांडे

    आज ७ नोव्हेंबर..आज मराठी लेखिका व सामाजिक कार्यकर्त्या *सुनीता देशपांडे यांची पुण्यतिथी*
    जन्म :- ३ जुलै १९२५
    पु.ल. आणि सुनीताबाई यांनी ओरिएंटल हायस्कुलात शिक्षक म्हणून काम केले होते. मा.पु. ल. देशपांडे आणि सुनीताबाईंचे लग्न १२ जून १९४६ रोजी झाले. करारी व्यक्तिमत्त्वाच्या व शिस्तीच्या भोक्त्या सुनीताबाई या पुलंची मूक सावली म्हणूनच केवळ वावरल्या नाहीत तर पुलंच्या जडणघडणीतही त्यांचा अत्यंत क्रियाशील वाटा होता. पुलंचे व्यक्तिमत्त्व साहित्य, एकपात्री प्रयोग, चित्रपट, नाटक, संगीत या क्षेत्रांत तळपत असताना सुनीताबाई प्रकाशझोतात फारशा नव्हत्या. खरे तर सुनीताबाईंनी पुलंबरोबर अनेक नाटक आणि चित्रपटांतूनही भूमिका केल्या होत्या. ‘वंदे मातरम्’ या त्यांच्या पहिल्याच मराठी चित्रपटात त्यांनी नायिकेची भूमिका केली. ‘बटाटय़ाची चाळ’, ‘वाऱ्यावरची वरात’ या पुलंच्या प्रयोगातही त्यांनी भूमिका केल्या होत्या. असे असूनही कलावंत म्हणून त्यांची फारशी दखल घेतली गेली नव्हती. नंतर या दोघांनी बा. भ. बोरकर, आरती प्रभू, बा. सी. मर्ढेकर आदी कवींच्या काव्यांचा मागोवा घेणारे जाहीर कार्यक्रम सुरू केले तेव्हा सुनीताबाईंची खऱ्या अर्थाने सर्वसामान्य रसिकांना ओळख झाली. कविता हा त्यांचा जीव की प्राण होता. मराठीतील अनेक कवींच्या अनेक कविता त्यांना तोंडपाठ होत्या. या काव्यप्रेमातूनच जाहीर काव्यवाचनाचा हा कार्यक्रम साकारला होता.
    १९९० मध्ये ‘आहे मनोहर तरी’ हे आपल्या व पुलंच्या सहजीवनाचा मागोवा घेणारे त्यांचे पुस्तक प्रसिद्ध झाले आणि त्याने साहित्य वर्तुळात तसेच पुलंच्या चाहत्यांमध्ये खळबळ उडवून दिली. लेखिका म्हणून हे त्यांचे पहिले पुस्तक तडाखेबंद खपले व गुजराथी आणि इंग्रजीत अनुवादित झाले तरी त्याला पुलंसारख्या दिग्गज लेखकाच्या नावाचेच वलय होते. त्यानंतर मात्र ‘मण्यांची माळ’, ‘मनातलं अवकाश’ आणि ‘सोयरे सकळ’ या त्यांच्या पुस्तकांनी त्यांची साहित्यिक म्हणून स्वतंत्र ओळख निर्माण झाली होती.. ‘प्रिय जी. ए.’ हे त्यांचे प्रकाशित झालेले शेवटचे पुस्तक. त्यांचे अत्यंत आवडते लेखक असलेल्या जी. ए. कुलकर्णीना त्यांनी वेळोवेळी लिहिलेल्या पत्रांचा हा संग्रह म्हणजे मराठी साहित्यातील एक अत्यंत वेगळे असे दालन ठरले आहे. पुलंच्या ठायी असलेल्या कलंदर वृत्तीला गोंजारत त्यांच्या सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणाऱ्या सुनीताबाईंनी त्यांच्या दातृत्वासही सामाजिक जोड दिली. सुनीताबाईंच्या व्यक्तिमत्त्वातच सामाजिक सहवेदना असलेला एक कलावंत दडला होता. त्यामुळे लोकांची दु:खे एका कलावंताच्या नजरेने टिपल्यामुळेच त्यांच्या पुढाकाराने पु. ल. देशपांडे फाऊंडेशनची संकल्पना पुढे आली आणि विविध क्षेत्रांत महत्त्वाचे काम करणाऱ्या अनेक संस्थांना या फाऊंडेशनच्या माध्यमातून एक कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या देणग्या मिळू शकल्या. अनिल अवचट यांचे मुक्तांगण, पाल्र्याचा लोकमान्य सेवा संघ, मराठी विज्ञान परिषद, ग्रामायन यासारख्या अनेक संस्थांना पुल - सुनीताबाईंनी अक्षरश: लाखो रुपयांच्या देणग्या दिल्या. त्या प्रत्येकवेळी त्याची वाच्यता होणार नाही, याची खबरदारीही त्यांनी घेतली. त्यासाठी या दाम्पत्याने साधी राहणी पसंत केली. मा. सुनीता देशपांडे यांचे ७ नोव्हेंबर २००९ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ:- इंटरनेट

  • स्वातंत्र्यसेनानी केशवराव मारुतराव जेधे

    बाबासाहेब आंबेडकरांच्या चवदार तळ्याच्या मोहिमेत ते सहभागी होते. केशवराव व शंकरराव मोरे हे १९३० नंतर देशाच्या राजकीय चळवळीच्या मुख्य प्रवाहात आले. लोकमान्य टिळकांनंतर पुण्यातून जेधे यांनीच कॉंग्रेसला संजीवनी दिली.

  • कृष्णदेव मुळगुंद

    मुळगंद यांच्या कलासाधनेची दखल समाजानेही घेतलेली आहे. कलाछाया पुरस्कार, कलागौरव पुरस्कार, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती पुरस्कार, कलारत्न पुरस्कार, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा रंगकर्मी पुरस्कार, कै. राजा मंत्री पुरस्कार, कै. मधू आपटे पुरस्कार असे अनेक पुरस्कार त्यांना लाभले.

  • अरुणा ढेरे

    अरुणा ढेरे ह्या मराठी साहित्य विश्वातील एक नावाजलेल्या लेखिका आहेत. आतापर्यंत त्यांनी बरीच पुस्तकं लिहिली आहेत. एक लेखिका म्हणून त्यांनी आतापर्यंत वैयक्तिक निबंध , लघुकथा , कादंबऱ्या, कविता , बालसाहित्य , मोनोग्राफ्स, मालिकांसाठी पटकथा व संवाद अशा विविध विभागात लेखन केले आहे.

  • वार्ताहर, लेखक, नाटककार व थोर समाजसुधारक अनंत हरि गद्रे

    झुणकाभाकरफेम समतानंद अनंत हरी गद्रे यांना नाटिका संप्रदायाचे प्रवर्तक मानले जाते. वार्ताहर, लेखक, नाटककार व थोर समाजसुधारक अनंत हरि गद्रे यांचा जन्म १६ ऑक्टोबर १८९० रोजी झाला.