जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
(७ जानेवारी १७७५-१४ जानेवारी १८७५)
मराठी राज्याचा शेवटचा पेशवा राबबाजी व बाबासाहेब या नावांनीही तो प्रसिद्ध आहे. रघुनाथराव व आनंदीबाई यांचा ज्येष्ठ मुलगा घार येथे जन्मला लहानपणी हा हुड व विक्षिप्त होता. सवाई माधवरावाच्या मृत्यूनंतर नाना फडणीसाने पेशव्याच्या गादीवर इतर वारस बसविण्याची खटपट केली, पण तो अयशस्वी होऊन बाजीरावास पेशवेपदावर बसविणे त्यास क्रमप्राप्त झाले. बाजीराव व नाना फडणीस यांचे कधीस जमले नाही. अखेर अंतर्गत कारस्थानात बाजीराव यशस्वी झाला नाना फडवीस प्रथम कैदेत पडले व पुढे लवकरच मरण पावले. बाजीरावावर शिंदे होळकरांचे प्रथमपासून वर्चस्व होते. त्यातून सुटण्यासाठी त्याने तैनाजी फौजेशी अट मान्य केली. त्याला इंग्रजांच्या धोरणाची जाण बाजीरावाला होती असे दिसत नाही. इंग्रजाच्या साहयाने पटवर्धन रास्ते त्याने रचला पण इंग्रज वकिल एल्फिन्स्टन याने १८१२ च्या पंढरपूरच्या तहाने तो हाणून पाडला. पेशवा जळफळला आणि इंग्रजाविरूद्ध कटास सुरूवात झाली.
बाजीरावाने सातार्याला छत्रपतींचा व त्या पदाचा उघड उघड अपमान करून त्यावेळचे छत्रपती प्रतापसिंह यांस प्राय कैदेत टाकले या परिस्थितीचा फायदा घेऊन एल्फिन्स्टनने पेशव्यांशी लढाई करतांना छत्रपतीपदाची अवहेलना करणार्या पेशव्यांचे राज्य बुडवावयाचे आहे असा पवित्रा घेतला. त्यामूळे मराठा मंडळावर योग्य तो परिणाम होऊन दुसरा बाजीराव एकाकी पडला आणि अष्टीच्या लढाईत त्याचा पराभव झाला १८१८ बापू गोखले प्राणपणाने लढला व धारातीर्थी पडला. पूढे इंग्रजांनी बाजीरावास अटक करून ब्रम्हावर्त येथे नेऊन ठेवले तेथेच तो पूढे मरण पावला.
दुसर्या बाजीरावामध्ये युद्ध कौशल्य वा धडाडी नव्हती सुरूवाती पासुन तो कारस्थानी व विषयलंपट होता. त्याने पुण्यास असताना सहालग्ने व पुढे ब्रम्हावर्तास पाच अशी एकूण अकरा लग्ने केली. त्याला तीन मुली व एक मुलगा झाला, पण मूलगा लहानपणीच वारला. पेशवाई बुडाल्यानंतर उर्वरित आयुष्य त्याने धार्मिक कृत्यांत व्यतीत केले.
नाटककार, कादंबरीकार आणि चरित्रकार यांचा जन्म २७ डिसेंबर १९०४ रोजी झाला.
वसंत देसाई हे नाटककार, कादंबरीकार आणि चरित्रकार म्हणून प्रसिद्ध होते. १९६० साली बडोद्यात भरलेल्या नाट्यसंमेलनाचे ते अध्यक्ष होते. त्यांनी राम गणेश गडकरी यांच्या प्रेमसंन्यास या नाटकासाठी पदे लिहिली. वसंत शांताराम देसाई हे मराठी रंगभूमीचा चालताबोलता कोश समजले जाते. विधिलिखित हे त्यांचे पहिले आणि अमृतसिद्धी हे दुसरे नाटक. ही दोन्ही नाटके त्यांनी बालगंधर्वांची मध्यवर्ती भूमिका डोळ्यासमोर धरून लिहिली.
मखमलीचा पडदा, नट-नाटक आणि नाटककार, किर्लोस्कर आणि देवल, खाडिलकरांची नाट्यसृष्टी, बालगंधर्व-व्यक्ती व कला, रागरंग, विश्रब्ध शारदा- २ खंड, संगीत विभाग, विधिलिखित, अमृतसिद्धी अशी त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत.
गीतकार वसंत शांताराम देसाई १९२५ साली हिराबाईंचे गाणे ऐकण्यासाठी त्यांच्या घरी गेले. तेव्हा त्या कार्यक्रमानिमित्ताने बाहेर गेल्या होत्या. काही वेळाने त्या घरी आल्या. त्यानंतर त्यांना गायला कसे सांगावे या विचारात असताना ‘पुन्हा गाते’ असे त्याच म्हणाल्या. तानपुरा घेतला व दोन तास गाणे ऐकविले. याच देसाईंनी ‘उपवनी गात कोकिळा’, ‘सखे मी मुरारी वनी पाहिला’ आणि ‘धन्य जन्म जाहला’ ही पदे हिराबाईंना लिहून दिली. त्यातल्या उपवनी गात..
या भावपदाने लोकप्रियतेचा उच्चांक गाठला. १९३७ मध्ये ओडियन कंपनीने ही ध्वनिमुद्रिका बाजारात आणली. शब्द वसंत शांताराम देसाई यांचे व मास्तर दिनकरांची मदत घेऊन चालही त्यांनीच केली. हे भावगीत इतके लोकप्रिय झाले की महाराष्ट्रातील प्रत्येक गायक हे गीत गाऊ लागला. स्वत: गायिकेने आपल्या जलशांतून नाट्यपदासह काही पदे गायला सुरुवात केल्यावर ‘उपवनी गात कोकिळा’ या गाण्याची हमखास फर्माईश होई. त्या काळात हिराबाईंनी हे गीत गायले नाही असा एकही कार्यक्रम नसेल. पंडित भीमसेन जोशी सांगायचे, ‘वधुपरीक्षेला आलेल्या मुलीला गाण्याचा आग्रह झाला की ती ‘उपवनी गात कोकिळा’ हे गीत गायची व त्यामुळे मुलगी पसंत व्हायची!’
वसंत शांताराम देसाई यांचे २३ जून १९९४ रोजी रोजी निधन झालं.
-- संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
आज ३० ऑक्टोबर.. आज अभ्यासू, समर्पित आणि शिस्तीचा कलावंत विक्रम गोखले यांचा वाढदिवस.
विक्रम गोखले यांचा जन्म ३० ऑक्टोबर १९४५ रोजी झाला.
सध्या नव्या नाटकाच्या तालमीलाही सगळे नट एकाच वेळी उपलब्ध असत नाहीत. त्यामुळे दिग्दर्शक प्रत्येकाला त्याच्या सवडीनुसार स्वतंत्र तालीम देऊन नाटक (कसेबसे) उभे करतो. अशा जमान्यात नाटकाचा सखोल आणि सर्वागीण विचार संभवणे अवघडच; परंतु काही मोजके नट याला अपवाद आहेत. त्यापैकी एक : विक्रम गोखले!
विजया मेहता यांच्या तालमीत तयार झालेल्या शिष्यांमध्ये विक्रम गोखले हे एक बिनीचे शिलेदार. नाटकाचा सर्वस्पर्शी विचार कसा करावा, याचे बाळकडू त्यांना बाईंकडून मिळाले. ‘बॅरिस्टर’ ही त्याची उत्तम फलश्रुती.
मा.विक्रम गोखले यांच्या पणजी दुर्गाबाई कामत या भारतीय चित्रपट सृष्टीतल्या पहिल्या स्त्री अभिनेत्या, तर आजी कमलाबाई गोखले (तेव्हाच्या कमलाबाई कामत) या पहिल्या बाल-अभिनेत्री होत्या. इ.स. १९१३ साली दुर्गाबाईंनी दादासाहेब फाळके यांची निर्मिती आणि दिग्दर्शन असलेल्या 'मोहिनी भस्मासुर' नावाच्या चित्रपटात पार्वतीची आणि कमलाबाईंनी मोहिनीची भूमिका केली होती.
विक्रम गोखले यांचे वडील चंद्रकांत गोखले यांनी ७०हून अधिक हिंदी-मराठी चित्रपटांतून भूमिका केल्या होत्या. मा.विक्रम गोखले यांनी घराणेशाहीच्या जोरावर अभिनय क्षेत्रात हडेलहप्पी करण्याचा मार्ग न पत्करता अभ्यासपूर्वक त्यातले सूक्ष्म कंगोरे आत्मसात केले. जाणीवपूर्वक भूमिका निवडून त्यांना आपल्या निरीक्षणशक्तीची, आकलन आणि विश्लेषणाची जोड देऊन त्यांवर आपला असा ठसा उमटवला. मग ती भूमिका ‘माहेरची साडी’सारख्या सिनेमातली का असेना. रंगभूमी, चित्रपट, चित्रवाणी या प्रत्येक माध्यमाची निकड त्यांनी सहजगत्या आत्मसात केली. त्यांच्या या चोखंदळपणामुळेच ते कला क्षेत्रातले संगीत नाटक अकादमी पुरस्कारासह अनेक प्रतिष्ठेच्या पुरस्कारांचे धनी होऊ शकले. ते कलेचा साकल्याने विचार करणारे, नव्या पिढीला प्रशिक्षण देणारे, त्या संदर्भात बांधीलकी जपणारे एक कर्ते रंगधर्मी आहेत. म्हणूनच रंगभूमीवर सध्या सुरू असलेल्या त्यांच्या ‘के दिल अभी भरा नहीं’ या नाटकाचे प्रयोग डोळ्याला इजा झालेली असतानाही त्यांनी थांबवले नाहीत. दुसरीकडे सामाजिक बांधीलकीचा वसाही त्यांनी जपलेला आहे. कमलाबाई गोखले पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टतर्फे अपंग सैनिक आणि समाजातील उपेक्षितांसाठी गेली कित्येक वर्षे ते सक्रिय कार्य करतात. सध्या त्यांनी नाटकाचे प्रयोग करणे बंद केले आहे.
मा.विक्रम गोखले यांना आधुनिक मराठी रंगभूमीचे प्रणेते विष्णुदास भावे यांच्या नावे दिल्या जाणारा पुरस्कार मिळाला आहे.अभिनेते मा.चंद्रकांत गोखले यांनाही भावे पुरस्काराने गौरवण्यात आले होते.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
गेल्या काही वर्षांत मराठी साहित्यात मोलाची भर घालणार्या महत्त्वाच्या कादंबर्या ग्रामीण भागातून लिहिल्या गेल्या आहेत. 'बारोमास', 'रौंदाळा', 'निशाणी डावा अंगठा' ही त्यातली काही लख्ख उदाहरणे. याच परंपरेतील अलीकडची महत्त्वाची कादंबरी म्हणजे, आनंद विंगकर यांची 'अवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट'. परिस्थिती आणि नैसर्गिक आपत्तीने नाडल्या जाणा-या शेतक-यांचं सनातन दु:ख मांडणा-या या कादंबरीने आनंद विंगकर यांना चांगलाच नावलौकिक मिळवून दिला आहे.
या कादंबरीला आतापर्यंत आद्य कादंबरीकार बाबा पदमनजी आणि सहकारमहर्षी शंकरराव मोहिते-पाटील या पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे. तिला मानाचा 'केशवराव कोठावळे पुरस्कार'ही मिळालेला आहे. अर्थात पुरस्कारांपेक्षाही विंगकर यांनी या कादंबरीतून शेतक-यांच्या दु:खाला जी वाचा फोडली आहे, ती महत्त्वाची आहे आणि खुद्द लेखकालाही तसंच वाटतं. कारण त्याचा आजवरचा प्रवासही संघर्षाचाच आहे.
सातारा जिल्ह्यातील कराडजवळच्या विंग गावातील आनंद विंगकरांचे वडील मुंबईत गिरणी कामगार होते. त्यांचं तिसरीपर्यंत शिक्षण मुंबईतच झालं. मात्र त्यानंतर आनंद विंगकर आईबरोबर गावाकडे परतले आणि गावच्या शाळेत जायला लागले. त्यानंतरचं त्यांचं वास्तव्य बहुतांशी ग्रामीण भागातच होतं. शिकून नोकरीला लागल्यावर काही काळ ते मुंबईत स्टेट बँकेत नोकरीला होते. परंतु १९८५च्या दरम्यान त्यांची कराडला बदली झाली. तिथे असतानाच एकदा त्यांची बदली खटाव-माण परिसरातील चितळी गावातल्या शाखेत झाली. तिथल्या वास्तव्यात आजूबाजूच्या परिसरातील जे भयानक वास्तव त्यांनी अनुभवलं, त्यातूनच 'अवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट' आकाराला आली. प्रकाशित झालेली ही त्यांची पहिली कादंबरी असली, तरी त्यापूर्वी त्यांनी 'दस्तावेज' नावाचीही कादंबरी लिहिली होती.
आणीबाणी ते जागतिकीकरण असा प्रदीर्घ काळ कवेत घेणा-या या कादंबरीचं ते सध्या पुनर्लेखन करीत आहेत. महत्त्वाचं म्हणजे विंगकरांची पहिली ओळख सामाजिक कार्यकर्ता आणि कवी म्हणूनच आहे. गेली अनेक वर्षं ते कवितालेखन करत आहेत. तसंच 'भारत ज्ञान-विज्ञान समुदाय' या पुण्यातील संस्थेच्या माध्यमातून ते साक्षरता व विज्ञानाच्या प्रसाराचंही काम करत आहेत. त्यांचा 'आत्मटीकेच्या उदास रात्री' हा कवितासंग्रह आणि 'सुंबरान मांडलं' ही दीर्घ कविता हा त्यांचा यापूर्वीचा प्रकाशित साहित्यिक ऐवज. त्यांचे डावे विचार व त्यातून आलेले व्यापक सामाजिक भान त्यांच्या शब्दाशब्दातून पसरलेले आहे. 'अवकाळी पावसाच्या' गोष्टीतले हेच भान वाचकांना अस्वस्थ करते.
(संदर्भ : महाराष्ट्र टाईम्समधील नोंद हे सदर)
दक्षिणेचे सुपरस्टार म्हणून प्रसिद्ध असलेले कमल हासन यांनी वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षी `कलतूर कन्नम्मा’ या तमिळ भाषेतील चित्रपटाद्वारे बालकलाकार म्हणून करिअरला सुरुवात केली होती. बॉलिवूडमध्ये त्यांनी ‘एक दुजे के लिए’ या सिनेमाद्वारे पदार्पण केले होते. कमल हासन यांनी १९० चित्रपटांत भूमिका केल्या आहेत.
मराठी चित्रपटातील खाष्ट सासू आणि करारी स्त्री, थोडी आधुनिक तर कधी हेखेखोर अशा भूमिकांची आठवण होताच डोळ्यासमोर नाव उभं रहातं ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचे.
दया डोंगरे यांचा जन्म ११ मार्च १९४० रोजी झाला.
मा.दया डोंगरे यांना गायिका व्हायचे होते. नागेशबुवा खळीकर यांच्याकडे काही काळ शास्त्रीय संगीत तर मा.हरिभाऊ देशपांडे यांच्याकडे त्या नाटय़संगीतही शिकल्या. त्या अवघ्या १२ वर्षांच्या असताना आकाशवाणी धारवाड केंद्राच्या उद्घाटन सोहळ्यात खास त्यांचे गाणे सादर झाले होते. आकाशवाणीने आयोजित केलेल्या अखिल भारतीय सुगम संगीत स्पर्धेत त्यांचा प्रथम क्रमांक आला. या पुरस्काराचे वितरण राष्ट्रपतींच्या हस्ते करण्यात आले त्या वेळी त्या १९ वर्षांच्या होत्या. पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते. अभिनयाने त्यांच्या गाण्यावर मात केली आणि गाणे मागे पडले. तसे झाले नसते तर आज कदाचित मा.दया डोंगरे यांचे नाव ज्येष्ठ गायिका म्हणून महाराष्ट्राला सुपरिचित झाले असते.
दया डोंगरे आजही दररोज सकाळी अर्धा ते पाऊण तास रियाज करतात. आपल्या वडिलांच्या बदलीच्या नोकरीमुळे मा. दया डोंगरे यांचे शिक्षण काही काळ धारवाड, त्यानंतर पुणे व दिल्ली येथे झाले. शाळेच्या स्नेहसंमेलनात त्या उत्साहाने भाग घेत असत, पण ते तेवढंच. अभिनयाचा वारसा त्यांना आपल्या आई मा.यमुताई मोडक यांच्या कडून मिळाला. मा.यमुताई मोडक यांनी त्या काळात हौशी रंगभूमीवर ‘किचकवध’, हाच मुलाचा बाप’ आदी नाटकातून काम केले होते. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे मा. दया डोंगरे यांची आत्या मा.शांता मोडक या त्या काळच्या प्रसिद्ध अभिनेत्री होत्या. त्यांनी बालगंधर्वाच्या नाटक कंपनीत त्यांना नाटकातून काम केले होते. मा.शांता मोडक यांना त्या काळी दामुअण्णा मालवणकर यांनी एक हजार रुपये पगार दिला होता. त्यांचा वारसा चालवायची संधी मा.दया डोंगरे यांना होती. पण त्यांनी आत्याच्या ओळखीचा कधी शिडी म्हणून वापर केला नाही. महाविद्यालयीन जीवनात मा.दया डोंगरे यांनी विशेष चमक दाखविली. सरकारी नाट्यस्पर्धेत मो. ग. रांगणेकर लिखित "रंभा' या नाटकात त्यांनी इतके अप्रतिम काम केले की त्यांना त्यासाठी प्रशस्तिपत्र मिळाले. पुण्यात आल्या नंतर मग मॉडर्न हायस्कूल व फर्ग्युसन महाविद्यालय येथे त्यांचे शिक्षण झाले. त्याच काळात त्यांनी पुरुषोत्तम करंडक स्पर्धाही गाजवल्या होती. अर्थातच महाविद्यालयीन शिक्षणानंतर त्या दिल्लीत "एनएसडी'मध्ये नाटकाचे उच्च शिक्षण घेण्यासाठी दाखल झाल्या, पण त्या वेळी त्यांनी संसारातही प्रवेश केल्याने त्यांना आपले शिक्षण एका वर्षातच आटोपते घ्यावे लागले. याच काळात सई परांजपे, सुधा शिवपुरी आणि विनायक चासकर ही मंडळी "एनएसडी'मध्ये दाखल झाली होती. तेथील शिक्षणानंतर सई परांजपे आणि अरुण जोगळेकर यांनी नाट्यद्वयी या संस्थेमार्फत विविध नाटकांचे प्रयोग सुरू केले. त्यात मा.दया डोंगरे काम करत असत. तुझी माझी जोडी जमली रे, नांदा सौख्य भरे, याचसाठी केला होता अट्टहास, इडा पिडा टळो यांसारख्या नाटकांत दया डोंगरे यांनी आपली चमक दाखवली होती.
दया डोंगरे यांच्या घरात त्यांच्या वडिलांना गायन-वादनाची हौस होती. त्यांचे पणजोबा कीर्तनकार होते. १९६९ च्या सुमारास त्या मुंबईला आल्या आणि मग त्यांची व्यावसायिक रंगभूमीवर घोडदौड सुरू झाली. नाट्यमंदिर या संस्थेने विद्याधर पुंडलिकाचे "माता द्रौपदी' हे नाटक रंगमंचावर आणले होते. यातील द्रौपदीची भूमिका विजया मेहता करत, तर गांधारीची भूमिका दया डोंगरे. दोन कसलेल्या अभिनेत्रींची ही झुंज पाहण्यासारखी असे. दुर्दैवाने या नाटकाचे फारसे प्रयोग झाले नाहीत. पण त्यानंतर आलेल्या "लेकुरे उदंड झाली' या नाटकाने मात्र दया डोंगरे यांचा चाहता वर्ग वाढला आणि त्यांना खऱ्या अर्थाने ओळख मिळाली. श्रीकांत मोघे यांच्याबरोबर त्या यामध्ये काम करत. त्यानंतर आले ते "संकेत मीलनाचा' हे वेगळ्या विषयावरची परकीय संकल्पनेवरचे नाटक तेही गाजले. मा.दया डोंगरे यांनी नाटक सुरू असतानाच दूरदर्शनवर काम करणे सुरू केले. त्या वेळी आजच्या इतक्याग वाहिन्या नव्हत्या. मात्र दिल्ली दूरदर्शनवरही त्यांनी हिंदी मालिकांमध्ये काम केले होते. मुंबईत आल्यावर नाटकांची घोडदौड सुरू झाली होतीच, पण त्या वेळी मुंबई दूरदर्शनची सुरवात होती. मा.दया डोंगरे यांच्या अभिनयप्रवासात मुंबई दूरदर्शनवरील ‘गजरा’ या कार्यक्रमाला विशेष स्थान आहे. मा.सुरेश खरे यांचे लेखन आणि दया डोंगरे यांचे निवेदन त्यात असायचे. या कार्यक्रमानेही खूप प्रसिद्धी मिळवून दिल्याचे त्या सांगतात. मराठी प्रेक्षकांबरोबरच अमराठी लोकांमध्येही हा कार्यक्रम लोकप्रिय होता. निखळ विनोद आणि करमणूक असे त्याचे स्वरूप होते. या कार्यक्रमामुळे ‘गजरा क्वीन’ अशी त्यांना ओळख मिळाली. याबाबतची एक आठवण सांगताना त्या म्हणतात, एकदा ग्रॅण्ट रोड येथे जाण्यासाठी मी माटुंगा रोड स्थानकात आले. स्थानकातील पादचारी पूल उतरत असतानाच गाडी सुटली. मला ती गाडी मिळणे शक्यच नव्हते. पण काही क्षणातच गाडी थांबली आणि मला त्याच गाडीत चढायला मिळाले. ही किमया ‘गजरा’ कार्यक्रमाने घडविली होती. धावतपळत उतरूनही मला गाडी पकडता आली नाही हे गाडीच्या मोटरमनने पाहिले. त्या अमराठी मोटरमनला ‘गजरा’ कार्यक्रमामुळे मी परिचित होते. केवळ त्या ओळखीमुळे त्यांनी सुरू झालेली गाडी काही क्षण पुन्हा थांबविली आणि ‘मॅडम मैं आपका प्रोग्रॅम देखता हूँ, हमें अच्छा लगता हैं’अशी त्यांची दादही मिळाली. मा.ललिता पवार यांच्यानंतर महाराष्ट्रात ‘सासू’ म्हणून दया डोंगरे यांचेच नाव घेतले जाते. दया डोंगरे म्हणजे ‘खाष्ट सासू’ असे समीकरण तयार झाले. सचिन पिळगावकर यांच्या ‘मायबाप’ या चित्रपटात त्यांनी पहिल्यांदा ‘सासू’ साकारली. ‘खटय़ाळ सासू नाठाळ सून’ किंवा दूरदर्शनवरील ‘आव्हान’ या मालिकेतील त्यांची ‘सासू’ गाजली. करडा आवाज, डोळ्यांतील जरब आणि अभिनयकौशल्याच्या जोरावर सर्वसामान्य प्रेक्षकांना मनात आपल्याविषयी भीती, तिरस्कार निर्माण करण्यात त्या यशस्वी ठरल्या. ती त्यांच्या अभिनयाला मिळालेली पावती होती. ‘सासू’ साकारताना माझ्या डोळ्यांपुढे कोणीही नव्हते किंवा मी कोणाचे अनुकरणही केले नाही. मी माझ्या पद्धतीने ‘सासू’ साकारली, असे त्या आपल्या मुलाखतीत सांगतात. अभिनेता चिन्मय मांडलेकर याने ‘मी लहान असताना मला तुमच्या डोळ्यांची खूप भीती वाटायची’ असे सांगितल्याची आठवण त्या सांगतात. ‘नवरी मिळे नवऱ्याला’, ‘उंबराठा’, ‘कुलदीपक’, ‘आत्मविश्वास’ हे त्यांचे आणखी काही चित्रपट. दूरदर्शनवरच अधिकारीबंधूंच्या ‘बंदिनी’ मालिकेत तसेच ‘वेडय़ांचा बाजार’मध्ये मी वृद्ध स्त्रीची भूमिका केली. आजवर रंगविलेल्या खाष्ट, दुष्ट आणि कजाग ‘सासू’पेक्षा या भूमिका वेगळ्या होत्या. कोणतीही भूमिका करताना कलाकाराला त्या भूमिकेत शिरण्याबरोबरच बाहेरही पडता आले पाहिजे. आपल्या आजूबाजूला असणाऱ्या व्यक्तींच्या निरीक्षणातून मी माझ्या ‘भूमिका’ रंगविल्या असे त्या म्हणतात. दूरदर्शनवरच्या ‘स्वामी’ मालिकेत त्यांनी साकारलेल्या ‘गोपिकाबाई’ आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे मार्गदर्शन आणि गजानन जहागीरदार यांचे दिग्दर्शन यातून एक छान मालिका प्रेक्षकांना पाहायला मिळाली. मराठीप्रमाणेच हिंदीत त्यांनी काम केले. जब्बार पटेल यांच्या ‘सुबह’ (मराठीतील उंबराठा), अमोल पालेकर यांच्या ‘आश्रय’मध्ये त्या होत्या. "मायबाप' चित्रपट असो, की "खट्याळ सासू नाठाळ सून' असो किंवा "उंबरठा'सारखा वेगळा चित्रपट असो या सगळ्यात दयाबाईंची भूमिका छोटी असो की मोठी त्या लक्षात राहायच्याच. तेच तर त्यांचे वैशिष्ट्य होते. सचिन दिग्दर्शित "आत्मविश्वाचस' चित्रपटात तर त्या वेगळ्या भूमिकेत होत्याच, पण त्याच्या आधीच्या "नवरी मिळे नवऱ्याला' या चित्रपटातील करारी स्त्रीचे त्यांचे रूप अनेकांच्या आजही स्मरणात आहे. गजानन जहागीरदार यांना दिग्दर्शित केलेल्या "स्वामी' मालिकेत त्यांनी माधवरावांच्या आई गोपिकाबाईंचे काम केले होते. त्यातील त्यांचा करारीपणा अनेकांना आवडला होता. ‘नकाब’ चित्रपटात ऋषी कपूरच्या तर ‘दौलत की जंग’ चित्रपटात आमिर खानच्या आईची भूमिका त्यांनी केली. पण हिंदीत त्या विशेष रमल्या नाहीत. नाटक चित्रपट आणि मालिका यामधून त्यांनी लीलया काम केले असले तरी त्या रमल्या खऱ्या रंगभूमीवरच. वसंत कानेटकरांच्या "माणसाला डंख मातीचा' या नाटकात त्यांनी सुप्रियाची भूमिका साकारली होती. ही अवघड भूमिका त्यांनी इतक्याट प्रभावीपणे केली, की खुद्द कानेटकरांनी माझ्या डोक्याातलं सुप्रियाचं पात्र तुम्ही सही सही उभं केलंत अशी पावती दिली. नाटकककाराने अशी पावती देणं हे सन्मानाचंच, दया डोंगरे यांनी असा सन्मान खूप वेळा मिळवला होता. कारण त्यांच्या अभिनयाची तेवढी ताकद आणि त्यांची तितकी गुणवत्ता आहे. आजच्या पिढीला मा.दया डोंगरे यांची ओळख आहे ती त्यांनी साकारलेल्या सासूच्या भूमिकेचीच. खाष्ट सासू किंवा करारी स्त्री अशाच भूमिका त्यांच्याकडे त्या काळात आल्या. खरं तर त्यांच्या अभिनयाची रेंज ही तेवढ्यापुरती मर्यादित नव्हती, तर विविध व्यक्तिरेखा समर्थपणे करणाऱ्या या अभिनेत्रीचे चीज मराठी चित्र आणि नाट्यसृष्टीने केले नाही. त्यांना मायबापमधील भूमिकेसाठी महाराष्ट्र शासनाचा विशेष अभिनेत्रीचा पुरस्कार, तसेच नाट्यदर्पण प्रतिष्ठानचा विशेष पुरस्कार मिळाला होता. १९९० मध्ये ‘चार दिवस सासूचे’ हा त्यांनी केलेला शेवटचा चित्रपट. ‘एण्ड्रोपियॉन’ या डोळ्यांच्या आजारामुळे त्यांना सक्तीची निवृत्ती पत्करावी लागली. बसमधून एकदा प्रवास करताना बसच्या वाहकाने, ‘लेकुरे उदंड जाली’ हे नाटक मी २५ वेळा पाहिले’ किंवा ‘काय दुष्ट बाई आहे ही, अशा बाईच्या घरात कोण मुलगी आपली सून म्हणून देईल,’ अशी पुण्यातील एका नाटय़प्रयोगाच्या वेळी मिळालेली प्रतिक्रिया त्यांना अधिक मोलाची वाटते. माझ्या सुदैवाने मला चांगले नाटककार, दिग्दर्शक आणि सहकलाकार मिळाले, याचाही त्या आवर्जून उल्लेख करतात.
‘मंतरलेली चैत्रवेल’ या नाटकाचा विषय निघाला की त्या आजही हळव्या होतात. सातारा येथील नाटकाचा प्रयोग आटोपून सर्व मंडळी कोल्हापूरला पुढील प्रयोगाठी बसने जात होती. या बसला भीषण अपघात झाला. अपघातातून दया डोंगरे वाचल्या पण त्यांचे सहकलाकार जयराम हर्डीकर आणि शांता जोग यांचा त्या अपघातात मृत्यू झाला. ही आठवण व तो प्रसंग आजही त्यांच्या अंगावर काटा आणतो.
दया डोंगरे यांना दोन विवाहित कन्या. संगीता व अमृता.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
दया डोंगरे यांची नाटके व चित्रपट - मंतरलेली चैत्रवेल, रंभा, वैदेही, लेकुरे उदंड झाली, संकेत मीलनाचा, चिं. सौ. कां. चंपा गोवेकर, अमानुष,
चित्रपट- नवरी मिळे नवऱ्याला, मायबाप, उंबरठा, आश्रय, जुम्बीष,
महाराष्ट्राचे लाडके नाटककार, उत्कृष्ट भावनाप्रधान भूमिका करणारे नट बाळ कोल्हटकर म्हणजे नाटयसृष्टीतला एक मानबिंदू.
मार्क झुकरबर्गचे वडिल इलियट हे व्यवसायाने डेन्टिस्ट तर आई मानसपोचारतज्ञ आहेत. त्यांचा जन्म १४ मे १९८४ रोजी झाला. वयाच्या १२ व्या वर्षापासुनच मार्कला कॉम्प्युटर प्रोग्रॅमिंग मध्ये रस निर्माण झाला होता. मुलाची कॉम्प्युटर मधली आवड बघुन मार्कच्या वडिलांनी त्याच्यासाठी खासगी शिक्षकाची नियुक्ती केली. लहानपणी केवळ मजा म्हणुन मार्कने अनेक कॉम्प्युटर गेम्स तयार केले होते. लहान वयातच त्याने अटारी बेसिक वापरायला सुरवात केली. त्याने घरात एकमेकांना संदेश देण्यासाठी एक प्रोग्रॅम विकसित केला. याचा उपयोग त्याच्या वडिलांच्या दवाखान्यात रुग्णांना त्यांचा नंबर आला आहे हे सुचित करण्यासाठी केला गेला. या नेटवर्कला ‘झुकनेट’ असं नाव दिले गेलं. नवनवीन प्रोग्रॅम लिहणं हा तर झुकरबर्गसाठी छंदच झाला होता. मार्कने हार्वर्ड विदयापीठात कॉम्प्युटर सायन्स आणि टेक्नॉलॉजी या शाखेत प्रवेश घेवुन आपल्या माहाविदयालयीन जीवनाला सुरवात केली. या काळात मार्कने गंमत म्हणुन ‘फेसमस’ हा प्रोग्रॅम तयार केला. यात पोस्ट केलेल्या फोटोंवर विदयार्थ्यांनी आपलं मत मांडायचं होतं. पण हा प्रोग्रॅम काही दिवसातच बंद पडला. परवानागी शिवाय फोटो वापरल्याबद्द्ल झुकरबर्गवर टिकाही झाली अणि त्याला माफीही मागावी लागली. परंतु हाच प्रयत्न झुकरबर्गला फेसबुकच्या निर्मितीसाठी प्रेरणादायी ठरला. मार्क शिकत असलेल्या अॅसकॅडमीत विदयार्थ्यांची माहिती आणि फोटोज संकलित केलेली डिरेक्टरी असायची त्याला फेसबुक असे म्हटलं जायचे यावरुनच साईटला ‘फेसबुक’ असं नाव दिलं गेलं असं म्हटलं जाते. मार्क झुकरबर्ग यांनी फेसबुक चालू करण्याआधी 'फेसबुक'ची संपूर्ण योजना आपली मैत्रीण प्रिशिलाला(जी नंतर पत्नी झाली.) समजावून सांगितली. प्रिशिलाने देखील मार्क झुकरबर्गला सगळ्या कामात मदत करण्याचे आश्वासन दिले. झुकरबर्गने 'फेसबुक'साठी शिक्षण सोडले.
'फेसबुक' सुरु झाल्यानंतर पहिला युजर म्हणून प्रिशिलाने रजिस्ट्रेशन केले. वेबच्या दुनियेत क्रांती घडवणाऱ्या झुकरबर्गचे यश त्याच्या वयाच्या मानाने कितीतरी मोठे आहे, यशाची एकेक पायरी चढत असताना मोठया उद्योगसमुहांकडुन येणाऱ्या ऑफर्स डावलून फेसबुक ने आपली यशस्वी घोडदौड सुरु ठेवली. मला अणि माझ्या सहकाऱ्यांना केवळ पैसा महत्वाचा नसुन लोकांना जास्तीत जास्त चांगली सेवा देण्याचे उद्दिष्ट्य आहे. “My aim is making world open” असं त्याने एक मुलाखतीत म्हटलं आहे. सध्या जगात १.७१ अब्ज फेसबुकचे युजर्स आहेत. फेसबुकमुळे शाळा-कॉलेज मधले मित्रमैत्रिणी पुन्हा एकमेकांच्या संपर्कात आले. मित्राचा मित्र, मैत्रिणीची मैत्रीण, तिची बहिण, तिचा भाऊ, सख्ये, चुलत - निलत अगदी शेजारी राहणारे ताई, माई, दादा सुध्दा ही लिस्ट तर हजारांवर जाऊन पोहचते. ज्यांना रोजच काय पण अनेक वर्षात भेटता आले नाही किंवा ज्यांच्या भेटीची शक्यताही दुरापास्त आहे त्यांना आता आपण रोज भेटतो फेसबुकवर. या सगळ्याच्या सुखदु;खात जरी आपल्याला प्रत्यक्षपणे सामील होता आलं नाही तरी अप्रत्यक्षपणे सामील होण्याची सोय फेसबुक ने उपलब्ध करुन दिली आहे. एरव्ही सामाजिक, राजकीय विषयांवर टिका, टिपण्णी करणं ही पत्रकार आणि नेते मंडळीचीच मक्तेदारी समजली जायची पण फेसबुकमुळे सामान्य माणुस या विषयांवर आपलं मत हिरीरीने मांडू लागला. फेसबुकमुळे प्रत्येकाला हक्काचं व्यासपीठ मिळालं. मार्क झुकरबर्गची लव्हस्टोरी त्याच्यासारखीच 'हटके' आहे. झुकरबर्ग १४ वर्षांपूर्वी पहिल्यादा आपल्या पत्नी प्रिशिला हिला भेटला होता. पहिल्या भेटीतची प्रिशिलावर झुकरबर्गला जीव जडला होता. मार्क झुकरबर्ग आणि प्रिशिला हार्वर्ड युनिव्हर्सिटीत शिक्षण घेत होते. दोघे २००३ मध्ये एका पार्टीत सहभागी झाले होते. झुकरबर्ग वॉशरूमबाहेर उभा होता. तितक्यात त्याचे लक्ष रांगेत उभ्या असलेल्या एका युवतीकडे गेले. ती युवती म्हणजेच प्रिशिला चान. झुकरबर्ग व प्रिशिलाचे हाय- हॅलो झाले. हळूहळू दोघांत चांगली गट्टी जमली. दोघे दररोज भेटू लागले. मैत्री अन् मैत्रीचे रुपांतर प्रेमात कसे झाले, हे दोघांनीही कळले नाही. झुकरबर्ग व प्रिशिलाने १९ मे २०१२ ला विवाह केला. मार्क आणि प्रसिला यांनी आपल्या मुलीच्या जन्मानंतर त्याच्या नावावर असलेले ९९ टक्के शेअर्स म्हणजेच ४५०० कोटी डॉलर दान केले. आजमितीला मार्क झुकरबर्ग हा जगातला सर्वात कमी वयाचा अब्जाधीश आहे. मार्क झुकरबर्गची संपत्ती ४१.२ अब्ज डॉलर आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
नाटक, मालिका, चित्रपट अशा तिन्ही माध्यमांमधून वेगवेगळ्या भूमिका करणाऱ्या सुनील अभ्यंकर यांना नाटकात भूमिका करणेच अधिक आव्हानात्मक वाटते. अभिनयाचा खरा कस हा रंगमंचावरच लागतो असे त्यांचे मत आहे. त्यांच्या वाट्याला आता पर्यंत विनोदी अंगाने जाणाऱ्या भूमीकाच आल्या असल्यातरी त्यांना गंभीर भूमीका करणेही आवडते. एका गंभीर भूमिकेच्या प्रतीक्षेत ते आहेत. तसेच खलनायकी ढंगाची भूमिका करणेही त्यांना आवडते. मात्र अद्याप त्यांना तशी संधी मिळालेली नाही.
महान कथक गुरू, उत्कृष्ट गायक, निष्णात तबला, सरोद, व्हायोलिन वादक आणि उत्तम दर्जाचे चित्रकार असणाऱ्या पं. बिरजू महाराज यांचा जन्म ४ फेब्रुवारी १९३८ रोजी झाला. पं बिरजू महाराज यांचे वडील म्हणजे लखनौच्या प्रसिद्ध कालका-बिंदादीन घराण्यातील अच्छन महाराज. त्याचे नाव खरे नाव ब्रिजमोहन मिश्रा. बिरजू हे त्यांचे लहानपणचे नाव.
आज आपण त्यांना आजही पंडित बिरजू महाराज म्हणून ओळखतो. पं.बिरजू महाराज यांना नृत्य वारसा हक्कानेच मिळाले होते. त्याशिवाय लय-तालाची नैसर्गिक देणगीही होती. बालपणातच त्यांनी आपल्या वडीलांकडून नृत्याचे धडे घ्यायला सुरवात केली. मात्र हे शिक्षण त्यांना फार काळ लाभले नाही. पं.बिरजू महाराज वयाच्या दहाव्या वर्षीच अच्छन महाराजांचे निधन झाले. पुढचे शिक्षण बिरजू महाराज यांनी त्यांचे काका पंडित लच्छू महाराज आणि पंडित शंभू महाराज यांच्याकडे घेतले. लच्छू महाराज लास्यांगात मुरलेले तर शंभू महाराजांचा अभिनयात हातखंडा. बिरजू महाराज यांनी हे सगळे टीपकागदाप्रमाणे आत्मसात केले. थोर गुरूंकडून मिळालेली विद्या, असामान्य प्रतिभा आणि अंत:प्रेरणा या त्रयींवर पुढे महाराजजींनी कथक नृत्यात नवनवीन प्रयोग केले. त्यांचे पूर्वज दरबारात नृत्य करत होते. ते नृत्य आता रंगमंचावर आले आहे याचे भान ठेवून बिरजू महाराज यांनी ते अधिकाधिक लोकाभिमुख केले. महाराजजींचं बालपण अतिशय हालाखीत गेले.त्यांचे काका श्री लच्छू महाराज मुंबईत नृत्य गुरू म्हणून आणि हिंदी चित्रपटसृष्टीत नृत्यदिग्दर्शक म्हणून प्रसिद्ध होते.त्यांनी आपल्या या पुतण्याला मुंबईला येण्याचा प्रस्ताव दिला.खूप मोठी संधी बिरजू महाराज यांच्याकडे चालून आली होती पण त्यांच्या आईने त्यांना अडवले. “चित्रपटसृष्टीत नाव, प्रसिद्धी, पैसा सगळं मिळेल पण घराण्याचं काम अर्धवट राहील. घराण्याचा वारसा पुढे नेणं हे तुझं प्रथम कर्तव्य आहे!” असे सांगून आईंनी महाराजजींना जणू त्यांच्या जीवितकार्याची जाणीव करून दिली. बिरजू महाराज यांनीही आपल्या आईची आज्ञा शिरसावंद्य मानली. पुढे काही तुरळक सिनेमांचा अपवाद वगळता महाराजजी आपल्या कर्तव्याशी एकनिष्ठ राहिले.
लहान वयात बिरजू महाराज यांची उत्तम नर्तक म्हणून ख्याती होतीच पण या वयातच उत्तम गुरू म्हणूनही त्यांचा लौकीक होऊ लागला.त्यांनी अनेक नृत्यनाट्यांची रचना केली.’फाग-लीला’, ’मालती-माधव’, ’कुमार संभव’ ही काही नावे. या नृत्यनाट्यांमधे त्यांनी स्वत: प्रमुख भूमिकाही साकारल्या. त्यांनी ’रोमिओ-ज्युलिएट’ या महान नाटककार शेक्सपियरच्या अजरामर कलाकृतीवर सर्वांगसुंदर असे नृत्य-नाट्य सादर केले. संपूर्ण देशभरात आणि विदेशात बिरजू महाराज यांच्या नृत्याने रसिकांना मंत्रमुग्ध केले आहे. बिरजू महाराज यांचे नृत्य पहाणे हा एक स्वर्गीय अनुभव असतो. त्यांच्या सहज-सुंदर रेषा, अप्रतिम पवित्रे, जणू एक जिवंत चित्रशिल्पच! मोराच्या गतीत जेव्हा बिरजू महाराज मोराची चाल करतात तेव्हा खरोखरच लखलखीत पिसाऱ्याचा, डौलदार मानेचा मोर आपल्यासमोर नाचतोय असे वाटते. त्यांचं भावांगही तितकंच सहज सुंदर. एखाद्या कुशल चित्रकाराने कॅनव्हासवर विविध रंगछटा लीलया साकाराव्यात त्याच सहजतेने त्यांच्या चेहेऱ्यावर भाव जिवंत होतात. सौंदर्यरसाच्या या उधळणीत रसिकमन चिंब भिजून जाते. बिरजू महाराज यांची प्रतिभा केवळ नृत्यापुरती सीमित नाही. ते एक उत्तम कवी आणि चित्रकार आहेत. तबला, पखावज वाजवण्यात ते वाकबगार आहेत. नृत्यासाठीही त्यांनी अनेक पद्यरचना केल्या आहेत. नवनवीन टुकडे, तोडे, तिहाया यांची निर्मिती तर अविरत चाललेली असते. खूप कमी कलावंत उत्तम शिक्षकही असतात.
मध्ये पुण्यातील कार्यक्रमात बिंदादीन महाराज यांच्या ठुमरींसह मराठी गाणेही गाऊन त्यांनी रसिकांना जिंकून घेतले होते. ’कथक केंद्र (दिल्ली)’ ते स्वत:ची संस्था ’कलाश्रम’ या प्रवासात त्यांनी अनेक उत्तमोत्तम शिष्य तयार केले. बाल, प्रौढ अश्या प्रत्येकाला शिकवण्याची महाराजजींची खास हातोटी आहे. बिरजू महाराज यांना ऐकताना आपण प्राचीन मंदिरातील कथकापुढे बसलो आहोत असे वाटते. बिरजू महाराज यांना अनेक मोठमोठे पुरस्कार प्राप्त झाले आहेत. देशाचा सर्वोच्च पद्मविभूषण पुरस्कार प्रदान करून भारत सरकारने त्यांचा गौरव केला आहे. बनारस आणि खैरागड या विद्यापिठांनी त्यांना डॉक्टरेट प्रदान केली आहे.याशिवाय कालिदास सन्मान, ’नृत्य चुडामणी’, आंध्र रत्न, सोविएत लँड नेहरू पुरस्कार असे विविध पुरस्कार त्यांना मिळाले आहेत.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट/ अनंत वझे
Copyright © 2025 | Marathisrushti