आनंद विंगकर

गेल्या काही वर्षांत मराठी साहित्यात मोलाची भर घालणार्‍या महत्त्वाच्या कादंबर्‍या ग्रामीण भागातून लिहिल्या गेल्या आहेत. 'बारोमास', 'रौंदाळा', 'निशाणी डावा अंगठा' ही त्यातली काही लख्ख उदाहरणे. याच परंपरेतील अलीकडची महत्त्वाची कादंबरी म्हणजे, आनंद विंगकर यांची 'अवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट'. परिस्थिती आणि नैसर्गिक आपत्तीने नाडल्या जाणा-या शेतक-यांचं सनातन दु:ख मांडणा-या या कादंबरीने आनंद विंगकर यांना चांगलाच नावलौकिक मिळवून दिला आहे.

या कादंबरीला आतापर्यंत आद्य कादंबरीकार बाबा पदमनजी आणि सहकारमहर्षी शंकरराव मोहिते-पाटील या पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे. तिला मानाचा 'केशवराव कोठावळे पुरस्कार'ही मिळालेला आहे. अर्थात पुरस्कारांपेक्षाही विंगकर यांनी या कादंबरीतून शेतक-यांच्या दु:खाला जी वाचा फोडली आहे, ती महत्त्वाची आहे आणि खुद्द लेखकालाही तसंच वाटतं. कारण त्याचा आजवरचा प्रवासही संघर्षाचाच आहे.

सातारा जिल्ह्यातील कराडजवळच्या विंग गावातील आनंद विंगकरांचे वडील मुंबईत गिरणी कामगार होते. त्यांचं तिसरीपर्यंत शिक्षण मुंबईतच झालं. मात्र त्यानंतर आनंद विंगकर आईबरोबर गावाकडे परतले आणि गावच्या शाळेत जायला लागले. त्यानंतरचं त्यांचं वास्तव्य बहुतांशी ग्रामीण भागातच होतं. शिकून नोकरीला लागल्यावर काही काळ ते मुंबईत स्टेट बँकेत नोकरीला होते. परंतु १९८५च्या दरम्यान त्यांची कराडला बदली झाली. तिथे असतानाच एकदा त्यांची बदली खटाव-माण परिसरातील चितळी गावातल्या शाखेत झाली. तिथल्या वास्तव्यात आजूबाजूच्या परिसरातील जे भयानक वास्तव त्यांनी अनुभवलं, त्यातूनच 'अवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट' आकाराला आली. प्रकाशित झालेली ही त्यांची पहिली कादंबरी असली, तरी त्यापूर्वी त्यांनी 'दस्तावेज' नावाचीही कादंबरी लिहिली होती.

आणीबाणी ते जागतिकीकरण असा प्रदीर्घ काळ कवेत घेणा-या या कादंबरीचं ते सध्या पुनर्लेखन करीत आहेत. महत्त्वाचं म्हणजे विंगकरांची पहिली ओळख सामाजिक कार्यकर्ता आणि कवी म्हणूनच आहे. गेली अनेक वर्षं ते कवितालेखन करत आहेत. तसंच 'भारत ज्ञान-विज्ञान समुदाय' या पुण्यातील संस्थेच्या माध्यमातून ते साक्षरता व विज्ञानाच्या प्रसाराचंही काम करत आहेत. त्यांचा 'आत्मटीकेच्या उदास रात्री' हा कवितासंग्रह आणि 'सुंबरान मांडलं' ही दीर्घ कविता हा त्यांचा यापूर्वीचा प्रकाशित साहित्यिक ऐवज. त्यांचे डावे विचार व त्यातून आलेले व्यापक सामाजिक भान त्यांच्या शब्दाशब्दातून पसरलेले आहे. 'अवकाळी पावसाच्या' गोष्टीतले हेच भान वाचकांना अस्वस्थ करते.

(संदर्भ : महाराष्ट्र टाईम्समधील नोंद हे सदर)




गेल्या काही वर्षांत मराठी साहित्यात मोलाची भर घालणार्‍या महत्त्वाच्या कादंबर्‍या ग्रामीण भागातून लिहिल्या गेल्या आहेत. ‘बारोमास’, ‘रौंदाळा’, ‘निशाणी डावा अंगठा’ ही त्यातली काही लख्ख उदाहरणे. याच परंपरेतील अलीकडची महत्त्वाची कादंबरी म्हणजे, आनंद विंगकर यांची ‘अवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट’. परिस्थिती आणि नैसर्गिक आपत्तीने नाडल्या जाणा-या शेतक-यांचं सनातन दु:ख मांडणा-या या कादंबरीने आनंद विंगकर यांना चांगलाच नावलौकिक मिळवून दिला आहे.

या कादंबरीला आतापर्यंत आद्य कादंबरीकार बाबा पदमनजी आणि सहकारमहर्षी शंकरराव मोहिते-पाटील या पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे. तिला मानाचा ‘केशवराव कोठावळे पुरस्कार’ही मिळालेला आहे. अर्थात पुरस्कारांपेक्षाही विंगकर यांनी या कादंबरीतून शेतक-यांच्या दु:खाला जी वाचा फोडली आहे, ती महत्त्वाची आहे आणि खुद्द लेखकालाही तसंच वाटतं. कारण त्याचा आजवरचा प्रवासही संघर्षाचाच आहे.

सातारा जिल्ह्यातील कराडजवळच्या विंग गावातील आनंद विंगकरांचे वडील मुंबईत गिरणी कामगार होते. त्यांचं तिसरीपर्यंत शिक्षण मुंबईतच झालं. मात्र त्यानंतर आनंद विंगकर आईबरोबर गावाकडे परतले आणि गावच्या शाळेत जायला लागले. त्यानंतरचं त्यांचं वास्तव्य बहुतांशी ग्रामीण भागातच होतं. शिकून नोकरीला लागल्यावर काही काळ ते मुंबईत स्टेट बँकेत नोकरीला होते. परंतु १९८५च्या दरम्यान त्यांची कराडला बदली झाली. तिथे असतानाच एकदा त्यांची बदली खटाव-माण परिसरातील चितळी गावातल्या शाखेत झाली. तिथल्या वास्तव्यात आजूबाजूच्या परिसरातील जे भयानक वास्तव त्यांनी अनुभवलं, त्यातूनच ‘अवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट’ आकाराला आली. प्रकाशित झालेली ही त्यांची पहिली कादंबरी असली, तरी त्यापूर्वी त्यांनी ‘दस्तावेज’ नावाचीही कादंबरी लिहिली होती.

आणीबाणी ते जागतिकीकरण असा प्रदीर्घ काळ कवेत घेणा-या या कादंबरीचं ते सध्या पुनर्लेखन करीत आहेत. महत्त्वाचं म्हणजे विंगकरांची पहिली ओळख सामाजिक कार्यकर्ता आणि कवी म्हणूनच आहे. गेली अनेक वर्षं ते कवितालेखन करत आहेत. तसंच ‘भारत ज्ञान-विज्ञान समुदाय’ या पुण्यातील संस्थेच्या माध्यमातून ते साक्षरता व विज्ञानाच्या प्रसाराचंही काम करत आहेत. त्यांचा ‘आत्मटीकेच्या उदास रात्री’ हा कवितासंग्रह आणि ‘सुंबरान मांडलं’ ही दीर्घ कविता हा त्यांचा यापूर्वीचा प्रकाशित साहित्यिक ऐवज. त्यांचे डावे विचार व त्यातून आलेले व्यापक सामाजिक भान त्यांच्या शब्दाशब्दातून पसरलेले आहे. ‘अवकाळी पावसाच्या’ गोष्टीतले हेच भान वाचकांना अस्वस्थ करते.

(संदर्भ : महाराष्ट्र टाईम्समधील नोंद हे सदर)


Author