(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

  • इतिहास संशोधक आणि चरित्रकार नरहर रघुनाथ फाटक

    इतिहास संशोधक आणि चरित्रकार नरहर रघुनाथ फाटक यांचा जन्म १५ एप्रिल १८९३ रोजी झाला.

    इतिहास संशोधक आणि चरित्रकार हाच नरहर रघुनाथ फाटक यांचा महाराष्ट्राला परिचय. न. र. फाटकांचा कोकणातील कमोद या गावाचे फाटकांचे घराणे. तेथून त्यांचे पूर्वज पुणे जिल्ह्यातील भोर संस्थानातील जांभळी या गावी आले. भोर संस्थानात त्यांचे आजोबा कारभारी होते. तर सरकारी नोकरीमुळे वडिलांचे वास्तव्य उत्तर भारतात होते. त्यामुळे न. र. फाटकांचे शिक्षण उत्तर भारतात वेगवेगळ्या ठिकाणी झाले.

    १९१५ मध्ये ते बी. ए. झाले. त्यावेळेस त्यांनी चित्रकलेच्या परीक्षा दिल्या होत्या आणि पंडित विष्णु दिगंबर पलुस्कर यांच्याकडे शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतले होते. त्यांची वाङ्मयीन कारकीर्द मुंबईच्या ‘इंदूप्रकाश या दैनिकात वृत्तपत्र संपादन करण्यापासून झाली. नंतर नवाकाळ मध्येही त्यांनी काम केले. महिला विद्यापीठात प्राध्यापक म्हणून अध्ययन केले आणि त्यानंतर रुईया महाविद्यालयात ते शिकवू लागले.

    प्रचलित विचार प्रवाहाविरूद्ध मत मांडून वाद निर्माण करणे हे त्यांच्या वृत्तपत्रीय लिखाणाचे वैशिष्ट्य ‘अंतर्भेदी’ या टोपणनावाने त्यांनी व्यक्तिचित्रे लिहिली. फाटकांनी चरित्रपर लेखनाला सुरुवात केली ती ‘न्यायमूर्ती महादेव गोविद रानडे’ या ग्रंथापासून. त्यानंतर ‘अर्वाचीन महाराष्ट्रातील सहा थोर पुरुष’, ‘ज्ञानेश्वर आणि ज्ञानेश्वरी’, ‘श्री एकनाथ ः वाङ्मय आणि कार्य’ ही संतचरित्रे तर लोकमान्य, आदर्श भारत सेवक, नाट्याचार्य कृ. प्र. खाडिलकर यांची चरित्रे ही फाटकांनी लिहिली. त्यांचा पिड खरा तर इतिहासकाराचा. त्यांच्यासमोर गिबनचा आदर्श होता. त्यामुळे त्या व्यक्तीचे तिच्या काळाशी नाते असते ह्या जाणिवेने फाटकांनी ही चरित्रे लिहिली आहेत. न. र. फाटक हे जसे स्वतंत्र प्रज्ञेचे समीक्षक होते तसेच ते इतिहासाचे दृष्टी ठेवून इतिहासाचा आणि वर्तमानाचा वेध घेण रे विचारवंत, भाष्यकार होते. त्यावरून फाटकांच्या वैचारिक आणि बौद्धिक पातळीची जाणीव होते. न. र. फाटक यांचे २१ डिसेंबर १९७९ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

  • गायिका मंजुश्री ओक

    पुण्यातील गायिका मंजुश्री ओक यांनी ऑक्टोबर २०१९ मध्ये १२२ भारतीय भाषांमधील गाणी सलग १३ तासांच्या कार्यक्रमात सादर केली. भारतात बोलल्या जाणाऱ्या ७८० भाषांपैकी अनुसूचित (शेड्युल्ड) असलेल्या २२ भाषा, नॉन शेड्युल्ड प्रकारच्या ३४ भाषा, तसेच उपभाषा, बोलीभाषा व मातृभाषा प्रकारातील ६४ भाषांमधील गीते या कार्यक्रमासाठी निवडण्यात आली होती. महाराष्ट्रातील आदिवासी भाषांमधील काही नवीन गाण्यांचाही अंतर्भाव करण्यात आला होता. ईशान्य भारतातील दुर्लक्षित ४१ भाषा, तसेच काश्मीरमधील व अगदी निकोबारी भाषेचाही यात समावेश होता.

  • महान गायक मोहम्मद रफी

    मोहम्मद रफी यांचा जन्म २४ डिसेंबर १९२४ रोजी झाला. शास्त्रीय संगीताची तालीम मोहम्मद रफी यांनी उस्ताद बडे गुलाम अली खाँ, उस्ताद अब्दुल वाहिद खान, पंडित जीवनलाल मट्टो आणि फिरोज निजामी यांच्याकडे घेतली. रफीजींचा पहिला पब्लिक परफॉर्मन्स हा त्याच्या वयाच्या १३ व्या वर्षी लाहोर मध्ये झाला. पहिले गाणे 'गाँव की गोरी' या चित्रपटात त्यांनी १९४५ मध्ये गायले. त्याच दरम्यान गायना बरोबरच त्यांनी एक दोन चित्रपटात छोट्या छोट्या भुमिकाही केल्या. १९४७ मध्ये फाळणीनंतर रफीजींनी भारतात राहण्याचा निर्णय घेतला. १९४९ ते १९७० च्या दरम्यान रफीजींनी चित्रपट क्षेत्रात आपल्या जबरदस्त गायनाने चांगला जम बसवला व तो टिकवला देखील. १९६० चे दशक हे रफीजींसाठी खास होतं, त्याच वर्षी त्यांना 'चौदहवी का चाँद' च्या शीर्षक गीतासाठी पहिल्यांदाच फिल्मफेअर अॅ्वॉर्ड मिळालं. याच दशकात रफीजींनी दिग्गज संगीतकारांबरोबर काम करून अनेकानेक हिट गाणी दिली. रफीजी हे त्यांच्या उदार स्वभावासाठी प्रसिद्ध होते. किशोरकुमारजींच्या सिनेमातल्या गाण्यासाठी त्यांनी निव्वळ 'एक रुपया' मानधन घेतलं असही म्ह्टलं जातं. शम्मीसाठी त्यांनी ज्या धाटणीत गाणी गायली आहेत, ती गाणी कुणीही पडद्यावर न पाहता फक्त ऐकून सांगेल किंवा अंदाज बांधू शकेल की ही गाणी बहुतेक शम्मीवरच चित्रित झाली असतील असं ऐकिवात आहे की गाण्याच्या रेकॉर्डिंगच्या वेळेला शम्मी स्वतः स्टुडिओत रफीजींना भेटून सांगत असे की ह्या गाण्यावर मी असे हावभाव करणार आहे किंवा इथे थोडा अंगविक्षेप आहे. इ. 'दोस्ती' चित्रपटासाठी त्यांनी सुधीरकुमार या नवोदित कलाकारासाठी ३ ते ४ गाणी गायली. तीही त्याच्याच लकबीत. त्यापैकी 'चाहूंगा मैं तुझे... ' या गीताला फिल्मफेअर मिळाले. चित्रपटसृष्टीत सगळय़ांत गाजलेला दुरावा म्हणजे मा.लता मंगेशकर व मा.मोहमद रफी यांच्यातील साठच्या दशकातील दुरावा मानतात. मानधनावरून एका बैठकीत काही वाद होऊन रफी यांनी ‘ये महारानी (लता) जैसा चाहेगी वैसा ही होगा’ अशी कॉमेंट केल्याने केल्याने लताजींना खूप राग आला व त्यानंतर जवळपास पाच-सहा वर्षे दोघांमध्ये दुरावा होता. लता व रफी यांनी युगलगीते गाणे बंद केल्यावर दोन गट पडले. त्या काळचे काही नायक, शम्मी कपूर, राजेंद्रकुमार, प्रदीपकुमार इ. हे मोहमद रफी यांचा आग्रह धरायचे, लता मंगेशकर व मोहम्मद रफी यांच्या दुराव्याचे पर्यावसान एकमेकांबरोबर न गाण्याच्या निर्णयात रूपांतरीत झालं. पण 'दिल ने फिर याद किया' या चित्रपटाचं शिर्षकगीत गाण्यासाठी सोनिक ओमी यांना रफी, लता आणि मुकेश यांची निवड केली होती. पण नेमकं त्याचवेळी 'लता आणि रफी हे एकमेकांबरोबर गाणार नाहीत' असं दोघांनी जाहीर करून टाकलं. सुमन कल्याणपूर या नव्या तरूण गायिकेला ते गाणं दिलं. त्यांनी एकवेळ लताजींना वगळल, पण रफीजी मात्र त्या गाण्यात त्यांना जास्त महत्त्वाचे वाटले. ‘लक्ष्मीकांत प्यारेलाल’ यांच्या यशामध्ये मो. रफी यांचा खूप मोठा वाटा होता. लक्ष्मीकांत प्यारेलाल मा.रफी यांना आपला गुरु मानायचे. लक्ष्मीकांत प्यारेलाल यांना सुरुवातीला संगीतकार म्हणून प्रोत्साहन देण्यात ज्या दोन व्यक्ती समोर होत्या त्यातील पहिले म्हणजे ‘रफी साहेब’ तर दुसऱ्या गानकोकिळा ‘लतादीदी’. रफी साहेबांनी आपल्या हिंदी चित्रपट संगीतातील सर्वात जास्त गाणी लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्या सोबतच गायलेले आहे. आपल्या एकूण ३५ वर्षांच्या गायनाच्या कारकिर्दीत मा.रफीजीनी ४००० च्या वर गाणी गायली. ज्यात हिंदी, मराठीसह अन्य भाषेतल्या अनेक प्रकारच्या गाण्यांचा समावेश होता. गैरफिल्मी, गझल, भजन, क्लासिकल, सेमिक्लासिकल इ. या अनेक प्रकारांमध्ये रफीजींचे अनेक मूडही समाविष्ट आहेत. रफींना गाडय़ांचीही खूप आवड होती. या छंदापोटी त्यांनी थेट लंडनहून होंडा कार मागविली होती आणि ऑडी हे नाव सिनेमासृष्टीत फारसं कोणाला ठाऊक नव्हतं तेव्हा त्यांच्या दारात दिमाखात ऑडी उभी होती. त्यांना करमणूकीसाठी कॅरम, बॅडमिंटन व पत्ते खेळायला आवडत. तसंच पतंग उडवणे हा ही त्यांचा छंद होता.*मा.मोहम्मद रफी* यांचे ३१ जुलै १९८० रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • ऑस्ट्रेलियाचा सर्वात यशस्वी कर्णधार रिकी पॉन्टिंग

    रिकी पॉन्टिंग हा क्रिकेट जगताचा एक अद्भुत आणि महान ‘एंटरटेनर’ मानला जातो. रिकी पॉन्टिंगला क्रिकेट जगतात पंटर या टोपणनावाने ओळखले जात असे.

  • फिअरलेस नाडिया म्हणून ओळख असलेल्या अभिनेत्री मेरी इवान्स

    फिअरलेस नाडिया म्हणून प्रसिद्ध असलेल्या नाडियाचे खरे नाव ‘मेरी इवान्स’ असे होते. त्यांचा जन्म ८ जानेवारी १९०८ रोजी पर्थ येथे झाला. हिंदी चित्रपटसृष्टीतील फिअरलेस नाडिया ही एक दिग्गज अभिनेत्री होती. जे बी एच आणि होमी वाडिया यांनी १९३० साली वाडिया मुव्हिटोन स्टुडिओची स्थापना केली होती. त्यांनीच ‘स्टंट क्वीन’ असलेल्या फिअरलेस नाडियाला लाँच केले होते.

    मूळची ऑस्ट्रेलियन असलेल्या नाडियाने भारतात अनेक अॅक्शन चित्रपट केले आणि अल्पावधीतच ती स्टार झाली. ती तिच्या बहारदार नृत्यासाठी, अ‍ॅक्शन्ससाठी प्रसिद्ध होतीच. शिवाय तिला चाबूकवाली म्हणूनही ओळखले जायचे. नाडियाने होमी वाडियाशी लग्न केले. नाडिया लहान असतानाच तिच्या आई-वडिलांसह भारतात आली. तिचे वडील ब्रिटीश आर्मीमध्ये सैनिक होते. पेशावरमध्ये मोठी झालेली नाडिया तेथेच घोडेस्वारी शिकली.

    लहानपणीच त्यांनी घोडेस्वारी, जिमनॅस्टिक, बॅले डान्सिंगचे प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी सर्कशीत प्रवेश केला व यानिमित्ताने त्या भारतभर फिरल्या. पहिल्या महायुद्धात तिच्या वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर ती आणि तिची आई मुंबईत स्थलांतरित झाल्या. त्यानंतर उत्तम नोकरी मिळावी याकरिता मेरीने (नाडिया) शॉर्टहॅण्ड टायपिंगचे प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. त्याचवेळी जाड असलेल्या मेरीने वजन कमी करण्याचाही निर्णय घेतला होता, त्यासाठी तिने रशियन नृत्य प्रशिक्षक मदाम अस्त्रोवा यांच्या नृत्यकला शाळेत नाव नोंदवले. त्यावेळी मदामनेच मेरीमध्ये असलेले कलागुण जाणले आणि भारतभर फिरण्या-या त्याच्या नृत्य/थेएटर ग्रुपमध्ये तिला सहभागी करून घेतले. त्याच्याच सांगण्यावरून तिने आपले नाव मेरीवरून नाडिया असे ठेवले.

    नाडियाच्या एकाही चित्रपटाची डीव्हीडी सध्या उपलब्ध नाही. पण जे बी एच वाडिया यांचे नातू रियाद विन्सी वाडिया यांनी तिच्यावर १९९३ साली एक सुंदर माहितीपट तयार केला होता. त्याचे नाव ‘फिअरलेस : द हंटरवाली स्टोरी’ असे आहे. यात नाडियाच्या काही छायाचित्र आणि व्हिडिओंच्या माध्यमातून तिचे आयुष्य आणि करिअर दाखविण्यात आले आहे.
    द हंटरवाली उर्फ मेरी इवान्स यांचे ९ जानेवारी १९९६ रोजी निधन झाले.

    भारतातील पहिल्या महिला 'स्टंटवुमन' म्हणून ओखळल्या जाणाऱ्या 'फिअरलेस नाडीया' यांना गुगलने डूडलद्वारे आज त्यांच्या जन्मदिनी श्रद्धांजली वाहिली आहे.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

    https://youtu.be/Y0A6a09C7hM
    https://youtu.be/dcZ_ab5LcuQ

  • ज्येष्ठ साहित्यिक रवींद्र सदाशिव भट

    साहित्याइतकीच अध्यात्माचीही ओढ असणाऱ्या रविंन्द्र भट यांनी एकूण १४ कादंबऱ्या, पाच नाटके, सहा काव्यसंग्रह व चित्रपट, अनुबोधपट, बालवाङमय असे विपुल लेखन केले. त्यांचा जन्म १७ सप्टेंबर १९३९ रोजी झाला. इंदायणी काठी, सागरा प्राण तळमळला, भगीरथ, आभाळाचे गाणे, देवाची पाऊले, भेदिले सूर्यमंडळा या त्यांच्या कादंबऱ्यांना वाचकांची विशेष पावती मिळाली होती.

    नसती उठाठेव, गोविंदा गोपाळा, ते माझे घर या चित्रपटांचे लेखनही त्यांनी केले. मोगरा फुलला, ओठावरली गाणी, जाणता अजाणता हे त्यांचे कवितासंग्रह लोकप्रिय आहेत. भट यांनी एस.पी कॉलेजमधून बी. ए. केले, त्यानंतर त्यांनी १९६८-८० या कालावधीत आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर नोकरी केली. १४ वर्षे महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह काम केले.

    त्यांना राष्ट्रपती पुरस्कार, मसाप पुरस्कार, चेतना ट्रस्टचा पुरस्कार, दर्पण, पुणे विद्यापीठाचा आणि ना. ह. आपटे स्मृती पुरस्कार मिळाले होते. रवींद्र सदाशिव भट यांचे २२ नोव्हेंबर २००८ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

  • मालतीबाई विश्राम बेडेकर (विभावरी शिरुरकर)

    मालती बेडेकर ह्या मराठीतल्या पहिल्या स्त्रिवादी लेखिका होत्या.

  • गायिका मोगुबाई कुर्डीकर

    मोगूबाईंवर १९११ साली हरिदासबुवांकडून गाण्याचे संस्कार झाले . मोगूबाई मुळातच बुद्धीमान. मोगुबाई चटकन आत्मसात करायच्या.

  • प्रख्यात मल्ल गजानन यशवंत माणिक (ताम्हणे) ऊर्फ माणिकराव

    वस्ताद जुम्मादादांचे शिष्य व अवघ्या एकोणिसाव्या वर्षी तीन हजार दंड, पाच हजार बैठका आणि सात तास कुस्तीचा सराव करणाऱ्या माणिकरावांचे अस्थिसंस्था, युनानी वैद्यक व शस्त्रास्त्रविद्येवरही प्रभुत्व होते. महाराष्ट्राप्रमाणे गुजरातमध्येही त्यांनी गावोगावी व्यायामशाळा स्थापन केल्या.

  • सुधीर गाडगीळ यांचा गायिका आरती अंकलीकर-टिकेकर यांच्यावरील लेख

    सुप्रसिद्ध निवेदक, लेखक सुधीर गाडगीळ यांची खासियत म्हणजे नवनव्या चवी शोधणं, मनापासून खाणं आणि खाण्यावर बोलणं. त्यांचं ‘मानाचं पान’ हे पुस्तक म्हणजे आपल्या आवडत्या सेलेब्रिटींबरोबर मांडलेली पंगतच जणू. कलयांकित व्यक्ती काय खातात, त्यांच्या खाण्याच्या आकडीनिकडी याबाबत आपल्याला उत्सुकता असतेच. सुधीर गाडगीळ यांनी या विषयाला धरून घेतलेल्या खुसखुशीत मुलाखती लेख स्करूपात या पुस्तकात आहेत. सुप्रसिद्ध शास्त्रीय गायिका आरती अंकलीकर-टिकेकर यांच्यावरील या पुस्तकातील लेख काळी गोल टिकली. त्यावर भांगापर्यंत रेखाटलेली काळ्या कुंकवाची उभी रेघ. नाकात लकाकणारी चमकी. डार्क ब्ल्यू किंवा मरून रंगाची सिल्क साडी. काठ ठळकपणे उठून दिसणारे, हाती तंबोरा – मैफलीपूर्वीची डोळे मिटलेली ध्यानस्थ स्तब्धता.आकाशवाणी धारवाड’ केंद्रावरचा फोटो वाटावा अशी आरती अंकलीकर – टिकेकरची प्रतिमा.रियाजाचं गांभीर्य सोडलं तर एरवी अवखळ, खटय़ाळ, खिदळणारी, जरा वरच्या स्वरात, अनुनासिक नादात खदखदणारी, चैतन्यदायी आरती.`अहो, तुमचं घर सापडायला फार वेळ लागला. ताडदेव डेपोपासून दोन चौक चालत यावं लागलं,’ असं फोटोग्राफरनं कुरकुरता क्षणीच `तुमचा वॉक चांगला झाला ना? गुड! तब्येतीला उत्तम!’ असा सट्टदिशी चौकार मारणारी आरती.

    भरपूर खादाडणं, भटकणं, चेष्टामस्करी करणं आवडतं. मी सोशल प्राणी आहे, असं म्हणता म्हणता हळूच जीभ चावत, खालच्या पट्टीत म्हणून सोसलं तेवढंच गाते, असा `पी.जे.’ मारत कन्येची, स्वानंदीची टाळीही घेते. `माझ्या माहेरी लहानपणी घरात भाज्या कमी असायच्या. कर्नाटकाचा तो दुष्काळीच भाग. तीळ, कारळं, दाण्याच्या सुक्या चटण्या आणि पोळी. खूप आग्रह खाण्याचा. कुठलाही रोग झाला तरी `खाणं’ हेच औषध मानत. माझे काका तापातही शिस्तीत जेवायचे. एक ताप असला तरी `काही तरी खा’ असंच म्हणत. `आई अस्सल कानडी. बॉर्डरवरची असली तरी माझं बालपण मुख्यत्वे माटुंग्यातलं. आसपास सगळी अंबा भुवन, आनंद भुवन, नायक, मद्रास कॅफे ही किंग्ज सर्कलची टिपिकल उडपी हॉटेल. तिथे महिन्यातून एकदा इडली, डोसा खायचा म्हणजे ग्रेट ट्रीट. हॉटेल संस्कृती एवढी बोकाळली नव्हती; पण खाण्यात रस असायचा. वडील कुणाकुणाच्या गाण्याच्या मैफलींना घेऊन जायचे, तेदेखील `बटाटे वडा देईन’ हे आमीष दाखवून!’ `खवय्या सो गवय्या’ हे माझं आवडीचं तत्त्व. जो चांगला खातो, पितो तो गवई. त्यामुळे मी कुठलेही पथ्यपाणी करत नाही. पाण्यानं पोट बिघडतं, वगैरे मनाचे खेळ. कैरीचं लोणचं चाखताना, खोकला येणार असं मनात आलं तर खोकला येणारच; नाही तर काही होत नाही. खाणाऱ्यानं, गाणाऱ्यानं सकारात्मक दृष्टिकोन ठेवणं महत्त्वाचं!

    `आरती, तुझं हे सकाळी हल्ली पेपरात प्रवचन येतं तसं चाललंय. तो तुझा स्वभाव नाही. थेट काय मन:पूर्वक खायला आवडलं ते सांग.’ `पालकाची मीठ पेरून भाजी, घट्ट साईचं दही, मेथीचं वरणं, त्यावर लाल सुक्या मिरच्यांची फोडणी आणि पुरणाचे कडबू प्रचंड आवडतात. मात्र खाताना गणित कच्चं पाहिजे, तरचं भरपेट जेवलं जातं. मुळात आम्हा धारवाडकडच्या लोकांना कुठल्याही प्रकारचे पोहे कधीही खायला आवडतात. झोप येत नसली तरी खा पोहे! हसू नका, खरंच सांगतेय! कार्यक्रमापूर्वी दोन दिवस मात्र पचायला हलकं खाणं पसंत करते. चहा रोज मी स्वत: करूनच पिते. ब्रेकफास्टला गरम पोळी भाजी. मग तासाभरानं दूध. जेवण संपूर्ण शाकाहारीच आवडतं, चाळीशीपर्यंत तिखट जास्त आवडायचं. वाचन, फिरणं वाढलं. जेवणातल्या व्हॅल्यूज कळल्या आणि मसालेदारपणा कमी केला. मात्र मिळमिळीत चालतच नाही. विशेषत: दुधीभोपळ्याची भाजी तर शक्यच नाही.’

    उदय (टिकेकर) पक्का मांसाहारी. त्याला चिकन -फिश आवडतं. मी खात नसले तरी करते. कॉन्टिनेंटल ते भाकरी सगळंच करायला आवडतं. स्वानंदीच्या डिमांडस् पहिल्या पुरवते. जराशी तिखट, सर्व प्रकारची सँडविचेस, माझ्या हातचा डोसा सर्वांना आवडतो. पीठ कालवून तापत्या तव्यावर विशिष्ट लयीत, विशिष्ट प्रेशरनं फिरवणं ही कला आहे. डोशाखेरीज टम्म फुगलेली, एकही डाग नसलेली कागदासारखी भाकरी मी उत्तम बनू शकते. अर्थात, स्वयंपाक करायची वेळ कमी येते’.

    एक तर माझ्या सासूबाई (सुमती टिकेकर) उत्तम स्वयंपाक करतात. त्या शेवयाची खीर, फ्रूट सॅलड, साजूक तुपातला शिरा, बासुंदी अप्रतिम बनवतात आणि उदयचं शूटिंगमुळे शेडय़ुल अनिश्चित असतं. तो रात्री उशिरा आल्यावर स्वयंपाकाचा सरंजाम मांडण्यापेक्षा आम्ही हॉटेलात जाणं पसंत करतो. चर्चगेटचं `पिझेरिया’, गिरगावातलं `ग्रीन हाऊस’, नाना चौकातला `श्रीकृष्ण’ उडपी किंवा आमच्या शास्त्री हॉलजवळचं `स्वाती स्नॅक्स!’

    `स्वाती’मध्ये एकतर अतिशय स्वच्छता असते. शुद्ध पाण्याचा वापर असतो. `पानगी फदुरा खिचडी’ केळीच्या पानावर आली की मी फस्तच करते. फलाफल इथं मिळतं. सीताफळ शेक इथे उत्तम असतो. तुमच्या पुण्यात आले की माझ्या सर्व शिष्या आमच्या घरी जमतात. तिथे आठ तास रियाज, उरलेल्या वेळात पीठ पेरलेल्या पालेभाज्या आणि पोळ्या आम्हीच सगळ्याजणी करतो नि खातो. पुण्यात वाडेश्वरचा `डोसा’ आणि वैशालीची इडली आणि खूप चटणी.
    `दौऱ्यात ठळकपणे लक्षात राहिलेली चव?’

    `कोलकात्यातले टपरीवरचे रसगुल्ले, इंदौरचा सराफा, अमेरिकेत मॅकडोनॉल्डचं सॅलड, अमृतसरची गरमागरम तंदुर रोटी आणि काळी डाळ, ओ। हो।हो। सुभान अल्ला! जिथे जाते तिथून ताज्या भाज्या आणायला मला आवडतं. गाजर, मुळा, मटार, फ्लॉवर, कोबी घरी स्वयंपाक करताना त्या ताज्या भाज्यांच्या गंधात मूड लागतो. डोक्यात रुंजी घालत असलेला `राग’ गुणगुणणं सुरू होतं. जीवन पुरी किंवा अहीर भैरव गुणगुणायला लागले की, माझा उत्तम मूड जमल्याचं माझं मला जाणवतं.

    लेखक - सुधीर गाडगीळ
    संकलन - संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३