जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
संगीत हे केवळ कर्णसंपुटांना समाधान देणारे साधन नाही, तर संगीताचा प्रत्येक स्वर आणि त्यापासून निर्माण होणारी ध्वनिकंपने शारीरिक समाधान आणि प्रफुल्लित चित्तवृत्तींचे उगमस्थान असतात, ही आता केवळ समजूत राहिलेली नाही. भारतीय संस्कृतीने शतकांच्या सखोल साधनेतून सिद्ध केलेल्या या वास्तविकतेला पुन्हा जनमानसात रुजविण्याची गरज ओळखून स्वार्थनिरपेक्ष काम करणारे
पं. डॉ. चंद्रकांत सरदेशमुख यांच्या निधनाने संगीतसाधनेच्या परंपरेतला एक अलौकिक दुवा निखळला आणि शरीर, मन व संगीत यांच्या नात्याची वैज्ञानिक उकल करण्याचे एक ‘संशोधनव्रत’ खंडित झाले. केवळ आंतरराष्ट्रीय ख्यातीचा उत्कृष्ट सतारवादक, एवढीच पं. सरदेशमुखांची ओळख नाही, तर संगीतविश्व हा मानवाच्या असंख्य भावविश्वांना सांधणारा प्रभावी दुवा आहे, हे ओळखून संगीतप्रसाराचा ध्यास घेतलेला एक आधुनिक मनस्वी माणूस अशी त्यांची खरी ओळख आहे. भारतीय संस्कृतीत संस्कृत मंत्रोच्चारांचे स्थान अढळ आहे, पण मंत्रोच्चार किंवा मंत्रपठण हा ‘पठडीबाज परंपरावाद’ असल्याचे अर्धज्ञान आजही उजळले जाते.
संस्कृत श्लोकांचे संगीतशास्त्रीय पठण मानवी आयुष्याला परमोच्च समाधानाचे क्षण प्राप्त करून देते, मानसिक जाणिवा पराकोटीच्या प्रगल्भ करते आणि जीवन समृद्ध करते. संस्कृत श्लोकपठणातील ध्वनिलहरींच्या कंपनांतून शारीरिक व्याधींचे समूळ उच्चाटन होते, दुष्प्रवृत्ती दूर होतात आणि मनाला आपोआपच माणुसकीचा स्पर्श होतो. अशा तऱ्हेने, मंत्रपठण ही समृद्ध आयुष्यासाठीची एक तप:साधना बनते, हे पं. सरदेशमुखांच्या संशोधनाचे सार! वयाच्या चौथ्या वर्षीपासूनच्या कठोर संगीत साधनेतून साधलेला हा साक्षात्कार समाजास अर्पण करण्याच्या भावनेतून पुढे, संगीत हे आरोग्य आणि मानसिक समाधानप्राप्तीचे साधन ठरावे, यासाठी पं. सरदेशमुख यांचे संशोधन सुरू झाले. वसंत बहरला, की कोकिळेच्या कंठातील अलौकिक सूर माणसाला मोहवून टाकतात. त्या सुरांच्या स्वर्गीयतेची जाणीव त्या कोकिळेला असेलच असे नाही, पण संगीताचा ‘स्वर’ ओळखणारा आणि जोखणारा जाणकार कान प्रकृतीने माणसालाच बहाल केला आहे. हाच ‘जाणता कान’ जोपासावा, यासाठी पं. सरदेशमुख सतत तळमळले.
कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात आणि पुणे विद्यापीठातही संगीत साधना सुरू झाली, हे त्या तळमळीचेच फलित होय. याच तळमळीतून त्यांनी अमेरिका, जर्मनी, ऑस्ट्रेलिया आणि कर्मभूमी जपानमध्ये भारतीय संगीताचे स्वर अजरामर केले. संगीत क्षेत्रातील नव्या दिशांचा शोध आणि वेध घेत नव्या पिढीसाठी संगीतात संशोधन करणाऱ्या पं. सरदेशमुख यांना त्यांच्या वडिलांचा आणि कुटुंबाचा आयुर्वेदाचा वारसा मिळाला होता, पण तो केवळ व्यावसायिकतेसाठी न वापरता, मानवी आरोग्य आणि मनाच्या संपन्नतेसाठी आयुर्वेद आणि संगीतोपचारांची सुरेख सांगड घालणारे संशोधन पं. सरदेशमुखांनी सुरू केले. म्हणूनच, भारतीय संस्कृती आणि तत्त्वज्ञानाची खरी ओळख झालेल्या या ज्ञानवंताने आपल्या अध्र्यामुध्र्या आयुष्यात केलेल्या कामाचे महत्त्व मोठे आहे.
August 5, 2017
मराठीतील लेखिका व समालोचक कुसुमावती देशपांडे यांचा जन्म १० नोव्हेंबर १९०४ रोजी झाला. विदर्भातील प्रसिद्ध वकील रावबहादुर रामकृष्ण रावजी जयवंत ह्यांच्या त्या कन्या. प्राथमिक शिक्षण अमरावतीला व पुढचे शिक्षण पुण्यातील हुजूरपागा शाळेत झाले. शिष्यवृत्तीसह त्या मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्या. नागपूर विद्यापीठाच्या बीएच्या परीक्षेत त्यांना सुवर्णपदक मिळाले, आणि मध्य प्रांत-विदर्भ सरकारची (सी.पी. ॲन्ड बेरार सरकारची) विशेष शिष्यवृत्ती मिळवून त्या इंग्लंडला गेल्या.
पुढे इंग्रजी साहित्यातली लंडन विद्यापीठाची पदवी मिळवून कुसुमावती १९२९ला भारतात परतल्या. त्याच वर्षी त्यांचा आत्माराम रावजी देशपांडे ऊर्फ कवी अनिल यांच्याशी विवाह झाला. नागपूरच्या मॉरिस कॉलेजमध्ये केवळ मुलगे शिकत असल्याने त्यांना इंग्रजीच्या प्राध्यापकाची नोकरी स्त्री म्हणून नाकारली गेली. शेवटी गव्हर्नरपर्यंत जाऊन, भांडून कुसुमावतींनी ती नोकरी मिळविली.
त्यानंतर त्यांनी काही काळ नागपूर आकाशवाणी केंद्रात आणि नंतर दिल्लीच्या केंद्रात त्यांनी कार्यक्रम संचालक म्हणून काम केले. ग्वाल्हेरला भरलेल्या त्रेचाळीसाव्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा मान कुसुमावतींना मिळाला. कुसुमावती देशपांडे यांचे १७ नोव्हेंबर १९६१ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
November 17, 2018
अभिजीत झुंजारराव हे मराठी रंगभूमीवर गाजत असलेलं नाव आहे. तसा अभिजीत अभिनेता म्हणून प्रसिद्ध आहेच पण तो एक उत्कृष्ट नाट्य दिग्दर्शकही आहे. अभिजीत रंगभूमी नेहमी वेगवेगळे पण तेवढेच कलात्मक प्रयोग करीत असतो.
October 31, 2020
विरेंद्र तिखे हा संगणक क्षेत्रातील कल्पनाशक्तीशी निगडीत असलेला एक उत्साही तरूण आहे. कोणत्याही गैरप्रकारांनी व उचला उचली न करता, स्वछ हातांनी कोडींग केलेली संकेतस्थळे लोकांना बनवून देणे, आकर्षक आय कॉन्स तयार करणे, कमीत कमी गिचमिडीमधूनही ग्राहकांना खुप काही सांगून जाणारे लोगोस डिझाइन करणे, प्रेसेन्टेशन्स तयार करणे, यंत्र व त्याला वापरणार्यांमध्ये ॠणानुबंध तयार करणारे, साधे, सोपे परंतु सुबक इंटरफेसेस निर्माण करणे हा त्याचा व्यवसाय असला तरी व्यवसायापेक्षाही, आपल्या अचाट कल्पनाशक्तीचा अविष्कार ग्राहकांना कसा लाभ देईल याचाच विचार तो जास्त करत असतो.
August 16, 2011
‘कथालक्ष्मी’ नावाचे मासिकही ते चालवत असत. त्या मासिकाचे तब्बल वीस वर्षे त्यांनी संपादन केले. या मासिकाच्या निमित्ताने त्यांनी मराठी कथाविश्वाला अनेक नव्या लेखकांचा परिचय करून दिला. त्या मासिकासाठी त्यांनी भालबा केळकर, केशवराव भोळे यांनाही लिहिते केले.वाटवे हे मुलाखतकार म्हणूनही प्रसिद्ध होते. त्यांनी घेतलेल्या शरद तळवलकर, प्रभाकर पणशीकर, राजा गोसावी, विवेक, लालन सारंग यांच्या मुलाखती विशेष गाजल्या. त्यांची अनेकांशी मैत्री होती. चित्रपट क्षेत्राबाबतच्या गप्पांमध्ये ते रंग भरत, जुने किस्से सांगत.
July 9, 2022
४५ व्या वर्षी ते जगातले ४४ वे श्रीमंत व्यक्ती बनले. टेक्सासमधील त्यांचा बंगला हा जगातील १५ वा आलिशान बंगला ठरला.
February 23, 2022
असेच एकदा त्यांच्या क्लासच्या गुरुपौर्णीमेच्या कार्यक्रमात यांनी दुर्गा राग वाजवीत होते. इतक्यात जवळच राहणारे प्रसिध्द संगीततज्ञ सरदार आबासाहेब मुजूमदार त्या ठिकाणी हजर झाले. भालचंद्र चे वादन संपल्यावर ते गुरुजींना म्हणाले, `वा! बबनराव हे रत्न तुम्ही कुठून पैदा केलेत.. ? एका थोर जाणकाराकडून भालचंद्र यांना मिळालेली ती पहिली पावती शाबासकी होती.
April 5, 2022
गोव्याचे पहिले मुख्यमंत्री दयानंद बाळकृष्ण ऊर्फ भाऊसाहेब बांदोडकर यांचा जन्म १२ मार्च १९११ रोजी गोव्यातील पेडणे (पणजी) येथे झाला.
गोमंतकाचे भाग्यविधाते दयानंद बाळकृष्ण बांदोडकर उर्फ भाऊसाहेब बांदोडकर हे गोवा, दमण व दीव या केंद्रशासित प्रदेशांचे पहिले मुख्यमंत्री व एक उद्योगपती. भाऊसाहेब बांदोडकर हे लोकशाही प्रणालीची तत्त्वे मानणारे नेते होते. त्यामुळेच त्यांनी अजूनही गोमंतकीयांच्या हृदयात स्थान कायम ठेवले आहे. ते गोव्यातील उद्योगपती होते (मँगेनिझ खान मालक) अत्यंत दानशूर म्हणून त्यांची ख्याती होती.
भाऊसाहेब बांदोडकर यांचा जन्म गोव्यातील पेडणे (पणजी) येथे सामान्य घराण्यात झाला. त्यांच्या लहानपणीच आई-वडील वारले. प्राथमिक मराठी शिक्षण म्हापसा येथे व माध्यमिक पोर्तुगीज शिक्षण पणजी येथे. पोर्तुगीज व मराठी भाषांबरोबरच फ्रेंच व हिंदी या भाषाही शालेय जीवनातच त्यांनी उत्तम प्रकारे आत्मसात केल्या. जुजबी शिक्षणानंतर त्यांनी आपल्या घराण्याचा व्यावसाय वाढविला व पुढे खाणमालक म्हणून नावलौकिक व विपुल धन मिळविले. त्यांचा विवाह सुशिलाबाई लक्ष्मण पेडणेकर या एका व्यापाऱ्या च्या मुलीशी झाला. त्यांचे सासरचे नाव सुनंदा. १९४२ च्या छोडो भारत आंदोलनाने बांदोडकरांचे राजकीय क्षेत्रात पदार्पण झाले. तरुणपणी रॉयवादी विचारसरणीकडे त्यांचा ओढा होता. त्यातूनच तरूणवर्गाला एकत्र आणून गोव्यात समाज प्रबोधनाचे कार्य हाती घेण्याची त्यांना प्रेरणा मिळाली. भारत स्वतंत्र झाल्यानंतर गोवा मुक्ती आंदोलनास चालना मिळाली. या आंदोलनात त्यांनी सक्रिय भाग घेऊन अनेक भूमिगतांना सर्व प्रकारचे सहकार्य दिले आणि खेडोपाडी पोर्तुगीजांविरुद्ध प्रचार केला; ग्रामीण भागात मराठी शाळा चालाव्यात म्हणून मदत केली. त्यामुळे त्यांना १९५६ साली तीन महिने तुरूंगवास भोगावा लागला.
११ डिसेंबर १९६२ रोजी भारत सरकारने लष्करी कारवाई करून गोवा मुक्त केले. तेव्हा बांदोडकरांनी स्वतंत्र गोव्यात महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाची स्थापना केली. गोवा महाष्ट्रात विलीन करावा, या माताचे ते कट्टर पुरस्कर्ते होते. त्यांनी इंडियन नॅशनल काँग्रेस पक्षाचा दारूण पराभव करून १९६३ च्या डिसेंबरमधील सार्वत्रिक निवडणुकीत एकूण ३० पैकी १४ जागा मिळविल्या. तीन अपक्षांच्या मदतीने त्यांनी बहुमत सिद्ध करून मंत्रिमंडळाची मागणी केली आणि महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे मंत्रिमंडळ स्थापन केले. बांदोडकरांनी निवडणूक लढविली नव्हती; पण कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव ते गोव्याचे पहिले मुख्यमंत्री झाले. त्यांच्याकडे सामान्य प्रशासन, अर्थ, नियोजन व समाजकल्याण ही खाती होती. या पक्षाचे मुख्य उद्दिष्ट गोवा महाराष्ट्रात विलीन व्हावा, हे होते. मुख्यमंत्री झाल्यानंतर गोवा महाराष्ट्रात विलीन करण्यासाठी जनतेचे मत वळविण्याचे त्यांनी ठरविले. त्याकरिता त्यांच्या मंत्रिमंडळाने शेतीविषयक सुधारणा आणि समाजकल्याण हे दोन महत्त्वाचे कार्यक्रम हाती घेतले. केंद्राने गोव्याच्या बाबतीत जनमताचा कौल घेण्याचे ठरविले.
कौल निःपक्षपाती वातावरणात पार पाडावा, म्हणून त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. गोव्यात सहा महिने राष्ट्रपती राजवट लादण्यात आली. या दरम्यान बांदोडकरांनी महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचा अध्यक्ष या नात्याने गोवा महाराष्ट्रात विलीन व्हावा, म्हणून खोड्यापाड्यांतून दौरे काढून प्रचार केला. गोवा केंद्रशासित प्रदेश ठेवावा, की महाराष्ट्रात विलीन करावा, या प्रश्नांवर ३ जानेवारी १९६७ रोजी सार्वमत घेण्यात आले. सार्वमतानुसार गोवा केंद्रशासित प्रदेश ठेवण्यात आला. गोव्याचे महाराष्ट्राशी मीलन व्हावे हे त्यांचे स्वप्न सार्वमतातील पराभवामुळे भंगले असले तरी त्यांनी हार न मानता निवडणूक जिंकून महाराष्ट्राशी गोव्याचे सांस्कृतिक संबंध वाढवून बळकट तर केलेच पण मराठी ही गोव्याची राजभाषा करणारा ठराव असेंब्लीत संमत करून घेतला.
त्यानंतरच्या एप्रिल १९६७ च्या निवडणुकीत बांदोडकर महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षातर्फे बहुमताने निवडून आले व गोव्याचे दुसऱ्यांभदा मुख्यमंत्री झाले. बांदोडकरांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाच्या दहा वर्षांच्या कारकीर्दीत गोव्यात अनेक सुधारणा केल्या. गोव्याचा सर्वांगीण विकास व्हावा, म्हणून त्यांनी अनेक योजना व कार्यक्रम राबविले; शेती व मच्छीमारी यांना प्रोत्साहन दिले; गोव्यातील उद्योजकांना चालना दिली; ग्रामिण शिक्षणाबरोबर त्यांनी मराठी भाषिक शिक्षणाला प्रोत्साहन दिले; तांत्रिक व वैद्यकीय शिक्षणाचा प्रसार केला; साहित्य-कला आदींना उत्तेजन देण्यासाठी गोव्यात कला अकादमीची स्थापना केली; अनेक शैक्षणिक तसेच क्रीडाविषयक संस्थांना त्यांनी सढळ हाताने मदत केली.
गोवा प्रवाशांचे आकर्षण ठरावे म्हणून अनेक योजना त्यांनी कार्यवाहीत आणल्या. कोणत्याही विधायक सामाजिक कार्याला सढळ हाताने मदत करण्यात ते अग्रेसर होते. थोर दानशूर व्यक्ती म्हणून त्यांचा लौकिक होता. गोरगरिबांचे प्रश्न ते जातीने लक्ष घालून सोडवीत. क्रिकेट, शिकार, वाचन, सुग्रास भोजन या गोष्टी त्यांना मनापासून प्रिय होत्या. रसिकतेचे राजस जीवन जगत असतानाही त्यांनी आपल्या खाणीतील मजुरांकडे किंवा मंत्रालयातील फाइलींकडे कधीच दुर्लक्ष केले नाही.
गोवा महाराष्ट्रात विलीन व्हावा, म्हणून ते अखेरपर्यंत प्रयत्नशील होते. त्यांना शशिकला, उषा, क्रांती व ज्योती ह्या चार मुली असून सिद्धार्थ बांदोडकर हा मुलगा होता. सिद्धार्थचे तरुणवयात निधन झाले. लीना चंदावरकरचा पहिला नवरा सिद्धार्थ बांदोडकर होता. भाऊसाहेब बांदोडकर यांच्या मृत्यूनंतर त्यांची मोठी मुलगी शशिकला काकोडकर ह्या गोव्याच्या मुख्यमंत्री झाल्या. त्या आधी बांदोडकरांच्या मंत्रिमंडळात त्या एक सदस्य होत्या.
गोव्याची कला अकादमी ही पु. ल. देशपांडे आणि दामू केंकरे यांच्या संकल्पनेतून व त्या काळातील मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांच्या पुढाकारामुळे उभी राहिली. आधी ती नाट्य अकादमी होती व नंतर ती कला अकादमी झाली.
भाऊसाहेब बांदोडकर यांचे १२ ऑगस्ट १९७३ निधन झाले.
-- संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
March 12, 2022
गो. आ. भट हे जातिवंत पत्रकार होते. शिकाऱ्याला आपल्या सावजाचा 'वास' लागल्यावर तो जिद्दीने, चिकाटीने माग काढतो आणि शेवटी आपली शिकार साधतो. त्यासाठी त्या शिकाऱ्याला प्रचंड कष्ट करावे लागतात. 'योग्य' वेळ येईपर्यंत वाट पाहावी लागते. अनेकवेळा भोवतालची परिस्थिती प्रतिकूल असते. परंतु कसलेला शिकारी प्राप्त परिस्थितीला अनुकूल करून घेतो आणि यशस्वी होतो. प्रदीर्घ काळ महाराष्ट्र टाइम्समध्ये काम केलेल्या गो. आ. भटांकडे या साऱ्याच गोष्टी उदंड होत्या.
एखाद्या बातमीचा 'वास' लागला की भट ते वृत्त मिळविण्यासाठी अक्षरश: जिवाचं रान करायचे. त्यासाठी अनेकांना भेटायचे. फोन करायचे. अनेकवेळा संबंधित व्यक्ती विविध कारणांनी फोनवर भेटायची नाही. पण भट चिकाटीने अनेक ठिकाणी फोन करायचे आणि शेवटी त्या व्यक्तीला हुडकून काढायचे. त्याच्याकडून माहिती घ्यायचे. ती माहिती आपल्या माहितीशी ताडून बघायचे. मिळालेल्या माहितीची पुन:पुन्हा खातरजमा करून घ्यायचे. आणि मग ती बातमी महाराष्ट्र टाइम्समध्ये द्यायचे.
कधी ती बातमी दुधाच्या भेसळीची असे, कधी कलानगरचा परिसर खचत असल्याची असे. पण त्यांची बातमी प्रसिद्ध झाली की सरकारलाही त्याची दखल घ्यावीच लागे. याचे मुख्य कारण म्हणजे भटांनी त्या बातमीवर प्रचंड मेहनत घेतलेली असे आणि त्यातील माहिती अचूक असे. राष्ट्रपती गिरी मुंबईत आल्यावर आपले एकेकाळचे सहकारी कॉम्रेड काळे यांना भेटायला त्यांच्या किंग्ज सर्कलच्या घरी गेले होते. भेट खाजगी होती; परंतु भटांना त्याबाबत कळताच त्यांनी ती बातमी मिळवलीच. दीर्घकाळ त्यांनी मंत्रालय हा 'बीट' सांभाळला होता. अनेक राजकारणी आणि ज्येष्ठ सनदी अधिकारी यांच्याकडे त्यांची उठबस होती. 'ए जर्नालिस्ट शूड बी टाइट लिप्ड' असा एक संकेत आहे. पत्रकाराने कान-डोळे उघडे ठेवावेत; तोंड मात्र जरुरीपुरतेच उघडावे, असा त्याचा मथितार्थ. भटांच्या स्वभावात हा संकेत जणू पूर्र्ण मुरलेला होता.
एरवी अघळपघळ गप्पा मारणारे भट कामाच्यावेळी अगदीच वेगळे असत. कष्टाला पर्याय नाही, हा त्यांच्या पत्रकारितेचा जणू मूलमंत्र होता. तो त्यांनी शेवटपर्यंत पाळला. वांद्याच्या साहित्य सहवासात राहणाऱ्या भटांनी त्या सोसायटीसाठीही बरेच काम केले होते आणि 'अजब सहवास' हे पुस्तकही लिहिलेे. त्यांचा स्वभाव अतिशय साधा. मनाने ते निष्कपट होते. टिंगलटवाळी करणे, उणेदुणे काढणे, एखाद्याच्या मर्मावर बोट ठेवून त्याला जाणीवपूर्वक घायाळ करणे यापासून चार हात लांब राहणारे भट आपल्या सिध्यासाध्या, मदतशील स्वभावामुळे सहकाऱ्यांतच नाही, तर सर्वत्रच प्रिय होते. त्यांच्या निधनाने एक कष्टाळू आणि जातिवंत पत्रकार काळाच्या पडद्याआड गेला आहे.
August 9, 2017
नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांचा जन्म ९ मे १८६६ रोजी झाला. गोपाळ कृष्ण गोखले हे भारतामधील ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध कायदेशीर राजकारणाच्या मार्गाने स्वातंत्र्यलढ्याचा पाया घालणाऱ्या राजकीय व सामाजिक नेत्यांपैकी एक होते. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, भारत सेवक समाज या संघटनांचे ते आघाडीचे नेते होते. रत्नागिरी जिल्ह्यातील कोतळूक या खेड्यात जन्मलेल्या गोखले यांचे बालपण कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथे गेले. त्यांचे प्राथमिक शिक्षणही येथेच झाले. वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांचे वडीलबंधू गोविंदराव यांनी स्वतःचे शिक्षण सोडून आणि त्यांच्या वहिनींनी स्वतःचे दागिने विकून केलेल्या त्यागामुळे त्यांचे उच्च शिक्षण कोल्हापूरचे राजाराम कॉलेज व मुंबईचे एलफिन्स्टन कॉलेज येथे होऊ शकले. १८८४ मध्ये बी.ए. पदवी घेऊन जानेवारी, १८८५ मध्ये पुण्याच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये त्यांनी शिक्षकाची नोकरी स्वीकारली. पुण्याच्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे आजीव सदस्यत्व, फर्ग्युसन कॉलेजमध्ये अध्यापन, १८९५ मध्ये मुंबई विद्यापीठाच्या सिनेटवर फेलो म्हणून नियुक्ती असा प्रवास सुरू असतानाच भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या माध्यमातून त्यांचा सार्वजनिक जीवनात प्रवेश झाला. सार्वजनिक सभेचे सचिव म्हणूनही त्यांनी काही काळ कार्य केले. शेतकऱ्यांचे कर्ज, दुष्काळ व सावकारांचा त्रास आदी विषयांचा सखोल अभ्यास करून सरकारकडे निवेदने पाठवणे, त्याबाबत पाठपुरावा करणे-अशा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांविषयक करण्यात येणाऱ्या कार्यात त्यांनी शिस्त निर्माण केली. त्यामुळे त्यांच्या निवेदनांना सर्वत्र मान्यता मिळाली.
बाळ गंगाधर टिळक आणि त्यांचा राजकीय प्रवास एकाच व्यासपीठावरून सुरू झाला. लोकमान्यांना जहालवादी राजकारण मान्य होते तर गोखलेंनी मवाळवादाचा मार्ग स्विकारला. त्यांनी लोकशिक्षण, अस्पृश्यता / जातीव्यवस्था निर्मूलन, स्त्रीशिक्षण, स्त्रीस्वातंत्र्य यांच्या माध्यमातून समाजकार्य केले. तत्कालीन इंग्रजी शासकांना समजेल अशाप्रकारे त्यांनी समाज सुधारणा मांडल्या आणि त्या मान्य करून घेतल्या. १९०२ साली त्यांची निवड मध्यवर्ती कायदेमंडळावर झाली. या निवडीचा त्यांनी पूर्णपणे उपयोग केला आणि विविध समस्यांना तसेच प्रश्नांना वाचा मिळवून दिली. या दरम्यान त्यांच्यातील क्षमतेची दखल घेऊन तत्कालीन व्हाईसरॉय लॉर्ड मिंटो यांनी नामदारांना १९०९ सालच्या मोर्ले-मिंटो सुधारणा कायद्याचा मसुदा तयार करण्यास सांगितले.
त्यासाठी ते इंग्लंड येथे वास्तव्य करून होते. त्या दरम्यान त्यांनी तेथील पार्लमेंटच्या सदस्यांना भेटून भारतातील समस्या आणि प्रश्न त्यांच्या कानी घातले आणि त्याकारणी त्यांचा पाठिंबा मिळविण्यात यशस्वी झाले. १८८९ मध्ये काँग्रेसच्या व्यासपीठावर केलेल्या पहिल्या भाषणापासून त्यांचा काँग्रेसशी संबंध प्रस्थापित झाला. आयुष्याच्या अखेरीपर्यंत ते काँग्रेसशी एकनिष्ठ राहिले. काँग्रेसचे ते राष्ट्रीय पातळीवरील नेते म्हणून गणले जात. डिसेंबर, १९०५ मध्ये बनारस येथे भरलेल्या काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली. त्यांनी काँग्रेसचे कार्य भारतात व इंग्लंडमध्येही केले. भारताच्या सेवेसाठी तरुण त्यागी, निष्ठावान कार्यकर्ते घडवण्याच्या उद्देशाने १३ जून, १९०५ रोजी त्यांनी भारत सेवक समाजाची (The Servants of India Society) स्थापना केली. मुंबई प्रांताच्या विधिमंडळाचे सभासदत्व, सन १९०२ पासून मध्ये केंद्रीय कायदेमंडळाचे सभासदत्व अशी अनेक मानाची पदे त्यांनी भूषविली. ते प्रदीर्घ काळ केंद्रीय कायदे मंडळाचे सभासद होते. सभागृहात अर्थसंकल्पावरील भाषणे गाजविणे हा तर त्यांचा हातखंडा होता. ते भारतातील पहिल्या श्रेणीचे अर्थतज्ज्ञ होते. त्या काळी भारतातील ब्रिटिश राज्याच्या वाढत्या खर्चाची चौकशी करण्यासाठी लॉर्ड वेल्बी यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या आयोगासमोर गोखले यांची साक्ष अतिशय महत्त्वाची ठरली होती.
या बुद्धिमत्तेच्या व गाढ व्यासंगाच्या आधारे दिलेल्या साक्षीमुळे त्यांचे नाव महाराष्ट्रात किंवा भारतातच नव्हे, तर परदेशातही प्रसिद्ध झाले. न्यायमूर्ती रानडे यांच्या आर्थिक व राजकीय विचारांचा गोखले यांच्यावर विशेष प्रभाव होता. ते न्यायमूर्ती रानडे यांना आपल्या गुरुस्थानी मानत; तर गोखले यांच्या अंगी असलेल्या शुचिता, नैतिकता, तत्त्वनिष्ठता, सौजन्यशीलता व नि:स्वार्थी सेवावृत्ती आदी गुणांनी प्रभावित होऊन महात्मा गांधीजी त्यांना (गोखले यांना) गुरुस्थानी मानत असत. गांधीजी त्यांना ‘महात्मा गोखले, धर्मात्मा गोखले’ म्हणत. भारतात सर्वप्रथम कायद्याचे राज्य, शांतता, सुव्यवस्थेचे प्रस्थापन, आधुनिक विचारांचे केलेले बीजारोपण, देशात केलेल्या अनेक सुधारणा यांमुळे इंग्रजी सत्तेविषयी त्यांचे धोरण मवाळ होते. कोणतीही चळवळ कायद्याच्या चौकटीतून करणे, स्वदेशीच्या वापरातून आपल्या देशातील उत्पादनास चालना देऊन आर्थिक उद्दिष्ट साध्य करणे असे त्यांचे विचार असत. गोपाळ गणेश आगरकरांनी सुरू केलेल्या ’सुधारक’ च्या इंग्रजी आवृत्तीची जबाबदारी नामदार गोखले यांनी काही काळ सांभाळली.
सार्वजनिक सभा, राष्ट्रसभा समाचार या वृत्तपत्रांतूनही त्यांनी लेखन केले. वृत्तपत्रातील लिखाणाद्वारे ते समाजसुधारणांचा सतत पाठपुरावा करत. ‘राजकारणाचे आध्यात्मिकरण’ ही अतिशय वेगळी (परंतु कोणत्याही स्तरावरील, क्षेत्रातील राजकारणात सर्वकाळ अत्यावश्यक असणारी) संकल्पना त्यांनी भारतात मांडली. राजकारण हे साधन शुचितेला महत्त्व देऊन, सेवाभावाने करायचे विशेष कार्य आहे , असे त्यांचे ठाम मत होते. चारित्र्य, नैतिकता, नि:स्वार्थी वृत्ती या सद्गुणांचा त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला, स्वतःचे आदर्श उदाहरणही तत्कालीन नेत्यांसमोर व जनतेसमोर ठेवले. १९०५ साली त्यांनी भारत सेवक समाजाची स्थापना केली.नामदार गोखले यांच्या स्मरणार्थ पुणे शहरात 'गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अॅन्ड इकॉनॉमिक्स' नावाची संस्था स्थापन करण्यात आली. ते संपूर्ण आयुष्य राजकारणात राहूनही ’राजकारण’ न करता विशुद्ध सार्वजनिक जीवन जगले नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांचे १९ फेब्रुवारी १९१५ निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
May 9, 2019
Copyright © 2025 | Marathisrushti