जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
गावकर, दादा
लोकसंस्कृतीमध्ये अश्वत्थाचा पट नावाचं एक व्रत आहे. पिंपळाच्या पाच प्रकारच्या पानांचं पूजन या व्रतात केलं जातं. त्यातलं हिरवं पान असतं सौंदर्यासाठी, कोवळं पान असतं नवजात पुत्रासाठी, पिकलेलं पान असतं पतीच्या दीर्घायुष्यासाठी, वाळलेलं पान असतं सुख-समृद्धीच्या वृद्धीसाठी आणि फाटलेलं पान असतं अमर्याद संपत्तीसाठी. आपल्या कार्याप्रती अविचल निष्ठा असणाऱ्या आणि संघसंस्कारांनी भारल्या गेलेल्या भिवा केशव तथा दादा गावकर नावाच्या गिरणगाववासीयानं गेल्या साठ-पासष्ट वर्षांत हे व्रत कधी केलं असावं अशी शक्यताच नाही,
पण त्यानं ऐकलेली ‘पिंपळपानांची सळसळ’ मात्र आयुष्याच्या प्रवासाची धगधगती आणि रोमांचकारी कथानकं रेखाटती ठरली. कोकणच्या लाल मातीत जन्माला आलेला हा मुलगा आपल्या वाटय़ाला आलेलं आयुष्य जगत असताना दुसऱ्याच्या आयुष्याचाच विचार करीत राहिला, त्याला जगण्याची दिशा आणि बळही देत राहिला. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीनं म्हणूूनच गोखले न्यासाच्या वतीनं दिला जाणारा एक लाख रुपयांचा अंत्योदय पुरस्कार देऊन गावकरांच्या कार्याला समुचित अभिवादन केलं आहे. दादा गावकर वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षी शिक्षणासाठी मुंबईत आले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्याशी त्यांची नाळ जुळली आणि आयुष्याला नवी दिशाच मिळाली. गिरणगावातलं तेव्हाचं वातावरण पोरांच्या टवाळखोऱ्या, गुंडांच्या मारामाऱ्या यासाठी प्रसिद्ध होतं, संघ जीवनात आला नसता तर माझ्या हातात कदाचित पत्ते आले असते, दारूची बाटली आली असती, खिशात रामपुरी आला असता आणि मीही सातरस्त्यावरच्या पोरांसारखा भाईगिरी करताना दिसलो असतो हे ‘पिंपळपानांची सळसळ’मधलं गावकरांचं वाक्य त्यांच्या आयुष्याला मिळालेली दिशा दर्शविणारं आहे. गिरणगावातील विद्यार्थ्यांभोवतीचीप्रतिकूल परिस्थिती त्यांना अस्वस्थ करीत होतीच. त्यांच्याच उत्कर्षांसाठी त्यांनी अवघ्या विसाव्या वर्षी विद्यार्थी उत्कर्ष मंडळ स्थापन केलं. गेली पंचावन्न र्वष ते अविरत कार्यरत आहे. या मंडळानं सुरू केलेली विवेकानंद व्याख्यानमाला महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे, नव्हे एक ज्ञानतीर्थ म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. तिकिटं लावून व्याख्यानमाला आयोजित करण्याचा धाडसी उपक्रम मंडळानं मुंबईतल्या गिरणगावासारख्या वस्तीत प्रथमच सुरू केला आणि त्याचा सुवर्णमहोत्सवही गेल्या वर्षी पार पडला. गावकरांनी विद्यार्थी क्षेत्रात तर डोंगराएवढं काम केलंच, पण त्याशिवाय सामाजिक, धार्मिक आणि काही अंशी राजकीय क्षेत्रातही त्यांनी काम केलं. त्यांच्या एकसष्टीनिमित्त झालेल्या कार्यक्रमात त्यांना जो निधी अर्पण करण्यात आला, त्यात तेवढीच स्वत:ची रक्कम घालून गावकरांनी एक प्रतिष्ठान स्थापन केलं. समाजात काम करणाऱ्या आणि प्रसिद्धीपासून चार हात दूर राहणाऱ्या गुणवंत कार्यकर्त्यांचा सत्कार आणि गिरणगावातील महापालिका शाळांतील तसंच खाजगी शाळांमधील हुशार विद्यार्थ्यांचं कौतुक करण्याचा या प्रतिष्ठानचा उपक्रम वाखाणला गेला आहे. गावकर फारसे शिकले नाहीत, पण त्यांनी जो सहकाऱ्यांचा-सोबत्यांचा परिवार उभा केला त्याचं वर्णन करताना डॉ. शिवाजीराव भोसले यांनाही गावकर हे चालतंबोलतं विद्यापीठच आहे, समाजसेवेची ती एक सांस्कृतिक मुद्रा आहे असं म्हणावंसं वाटलं. गावकरांनी सव्र्हेलन्स इन्स्पेक्टर म्हणून सातपुडय़ासारख्या आदिवासी भागात तीन र्वष नोकरीही केली. आदिवासी जनजीवन, त्यांच्या चालीरीती, त्यांच्यात वावरताना आलेले प्रत्ययकारी अनुभव याचं वर्णन ‘पिंपळपानांची सळसळ’मध्ये आलं आहे. त्याचा मोठा वाटा त्यांच्या जीवनातील यशाच्या आरेखनात आहे. यश काही सहजासहजी प्रत्येकाच्या वाटय़ाला येत नाही, त्यासाठी परिस्थितीशी झुंजावं लागतं, परीक्षांचे पत्थर फोडावे लागतात. शून्यातून विश्व उभं करण्याची महत्वाकांक्षा उरी बाळगावी लागते. गावकर हा असा एक समाज-विश्व उभा करणारा शिल्पी आहे, कोकणी काव्र्हर आहे. सामाजिक क्षेत्रातल्या कार्यकर्त्यांसाठीचं चालतंबोलतं पाठय़पुस्तक आहे. पिंपळ हा पुण्यवृक्ष मानला जातो. आदिवासी समाज तर याला राज्याचा द्वाररक्षक मानतात. गावकर हा असा पिंपळवृक्ष आहे, त्याला मिळालेल्या पुरस्कारासाठी मन:पूर्वक अभिनंदन.
सुर्यकांत दाणेकर हे किर्ती प्रकाशन, या प्रसिध्द संस्थेचे संपादक म्हणून कार्यरत आहेत. नवोदित लेखक व कवींना आपल्या प्रतिभेचे अविष्कार रसिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी ही प्रकाशन संस्था नेहमी तत्पर असते. आजपर्यंत प्रख्यात लेखिका अनुराधा वैद्य, रेखा बैजल यासारख्या अनेक हौशी व अनुभवी लेखकांचे साहित्य त्यांनी आपल्या निखळ साहित्यप्रेमापोटी आग्रहाने प्रकाशित केले. व्यक्तिशः हिंडून फिरून आपल्या पुस्तकांचे वितरण करणार्या काही मोजक्या संपादकांपैकी ते त्यांचे नाव प्रथम घ्यायला हवे. साहित्य निवडण्यातील त्यांच्या चोखंदळपणामुळे त्यांनी आपल्या वाचकवर्गाला नेहमीच दर्जेदार वाड्मय प्रदान केले आहे.
उत्तम शाब्दिक विनोद, बहारदार शाब्दिक कोट्या, दर्जेदार मुद्राभिनय, स्लपस्टिक कॉमेडीसाठी लागणारी शरीराची कल्पनातीत लवचिकता, हजरजबाबीपणा व अफाट टायमिंग सेन्स!
आज २५ ऑक्टोबर.... नटवर्य चित्तरंजन कोल्हटकर यांची पुण्यतिथी.
त्यांचा जन्म १५ जानेवारी १९२३ रोजी अमरावती येथे झाला.
संगीत रंगभूमीवरील सुप्रसिद्ध अभिनेते चिंतामणराव कोल्हटकर हे त्यांचे पिताश्री तर विनोदी साहित्याचे मेरूमणी श्रीपाद कृष्ण कोल्हटकर हे चित्तरंजन कोल्हटकर यांचे चुलते.
संगीत नाटक अकादमी आणि राष्ट्रपती पदक विजेत्या चित्तरंजन कोल्हटकर यांनी कोल्हापूर येथे १९४४ साली ललित कला कुंजच्या भावबंधन याच नाटकाद्वारे रंगभूमीवर पदार्पण केले. मात्र पदार्पणातील त्यांची भूमिका घनःश्यामची नसून मोरेश्वरची होती. घनःश्यामची भूमिका त्यांनी प्रथम १९४९ मध्ये केली. आपल्या समर्थ अभिनयाने त्यांनी भावबंधन नाटकातील घनःश्यामची भूमिका अजरामर केली. मात्र याच भूमिकेने त्यांच्यावर खलनायकाचा शिक्का बसला आणि खलनायकाच्या भूमिकेलाही त्यांनी नवीन उंचीवर नेऊन ठेवले.
तत्पुर्वी १९४७ मध्ये गरीबांचे राज्य या चित्रपटाद्वारे त्यांनी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. कुंकवाचा धनी या १९५० मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटात त्यांनी शांताबाई आपटे यांच्याबरोबर नायकाची भूमिका प्रथमच केली. त्यानंतर त्यांनी पेडगावचे शहाणे, शेवग्याच्या शेंगा, मोहित्याची मंजूळा, हिरवा चूडा, थांब लक्ष्मी कुंकु लावते, जावई माझा भला, तू तिथे मी आदी ८० पेक्षा जास्त चित्रपटातून त्यांनी भूमिका केल्या.
त्यांच्या ऐतिहासिक नाटकातील भूमिका अतिशय गाजल्या. आग्य्राहून सुटका, बेबंदशाही, पद्मिनी, इथे ओशाळला मृत्यू, नटसम्राट आदी प्रसिद्ध मराठी नाटकांतून त्यांनी अजरामर भूमिका केल्या. भावबंधन प्रमाणेच एकच प्याला, स्वामिनी, दुरीतांचे तिमिर जावो, गारंबीचा बापू, पंडितराज जगन्नाथ, अश्रूंची झाली फुले इ. नाटकांमधील त्यांच्या भूमिका प्रसिद्ध आहेत. काही नाटकांचे त्यांनी दिग्दर्शनही केले.
इंदुर येथे १९८७ मध्ये झालेल्या ६८ व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. नाट्यपरिषदेच्या पुणे शाखेचेही ते अध्यक्ष होते. तर संस्कार भारती चे ते महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदही त्यांनी भूषविले होते. त्यांना सिने आणि नाट्य अभिनयासाठी विविध पुरस्कार प्राप्त झाले होते. त्यात विष्णूदास भावे पुरस्कार, शासनाचा चिंतामणराव कोल्हटकर पुरस्कार, छ. शाहू पुरस्कार, अल्फा गौरव पुरस्कार, नानासाहेब फाटक जीवनगौरव पुरस्कार आदींचा समावेश आहे.
चित्तरंजन कोल्हटकर यांचे निधन २५ ऑक्टोबर २००९ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
मिरजकर, युसूफ
भारतीय वाद्यांच्या निर्मितीमागील विज्ञान समजून घेऊन त्यात आपला जीव ओतणारे कारागीर ते वाद्य वाजविणाऱ्यांसाठी फार महत्त्वाचे असतात. पुण्याचे युसूफभाई मिरजकर हे अशांपैकी एक होते. त्यांच्या अपघाती निधनाने त्यांनी तयार केलेल्या वाद्यांवर आनंद निर्माण करणारे अनेक कलावंत आणि रसिक दु:खी होणे स्वाभाविक आहे. पंडित भीमसेन जोशी यांच्यापासून ते रईस खाँ यांच्यापर्यंत अनेक ज्येष्ठ कलावंत युसूफभाईंनी तयार केलेल्या वाद्यांवर फिदा असत.
वाद्यनिर्मिती ही जरी आनंद निर्माण करण्याचे साधन असले, तरीही त्यामागे विज्ञानाची पक्की बैठक असते. सतार, सरोद, विचित्र वीणा, व्हायोलिन, तबला, हार्मोनियम अशा वाद्यांमधील विज्ञानाचे सार लक्षात आल्याशिवाय त्या वाद्यांची निर्मिती अशक्य असते. त्यासाठी विज्ञान शिकावे लागत नाही, तर त्या विज्ञानाचा उपयोग समजून घ्यावा लागतो. सुमारे २०० वर्षांपूर्वी मिरजेत आलेल्या वाद्यनिर्मितीकारांनी भारतीय संगीतात आपण अपरिहार्य असल्याचे सिद्ध केले आहे. युसूफभाई हे अशा वाद्यनिर्मितीकारांच्या ३६ व्या पिढीचे प्रतिनिधी. भाईबंद मिरजेत राहिले आणि युसूफभाईंचे वाडवडील पुण्यात आले. पुण्याच्या लक्ष्मी रस्त्यावर त्यांनी आपले दुकान थाटले आणि मग तिथे अनेक ज्येष्ठ कलावंतांचा राबता सुरू झाला. एखादा पदार्थ तयार करताना त्या माऊलीच्या ‘हाताची चव’ त्यात सहजपणे विरघळते, असा अनुभव आपल्या सगळय़ांना येतो. पुस्तकात वाचून पदार्थ तयार करण्याचा सोस असणाऱ्यांना ‘काहीतरी कमी’ असल्याचे जाणवत राहते. वाद्यांच्या बाबतीत तसेच घडते. त्या वाद्याच्या जडणघडणीमागे असणाऱ्या हाताची कमाल ते वाद्य बोलायला लागल्यावर लक्षात येते. युसूफभाईंचा हात प्रत्येक वाद्यावर ज्या मायेने फिरत असे, ते प्रेमच त्यांच्या वाद्याला सजीव करत असे. लाकडावर ताणून बसविलेल्या तारांचा झंकार होण्यासाठी जवारीची गरज असते. जवारी हा भारतीय संगीतातील एक वैज्ञानिक असला तरीही मनाला जाणवणारा चमत्कार आहे. ही जवारी काढणे ही मोठी कुशलतेची गोष्ट असते. प्रत्येकाला ती जमतेच असे नाही. युसूफभाई मात्र जवारी काढण्यात पटाईत होते. वाद्य तयार करणाऱ्याला त्यातून निर्माण होणाऱ्या संगीताची मोठी जाण असावी लागते. युसूफ मिरजकर हे त्या अर्थाने वादक नसले, तरीही त्यांच्या तंतुवाद्यांवरची हुकमत अफाट होती. त्यांच्या हाती वाद्य आले, की ते त्याच्यावर ज्या आत्मीयतेने ‘उपचार’ करायचे, की त्या वाद्यानेही सजीव होऊन त्यांचे आभार मानावेत! पुण्याच्या मानाच्या सवाई गंधर्व संगीत महोत्सवात येणाऱ्या सगळय़ा दिग्गज कलावंतांना युसूफभाई तिथे आहेत, याचाच आधार असायचा. आपली वाद्ये सुस्थितीत ठेवून ती संगीतानुकूल ठेवण्यात त्यांचा हातखंडा होता. वादक आणि संगीतकार म्हणूनच या पडद्यामागील खऱ्या कलावंताच्या प्रेमात असत. आयुष्यभर संगीताची खरी सेवा करणारा हा एक वाद्यनिर्मिती करणारा कलावंतच होता. रस्त्यावरील अपघातात त्यांचा जागीच मृत्यू होणे ही जशी धक्कादायक बाब आहे, तशीच मनाला चटका लावून जाणारी घटना आहे.
निम्मी यांचे नाव नवाब बानू आहे. राजकपूर यांच्या बरसात चित्रपटात त्यांचे निम्मी हे नाव ठेवण्यात आले. त्यांचा जन्म १८ फेब्रुवारी १९३३ रोजी झाला.मुळात त्यांची बॉलिवूडमधील एंट्री मजेदार होती. त्या लाहोरहून मुंबईत आल्यानंतर सरदार अख्तर आणि महिबूब खान यांच्याकडे राहत होत्या. एकदा राजकपूर जद्दनबाई (नर्गिस यांची आई) यांच्याकडे आले होते. त्यावेळी त्यांना ‘बरसात’ या चित्रपटासाठी हिरोईन हवी होती. बऱ्याच मुली पाहिल्यानंतरही त्यांना हवी तशी हिरोईन मिळत नव्हती. जद्दनबाई कडे आल्यानंतर शेजारी बसलेल्या निम्मी यांच्याकडे त्यांचे लक्ष गेले. त्यांनी मेहबूब खान यांच्याजवळ जावून सांगितले, ‘ही मुलगी मला हिरोईन म्हणून हवी आहे’ त्यावेळी निम्मी काही बोलल्या नाहीत. त्यांना त्यांच्या आजी काय म्हणतील याची भीती होती. सरदार अख्तर यांनी त्यांच्या आजीशी संपर्क साधला, विशेष म्हणजे त्यांच्या आजीनेही होकार दिला. त्यानंतर त्यांची स्क्रीन टेस्ट झाली आणि त्या उत्तीर्ण होऊन, त्यांची बरसात चित्रपटासाठी निवड झाली. पन्नाशीच्या दशकात अनेक चित्रपटांमधून आपल्या अभिनयाची छाप सोडलेल्या निम्मी यांचे नाव दिलीपकुमारसह अनेकांशी जोडले गेले. पन्नासाव्या दशकात मधुबाला, नर्गिस, नूतन, मीना कुमारी, गीता बाली, सुरैय्या यांच्यासारख्या अभिनेत्रींसोबत काम करताना निम्मी यांनी आपले स्थान वेगळे राखले. बरसात (१९४९), दीदार (१९५१), दाग (१९५२), उडन खटोला (१९५५) मेरे मेहबूब (१९६३), पूजा के फुल, अकाशदीप (१९६५), लव्ह अँड गॉड या चित्रपटातून निम्मी यांनी काम केले. दिलीप कुमार यांच्यासोबतच्या यशस्वी कारकीर्दीमुळे अनेकांचे लक्ष त्यांच्याकडे गेले. यावेळी दिलीप कुमार यांच्याशी त्यांचे प्रेम असल्याचे वृत्त पसरले होते. अर्थात दिलीप कुमार आणि निम्मी यांनी याचा इन्कार केला. दिलीप कुमार यांचे प्रेम त्यावेळी मधुबाला यांच्यावर होते. निम्मी यांचे प्रेम पटकथालेखक एस. अली रझा यांच्यावर होते. रझा हे विख्यात कथालेखक, पटकथालेखक आगाजानी कश्मिरी यांचे भाचे. दोघेही लखनौ येथील. रझा यांच्याशी लग्न करून त्या मुंबईत स्थायिक झाल्या. महेबूब स्टुडिओ सोडण्यास निम्मी याच कारणीभूत ठरल्या. संपूर्ण आयुष्य तू याच स्टुडिओत राहून आपली कारकीर्द संपविणार आहे का? असा प्रश्न निम्मी यांनी विचारल्यानंतर रझा यांनी हा स्टुडिओ सोडला. निम्मी त्यांच्या लिखाणाच्या फॅन होत्या. आकाशदीप हा त्यांचा शेवटचा चित्रपट. निम्मी आणि त्यांच्या पतींना मूल नव्हते. त्यांना दोनदा अपत्य होऊ शकले नाही. त्यांनी आपल्या बहिणीचा मुलगा दत्तक घेतला. मरताना त्यांच्या बहिणीने त्यांच्याकडून तसे आश्वासन घेतले होते. ४२ वर्षे लग्नानंतर म्हणजे एस. अली रझा यांच्या निधनानंतर त्यांची ताटातूट झाली. जून १९९१ साली निम्मी या पुन्हा एकदा प्रकाशझोतात आल्या. हिंदी अभिनेत्री किमी काटकर ही निम्मी यांची मुलगी आहे, अशा अफवा उठल्या होत्या.निम्मी या अत्यंत कमी बोलणाºया अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध होत्या. बॉलीवूडमधील समारंभ, पार्टीजमध्ये दिलीप कुमार यांच्यासोबत त्या बर्याचवेळा दिसून आल्या आहेत.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०७१३३
संदर्भ.इंटरनेट
डिटको यांचे आयुष्य अगदी बंदिस्त होते. त्यांनी कधी मुलाखती दिल्या नाहीत किंवा जाहीर कार्यक्रम घेतले नाहीत. अतिशय नम्र असे त्यांचे व्यक्तित्व. त्यांनी प्रत्येकाच्या मनात दडलेला नायक ‘स्पायडरमॅन’च्या रूपाने चित्ररूपात प्रकट केला.
सांस्कृतिक वारसा लाभलेल्या ठाणे शहरास क्रीडापटूंची नगरी असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी राष्ट्रीय पातळीवर बॅडमिंटन ह्या क्रीडाप्रकारात यश प्राप्त करुन इशान नकवी ह्याने ठाण्याचा राष्ट्रीय पातळीवर गौरव केला.
आपल्या सुरेल स्वरांने आणि अविट गोडीच्या संगीताने मराठी भावगीतांना अनोखी उंची प्राप्त करुन अर्थघन भावगीतांचे नवे युग निर्माण करणारे गजानन वाटवे.
काही माणसांच्या लोकप्रियतेचे रहस्य त्यांच्या कामाइतकेच व्यक्तिमत्त्वातही असते. ते किशोर कदम यांच्यातपण आहे. किशोर कदम यांना महाराष्ट्राचा लाडका कवी आणि नट म्हणता येईल. संवेदनशील कलावंत म्हणून सुद्धा किशोर कदम यांनी रसिकांच्या हृदयात स्थान निर्माण केले आहे. ‘गारवा’ या अल्बमसाठी त्यांनी लिहिलेल्या कविता विशेष गाजल्या. ‘गारवा’ची लोकप्रियता हा एक विक्रम आहे आणि तो कोणीच मोडू शकलेला नाही.
प्रेम आणि पाऊस या कवी सौमित्र यांच्या कवितेतील खास बाबी आहेत. त्याने गुलजार यांच्या अनेक कविता हिंदीतून मराठीत आणल्या. गुलजार यांनीदेखील त्याच्या कविता हिंदीत नेल्या. ते सध्या गुलजारांवरील ‘बात पश्मिनेकी’ हा कार्यक्रम सादर करतात. किशोर कदम यांचे नाव मराठी चित्रपटसृष्टीत ज्येष्ठतेच्या यादीत घेतले जात आहे. नटरंग, जोगवा, फॅण्ड्री अशा अनेक चित्रपटांत उत्कृष्ट अभिनेता म्हणून त्यांनी पुरस्कार मिळविले आहेत.
अधिक माहितीसाठी खालील लिंक्स क्लिक करा.
मराठी काव्यविश्वात मनसोक्त मुशाफिरी करणारे कवी सौमित्र (9-Nov-2016)
कवी सौमित्र उर्फ किशोर कदम (15-Nov-2017)
मराठी कवी सौमित्र उर्फ किशोर कदम (12-Jun-2019)
कवी सौमित्र उर्फ किशोर कदम (9-Nov-2021)
# Kadam, Kishor
Copyright © 2025 | Marathisrushti