जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
मल्लिका साराभाई या नर्तकी मृणालिनी साराभाई व वैज्ञानिक विक्रम साराभाई यांची कन्या. समांतर सिनेमा पासून आपल्या करीयरची त्यांनी सुरवात केली. त्यांचा जन्म ९ मे १९५४ रोजी झाला.
मल्लिका साराभाई यांनी पीटर ब्रुक यांचे नाटक महाभारत मध्ये द्रोपदी ची भूमिका केली होती. याच नाटकावर नंतर चित्रपट बनवला गेला होता. मल्लिका साराभाई यांनी भारतात व परदेशात अनेक कार्यक्रमात भाग घेतला आहे. मल्लिका साराभाई यांनी हर्ष मन्दर यांच्या पुस्तकावर आधारित अनसुनी या नाटकाची पटकथा लिहिली आहे. मल्लिका साराभाई या दर्पणा अकादमी ऑफ आर्टस् (अहमदाबाद) च्या निदेशक आहेत.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
टाटा मोटर्स या नामांकित कंपनीसाठी सरपोतदार यांनी अनेक जाहिराती आणि माहितीपट (डॉक्युयमेंटरी) तयार केले. अजय सरपोतदार यांनी आपल्या विविधांगी कारकिर्दीत हैदराबाद येथील जगप्रसिद्ध रामोजी फिल्म सिटीत अनेक वर्ष वरिष्ठ निर्माते म्हणून जबाबदारी सांभाळली.
मराठीबरोबरच प्रादेशिक वाहिन्यांचे काम त्यांच्याकडे देण्यात आले होते. आपले वडिल विश्वा स सरपोतदार आणि आजोबा नानासाहेब सरपोतदार यांच्या पावलावर पाऊल टाकत चित्रपट क्षेत्रात काम करू लागलेले अजय सरपोतदार १९९५ मध्ये "पैंजण' या चित्रपटाद्वारे दिग्दर्शनाच्या क्षेत्रात उतरले.
आजोबा नानासाहेब सरपोतदार यांनी १९१९ साली स्थापन केलेल्या आर्यन फिल्म कंपनीचे त्यांनी पुनरूज्जीवन केले. या कंपनीच्या बॅनरखाली सरपोतदार यांनी अलिकडेच कोटींचे बजेट असलेल्या उलाढाल या चित्रपटाची निर्मिती केली होती. बॉलिवूडमधील चित्रपटांच्या तोडीसतोड असे तांत्रिक पाठबळ वापरून हा चित्रपट तयार करण्यात आला होता. त्याचे चित्रिकरण मॉरिशसमध्ये करण्यात आले.
अजय सरपोतदार यांनी मॉरिशसमध्ये झालेल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट महोत्सवाचे यशस्वीरित्या आयोजन केले.
अजय सरपोतदार यांच्यावरील संपूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
# Sarpotdar, Ajay
कसोटी क्रिकेट संपले की क्रिकेटपटू काय करतात? कुणी आपल्या कार्यालयाचे काम इमानेइतबारे करायला लागतो. किमान पूर्वीच्या काळातील क्रिकेटपटू तरी हे करायचे. काही क्रिकेटपटू क्रिकेट प्रशिक्षकाच्या पेशाकडे वळतात. काहींनी समालोचकाचा माईक हातात धरला. काहींनी क्रिकेट अॅकॅडमीज् सुरू केल्या. काहींनी क्रिकेट प्रशासन व्यवस्थेकडे लक्ष द्यायला सुरुवात केली. अजित वाडेकरांनी काय केलं?
अजित वाडेकरांनी सर्वप्रथम आपल्या कार्यालयाला न्याय दिला. फावल्या वेळात त्यांनी अपंग क्रिकेटपटूंसाठी संघटन कार्य करायला सुरुवात केली. १९८८ मध्ये अपंग क्रिकेटपटूंची संघटना स्थापन झाली. तेव्हापासून आजतागायत या क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष आहेत. आज या संघटनेने २३ राज्यांच्या संघटनांना आपल्या कृपाछत्राखाली घेतले आहे. रणजी करंडक, दुलीप करंडक, इराणी करंडक क्रिकेट स्पर्धाच्या धर्तीवर ही संघटना अपंगांसाठी क्रिकेट स्पर्धाचे आयोजन करते. ३ वर्षांपूर्वी या संघटनेने इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय क्रिकेट मालिकेचे आयोजन केले होते.
भारताने ही मालिका जिंकली होती. अपंगांसाठीच्या मिनी वर्ल्ड कप स्पर्धेच्या आयोजनाचा विचार ही संघटना करीत आहे.अपंग क्रिकेटपटूंच्या या भरारीला पंख देण्याचे काम अजित वाडेकरांनी केले. त्यांच्या सहकाऱ्यांनी केले. आयपीएलसारख्या लिगवर करोडो रुपये उधळणाऱ्या भारतीय क्रिकेट संघटनेला मात्र अद्याप अपंगांना मदतीचा हात द्यावासा वाटत नाही हे क्रिकेटचे दुर्दैव. सुदैवाने अपंग क्रिकेटपटंना अजित वाडेकरांसारखा मसिहा भेटला. ज्याने आपल्या प्रसिद्धीच्या वलयाचा अपंगांच्या क्रिकेटसाठी वापर केला. आपल्या नोकरीतील पदाचा लाभ अपंगांच्या क्रिकेटसाठी केला.
वाडेकरांच्या या कार्याची दखल सातासमुद्रापलिकडच्या अमेरिकन क्रिकेट संघटनेने घेतली. त्यांना ‘हॉल ऑफ फेम’मध्ये त्यांनी स्थान दिले. सर गारफिल्ड सोबर्स, विवियन रिचर्डस, मायकेल होल्डिंग, सुनील गावसकर यांच्यासारख्या महान क्रिकेटपटूंच्या ‘हॉल ऑफ फेम’मध्ये त्यांनी अजित वाडेकरांना बसविले. १९७१ ला वेस्ट इंडिजला कॅरिबियन द्विपसमूहात मालिकेत पराभूत करता येते हे स्वप्न वाडेकरांनी प्रत्यक्षात उतरविले होते. ब्रिटिशांना त्यांच्याच भूमीवर मालिकेत लोळविण्याचा पराक्रम वाडेकरांच्या भारतीय संघाने केला होता.
१९७१ नंतर भारतीय क्रिकेट संघाकडे पाहण्याचा जगाचा दृष्टीकोन वाडेकरांनी बदलायला लावला. अझरुद्दीनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाला, वाडेकरांनी प्रशिक्षक बनून तब्बल साडेतीन वर्षे विजयी संघ बनविले. वाडेकरांच्या यशाचा तो परिसस्पर्श सुदैवाने अपंग क्रिकेटपटूंनाही लाभला. वाडेकरांच्या या अतुलनीय कार्याची दखल घेऊन त्यांना यंदाचा मदर टेरेसा ‘लाईफ टाईम अचिव्हमेंट अॅवार्ड’ हा पुरस्कार देण्यात आला.
सातासमुद्रापलिकडच्या लोकांना वाडेकरांमध्ये दिसले ते आपल्या इथल्या लोकांना दिसले नाही हे मोठे दुर्दैव आहे. मोदी यांची प्रकरणे आणि भ्रष्टाचाराच्या अन्य गोष्टींनी कलंकित झालेल्या भारतीय क्रिकेटला गरज आहे ती जुन्या, बुजूर्ग क्रिकेटपटूंना मानसन्मान देण्याची. विनू मांकड, विजय हजारे, र्मचट, अमरनाथ, यांच्यासारख्या क्रिकेटपटूंच्या स्मृती जतन करून ठेवण्याची; त्यांची स्मारके उभी करण्याची. अजित वाडेकरांच्या कार्याचा, क्रीडाकौशल्याचा गुणगौरव अमेरिकेत होऊ शकतो, मात्र त्यांच्या कर्मभूमीत मुंबईत का नाही? मुंबईच्या क्रिकेटने देशाला महान क्रिकेटपटू दिले. त्या महान क्रिकेटपटूंची ओळख भावी पिढीला कायमस्वरुपी राहावी याकरिता मुंबई क्रिकेट असोसिएशनने ‘हॉल ऑफ फेम’च्या धर्तीवर काहीतरी उभे करण्याचीगरज आहे.
पदाधिकाऱ्यांच्या फोटोच्या गर्दीत हरविलेल्या क्रिकेटपटूंना पुढे आणण्याची गरज आहे. अजित वाडेकरांना मुंबई क्रिकेट संघटना विसरली. पण क्रिकेटची फारशी ओळख नसलेल्या ठिकाणी त्यांच्या नावाची पूजा बांधली जाते. हा विजय कुणाचा? अजित वाडेकरांच्या कर्तृत्वाचा तो निश्चितच गौरव आहे. त्यांना पुरस्कार देणाऱ्या संस्थेच्या विशाल दृष्टीकोनाचा तो एक पुरावा आहे. भारतीय क्रिकेट बोर्ड आणि मुंबई क्रिकेट असोसिएशन यासारख्या संघटनांमधील दूरदर्शीपणाच्या अभावाचे ते एक द्योतक आहे.
बापू नाडकर्णी हे खऱ्या अर्थाने ऑल राऊंडर स्पोर्स्टमन होते , ऑल राऊंडर होते. ते कॉलेजमधून स्टेट लेव्हलला टेनिस खेळले . क्रिकेट खेळतच होते. नॅशनल लेव्हलला बॅडमिंटन खेळले , खो-खो , टेबल टेनिस हे सर्व खेळ खेळले . इतकेच नव्हे ते अभ्यासामध्येही ग्रेट होते .
(25 जुलै 1922 ते 27 सप्टेंबर 2002)
प्रा. वसंत बापट यांचा जन्म 1922 रोजी सातारा जिल्हयातील कह्राड येथे झाला. तर महाविद्यालयीन शिक्षण पुण्याच्या स.प. महाविद्यालयात झाले. त्यानंतर `नॅशनल कॉलेज आणि `रामनारायण रूईया कॉलेज` हया महाविद्यायलयातुन मराठी व संस्कृत हया विषयाचे प्राध्यापक होते. 1974 पासून मुंबई विद्यापिठातील गुरूदेव रविंद्र टागोर अध्यासनाचे प्राध्यापक होते. साहित्य अकादमीचे सदस्य होते. प्रा. वसंत बापट हे स्वांतत्र्य चळवळीतही सहभागी झाले होते. 1942 च्या चलेजाव चळवळीत त्यांनी महत्त्वपूर्ण भुमिका बजावली होती. ऑगस्ट 1943 ते जानेवारी 1945 पर्यंत ते तुरूगांत होते. 1947 ते 1982 ते पर्यंत ते मुंबई विद्यापिठात ते प्राध्यापक होते. 1983 ते 1988 ते साधनाचे संपादक होते. राष्ट्रसेवा दलाशी ते सलंग्न होते. 1972 साली मुंबईत भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.
लहानपणापासून बापटांवर राष्ट्रसेवा दलाचे आणि सानेगुरूजींच्या सहवासाचे संस्कार झाले. `बिजली` हया पहिल्या काव्यसंग्रहावर हया संस्काराचा प्रभाव स्पष्टपणे जाणवतो. `अकरावी दिशा` , `सकीना` आणि `मानसी` हे त्यांचे बिजली नंतरचे काव्यसंग्रह होते. त्यांनी लहान मुलांसाठीही कविता लिहील्या.
प्रा. वसंत बापट यांच्यावरील मराठीसृष्टीवरील लेख.
मराठी कवी वसंत बापट (29-Jul-2017)
मराठीतील कवी वसंत बापट (17-Sep-2017)
ज्येष्ठ कवी वसंत बापट (17-Sep-2021)
१९२४, नाशिक शहरात असलेला हिंदुस्थान फिल्म कंपनीचा स्टुडिओ. तेथील वास्तुपुरुष होते भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके. ‘हिंदुस्थान फिल्म कंपनी’ तर्फे दादासाहेब फाळके विविध मूकपट त्या वेळी याच स्टुडिओत बनवत होते. त्यांच्या या कंपनीत वसंत शिंदे प्रथम दाखल झाले ते सुतार खात्यात.
त्यांचा जन्म १४ मे १९१२ रोजी भंडारदरा येथे झाला. त्यांना चित्रकलेचे थोडे अंग होते, हे लक्षात आल्यानंतर काही काळाने त्यांची रवानगी पेंटिंग खात्यात करण्यात आली. स्टुडिओतील इतर कामांबरोबरच आपल्याकडील सर्व माणसांना अभिनय, नाच, गाणे असे सर्व काही आले पाहिजे, असा फाळके यांचा आग्रह असे.
लहानपणापासून अंगपिंडाने गुटगुटीत असलेल्या व स्टुडिओत कराव्या लागणाऱ्या रोजच्या सक्तीच्या व्यायामामुळे वसंत शिंदे यांच्या तब्येतीने चांगलेच बाळसे धरले होते. उंचीने काहीसे बुटके असलेला, उपजत मिश्कील स्वभावाची देणगी लाभलेला हा कलाकार दादासाहेब फाळके यांच्या नजरेतून सुटणे शक्यच नव्हते. १९२५ मध्ये फाळके यांनी निर्माण केलेल्या ‘चतुर्थीचा चंद्र’ या मूकपटात वसंत शिंदे यांना गणपतीची भूमिका मिळाली. ती उत्तम वठली. त्यानंतर ‘सीतावनवास’, ‘राम-रावण युद्ध’ या मूकपटांतील वानर, ‘संत जनाबाई’मध्ये लहानगा विठ्ठल, ‘भक्त प्रल्हाद’मध्ये राक्षसपुत्र, ‘बोलकी तपेली’मध्ये भटजीचा मुलगा अशा भूमिका वसंत शिंदे यांनी केल्या. अगदी लहानपणापासूनच आपल्या अभिनयाची लखलखीत मुद्रा ते उमटवू लागले.
हिंदुस्थान फिल्म कंपनीतील पाच वर्षांच्या नोकरीच्या काळात शिंदे जवळजवळ सगळ्या खात्यांमधील कामे शिकून आले. या काळात त्यांनी फाळकेंच्या दिग्दर्शनाखाली १९ मूकपटांमध्ये विविध भूमिका साकारल्या. फाळकेंकडे नोकरी करताना शिंदे यांना पहिला पगार मिळाला होता दरमहा ५ रुपये! पाच वर्षांनंतर त्यांनी ती नोकरी सोडली. त्या वेळी शिंदे यांचा पगार होता दरमहा १८ रुपये. पगाराचे हे आकडे आता कोणी ऐकले, तर त्याला निश्चितच भोवळ येईल. पण त्या काळच्या स्वस्ताईच्या जमान्यात एवढे पैसेही पुरेसे होते. हिंदुस्थान फिल्म कंपनीच्या स्थापनेपासून, म्हणजे १९२३ पासून दादासाहेब फाळके या कंपनीचे पगारी नोकर होते. मुंबईतील कोहिनूर मिलचे मालक वामनराव श्रीधर आपटे हे या फिल्म कंपनीचे मालक होते. त्यांचे व फाळक्यांचे अनेकदा मतभेद होत. त्याचमुळे फाळके दोनदा नोकरीचा राजीनामा देऊन मग पुन्हा फिल्म कंपनीत परत आले होते. मात्र तिसर्यांदा फाळकेंनी राजीनामा दिला आणि ते पुन्हा तिथे कधीही फिरकले नाहीत. ते गेल्यानंतर हिंदुस्थान फिल्म कंपनीतून जे अनेक लोक बाहेर पडले, त्यात वसंत शिंदेही होते. ते वर्ष अदमासे १९२८-२९ असे असावे.
सिनेमा कंपनीतील कामाला व तेथील कमी पगाराला कंटाळलेल्या वसंत शिंदे यांच्यापुढे भविष्याचा प्रश्न आ वासून उभा होता. पोट भरण्यासाठी हातपाय तर हलवायला हवे होते. नियतीने त्यांना या वळणावर नेऊन सोडले पुण्याच्या बालमोहन नाटक कंपनीत. लहान मुलांसाठी नाटके करणे, हा या कंपनीचा प्रमुख उद्योग. बालमोहनचे मालक होते दामूअण्णा जोशी. वसंत शिंदे ज्या वेळी या कंपनीत गेले, तेव्हा तिचीदेखील ती सुरुवातच होती. संस्थेने तोवर एकही नाटक बसवलेले नव्हते. सगळी जमवाजमव सुरू होती. त्या दोन महिन्यांच्या काळात वसंत शिंदे यांच्या वाटय़ाला फक्त साफसफाईच्या कामांपलीकडे कोणतीच भूमिका आली नाही. त्यामुळे ते अखेर वैतागून पुन्हा नाशिकला परतले. ११ ऑगस्ट १९२९ रोजी स्थापन झालेल्या अरुणोदय नाटक मंडळीमध्ये वसंत शिंदे यांच्या अभिनय कारकिर्दीचा पुढचा पडाव होता. या नाटय़मंडळीत त्यांनी चार वर्षे काढली. त्या कालावधीत गिरणीवाला (काटखाँ), प्राणप्रतिष्ठा (खान), साक्षात्कार (पशुपती), महारवाडा (गुलखाँ), बुवाबाजी (वीरभद्रप्पा), सैरंध्री, कॉलेजकुमारी (कोंडिबा न्हावी), विठोबाची चोरी (दरोडेखोर), आय. सी. एस. (दगडय़ा), राजकुंवर (मराठा गडी), कारकून (कारकून), कॅप्टन (आचारी), सासुरवास (घरगडी) अशा १४ नाटकांमध्ये वसंत शिंदेंनी काम केले. या नाटकांचे दौरे महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये झाले. त्यामुळे एक नाटय़कलाकार म्हणूनही वसंत शिंदे यांना मान्यता मिळू लागली. त्या वेळी नाटकमंडळ्यांचे संसारही अल्पजीवीच असायचे.
अरुणोदय नाटक मंडळी बंद पडल्यानंतर वसंत शिंदे यांची पावले वळली ती नवजीवन संगीत मंडळीमध्ये. मोराचा नाच, व्याही-विहीण, भांगेची तार, पापी ईश्वर, राधाकृष्ण, कृष्णार्जुन युद्ध, मृच्छकटिक, पुण्यप्रभाव या नाटकांमधून काम करत असताना वसंत शिंदे यांच्या विनोदी अभिनयाच्या कळांना प्रेक्षकांकडून भरभरून दाद मिळू लागली.नाटक-चित्रपटाचा व्यवसाय एकूण अस्थिरच. नवजीवन संगीत मंडळीतील अवतारकार्य आटोपल्यानंतर उपजीविकेसाठी वसंत शिंदे यांनी कोल्हापूर येथील रघुनाथ केळकर यांनी स्थापन केलेल्या ‘आनंद व्यंगपट’ या कार्टून फिल्ममध्ये पडदे रंगवायचीही नोकरी केली. आयुष्यात असे अनेक चढउतार येत होते. विवाहानंतर सांसारिक जबाबदाऱयांतही वाढ झाली होती. १९४१च्या सुमारास वसंत शिंदे राजाराम संगीत मंडळीत प्रवेश करते झाले.
राम गणेश गडकरी यांच्या भावबंधन या नाटकाचे प्रयोग ही कंपनी करत असे. ‘भावबंधन’मधील कामण्णा यांची भूमिका दिनकर ढेरे यांनी इतकी लोकप्रिय केली होती की त्यांना पुढे ‘कामण्णा’ या नावानेच ओळखले जाऊ लागले. दिनकर ढेरेंनंतर वसंत शिंदे यांनी कामण्णा यांची भूमिका मुळाबरहुकूम करून गाजवली. राजाराम नाटक मंडळीत चिंतामणराव कोल्हटकर हे विविध नाटकांचे दिग्दर्शन करत असत. वसंत शिंदे हे त्यांना गुरुस्थानी मानू लागले. त्यांच्या दिग्दर्शनाखाली ‘प्रेमसंन्यास’मधील गोकुळ, ‘राजसंन्यास’मधील जिवाजी कलमदाने अशा काही भूमिका केल्या. राजाराम संगीत मंडळीनंतर ‘ललित कला कुंज’च्या नाटकांत काही काळ कामे केल्यानंतर वसंत शिंदे यांनी आपला मोहरा पुन्हा चित्रपटसृष्टीकडे वळवला. बोलपटांची एव्हाना चलती सुरू झालेली होती.
वसंत शिंदे यांचा पहिला बोलपट म्हणजे राजा पंडित दिग्दर्शित ‘मायाबाजार’. १९३९ मध्ये झळकलेल्या या चित्रपटात त्यांनी एक किरकोळ भूमिका साकारली होती. १९४६मध्ये भालजी पेंढारकर दिग्दर्शित ‘सासुरवास’मध्ये सुभान्याच्या भूमिकेत वसंत शिंदे यांनी विविध रंग भरले. त्यानंतर वसंत शिंदे यांनी कधीही मागे वळून बघितले नाही. १९२४ ते १९२९ या काळात त्यांनी १९ मूकपटांमध्ये भूमिका साकारल्या होत्या. त्यानंतर १९३९ पासून ते १९९६पर्यंत १९०हून अधिक मराठी चित्रपटांत त्यांनी भूमिका केल्या. त्याशिवाय सात हिंदी चित्रपटांतही कामे केली. चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले, तरी तो प्रत्यक्ष चित्रपटगृहांत प्रदर्शित होईपर्यंत काही खात्री नसते. अशाच अप्रदर्शित राहिलेल्या नऊ चित्रपटांतही वसंत शिंदे यांच्या भूमिका होत्या. पण त्या बघण्याचे भाग्य प्रेक्षकांना काही लाभले नाही.
वसंत शिंदे यांची दुसरी ठळक ओळख म्हणजे ते अस्सल लोकनाटय़ कलावंत होते. राहूने गिळली चंद्रकोर, मी नांदायची न्हाय अशा सुमारे ५७ लोकनाटय़ांतून वसंत शिंदे यांनी छोटय़ा-मोठय़ा भूमिका साकारल्या होत्या. विनोद, कारुण्य असे अनेक पदर या भूमिकांना होते. माधवराव जोशी, आचार्य अत्रे, काकासाहेब खाडिलकर, राम गणेश गडकरी, व्यंकटेश माडगूळकर आदी सिद्धहस्त लेखकांच्या लेखणीतून उतरलेल्या नाटकांमध्ये वसंत शिंदे यांनी छोटय़ा-मोठय़ा भूमिका साकारल्या. त्यांनी १०५ नाटकांमध्ये विविध भूमिका करताना महाराष्ट्र जवळजवळ चार ते पाच वेळा पालथा घातला होता. मराठी चित्रपटांमध्ये घरगडय़ाची पेटंट भूमिका फक्त माझ्यासाठीच राखून ठेवलेली आहे, असे वसंत शिंदे गमतीने म्हणायचे. पण त्यांच्या प्रदीर्घ अभिनय कारकिर्दीवर नजर टाकली तर त्यांच्यातील खेळियाने किती नानाविध भूमिका केल्या होत्या, हे सहज लक्षात येईल. विनोदी कलाकाराचा छाप असला तरी गंभीर भूमिकेतही वसंत शिंदे तेवढेच रंगून जात. सुमारे ७५ वर्षे मूकपट, नाटके, बोलपट यांच्यात वसंत शिंदे यांनी यशस्वी कारकीर्द गाजवली.
वसंत शिंदे यांच्या वर ‘विनोदवृक्ष’ हे मा.मधू पोतदार यांनी आत्मचरित्र लिहिले आहे. ‘विनोदवृक्ष’ या आत्मचरित्राला प्रस्तावना लिहिताना मा.शरद तळवलकर यांनी म्हटले होते, ‘वसंत म्हणजे ऋतूंतला श्रेष्ठ ऋतू! सृष्टीचे वातावरण त्या वेळी प्रसन्न असतं. तेच नाव घेऊन वसंतराव शिंदे जन्माला आले. त्या ऋतूचं कार्य चालवण्याची जबाबदारी वसंतरावांवर येऊन पडली असं म्हणायला हरकत नाही.’
वसंत शिंदे यांचे ४ जुलै १९९९ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट / समीर परांजपे
‘विनोदवृक्ष’ या पुस्तकाची लिंक
http://erasik.com/productdetails/PROD150300028501
आयुष्याच्या वाटचालीवर वा ज्याला जीवनकर्तृत्त्व असे म्हणण्याचा प्रघात आहे. त्यावर आसपासच्या वातावरणाचा वा संस्कारांचा प्रभाव असतो. वातावरण आणि संस्कार याच्या जोडीला पिंड म्हणून जो काही प्रकार असतो तोच त्या व्यक्तीच्या कर्तृत्वगाथेची उंची ठरवत असतो. आपल्या ८६ वर्षांच्या आयुष्यातील क्षण न क्षण दुसऱ्यासाठी वेचलेल्या आणि कृतार्थ ठरलेल्या संभा चव्हाण यांचा पिंड हा शूर योद्धय़ाचा, लढवय्याचा होता.
म्हणूनच अंतिम श्वासापर्यंत हा वीर झुंजत राहिला. त्यातील सुमारे ६० वर्षे समाजातील दुर्लक्षितांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आणि अखेरची सात-आठ वर्षे मृत्यूविरुद्ध या योद्धय़ाचा लढा हा असा अखंड होता. कोकणातील देवगडमधील तारामुंब्री हे मूळ गाव असलेल्या संभा चव्हाणांचं संपूर्ण आयुष्य मुंबईत आणि तेही वरळी विभागात गेलं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे घट्ट संस्कार आणि स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या विचारांचा गडद प्रभाव त्यांच्यावर पडला होता. स्वातंत्र्याचं तेज उरात घेऊन नवा भारत घडवायला निघालेल्या तळागाळातील आणि कनिष्ठ मध्यमवर्गीय तरूण पिढीचा झपाटय़ाने भ्रमनिरास झाला.
देशप्रेम, साधेपणा, कृतज्ञता, त्याग ही मूल्ये भांडवलशाहीच्या चक्रात नष्ट होत गेली आणि याचसाठी का मिळवले स्वातंत्र्य असा प्रश्न त्या पिढीला पडू लागला. संभा चव्हाण याच भ्रमभारित युवा पिढीचे एक प्रतिनिधी होते. मात्र या चकव्यात त्यांनी स्वत:ला गुंतू दिले नाही. आधी समाज सुधारला की देश सुधारेल, या विचारधारेचे ते पाईक बनले आणि ज्या पोलीस दलात काही काळ त्यांनी सेवा केली, त्या पोलिसांच्या जीवनकल्याणासाठी अखंड झुंजण्याचा निर्धार त्यांनी केला.
कायदा आणि सुव्यवस्था राबविण्यासाठी जे दल राबते ते पोलिसच अत्यंत हलाखीत राहतात, त्यांना चांगलेवेतन मिळत नाही, त्यांना कायम मानसिक दडपणाखाली काम करावे लागते आणि ज्यांची वरिष्ठ कायम उपेक्षा करतात, त्या महाराष्ट्र पोलिसांवरचा अन्याय दूर करण्यासाठी अखंड लढय़ाला पर्याय नाही, हे संभा चव्हाण यांनी हेरले. म्हणूनच १९६६ साली जगावेगळा असा पोलिसांच्या पत्नींचा मोर्चा त्यांनी पोलीस आयुक्तालयावर नेला. या त्यांच्या कृत्याबद्दल त्यांना कारावासाची शिक्षा झाली. त्या शिक्षेच्या दरम्यान येरवडा तुरुंगात तत्कालिन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण त्यांना जाऊन भेटले. पोलीस कल्याणाचे काम सोडून द्या, आपण म्हणाल त्या पदावर पोलीस दलात आपली नियुक्ती करतो, अशी सुखासीन भविष्याची हमी देणारी ऑफर त्यांनी संभा चव्हाण यांना दिली.
कारावासात असलेल्या अन्य कोणालाही हा मोहाचा क्षण स्वीकारावासा वाटला असता; त्याचे चित्त डळमळले असते. पण भगवद्गीतेचा संस्कार झालेल्या संभा चव्हाण यांनी आपले पोलीस कल्याणाचे समरांगण अधिक मोठे मानले आणि मुख्यमंत्र्यांची ऑफर निग्रहाने बाजूला सारली. जनसंघाचे कार्यकर्ते आणि मग याच पक्षाच्या तिकीटावर नगरसेवक झालेले संभा चव्हाण कर्मयोद्धा ठरले. याच भूमिकेतून त्यांनी वरळीच्या पोलीस वसाहतीत अनेक सुधारणा घडवून आणल्या. १९५६-५७ साली वरळीच्या गांधीनगरात गुंडांचे साम्राज्य होते.
दारूच्या भट्टय़ा राजरोस लागायच्या. हे गुंड संभा चव्हाण यांनी संपुष्टात आणले. पत्रकारितेत त्यांनी आचार्य अत्रेंना आपले गुरू मानले होते. अत्रेंची बेधडक, जहाल लेखणी संभा चव्हाणांना प्रिय होती. आपल्या ‘शूर शिपाई’ आणि ‘आमचा हिंदुस्थान’ या नियतकालिकांतून संभा चव्हाण यांनी अत्रेंचाच वारसा जपण्याचा प्रयत्न करीत आपले लेखणी परजली.
संघ विचार आणि तत्त्वांशी एकनिष्ठ राहताना सुखकर आयुष्यासाठीच्या साऱ्या तडजोडी झुगारून दिलेल्या या लढवय्याची इच्छा महाराष्ट्राच्याविधिमंडळात जाऊन पोलीस कल्याणासाठीचा आवाद बुलंद करण्याची होती. आमदारकी ‘विकत’ घेतली जाण्याच्या आजच्या काळात ती पूर्ण होणे अशक्यच बाब होती. मात्र झाले ते एका अर्थाने चांगलेच झाले. एका झुंजाराची जीवनगाथा शंभर टक्के निष्कलंकच राहिली!
प्रभाकर जोग यांचे वडील साखर कारखान्यांच्या तंत्रज्ञानातील जाणकार होते. त्यांचा जन्म २५ डिसेंबर १९३२ रोजी झाला. आई-वडिलांपकी कोणी कलेच्या प्रांतात नव्हते, मात्र वडिलांना संगीत नाटकांची पहिल्यापासून आवड होती. पुण्याजवळच्या मांजरा फार्म येथे उमेदवारी करीत अस्ताना बालगंधर्वाचें नाटक पुण्यात आले की वडील सायकलवरून बारा किलोमीटरची रपेट करून पुण्यात येत असत, रात्रभर नाटक पाहून, परतीची सायकलवारी करून पुन्हा दुसऱ्या दिवशी कामावर हजर रहात.
संगीतकलेची ही आवड प्रभाकर जोगांमध्ये उतरली. त्यांनी गजाननराव जोशी आणि नाराणराव मारुलीकर यांच्याकडून वयाच्या ५ व्या वर्षापासून गायन शिकायला सुरुवात केली. प्रभाकर जोगांची मोठ्या आकारमानाच्या व्हायोलिनशी चाललेली झटापट पाहून त्यांच्या आजीने त्याना अडीचशे रुपयांचे एक छोटे व्हायोलिन आणून दिले. प्रभाकर जोग या वाद्यावर हळूहळू प्रभुत्व मिळवत गेले. मा.प्रभाकर जोग यांचे भाऊ मा.वामनराव जोग हे आकाशवाणीवर व्हायोलिनवादक म्हणून नोकरी करत आणि घरी व्हायोलिनचे वर्ग घेत..प्रभाकर जोग आसपास रेंगाळून संगीताचा आस्वाद घेतच मोठे झाले. वयाच्या बाराव्या वर्षी त्यांनी त्यांनी व्हायोलिनचे कार्यक्रम करायला सुरुवात केली.
कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात पुण्यातील वाड्यांमधून त्यांनी सव्वा रुपया आणि नारळ या बिदागीवर व्हायोलिन वादनाचे कार्यक्रम केले. एस.पी. कोलेजच्या मैदानात भरलेल्या स्नेहसंमेलनात व्हायोलिन वाजवत असताना मदानापलीकडे राहणार्यार सुधीर फडके यांनी ते ऐकले आणि प्रभाकर जोगांना भेटायला बोलावले. पुढे ते संगीत दिग्दर्शक सुधीर फडके यांचे सहाय्यक झाले. गीतरामायणाच्या सुमारे ५०० कार्यक्रमांना प्रभाकर जोग यांची साथ होती. स्नेहल भाटकर यांच्याकडे जोग यांनी ’गुरुदेवदत्त’ या १९५१ च्या चित्रपटात व्हायोलिन वादन केले.
स्वरलिपी लेखनकलेत पारंगत असलेले प्रभाकर जोग त्यानंतर संगीतकार श्रीनिवास खळे, दशरथ पुजारी, हृदयनाथ मंगेशकर, यशवंत देव, वसंत पवार, वसंत प्रभू, राम कदम आणि यशवंत देव यांच्याबरोबर काम करू लागले. १९५२ साली प्रभाकर जोग हिंदी चित्रपसृष्टीत साँग व्हायोलिनिस्ट् म्हणून दाखल झाले. रोशन, मदनमोहन, लक्ष्मीकांत प्यारेलाल, राहुलदेव बर्मन या संगीतदिग्दर्शकांकडून त्यांना बोलावणी येऊ लागली. प्रभाकर जोग यांनी मराठी चित्रपट, गामोफोन कंपन्या, आकाशवाणी आणि दूरदर्शन यांच्यासाठी संगीताच्या सुरावटी रचल्या आहेत. प्रभाकर जोगांच्या व्हायोलिन वादनातून जणू शब्द ऐकू येतात, त्यामुळे त्यांचे व्हायोलिन ’गाणारे व्हायोलिन’ म्हणून ओळखले जाते. प्रभाकर जोग यांनी गाण्याला भावप्रधान करताना व्हायोलिनचा सुंदर वापर केला.
सुरुवातीच्या काळात त्यांनी व्हायोलिनवादनाचे लहान-मोठे कार्यक्रम केले. पुढे संगीतकार श्रीनिवास खळे, दशरथ पुजारी, पंडित हृदयनाथ मंगेशकर, यशवंत देव, वसंत पवार, राम कदम, वसंत प्रभू या दिग्गज संगीतकारांना साथ केली. ‘लपविलास तू हिरवा चाफा’ या गीतापासून जोग हे स्वतंत्र गीतकार म्हणून महाराष्ट्राला परिचित झाले. ‘जावई माझा भला’ हा त्यांचा पहिला मराठी चित्रपट आहे. त्यांनी एकूण २२ चित्रपटांना संगीत दिले. गायक, संगीतकार सुधीर फडके यांच्या गीतरामायणाच्या ५०० पेक्षा अधिक कार्यक्रमांना व्हायोलिनचे सूर दिले. ‘गाणारे व्हायोलिन’ आणि ‘गाता रहे मेरा व्हायोलिन’ या त्यांच्या व्हायोलिन गीतांच्या व्हिसीडी रसिकांच्या पसंतीस उतरल्या.
‘स्वर आले दुरूनी’, ‘तेच स्वप्न लोचनात’, ‘बाजार फुलांचा भरला’, ‘हे चांदणे फुलांनी’, ‘सोनियाचा पाळणा’, ‘सत्यात नाही आले स्वप्नात येऊ का’, ‘आला वसंत ऋतू आला’ ही जोग यांनी संगीतबद्ध केलेली गाणी गाजली. हिंदी चित्रपटसृष्टीतील मदनमोहन, एस. डी. बर्मन, लक्ष्मीकांत प्यारेलाल, शंकर जयकिशन, खय्याम, ओ.पी. नय्यर, उषा खन्ना, जयदेव, रवींद्र जैन या संगीतकारांसोबतही त्यांनी काम केले. व्हायोलिन वादन आणि संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना वसुंधरा पंडित, लता मंगेशकर, सूरसिंगार, चित्रकवी अशा वैविध्यपूर्ण पुरस्कारांनी त्यांचा गौरव झाला आहे. त्यात आता गदिमा पुरस्काराने मोठी भर पडली आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट
अण्णासाहेब किर्लोस्कर यांनी वयाच्या बाराव्या वर्षापर्यंत कानडी व मराठी भाषेचा अभ्यास त्यांनी घरीच केला. त्यांचा जन्म ३१ मार्च १८४३ रोजी धारवाड जिल्ह्यात गुर्लहोसूर या गावी झाला. नंतर कोल्हापूर व धारवाड येथे शिक्षणासाठी राहून मुलकी परीक्षेपर्यंत ते शिकले. त्यापूढील शिक्षणासाठी पुण्यास असताना त्यांना नाटकांचा नाद लागला व ते नाटक मंडळ्यांस पदे रचून देऊ लागले. स्वतःची नाटक मंडळी काढून त्यांनी काही नाटकेही केली. तथापि ही नाटक मंडळी मोडली आणि ते गुर्लहासून येथे येऊन राहिले. त्यानंतर त्यांनी वकिलीची परीक्षा देण्यासा प्रयत्न केला; पण तो यशस्वी न झाल्यामुळे ते नोकरी करू लागले. शिक्षक, जमादार आणि महसूल आयुक्ताच्या कचेरीतील कर्मचारी अशा विविध प्रकारच्या नोकऱ्या त्यांनी केल्या. अण्णासाहेबांनी प्रारंभी अल्लाउद्दिनाची चितुडगडावरील स्वारी हे नाटक लिहावयास घेतले होते; ते अपुरेच राहिले. शिक्षक असताना शांकरदिग्जय हे गद्य नाटक त्यांनी लिहिले (१८७३).
पुणे येथे १८८० साली एका पारशी नाटक मंडळीचे ऑपेराच्या धर्तीवरील एक नाटक त्यांच्या पाहण्यात आले. तसे नाटक मराठीत करून दाखविण्याची इच्छा त्यांस होऊन त्यांनी कालिदासाच्या अमिज्ञानशाकुंतर या नाटकाचे भाषांतर केले. त्यामध्ये स्वतःची पदेही घातली आणि उत्तम नटसंच मिळवून ते रंगभूमीवर आणले (१८८०). या नाटकास लाभलेले अपूर्व यश आणि लोकप्रियता पाहून १८८० मध्ये `किर्लोस्कर नाटक मंडळी' ची त्यांनी स्थापना केली. त्यानंतर सुभद्राहरणावरील संगीत सौभद्र हे नाटक स्वतंत्रपणे त्यांनी लिहिले (१८८२). प्रणयभावनेचे मनोहर चित्रण त्यांनी ह्या नाटकात केले आहे. त्यांच्या सर्व नाटकांत हेच नाटक अधिक लोकप्रिय आहे. सुसंघटिक कथानक, अकृत्रिम संवाद, विलोभनीय व्यक्तिरेखा, प्रासादिक पदे आणि नाट्योपरोधावर आधारलेल्या विनोदाचा अखंडपणे वाहणारा अंतःप्रवाह या वैशिष्ट्यांमुळे या नाटकाचे आकर्षण मराठी प्रेक्षकांच्या मनात आजही टिकून आहे. अण्णासाहेब स्वतः चांगले नट व दिग्दर्शक होते. महाराष्ट्रात संगीत नाटकांचे नवे युग त्यांनी निर्माण केले. इतकेच नव्हे, तर उत्तम संगीत नाटके कशी असावीत, याचा आदर्श घालून दिला.
अण्णासाहेब, किर्लोस्करअण्णासाहेब, किर्लोस्करजुन्या विष्णुदासी नाटकांतील सूत्रधार, विदूषक, गणपती व सरस्वती यांच्या अनुक्रमाने होणाऱ्या प्रवेशाची परंपरा सोडून देऊन संस्कृत नाटकातील सूत्रधार, परिपार्श्वक व नटी यांच्या संवादांनी नाटकांची प्रस्तावना करण्याची त्यांनी प्रथा पाडली. नाटक मंडळ्या व नट यांच्याविषयी समाजात असलेली अनुदारपणाची भावना त्यांनी रसिकांना उदात्त करमणुकीचे नवे माध्यम उपलब्ध करून दिले. परिणामी समाजातील उच्च वर्गात मोडणारे लोकही त्यांच्या नाटक मंडळीशी जिव्हाळ्याचे संबंध ठेवू लागले. मोडणारे लोकही त्यांच्या नाटक मंडळीशी जिव्हाळ्याचे संबंध ठेवू लागले. अण्णासाहेबांनी काव्यरचनाही बरीच केली आहे. पौराणिक नाटक मंडळ्या व कीर्तनकार यांना त्यांनी आख्याने रचून दिली. त्यांना कानडी, उत्तर हिंदुस्थानी आणि मराठी (लावणी इ.) गाण्यांच्या अनेक चाली अवगत होत्या व ते शीघ्रपणे कवने रचू शकत असत. त्यांनी `दक्षिणा प्राइझ कमिटी'ने बक्षीस लावल्यावरून स्पर्धेसाठी शिवाजी महाराजांवर पाचशे आर्यांचे एक दीर्घकाव्य रचिले होते.
परवाच ३१ ऑक्टोबर ला 'संगीत शाकुंतल' या नाटकाच्या पहिल्या प्रयोगाला १३६ वर्षे झाली. ज्याला अस्सल मराठी संगीत नाटक म्हणून संबोधिता येईल आणि त्या मराठी `शाकुंतला'चा पहिला प्रयोग म्हणजे (नंतरच्या काळात लोकप्रिय झालेल्या) संगीत नाटकाची गंगोत्री होय. या प्रयोगात जवळपास शंभर पदे होती. आणि या पदांची रचना ओवी, लावणी, साकी, दिंडी इ. रूढ छंदांना अनुसरणारी होती. 'संगीत शाकुंतल' नाटकाच्या शुभारंभाच्या प्रयोगाला स्वतः अण्णासाहेब सूत्रधार, बाळकोबा नाटेकर, मोरोबा वाघोलीकर आणि शेवडे या पारिपार्श्वकांसह पडद्यामागे नांदी म्हणण्याकरता सज्ज झाले. 'पंचतुंड नररुंडमालधर' ही नांदी म्हणण्यास सुरुवात करणार, तोवर जणू पडदा ओढणार्याझस तेवढाही विलंब सहन न होऊन त्याने एकदम पडदा वर उचलला. आणि पडद्यामागे नांदी म्हणून नटेश्वराला फुले अर्पण करून नाट्यप्रयोगाला सुरुवात करण्याचा संकेत असा अचानकपणे बदलून गेला. मा.अण्णासाहेब किर्लोस्करांनी एकूण पाच नाटके लिहीली.
अल्लाउद्दिनाची चितुरगडावरील स्वारी एकांकीका, अपूर्ण फार्स , शांकर दिग्जय गद्य नाटक, संगीत शांकुतल कालिदासकृत 'अभिज्ञान शांकुंतलम' चे भाषांतर , संगीत सौभद्र सात अंकी संगीत नाटक
संगीत रामराज्यवियोग तीन अंकी - अपूर्ण संगीत नाटक. महाराष्ट्रात १९४३ मध्ये साजरी झालेली त्यांची जन्मशताब्दी व त्यांच्या निधनानंतर `किर्लोस्कर नाटक मंडळी'ने पुणे येथे बांधलेले `किर्लोस्कर नाटकगृह' या दोन घटना त्यांच्या सहकाऱ्यांचे व मराठी रसिकांचे त्यांच्यावर केवढे प्रेम होते याची साक्ष देतात. त्यांच्या सर्व लेखनाचा संग्रह समग्र किर्लोस्कर या नावाने प्रसिद्ध करण्यात आला आहे.
अण्णासाहेब किर्लोस्कर यांचे निधन २ नोव्हेंबर १८८५ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट/ मराठी विश्वकोश
थोड्याच वेळाने आणखी एक टांगा आला. त्यामागे कोणीतरी पळत होते आणि मोठ्याने ओरडत होते, ‘गोंद्या आला रे आला ! गोंद्या आला रे आला! तीच खूण ठरली होती. ते इशाऱ्याचे वाक्य होते. झाडीत लपलेले दामोदर हरी चाफेकर सरसावले. ते स्वतःशी म्हणाले, होय, हीच रँड साहेबाची गाडी आहे. मघाच्या टांग्यात दुसरा कोणीतरी साहेब असेल. बाळकृष्णाने घाई केली, पण त्यात काही बिघडले नाही. मुख्य रँडसाहेब मला सापडला म्हणजे योजना यशस्वी झाली. त्यांनी हाताने खूण करून वासुदेवाला थांबविले. चित्ता हरिणावर झेप घेतो त्याप्रमाणे त्यांनी टांग्यावर उडी मारली. छपरामुळे पडदा होता तो त्यांनी सर्रकन् बाजूला सारला. रँडच्या बरगड्यांजवळ पिस्तुल नेऊन त्यांनी सटासट गोळ्या झाडल्या. रँड गाडीतच कोसळला.
Copyright © 2025 | Marathisrushti