युसूफ मिरजकर

मिरजकर, युसूफ

भारतीय वाद्यांच्या निर्मितीमागील विज्ञान समजून घेऊन त्यात आपला जीव ओतणारे कारागीर ते वाद्य वाजविणाऱ्यांसाठी फार महत्त्वाचे असतात. पुण्याचे युसूफभाई मिरजकर हे अशांपैकी एक होते. त्यांच्या अपघाती निधनाने त्यांनी तयार केलेल्या वाद्यांवर आनंद निर्माण करणारे अनेक कलावंत आणि रसिक दु:खी होणे स्वाभाविक आहे. पंडित भीमसेन जोशी यांच्यापासून ते रईस खाँ यांच्यापर्यंत अनेक ज्येष्ठ कलावंत युसूफभाईंनी तयार केलेल्या वाद्यांवर फिदा असत.

वाद्यनिर्मिती ही जरी आनंद निर्माण करण्याचे साधन असले, तरीही त्यामागे विज्ञानाची पक्की बैठक असते. सतार, सरोद, विचित्र वीणा, व्हायोलिन, तबला, हार्मोनियम अशा वाद्यांमधील विज्ञानाचे सार लक्षात आल्याशिवाय त्या वाद्यांची निर्मिती अशक्य असते. त्यासाठी विज्ञान शिकावे लागत नाही, तर त्या विज्ञानाचा उपयोग समजून घ्यावा लागतो. सुमारे २०० वर्षांपूर्वी मिरजेत आलेल्या वाद्यनिर्मितीकारांनी भारतीय संगीतात आपण अपरिहार्य असल्याचे सिद्ध केले आहे. युसूफभाई हे अशा वाद्यनिर्मितीकारांच्या ३६ व्या पिढीचे प्रतिनिधी. भाईबंद मिरजेत राहिले आणि युसूफभाईंचे वाडवडील पुण्यात आले. पुण्याच्या लक्ष्मी रस्त्यावर त्यांनी आपले दुकान थाटले आणि मग तिथे अनेक ज्येष्ठ कलावंतांचा राबता सुरू झाला. एखादा पदार्थ तयार करताना त्या माऊलीच्या ‘हाताची चव’ त्यात सहजपणे विरघळते, असा अनुभव आपल्या सगळय़ांना येतो. पुस्तकात वाचून पदार्थ तयार करण्याचा सोस असणाऱ्यांना ‘काहीतरी कमी’ असल्याचे जाणवत राहते. वाद्यांच्या बाबतीत तसेच घडते. त्या वाद्याच्या जडणघडणीमागे असणाऱ्या हाताची कमाल ते वाद्य बोलायला लागल्यावर लक्षात येते. युसूफभाईंचा हात प्रत्येक वाद्यावर ज्या मायेने फिरत असे, ते प्रेमच त्यांच्या वाद्याला सजीव करत असे. लाकडावर ताणून बसविलेल्या तारांचा झंकार होण्यासाठी जवारीची गरज असते. जवारी हा भारतीय संगीतातील एक वैज्ञानिक असला तरीही मनाला जाणवणारा चमत्कार आहे. ही जवारी काढणे ही मोठी कुशलतेची गोष्ट असते. प्रत्येकाला ती जमतेच असे नाही. युसूफभाई मात्र जवारी काढण्यात पटाईत होते. वाद्य तयार करणाऱ्याला त्यातून निर्माण होणाऱ्या संगीताची मोठी जाण असावी लागते. युसूफ मिरजकर हे त्या अर्थाने वादक नसले, तरीही त्यांच्या तंतुवाद्यांवरची हुकमत अफाट होती. त्यांच्या हाती वाद्य आले, की ते त्याच्यावर ज्या आत्मीयतेने ‘उपचार’ करायचे, की त्या वाद्यानेही सजीव होऊन त्यांचे आभार मानावेत! पुण्याच्या मानाच्या सवाई गंधर्व संगीत महोत्सवात येणाऱ्या सगळय़ा दिग्गज कलावंतांना युसूफभाई तिथे आहेत, याचाच आधार असायचा. आपली वाद्ये सुस्थितीत ठेवून ती संगीतानुकूल ठेवण्यात त्यांचा हातखंडा होता. वादक आणि संगीतकार म्हणूनच या पडद्यामागील खऱ्या कलावंताच्या प्रेमात असत. आयुष्यभर संगीताची खरी सेवा करणारा हा एक वाद्यनिर्मिती करणारा कलावंतच होता. रस्त्यावरील अपघातात त्यांचा जागीच मृत्यू होणे ही जशी धक्कादायक बाब आहे, तशीच मनाला चटका लावून जाणारी घटना आहे.



मिरजकर, युसूफ

भारतीय वाद्यांच्या निर्मितीमागील विज्ञान समजून घेऊन त्यात आपला जीव ओतणारे कारागीर ते वाद्य वाजविणाऱ्यांसाठी फार महत्त्वाचे असतात. पुण्याचे युसूफभाई मिरजकर हे अशांपैकी एक होते. त्यांच्या अपघाती निधनाने त्यांनी तयार केलेल्या वाद्यांवर आनंद निर्माण करणारे अनेक कलावंत आणि रसिक दु:खी होणे स्वाभाविक आहे. पंडित भीमसेन जोशी यांच्यापासून ते रईस खाँ यांच्यापर्यंत अनेक ज्येष्ठ कलावंत युसूफभाईंनी तयार केलेल्या वाद्यांवर फिदा असत.

वाद्यनिर्मिती ही जरी आनंद निर्माण करण्याचे साधन असले, तरीही त्यामागे विज्ञानाची पक्की बैठक असते. सतार, सरोद, विचित्र वीणा, व्हायोलिन, तबला, हार्मोनियम अशा वाद्यांमधील विज्ञानाचे सार लक्षात आल्याशिवाय त्या वाद्यांची निर्मिती अशक्य असते. त्यासाठी विज्ञान शिकावे लागत नाही, तर त्या विज्ञानाचा उपयोग समजून घ्यावा लागतो. सुमारे २०० वर्षांपूर्वी मिरजेत आलेल्या वाद्यनिर्मितीकारांनी भारतीय संगीतात आपण अपरिहार्य असल्याचे सिद्ध केले आहे. युसूफभाई हे अशा वाद्यनिर्मितीकारांच्या ३६ व्या पिढीचे प्रतिनिधी. भाईबंद मिरजेत राहिले आणि युसूफभाईंचे वाडवडील पुण्यात आले. पुण्याच्या लक्ष्मी रस्त्यावर त्यांनी आपले दुकान थाटले आणि मग तिथे अनेक ज्येष्ठ कलावंतांचा राबता सुरू झाला. एखादा पदार्थ तयार करताना त्या माऊलीच्या ‘हाताची चव’ त्यात सहजपणे विरघळते, असा अनुभव आपल्या सगळय़ांना येतो. पुस्तकात वाचून पदार्थ तयार करण्याचा सोस असणाऱ्यांना ‘काहीतरी कमी’ असल्याचे जाणवत राहते. वाद्यांच्या बाबतीत तसेच घडते. त्या वाद्याच्या जडणघडणीमागे असणाऱ्या हाताची कमाल ते वाद्य बोलायला लागल्यावर लक्षात येते. युसूफभाईंचा हात प्रत्येक वाद्यावर ज्या मायेने फिरत असे, ते प्रेमच त्यांच्या वाद्याला सजीव करत असे. लाकडावर ताणून बसविलेल्या तारांचा झंकार होण्यासाठी जवारीची गरज असते. जवारी हा भारतीय संगीतातील एक वैज्ञानिक असला तरीही मनाला जाणवणारा चमत्कार आहे. ही जवारी काढणे ही मोठी कुशलतेची गोष्ट असते. प्रत्येकाला ती जमतेच असे नाही. युसूफभाई मात्र जवारी काढण्यात पटाईत होते. वाद्य तयार करणाऱ्याला त्यातून निर्माण होणाऱ्या संगीताची मोठी जाण असावी लागते. युसूफ मिरजकर हे त्या अर्थाने वादक नसले, तरीही त्यांच्या तंतुवाद्यांवरची हुकमत अफाट होती. त्यांच्या हाती वाद्य आले, की ते त्याच्यावर ज्या आत्मीयतेने ‘उपचार’ करायचे, की त्या वाद्यानेही सजीव होऊन त्यांचे आभार मानावेत! पुण्याच्या मानाच्या सवाई गंधर्व संगीत महोत्सवात येणाऱ्या सगळय़ा दिग्गज कलावंतांना युसूफभाई तिथे आहेत, याचाच आधार असायचा. आपली वाद्ये सुस्थितीत ठेवून ती संगीतानुकूल ठेवण्यात त्यांचा हातखंडा होता. वादक आणि संगीतकार म्हणूनच या पडद्यामागील खऱ्या कलावंताच्या प्रेमात असत. आयुष्यभर संगीताची खरी सेवा करणारा हा एक वाद्यनिर्मिती करणारा कलावंतच होता. रस्त्यावरील अपघातात त्यांचा जागीच मृत्यू होणे ही जशी धक्कादायक बाब आहे, तशीच मनाला चटका लावून जाणारी घटना आहे.

Author