(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • जयप्रकाश जोशी

    भारतीय बाजारपेठांमध्ये “मेड इन चायना” लेबलने घुसखोरी केली असतानाच जयप्रकाश जोशी यांच्या उत्पादनाने मात्र मेड इन इंडिया लेबलवर चीनसह १२ देशांमध्ये ओळख निर्माण केली आहे. नाशिकजवळ सय्यद-पिंप्री गावातून शहराकडे नोकरीच्या शोधात आलेल्या जयप्रकाश जोशी यांनी मोठी डिग्री नसताना गायडिंग व्हिल्सच्या उत्पादनात जोरदार मुसंडी मारली...

    उद्योगाचे धावते चक्र

  • राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया-सुळे

    निवडणूक जाहीर झाल्यानंतर शरद पवार बाळासाहेबांना भेटायला गेले. त्यांनी सुप्रिया सुळे यांना उमेदवारी देत असल्याचं बाळासाहेबांना सांगितलं. बाळासाहेब म्हणाले, मग शिवसेना उमेदवारी देणार नाही. मध्येच शरद पवार म्हणाले, ‘पण भाजपाचं काय?’ बाळासाहेब म्हणाले, ‘कमळाबाईची चिंता नको करू, कमळाबाईला कसं पटवायचं ते मला माहिती आहे,’ असा शब्द बाळासाहेबांनी दिला. सुप्रिया सुळे बिनविरोध निवडून आल्या.

  • बुंदेलखंडचा महाराजा छत्रसाल बुंदेला

    बुंदेलखंडचा महाराजा छत्रसाल बुंदेला यांचा जन्म ४ मे १६४९ रोजी झांशीजवळ ककर-कचनय गावामध्ये झाला.

    छत्रसाल राजाने बुंदेलखंडला शक्तिशाली राज्य बनवले होते. छतरपूर नगर छत्रसालनेच वसवले होते. त्यांची राजधानी महोबा होती. ते धार्मिक स्वभावाचे होते. छत्रसाल यांना बुंदेलखंडचे शिवाजी म्हणून ओळखले जायचे. छत्रसाल यांच्या वडिलांचे नाव होते बुंदेला वीर चंपतराय. त्यांनी १७ व्या शतकाच्या तिसऱ्या दशकात ओरछा प्रदेशाला मुघल साम्राज्यातून स्वतंत्र करण्याचा प्रण केला होता. यासाठी त्यांनी विद्रोचा झेंडा हाती घेतला होता. परंतु चंपतराय यांना स्वकीयांविरुद्धच अनेकदा युद्ध करावे लागले. कारण स्वकीयांपैकी काही जण हे मुघलांची हुजरेगिरी करून त्यांचे बंड थोपवण्याचे प्रयत्न करत होते. ३० वर्षे संघर्षानंतर स्वकीयांपैकीच काहींनी कट करून १६६१ मध्ये चंपतराय यांचा वध केला आणि मुंडके कापून औरंगजेबाकडे पाठवले. या संघर्षाच्या काळात बालक छत्रसालही आपल्या वडिलांसोबत जागोजागी भटकत राहिले. आणि त्यांच्याकडून युद्धकलेचे प्रशिक्षण घेत राहिले.

    आपल्या वडिलांच्या हत्येचा बदला घेण्याची भावना छत्रसाल यांच्यात वाढीस लागली होती. यासाठी त्यांच्याकडे काही साधन नसल्याने ते सुसंधीची प्रतीक्षा करत होते. दरम्यानच्या काळात छत्रसाल मुघल सैन्यात भरती झाले. आणि सैन्यासह दख्खनच्या मोहिमेवर आले. तेथे मिर्झा राजे जयसिंग यांच्यासह सैन्यासह पुरंदरच्या वेढ्यात, आपला भाऊ अंगद तथा काका जामशहा यांच्या सोबत होते. त्या वेढ्याच्या वेळी शौर्य गाजवल्याने त्यांना पुरस्कृतही करण्यात आले. परंतु, छत्रसालच्या हृदयात आपल्या वडिलांच्या हत्येचा प्रतिशोध घेण्याची जिद्द पेटलेली होती. शिवाजी महाराजांच्या मुघलांविरुद्धच्या संघर्षामुळे ते प्रभावित झाले. मुघल सल्तनतीला आव्हान देणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांची भेट घेण्याची तीव्र इच्छा त्यांच्या मनात जागी झाली.

    एका दिवशी शिकारीच्या बहाण्याने छत्रसाल मुघलांच्या कंपूतून बाहेर पळून गेले. त्यांनी भीमा नदी पार करून आपल्या पत्नीसह शिवाजी महाराजंची पुण्यात भेट घेतली. इतिहासकारांच्या मते, छत्रपती शिवाजी व छत्रसाल भेट, शिवाजी महाराजांच्या आग्ऱ्याहून सुटकेनंतर 1667 मध्ये झाली. छत्रसाल काही काळ शिवाजी महाराजांकडे पुण्यात राहिले. तेथे त्यांनी महाराजांकडून युद्धनीती, कूटनीती आणि शासननीतीचे शिक्षण घेतले. नंतर त्यांनी या शिक्षणाचा आपल्या मुलखात बुंदेलखंडात मोठ्या खुबीने उपयोग केला.

    महाराजा छत्रसालची इच्छा होती की, दक्षिणेत राहून मुघलांविरुद्ध छत्रपती शिवाजी महाराजांसोबत स्वराज्याच्या कामी यावे. परंतु छत्रपती शिवाजी महाराज दूरदर्शी होते. त्यांनी स्वराज्याच्या प्रयत्नाला फक्त दक्षिणेपर्यंत सीमित ठेवायचे नव्हते. म्हणून त्यांनी छत्रसालला सल्ला दिला की, तुम्ही बुंदेलखंडात परता आणि मुघलांविरुद्ध स्वातंत्र्याचा शंखनाद करा.

    छत्रपती शिवाजी महाराजांचा सल्ला प्राणपणाने मानून छत्रसाल बुंदेलखंडात परतले. तेथे त्यांनी फक्त ५ घोडदळातील सैनिक आणि २५ तलवारबाज यांच्यासह संघर्षाला सुरुवात केली. जवळ होती फक्त छत्रपतींनी चेतवलेले स्वराज्याचे स्फुलिंग. लवकरच ती संधी आली जेव्हा औरंगजेबाने आपल्या सैन्याला ओरछातील मंदिरे नष्ट करण्याचा आदेश दिला. या वेळी रयतेच्या दृष्टीने छत्रसालच एकमेव आशेची किरण होते. म्हणून सर्व जण छत्रसाल यांच्या नेतृत्वा संघटित झाले. यानंतर एकेक जहागीरदार अन् सरदार छत्रसाल यांना जोडत गेले अन् सर्वांनी मुघलांचा सशस्त्र प्रतिकार केला.

    छत्रसाल बुंदेला यांचे निधन २० डिसेंबर १७३१ रोजी झाले.

  • वासुदेव वामन पाटणकर

    “आजवर बेधुंदतेने मांड जैसा गायिला, त्याच त्या तल्लीनतेने जोगियाही गायिला” अशा शब्दांत त्यांनी आसक्ती आणि वैराग्य हे दोन्ही गुण शायरीत कसे असतात, याचे वर्णन केले आहे. पाटणकरांच्या आधीही शायरीचे तंत्र मराठीत वापरले गेले होते, पण “शायराना जिंदादिली” पाटणकरांनीच मराठीत आणली.

  • कथालेखक व कादंबरीकार श्रीपाद नारायण पेंडसे

    श्रीपाद नारायण पेंडसे यांनी मराठी भाषेतील एक कथालेखक व कादंबरीकार मराठी कादंबरीक्षेत्रात आपले वैशिष्ट्यपूर्ण स्थान निर्माण केले होते. त्यांचा जन्म ५ जानेवारी १९१९ रोजी झाला.गारंबीचा बापू’, ‘हत्या’, ‘यशोदा’, ‘कलंदर’ अशा यशाच्या शिखऱ गाठणा-या कादंब-यांचे लेखक श्रीपाद नारायण पेंडसे यांना खाजगीत शिरूभाऊ म्हणत. त्यांच्या नावाचा उल्लेख साहित्य प्रांतातही ‘पेंडसे’ असा होण्याऐवजी ‘शिरूभाऊ’ असाच होत होता. शिक्षणानंतर बी. ई. एस. टी. मध्ये ते रूजू झाले. त्यांच्या लेखनाला कथा लेखनापासून सुरुवात झाली. १९३८ मध्ये सह्याद्री मासिकात त्यांची ‘जीवनकला’ ही पहिली कथा प्रसिद्ध झाली. नंतर काही व्यक्तिचित्रे त्यांनी लिहिली. १९४१ साली त्यांचे पहिले पुस्तक ‘खडकावरील हिरवळ’ प्रसिद्ध झाले. त्यानंतर हिंदू-मुसलमानांच्या दंग्यावर आधारलेली ‘एल्गार’ ही कादंबरी प्रकाशित झाली. ‘हद्दपार’ ही कादंबरी खूपच लोकप्रिय झाली. पुढे ‘गारंबीचा बापू’, ‘हत्या’, ‘यशोदा’, ‘कलंदर’ इ. कादंबर्यांरनी यशाचे शिखर गाठले. श्री. ना. पेंडसे यांची ‘गारंबीचा बापू’ ही कादंबरी साठच्या दशकात प्रकाशित झाली आणि मराठी साहित्यात एक लोकविलक्षण प्रेमकहाणी जन्माला आली. तीही कोकणातील पारंपरिक, कर्मठ वातावरणात! यातल्या अफाट कर्तृत्वाच्या बापूमध्ये अनेकांनी स्वत:ला कल्पिले आणि राधासारखी विलक्षण प्रेयसी आपल्यालाही लाभावी असं चित्रही मनोमन रंगवलं. ‘गारंबीच्या बापू’ ची मोहिनी अनेक पिढय़ा टिकली. नव्हे, आजही टिकून आहे. श्री. ना. पेंडसे यांनी आपल्या कादंबरीचं केलेलं नाटय़रूपांतरही तितकंच प्रभावी आहे. १९६२ साली लिहिलेल्या ‘रथचक्र’ या कादंबरीला १९६४ साली साहित्य अकादमीचे पारितोषिक मिळाले. पेंडसेंच्या सुरुवातीच्या कादंबर्यांकमधे कोकणचा प्रदेश आणि त्यातली माणसे हे वर्णन प्रकर्षाने येत असे. पण ‘लव्हाळी’ आणि ‘ऑक्टोपस’ ला मुंबईची पार्श्वभूमी आहे. ‘ऑक्टोपस’चे वैशिष्ट्य म्हणजे ही कादंबरी केवळ पात्रांच्या संवादातूनच पुढे जाते. त्यानंतरची मा.श्री.ना.पेंडसे यांची चैतन्यपूर्ण कादंबरी म्हणजे ‘तुंबाडचे खोत’. चार पिढ्यांच्या कहाणीची ही चौदाशे पानांची कादंबरी दोन खंडात विभागली आहे. मानवी वृत्तीचे गूढ, कोकणातील निसर्ग, जिवंत व्यक्तिचित्रण, नाट्यपूर्ण संवाद आणि ओघवते निवेदन यामुळे ही कादंबरी वाचकाच्या मनाची पकड घेते. ‘राजे मास्तर’, ‘यशोदा’, ‘संभुसांच्या चाळीत’, ‘असं झालं उजाडलं’, ‘चक्रव्यूह’, ‘रथचक्र’ ह्या त्यांच्या नाटकांनी रंगभूमीवरही यश प्राप्त केलं. ‘जुम्मन’ नावाचा त्यांचा कथासंग्रहही प्रसिद्ध आहे. ‘श्री. ना. पेंडसे. लेखक आणि माणूस’ हे त्यांचे आत्मचरित्र प्रकाशित झाले आहे. श्री.ना. पेंडसे यांना नाशिकच्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा मानाचा ‘जनस्थान’ पुरस्कार प्राप्त झाला होता. श्री.ना.पेंडसे यांचे २४ मार्च २००७ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • प्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना सितारादेवी

    प्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना सितारादेवी यांचा जन्म ८ नोव्हेंबर १९२० कोलकाता येथे झाला. त्यांची गेल्या सहा दशकांहून अधिक त्यांची प्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना अशी ख्याती राहिली होती. सितारा देवींनी देशविदेशांमध्ये कथ्थक नेले. लोकप्रिय केले आणि कथ्थकला रसिकांच्या मनात कायमसाठी एक उन्नत स्थान त्यांनी मिळवून दिले. त्यांचे वडिल सुखदेव महाराज मिश्रा यांनी त्यांना कथ्थकची उत्तम तालीम आणि प्रशिक्षण दिले.

    आपल्या वडीलांप्रमाणेच लखनौ घराण्यातील अच्छन महाराज, लच्छू महाराज आणि शंभू महाराज यांच्याकडूनही त्यांनी कथ्थकचे धडे गिरवले. बनारस आणि लखनौ घराण्यांचा मिलाफ त्यांच्या नृत्यातून दिसून येत असे. भावविभोर डोळे, ठसठशीत सौंदर्य आणि त्याला भारतीय भारदस्तपणाची डुब हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्टय़ होते. एक नर्तकी म्हणून त्यांच्या अदाकारीमुळे त्यांच्या सौंदर्यामध्ये काही औरच जीव ओतला गेला होता.

    सितारादेवी या प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक के. आसिफ यांच्या पत्नी. जवळपास १९३४ पासून ते १९७४ पर्यंत त्यांनी नृत्यप्रधान भूमिका करून हिंदी चित्रपटही गाजवले. एक अवसर असा आला की, त्यांनी कथ्थक नृत्यशैलीशी पुरते तादात्म्य ठेवावे या हेतूने हिंदी सिनेसृष्टीला रामराम ठोकला. पडद्यावर आणि प्रत्यक्ष लाईव्ह डान्समध्ये सितारा देवींचे नृत्य पाहणे हा एक चित्तथरारक, रोमहर्षक आणि प्रेक्षकाला खिळवून ठेवणारा असा अनुभव असायचा. प्रेक्षकाला अधिक करणारा, कलेच्या निरामय लाटेवरून स्वर्गीय आनंदाची सर घडवणारा असा तो अनुभव असायचा. ‘रोटी’ चित्रपटातील जंगल डान्स (१९४२) किंवा ‘सौतन के घर ना जाईयो’ हा ‘आबरू’ चित्रपटातील (१९४३) डान्स अशा त्यांच्या अनेक उल्लेखनीय कलाकृती आहेत. नागनृत्य हे स्नेक डान्स या नावाने जास्त प्रचलित आहे.

    १९५७ मध्ये ‘अंजली’ या चित्रपटामध्ये सितारा देवींनी स्नेक डान्स केला आहे. त्यांनी अनेक हिंदी चित्रपटांचे नृत्यदिग्दर्शनही केले होते. वयाच्या १६व्या वर्षी सितारादेवींनी गुरुवर्य पं. रवींद्रनाथ टागोर यांच्यासमोर सुंदर कथकनृत्य सादर केले. सितारादेवींचे सुरेख नृत्य पाहून पं. रवींद्रनाथ टागोर भारावून गेले व त्यांनी सितारादेवींना ‘कथकक्वीन’ उपाधी (पदवी) दिली. सितारादेवी यांना त्यांच्या नृत्य कारकिर्दीत आजवर अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. संगीत नाटक अकादमी पुरस्कार, पद्मश्री, आणि कालिदास सम्मान यांसारखे प्रतिष्ठित पुरस्कार त्यांना मिळाले होते. कथ्थक या नृत्यप्रकाराला त्यांनी बॉलिवूडमध्ये स्थान मिळवून देण्याचे श्रेय त्यांना जाते. नृत्यातील त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना २०११ मध्ये जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. सितारा देवी यांचे निधन २५ नोव्हेंबर २०१४ रोजी झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

  • अभिनेता व दिग्दर्शक अभिराम भडकमकर

    नाटक, चित्रपट आणि दूरचित्रवाहिनी क्षेत्रात गेली दोन दशकं लेखक, अभिनेता व दिग्दर्शक म्हणून वावरणाऱ्या अभिराम भडकमकर यांचा जन्म ७ जानेवारी १९६५ रोजी झाला. नाटक, सिनेमा, कथा, कादंबरी या सर्वच क्षेत्रात सहजपणे वावरणारा हा कलावंत.. रुढार्थानेसुद्धा कलावंतच... कारण तो अभिनयसुद्धा करतो... आजच्या घडीला उत्तम आणि दर्जेदार लिहिणा-या लेखकांपैकी एक महत्वाचे नाव म्हणजे अभिराम भडकमकर... चुड़ैल हा कथासंग्रह असो किंवा बालगंधर्व'सारखी एका अवलिया कलावंताचा विशाल जीवनपट असलेली कादंबरी असो किंवा आजच्या मालिका विश्वाच्या पडद्यामागल्या वास्तवाचं भीषण दर्शन घडवणारी 'एट एनी कॉस्ट' ही कादंबरी.... भडकमकर यानी लेखक म्हणून एक विशिष्ट स्थान निर्माण केलेले आहे.

    राष्ट्रीय नाट्य विद्यालायाचे स्नातक असलेले भडकमकर सतत कुठल्या ना कुठल्या 'लेखन' प्रयोगात व्यस्त असतात. पछाडलेला या चित्रपटा मध्ये "समीर" ची भूमिका अभिराम ने साकारलेली आहे. आई, ए रेनी डे, खबरदार, देवकी, पाऊलवाट, बालगंधर्व या चित्रपटाना अभिराम भडकमकरची पटकथा आहे. अभिराम भडकमकर यांनी आम्ही असू लाडके हा मराठी चित्रपट दिग्दर्शित केलेले आहे.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९३२२४०१७३३
    संदर्भ. इंटरनेट
    http://www.abhirambhadkamkar.com/

  • सुप्रसिद्ध बॉलीवुड मधील संगीतकार लक्ष्मीकांत-प्यारेलाल या जोडीतील प्यारेलाल

    प्यारेलाल रामप्रसाद शर्मा उर्फ प्यारेलाल यांना हिंदी चित्रपटाचा संगीतकार व्हायचे नव्हते, तर येहुदी मेन्यूहीनसारखे व्हायोलिनवादक व्हायचे होते. त्यांचा जन्म ३ सप्टेंबर १९४० रोजी झाला. त्यासाठी सतराव्या वर्षी ते व्हिएन्नाला जायला निघाले होते, पण लक्ष्मीकांत कुडाळकर उर्फ लक्ष्मीकांत यांनी त्यांना थांबवले व दोघे ‘लक्ष्मीकांत प्यारेलाल’ या नावाने संगीत देऊ लागले; आणि हिंदी सिने-सृष्टीत सुप्रस्थापित झाले. प्यारेलाल यांच्या वडिलांना, म्हणजे पं. रामप्रसाद शर्माना (बाबाजी) सारे जण ट्रम्पेटवादक म्हणून ओळखत. त्यांच्या काळात पाश्चात्त्य पद्धतीची नोटेशन करू शकणारी अगदी मोजकी माणसे होती, त्यापैकी एक बाबाजी होते. त्यांनी त्यांच्याजवळची नोटेशनलेखनाची विद्या मुक्तहस्ताने सर्वाना दिली.

    प्यारेलाल यांना वयाच्या आठव्या वर्षी केव्हा तरी एके सकाळी आठ वाजता त्यांनी समोर बसवले आणि नोटेशन कसे करायचे ते अर्ध्या तासात शिकवले. त्यानंतर, पुढचे तीन दिवस बारा बारा तास प्यारेलाल यांनी नोटेशन लेखनाचा सराव केला, आणि ते तंत्र बऱ्या पैकी आत्मसात केले. त्यांनंतर वडिलांनी प्यारेलालच्या हातांत व्हायोलिन दिले. व्हायोलिनवादकाला भारतीय किंवा पाश्चात्त्य संगीतात मरण नाही, असे वडील सांगत. त्यांनी प्यारेलालांच्या हाती व्हायोलिन दिले, पण वाजवायला शिकवले ते सहा महिन्यांनी. पाश्चात्त्य पद्धतीने व्हायोलिन वाजवण्यासाठी बसायची एक पद्धत आहे. व्हायोलिन वादक डावा खांदा व डावा पाय काहीसा पुढे काढून ताठ व डौलदार बसतो. व्हायोलिन खांद्यावर जिथे ठेवायचा तो भाग कसा धरायचा, व्हायोलिन कसे पकडायचे, त्याचा बो उजव्या हाताच्या अंगठ्याने आणि तिसर्याी चौथ्या बोटाने कसा धरायचा या सार्यां चे एक शास्त्र आहे. ते शास्त्र येईपर्यंत त्यांनी प्यारेलालना व्हायोलिन वाजवायला शिकवले नाही.

    प्यारेलालजी मितभाषी. आपण बरे की आपले काम बरे असा या दोघांचाही खाक्या. त्यामुळे यशाचे एकाहून एक टप्पे पार करत असतानाही फिल्मी पार्ट्या, पेज थ्री कल्चर यात हे दोघेही रमले नाहीत. त्यांच्याकडे तेवढा वेळच नव्हता. आलेलं कुठलंही काम - मग भलेही तो चित्रपट बी किंवा सी ग्रेडचा असो, सामाजिक असो की मायथालॉजीकल - नाकारायचा नाही हे त्यांनी ठरवूनच टाकलं होतं. एका मुलाखतीत लक्ष्मीकांतजी म्हणाले होते की आम्ही दोघंही फारसे शिकलेलो नाही. संगीत देणं हे एवढं एकच काम आम्हाला जमतं. तेच फक्त आम्ही करतो. मग त्याबद्दल लोक काय म्हणतात याची पर्वा करायला आम्हाला वेळच नाही. आलेलं काम नाकारायचं नाही हे धोरण जरी असलं तरी या दोघांनी नेहमी अव्वल गायकांनाच वापरलं. त्यातही रफी, लता आणि किशोरवर त्यांचे जास्त प्रेम. चित्रपटसंगीताचा सुवर्णकाळ संपल्यानंतर रफी आणि लता यांनी सर्वाधिक लोकप्रिय गाणी एल्.पीं.च्याच संगीतात दिली. चित्रपटाचं बजेट कमी असणं हे तर त्यांनी त्यांच्या पहील्या चित्रपटापासूनच अनुभवलं होतं. १९६३ च्या पारसमणी च्या ८ वर्षे आधी त्यांनी एका चित्रपटाला संगीत दिलं होतं. पण तो चित्रपट डब्यात गेला.

    १९४८ च्या "जिद्दी" पासून १९६३ पर्यंत या दोघांनी त्याकाळातल्या फक्त ओ.पी. नय्यर आणि शंकर-जयकिशन वगळता सर्व संगीतकारांकडे कधी नुसते वादक तर कधी संयोजक म्हणून काम केले. पारसमणी नंतरही काही काळ त्यांनी कल्याणजी आनंदजी यांच्या कडे संयोजकाचे काम केले. पारसमणी हा तसा बी ग्रेड पोषाखी चित्रपट. त्या काळात त्याचे बजेट होते अवघे २५ लाखाचे. अशाही परिस्थीतीत लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांनी फुल ऑर्केस्ट्रा वापरून आणि लता, रफी, आशा आणि मुकेश या कलाकारांना वापरून त्याचे संगीत दिले. ‘पारसमणी’ चित्रपटात हसता हुआ यह नुरानी चेहरा, वो जब याद आये अशी हिट गाणी देत त्यांनी लक्ष वेधले. हे शक्य झाले केवळ लक्ष्मीकांत यांच्या माणसं जोडण्याच्या कलेमुळे. या दोघांनाही भव्य-दिव्यतेची आवड ही शंकर-जयकिशन यांच्या संगीतामुळे निर्माण झाली. ‘प्यारेलाल शर्मा आणि लक्ष्मीकांत कुदळकर हे दोघेही गाण्यांना चाली लावयचे आणि वाद्यसंगीताचे संयोजनही करायचे. प्यारेलालने चाल दिलेलं गाणे कोणते आणि लक्ष्मीकांतने चाल दिलेले गाणे कोणते, हे सांगता येणार नाही, इतके ते एकजीव व्हायचे त्या दोघांचे विचारच काय पण रक्तगटही एकच होते. एकदा आंघोळ करताना प्यारेलाल यांना एक चाल सुचली.

    लक्ष्मीकांतांनीही तीवर काम केले होतं. दोघांची चाल एकसारखी निघाली. संगीतकार सी. रामचंद्र यांनाही या होतकरू लक्ष्मीकांत-प्यारेलाल बद्दल विशेष आस्था होती. "दोस्ती" चित्रपटासाठी एल.पी. ना त्यांचे पहिले-वहीले फिल्मफेअर अवॉर्ड जाहीर झाले ही बातमी द्यायला स्वतः सी. रामचंद्र त्यांच्या घरी गेले होते. आपल्या ड्रेसींग सेन्स साठी प्रसिद्ध असलेल्या चितळकरांनी या समारंभाला हजर राहण्यासाठी त्यांच्या आवडत्या टेलरकडून या दोघांसाठी सुट शिववून घेतला होता. १९६३ ते १९९८ या कालावधीत तब्बल ६३५ हिंदी चित्रपटांना संगीत लक्ष्मीकांत-प्यारेलाल या जोडीने दिले. सर्वाधिक यशस्वी संगीतकार म्हणून याच जोडीचे नाव चित्रपटसंगीताच्या इतिहासात नोंदलं गेलं आहे. त्या काळात लोकप्रियतेचा आणि गुणवत्तेचा निकष मानली जाणारी ‘बिनाका गीतमाला’ लोकप्रिय होती. पारसमणी या पहिल्याच चित्रपटातले ‘हसता हुवा नूरानी चेहरा’ हे गाणे ‘बिनाका’ मध्ये वाजलेले पहिले गाणे ठरले. त्यानंतर सलग १६ गाणी या मालिकेत गाजली. बिनाकाच्या वार्षिक उत्सवात तर ५० पैकी ३२ गाणी लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांची होती. एकूण १७४ गाणी बिनाकामध्ये आली, हा एक विक्रम आहे. ‘पारसमणी’ (१९६३) या चित्रपटापासूनच्या त्यांची सुरु झालेली ‘संगीत वाटचाल या यशस्वी जोडीतील लक्ष्मीकांत यांचे २१ जून १९९८ रोजी निधन झाल्यानंतर प्यारेलाल यांनी आपला ‘संगीत प्रवास’ कमी केला., परंतु या जोडीचा ‘संगीत प्रभाव’ मात्र कायम आहे.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

    लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांनी संगीत दिलेली गाणी
    https://www.youtube.com/watch?v=q667JQMNqME
    https://www.youtube.com/watch?v=ykiEKsr_kNc

  • मराठी विनोदी लेखक व कथाकथनकार द.मा.मिरासदार

    मराठीतले विनोदी लेखक व कथाकथनकार दत्ताराम मारुती मिरासदार उर्फ द. मा. मिरासदार यांचा जन्म १४ एप्रिल १९२७ रोजी झाला.

    काही वर्षे पत्रकारी केल्यानंतर त्यांनी १९५२ साली अध्यापनक्षेत्रात प्रवेश केला. पुण्याच्या कँप एज्युकेशनच्या शाळेत ते शिक्षक होते.

    व्यंकटेश माडगूळकर, शंकर पाटील आणि द. मा. मिरासदार या त्रयीने १९६२ सालापासून कथाकथन करून महाराष्ट्रातलील जनतेला भुरळ घातली होती. मिरासदारांच्या व्यंकूची शिकवणी, माझ्या बापाची पेंड, शिवाजीचे हस्ताक्षर, भुताचा जन्म, माझी पहिली चोरी, हरवल्याचा शोध इत्यादी कथा उत्कृष्ट लिखाण आणि सादरीकरण यामुळे वाचकांच्या आणि श्रोत्यांच्या मनात कायमच्या कोरल्या गेल्या. गप्पागोष्टी, गुदगुल्या, मिरासदारी, गप्पांगण, ताजवा, असे २४ कथासंग्रह, १८ विनोदी चित्रपटांच्या पटकथा त्यांच्या नावावर आहेत. 'एक डाव भुताचा' या चित्रपटात कथा-पटकथा लेखनासह हेडमास्तरची भूमिकाही त्यांनी केली होती.

    मिरासदारांच्या कथासंग्रहांतील बहुतेक कथा ग्रामीण जीवनावर आहेत. ग्रामीण जीवनातील विसंगतीचे, विक्षिप्तपणाचे आणि इरसालपणाचे दर्शन घडवून त्यातील विनोद मिरासदारांनी आपल्या कथांतून फुलवला. असे असले, तरी ‘स्पर्श’, ‘विरंगुळा’, ‘कोणे एके काळी’ सारख्या काही गंभीर कथांतून त्यांनी जीवनातील कारुण्यही प्रत्ययकारीपणे टिपले आहे. तसेच अनेकदा त्यांच्या विनोदालाही कारुण्याची झालर असल्याचे दिसून येते. एक डाव भुताचा आणि ठकास महाठक ह्या दोन चित्रपटांच्या संवादलेखनाबद्दल त्यांना पारितोषिके मिळाली आहेत. ‘व्यंकूची शिकवणी’ ह्या त्यांच्या गाजलेल्या विनोदी कथेवरुन गुरुकृपा हा मराठी चित्रपट काढण्यात आला होता. मराठी साहित्यिकांनी विनोदी वाङ्मयात ज्या अजरामर कथा लिहिल्या त्यात द. मा. मिरासदार यांची ‘माझ्या बापाची पेंड’ आणि ‘भुताचा जन्म’ यांचा समावेश व्हायला हरकत नाही. 'मिरासदारी' या पुस्तकातली 'भुताचा जन्म' ही कथा प्रसिद्ध आहे. ही लोकप्रिय कथा या वर्षी बारावीच्या अभ्यासक्रमातल्या मराठीच्या पाठ्यपुस्तकात आहे. द.मा.मिरासदार यांच्या 'भुताचा जन्म' या कथेवर बनलेली शॉर्टफिल्म आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलमध्ये गाजली. ही कलाकृती रोममध्ये होणाऱ्या फेस्टिवलमध्येही दाखवली गेली.

    द. मा. मिरासदार यांच्या खास विनोदी शैलीतल्या निवडक कथांचा अत्यंत सुरस संग्रह म्हणजे मिरासदारी हे पुस्तक. गेल्या काही वर्षांत मराठी ग्रामीण कथेच्या उदयाबरोबर ग्रामीण वातावरणाशी संलग्न असणारी हास्यजनक कथा जन्माला आली. तिच्यात वृत्तीची विविधता आहे, केवळ एकसुरीपणा नाही. मिरासदारांच्या या कथांतून एक अनोखी मिश्किलपणाची, चमत्कृतीपूर्ण वळणांची व गमतीदार विक्षिप्तपणाची झाक वाचकाला अतिशय भावली. मिरासदारांच्या लेखनात अस्सल विनोदी अशी अनेक गावरान पात्रे आढळतात. त्यात नाना चेंगट, गणा मास्तर, रामा खरात, बाबू पैलवान, सुताराची चहाटळ आनशी, ज्ञानू वाघमोडे, अशी एकाहून एक अस्सल इब्लीस, बेरकी, वाह्यात, टारगट आणि क्वचित भोळसट अशी ही सारी पात्रे आहेत. ती श्रोत्यांना खळाळून हसायला लावत.

    मिरासदारांच्या कथासंग्रहांतील बहुतेक कथा ग्रामीण जीवनावर आहेत. ग्रामीण जीवनातील विसंगतीचे, विक्षिप्तपणाचे आणि इरसालपणाचे दर्शन घडवून त्यातील विनोद मिरासदारांनी आपल्या कथांतून फुलवला. त्याचप्रमाणे त्यांनी ‘स्पर्श’, ‘विरंगुळा’, ‘कोणे एके काळी’ सारख्या काही गंभीर कथांतून जीवनातील कारुण्यही प्रत्ययकारीपणे टिपले आहे.

    द. मा. मिरासदार हे नेहमीच त्यांच्या मार्मिक आणि शैलीदार विनोदांसाठी प्रसिद्ध राहिले आहेत. महाराष्ट्रातील विविध गाव आणि तिथे राहणारी माणस आपल्याला नेहमी मिरासदारांच्या कथेतून भेटत राहतात. 'चकाट्या' मध्ये ही अशाच काही गावात आणि शहरात राहणाऱ्या अवली माणसाच्या आणि त्यांच्या स्वभाव वैशिष्ट्यांच्या कथा आपल्याला वाचायला मिळतात फक़्त शाब्दिक विनोद न करता प्रासंगिक विनोद लेखनातून वठवणे आणि साध्या लिखाणातून वाचकाला गुंतवून ठेवणे यातच लेखकाचे यश मानता येईल . 'शिवाजीचे हस्ताक्षर' ही कथा तर अप्रतिम.

    द. मा. मिरासदार यांना विंदा करंदीकर जीवनगौरव, पुलोत्सव जीवनगौरव' पुरस्कार मिळाला होता.

    मराठी सिने-नाट्य कलाकार रवींद्र मंकणी हे द. मा. मिरासदार यांचे जावई.

    द. मा. मिरासदार यांचे २ ऑक्टोबर २०२१ रोजी निधन झाले.

    -- संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

    कथा कथन - द. मा. मिरासदार यांच्या आवाजात..
    https://www.youtube.com/watch?v=4yy-dYVTrow
    https://www.youtube.com/watch?v=_NCs6yL1chE
    https://www.youtube.com/watch?v=I0DUFPBj33k

  • मराठी ग्रंथकार आणि संपादक रामचंद्र भिकाजी गुंजीकर

    गुंजीकरांची मोचनगड ही मराठीतील पहिली ऐतिहासिक कादंबरी. शिवकालाच्या पार्श्वभूमीवर काल्पनिक पात्रे व प्रसंग निर्माण करून लिहिलेली ही कादंबरी आहे. शिवाजी महाराज ह्या कादंबरीत अगदी अखेरीअखेरीस येतात. कादंबरीच्या उद्दिष्टांविषयी गुंजीकरांच्या निश्चित कल्पना होत्या, असे दिसते. त्यांच्याशी प्रामाणिक राहून त्यांनी शिवकालीन इतिहासाची काटेकोर जाण ठेवली व शिवकालाचे जिवंत वातावरण निर्माण केले. ऐतिहासिक कादंबरीचा एक उत्कृष्ट आदर्श म्हणून अ. का. प्रियोळकरांसारख्या चिकित्सक विद्वानांनी ह्या कादंबरीला मान्यता दिली आहे.