जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील एक अभिनेते, दिग्दर्शक, चित्रकार अमोल पालेकर यांचा जन्म २४ नोव्हेंबर १९४४ रोजी झाला. चित्रपट, टीव्ही मालिकांमध्ये अभिनय, दिग्दर्शन, निर्मिती अशा विविध भूमिका करत असलेले अमोल पालेकर यांचे वडील पोस्टात काम करत असत, आणि आई खाजगी कंपनीत काम करत होती.
खरे तर, पालेकर चित्रकार व्हावयाचे. जे. जे. स्कूल ऑफ आर्टमधून फाइन आर्टची पदव्युत्तर पदवी प्राप्त केलेल्या अमोल पालेकरांच्या अप्रतिम चित्रांची सात प्रदर्शनेही झाली आहेत. पण, सत्यदेव दुबेंच्या रूपात गुरू भेटला आणि यथावकाश त्यांच्यातील चित्रकार अभिनेत्याच्या रूपात दृढ होत गेला. समांतर रंगभूमीवरील निष्ठा, नैतिकता या दुबेंच्या गुणांचा मनोहारी संगम पालेकरांमध्येही झालेला दिसतो. छबिलदास थिएटर चळवळीचा, किंबहुना समांतर रंगभूमीचा इतिहास लिहिला जाईल; तेव्हा त्यातील एक सुवर्ण पान अमोल पालेकरांच्या नावाने लिहिलेले असेलच!
अमोल पालेकर यांनी सत्यदेव दुबे यांच्याबरोबर मराठी प्रयोगात्मक नाटकात रंगभूमीवर पदार्पण केले आणि नंतर "अनिकेत" नावाची स्वतःची नाट्यसंस्था १९७२ मध्ये सुरू केली. त्यांनी चित्रपटातील अभिनयाची सुरुवात १९७१ सालच्या शांतता! कोर्ट चालू आहे या सत्यदेव दुबे दिग्दर्शित मराठी चित्रपटातून केली. या चित्रपटापसून नवीन मराठी चित्रपट चळवळ सुरू झाली असे समजले जाते. १९७४ मध्ये अमोल पालेकर यांनी बासू चॅटर्जी यांच्या रजनीगंधा आणि छोटीसी बात या कमी खर्चात केलेल्या पण गाजलेल्या चित्रपटांत काम केले. यातूनच आणखी विनोदी चित्रपटांतून त्यांना "मध्यमवर्गीय" माणसाच्या भूमिका मिळत गेल्या.
गोलमाल चित्रपटासाठी त्यांना १९७९ मध्ये फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. १९८२ मध्ये त्यांनी ओलंगल या मल्याळम चित्रपटात रवीची भूमिका केली, नंतर हा चित्रपट हिंदीत मासूम नावाने करण्यात आला. मराठी चित्रपट आक्रीत पासून अमोल पालेकर यांनी दिग्दर्शनाची सुरुवात केली. त्यांनी दिग्दर्शित केलेला पहेली हा चित्रपट २००६ मध्ये सर्वोत्कृष्ट परदेशी चित्रपटासाठीच्या ऑस्कर पुरस्कारासाठी भारतातर्फे अधिकृतरीत्या पाठविण्यात आला. पण तो अखेरच्या नामांकनांपर्यंत पोचला नाही. मराठी बरोबरच कानडी, बंगाली, मल्याळम या भाषांतील अमोल पालेकर यांच्या चित्रपटांना समीक्षकांनी वाखाणले आहे.
दिग्दर्शक म्हणून त्यानी स्त्रियांचे चित्रण अधिक संवेदनशीलपणे केले. भारतीय साहित्यातील अभिजात कथांवर त्याचे काही चित्रपट आधारलेले आहेत. अमोल पालेकर यांच्या चित्रपटांतून आधुनिक दृष्टिकोन असतो. बादल सरकार यांचा मोठा प्रभाव पालेकर यांच्यावर आहे. त्यामुळेच त्यांना बगीचे, गॅरेज, कॅन्टीन, इमारतीची गच्ची अशा एरवी अशक्यव मानल्या जाणाऱ्या ठिकाणी नाटक सादर करण्याची प्रेरणा मिळाली असावी. समांतर रंगभूमी जगविण्यासाठी जे जे प्रयत्न झाले, त्यामध्ये पालेकरांच्या या अजोड भूमिकेचीही दखल घ्यावी लागेल.
विजय तेंडुलकरांच्या "शांतता, कोर्ट चालू आहे‘ चे हिंदी रूपांतर "चूप! कोर्ट चालू है‘, मोहन राकेश यांचे "आधे अधुरे‘, गिरीश कार्नाड यांचे "हयवदन‘ या नाटकांतील संस्मरणीय भूमिकांच्या बरोबरीने पालेकरांनी नाट्यदिग्दर्शक म्हणूनही प्रवास सुरू ठेवला होता. बादल सरकार यांचे "वल्लभपूरची दंतकथा‘, "पगला घोडा‘, "जुलूस‘, चिं. त्र्यं. खानोलकरांचे "अवध्य‘, अच्युत वझेंचे "चल रे भोपळ्या टुणूक टुणूक‘, महेश एलकुंचवारांचे "वासनाकांड‘ आणि "पार्टी‘, अकिरा कुरोसावा यांचे "राशोमान‘, दिवाकरांच्या नाट्यछटांना त्यांनी दिलेले नाट्यरूप, असे पालेकरांच्या नाट्यसाधनेच्या मार्गातील लक्षणीय टप्पे आहेत. फक्त नाट्यगृहापुरती नाटकाची व्याप्ती न ठेवता नाटक थेट लोकांपर्यंत नेण्यासाठी त्यांनी केलेले विविध प्रयोगही अत्यंत महत्त्वाचे आहेत.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
https://www.youtube.com/watch?v=5jJIb55qGHg
https://www.youtube.com/watch?v=jibrG5b-IpU
November 24, 2018
पं. डी. के. दातार यांच्या आधी १०० वर्षांची व्हायोलिन वादनाची परंपरा असलेल्या कर्नाटक संगीतात गायकी अंगाने व्हायोलिन वाजवण्याची पद्धत होती. परंतु हिंदुस्थानी संगीतात ती रुजली नव्हती. ती रुजवण्याचे मोठे काम पं. दातार यांनी केले.
June 7, 2022
अव्वल इंग्रजीतील मराठी व्याकरणकार, ग्रंथकार आणि कळकळीचे धर्मसुधारक पांडुरंग दादोबा तर्खडकर यांचा जन्म ९ मे १८१४ रोजी झाला.
प्राथमिक शिक्षण घरी वडिलांजवळ तसेच खाजगी शाळांतून आणि माध्यमिक शिक्षण ‘बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी’ च्या शाळेत झाले. गुजराती व फार्सी भाषा त्यांना अवगत होत्या. सरकारी नोकरीत शिक्षक, अधीक्षक, उपजिल्हाधिकारी अशा विविध हुद्यांवर त्यांनी काम केले, सेवानिवृत्तिनंतर अल्पकाळ ओरिएंटल ट्रान्स्लेटरच्या हुद्यावर ते होते.
संस्कृत व इंग्रजी भाषांच्या व्याकरणाचे अध्ययन करून आणि मराठी भाषेच्या रूपविचाराची स्वतंत्र प्रज्ञेने व्यवस्था लावून मराठी भाषेचे व्याकरण (१८३६) त्यांनी सिद्ध केले. ह्या व्याकरणाच्या अनेक आवृत्या निघाल्या.
१८८१ मध्ये दादोबांनी आपल्या व्याकरणाच्या सातव्या आवृत्तीची पूरणिकाही प्रसिद्ध केली. विद्यार्थ्यांसाठी शालोपयोगी लघुव्याकरणही (१८६५) त्यांनी लिहीले. त्याच्याही अनेक आवृत्या निघाल्या. मोरोपंतांच्या केकावलीवर यशोदापांडुरंगी (१८६५) ही गद्य टीका त्यांनी लिहिली. तीतून दादोबांची सहृदयता प्रत्ययास येते. ह्या टीकेस इंग्रजी आणि मराठी अशा दोन प्रस्तावना त्यांनी जोडल्या. त्यांपैकी मराठी प्रस्तावनेत त्यांचे वाङ्मयविषयक विविध विचार आलेले आहेत. त्यांचे १८४६ पर्यंतचे आत्मचरित्र (१९४७, संपा. अ. का. प्रियोळकर) महत्त्वाचे आहे.
अव्वल इंग्रजीतील जवळजवळ एकमेव आत्मचरित्र म्हणून दादोबांच्या आत्मचरित्राचे महत्त्व आहेच. तथापि त्यांच्या काळातील धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय स्थितीचे त्यात पडलेले प्रतिबिंबही अभ्यासकांच्या दृष्टीने मोलाचे आहे. स्वतः दादोबांचे जीवन अशा काही चळवळींशी वेगवेगळ्या प्रकारे निगडित झालेले असले, तरी त्यांच्या आत्मचरित्रातून त्या चळवळींबरोबरच दादोबांचे व्यक्तिमत्त्वही स्पष्टपणे प्रत्ययास येते. साधी भाषाशैली आणि प्रांजळ निवेदन ही ह्या आत्मचरित्राची काही उल्लेखनीय वैशिष्ठ्ये. यांशिवाय मराठी नकाशांचे पुस्तक (१८३६), इंग्रजी व्याकरणाची पूर्वपीठिका (१८६०), धर्मविवेचन (१८६८), पारमहंसिक ब्राह्मधर्म (१८८०) आणि शिशुबोध (१८८४) अशी विविध प्रकारची त्यांची ग्रंथरचना आहे, तसेच काही मराठी आणि इंग्रजी स्फुट निबंधही त्यांनी लिहिले. विधवापुनर्विवाहाचे समर्थन करण्यासाठी त्यांनी लिहिलेला ‘विधवाश्रुमार्जन’ हा संस्कृत निबंध बाबा पदमनजी ह्यांच्या यमुनापर्यटन ह्या कादंबरीत अंतर्भूत करण्यात आला होता.
विख्यात स्वीडिश तत्वज्ञ स्वीडनबॉर्ग ह्याच्या ग्रंथावर त्यांनी लिहिलेल्या अ हिंदू जंटलमन्स रिफ्लेक्शन्स रिस्पेक्टिंग द वर्क्स ऑफ एमानुएल स्वीडनबॉर्ग (१८७८) ह्या ग्रंथाची यूरोपात प्रशंसा झाली होती. दादोबांच्या साहित्यात साधेपणा आणि विचारप्रवर्तकता आहे. त्यांचे मराठी व्याकरणविषयक कार्य अग्रेसर महत्त्वाचे असून त्यायोगे मराठी गद्याला प्रमाणरूप प्राप्त झाले असल्याने ‘मराठी भाषेचे पाणिनी’ हे रास्त बिरुद त्यांना लावले जाते.
ग्रंथलेखनाप्रमाणेच समाजसुधारणेचे कार्यही दादोबांनी केले. सरकारी नोकरी करीत असतानाच लोकहिताच्या कार्यात त्यांनी भाग घेतला. दुर्गाराम मनसाराम मेहेता यांनी सुरतला स्थापन केलेली मानवधर्मसभा (१८४४) आणि राम बाळकृष्ण जयकर यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेली परमहंस सभा (सु. १८४८) या धर्मसुधारक संस्थांमागे दादोबांची प्रेरणा होती. यांशिवाय मराठी ज्ञानप्रसारक सभा, मुंबई विद्यापीठ, पुनर्विवाहोत्तेजक सभा, बॉम्बे असोसिएशन इ. संस्थांच्या कार्यातही त्यांचा सहभाग असे.
भिल्लांचा बंडखोर पुढारी पटाजी नाईक याचे बंड त्यांनी १८५७ साली मोडून काढले व सरकारने रावबहादुर ही पदवी त्यांना बहाल केली. पांडुरंग दादोबा तर्खडकर यांचे १७ ऑक्टोबर १८८२ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३
संदर्भ.मराठी विश्वकोश/ मालशे, स. गं.
May 9, 2019
गिरीजाबाईंनी विविध वाङ्मय प्रकारांनी आपले लेखन केले. त्यांची एकूण ७८ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यात कथा, कादंबरी, मुलाखती, प्रवासवर्णने, बालसाहित्य इत्यादी विविधता आहे. १९६८ ते १९७८ या काळात ‘अनुराधा’ मासिकाची सहाय्यक संपादिका म्हणूनही त्यांनी काम केले.
November 1, 2019
एखाद्या क्रिकेट, टेनिस किंवा फुटबॉल सामन्याच्या अखेरीस बातमी पाठवण्यापूर्वी संबंधित क्रीडा पत्रकारांनी एकत्रित येऊन बारकावे निसटणार नाहीत ना, याची खातरजमा करून घेणे तसे नित्याचेच. या नियमाला एक खणखणीत अपवाद- जॉन वुडकॉक! ‘द टाइम्स’साठी त्यांनी १९५४ ते १९८७ असा प्रदीर्घ काळ प्रामुख्याने क्रिकेट सामन्यांचे वृत्तांकन केले.
कसोटी वा कोणत्याही क्रिकेट सामन्यात वार्ताहर कक्षात किंवा काही वेळा छायाचित्रकारांसमवेत सीमारेषेच्या जरा बाहेर बसून वुडकॉक वार्तांकन करायचे. त्यांची निरीक्षणे बिनचूक, वार्तांकन पूर्णतया निर्दोष! बहुतेक पत्रकार दुसऱ्या दिवशी त्यांच्या छापून आलेल्या बातम्या किंवा वृत्तलेख वाचायचे. सर्वांपेक्षा सरासरी किमान दोन निरीक्षणे वुडकॉक यांच्या वार्तांकनात अतिरिक्त तरीही तथ्याधारित आढळायचीच. डॉन ब्रॅडमन ते सचिन तेंडुलकर असा क्रिकेटपटूंचा विस्तीर्ण पट त्यांनी डोळ्याखालून घातला. वार्तांकनाकडे ते वळले तसे अपघातानेच.
भूगोलाची पदवी आणि शिक्षणशास्त्राची पदविका घेऊन ते शिक्षकच व्हायचे. पण ऑक्सफर्डमध्ये क्रिकेट खेळत असताना विख्यात क्रिकेट लेखक ई. डब्ल्यू. स्वाँटन यांच्या संपर्कात आले. सुरुवातीला बीबीसीसाठी स्कोरर, मग स्वाँटन यांच्यासह ऑस्ट्रेलिया दौऱ्यात त्यांचे हरकामे अशा जबाबदाऱ्या पाडल्या. बीबीसीसाठी चित्रफितींची रिळे पाठवण्यापासून, ते स्वाँटन यांचे चालक, व्हिस्की सहायक असे उद्योग सांभाळत असताना त्यांनी काही लिखाणही केले. त्याने स्वाँटन यांच्यासह अनेक प्रभावित झाले. दरम्यानच्या काळात ‘मँचेस्टर गार्डियन’मध्ये भारतीय मालिकेचे वार्तांकन करण्याची जबाबदारी त्यांनी यथास्थित निभावली.
१९५४ मध्ये ‘द टाइम्स’ने त्यांना क्रिकेट वार्ताहर म्हणून संधी दिली, तेथे ते निवृत्त होईपर्यंत काम करत राहिले. जॉन अरलॉट, नेव्हिल कार्डस, ई. डब्ल्यू. स्वाँटन अशा दर्जेदार क्रिकेट पत्रकारांच्या परंपरेतील ते एक. परंतु जॉन वुडकॉक स्वत:चा उल्लेख क्रिकेट लेखक असाच करत. ‘विस्डेन क्रिकेट’ मासिकाचे ते १९८०पासून सहा वर्षे मानद संपादक होते.
‘विस्डेन’च्या जुनाट वळणाच्या क्रिकेट लिखाणात त्यांनी टवटवीतपणा आणला. त्यांनी जितक्या कसोटी सामन्यांचे वार्तांकन केले, तितके आजवर कोणीही केलेले नाही. त्यामुळेच त्यांचा उल्लेख ‘क्रिकेट पत्रकारांचे भीष्म पितामह’, ‘क्रिकेटचा विश्वकोश’ असा केला जाई. निवृत्त झाल्यानंतरही अगदी अलीकडेपर्यंत ते लिखाण करत. त्यांच्या लिखाणाला ‘द टाइम्स’मध्ये सन्मानाने स्थानही दिले जात होते.
जॉन वुडकॉक यांचे १८ जुलै २०२१ रोजी निधन झाले.
संकलन संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- इंटरनेट
August 7, 2021
December 15, 2010
भालजी पेंढारकर यांच्या आकाशगंगा या चित्रपटातील छोट्या सीतेच्या भूमिकेपासून त्यांच्या चित्रपट कारकीर्दीची सुरुवात झाली. थोरातांची कमळा या चित्रपटात त्यांनी प्रथमच नायिकेची भूमिका केली. त्यानंतर नायिका म्हणून त्यांनी सुमारे १५ वर्षे काम केले. मधुचंद्र, आम्ही जातो आमुच्या गावा, अंगाई, काका मला वाचवा, शेवटचा मालुसरा, मल्हारी मार्तंड, स्वयंवर झाले सीतेचे, भालू असे ८० हून अधिक चित्रपट त्यांच्या नावावर आहेत. अभिनेते-दिग्दर्शक प्रकाश भेंडे हे त्यांचे पती. लग्नानंतर प्रकाश भेंडे यांनी सुरू केलेल्या श्री प्रसाद चित्र या संस्थेच्या माध्यमातून भालू, चटक चांदणी, आपण यांना पाहिलंत का, प्रेमासाठी वाट्टेल ते, आई थोर तुझे उपकार या चित्रपटांची त्यांनी निर्मिती व चित्रपटांमधून त्यांनी काम केले.
May 31, 2022
काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या असणार्या श्रीमती प्रतिभाताई देवीसिह पाटील २५ जुलै २००७ ते २५ जुलै २०१२ या दरम्यान भारताच्या राष्ट्राध्यक्षा होत्या.
January 22, 2010
संत तुकारामांना इंग्रजीत नेणारे ज्येष्ठ साहित्यिक, प्रयोगशील कवी, वारकरी परंपरेचे अभ्यासक, चित्रपटकार व चित्रकार दिलीप पुरुषोत्तम चित्रे हे बहुआयामी व्यक्तिमत्व होते.
December 28, 2018
२००३ साली त्या सॅन फ्रान्सिस्कोच्या डिस्ट्रिक्ट अॅटर्नी झाल्या. कॅलिफोर्नियाच्या अॅटर्नी जनरल म्हणून निवड होणाऱ्या त्या पहिल्या महिला आणि पहिला कृष्णवर्णीय व्यक्ती होत्या.
October 20, 2021
Copyright © 2025 | Marathisrushti