जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
आज ७ नोव्हेंबर.. मराठीतील लेखक आणि पटकथालेखक यशवंत गो. जोशी यांची पुण्यतिथी
त्यांचा जन्म १७ डिसेंबर १९०१ रोजी झाला आणि प्राथमिक शिक्षण पुणे येथे झाले. आर्थिक ओढगस्तीमुळे इंग्रजी पाचवीत असतानाच त्यांनी शिक्षण सोडले. त्यानंतर त्यांनी अनेक नोकर्या केल्या. शाई, सुगंधी तेले तयार करून विकण्याचा तसेच वृतपत्रे विकण्याचा व्यवसाय केला. पुढे लेखनास सुरुवात केली व १९३४ मध्ये प्रकाशन व्यवसायास आरंभ केला.
हे प्रकाशन प्रामुख्याने वैचारिक वाङ्मय प्रकाशित करत असे. शिवराम महादेव परांजपे यांच्या ’काळातील निवडक निबंधां’चे १० भाग य.गो. जोशी प्रकाशनाने प्रसिद्ध केले होते.
य.गो. जोशी यांची ’एक रुपया दोन आणे’ ही पहिली कथा यशवंत या मसिकात १९२९ साली प्रसिद्ध झाली. आणि याच मासिकाच्या कथास्पर्धेत य.गो. जोशींच्या ’शेवग्याच्या शेंगा’ या कथेस पहिले पारितोषिक मिळाले. जिवंत अनुभवातून प्रकटलेली जोशी यांची कथा पांढरपेशा मध्यमवर्गीय जीवनाचे, व्यक्ती–व्यक्तींतील भावसंबंधाचे जिव्हाळ्याचे चित्रण करते. परिणामाची उत्कटता, सहजसुंदर संवाद, साधी, प्रसन्न आणि अर्थपूर्ण भाषाशैली ही त्यांच्या कथालेखनाची काही लक्षणीय वैशिष्ट्ये होती. तंत्र हे कथेच्या गळ्यात अडकलेले लोढणे, अशी त्यांची ठाम समजूत होती.
‘ग्यानबा तुकाराम आणि टेक्निहक’ ह्या कथेतून त्यांनी तंत्राच्या हव्यासाचा उपहास केला आहे. ’अन्नपूर्णा’, ’वहिनींच्या बांगड्या’, ’शेवग्याच्या शेंगा’, ’माझा मुलगा’ या मराठी चित्रपटांच्या कथा आणि पटकथा य.गो. जोशींच्या आहेत.
य.गो. जोशी हे पुण्यातून प्रकाशित होणार्या ’प्रसाद’ मासिकाचे संपादक होते. य.गो. जोशींच्या पुण्यतिथीला नामवंतांच्या उपस्थितीत ’यशवंत संध्या’ नावाचा संगीत कार्यक्रम करण्यात येतो.
य.गो.जोशीं यांचे ७ नोव्हेंबर १९६३ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ:- विकिपीडिया
प्रभाकर जोग यांचे वडील साखर कारखान्यांच्या तंत्रज्ञानातील जाणकार होते. त्यांचा जन्म २५ डिसेंबर १९३२ रोजी झाला. आई-वडिलांपकी कोणी कलेच्या प्रांतात नव्हते, मात्र वडिलांना संगीत नाटकांची पहिल्यापासून आवड होती. पुण्याजवळच्या मांजरा फार्म येथे उमेदवारी करीत अस्ताना बालगंधर्वाचें नाटक पुण्यात आले की वडील सायकलवरून बारा किलोमीटरची रपेट करून पुण्यात येत असत, रात्रभर नाटक पाहून, परतीची सायकलवारी करून पुन्हा दुसऱ्या दिवशी कामावर हजर रहात.
संगीतकलेची ही आवड प्रभाकर जोगांमध्ये उतरली. त्यांनी गजाननराव जोशी आणि नाराणराव मारुलीकर यांच्याकडून वयाच्या ५ व्या वर्षापासून गायन शिकायला सुरुवात केली. प्रभाकर जोगांची मोठ्या आकारमानाच्या व्हायोलिनशी चाललेली झटापट पाहून त्यांच्या आजीने त्याना अडीचशे रुपयांचे एक छोटे व्हायोलिन आणून दिले. प्रभाकर जोग या वाद्यावर हळूहळू प्रभुत्व मिळवत गेले. मा.प्रभाकर जोग यांचे भाऊ मा.वामनराव जोग हे आकाशवाणीवर व्हायोलिनवादक म्हणून नोकरी करत आणि घरी व्हायोलिनचे वर्ग घेत..प्रभाकर जोग आसपास रेंगाळून संगीताचा आस्वाद घेतच मोठे झाले. वयाच्या बाराव्या वर्षी त्यांनी त्यांनी व्हायोलिनचे कार्यक्रम करायला सुरुवात केली.
कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात पुण्यातील वाड्यांमधून त्यांनी सव्वा रुपया आणि नारळ या बिदागीवर व्हायोलिन वादनाचे कार्यक्रम केले. एस.पी. कोलेजच्या मैदानात भरलेल्या स्नेहसंमेलनात व्हायोलिन वाजवत असताना मदानापलीकडे राहणार्यार सुधीर फडके यांनी ते ऐकले आणि प्रभाकर जोगांना भेटायला बोलावले. पुढे ते संगीत दिग्दर्शक सुधीर फडके यांचे सहाय्यक झाले. गीतरामायणाच्या सुमारे ५०० कार्यक्रमांना प्रभाकर जोग यांची साथ होती. स्नेहल भाटकर यांच्याकडे जोग यांनी ’गुरुदेवदत्त’ या १९५१ च्या चित्रपटात व्हायोलिन वादन केले.
स्वरलिपी लेखनकलेत पारंगत असलेले प्रभाकर जोग त्यानंतर संगीतकार श्रीनिवास खळे, दशरथ पुजारी, हृदयनाथ मंगेशकर, यशवंत देव, वसंत पवार, वसंत प्रभू, राम कदम आणि यशवंत देव यांच्याबरोबर काम करू लागले. १९५२ साली प्रभाकर जोग हिंदी चित्रपसृष्टीत साँग व्हायोलिनिस्ट् म्हणून दाखल झाले. रोशन, मदनमोहन, लक्ष्मीकांत प्यारेलाल, राहुलदेव बर्मन या संगीतदिग्दर्शकांकडून त्यांना बोलावणी येऊ लागली. प्रभाकर जोग यांनी मराठी चित्रपट, गामोफोन कंपन्या, आकाशवाणी आणि दूरदर्शन यांच्यासाठी संगीताच्या सुरावटी रचल्या आहेत. प्रभाकर जोगांच्या व्हायोलिन वादनातून जणू शब्द ऐकू येतात, त्यामुळे त्यांचे व्हायोलिन ’गाणारे व्हायोलिन’ म्हणून ओळखले जाते. प्रभाकर जोग यांनी गाण्याला भावप्रधान करताना व्हायोलिनचा सुंदर वापर केला.
सुरुवातीच्या काळात त्यांनी व्हायोलिनवादनाचे लहान-मोठे कार्यक्रम केले. पुढे संगीतकार श्रीनिवास खळे, दशरथ पुजारी, पंडित हृदयनाथ मंगेशकर, यशवंत देव, वसंत पवार, राम कदम, वसंत प्रभू या दिग्गज संगीतकारांना साथ केली. ‘लपविलास तू हिरवा चाफा’ या गीतापासून जोग हे स्वतंत्र गीतकार म्हणून महाराष्ट्राला परिचित झाले. ‘जावई माझा भला’ हा त्यांचा पहिला मराठी चित्रपट आहे. त्यांनी एकूण २२ चित्रपटांना संगीत दिले. गायक, संगीतकार सुधीर फडके यांच्या गीतरामायणाच्या ५०० पेक्षा अधिक कार्यक्रमांना व्हायोलिनचे सूर दिले. ‘गाणारे व्हायोलिन’ आणि ‘गाता रहे मेरा व्हायोलिन’ या त्यांच्या व्हायोलिन गीतांच्या व्हिसीडी रसिकांच्या पसंतीस उतरल्या.
‘स्वर आले दुरूनी’, ‘तेच स्वप्न लोचनात’, ‘बाजार फुलांचा भरला’, ‘हे चांदणे फुलांनी’, ‘सोनियाचा पाळणा’, ‘सत्यात नाही आले स्वप्नात येऊ का’, ‘आला वसंत ऋतू आला’ ही जोग यांनी संगीतबद्ध केलेली गाणी गाजली. हिंदी चित्रपटसृष्टीतील मदनमोहन, एस. डी. बर्मन, लक्ष्मीकांत प्यारेलाल, शंकर जयकिशन, खय्याम, ओ.पी. नय्यर, उषा खन्ना, जयदेव, रवींद्र जैन या संगीतकारांसोबतही त्यांनी काम केले. व्हायोलिन वादन आणि संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना वसुंधरा पंडित, लता मंगेशकर, सूरसिंगार, चित्रकवी अशा वैविध्यपूर्ण पुरस्कारांनी त्यांचा गौरव झाला आहे. त्यात आता गदिमा पुरस्काराने मोठी भर पडली आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट
विनोदाचे बादशहा, विनोदकार, विनोदी कथाकार म्हणून ज्यांनी अनेक वर्षे अगदी आजच्या पिढीपर्यंत हसवलं, ज्यांचे विनोदी साहित्य आजही ताजेतवाने वाटते असे विनोदी साहित्याचे जनक म्हणजे चिंतामण विनायक तथा चि.वि. जोशी चि.विं. चा जन्म 19 जानेवारी 1892 सालचा.
पुण्याच्या नूतन मराठी शाळेतून ते मॅट्रिकची परिक्षा उत्तीर्ण झाले. त्यानंतर फर्ग्यूसन कॉलेजमधून 1911 मध्ये बी. ए. आणि 1916 मध्ये त्यांनी एम.ए. ची पदवी मिळविली. तसेच चि.वि.जोशी हे पाली भाषेचे पंडित होते, पाली भाषेवर त्यांचे चांगलेच प्रभुत्व होते. पदवी मिळविल्यानंतर काही वर्षे त्यांनी मुंबई येथे शिक्षण खात्यात नाकरी केली. 1920 सालापासून बडोदा येथे पाली, मराठी आणि इंग्रजीचे अध्यापन करु लागले. 1928 पासून निवृत्त होईपर्यंत बडोदा संस्थानात ते रेकॉर्ड ऑफिसर म्हणून सेवेत होते. इतर भाषांप्रमाणेच बडोद्यातील वास्तव्यामुळे त्यांनी गुजराती भाषेवरसुध्दा प्रभूत्व मिळविले होते. पाली भाषेवरील प्राविण्यामुळे त्यांनी जातक कथांचा अनुवाद केला होता. शाक्यमुनी गौतम, बुध्द संप्रदाय व शिकवण हे पालीभाषेतील ग्रंथ त्यांनी मराठीत अनुवादित केले. अनुवादित साहित्याबरोबरच त्यांचे विनोदी लेखन प्रसिध्द आणि लोकप्रिय आहे. एरंडाचे गुऱहाळ, चिमणरावांचे चऱहाट, वायफळाचा मळा, आणखी चिमणराव, ओसाडवाडीचे देव , गुंडयाभाऊ, द्वादशी, गुदगुल्या, रहाटगाडगे, हास्य चिंतामणी, बोरीबाभळी, इत्यादी अनेक विनोदी कथासंग्रह प्रकाशित आहेत. अत्यंत दर्जेदार आणि कोटीबाज विनोद हे त्यांच्या लेखनाचे वैशिष्टय होते. मानवी स्वभावांतील विसंगती सुक्ष्मपणे हेरुन त्या विसंगतीतून भावनिक आणि शाब्दिक विनोद उभा करणे ही चि.वीं.ची खासियत होती, साधी, सोपी, सरळ भाषा, सर्वसामान्यांच्या आयुष्यात घडणारे छोटे छोटे प्रसंग त्यातून निर्मित विनोद, त्यामुळे त्यांचे लेखन आणि विनोदी भाव सर्वसामान्य माणसांपर्यंत चटकन पोहोचत असत. या त्यांच्या हातोटीमुळे त्यांना लोकप्रियता लाभली. मागील पिढीतील आणि सद्य काळातील लेखकांनी स्वतची अशी काही व्यक्तिचित्रे उभी केली, त्याचप्रमाणे चि.वी. नी उभे केलेले हास्यव्यक्तिमत्व म्हणजे चिमणराव` चिमणरावांचं व्यक्तिमत्व त्यांच्या लेखणीतून इतकं जीवंत झालं होतं की चिमणराव म्हणजे चि. वि. चा मानसपुत्र असे मानले जात असे. अनेकांच्या अनेक विनोदी पात्रांमधला एकमेव असे चिमणरावांचे वर्णन केले जात असे. भोळसट, हास्यकारक वर्तन करणारा असा हा चि.वि. चा चिमणराव मराठी साहित्यात अजरामर झाला आहे. त्या काळातील साहित्यिकांच्या लेखनावर पाश्चात्य लेखकांचा बहुतेक प्रभाव असे. इंग्रजी विनोदी पाश्चात्य लेखकांच्या बाबतीतही असेच म्हणता आले असते. परंतु या बाबतीत मात्र चि.विं. नी आपल्या व्यक्तीरेखेवर पाश्चात्य छाप पडू न देता चिमणरावांचे व्यक्तीत्व हे संपूर्ण ब्राम्हणी असे रंगविलेले आहे. ही त्यांच्या स्वतंत्र प्रतिभेचीच एक प्रतिमा आहे. साहित्य लेखन हा अनेक लेखकांचा हातखंडा असला तरी विनोदी साहित्य निर्मिती हा अतिशय कठीण असा साहित्याचा प्रकार. तो सहजतेने हाताळणारे चि.विं. सारखे विनोदी साहित्यिक विरळाच.
आयुष्यभर आपल्या लेखनाने महाराष्ट्राला हसविणार्या या विनोदी लेखकाचे 21 नोव्हेंबर 1963 रोजी निधन झाले.
चि. वी. जोशी यांचे मराठीसृष्टीवरील लेख.
सुप्रसिध्द मराठी विनोदी लेखक चिं.वी.जोशी (21-Nov-2018)
सुप्रसिध्द मराठी विनोदी लेखक चिं.वी.जोशी (19-Jan-2019)
विनोदाचे बादशहा, विनोदकार, विनोदी कथाकार चिंतामण विनायक जोशी उर्फ चि.वि.जोशी (19 Jan 2018)
अमिताभचा १९७७ सालचा अमर अकबर अँथोनी हा अतिशय गाजलेला चित्रपट कोणाला माहित नाही असे होणे नाही. आजही या चित्रपटातील गाणी आणि संवाद लोकांच्या आठवणीत आहेत. या चित्रपटात अमिताभने साकारलेले अँथोनी नावाचे पात्र फारच गाजले.
लोकांच्या मनावर या पात्राने त्या काळी अधिराज्य गाजवले असे म्हटले तर वावगे ठरू नये. चित्रपटातील अमिताभच्या पात्राचे वर्ण करणारे ‘माय नेम इज़ अँथोनी गोन्सालवीस , मैं दुनिया में अकेला हूं.’ हे गाणं तर आजही गुणगुणण्यासारखे आहे.
आता तुम्हाला आम्ही याच पात्राच्या नावाबद्दल एक आश्चर्यकारक गोष्ट सांगणार आहोत.
तुम्हाला वाटत असेल की अँथोनी गोन्सालवीस हे नाव लेखकाच्या लेखणीतून काल्पनिकरित्या उतरले असेल, पण हे खरं नाही आहे. अँथोनी गोन्सालवीस या नावाचा एक व्यक्ती आपल्या बॉलीवूड मध्ये कार्यरत होता, त्याच्याच नावावरून अमिताभच्या रांगड्या पात्राचे नाव अँथोनी गोन्सालवीस ठेवण्यात आले होते.
आपल्यापैकी बहुतेक जणांना ही गोष्ट देखील ठावूक नसेल की मूळ कथेमध्ये अमिताभच्या पात्राचे नाव अँथोनी फर्नांडीस ठेवण्यात आले होते.
या चित्रपटाला लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांनी संगीत दिलं होतं, तर गाणी लिहिली होती आनंद बक्षी यांनी. एकदा हे तिघं मिळून गाण्यांबद्दल चर्चा करत असताना त्यांच्या लक्षात आलं की ‘माय नेम इज़ अँथोनी फर्नांडीस’ या बोलासह गाण जास्त आकर्षक वाटत नाहीये. त्यामुळे त्यांनी गाण्यात बदल करायचे ठरवले, त्यानुसार पात्राचे नाव देखील बदलून अँथोनी गोन्सालवीस करण्यात आले. मुख्य गोष्ट म्हणजे हे नाव प्यारेलाल यांनी सुचवले होते.
प्यारेलाल यांनी हे नाव सुचवलं कारण त्यांना ज्या व्यक्तीने व्हायोलीन शिकवले त्यांचे नाव अँथोनी गोन्सालवीस होते.
एकप्रकारे या गाण्यामध्ये आणि संपूर्ण चित्रपटामध्ये आपल्या गुरुचे नाव वापरून त्यांना गुरुदक्षिणा अर्पण करण्याचा प्यारेलाल यांचा हेतू असावा. त्यांच्या या मागणीला चित्रपटाचे दिग्दर्शक मनमोहन देसाई यांनी देखील दुजोरा दिला. त्यामुळे अँथोनी गोन्सालवीस हे नाव वापरण्यात आले.
प्यारेलाल यांचे गुरु म्हणजे अँथोनी गोन्सालवीस हे बॉलीवूडमधले पहिले म्युजिक अरेंजर होत. त्यांच्याबद्दल फारच कमी लोकांना ठावूक आहे. संगीतकार मदन मोहन पासून ते आर.डी. बर्मन सारख्या दिग्गजांसोबत त्यांनी काम केले आहे.
गाण्याच्या दोन अंतरामध्ये म्युजिक देण्याचा ट्रेंड देखील अँथोनी गोन्सालवीस यांनीच बॉलीवूड मध्ये आणला.
संगीतकारांसाठी सर्वात प्रथम स्टाफ नोटेशन्स बनवण्याचं श्रेय देखील त्यांनाच जातं. १९६० साली त्यांनी संगीत क्षेत्रातून संन्यास घेतला होता. २०१२ साली त्यांचे निधन झाले.
भारतीय संगीत क्षेत्रामध्ये असे अमुलाग्र बदल घडवून आणणारा हा व्यक्ती मात्र कधीही रसिकांपर्यंत पोचू शकला नाही, परंतु त्यांचे शिष्य प्यारेलाल यांनी मात्र त्यांना एक अनोखी गुरु दक्षिणा देत अँथोनी गोन्सालवीस हे नाव अजरामर केले.
अच्युत अभ्यंकर यांनी किराणा घराण्याचे अध्वर्य कै.पं. फिरोझ दस्तूर यांकडून शास्त्रीय संगीताच्या प्रेमाखातर, त्याची जोपासना व प्रचाराचा विडा उचललेल्या अभ्यंकरांनी आकाशवाणी येथे उच्च श्रेणीचे कलाकार म्हणून अनेक गाण्याचे कार्यक्रम केले. तसेच देश – विदेशांत असंख्य मैफिली सादर करुन नावलौकीक प्राप्त केला. आपले गुरु कै. पं. फिरोझ दस्तुर यांचा अनमोल ठेवा पुढील पिढीपर्यंत पोहचविण्याच्या कार्यात स्वत:ला झोकून देऊन श्री. अभ्यंकर यांनी ठाण्यातील अनेक संगीत संस्थात संगीत विद्यादानाचे अमूल्य काम केले आहे. जे अजूनही अविरत चालू आहे. गेले अनेक वर्षे ते विद्यादान करत असून त्यातील काही विद्यार्थ्यांनी संगीतातील उच्च पदव्या प्राप्त केल्या आहेत.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.मराठीसृष्टी
बाबाराव मुसळे हे नाव मराठी साहित्य विश्वाला नवं नाही. १९८५ मध्ये 'हाल्या हाल्या दुधू दे' या कादंबरीने त्यांचं नाव एकदम प्रसिद्धीच्या झोतात आलं. या कादंबरीने ग्रामीण वास्तव आपल्या खास शैलीत टिपणारे कादंबरीकार म्हणून त्यांना लौकीक मिळवून दिला.
'हाल्या हाल्या दुधू दे' नंतर आलेल्या 'पखाल' कादंबरीलाही रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. पु. ल. देशपांडे यांनी 'पखाल'चं विशेष कौतुक केलं होतं. दरम्यानच्या काळात बाबाराव मुसळे यांची 'झुंगु लुखू लुखू', 'मोहोरलेला चंद', 'नगरभोजन' हे कथासंग्रह आणि 'पाटीलकी', 'दंश' या कादंबर्या प्रकाशित होत राहिल्या तर 'वारुळ' या कादंबरीने पुन्हा एकदा मराठी साहित्यात हलचल निर्माण केली. मात्र एव्हाना वाचक त्यांच्या लेखनशैलीला सरावलेला असतानाच 'इथे पेटली माणूस गात्रे' या कवितासंग्रहाला 'सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील' हा मानाचा साहित्य पुरस्कार मिळाला आणि बाबाराव मुसळे हे नाव पुन्हा एकदा चर्चेत आलं.
खरंतर बाबाराव मुसळे यांच्यासाठी पुरस्कार आणि प्रसिद्धी नवी नाही. मात्र गेली अनेक वर्षं कादंबरी-कथा प्रांतात जोरकस मुशाफिरी करणार्या मुसळे यांचं कवीतिक अंग आजवर रसिकांना फारसे उमगलेलं नव्हतं. वास्तविक कादंबरी आणि कथालेखन करत असतानाच मुसळे यांचे कवितालेखनही समांतरपणे सुरू होते. त्यांची ही कविता नागर, ग्रामीण, दलित, आदिवासी असा विविध प्रवाहांना आपल्यात सामावून घेत आपल्या पद्धतीने व्यक्त होत होती. मात्र ती आजवर पुस्तकरूपाने प्रकाशात न आल्यामुळे वाचक तिच्यापासून अनभिज्ञ होते. परंतु 'काव्याग्रह प्रकाशन'च्या विष्णू जोशी यांनी मुसळे यांच्या कवितेला प्रकाशनाची वाट दाखवली आणि या कवितेने कवितेचा गाभारा लख्खपणे उजळून टाकला.
मुसळे यांच्या गद्य लेखनावर यशस्वीतेची मोहोर उमटलेली होतीच. परंतु त्यांच्या पहिल्याच कवितासंग्रहालाही मानाचा साहित्यिक पुरस्कार मिळाल्यामुळे त्यांनी कवी म्हणूनही आता स्वत:ला सिद्ध केलं आहे. अर्थात हा त्यांच्या कवितेचा आणि त्यांनी त्या कवितेतून जो मानवतेचा धर्म जागवलाय त्याचा गौरव आहे. कारण त्यांची कविता केवळ स्वत:चं दु:ख जागवत नाही, ती समोरच्याचं दु:ख पाहूनही तेवढीच व्याकुळ होते. प्रसंगी पेटून उठते. एकूण मुसळे यांची कविता ही माणुसकीची कविता आहे आणि त्यांच्या कवितेचा झालेला गौरव हा माणुसकीचा गौरव आहे.
(संदर्भ : महाराष्ट्र टाईम्समधील नोंद हे सदर)
प्रतिक पारखी हा तरूण पुण्याचा रहिवासी असून कला, तंत्रज्ञान या क्षेत्रांमध्ये कार्यरत असणारा व्यावसायिक आहे. ‘ओव्हेशन क्रिएशन’ ह्या सर्वा प्रकारच्या व आशयांवरच्या दृष्यफितींना सराईतपणे कात्री लावून त्यांच व्यावसायिक एडिटींग करून देणार्या लोकप्रिय स्टुडिओचा, समान भागीदार आहे. ऑगस्ट 2009 पासून सुरू झालेला हा स्टुडियो आजवरच्या त्याच्या सर्वात यशस्वी व फायदेशीर जागेवर उभा आहे, व याचं सारं श्रेय जातं ते उत्तुंग प्रतिभेचं व कल्पनाशक्तीचं, अत्यावश्यक भांडवल या स्टुडियोला एकहाती पुरविणार्या प्रतिकला.
उदय टिकेकर यांनी ‘शमिताभ’, ‘बर्फी’, ‘रईस’, ‘लाल सलाम’ या हिंदी चित्रपटांमधूनही त्यांनी काम केलं आहे. ‘तुझा माझा ब्रेक अप’, ‘जुळून येती रेशीमगाठी’, ‘कोई अपना सा’, ‘कसौटी जिंदगी की’ या मराठी-हिंदी मालिकेत उदय टिकेकर यांनी काम केले आहे.
हिंदी सिनेमाच्या ग्लॅमरस दुनियेत कारकीर्द घालवूनही शशी कपूर यांचं मन घुटमळत राहिलं ते पृथ्वी थिएटरपाशी. काही वर्षांपूर्वी पं. सत्यदेव दुबे यांना मानवंदना म्हणून पृथ्वी थिएटरने महोत्सव आयोजित केला होता, तेव्हा शशी कपूर व्हीलचेअरवर बसून पृथ्वी थिएटरमध्ये आले होते एका कोपऱ्यात शांतपणे बसून नाटकवाल्यांचा चाललेला जल्लोष शांतपणे निरखत होते आणि स्मितहास्य करत होते.
Copyright © 2025 | Marathisrushti