जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
साधना सरगम यांचे खरे नाव साधना घाणेकर. त्यांचा जन्म ७ मार्च १९७४ दाभोळ येथे झाला.बालपणापासून संगीताची आवड असलेल्या साधना यांच्या मातोश्री नीला घाणेकर या शास्त्रीय गायिका होत्या. नीला यांची संगीतकार अनिल मोहिलेंसोबत ओळख होती. तर अनिल संगीतकार जोडी कल्याणजी-आनंदजी यांच्यासाठी म्युझिक अरेंजिंगचे काम बघायचे. त्यांनीच साधना यांची कल्याणजी-आनंदजींसोबत भेट घालून दिली होती. त्यानंतर साधना सरगम यांनी १९७८ मध्ये आलेल्या फिल्म 'तृष्णा'साठी कोरस गायले होते. त्या गाण्याचे बोल होते 'पम परम पम बोले जीवन की सरगम'. या गाण्याला किशोर कुमार यांनी स्वरसाज चढवला होता. त्यानंतर साधना यांनी वयाच्या सातव्या व्या वर्षीपासून पंडित जसराज यांच्याकडे संगीताचे धडे गिरवले. १९८२ मध्ये आलेल्या 'विधाता' या चित्रपटातील 'सात सहेलियां खडी खडी' हे गाणे गाऊन साधना सरगम यांनी बॉलिवूडमध्ये धमाल केली होती. साधना सहा वर्षांच्या असताना त्यांनी दूरदर्शनसाठी ‘सूरज एक चंदा एक तारे अनेक’ हे बोल असलेले गीत गायले होते. हे गाणे त्यावेळी खूप गाजले होते. साऊथ इंडियन गाण्यासाठी नॅशनल अवॉर्ड मिळवणा-या साधना पहिल्या नॉन साऊथ इंडियन सिंगर आहेत. कल्याणजी-आनंदजी जोडीपासून ए. आर. रहेमानपर्यंत प्रत्येकाने त्यांचे कौतुक केले आहे. उदित नारायण यांच्यासोबत 'जो जीता वही सिकंदर' या सिनेमातील गाजलेले गाणे ‘पहला नशा पहला खुमार’ गाऊन प्रसिद्धीझोतात आलेल्या साधना सरगम यांनी वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षापासून गायन सुरु केले होते. वयाच्या चौथ्या वर्षी साधना यांनी सवाई गंधर्व म्युझिक फेस्टिव्हलमध्ये गाणे सादर केले होते. साधना घाणेकरच्या साधना सरगम कशा झाल्या, याविषयी एका मुलाखतीत म्हणतात, ''सरगम हेच माझे जीवन आहे. माझ्या पहिल्याच गाण्यावेळी मी सरगम गायले. ते सर्वांना आवडले अन् माझे नाव साधना सरगम असे उच्चारले जाऊ लागले. माझ्या कामाची ही पावती होती. त्या म्हणतात मी आजवर 34 विविध भाषांत गायले आहे. पण मराठीत संस्मरणीय गाणी गाण्याची संधी माझ्या वाट्याला आलीच नाही. मी मराठी मुलगी असूनही मराठीतील गाणे गायले नाही, हे दु:ख मनात आहेच.
'' सातसमंदर पार मैं तेरे पीछे पीछे गई’, ‘हर किसी को नहीं मिलता’, ‘मैं तेरी मोहोब्बत में’, ‘तेरी उम्मीद तेरा इंतजार’ आणि ‘नीले नीले अंबर पर’ अशी अनेक गाणी प्रसिद्ध आहेत.
साधना सरगम यांनी अंदाजे १५०० चित्रपटात २०००च्या वर हिंदीत गाणी गायली आहेत. ५०० हून अधिक तामिळ चित्रपटात १००० च्या वर तामिळ गाण्यांना त्यांनी आवाज दिला आहे. १९९४ ते २०१५ याकाळात साधना सरगम यांनी २५०० हून अधिक बंगाली गीत गायली आहेत. त्यांनी तेलुगु , कन्नड, मल्याळम, गुजराती, नेपाली आणि अनेक प्रादेशिक भाषेत गाणी गायली आहेत. साधना सरगम यांनी ३४ भाषांत गीते गायली आहेत. साधना सरगम यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. मध्यप्रदेश सरकारने त्यांना लता मंगेशकर अवॉर्डने सन्मानित केले आहे. याशिवाय त्यांना १९८८ आणि २००४ मध्ये फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला आहे. साधना यांना साऊथच्या फिल्मफेअर अवॉर्डसोबतच पाचवेळा महाराष्ट्र स्टेट फिल्म अवॉर्डने गौरवण्यात आले आहे. शिवाय त्यांना ओडिशा स्टेट फिल्म अवॉर्डसुद्धा मिळाला आहे. आपल्या चार दशकाच्या करिअरमध्ये साधना सरगम यांनी आपल्या सुरेल आवाजाने रसिकांच्या मनात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. साधना सरगम या गाण्यांसोबतच खाण्याच्यादेखील शौकीन आहेत. साधना यांना स्पायसी जेवण पसंत आहे. हॉट अँड सॉर सूप त्यांचे ऑलटाइम फेव्हरेट आहे. याशिवाय पुरणपोळी, आणि श्रीखंड त्यांना आवडतं. त्यांना स्वयंपाकाचीही विशेष आवड आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
साधना सरगम यांची काही गाणी
हर किसी को नहीं मिलता (जांबाज),
हंसते-हंसते कट जाएं रस्ते (खून भरी मांग),
नजर ने किया है इशारा (त्रिदेव),
हमने घर छोडा है (दिल),
राधा बिना है किशन अकेला (किशन कन्हैया),
जब कोई बात बिगड जाए (जुर्म),
इमली का बूटा (सौदागर),
बोल राधा बोल तूने ये क्या किया (बोल राधा बोल),
तेरी उम्मीद तेरा इंतजार (दीवाना),
कितना प्यार तुम्हें करते हैं (दिल का क्या कसूर),
प्यार के कागज पे (जिगर),
पहला नशा पहला खुमार (जो जीता वही सिकंदर),
सात समुंदर पार मैं तेरे पीछे पीछे (विश्वात्मा),
क्या मौसम आया है (अनाड़ी),
ठहरे हुए पानी में (दलाल),
वो मेरी नींद मेरा चैन मुझे (हम हैं राही प्यार के),
तेरे दर पर सनम (फिर तेरी कहानी याद आई),
सुबह से लेकर शाम तक (मोहरा),
आइए आपका इंतजार था (विजयपथ),
नहीं ये हो नहीं सकता (बरसात),
भंगड़ा पाले आजा आजा (करन-अर्जुन),
तुम हमपे मरते हो (हीरो नंबर वन),
दर्द करारा (दम लगाके हइशा)
स्वातंत्र्याचा लढा, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ आणि राष्ट्रीय सेवादलाशी जोडले गेलेले प्रमुख महिलांपैकी एक नाव आणि राष्ट्रीय सेवादलाच्या पहिल्या महिला अध्यक्षा म्हणजे सुधा वर्दे. माहेरचं अनुताई कोतवाल हे नाव असलेल्या सुधाताईंचा जन्म १९३२ सालचा;लहानपणापासूनच सुधाताईंना विविध कलांची आवड होती.
एक व्यावसायिक चित्रकार, लेखक व वक्ता अशी विजयराज मुरलीधर बोधनकार ह्यांची ओळख करुन देता येईल. जे.जे.स्कुल ऑफ आर्ट मधून शिक्षण घेतल्यावर लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, लोकमत, सकाळ ह्या वृत्तपत्रांमधून लेखन व चित्रकारीता केली.
भारतीय रेल्वेच्या इतिहासातील क्रांतिकारक निर्णय नानांनी घेतला. सेकंड क्लासच्या बाकांना दोन इंच कुशनची सोय दंडवतेंनी करून दिली. दंडवतेंच्या याच निर्णयामुळे आजही लाखो-करोडो गरिब लोक सेकंड क्लास मधून आरामदायक प्रवास करू शकतात.
’पायोजी मैने रामरतन धन पायो’, ’ठुमक चलत रामचंद्र’, ’चलो मन गंगा जमुनातीर’ ही त्यांनी गायलेली काही अत्यंत लोकप्रिय गाणी आहेत. ’सुध मुद्रा, सुध बानी’ हे गायकासंबंधी सांगितलेले कलागुण त्यांच्यात प्रकर्षाने दिसत असत.
भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती मा.प्रतिभा पाटील यांचा जन्म १९ डिसेंबर १९३४ रोजी जळगाव येथे झाला. प्रतिभा पाटील यांचे वडिल सरकारी वकिल होते. एम.ए करत असतानाच त्यांची पावले राजकारणाकडे पडली. त्याला कारण ठरले माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण. त्यांच्या एका कार्यक्रमाला प्रतिभाताई उपस्थित होत्या. महिलांनी राजकारणात यायला हवे. राजकारण स्वच्छ रहाण्यासाठी महिलांची उपस्थिती गरजेची आहे, अशा आशयाचे भाषण तेव्हा चव्हाणांनी केले होते. ते ऐकून प्रभावित झालेल्या प्रतिभाताई राजकारणात उतरल्या.
पण राजकारणा उतरायचे तर काही लक्ष्य समोर हवे, असे नव्हते. योगायोगाने त्यांच्या तोपर्यंतच्या कामाची पावती आणि धडाडी पाहून त्यांन जळगाव मतदारसंघातून आमदारकीचे तिकिट मिळाले. आश्चर्य म्हणजे पहिल्याच प्रयत्नात त्या आमदार झाल्या. त्यावेळी त्यांचे वय होते अवघे पंचवीस. त्यानंतर सलग सहावेळा त्यांनी आमदारकी भूषवली. आमदार असतानाच त्या वकील झाल्या. याच काळात त्यांचा विवाह झाला देवीसिंह शेखावत यांच्याशी. जळगावनंतर प्रतिभाताईंनी मतदारसंघ बदलला आणि त्या एदलाबाद (सध्याचा मुक्ताईनगर) मधून सलग पाचवेळा निवडणूक जिंकल्या.
विधानसभेत प्रतिभाताईंनी अनेक पदांवर संधी मिळाली. त्यांचे त्यांनी सोने केले. १९६७ ते १९७७ या कालावधीत उपमंत्री, राज्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्रीपद सांभाळले. त्यानंतर १९७८ ते १९८० या कालावधीत शरद पवार पुलोदचे मुख्यमंत्री असताना त्यांनी विरोधी पक्षनेतेपद समर्थपणे सांभाळले.
कॉंग्रेसवरील निष्ठा आणि अभ्यासू व्यक्तिमत्त्व लक्षात घेऊन १९८० मध्ये प्रतिभाताईंना मुख्यमंत्री बनविण्याचे कॉंग्रेसचे डावपेच होते. मात्र, ऐनवेळी अब्दुल रेहमान अंतुले यांनी बाजी मारली आणि पाटील यांचे मुख्यमंत्रीपद हुकले. मात्र, पक्षावर किंवा एखाद्या व्यक्तीवर नाराज होऊन कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देण्याचा विचारही त्यांच्या मनात आला नाही. पण पक्षानेही त्यांच्या योग्यतेचा विचार करून राज्यसभेवर त्यांची नियुक्ती केली.
तेथे त्यांची ज्येष्ठता आणि अनुभव लक्षात घेऊन उपसभापती म्हणून निवड झाली. १९८६ ते ८८ या कालावधीत त्यांनी उपसभापतीपद भूषविले. पुढे त्यांच्यावर कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली. राजीव गांधी यांच्या हत्येनंतर झालेल्या निवडणुकीत १९९१ साली त्या अमरावतीतून सहजपणे लोकसभेवर निवडून आल्या.
प्रतिभाताई २००७ ते २०१२ या काळात राष्ट्रपती राहिल्या. राष्ट्रपतिपदाची कर्तव्ये पार पाडतानाच त्यांनी वायुसेनेच्या सुखोई, टी-10 या रणगाड्यावर स्वार होऊन, सुदर्शन शक्ती सैन्य अभ्यास दौ-यात सहभागी होऊन महिला शक्तीची प्रचिती आणून दिली होती. राष्ट्रपती असताना प्रतिभा पाटील यांनी राष्ट्रपती भवनातील ऊर्जा बचत आणि पर्यावरण संवर्धनाविषयी रोशनी प्रकल्पाची संकल्पना अमलात आणली होती.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
प्रजासत्ताक दिनानिमित्त पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आले. त्यापाठोपाठ पद्म पुरस्करांची खिरापत होत असल्याची टीका
ही सालाबादप्रमाणे करण्यात आली. मात्र, काही व्यक्तींना पद्म किताब जाहीर केल्याबद्दल कुणाचेच दुमत नव्हते. त्या म्हणजे शोभना रानडे!
गांधीवादी विचारांच्या प्रसारक, ज्येष्ठ सामाजिक कार्यर्कत्या, दूरदृष्टी असलेल्या गांधीवादी, लहान मुलांसाठी लाडकी आजी… अशा शोभनाताई. गेल्या सहा दशकांहून अधिक काळ महिला सबलीकरण, मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकास आणि तरुण पिढीपर्यंत गांधीजींचे विचार पोहोचण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या शोभनाताई. महिलांना स्वातंत्र्यच नव्हे तर स्वत:ची मतं मांडण्याचे अधिकारही मिळाले नव्हते, अशा काळात नाशिकमध्ये १९३५ साली काही मुलींनी ‘यापुढे आम्ही केवळ देशासाठीच जगणार’ अशी शपथ घेतली. पुढे हीच संस्था ‘हिंद सेविका संघ’ म्हणून नावारूपास आली. या मुलींमध्ये अवघ्या तेरा वर्षांची एक मुलगी म्हणजेच शोभना रानडे यांचाही समावेश होता.
आपल्या पहाडी आवाजाने महाराष्ट्राला दणाणून सोडणारे गोवा मुक्तीसंग्राम व संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील सेनानी शाहीर यशवंत चकोर.
१९४२ च्या स्वातंत्र्य-लढ्यात जयप्रकाश नारायण यांच्या सभेची सुरुवात करण्याची संधी शाहीर चकोर यांना मिळाली होती. १९४७ मध्ये क्रांतिवीर नाना पाटील यांच्या सभेत त्यांनी स्वातंत्र्यगीते गायली. पुढे शाहीर अमर शेख, अण्णाभाऊ साठे अशा ज्येष्ठ शाहिरांसोबत त्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत भाग घेतला.
त्यावेळी मुंबई प्रांत सरकारविरोधात प्रचार केल्यामुळे त्यांना रेल्वेची नोकरी गमावावी लागली. आचार्य अत्रे यांना हे कळल्यानंतर त्यांनी 'दैनिक मराठा' नाशिक जिल्ह्याची एजन्सी त्यांना दिली. पुढे चकोर १० वर्षे मनमाड नगरपालिकेत नगरसेवक होते. लोककलेतून जनजागृती करणार्या या कलाकारावर आचार्य अत्रे प्रचंड खुश होते. सभेपूर्वी ते 'जय देव जय देव जय मंगलमूर्ती' हे गीत शाहीर चकोर यांना म्हणायला सांगत.
स्वातंत्र्यापासून संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत कार्यरत राहणार्या आणि अनेक वर्षे पुरोगामी पक्षाबरोबर जनजागृतीचे काम करणार्या या शाहिराच्या वाट्याला अखेरपर्यंत उपेक्षाच आली. निळू फुले, राम नगरकर यांच्यासोबतीने पुण्यात कलापथकात काम करणारे शाहीर केवळ आईच्या आग्रहास्तव पुन्हा मनमाडला आले. त्यानंतर त्यांनी मनमाड सोडले नाही.
पुण्याच्या बालगंधर्व नाट्यगृहाच्या उदघाटनाप्रसंगी पहिले गाणे शाहीर चकोरांनी सादर केले. त्या गाण्याला चाल व संगीत पु. ल. देशपांडे यांनी दिले. अशा कितीतरी आठवणींवर शाहीर शेवटपर्यंत चिरतरुण होते. त्यामुळेच उपेक्षित जगण्याची त्यांनी कधीही खंत व्यक्त केली नाही.
गोवामुक्ती संग्राम स्वातंत्र्यसैनिकाचा दर्जा मिळावा, यासाठी त्यांनी केलेले सर्व प्रयत्न अयशस्वी झाल्याने त्यांचा अखेरच्या टप्प्यातील प्रवास खडतर झाला होता. जागा मराठा, आम जमाना बदलेगा, उठा है जो तुफान, वह आखिर बंबई लेके दम लेगा अशी महाराष्ट्र गीते, पोवाडे आणि शौर्यगीते गाऊन एकेकाळी महाराष्ट्राला वेड लावणारे शाहीर चकोर अखेरच्या क्षणी स्वातंत्र्यसैनिकाचा दर्जा मिळविण्यासाठी दारोदार भटकत होते. उदरनिर्वाहासाठी अल्पबचत एजंट म्हणून घरोघरी पैसे गोळा करण्याचे काम करणार्या शाहिरांनी अखेरपर्यंत काम केले.
त्यांचे वयाच्या ८७ व्या वर्षी निधन झाले. अखेरपर्यंत चकोर हे शाहीर म्हणून मिळणारे तुटपुंजे मानधन व पतसंस्थेचे कमिशन यावर गुजराण करत होते.
(संदर्भ : महाराष्ट्र टाईम्समधील नोंद हे सदर)
जे. जे. स्कुलमधील शिल्पकला व मॉडेलिंग ची जी. डी. आर्ट ही पदवी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण केल्यानंतर शहरात अतिशय चांगल्या संधी व मान उपलब्ध असूनसुध्दा गुंजीससारख्या लहानशा खेड्यात शहरी झगमाटापासून व गजबजाटापासून अगदी दूर आपल्या शिल्पकलेचा कारखाना सुरू करणारे व हिरव्यागर्द निसर्गाच्या व विविध पशुपक्ष्यांच्या सानिध्यात आपल्या शिल्पांना बोलत करणारे हाडाचे कलाकार म्हणजे श्री गजानन कुडतरकर.
‘जेसीबी’ हे जगातलं पहिलं यंत्र जे कुठल्याही नावाशिवाय बाजारात लाॅंच झालं..साल होतं १९४५. ज्यांनी हे धूड बनवलं ते अनेक दिवस चिंतित होते की याचं नाव काय ठेवायचं? शेवटी याचं वेगळं नाव न ठेवता त्याच्या इंजिनचंच नाव वापरूया यावर शिक्कामोर्तब झालं..
Copyright © 2025 | Marathisrushti