(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • राजकुमार

    आज ‘जिनका घर शिशों का होता है, वो दुसरों पर पत्थर फेंका नही करतें’ अशा दमदार डायलॉगबाजीने प्रेक्षकांच्या टाळय़ा घेणाऱ्या राजकुमार यांचा जन्म ८ आक्टोबर १९२६ रोजी झाला. राजकुमार उर्फ भूषण पंडित यांची ओळख विशिष्ट शैलीतील संवादफेक गोष्टींसाठी म्हणून अधोरेखित झाली. बी. आर. फिल्म निर्मित व यश चोप्रा दिग्दर्शित ‘वक्त’ या मल्टिस्टार कास्ट चित्रपटातील त्यांनी रहेमान यांना उद्देशून केलेला संवाद त्या काळात प्रचंड गाजला व असे संवाद म्हणजेच आपली अभिनयशैली असे ते मानू लागले. तो संवाद होता, ‘चिनॉय शेठ शिशे के घर में रहनेवाले लोग दुसरों के उपर पत्थर नही फेंका करते.. यह चाकू कोई बच्चे के खेलने की चीज नही, हाथ कट जाएगा तो खून निकल आयेगा..’ या संवादाला रसिकांच्या प्रचंड टाळय़ा पडल्या व या यशानंतर राजकुमार यांनी अभिनयापेक्षा संवादफेकीवर जरा जास्तच लक्ष केंद्रित केले. कधी ते प्रभावीदेखील ठरले.

    ‘पाकिजा’मध्ये मा.राजकुमार मीनाकुमारी यांना एकदा म्हणतात, ‘यह पाँव जमीं पे मत रख देना, मैले हो जायेंगे..’ पण ‘एका विशिष्ट लयीतील संवाद’ अशी त्याची ओळख व ताकददेखील झाल्याने दिग्दर्शक त्याला स्वातंत्र्य देत असत असे जाणवू लागले. आणि याच गुणावर ‘फिदा’ असणारा असा त्याचा स्वत:चा एक मोठा चाहतावर्गही निर्माण झाला. तो राजकुमारचे संवाद ऐकायला सिनेमाचे तिकीट काढू लागला. त्याच्या संवादावर मनसोक्त टाळय़ा मारू लागला. गिरगावातील इम्पिरियल या चित्रपटगृहाच्या भिंतीवर त्याचे ‘बुलंदी’चे संवाद लिहिले होते, ते वाचून तिकीट काढणारे फिल्म दीवाने होते. हेदेखील यशच! मेहबूब खान यांचा ‘मदर इंडिया,’ श्रीधरचा ‘दिल एक मंदिर,’ चेतन आनंदचा ‘हीर रांझा’ या चित्रपटांत राजकुमार यांचा उत्तम अभिनय पाहायला मिळतो. दिल अपना और प्रीत परायी’ हा राजकुमार यांचा एक महत्त्वपूर्ण चित्रपट. एका डॉक्टरच्या भूमिकेत, नर्स असलेल्या मीनाकुमारी यांच्याबरोबर, त्यांची अभिनयाची जुगलबंदी प्रेक्षक विसरू शकत नाहीत.

    ‘जेमिनी पिक्चर्सच्या एस.एस. वासन दिग्दर्शित ‘पैगाम’ नंतर मुक्ता आर्ट्सच्या सुभाष घई दिग्दर्शित ‘सौदागर’ मध्ये ते तब्बल एकतीस वर्षांनी दिलीपकुमारसमोर उभा ठाकले. कारकिर्दीच्या सुरुवातीला दिलीप-देव-राज या त्रिमूर्तीच्या वाटचालीतही या जानीने उभे राहण्यात यश मिळवले व नंतर मनोजकुमार सुनील दत्त-धर्मेद्र-जीतेंद्र-राजेश खन्ना यांच्यासमोरही ते वाटचाल करू शकला. अर्थात, त्याचे वळण, त्याचा रस्ता पूर्णपणे वेगळा होता. राजकुमार हे वेगळे रसायन होते हे त्यात त्यांनी सतत सिद्ध केले, अगदी त्याच्या मृत्यूची बातमीदेखील त्याच्या त्या वाटचालीला साजेशी ठरली. त्याला कर्करोगाने ग्रासले असल्याची बराच काळ चर्चा असूनही त्या दरम्यान त्याने ‘सौदागर’मधील भूमिका साकारली होती, पुढेही काही काळ वाटचाल केली, राजकुमार हा राजकुमारसारखा जगला व स्वत: निर्माण केलेल्या अनाकलनीय अशा प्रतिमेनुसारच जगाच्या पडद्यावरून गेला. राजकुमार यांचे काही महत्त्वाचे व उल्लेखनीय चित्रपट – ‘अर्धागिनी’ (१९५९) (मीनाकुमारी), ‘नीलकमल’ (१९६८) (वहिदा रहेमान), ‘जिंदगी’ (१९६४) (वैजयंतीमाला), ‘हमराज’ (१९६८) (सुनील दत्त), ‘मेरे हुजूर’ (१९६८) (माला सिन्हाबरोबर) मा. राजकुमार यांचे ३ जुलै १९९६ यांचे निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ:- इंटरनेट

  • अभिनय, दिग्दर्शनाचा “राजा’ राजा परांजपे

    राजा परांजपे यांचा चित्रपटसृष्टीत प्रवेश झाला तो मात्र नट वा सहायक दिग्दर्शक म्हणून नव्हे तर संगीत विभागात ‘ऑर्गन वादक’ म्हणून! राजाभाऊंना लहानपणपासून संगीताचं उपजतच वेड होतं. त्यांचा जन्म २४ एप्रिल १९१० रोजी झाला. हा वारसा त्यांना त्यांच्या आईकडून लाभला. विद्यार्थी दशेतच ‘भारत गायन समाजा’च्या कै. बापूराव केतकरांनी त्यांच्या संगीतवेडाला चांगलं वळण दिलं. नवनवी नाटके आणि सिनेमा बघण्याचे वेड त्यांना लागले. पण रोज रोज नाटक, सिनेमा पाहायचं म्हटलं तर पैशाची चणचण त्यांना भासू लागली. पण त्यासाठी त्यांच्या संगीतवेडातूनच त्यांना एक नवीन मार्ग सापडला. राजा परांजपे यांची अभिनयातील समज पाहून तिथेच त्यांना "लपंडाव' या नाटकात अचानक संधी मिळाली. या नाटकातील एक कलाकार अचानक नाटक सोडून गेला. दात्ये यांयांनी त्याच्या जागी राजा परांजपे ना संधी दिली, त्या संधीचे त्यांनी चीज केले. पुढे केशवराव दात्ये यांनीच त्यांना "सावकारी पाश' या चित्रपटातील भूमिका मिळवून दिली. त्यानंतर ते भालजी पेंढाकर यांच्याकडे सहायक दिग्दर्शक म्हणून काम करू लागले. भालजींच्याच काही चित्रपटांत त्यांनी अभिनयही केला. "सावकारी पाश'मधील भूमिकेनंतर ते छोटी मोठी कामे करत होते; पण खऱ्या अर्थाने ते दिग्दर्शक झाले ते १९४८ मध्ये "बलिदान'च्या माध्यमातून आणि यशाची बरसात झाली ती "जिवाचा सखा' या चित्रपटाने.

    मराठी चित्रपटाच्या सुवर्णकाळातील सर्वांत यशस्वी त्रयी म्हणजे राजा परांजपे, सुधीर फडके आणि ग. दि. माडगूळकर होय. ग. दि. माडगूळकर यांच्या पटकथेवर राजाभाऊ आपल्या दिग्दर्शन कौशल्याचा असा काही प्रभाव पाडत, की तो चित्रपट वेगळाच होऊन जाई. शब्दप्रभू माडगूळकरांयांनी राजा परांजपे ना परिसाची उपमा दिली होती. तुमच्या पटकथेवर इतरांना राजा परांजपे च्याइतके यश का नाही मिळवता आले, असे त्यांना एकदा विचारले असता गदिमा म्हणाले राजाभाऊ हे परिसासारखे आहेत, त्यामुळे त्यांच्यासारखी किमया इतरांना कशी जमेल? राजा परांजपे यांनी केवळ मराठी चित्रपटांचे दिग्दर्शन केले असे नाही, तर त्यांयांनी दिग्दर्शित केलेल्या चार हिंदी चित्रपटांनाही चांगले यश मिळाले. त्यातील "दो कलियॉं' हा चित्रपट तर प्रचंड यशस्वी ठरला होता. आज आपण अनेक दिग्दर्शकांच्या वैविध्यपूर्ण शैलींबद्दल बोलत असतो; पण कोणताही गाजावाजा न करता राजाभाऊ वेगवेगळ्या प्रकृतीचे चित्रपट त्याकाळात दिग्दर्शित करत होते आणि यश मिळवत होते. "पुढचं पाऊल', "ऊन पाऊस', "देवघर' यासारखे कलात्मक चित्रपट राजा परांजपे यांनी यशस्वी करून दाखवले होते. राजा परांजपे यांनी दिग्दर्शन केले आणि ज्यामध्ये त्यांयांनी स्वतः काम केले अशा "हा माझा मार्ग एकला' या चित्रपटाची सगळीकडेच वाहवा झाली, त्याचबरोबर या चित्रपटाला राष्ट्रपतींचे सुवर्णपदकही मिळाले होते.

    अर्थात, हा बहुमान त्यांना दोनदा मिळाला होता. "पाठलाग' या रहस्यप्रधान चित्रपटालाही राष्ट्रपतींचा पुरस्कार मिळाला होता. हा चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीत मैलाचा दगड मानला जातो. त्याचबरोबर या चित्रपटाचे यश पाहून हिंदीमध्येही त्याचा रीमेक केला गेला. "मेरा साया' नावाने हा चित्रपट हिंदीत आला. नाटकात उत्तम भूमिका करून प्रसिद्ध झालेल्या राजा परांजपे चा अभिनेता म्हणून रसिकांच्या मनावर ठसा उमटला होता, तरी दिग्दर्शन हाच त्यांच्यासाठी सर्वांत यशाचा भाग ठरला. भूमिका कोणतीही असो, मग ती विनोदी असो की कौटुंबिक अथवा कारुण्यमयी, राजाभाऊ त्या भूमिकेला आपला रंग देत असत. हेच कौशल्य त्यांयांनी चित्रपट दिग्दर्शित करताना ठेवले, त्यामुळे एकाच वेळी भिन्न प्रकृतीच्या चित्रपटांचे दिग्दर्शन करूनही त्यांयांनी त्यामध्ये लक्षणीय यश मिळवले. व्ही. शांताराम यांनी त्यांची तुलना करताना त्यांना सत्यजित रे यांच्यापेक्षा अधिक गुण दिले होते. कोणत्याही चित्रपटाचे दिग्दर्शन करत असताना ते त्या चित्रपटाचेच होऊन जात असत, त्या वेळी दुसरा विचारच त्यांना सुचत नसे.

    २७ चित्रपटांचे दिग्दर्शन केलेल्या या माणसाचे पाय शेवटपर्यंत जमिनीवर होते. शरद तळवलकर, सीमा आणि रमेश देव, राजा गोसावी आणि डॉ. काशिनाथ घाणेकर व सचिन पिळगावकर या सारख्या अनेकांना चित्रपटसृष्टीत उभे केलेल्या या दिग्दर्शकाने आपल्या काळात अक्षरशः राजासारखे राज्य केले. स्कूल अर्थातच राजा परांजपे यांचं. या मंडळींच्या कारकिर्दीला सर्वाधिक आकार दिला तो राजा परांजपे या कसबी दिग्दर्शकाने. मा. राजा परांजपे यांचे ९ फेब्रुवारी १९७९ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • मराठी साहित्यिक पांडुरंग सदाशिव साने ऊर्फ साने गुरुजी

    स्वातंत्र्यसैनिक, समाजवादी विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते, मराठी साहित्यिक पांडुरंग सदाशिव साने ऊर्फ साने गुरुजी यांचा जन्म २४ डिसेंबर १८९९ रोजी झाला. साने गुरुजींचा जन्म कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील पालगड या गावी झाला. वडील खोताचे काम ते करीत असत. खोताचे घराणे साधारणतः वैभवसंपन्न व श्रीमंत समजले जाते व त्यांच्या आजोबांच्या वेळची परिस्थिती तशी होती ही. पण सदाशिवरावांच्या वेळेपासून मात्र घराण्याची आर्थिक स्थिती घसरत गेली. ती इतकी की, सदाशिवरावांचे घरदारही जप्तीत नाहीसे झाले. बालपणी त्यांच्या जीवनाच्या सर्व अवस्था आणि कक्षा व्यापणारी त्यांची आई ही त्यांची देवता होती. त्यांच्या आईने त्यांच्या बालमनावर जे विविध संस्कार केले त्यातूनच गुरुजींचा जीवनविकास झाला. त्यानी इंग्रजी साहित्यामध्ये एम. ए. ही उच्च पदवी मिळवली होती. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी अंमळनेर येथील प्रताप हायस्कूल येथे शिक्षक म्हणून सहा वर्षे नोकरी केली. प्रताप हायस्कूलच्या वसतीगृहाची जबाबदारी सांभाळताना त्यांच्यातील शिक्षकाला अधिक वाव मिळाला. त्यांनी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना स्वतःच्या उदाहरणातून स्वावलंबनाचे धडे दिले, सेवावृत्ती शिकवली. अंमळनेर येथील प्रताप तत्त्वज्ञान केंद्र येथे त्यांनी तत्त्वज्ञानाचा अभ्यासही केला. १९२८ साली त्यांनी ‘विद्यार्थी’ हे मासिक सुरू केले. त्यांच्यावर महात्मा गांधींच्या विचारांचा फार मोठा प्रभाव होता. ते स्वतः खादीचाच वापर करत असत.

    १९३० साली त्यांनी शिक्षकाची नोकरी सोडून सविनय कायदेभंगाच्या चळवळीत भाग घेतला. त्यांनी ‘काँग्रेस’ नावाचे साप्ताहिक काढणे, दुष्काळात शेतकऱ्यांची करमाफी व्हावी म्हणून प्रयत्न करणे, जळगाव जिल्ह्यातील फैजपूर येथील काँग्रेस अधिवेशन यशस्वी होण्यासाठी कार्य करणे, १९४२ च्या चळवळीत भूमिगत राहून स्वातंत्र्याचा प्रचार या माध्यमांतून त्यांनी राजकीय कार्य केले. फैजपूर येथील अधिवेशनात महात्मा गांधींच्या विचरसरणीस अनुसरून त्यांनी 'मैला वाहणे' व ग्राम स्वच्छतेची इतर कामे केली. त्यानी राष्ट्र सेवा दलाची स्थापना केली. ‘पत्री’ या त्यांच्या पहिल्या काव्यसंग्रहातून त्यांनी देशभक्तिपर कविता प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यातील बलसागर भारत होवो सारख्या कवितांचा नागरिकांवरील वाढता प्रभाव लक्षात घेऊन ब्रिटिश सरकारने त्या काव्यसंग्रहाच्या प्रती जप्त केल्या. समाजातील जातिभेद, अस्पृश्यता यांसारख्या अनिष्ट रूढी व परंपरांना साने गुरुजींनी नेहमी विरोध केला. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात हरिजनांना प्रवेश मिळावा यासाठी त्यांनी १९४६ च्या दरम्यान महाराष्ट्राचा दौरा केला, या भूमिकेला पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न केला. अखेर त्यांनी या मुद्यावर उपोषणाचा मार्ग अवलंबला व त्यांना यश मिळाले. ‘एका पांडुरंगाने दुसऱ्या पांडुरंगाला खऱ्या अर्थाने मुक्त केले,’ असे त्या वेळी म्हटले गेले. स्वातंत्र्य चळवळीतील सहभागाबद्दल त्यांना तुरुंगवास झाला. नाशिक कारागृहात त्यांनी श्यामची आईचे लेखन पूर्ण केले. साने गुरुजींचे 'श्यामची आई` हे पुस्तक पहिल्यांदा प्रकाशित झाले, ते १९३५ साली. ‘आई माझा गुरु – आई माझे कल्पतरु’ असे तिचे वर्णन ‘श्यामची आई’ या पुस्तकातून केले आहे. श्यामची आई` हा साने गुरुजींच्या बालपणीच्या आठवणींचा एक सोहळा आहे. अर्थात, याचा अर्थ गुरुजींच्या सार्यामच आठवणी सुखद आहेत, असे मुळीच नाही. उलट गुरुजींचे बालपण किती खडतर अवस्थेत गेले, त्याचीच एका अर्थाने ही 'कथामाला` आहे. पण गुरुजींच्या मनात त्या आठवणी सांगताना, त्याबद्दलची खंत बिलकूलच नाही. उलट त्या खडतर काळातही आईने लहानग्या श्यामवर केवळ प्रेमाचाच वर्षाव केला, असे नाही तर उलट कोणत्याही खडतर प्रसंगातून आपले चारित्र्य आणि शील अभंग राखून बाहेर कसे पडावयाचे याचेच त्यास शिक्षण दिले. 'श्यामची आई` ही एका अर्थाने एक संस्कार शाळाच होती. शाळा कसली, ते खर्याग अर्थाने गुरुजींचे 'माझे विद्यापीठ`च होते.

    स्वातंत्र्य आंदोलनात तुरुंगवासात गुरुजींनी या आठवणी जागवल्या. खुद्द गुरुजी लिहितात : 'दिवसा काम करावे आणि रात्री जगन्माता, भारतमाता व जन्मदात्री माता यांच्या विचारात रंगावे,` असे तेथे चालले होते. गुरुजींच्या तुरुंगातील अनेक मित्रांना या रात्री आवडल्या. ज्यांना गुरुजी आपले लिखाण वाचून दाखवीत, त्यांच्या डोळ्यात अश्रू येत आणि त्यांच्याबरोबर गुरुजींच्या डोळ्यातूनही घळघळा पाणी वाहत असे. अश्रू हा गुरुजींच्या सार्याेच साहित्याचा एक अविभाज्य घटक आहे. कोणी त्यामुळे गुरुजींच्या साहित्याची संभावना रडके वा पळपुटे साहित्य अशा शब्दांत भलेही करोत त्यामुळे त्या साहित्याची महती कमी होणारी नाही. आचार्य अत्रे यांच्यासारख्या अत्यंत आक्रमक प्रकृतीच्या माणसालाही ती समजू शकली होती त्यामुळेच त्यांनी या आठवणींवर अत्यंत भावूक आणि मनाला हात घालणारा असा चित्रपट तर काढलाच, शिवाय 'मातृप्रेमाचे महन्मंगल स्तोत्र` असा डोळ्यात पाणी आणणारा लेख लिहून या पुस्तकाचे अजरामर स्थान मराठी वाचकांच्या लक्षात आणून दिले. ‘खरा तो एकचि धर्म जगाला प्रेम अर्पावे आणि बलसागर भारत होवो’ ह्यांच्या कविता प्रसिद्ध आहेत. साधना, सेवादल आणि आंतरभारती ही त्यांची आत्मविलोपनाच्या आधीची आशास्थाने होती. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ते समाजवादी पक्षात सामील झाले. स्वातंत्र्यानंतर आंतरभारती चळवळीच्या मार्गाने त्यांनी भारत जोडण्याचा प्रयत्न केला. विविध राज्यांतील लोकांनी एकमेकांची संस्कृती समजून घ्यावी, अनेक भाषा समजून घ्याव्यात असे या चळवळीत अभिप्रेत होते. ते स्वतः तामीळ, बंगाली आदी भाषा शिकले होते. १९४८ मध्ये त्यांनी ‘साधना’ साप्ताहिक सुरू केले त्यांच्या कथा, कादंबऱ्या, लेख, निबंध, चरित्रे, कविता यांमधून त्यांच्यातील संवेदनशील साहित्यिकही आपल्याला दिसतो. मानवतावाद, सामाजिक सुधारणा व देशभक्ती ही मूल्ये त्यांच्या साहित्यात ठायी ठायी दिसतात. त्यांनी एकूण ७३ पुस्तके लिहिली. त्यांनी त्यांचे बहुतांश लेखन हे तुरुंगात असतानाच केले. आचार्य विनोबा भावे-रचित ‘गीता प्रवचनेसुद्धा विनोबा भावे यांनी धुळे येथील तुरुंगात सांगितली व साने गुरुजींनी लिहिली. याच धुळ्यातील तुरुंगात त्यांनी स्वातंत्र्यलढ्यातील सहभागाबद्दल सुमारे १५ महिन्यांचा तुरुंगवास भोगला. साने गुरुजींनी अमळनेर, धुळे व काही काळ नाशिक येथे वास्तव्य करून खानदेशला कर्मभूमी बनविले. साने गुरुजी यांचे ११ जून १९५० रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ:- इंटरनेट

  • मराठीतील प्रसिध्द शाहीर पिराजी रामजी सरनाईक

    मराठीतील प्रसिध्द शाहीर पिराजी रामजी सरनाईक

    मराठीतील प्रसिध्द शाहीर पिराजी रामजी सरनाईक यांचा जन्म २८ जुलै रोजी झाला. शाहीर तिलक, शाहीर विशारद आणि करवीर दरबारचे शाहीर व ‘लहरी हैदर गुरूजी माझे शीघ्र कवी थोर! त्यांच्या कृपेने शाहीर पिराजी पोवाडा लिहिणार!’असे म्हणणा-या पिराजी रामजी सरनाईक या शाहिराने आपल्या खडय़ा आवाजात अनेक चित्रपटांतून, नाटकांतून, वीररसाने ओथंबलेले पोवाडे म्हटले आणि पिचलेल्या मनगटातही जान आणली, छातीत स्फुरण आणले.

    कोल्हापुरात शिवाजी पेठेत ‘उभा मारूती चौकात’ सन १९३३ मध्ये त्यांनी पहिला पोवाडा म्हटला तो बाजीप्रभूंचा! ‘सावकारी पाश या चिटपटातील पोवाडय़ाने त्यांना अमाप प्रसिद्धी मिळाली. मुंबईच्या हिज मास्टर्स व्हाईस कंपनीने १९३७ मध्ये मुंबईची कहाणी हे त्यांचे पहिले ग्रामोफोन रेकॉर्डिग केले. पोलीस कचेरीतील कारकुनाची नोकरी सन १९५० मध्ये सोडून देऊन पिराजी सरनाईक यांनी पूर्ण वेळ शाहिरीला वाहून घेतले. छ. शहाजी महाराजांनी त्यांना ‘शाहीर विशारद’ हा किताब व तहहयात मानधन दिले. महाराष्ट्र शाहिरी संमेलनाने त्यांना ‘शाहीर तिलक’ म्हणून गौरवले.

    ‘म्यानातून तलवार उपसावी’ असा शाहिरांचा आवाज बाहेर पडतो’ अशा शब्दांत शिवभक्त भालजींनी ज्यांना गौरव केला, असे हे शाहीर पिराजीराव! ज्यांच्या शंभरावर पोवाडय़ांच्या रेकॉर्डस प्रसारित झाल्या, असा हा करवीर शाहीर. ‘जुनं ते सोनं’ हा त्यांच्या गाजलेल्या पोवडय़ांचा संग्रह आहे. शाहीर पिराजी रामजी सरनाईक यांचे ३० डिसेंबर १९९२ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

    पोवाडा
    https://www.youtube.com/watch?v=CAjfiInm1Fg

  • सुधीर जोशी

    मराठी रंगभूमी आणि चित्रपटातील चतुरस्त्र अभिनेते सुधीर जोशी यांचा जन्म १९४८ रोजी मुंबईत झाला. सुधीर जोशी यांनी मुंबईच्या कीर्ती कॉलेजातून अर्थशास्त्रात बी.ए. केले होते. अभिनया कडे वळण्या आधी ते मुंबईतल्या ब्लॅकी ॲड सन्स या प्रकाशन संस्थेत विपणन अधिकारी होते.

    सुधीर जोशी यांच्या निधनानंतर ते करत असलेल्या "मातीच्या चुली' या चित्रपटातील त्यांची अर्धवट राहिलेली भूमिका अभ्यंकर यांनी पूर्ण केली होती. सुधीर जोशी यांचे १४ डिसेंबर २००५ रोजी निधन झाले.

    अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

  • समृद्धी बडे

    कॉलेजमध्ये शिकता शिकता करिअरच्या दृष्टीने काही कोर्सेस करणं, किंवा समर जॉब्ज किंवा पार्टटाइम जॉब्ज तर अनेकजणं करतात. नोकरीऐवजी पुढे जाऊन स्वतःचा व्यवसाय करण्याचा विचार करणारेही फार कमी असतात. पण समृद्धी बडेने याहीपुढे जाऊन स्वतःचा ब्रँड डेव्हलप करण्याचा विचार केलाय.

    झेवियर्स कॉलेजमध्ये थर्ड इयर आर्ट्सला शिकणार्‍या समृद्धीला वेगवेगळ्या कलाकृती करण्यात कायमच रस होता. ज्यूट, कागद, कापड, पातळ लाकूड अशा अनेक गोष्टींपासून विविध कलाकृती तिने साकारल्या आहेत. ज्यूटच्या बॅग्ज, झोळ्या, पेंटिंग केलेले टीशर्टस, वेताचे ट्रे, चिनीमातीच्या किंवा काचेच्या मग्जवरील पेंटिंग, भित्तीचित्रे अशा अनेक क्रिएटिव्ह वस्तू ती तयार करत असते. इतकंच नव्हे तर या वस्तूंच्या विक्रीसाठी तिने फेसबुकवर ' वरुणी कलेक्शन्स ' या नावाने एक पेजही तयार केलंय. त्याला लोकांचा चांगला रिस्पॉन्स मिळतोय. या सगळ्या वस्तू ती स्वतःच बनवते. पण त्यांची विक्री करणं, किंमत ठरवणं हे सगळं समृद्धी आईच्या मदतीने ठरवते.

    तिच्या या पेजवर तिच्या वस्तूंसाठी मागणी नोंदवता येते. ग्राहकाच्या आवडीनुसार आणि गरजेनुसार वस्तू तयार केली जाते. त्यांची घरपोच डिलीव्हरीही दिली जाते. शिवाय आपल्या प्रॉडक्टच्या प्रसिद्धीचं कामही समृद्धी मनापासून एन्जॉय करतेय. तिच्या वरुणी कलेक्शनसाठी या सगळ्या गोष्टी करणं हा तिच्या अनुभवाचाच एक भाग आहे.

    बीए झाल्यानंतर एमबीए करुन पुढे स्वतःचा हस्तव्यवसायाचा ब्रँड तयार करण्याचं समृद्धीने आत्तापासूनच मनाशी पक्कं केलंय.

    समृद्धीची घोडदौड इथेच थांबत नाही. हस्तकलेच्या जोडीला तिला फ्रेंच भाषेचीही अत्यंत आवड आहे. एका आंतरराष्ट्रीय दर्जाच्या फ्रेंच इन्स्टिट्यूटमधून ती सध्या फ्रेंचच्या परीक्षा देतेय. त्याअंतर्गत चार महिन्यांसाठी ती फ्रान्समध्ये कल्चरल एक्स्चेंजची विद्यार्थिनी म्हणून शिक्षणही घ्यायला गेली होती.

    (संदर्भ : महाराष्ट्र टाईम्समधील नोंद हे सदर)


  • संगीतकार अशोक पत्की जिंगल्सचा राजा

    पूर्वी एक जिंगल तयार व्हायला चार ते पाच तास लागत. माझ्या बाबतीत सांगायचं तर दोन तासांत दोन जिंगल्स तयार करून मी पुन्हा तिसऱ्या कामासाठी दुसऱ्या स्टुडिओत जायचो. एक काळ असा होता की, सकाळी रेडिओवाणीला (वरळी) ८ ते १० मध्ये दोन जिंगल्स, मग १० ते ६ वेस्टर्न आऊटडोअर (फाऊंटन), पुन्हा संध्याकाळी ६ ते १० दोन जिंगल्स (रेडिओवाणी किंवा रेडिओ जेम्स- वरळी) आणि रात्री १० ते २ बॉम्बे लॅब किंवा फिल्म सेंटरला फिल्मची जिंगल्स मी करत असे आणि पहाटे तीन वाजता घरी जात असे. आणि पुन्हा सकाळी साडेसहाला उठून आठ वाजता रेडिओवाणीला हजर!

    अशोक पत्की यांच्याविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
    http://www.marathisrushti.com/articles/ashok-patki-jingles-king/

    # Patki, Ashok

  • नाट्य दिग्दर्शक दामू केंकरे

    चाकोरीबध्द रंगभूमीच्या बाहेर जाऊन विचार करणारा दिग्दर्शक म्हणून त्यांची ओळख होती. हॅल्मेट,कालचक्र, उद्याचा संसार, आपलं बुवा असं आहे, सूर्याची पिल्ले, अखेरचा सवाल, कालचक्र, कार्टी प्रेमात पडली अशा नाटकांचे दिग्दर्शन दामू केंकरे यांनी केले होते.

  • सारस पक्षी प्रेमी डॉ. विजय सूर्यवंशी, जिल्हाधिकारी गोंदिया !!!!

    अगदी पुराणात सुद्धा ज्याचा उल्लेख आहे आणि नेहमी जोडीने (जोडप्याने )जो फिरतो . जो आपल्या जोडीदाराला मरे पर्यंत सोडत नाही.दोघांपैकी एकच मृत्यू झालातर दुसरा अन्नपाणी वर्ज्य करून प्राणत्याग करतो.पायाची नखे ते चोच अशी किमान साडेपाच ते सहा फूट उंचीचा हा अत्यंत देखणा पक्षी. विस्तीर्ण पंख विखुरले तर तब्बल चौदा ते सोळा फुटांपर्यंत रुंद..! भातशेतातच स्वत:चं घर करणारा अन्‌ त्यामध्ये किमान तीन ते चार किलो वजनाचं अंड घालून प्रजातींची संख्या वाढवणाऱ्या आणि गम्मत म्हणजे अंडी उबवण्याचा अधिकार फक्‍त मादीचाच या निसर्ग नियमालाही छेद देत अंडे उबणारा नर पक्षी, या पक्षाचे नाव आहे सारसपक्षी. या सारस पक्ष्यांवर शेतकऱ्यांची कुऱ्हाड कोसळत होती. २००० पर्यंत नामशेष होण्याच्या मार्गावर सारस होता. केवळ चार जोड्याच शिल्लक होत्या.

    असे म्हणतात कि ज्यांचे पटत नाही अशा भांडणा-या पतीपत्नीला या सारस पक्षाच्या सान्निध्यात ठेवण्याची प्रथा भारतात एकेकाळी होती.करड्या रंगाचा ,लालभडक मान असलेला पक्षी याला एका शिका-यांनी मारताना वाल्मिकी ऋषींनी पहिला .वाल्मिकी ऋषींना खूप वेदना झाल्या . त्यांनी त्या शिका-यास शाप दिला आणि त्या तडफडून मरणा-या पक्षाला पाहून त्यांना 'रामायण' हे महाकाव्य सुचले अशी कथा आहे. असे म्हणतात एकमेकांसाठी जीवनभर जगणा-या सारस पक्षाच्या जोडीला पाहून त्यांना प्रभू रामचंद्र आणि सीतामाई यांच्या एकनिष्ठ प्रेमाची कथा लोकांना सांगावीशी वाटली . हि सारस पक्षाची जोडी अशी रामायण काळा पासून प्रसिद्ध आहे.रामायण हे महाकाव्य म्हणजे एक शोकांतिकाच आहे. विवाह झाल्यापासून त्रास ,वनवास, वियोग या वेदना रामायणात आहेत.प्रभू रामचंद्र आणि सीतेचा विवाह हा पुष्य नक्षत्रावर झाला होता.विवाह झाल्यानंतर त्यांना आजन्म वेदना आणि विरहच सोसावा लागला म्हणून कितीही शुभ असले तरी पुष्य नक्षत्र विवाह साठी वर्ज्य समजले जाते. .पतीपत्नी मध्ये सारस पक्षा सारखी निष्ठा असावी म्हणून भारतात न पटणा-या जोडप्याला या पक्षाच्या सान्निध्यात ठेवतात.

    असे म्हणतात कि जहांगीर बादशहा यांनी हे पक्षी पाळले होते. दुधात पाव भिजवून जर या पक्षांना दिले तर हे पक्षी पावाचा तुकडा पाण्यात बुडवून धुतात आणि दुध वेगळे झाल्यावर पाव खातात.एकाद्या इमानी कुत्र्या सारखे माणसांच्या मागे हे पक्षी चालतात. उभ्या पिकातलं भात दाणे हे पक्षी खातात म्हणून शेतकरी या पक्षांना शेतात येऊ देत नाहीत. परंतु काहीही असले तरी अत्यंत आश्चर्य कारक या पक्षांचे जीवन असते.

    संपूर्ण जगात हे पक्षी नामशेष होत आहेत. भारतात तर फक्त ४ जोड्या शिल्लक राहिल्या होत्या. गोंदियाचे जिल्हाधिकारी डॉक्टर विजय सूर्यवंशी यांनी त्यांच्या नेहमीच्या रुक्ष कामातून वेळ काढला आणि हे पक्षी वाचवण्यासाठी पक्षी प्रेमी संघटनांच्या मदतीने या पक्षांचे संगोपन करून त्यांची संख्या वाढवली .

    एक जिल्हाधिकारी काय करू शकतो याचे हे मूर्तिमंत उदाहरण आहे . आपल्या देशात असे अनेक अधिकारी आहेत कि ज्यांच्या कार्याला जनतेच्या शाब्बासकीची फक्त गरज असते. त्यांच्या कामाला आपण उत्तेजन दिले पाहिजे.अतिशय दुर्मिळ आणि वाल्मिकी मुनींना प्रिय असलेल्या सारस पक्षांना वाचवणा-या जिल्हाधिकारी सूर्यवंशी यांना सलाम !!!!

    -- चिंतामणी कारखानीस

  • प्रसिद्ध फारसी आणि उर्दू कवी गालिब

    मिर्ज़ा असद-उल्लाह बेग ख़ां उर्फ “ग़ालिब” हे एक प्रसिद्ध फारसी आणि उर्दू कवी होते. त्यांचा जन्म २७ डिसेंबर १७९७ रोजी झाला. ते सुधारक वृत्तीचे, सर्व धर्मांना समान मानणारे, कर्मठ नसलेले, नमाज न पढणारे, रोजा न ठेवणारे, कलेचे आसक्त, रसिक व्यक्ती होते. गालिब केवळ चार वर्षांचे असतांना त्यांचे वडील वारले म्हणून आजोबा आणि काकांनी पालनपोषण केले. लहानपणी त्यांनी इस्लामचे धडे घेतले, फारसी भाषा शिकले. मा.मिर्झा गालिब हे थोरल्या बाजीरावांची पत्नीे मस्तानी हिच्या वंशात जन्माला आले होते.

    गालिब यांनी फारसी भाषेत लिखाण काम सुरू केले. त्यांच्या साहित्यात जीवनाचे गंभीर तत्वज्ञान त्यांनी मांडले. वयाच्या ११व्या वर्षापासून गालिब शेर लिहीत होते. जीवनाच्या झळा सोसून मिर्झा गालिब यांनी त्या सुंदर करून काव्यातून मांडल्या. त्यांनी एकूण १८,००० च्या वर शेर फारसी भाषेत रचले. पुढे मित्रांच्या आग्रहाखातर त्यातीलच १०००-१२०० शेर त्यांनी उर्दू भाषेत लिहिले. मा.गालिब यांनी कधी कोणताही उद्योग-धंदा केला नाही. मित्रांच्या आणि नातेवाईकांच्या सहकार्याने ते राहत. त्यांना स्वतःला प्रसिद्धी मिळविण्याची गरज वाटली नाही. उत्तर मोगल काळातील राजांच्या, उमरावांच्या दरबारी जाणेही त्यांना आवडत नसे. ते म्हणत माझ्या कविता माझ्या मृत्यूनंतरही अजरामर राहणार असल्याने माझे नाव आपोआपच सर्वत्र पसरणार.

    गालिबच्या काव्यावर मीर आणि आमीर खुसरो यांच्या रचनांचा प्रभाव होता. साहित्य निर्मिती करताना केवळ चौकट मोडून चालत नाही. त्यात तितकी ताकदही असावी लागते. गालिबने परंपरेला नावीन्याची झालर लावली. अभिजात सौंदर्याची बूज राखायला शिकवले. घराण्यातच सैनिकी पार्श्वभूमी असल्याने गालिबमध्ये बंडखोरीचे बीज होते. मिर्झा गालिब यांच्यावर हिंदीत १९५४ साली एक चित्रपट निघाला होता व दुसरा १९८८ साली दूरचित्रवाणीसाठी बनवला होता. पहिल्या चित्रपटाचे दिग्दर्शक सोहराब मोदी तर दुसर्याा चित्रपटाचे दिग्दर्शक गुलझार होते. मिर्झा गालिब यांचे निधन १५ फेब्रुवारी १८६९ रोजी झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

    मिर्झा गालिब यांच्या काव्यातल्या सुप्रसिद्ध पंक्ती
    काबां किस नूर से जाओगे गालिब, शर्म तुमको मगर नहीं आती
    दिल-ए-नादाँ तुझे हुआँ क्या आखि़र इस दर्द की दवा क्या है
    नुक्ताचीं है ग़म-ए-दिल उस को सुनाये न बने
    ये नथी हमारी किस्मत कि विसाल-ए-यार होता
    हजारो ख्वाईशें ऐसी के हर ख्वाईश पे दम निकलें
    हैं और भी दुनियामें सुखन-वर बहुत अच्छे, कहते हैं कि गालिब का अंदाज-ए-बयाँ और