जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
माणसाचे अक्षर हा त्याचा मनाचा आरसा असतो असं म्हणतात. आपल्या हस्ताक्षरावर आपलं मन कसं आहे हे खरोखरच कळतं का? असा प्रश्न कुणी विचारला तर त्याला उत्तर होय असंच येईल;
वीरसेन आनंदराव कदम ऊर्फ बाबा कदम हे मराठी लेखक होते.
वाणिज्य, व्यवस्थापन, अर्थ, बँक, विमा, शिक्षण, साहित्य, अध्यात्म अशा विविध क्षेत्रांत सहजपणे मुसाफिरी करणारे प्राचार्य डॉ. प्र. चिं. शेजवलकर.
ज्या काळामध्ये आपल्या देशात व्यवस्थापन या विषयाचा शास्त्र म्हणून उदय झाला नव्हता, त्या काळात त्यांनी विद्यार्थ्यांना या विषयाकडे पाहण्याची व्यापक दृष्टी दिली.
'मॅनेजमेंट गुरू' ही संज्ञा आता प्रचलित झाली आहे. शेजवलकर हे या संज्ञेचे एक चालते-बोलते उदाहरण. याच्या पुढे जात ते 'मॅनेजमेंट एज्युकेशन गुरू' बनले. म्हणूनच पुण्यातील व्यवस्थापन शिक्षणक्षेत्रात त्यांचा उल्लेख 'शेजवलकर शिक्षण संस्था' म्हणून केला जातो. त्यांनी विद्यापीठाच्या स्तरावर तब्बल ६० वर्षे अध्यापन केले. पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन विभागाचे ते प्रमुख होते. त्यांच्या हाताखाली ८२ विद्यार्थ्यांनी पीएच.डी. मिळवली आहे. काही व्यवस्थापन संस्थांचे प्रमुख संचालकपद ते अखंडपणे भूषवित आहेत. पुणे विद्यापीठाच्या 'नॉलेज मॅनेजमेंट' या अभ्यासमंडळाचे ते अध्यक्ष होते. पुणे स्टॉक एक्स्चेंजचे ते संचालक होते. ही यादी आणखी वाढविता येईल; पण केवळ एवढ्या उल्लेखांमध्येही त्यांच्या चतुरस्त्र व्यक्तिमत्त्वाची झलक दिसून येते.
त्यांचे मराठी भाषाप्रेमही सर्वज्ञात आहे. मराठी ही ज्ञानभाषा व्हावी यासाठी ते नेहमीच आपल्या लेखनातून आणि व्याख्यानांमधून पाठपुरावा करतात. पुण्यात बी.कॉम.चा अभ्यासक्रम आज मराठी भाषेतून शिकवला जातो. उत्तरपत्रिकासुद्धा मराठी भाषेमधून लिहिता येते. हे सारे डॉ. शेजवलकर यांच्या प्रयत्नांमधूनच साध्य झाले. वाणिज्य विद्याशाखेत पीएच.डी.चा प्रबंध मराठीतून लिहिण्यास परवानगी मिळावी, हा त्यांचा आग्रह पुणे विद्यापीठाने मान्य केला. परंतु तेवढ्यावरच ते थांबले नाहीत. सुमारे ३० पाठ्यपुस्तके त्यांनी मराठीतून लिहिली.
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या विश्वस्त मंडळाचे ते पाच वर्षे अध्यक्ष होते. या सार्या व्यापातून वेळ काढून त्यांनी चार हजारांहून अधिक मराठीतून भाषणे केली. कामगारांसाठी ज्ञानशिक्षण देण्याचे वर्ग काढले. गेली ५० वर्षे त्यांनी अध्यात्मावरही विविधांगी लेखन केले आहे. 'प्रार्थने'संबंधी ते लिहितात, 'सुखदु:खाच्या पलीकडे जाऊन परमेश्वराजवळ जाण्याची खरी ओढ निर्माण होते, तेव्हा केलेली प्रार्थना आत्मोन्नती करणारी असते.' व्यवस्थापनापासून अध्यात्मापर्यंतचा त्यांचा सहजसुंदर वावर खरोखरच स्तिमित करणारा आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या अध्यक्षपदावरील त्यांच्या निवडीमुळे राजकारणविरहीत भाषासेवेचे बीज रोवले जाईल, अशी आशा आहे.
(संदर्भ : महाराष्ट्र टाईम्समधील नोंद हे सदर)
शक्तिमान’, ‘कॅप्टन व्योम’सारख्या मालिकांमध्येही त्यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या.
‘श्रावणात घननिळा बरसला’ या गाण्यातील गोडवा अथवा ‘दिल चीज क्या है आप मेरी जान लिजीये’ या गाण्यातील ठसका योग्य वाद्यमेळाच्या आधारे खुलवून ती अधिक कर्णप्रिय करण्याचे कसब लाभलेले अनिल मोहिले यांना लहानपणापासून संगीताची आवड होती. त्यांना त्यांच्या वडिलांचे मार्गदर्शन आणि तरंगवाद्याचं बाळकडू मिळाले. वयाच्या १५ व्या वर्षी त्यांना अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाची संगीत विशारद ही पदवी मिळाली. रूपारेल कॉलेजमध्ये शिक्षण घेत असतानाच १९६० च्या दशकात त्यांनी आकाशवाणीवर काम केलं. संगीतसंयोजनाची सुरुवात त्यांनी आकाशवाणीवर केली. तेथेच त्यांच्या आयुष्यातील नवे लक्ष्य मिळाले आणि ते शास्त्रीय संगीतापासून भावसंगीताकडे वळले. संगीत संयोजनासाठी शिवकुमार पुंजाणी यांच्याकडे त्यांनी मार्गदर्शन घेतले. नोटेशन वाचून वाजवणं हा प्रकार ते त्यांच्याकडे शिकले. आकाशवाणीवर श्रीनिवास खळे यांची ओळख झाली. नोटेशन लिहिणं, चालीमधल्या जागा गीताच्या चालीला अनुरूप अशा धूनांनी भरणं यासाठी लागणारं ज्ञान त्यांना श्रीनिवास खळे यांच्याकडून मिळाले. ते स्वतः बुलबुल तरंग आणि मेंडोलिन वाजवायचे. स्वतःची नोकरी सांभाळून त्यांनी ही आवड जोपासली होती. वयाच्या सातव्या वर्षी आकाशवाणी मुंबई केंद्रावर त्यांचा ‘गंमत जंमत’ या मुलांच्या कार्यक्रमात एकल तबलावादनाचा कार्यक्रम सादर झाला होता.
जलतरंग, बुलबुलतरंग, व्हायोलिन, मेण्डोलिन यासारख्या वाद्यांवर कमालीचे प्रभुत्व असणाऱ्या मोहिले यांनी सुमारे ४० मराठी चित्रपटांना संगीत दिले. त्यापूर्वी हिंदी चित्रपटसृष्टीत सचिनदेव बर्मन, खय्याम, कल्याणजी-आनंदजी, भप्पी लाहिरी यासारख्या अनेक संगीतकारासोबत त्यांनी संगीत संयोजक तसेच सहाय्यक संगीतकाराची भूमिका पार पाडली. त्यांच्यावर लक्ष्मीकांत-प्यारेलाल या जोडीतल्या प्यारेलाल शर्मा, शंकर-जयकिशन यांचे म्युझिक अरेंजर सॅबेस्टियन, कल्याणजी आनंदजी यांचे अरेंजर बाळ पार्टे आणि मदनमोहन यांचे अरेंजर सोनिक मास्तर यांचा प्रभाव होता. ८६ हिंदी चित्रपटांचे त्यांनी संयोजन केले आहे. जवळपास ७० हून अधिक संगीतकारांकडे त्यांनी काम केले. लता मंगेशकर यांच्या देश-विदेशातील सर्व संगीत मैफलींमधील संगीत संयोजनाची जबाबदारी मोहिले यांनी अनेक वर्षे सांभाळली होती. इंडस्ट्रीत माझं स्थान पक्कं करण्यात लतादीदींची बहुमोल मदत झाली. किंबहुना त्यांच्या पाठिंब्यामुळेच मी आजतागायत घट्ट पाय रोवून आहे, असे अनिल मोहिले नेहमी म्हणायचे.
अनिल मोहिले आणि अरुण पौडवाल या जोडीने संगीतबद्ध केलेली अनेक गाणी आहेत.त्यानंतर अनिलजींनी स्वतंत्रपणे संगीत दिले. मराठी चित्रपट सृष्टीत अनिल अरुण या जोडीने अष्टविनायक या चित्रपटाला दिलेल्या संगीतामुळे त्यांना भरपूर प्रसिद्धी मिळाली. मंगेशकर कुटुंबीयांचा उजवा हात अशी त्यांची प्रसिद्धी होती. संगीताच्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या कलाकारांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्याचा उपक्रमही सन २००३ पासून मोहिले यांनी राबविला. तीन पिढ्यांच्या संगीतकारांना जोडणारा दुवा म्हणून अनिल मोहिलेंकडे पाहिले जात होते. मुंबई विद्यापीठात संगीत संयोजनाचा अभ्यासक्रमही त्यांनी सुरु केला होता. त्यातून अनेक विद्यार्थी त्यांनी घडवले. थोडीसी बेवफाई, कयामत से कयामत, लेकिन, शराबी, डॉन, अभिमान यांसह ८६ हिंदी चित्रपटांचे संगीत नियोजन त्यांनी केले होते. शुभमंगल सावधान, दे दणादण, थरथराट यांसह अनेक मराठी चित्रपटांचेही संगीत नियोजक तेच होते. अनिल मोहिले यांचे निधन १ फेब्रुवारी २०१२ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
महान धावपटू फ्लाइंगसीख मिल्खासिंग यांचा जन्म २० नोव्हेंबर १९२९ रोजी झाला.
मिल्खा सिंग यांचा जन्म गोविंदपुरा स्थित शीख कुटुंबात झाला होता. मिल्खा सिंग यांनी आपल्या जीवनात ८० शर्यतीत भाग घेतला. त्यात ते ७७ वेळेस विजयी झाले. तीन ऑलिम्पिकमध्ये त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले. १९५८ मधील कार्डिफ राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये मिल्खा सिंग यांनी 400 मीटरच्या शर्यतीत गोल्ड मेडल मिळवलं होतं. पण त्यांना सर्वाधिक प्रसिद्धी मिळाली १९६० च्या रोम ओलिम्पिक स्पर्धेमुळे. त्या स्पर्धेत ४०० मीटरच्या शर्यतीत अगदीच सूक्ष्म फरकानं त्यांचं कांस्यपदक चुकलं होतं.
रोम ऑलिम्पिकमध्ये मिल्खा सिंग यांनी ४०० मीटर शर्यत ४५.७३ सेकंदांमध्ये पूर्ण केली होती. जर्मनीचा धावपटू कार्ल कूफमॅनपेक्षा ते सेकंदाच्या १०० व्या भाग एवढ्या कमी फरकानं मागं राहिले होते. पण त्यांनी शर्यत पूर्ण केलेली ही वेळ त्यानंतर पुढचे ४० वर्षं राष्ट्रीय विक्रम म्हणून कायम होती.मिल्खा कॉमनवेल्थ खेळात वैयक्तिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारे स्वतंत्र भारतातील पहिले खेळाडू होते.१९५८ च्या टोकियो इथं झालेल्या आशियाई स्पर्धांमध्ये मिल्खा सिंग यांनी २०० मीटर आणि ४०० मीटर शर्यतीत सुवर्ण पदक जिंकलं होतं. तर १९६२ च्या जकार्ता आशियाई स्पर्धांमध्ये ४०० मीटर आणि ४ बाय ४०० मीटर रिले शर्यतीतही सुवर्ण पदक जिंकलं होतं.
लष्करात जाण्याची मिल्खा सिंग यांची खूप इच्छा होती. त्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केला; मात्र तीन वेळा त्यांना अपयश आले. त्यामुळे त्यांनी लष्करात जाण्याचा विचार सोडला. मिल्खा सिंग यांना 'फ्लाइंग सीख' हे नाव पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती आयुब खान यांनी १९६० मध्ये दिले होते. त्या वेळी मिल्खा यांनी पाकिस्तानचा सुवर्णपदक विजेता अब्दुल खालिकला पाकिस्तानातच हरवले होते. मिल्खा सिंगच्या आई-वडिलांचा मृत्यू फाळणीदरम्यानच्या दंगलीमध्ये झाला. मिल्खा यांचे लग्न भारतीय महिला व्हॉलीबॉल संघाच्या माजी कर्णधार निर्मल कौरसोबत झाले. मिल्खा सिंग यांची पत्नी देखील एक खेळाडू होती. हे अनेक जणांना माहीत ही नसेल कदाचित. दोन महान खेळाडूंच्या मृत्यूमुळे क्रीडा जगतात शोककळा पसरली आहे. मिल्खा सिंह आणि त्यांची पत्नी निर्मला कौर यांची लव्हस्टोरी वेगळी आहे. मिल्खा सिंह हे पहिल्या नजरेतच निर्मला यांच्या प्रेमात पडले होते.
मिल्खा सिंग आणि निर्मला कौर यांची पहिली नजर ही खेळाच्या मैदानावरच भिडली. तिथूनच त्यांच्या प्रेमाची गोष्ट सुरू झाली. मिल्खा सिंग यांचं अनेक मुलींसोबतच्या अफेअरच्या चर्चाही गाजल्या होत्या. एक दोन नव्हे तर तीन मुलींसोबत मिल्खा सिंह यांचं नाव जोडलं गेलं होतं. या मुलींसोबत प्रेमाचे किस्सेही चांगलेच रंगले होते. मात्र मिल्खा यांचा जीव जडला तो मैदानावरच्या हॉलीबॉल खेळणाऱ्या राणीवर.
1955 मध्ये श्रीलंकेमध्ये मिल्खा सिंग आणि निर्मला कौर पहिली भेट झाली होती. याच ठिकाणी दोघांची एकमेकांशी ओळखही झाली. मिल्खा सिंग यांनी एका मुलाखतीत सांगितल्याप्रमाणे, ते पहिल्याच भेटीत निर्मला कौर यांच्या प्रेमात पडले होते. त्यावेळी कागद नसल्यानं निर्मला कौर यांच्या हातावर रुम नंबर लिहिला असल्याचा किस्साही फार गाजला आहे.
पहिल्या भेटीनंतर 1958 मध्ये दोघांची भेट पुन्हा एकदा झाली. 1960 मध्ये दोघांची भेट पुन्हा एकदा दिल्लीतील नॅशनल स्टेडियममध्ये झाली. तेव्हा मिल्खा सिंग खेळातील मोठं नाव बनलं होतं. या काळात कॉफीसाठी एकत्र येताना त्यांचं प्रेम वाढत गेलं.
दरम्यान या दोघांच्याही लग्नासाठी निर्मला कौर यांच्या घरातून मात्र विरोध होता. मिल्खा सिंग शिख असल्याने निर्मला कौर यांचे वडील दोघांच्या लग्नासाठी तयार नव्हते. त्यामुळे लग्नाच्या मार्गात अडथळा येत होता. अशावेळी पंजाबच्या तत्कालीन मुख्यमंत्री प्रताप सिंह कैरो यांना मध्यस्थी करावी लागली होती.
१९६२ मध्ये मिल्खा आणि निर्मला या दोघांचं लग्न झालं. मिल्खा सिंग यांनी अनेकदा आपल्या पत्नीचे जाहीरपणे कौतुक केलं केलं होतं. ते आपल्या बायकोला स्वतःची सर्वात मोठी ताकद मानत असत.
त्यांचा मुलगा जीव सिंग गोल्फचा प्रसिद्ध खेळाडू आहे. भारत सरकारने त्यांना अर्जून पुरस्कार आणि ‘पद्मश्री’ पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.
भाग 'मिल्खा भाग मिल्खा' हा चित्रपट मिल्खा सिंग यांच्या १९४६ ते १९६० पर्यंतच्या जीवनावर आधारित बायोपिक आहे. यात फरहान अख्तर यांनी मिल्खा सिंग यांचा अभिनय केला आहे. या वयात ही मिल्खा सिंग हे देशातल्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचं काम करत असत. यासाठी सरकारनंही त्यांना मदतीचा हात दिला होता. मिल्खा सिंग यांच्या पत्नी निर्मल मिल्खा सिंग यांचं १३ जून २०२१ कोरोनामुळं निधन झाले होते.
मिल्खा सिंग यांचे १८ जून २०२१ रोजी निधन झाले.
-- संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
कवी ग्रेस हे मराठी कवितेच्या प्रांतावर मौलिक ठसा उमटवून गेलेले कवी...'ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता' या काव्याने घरोघरी पोहचलेले माणिक गोडघाटे ऊर्फ कवी ग्रेस. त्यांचा जन्म १० मे १९३७ रोजी झाला.
माणिक सीताराम गोडघाटे ऊर्फ कवी ग्रेस यांची मर्ढेकरोत्तर नव कवींच्या दुसऱ्या पिढीतील प्रमुख कवींमध्ये गणना होते. ग्रेस मूळचे नागपूरचे. त्यांचे वडील सैन्यात होते. नागपुरातील कर्नल बाग परिसरात त्यांचं बालपण हलाखीच्या परिस्थितीत गेलं. आईच्या अकाली निधनामुळे नोकरी व शिक्षण यांच्यात मेळ साधत त्यांना आपली प्रतिभा जपावी लागली. १९६६ मध्ये ते नागपूर विद्यापीठातून मराठीमध्ये एम.ए. झाले. त्यानंतर दोन वर्षं त्यांनी धनवटे नॅशनल कॉलेजमधे अधिव्याख्याता म्हणून नोकरी केली. १९६८ पासून १९९७ साली निवृत्त होईपर्यंत ते नागपूरमधील वसंतराव नाईक समाजविज्ञान संस्थेत (मॉरिस कॉलेज) मराठीचे प्राध्यापक होते. निवृत्तीनंतर काही काळ ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या मराठी विभागात सौंदर्यशास्त्र या विषयाचं अध्यापनही करत होते. ग्रेस यांच्या लिखाणाला सुरुवात झाली १९५५ सालापासून. 'छंद', 'सत्यकथा' या नियतकालिकांमधून त्यांच्या कविता सुरुवातीला प्रसिद्ध झाल्या. १९६७ साली त्यांचा पहिला काव्यसंग्रह 'संध्याकाळच्या कविता' प्रसिद्ध झाला. त्यांचं समकालीन कवितेत असलेलं वेगळेपण या कविता संग्रहामुळे अधोरेखित झालं. मुक्तछंदाचा प्रभाव असणाऱ्या या काळात ग्रेस यांनी निष्ठेने वृत्तबद्ध आणि नादानुसारी लयविभोर काव्यरचना केली.त्यामुळे त्यांची कविता सौंदर्यवादी असूनही तिला अभिजाततेची वैशिष्ट्यं प्राप्त झाली. यानंतर प्रसिद्ध झालेल्या राजपुत्र आणि डार्लिंग (१९७४), चंद्रमाधवीचे प्रदेश (१९७७), सांध्यपर्वातील वैष्णवी (१९९५), सांजभयाच्या साजणी (२००६) आदी संग्रहांमधून त्यांची कविता अधिक गूढ आणि व्यामिश्र होत गेलेली जाणवते. मा.ग्रेस हे विलक्षण आत्ममग्न कवी होते. ग्रेस एक बेट आहे आणि या बेटाला समजून घेण्यासाठी त्या बेटावरच यावे लागते असे मा.ग्रेस वारंवार म्हणायचे. मा.ग्रेस यांचे मराठीसोबत इंग्रजी व उर्दू भाषांवर प्रभुत्व होतं. त्यांच्या कवितांमधून याचा प्रत्यय येतोच, पण त्यांच्या व्याख्यानांमधे व पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्यासोबत त्यांनी केलेल्या कार्यक्रमांमधूनही त्यांच्या प्रखर वाणीचा अनुभव रसिकांना येत असे. मा.ग्रेस यांच्या काव्याइतकीच मोहिनी त्यांच्या ललित लेखनानेही वाचकांच्या मनावर घातली आहे. 'चर्चबेल' हा त्यांचा पहिला ललित लेख संग्रह १९७४ मध्ये प्रकाशित झाला. त्यानंतर 'मितवा', 'संध्यामग्न पुरुषाची लक्षणे', 'मृगजळाचे बांधकाम', 'वाऱ्याने हलते रान', 'ओल्या वेळूची बासरी' हे त्यांचे ललित लेख संग्रह प्रसिद्ध झाले आहेत. " मा.माणिक गोडघाटे यांनी कवी म्हणून 'ग्रेस' हे नाव धारण करण्यामागे कारण ठरली ती लोकप्रिय पाश्चात्त्य अभिनेत्री इन्ग्रीड बर्गमन. 'द इन ऑफ द सिक्स्थ हॅपिनेस' या चित्रपटात इन्ग्रीडसंबंधी 'शी इज इन ग्रेस' असं वाक्य उच्चारलं जातं. हे वाक्य ऐकल्यानंतर आपल्या आत्म्यावरची धूळ उडाली आणि आपल्याला प्रतिभेचा पहिला साक्षात्कार झाला, असं ग्रेस यांनी म्हटलं आहे. इन्ग्रीडचे ऋण आठवणीत राहावं यासाठी त्यांनी कायमस्वरूपी 'ग्रेस' हेच नाव लावलं. स्वतःला त्यांनी दुःखाच्या स्वाधीन केले होते. त्याबाबतीत त्यांनी म्हटलेले आहे, "मी महाकवी दुःखाचा म्हणत, दुःखाचा धागा विणताना, दगडाचे माझ्या हाती, वेगाने फूल होते'. मा.ग्रेस यांच्या ‘ती आई होती म्हणुनि...’ या गीताबद्दल, मा.ग्रेस यांच्या आईचे जेव्हा निधन झाले, त्यांना ही कविता सुचली. त्यांच्या विषण्ण मनाने ही कविता लिहिली. ग्रेस यांच्या कवितेतल्या शब्दांना हृदयनाथ मंगेशकरांच्या सुरांनी साद घातली आणि एक अजरामर गीत जन्माला आलं...
ती गेली तेव्हा रिमझिम
पाऊस निनादत होता
मेघात अडकली किरणे
हा सूर्य सोडवीत होता...
पावसाचा रिमझिम निनाद दु:खाचा सांगावा घेऊन येणारा...आई गेल्यानंतरचं पोरकेपण सांगणारा...जाणारी ती आई होती म्हणून घनव्याकूळ करणारा... हृदयनाथ मंगेशकरांच्या स्वरांमधून ग्रेस यांची ही कविता ऐकताना आपल्या मनाची अवस्था कशी होते हे सांगण्यासाठी शब्द बापुडे होतात. पावसाच्या प्रत्येक थेंबात दु:ख ठिबकत राहावं ना, अगदी तसच वाटत राहतं. त्यांच्या इतर ''भय इथले संपत नाही'',घर थकलेले संन्यासी '',पाऊस कधीच पडतो''अशा या सुंदर कवितांना ही हृदयनाथ यांनी आपल्या सुरेल स्वरांच्या कोंदणात बसवून अजरामर केले आहे. ग्रेस यांच्या ''संध्याकाळच्या कविता''या संग्रहाला १९६८ मध्ये महाराष्ट्र सरकारचे ''कवी केशवसुत''पारितोषिक मिळाले .त्यांच्या ''वाऱ्याने हलते रान'' या ललितबंध संग्रहाला २०१२ साली साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला.२०१२ साली ''युनिक फीचर्स ''ने आयोजित केलेल्या ''दुसऱ्या मराठी ई साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पद त्यांनी भूषविले होते. हिंदी चित्रपटसृष्टीतील अतिशय गुणी व प्रतिभाशाली संगीतकार रोशन हे ग्रेस यांचे आवडते संगीतकार. 'चर्चबेल' या ललित गद्याच्या पुस्तकात ग्रेस यांचा 'रोशनची गाणी' या शीर्षकाचा अतिशय सुंदर लेख आहे. त्यात सुरवातीलाच ग्रेस म्हणतात, 'मी रोशनचे छायाचित्र पाहिले आहे, पण त्याला भेटू शकलो नाही. भेटायची खूप इच्छा होती. अशा ब-याच गोष्टी राहून गेल्या आहेत; राहून जातात. मृत्यू असं काही करुन जातो.' ग्रेसनी, रोशन यांनी संगीतबद्ध केलेल्या 'बहुबेगम' चित्रपटातील कव्वालीतील वाकिफ़ हूं खूब इश्क की तर्जे-बयां से मैं, ऐसे में तुझको ढूंढके लाऊं कहां से मैं! या ओळी उद़्धृत करुन, रोशनना आदरांजली वाहिली होती. ग्रेस यांचे २६ मार्च २०१२ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
ग्रेस यांचे कवितासंग्रह
संध्याकाळच्या कविता (१९६७)
राजपुत्र आणि डार्लिंग (१९७४)
चंद्रमाधवीचे प्रदेश (१९७७)
सांध्यपर्वातील वैष्णवी (१९९५)
सांजभयाच्या साजणी (२००६)
बाई! जोगिया पुरुष (२०१२)
ललितबंध संग्रह
चर्चबेल (१९७४)
मितवा (१९८७)
संध्यामग्न पुरुषाची लक्षणे (२०००)
मृगजळाचे बांधकाम (२००३)
वाऱ्याने हलते रान (२००८)
कावळे उडाले स्वामी (२०१०)
ओल्या वेळूची बासरी (२०१२)
ती गेली तेंव्हा रिमझिम पाऊस होता
https://youtu.be/pM3eOOP786w
भय इथले संपत नाही.
https://youtu.be/x88r7JI4ljU
तुला पाहिलें मी नदीच्या किनारीं
https://youtu.be/e_-9GiAMInY
अरुण होर्णेकरांनी आजवर ‘दिवा जळू दे सारी रात’सारख्या मेलोड्रामापासून ‘हैदोस’, ‘भोगसम्राट’सारख्या हिट् ॲण्ड हॉट नाटकांपर्यंत.. आणि ‘बेकेट’,‘वेटिंग फॉर गोदो’, ‘गिधाडे’ सारख्या ॲटब्सर्ड, प्रश्नयोगिक, तसंच वास्तववादी नाटकांपासून ते ‘सख्खे शेजारी’सारख्या रेव्ह्यू प्रकारातल्या नाटकांपर्यंत सगळ्या पिंड-प्रकृतीची आणि प्रवृत्तीची नाटकं केली आहेत.
पूनम ढिल्लन १९७७ मध्ये फेमिना मिस इंडियाचा किताब जिंकून प्रसिद्धी झोतात आल्या होत्या. त्यांचा जन्म १८ एप्रिल १९६२ रोजी झाला. असे म्हटले जाते, की एका मॅगझिनमध्ये पूनम यांचे छायाचित्र बघून दिवंगत दिग्दर्शक-निर्माते यश चोप्रा यांनी त्यांना 'त्रिशुल' सिनेमाची ऑफर दिली होती. सुरुवातीला पूनम यांची ऑफर नाकारली होती, मात्र नंतर त्यांनी तो सिनेमा स्वीकारला होता. त्यांच्या या निर्णयाने त्यांचे आयुष्यच पालटून गेले. 'त्रिशुल' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. 'त्रिशुल' या सुपरहिट सिनेमाद्वारे अभिनयाचा श्रीगणेशा करणा-या पूनम यांची राजेश खन्नांसोबत ऑन स्क्रिन जोडी जमली होती. दोघांनी 'निशान', 'दर्द', 'आवाम', 'जय शिव शंकर', 'रेड रोज'), 'जमाना' या सिनेमांमध्ये एकत्र काम करुन प्रेक्षकांची मने जिंकली होती. १९८८ मध्ये पूनम यांनी निर्माते अशोक ठाकरियासोबत लग्न केले. दोघांची भेट एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून झाली होती. पूनम यांना पाहताच क्षणी अशोक त्यांच्या प्रेमात पडले होते. पूनमकडे आपल्या प्रेमाची कबुली दिल्यानंतर जोपर्यंत त्यांचा होकार आला नाही, तोपर्यंत दररोज ते त्यांना एक गुलाबाचे फूल पाठवत होते. अशोक यांच्यासोबत विवाहबद्ध झाल्यानंतर पूनम यांनी सिनेमात काम करणे कमी केले होते. १९९२ मध्ये आलेल्या 'विरोधी' या सिनेमानंतर जवळजवळ पाच वर्षे पूनम यांनी इंडस्ट्रीपासून ब्रेक घेतला होता. १९९७ मध्ये 'जुदाई' या सिनेमाद्वारे त्यांनी बॉलिवूडमध्ये कमबॅक केले. त्यानंतर त्यांनी छोट्या पडद्याकडे आपला मोर्चा वळवला.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
मराठी रंगभूमीवर स्त्री भूमिका करणारे प्रसिद्ध नट, गायक आणि वादक बापूराव पेंढारकर यांचा जन्म १० डिसेंबर, १८९२ रोजी ग्वाल्हेर येथे झाला.
व्यंकटेश बळवंत पेंढारकर ऊर्फ बापूराव पेंढारकर हे मराठी रंगभूमीवर स्त्रीभूमिका करणारे प्रसिद्ध नट, गायक आणि वादक होते. बापूराव हे केशवराव भोसले ह्यांनी स्थापन केलेल्या ललित कलादर्श ह्या नाट्यसंस्थेचे अध्वर्यू होते. केशवराव भोसले यांनी १९०७ साली हुबळी येथे ‘ललितकलादर्श’ ही संस्था सुरू केली. या संस्थेने अनेक नाटकांना लोकप्रियता मिळवून दिली. केशवरावांच्या मृत्यूनंतर बापूराव पेंढारकर यांनी ‘ललितकलादर्श’ची धुरा सांभाळून सत्तेचे गुलाम, कुंजविहारी, कृष्णार्जुनयुद्ध, श्री, सोन्याचा कळस, आदी नवी नाटके मराठी रंगभूमीवर आणली; पण त्यांच्या अकाली निधनानंतर‘ललितकलादर्श’ पोरकी झाली.
त्याचवेळी बोलपटांमुळे संगीत नाटकांची लोकप्रियता ओसरू लागली होती, पण बापूरावांचे सुपुत्र भालचंद्र पेंढारकर यांनी वयाच्या एकविसाव्या वर्षी १९४२ साली नव्या जोमाने संस्थेचे पुनरुज्जीवन केले. त्यांना या कामात अनेक वेळा आर्थिक समस्यांनी ग्रासले, पण त्यांनी ललित कलादर्शचे काम तडफेने पुढे चालूच ठेवले.
आत्तापर्यंत कवी ना. घ. देशपांडे यांनी लिहिलेली आणि जी. एन. जोशी यांनी गायलेली व संगीतबद्ध केलेली ‘रानारानात गेली बाई शीळ’ ही कविता पहिले मराठी भावगीत समजले जात होते.; पण या गाण्यापूर्वी राम गणेश गडकरी ऊर्फ गोविंदाग्रज यांनी लिहिलेले आणि रंगभूमीवरील अभिनेते-गायक तसेच ‘ललित कला दर्श’ कंपनीचे चालक-मालक बापूराव पेंढारकर यांनी गायलेले ‘हे कोण बोलले बोला राजहंस माझा निजला’ हे ध्वनिमुद्रित झालेले पहिले मराठी भावगीत असल्याची माहिती अभ्यास व संशोधनातून नंतर समोर आली आहे. बापूराव पेंढारकर यांचे निधन १५ मार्च १९३७ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Copyright © 2025 | Marathisrushti