जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
खानदानी कविराज मंगेश पाडगावकर यांचा जन्म १० मार्च १९२९ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला येथे झाला.
शाळेत असल्यापासूनच मराठीवर त्यांचं प्रेम जडलं आणि वयाच्या १४ व्या वर्षापासूनच ते कविता करू लागले. कविवर्य वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज आणि बा. भ. बोरकर यांचा त्यांच्यावर खूप प्रभाव होता. परंतु, पाडगावकर एका साच्यात कधीच अडकले नाहीत. त्यांनी स्वतःची शैली निर्माण करून मराठी साहित्यात आणि रसिकांच्या मनात वेगळं स्थान मिळवलं. स्वतः प्रेमळ व्यक्ती, प्रेमळ प्राध्यापक असल्यानं प्रेमकवितेवर त्यांचं विशेष प्रेम होतं. पण, भावगीतं, बालकविता, निसर्गकविता, चिंतनशील कविताही त्यांनी तितक्याच प्रभावीपणे केल्या होत्या. त्या सादर करण्याची त्यांची पद्धत तर अफलातून होती. पाडगावकर, विंदा करंदीकर आणि वसंत बापट या त्रयीनं ठिकठिकाणी काव्यवाचनाचे कार्यक्रम करून राज्याच्या कानाकोपऱ्यातील वाचकांना कवितेची गोडी लावली. सहजसोप्या शब्दांतून व्यक्त होणारे बोल आणि ओठांवर सहज रुळणाऱ्या कविता पाडगावकरांनी दिल्या. मंगेश पाडगांवकरांची कविता-गीतं म्हणजे मोगऱ्याची टपोरी फुलं. नियतीने पाडगांवकरांच्या प्रतिभेला कधीही धोका दिला नाही. त्यांचा हात सतत लिहिता ठेवला. आपल्या कवितेतली, गीतांतली आशयघनता सातत्याने टिकवलेला हा श्रेष्ठ कवी! त्यातल्या अनेक कवितांची गाणी झाल्यानं साहित्यासोबतच संगीत क्षेत्रातील मा.पाडगावकरांचं योगदानही मोठं आहे.मा. पाडगावकरांनी या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे' असं म्हणत मराठी रसिकांना प्रेम करायला शिकवले, जगण्याचं बळ देणारे... 'अशी पाखरे येती, आणिक स्मृति ठेवुनी जाती', अशा सहजसोप्या शब्दांत जीवनाचं सार सांगीतले.
ते आपल्या कवीतांनी तरुणाईला प्रेमात पाडत असत. 'प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं', असं म्हणणारे 'पाडगावकर आजोबा' कॉलेजमधल्या मुला-मुलींचे मित्रच होऊन जायचे. भावकविता, भावगीते, बालगीते, संगीतीका, नाटय़काव्य, गझल, वात्रटिका, सामाजिक उपरोधपर कविता, बोलगाणी आणि विडंबन अशा विविध साहित्य प्रकारातून मा.पाडगावकरांनी वाचकांना समृध्द केले.
पाडगांवकर यांनी ‘कधी बहर, कधी शिशिर, परंतु दोन्ही एक बहाणे. या त्यांच्या गीताच्या ध्वनिमुद्रणाची सांगीतलेली आठवण. ‘सुधीर फडक्यांनी केलेले शब्दांचे उच्चार ही एक थरारून टाकणारी गोष्ट होती. शब्द माझेच होते. त्यामुळे मला तरी त्या शब्दांचं नावीन्य नव्हतं. पण सुधीर फडक्यांच्या आवाजात ते ऐकताना माझेच शब्द आता मला नव्याने भेटत होते. ‘बहर धुंद वेलीवत यावा’ या ओळीतील ‘बहर’ आणि ‘धुंद’ या शब्दांतून व्यक्त होणारी तारुण्यातल्या फुलण्याची धुंदी.. ‘हळूच लाजरा पक्षी गावा’ या ओळीतील पक्ष्याच्या गाण्यातून व्यक्त होणारं कोणाचंतरी ते कोवळं लाजरेपण.. ‘आणि अचानक गळून पडावी विखरून सगळी पानं’ या ओळीतील निराशा आणि आधीच्या दोन ओळींतील विरोधाचं नातं- हे सारं सुधीर फडके इतक्या विलक्षण उत्कटतेनं प्रकट करत होते, की त्यांच्या गायनातून माझी कविता नव्याने जन्म घेत आहे असं मला वाटलं.
मंगेश पाडगावकरांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलं होतं. 'सलाम' या काव्यसंग्रहासाठी त्यांना १९८० मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. महाराष्ट्रातील दर्दी रसिकांच्या मनात स्थान मिळवलेल्या पाडगावकरांना २००८ मध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. त्यानंतर, २०१३ मध्ये पद्मभूषण पुरस्कारानं त्यांचा गौरव करण्यात आला होता. २०१० मध्ये दुबईत झालेल्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. महाराष्ट्र टाइम्सनंही पाडगावकरांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कारानं गौरवलं होतं.
मंगेश पाडगावकर यांचे ३० डिसेंबर २०१५ रोजी निधन झालं.
-- संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
शुजीमुरा यांना हायस्कूल मध्ये असल्यापासून विज्ञानाची आवड निर्माण झाली.१९२० मध्ये, त्यांनी आपले लक्ष वैज्ञानिक संशोधक बनण्यावर केंद्रित केले आणि होक्काइडो इम्पीरियल युनिव्हर्सिटीमध्ये प्रयोगशाळा सहाय्यक म्हणून काम काम करण्यास सुरूवात केली. त्यांनी सुरुवातीला रेशीम कीटकांच्या पोषणावर संशोधन सुरू केले, परंतु १९२२ मध्ये त्यांची जीवनसत्त्व संशोधक उमेटारो सुझुकी यांच्यासह टोकियो इम्पीरियल विद्यापीठात बदली झाली. इथे मिशिओने ग्रीनच्या बायोकेमिस्ट्रीवर संशोधन केले. दोन वर्षांनंतर, त्यांनी आणि त्यांचे सहकारी सितारो मिउरा यांच्या सह ग्रीन टी मध्ये ‘व्हिटॅमिन सी’ असल्याचा शोध लावला, ज्यामुळे उत्तर अमेरिकेत ग्रीन टीची निर्यात वाढली.
नाना पाटेकर यांचे मूळ नाव विश्वनाथ पाटेकर. त्यांचा जन्म १ जानेवारी १९५१ रोजी झाला. नाना पाटेकर यांचे वडील दिनकर पाटेकर हे चित्रकार होते. नाना मुंबईतील जे.जे. स्कूल ऑफ आर्ट’चे विद्यार्थी होते. नाना पाटेकर यांनी ’गमन’ या १९७८ मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटातून चित्रसृष्टीत पदार्पण केले. ही भूमिका इतकी छोटी होती की ते प्रेक्षकांच्या नजरेतही आले नाहीत. पुढे आठ वर्षे नाना चित्रपटात मिळेल ती भूमिका करत राहिले. सुरवातीला जाहिरात एजन्सीमध्ये काम केले. त्याच दरम्यान "हमीदाबाईची कोठी' या नाटकामध्ये भूमिका केली व मोठे यश मिळाले. अगदी सुरवातीला "दमन', "गड जेजुरी जेजुरी' आदी चित्रपटांमध्ये काम केले. रंगभूमीवर आपला ठसा उमटवल्यावर रुपेरी पडद्याकडे वळलेल्या पाटेकर यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीही गाजवली आहे.
नाना पाटेकर यांनी अभिनय केलेला माफीचा साक्षीदार हा मराठी चित्रपट त्यांच्या अभिनयामुळे इतका गाजला की या चित्रपटाची हिन्दी आवृत्तीस ’फांसी का फंदा’ ही सुद्धा खुप गाजली. मोहरे आणि सलाम बॉम्बे या चित्रपटांमध्ये अभिनय केलानंतर त्यांना हिन्दी फिल्म इंडस्ट्रीमध्ये खलनायकाचे काम मिळायला सुरुवात झाली मा.नाना पाटेकर यांनी खलनायकाबरोबर अनेक चित्रपटांमध्ये नायकाची भुमिकासुद्धा केली आहे. अंधायुद्ध, परिंदा, अंगार, तिरंगा, क्रांतिवीर, वजूद, अब-तक-छप्पन, अटॅक ऑफ २६११, गुलाम-ए-मुस्तफा, टॅक्सी नं. ९२११, यशवंत, युगपुरुष, खामोशी, अपहरण, वेलकम, हे त्यांचे काही गाजलेले चित्रपट. नाना पाटेकर यांनी प्रहार चित्रपटात एका सैनिकाची भूमिका साकारली होती. ही भूमिका पडद्यावर वास्तवदर्शी वाटावी म्हणून नाना भारतीय सैनिकांसोबत दिवस राहिले होते. विशेष म्हणजे ते त्यावेळी ते कलाकार म्हणून नाही तर एक सैनिक म्हणून राहिले होते.नाना यांनी सैनिकाच्या भूमिकेकरिता जवळपास तीन महिने पुण्याला जाऊन ट्रेनिंग घेतली होती. जेणेकरून प्रहार मधील कमांडोची भूमिका ते अधिक चांगल्या पद्धतीने साकारू शकतील.
प्रहार या चित्रपटाद्वारे त्यांनी दिग्दर्शनात पदार्पण केले होते. सैनिकांसोबत राहत असताना नाना पाटेकर यांच्या धाडसी व्यक्तिमत्वाने भारावून गेलेल्या सैनिकांनी त्यांना 'कॅप्टन' या पदवीने सन्मानित केले.१९८९ साली ’परिंदा’ मध्ये केलेल्या खलनायकाच्या भुमिकेसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा फिल्म फेअर पारितोषिक मिळाले. तसेच १९९२ साली ’अंगार’ या चित्रपटातील खलनायकाच्या भुमिकेसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट खलनायक चा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. १९९४ साली ’क्रांतिवीर’ चित्रपटातील अभिनयासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. अपहरण या चित्रपटातील त्यांच्या खलनायकाच्या भुमिकेला सर्वोत्कृष्ट खलनायक फिल्मफेअर पुरस्कार आणि स्टार स्क्रीन पुरस्कार मिळाले. बंगाल फिल्म पत्रकारिता संघातर्फे बेस्ट ऍक्टर पुरस्कार अबतक छप्पन या चित्रपटातील भूमिकेकरिता मिळाला. इतरांपर्यंत संवाद फेकण्याची त्यांची शैली. या क्षणी त्यांच्या चेहर्या वर येणारे चढउतार नैसर्गिकच. मनात खोलवर दाबून ठेवलेला राग काढतेवेळी चेहर्याटवर येणारा संताप सहजरीत्या त्यांच्या अभिनयातून आपणास पहावयास मिळते. ही व यासारखी अनेक चित्रपटांतून त्यांनी आपले कलाकौशल्य दाखविले.
हिंदी सिनेसृष्टीतील ट्रॅजिडीकिंग म्हणवणारे दिलीपकुमार, अभिनय सम्राट राजकुमार आणि यँग्री यंग मॅन अभिताभ बच्चन यांचीही अभिनयशैली निराळी, या महान नायकांच्या अभिनयक्षमतेला नानांची अभिनयक्षमताच टक्कर देऊ शकते असं म्हणायला हरकत नाही. ‘खामोशी’ चित्रपटातील नाना पाटेकरांची भूमिका अगदी वेगळीच. जिवंत अभिनय आपणास त्यांच्या चित्रपटातून पहावयास मिळतात. टेलिव्हीजन कार्टून मालिका ‘जंगल बुक’ याकरिता स्वतःचा आवाज दिला. यशवंत, आंच, वजूद या चित्रपटातून त्यांनी गाणी ही गायली. नाना पाटेकर यांचा अभिनय असलेला डॉ. प्रकाश आणि डॉ. मंदाकिनी आमटे यांचे प्रेरणादायी कार्य सांगणारा ‘डॉ. प्रकाश बाबा आमटे-द रिअल हिरो’ हा चित्रपट नक्की बघावा. तसेच गेल्या वर्षी जानेवारीत प्रदर्शित झालेला नाना पाटेकरचा 'नटसम्राट' शिरवाडकर यांचे 'नटसम्राट' या चित्रपटात गणपतराव बेलवलकर यांची भूमिका पेलणारे नाना पाटेकर यांनी ती भूमिका अतुच्य कळसावर नेऊन ठेवली. मा.नानांनी देऊळ चित्रपटात पण सुंदर भूमिका केली आहे. अनेक महत्त्वाच्या पुरस्कारांचे मानकरी ठरलेल्या मा.नाना यांना भारत सरकाने ‘पद्मश्री’ सन्मानाने गौरवले आहे. पत्नी निलकांती व मुलगा मल्हार पाटेकर हा त्यांचा परिवार.
नाना पाटेकर यांनी सप्टेंबर २०१५ मध्ये मकरंद अनासपुरे याच्याबरोबर ‘नाम फाउंडेशन’ या धर्मादाय संस्थेची स्थापना केली. या संस्थेअंतर्गत ते महाराष्ट्रातील दुष्काळी भागातील शेतक-यांना मदत करतात.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट
पल्लवी रेणके या भटक्या-विमुक्तांसाठी पूर्ण वेळ काम करणार्या एक कर्तुत्ववान कार्यकर्त्या आहेत. शिक्षणाने त्या एल एल बी असल्या तरी स्वतःची नाळ मात्र त्या विसरलेल्या नाहीत. शहरात, चांगल्या प्रतिष्ठीत उद्योजकांच्या फिर्यादी लढवून बक्कळ पैसा कमवण्याच्या संध्या उपलब्ध असूनसुध्दा त्या उच्च न्यायालयात किंवा इतर कोर्टांमध्ये जी काही वकिली करतात ती भटक्या-विमुक्तांच्या हितासाठीच. त्या स्वत: ‘गोंधळी’ कुटुंबात जन्मलेल्या आहेत.
विनोदाच्या अचूक टायमिंगला तेवढ्याच सशक्त अभिनयाची जोड असणारा हरहुन्नरी अभिनेते म्हणजे विजय पाटकर. त्यांचा जन्म २९ मे १९६१ रोजी झाला. जाहिरात, मालिका, नाटक, सिनेमा अशा चारही माध्यमात हौसेखातर अभिनेता म्हणून सुरू झालेला त्यांचा प्रवास आज अभिनयाच्या वाटेवरून दिग्दर्शन, निर्मितीची मजल गाठणारा ठरला आहे. ‘एक उनाड दिवस’, ‘चष्मेबहाद्दर’, ‘जावईबापू जिंदाबाद’, ‘सासू नंबरी जावई दस नंबरी’ आणि ‘सगळं करून भागले’, ‘लावू का लाथ’ या चित्रपटांचे दिग्दर्शन विजय पाटकर यांची केले आहे. विजय पाटकर यांनी मराठी व हिंदी मिळून १४२ चित्रपटांतून आणि ३५ नाटकांमधून भूमिका साकारल्या आहेत.
विजय पाटकर यांनी ऑस्करच्या निवडसमितीत सदस्य म्हणून काम केले आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
गुलशन बावरा यांचे मूळ नाव गुलशन कुमार मेहता. त्यांचा जन्म १२ एप्रिल १९३७ रोजी झाला. त्यांचे वडील बांधकाम संबंधित व्यवसाय करीत होते. गुलशनदांचे आयुष्यच मुळी लहानपणापासून संकटांनी घेरलेले होते. भारत-पाकिस्तान फाळणीच्यावेळी त्यांच्या डोळ्यासमोरच आई वडिलांची हत्या झाली. त्यानंतर भेदरलेल्या गुलशन बावरा यांनी त्यांच्या लहान भावासकट एका छावणीत आश्रय घेतला आणि त्यानंतर माघारी परतणाऱ्या जमावाबरोबर ते भारतात आले. तेथून ते जयपूरमधल्या आपल्या बहिणीच्या घरी आले. गीतकार म्हणून त्यांचा प्रवास जयपूरमधूनच सुरू झाला.
नंतर गुलशन बावरा यांनी दिल्लीस येऊन मॅट्रिक आणि दिल्ली विद्यापीठातून पदवी परीक्षा उत्तीर्ण केली. आपल्या महाविद्यालयीन जीवनापासूनच त्यांनी कविता लिहिण्यास सुरुवात केली होती.
पदवी मिळाल्यानंतर त्यांनी रेल्वेत नोकरीसाठी अर्ज केला. रेल्वे भरती परीक्षेत उत्तीर्ण झाल्यावर त्यांना कोटा येथे नियुक्ती देण्यात आली, पण जेव्हा ते कामावर हजार होण्यास कोट्याला पोहचले तर ती जागा अगोदरच भरलेली होती. मग त्यांना मुंबईस पुनर्नियुक्ती देण्यात आली आणि अशा तऱ्हेने ते माया नगरीत दाखल झाले.
१९५९ मध्ये प्रदर्शित झालेल्या चंद्रसेना या चित्रपटाद्वारे त्यांना ब्रेक मिळाला. या चित्रपटातील त्यांनी लिहिलेले मैं क्या जानूँ कहाँ लागे ये सावन मतवाला रे हे गीत लता मंगेशकरांनी गायले. या चित्रपटाला कल्याणजी-आनंदजी या द्वयींचे संगीतदिग्दर्शन लाभले. त्यांनी १९६१ साली नोकरी सोडून दिली.चित्रपटसृष्टीत पदार्पण झाले असले तरी गुलशनदांना गीतकार म्हणून खरी मान्यता मिळाली ती सट्टा बाजार या चित्रपटाद्वारे. चित्रपटसृष्टीत अगदी नवखे असल्याने त्यांची वेषभूषा ही गबाळ्यासारखी होती. त्यामुळे या चित्रपटाचे वितरक असणाऱ्या शांतिभाई पटेल यांनी त्यांचे नामकरण बावरा असे केले. तेव्हापासून ते गुलशन बावरा या नावाने ओळखले जाऊ लागले.
चित्रपट प्रदर्शित झाला त्यावेळी गुलशनदा केवळ वीस वर्षांचे होते. त्यांनी आपल्या कारकिर्दीत केवळ २४० गाणी लिहिली आहेत. पैकी कल्याणजी-आनंदजी ह्या संगीतकारांसाठी गुलशन बावरा यांनी एकूण ६९ गाणी लिहिली तर आर. डी. बर्मन यांच्यासाठी १५० गाणी लिहिली.त्यांना मेरे देश की धरती आणि यारी है इमान मेरा या गाण्यांसाठी दोन वेळा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला. मेरे देश की धरती (उपकार), यारी है इमान मेरा (जंजीर), अगर तुम ना होते (अगर तुम ना होते), वाद कर ले साजना ( हाथ की सफाई), कस्मे वादे निभायेंगे हम (कस्मे वादे) ही काही त्यांची गाजलेली गीते. गुलशन बावरा यांचे ७ ऑगस्ट २००९ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
आत्ता पर्यत तब्बल ६५० चित्रपटांसाठी हजारोंच्या संख्येने गीतांचे लेखन करणारा आणि तरीही अंतरंगात कुठे तरी कातर, हळव्या मनाचा कवी अशीच गीतकार समीर अंजान पाण्डेय ऊर्फ शीतल पांडे'' उर्फ मा.समीर यांची ओळख. त्यांचा जन्म २४ फेब्रुवारी १९५८ रोजी झाला.ज्येष्ठ गीतकार मा.अंजान हे समीर यांचे वडील. इंडस्ट्रीचा बेभरवशीपणा अनुभवला असल्याने मा.अंजान यांनी मा.समीर यांच्या गीतकार होण्याला विरोध केला. पण समीर यांचा पिंड कवी मनाचाच असल्याने घरच्या विरोधाला जुमानता तो प्रकट होत राहिला. बँक अधिकारी म्हणून करिअरची सुरुवात केलेल्या मा.समीर यांनी बॉलिवूडमध्ये करिअर करायचे या उद्देशाने त्यांनी बँकेतील सुरक्षित नोकरी सोडली आणि सिनेक्षेत्रात गीतकार म्हणून पाऊल टाकले. सुरुवातीला त्यांनी ‘बेखबर’, ‘इन्साफ कौन करेगा’, ‘जबाब हम देंगे’, रखवाला’, ‘महासंग्राम’ आदी चित्रपटांसाठी गाणी लिहिली. मात्र या गाण्यांमुळे त्यांना यश व प्रसिद्धी मिळाली नाही. सातत्याने संघर्ष केल्यानंतर अखेर १९९० मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘आशिकी’ चित्रपटातील गाण्यांनी समीर यांना प्रसिद्धी मिळवून दिली. ‘सांसो की जरुरत है जैसे’, ‘मै दुनिया भूला दुंगा’, ‘नजर के सामने जिगर के पास’ ही गाणी प्रचंड लोकप्रिय झाली. चित्रपट रसिक व श्रोत्यांवर आपल्या शब्दांनी गारूड करणाऱ्या समीर यांनी आपल्या कारकिर्दीत शंभरहून अधिक संगीत दिग्दर्शकांसोबत काम केले आहे. अन्नू मलिक, आदेश श्रीवास्तव, इलया राजा, ए.आर. रहेमान, जतीन ललित, दिलीप सेन-समीर सेन, नदीम-श्रवण, राजेश रोशन, शंकर एहसान-लॉय आदी संगीतकारांबरोबर समीर यांची जोडी जमली. ‘आँखे’, ’आशिकी’, ’कभी खुशी कभी गम’, ‘कुछ कुछ होता है’, ‘कुली नंबर वन’, ‘जुर्म’, ‘तेरे नाम’, ‘दबंग-२’, ‘दिल है की मानता नही’, ‘दिवाना’, ‘देवदास’, ‘धडकन’, ‘धूम’, ‘फिजा’, बेटा’, ‘बोल राधा बोल’, ‘राजाबाबू’, ‘राजा हिंदुस्थानी’, ‘रावडी राठोड’, ‘शोला और शबनम’, ‘सडक’, साजन’, ‘सावरियाँ’, ‘हम है राही प्यार के’, ‘हीरो नंबर वन’, अशा अनेक चित्रपटांसाठी मा.समीर यांनी लिहिलेली गाणी लोकप्रिय झाली आहेत. मा.समीर यांनी मराठी आणि भोजपुरी चित्रपटांसाठीही गाणी लिहिली आहेत. मा.समीर यांनी फेब्रुवारी २०१६ पर्यंत ६१७ चित्रपटांसाठी ३ हजार ४०० गाणी लिहिली आहेत. सर्वाधिक गाणी लिहिल्याबद्दल त्यांचे नाव ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ मध्ये नोंदले गेले आहे. या आधीचे रेकॉर्ड गीतकार मा.आनंद बक्षी यांचे होते; त्यांनी ६२४ चित्रपटांसाठी ३ हजार २०० गाणी लिहिली होती. मा.समीर यांना आपल्या समूहाकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
समीर यांची काही गाणी
आए हो मेरी जिंदगी में
आखों ने तुम्हारी
आपके प्यार मे हम
घुंगट की आड से
चाहा है तुझको
जो हाल दिल का
तुम्हे अपना बनाने की कसम खाई है
तेरी उम्मीद तेरा इंतजार
धीरे धीरे से मेरी जिंदगी में आना
धूम मचा ले धूम
दिल ने दिल से क्या कहा
दिल है के मानता नही
देखो जरा देखो
महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील सुप्रसिद्ध संत.
जन्म इ.स. १५३३ मध्ये पैठण येथे.
वडील सूर्याजी(भानुदास), आई रुक्मिणी.
देवगिरी (दौलताबाद) च्या जनार्दनस्वामींना त्यांनी गुरू मानले. त्यांच्याकडूनच एकनाथांनी वेदांत, योग, भक्तियोग यांचे शिक्षण घेतले. बराचसा काळ ध्यान आणि वेदाध्ययनात घालवला. गुरूंबरोबर तीर्थयात्रा केल्यानंतर त्यांनी गृहस्थाश्रम स्वीकारला. गिरीजाबाई हे त्यांच्या पत्नीचे नाव.
जीवन
जातीभेद दूर करण्यासाठी यांनी आयुष्यभर प्रयत्न केले.
१. एकनाथी भागवत: भागवत पुराणातील ११व्या स्कंदावर ओवीरूप मराठी ग्रंथ
२. समाजाच्या जागृतीसाठी अभंग व भारुडे यांची रचना.
३. ज्ञानेश्वरीच्या उपलब्ध प्रतींचे शुद्धीकरण (ज्ञानेश्वरी लिहिल्यानंतर जवळजवळ २५० वर्षांनंतर) ज्ञानेश्वरी च्या शुद्धीकरणाचे काम त्यांनी शके १५०६ मध्ये पूर्ण केले.
४.रुक्मिणीस्वयंवर
५. भावार्थ रामायणाचे लेखन
६. संत ज्ञानेश्वरांचे आळंदी येथील समाधीस्थळाचा शोध.
भाजीपाल्याच्या भडकत्या भावांची, जनुकीय बदल केलेल्या कृषिमालाबाबतच्या वादाची चर्चा होण्याच्या या काळात भाजीपाला-फळे यांबाबत विशेष संशोधन केलेल्या डॉ. तुकाराम मोरे यांची महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती होणे, हा योग महत्त्वपूर्ण मानला जायला हवा.
ज्येष्ठ कृषिशास्त्रज्ञ म्हणून डॉ. मोरे यांनी केवळ देशातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवरही पाडलेल्या लक्षणीय प्रभावाची माहिती असणारे कोणीही या नियुक्तीमुळे कृषी क्षेत्राच्या उज्ज्वल भविष्याचीच अपेक्षा करतील. कोल्हापूरच्या ज्या कृषी महाविद्यालयातून डॉ. मोरे यांनी कृषी विषयाची पदवी घेतली, त्याच महाविद्यालयात ते व्याखाता या पदावर रुजू झाले. अर्थातच त्यांचा अभ्यासाचा मुख्य विषय फळबागा हा होता. त्यानंतरच्या काळात त्यांनी नवी दिल्लीच्या भारतीय कृषी अनुसंधान परिषदेमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले तसेच आपली डॉक्टरेटही संपादन केली. या परिषदेशी त्यांचा नातेसंबंध दीर्घकाळ टिकला. प्रथम शिक्षणासाठी आणि नंतर शिकवण्यासाठी! या संस्थेत त्यांनी तब्बल सतरा वर्षे अध्यापन केले तसेच संशोधनही केले. फळे आणि भाजीपाल्याचे नवे वाण विकसित करण्याच्या त्यांच्या संशोधनाला खूपच चांगले यश मिळाले. त्यांनी विकसित केलेल्या नव्या जातींची संख्या तब्बल एकतीस एवढी आहे, तर त्यातील नऊ जाती या संकरित आहेत. हेमांगी काकडी, प्राची घेवडा या जाती पुढे लोकप्रिय झाल्या, त्याचे सर्व श्रेय हे डॉ. मोरे यांच्याकडेच जाते. देशाच्या चौथ्या पंचवार्षिक योजनेपर्यंत सरकारी पातळीवरील सर्व लक्ष हे अन्नधान्याच्या उपलब्धतेकडे होते. देशातील १९७२च्या भीषण दुष्काळामुळे तर अन्नधान्याचे उत्पादन वाढविण्याकडे सरकारचा भर होता. अर्थात, अन्नधान्याची गरज मान्य करूनही फळफळावळे-भाजीपाला यांच्याकडेही लक्ष देण्याची गरज डॉ. मोरे यांनी व्यक्त केली. दिल्लीसारख्या केंद्रस्थानी ते असल्याने आणि त्यांचा त्या क्षेत्रातील अधिकार मोठा असल्याने त्यांच्या विचारांची दखल केंद्रीय नेत्यांना घ्यावी लागली. चौथ्या योजनेपासून फळे-भाजीपाल्याकडे लक्ष दिले जाऊ लागले होते आणि डॉ. मोरे यांनी केलेल्या प्रयत्नांचे फळ त्यानंतर मिळू लागले. उद्यानविद्या, समुद्रतीरावरील पिके, सेंद्रिय शेती या तीन विषयांसाठी दहाव्या पंचवार्षिक योजनेमध्ये केलेल्या तरतुदीमध्ये वाढ करावी, यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न यशस्वी झाले आणि या विषयांसाठीची तरतूद चार ते पाच पटींनी वाढविण्यात आली. केंद्रीय शुष्क बागवानी संस्थेत काम करतानाही डॉ. मोरे यांनी देशाच्या दीर्घकालीन गरजेकडे लक्ष दिले आणि अनेक मूलगामी परिणाम करणाऱ्या योजना सुरू केल्या. गोधरा हे ठिकाण जातीय विद्वेषातून रेल्वे जाळण्यात आल्याच्या आरोपामुळे देशामध्ये काही वर्षांपूर्वी चर्चेत आले होते. मात्र कृषी क्षेत्रातील जाणकारांमध्ये या ठिकाणाची ओळख शेतीसंशोधनाच्या दृष्टीने मोठी आहे. डाळिंब, चिकू आदी फळांच्या संशोधनाचे मोलाचे काम या ठिकाणी चालते. तेथे जांभळाच्या नव्या जाती विकसित करण्यात आल्या. केंद्रीय संस्थेत काम करताना डॉ. मोरे यांनी महाराष्ट्राला न विसरता आपल्या राज्यालाही लाभ करून दिला. पुण्याजवळील जाधववाडी येथे अंजीर-सीताफळ या फळांच्या संशोधनासाठी केंद्र उभारले. त्या केंद्रासाठी एक कोटी नव्वद लाख रुपये मंजूर करण्यात आले. केवळ आर्थिक मदत मंजूर करून ते थांबले नाहीत, तर सहा संशोधकांचे पथकही तेथे नेमण्यात आले. अंबाजोगाई येथे सीताफळ संशोधन केंद्र उभारण्यात आले, तर अकोल्यामध्ये संत्री संशोधन केंद्र उभारण्यात आले. प्राध्यापक म्हणून डॉ. मोरे यांनी केलेल्या कामगिरीचे मोठेपण काही आकडय़ांवरून दिसून येते. त्यांच्या बत्तीस विद्यार्थ्यांनी पीएच. डी. केली असून तब्बल तेवीस पुस्तके लिहिली आहेत. एकूण ६६६ राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय परिसंवादांत त्यांनी भाग घेतला आहे. अमेरिकेतील विख्यात कार्नेल विद्यापीठात पीएच.डी.नंतरच्या शिक्षणासाठी ते अडीच वर्षे होते. त्याखेरीज इस्त्रायलसारख्या देशातील शेतीचा अभ्यासही त्यांनी केला आहे. शेती क्षेत्रातील नव्या तंत्रज्ञानाबाबत तसेच निर्माण होणाऱ्या वादांबाबत त्यांनी वेळोवेळी ठाम भूमिका घेतली आहे. हरितगृह म्हणजेच ग्रीन हाऊस तंत्रज्ञान नव्याने जेव्हा आले, तेव्हा ते तंत्रज्ञान किती उपयोगी आहे, याबाबत त्यांनी शेतकऱ्यांमध्ये जागृती केली. यासाठी आवश्यक असलेले देशी तंत्रज्ञान त्यांना पुरविले. जनुकीय बदल केलेल्या (जेनेटिकली मोडिफाईड) शेतीमालाबाबतचा वाद चांगलाच रंगला. हा शेतीमाल आरोग्यास हानिकारक असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या. त्याबाबत दोन्ही बाजूंनी मते व्यक्त होऊ लागली. त्यावरून अशा जनुकीय बदल केलेल्या शेतीमालावर बंदी घालावी, अशी मागणी करण्यात आली. मात्र अशा वेळी डॉ. मोरे यांनी ठाम भूमिका घेतली. ‘याबाबत देशपातळीवर संशोधन होऊ द्या, ते संशोधन पूर्ण झाल्यावर मगच त्यावर काय कृती करायची ते ठरवा,’ असे मत ते मांडू लागले. अर्धवट अवस्थेत संशोधन थांबविणे चुकीचे ठरेल, हे त्यांचे मत सर्वानाच मान्य करावे लागले. राहुरी कृषी विद्यापीठाच्या कुलगुरुपदाची सूत्रे हाती आल्यावर त्याचा लाभ ते शेतीला निश्चितच करून देतील, असा विश्वास म्हणूनच सर्वाना वाटतो आहे. फळे-भाजीपाल्याच्या उत्पादनात आपला देश जगात दुसऱ्या क्रमांकावर असला तरी त्यात प्रचंड सुधारणेस वाव आहे. आपल्या देशातील फळे-भाजीपाल्याच्या उत्पादनाचे क्षेत्र अधिक असले तरी एकरी उत्पादन फारच कमी आहे. तसेच निर्यातीतही या उत्पादनांचा वाटा फारसा नाही. आपल्या देशातील अन्नधान्याचे उत्पादन २३ कोटी टनांचे असून भाजीपाल्याचे २२.६ कोटी, तर फळांचे उत्पादन १२.६ कोटी टन एवढे आहे. एवढे उत्पादन असले तरी त्याची योग्य किंमत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही. ती पोहोचण्यासाठीही काहीतरी करणे आवश्यक असून, त्यासाठी या काळात भरीव काहीतरी होणे अपेक्षित आहे.
दत्ता केशव यांनी स्वतंत्रपणे दिग्दर्शित केलेला पहिला चित्रपट ‘अति शहाणा त्याचा.’ (१९६७) त्या वेळेस हा चित्रपट मराठी आणि भोजपुरी भाषेत करण्यात आला होता. पुढे ‘बायांनो नवरे सांभाळा’ हा चित्रपट १९७४-७५ साली प्रदर्शित झाला. चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन दत्ता केशव यांचे होते. ‘पिंजरा’नंतरचा हा मराठी रंगीत चित्रपट होता.
Copyright © 2025 | Marathisrushti