जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
कार्यकर्ता आणि ज्येष्ठ विचारवंत यांचा अपवादात्मक असा संगम वसंत पळशीकर यांच्या व्यक्तिमत्त्वात झाला आहे.
त्यांचा जन्म हैदराबादमधला. महात्मा गांधींच्या चळवळीतील वडिलांच्या संस्कारात ते वाढले. इंटरनंतर शिक्षण सोडून ते सामाजिक कार्याकडे वळले. गांधींजींच्या विचारांचा चिकित्सक स्वीकार त्यांनी केला. आचार्य विनोबा भावे, अण्णासाहेब सहसबुद्धे, साने गुरुजी, रावसाहेब आणि अच्युतराव पटवर्धन, बाबा आमटे यांच्या कार्यात वेळोवेळी सहभागी होत त्यांनी स्वत:ला अधिक समृद्ध केले. भूदान आंदोलन, आनंदवन, ओरिसातील कोरापूर येथे सर्वसेवासंघाच्या कामात त्यांचा सक्रिय वाटा होता.
सन १९५९ मध्ये ते महाराष्ट्रात परतले आणि प्रबोधनाच्या कामाला त्यांनी वाहून घेतले. मात्र हे काम ते प्राध्यापकीय अलिप्तपणे नव्हे, तर व्रत म्हणून पार पाडत आले आहेत. समाज प्रबोधन पत्रिका, नवभारत यांच्यासारख्या वैचारिक नियतकालिकांचे संपादन त्यांनी दीर्घकाळ केले, तसेच कार्यकर्त्यांची शिबिरे, वैचारिक परिषदा-संमेलने यांतही तेवढ्याच कळकळीने मार्गदर्शन केले. देशभरातील परिवर्तनवादी गट, प्रयोगशील संस्था यांना त्यांच्या मांडणीचा लाभ होत आला आहे.
संथ, अनाक्रमक शैली, पण ठाम युक्तिवाद हे त्यांचे वैशिष्ट्य. एकांगीपणा, साचेबद्ध गृहितांवर आधारित भोवतालच्या घटितांचा अर्थ लावण्याची खटपट, सखोल चिकित्सेपेक्षा दुसर्याला निरुत्तर करण्यातील आनंद यापासून त्यांचे लेखन आणि संवाद कायम दूर राहिला. त्यामुळेच त्यांची मांडणी अंतिमत: पटो वा न पटो, त्यातून विचाराला चालना देणारी, आपल्या समजांचा पुनर्विचार करण्यास भाग पाडणारी निरीक्षणे मिळत नाहीत असे कधी होत नाही. राजकारण, समाजकारण, शिक्षण, साहित्य-कला, विज्ञान, संस्कृती, स्त्री-पुरुष संबंध, चिरंजीवी विकास यासारख्या क्षेत्रांत त्यांनी मूलगामी लेखन केले आहे. समग्रतेचे भान हे त्यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य. विचारांशी सुसंगत अशीच त्यांची जीवनशैलीही आहे. त्यामुळे त्यांच्या विचारांना सच्चेपणा लाभला आहे.
समाजाच्या धारणेच्या, उन्नयनाच्या दृष्टीने किती मोलाचा विचार दिला, ही एखाद्याला 'विचारवंत' संबोधायचे की नाही याची एक कसोटी आहे, असे त्यांनी लिहून ठेवले आहे. या कसोटीला खुद्द पळशीकर उतरतात, असाच निवाडा त्यांचे वाचक करतील. गेली काही वर्षे प्रकृतिअस्वास्थ्यामुळे त्यांच्या लेखनात खंड पडला असला, तरी चिंतनात नाही.
महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळाने मराठी भाषा दिनी वसंत पळशीकर यांचा 'जीवन गौरव' पुरस्काराने केलेला सन्मान हा विचारी मराठीजनांसाठी कृतज्ञता सोहळाच होता.
(संदर्भ : महाराष्ट्र टाईम्समधील नोंद हे सदर)
तामिळनाडूमधील अय्यंगार ब्राह्मण कुटुंबात जयललिता जन्माला आल्या. त्यांचा जन्म २४ फेब्रुवारी १९४८ रोजी मैसूर मध्ये झाला. राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी जयललिता नावाजलेल्या अभिनेत्री होत्या. कोमल वल्ली असे त्यांचे खरे नाव.
मात्र, त्यांची आई प्रेमाने त्यांना 'अम्मो' या नावाने हाक मारत. वय अवघं दोन वर्षांचं असताना वडिलांचं निधन झालं आणि जयललितांच्या आईने कर्नाटक सोडून बंगळुरू गाठलं.जयललितांना कधीही चित्रपटात येण्याची इच्छा नव्हती. पण नाइलाजाने त्यांना चित्रपटांत यावे लागले. जयललितांच्या आईची दुसरी बहीण अमबुजावल्ली यांनी त्यांना चित्रपटसृष्टीत आणले. सुरुवातीला त्यांनी लहान-लहान ड्रामा कंपनीत अभिनय केला त्यानंतर त्यांनी चित्रपटांकडे मोर्चा वळवला.
काही वर्षांनंतर जयललिताही मद्रासला गेल्या आणि त्यांनी प्रसिद्ध भारतनाट्यम गुरू वैजूवूर बीरमैया पिल्लई यांच्याकडून नृत्याचे धडे घेतले. मायलापूरच्या एका ऑडिटोरियममध्ये जयललितांचा कार्यक्रम झाला त्यावेळी तत्कालीन सुपरस्टार शिवाजी गणेशन त्यांच्यावर भलतेच इम्प्रेस झाले. त्यांनी जयललिताला चित्रपटात अभिनय करण्याचा सल्ला दिला. त्यांच्या सल्ल्यानुसार १५ वर्षांच्या असताना त्यांनी चित्रपट कारकिर्दीला सुरुवात केली व जयललिता यांनी १७ व्या वर्षी लीड अॅक्ट्रेस म्हणून ‘वेनिरा अडाई’ हा त्यांचा पहिला चित्रपट प्रदर्शित झाला.
पहिल्या चित्रपटानंतर जयललिता यांना अनेक प्रकारच्या ऑफर यायला सुरुवात झाली होती. पण जयललितांना शिक्षण सुरू ठेऊन वकील बनायचे होते. त्यांच्या आईचीही तशीच इच्छा होती. पण घरची आर्थिक घडी पुन्हा बसवण्यासाठी अभिनय करण्याखेरीज दुसरा पर्याय जयललितांकडे नव्हता. अभिनयाच्या कामाच्या मोबदल्यात त्यांना लगेचच पैसे मिळायचे. त्यानंतर चित्रपट हेच जयललिता यांचे करियर बनले. त्यांनी सुमारे ३०० चित्रपटांत अभिनय केला. त्या दक्षिणेतील सुपस्टार बनल्या होत्या. शर्मिला टागोर यांच्याशी त्यांची तुलना होऊ लागली होती. त्या काळातील फेमस ब्रँड लक्सने त्यांना साईन केले. राजकारणात सक्रिय होईपर्यंत जयललिता हे तमीळ चित्रपटसृष्टीत आघाडीचं नाव होतं.
राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी जयललिता तरुणपणात त्या काळच्या लोकप्रिय नायिका होत्या.जयललिता यांनी हिंदी चित्रपट इज्जत मध्येही काम केलं होतं. या चित्रपटात जयललितांसोबत धर्मेंद्र यांनी काम केलं. जयललिता यांनी एमजीआर यांच्यासोबत जवळपास २८ चित्रपटांत काम केलं आहे. जयललिता या शक्तिशाली नेत्या म्हणून ओळखल्या जात. जयललिता या AIADMKचे संस्थापक एमजी रामचंद्रन ऊर्फ एमजीआर यांच्या जवळच्या समजल्या जायच्या. जयललिता यांनी चित्रपटसृष्टीला रामराम ठोकत एमजीआर यांच्यासोबत सक्रिय राजकारणात प्रवेश केला.एम. करुणानिधी यांचा द्रमुक पक्ष फुटल्यानंतर एमजीआर यांनी AIADMK या पक्षाची स्थापना केली. एमजीआर यांनी १९८३ साली जयललिता यांची पक्षाच्या सचिवपदी नियुक्ती केली आणि त्यांना राज्यसभेवर पाठवलं.
एमजीआर आणि जयललिता यांच्यात मतभेदाच्या अनेक बातम्या आल्या. त्यानंतर जयललिता यांनी १९८४ मध्ये AIADMK या पक्षाचं प्रचार अभियानाचं नेतृत्व केलं.एमजीआर यांच्या निधनानंतर जयललिता यांनी मजबूतपणे पक्षाची कमान सांभाळली आणि १९९१ मध्ये निवडणूक जिंकून त्या तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्या. १९९६ च्या विधानसभा निवडणुकीत जयललिता यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. तरीही त्यांचा राजकारणातला दबदबा कायम राहिला. जयललिता यांनी १९९१, १९९६, २००२, २००६, २०११, २०१४ आणि २०१५ ला तामिळनाडू राज्याचं मुख्यमंत्रिपद सांभाळलं होते. जयललिता यांचे ५ डिसेंबर २०१६ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ.इंटरनेट
https://www.youtube.com/watch?v=2yN-YJHQvq8
साठच्या दशकात बॅ. नाथ पै यांच्या विचारांनी गुरूनाथ कुलकर्णी यांना झपाटले होते. त्यामुळे भारावून त्यांनी देवगड तालुक्यात काम सुरू केले. एलएल.बी.च्या शिक्षणासाठी मुंबईत आल्यानंतर साम्यवादी विचारांचे त्यांना आकर्षण वाटले. पण मार्क्सच्या पोथीवादापेक्षा विविध क्षेत्रांतील लोकांत काम करण्याचा त्यांचा पिंड होता.
सोनोपंत दांडेकर महाराष्ट्रातील विचारवंत, शिक्षणतज्ज्ञ, सर परशुरामभाऊ महाविद्यालयात तत्त्वज्ञान-विषयाचे प्राचार्य, संत साहित्याचे अभ्यासक, व वारकरी संप्रदायाचे प्रवचनकार होते.
गिटारवादक, अभिनेता आणि 'किंग ऑफ द रॉक अँड रोल' एल्व्हिस प्रिस्टले यांचा जन्म ८ जानेवारी १९३५ रोजी झाला. कॉलेज शिक्षणासाठी ट्रक चालकाचं काम करण्याऱ्या एल्व्हिस यांनी एका ठिकाणी गायक म्हणून 'ऑडिशन' दिली पण त्यात तो नापास झाला. परीक्षकाने त्याला तुझ्यासाठी ट्रक ड्रायव्हरचीच जागा योग्य आहे असा अनाहूत सल्लाही दिला. यानंतर काही महिन्यातच हा मुलगा आणखी एका ऑडिशनसाठी गेला. यावेळी ही त्याची भट्टी काही जमत नव्हती. दिवसभर प्रयत्न करून थकलेला हा मुलगा शेवटी शेवटी पार कंटाळला पण इतर वादकांनी ब्रेक घेतला असताना आपल्या गिटारवर एकटाच गाऊ लागला. 'आर्थर कृडूप'चं ते मूळ गाणं हा मुलगा पार वेगळ्या ढंगात आणि जलद लयीत गाऊ लागला नि म्युझिक रूम मध्ये जणू विजेचा झटका बसल्यासारखं होऊन एक उत्फुल्ल वातावरण निर्माण झालं. इतर वादकांनी क्षणात याला साथ द्यायला सुरुवात केली आणि हे मूळचं संथ गाणं निराळ्याच आवेशात रेकोर्ड झालं. हे गाणं पहिल्यांदा 'रेडिओ'वर वाजवलं जाताच लोकांनी 'रेडिओ स्टेशन'वर फोन करून गायकाची चौकशी करायला सुरुवात केली. सर्वांना उत्सुकता होती की हा कोण नवा कृष्णवर्णी गायक आलाय. आणि जेव्हा त्यांना कळलं की नवीन गायक गौरवर्णी आहे पण याचं संगीत नि गायन मात्र 'ब्लूज-गोस्पेल' ढंगातलं आहे, त्यांचा विश्वासच बसेना.
रेडिओवर या मुलाच्या मुलाखती प्रसारित होऊ लागल्या आणि त्यात मुख्यत्वाने त्याच्या शाळा आणि कॉलेजबद्दलचे प्रश्न विचारले जाऊ लागले की ज्यातून त्याचं गौरवर्णत्व सिद्ध व्हावं. गौर आणि कृष्ण दोन्ही वर्णीयांमध्ये हा मुलगा प्रचंड लोकप्रिय झाला. त्याच्या सांगीतिक आणि गायकी ढंगालाच पुढे 'रॉक एन रोल' अशी संज्ञा मिळाली. हा मुलगा होता 'द किंग' या नावाने नंतर ओळखला गेलेला 'एल्व्हिस प्रेस्ले' आणि ते गाणं होतं "That's All Right, Mama".
१९६० च्या दशकात अमेरिकेने व्हिएतनाम मध्ये पुकारलेल्या युद्धावर जाण्यासाठी 'एल्व्हीस'चे नावही लष्करात दाखल होण्यासाठी पुढे आले. यावेळी तो चांगलाच लोकप्रिय होता. आपल्या लोकप्रियतेच्या आश्रयाने तो स्वत:ला अपवाद म्हणून लष्कराच्या सेवेतून स्वत:ची सुटका करून घेऊ शकला असता पण त्याऐवजी त्याने सैन्यात दाखल होणे मान्य केले. सैन्यात २ वर्ष सेवा करून तो परत अमेरिकेत दाखल झाला. या २ वर्षांच्या काळातच फ्रायबर्ग, जर्मनी इथे त्याची भेट 'प्रिसिला बिलिव'शी झाली आणि तिच्याशी त्याने ७ वर्षांनंतर लग्न केलं. एल्व्हिस प्रिस्लेची मुलगी लिसा मेरी हिच्याशी मायकेल जॅक्सननं मे १९९४ मध्ये विवाह केला. 'एल्व्हिस' यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक गाणी या 'रॉक एण्ड रोल' संगीतात दिली किंबहुना त्याच्यासाठीच गीतकारांनी लिहिलेली गाणी आता खास त्याचीच म्हणून गणली जातात. यातलं संगीत, गायन आणि सादरीकरण हे 'एल्व्हिस' स्टाईलचंच आहे.
मूळ 'जॉर्ज वाईस', 'ह्युगो पेरेत्ती' आणि 'लुइगी क्रियेटर' यांनी लिहिलेलं गाणं १९६१ साली 'एल्विस'ने गायलं आणि काही दिवसातच लोकप्रियतेच्या कळसाला पोहोचलं. या गाण्यातला 'एल्विस'चा आवाज, त्याची गायकी, हे गाणं म्हणताना त्याचा स्टेज वरचा वावर, त्याचे झ्याक प्याक कपडे, त्याचं ते पार डोळ्यात बघण सारं सारं जबरदस्त होतं. पुढे अनेक वर्ष तो आपल्या कार्यक्रमाची सांगता या गाण्याने करायचा. 'एल्विस' यांचे एक गाणं आहे, "Jailhouse Rock".
'जेरी लिबर' आणि 'माईक स्टोलर' यांनी लिहिलेलं हे परफेक्ट 'रॉक एन रोल' गाणं 'एल्विस'ने झकास गायलेलं आहेच पण याच नावाच्या त्याच्या चित्रपटात त्याने हे त्याच्या स्वत:च्या नृत्यशैलीत सादरही केलेलं आहे. 'लष्करी सेवेनंतर 'एल्व्हिस' यांनी आपलं करीअर पुन्हा सुरु केलं. संगीत, काव्य याबरोबरच त्यांनी अनेक सिनेमांमध्येही कामं केली. व्हिएतनाम युद्धापूर्वीपेक्षाही नंतर त्यांची लोकप्रियता कैक पटीने वाढली. १९६० च्या दशकाच्या उत्तरार्धात आणि ७० च्या दशकाच्या उत्तरार्धात अनेकदा सलग दीड-दोन वर्षांचे संगीत दौरे त्याने केले. याच दरम्यान सिनेमातील कामंही होतीच. मा.एल्व्हिस प्रिस्टले यांचे १६ ऑगस्ट १९७७ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट
'द किंग' एल्व्हिस प्रिस्लेची काही गाणी.
http://www.youtube.com/watch?v=zRu3tw9fYxE&feature=related
http://www.youtube.com/watch?v=-rS55BtfNtI&feature=related
http://www.youtube.com/watch?v=e1s-E1WWipc
दांडेकर, दिलीप
मराठी उद्यमशीलता वाढविण्या-जोपासणाऱ्या महाराष्ट्रातील मोजक्या कुटुंबांमध्ये दांडेकरांचे नाव प्रामुख्याने घ्यावे लागेल. स्वदेशी चळवळीतून प्रेरणा घेऊन काकासाहेब दांडेकरांनी गिरगावातील एका छोटय़ा खोलीत ‘उंट’ छाप शाई तयार करण्याच्या व्याप सुरू केला. १९३० सालचा काळ. महिन्याकाठी ४५ ते ५० रुपये मिळत. आज त्यांनी लावलेले हे रोपटे ४०० कोटी रुपयांची उलाढाल करणाऱ्या आणि बहुराष्ट्रीय पसारा असलेल्या उद्योगवृक्षाच्या रूपात फोफावले आहे.शालोपयोगी स्टेशनरी आणि रंगसाहित्याची विविध २००० उत्पादने आणि देशभरात ५० हजाराहून अधिक विक्रेत्यांचे जाळे असलेल्या आजच्या ‘कॅम्लिन’चा भार अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक या नात्याने दिलीप दांडेकर सांभाळत आहेत.
औद्योगिक संस्कृतीची उपासना करताना गुणवत्ता, प्रामाणिकता, पारदर्शकता, नम्रता अशा सुसंस्कृतपणाची जपणूक करणे, असा मेळ आजच्या उद्योगसंस्कृतीत विरळाच आढळतो. उद्योगजगताची शिखर संघटना इंडियन मर्चंट्स चेंबरच्या अध्यक्षपदी त्यांची झालेली निवड म्हणजे त्यांच्या उद्योजकीय कर्तबगारीबरोबरीच त्यांच्या संयमी व शांत नेतृत्वगुणाची घेतली गेलेली स्वाभाविक दखल होय. घरचा उद्योग असतानाही दिलीप दांडेकर यांनी कॅम्लिनमध्ये मॅनेजमेंट ट्रेनी म्हणून नोकरी करीत आपली कारकीर्द सुरू केली. त्यांनाही इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे महिन्याकाठी त्याच श्रेणीचे वेतन मिळत असे. कॅम्लिनच्या सर्व विभागांमध्ये अशा तऱ्हेने रीतसर प्रशिक्षण पूर्ण करून, कामाचे बारकावे शिकून मगच अधिकारपदाची सूत्रे हाती घेतली, असे ते अभिमानाने सांगतात. दिलीप दांडेकर यांनी कंपनीचा मार्केटिंग विभाग सांभाळायला घेतला आणि कॅम्लिन या ब्रॅण्डला खऱ्या अर्थाने बहर आला. नवनवीन उत्पादने, तीही बडय़ा बहुराष्ट्रीयकंपन्यांशी स्पर्धा करीत बाजारात आणणे आणि विविध उपक्रमांद्वारे ग्राहकांच्या नजरेसमोर सतत भिरभिरत राहणे ही कॅम्लिनच्या यशाची गुरुकिल्ली त्यांच्याच कल्पकतेतून पुढे आली. बालचित्रकारांपासून, व्यावसायिक चित्रकारांपर्यंत सर्वांपर्यंत पोहचता येईल अशी कमावलेली सर्वसमावेशक ब्रॅण्ड इक्विटी मग कार्यशाळा, स्पर्धा, प्रदर्शने या माध्यमातून उत्तरोत्तर वृद्धिंगत होत गेली. आर्थिक उदारीकरण आणि जागतिकीकरणाच्या झंझावातात स्पर्धेचे आव्हान ज्यांना पेलता आले ते टिकून राहिले. अन्यथा अनेक नावाजलेले उद्योग आणि ब्रॅण्ड्स पाल्यापाचोळ्यासारखे उडून गेले. अनेकांनी बहुराष्ट्रीय कंपन्यांशी हातमिळवणी केली. स्पर्धेत मारले जाण्यापेक्षा मोठय़ा प्रवाहात सामील होऊन जिवंत राहण्याचा हा पर्याय कॅम्लिनपुढेही आला होता. पण खुल्या आर्थिक धोरणाने निर्माण केलेल्या स्पर्धेला आव्हान नव्हे तर संधी मानून दिलीप दांडेकर यांनी वाटचाल सुरू ठेवली. कॅम्लिनशी स्पर्धेत उतरलेल्या बडय़ा बहुराष्ट्रीय कंपन्यांना त्यांच्याच देशात जाऊन आव्हान निर्माण करणारा आक्रमक बाणाही त्यांनी दाखविला. आज कॅम्लिनच्या उत्पादनांची निर्यात युरोप-अमेरिकेत सातत्याने वाढत आहे, तर देशांतर्गत बाजारातही किंमत व गुणवत्तेत ती बिनतोड ठरली आहेत. चीन आणि कोरियातून २० टक्के कमी खर्चात उत्पादने घेऊन बाजारपेठेत टिकाव धरून राहण्याची किमया खुलीकरणाच्या धोरणामुळेच शक्य झाली, असे तेच सांगतात. पिढीजात उद्योगाची धुरा वाहत असताना, काळानुरूप बदल वेळच्या वेळी स्वीकारणे किती आवश्यक आहे, याचा वस्तुपाठच त्यांनी दिला आहे. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, फिक्की, इंडियन र्मचट्स चेंबर आणि अन्य अनेक उद्योगसंघटनांच्या व्यासपीठांवरून काम करताना, त्यांनी नवउद्योजकांना प्रेरक असा उद्योगशीलतेचा कानमंत्र दिला आहे. वाळवंटातही अथक प्रवास करणे हा उंटाचा गुणधर्म, आपल्या उत्पादनांसाठी उंट छाप निवडताना काकासाहेबांनी डोळ्यासमोर ठेवला होता. भरपूर मेहनत, सचोटीचा व्यवहार आणि प्रतिकूल परिस्थितीतही न डगमगण्याची निश्चयी वृत्ती या पायावर दांडेकर कुटुंबीयांच्या प्रत्येक पिढीने हा व्यवसाय वाढवीत नेला. भविष्यातही कॅम्लिनच्या विस्ताराच्या योजना तयार आहेत, दांडेकर कुटुंबाची तिसरी पिढी राजीव, दीपक, श्रीराम व आशीष त्या साकारायला समर्थ आहे.
मल्लिका साराभाई या नर्तकी मृणालिनी साराभाई व वैज्ञानिक विक्रम साराभाई यांची कन्या. त्यांचा जन्म ९ मे १९५४ रोजी झाला. समांतर सिनेमा पासून आपल्या करीयरची त्यांनी सुरवात केली. मल्लिका साराभाई यांनी पीटर ब्रुक यांचे नाटक महाभारत मध्ये द्रोपदी ची भूमिका केली होती. याच नाटकावर नंतर चित्रपट बनवला गेला होता. मल्लिका साराभाई यांनी भारतात व परदेशात अनेक कार्यक्रमात भाग घेतला आहे. मल्लिका साराभाई यांनी हर्ष मन्दर यांच्या पुस्तकावर आधारित अनसुनी या नाटकाची पटकथा लिहिली आहे. मल्लिका साराभाई या दर्पणा अकादमी ऑफ आर्टस् (अहमदाबाद) च्या निदेशक आहेत.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
“शास्त्रीय मराठी व्याकरण” हा सुमारे एक हजार पृष्ठांचा ग्रंथ मोरो केशव दामले यांनी लिहिला. त्यांचे व्याकरण पुढील मराठी व्याकरणकारांस आधारभूत ठरले. त्यांच्या ग्रंथात असंख्य उदाहरणे, असंख्य शब्द गटवारीने उपलब्ध करून दिले आहेत. हे व्याकरणाच्या क्षेत्रातील मोठे काम म्हटले गेले.
प्रवीण आम्रे हे १९९१ ते १९९४ भारतीय क्रिकेट संघाकडून खेळले. त्यांचा जन्म १४ ऑगस्ट १९६८ रोजी झाला. सचिन तेंडुलकर, विनोद कांबळीप्रमाणेच रमाकांत आचरेकरांचा शिष्य असलेल्या अमरेंची कारकीर्द फार मोठी ठरली नाही. ११ कसोटीत एका शतकासह ४२५ धावा त्यांनी केल्या. ३७ वनडे खेळताना मात्र प्रवीण अमरे यांना शतक ठोकता आले नाही.
आय.पी.एल.मध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाचे प्रशिक्षक म्हणून प्रवीण अमरे यांनी काम केले आहे. त्यांच्या पुढील मोसमासाठी सहाय्यक प्रशिक्षक म्हणून काम केले आहे. तसेच त्यांनी निवड समितीचे सदस्य म्हणून काम केले आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ.इंटरनेट
श्रीपाद अमृत डांगे यांच्या बद्दल अशी गोष्ट सांगितली जाते की डांगे यांच्या नेतृत्त्वातून आणखी दोन गोष्टी जन्माला आल्या. महाराष्ट्र राज्याची निमिर्ती झाली आणि फ्लोरा फाउंटनला हुतात्मा स्मारक निर्माण झाले. त्यात शेतकरी आणि कामगारांच्या एकजुटीची प्रतिमा आली. महाराष्ट्र राज्यनिमिर्तीसाठी दिल्लीतील विद्वानांनी १ एप्रिल ही तारीख ठरवली होती. यशवंतराव चव्हाणांनी हा बेत कॉ.डांगे यांना सांगितला तेव्हा ते म्हणाले, ‘अहो, शहाण्यांना मूर्ख बनवण्याचा जागतिक दिन तो, आणि त्या दिवशी तुम्ही नव्या राज्याची गुढी उभारणार? ते जमायचं नाही. हा लढा मुख्यत्वे मुंबईच्या कामगार वर्गात लढलेला आहे. तेव्हा मे दिन हाच महाराष्ट्र दिन होईल. नेहरूंना समजावण्याची जबाबदारी माझी.’ कॉ.डांगे नेहरूंना दिल्लीत जाऊन भेटले. ‘आम्हाला एप्रिल फूल करताय का?’ असा प्रश्न त्यांनी केला. नेहरूही हसले आणि त्यांनी १ मे ही तारीख मान्य केली. आणि १ मे महाराष्ट्र दिन झाला.
Copyright © 2025 | Marathisrushti