(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

  • अभय अष्टेकर

    सापेक्षतावाद आणि पुंजवादाला एकत्र आणणार्‍या पुंजकीय गुरुत्वाकर्षणाच्या क्षेत्रात अभय अष्टेकरांनी केलेली कामगिरी लक्षणीय ठरली आहे.

  • अभिनेत्री नंदिता पाटकर

    नंदिता पाटकर एक मराठी चित्रपट आणि नाट्य अभिनेत्री आहेत. नंदिता यांनी मुंबईतील रुपारेल कॉलेजमधून पदवी पूर्ण केली. त्यांनी सुरुवातीला आरजे आणि व्हॉईस आर्टिस्ट म्हणून काम केले आहे.नंदिता या झी मराठी वरील माझे पति सौभाग्यवती या मराठी मालिकेत त्यांनी अभिनय केला होता.

  • मराठी कादंबरीकार आणि रहस्यकथा लेखक सुहास शिरवळकर

    सुहास शिरवळकर उर्फ सुशि हे एक जबरदस्त लोकप्रिय लेखक होते. यांचा जन्म १५ नोव्हेंबर १९४८ रोजी पुणे येथे झाला. सुहास शिरवळकर यांचे वाणिज्य शाखेतील पदवीपर्यंतचे शिक्षणही पुण्यातच झाले. वयाच्या २४ व्या वर्षी त्यांनी लिहिलेल्या दुनियादारी या पहिल्याच कादंबरीला भरपूर लोकप्रियता लाभली आणि लेखक म्हणून त्यांचा प्रवास सुरू झाला. त्यांच्याच शब्दांत सांगायचं तर 'पुण्यापासून गोव्यापर्यंत आणि पुण्यापासून नागपूरपर्यंत मी चालत गेलो तर प्रत्येक गावात मला माझा चाहता भेटेल. मला हॉटेलात जेवावं लागणार नाही.

    वयाच्या २४ व्या वर्षी त्यांनी लिहिलेल्या ' दुनियादारी ' या पहिल्याच कादंबरीला भरपूर लोकप्रियता लाभली आणि लेखक म्हणून त्यांचा प्रवास सुरू झाला. त्यांचे लेखन शैली प्रसन्न, खेळकर होती. छोट्या छोट्या सुटसुटीत वाक्यरचना, बोली भाषेचा भरपूर वापर आणि संवादात्मक शैलीमुळं त्याचं लेखन कधीही कंटाळवाणं होत नसे. पण समीक्षक आपल्याला महत्त्व देत नाहीत, इतिहासात आपला उल्लेख हेटाळणीने केला जातो, असं त्यांना वाटत राहायचं. १९७४ साली त्यांनी रहस्यकथा लेखनास सुरुवात केली. तेव्हापासून १९७९ सालापर्यंत त्यांनी २५० छोट्या मोठ्या रहस्यथा लिहिल्या.

    १९८० सालापासून ते 'सामजिक कादंबरी' साहित्यप्रकाराकडे वळले. शिरवळकरांनी वाचकप्रिय लेखनप्रकार जाणीवपूर्वक निवडला. परंतु 'लोकांना आवडेल ते' अश्या मर्यादित अर्थाने त्याकडे न बघता, त्यांनी आपले साहित्य सवंग दर्जाचे होऊ न देता लेखन केले. रहस्यकथा, १७५ कादंबऱ्यांव्यतिरिक्त त्यांनी इतर कथांचेही लेखन केले. या कथा पुढे कथासंग्रहाच्या रूपात प्रकशित करण्यात आल्या. सुहास शिरवळकरांनी काही बालकथा देखील लिहिल्या. त्यांच्या निधनानंतर त्यांनी लिहलेल्या कवितांचा काव्यसंग्रहसुद्धा प्रकाशित झाला आहे. त्यांच्या 'देवकी' या कथेवर आधारलेला मराठी चित्रपट बनला, तर 'दुनियादारी', 'कोवळीक' या कादंबऱ्यांवर दूरचित्रवाणी मालिकाही प्रसिद्ध झाल्या होत्या. नंतर दुनियादारी ' या कादंबरी वर चित्रपट आला व त्याला तुफान लोकप्रियता लाभली. सुहास शिरवळकर यांचे ११ जुलै, २००३ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

  • बॉलिवूड चित्रपट निर्माते प्रकाश झा

    बॉलिवूडमध्ये दिग्गज तारकांना घेऊन चित्रपट बनविणाऱ्या दिग्दर्शकांची कमी नाही. दिग्दर्शक प्रकाश झा यांनी शबाना आजमी आणि दीप्ती नवल पासून या काळातील काजोल, माधुरी दीक्षित, करिना कपूर, बिपाशा बसू, दीपिका पदुकोण, कॅटरिना कैफ आणि प्रियंका चोपडा अश सर्व स्टार नायिकांसोबत चित्रपट बनविले आहेत.

    दिग्दर्शक म्हणून प्रकाश झा यांचा पहिला चित्रपट ‘दामुल’ होता. यात दीप्ती नवलने मुख्य भूमिका साकारली होती. शबाना आजमी यांनी त्यांच्या ‘मृत्युदंड’ मध्ये काम केले होते. या चित्रपटात माधुरी दीक्षित मुख्य भूमिकेत दिसली होती. या चित्रपटाला माधुरीच्या सर्वश्रेष्ठ चित्रपटाच्या यादीत ठेवले जाते.

    कमर्शियल चित्रपटाच्या दिग्गज नायिकांसोबत काम करणारे प्रकाश झा यांनी आपल्या चित्रपटांपासून आर्ट फिल्म मेकरची प्रतिमा तोडण्यात यश मिळविले. ‘दामुल’मुळे त्यांची तशी ओळख बनली होती. या प्रतिमेला तोडण्यात प्रकाश झा यांना अजय देवगण सोबतच्या ‘दिल क्या करे’ने मोठे योगदान दिले. चित्रपट बॉक्स ऑफीस वर जास्त चालला नव्हता, मात्र प्रकाश झा यांचे नाते या चित्रपटामुळे कमर्शियल चित्रपटासोबत जोडले गेले. अजय देवगण सोबत त्यांनी या चित्रपटानंतर ‘गंगाजल’ आणि ‘अपहरण’मध्येही काम केले. अपहरणमध्ये बिपाशा बसू होती. जिने बिहारी मुलीचा रोल केला होता. बिपाशा नंतर ‘राजनीति’ मध्ये प्रकाश झा ने कॅटरिना कैफ, ‘आरक्षण’ मध्ये दीपिका पदुकोण आणि ‘सत्याग्रह’मध्ये करिना कपूर सोबत काम केले.

    प्रकाश झा यांचे गेल्या काही वर्षांतले चित्रपट म्हणजे भारतीय समाजाचे जळजळीत, धगधगीत वास्तवाचे चित्रण करणारे चित्रपट आहेत. अनेक चित्रपटात एकसंध पटकथा, कथानकातील नाटय़ टिकवून प्रेक्षकाला खिळवून ठेवण्यात ते यशस्वी झाले आहेत.

    प्रकाश झा यांचे चित्रपट समकालीन प्रश्नांवर असतात. "दामुल', "गंगाजल', "अपहरण', "राजनीती' या चित्रपटांनी झा यांचे हिंदी चित्रपट क्षेत्रातील स्थान पक्के केलेले आहे. अमिताभ बच्चन यांच्यापासून अजय देवगण, अर्जुन रामपाल यांच्यासारख्या कलाकारांकडून आपल्याला हवा तो विषय काढून घेण्याची ताकद असलेल्या प्रकाश झा यांच्यासारख्या मुरब्बी दिग्दर्शकाला अभिनय करणे अवघड नाही. प्रकाश झा यांनी आपल्याच ‘आरक्षण’ या चित्रपटातही छोटीशी भूमिका केली होती.

    प्रकाश झा यांचा आणि अलंक्रिता श्रीवास्तव यांनी दिग्दर्शित केलेला "लिपस्टिक अंडर माय बुरखा' हा हिंदी चित्रपट सेन्सॉर बोर्डाकडे परवानगीसाठी पाठविण्यात आला होता. मात्र, चित्रपटात काही अश्लिल संवाद आणि दृश्ये असून तो समाजातील काही विशिष्ट घटकांसाठी संवेदनशील असल्याचे म्हणत कालच बोर्डाने चित्रपटाला परवानगी नाकारली आहे.

    प्रकाश झा यांचा जन्म २७ फेब्रुवारी १९५२ रोजी झाला. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा...

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • अभिनेता सुशांत शेलार

    अभिनेता सुशांत शेलार यांचा जन्म १७ नोव्हेंबर १९८० रोजी मुंबई येथे झाला. सुशांत शेलार हे मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध नाव असून ते थिएटर, टीव्ही पण जोडलेले आहेत. मुंबईतून त्यांनी शालेय शिक्षण व महाविद्यालय केले. त्यांनी बालपणी अनेक नाटके व सांस्कृतिक उपक्रमांमध्ये सहभाग घेतला होता १९९१ साली बाल कलाकार म्हणून काम करणारी त्यांची कारकीर्द सुरू झाली.

    मयूरपंख मध्ये बाल कलाकार म्हणून काम केले होते. महाविद्यालयीन दिवसांपासून ते आपल्या सांस्कृतिक कार्यात सक्रिय होते आणि आपल्या कारकीर्दीसाठी अनेक गोष्टी करीत आहेत. त्यांच्या काही नाटकांमध्ये मी नथुराम गोडसे बोलतोय, अयत्यावर कोयता, बहुरुपी पु. ल आणि आधी बसू मग बोलू यांचा समावेश आहे. सुशांत शेलार यांनी मराठी चित्रपटसृष्टीला अनेक चित्रपट दिले आहेत. त्याचा दुनियादारी हा चित्रपट प्रचंड हीट झाला होता. या चित्रपटातील त्याची प्रीतमची भूमिका प्रेक्षकांना खूपच भावली होती. त्याचबरोबर त्यांनी क्लासमेट, तू ही रे, धूम टू धमाल, मॅटर, ब्लाइड गेम, संघर्ष अशा अनेक चित्रपटात काम केले आहे.

    सुशांत शेलार यांनी रूपेरी पडदयाबरोबरच आपल्या अभिनयाची चुणूक छोटया पडदयावरदेखील दाखविली आहे. त्यांनी या गोजिरवाण्या घरात, मयूरपंख, किमयागार, घे भरारी, काटा रूते कोणाला, इंद्रधनुष्य अशा अनेक मालिकादेखील केल्या आहेत. सुशांत शेलार हे एक चांगला कवी आहेत आणि त्यांनी कविता व इतर लेखन केले आहे. ते आपल्या वैयक्तिक जीवनात श्री स्वामी समर्थांचे भक्त आहेत. त्यांची समर्थ व्हिजन नावाची संस्था आहे.

    सुशांत शेलार यांची ‘कबड्डी’ खेळाशी लहानपणापासून एक नाळ जोडली गेली आहे. या खेळाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने त्यांने या ‘कबड्डी’ सामन्यांचे आयोजन केले आहे. सुशांत शेलार यांचे वडील अरुण दत्तात्रय शेलार हे उत्तम कबड्डीपटू होते. त्यांच्या स्मरणार्थ ‘शेलार मामा फाऊंडेशन’च्या वतीने दर वर्षी सुशांत शेलार हे सामने भरवित असतात. सुशांत शेलार यांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे आता सुशांतच्या चाहत्यांना तो एक नवीन जबाबदारी पार पाडताना दिसणार आहे. सुशांत शेलार हे शिवसेनेच्या चित्रपट सेना कार्याध्यक्ष आहेत.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

  • इतिहास संशोधक डॉ.पांडुरंग पिसुर्लेकर

    पिसुर्लेकरांनी या अभिलेखागाराखालील दप्तरखाना सुधारला; त्यातील कागदपत्रे खंडवार लावली आणि त्यासंबंधी सूची व दोन मार्गदर्शिका प्रसिध्द केल्या. गोवा स्वतंत्र झाल्यानंतर मुंबई विद्यापीठाने पणजी येथे इतिहास संशोधनकेंद्र स्थापन केले. त्याचे संचालकपद पिसुर्लेकरांकडे होते. गोमांतकातील पहिले हिंदू इतिहास संशोधक असणारे डॉ. पिसुर्लेकर पोर्तुगिजांच्या ताब्यात असलेली सर्व ऐतिहासिक कागदपत्रे भारतीय पुराभिलेखागारात आणण्यासाठी आयुष्यभर झटले. पोर्तुगीज दफ्तरातील साडेचारशे वर्षातील सर्व कागदपत्रे अभ्यासून त्यांनी ‘पोर्तुगीज मराठे संबंध’ हा अप्रतिम साधनग्रंथ लिहिला.

  • जेष्ठ हार्मोनियमवादक पं.तुळशीदास बोरकर

    बोरकर यांचा जन्म १८ नोव्हेंबर १९३४ रोजी गोव्यातील बोरी येथे झाला. पं.तुळशीदास बोरकर उर्फ बोरकर गुरुजी संवादिनी वादन क्षेत्रातील ऋषितुल्य नाव. आज घडीला संवादिनी अर्थात पेटीवर प्रभुत्व असणारी जी काही मान्यवर मंडळी आहेत त्यातील हे अग्रगण्य नाव होते. प्रतिकूल परिस्थितीतून काम करत गुरुजींनी स्वताला घडवलं होते. त्यामागे त्यांचा रियाज तर होताच पण संवादिनी प्रतीचं प्रेम अधिक होते. पं.तुळशीदास बोरकर यांच्या घरापासून जवळच नवदुर्गेचं देऊळ होतं. त्या वेळी ते बरेचदा त्या देवळांमध्ये जाऊन बसत असत. भजन, कीर्तनावर तिथले हार्मोनियमवादक सुंदर साथ करत असत. पण त्या सुरांनी त्यांना आकर्षून घेतलं होतं. काही काळानंतर त्यांचे वडील अचानक वारल्याने गोव्याहून पुण्याला यावे लागले.

    पं.तुळशीदास बोरकर यांची मोठी बहीण, उत्तम कलागुण असलेली अभिनेत्री होती. त्यांना छोटा गंधर्वानी ‘कलाविकास’ मध्ये बोलावून घेतलं. ते त्यांच्या बरोबर तालमींना जात असत. कंपनीचे ऑर्गनवादक विष्णुपंत वष्ट यांनी विचारलं, ‘‘काय रे तुला हार्मोनियम शिकायची आहे का?’’ आणि त्यांनीच हार्मोनियम शिकवायला सुरुवात केली. त्यानंतर पुढच्याच आठवडय़ात त्यांचा नागपूरला दौरा होता. तिथे जबरदस्त थंडी होती. एक दिवस वष्ट गुरुजींनी पहाटे चार वाजता त्यांना उठवलं आणि म्हणाले, ‘‘चल शिकायला बस.’’ त्यांचीच लहानशी पेटी होती. त्यावर सात शुद्ध स्वर कसे वाजवायचे ते शिकवलं. तेव्हा सलग चार तास त्यांनी रियाज केला. मग नऊ वाजता म्हणाले, ‘‘ऊठ. चहा वगैरे घेऊन दहा वाजता परत ये.’’ त्यानंतर पुन्हा चार-पाच तास शिकायला बसले. म्हणजे त्या पहिल्याच दिवशी त्यांनी १२ ते १४ तास रियाज करून घेतला.

    काही वर्षानी ‘कलाविकास’ बंद पडली. या कंपनीचे पाच-सहा मालक होते. छोटा गंधर्व, केशवराव कुंटे, शंकर आपटे, हंसराज कोरडे, नागेश जोशी, दिगंबर भुमकर. त्यापैकी दोन-तीन जणांनी मिळून १९४९-५० दरम्यान ‘श्री.कलाविकास’ ही नवीन संस्था सुरू केली. त्यात छोटा गंधर्व आणि नागेश जोशी नव्हते. ‘देवमाणूस’ हे संगीत नाटक करायचं होतं. कुंटे यांनी या कंपनीसाठी गानू मास्तरांना ऑर्गनवादक म्हणून घेतलं.

    पंधरा दिवस झाले तरी त्यांच्या हातात ती गाणी बसेनात. मग कुंटे म्हणाले, ‘‘तुळशीदास तू ही गाणी ऐकलीयेस. बघ जरा, बस साथीला.’’ पं.तुळशीदास बोरकर म्हणाले ‘‘मला दोन्ही हातांनी वाजवता येत नाही.’’ ते म्हणाले, ‘‘चालेल, एका हाताने वाजव.’’ ते एका हाताने ती गाणी वाजवली. त्याबरोबर त्यांनी ओळखलं की हा मुलगा हे काम निभावू शकेल. मग त्यांनी ऑर्गनची बाजू पं.तुळशीदास बोरकर यांच्या वर ढकलली. या नाटकाच्या साथीसाठी २५ रुपये महिना पगार मिळाला होता. तेव्हापासून ते जो ऑर्गन वाजवू लागले तो कायमचा. त्यानंतर साधारण १९५२ साली छोटा गंधर्वानी पं.तुळशीदास बोरकर gov 'यांच्या कडून ‘संगीत सौभद्र’ची १२-१३ गाणी बसवून घेतली. गोपीनाथ सावकारांची संस्था होती. मग दर आठवडय़ाला ते पुण्याहून मुंबईला यायचे.

    पुण्यात छोटा गंधर्वाचं आणि पं.तुळशीदास बोरकर यांचं घर जवळच होतं. ते दर रविवारी त्यांच्याकडे तालमीसाठी जाऊन बसत असे. त्यांचा रियाज चालू असायचा. छोटा गंधर्वानी त्यांना रागदारी संगीत शिकवले. पण छोटा गंधर्व नाटकात गायलेले असल्यामुळे शास्त्रीय संगीत जगतात त्यांचं फारसं नाव नव्हतं. वास्तविक पाहता छोटा गंधर्व हा अतिशय हुशार माणूस. ते शास्त्रीय संगीत शिकले होते. पण शास्त्रीय संगीत गाणारी मंडळी संगीत नाटकातल्या गायक-नटांना दुय्यम मानत असत. त्यामुळे छोटा गंधर्वाचं शास्त्रीय संगीत गायक म्हणून फारसं नाव झालं नाही. त्या दरम्यानच त्यांना ‘मंदारमाला’ नाटकात ऑर्गन वाजवायची संधी मिळाली. चाळीस रुपये बिदागी मिळत होती. तिथे पं. राम मराठेंचा त्यांना सहवास लाभला. शास्त्रीय संगीत आणि नाटय़संगीत या दोन्हींवर त्यांची हुकूमत होती. लोक त्यांना मानत होते. ते त्यांच्या गायकीचा अभ्यास करत होते आणि त्यांना गुरू मानू लागले.

    पुढे पं.तुळशीदास बोरकर यांनी पी. मधुकर (मधुकर पेडणेकर) यांच्या कडे शिक्षण घेतले. तसेच पं. एस. सी. आर भट, पं. के. जी. गिंडे यासारख्या अनेक मातब्बरांचं मार्गदर्शन त्यांना मिळालं.

    पं.तुळशीदास बोरकर मल्लिकार्जुनजी यांची आठवण सांगताना म्हणतात, १९७८-८०च्या दरम्यान मल्लिकार्जुन मन्सुरांचा सत्तरावा वाढदिवस पु. ल. देशपांडेंच्या अध्यक्षतेखाली पाल्र्याच्या टिळक मंदिरात साजरा केला जाणार होता. त्या वेळी मल्लिकार्जुन मन्सुरांची हार्मोनियम मी टय़ून करून दिली होती. पु.ल. आणि मल्लिकार्जुनजी बेंगेरी आडनावाच्या गृहस्थांकडे गप्पा मारत बसले होते. तेवढय़ात मी आणि पन्नालाल घोष यांचे शिष्य आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचे बासरीवादक देवेंद्र मुर्डेश्वर तिथे गेलो. पुलंनी मल्लिकार्जुनजींना माझी ओळख करून दिली. ते म्हणाले, ‘‘अण्णा, मुंबईचे जे दोन-चार ऑर्गनवादक आहेत, त्यांच्यात या पोराचा हात मला आवडतो.’’ त्याबरोबर मल्लिकार्जुन लगेच म्हणाले, ‘‘अरे, मग आज याला साथीला बसू दे.’’ पण त्या कार्यक्रमासाठी बबनराव मांजरेकरांना आधीच बुक केलं होतं. त्यामुळे मी साथ करण्याचा प्रश्नच नव्हता. कार्यक्रमाच्या ठिकाणी पहिल्या रांगेत सगळे मातब्बर कलाकार बसले होते. प्रेक्षकांची तुफान गर्दी होती.

    पुलंच्या प्रास्ताविकाने छान माहोल तयार झाला आणि त्यानंतर मल्लिकार्जुनांचं गाणं होतं. मध्यांतरापर्यंत कार्यक्रम उत्तम झाला. पण बबनराव मांजरेकर डोंबिवलीला राहत असल्याने त्यांना दुस-या दिवशीच्या आकाशवाणी डय़ुटीसाठी लवकर निघावं लागणार होतं. पूर्ण कार्यक्रम होईपर्यंत ते थांबू शकत नव्हते. त्याबरोबर मल्लिकार्जुन मन्सुरांनी मला त्यांच्या साथीला बसायला सांगितलं. मला दरदरून घाम फुटला. लोकांकडेही बघायची माझी हिंमत नव्हती. पण मन्सुरांची आज्ञा होती. त्यामुळे मी साथीला बसलो आणि कार्यक्रम सुफळ संपूर्ण झाला. तो संपल्यावर मन्सुरांना तबला साथ करणारे निझामुद्दिन खान मला म्हणाले, ‘वाह बोरकर!’ मला आनंद झाला. बेंगेरीसाहेबांनी मला बिदागी दिली. घरी येऊन देवासमोर ठेवल्यानंतर बघतो तर त्या लिफाफ्यात ५०० रुपये होते. त्या काळात ५०० रुपये बिदागी म्हणजे खूपच मोठी किंमत होती. तसंच एकदा किंग जॉर्ज शाळेत ‘मानापमान’चा प्रयोग होता. त्या प्रयोगाच्या आधी ‘दे हाता या शरणागता’ या गाण्यातल्या अंत-याच्या ‘संपदा चपलचरणा’ या ओळीवर मी टाळी घेऊन दाखवेन, असं त्यांनी प्रयोगाच्या आधी सांगितलेलं. त्याप्रमाणे त्यांनी एक भलीमोठी हरकत घेतली आणि प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. त्यानंतर तीच हरकत मी हार्मोनियम वर जशीच्या तशी वाजवली आणि त्यालाही प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली. नाटकातल्या संगतकाराला अशी टाळी मिळणं फार दुर्मीळ. असाच आणखी एक अविस्मरणीय प्रसंग आहे. एकदा शोभा गुर्टूबरोबर मी लंडनला गेलो होतो.

    पाच-दहा प्रोग्रॅम्सचा दौरा होता. शेवटच्या कार्यक्रमाच्या वेळी पं. रविशंकर प्रमुख पाहुणे होते. कार्यक्रम संपल्यानंतर आयोजकांनी पं. रविशंकर यांना कार्यक्रमातल्या कलाकारांचा सन्मान करण्याची विनंती केली. त्या वेळी त्यांनी कौतुकाने माझी पाठ थोपटली आणि म्हणाले, ‘‘बेटे, अच्छी संगत करते हो, बहुत अच्छे!’’ ज्या रविशंकरांना कार्यक्रमां मध्ये खूप ठिकाणी ऐकलं. पण त्यांना जवळून बघता येईल का, असा मी विचार करत असे, त्या रविशंकरांनी मला आशीर्वाद दिल्यानंतर मी धन्य झालो. पं. तुळशीदास बोरकर यांनी पं. मल्लिकार्जुन मन्सूर, पं. भीमसेन जोशी, पं. जितेंद्र अभिषेकी, पं. राम मराठे, पंडिता गंगुबाई हनगल, डॉ. प्रभा अत्रे यासारख्या दिग्गज कलाकारांना साथ केली आहे. पं.तुळसीदास बोरकर यांनी प्रा. मधुकर तोरडमल दिग्दर्शित हे बंध रेशमाचे या नाटकाचे साहाय्यक संगीत दिग्दर्शन केले होते.

    पं. तुळशीदास बोरकर यांना साहित्य कला अकादमीचा पुरस्कार दोन वेळा, ‘नटवर्य केशवराव दाते पुरस्कार’, ‘गोविंदराव टेंबे संगीतकार पुरस्कार’, ‘मा. दिनानाथ मंगेशकर स्मृती गुणगौरव पुरस्कार’, गोवा सरकारच्या सांस्कृतिक कलासंचनालयाचा राज्य पुरस्कार, भारत गायन समाजातर्फे देण्यात येणारा ‘पं. रामभाऊ मराठे पुरस्कार’, ‘चतुरंग संगीत सन्मान पुरस्कार यासारख्या अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. भारत सरकारने त्यांना पद्मश्री देऊन सन्मानित केल आहे. संवादिनी वादनाकरिता सन्मानित केले जाणारे ते पहिले आणि मराठी मातीतले म्हणूनही ते एकमेव वादक होते. पं.तुळशीदास बोरकर यांचे निधन २९ सप्टेंबर २०१८ रोजी झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • मराठी रंगभूमीच्या जेष्ठ अभिनेत्री लालन सारंग

    ‘सखाराम बाइंडर’, ‘रथचक्र’ आणि ‘कमला’ मा.लालन सारंग यांच्या आयुष्यातील ही तीन महत्वाची नाटकं. त्यांचा जन्म २६ डिसेंबर १९४१ रोजी झाला. त्यातील त्यांच्या भूमिका कलावंत म्हणून त्यांचा कस पाहणाऱ्या तर होत्याच, पण त्याहीबरोबर जगण्याचं नवं भान देणाऱ्या होत्या. मा.लालन सारंग भारतीय रंगभूमीवरील बंडखोर अभिनेत्री म्हणून त्यांची ओळख आहे. पण त्यांचं व्यक्तिमत्तव त्याहीपेक्षा बरच गहिरं आहे. बंडखोरपणा त्यांच्या आयुष्यातही आहेत. काळाच्या पुढे जाणार्याय असंख्य भूमिका त्यांनी केल्या आणि त्यातून निर्माण होणारी वादळं अंगावर घेतली. मा.लालन सारंग या तेंडुलकरांच्या नायिका म्हणून ओळखल्या जात. सखाराम बाईंडर, घरटे आमचे छान, बेबी, कमला अशा तेंडुलकारांच्या नाटकांनी लालन सारंग यांना बरच काही मिळवून दिलं.

    लालन सारंग मूळच्या गोव्याच्या. पण त्यांचं जन्मापासूनचं आयुष्य मुंबईत गेलं. 'पहिल्या वर्षी ' बावळट मुलगी ' म्हणून कमलाकर सारंग यांनी जिला हिणवलं त्याच लालन सारंग यांना कमलाकर सारंग यांनी पुढच्या वर्षी स्वत:च्या नाटकात रोल दिला. हे कसं झालं ? कमलाकर सारंग त्यांच्या प्रेमात पडले होते का? या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी एका मुलाखतीत सांगितले होते, ' त्यावेळेस तो माझा फक्त मित्र होता. पहिल्या नाटकानंतर आमची ओळख झाली, मग वेगवेगळ्या नाटकात काम करत असताना आमची ओळख वाढत गेली. कालांतरानं आम्ही एकाच संस्थेचं काम करू लागलो आणि आमची मैत्री झाली. त्यावेळेस प्रेमात वगैरे पडण्याचा संबंधच नव्हता कारण तो त्यावेळेस दुसर्याआ मुलीच्या प्रेमात होता. माझ्यासमोर तिच्याबरोबर फिरतही होता. पहिल्यापासूनच कमलाकरचं व्यक्तिमत्त्व जरासं वेगळं होतं. एक तर जनरल कोकणी माणसाप्रमाणे तो कुजकट बोलायचा. पण साहित्य नाटक याचं त्याला प्रचंड नॉलेज होतं. एक प्रकारचं औदार्य त्याच्या व्यक्तिमत्त्वात होतं. त्यामुळे मला तो आवडायला लागला, पण त्याला तसं काही विचारायचं धाडस मी कधीच केलं नाही. पुढे त्याच्या चार्टर बँकेच्या नाटकात जेव्हा मी केलं तेव्हा आमचं संभाषण जास्त वाढत गेलं. मग त्यानं मला लग्नासाठी विचारलं आणि मी हो म्हटलं. ' कमलाकर सारंगांविषयी बोलताना त्या म्हणतात. ' नवरा वगैरेपेक्षा कमलाकर माझा चांगला मित्र होता. त्यानं उठसूठ माझी स्तुती केली नाही, पण तो एवढंच म्हणायचा की लालन जी भूमिका करते, त्याच्यासारखीच ती दिसते. त्याच्या आयुष्याला स्थैर्य कदाचित माझ्यामुळे मिळालं असेल, पण त्याच्याबरोबर माझी वाढ होत गेली. 'सखाराम बाईंडरच्या आधीही लालन सारंग यांनी सहा व्यावसायिक नाटकं केली होती. पण मा.लालन सारंग यांच्या आयुष्यातला माइल स्टोन रोल म्हणजे सखाराम बाईंडरमधली ' चंपा. ' या भूमिकेनं त्यांना नवी ओळख मिळवून दिली. 'सखाराम बाईंडरमधले लालन सारंग यांचे सहकलाकार म्हणजे निळू फुले.

    निळू फुलेंविषयी बोलताना त्या म्हणतात, ' निळू फुले हे सहकलाकार म्हणून फार चांगले होते. ते कुठेही ओव्हरपॉवर करायला जात नाहीत ते खूप साधे होते. सहकलाकार म्हणून त्यांचा कोणताही त्रास झाला नाही. अर्थात आपल्या समोरच्या माणसाच्या बोलण्याची पद्धत किंवा अभिनयाची तर्हाी याचा समोरच्या माणसावर फरक पडतोच. आमची केमिस्ट्री एवढी छान जमली होती की कोणत्याही कॅरेक्टरनं दुसर्या ला ओव्हरपावर केलं नाही. 'सखाराम बाईंडर म्हणजे लालन सारंग यांच्या जीवनातलं एक वादळी पर्व. महाराष्ट्राच्या इतिहासात दुसर्यार कोणत्याही नाटकावरून इतके वाद झाले नाहीत. दुसर्या कोणत्याही नाटकासाठी इतकी मोठी लढाई झाली नाही. 'एवढं वादळ झाल्यावरही कमलाकर सारंग यांनी दिग्दर्शक म्हणून किंवा लालन सारंग यांनी अभिनेत्री म्हणून हे नाटक बंद पडू दिलं नाही. बाईंडर नाटकाच्या वादामुळे कमलाकर सारंग यांना नोकरी सोडावी लागली. त्यामुळे घरात पैशाची चणचण. 'सखाराम बाईंडरवरून झालेल्या वादाचा त्रास मा.लालन सारंग यांच्या सगळ्या कुटुंबियांना भोगावा लागला. गुजराती, मराठी आणि हिंदी या तिन्ही रंगभूमीवर काम केल्यावरही मराठी रंगभूमी ही लालन सारंग यांची सर्वात आवडती रंगभूमी आहे. नाटक हे लालनताईंचं पहिलं आणि शेवटचं प्रेम आहे. सध्याच्या नाट्यव्यवसायाविषयी लालनताई फारशा समाधानी नाहीत. चांगली नाटकं येतच नाहीत, असं मत त्यांचे आहे. समांतर आणि बालरंगभूमीला द्यायला हवं तितकं महत्त्व दिलं जात नाही, म्हणूनच त्याविषयी नाट्यसंमेलनाध्यक्ष असताना आवाज उठवला.

    लालन सारंग या मराठी नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षाही होत्या. अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध असणार्याल लालन सारंग या उत्तम गृहिणीही आहेत. त्या उत्तम स्वयंपाक करतात. पाककलांवर त्यांनी पुस्तकं लिहिली आहेत. मधल्या काळात त्यांनी बुटिकही काढलं. विविधांगी भूमिका केल्याचं समाधान जगण्याला नक्कीच बळ देतयं. पैशांपेक्षा आपल्यातल्या कलागुणांना वाव मिळून रसिकांच्या टाळ्यांचा कडकडाटच आम्हाला प्रोत्साहन देणारा ठरत होता. आता लालनजी दोन-तीन वर्षांपासून आराम करतात. मात्र, सध्या व्यवसायिकाच्या भूमिकेत आहे त्या आनंद घेतात, स्वयंपाक व विविध प्रकारचे पदार्थ बनविण्याची त्यांना आवड आहे. पुण्यात ‘मासेमारी’ हे हॉटेल उघडल आहे. त्या उत्तम वाचक आहेत आणि शिवाय त्यांचं लेखनही चालू आहे.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९३२२४०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

  • मराठी लेखक डॉ. राजन गवस

    मराठी लेखक डॉ. राजन गवस यांचा जन्म २१ नोव्हेंबर १९५९ रोजी झाला. राजन गवस यांनी भाऊं पाध्ये यांच्या साहित्यावर पीएच. डी. केलेली आहे. राजन गवस यांनी साधारण ऐंशीच्या दशकात लिहायला सुरुवात केली. कविता, कथा, कादंबरी आणि ललित लेखन अशा मार्गावरून त्यांची लेखणी चालत राहिली. या सा-याच लेखनात राजन गवस यांच्या लेखनाचे तीन पैलू प्रामुख्यानं नजरेत भरतात. त्यांची विश्वजवात्सल्य आणि कारुण्यानं भरलेली आणि भारलेली दृष्टी, निर्णयच नव्हे तर मतही न देता वास्तवाच्या तटस्थ पण कलात्मक दर्शनानं वाचकावर दाखवलेला विश्वा स आणि तिसरं म्हणजे कृषिप्रधान जगण्याकडे एकाच वेळी आतून येणा-या जाणिवेने आणि दूरस्थ तटस्थपणे (क्वचितप्रसंगी आत्मटीकेनेदेखील) पाहण्याची क्षमता. या तीन पैलूंमध्ये उपजतच अंतर्विरोध आहेत, ताण आहेत; पण ते संतुलित करणं हेच राजन गवस यांचं कौशल्य आहे. उदाहरणार्थ, पहिला पैलू कारुण्य आणि विश्ववात्सल्य. म्हणजे गवस आपल्या कथेतल्या वरकरणी खल किंवा चूक वागणार्याल पात्रांचीही टर किंवा खिल्ली उडवत नाहीत, निवेदनकर्त्याला मिळणारा उपजत फायदा घेत अशा पात्रांच्या चुका सव्याज त्यांच्या पदरात टाकत नाहीत. दोनच उदाहरणं घेऊ या. ‘भंडारभोग’ या जोगत्याच्या जीवनावरच्या कादंबरीत सुरुवातीच्या भागात क‘व्वा वगैरे पात्रं अंधश्रद्धेनं अत्यंत अडाणी, चुकीचं आणि अन्याय्य वागत असतानादेखील गवस यांच्यातला निवेदक अशा पात्रांचा उपहास करत नाही.

    संपूर्ण तादात्म्यानं आणि सहानुभावानं त्यांचं चित्रण करतो. दुसरं उदाहरण- ‘तणकट’ कादंबरीत गौतम वगैरे पात्रं उघड उघड चुकीच्या मार्गानं आणि अल्पावधीत मोठा लाभ मिळवण्यासाठी गैरमार्गावर जातात, पण गवस यांचा निवेदक कोणतीही बाजू घेत नाही, उलट त्या त्या पात्राला समजून घ्यायचं आवाहनच करतो वाचकाला. हे दुर्मिळ आहे. करुणेबरोबरच आढळणारी ही तटस्थता चकित करणारी आहे. कारण त्यांच्या तथाकथित नायकालादेखील झुकतं माप द्यायचा आक्रस्ताळा उपद्व्याप इथे नाही. शक्यतो मतं बनवण्याचं स्वातंत्र्य वाचकालाच द्यायचं परिपक्व भान दाखवतात गवस. अजून एक अंतर्विरोध म्हणजे कधी राजन गवस यांचा नायक किंवा निवेदक कृषिसंस्कृतीचं प्रतिनिधित्व करतो, तर कधी त्या संस्कृतीपासून दूर गेलेल्या, अपराधगंड बाळगणार्या व्यक्तींचं प्रतिनिधित्व करतो. या दोन्ही भूमिका कित्येकदा एकमेकांविरुद्ध उभ्या असतात, पण गवस यातही आपलं निर्णायक मत लादत नाहीत हे विशेष.

    राजन गवस यांनी प्रामुख्याने तीन-चार विषयांवर लिहिलं आहे. सर्वप्रथम म्हणजे ‘देवदासी’ आणि ‘जोगते’ या अनिष्ट रूढींच्या भयावह वास्तवाचं चित्रण. ‘चौंडकं’, ‘भंडारभोग’ या कादंब-या आणि ‘खांडुक’, ‘हुंदका’ यासारख्या कथांमधून ते प्रगटतं. दुसरा विषय म्हणजे गावपातळीवर चालणारं पंचायती, सोसायट्या वगैरेमधलं राजकारण आणि त्याला असलेली जातीयतेची डूब. ‘धिंगाणा’, ‘कळप’, ‘तणकट’ या कादंब-या आणि ‘ठराव’, ‘नवाचं तीन चतुर्थांश’ वगैरे कथांतून हे चित्रण प्रभावीपणे आलं आहे. एकूणच गावगाड्याचं प्रभावी चित्रण इथे दिसतं. तिसरं म्हणजे ग्रामजीवनापासून दुरावलेल्या सुशिक्षित माणसांचा अपराधगंड हे आशयसूत्र त्यांच्या अनेक कथांचा विषय झालं आहे, आणि याचबरोबर आत्मनिर्भर होऊ पाहणारी स्त्री हाही त्यांच्या अनेक कथांचा विषय आहे. ‘रिवणावायली मुंगी’, ‘तळ’, ‘घुसमट’ अशा अनेक कथा स्त्रीकेंद्री आशय व्यक्त करतात. एकूणच, हरवत चाललेली मूल्यं, निसर्ग आणि माणूसपण हे त्यांच्या ललित लेखनचे विषय आहेत. बाईचं जगणं मात्र नेहमीच त्यांच्या लेखनाच्या केंद्रस्थानी आहे.

    भालचंद्र नेमाडे, भाऊ पाध्ये आणि रंगनाथ पठारे यांच्या साहित्यावर राजन गवस यांनी बारकाईनं अभ्यास करून समीक्षात्मक लेखन-संपादन केलं आहे. गवस यांच्या साहित्यात मांडणी आणि अभिव्यक्तीवर कळत-नकळतपणे या साहित्यिकांचा प्रभाव पडलेला दिसतोच. विशेषत: ‘चौंडकं’ आणि ‘भंडारभोग’ या सुरुवातीच्या कादंब-यांनंतरच्या लेखनाबाबत हे विशेष जाणवतं. ‘धिंगाणा’ कादंबरीतलं पहिलं वाक्य ‘आमचा बाप मला उपकाराखातर जेवाय घालतो हा त्याचा समज’ असं आहे. ही मानसिकता नेमाडे यांच्या नायकाची वाटते. या कालखंडातल्या गवस यांच्या कादंब-यांवर या परात्म, हताश नायकाने केलेल्या दंभस्फोटांची गडद छाया आहे. या लेखनाला अनुकरण किंवा प्रभाव यापलीकडे जाऊन बघायला हवं. त्यात एका विशिष्ट वाङ्‌मयीन दृष्टीचा डोळस स्वीकार दिसतो आणि ‘तणकट’च्या निमित्ताने आपली स्वत:ची वाट ओळखण्याचा ठळक प्रयत्नही दिसतो. या दृष्टीनं ‘कळप’ या कादंबरीची अर्पणपत्रिका आवर्जून बघावी अशी आहे.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट/ संजय भास्कर जोशी

  • मराठी व्याकरणकार धर्मसुधारक पांडुरंग दादोबा तर्खडकर

    आज १७ ऑक्टोबर... आज अव्वल इंग्रजीतील मराठी व्याकरणकार, ग्रंथकार आणि कळकळीचे धर्मसुधारक मा.पांडुरंग दादोबा तर्खडकर यांची पुण्यतिथी.

    त्यांचा जन्म ९ मे १८१४ रोजी झाला. प्राथमिक शिक्षण घरी वडिलांजवळ तसेच खाजगी शाळांतून आणि माध्यमिक शिक्षण ‘बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी’ च्या शाळेत झाले. गुजराती व फार्सी भाषा त्यांना अवगत होत्या. सरकारी नोकरीत शिक्षक, अधीक्षक, उपजिल्हाधिकारी अशा विविध हुद्यांवर त्यांनी काम केले, सेवानिवृत्तिनंतर अल्पकाळ ओरिएंटल ट्रान्स्लेटरच्या हुद्यावर ते होते.

    संस्कृत व इंग्रजी भाषांच्या व्याकरणाचे अध्ययन करून आणि मराठी भाषेच्या रूपविचाराची स्वतंत्र प्रज्ञेने व्यवस्था लावून मराठी भाषेचे व्याकरण (१८३६) त्यांनी सिद्ध केले. ह्या व्याकरणाच्या अनेक आवृत्या निघाल्या. १८८१ मध्ये दादोबांनी आपल्या व्याकरणाच्या सातव्या आवृत्तीची पूरणिकाही प्रसिद्ध केली. विद्यार्थ्यांसाठी शालोपयोगी लघुव्याकरणही (१८६५) त्यांनी लिहीले. त्याच्याही अनेक आवृत्या निघाल्या. मोरोपंतांच्या केकावलीवर यशोदापांडुरंगी (१८६५) ही गद्य टीका त्यांनी लिहिली. तीतून दादोबांची सहृदयता प्रत्ययास येते. ह्या टीकेस इंग्रजी आणि मराठी अशा दोन प्रस्तावना त्यांनी जोडल्या. त्यांपैकी मराठी प्रस्तावनेत त्यांचे वाङ्‌मयविषयक विविध विचार आलेले आहेत. त्यांचे १८४६ पर्यंतचे आत्मचरित्र (१९४७, संपा. अ. का. प्रियोळकर) महत्त्वाचे आहे. अव्वल इंग्रजीतील जवळजवळ एकमेव आत्मचरित्र म्हणून दादोबांच्या आत्मचरित्राचे महत्त्व आहेच. तथापि त्यांच्या काळातील धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय स्थितीचे त्यात पडलेले प्रतिबिंबही अभ्यासकांच्या दृष्टीने मोलाचे आहे. स्वतः दादोबांचे जीवन अशा काही चळवळींशी वेगवेगळ्या प्रकारे निगडित झालेले असले, तरी त्यांच्या आत्मचरित्रातून त्या चळवळींबरोबरच दादोबांचे व्यक्तिमत्त्वही स्पष्टपणे प्रत्ययास येते. साधी भाषाशैली आणि प्रांजळ निवेदन ही ह्या आत्मचरित्राची काही उल्लेखनीय वैशिष्ठ्ये.

    यांशिवाय मराठी नकाशांचे पुस्तक (१८३६), इंग्रजी व्याकरणाची पूर्वपीठिका (१८६०), धर्मविवेचन (१८६८), पारमहंसिक ब्राह्मधर्म (१८८०) आणि शिशुबोध (१८८४) अशी विविध प्रकारची त्यांची ग्रंथरचना आहे, तसेच काही मराठी आणि इंग्रजी स्फुट निबंधही त्यांनी लिहिले. विधवापुनर्विवाहाचे समर्थन करण्यासाठी त्यांनी लिहिलेला ‘विधवाश्रुमार्जन’ हा संस्कृत निबंध बाबा पदमनजी ह्यांच्या यमुनापर्यटन ह्या कादंबरीत अंतर्भूत करण्यात आला होता. विख्यात स्वीडिश तत्वज्ञ स्वीडनबॉर्ग ह्याच्या ग्रंथावर त्यांनी लिहिलेल्या अ हिंदू जंटलमन्स रिफ्लेक्शन्स रिस्पेक्टिंग द वर्क्‌स ऑफ एमानुएल स्वीडनबॉर्ग (१८७८) ह्या ग्रंथाची यूरोपात प्रशंसा झाली होती. दादोबांच्या साहित्यात साधेपणा आणि विचारप्रवर्तकता आहे. त्यांचे मराठी व्याकरणविषयक कार्य अग्रेसर महत्त्वाचे असून त्यायोगे मराठी गद्याला प्रमाणरूप प्राप्त झाले असल्याने ‘मराठी भाषेचे पाणिनी’ हे रास्त बिरुद त्यांना लावले जाते.

    ग्रंथलेखनाप्रमाणेच समाजसुधारणेचे कार्यही दादोबांनी केले. सरकारी नोकरी करीत असतानाच लोकहिताच्या कार्यात त्यांनी भाग घेतला. दुर्गाराम मनसाराम मेहेता यांनी सुरतला स्थापन केलेली मानवधर्मसभा (१८४४) आणि राम बाळकृष्ण जयकर यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेली परमहंस सभा (सु. १८४८) या धर्मसुधारक संस्थांमागे दादोबांची प्रेरणा होती. यांशिवाय मराठी ज्ञानप्रसारक सभा, मुंबई विद्यापीठ, पुनर्विवाहोत्तेजक सभा, बॉम्बे असोसिएशन इ. संस्थांच्या कार्यातही त्यांचा सहभाग असे.

    भिल्लांचा बंडखोर पुढारी पटाजी नाईक याचे बंड त्यांनी १८५७ साली मोडून काढले व सरकारने रावबहादुर ही पदवी त्यांना बहाल केली. मा.पांडुरंग दादोबा तर्खडकर यांचे १७ ऑक्टोबर १८८२ रोजी निधन झाले.

    -- संजीव वेलणकर पुणे
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.मराठी विश्वकोश/ मालशे, स. गं.