जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
एक महिला असूनही चंद्रकला कदम या बेधडकपणे गुन्हेगारी जगतातील संशयितांना पकडण्यासाठी आपल्या कलेच्या माध्यमातून गुन्हेगारांची हुबेहूब रेखाचित्रे रेखाटून आपली कला समाजकार्य म्हणून जोपासत आहेत. काही गुन्ह्यांतील संशयित गुन्हेगारांची रेखाचित्रे काढून त्यांना यशस्वीरीत्या पकडून देण्यामध्ये चंद्रकला कदम यांच्या रेखाचित्रांची आजवर पोलिसांना पुरेपूर मदत मिळाली आहे.
June 27, 2022
हे मराठी, भारतीय समाजसुधारक होते.
December 15, 2010
व्यवसायाने शल्यविशारद अशी ख्याती असणारे डॉ. वा. भ. पंडित हे संस्कृत भाषेचे गाढे आभ्यासकही होते.
“शब्दांगण” या प्रसिध्द मासिकाचे जनक म्हणून ते सर्वसामान्यांना परिचित आहेत. कविवर्य म. पां. भावे हे या नियतकालिकाचे संपादक म्हणून कार्यरत होते.
डॉ. अनंत देशमुख, डॉ. महेश केळुस्कर, शिरीष लाटकर, पद्माकर चितळे, गोविंद मुसळे अश्या मान्यवर लेखकांनी “शब्दांगण” मध्ये विविध विषयांवरील सकस लेख लिहून या मासिकाची वैचारिक पातळी अनोख्या उंचीवर नेऊन ठेवली होती.
दैनिक गावकरी च्या पुरवणीवरुन संपादित
January 3, 2015
आज ५ डिसेंबर
आज ख्यातनाम गझल गायक गुलाम अली यांचा वाढदिवस
जन्म:- ५ डिसेंबर १९४०
गुलाम अली यांचे नाव त्यांच्या वडलांनी बडे गुलाम अली खाँ यांच्यापासून प्रेरित होऊन ठेवले. गुलाम अली थोडे मोठे झाल्यावर बडे गुलाम अली खाँ यांच्याकडे त्यांना शिष्य बनवण्यासाठी वडलांनी चकरा मारायला सुरुवात केली. बडे गुलाम हे त्या काळचे सर्वात मोठे आणि अत्यंत व्यग्र असे व्यक्तिमत्त्व होते. गुलाम अली यांनी आपल्या एका जुन्या मुलाखतीत सांगितलं होतं, की त्यांचे वडील त्यांना पहाटे पाच वाजता उठवायचे. नाही उठले तर काठीने मारून उठवायचे. का, तर बडे गुलाम अली खाँचे नाव खराब होऊ नये. तेव्हा ते पाच वर्षांचे होते. बरेच दिवस गेल्यावर एके दिवशी बडे गुलाम अली खाँ त्यांच्या घरी आले आणि त्यांच्या वडलांच्या असंख्य बिनत्यांची आबरू ठेवण्यासाठी गुलाम अली यांना ‘काहीतरी गा’ असे म्हणाले. त्यांनी धीर करून ‘सैयाँ बोलो तनिक मोसे रहियो न जाए’ ही ठुमरी गायली. गाणं संपताच बडे गुलाम यांनी पंधरा वर्षांच्या छोट्या गुलामला मिठी मारली आणि त्यांना आपला गंडा बांधला. तथापि, बडे गुलाम खरोखरीच अतिशय व्यग्र असल्याने त्यांचे तीन बंधू बरकत अली खाँ, मुबारक अली खाँ आणि अमानत अली खाँ यांनी त्यांचे प्रशिक्षण पूर्ण केले.
१९६० साली मा.गुलाम अली यांनी लाहोर आकाशवाणीवर गायक म्हणून कारकिर्दीची सुरवात केली. त्यानंतर त्यांना गझल गायक म्हणून भारत, पाकिस्तान व जगात अमाप लोकप्रियता मिळाली.
गुलाम अलीजी एक मेहबूब गजल गायक आहेत. पाकिस्तानातील गजलचे बादशहा मेहदी हसन यांच्या नंतरच्या पुढच्या पिढीचे आणि समर्थ गजल गायक आहेत. त्यांच्या ‘चुपके चुपके’ने तीन दशकांपूर्वी लावलेले वेड अद्याप ओसरायला तयार नाही. हिंदुस्थानी ठुमरी गायकीची शैली गजलच्या फॉर्मसाठी यशस्वीपणे वापरणाऱ्या गुलाम अली यांनी शेकडो गजला गायल्या आहेत. त्यातील एक निवडणे हे इतर गजलांवर अन्याय केल्याशिवाय शक्य नाही. मा.गुलाम अली व मा.आशा भोसले यांचा मिराज ए गझल हा अल्बम फारच सुंदर आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
गुलाम अली यांच्या काही गजला
चुपके चुपके रात दिन
चमकते चाँद को टूटा हुआ
हंगामा है क्यूँ बरपा
ये दिल ये पागल दिल मेरा
हम तेरे शहर में आए हैं
कल चौदहवीं की रात थी
अपनी धुन में रहता हूँ
December 12, 2016
मास्टर अविनाश उर्फ गणपतराव मोहिते यांचे शालेय शिक्षण मिरज येथेच इयत्ता पहिलीपर्यंत झाले. त्यांचा जन्म १ जानेवारी १९०९ मिरज येथे झाला. वडील लक्ष्मणरावांना संगीताची आवड होती. संगीताचे भीष्माचार्य बाळकृष्णबुवा इचलकरंजीकरांकडे ते थोडीफार गायकी शिकले होते. गणपतरावांना २ भाऊ आणि ५ बहिणी. मोठा बळवंत हा बळवंतराव मराठे यांच्या ‘हिंदी नाटक मंडळीत’ बालनट होता. मधला शंकर हा जनुभाऊ निमकरांच्या ‘स्वदेश हितचिंतक मंडळीत होता. पुढे लक्ष्मणरावांनी शंकर आणि गणूला संगीतसूर्य केशवराव भोसले यांच्या ‘ललितकलादर्श’मध्ये दाखल केले. ललितकलादर्शच्या ‘शापसंभ्रम’ मध्ये गणूने महाश्वेताच्या मैत्रिणीचे काम केले. मराठी संगीत रंगभूमीची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या किर्लोस्कर संगीत मंडळीतील दीनानाथ मंगेशकर, चिंतामणराव कोल्हटकर आणि कृष्णराव कोल्हापुरे यांनी ‘किर्लोस्कर’मधून बाहेर पडून नवीन नाटय़संस्था काढण्याचे ठरविले. १८ जानेवारी १९१८ रोजी बोरिवली येथे या नवीन ‘बलवंत संगीत मंडळी’ची स्थापना झाली. या तीन प्रमुख कलाकारांबरोबरच अन्य कलाकारांचीही संस्थेला आवश्यकता होती.
शंकर आणि गणू या बालनटांची कीर्ती ऐकून कृष्णराव कोल्हापुरे यांनी त्यांना ‘बलवंत’मध्ये आणले. ज्या बलवंत संगीत मंडळीने गणूचे आयुष्यच बदलून टाकले, उजळून टाकले त्या कंपनीत गणू वयाच्या दहाव्या वर्षीच दाखल झाला.
नाटय़ाचार्य अण्णासाहेब (बळवंत) किर्लोस्कर आणि लोकमान्य टिळक यांच्या नावाचा सार्थ अभिमान बाळगणारी बलवंत कंपनी राष्ट्रकार्यातही अग्रेसर होती. कंपनीच्या स्थापनेनंतर लगेचच लोकमान्य टिळकांच्या होमरूल चळवळीच्या फंडासाठी आयोजित केलेल्या ‘पुण्यप्रभाव’ या नाटकाच्या प्रयोगाला स्वत: लोकमान्य टिळक हजर होते. या नाटकात युवराजाची भूमिका करताना गणूच्या ‘भुलूनिया खलजनालापा’ ‘दुर्दैवे हेतू झाला’ ‘अंतरि खेद भरे’ या पदांना आणि भूमिकेला श्रोत्यांची भरपूर दाद मिळाली. पदांना ‘वन्समोअर’ मिळाले. मध्यंतरात लोकमान्यांनी गणूचे विशेष कौतुक करताना म्हटले,‘युवराजाची सुंदर भूमिका करणऱ्या या मुलाचे कौतुक करावेसे वाटते. याला काहीतरी द्यायला हवे. पण मी हा असा! काय देऊ या मुलाला?’
टिळक असे म्हणताहेत तोच त्यांच्या शेजारच्या खुर्चीवर बसलेल्या गृहस्थांनी आपली सोन्याची अंगठी काढून टिळकांच्या हातात दिली. ‘‘या सद्गृहस्थांनी दिलेली ही अंगठी मी या मुलाला बक्षीस देतो,’’ असे म्हणून टिळकांनी ती अंगठी गणूच्या बोटात घातली.
पुढे १९३१ मध्ये झालेल्या बलवंतच्या स्वातंत्र्यवीर सावरकरलिखित ‘संगीत संन्यस्त खड्ग’ या नाटकाच्या वेळीही नलिनीच्या अप्रतिम भूमिकेबद्दल स्वातंत्र्यवीरांनी त्यांचे कौतुक केले. शासकीय पुरस्कारांकडून सदैव उपेक्षित राहिलेल्या गणपतरावांना लोकमान्य आणि स्वातंत्र्यवीरांनी केलेले हे कौतुक कोणत्याही पुरस्कारापेक्षा मोठे वाटत असे.
१९१८ ते १९४० या बलवंत कंपनीच्या कार्यकाळात गणपतरावांनी कंपनीचे मुख्य कलाकार दीनानाथ मंगेशकर, चिंतामणराव कोल्हटकर, कृष्णराव कोल्हापुरे यांच्याबरोबर प्रामुख्याने स्त्री भूमिका केल्या. शारदा, उग्रमंगल, भावबंधन, राजसंन्यास, संन्यस्त खड्ग, ब्रह्मकुमारी इ. नाटकातील त्यांच्या भूमिका रसिकांना पसंत पडल्या. दीनानाथांच्या सहवासात आणि त्यांच्याकडून मिळालेल्या संगीत शिक्षणाने गणपतरावांची कला बहरली. बलवंत कंपनीच्या मालकांनी कपंनी बंद करून ‘बलवंत पिक्चर्स’ ही चित्रपटनिर्मिती संस्था काढली. दीनानाथांचा प्रयत्न यशस्वी झाला नाही तरी ‘कृष्णार्जुन युद्ध’, ‘ठकीचं लग्न’, ‘भक्त पुंडलिक’, ‘अंधेरी दुनिया’ या चित्रपटातील गणपतरावांच्या भूमिका रसिकांना भावल्या. यातील काही चित्रपटांना त्यांनी संगीतही दिले. दीनानाथांच्या अकाली निधनानंतर त्यांनी मो. ग. रांगणेकराच्या ‘आशीर्वाद’, ‘कुलवधू’ इ. नाटकात प्रमुख भूमिका केल्या. अत्रे पिक्चर्सच्या ‘पायाची दासी’ या चित्रपटाच्या वेळी आचार्य अत्रे यांनी त्यांना ‘मा.अविनाश’ हे नाव दिले आणि तेच पुढे रूढ झाले. मास्टर अविनाश यांचे मंगेशकर कुटूंबियांशी त्यांचे घनिष्ठ सबंध होते. दिनानाथ मंगेशकरांच्या पडत्या काळात त्यांनीच हात दिला. दीनानाथांनंतर ह्रदयनाथ, लतादीदींना त्यांनी आपल्या अंगाखांद्यावर खेळवलं. दीनानाथांचेही गणपतराव हे प्रिय शिष्य सहकारी होते. १९४२ साली दीनानाथांच्या निधनाच्या वेळी गणपतराव पुण्यात नव्हते. दीनानाथांनी मृत्यूपूर्वी आपल्या या प्रिय शिष्याची आठवण काढताना,
‘इतुके कळवि आजि माझ्या गुरुला’
‘मरताही भय नाही शिवले कचाला’
या विद्याहरण नाटकातील पदात थोडा पदल करून
‘इतुके कळवि आजि माझ्या गणूला
मरताही भय नाही शिवले दिनाला’
असा निरोप गणूसाठी ठेवला.
संगीत आणि नाटय़क्षेत्रातून अकाली, अकारण निवृत्ती घेतलेल्या गणपतरावांनी १९५३-५७ मध्ये तळेगाव दाभाडे येथे ‘अशोक सहकारी शेतकरी संघा’च्या माध्यमातून सामुदायिक शेतीचा प्रयोग केला. त्यानंतर मात्र सांगली येथे जाऊन वानप्रस्थ जीवन ते व्यतीत करू लागले. सांगलीकरांनी त्यांचा योग्य तो सन्मान करताना ‘‘विष्णुदास भावे पुरस्कार’, ‘सांगली भूषण’ हे पुरस्कार त्यांना दिले. तरी शासकीय सन्मान त्यांच्या योग्यतेनुसार मिळणे आवश्यक होते ते त्यांना मिळाले नाहीत. शासनदरबारी त्यांची उपेक्षा झाली हे शल्य त्यांच्या मित्रपरिवाराला आणि चाहत्यांना अस्वस्थ करणारे आहे. मास्टर अविनाश हे संगीत आणि नाटय़क्षेत्राचा चालताबोलता इतिहास आणि शतकाचा साक्षीदार होते. मास्टर अविनाश यांचे निधन ३ एप्रिल २००९ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट/ डॉ. रवींद्र घांगुर्डे
January 1, 2018
त्यांचे विशेष संशोधन म्हणजे गर्भाच्या खांद्याच्या (अॅ्ण्टिरियर शोल्डर) हालचालीवरून प्रसूतीच्या प्रगतीचा अंदाज घेणे. गर्भाशयाच्या स्खलनाची शस्त्रक्रिया त्यांनी सुधारली.
October 27, 2021
गझलसम्राट मेहंदी हसन यांचा जन्म १८ जुलै १९२७ रोजी राजस्थान येथे झाला. मेहंदी हसन यांनी गायनाचे धडे वडील उस्ताद अझीम खॉं आणि काका उस्ताद इस्माईल खॉं यांच्याकडून गिरविले. ते दोघेही पारंपरिक धृपद गायक होते. त्यांचे कुटुंब वाद्यनिर्मिती उद्योगातही होते. फाळणीनंतर त्यांच्या कुटुंबाने पाकिस्तानात स्थलांतर केले. पंजाब प्रांतातील चिचवटनी गावात ते स्थायिक झाले. पाकिस्तानात ते एका सायकलीच्या दुकानात काम करीत होते. नंतर त्यांनी मोटार आणि ट्रॅक्टार मेकॅनिकचेही काम केले. काम करीत असतानाही त्यांनी गायनाचे धडे गिरविणे सुरू ठेवले होते. पुढील काळात ते ठुमरी गायनाकडून गझल गायनाकडे वळले. कुटुंबाला आर्थिक मदत व्हावी, या हेतूने ते गझल गायनाचे कार्यक्रम करीत असत. गझलगायन सुरू केल्यानंतरही त्यांनी शास्त्रीय गायनाचा रियाझ कायम ठेवला होता. पाकिस्तान रेडिओवर पहिल्यांदा १९५७ मध्ये त्यांना ठुमरी गायनाची संधी मिळाली. नंतर त्यांनी पाकिस्तानी चित्रपटांसाठी गीतगायन सुरू केले. "गुलो में रंग भरीये‘ हे त्यांचे "फरंगी‘ या १९६४ च्या चित्रपटातील गीत त्यांचे पहिले चित्रपटगीत होते.
"पत्ता, पत्ता, बूटा, बूटा‘, "अब के हम बिछडे‘, "रंजिश ही सही दिल ही दुखाने के लिए आ‘, "तडप ना मेरे दिल, किसी की आस में, हजार तिल्खियॉं, तेरी प्यास में..‘ अशा एकापेक्षा एक सरस आणि अविट गोडीच्या गझल मेहंदी हसन यांनी रसिकांना दिल्या. अब के बिछडे आणि पत्ता पत्ता बुटा बुटा या त्यांनी गायलेल्या गझल विशेष लोकप्रिय होत्या. मेहंदी हसन यांनी गझलेला एक वेगळीच उंची प्राप्त करून दिली. मेहंदी हसन यांचे १३ जून २०१२ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ:- इंटरनेट
मेहंदी हसन यांच्या गाजलेल्या काही गझला
https://www.youtube.com/watch?v=K-92Z3OXWZQ
https://www.youtube.com/watch?v=_52zfKw5KoE&t=526s
June 13, 2017
‘वारा फोफावला’, ‘गगनी उगवला सायंतारा’ आणि ‘यमुनाकाठी ताजमहाल’ या गाण्यांचे गायक गजाननराव वाटवे यांच्या लोकप्रियतेची कल्पना आज एकविसाव्या शतकात करता येणं अशक्य.
गजाननराव वाटवे यांचा जन्म ८ जून १९१७ रोजी झाला. मराठीत भावगीताचा जन्म गजानन वाटवेंच्या काव्यगायनाने झाला, असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही. गजाननराव वाटवे यांनी मराठीतील अनेक कवितांना सुंदर चाली लावून प्रथम भावगीताचा प्रकार लोकांपर्यंत नेला. आणि त्यांच्या या प्रयत्नाला लोकांनी एवढा प्रचंड प्रतिसाद दिला की, पुढे बराच काळ वाटवे म्हणजे भावगीत हे समीकरण झाले.
गजाननराव वाटवे यांचं खास वैशिष्टय़ म्हणजे कवितांना सुंदर चाली लावून त्या रेकॉर्ड व पुस्तकांतून त्यांनी घराघरांत व गल्लोगली लोकप्रिय केल्या. गजाननराव वाटवे यांच्या भावगीतांना कवितांतून जन्म मिळाला. प्रथमच कवितांना चाल लावली जाते व ती गोड गळ्याने म्हटली जाते हे रसिकांच्या ध्यानात आले. वाटवे यांचा हा प्रयत्न सुरुवातीलाच एवढा गाजला व त्याला एवढी प्रचंड लोकप्रियता मिळाली.
त्याकाळी गजाननराव वाटवेंचे भावगीत गायनाचे स्वतंत्र कार्यक्रम होऊ लागले. गजाननराव वाटवेंची भावगीतातील कारकीर्द म्हणजे भावगीतांचा सुवर्णकाळ होता. आपल्या कार्यक्रमात ते स्वत: लावलेल्या चालीच बहुधा ते म्हणत. त्यामुळे प्रत्यक्ष गाताना हवे ते बदल ते करून घेत. त्यामुळे त्यात ठराविकपणा येत नसे. प्रत्येक वेळी ते काव्य नवीनच वाटे. लोकांच्या आग्रहास्तव त्यांनी कधी लावण्या, नाटय़संगीत, सिनेसंगीत इतर काही प्रकार त्यांच्या कार्यक्रमात आणले नाहीत. द्वंद्वगीते नाहीत. साधेसुधे शब्द, साध्यासुलभ चाली यांचं जणू मनोमीलन त्यावेळच्या भावगीतात झालं आहे. दुधात साखर पडावी अशी भावगीतं पानफुटीसारखी जमून गेली आहेत की या भावगीतातील शब्दासाठी चाल जन्माला आली की चालीसाठी शब्द जन्माला आले, अशा गोड संभ्रमात भावगीतांचे रसिक पडतात, मनात घर करणारी व ओठावर रेंगाळणारी ही गोड गोड भावगीते महाराष्ट्राचे एक सांस्कृतिक वैशिष्टय़ झाले. हा सांस्कृतिक ठेवा अवीट आहे. खरं तर या साध्या कविता होत्या, त्यांना गजानन वाटवेंनी सहज सुलभ चाली लावल्या. आश्चर्य म्हणजे गजाननराव वाटवे यांनी कवितेतील एकाही शब्दाचा बदल न करता त्यांना सुंदर चाली लावलेल्या आहेत.
मात्र एक काळ गजाननराव वाटवे यांनी गाजवला होता, हे मात्र नक्की. कवी मनमोहन यांच्या ‘राधे तुझा सैल अंबाडा’ आणि राजा बडे लिखित ‘नका मारू खडा शिरी भरला घडा’ या गीतांनी पुण्या-मुंबईत खळबळ उडवून दिली. दोन्ही गीतं अश्लील असल्याचं शिक्कामोर्तब संस्कृतीरक्षकांनी केले होते. रेडिओने दोन्ही गाण्यांवर बॅन टाकला. त्याकाळच्या लोकप्रिय सिनेमातल्या गाण्यांच्या रेकॉर्डस्पेक्षाही अधिक विक्री या दोन प्रायव्हेट गाण्यांच्या रेकॉर्ड्सने केली. गजाननराव वाटवे यांच्या स्वरातलं भावदर्शन ही त्याकाळच्या तरुण पिढीची गरज होती. स्वातंत्र्यपूर्व काळापासून थेट साठच्या दशकातील सुरुवातीपर्यंत गजाननरावांच्या भावगीतांनी मराठी मनावर अधिराज्य गाजवलं. गांधी हत्येनंतर महंमद रफीचं ‘सुनो सुनो ए दुनियावालों बापू की अमर कहानी’ ऐकून गजाननरावांनी कवी मनमोहन यांना गांधीजींच्या जीवनावर कविता लिहिण्याची विनंती केली.
तुफान लोकप्रियता हे ‘गजाननराव वाटवे’ या नावासरशी जणू घट्ट चिकटलं होतं. गजाननराव वाटवे यांचे २ एप्रिल २००९ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ.इंटरनेट
गजाननराव वाटवे यांची काही गाणी
https://www.youtube.com/watch?v=pYqBj-cduu8
https://www.youtube.com/watch?v=u8LD6_Q4OKQ
https://www.youtube.com/watch?v=C316cQP3EYI
https://www.youtube.com/watch?v=Zdfh5gVMA60
https://www.youtube.com/watch?v=8EJxW0rNF7k
April 15, 2017
मराठी सिने-नाट्य क्षेत्रातील एक चतुरस्त्र अभिनेत्री म्हणजे ज्योती चांदेकर.
पुण्याच्या सरस्वती नाट्यमंदिरात शिकताना केवळ आवड म्हणून ज्योती चांदेकर यांनी तिथल्या नाट्यवाचन स्पर्धांमध्ये भाग घ्यायला सुरुवात केली. याच वाचनावेळी बाबा ओक यांनी ज्योती यांची गुणवत्ता हेरुन त्यांना' सुंदर मी होणार' या नाटकासाठी विचारलं. त्यांच्या नाटकातल्या कलाकाराची झालेली अडचण लक्षात घेऊन ज्योती यांनी अवघ्या १४ व्या वर्षी रंगमंचावर पाऊल ठेवलं आणि अल्पावधीतच ती हौस न उरता त्यांचं प्रोफेशन बनलं. या नाटकातलं त्यांचं काम पाहून 'नाट्यसंपदा' च्या प्रभाकर पणशीकर यांनी आपल्या 'बेइमान' या नाटकासाठी विचारणा केली. ज्योती तिथेही उभ्या राहिल्या त्या बदली खेळाडू म्हणूनच. यावेळी त्यांचा सहकलाकार होते सतीश दुभाषी. नवोदित ज्योती यांच्यांवर शाबासकीची पहिली थाप पडली ती दुभाषी यांच्याकडूनच.
मुंबईतल्या नाटकांमध्ये चुणूक दाखवतानाच, त्यांनी आपलं मूळ गाव पुणे मात्र सोडलं नाही.'थ्री स्टार्स' या बाबूराव गोखले यांच्या संस्थेतून 'वर्हाडी माणसं', 'स्वयंसिद्धा', 'प्रेमा तुझा रंग कसा ?' आदी अनेक नाटकं केली. घरातल्या दोन धाकट्या बंधूंची असलेली जबाबदारी लक्षात घेऊन ज्योती यांनी त्याकाळी ऑर्केस्ट्रामधून आपलं नृत्यकौशल्यही दाखवलं. अनेक लोकनाट्यातून काम केलं. परंतु, अभिनेत्री म्हणून मोठी लोकमान्यता त्यांना मिळाली ती १९७५ साली आलेल्या 'रखेली' या नाटकामुळे. अरुण सरनाईकही या नाटकात मुख्य भूमिका करत. हे नाटक होतं आशयघन. पण त्या काळी 'प्रौढांसाठी' च्या नाटकांचं पेव फुटलं होतं. त्यात हे नाटक विनाकारण भरडलं गेलं असलं, तरी ज्योती यांच्या कामाचं कौतुक होत होतं. त्यानंतर 'श्रीचिंतामणी', 'सुयोग' आदी बड्या संस्थांमधून त्यांनी अनेक नाटकं केली. 'नाट्यदर्पण', 'रंगदर्पण' आदी अनेक पुरस्कारांवर आपलं नाव कोरलं.
अनेक नाटकांतून त्यांच्या अभिनयाचा धडाका सुरू असतानाच, आठ वर्षांपूर्वी आलेल्या 'मित्र' नाटकानंतर मात्र तब्येतीच्या कारणास्तव ज्योती यांनी नाट्यसृष्टीतून काढता पाय घेतला. पुढे पाचेक वर्षं ज्योती पुण्यातच होत्या. त्यांचं मोठं कमबॅक झालं ते 'सुखान्त' या सिनेमातून. यातील भूमिकेसाठी 'मटा सन्मान', 'झी' यांसह अनेक पुरस्कार पटकावले. त्यानंतर मात्र ज्योती यांनी मागे वळून पाहिलं नाही. समोर आलेल्या संधीचं त्यांनी सोनं केलं. ही त्यांची दुसरी इनिंग होती. त्यानंतर आलेल्या 'मी सिंधुताई सपकाळ', 'पाऊलवाट' या सिनेमांमधल्या भूमिकांसाठी त्यांना सहाय्यक अभिनेत्रीसाठीचे अनेक पुरस्कार मिळाले. आगामी काळात त्यांचे आणखी काही सिनेमे येणार आहेत. पुण्यात राहून ज्योती यांनी हे योगदान कोणताही गाजावाजा न करता दिलं आहे. गेल्या ४५ वर्षांचं त्यांचं नाट्य, सिनेसृष्टीतील योगदान लक्षात घेऊन अ. भा. चित्रपट महामंडळाने त्यांचा 'चित्रकर्मी' पुरस्काराने उचित गौरवच केला आहे.
(संदर्भ : महाराष्ट्र टाईम्समधील नोंद हे सदर)
August 9, 2017
December 15, 2010
Copyright © 2025 | Marathisrushti