जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
राम सुतार यांनीच गुजरातमधील सरदार वल्लभभाई पटेल यांचा स्टॅच्यू ऑफ युनिटी हा पुतळा साकारला आहे. त्याची उंची १८२ मीटर इतकी आहे. याशिवाय मुंबईत बसविण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १३७.२ मीटर उंचीचा पुतळा आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा २१२ मीटर उंचीचा पुतळाही ते साकारत आहेत. तसेच, सध्या अयोध्येतील राम मूर्ती बनविण्याचे काम राम सुतार करत आहेत. अयोध्येतील रामाची मूर्ती ही जगात सर्वाधिक उंच असणार आहे.
पडद्याआड तर कधी पडद्यापुढे आत्मविश्वासाने वावरलेले ज्येष्ठ साहित्यिक बी. के. मोमीन कवठेकर म्हणजेच बशीर कमरुद्दीन मोमीन यांनी आजपर्यंत गद्य आणि पद्य अशा दोन्ही प्रकारात विपुल असे लिखाण केले होते. मोमीन कवठेकरांनी लोककलावंतावर लिहिलेले पुस्तक संदर्भ म्हणून अभ्यासकांकडून वापरले जात असे.
कृष्णा बोरकर यांच्या आजवरच्या प्रवासात व्ही. शांताराम, राजकमल स्टुडिओ, ज्येष्ठ रंगभूषाकार बाबा वर्दम यांचेही महत्त्वाचे स्थान आहे. एकदा ‘राजकमल’चे मुख्य रंगभूषाकार बाबा वर्दम आलेले नसताना बोरकर यांनी ‘राजकमल’मधील ज्येष्ठ अभिनेते बाबुराव पेंढारकर यांची रंगभूषा केली. शांताराम बापू यांनी ठीक आहे, अशा शब्दात पावती दिली आणि नंतर चक्क स्वत:ची रंगभूषा बोरकर यांना करायला सांगितली.
`ज्ञानकोशकार’ म्हणून डॉ.श्रीधर व्यंकटेश केतकर यांच्या नावामागे उपाधी लागली असली तरी त्यांच्या व्यक्तिमत्त्वात पांडित्य आणि विक्षिप्तपणा यांचे अजब मिश्रण होते. श्रीधर व्यंकटेश केतकर हे एक लेखक, समाजशास्त्रज्ञ व विचारवंत म्हणून जेवढे ज्ञात आहेत, त्यापेक्षा ‘ज्ञानकोशकार केतकर’ म्हणून अधिक सुपरिचित आहेत. त्यांचा जन्म २ फेब्रुवारी १८८४ रोजी झाला.समाजप्रबोधनासाठी जीवनभर अत्यंत निर्धारपूर्वक झटलेले व ‘भारतीय जातिसंस्थेचा इतिहास’ या आपल्या अत्यंत अभ्यासपूर्ण पुस्तकाने देशाबरोबरच पाश्चारत्त्य जगातही मान्यता पावलेले व्यक्तिमत्व म्हणजे डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर. एक समाजशास्त्रज्ञ, विचारवंत आणि लेखक म्हणून ते लोकप्रिय ठरले हे खरे, पण ‘ज्ञानकोशकार केतकर’ म्हणून ते विशेष प्रसिद्ध झाले.
डॉ. केतकर यांनी मनाचा निश्चरय करून ज्ञानकोशाचे कार्य पूर्ण करायचेच असा निर्धार जेव्हा केला, तेव्हा सुप्रसिद्ध इतिहास संशोधक वि. का. राजवाडे यांनी आपल्या मनातील रास्त शंका केतकरांपुढे मांडीत म्हटले, ‘हे काम एवढे अवाढव्य आहे की, त्यासाठी एखाद्याची पुरी हयात खर्च होईल.’ डॉ. केतकर यावर स्मितहास्य करीत म्हणाले,‘ प्रयत्न तरी करून पाहूया.’ आणि डॉ. केतकर यांनी आपल्या प्रचंड मेहनतीने हे अपूर्व व असामान्य काम बारा वर्षांत पूर्ण केले व याकामी आपणास सहकारी संपादक म्हणून य. रा. दाते, चिं. ग. कर्वे आदींचे मोलाचे सहकार्य लाभले हेही अत्यंत प्रांजळपणे कबूल केले. श्रीधर व्यंकटेश केतकर यांचे कोकणातील दाभोळजवळील अंजनवेल हे मूळ गाव. त्यांचे वडील पोस्ट खात्यात पोस्टमास्तर होते. वडीलांचे छत्र लहानपणीच नाहीसे झाल्यामुळे आईच्या मदतीने त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. प्राथमिक दुसर्याा इयत्तेपासून प्रवेश मिळेपर्यंत त्यांचे शिक्षण उमरावतीस झाले. तिसरीहून चौथीत जाताना त्यांनी ‘हायस्कूल एंट्रंस’ ही परीक्षा देऊन पहिल्याप्रथमच आपली शालेय चमक दाखवली. नववीत असताना गंमत म्हणून ते दहावीच्या परीक्षेला बसले व अनेक विषयांत उत्तम गुण मिळवून शिक्षकांच्या कौतुकास पात्र ठरले. पुढे व्हर्नाक्युलर स्कॉलरशिप’ च्या परीक्षेत बसून दुसर्यात क्रमांकावर उत्तीर्ण झाले.
शिक्षणाचा ध्यास घेतलेल्या केतकर यांनी अनेक हालअपेष्टांना तोंड देत ते उच्चविभूषित झाले. शिवाय शालेय जीवनात जोपासलेल्या वाचन, कविता करणे, इतिहास, वाङ्मय, राजकारण, रोमन कायदा यांत विशेष रस घेणे यांचा फायदा त्यांना त्यांच्या पुढील आयुष्यात झाला. ते इंग्लंडमध्ये सांपत्तिक स्थिती हलाखीची असूनही उच्च शिक्षण घेताना कसे जीवन जगले व शिक्षणाची हौस पूर्ण केली हे समजून घेणे उचित ठरेल. इंग्लंडमध्ये ‘हिंदुइझम’ या तेथे प्रसिद्ध झालेल्या आपल्या ग्रंथावर आणि ‘अथिनियम’ किंवा ‘राजस्थान’ या नियतकालिकात समालोचन करून किंवा लेख लिहून ते आपला उदरनिर्वाह चालवित. पण या पैशांतून भागत नसे. तेव्हा ते दिवसातून एकदाच जेवण घेत. जेवणाला पुरेसे पैसे नसल्यामुळे लंडनमध्ये स्वस्तात स्वस्त जेवण कुठे मिळेल याचे ते ‘तज्ज्ञ’ बनले. ते स्वस्त जेवण जेवण्यास ये-जा करण्यासाठी खिशात आवश्यक पैसे नसल्याने लंडनमध्ये पायी फिरण्याची ‘खास मौज’ ते अनुभवीत. पण आपले हे दैन्य त्यांनी इतरांना दाखवून दिले तर नाहीच, पण त्यामुळे अभ्यासाकडे दुर्लक्ष होऊ नये याची खबरदारीही त्यांनी घेतली.
ऑक्टोबर १९१२ मध्ये उच्चविद्याविभूषित होऊन ते जेव्हा हिंदुस्थानात परतले तेव्हा त्यांच्या जीवनातील खर्याा कार्यास सुरवात झाली. त्याकाळी अनेक हिंदुस्थानी लोक पाश्चाेत्य पदवी संपादून मायदेशी येत व बड्या पगाराची नोकरी मिळवून ऐषारामी जीवन जगत. पण डॉ. केतकर यांनी अनुकरण केले ते रँग्लर अप्पासाहेब परांजपे यांचे. त्यांनी त्यागपूर्वक जीवन जगण्याचा निर्धार केला होता. १९१३-१४ च्या दरम्यान त्यांनी कलकत्ता विद्यापीठात पदवीधर विद्यार्थ्यांना राजकारण व अर्थशास्त्र शिकविण्याचे काम स्वीकारले खरे, पण त्यांच्या सत्य बाण्यामुळे त्यांना नोकरीचा त्याग करावा लागला. येथील वास्तव्यात त्यांनी ‘इंडियन इकॉनॉमिक्स’ हे पुस्तक लिहिले, पण त्यातील सत्यांशामुळे ते विरोधाचे धनी बनले. ‘हिंदू लॉ’ या दुसर्याय पुस्तकात त्यांनी अर्थकारण व समाजनियमन या दोन क्षेत्रांतील विचारांना चालना दिली. शिवाय सामाजिक, राजकीय विषयांवर अभ्यासपूर्ण लेख लिहून समाजमन जागृत करण्याचे काम केले. या वेळपर्यंत त्यांची परिपक्व झालेली परिस्थिती आणि कर्तबगार व्यक्तींचे प्रयत्न यांची सांगड पडली की त्यातून मोठी कार्ये उभी राहत असतात याची पूर्ण जाणीव झाली आणि त्यांनी ‘ज्ञानकोशा’च्या भव्य दिव्य कार्यात स्वतःला अक्षरशः झोकून दिले. तोपर्यंत तेलगू, बंगाली, हिंदी, गुजराथी, ऊर्दू यांसारख्या भारतीय भाषांत ज्ञानकोश तयार झाले होते.
केतकरांनी ‘मराठी’ ज्ञानकोशाचा ध्यास घेतला. १९१५ च्या ऑगस्टमध्ये त्यांनी सर्वप्रथम ज्ञानकोशाची कल्पना मांडली व आर्थिक अडचणींवर मात करीत असंख्यांचे असंतोष मनात साठवित व असंख्यांचे सहकार्य घेत बारा वर्षांनी त्यांनी हा ज्ञानकोश तयार केला. त्यांच्या या अद्वितिय कार्याची पावती देत त्यांच्या चाहत्यांनी त्यांच्या ‘श्रीधर व्यंकटेश केतकर’ या नावाऐवजी त्यांना ‘श्रीधर व्यंकटेश ज्ञानकोशे’ असे संबोधून त्यांचा गौरव केला. श्रीधर व्यंकटेश केतकर यांचे १० एप्रिल १९३७ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- इंटरनेट
सी.रामचंद्र यांचे मूळ नाव रामचंद्र नरहर चितळकर. त्यांचा जन्म १२ जानेवारी १९१८ रोजी झाला. ‘सी. रामचंद्र’ हे संक्षिप्त नाव त्यांनी सिनेदिग्दर्शक जयंत देसाई ह्यांच्या सूचनेवरुन धारण केले. आपल्या निकटवर्तीयांत ते ‘अण्णा’ म्हणून प्रसिद्घ होते. आर्. एन्. चितळकर, श्यामू, राम चितळकर, सी. रामचंद्र व अण्णासाहेब अशा विविध नावांनी त्यांनी संगीतदिग्दर्शन व पार्श्वगायन केले. त्यांचे वडील रेल्वेत नोकरीस होते. वडिलांची ठिकठिकाणी बदली होत असल्यामुळे त्यांचे बालपण डोंगरगड, नागपूर, विलासपूर, गोंदिया अशा निरनिराळ्या ठिकाणी गेले. शालेय शिक्षणात त्यांना फारसे स्वारस्य नव्हते; पण संगीताची अतोनात आवड होती. नागपूरच्या ‘श्रीराम संगीत विद्यालया’त त्यांनी संगीताचे पहिले धडे गिरविले. उत्तम गाणारा मुलगा असा लौकिक मिळविला. गांधर्व संगीत महाविद्यालयात त्यांनी पं. विनायकबुवा पटवर्धन यांच्या हाताखाली गायकीचे धडे घेतले. ‘न्यू थिएटर्स’ च्या चित्रपटांतल्या गाण्यांच्या ध्वनिमुद्रिका ऐकून त्यांच्या स्वरलिप्या (नोटेशन्स) बनविणे हाही त्यांचा एक छंद होता. चित्रपटात काम करण्याचीही त्यांना ओढ होती. नागानंद ह्या चित्रपटात त्यांनी नायकाची भूमिका करून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले; परंतु तो चित्रपट यशस्वी झाला नाही. प्रसिद्घ चित्रपटनिर्माते आणि दिग्दर्शक सोहराब मोदी ह्यांच्या ‘मिनर्व्हा मूव्हिटोन’ ह्या संस्थेच्या संगीत विभागात हार्मोनियमवादनाचे काम त्यांना मिळाले आणि संगीतदिग्दर्शनाच्या दिशेने त्यांची वाटचाल सुरू झाली. तेथे हूगन आणि मीरसाहेब ह्या संगीतकारांशी त्यांचा संबंध आला. हूगन हे पाश्चात्त्य वाद्यांवर हिंदुस्थानी संगीत वाजवून दाखवीत. त्यांच्या संगतीने सी. रामचंद्रांनी मुंबईच्या मोठमोठ्या हॉटेलांतून इंग्लिश वादकांचे वादन ऐकले. पश्चिमी संगीतातली उडती लय देशी गाण्यांना देता आली तर ती खूप लोकप्रिय होतील, ह्याचा अंदाज त्यांना आला. हूगन ह्यांनी तयार केलेल्या गाण्यांच्या चालींच्या स्वरलिप्या तयार करण्याचे काम त्यांच्याकडे होते. त्या करताना स्वतःला सुचलेले नवीन काही ते त्यांत घुसडून देत. हूगन ह्यांच्याकडून त्याबद्दल कधी आक्षेप आला नाही. मीरसाहेबांचे बनारसी पद्घतीच्या गायकीवर प्रभुत्व होते. चाली कशा बांधतात ह्याचे प्रात्यक्षिकच ‘मिनर्व्हा मूव्हिटोन’ मध्ये सी. रामचंद्रांना मिळाले. थोर संगीतकार अनिल विश्वास ह्यांनी हिंदी संगीतात पाश्चात्त्य संगीताचे स्वर बेमालूमपणे मिसळण्याचे तंत्र आत्मसात केले होते. त्यांच्या चालींचे संस्कारही सी. रामचंद्रांवर झाले. पाश्चात्त्य संगीताचा बाज, सुरावट व वाद्यवृंद हिंदी सिनेसंगीतात आणण्याचे व लोकप्रिय करण्याचे श्रेय मुख्यत्वे सी. रामचंद्र यांच्याकडे जाते. त्याच वेळी भारतीय संगीतातील गोडवा व सुरावटही त्यांनी आपल्या संगीतातून जपली. हिंदी स्टंटपटांतून काम करणारे अभिनेते मा. भगवान ह्यांच्याशी झालेल्या मैत्रीमुळे त्यांना जयक्कोडी हा तमिळ चित्रपट संगीत दिग्दर्शनासाठी मिळाला. त्यांचे संगीत असलेला हा पहिला चित्रपट. त्यानंतर वनमोहिनी हा आणखी एक तमिळ चित्रपट त्यांना मिळाला. मा. भगवान यांच्या सुखी जीवन ह्या चित्रपटातील ‘सारे जहाँसे अच्छा’ ह्या गीतामुळे संगीतकारांच्या जगात त्यांच्या नावाचा बोलबाला झाला. ‘जयंत देसाई प्रॉडक्शन्स’ चे जबान, मनोरमा, ललकार, चंद्रगुप्त असे काही चित्रपटही त्यांनी केले. पुढे हिंदी चित्रपटसृष्टीतील ख्यातनाम कवी प्रदीपजी ह्यांच्यामुळे शशीधर मुखर्जी ह्यांच्या ‘फिल्मिस्तान’ ह्या चित्रपटसंस्थेत सी. रामचंद्रांचा प्रवेश झाला. या चित्रपटसंस्थेच्या शहनाई ह्या चित्रपटाला त्यांनी दिलेले संगीत-विशेषतः त्यातील ‘आना मेरी जान संडे के संडे’ हे गाणे-अत्यंत लोकप्रिय झाले. ह्या चित्रपटामुळे त्यांचे नाव भारतभर झाले. अनेक चित्रपट त्यांच्याकडे आले. मा. भगवान ह्यांच्या अलबेला ह्या अफाट लोकप्रिय ठरलेल्या चित्रपटाला त्यांनी संगीत दिले. त्यातील ‘भोली सूरत दिलके खोटे’, ‘शोला जो भडके’ , ‘शाम ढले खिडकी तले’, ‘मेरे दिल की घडी करे टिक टिक’, ‘ओ बेटाजी ओ बाबूजी’ ही गाणी अतिशय गाजली. त्यांना रसिकांनी उदंड प्रतिसाद दिला. विशेषतः ‘धीरे से आजा रे अखियनमे निंदिया’ ही लोरी (अंगाई गीत) हिंदी चित्रपटांतल्या गाजलेल्या अविस्मरणीय लोरींपैकी एक मानली जाते. त्यानंतर फिल्मिस्तानच्या अनारकली ने यशाचा उच्चांक गाठला. या यशात सी. रामचंद्रांच्या संगीताचा वाटा सर्वाधिक होता. ‘ये जिंदगी उसीकी है’ हे त्यातले लता मंगेशकर यांनी गायिलेले गीत अवीट गोडीमुळे अजरामर ठरले. आझाद, इन्सानियत, तिरंदाज, यास्मिन, शहनाई, नवरंग, नास्तिक, झांझर, शिनशिनाकी बबला बू, दुनिया गोल है हे त्यांच्या संगीत दिग्दर्शना-खालील काही उल्लेखनीय चित्रपट होत. त्यांपैकी झांझर व दुनिया गोल है यांची निर्मिती त्यांनी १९५५ मध्ये अभिनेते ओमप्रकाश यांच्याबरोबर ‘न्यू साई प्रॉडक्शन्स’ तर्फे केली होती. तिरंदाज व यास्मिन या चित्रपटांच्या संगीतात त्यांनी अरबी संगीताचा कौशल्यपूर्ण वापर केला होता.
सी. रामचंद्र यांनी संगीतबद्घ केलेली काही हिंदी चित्रपटगीते उत्कृष्ट व अविस्मरणीय ठरली. उदा. ‘जाग दर्दे इष्क जाग’ , ‘जिंदगी प्यार की दो चार घडी होती है’, ‘आधा है चंद्रमा रात आधी’, ‘देख तेरे संसार की हालत’, ‘ कैसे आऊँ जमुना के तीर’, ‘कितना हसीन है मौसम’ , ‘गोरे गोरे ओ बांके छोरे’ , ‘इना मिना डिका’, ‘कटते है दुख मे ये दिन’ व ‘तुम क्या जानो, तुम्हारी याद मे’ , ‘आँखो मे समा जाओ, इस दिलमें रहा करना’, ‘जलनेवाले जला करे’ इत्यादी. मा.सी. रामचंद्र यांनी हिंदीबरोबरच काही मराठी, तमिळ, तेलुगू व भोजपुरी चित्रपटांनाही संगीत दिले. सुरूवातीच्या काळात आर्. एन्. चितळकर या नावाने त्यांनी काही मराठी चित्रपटांत भूमिका केल्या व गाणीही गायिली. १९६० च्या दशकात त्यांनी धनंजय व घरकुल हे मराठी चित्रपट निर्माण केले, त्यांना संगीत दिले व त्यांत प्रमुख भूमिकाही केल्या. घरकुल मधील गाणी, विशेषतः ‘पप्पा सांगा कुणाचे’ हे गाणे अतिशय लोकप्रिय ठरले.
भारताचे तत्कालीन पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरु ह्यांच्या उपस्थितीत सी. रामचंद्र यांनी लता मंगेशकर ह्यांच्या आवाजात दिल्ली येथे २७ जानेवारी १९६३ रोजी सादर केलेल्या ‘ऐ मेरे वतन के लोगो’ ह्या गीताला मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद हा त्यांच्या आयुष्यातला सर्वोच्च आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण होता. कवी प्रदीपजींनी भारत-चीन युद्घाच्या पार्श्वभूमीवर लिहिलेल्या ह्या भावोत्कट गीतात देशासाठी शहीद झालेल्या सैनिकांच्या बलिदानाचे स्मरण ठेवण्याचे आवाहन सर्व भारतीयांना केलेले आहे. मा.सी.रामचंद्रांनी माझ्या जीवनाची सरगम हे आपले आत्मचरित्र लिहिले आहे.
सी. रामचंद्र यांचे ५ जानेवारी १९८२ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- मराठी विश्वकोश
जितेंद्र विजय भोपळे उर्फ जादूगार जितेंद्र रघुवीर यांचा जन्म २७ जानेवारी १९७८ रोजी पुणे येथे झाला.
रघुवीर भिकाजी भोपळे ऊर्फ जादूगार रघुवीर हे जादूगार घराण्याचे अध्वर्यू ते मूळचे चाकणजवळील आंबेठाणचे. घरच्या बेताच्या परिस्थितीमुळे रघुवीर पुण्यामध्ये आले आणि अनाथ विद्यार्थी गृहामध्ये माधुकरी मागून त्यांनी शिक्षण घेतले. एकदा रस्त्याने जात असताना राणा या राजस्थानी कलाकाराला त्यांनी जादूचे खेळ करताना पाहिले. त्यांच्याकडून जादूची ही कला रघुवीर यांनी आत्मसात केली आणि ७५ वर्षांपूर्वी पहिला व्यावसायिक प्रयोग केला.
गानहिरा हिराबाई बडोदेकर यांनी जादूगार रघुवीर यांना पहिल्यांदा परदेश दौऱ्यावर नेले आणि तेथून त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही. जादूगार रघुवीर यांनी आपल्या हयातीमध्ये ७ हजार २३ प्रयोग केले.
त्यांचे चिरंजीव विजय रघुवीर यांनी ६ हजार ३३० प्रयोग केले आहेत. जितेंद्र रघुवीर हे विजय रघुवीर यांचे चिरंजीव. बालपण व शिक्षण नुमवी प्रशालेत शिक्षण स.प. महाविद्यालय पुढे B.E. production engineering भारती विद्यापीठ पुणे पुण्यात झाले. नंतर उच्च शिक्षण अमेरिका येथे जाऊन एम.एस केले. जितेंद्र रघुवीर यांनी आपल्या शालेय शिक्षणा बरोबर वयाच्या ५ व्या वर्षांपासून जादूचे प्रयोग शिकायला आणि करायला सुरवात केली. जितेंद्र रघुवीर यांनी एम.एस करूनही नोकरी न करता आपला पिढीजात व्यवसाय पुढे नेला व त्याला ग्लॅमर दिले. जितेंद्र रघुवीर यांनी आपले आजोबा जादूगार रघुवीर यांच्या सारखेच २७ देशात प्रयोग केले आहेत.
जितेंद्र रघुवीर यांना आत्तापर्यत बालगंधर्व पुरस्कार, कलागौरव पुरस्कार,इंडियन मॅजीक ॲकाडमी पुरस्कार, अखिल मराठी नाट्य परिषद पुरस्कार असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत. तसेच जितेंद्र रघुवीर यांचा युनायटेड नेशन्स, भारत सरकार ऑस्टेलिया व फिजी सरकार यांनी गौरव केला आहे.
जितेंद्र रघुवीर यांच्या पत्नी अश्विनी देशपांडे भोपळे यांनी एच आर मध्ये एम.बी.ए केले असून त्या स्वत: भरतनाट्यम डान्सर आहेत. त्यांचा मुलगा ईशान व मुलगी आणि तनिशा यांनी आपल्या वडीलांच्या कडून जादूचे प्रयोग शिकायला आणि करायला सुरवात केली आहे. जितेंद्र रघुवीर हे आपला मुलगा ईशानला जादूच्या प्रयोग स्टेजवर सामील करून घेतात.
-- संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
चित्रकला हे कार्यक्षेत्र असलेले श्री. कैलास अन्याल यांनी ठाण्यातील सरस्वती सेकंडरी स्कुलमधून आपल्या शिक्षणाची सुरुवात त्यांनी केली. नंतर रहेजा स्कूल ऑफ आर्ट मधून चित्रकलेचे शिक्षण घेतले. जाहिरात क्षेत्रात ते १४ वर्षे कार्यरत होते. नंतर मुक्तपणे पूर्णवेळ चित्रनिर्मितीला त्यांनी सुरुवात केली.
वयाच्या ८ व्या वर्षापासून “बॅडमिंटन” खेळणार्या अक्षय देवलकर ह्याने क्रीडाक्षेत्रात ठाण्याचे नाव राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर नेऊन ठेवले आहे.
यश चोप्रा यांनी पाच दशके चित्रपटसृष्टीवर राज्य केले. यादम्यान त्यांना ६ राष्ट्रीय व ११ फिल्मफेअर पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.
समाधी मंदिरावर मंदिर, मशीद, क्रूस व अग्निपात्राची प्रतिकृती आहे. जणू सर्व धर्माचं संचित इथे आहे! आतील भिंती व घुमटाच्या आत मेहेरबाबा व भक्तांची चित्रं रेखाटण्यात आली आहेत. समाधी मंदिराचा लाकडी उंबरठा ओलांडला की, समोर दिसतं मेहेरबाबांचं स्मितहास्य करणारं तैलचित्र.
Copyright © 2025 | Marathisrushti