जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
आज ३१ ऑक्टोबर.. आज ज्येष्ठ अभिनेत्री सुमती गुप्ते यांची पुण्यतिथी.
मराठीत तमाशाप्रधान चित्रपटांची चलती असताना पडद्यावर केवळ सोज्ज्वळ नायिका रंगवून आपल्या सहजसुंदर अभिनयाची मोहोर उमटवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री म्हणजे मा.सुमती गुप्ते.
त्यांचा जन्म १९१९ मध्ये वाई येथे झाला. वाईत जन्मलेल्या सुमतीबाईंचे बालपण मात्र बडोद्यासारख्या कला-संस्कृतीच्या माहेरघरात व्यतीत झाले. साहजिकच त्यांचा कलाक्षेत्राकडे, विशेषत: सिनेमाकडे ओढा होता. पदवी शिक्षण प्राप्त केल्यानंतर चित्रपटक्षेत्रात प्रवेश करण्यासाठी त्या ‘प्रभात’मध्ये दाखल झाल्या. तिथे ‘संत ज्ञानेश्वर’ या चित्रपटात त्यांना पहिले काम मिळाले. त्यानंतर त्यांना बाबासाहेब तोरणेंच्या ‘नवरदेव’ चित्रपटात प्रमुख भूमिका मिळाली. त्यांच्या कामाने प्रभावित होऊन भालजी पेंढारकरांनी त्यांना ‘थोरातांची कमळा’ या ऐतिहासिक चित्रपटात संभाजीच्या प्रेयसीची कमळेची मध्यवर्ती भूमिका दिली. त्यापाठोपाठ त्यांच्या ‘सूनबाई’नेही रौप्यमहोत्सवी यश मिळविले आणि सुमतीबाईंचे नाव एक उत्तम अभिनेत्री म्हणून सर्वतोमुखी झाले. पुढे त्यांनी मा. विनायकांच्या प्रफुल्ल पिक्चर्समध्ये ‘चिमुकला संसार’, ‘माझं बाळ’ यासारखे काही चित्रपट केले. ‘चिमुकला संसार’चे दिग्दर्शक वसंतराव जोगळेकर यांच्या रूपाने त्यांना जीवनाचा जोडीदारही इथेच लाभला. वसंतराव जोगळेकर यांच्या साथीने त्यांनी मीरा पिक्चर्स या संस्थेची स्थापना करून त्या बॅनरखाली ‘शेवटचा मालुसरा’, ‘जानकी’, ‘हा खेळ सावल्यांचा’ आदी चित्रपटांची निर्मितीही केली. अभिनयाबरोबरच 'हा खेळ सावल्यांचा', 'जानकी' आणि 'शेवटचा मालुसरा' या चित्रपटांची निमिर्ती आणि लेखनही सुमतीबाईंनी केले होते. दिग्दर्शक वसंत जोगळेकर यांच्या त्या पत्नी. ‘ऊनपाऊस’, ‘थोरातांची कमळा’, ‘चिमुकला संसार’, ‘हा खेळ सावल्यांचा’, ‘जानकी’ यांसारखे गाजलेले मराठी चित्रपट, तसेच ‘मौसी’, ‘उर्वशी’, ‘हमारा संसार’, ‘वक्त’, ‘एक मंझिल, दो राहें’ इत्यादी हिंदी चित्रपटांतून आणि ‘संशयकल्लोळ’, ‘उद्याचा संसार’, ‘संन्यस्त खड्ग’, ‘लग्नाची बेडी’, ‘विकारविलसित’ आदी नाटकांतून सुमती गुप्ते यांनी संस्मरणीय भूमिका केल्या. त्यांना रसरंगचा दादासाहेब फाळके पुरस्कार, गदिमा प्रतिष्ठानचा गृहिणी-सखी-माता पुरस्कार, शासनाचा व्ही. शांताराम पुरस्कार, अ. भा. मराठी चित्रपट महामंडळाचा ‘चित्रभूषण’ जीवनगौरव पुरस्कार मिळाले होते. नाटककार अच्युत वझे हे त्यांचे जावई आहेत.
सुमती गुप्ते यांचे ३१ ऑक्टोबर २००९ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
दत्ता केशव यांनी स्वतंत्रपणे दिग्दर्शित केलेला पहिला चित्रपट ‘अति शहाणा त्याचा.’ (१९६७) त्या वेळेस हा चित्रपट मराठी आणि भोजपुरी भाषेत करण्यात आला होता. पुढे ‘बायांनो नवरे सांभाळा’ हा चित्रपट १९७४-७५ साली प्रदर्शित झाला. चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन दत्ता केशव यांचे होते. ‘पिंजरा’नंतरचा हा मराठी रंगीत चित्रपट होता.
नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांचा जन्म ९ मे १८६६ रोजी झाला. गोपाळ कृष्ण गोखले हे भारतामधील ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध कायदेशीर राजकारणाच्या मार्गाने स्वातंत्र्यलढ्याचा पाया घालणाऱ्या राजकीय व सामाजिक नेत्यांपैकी एक होते. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, भारत सेवक समाज या संघटनांचे ते आघाडीचे नेते होते. रत्नागिरी जिल्ह्यातील कोतळूक या खेड्यात जन्मलेल्या गोखले यांचे बालपण कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथे गेले. त्यांचे प्राथमिक शिक्षणही येथेच झाले. वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांचे वडीलबंधू गोविंदराव यांनी स्वतःचे शिक्षण सोडून आणि त्यांच्या वहिनींनी स्वतःचे दागिने विकून केलेल्या त्यागामुळे त्यांचे उच्च शिक्षण कोल्हापूरचे राजाराम कॉलेज व मुंबईचे एलफिन्स्टन कॉलेज येथे होऊ शकले. १८८४ मध्ये बी.ए. पदवी घेऊन जानेवारी, १८८५ मध्ये पुण्याच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये त्यांनी शिक्षकाची नोकरी स्वीकारली. पुण्याच्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे आजीव सदस्यत्व, फर्ग्युसन कॉलेजमध्ये अध्यापन, १८९५ मध्ये मुंबई विद्यापीठाच्या सिनेटवर फेलो म्हणून नियुक्ती असा प्रवास सुरू असतानाच भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या माध्यमातून त्यांचा सार्वजनिक जीवनात प्रवेश झाला. सार्वजनिक सभेचे सचिव म्हणूनही त्यांनी काही काळ कार्य केले. शेतकऱ्यांचे कर्ज, दुष्काळ व सावकारांचा त्रास आदी विषयांचा सखोल अभ्यास करून सरकारकडे निवेदने पाठवणे, त्याबाबत पाठपुरावा करणे-अशा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांविषयक करण्यात येणाऱ्या कार्यात त्यांनी शिस्त निर्माण केली. त्यामुळे त्यांच्या निवेदनांना सर्वत्र मान्यता मिळाली.
बाळ गंगाधर टिळक आणि त्यांचा राजकीय प्रवास एकाच व्यासपीठावरून सुरू झाला. लोकमान्यांना जहालवादी राजकारण मान्य होते तर गोखलेंनी मवाळवादाचा मार्ग स्विकारला. त्यांनी लोकशिक्षण, अस्पृश्यता / जातीव्यवस्था निर्मूलन, स्त्रीशिक्षण, स्त्रीस्वातंत्र्य यांच्या माध्यमातून समाजकार्य केले. तत्कालीन इंग्रजी शासकांना समजेल अशाप्रकारे त्यांनी समाज सुधारणा मांडल्या आणि त्या मान्य करून घेतल्या. १९०२ साली त्यांची निवड मध्यवर्ती कायदेमंडळावर झाली. या निवडीचा त्यांनी पूर्णपणे उपयोग केला आणि विविध समस्यांना तसेच प्रश्नांना वाचा मिळवून दिली. या दरम्यान त्यांच्यातील क्षमतेची दखल घेऊन तत्कालीन व्हाईसरॉय लॉर्ड मिंटो यांनी नामदारांना १९०९ सालच्या मोर्ले-मिंटो सुधारणा कायद्याचा मसुदा तयार करण्यास सांगितले.
त्यासाठी ते इंग्लंड येथे वास्तव्य करून होते. त्या दरम्यान त्यांनी तेथील पार्लमेंटच्या सदस्यांना भेटून भारतातील समस्या आणि प्रश्न त्यांच्या कानी घातले आणि त्याकारणी त्यांचा पाठिंबा मिळविण्यात यशस्वी झाले. १८८९ मध्ये काँग्रेसच्या व्यासपीठावर केलेल्या पहिल्या भाषणापासून त्यांचा काँग्रेसशी संबंध प्रस्थापित झाला. आयुष्याच्या अखेरीपर्यंत ते काँग्रेसशी एकनिष्ठ राहिले. काँग्रेसचे ते राष्ट्रीय पातळीवरील नेते म्हणून गणले जात. डिसेंबर, १९०५ मध्ये बनारस येथे भरलेल्या काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली. त्यांनी काँग्रेसचे कार्य भारतात व इंग्लंडमध्येही केले. भारताच्या सेवेसाठी तरुण त्यागी, निष्ठावान कार्यकर्ते घडवण्याच्या उद्देशाने १३ जून, १९०५ रोजी त्यांनी भारत सेवक समाजाची (The Servants of India Society) स्थापना केली. मुंबई प्रांताच्या विधिमंडळाचे सभासदत्व, सन १९०२ पासून मध्ये केंद्रीय कायदेमंडळाचे सभासदत्व अशी अनेक मानाची पदे त्यांनी भूषविली. ते प्रदीर्घ काळ केंद्रीय कायदे मंडळाचे सभासद होते. सभागृहात अर्थसंकल्पावरील भाषणे गाजविणे हा तर त्यांचा हातखंडा होता. ते भारतातील पहिल्या श्रेणीचे अर्थतज्ज्ञ होते. त्या काळी भारतातील ब्रिटिश राज्याच्या वाढत्या खर्चाची चौकशी करण्यासाठी लॉर्ड वेल्बी यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या आयोगासमोर गोखले यांची साक्ष अतिशय महत्त्वाची ठरली होती.
या बुद्धिमत्तेच्या व गाढ व्यासंगाच्या आधारे दिलेल्या साक्षीमुळे त्यांचे नाव महाराष्ट्रात किंवा भारतातच नव्हे, तर परदेशातही प्रसिद्ध झाले. न्यायमूर्ती रानडे यांच्या आर्थिक व राजकीय विचारांचा गोखले यांच्यावर विशेष प्रभाव होता. ते न्यायमूर्ती रानडे यांना आपल्या गुरुस्थानी मानत; तर गोखले यांच्या अंगी असलेल्या शुचिता, नैतिकता, तत्त्वनिष्ठता, सौजन्यशीलता व नि:स्वार्थी सेवावृत्ती आदी गुणांनी प्रभावित होऊन महात्मा गांधीजी त्यांना (गोखले यांना) गुरुस्थानी मानत असत. गांधीजी त्यांना ‘महात्मा गोखले, धर्मात्मा गोखले’ म्हणत. भारतात सर्वप्रथम कायद्याचे राज्य, शांतता, सुव्यवस्थेचे प्रस्थापन, आधुनिक विचारांचे केलेले बीजारोपण, देशात केलेल्या अनेक सुधारणा यांमुळे इंग्रजी सत्तेविषयी त्यांचे धोरण मवाळ होते. कोणतीही चळवळ कायद्याच्या चौकटीतून करणे, स्वदेशीच्या वापरातून आपल्या देशातील उत्पादनास चालना देऊन आर्थिक उद्दिष्ट साध्य करणे असे त्यांचे विचार असत. गोपाळ गणेश आगरकरांनी सुरू केलेल्या ’सुधारक’ च्या इंग्रजी आवृत्तीची जबाबदारी नामदार गोखले यांनी काही काळ सांभाळली.
सार्वजनिक सभा, राष्ट्रसभा समाचार या वृत्तपत्रांतूनही त्यांनी लेखन केले. वृत्तपत्रातील लिखाणाद्वारे ते समाजसुधारणांचा सतत पाठपुरावा करत. ‘राजकारणाचे आध्यात्मिकरण’ ही अतिशय वेगळी (परंतु कोणत्याही स्तरावरील, क्षेत्रातील राजकारणात सर्वकाळ अत्यावश्यक असणारी) संकल्पना त्यांनी भारतात मांडली. राजकारण हे साधन शुचितेला महत्त्व देऊन, सेवाभावाने करायचे विशेष कार्य आहे , असे त्यांचे ठाम मत होते. चारित्र्य, नैतिकता, नि:स्वार्थी वृत्ती या सद्गुणांचा त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला, स्वतःचे आदर्श उदाहरणही तत्कालीन नेत्यांसमोर व जनतेसमोर ठेवले. १९०५ साली त्यांनी भारत सेवक समाजाची स्थापना केली.नामदार गोखले यांच्या स्मरणार्थ पुणे शहरात 'गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अॅन्ड इकॉनॉमिक्स' नावाची संस्था स्थापन करण्यात आली. ते संपूर्ण आयुष्य राजकारणात राहूनही ’राजकारण’ न करता विशुद्ध सार्वजनिक जीवन जगले नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांचे १९ फेब्रुवारी १९१५ निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
गुप्तहेर म्हणजे बॉन्ड.. जेम्स बॉन्ड.. असे समीकरण असणा-या जेम्स बॉन्डच्या चित्रपटांना आज पंचावन्न वर्षे पूर्ण झाली आहेत. जगातल्या जवळपास ५० टक्क्य़ांहून अधिक लोकांनी जेम्स बॉण्ड हे नाव ऐकलेलं आहे. जगातल्या इतर कुठल्याही चित्रपटाला बॉण्डपटांइतकी लोकप्रियता मिळालेली नाही. ब्रिटिश कादंबरीकार इयान फ्लेमिंग यांनी जेम्स बॉन्डच्या पात्राला जन्म दिला आणि पाहता पाहता संपूर्ण जगभरातील सिनेचाहत्यांना बॉन्डपटाचे वेड लागले.
जेम्स बाँड हे इयान फ्लेमिंग ह्यांनी १९५३ साली बनवलेले एक काल्पनिक पात्र आहे. जेम्स बाँड हा एक ब्रिटिश गुप्तहेर असून तो खात्यामध्ये ००७ ह्या सांकेतिक नावाने ओळखला जात असतो. ५ ऑक्टोबर १९६२ साली आलेला ‘डॉक्टर नो’ हा पहिला बॉन्डपट. इयन फ्लेमिंगने बाँडवर ६ कादंबऱ्या व २ लघुकथा लिहिल्या. इयान फ्लेमिंगचा मृत्यू १९६४ मध्ये झाला. त्यानंतर जेम्स बॉण्ड सीरिजचा पिता म्हणून किंग्जले अमिस यांना ग्लिडरोज पब्लिकेशन या प्रकाशन संस्थेने पाचारण केले. त्यानुसार त्यांनी ‘कर्नल सन’ ही कादंबरी रॉबर्ट मर्खाम या टोपणनावाने लिहिली. पण पुढील कादंबऱ्या स्वत:च्याच नावाने लिहिल्या. त्यानंतर ख्रिस्तोफर वूड, जॉन गार्डनर, रेमंड बेन्सन, सॅबॅस्टियन फॉल्क्स, जेफ्री डेवर, विल्यम बॉयड या सात लेखकांनी बॉण्ड सीरिजमधल्या कादंबऱ्या-कथा लिहिल्या. त्या सर्वावर बॉण्डपट आले. तेही जगभर तुफान गाजले. या काळात जसा जेम्स बॉण्डचा पिता बदलत गेला.
बॉण्ड चित्रपटांत शॉन कानरी, जार्ज लेझांबी, रॉजर मूर, टिमोथी डाल्टन, पिअर्स ब्रॉस्नन आणि डॅनिअल क्रेग जेम्स बाँडची यांनी व्यक्तिरेखा साकारली आहे. चित्रपटांमध्ये हेरगिरी करत शत्रूंच्या नाकी नऊ आणणा-या आणि सुंदर तरूणींना आपल्या चलाखीने, स्मार्ट लूकने वेड लावणा-या बॉन्डची भूमिका साकरणा-या कलाकारांनी ख-या आयुष्यातही जगभरातील तरूणींना घायाळ केले आहे. जेम्स बाँड नायक असलेले आजवर २४ चित्रपट प्रदर्शित झाले असून सर्वात नवा चित्रपट २०१५ सालचा स्पेक्टर हा होय. हे चित्रपट अत्यंत यशस्वी ठरले असून ते जेम्स बाँडच्या पात्राची स्टाईल, रूबाब तसेच चित्रपटांमधील संगीतासाठी ओळखले जातात. आजवर सहा वेगवेगळ्या सिनेनायकांनी ह्या २४ चित्रपटांमध्ये आजवर जेम्स बाँड शृंखलेमध्ये २४ चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. हे सर्व चित्रपट एऑन प्रॉडक्शन्स ह्या लंडनमधील कंपनीने बनवले आहेत.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
बांगलादेशी पार्श्वगायिका रूना लैला यांचा जन्म १७ नोव्हेंबर १९५२ रोजी सिलहट बांगलादेश येथे झाला. भूपिंदर आणि रुना लैला यांनी गायलेलं घरोंदा या चित्रपटातील दो दीवाने शहर में हे गाणं व दमादम मस्त क़लन्दर हे खूपच लोकप्रिय झाले होते. रूना लैला यांनी जयदेव, कल्याणजी-आनंदजी, लक्ष्मीकांत प्यारेलाल व भप्पी लाहिरी यांच्या बरोबर काम केले आहे.
त्यांची काही बंगाली 'साधेर लाऊ बनाईलो मोरे', 'शिल्पी आमी, तोमादेरी गान शोनाबो' ही पण लोकप्रिय आहेत.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
अव्वल इंग्रजीतील मराठी व्याकरणकार, ग्रंथकार आणि कळकळीचे धर्मसुधारक पांडुरंग दादोबा तर्खडकर यांचा जन्म ९ मे १८१४ रोजी झाला.
प्राथमिक शिक्षण घरी वडिलांजवळ तसेच खाजगी शाळांतून आणि माध्यमिक शिक्षण ‘बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी’ च्या शाळेत झाले. गुजराती व फार्सी भाषा त्यांना अवगत होत्या. सरकारी नोकरीत शिक्षक, अधीक्षक, उपजिल्हाधिकारी अशा विविध हुद्यांवर त्यांनी काम केले, सेवानिवृत्तिनंतर अल्पकाळ ओरिएंटल ट्रान्स्लेटरच्या हुद्यावर ते होते.
संस्कृत व इंग्रजी भाषांच्या व्याकरणाचे अध्ययन करून आणि मराठी भाषेच्या रूपविचाराची स्वतंत्र प्रज्ञेने व्यवस्था लावून मराठी भाषेचे व्याकरण (१८३६) त्यांनी सिद्ध केले. ह्या व्याकरणाच्या अनेक आवृत्या निघाल्या.
१८८१ मध्ये दादोबांनी आपल्या व्याकरणाच्या सातव्या आवृत्तीची पूरणिकाही प्रसिद्ध केली. विद्यार्थ्यांसाठी शालोपयोगी लघुव्याकरणही (१८६५) त्यांनी लिहीले. त्याच्याही अनेक आवृत्या निघाल्या. मोरोपंतांच्या केकावलीवर यशोदापांडुरंगी (१८६५) ही गद्य टीका त्यांनी लिहिली. तीतून दादोबांची सहृदयता प्रत्ययास येते. ह्या टीकेस इंग्रजी आणि मराठी अशा दोन प्रस्तावना त्यांनी जोडल्या. त्यांपैकी मराठी प्रस्तावनेत त्यांचे वाङ्मयविषयक विविध विचार आलेले आहेत. त्यांचे १८४६ पर्यंतचे आत्मचरित्र (१९४७, संपा. अ. का. प्रियोळकर) महत्त्वाचे आहे.
अव्वल इंग्रजीतील जवळजवळ एकमेव आत्मचरित्र म्हणून दादोबांच्या आत्मचरित्राचे महत्त्व आहेच. तथापि त्यांच्या काळातील धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय स्थितीचे त्यात पडलेले प्रतिबिंबही अभ्यासकांच्या दृष्टीने मोलाचे आहे. स्वतः दादोबांचे जीवन अशा काही चळवळींशी वेगवेगळ्या प्रकारे निगडित झालेले असले, तरी त्यांच्या आत्मचरित्रातून त्या चळवळींबरोबरच दादोबांचे व्यक्तिमत्त्वही स्पष्टपणे प्रत्ययास येते. साधी भाषाशैली आणि प्रांजळ निवेदन ही ह्या आत्मचरित्राची काही उल्लेखनीय वैशिष्ठ्ये. यांशिवाय मराठी नकाशांचे पुस्तक (१८३६), इंग्रजी व्याकरणाची पूर्वपीठिका (१८६०), धर्मविवेचन (१८६८), पारमहंसिक ब्राह्मधर्म (१८८०) आणि शिशुबोध (१८८४) अशी विविध प्रकारची त्यांची ग्रंथरचना आहे, तसेच काही मराठी आणि इंग्रजी स्फुट निबंधही त्यांनी लिहिले. विधवापुनर्विवाहाचे समर्थन करण्यासाठी त्यांनी लिहिलेला ‘विधवाश्रुमार्जन’ हा संस्कृत निबंध बाबा पदमनजी ह्यांच्या यमुनापर्यटन ह्या कादंबरीत अंतर्भूत करण्यात आला होता.
विख्यात स्वीडिश तत्वज्ञ स्वीडनबॉर्ग ह्याच्या ग्रंथावर त्यांनी लिहिलेल्या अ हिंदू जंटलमन्स रिफ्लेक्शन्स रिस्पेक्टिंग द वर्क्स ऑफ एमानुएल स्वीडनबॉर्ग (१८७८) ह्या ग्रंथाची यूरोपात प्रशंसा झाली होती. दादोबांच्या साहित्यात साधेपणा आणि विचारप्रवर्तकता आहे. त्यांचे मराठी व्याकरणविषयक कार्य अग्रेसर महत्त्वाचे असून त्यायोगे मराठी गद्याला प्रमाणरूप प्राप्त झाले असल्याने ‘मराठी भाषेचे पाणिनी’ हे रास्त बिरुद त्यांना लावले जाते.
ग्रंथलेखनाप्रमाणेच समाजसुधारणेचे कार्यही दादोबांनी केले. सरकारी नोकरी करीत असतानाच लोकहिताच्या कार्यात त्यांनी भाग घेतला. दुर्गाराम मनसाराम मेहेता यांनी सुरतला स्थापन केलेली मानवधर्मसभा (१८४४) आणि राम बाळकृष्ण जयकर यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेली परमहंस सभा (सु. १८४८) या धर्मसुधारक संस्थांमागे दादोबांची प्रेरणा होती. यांशिवाय मराठी ज्ञानप्रसारक सभा, मुंबई विद्यापीठ, पुनर्विवाहोत्तेजक सभा, बॉम्बे असोसिएशन इ. संस्थांच्या कार्यातही त्यांचा सहभाग असे.
भिल्लांचा बंडखोर पुढारी पटाजी नाईक याचे बंड त्यांनी १८५७ साली मोडून काढले व सरकारने रावबहादुर ही पदवी त्यांना बहाल केली. पांडुरंग दादोबा तर्खडकर यांचे १७ ऑक्टोबर १८८२ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३
संदर्भ.मराठी विश्वकोश/ मालशे, स. गं.
‘हम अंग्रेजोंके जमाने के जेलर है’ या शोलेतल्या संवादाने व आपल्या अनेक वैविध्यपूर्ण भूमिकांनी रसिकांना रिझवणारे ज्येष्ठ अभिनेते असरानी यांनी अनेक हिंदी चित्रपटात भूमिका केल्या आहेत. त्यांचा जन्म १ जानेवारी १९४१ रोजी झाला. ‘फॅमिली ४२०’ या मराठी चित्रपटात सुद्धा असरानी यांनी काम केले आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट
गाईड चित्रपटासाठी १९६५ साली नॅशनल फिल्म अवॉर्ड मिळाले , तर २००२ साली दादासाहेब फाळके अवॉर्ड मिळाले .त्यांनी निर्माता , अभिनेता , डायरेक्टर , नवकेतन फिम्सचा सहनिर्माता अशा अनेक प्रकारे काम केले.
मराठी गायक, कवि, लेखक व कीर्तनकार बबनराव नावडीकर यांचा जन्म १९ ऑगस्ट १९२२ रोजी झाला.
बबनराव नावडीकर यांचे मूळ नाव श्रीधर यशवंत कुलकर्णी. त्यांचे वडीलही कीर्तन करीत. गाण्यासाठी बबनराव दहावीत शिकत असताना कऱ्हाड येथून पळून पुण्यात आले आणि वाराने राहून त्यांनी पुढचे शिक्षण घेतले. नंतर ते पुण्यातील सरस्वती मंदिर शाळेत गायन शिक्षक झाले. तेथॆ त्यांना आदर्श शिक्षकाचा पुरस्कारसुद्धा मिळाला. पुण्यात आले तेव्हा बबनराव नावडीकर यांना गजानन वाटवे यांच्या गायनाचे फार आकर्षण होते. त्यांना भेटण्याची अनावर इच्छा होती. घर सोडून आलेले नावडीकर एकदा पुण्यात हुजूरपागेवरील फुटपाथवर बसले होते. बाजूला कंपाऊंडची भिंत होती. बबनराव येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांकडे बघत बसले होते. त्यांच्या वडिलांचे- यशवंत नावडीकर यांचे एक मित्र त्या रस्त्याने जात होते. त्यांनी बबनरावांना ओळखले व चौकशी केली. बबनराव म्हणाले, ‘मी घरातून निघून आलो आहे. मला गाणं शिकायचंय.’ त्यांनी बबनरावांना चार-पाच दिवस आपल्या घरी ठेवून घेतले. पुण्यामध्ये हिंडताना एके दिवशी टिळक रोडवरील गोखले बिल्डिंगमध्ये त्यांना गायक गजाननबुवा जोशी हे गुरू भेटले. त्यांच्याकडे नावडीकरांचे संगीताचे शिक्षण सुरू झाले. त्यांची गजाननराव वाटवे यांना भेटण्याची इच्छा मात्र अजून पूर्ण झाली नव्हती. ते गुरूंकडेच राहत होते. तिथे असताना एकदा गजाननराव वाटवे सायकलीवरून जाताना त्यांना दिसले. या भेटीनंतर त्यांचा कार्यक्रम ऐकण्याचाही योग आला. आपले गुरूस्थान हेच आहे हे नावडीकरांना तेव्हा समजून चुकले.
शंकराचार्यांनी त्यांना भावगीतरत्न ही उपाधी बहाल केली होती. बालगंधर्वांबरोबर त्यांनी काही नाटकांत भूमिकाही केल्या होत्या. बबनराव नावडीकरांनी ३०-४० वर्षे स्वतःच्या आवाजात गीतरामायणाचे कार्यक्रम केले. सुधीर फडके यांच्या श्रद्धांजलीच्या कार्यक्रमात आकाशवाणीने बबनरावांना ’उदास का तू आवर वेडे' म्हणायला सांगितले होते. एकेकाळी पुण्यातील कोणताही लग्नसमारंभ बबनराव नावडीकरांच्या मंगलाष्टकां शिवाय होत नसे. बबनराव नावडीकर म्हणत त्यांच्या या यशामागे त्यांच्या पत्नी मंगला नावडीकर यांचा सिंहाचा वाटा आहे. 'त्यांनी घर बघितले नसते तर आज मी इथपर्यंत पोचलो नसतो' असे ते म्हणत.
बबनराव नावडीकर हे बालगंधर्वांचे भक्त असल्याने त्यांनी बालगंधर्वांची गायकी तरुण पिढीपुढे नेण्यासाठी अतोनात परिश्रम केले. गंधर्वांचे फोटो आणि माहिती यांचे एक प्रदर्शन नावडीकरांनी गावोगाव नेऊन सुमारे बाराशे ठिकाणी भरवले. 'मी पाहिलेले बालगंधर्व' हे पुस्तक स्वतः बबनराव यांनी लिहिले आहे. त्याचा मंगलाष्टक गायनाचा वारसा त्यांचे सुपुत्र विजय नावडीकर आणि नातं मुग्धा नावडीकर करत आहेत.
बबनरावांचे सुपुत्र प्रा. विजय नावडीकर व दोन नाती मेधा आणि मुग्धा यांनी त्यांच्या गाण्याचा वारसा स्वरमुग्धा या संस्थेमार्फत गाण्याचे कार्यक्रम करून चालूच ठेवला आहे. 'रानात सांग कानात' हा खास बबनराव नावडीकरांनी गायलेल्या गीतांचा कार्यक्रम त्यांच्या स्मृतीदिनी होतो. त्यात बबनराव नावडीकरांची आणि त्यांच्या समकालीन गायकांची गाणी सादर केली जातात. बबनरावांचा एक नातू आनंद अरविंद नावडीकर हा सुद्धा बबनरावांचा वसा पुढे चालवीत आहे. गेली अनेक वर्षे अमेरिकेत राहून तेथे गीत रामायणातील पदे, जुनी मराठी हिंदी गीते आणि बबनरावांची भावगीते सादर करीत आहे.
बबनराव नावडीकर यांचे २८ मार्च २००६ रोजी निधन झाले.
त्यांची निवडक गाणी:
https://www.youtube.com/watch?v=W0a1nq5DHi8&index=1&list=PL759C91FA75E7FC08
https://www.youtube.com/watch?v=QHiIWXKDSs8
https://www.youtube.com/playlist?list=PL759C91FA75E7FC08
-- संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Copyright © 2025 | Marathisrushti