(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

  • (डॉ.) अनला पंडित

    पंडित, (डॉ.) अनला

    कोणत्याही खासगी अथवा सार्वजनिक कंपनीमध्ये कार्यरत असलेल्या यंत्रणेने आपल्याकडे उपलब्ध असलेल्या माहिती साठय़ाचा योग्य उपयोग करून घेतल्यास त्याचा कंपनीच्या विकासासाठी मोठा फायदा होऊ शकतो; पण त्यासाठी कंपनी कर्मचाऱ्यांना आपल्याच कंपनीमध्ये उपलब्ध असलेल्या या माहितीचा कसा शोध घ्यायचा याचे प्रशिक्षण दिले जाणे आवश्यक असते. किंबहुना ही माहिती कशी जमा करावी, त्याचा उपयोग कसा करावा याबाबतचा खास अभ्यासक्रम असेल तर त्याचा मोठाच फायदा होऊ शकतो.

    ‘वीरमाता जिजाबाई टेक्निकल इन्स्टिटय़ूट’च्या (व्हीजेटीआय) सहाय्यक प्राध्यापिका अनला पंडित यांनी ‘आयबीएम’ या जगविख्यात संगणक कंपनीला अशा माहितीचा उपयोग करून घेणारा ‘कॉम्पिटिटिव्ह इंटलिजन्स यूजिंग बिझनेस अ‍ॅनॅलिसिस’ हा प्रोजेक्ट सादर केला. पंडित यांचा हाच प्रोजेक्ट ‘आयबीएम’च्या दहा हजार डॉलर्सच्या (सुमारे साडेचार लाख रुपये) ‘सर्जनशील शिक्षक पुरस्काराचा’ मानकरी ठरला आहे. जगभरातून २०४ तर भारतातून अवघ्या सहा जणांची या पुरस्कारासाठी निवड झाली होती, त्यात पंडित एक होत्या. ‘आयबीएम’ने दिलेल्या या रकमेतून आता पंडित ‘व्हीजेटीआय’मध्ये हा प्रोजेक्ट प्रत्यक्ष राबविणार आहेत. कोणत्याही प्रोजेक्टसाठी, संशोधन कार्यासाठी एखाद्या कंपनीकडून अशा प्रकारचा पुरस्कार मिळणे ही त्या शिक्षकासाठी व संबंधित महाविद्यालयासाठी अभिमानास्पद बाब असते. सायन येथील ‘एसआयईएस’ महाविद्यालयातून त्यांनी १९८१ मध्ये बीएस्सी तर १९८३ साली मुंबई विद्यापीठातून एमएस्सी अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यांनी अमेरिकेत ‘युनिव्हर्सिटी ऑफ लुईविल’मध्ये दोन वर्षांचा एमएस इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरींग हा (एमटेक समकक्ष) अभ्यासक्रम पूर्ण केला. पंडित यांच्या आई शिक्षिका तर वडील महापालिकेमध्ये नोकरी करणारे. त्यांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळेच हे उच्चशिक्षण शक्य झाले. ८५ साली शिक्षण पूर्ण करून त्या मुंबईस परतल्या आणि वाटुमल अभियांत्रिकी महाविद्यालयात व्याख्यात्या म्हणून रुजू झाल्या. विद्यार्थ्यांना पुस्तकाबाहेरचे शिक्षण द्यायचे, त्यांना संशोधनासाठी प्रवृत्त करायचे, पुस्तकी शिक्षणाबरोबरच समाजासोबत जोडून घ्यायला प्रवृत्त करायचे या हेतूने त्यांनी विविध उपक्रम महाविद्यालयात सुरू केले. पती अनिरूद्ध हे ‘आयसीटी’मध्ये (यूआयसीटी) प्राध्यापक, तर सासरे भालचंद्र पंडित हेसुद्धा शिक्षकच. त्या दोघांचे अनेक बाबतींत मार्गदर्शन आणि सहकार्य त्यांना लाभले. सुमारे साडेतीन वर्षांच्या सेवेनंतर काही कारणास्तव त्यांनी वाटूमल महाविद्यालयातील नोकरीचा राजीनामा दिला आणि क्रॉम्प्टन या खासगी कंपनीत त्या ‘कस्टमर सपोर्ट एक्झिक्युटिव्ह’ पदावर रूजू झाल्या. त्यांच्या कामाने प्रभावित होऊन वरिष्ठांनी प्रोबेशन काळातच त्यांना बढती दिली. मात्र तीन-चार वर्षे हे काम केल्यानंतर पुन्हा शिक्षकी पेशात यायचा निर्णय त्यांनी घेतला. १९९४ ते ९९ या काळात त्यांनी रिझवी इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट, व्हीजेटीआय, एमईटी या महाविद्यालयांमध्ये व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून काम केले. २००० मध्ये त्यांना व्हीजेटीआयमध्येच पूर्णवेळ व्याख्याता होण्याची संधी मिळाली. त्यांच्या कामाचा व्याप आता रेडिफ, आयबीएम, सिटी बँक अशा विविध कंपन्याच्या कर्मचाऱ्यापर्यंत जाऊन पोचला आहे. राष्ट्रीय स्तरावरच्या काही पुरस्कारांच्या मानकरीही त्या ठरल्या आहेत. त्यांना पीएच.डी.साठी अमेरिकेतील ‘युनिव्हर्सिटी ऑफ लुईविल’ येथे पाठविण्याचा निर्णय व्हीजेटीआयने घेतला आहे. ऑगस्टमध्ये त्या अमेरिकेला जाणार आहेत, त्यांच्या भावी वाटचालीला शुभेच्छा.

  • कलाकार सदानंद जोशी

    या कार्यक्रमाच्या पहिल्या प्रयोगाला आचार्य अत्रे स्वत: उपस्थित होते. कार्यक्रम झाल्यानंतर अत्र्यांनी केलेल्या भाषणात सदानंद जोशी यांना प्रशस्तिपत्र देताना अत्रे म्हणाले “सदानंद जोशी यांनी मला जिवंतपणी अमर केल आहे.” मी अत्रे बोलतोय!

  • यशवंत चकोर

    आपल्या पहाडी आवाजाने महाराष्ट्राला दणाणून सोडणारे गोवा मुक्तीसंग्राम व संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील सेनानी शाहीर यशवंत चकोर.

    १९४२ च्या स्वातंत्र्य-लढ्यात जयप्रकाश नारायण यांच्या सभेची सुरुवात करण्याची संधी शाहीर चकोर यांना मिळाली होती. १९४७ मध्ये क्रांतिवीर नाना पाटील यांच्या सभेत त्यांनी स्वातंत्र्यगीते गायली. पुढे शाहीर अमर शेख, अण्णाभाऊ साठे अशा ज्येष्ठ शाहिरांसोबत त्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत भाग घेतला.

    त्यावेळी मुंबई प्रांत सरकारविरोधात प्रचार केल्यामुळे त्यांना रेल्वेची नोकरी गमावावी लागली. आचार्य अत्रे यांना हे कळल्यानंतर त्यांनी 'दैनिक मराठा' नाशिक जिल्ह्याची एजन्सी त्यांना दिली. पुढे चकोर १० वर्षे मनमाड नगरपालिकेत नगरसेवक होते. लोककलेतून जनजागृती करणार्‍या या कलाकारावर आचार्य अत्रे प्रचंड खुश होते. सभेपूर्वी ते 'जय देव जय देव जय मंगलमूर्ती' हे गीत शाहीर चकोर यांना म्हणायला सांगत.

    स्वातंत्र्यापासून संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत कार्यरत राहणार्‍या आणि अनेक वर्षे पुरोगामी पक्षाबरोबर जनजागृतीचे काम करणार्‍या या शाहिराच्या वाट्याला अखेरपर्यंत उपेक्षाच आली. निळू फुले, राम नगरकर यांच्यासोबतीने पुण्यात कलापथकात काम करणारे शाहीर केवळ आईच्या आग्रहास्तव पुन्हा मनमाडला आले. त्यानंतर त्यांनी मनमाड सोडले नाही.

    पुण्याच्या बालगंधर्व नाट्यगृहाच्या उदघाटनाप्रसंगी पहिले गाणे शाहीर चकोरांनी सादर केले. त्या गाण्याला चाल व संगीत पु. ल. देशपांडे यांनी दिले. अशा कितीतरी आठवणींवर शाहीर शेवटपर्यंत चिरतरुण होते. त्यामुळेच उपेक्षित जगण्याची त्यांनी कधीही खंत व्यक्त केली नाही.

    गोवामुक्ती संग्राम स्वातंत्र्यसैनिकाचा दर्जा मिळावा, यासाठी त्यांनी केलेले सर्व प्रयत्न अयशस्वी झाल्याने त्यांचा अखेरच्या टप्प्यातील प्रवास खडतर झाला होता. जागा मराठा, आम जमाना बदलेगा, उठा है जो तुफान, वह आखिर बंबई लेके दम लेगा अशी महाराष्ट्र गीते, पोवाडे आणि शौर्यगीते गाऊन एकेकाळी महाराष्ट्राला वेड लावणारे शाहीर चकोर अखेरच्या क्षणी स्वातंत्र्यसैनिकाचा दर्जा मिळविण्यासाठी दारोदार भटकत होते. उदरनिर्वाहासाठी अल्पबचत एजंट म्हणून घरोघरी पैसे गोळा करण्याचे काम करणार्‍या शाहिरांनी अखेरपर्यंत काम केले.

    त्यांचे वयाच्या ८७ व्या वर्षी निधन झाले. अखेरपर्यंत चकोर हे शाहीर म्हणून मिळणारे तुटपुंजे मानधन व पतसंस्थेचे कमिशन यावर गुजराण करत होते.

    (संदर्भ : महाराष्ट्र टाईम्समधील नोंद हे सदर)


  • नारायण श्रीपाद राजहंस, ऊर्फ बालगंधर्व

    बालगंधर्व या नावाने अधिक लोकप्रिय असलेले विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळातील मराठी रंगभूमी आणि चित्रपटांतील अभिनेते, गायक आणि नाट्यनिर्माते. त्यांचा जन्म २६ जून १८८८ रोजी झाला.रंगभूमीवर स्त्रिया अभिनय करीत नसतानाच्या काळात आपल्या हुबेहुब रंगवलेल्या स्त्री-भूमिकांमुळे बालगंधर्वांनी मोठी लोकप्रियता मिळवली. नाट्यगीतांसह ख्याल, ठुमरी, गझल, दादरा, भक्तिगीते यांसारख्या गायन प्रकारांवरही त्यांचे विलक्षण प्रभुत्व होते. बालगंधर्व भास्करबुवा बखले यांचे शिष्य आणि मास्तर कृष्णरावांचे गुरुबंधू होत. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात त्यांचे गाणे ऐकून बाळ गंगाधर टिळकांनी त्यांना बालगंधर्व ही पदवी बहाल केली. पुढे ते त्याच नावाने लोकप्रिय झाले. बालगंधर्वानी आपल्या भूमिका साकारनाच संगीत नाटक आणि नाट्यसंगीत हे कलाप्रकार मध्यमवर्गीय महाराष्ट्रीय कुटुंबांमध्ये लोकप्रिय केले. नाटककार अण्णासाहेब किर्लोस्कर, गोविंद बल्लाळ देवल, श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, काकासाहेब खाडिलकर, राम गणेश गडकरी आणि वसंत शांताराम देसाई प्रभृतींनी लिहीलेली अनेक संगीत नाटके बालगंधर्वांनी केली. बालगंधर्वांनी कंपनीतील सर्वांना चांदीच्या थाळीतून वरण-भात तूप आणि पक्वान्नं खाऊ घातली, त्यांनाच आंधळ्या प्रेमापोटी जर्मनच्या थाळीतून जेमतेम अर्धी भाकरी अन्‌ मूठभर भात खाण्याची वेळ यावी, यापरता दैवदुर्विलास कोणता? मोत्यांचा चारा खाऊन जगणाऱ्या "राजहंसा‘वर अशी वेळ आली, ती निव्वळ अव्यवहारीपणा, आंधळं प्रेम अन्‌ व्यक्तिगत अवगुणांमुळं, असं आचार्य प्र. के. अत्रे, गंधर्व कंपनीतील हीरो-कृष्णराव चोणकर आणि विनायकराव पटवर्धन-यांनी लिहून ठेवलंय...अन्‌ तरीही अनुपम सौंदर्य अन्‌ स्वर्गीय गाणं यामुळं "असा बालगंधर्व आता न होणे‘ हे शब्द सार्थच ठरतात!
    बालगंधर्व हे महाराष्ट्राला पडलेलं देखणं, सुरेल स्वप्न होतं. महाराष्ट्राचे महाकवी ग. दि. माडगूळकर यांनी त्यांचं यथार्थ वर्णन केलंय...
    जशा जन्मती तेज घेऊन तारा । जसा मोर घेऊन येतो पिसारा ।
    तसा येइ कंठात घेऊन गाणे ।
    असा बालगंधर्व आता न होणे ।।
    रतीचे जया रूपलावण्य लाभे ।
    कुलस्त्री जसे हास्य ओठात शोभे ।
    सुधेसारखा साद; स्वर्गीय गाणे।
    असा बालगंधर्व आता न होणे ।।
    अनुपम सौंदर्य अन्‌ स्वर्गीय गाणं यामुळं "असा बालगंधर्व आता न होणे‘ हे शब्द सार्थच ठरतात!
    ‘गंधर्व’ या शब्दात काहीतरी विलक्षण जादू असलीच पाहिजे. कारण या शब्दावर आधारून जितक्या पदव्या दिल्या गेल्या किंवा घेतल्या गेल्या तितक्या दुसर्याल कोणत्याही शब्दाच्या वाट्याला आल्या नाहीत. बालगंधर्व, भूगंधर्व, सवाई गंधर्व, महाराष्ट्र गंधर्व, कुमार गंधर्व, छोटा गंधर्व, नूतन गंधर्व, हिंद गंधर्व, आनंद गंधर्व, भावगंधर्वपासून अक्षरशः डिट्टो गंधर्वपर्यंत गंधर्वांची एक मांदियाळीच महाराष्ट्रात तयार झाली. यांपैकी बर्याधच जणांनी आपल्या कर्तृत्वाने ती पदवी सार्थ करून दाखवली आणि काहीजणांनी आपल्या अतिहुशारीमुळे त्या पदवीलाच लाजविले. नारायण श्रीपादराव राजहंस या माणसाने मात्र ‘बालगंधर्व’ ही आपणाला मिळालेली पदवी अजरामर केली. बरं, ही पदवी बहाल करणारा माणूस तरी लेचापेचा होता? अजिबात नाही. १८९८ साली नारायण राजहंस या छोट्या मुलाचं गाणं ऐकून ‘अरे, हा तर साक्षात बालगंधर्व आहे!’ असे उद्गार काढणारी ती व्यक्ती कोण असेल? भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे अध्वर्यू, असंतोषाचे जनक, प्रख्यात प्रकांड पंडित, भगवद्गीतेचे भाष्यकार, ज्योतिर्विद्येचे जाणकार आणि वैदिक गणितज्ज्ञ- साक्षात लोकमान्य टिळक!
    या घटनेचं वर्णन करताना गदिमांनी लिहिलंय-
    त्याच संधिला कुणा अनामिक रसिकाची हौस
    टिळकांपुढती ठेवि बोलका कुणी राजहंस
    राजहंस तो नेत्यासन्मुख गीत मनोहर म्हणे

    देवदत्त तो साद मनोहर ऐकूनिया कानी
    बाल गायका अमोल पदवी दिली टिळकांनी
    शिरोधार्य ते दान मानिले इवल्या नारायणें
    तो तोच बालगंधर्व
    जाणिती सर्व
    वाढला पुढती
    यशसिद्धी राहिली त्याची सदोदित चढती
    वाढला बालगंधर्व युगंधर झाला
    वर्षाव प्रीतीचा रसिकजनांनी केला
    सन्मान असा ना मिळतो सम्राटाला
    मंत्रमुग्ध जन होत राहिले त्यांच्या मधुगायनें…
    साक्षात सम्राटालाही मिळत नाही असा मान बालगंधर्वांना मिळाला. जवळपास पन्नास वर्षे रसिकमनावर त्यांनी अधिराज्य केले. आवाजाच्या जोरावर ते संगीतातील विलक्षण जादूगार झाले. ज्याप्रमाणे त्यांचे रूप मोहक होते त्याचप्रमाणे त्यांचा आवाजही मोहिनी घालणारा होता. अत्यंत मधुर, झार असलेला स्वयंप्रकाशी असा तो आवाज होता. त्यांच्या आवाजाच्या झारेला इंद्रधनुष्यातील विविध रंगांच्या छटांची उपमा एका मर्मज्ञ रसिकाने दिली होती व ती सार्थही होती. इतर कलावंत गायकांप्रमाणे जरी त्यांच्या गायनात पुष्कळ तर्हाआ नसल्या तरी त्यांचे साधेसुधे गोड गाणे आल्हाददायक बनू शकले ते या कंठमाधुर्याच्या देणगीवरच! हा आवाज प्रत्यक्ष ऐकण्यासाठी लोक शेकडो मैलांवरून धावत येत; तारेने थिएटरमध्ये जागा रिझर्व्ह केल्या जात; स्पेशल मोटारी सोडल्या जात. एवढेच नव्हे तर नाटकाच्या तिसर्याम अंकापर्यंत तिकिटं मिळवण्याची लोक खटपट व धडपड करीत. असं काय बालगंधर्वांमध्ये होतं की त्यांना पाहायला, ऐकायला लोक एवढे वेडावले होते? ही सर्व किमया बालगंधर्वांच्या जादुई आवाजाची होती! ऑर्गन व सारंगीवर त्यांनी आपला आवाज मिळवला की त्या तीन सुंदर स्वरांच्या मिलाफाने श्रोत्यांच्या कानांचे समाधान होऊन अंगावर रोमांच उभे राहत. रंगमंदिरात विलक्षण शांतता प्रस्थापित होई. १९८८ साली भारत सरकारने बालगंधर्व यांचे पोस्टाचे तिकीट त्यांच्या स्मृती निमीत्त छापले होते. बालगंधर्व यांचे १५ जुलै १९६७ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट/ विष्णू सूर्या वाघ

  • व्हिताज बलसारा उर्फ व्ही.बलसारा

    संगीतावर हुकूमत गाजविणारा कुशल कलाकार, प्रतिभासंपन्न संगीतकार व जागतिक कीर्तीचे पियानोवादक व्हिताज बलसारा यांचा जन्म २२ जुन १९२२ रोजी झाला.

    व्हिताज अर्देशर बलसारा उर्फ व्ही. बलसारा हे पारशी असून सुद्धा व्ही.बलसारा यांनी एकेकाळी आपला हार्मोनियम, ऑर्गन व पियानोच्या अप्रतिम साथीने अवघ्या हिंदी फिल्मी संगीतावर हुकूमत गाजवली.

    व्ही. बलसारा यांना हिंदी चित्रपटसृष्टीत जंटलमन म्युझीशयन म्हणत असत.
    ‘त्यांना संगीताचं बाळकडू आईकडून मिळालं. तीच पहिली गुरू. संगीताची गोडी त्यांना बालपणापासूनच होती. घरी पियानो नव्हता. गोव्याच्या शिक्षकांनी त्यांना पियानो व व्हायोलिनचं शास्त्रशुद्ध शिक्षण दिलं. गायनाचे प्राथमिक धडे त्यांनी फ्रामरोज श्रॉफ व पुढे बडोदा संस्थानचे उस्ताद बच्चूमियाँ यांच्याकडे गिरवले. १९३८ साल होतं. जुहूर राजा यांच्या ‘बादल’ चित्रपटासाठी बरेलीचे खानसाहेब मुश्ताक हुसैन संगीत दिग्दर्शक होते. ध्वनिमुद्रणाच्या वेळी त्यांचा नेहमीचा साजिंदा आला नाही, तेव्हा आयत्या वेळी व्ही. बलसारा पियानो वाजवण्यास बोलवले. तेव्हा वय होतं फक्त १६ वर्ष. व्ही. बलसारा यांच्या वादनशैलीवर खुश होऊन खानसाहेबांनी तिथल्या तिथे माझी दुय्यम सहायक म्हणून नेमणूक केली.’’ मा.व्ही.बलसारा यांनी ‘जिना सिखो’मध्ये पं. हनुमान प्रसादबरोबर, जुहूर राजासाठी ‘मझाक’मध्ये, ‘दोस्त’मध्ये सज्जाद हुसैनबरोबर, ‘रंगमहल’मध्ये मा.दत्ता कोरगावकर यांचा सहायक म्हणून काम केलं. त्यावेळी अॅ रेंजरचं नाव चित्रपटाच्या श्रेयनामावलीत येत नसे. मास्टर गुलाम यांनी मा.व्ही. बलसारा यांना स्वत:च्या मुलाप्रमाणे सांभाळलं. दत्ता कोरगावकर व मदन मोहननी सख्ख्या भावाचं प्रेम दिलं. शंकर-जयकिशननी तर अगदी ‘बरसात’पासून ते मुंबई सोडेपर्यंत एकही गाणं त्यांचे ऑर्गन अथवा हार्मोनियमवर असल्याशिवाय ध्वनिमुद्रित केलं नाही. मा.व्ही. बलसारा यांनी ‘‘‘आऽ इन्तजार हैं तेरा’ (बडी माँ), ‘चकोरी का चंदा से प्यार’ (दामन), ‘कोई प्रेम का दे के संदेसा’ (दोस्त), ‘कैसे कोई जिए’ (बादबान), ‘तारा री यारा री’ (दास्तान), ‘लो प्यार की हो गई जीत’ (जादू), याशिवाय शंकर-जयकिशन यांची ‘आवारा’, ‘बरसात’, ‘बादल’, ‘दाग’, ‘आंस’, ‘आह’, ‘पतिता’, ‘बादशहा’, ‘श्री ४२०’, ‘काली घटा’, ‘चोरी चोरी’ अशा अनेक चित्रपटांतील वाजवलेली गाणी अजून लोकांच्या लक्षात आहेत.’’ मा.व्ही.बलसारा हे पियानो, हार्मोनियमशिवाय व्हायोलिन, मेंडोलिनही वाजवत असत. त्या वादनामध्ये सतत ते निरनिगळे प्रयोग करीत असत. ते हार्मोनियमवर पाश्चिमात्य संगीत वाजव असत, त्यावेळी हार्मोनियमचा सूर अॅीकॉर्डियनसारखा येत असे. उदा. ‘ऐ मेरे दिल कही’ (दाग), ‘याद किया दिलने’ (पतिता) हे गाणं, पियानोवर जेव्हा ते वाजवत असत त्याला भारतीय संगीताची जोड देऊन तेव्हा पियानोवर सरोद, जलतरंग अथवा संतूरसारखा आवाज आणत असत. त्यांनी काउंटर मेलडी वाजवण्याची एक वेगळी शैली निर्माण केली ती सिनेशौकिनांना आवडली.’ १९४३ साली सर्कस गर्ल या चित्रपटाला संगीत देऊन मा.व्ही.बलसारा यांनी आपली संगीतकाराची कारकीर्द सुरुवात केली.ओ पंछी, रंगमहाल, मदमस्त, तलाश,चार दोस्त, विद्यापती और प्यार, अशा अनेक चित्रपटाना संगीत दिले. त्यांनी अनेक बंगाली चित्रपटाना सुद्धा संगीत दिले. मा.व्ही.बलसारा यांना ‘‘आयझ्ॉक डेव्हिड (स्पॅनिश मेंडोलिन), रामसिंग (सॅक्सोफोन), रामनारायण (सारंगी), अब्दुल करीम लाला (ढोलक व ढोलकी), कर्नाड, नार्वेकर (व्हायोलिन) यांसारखे अनेक कलाकारांनी साथ दिली. मा.व्ही.बलसारा यांचे निधन २४ मार्च २००५ रोजी झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट / मा.अरुण पुराणिक

    व्ही.बलसारा
    https://www.youtube.com/watch?v=sBnWhzMYXJY

    https://www.youtube.com/watch?v=thXUWWYPsMo

  • चित्रपती व्ही. शांताराम

    व्ही. शांताराम हे नांव उच्चारताच डोळ्यासमोर येतो तो चित्रपटाचा पडदा आणि त्यावर व्ही. शांताराम या नांवाखाली गाजलेले एक एक चित्रपट.

  • सिनेमॅटोग्राफर, दिग्दर्शक महेश लिमये

    मराठीत ‘उत्तरायण’, ‘एवढंसं आभाळ’, ‘नटरंग’, ‘बालक पालक’, ‘बाल गंधर्व’, ‘मुळशी पॅटर्न’ आदी चित्रपट महेश लिमये यांनी केले. सलमान खानच्या ‘दबंग’साठी ‘सिनेमॅटोग्राफर’ म्हणून महेश लिमये यांना खास बोलावून घेण्यात आले. हिंदीतील ‘बिग बजेट’ आणि ‘१५० कोटी’ क्लबमध्ये गेलेला एक मोठा चित्रपट त्यांच्या नावावर जमा झाला. पुढे त्यांनी ‘दबंग २’साठी ही काम केले. ‘ट्रॅफिक सिग्नल’, ‘कॉर्पोरेट’, ‘हीरोईन’, ‘दबंग’, ‘दबंग २’ हे त्यांचे हिंदीतील गाजलेले चित्रपट होत.

  • चिंतामण विनायक वैद्य

    चिंतामण विनायक वैद्य हे संस्कृत भाषेतील विद्वान होत.

  • क्रिकेटपटू विनू मंकड

    प्रत्येक खेळाडूची अशी इच्छा असते की त्यावेळी विस्डेन ( WISDEN ) च्या पहिल्या पाच खेळाडू मध्ये यावे. विनूभाई यांचे नाव १९४७ साली त्यामध्ये आले. त्यांनी फलंदाजी आणि गोलंदाजीमधील दुहेरी कामगिरी करून विक्रम त्यावेळी कसोटी सामन्यांमध्ये रचला तो म्हणजे १००० ध्वनीचा आणि १०० विकेट्सचा. याला इंग्लिशमध्ये ‘ डबल ‘ म्हणतात. त्यांनतर हा विक्रम इयान बोथट ने मोडला. ही दुहेरी कामगिरी त्यांनी २३ कसोटी सामन्यांमध्ये पुरी केली तर एम. ए . नोबल या खेळाडूला २७ कसोटी सामने लागले तर कीथ मिलरला ३३ कसोटी सामने लागले.

  • रंगभूमीवरचा नटसम्राट डॉ.श्रीराम लागू

    डॉ.श्रीराम लागू यांचे पूर्ण नाव डॉ. श्रीराम बाळकृष्ण लागू. त्यांचा जन्म १६ नोव्हेंबर १९२७ रोजी सातारा येथे झाला. नटसम्राट' हा शब्द उच्चारला की डोळ्यासमोर उभे राहते ते एकमेवाद्वितीय व्यक्तिमत्व म्हणजे ‘डॉ. श्रीराम लागू’ भारतीय चित्रपटाच्या इतिहासातले एक तेजस्वी अभिनय पर्व असलेले, नटसम्राट गणपतराव बेलवलकरांसारखी अनेक पात्रे रंगभूमीवर चिरंजीव करणारे, अनेक नाटककारांना प्रयोजन देणारे, व्यक्तिमत्व म्हणजे, डॉक्टर श्रीराम लागू. मराठी रंगभूमीवरचा नटसम्राट या शब्दात श्रीराम लागूंचे वर्णन करता येईल. भूमिका जिवंत करणे हा वाक्प्रचार लागूंच्या बाबतीत अगदी खरा ठरतो. मराठी रंगभूमी, चित्रपट, हिंदी चित्रपट यात यशस्वी मुशाफिरी करणारे लागू खऱ्या अर्थाने रमले ते नाटकातच.

    त्यांचे शिक्षण भावे हायस्कूल, फर्ग्युसन महाविद्यालय आणि बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे या संस्थांतून झाले. शालेय जीवनापासून त्यांचा नाटकाकडे ओढा होता. पुण्यातील पी. डी. ए. या नाट्यसंस्थेच्या माध्यमातून त्यांनी नाटकात कामे करायला सुरुवात केली. १९५० च्या दशकात त्यांनी कान नाक घसा यांच्या शस्त्रक्रियांचे प्रशिक्षण घेतले आणि पुण्यात ५ वर्षे काम केले ब नंतर कॅनडा आणि इंग्लंड येथे पुढील प्रशिक्षण घेतले. १९६० च्या दशकात पुणे आणि टाबोरा, टांझानियायेथे त्यांचा वैद्यकीय व्यवसाय सुरू होता. १९६९ मध्ये त्यांनी पूर्ण वेळ नाट्य अभिनेता म्हणून वसंत कानेटकर लिखित इथे ओशाळला मृत्यू या नाटकापासून काम करण्यास सुरुवात केली. एम.बी.बी.एस. झाल्यावर वैद्यकीय व्यवसायात जम बसत असतानाही केवळ नाटकाच्या ओढीने कलावंत म्हणून केलेले काम डॉक्टरेट मिळविण्याइतके महत्त्वाचे आहे. डॉ.लागूंनी रंगभूमीवर कलावंत म्हणून प्रवास सुरु केला.

    पी.डी.ए, रंगायन, थिएटर युनिट, कलावैभव, गोवा हिंदू, रूपवेध, आविष्कार, आय.एन.टी. ह्या मान्यवर नाट्यसंस्थांच्या नाटकातून विविध भूमिका साकारत आपल्या अभिनयाचा वेगळा ठसा उमटवला. अभिनयाशिवाय त्यांनी अनेक नाटकांचे दिग्दर्शनही केले. त्यात गुरु महाराज गुरु, गिधाडे, हिमालयाची सावली, गार्बो, उद्ध्वस्त धर्मशाळा, कस्तुरीमृग, एकच प्याला, शतखंड, चाणाक्य विष्णुगुप्त, किरवंत इत्यादी. कांती मडिया या अनुवादित गुजराथी नाटकाचे दिग्दर्शनही त्यांनी केले होते. तसेच एक होती राणी आणि अॅन्टीगनी या दोन नाटकांचे नाटककार श्रीराम लागू होते. वसंत कानेटकर आणि वि. वा. शिरवाडकर हे दोघेही नाशिककर नाटककार लागूंना जवळचे. त्या दोघांच्याही नाटकांतल्या आव्हानदायी चरित्रभूमिका त्यांनी समर्थपणे हाताळल्या. गो. नी. दांडेकर आणि श्री. ना. पेंडसे यांच्यापासून तो प्र. ल. मयेकर, प्रेमानंद गज्वी आणि श्याम मनोहर यांच्यासारख्या आजकालच्या नाटककारांच्या 'प्रायोगिक' कृतीही त्यांनी उत्साहाने हाताळल्या.

    मोहन तोंडवळकर, सुधीर भट आणि मोहन वाघ यांच्यापासून तो गोवा हिंदू असोसिएशन आणि इंडियन नॅशनल थिएटरसारख्या संस्थांतही त्यांनी निष्ठेने काम केले. सत्यदेव दुबे यांच्या प्रागतिक संस्थेसाठी डॉक्टरांनी तेंडुलकरांचे 'गिधाडे' हे खळबळजनक नाटक दिग्दर्शित केले आणि त्यात स्वत: एक मध्यवर्ती भूमिकाही केली.
    डॉ.श्रीराम लागूच्या रंगभूमीवरच्या एकाहून एक सरस भूमिका गाजल्या त्यातही नटसम्राटमधील गणपतराव बेलवलकरांच्या भूमिकेने अभिनय कारकिर्दीला हिमालयाची उंची गाठून दिली. पत्नी दीपा श्रीराम यांनी निर्मिती केलेल्या 'झाकोळ' या चित्रपटाचे दिग्दर्शनही त्यांनी केले होते.

    शांताराम बापूंच्या ‘पिंजरा’तल्या अभिनयाने इतिहास घडवला. सामना’, सिंहासन’, ‘मुक्ता’ या सारख्या चित्रपटांमुळे डॉ. लागू आणि राजकीय चित्रपट हे समीकरण जुळले. 'पिंजरा'तली भूमिका आव्हानात्मक होती. एकाच चित्रपटात लागूंनी दुहेरी अभिनय केला होता. चित्रपटाच्या सुरुवातीला एका संस्कारक्षम, जीवनातील सर्व मूल्य सांभाळून असणारा शिस्तप्रिय शिक्षक, तर चित्रपटांच्या उत्तरार्धात सर्व संस्कार लयाला गेलेली एक असहाय, केविलवाणी, स्वत:चं सर्व अस्तित्व घालवून बसलेली व्यक्ती. एकाच चित्रपटातली आपली ही दोन रुपं अभिनयाच्या ताकदीवर लागूंनी इतकी अप्रतिम साकारलीत की आजही भारतीय चित्रपटसृष्टीचा इतिहास वर्णन करताना तो ह्या भूमिकेशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. निळू फुले आणि श्रीराम लागूंचा ‘सामना’ ही चांगलाच रंगला. आणि लागूंच्या ‘सिंहासन’लाही रसिकांनी दाद दिली. आणि सुगंधी कट्टा, देवकीनंदन गोपाला, चंद्र आहे साक्षीला, आदी यशस्वी चित्रपटांची मालिकाच सुरू झाली.

    हिंदीतही श्रीराम लागूंनी अभिनयाच्या उंचीने चित्रपटसृष्टीत मोलाची भर घातली. मराठीत काम करताना त्यांना हिंदीतही ऑफर आल्या. लागू हिंदीत गेले खरे पण त्यात ठसा उमटू शकेल अशा भूमिका त्यांच्या वाट्याला क्वचितच आल्या. हिंदीत चरित्र अभिनेत्याच्या भूमिका त्यांनी ताकदीने उभ्या केल्या. 'सौतन' चित्रपटातील वडिलांची भूमिका त्यांच्या कसदार अभिनयामुळे लक्षात रहाते. अनेक मालिकांमधूनही त्यांनी काम केले. व्यावसायिक चित्रपटांच्या या दुनियेत कामाच्या समाधानापेक्षा लोकांना काय आवडते हे जास्त पाहिले जाते. शांतारामबापूंच्या दिग्दर्शनात सुरु झालेला श्रीराम लागूंचा चित्रपट प्रवास एका एखाद्या सुंदर स्वप्नासारखा आहे, श्रीराम लागूंच्या अनेकविध भूमिकांमधले वैविध्य अचंबित करणारे आहे. लागूंनी पु. लं.च्या 'सुंदर मी होणार' मधूनही काम केले. सॉक्रिटिसच्या विचारांवर आधारीत ' सूर्य पाहिलेला माणूस' हे नाटकही वैचारीक वर्तुळात गाजले. शिवाय 'मित्र' मधूनही वेगळे लागू पहायला मिळाले. लागू निरिश्वरवादी म्हणून प्रसिद्ध आहेत. 'देवाला रिटायर करा' या त्यांच्या विधानाने एकेकाळी खळबळ उडवली होती.

    विचार स्वातंत्र्याची चळवळ, अंधश्रद्धा निर्मूलन यांसारख्या सार्वजनिक महत्त्वाच्या कामांत आघाडीवर राहणारे आणि सामाजिक कृतज्ञता निधीला नेतृत्त्व देणारे मा.श्रीराम लागू अनेक सामाजिक, राजकीय बाबींवर परखड प्रतिक्रिया नोंदवतात. सांस्कृतिक व्यासपीठावर ते चौफेर विषयांवर अभ्यासपूर्ण विधाने करतात. सूक्ष्म निरिक्षण व विश्लेषण क्षमता याचा उत्कृष्ट संयोग त्यांच्या व्यक्तीमत्वात झाला आहे. त्यांच्या एकूण कर्तृत्वाचा सन्मान संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार देऊन करण्यात आला. मास्टर दिनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान तर्फे जीवनगौरव पुरस्कार मिळाला आहे. तसेच भारत सरकारने पद्मश्री हा किताब देऊन त्यांना गौरविले आहे. मराठी रंगभूमी आणि हिंदी मराठी चित्रपटांमधल्या अनेक भूमिका आपल्या दमदार अभिनयाने अजरामर करणारा रंगकर्मी, ‘रूपवेध’ ही नाट्यसंस्था सुरू करून चाकोरीबाहेरची अनेकानेक उत्तम नाटके रंगमंचावर आणणारा दिग्दर्शक, निर्माता, नाटकांबरोबरच साहित्य, संगीत अशा कलांमध्ये गती असणारा रसिक, सामाजिक कृतज्ञता निधी, अंधश्रद्धा निर्मूलन, विचारस्वातंत्र्याची चळवळ अशा समाजोपयोगी चळवळींशी जोडलेला सामाजिक कार्यकर्ता असे डॉ. श्रीराम लागू यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेकविध पैलू उलगडणारे पुस्तक आहे ‘रूपवेध’.

    तसेच "लमाण" हे डॉ. श्रीराम लागू यांनी लिहीलेले स्वताःचे आत्मचरित्र आहे.
    'लमाण' म्हणजे मालवाहू कामगार. वि. वा. शिरवाडकरांच्या ज्या 'नटसम्राट' या नाटकातील नटवर्य अप्पासाहेब बेलवलकरांची मध्यवर्ती भूमिका डॉ. श्रीराम लागूंनी प्रथम साकार केली त्याच भूमिकेतील त्यांचे वाक्य आहे : ''आम्ही फक्त लमाण, इकडचा माल तिकडे नेऊन टाकणारे.''

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

    श्रीराम लागू यांचे नटसम्राट नाटक
    https://www.youtube.com/watch?v=yTFPT7-v-Ws&feature=youtu.be

    श्रीराम लागू यांचा पिंजरा चित्रपट
    https://www.youtube.com/watch?v=W-WzNiN9Tms

    श्रीराम लागू यांचा सामना चित्रपट
    https://www.youtube.com/watch?v=qss_9no2Oeo&t=20s
    https://www.youtube.com/watch?v=EqnFwzOtcAM&t=3662s

    श्रीराम लागू यांचा सिंहांसन चित्रपट
    https://www.youtube.com/watch?v=nQoh1HGlxdY