जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
मोगॅम्बो खूश हुआ'...'त्या' भारदस्त आवाजातील हे तीन शब्द कानांवर पडले की समोरच्याचा थरकाप झालाच म्हणून समजा. त्यांचा जन्म २२ जून १९३२ रोजी झाला. 'मि. इंडिया' या सिनेमात अमरिश पुरी यांनी साकारलेली मोगॅम्बोची व्यक्तिरेखा विसरणे केवळ अशक्य. अशा एकापेक्षा एक सरस खलनायकी व्यक्तिरेखा, चरित्र भूमिका साकारणारे मा.अमरीश पुरी हे जुन्या काळातले प्रसिद्ध हिंदी चित्रपट कलाकार मा.मदन पुरी यांचे धाकटे भाऊ. अमरीश यांना हिंदी चित्रपटांमध्ये नायक बनायचं होतं म्हणून त्यांनी पंजाब सोडून मुंबई गाठली. मोठ्या भावाने सरळ सांगितलं की मी अजिबात मदत करणार नाही, जे काही या क्षेत्रात करायचं ते स्वतःच्या जोरावर करायचं.
नायक बनण्याच्या अमरीश यांच्या प्रयत्नांना यश मिळालं नाही. मग त्यांनी पृथ्वी थिएटर्समधल्या नाटकांमध्ये कामं करायला सुरुवात केली. तिथे मोठ्या दिग्दर्शकांकडे त्यांनी काम केलं. अगदी इंदिरा गांधी, अटल बिहारी वाजपेयी अमरीश यांची नाटकं बघायला आवर्जून येत. मग हळूहळू अमरीश यांनी आपला मोर्चा परत एकदा हिंदी चित्रपटांकडे वळवला. सुरुवातीलाच चांगल्या दिग्दर्शकांचे चित्रपट अमरीश यांना मिळू लागले आणि हळूहळू त्यांनी आपले पाय हिंदी चित्रपटात घट्ट रोवायला सुरुवात केली. त्यांच्या कारकिर्दीबद्दल नव्याने लिहायची काहीच आवश्यकता नाही.
भारदस्त आवाज, भेदक नजर आणि करारी, देखणे रुप असलेले मा. अमरिश पुरी यांनी हिंदी सिनेमासृष्टीवर अनेक वर्षे राज्य केले. मा.अमरिश पुरी यांना बॉलिवूड सिनेमांमध्ये हीरो बनायचे होते. मात्र त्यांच्या नशीबात काही वेगळेच लिहिले होते. ते हीरो नाही मात्र बॉलिवूडमधील प्रसिद्ध खलनायक बनले. अमरिश पुरी यांनी आपल्या तीस वर्षांच्या कारकिर्दीत सर्वाधिक नकारात्मक भूमिका साकारल्या.
पाश्चिमात्य प्रेक्षकांमध्येही अमरिश पुरी लोकप्रिय अभिनेते आहेत. स्टीवन स्पिलबर्ग यांच्याबरोबरील 'इंडियाना जोन्स' या हॉलिवूड सिनेमातील मोला रामची भूमिका आणि 'टेंपल ऑफ डूम' या सिनेमातील भूमिकेसाठी प्रेक्षक त्यांना कधीही विसरु शकत नाही. त्यांची खलनायकाची प्रतिमा सामान्य नागरिकांमध्ये एवढी परिणामकारक बनली होती की त्यांच्या मुलाचे मित्र जेव्हा घरी येत तेव्हा अमरीश यांच्यासमोर नुसतं जायलाही घाबरत असत.
खऱ्या आयुष्यात मात्र अमरीश अतिशय साधे, मन मिळावू, मृदू स्वभावाचे, आपल्या कुटुंबात रमणारे असे होते. आपल्या वडिलांविषयी राजीव पुरी यांनी एका मुलाखतीत सांगितले होते, की ''पापा तारुण्याच्या काळात हीरो होण्यासाठी मुंबईत आले होते. त्यांचे थोरले बंधू मदन पुरी सिनेसृष्टीत कार्यरत होते. निर्मात्यांनी त्यांना सांगितले, की त्यांचा चेहरा हीरोसारखा नाहीये. त्यामुळे ते खूप निराश झाले होते. अमरिश पुरी यांचे १२ जानेवारी २००५ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
डॉ. श्रीकांत राजे हे ठाणे येथील सुप्रसिद्ध रेडिओलॉजिस्ट – क्ष-किरण तज्ज्ञ (Radiologist) आहेत.
पाटील, सा. रे.
ब्रिटिश राज्य असताना म्हणजे १९३४ मध्ये त्यांनी शेतीत घाम गाळण्यास सुरूवात केली ती त्या वेळच्या पारंपरिक साधनांनिशी आणि त्यानंतर तब्बल शहात्तर वर्षे उलटल्यानंतरही अत्याधुनिकता जोपासत, नव्या जमान्याचे सूर आळवत ते उमेदीने शेती करीत आहेत. शेतीच्या मशागतीपासून त्यांनी आयुष्याला सुरूवात केली. त्यानंतर आतापर्यंतच्या प्रदीर्घ प्रवासात त्यांनी राजकीय, सामाजिक क्षेत्राच्या केलेल्या मशागतीमुळे महाराष्ट्रातील ग्रामीण जीवनाला आकार येऊ लागला.
म्हणूनच वयाच्या तब्बल ८९ वर्षीही तरूणाच्या उत्साहाने कार्यरत असणाऱ्या सा. रे. ऊर्फ अप्पासाहेब पाटील यांना यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचा कृषी-औद्योगिक समाजरचना पुरस्कार मिळणे यथोचितच ठरते. कोल्हापूर जिल्ह्य़ातील शिरोळ तालुक्यात असलेल्या जांभळी या गावी ११ डिसेंबर १९२१ ला जन्मलेल्या अप्पासाहेबांना लहानपणापासूनच शेतीची आवड होती. वडील रेवगोंडा पाटील यांच्याबरोबरच वयाच्या १३-१४ वर्षांपासून ते शेतीची सर्व कामे करू लागले. त्याचवेळी कुस्ती आणि मलखांब खेळू लागल्याने शरीरयष्टी उत्कृष्ट झाली. अफाट वाचन, कष्ट करण्याची तयारी, जिद्द या जोरावर त्यांनी आयुष्याचा प्रवास सुरू केला. मित्रपरिवार मोठा असल्याने त्यातून त्यांना समाजवादाचे धडे मिळाले. सहकाराचा प्रसार आणि बोलबाला पुढे महाराष्ट्रात झाला, पण १९४६ मध्ये जांभळी गावातील शेतक ऱ्यांना एकत्र आणून सेवा सोसायटीची स्थापना त्यांनी केली. गांधीजींच्या विचाराने प्रभावित झाल्याने ग्रामस्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्नही त्यातून झाला. शिरोळ तालुका सहकारी खरेदी-विक्री संघाच्या व्यवस्थापकपदी १९५१ मध्ये त्यांची निवड झाल्याने गावातील काम तालुका पातळीवर आले. या दरम्यानच संयुक्त महाराष्ट्राच्या सुरू झालेल्या चळवळीत त्यांनी भाग घेण्यास सुरुवात केली. त्यातूनच साने गुरुजी, मधु दंडवते, अच्युतराव पटवर्धन, एस. एम. जोशी, नानासाहेब गोरे, ग. प्र. प्रधान आदींच्या सान्निध्यात ते आले आणि या नेत्यांची साधी राहणीही त्यांच्यात उतरली. राष्ट्र सेवा दल, साने गुरुजींचे साधना साप्ताहिक या चळवळीत ते रमू लागले. १९५७ च्या विधानसभेच्या निवडणुकीत संयुक्त महाराष्ट्र समितीने त्यांना शिरोळमधून उमेदवारी दिली. या चळवळीच्या निमित्ताने त्यांनी ‘इंद्रधनुष्य’ हे दैनिक कोल्हापुरातून सुरू केले होते. १९९९ मध्ये आणि २००९ मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीतही जनतेने त्यांना निवडून दिले. सहकार क्षेत्रातील त्यांचे कामही सुरूच होते. शिरोळला श्री दत्त सहकारी साखर कारखान्याच्या उभारणीत त्यांनी मोलाचा वाटा उचलला. या कारखान्याचे ते संस्थापक संचालक असून आजपर्यंत अध्यक्ष-उपाध्यक्ष-संचालक अशा अनेक जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या आहेत. या कारखान्याच्या स्थापनेपूर्वी कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील नद्यांना उपलब्ध असलेले पाणी विचारात घेऊन सहकारी तत्त्वावर २० पाणीपुरवठा योजनांची स्थापना त्यांनी केली. राजकारणातील कामगिरीसाठी एस. एम. जोशी-दंडवते-पटवर्धन आदींपासून स्फूर्ती त्यांनी घेतली, तशीच सहकार क्षेत्रातील कामासाठीची स्फूर्ती त्यांना मिळाली ती धनंजयराव गाडगीळ, वैकुंठभाई मेहता आदींकडून. सहकार क्षेत्रातील राज्य भूविकास बँक, राज्य सहकारी संघ यांचे संचालक, जयसिंगपूर उदगाव सहकारी बँकेचे संस्थापक अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले. उदगाव टेक्निकल हायस्कूल, जांभळी हायस्कूलची स्थापना त्यांनी करून शिक्षण क्षेत्रावरही ठसा उमटवला. शेती हा त्यांचा पहिल्यापासूनच आवडीचा विषय असल्याने शेतीमधील नव्या तंत्रज्ञानाबाबत ते कायम आग्रही असतात. नव्या तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याच्या त्यांच्या कळकळीमुळेच ते ताजेपणाने विचार करू शकतात. कोणतेही नवे तंत्र ते स्वीकारण्यास अप्पासाहेब कायम तयार असल्याने सर्वात वयोवृद्ध आमदार अशी त्यांची ओळख न राहता उत्साहाने सळसळणारे तरूण आमदार-नेते अशी त्यांची ओळख करून द्यावी लागते. त्यांच्या या सततच्या धडपडीला चव्हाण प्रतिष्ठानकडून मिळालेला हा मुजरा सार्थच ठरतो.
समर्थ श्री रामदासस्वामी
भगवंत गांगल यांचे लेखन हे सहजस्फुर्तीमधून जन्माला आले. लेखनीक व्हायचे या आकांक्षेने ते कधीच जगले नसल्यामुळे, त्यांची लेखणी ही व्यावसायिक ध्येयाने कधीच मुहूर्तरूपात उमटली नाही. त्यात सफाईदारणा किंवा आभ्यासपूर्ण लिखाणामुळे जमून आलेली खमंग फोडणी नव्हती, परंतु मानवी स्वभावाच्या विवीध कडांच्या अचूक चित्रणामुळे, ती रसिकांच्या मनाला मात्र चांगलीच भावली. कथा व कादंबरी या दोन वाचकप्रिय प्रकारांना आपलेसे करून त्यांनी पहिल्यांदा हातात लेखणी धरली होती. त्यातून मध्यमवर्गीयांच्या भावना व मनोजीवनाचे हुबेहूब चित्रण करण्याचा त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केला. नव्या व काहीश्या अपारंपारिक, विचारांची कुपी पहिल्यांदा आपल्या साहित्यातून वाचकांपर्यंत पोहोचवणारे लेखक ही ओळख त्यांना अल्पावधीत मिळाली. नव्या पिढीचे स्पष्ट विचार, पारदर्शीपणे तिच्या तत्वांचा, स्वप्नांचा व आकांक्षाचा आपल्या साहित्यामधून केलेला जिवंत उहापोह, ही खरं तर त्या काळामध्ये त्यांनी उचललेली धाडसी पाऊले होती. त्यामुळे त्यांचे साहित्य हे कर्मठ व सनातनी लोकांच्या पचनी पडलेले नसले, तरी तरूणांनी त्यांच्या साहित्याची पताका नेहमी उंचावरच फडकवत ठेवली.
क्षणचित्रे (१९३८), शल्ये (१९४४), आसवांची माळ (१९३४), पिंजर्यातील पक्षी (१९३८), पाझर (१९४०), रंगाचे घर (१९४४) या कादंबर्यांद्वारे त्यांनी मनुष्यस्वभावाच्या विविधांगी पैलुंचा, त्यांना झालेला साक्षात्कार कलात्मकरितीने रसिकांसमोर मांडला. हे सर्व रसिकांना पटवून देण्यासाठी त्यांनी, अनेक रोचक पात्रांचा व उत्कंठावर्धक परिस्थितींचा परस्परसंबंध मोठया कुशलपणे गुंफला. समाजात आपण पाहिलेले, ऐकलेले, अनुभवलेले, नजरेस पडलेले सांस्कृतिक व नागरी जीवन संक्षिप्तरूपात चितारण्याच्या एकाच ध्येयाने, त्यांनी विपुल लेखन केले. हे ध्येय त्यांच्या साहित्याने काही प्रमाणात पुर्ण केले हे नक्की सांगता येईल. गांगलांनी त्यांच्या अनेक कथांमधून, त्या काळानुरूप विस्फोटक असलेल्या सामाजिक गोष्टींवर बिनधास्त मते नोंदवली. जसे- अधोगती की उध्दार या कथेमध्ये विधवाविवाहाची उपयुक्तता रसिकांमनावर बिंबवण्यासाठी, त्यांनी एक अप्रतिम व ओघवता कथासाचा निर्माण केला होता. आसवांची माळ या कथेतून त्यांनी प्रेमविवाहाचा जाज्वल्य पुरस्कार केला. मनाविरूध्द विवाह घडावून आणल्याने भविष्यात कोणते भीषण परिणाम होऊ शकतात, व प्रत्येक व्यक्तीला इमानाने आपला जोडीदार निवडण्याचा अधिकार न दिल्याने कोणती परिस्थिती उद्भवु शकते, हे रसिकांना ह्या कादंबरीने प्रभावीपणे पटवून दिले होते. ही कादंबरी देखील भरपुर वादग्रस्त ठरली होती. त्यामुळे नव्या जाणीवेने केलेले स्पष्टवक्ते लेखन हा त्यांच्या कथेचा आत्मा होता असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. आसवांची माळ या कादंबरीचा अपवाद सोडला तर पुढील लेखनात त्यांनी साध्या साध्या अर्थपूर्ण प्रसंगांतून घरगुती जिव्हाळ्याचे वातावरण तयार केले. पात्रांच्या वास्तव आणि मनोजीवनाचे धागे एकमेकांमध्ये, कौशल्यपुर्ण प्रसंग रचनेच्या व लक्षवेधी संवादांच्या साहाय्याने गुंतवून, वाचकांना त्या पात्राच्या भावविश्वामध्ये गुंगवून ठेवण्याचे कसब त्यांनी चांगलेच अवगत केले होते.
दैनिक गावकरी च्या पुरवणीवरुन संपादित
केशवराव यांचे वडील वैद्यकी करत. कोल्हापुरात भोसले वैद्य म्हणून ते परिचित होते. त्यांचा जन्म ९ ऑगस्ट १८९० रोजी कोल्हापूर येथे झाला. पण लहानपणीच वडील वारले आणि घराचं घरपण नाहीसं झालं. चार चिमण्या जिवांची जबाबदारी आईवर पडली. दत्तू, केशव, नारायण आणि एक अगदी छोटी लहान बहीण. त्यांच्या आईला मोलमजुरीसाठी घराबाहेर पडणं भाग पडलं. त्यावेळी ‘स्वदेशी हितचिंतक’ नाटक कंपनीचा मुक्काम कोल्हापुरातच होता. ‘विद्याविलास’कार शंकरशास्त्री गोखले यांच्या मध्यस्थीने, त्यांची आई घरकामासाठी कंपनीत जाऊ लागली.
आईबरोबर दत्तू आणि केशवही होतेच. दोन्ही मुलगे मोठे चुणचुणीत होते. कंपनीचे मालक जनुभाऊ निमकर यांनी त्या दोघांना वरकामासाठी कंपनीत ठेवून घेतले. त्यावेळी दत्तू नऊ वर्षांचा आणि केशव अवघा चार वर्षांचा होता.
‘स्वदेशी हितचिंतक’ नाटक मंडळी हे एक मोठं कुटुंबच होतं. कुटुंब प्रमुख जनुभाऊ मोठे व्यवहार कुशल आणि करड्या शिस्तीचे होते. व्यवसाय नाटकाचा असला तरी कंपनीचं वातावरण अगदी घरगुती होतं. कुठे नाटकाची तालीम सुरू आहे, कुणी आपली नक्कल पाठ करतो आहे, कुणी तंबोरा जुळवून रियाज करतो आहे, कोणी ताला-सुरात आपलं गाणं पक्क करतो आहे. अशा अनोख्या पण आवडत्या वातावरणात दत्तू आणि केशव तिथे रंगून जात होते.
कंपनीतल्या मुलांना गाणं शिकवण्यासाठी दत्तूबुवा जांभेकर होते. दत्तूबुवा जांभेकर हे केशवरावांचे गानगुरू आणि जनुभाऊ निमकर हे नाट्यगुरू. इतर मुलांबरोबर केशव कंपनीत गाणं शिकू लागला. त्याची गाण्यातली चमक लक्षात यायला बुवाना वेळ लागला नाही. ‘हे पाणी काही वेगळं आहे’ अशी बुवांची खात्री पटली आणि बुवा त्याच्याकडे अधिक लक्ष देऊ लागले.
बालकलाकार म्हणून केशव हळूहळू रंगभूमीवर वावरू लागला. कधी त्याला स्त्री पात्राची भूमिका करावी लागत असे. तो प्रेक्षकांच्या प्रथम नजरेत भरला तो ‘शारदा’ नाटकातल्या ‘वल्लरी’च्या मिष्किल भूमिकेत. ते काम तो मोठ्या ठसक्यात करी. त्याचं कौतुकही होऊ लागलं.
कंपनीचा मुक्काम पंढरपूरला होता. खेळ चालू होते. शनिवारचा कंपनीचा पेटंट खेळ ‘शारदा’ जाहीर झाला होता. गुरूवारपासून तिकीट विक्री चालू झाली होती. पण नाटकात ‘शारदे’ची भूमिका करणारा कृष्णा देवळी हा अचानक आजारी पडला. तो तापाने फणफणत होता. शनिवारचा खेळ रद्द करावा अशी बोलणी सुरू झाली. इतक्यात छोटा केशव जनुभाऊंसमोर येऊन धीटपणे म्हणाला, ‘खेळ बदलू नका, मी करतो शारदा! माझी नक्कल पाठ आहे.
गाणी तयार आहेत! घ्या म्हणून हवी तर...’ तो एका दमात भराभर बोलत होता. मालक जनुभाऊ म्हणाले, ‘अरे वेड्या, एवढं मोठं काम तुला एकदम कसं झेपेल?’ त्यावर तो ताडकन म्हणाला, ‘मी खरंच करीन! एकदा पहा तर खरं! माझं काही चुकलं तर थोबाडीत मारा!’ जनुभाऊ कौतुकानं त्याच्याकडे बघू लागले आणि त्यांना एकदम काय वाटलं कुणास ठाऊक? मॅनेजर म्हैसकरना ते म्हणाले, ‘यादीत ‘शारदे’साठी केशवचं नाव टाका!
दोन दिवस कसून तालमी झाल्या.केशव आनंदाने फुलून आला होता.
शनिवार उजाडला. रात्री नाटकाचा पडदा वर गेला. जनुभाऊंच्या पायावर डोकं ठेवून केशव रंगभूमीवर गेला. स्टेजवर तो असा वावरत होता की जसं काही तो नेहमीच रोजचंच काम करत होता. शारदेच्या भूमिकेत तो सुरेल गायला आणि सुंदर दिसत होता. ‘मूर्तिमंत भीती उभी’ हे पद असं गायला की प्रेक्षकांतून ‘वन्समोअर’ वर ‘वन्समोअर’ मिळत होते. प्रेक्षक शारदेला रंगभूमीवरून आत जायलाच देत नव्हते. शेवटी जनूभाऊ स्टेजवर आले आणि केशवला जवळ घेऊन प्रेक्षकांना म्हणाले, ‘‘पोरगं लहान आहे, दमलं आहे. सांभाळून घ्या. क्षमा करा!’’ जनुभाऊंचे आणि प्रेक्षकांचेही डोळे अश्रूंनी भरून आले होते. त्या दिवसांपासून केशव ‘हितचिंतक’ ‘रंगशारदा’ ठरला. वय होतं फक्त दहा वर्षे! साल होतं, १९०१!
‘शारदे’चं अपरंपार कौतुक झालं. प्रयोग रंगू लागले. पैशांचा पाऊस पडू लागला. उभ्या महाराष्ट्रात केशवरावांचं नाव झालं. सौभद्र, मृच्छकटिक, इत्यादी खेळ रंगू लागले. सुभद्रा, वसंतसेना केशवरावांकडेच आल्या. प्रेक्षक खेळांना गर्दी करू लागले. साहजिकच आपल्यामुळेच उत्पन्न भरपूर मिळतं. हे दत्तोबा आणि केशवराव यांच्या मनात यायला वेळ लागला नाही. कौतुक होत होतं. पण त्यांच्या हातात पैसे अधिक पडत नव्हते. आईला आता जास्त पैसे पाठवावेत, असं त्यांना वाटत होतं. पण ते जमत नव्हतं. जनुभाऊंकडे विषय काढला तरी ते लक्ष देत नव्हते. खूप धीर धरला, पण शेवटी एक दिवस सगळ्या मित्र मंडळींनी उचल खाल्ली आणि सगळेजण कंपनी सोडून बाहेर पडले.
‘जो पगार घेणार नाही तो मालक’ या तत्त्वावर नवीन कंपनी सुरू करण्याचं ठरलं. नोकरांपेक्षा मालकच जास्त! सुरूवातीला वीस-एकवीस मालक होते, पण कंपनी सुरू झाली तेव्हा दत्तोबा आणि केशवराव हे दोघे भाऊ, आणि वीरकर बेडेकर असे स्नेही मिळून सात आठ मालक झाले. कंपनीची स्थापना हुबळी मुक्कामी, सिद्धरूढ स्वामींच्या शुभाशीर्वादाने झाली. कंपनीचं नाव केशवरावांनी सुचवलं. ‘ललित कलादर्श नाटक मंडळी’ तो दिवस होता. एक जानेवारी १९१० आणि तेव्हा केशवराव होते अवघे अठरा वर्षाचे! त्या काळातली ‘ललित कलादर्श’ ही एकमेव नाटक मंडळी आज शंभर वर्षानंतरही भालचंद्र पेंढारकर यांच्या रूपाने कार्यरत आहे.
सौभद्र, शारदा, गोपीचंद असे खेळ संस्था करत होती. पण कंपनीचा जम बस नव्हता. सावकार तगादा लावत होते. केशवराव जीव तोडून आपल्या भूमिका करत होते. कंपनी उत्तम चालवत होते, पण वर्षा, दोन वर्षातच, एकेका मालकाने अंग काढून घेतले आणि कंपनीची जबाबदारी दोघा भोसले बंधूंवर पडली.
केशवराव नव्या नाटकाच्या शोधात होते. त्यांनी आ. रा. दोंदे यांचं ‘मदालसा’ आणि हिराबाई पेडणेकर यांचं ‘दामिनी’ अशी दोन नाटकं बाहेर काढली. पण, त्यांनी दम धरला नाही. हिराबाई या तत्कालीन ‘अकुलिना स्त्री’चं नाटक रंगभूमीवर आणून त्यांनी तत्कालीन सामाजिक प्रतिष्ठेचा आशयही साकार केला. याच सुमाराला त्यांनी वीर वामनराव जोशी यांचं ‘राक्षसी महत्त्वाकांक्षा’ हे नाटक मिळवलं.
२० सप्टेंबर १९१३ रोजी मुंबईत बॉम्बे थिएटरमध्ये या नाटकाचा पहिला प्रयोग झाला. नाटकाचा विषय, आशय, याला पूरक असं सुसंग नेपथ्य, सिद्धहस्त कलाकार आनंद मेस्त्री यांनी दिलं होतं. प्रथमच इथे मराठी रंगभूमीला मखमली पडदा मिळाला. या नाटकातील केशवरावांच्या ‘मृणालिनी’च्या भूमिकेने आणि तेजस्वी गायनाने रसिक दिपून गेले. कंपनीवर पैशांचा पाऊस पडला. कर्ज तर फिटलेच पण गाठीशी पैसाही खूप आला. यावेळी मुंबई रसिकांनी आणि मित्र परिवाराने केशवरावांचा भव्य नागरी सत्कार करून त्यांना एक थैली अर्पण केली होती. या समारंभाला केशवरावांचे गुरू दत्तोपंत जांभेकर मुद्दाम आले होते. केशवरावांनी कृतज्ञतापूर्वक नम्रपणे त्यांना मिळालेली थैली गुरूचरणी अर्पण केली.
तिथून पुढे केशवराव कंपनी घेऊन विदर्भाच्या दौऱ्यावर गेले, तेही स्पेशल ट्रेन घेऊन. ट्रेनवर फलक झळकत होता, ‘ललित कलादर्श नाटक मंडळी.’ त्याकाळी नाटक कंपन्या संस्थानिकांच्या राजे राजवाड्यांच्या आश्रयावर, सहाय्यावर चालायच्या. पण केशवराव आपल्या कंपनीचा उल्लेख, खास लोकाश्रयाखालील असा मोठ्या अभिमानाने करीत होते.
‘राक्षसी महत्त्वाकांक्षे’च्या जोडीला दुसरं नवं नाटक आणण्याच्या विचारात केशवराव होते. इतक्यात त्यांना ‘मानापमान’ नाटकाच्या प्रयोगाचे हक्क मिळाले. याच वेळी बापूराव पेंढारकर त्यांना मिळाले. ‘मानापमान’ च्या तालमी जोरात सुरू झाल्या आणि ‘मानापमान’चा पहिला प्रयोग त्यांनी मुंबईत डिसेंबर १९१५ मध्ये बॉम्बे थिएटरमध्ये सादर केला. धैर्यधर (केशवराव) भामिनी (बापूराव पेंढारकर) आणि लक्ष्मीधर (दत्तोपंत भोसले)! खुद्द काकासाहेब खाडिलकर यांनी, ‘मला तुमचा धैर्यधर खूप आवडला!’ असं केशवरावांचं कौतुक केलं.
‘कर्ज फिटेपर्यंत कपाळाला गंध लावणार नाही’ असा केशवरावांनी पण केला होता. म्हणून ते गंध लावत नसत. ‘राक्षसी महत्त्वाकांक्षा’ आणि ‘मानापमान’ च्या अपूर्व यशानंतर ते नरसोबावाडीला गेले. दत्त हे त्यांचं दैवत. तिथे षोडशोपचारे पूजा केली. सहस्त्रभोजन घातलं आणि मंत्रघोषात आशीर्वाद घेऊन कपाळी केशरी गंध लावलं आणि मग पुण्याला परतले.
पुढचा मुक्काम होता कोल्हापूर. वयाच्या चौथ्या वर्षी घर सोडल्यापासून जन्मभूमीत ते प्रथमच पाऊल टाकत होते. दोन महिन्याच्या मुक्कामात सौभद्र, शारदा, राक्षसी महत्त्वाकांक्षा, मानापमान अशा खेळांनी कोल्हापूर दुमदुमून गेलं. उत्पन्नही अफाट मिळालं. मिळालेला सारा पैसा त्यांनी दानधर्मात खर्च केला. आई अंबाबाईच्या मंदिराच्या कळसाला सोन्याचा मुलामा चढवला. अनेक संस्थांना देणग्या दिल्या. कोल्हापूरला मिळालेला पैसा कोल्हापूर वेशीच्या बाहेर नेला नाही.
मामा वरेकर हे नवे नाटककार आता ललित कलेला लाभले होते. त्यांची ‘हाच मुलाचा बाप’ आणि ‘संन्याशाचा संसार’ ही दोन नवी सामाजिक नाटके केशवरावांनी रंगभूमीवर आणली आणि त्यातून हुंडा आणि पतित परिवर्तन, अशा सामाजिक विषयांना त्यांनी कलारूप साकार केलं. याचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ‘हाच मुलाचा बाप’ या नाटकात पशू डॉक्टरचं काम, दामू अण्णा मालवणकर यांनी केलं होतं. प्रेक्षक त्यांच्यावर बेहद्द खूष झाले होते.
गायनाचार्य रामकृष्णबुवा वझे यांच्याबद्दल केशवरावांच्या मनात अतिव आदर होता. ललितकला नाट्य कंपनीचे ते गुरू! वझेबुवांची गायकी आक्रमक होती. त्यांना केशवरावांसारखा तडफदार आवाजाचा शिष्य लाभला.
१९२१ हे ललितकलाचं वैभवाचं वर्ष होतं. केशवरावांच्या कारकीर्दीचं ते सोनेरी वर्ष होतं. पुण्यात किर्लोस्कर थिएटरमध्ये तेव्हाचं नाट्यसंमेलन भरलं होतं. या नाट्य संमेलनाचं यजमानपद ललितकलेकडे होतं. संमेलनाचा सर्व खर्च त्यावेळी केशवरावांनी केला होता. जमलेले सर्व रसिक संमेलनात, केशवरावांचं मनापासून कौतुक करीत होते.
याच वर्षी, आप्पासाहेब टिपणीस यांचं ‘शहाशिवाजी’ हे नाटक केशवरावांनी १४ मे १९२१ रोजी रंगभूमीवर आणलं. शिवाजी महाराज प्रथम गायले ते याच नाटकात. केशवरावांचा ‘संगीत शिवाजी’ प्रेक्षकांना इतका पसंत पडला की खरा शिवाजी असाच दणदणीत गात असला पाहिजे, असे प्रेक्षकांना वाटू लागले.
१९२० साली लो. टिळकांचं निधन झालं आणि देशाने गांधीजीचं नेतृत्व स्वीकारलं. गांधीजींनी लोकमान्य स्वराज्य फंडासाठी एक कोटी रूपयांचा संकल्प सोडला होता. या संकल्पामुळेच रंगभूमीवर एक अभूतपूर्व प्रयोग घडला. तो म्हणजे संयुक्त ‘मानापमान’चा! यात केशवराव धैर्यधर होते, तर बालगंधर्व भामिनी, इतर पात्रांची विभागणी करताना गणपतराव बोडस म्हणाले, ‘केशवराव, शिपाई ललितकलेतले आणा, चोर गंधर्व कंपनीत आहेत.’
या प्रयोगाला त्यावेळी पहिले तिकीट होते १०० रूपये आणि पिटातले तिकीट होते पाच रूपये. प्रयोग केव्हाच हाऊसफुल्ल झाला होता. केशवरावांच्या तेजस्वी ताना आणि बालगंधर्वांच्या गळ्यातील गोडवा, यांनी रसिकांची मने तृप्त झाली. या प्रयोगानंतर रसिकांच्या पसंतीची टाळी केशवरावांच्या गाण्याकडे झुकलेली होती असे इतिहास सांगतो.
या प्रयोगात खर्च जाऊन प्रत्येकी साडेचार हजार रूपये आले. कर्जबाजारी झालेल्या बालगंधर्वांना केशवराव म्हणाले, ‘दादा, कर्ज—कर्ज काय घेऊन बसलात? मनात आणलं तर असे प्रयोग करून कर्जाचे डोंगर आपण फेकून देऊ!’
प्रयोगाच्या वेळी ‘संदेश’कार अच्युत बळवंत कोल्हटकर यांनी सर्वप्रथम केशवरावांचा उल्लेख ‘संगीतसूर्य’ असा केला. ललित कलादर्श नाट्य संस्थेच्या रूपाने रसिकांचे ऋण मान्य करणे, मखमली पडद्याचे वास्तव नेपथ्य सुरू करणे आणि आपल्या मालकीची, आपण निर्माण केलेली, वाजती, गाजती आपली नाट्यसंस्था आपल्या कलेच्या वारसदाराकडे बापूराव पेंढारकरांकडे सोपवणं हे करायला मन केवढं मोठं असावं लागतं. कौटुंबिक वारसांचा विचारसुद्धा त्यांच्या मनाला शिवला नाही. इथे ओढ होती ती रक्ताचं पाणी करून उभ्या केलेल्या संस्थेच्या भवितव्याची!
मराठी रंगभूमीवरच्या अनेक मूलभूत उपक्रमांचे केशवराव धनी होते.आणखी एक महत्त्वाचा केशवरावांनी राबवलेला उपक्रम म्हणजे नाटक ठरल्यावेळी घड्याळाच्या ठोक्याला सुरू करण्याचा. केशवरावांच्या ललितकलाच्या नाटकाच्या तिकिटावर ‘रात्री नऊ’चा आकडा छापलेला असे. याचा अर्थ, नाटक रात्री नऊच्या ठोक्यालाच सुरू होणार.
यासंबंधी एक आठवण सांगितली जाते. एकदा एका संस्थानात ललितकलाच्या नाटकाचा प्रयोग होता. वाड्यावरून निरोप आला की, ‘राजेसाहेब नाटकाला येणार आहेत, तेव्हा प्रयोग अर्धातास उशिरा म्हणजे साडेनऊला सुरू करावा.’ केशवरावांनी ठरल्या वेळी नऊ वाजता तिसरी घंटा दिली आणि नांदी सुरू केली. केशवरावांच्या तेजस्वी तडफदार आवाजात प्रेक्षकांना त्या दिवशी अर्धातास नांदी ऐकायला मिळाली.
महाराज साडेनऊला आले. तोपर्यंत नांदी चालू होती आणि नांदी संपल्यानंतर साडेनऊला नाटक सुरू झाले.
पुढे ‘माझा सूर ज्या क्षणी कमी होईल, त्याक्षणी मला मृत्यू यावा’ असा संकल्प केशवरावांनी केला आणि त्यांना ताप येऊ लागला. त्याही अवस्थेत त्यांनी बालगंधर्वासोबत ‘सौभद्र’ नाटक केलं पण ताप त्यांचा पिच्छा सोडेना. अखेर तो टायफॉईड ठरला आणि ४ ऑक्टोबर १९२१ रोजी या केशव भोसले नावाच्या संगीतसूर्याचा अस्त झाला. केशवराव नावाचं तुफान शांत झालं.
वामन काळे
संकलन. संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
ठाण्यातील शहरास “सांस्कृतिक शहर” हे नावलौकिक प्राप्त करुन देणार्या कलाकारांपैकी एक होतकरु अभिनेता पराग मधुकर बडेकर. आंतर महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धांमध्ये अभिनेता व दिग्दर्शक म्हणून मोलाची कामगिरी त्यांनी बजावली.
दिग्दर्शक-निर्माते रमेश सिप्पी यांनी आत्तापर्यंत बॉलिवूडला अनेक सिनेमे दिले, मात्र शोले सिनेमाने त्यांनी जी प्रसिद्ध मिळवून दिली,ती इतर सिनेमांमुळे त्यांना मिळाली नाही. एकच सिनेमा त्यांच्या करिअरमधील मैलाचा दगड ठरला.या सिनेमाने अनेक रेकॉर्ड प्रस्थापित करत त्यांचे नाव इतिहासातील महान दिग्दर्शकांमध्ये नोंदवले गेले. त्यांचा जन्म २३ जानेवारी १९४७ पाकिस्तानमधल्या कराचीमध्ये झाला.
रमेश सिप्पी यांचे वडील जी.पी.सिप्पी प्रख्यात निर्माते होते. वयाच्या नवव्या वर्षी रमेश सिप्पी यांनी पहिल्यांदा कॅमे-यासमोर काम केले होते. १९५३ मध्ये वडिलांच्या 'शहंशाह' या सिनेमात रमेश यांनी बालकलाकाराच्या रुपात काम केले होते.रमेश यांनी दिग्दर्शक आणि निर्माता म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे.या दोन्ही क्षेत्रात त्यांना यश प्राप्त झाले. १९७१ मध्ये 'अंदाज' या सिनेमाद्वारे दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करण्यापूर्वी त्यांनी सात वर्षे सहायक दिग्दर्शक म्हणून काम केले होते. "अंदाज', "सीता और गीता', "ब्रह्मचारी' वगैरे चित्रपटांनी सुरवात करणाऱ्या रमेश सिप्पी यांनी अल्पावधीतच चित्रसृष्टीत भक्कम स्थान निर्माण केले. "शोले'ने त्यांचे नाव इतिहासात लिहिले गेले. त्यानंतर आलेला "शान' जरी कोसळला असला, तरी डिंपल कापडियाचे पुनरागमन असलेला "सागर' चांगला चालला.
"शक्ती'मध्ये त्यांनी दिलीपकुमार, अमिताभ बच्चनला प्रथमच एकत्र आणले. चित्रसृष्टीत असे वेगवेगळे प्रयोग करणाऱ्या या दिग्दर्शकाने "बुनियाद' या मालिकेद्वारे टीव्हीवरही प्रयोग केला आणि तो तुफान यशस्वी ठरला. "शोले'प्रमाणेच या मालिकेतील मास्टरजी, लाजोजी वगैरे पात्रे घराघरांत पोचली. रमेश सिप्पी दिग्दर्शक म्हणून दिलेले अंदाज, सीता और गीता, शोले, शान, शक्ति,सागर, जमीन, भ्रष्टाचार, जमाना दीवाना, असे अनेक सिनेमे सुपरहिट ठरले. रमेश सिप्पी यांनी दूरचित्रवाणी मालिका'बुनियाद'चेही दिग्दर्शन केले होते. ती टीव्ही मालिका पण खूप गाजली होती.
रमेश सिप्पी यांनी निर्माता म्हणून ब्रह्मचारी, कुछ ना कहो, ब्लफमास्टर, टॅक्सी नंबर 9211, चांदनी चौक टू चाइना, नौटंकी साला, सोनाली केबल या चित्रपटासाठी काम केले. त्यांनी अभिनेत्री किरण जुनेजा यांच्याशी विवाह केला. अभिनेत्री किरण जुनेजा रमेश सिप्पी यांच्या दुस-या पत्नी आहेत. रमेश सिप्पी यांना दोन मुले असून रोहन सिप्पी हे मुलाचे तर शीना सिप्पी हे मुलीचे नाव आहे. शीनाचे लग्न शशी कपूर यांचा मुलगा कुणाल कपूरसोबत झाले आहे. रोहन प्रसिद्ध दिग्दर्शक असून आपल्या वडिलांचा वारसा सांभाळत आहे. रमेश सिप्पी हे राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाच्या (एनएफडीसी) अध्यक्षपदी राहिले आहेत.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट
यतीन कार्येकर हे आपल्या सगळ्यांच्या ओळखीचं नाव आहे. यतीन कार्येकर हे मराठीतील जेष्ठ अभिनेत्री ज्योत्स्ना कार्येकर यांचे सुपुत्र आहेत.
सरंजामशाही आणि जमीनदारशाहीच्या विरोधात बंडाचा झेंडा उभारून या दोन्ही शाह्या समूळ संपविण्याचा विडा उचलेल्या सर्वहारा वर्गाचे ते एकनिष्ठ पाईक असले तरी प्रत्यक्षात त्यांच्या घरातच दोन पिढय़ा अगोदपर्यंत या दोनही शाह्या सुखनैव नांदत होत्या. वडील राजनिष्ठ सेवक होते आणि विद्यार्थीदशेत अत्यंत आज्ञाधारक असलेला गंगाधर चिटणीस एकदम दुसऱ्या टोकाच्या विचारांचा गिरणी कामगारांच्या सुखदु:खाशी समरस होत गेला. हे अतक्र्य घडविले साने गुरूजींनी.
‘समाजासाठी आणि देशासाठी जगा’ हा साने गुरूजींचा संदेश त्यांनी आत्मसात केला आणि एका क्षणात सुखाची सरकारी नोकरी सोडून त्यांनी कामगारांशी आपले नाते जुळवले ते अखेपर्यंत! अहमदनगर जिल्ह्यातील नेवासे येथे १९२७ मध्ये जन्म झालेल्या कॉ. गंगाधर चिटणीस यांचे शिक्षण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात झाले आहे.
सावंतवाडी, पुणे, मुंबई येथे प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यावर ते पुण्याला गेले. गंगाधरचे वडील राजापेक्षा राजनिष्ठ असे होते. त्यांना आपल्या मुलानेही तसेच व्हावे असे वाटत होते. विद्रोही वातावरणापासून त्यांनी मुलांना कटाक्षाने दूर ठेवले असले तरी इंग्रजी पाचवीपर्यंत मुंबईत शिक्षण घेत असताना गंगाधरच्या एका शिक्षकामुळे त्याचा रा. स्व. संघाच्या शिवाजी पार्कच्या शाखेशी संबंध आला होता. पण संघाच्या शिकवणुकीविषयी त्यांचा भ्रमनिरास झाला आणि नंतर वडिलांच्या बदलीमुळे त्यांचा संघाशी असलेला संबंध कायमचा तुटला. पुन्हा ते मुंबईत आले पण तेव्हा त्यांच्या विचारांवर मार्क्सवाद आणि साने गुरूजी यांच्या विचारांचा पगडा होता. त्यांनी मुंबईच्या पोदार महाविद्यालयातून आपले शिक्षण पूर्ण केले. वाणिज्य शाखेमध्ये अॅडव्हान्स बँकींगमध्ये ते विद्यापीठात सर्वप्रथम आले. त्यांना सरकारी नोकरी मिळाली तीही निर्वासितांचे अश्रू पुसणारी.
स्वातंत्र मिळाल्यावर देशातल्या निर्वासितांच्या छावण्यांमध्ये जाऊन त्यांना मदत करताना आपल्या समाजातील विषमता त्यांना सतत डाचत होती आणि त्याचवेळी साने गुरूजींच्या साहित्याचा प्रभाव त्यांच्या मनावर होत होता. एका क्षणी त्यांनी ठाम निर्णय घेतला आणि नोकरी सोडून कम्युनिस्ट पक्षात ते दाखल झाले. मार्क्सवादी साहित्य संपूर्णपणे वाचून पूर्ण विचारांती कम्युनिस्ट पक्षात दाखल झालेल्या चिटणीसांची नाळ गिरणी कामगारांच्या प्रत्येक लढयाबरोबर अधिक घट्ट होत गेली. १९५२ मध्ये पक्षात आल्यावर त्यांनी कॉ. डांगे यांच्या बरोबर आयटकच्या कामात स्वत:ला झोकून दिले आणि कार्यालयीन कामकाजाची जबाबदारी स्वत:हून स्वीकारली.
गिरणी कामगारांच्या संपामध्ये गिरणगावातील अनेक गिरण्यांच्या दरवाजावर संपफोडय़ांचे हल्ले झेलत, कामगारांना आपली भूमिका पटवून देण्यात चिटणीसांचा हातखंडा होता. शिवसेनेच्या उदयानंतर त्यांना तोडीस तोड उत्तर देण्यासाठी गिरणी कामगार युनियन आणि कम्युनिस्ट पक्षातर्फे काढण्यात आलेल्या ‘लाल बावटा’ या मुखपत्राचे संपादन चिटणीस यांनी केले होते. गिरणी कामगारांचे बोनसचे लढे असोत किंवा क्षणिक एखाद्या मुद्यावरून एखाद्या गिरणीत अचानक आंदोलन झालेले असो, चिटणीस तेथील तणाव कमी करण्याचा प्रयत्न करीत असत.
कमला मिल असो वा मधुसूदन मिल तेथील कामगारांना आजही पोलिसांबरोबर झालेल्या संघर्षांत चिटणीसांनी बजावलेली समन्वयाची भूमिका लक्षात आहे. अनेकदा हल्ले झाल्यावरही त्याच नेटाने आपली ‘गेट मिटींग’ पूर्ण करणारे चिटणीस पंक्षातर्गत वादामध्ये कधी पडले नाहीत. पक्षाचा आदेश कायम मानणारे आणि प्रसंगी आपल्या मनाला मुरड घालून तो आदेश शेवटपर्यंत पाळणारे, असे ते एकनिष्ठ पदाधिकारी होते. गिरणी कामगार युनियनच्या स्थापनेपासून किंबहुना त्या अगोदरपासून त्यांनी गिरणी कामगारांची लढाई पाहिली होती.
१९७१ ते २००० पर्यंत तब्बल २९ वर्षे ते मुंबई गिरणी कामगार युनियनचे कार्यवाह होते. पक्षांतर्गत मतभेद असले तरीही त्यांनी भावनिक आणि वैचारिक पातळीवर भारतीय कम्युनिस्ट पक्षाबरोबर असलेली नाळ कधीही तोडली नाही. आंतरराष्ट्रीय राजकारणही जवळून अभ्यासलेल्या साम्यवादी नेते आणि कार्यकर्त्यांच्या पठडीतले ते होते. कामगारांच्या सर्व संघटना एकत्र करून पुन्हा एक मोठी लढाई उभारण्याची त्यांची मनीषा होती, पण ती त्यांची मंझिल दूरच राहिली.
आठ वर्षे प्रकृती साथ देत नसतानाही त्यांनी आपला अभ्यास सुरू ठेवला. काही दिवसांपूर्वी त्यांना इस्पितळात दाखल केले तेव्हाही ते आपल्या मंझिलबाबत आशावादी होते. इतक्या सरळ मनाचा, इतका नि:स्पृह आणि इतक्या निस्वार्थीपणे आपले जीवन, ध्येयासाठी पूर्णपणे वाहून टाकणारा असा हा कॉम्रेड होता. त्यामुळेच जेव्हा कम्युनिस्ट पक्षात फूट पडली तेव्हा आणि कॉ. श्रीपाद अमृत डांगे यांना पक्षातच टीकेचे लक्ष्य केले गेले, तेव्हा त्यांना खूप वेदना झाल्या. परंतु ते वैचारिक आणि धोरणात्मक वादामध्ये सहसा पडत नसत आणि आपला लाल ध्रुव तारा कधीतरी अवघ्या जगावरती त्याची प्रभा पसरवेल असा आत्मविश्वास त्यांना अखेपर्यंत होता. त्यामुळेच अनेकदा जागतिक पातळीवरती साम्यवादी देशांना व विचारांना पीछेहाट सहन करावी लागली तरी ते खचून गेले नाहीत.
भविष्य कामगार आणि कष्टकरी वर्गाच्याच हातात आहे अशी खात्री त्यांना होती आणि ती मनात ठेऊनच ते चिरंतनात विलिन झाले.
Copyright © 2025 | Marathisrushti