जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
संगीत नाटकांच्या कालखंडात रंगभूमीनी महाराष्ट्राला जे अनेक नट दिले त्यातील एक नाव म्हणजे गणपतराव बोडस. त्यांचा जन्म २ जुलै १८८० रोजी झाला. संगीताची आवड बालपणापासूनच त्यांना होती. १८९५ मध्ये किर्लोस्कर संगीत मंडळीत प्रवेश करून अवघ्या पंधराव्या वर्षी गणपतरावांनी आपली रंगभूमीवरील कारकीर्द सुरू केली. संगीत नाटकातून भूमिका करताना त्यांनी संगीत सौभद्रमध्ये कृष्ण, संगीत शारदा मध्ये कांचनभट,मूकनायकात विक्रांत तर संगीत मानापमानात लक्ष्मीधर इत्यादींच्या भूमिका केल्या. त्यांनी किर्लोस्कर संगीत मंडळी सोडल्यानंतर गोविदराव टेंबे व बालगंधर्व ह्यांच्याबरोबर गंधर्व नाटक मंडळी ही संस्था स्थापन केली. गंधर्व नाटक मंडळीच्या नाटकातून त्यांनी केलेल्या भूमिकांमुळे त्यांना प्रसिद्धी मिळाली. एकच प्याला मध्ये सुधाकर, मानापमानातील लक्ष्मीधर, मृच्छकटिक मधील शकार, विद्याहरण मधील शिष्यवर, संशयकल्लोळमधील फाल्गुनराव या त्यांच्या प्रमुख भूमिका खूपच गाजल्या. त्यांच्या या उत्कृष्ट भूमिकांमुळे त्यांना संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार ही मिळाला होता. जे करायचे ते चांगलेच, उठावदार, समरसून करायचे अशा भूमिकेतून बोडसांनी संगीत रंगभूमीवरची व्यक्तिचित्रे अजरामर केली. गाता गळा नसतानाही कृष्णाच्या पदांना ’वन्समोअर’ मिळवले. रंगभूमीवरील आणि रंगभूमीमागील आपल्या जीवन पटाचे दर्शन गणपतराव बोडसांनी माझी भूमिका या आपल्या आत्मचरित्रातून घडविले आहे. मराठी कलावंताने लिहिलेले हे पहिलेच आत्मचरित्र आहे. माझी भूमिका हे त्यांचे आत्मचरित्र १९४० साली प्रकाशित झाले. मा. गणपतराव बोडस यांचे २३ डिसेंबर १९६५ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
मराठी सिनेमांच्या संगीतासाठी सध्या आघाडीच्या नावांमध्ये घेतलं जाणार एक नाव म्हणजे चिनार-महेश. चिनार खारकर आणि महेश ओगले या जोडगोळीने संगीतकार म्हणून मराठीतल्या अनेक सिनेमांच्या गाण्यांना संगीत दिलं. या दोघांनी एकत्रच मराठी सिनेइंडस्ट्रीत संगीतकार म्हणून श्रीगणेशा केला तो २००४ साली.
सुहास शिरवळकर उर्फ सुशि हे एक जबरदस्त लोकप्रिय लेखक होते. यांचा जन्म १५ नोव्हेंबर १९४८ रोजी पुणे येथे झाला. सुहास शिरवळकर यांचे वाणिज्य शाखेतील पदवीपर्यंतचे शिक्षणही पुण्यातच झाले. वयाच्या २४ व्या वर्षी त्यांनी लिहिलेल्या दुनियादारी या पहिल्याच कादंबरीला भरपूर लोकप्रियता लाभली आणि लेखक म्हणून त्यांचा प्रवास सुरू झाला. त्यांच्याच शब्दांत सांगायचं तर 'पुण्यापासून गोव्यापर्यंत आणि पुण्यापासून नागपूरपर्यंत मी चालत गेलो तर प्रत्येक गावात मला माझा चाहता भेटेल. मला हॉटेलात जेवावं लागणार नाही.
वयाच्या २४ व्या वर्षी त्यांनी लिहिलेल्या ' दुनियादारी ' या पहिल्याच कादंबरीला भरपूर लोकप्रियता लाभली आणि लेखक म्हणून त्यांचा प्रवास सुरू झाला. त्यांचे लेखन शैली प्रसन्न, खेळकर होती. छोट्या छोट्या सुटसुटीत वाक्यरचना, बोली भाषेचा भरपूर वापर आणि संवादात्मक शैलीमुळं त्याचं लेखन कधीही कंटाळवाणं होत नसे. पण समीक्षक आपल्याला महत्त्व देत नाहीत, इतिहासात आपला उल्लेख हेटाळणीने केला जातो, असं त्यांना वाटत राहायचं. १९७४ साली त्यांनी रहस्यकथा लेखनास सुरुवात केली. तेव्हापासून १९७९ सालापर्यंत त्यांनी २५० छोट्या मोठ्या रहस्यथा लिहिल्या.
१९८० सालापासून ते 'सामजिक कादंबरी' साहित्यप्रकाराकडे वळले. शिरवळकरांनी वाचकप्रिय लेखनप्रकार जाणीवपूर्वक निवडला. परंतु 'लोकांना आवडेल ते' अश्या मर्यादित अर्थाने त्याकडे न बघता, त्यांनी आपले साहित्य सवंग दर्जाचे होऊ न देता लेखन केले. रहस्यकथा, १७५ कादंबऱ्यांव्यतिरिक्त त्यांनी इतर कथांचेही लेखन केले. या कथा पुढे कथासंग्रहाच्या रूपात प्रकशित करण्यात आल्या. सुहास शिरवळकरांनी काही बालकथा देखील लिहिल्या. त्यांच्या निधनानंतर त्यांनी लिहलेल्या कवितांचा काव्यसंग्रहसुद्धा प्रकाशित झाला आहे. त्यांच्या 'देवकी' या कथेवर आधारलेला मराठी चित्रपट बनला, तर 'दुनियादारी', 'कोवळीक' या कादंबऱ्यांवर दूरचित्रवाणी मालिकाही प्रसिद्ध झाल्या होत्या. नंतर दुनियादारी ' या कादंबरी वर चित्रपट आला व त्याला तुफान लोकप्रियता लाभली. सुहास शिरवळकर यांचे ११ जुलै, २००३ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
अप्पासाहेब पटवर्धन हे प्रसिद्धीपासून अलिप्त राहिले होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यात गोपुरी आश्रम आहे. कोकणचे गांधी म्हणून प्रसिध्द असलेल्या आप्पासाहेब पटवर्धन यांनी या आश्रमाची स्थापना केली. परिसरातील युवकांना हाताशी धरुन येथे त्यांनी गोबर ग्रॅस प्रकल्प सुरु केला.
राजा परांजपे यांचा चित्रपटसृष्टीत प्रवेश झाला तो मात्र नट वा सहायक दिग्दर्शक म्हणून नव्हे तर संगीत विभागात ‘ऑर्गन वादक’ म्हणून! राजाभाऊंना लहानपणपासून संगीताचं उपजतच वेड होतं. त्यांचा जन्म २४ एप्रिल १९१० रोजी झाला. हा वारसा त्यांना त्यांच्या आईकडून लाभला. विद्यार्थी दशेतच ‘भारत गायन समाजा’च्या कै. बापूराव केतकरांनी त्यांच्या संगीतवेडाला चांगलं वळण दिलं. नवनवी नाटके आणि सिनेमा बघण्याचे वेड त्यांना लागले. पण रोज रोज नाटक, सिनेमा पाहायचं म्हटलं तर पैशाची चणचण त्यांना भासू लागली. पण त्यासाठी त्यांच्या संगीतवेडातूनच त्यांना एक नवीन मार्ग सापडला. राजा परांजपे यांची अभिनयातील समज पाहून तिथेच त्यांना "लपंडाव' या नाटकात अचानक संधी मिळाली. या नाटकातील एक कलाकार अचानक नाटक सोडून गेला. दात्ये यांयांनी त्याच्या जागी राजा परांजपे ना संधी दिली, त्या संधीचे त्यांनी चीज केले. पुढे केशवराव दात्ये यांनीच त्यांना "सावकारी पाश' या चित्रपटातील भूमिका मिळवून दिली. त्यानंतर ते भालजी पेंढाकर यांच्याकडे सहायक दिग्दर्शक म्हणून काम करू लागले. भालजींच्याच काही चित्रपटांत त्यांनी अभिनयही केला. "सावकारी पाश'मधील भूमिकेनंतर ते छोटी मोठी कामे करत होते; पण खऱ्या अर्थाने ते दिग्दर्शक झाले ते १९४८ मध्ये "बलिदान'च्या माध्यमातून आणि यशाची बरसात झाली ती "जिवाचा सखा' या चित्रपटाने.
मराठी चित्रपटाच्या सुवर्णकाळातील सर्वांत यशस्वी त्रयी म्हणजे राजा परांजपे, सुधीर फडके आणि ग. दि. माडगूळकर होय. ग. दि. माडगूळकर यांच्या पटकथेवर राजाभाऊ आपल्या दिग्दर्शन कौशल्याचा असा काही प्रभाव पाडत, की तो चित्रपट वेगळाच होऊन जाई. शब्दप्रभू माडगूळकरांयांनी राजा परांजपे ना परिसाची उपमा दिली होती. तुमच्या पटकथेवर इतरांना राजा परांजपे च्याइतके यश का नाही मिळवता आले, असे त्यांना एकदा विचारले असता गदिमा म्हणाले राजाभाऊ हे परिसासारखे आहेत, त्यामुळे त्यांच्यासारखी किमया इतरांना कशी जमेल? राजा परांजपे यांनी केवळ मराठी चित्रपटांचे दिग्दर्शन केले असे नाही, तर त्यांयांनी दिग्दर्शित केलेल्या चार हिंदी चित्रपटांनाही चांगले यश मिळाले. त्यातील "दो कलियॉं' हा चित्रपट तर प्रचंड यशस्वी ठरला होता. आज आपण अनेक दिग्दर्शकांच्या वैविध्यपूर्ण शैलींबद्दल बोलत असतो; पण कोणताही गाजावाजा न करता राजाभाऊ वेगवेगळ्या प्रकृतीचे चित्रपट त्याकाळात दिग्दर्शित करत होते आणि यश मिळवत होते. "पुढचं पाऊल', "ऊन पाऊस', "देवघर' यासारखे कलात्मक चित्रपट राजा परांजपे यांनी यशस्वी करून दाखवले होते. राजा परांजपे यांनी दिग्दर्शन केले आणि ज्यामध्ये त्यांयांनी स्वतः काम केले अशा "हा माझा मार्ग एकला' या चित्रपटाची सगळीकडेच वाहवा झाली, त्याचबरोबर या चित्रपटाला राष्ट्रपतींचे सुवर्णपदकही मिळाले होते.
अर्थात, हा बहुमान त्यांना दोनदा मिळाला होता. "पाठलाग' या रहस्यप्रधान चित्रपटालाही राष्ट्रपतींचा पुरस्कार मिळाला होता. हा चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीत मैलाचा दगड मानला जातो. त्याचबरोबर या चित्रपटाचे यश पाहून हिंदीमध्येही त्याचा रीमेक केला गेला. "मेरा साया' नावाने हा चित्रपट हिंदीत आला. नाटकात उत्तम भूमिका करून प्रसिद्ध झालेल्या राजा परांजपे चा अभिनेता म्हणून रसिकांच्या मनावर ठसा उमटला होता, तरी दिग्दर्शन हाच त्यांच्यासाठी सर्वांत यशाचा भाग ठरला. भूमिका कोणतीही असो, मग ती विनोदी असो की कौटुंबिक अथवा कारुण्यमयी, राजाभाऊ त्या भूमिकेला आपला रंग देत असत. हेच कौशल्य त्यांयांनी चित्रपट दिग्दर्शित करताना ठेवले, त्यामुळे एकाच वेळी भिन्न प्रकृतीच्या चित्रपटांचे दिग्दर्शन करूनही त्यांयांनी त्यामध्ये लक्षणीय यश मिळवले. व्ही. शांताराम यांनी त्यांची तुलना करताना त्यांना सत्यजित रे यांच्यापेक्षा अधिक गुण दिले होते. कोणत्याही चित्रपटाचे दिग्दर्शन करत असताना ते त्या चित्रपटाचेच होऊन जात असत, त्या वेळी दुसरा विचारच त्यांना सुचत नसे.
२७ चित्रपटांचे दिग्दर्शन केलेल्या या माणसाचे पाय शेवटपर्यंत जमिनीवर होते. शरद तळवलकर, सीमा आणि रमेश देव, राजा गोसावी आणि डॉ. काशिनाथ घाणेकर व सचिन पिळगावकर या सारख्या अनेकांना चित्रपटसृष्टीत उभे केलेल्या या दिग्दर्शकाने आपल्या काळात अक्षरशः राजासारखे राज्य केले. स्कूल अर्थातच राजा परांजपे यांचं. या मंडळींच्या कारकिर्दीला सर्वाधिक आकार दिला तो राजा परांजपे या कसबी दिग्दर्शकाने. मा. राजा परांजपे यांचे ९ फेब्रुवारी १९७९ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
तारक मेहता यांच्या लेखनामध्ये नेहमीच नव्या पिढीच्या विचारांचे प्रतिबिंब पाहायला मिळाले. ‘दुनियाने उंधा चष्मा’ या सदरासाठी आणि अनोख्या लेखन शैलीसाठी तारक मेहता ओळखले जायचे. गुजराती रंगभूमीसाठी तारक मेहता यांचे योगदान फार महत्त्वाचे आहे.
दिलीप वेंगसरकर यांच्या कारकीर्दीतील सर्वात संस्मरणीय क्षण म्हणजे लॉर्ड्सवर साकारलेले सलग तीन शतके. सहा फूट उंचीचा वेंगसरकर एकाग्रतेने स्टान्स घेऊन उभा राहिले की हिमालयातल्या शिळेवर डोळे मिटून तपश्चर्येला बसलेल्या ऋषीसारखाच वाटे. डिफेन्स करण्याची त्याची पद्धत वेगळी होती. डिफेन्स करताना तो फार वाकत नसे. बॉलला बॅटवर लेट येऊ देऊन उभ्या उभ्या संरक्षण करण्याचे त्याचे तंत्र होते. काही वेळेस उभ्या उभ्या खेळण्याने त्याचा घात व्हायचा. पण फलंदाजीच्या बायबलमधले सगळे फटके तो बाळगून होता. मिडअॉन आणि मिडविकेटमधून मारलेला रायफल शॉट त्याचा ट्रेडमार्क होता. त्या दर्जाचा शॉट नंतर द्रविडकडे पाहायला मिळाला.
माझे वडील पूज्य पंडित विष्णू चिंचोरे हे त्यांच्या काळातील नामवंत शिक्षक होते ! पुणे येथील डेक्कन जिमखान्यावरील भांडारकर रोडवर असलेल्या महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या बाल शिक्षण मंदिर शाळेचे, जून १९३६ ते ३१ मे १९६१ ह्या कालावधीमध्ये ते मुख्याध्यापक होते. पुढे १ जून १९६१ ते ३० सप्टेंबर १९७५ या कालावधीमध्ये महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या भावे प्राथमिक शाळेचे ते मुख्याध्यापक होते !
"चिंचोरे गुरुजी" ह्याच नावाने ते ओळखले जायचे ! गोष्टीरूप इतिहास शिकवण्यामध्ये त्यांचा हातखंडा होता. गणित विषयाची भीती, मुलांच्या मनातून कायमची काढून टाकण्यात ते वाकबगार होते. भाषेचे धडे शिकविताना ते चित्ररूपी भाषेतील वर्णन करून सांगायचे तर प्रत्येक कविता ते चालीमध्ये म्हणून दाखवित असत, आपोआपच मुलांच्या कविता तोंडपाठ होत असायच्या. स्कॉलरशिपचे वर्ग ते वर्षानुवर्षे घेत होते !
चिंचोरे गुरुजींच्या शिकवण्याच्या हातोटीचे अनेक दाखले, त्यांचे विद्यार्थी ज्येष्ठ साहित्यिक व. पु. काळे ह्यांनी त्यांच्या वपुर्झा, गुलमोहर, रंगपंचमी, ककचीक अश्या अनेक पुस्तकाद्वारे वाचकांसमोर दिले आहेत. तसेच १७ मार्च १९८२ रोजी मुंबई दूरदर्शन वरून सादर झालेल्या, "आमची पंचविशी" ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून, व. पुंनी आपल्या लाडक्या चिंचोरे गुरुजींच्या अनेक हृद्य आठवणी साध्यंत कथन केल्या होत्या !
माझ्या वडिलांच्या काही विद्यार्थ्यांची नावेच पाहा ना, ज्यांनी आपल्या यशोगाथेचे सर्व श्रेय मुक्तकंठाने आपल्या चिंचोरे गुरुजींना आदरपूर्वक दिले आहे :
भारताचे एअर मार्शल भूषण गोखले, ज्येष्ठ साहित्यिक व. पु. काळे, ज्येष्ठ उद्योगपती अरुण फिरोदिया, ब्रिगेडिअर विजय खांडेकर, ब्रिगेडियर सदाशिव जावडेकर, डायबेटीस स्पेशलिस्ट डॉ. सुभाष काळे, कँसरतज्ज्ञ डॉ. पुष्पाताई शिरोळे, विख्यात निर्माते व्ही.शांताराम ह्यांचा पुतण्या व्हणकुद्रे. रोहिणी भाटे, ज्योत्स्ना भोळे ह्यांचा मुलगा सुहास केशव भोळे, अभिनेते विक्रम गोखले, मनीषा साठे, डॉ ओतूरकर, विद्युत बापट, दिलीप जोशी, जयंत दामले (मॅनेजमेंट कन्सलटंट) डॉक्टर माधव कवडे, अल्हाद धर्माधिकारी, चारू रानडे, नीता, पुष्पा पुजारी भगिनी, मेधा पंडित, सुरेखा गायधनी-पेठे, दिलीप दाणी, जयंत मालशे, जयंत झेंडे, चंद्रशेखर म्हैसकर, ही यादी फार मोठी आहे ….
विशेष म्हणजे ह्या तमाम विद्यार्थीगणांनी आपल्या लाडक्या चिंचोरे गुरुजींना आजही लक्षात ठेवलेय, ते तसा आवर्जून उल्लेख करतात, ह्यामाध्येच चिंचोरे गुरुजींच्या पवित्र शिक्षकी पेशाचे चीज झाले, असे मी आदरपूर्वक म्हणतो, माझ्या सर्व ज्ञात-अज्ञात गुरु बंधू-भगिनींना माझा मनोभावे नमस्कार,
वरून कडक शिस्तीचे दिसणारे चिंचोरे गुरुजी आतून मात्र खूप हळवे होते. व. पु. काळे, उद्योगपती अरुण फिरोदिया, जेंव्हा माझ्या वडिलांच्या अखेरच्या आजारपणात भेटायला घरी आले, तेव्हां सर्वजण जुन्या आठवणीत रमले. त्यावेळी चिंचोरे गुरुजींनी त्यांच्या अनेक विद्यार्थ्यांच्या आठवणी नावासह सांगितल्या, संग्रहामधील जुने फोटो दाखविले, तेव्हां तर सर्वजण भावुक झाले होते. व पु काळे जेव्हां बोलत होते, तेव्हां मी म्हणालो, "बापू, "शिक्षक" शब्दाची व्याख्या अशी करता येईल कां ? शिकविण्याच्या क्षमतेचा कलावंत म्हणजे शिक्षक", माझे वाक्य पूर्ण होताच, व पुंनी मला टाळी दिली ! एअर मार्शल बी एन गोखले सर तर अभिमानाने सांगतात, "आम्हांला चिंचोरे गुरुजींनी घडवलं" डायबेटीस स्पेशलिस्ट डॉ. सुभाष काळे ह्या त्यांच्या विद्यार्थ्याने तर, चिंचोरे गुरुजींना एकवीस वर्षे विनामोबदला औषधोपचार केले, मी काही बोललो, कि ते म्हणायचे, "उपेंद्र, गुरुजींची सेवा, हीच माझी गुरुदक्षिणा आहे"! ज्येष्ठ उद्योगपती श्रीमान अरुण फिरोदिया ह्यांना पद्मश्री जाहीर होताच, त्यांनी मुलाखत कर्त्यांना आपल्या यशाचे श्रेय माझ्या आई वडिलांना आणि चिंचोरे गुरुजींना असल्याचे जाहीर केले. टीव्ही वर मी जेव्हां हे ऐकले, पाहिले तेव्हां माझे डोळे भरून आले. मी त्यांना लगेच फोन केला आणि दुसऱ्या दिवशी त्यांचे घरी जाऊन नमस्कार केला, तेव्हां त्यांनी माझ्या वडिलांच्या अनेक आठवणी कथन केल्या होत्या. धन्य ते शिक्षक आणि धन्य ते कृतज्ञ विद्यार्थी !
मॅनेजमेंट कन्सलटंट जयंत दामले आणि मोहन कानडे, हे त्यांचे विद्यार्थी आजही साठ वर्षांपूर्वीच्या, चिंचोरे गुरुजींच्या शालेय सहल नियोजनाच्या आठवणी सांगतात ! डॉ उषा केळकर वय वर्षे फक्त सत्याऐंशी, चिंचोरे गुरुजींनी, गीतेचा पंधरावा अध्याय कसा पाठ करून घेतला, ह्याविषयी त्यांच्या लेखात सांगतात. डॉ सुमन करमरकर (सध्याचे वय ८७) ह्या चिंचोरे गुरुजींच्या शब्दसंग्रहाचे वर्णन करतात. हो, शब्दकोडी पटापट सोडविण्यात ते तरबेज होते. महाराष्ट्र कोश मंडळ लि. पुणे, ह्यांनी १९३५-१९३६ मध्ये सात खंड प्रसिद्ध केले होते. पीवायसी ग्राउंड जवळ राहणारे कर्नल के जि घारपुरे साहेबांनी ते सातही खंड त्याकाळी चिंचोरे गुरुजींना भेट दिले होते. आजही ते खंड म्हणजे माझा जीव कि प्राण आहेत ! ह्या कर्नल घारपुरे साहेबांचे अजून एक वैशिष्ठ्य म्हणजे त्याकाळी शाळेच्या संमेलनाची अनेक छायाचित्रे त्यांनी स्वतः टिपलेली होती, जी आजही माझ्या संग्रहामध्ये आहेत, ह्या पोस्टवर टाकलेले छायाचित्र हे त्याचेच सर्वोत्तम उदाहरण आहे !
शिक्षणतज्ज्ञ वि वि चिपळूणकर सरांच्या हस्ते जेव्हां चिंचोरे गुरुजींचा "शिक्षक दिनी" सन्मान झाला, तेव्हां ते म्हणाले होते, "पंडित" हे नाव सार्थ करणारे "पंडित विष्णू चिंचोरे गुरुजी" ! महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण संचालिका डॉक्टर चित्राताई नाईक ह्यांच्या शुभहस्ते चिंचोरे गुरुजींचा "आदर्श शिक्षक" हे बिरुद अर्पण करून पुणे येथे १७ ऑगस्ट १९७३ रोजी सन्मान करण्यात आला होता !
माझी आईनं त्याकाळी गाण्याचं नियमित शिक्षण घेतलं होतं ! आमचे नातेवाईक होसिंग काकांनी त्यांची बेल्ज्यियम सुरांची पेटी माझ्या आईला भेट दिली होती. चिंचोरे गुरुजीही पेटी वाजवायचे, "तुला रं गाड्या भीती कशाची" हे गाणं ते पेटीवर वाजवायचे आणि आम्ही भावंडं ते ऐकत, त्यांच्या पुढ्यात बसायचो !
तिथीने चंपाषष्ठीला आणि तारखेनी ३ डिसेंबर रोजी चिंचोरे गुरुजींची जयंती आहे, आज सात मे रोजी त्यांची ३३ वी पुण्यतिथी आहे,
-- उपेंद्र पंडित चिंचोरे
विद्या बाळ या स्त्रियांचं आत्मभान जागृत करण्याचं आणि समाजाला स्त्रियांसंदर्भात सजग आणि संवेदनशील बनवण्याचं कार्य करण्यात अग्रेसर असणाऱ्या प्रमुख सामाजिक नेत्या आहेत. त्यांचा जन्म १२ जानेवारी १९३७ रोजी झाला. ‘स्त्री’ व ‘मिळून साऱ्याजणी’ या मासिकांमधून सातत्याने लेख लिहून त्यांनी स्त्रियांमध्ये स्वत्वाची भावना चेतवली आहे.
स्त्रियांना समृद्ध जीवन जगता यावे, यासाठी पुरुषभान येण्याची आवश्यकता आहे,' असे आग्रही प्रतिपादन करतानाच ते प्रत्यक्षात येण्यासाठी विद्या बाळ यांनी आपले आयुष्य खर्ची घातले आहे. त्यांनी १९५८ साली पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमधून बी.ए. (अर्थशास्त्र) ही पदवी घेतली. पुणे आकाशवाणीवर कार्यक्रम सादरकर्त्या म्हणून विद्या बाळ यांनी दोन वर्षे नोकरी केली.
स्त्रियांना त्यांच्या हक्कांची जाणीव त्यांनी करून देणाऱ्या विद्या बाळ यांनी 'स्त्री' या मासिकात सुमारे २२ वर्षे म्हणजे १९८३पर्यंत काम केले. या काळातच १९८१ मध्ये त्यांनी स्त्रियांच्या समस्यांचा वेध घेणाऱ्या 'नारी समता मंचा'ची स्थापन केली. पुढे त्यांनी 'मिळून साऱ्याजणी' हे मासिक सुरू केले. स्त्रियांच्या चळवळीशी अतूट बांधिलकी मानणाऱ्या या मासिकाने आज स्वतंत्र ठसा उमटवला आहे. या साऱ्याजणी 'आपण बाया आहोत, हे नाकारत नाहीत. त्या जाणिवेत अडकून पडत नाहीत, त्याचा बाऊही करत नाहीत.
उलट त्या बाईपणाला ओलांडून व्यक्ती आणि माणूस म्हणून त्या स्वतःची ओळख करून घेऊ इच्छितात,' अशी स्पष्ट भूमिका त्या मांडतात. याच मासिकाशी सलग्न 'सखी मंडळा'ची स्थापनाही विद्या बाळ यांनी केली. स्त्री प्रश्नांसह विविध सामाजिक विषयांची चर्चा या मंडळामार्फत घडवून आणली जाते. 'बोलते व्हा,' 'पुरुष संवाद केंद्र,' 'अक्षरस्पर्श ग्रंथालय,' 'साथ साथ विवाह अभ्यास मंडळ,' 'पुरुष उवाच अभ्यासवर्ग,' 'पुरुष उवाच अभ्यासवर्ग' या संस्थाही त्यांनी सुरू केल्या. या संस्थांकडे नजर टाकली, लेख, अनुवाद, कादंबरी, संपादन अशी त्यांची चौफेर लेखणी आहे. कृतीशील कार्यकर्त्या अशीही त्यांनी ओळख आहे.
जनजागृतीसाठी रात्री काढलेली 'प्रकाशफेरी,' एकट्या स्त्रियांसाठी परिषद, विवाह परिषद, कुटुंब नियोजन परिषद, आत्मसन्मान परिषद किंवा विविध पथनाट्य, निदर्शने, परिसंवाद, 'दोस्ती जिंदाबाद,'सारखा अॅसिड हल्ल्याविरोधातील जागृतीसाठीचा कार्यक्रम, लिंगभाव समतेसाठी पुरुषभान परिषद आदी अनेक कार्यक्रम त्यांनी आपल्या संस्थांच्या माध्यमातून घेतले. अनेक कार्यकर्त्या तयार केल्या. शहरी आणि ग्रामीण स्त्रियांना जोडणे हे उद्दिष्ट ठेवून त्या काम करतात.
त्यांना फाय फाउंडेशन, आगरकर पत्रकारिता पुरस्कार असे अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. तसंच सामाजिक कृतज्ञता जीवनगौरव सन्मानसुद्धा मिळाला आहे. कथा गौरीची, अपराजितांचे नि:श्वास, शोध स्वतःचा, संवाद, तुमच्या-माझ्यासाठी, कमलाकी, तेजस्विनी, वाळवंटातील वाट अशी त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
मराठी चित्रपटांचे दिग्दर्शक दत्ता धर्माधिकारी यांचा जन्म २ डिसेंबर १९१३ रोजी कोल्हापुर येथे झाला. शांतारामबापूं नंतर हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीत यश मिळवणारा दिग्दर्शक म्हणून दत्ता धर्माधिकारी याचं नाव घ्यावं लागेल. दत्ताजींचं शिक्षण कोल्हापुरातच झालं. त्याच वेळी "पाध्येबुवा‘कडं त्यांनी शास्त्रोक्त गायनाच्या शिक्षणाचे धडेही गिरवले; पण त्यांचे वडील जगन्नाथराव वारल्यामुळं शिक्षण अर्धवट सोडून ते पुण्यात आले आणि नोकरी करायची म्हणून प्रभात स्टुडिओत त्यांनी "टाइमकीपर‘ची नोकरी स्वीकारली; पण त्यांचं मन त्यात रमत नव्हतं. त्यांना व्ही. शांताराम यांच्यासारखा मोठा दिग्दर्शक व्हायचं होतं. ते क्षेत्र त्यांना खुणावत होतं.
चराचरसृष्टीचा "टाइमकीपर‘ ब्रह्मदेव; त्यानं दत्ताजींच्या कुंडलीत शुभवेळेची नोंद केली; ते शांतारामबापूंचे व दामले-फत्तेलाल यांचे सहायक दिग्दर्शक झाले! आणि १९५० मध्ये त्यांनी "मायाबाजार‘ (हिंदी व मराठी) हा चित्रपट स्वतंत्रपणे दिग्दर्शित केला. सुलोचना, बेबी शकुंतला, उषा किरण (यांना दत्ताजींनी नायिकेची प्रथम संधी दिली), राजा गोसावी, शरद तळवलकर (यांनाही रजतपटावर प्रथम संधी दिली), सूर्यकांत, चंद्रकांत, राजा परांजपे, राजा नेने, जयश्री गडकर, रेखा, चित्रा आदी कलावंतांनीही त्यांच्या दिग्दर्शनाखाली आपल्या भूमिका उत्तम प्रकारे साकारल्या. मराठीबरोबरच हिंदीतले प्रथितयश मोतीलाल, सोहराब मोदी, नलिनी जयवंत, गीता बाली, निरुपा रॉय, मीनाकुमारी आदी कलाकारांनीही त्यांच्या दिग्दर्शनाखाली काम केलं होतं.
"बाळा जो जो रे‘, "स्त्रीजन्मा ही तुझी कहाणी‘, "भाग्यवान‘, "चिमणीपाखरं‘, "एक धागा सुखाचा‘, "अबोली‘, "सावधान‘, "सुहागन‘ (हिंदी) चित्रपटांबरोबरच "अखेर जमलं,‘ "आलिया भोगासी‘, "लग्नाला जातो मी‘, असे विनोदी चित्रपट काढून त्यांनी लोकांना खळखळून हसवलंही. याशिवाय "थांब लक्ष्मी कुंकू लावते‘, "विठू माझा लेकूरवाळा‘, "सतीचं वाण‘, "सतीची पुण्याई‘, "सुदर्शनचक्र‘, "भक्त पुंडलिक‘ इत्यादी धार्मिक व पौराणिक चित्रपट तितक्या च समर्थपणे त्यांनी दिग्दर्शित केले. "भाग्यवान‘, "दीप जलता रहे‘, "मुझे सीने से लगा लो‘, "दौलत का नशा‘ इत्यादी हिंदी चित्रपटांचंही दिग्दर्शन त्यांनी केलं. "दैवे लाभला चिंतामणी‘, "कुंकू जपून ठेव‘ इत्यादी यशस्वी नाटकं त्यांच्या नावावर जमा आहेत. "कुंकू जपून ठेव‘ या नाटकात नायिकेच्या वडिलांची भूमिका त्यांनी केली होती, तीही वयाच्या साठाव्या वर्षी. त्यांचा "महात्मा‘ हा चित्रपट पु. ल. देशपांडे यांच्या "भाग्यवान‘ नाटकावर आधारित होता आणि तो मराठी, हिंदी, इंग्रजी या तीन भाषांमध्ये निर्माण केला होता. एकच चित्रपट एकाच वेळी तीन भाषांमध्ये निर्माण करणारे दत्ताजी हे केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे, तर भारतातले पहिले निर्माता-दिग्दर्शक होते. सर्व समीक्षकांनी या चित्रपटाचं यथोचित कौतुक केलं होतं. दत्ताजींचं हास्य ही त्यांना ईश्व-रानं दिलेली देणगी होती आणि कोणत्याही संकटात ते हास्य त्यांना सोडून गेलं नाही. साधेपणा हा त्यां चा गुण होता.
एवढंच नव्हे तर, संगीतकार वसंत पवार यांना हिंदी चित्रपटात त्यांनी संधी दिली व त्यांचा रुबाब वाढावा म्हणून त्यांना वूलनचा सूटही शिवून दिला होता. आपल्या "स्टाफ‘वर त्यांचं मनस्वी प्रेम होतं. त्यामुळंच एक चित्रपट पूर्ण झाल्यावर दुसरा चित्रपट सुरू होण्यापूर्वीच्या मध्यंतरीच्या काळातला पगारही ते देत असत! काही काम न करताही आपल्या या कुटुंबाला ते सहा-सहा महिने पोसत असत. स्वतः उत्तम दिग्दर्शक असूनही आपले सहकारी अनंत माने यांना आपल्या मराठी व हिंदी चित्रपटाच्या दिग्दर्शनाची संधी त्यांनी दिली होती. एखाद्या संतानं प्रेमळ मानवाचं रूप घेऊन तो या मायावी चित्रपटसृष्टीत वावरतोय, असं दत्ताजींना पाहून वाटायचं. दत्ता धर्माधिकारी यांचे ३० डिसेंबर १९८२ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Copyright © 2025 | Marathisrushti