(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

  • प्रयोगशील गायिका नीला भागवत

    हिंदुस्तानी शास्त्रीय गायनातील ग्वाल्हेर घराण्याच्या ख्याल शैलीतील बंदिशींच्या माध्यमातून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर आपला ठसा उमटवणा-या एक प्रयोगशील गायिका नीला भागवत यांचा जन्म २९ नोव्हेंबर १९४२ रोजी पुणे येथे झाला.

    कृष्णराव पंडीत व शरच्चंद्र आरोलकर हे त्यांचे गुरु. त्यांची मीराबाई व कबीराच्या भजन गाण्याबद्धल विशेष प्रसिद्ध आहेत. जयपूर आणि ग्वाल्हेर अशा दोन्ही घराण्यांमधली गायकी त्या शिकल्या, ती आत्मसात केली आणि अवलंबलीही, मात्र ग्वाल्हेर घराण्याच्या ख्याल (खयाल-कल्पना) गायकीमध्ये त्या मनापासून रमल्या. ग्वाल्हेर घराण्यात बोलाला सर्वाधिक महत्त्व आहे. बोलात सगळंच अंतर्भूत असतं, या कल्पनेनं झपाटलेल्या नीला यांनी ख्यालाचा मूळ पिंड कधीच सोडला नाही. त्या व्यवसायाने प्राध्यापक व भाषांतर कार आहेत. आजही पारंपरिक गायिकीसोबतच जीवनातील अनुभव बंदिशींमधून मांडत नवता, प्रयोगशीलताही त्या जपत आहेत. शास्त्रीय रागांसह ‘पियानो’सारख्या पाश्चिमात्य वाद्याबरोबरही त्या जितक्या एकरूप होतात, तितक्याच परदेशी मूकबधिर मुलांना गायन शिकवतानाही होतात.

    संत कबीर, मीराबाई, चोखामेळा, संत तुकाराम, महात्मा फुले ते अगदी महात्मा गांधी यांसारख्या संत आणि महापुरुषांच्या विचारांवर, काव्यांवर बंदिशी बांधून त्यांचं सांगीतिक चित्र समाजापुढे मांडत आहेत. आज वयाच्या पंच्याहर्या वर्षीही नीला भागवत यांचा नवनिर्मितीचा, सृजनशीलतेचा उत्साह कायम आहे. त्यांना एसएनडीटी विद्यापीठ आणि वायएमसीए संस्था यांच्यातर्फे ‘कॉन्ट्रिब्युशन टू विमेन्स कल्चर’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच
    केंद्र सरकारतर्फे संगीतातील संशोधनासाठी मानद शिष्यवृत्ती त्यांना देण्यात आली आहे.

    नीला भागवत यांचे साहित्य.
    मोनोग्राफ ऑन कृष्णराव शंकर पंडित (१९९२)
    तिहाई (कवितासंग्रह) (१९९२-९३)
    कबीर गाता गाता (२००४)
    शरच्चंद्र आरोलकर – लेणे प्रतिभेचे (२०१२)

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट https://www.youtube.com/watch?v=0WLgyPkL5dI https://www.youtube.com/watch?v=Ukghy6LIqlA

  • देखणी – प्रिया मराठे

    प्रिया मराठे… विविध मराठी, हिंदी मालिकांमधून सातत्याने दिसणारा देखणा चेहरा… आकर्षक बांधा… ही प्रियाची वैशिष्टय़ं..

    आपला दमदार अभिनय सादर करत ‘या सुखांनो या’ ते ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ व्हाया ‘पवित्र रिश्ता’ आणि ‘साथ निभाना साथिया’ असा मराठी आणि हिंदी छोटय़ा पडद्यावरचा प्रवास गेली दशकभर सातत्याने करणारी अभिनेत्री म्हणजे प्रिया मराठे. छोटय़ा पडद्यावरून घराघरांत पोहचलेल्या प्रियाने रुपेरी पडद्यावरही आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली. सडपातळ बांधा, मात्र हसऱया चेहऱयाच्या, बोलक्या डोळ्यांच्या आणि मनमिळावू स्वभावाच्या प्रियाने अल्पावधीतच मराठी आणि हिंदी सिने इंडस्ट्रीत आपलं वेगळं स्थान निर्माण केलं.

    लहानपणापासून प्रियाने शिक्षणाची स्वप्नं रंगवली. इतर मुलांप्रमाणेच तिलाही इंजिनीअर, डॉक्टर व्हायचं होतं खरं, मात्र अभिनय क्षेत्राकडे तिची कधी पावलं वळतील अशी कल्पनाही तिला त्या काळी नव्हती. शालेय शिक्षण पूर्ण होईपर्यंत तिचा आणि अभिनयाचा तसा काहीच संबंध नव्हता. ठाणा कॉलेजला प्रवेश घेतल्यानंतर अकरावीत असतानाच तिने महाविद्यालयातल्या एकांकिका स्पर्धा, नाटय़स्पर्धा, तसंच तालमी पाहिल्या होत्या आणि याच काळात ती अभिनय क्षेत्राकडे आकर्षित झाली. अकरावीत असल्यापासून अभ्यासाच्या जोडीने अभिनयाचा वेगळा प्रवास तिचा सुरू झाला. पुढे एफवायला असताना तिची आणि याच महाविद्यालयातल्या इतर नाटय़प्रेमींची ओळख झाली आणि तिच्या प्रवासाला वेगळी गती मिळाली. दिग्दर्शक रवी करमरकर, विजू माने, संतोष सराफ, लेखक शिरीष लाटकर या दिग्गजांचं त्या काळी तिला मार्गदर्शन मिळालं.

    प्रियाने ‘या सुखांनो या’ या मालिकेतून छोटय़ा पडद्यावर प्रवेश मिळवला. 2005 साली मराठी मालिकेतून आपल्या व्यावसायिक अभिनयाचा श्रीगणेशा केलेल्या प्रियाने नंतर कधी मागे वळूनच पाहिलं नाही. 2007 साली तिने हिंदी इंडस्ट्रीत प्रवेश केला तो ‘कसम से’ मालिकेतून. मराठी मालिकांसोबतच हिंदी मालिकांमध्येही तिचा चांगलाच बोलबाला निर्माण झाला. मालिकांचा हा प्रवास सुरू असतानाच ‘तू तिथे मी’ या मालिकेत तिला निगेटिव्ह शेड असलेली भूमिका करण्याची संधी चालून आली आणि मिळालेल्या संधीचं सोनं केलं. ‘पवित्र रिश्ता’ आणि ‘तू तिथे मी’ या दोन्ही मालिका समांतर सुरू असल्याने तिची यासाठी वेळेची गणितं मांडताना तारेवरची कसरत होत होती. सरतेशेवटी ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून आपला काढता पाय घेत तिने ‘तू तिथे मी’ याच मालिकेला प्राधान्य देत तिने आपला सकस अभिनय सादर केला. ‘विघ्नहर्ता महागणपती’, ‘किरण कुलकर्णी वर्सेस किरण कुलकर्णी’, ‘1234’ आणि ‘ती आणि इतर’ या सिनेमांत तिने आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली.

    प्रियाचं फोटोशूट करण्याची संधी मला मिळाली होती. प्रिया मराठे हा चेहरा तिच्या मालिकांमधील अभिनयामुळे घराघरात पोहचला होता आणि म्हणूनच सुरुवातीला तिचं फोटोशूट हे तिच्या तेव्हा सुरू असलेल्या मालिकांतील भूमिकेला धरून करण्याचं निश्चित करण्यात आलं. यासाठी मॉडर्न साडीतला तिचा लूक लक्षात घेण्यात आला होता. यानुसार मेकअप, हेअर हे देखील लक्षात घेण्यात आलं. यावर साजेसे दिसतील असे दागिने आणि बांगडय़ा, कानातले दागिने हे देखील निवडण्यात आले. या शूटनंतर तिच्या मालिकांमध्ये असलेल्या नेहमीच्या इमेजला तडा देत तिचं वेस्टर्न आऊटफिटमधलं वेगळं फोटोशूट करायचं आम्ही ठरवलं. खरं तरं प्रिया जशी आहे, तिचं राहणीमान जसं आहे त्या सगळ्याला समोर ठेवून तिच्यासाठीचे कपडे निवडण्यात आले आणि मग फॅशनचा एक टच देऊन तिचा मेकअप आणि हेअर करण्यात आला. प्रियाचा चेहरा लक्षात घेऊन तिच्या मेकअपची शेड ठरवण्यात आली. मेकओव्हर केलेली प्रिया या फॅशनेबल लूकमध्ये फारच खुलून दिसत होती. भूमिकेतील तिची एकरूपता आणि तिने प्रत्येक भूमिकेला दिलेला समान न्याय हा मी देखील एकाच दिवशी करण्यात आलेल्या या दोन वेगवेगळ्या फोटोशूटमधून अनुभवाला आणि इथेच प्रियातला लपलेला उत्तम कलाकार मला कॅमेराबद्ध करता आल्याचा वेगळा आनंद मिळाला.

    धनेश पाटील

  • ज्येष्ठ पत्रकार प्रकाश बाळ जोशी

    प्रकाश बाळ जोशी हे एक बहुआयामी असं व्यक्तिमत्त्व आहे. गेल्या एक्केचाळीस वर्षापासून ते पत्रकारितेत आहेत. एका बाजूला सर्जनशील लेखन तर दुस-या बाजूला एक चित्रकार म्हणून मिळालेली आंतरराष्ट्रीय स्तरावरची ओळख याची त्यांनी स्वत:ची अशी एक खास शैली निर्माण केलेली आहे.

  • जॅकी श्रॉफ

    हिरो' सिनेमाद्वारे आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात करणा-या जॅकी श्रॉफ यांचा जन्म गुजराती कुटुंबात झाला होता. त्यांचा जन्म १ फेब्रुवारी १९६० रोजी झाला. जॅकी श्रॉफ यांचे पूर्ण नाव जय किशन श्रॉफ. सिनेमांत झळकण्यापूर्वी जॅकी यांनी काही जाहिरातीत काम केले होते. सुभाष घई यांनी जॅकी श्रॉफ यांना 'हिरो ' या सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये लाँच केले. या सिनेमात त्यांचे नाव जॅकी होते. जॅकी श्रॉफ यांच्या या सिनेमाने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले. जॅकी श्रॉफ यांचा अभिनेता म्हणून पहिला सिनेमा 'हीरो' होता. मात्र त्यापूर्वी त्यांनी 'स्वामी दादा' या सिनेमाद्वारे फिल्मी करिअरला सुरुवात केली होती.

    १९८३ मध्ये रिलीज झालेल्या या सिनेमात जॅकी देव आनंद यांच्यासह झळकले होते. जॅकी श्रॉफ फिल्म इंडस्ट्रीतील असे अभिनेते आहेत, ज्यांनी हिंदीसह तब्बल आठ भाषांमध्ये काम केले. त्यांनी बंगाली, तेलगु, मल्याळम, कन्नड, मराठी, तामिळ, पंजाबी आणि उडिया या सिनेमांत अभिनय केला आहे. ऐंशीच्या दशकात त्यांनी आयशा दत्तसह लग्न केले. जॅकी श्रॉफ यांना आपल्या फिल्मी करिअरमध्ये तीन वेळा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आहे. याशिवाय त्यांना हिंदी सिनेसृष्टीतील उल्लेखनीय कामगिरीसाठी स्पेशल ऑनर ज्युरी अवॉर्डने सन्मानित करण्यात आले आहे. 'रंगीला' या सिनेमात जॅकी श्रॉफ यांनी आमिर खानसोबत काम केले होते. त्यानंतर तब्बल १७ वर्षांनी 'धूम ३' या सिनेमात जॅकी आणि आमिर यांनी एकत्र काम केले. जॅकी श्रॉफ यांनी आपल्या पत्नीसह मिळून एक मीडिया कंपनी सुरु केली होती.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • एम. एल. टहलियानी

    व्यक्तिवेध : एम. एल. टहलियानी
    शुक्रवार, ७ मे २०१०

    २६/११ चा खटला हा कसाबमुळे जसा लक्षात राहणार आहे तसाच तो, हा खटला चालविणारे विशेष न्यायालयाचे निर्भीड न्यायाधीश एम. एल. अर्थात मदन लक्ष्मणदास टहलियानी यांच्यामुळेही लक्षात राहणार आहे. खटल्याच्या निकालपत्रावर टहलियानी यांची खास छाप पाहायला मिळते. विशेषत: दोन महत्त्वाच्या बाबींमध्ये. अनलॉफुल अ‍ॅक्टिविटीज अ‍ॅक्टच्या कलम१६ अन्वयेदेखील कसाबला मृत्युदंडाची शिक्षा होऊ शकते, असा युक्तिवाद करण्यास विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम विसरले होते. हा मुद्दा स्वत टहलियानी यांनी लक्षात आणून दिला. केवळ युक्तिवादावर निर्णय न देता, कायद्याचा सारासार विचार करून निर्णय देणारा न्यायाधीश आदर्श मानला जातो. शिवाय कंदहार प्रकरणाचा उल्लेखही न्यायाधीश टहलियानी यांनी केला. त्या वेळेस मौलाना मसूद याला दहशतवाद्यांच्या ताब्यात देऊन त्यांनी ओलीस ठेवलेल्या देशवासीयांची सुटका करावी लागली होती. कसाबला फाशी दिल्यास अशा प्रकारच्या मानहानीकारक प्रसंगाला देशाला भविष्यात सामोरे जावे लागणार नाही; अर्थात त्याला फाशी देण्याशिवाय पर्याय नाही, असा महत्त्वपूर्ण उल्लेख टहलियानी यांनी केला. या दोन्ही महत्त्वाच्या बाबींच्या निमित्ताने टहलियानी यांनी आदर्शाचा एक नवा पायंडाच न्यायदानाच्या क्षेत्रात घालून दिला आहे. टहलियानी यांचे घराणे मूळचे राजस्थानातील. रोजगाराच्या निमित्ताने महाराष्ट्रात आल्यानंतर चंद्रपूर जिल्ह्य़ातील मूल येथे ते स्थायिक झाले. न्या. टहलियानी यांचा जन्म मात्र राजस्थानातला. नागपूर येथे इयत्ता दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करून नागपूर विद्यापीठातूनच त्यांनी कायद्याची पदवी संपादन केली. गोंदिया येथे वकिलीची एक वर्षांची उमेदवारी केल्यावर ते चंद्रपूरला गेले. नामवंत वकील दादासाहेब देशकर यांच्या हाताखाली त्यांनी वकिलीचे धडे गिरवले. गडचिरोली, वडसा, सिरोंचा इत्यादी ठिकाणी सरकारी वकील म्हणून त्यांनी काम पाहिले. नंतर मुंबईमध्ये महानगर दंडाधिकारी म्हणून त्यांनी काम पाहिले. वांद्रे न्यायालयापासून त्यांनी सुरुवात केली. अतिरिक्त प्रधान न्यायाधीश म्हणून काम करत असतानाच कसाबच्या खटल्यासाठी विशेष न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून त्यांची नेमणूक झाली. यापूर्वी सीबीआयचे अनेक खटले त्यांच्यासमोर चालले. त्याचप्रमाणे कॅसेटकिंग गुलशन कुमार हत्या आणि कामगार नेते दत्ता सामंत हत्या या खटल्यांचीही सुनावणी न्या. टहलियानी यांच्यासमोर झालेली आहे. तपासात ढिलाई दाखविलेली असेल तर पोलिसांवर बरसणारे टहलियानी यापूर्वी अनेकांनी पाहिले आहेत. किंबहुना पोलिसांना धारेवर धरणारे न्यायाधीश म्हणूनच ते अधिक प्रसिद्ध आहेत. सध्याच्या जगात न्यायाधीशांनीही ‘अपडेट’ होण्याची गरज आहे. बदलत्या काळासोबत नव्या बाबी शिकत, कायद्याचा सारासार विचार करून निवाडा करेल तोच उत्तम न्यायाधीश, असे विधान अलीकडेच भारताच्या सरन्यायाधीशांनी केले होते. ही व्याख्या त्यांनी न्या. टहलियानी यांच्याकडे पाहूनच केली असावी! तांत्रिक बाबी आल्या की सहसा न्यायालयीन अधिकारी गोंधळून जातात मात्र न्या. टहलियानी यांच्यासमोर अशा बाबी येतात तेव्हा, ‘गृहपाठ’ व्यवस्थित केलेला नसेल तर समोरच्या अधिकाऱ्याची ‘शाळा’च घेतली जाते. याचा प्रत्यय तर कसाबच्या या खटल्यामध्येही सर्वाना आला. दहशतवाद्यांशी संपर्क साधण्यासाठी व्हीओआयपी या अद्ययावत यंत्रणेचा वापर करण्यात आला होता. त्या वेळेस समोर आलेल्या साक्षीदारापेक्षाही अधिक ज्ञान त्या संदर्भात त्यांनाच होते. त्याचप्रमाणे सायबर क्राइम सेलचे अधिकारी साक्षीसाठी आले, त्याही वेळी याचा प्रत्यय आला. ई-मेल हॅकिंग कसे घडते, याबाबतची माहिती तुम्ही कशी शोधली, अशी विचारणा टहलियानी यांनी केली. त्यावर अशा प्रकारचा शोध घेणाऱ्या अनेक वेबसाइटस् उपलब्ध आहेत, असे मोघम उत्तर त्या अधिकाऱ्याने दिले; मात्र त्यानंतरच्या संवादातही त्यांनाच अधिक विश्वासार्ह माहिती असल्याचे स्पष्ट झाले. न्यायालयातही अनेकदा त्यांनी सांगितले आहे की, कोणतीही पाश्र्वभूमी नसताना मी स्वतच कोणाचीही मदत न घेता संगणक- इंटरनेट आदी सारे शिकलो आहे. फक्त शिकलो असेच नव्हे तर ते वापरतोही. शिवाय आजही रोज काही तरी शिकत असतो.. सकाळी मरिन ड्राइव्हवर मॉर्निग वॉक, शक्य झाल्यास रात्रीही एक फेरी मारायला त्यांना आवडते. एरवी कामाच्या बाबतीत कडक शिस्तीचे न्यायाधीश म्ङणून ते ओळखले जातात. या कडक शिस्तीचा त्रासही काही वेळा त्यांच्या कर्मचाऱ्यांना होतो. मात्र कामे वेळच्या वेळीच व्हायला हवीत, असा त्यांचा कटाक्ष असतो. याच खटल्यात अगदी सुरुवातीच्या काळात काही बाबी वेळच्या वेळी न झाल्याने त्यांनी कर्मचाऱ्यांना धारेवर धरले होते. मात्र नंतर कर्मचाऱ्यांनी खासगीत त्यांची भेट घेऊन कामे व्यवस्थित करण्याचे त्यांना आश्वासन दिले आणि जाहीरपणे न्यायालयात सुनावणे टाळावे, अशी त्यांना विनंती केली. ती त्यांनी मोठय़ा मनाने मान्यही केली. त्यानंतर न्यायालयात कर्मचाऱ्यांना अशा प्रसंगास कधीच सामोरे जावे लागले नाही. माणूस म्हणूनही ते आपल्या सहकाऱ्यांची चांगली काळजी घेतात, असा अनुभव आहे. त्याचप्रमाणे चांगले वरिष्ठ असतील, तर कर्मचारीही स्वतमध्ये चांगले बदल घडवून आणतात हे कर्मचाऱ्यांनीही दाखवून दिले. कर्तव्यकठोर अशी त्यांची प्रतिमा असली तरीही दुसऱ्या बाजूस ते पर्यावरणप्रेमी म्हणूनही सर्वाना चांगले परिचित आहेत. वृक्षवेलींत ते रमतात. झाडांची निगा राखणे हा त्यांचा आवडता छंद आहे. म्हणूनच तर त्यांनी आर्थर रोड कारागृहाच्या आवारातच असलेल्या विशेष न्यायालयाच्या मागच्या बाजूस झाडे लावली असून तिथे भेंडी व इतर काही भाज्यांचीही लागवड केली आहे. त्यांचे हे पर्यावरणप्रेमही त्यांच्या कर्तव्यकठोरतेइतकेच लक्षात राहते. याशिवाय अनेक गोष्टींतून त्यांची कामाप्रती असलेली निष्ठा या खटल्यादरम्यान अनेकांच्या लक्षात आली. सार्वजनिक बांधकाम विभागाने याच ठिकाणी आर्थर रोडमध्ये असलेले न्यायालय सुसज्ज करण्याचा निर्णय घेतला तेव्हा, अगदी सुरुवातीपासून म्हणजे त्याचे डिझाइन कसे असावे इथपासून ते पार त्याला अंतिम रूप प्राप्त होईपर्यंत दररोज स्वत ते प्रत्यक्ष ठिकाणी येऊन कामावर लक्ष ठेवत. वास्तविक ते काम इतर कोणाच्याही हाती सोपवणे त्यांना सहज शक्य होते. मात्र हा खटला लवकर सुरू व्हावा आणि लवकरात लवकर तो निकालातही निघावा, असा त्यांचा कटाक्ष होता. त्यामुळे त्यांनी कधीही, सुनावणीदरम्यानदेखील, वेळ वाया जाऊ दिला नाही. वेळ वाया जातो आहे, असे एकदोनदा लक्षात आले तेव्हा त्यांनी अभियोग पक्ष आणि आरोपींचे वकील दोघांनाही कडक शब्दांत तंबी दिली होती. त्यांना सिंधी उत्तम येते. घरी संभाषणाची भाषा सिंधीच. त्यांचे उर्दूचे ज्ञानही उत्तम आहे. कसाबशी संवाद साधणे त्यामुळेच त्यांना सोपे जात असे. .आणि अनेक वर्षे महाराष्ट्रातच गेल्याने त्यांचे मराठीचे ज्ञानही तेवढेच उत्तम आहे. सुनावणीदरम्यान क्षीरसागर नावाच्या अधिकाऱ्याने साक्ष देताना आपले नाव ‘शीरसागर’ असे सांगितले, तेव्हा त्यांनी त्याला पुन्हा विचारले, ‘तुमचे नाव क्षीरसागर की, शीरसागर?’ त्यावर त्याने ‘शीरसागर’ असे सांगितल्यानंतर त्यांनी त्याला ‘क्षीरसागर’चा अर्थ समजावून सांगितला! त्यांच्या उत्तम मराठीचा प्रत्ययही असाच वेळोवेळी खटल्यादरम्यान उपस्थितांना अनुभवता आला. वर्तमानपत्रांचे वाचन हाही त्यांचा आवडता छंद आहे. रात्री ते विदेशी वर्तमानपत्रांच्या वेबसाइटस् आवर्जून पाहतात. खटला पारदर्शीपणे जगासमोर जाईल आणि त्या माध्यमातून भारतीय न्यायव्यवस्थेची निष्पक्ष व स्वच्छ प्रतिमाही जगासमोर जाईल, असे त्यांनी कटाक्षाने पाहिले, ही भारतीय नागरिक म्हणून आपल्या सर्वासाठी अभिमानास्पद बाब आहे!

  • दीक्षित डाएट प्लॅनचे रचेते डॉ. जगन्नाथ दीक्षित

    डॉ. दीक्षित यांनी विकसित केलेल्या उपचार पद्धतीने फक्त भारतातीलच नव्हे, तर परदेशातील रुग्णांनाही फायदा झाला आहे. सोशल मीडियावरही डॉक्टरांनी सांगितलेल्या स्वास्थ्यशैलीचा प्रचार होत असून ‘दीक्षित डाएट प्लॅन’ नावाने ती प्रसिद्ध झाली आहे.

  • देव आनंद चे सर्वोत्तम दहा चित्रपट

    आज चैत्यन्याचा रुपेरी झरा अशा वैशिष्ट्याने पडद्यावर वावरलेल्या देव आनंद यांची जयंती. त्यांनी आपल्या अजरामर भूमिकांनी अनेक चित्रपट गाजवले. त्यातील सर्वोत्तम दहा चित्रपट.

    १. गाईड (दिग्दर्शक विजय आनंद)
    राजू गाईड(देव आनंद) व विवाहीत रोझी (वहिदा रेहमान) यांच्या ओळखीचे रुपांतर प्रेमात होते, पण हे प्रकरण खूप वेगळे वळण घेते. या चित्रपटातील देव आनंद यांचा अभिनय त्यांच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम सर्वोत्तम अभिनय ठरला. चित्रपटाच्या शेवटी त्याचा मृत्यू होतो असे दाखवण्यात आले आहे, हा देखील त्यांच्या कारर्किदीतील दुर्मिळ योग.

    २. ज्वेल थीफ (दिग्दर्शक विजय आनंद)
    देव आनंद यांच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम रहस्यरंजक चित्रपट. आपण चित्रपटाच्या नायकावर( अर्थात देव आनंद) तोच गुन्हेगार असल्याचा संशय ठेवतो (हे दिग्दर्शकाचे कसब). चित्रपटाचा शेवट धक्कादायक. वैजयंती माला आणि अशोक कुमार महत्त्वाच्या भूमिकेत.

    ३. जॉनी मेरा नाम (दिग्दर्शक विजय आनंद)
    देवचा सर्वोत्तम गुन्हेगारी पट. हेमा मालिनीशी त्याची जोडी छान शोभली. प्रेमनाथ, प्राण, पद्मा, रंधावा अशा कितीतरी कलाकारांनी हा मसालापट खुलवला. प्रत्येक गाण्यात देव आनंद यांचा मस्तच वापर करण्यात आला आहे.

    ४. तेरे घर के सामने (दिग्दर्शक विजय आनंद)
    गाण्यांतून दिसणारा देव आनंद..अनुभवणाऱयांसाठी हा चित्रपट उत्तम! ‘एक घर बानाऊंगा तेरे घर के सामने’ असो वा ‘दिल का भंवर करे पुकार’ असो पडद्यावर गाणे कसे सजवायचे हे देव आनंद यांनी दाखवून दिले. अर्थात नूतन यांनीही तितक्याच ताकदीने योगदान दिले आहे.

    ५. तेरे मेरे सपने (दिग्दर्शक विजय आनंद )
    सायकलवरचे एक मैने कसम ली असो अथवा जीवन की बगियाँ महकेगी असो मुमताजसोबतची देव यांची जोडी मस्त जमली. गाण्यातून दिसणारा देव आनंद हा देखील त्यांच्या व्यक्तीमत्त्व व अभिनयाच्या शैलीचाच प्रकार.

    ६. हरे राम हरे कृष्ण (दिग्दर्शक देव आनंद)
    देवने प्रेम पुजारी पासून दिग्दर्शनात पाऊल टाकले, पण ठसा मात्र हिप्पी संस्कृतीवरील हरे राम..मध्येच उमटला. झीनत अमानची हिप्पी गर्ल खूपच धाडसी. काठमांडूच्या परिसराने विषय प्रवाभी ठरला.

    ७. देस परदेस (दिग्दर्शक देव आनंद)
    विदेशात विशेषत: इंग्लंडमध्ये रोजगारासाठी जाणाऱया भारतीयांच्या वाट्याला नेमके काय येते? या विषयाची ‘देव’ शैलीत मांडणी.

    ८. हम दोनो (दिग्दर्शक अमरजीत)
    देव आनंदची दुहेरी भूमिका. जोडीला साधना व नंदा, तर जयदेवच्या संगीतामुळे आणखी आकर्षण वाढले. मूळचा हा कृष्णधवल चित्रपट कालांतराने रंगीत स्वरुपात आला. देवने आपण नवीन चित्रपटाच्या तयारीत गुंतलो आहोत हा व्यक्त केलेला आशावाद सतत पुढेच पाहायचे ही त्याची वृत्ती दर्शवणारा होता.

    ९. वॉरंट (दिग्दर्शक प्रमोद चक्रवर्ती)
    सत्तरच्या दशकातील तद्दन मसालापट. त्यात पन्नाशीपार देव आनंदचा झीनत अमानला उद्देशून केलेला ‘रुक रुक..रुक झाला हमसे दो बाते करके जाना, यह मौसम हे दिवाना’ हा आग्रह त्यालाच शोभला व देव आनंद यांनी रौप्य महोत्सवी यश संपादन केले.

    १०. फंटूश (दिग्दर्शक चेतन आनंद)
    दूखी मन मेरे सून मेरा कहना जहाँ नही चैना वहा नही रहना.. देवची भावूक मुद्रा व्यक्त करणारे हे सर्वकालीन लोकप्रीय गीत. याच चित्रपटात ‘ए मेरी टोपी पलट के आ’ गात सवयीने तो मोकळेपणाने वावरलाही. शैला रामाणी या चित्रपटात नायिका होत्या.

    देव आनंद यांची रुपेरी वाटचाल खूपच मोठी आहे. प्रभातच्या हम एक है (१९४६) पासून नवकेतनच्या ‘जाना जा दिलसे दूर’पर्यंत (२०१० हा चित्रपट अप्रकाशीत) देव आनंद सतत खुलला. फुलला.

    चार्जशीट(२०११) हा त्याचा त्यानेच दिग्दर्शित केलेला व प्रदर्शित झालेला शेवटचा चित्रपट..

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.लोकसत्ता

  • समृद्धी बडे

    कॉलेजमध्ये शिकता शिकता करिअरच्या दृष्टीने काही कोर्सेस करणं, किंवा समर जॉब्ज किंवा पार्टटाइम जॉब्ज तर अनेकजणं करतात. नोकरीऐवजी पुढे जाऊन स्वतःचा व्यवसाय करण्याचा विचार करणारेही फार कमी असतात. पण समृद्धी बडेने याहीपुढे जाऊन स्वतःचा ब्रँड डेव्हलप करण्याचा विचार केलाय.

    झेवियर्स कॉलेजमध्ये थर्ड इयर आर्ट्सला शिकणार्‍या समृद्धीला वेगवेगळ्या कलाकृती करण्यात कायमच रस होता. ज्यूट, कागद, कापड, पातळ लाकूड अशा अनेक गोष्टींपासून विविध कलाकृती तिने साकारल्या आहेत. ज्यूटच्या बॅग्ज, झोळ्या, पेंटिंग केलेले टीशर्टस, वेताचे ट्रे, चिनीमातीच्या किंवा काचेच्या मग्जवरील पेंटिंग, भित्तीचित्रे अशा अनेक क्रिएटिव्ह वस्तू ती तयार करत असते. इतकंच नव्हे तर या वस्तूंच्या विक्रीसाठी तिने फेसबुकवर ' वरुणी कलेक्शन्स ' या नावाने एक पेजही तयार केलंय. त्याला लोकांचा चांगला रिस्पॉन्स मिळतोय. या सगळ्या वस्तू ती स्वतःच बनवते. पण त्यांची विक्री करणं, किंमत ठरवणं हे सगळं समृद्धी आईच्या मदतीने ठरवते.

    तिच्या या पेजवर तिच्या वस्तूंसाठी मागणी नोंदवता येते. ग्राहकाच्या आवडीनुसार आणि गरजेनुसार वस्तू तयार केली जाते. त्यांची घरपोच डिलीव्हरीही दिली जाते. शिवाय आपल्या प्रॉडक्टच्या प्रसिद्धीचं कामही समृद्धी मनापासून एन्जॉय करतेय. तिच्या वरुणी कलेक्शनसाठी या सगळ्या गोष्टी करणं हा तिच्या अनुभवाचाच एक भाग आहे.

    बीए झाल्यानंतर एमबीए करुन पुढे स्वतःचा हस्तव्यवसायाचा ब्रँड तयार करण्याचं समृद्धीने आत्तापासूनच मनाशी पक्कं केलंय.

    समृद्धीची घोडदौड इथेच थांबत नाही. हस्तकलेच्या जोडीला तिला फ्रेंच भाषेचीही अत्यंत आवड आहे. एका आंतरराष्ट्रीय दर्जाच्या फ्रेंच इन्स्टिट्यूटमधून ती सध्या फ्रेंचच्या परीक्षा देतेय. त्याअंतर्गत चार महिन्यांसाठी ती फ्रान्समध्ये कल्चरल एक्स्चेंजची विद्यार्थिनी म्हणून शिक्षणही घ्यायला गेली होती.

    (संदर्भ : महाराष्ट्र टाईम्समधील नोंद हे सदर)


  • लेखक, कवी, गोविंद विनायक तथा ‘विंदा’ करंदीकर

    विंदा' करंदीकर यांचे पूर्ण नाव गोविंद विनायक करंदीकर. त्यांचा जन्म २३ ऑगस्ट १९१८ रोजी रत्नागिरी जिल्यातील घालवली या गावी झाला.विंदा हे कोकणातील पोम्बुर्ल्याचे. तिकडचा टिपीकल कोकणी स्वभाव नि वृत्ती विंदांमध्येही उतरली होती. पण विंदा कोकणपट्टीतच अडकले नाहीत, ते वैश्विक झाले. त्यांच्या जगण्याचे भानही कायम वैश्विक राहिले. पण कोकण नि त्याची दरिद्री अवस्था हा त्यांच्या कायम चिंतेचा नि चिंतनाचा विषय राहिला. उच्च शिक्षण कोल्हापूरमध्ये झाल्यानंतर ते शिक्षण क्षेत्रात आले. बसवेश्वर कॉलेज, रत्नागिरी, रामनारायण रुईया महाविद्यालय, मुंबई, एस.आय.ई.एस. कॉलेज इत्यादी महाविद्यालयांमध्ये ते इंग्रजी विषयाचे प्राध्यापक होते. त्या आधी ते हैदराबाद मुक्तीसंग्रामातही सहभागी झाले होते. मा.विदांनी बालकविता, विरूपिका, छंदोबद्ध काव्य, मुक्तछंद आणि लघुनिबंध असे मह्त्वाचे साहित्यप्रकार लिलया हाताळले. या सगळ्यांत विविध प्रयोग केले. मा.विंदांनी ‘स्वेदगंगा, मृदगंध, धृपद, जातक, विरूपिका, संहिता’ असे कवितासंग्रह तर ‘राणीचा बाग, परी ग परी, सर्कसवाला’ यासारखे बालकवितासंग्रह दिले. १९४९ साली प्रथम प्रकाशित झालेल्या 'स्वेदगंगा' पासून सुरू मा.विंदांचा साहित्यिक प्रवास सुरु झाला. विंदाचे पहिले काव्यवाचन आचार्य भागवत यांच्याकडे झाले. १९४९ साली पुण्यात भरलेल्या मराठी साहित्य संमेलनातील पहिल्या जाहीर काव्यवाचनाने त्यांचा मराठीभाषकांस परिचय झाला. मराठीतील महत्वाचे समीक्षक म्हणूनही त्यांना मान्यता मिळाली होती. लघुनिबंधकार म्हणूनही ते प्रसिद्ध होते. गझल, गीत, मुक्तसुनीत, तालचित्रे, विरूपिका असे जुने काव्यप्रकारही त्यांनी हाताळले. विंदांच्या बालकविता हा त्यांचा एक वेगळाच पैलू आहे. एकदा काय झाले सशाचे कान, एटू लोकांचा देश, परी ग परी, अजबखाना, सर्कसवाला, पिशीमावशी आणि तिची भुतावळ, अडम् तडम्, टॉप, सात एके सात, बागुलबोवा. हे त्यांचे बाल काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत. या बालकविता अत्यंत वेगळ्या अशा आहेत. नाविन्यपूर्ण कल्पना आणि विनोदाची छानशी फोडणी ही त्यांची वैशिष्ट्ये आहेत. स्पर्शाची पालवी व आकाशाचा अर्थ हे त्यांचे लघुनिबंधसंग्रह, ज्ञानेस्वरांच्या अमृतानुवाचे अर्वाचिनीकरण हा त्यांचा अभिनव प्रयोग होता. स्वतःच्याच काही कवितांचा त्यांनी इंग्रजीतही अनुवाद केला होता. पण मा. विंदा आठवतात ते त्यांनी महाराष्ट्रभर केलेल्या काव्यवाचनामुळे. दर्जेदार मराठी कवितांना घरे मिळवून देण्याचा हा अफाट यशस्वी प्रयोग होता. काव्यवाचनाचा प्रकार फारसा रूढ नसतानाही मा.वसंत बापट, मा.मंगेश पाडगावकर आणि मा.विंदा या तिघांनी काव्यवाचनाच्या जाहीर अनेक कार्यक्रम केले होते. मा.विंदा करंदीकर यांना साहित्य क्षेत्रातला सर्वोच्चअ प्रतिष्ठेचा एकोणचाळिसावा ज्ञानपीठ पुरस्कार त्यांना ’अष्टदर्शने’ या साहित्यकृतीसाठी प्रदान केला गेला. वि.स. खांडेकर आणि कुसुमाग्रजांनंतर हा पुरस्कार मिळवणारे ते तिसरे मराठी साहित्यिक ठरले. मा. विंदांना सर्वोच्च पातळीवरील राष्ट्रीय कवी म्हणून ‘कबीर पुरस्कार’आणि ‘कालिदास पुरस्कार’ हे मानाचे पुरस्कार प्राप्त झाले होते. याशिवाय मा. विंदांना महाराष्ट्र साहित्य परिषद पुरस्कार, कुसुमाग्रज पुरस्कार, जनस्थान पुरस्कार सारखे अनेक सन्मान व पुरस्कार प्राप्त झाले होते. मार्क्स आणि गांधीवादावर अढळ निष्ठा असणाऱ्या मा.विंदांनी पुरस्कारापोटी मिळालेले लक्षावधी रुपये सामाजिक संस्थांना देऊन ‘देणार्या‍ने देत जावे’ चा अनुभव रसिकांना दिला. मा.विंदा ‘मानवाचे अंती गोत्र एक’ हे जसे लिहिले तसेच ‘सर्वस्व तुजला वाहुनी, माझ्या घरी मी पाहुणी’ अशी भावगीतेही त्यांनी लिहिली. मा.विंदाचे वैयक्तिक जीवन साधे, स्वावलंबी राहिले. त्यांनी स्वातंत्र्य-सैनिकांना मिळणारे वेतनपण कधी स्वीकारले नाही. काटेकोरपणाबद्दल त्यांची भूमिका नेहमी आग्रही राहिली. देता देता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावेत, इतके देऊन टाकत हा कवी आपल्यातून निघून गेला. मा.'विं.दा' करंदीकर यांचे १४ मार्च २०१० रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

    'विं.दा' करंदीकर यांची ग्रंथसंपदा
    स्वेदगंगा, जातक, विरुपिका, संहिता इत्यादी काव्यसंग्रह. स्पर्शाची पालवी, आकाशाचा अर्थ इत्यादी ललित लेखसंग्रह. परी गं परी, राणीचा बाग, इत्यादी बालगीतसंग्रह. किंग लियर, फ़ाऊस्ट इत्यादी अनुवादित ग्रंथ.

    'विं.दा' करंदीकर यांची कविता
    https://www.youtube.com/watch?v=JRpJ9_pQKmQ
    'विं.दा' करंदीकर नक्षत्रांचे देणे
    https://www.youtube.com/watch?v=NHczZUq9rNY

    https://www.youtube.com/watch?v=Unea-KyPEdA

  • इंग्लंडचे महान क्रिकेटपटू डब्ल्यू जी ग्रेस

    द डॉक्टर, डब्ल्यूजी, डॉक अशा अनेक टोपणनावांनी ते ओळखले जात.आक्रमक फलंदाज, उपयुक्त अष्टपैलू असलेल्या ग्रेस यांच्या नावावर अनेक डोमेस्टिक आणि कसोटी क्रिकेट विक्रम आहेत.