जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
गोव्याचे पहिले मुख्यमंत्री दयानंद बाळकृष्ण ऊर्फ भाऊसाहेब बांदोडकर यांचा जन्म १२ मार्च १९११ रोजी गोव्यातील पेडणे (पणजी) येथे झाला.
गोमंतकाचे भाग्यविधाते दयानंद बाळकृष्ण बांदोडकर उर्फ भाऊसाहेब बांदोडकर हे गोवा, दमण व दीव या केंद्रशासित प्रदेशांचे पहिले मुख्यमंत्री व एक उद्योगपती. भाऊसाहेब बांदोडकर हे लोकशाही प्रणालीची तत्त्वे मानणारे नेते होते. त्यामुळेच त्यांनी अजूनही गोमंतकीयांच्या हृदयात स्थान कायम ठेवले आहे. ते गोव्यातील उद्योगपती होते (मँगेनिझ खान मालक) अत्यंत दानशूर म्हणून त्यांची ख्याती होती.
भाऊसाहेब बांदोडकर यांचा जन्म गोव्यातील पेडणे (पणजी) येथे सामान्य घराण्यात झाला. त्यांच्या लहानपणीच आई-वडील वारले. प्राथमिक मराठी शिक्षण म्हापसा येथे व माध्यमिक पोर्तुगीज शिक्षण पणजी येथे. पोर्तुगीज व मराठी भाषांबरोबरच फ्रेंच व हिंदी या भाषाही शालेय जीवनातच त्यांनी उत्तम प्रकारे आत्मसात केल्या. जुजबी शिक्षणानंतर त्यांनी आपल्या घराण्याचा व्यावसाय वाढविला व पुढे खाणमालक म्हणून नावलौकिक व विपुल धन मिळविले. त्यांचा विवाह सुशिलाबाई लक्ष्मण पेडणेकर या एका व्यापाऱ्या च्या मुलीशी झाला. त्यांचे सासरचे नाव सुनंदा. १९४२ च्या छोडो भारत आंदोलनाने बांदोडकरांचे राजकीय क्षेत्रात पदार्पण झाले. तरुणपणी रॉयवादी विचारसरणीकडे त्यांचा ओढा होता. त्यातूनच तरूणवर्गाला एकत्र आणून गोव्यात समाज प्रबोधनाचे कार्य हाती घेण्याची त्यांना प्रेरणा मिळाली. भारत स्वतंत्र झाल्यानंतर गोवा मुक्ती आंदोलनास चालना मिळाली. या आंदोलनात त्यांनी सक्रिय भाग घेऊन अनेक भूमिगतांना सर्व प्रकारचे सहकार्य दिले आणि खेडोपाडी पोर्तुगीजांविरुद्ध प्रचार केला; ग्रामीण भागात मराठी शाळा चालाव्यात म्हणून मदत केली. त्यामुळे त्यांना १९५६ साली तीन महिने तुरूंगवास भोगावा लागला.
११ डिसेंबर १९६२ रोजी भारत सरकारने लष्करी कारवाई करून गोवा मुक्त केले. तेव्हा बांदोडकरांनी स्वतंत्र गोव्यात महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाची स्थापना केली. गोवा महाष्ट्रात विलीन करावा, या माताचे ते कट्टर पुरस्कर्ते होते. त्यांनी इंडियन नॅशनल काँग्रेस पक्षाचा दारूण पराभव करून १९६३ च्या डिसेंबरमधील सार्वत्रिक निवडणुकीत एकूण ३० पैकी १४ जागा मिळविल्या. तीन अपक्षांच्या मदतीने त्यांनी बहुमत सिद्ध करून मंत्रिमंडळाची मागणी केली आणि महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे मंत्रिमंडळ स्थापन केले. बांदोडकरांनी निवडणूक लढविली नव्हती; पण कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव ते गोव्याचे पहिले मुख्यमंत्री झाले. त्यांच्याकडे सामान्य प्रशासन, अर्थ, नियोजन व समाजकल्याण ही खाती होती. या पक्षाचे मुख्य उद्दिष्ट गोवा महाराष्ट्रात विलीन व्हावा, हे होते. मुख्यमंत्री झाल्यानंतर गोवा महाराष्ट्रात विलीन करण्यासाठी जनतेचे मत वळविण्याचे त्यांनी ठरविले. त्याकरिता त्यांच्या मंत्रिमंडळाने शेतीविषयक सुधारणा आणि समाजकल्याण हे दोन महत्त्वाचे कार्यक्रम हाती घेतले. केंद्राने गोव्याच्या बाबतीत जनमताचा कौल घेण्याचे ठरविले.
कौल निःपक्षपाती वातावरणात पार पाडावा, म्हणून त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. गोव्यात सहा महिने राष्ट्रपती राजवट लादण्यात आली. या दरम्यान बांदोडकरांनी महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचा अध्यक्ष या नात्याने गोवा महाराष्ट्रात विलीन व्हावा, म्हणून खोड्यापाड्यांतून दौरे काढून प्रचार केला. गोवा केंद्रशासित प्रदेश ठेवावा, की महाराष्ट्रात विलीन करावा, या प्रश्नांवर ३ जानेवारी १९६७ रोजी सार्वमत घेण्यात आले. सार्वमतानुसार गोवा केंद्रशासित प्रदेश ठेवण्यात आला. गोव्याचे महाराष्ट्राशी मीलन व्हावे हे त्यांचे स्वप्न सार्वमतातील पराभवामुळे भंगले असले तरी त्यांनी हार न मानता निवडणूक जिंकून महाराष्ट्राशी गोव्याचे सांस्कृतिक संबंध वाढवून बळकट तर केलेच पण मराठी ही गोव्याची राजभाषा करणारा ठराव असेंब्लीत संमत करून घेतला.
त्यानंतरच्या एप्रिल १९६७ च्या निवडणुकीत बांदोडकर महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षातर्फे बहुमताने निवडून आले व गोव्याचे दुसऱ्यांभदा मुख्यमंत्री झाले. बांदोडकरांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाच्या दहा वर्षांच्या कारकीर्दीत गोव्यात अनेक सुधारणा केल्या. गोव्याचा सर्वांगीण विकास व्हावा, म्हणून त्यांनी अनेक योजना व कार्यक्रम राबविले; शेती व मच्छीमारी यांना प्रोत्साहन दिले; गोव्यातील उद्योजकांना चालना दिली; ग्रामिण शिक्षणाबरोबर त्यांनी मराठी भाषिक शिक्षणाला प्रोत्साहन दिले; तांत्रिक व वैद्यकीय शिक्षणाचा प्रसार केला; साहित्य-कला आदींना उत्तेजन देण्यासाठी गोव्यात कला अकादमीची स्थापना केली; अनेक शैक्षणिक तसेच क्रीडाविषयक संस्थांना त्यांनी सढळ हाताने मदत केली.
गोवा प्रवाशांचे आकर्षण ठरावे म्हणून अनेक योजना त्यांनी कार्यवाहीत आणल्या. कोणत्याही विधायक सामाजिक कार्याला सढळ हाताने मदत करण्यात ते अग्रेसर होते. थोर दानशूर व्यक्ती म्हणून त्यांचा लौकिक होता. गोरगरिबांचे प्रश्न ते जातीने लक्ष घालून सोडवीत. क्रिकेट, शिकार, वाचन, सुग्रास भोजन या गोष्टी त्यांना मनापासून प्रिय होत्या. रसिकतेचे राजस जीवन जगत असतानाही त्यांनी आपल्या खाणीतील मजुरांकडे किंवा मंत्रालयातील फाइलींकडे कधीच दुर्लक्ष केले नाही.
गोवा महाराष्ट्रात विलीन व्हावा, म्हणून ते अखेरपर्यंत प्रयत्नशील होते. त्यांना शशिकला, उषा, क्रांती व ज्योती ह्या चार मुली असून सिद्धार्थ बांदोडकर हा मुलगा होता. सिद्धार्थचे तरुणवयात निधन झाले. लीना चंदावरकरचा पहिला नवरा सिद्धार्थ बांदोडकर होता. भाऊसाहेब बांदोडकर यांच्या मृत्यूनंतर त्यांची मोठी मुलगी शशिकला काकोडकर ह्या गोव्याच्या मुख्यमंत्री झाल्या. त्या आधी बांदोडकरांच्या मंत्रिमंडळात त्या एक सदस्य होत्या.
गोव्याची कला अकादमी ही पु. ल. देशपांडे आणि दामू केंकरे यांच्या संकल्पनेतून व त्या काळातील मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांच्या पुढाकारामुळे उभी राहिली. आधी ती नाट्य अकादमी होती व नंतर ती कला अकादमी झाली.
भाऊसाहेब बांदोडकर यांचे १२ ऑगस्ट १९७३ निधन झाले.
-- संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
आज ७ नोव्हेंबर..आज तमिळ, हिंदी अभिनेता, पटकथालेखक व दिग्दर्शक कमल हासन यांचा वाढदिवस.
जन्म:- ७ नोव्हेंबर १९५४
कमल हासन यांनी हिंदी, तामिळ, तेलुगु, मल्याळम आणि कन्नड या भाषांतील अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले आहे. १९६० मध्ये त्यांना कलथुर कन्नामा या चित्रपटातील भूमिकेसाठी पहिला राष्ट्रीय बालकलाकार पुरस्कार मिळाला. या चित्रपटातील भूमिकेसाठी वयाच्या चौथ्या वर्षी त्यांचा राष्ट्रपतींकडून सन्मान करण्यात आला होता. कमल हसन यांनी आतापर्यंत अनेक हिंदी चित्रपटात आपल्या अभिनयाची छाप उमटवली. आत्ता पर्यंत कमल हासन यांनी १९० चित्रपटांत भूमिका केल्या आहेत. एक दुजे के लिये, सदमा, एक नई पहेली, चाची ४२० ही त्यांच्या चित्रपटांची काही नावे. कमल हसन यांनी आतापर्यंत चित्रपटसृष्टीतील अनेक प्रतिष्ठित पुरस्कार मिळवले आहेत. ते दिग्दर्शन, निर्माते, पार्श्वगायक अशीही त्यांची ओळख आहे. त्यांनी अनेक चित्रपटांचे लेखन केले आहे. तामिळ, हिंदी, तेलुगु, मल्याळम आणि इंग्रजी भाषेतही त्यांनी अनेक गाणी गायली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुरु केलेल्या स्वच्छता अभियानात कमल हसन यांची निवड करण्यात आली.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
आज १२ सप्टेंबर... हिंदुस्थानी पद्धतीचे ख्यातनाम गायक सवाई गंधर्व यांची पुण्यतिथी
सवाई गंधर्वांचे मूळ नाव रामभाऊ कुंदगोळकर. त्यांचा जन्म १९ जानेवारी १८८६ रोजी झाला.
‘नर करनी करे तो नर का नारायण हो जाए’ या म्हणीचे प्रतीक म्हणजे ‘सवाई गंधर्व’. रामभाऊंचा आवाज लहानपणी गोड व हलका होता. त्यांना व घरातील मंडळींना गाण्याची आवड होती. वडील स्वत: तबल्याची साथही करत असत. घरातील आर्थिक सुबत्ता व सर्वांना असलेली गाण्याची आवड या अनुकूल परिस्थितीमुळे लहानपणी रामभाऊंना कुंदगोळ येथे बळवंतराव कोल्हटकर यांच्याकडे गाणे शिकण्याची संधी मिळाली. त्यांना त्यात सुमारे पंच्याहत्तर ध्रुवपदे व पंचवीस तराणे मिळाले. रामभाऊंचे वडील मुळचे कुळकर्णी. त्यामुळे मुलाने जहागीरदारांकडील वहिवाटदारी व पाटीलकी पुढे सांभाळावी अशी त्यांची इच्छा होती. परंतु रामभाऊंचा जीव गाण्यात अडकला होता. लहानपणी जरी त्यांचा आवाज गोड व हलका होता, तरी ते वयात आल्यावर त्यांचा आवाज फुटला व तो बोजड झाला. त्यावर उपाय म्हणजे, चांगल्या गुरूंकडून तालीम मिळणे हाच होता.
त्या सुमारास म. अब्दुल करीमखाँसाहेब मिरज येथे येऊन स्थायिक झाले. खाँसाहेबांचे गाणे सुरेल व भावनाप्रधान. रामभाऊंना खाँसाहेबांकडे शिकण्याची ओढ निर्माण झाली. तेव्हा मोठ्या प्रयत्नांती वडिलांचे मन वळवून रामभाऊ अब्दुल करीमखाँसाहेबांकडे गाणे शिकण्यास गेले. आवाज फुटल्यामुळे व बोजड झाल्यामुळे खाँसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली रामभाऊंनी त्यांचा स्वत:चा आवाज मोठ्या कष्टाने ताब्यात आणला. खाँसाहेबांकडे सुमारे सात-आठ वर्षे तालीम घेतल्यानंतर बीनच्या अंगाने कसे गावे याचे तंत्र रामभाऊंना अवगत झाले व त्यातून त्यांनी स्वत:ची विशेष आक्रमक गायकी बनवली. पुढे, सुमारे १९०८ पासून, त्यांनी संगीत नाटकांमध्ये कामे केली. त्यांना ‘नाट्यकला संगीत प्रवर्तक मंडळी’ या संस्थेतर्फे होणाऱ्या ‘सौभद्र’ नाटकातील सुभद्रेची भूमिका मिळाली. त्यांच्या सभ्य, सौम्य, प्रतिष्ठित व सुंदर व्यक्तिमत्त्वामुळे त्यांची सुभद्रेची भूमिका लोकप्रिय होऊ लागली. मुख्य म्हणजे त्यांचा गाण्याचा ढंगही वेगळा व प्रेक्षकांवर छाप पाडणारा असायचा. एके दिवशी अमरावतीला ‘सौभद्र’चा प्रयोग चालू असताना त्या प्रयोगाला हजर असलेले पुढारी व वऱ्हाडचे अनभिषिक्त राजे दादासाहेब खापर्डे यांनी रामभाऊंच्या भूमिकेवर व गाण्यावर खुश होऊन ‘हे तर सवाई गंधर्व’ असे उत्स्फूर्तपणे उद्गार काढले! तेव्हापासून लोक रामभाऊ कुंदगोळकरांना ‘सवाई गंधर्व’ या नावाने ओळखू लागले.
सवाई गंधर्वांनी १९०८ ते १९३१ पर्यंत संगीत नाटकांत वेगवेगळ्या भूमिका केल्या. ‘विनोद’ या नाटकातील त्यांचे वामनरावाचे काम; तसेच, ‘मिराबाई’ नाटकातील दयानंदाची भूमिका व ‘सुखसाधना भजना गणा’ हे पद खूप गाजले. त्यांनी नाट्यजीवनाला १९३१ नंतर पूर्णविराम दिला. त्यानंतर ते फक्त खासगी बैठकीत गात असत. रामभाऊंच्या कुटुंबात संगीताची विशेष पार्श्वभूमी नसताना त्यांनी संगीतामध्ये रुची वाढविली आणि हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या अभ्यासाला उस्ताद अब्दुल करीम खान यांच्या मार्गदर्शनाखाली प्रारंभ केला. तेथील अभ्यास पूर्ण केल्यानंतर रामभाऊ एका नाटक कंपनीला सामील झाले आणि लवकरच मराठी रंगभूमी क्षेत्रामधे त्यांनी स्वतःचे स्थान निर्माण केले. बालगंधर्व (उर्फ नारायण राजहंस) यांच्याप्रमाणे त्यांना देखील लोक सवाई गंधर्व या नावाने ओळखू लागले.
त्यांनी गायलेली मराठी नाट्यसंगीतातील काही पदे आज अजरामर झाली आहेत. किराणा घराण्याची परंपरा यशस्वीरित्या पुढे नेणार्याह आणि अधिकच उजळविणार्या. त्यांनी मार्गदर्शन केलेल्या त्यांचे शिष्य यापैकी काही नावे म्हणजे पंडित भीमसेन जोशी, बसवराज राजगुरू, गंगुबाई हंगल, वगैरे. यापैकी पंडित भीमसेन जोशी ह्यांनी त्यांच्या गुरूंच्या स्मरणार्थ १९५२ सालापासून दरवर्षी सवाई गंधर्व संगीत महोत्सव पुणे येथे भरविण्यास सुरवात केली.
सवाई गंधर्व यांचे १२ सप्टेंबर १९९२ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर, पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. विकीपीडीया / thinkmaharashtra
हिंदी तसंच मराठी चित्रपटसृष्टीतील विख्यात संगीत दिग्दर्शक व पार्श्वगायक असलेल्या सी.रामचंद्र यांचे मूळ नाव रामचंद्र नरहर चितळकर. ‘सी. रामचंद्र’ हे संक्षिप्त नाव त्यांनी सिनेदिग्दर्शक जयंत देसाई ह्यांच्या सूचनेवरुन धारण केले. आपल्या निकटवर्तीय व आप्तेइष्टांमध्ये ते ‘अण्णा’ या नावाने प्रसिद्घ होते.
यशस्वी होण्याच्या सर्व संधी उपलब्ध असूनही काही वेडी माणसे ही चाकोरी सोडतातात आणि वेगळी वाट तयार करतात. किरण पुरंदरे अशांपैकीच एक आहेत.
पक्ष्यांचा आवाज
शास्त्रीय संगीतात आपल्या अनोख्या आणि स्वयंभू गायकीने उच्चस्थान निर्माण करणारे पं. कुमार गंधर्व हे पं.सत्यशील देशपांडे यांचे गुरू!
लहान मुले खेळताना भिंतीआडून डोकावणाऱ्या एखाद्या भिडूला ज्या सहजतेने आपल्या खेळात समाविष्ट करून घेतात, तेवढय़ाच सहजतेने एखाद्या रागातील एखाद्या वज्र्य स्वराला हळूवार कुरवाळणाऱ्या पं. कुमार गंधर्व यांची संगीताकडे पाहण्याची दृष्टीच वेगळी आणि उदात्त होती. त्यांचा जन्म ९ जानेवारी १९५१ रोजी झाला. हाच उदात्त दृष्टिकोन आपल्या जीवनाचे साध्य बनवून संगीताची आराधना करणाऱ्या पं. सत्यशील देशपांडे यांनी ख्याल गायकीचे अक्षरश: झाड फुलवले. विशेष म्हणजे, कुमारजींप्रमाणेच पं.सत्यशील देशपांडेही संगीताच्या बाबतीत कोणत्याही बंधनात अडकून पडले नाहीत. भारतीय शास्त्रीय संगीतातील ख्याल गायकी हा प्रकार लोकप्रिय असला, तरी कलाकारांसाठी तो साधनेचा विषय आहे.
पं. सत्यशील देशपांडे यांनी ख्याल गायकी साधनेने आत्मसात केली. त्यांनी ज्या सहजतेने आणि तन्मयतेने ख्याल गायकी गायली, त्याच तन्मयतेने त्यांनी ‘लेकीन’ किंवा ‘विजेता’ अशा चित्रपटांमधील गाणीही गायली. ख्याल गायकी सामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी प्रफुल्ल डहाणूकर आर्ट फाऊंडेशनसाठी ‘पाच मिनिटांचे शास्त्रीय संगीत’ असा एक पाच मिनिटांचा तुकडा तयार केला होता.
संगीताकडे वेगळ्याच दृष्टीने पाहणारा हा सुरांचा गुरू शास्त्रीय संगीत हा फक्त ऐकण्याचा किंवा गाण्याचा विषय नसुन अनुभवण्याचा देखील विषय आहे हे मा.पं.सत्यशील देशपांडे जेव्हा सांगतात ते रसिकांना नक्की पटत असेल. हा अनुभव स्वत: घेण्यासाठी व लुटण्यासाठी सत्यशीलजींनी आयुष्यभर अक्षरशः जीवाचं रान केलं. मुख्य म्हणजे त्यांचे गुरु कुमारजी नेहमीच आधी कुठलीही गोष्ट करुन दाखवायचे व मग त्यावर भाष्य करायचे.
कुमारजींच्या ह्या आगळ्यावेगळ्या शिष्याचीही तीच पद्धत आहे. नुसत्या समीक्षेपेक्षा हे वेगळं व अवघड काम आहे. एखादी नवीन बंदिश बसवणं म्हणजे काय असतं ते गवयांना चांगलेच माहितेय. मग प्रत्येक रागातील पाचपन्नास बंदिशी नुसत्या बसवुनच नाही तर त्यातील सौष्ठव व सौंदर्यासहित स्वत: गाऊन अनुभवण्याचा वसा त्यांनी घेतला व अजुनही तो चालुच ठेवलाय. तसेच त्या बंदिशीचे पोषण कुठल्या गायकिने चांगले होते ही सौंदर्य दृष्टी सुद्धा त्यांच्याकडे आहे. त्यासाठी त्यांनी विविध गायकींचा अभ्यास करुन त्या आत्मसात केल्यायत. त्यामुळे वेगवेगळ्या गायकींचा तुलनात्मक आभास करणं त्यांना शक्य झालंय. टोकाचा व्यासंग, तल्लख बुद्धी व उत्तम प्रतिभा हा त्रिवेणी संगम सत्यशीलजींपाशी आहे.
तरुण संगीतकार कौशल इनामदार हे पं.सत्यशील देशपांडे यांचे शिष्य. कौशल इनामदार आपल्या गुरु बद्दल सांगताना म्हणतात, गुरु अंतर्दृष्टी देतो ती फक्त कलेकडे पाहण्याची नाही तर जगण्याकडे पाहण्याची. त्यांनी गाण्याकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टीकोन दिला. ते स्वतः कुमारजींचे शिष्य. तरीही त्यांच्या गाण्यात कुमारजींची नक्कल नाही. कुमारजींनीपण त्यांना सांगितलं होतं की तुमचे खड्डे तुम्ही खणा!
थोडक्यात काय तर अगदी गुरूचीसुद्धा नक्कल न करता स्वतःचं वेगळेपण स्वतः सिद्ध करा. त्यामुळे मी विचार करताना कधीही सत्यशील देशपांडे यांच्यासारखा करत नाही. मी माझ्या सारखा विचार करतो. मला वाटतं की आपल्यासमोर वाट असतेच, ती आपण शोधत जातो. गुरु आपल्याला जाणीव करून देतो की तुमची वाट तुम्ही शोधा. त्यासाठी आवश्यक त्या गोष्टी गुरु पुरवतात. मी गाण्याचा विचार माझ्यासारखा करतो कारण मी त्यांचा शिष्य आहे. एखादी चाल फसली तर ते सांगतात की त्यात काय करता येईल. त्यातलं एक सूत्र सांगतात ज्यामुळे अनेक गोष्टी स्पष्ट होतात.
मी संगीत द्यायला लागल्यापासून माझ्या चालींवर त्यांचा एक वेगळ्या प्रकारचा प्रभाव आहे. ते स्वतः उत्तम संगीतकार आहेत. त्यांना संगीतातले बारकावे अचूक कळतात. त्यांनी दाखवलेलं प्रतिबिंब इतकं स्वच्छ असतं की ‘प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट’ अशी काहीशी स्थिती होते! त्यामुळे असं म्हणायला हवं की गुरु म्हणजे वाटाडय़ा नाही. तो सतत तुमच्याबरोबर राहत नाही. वेगवेगळे मार्ग ते तुम्हाला सांगतात. तिथे जाताना तुम्हाला प्रश्न पडतात. माझ्या गुरुचं वेगळेपण हेच की त्यांनी आम्हाला असे प्रश्न पाडले. आज जवळजवळ १६ वर्ष मी त्यांच्याकडे शिकतोय पण जाऊन त्यांच्याकडे शिकायला बसलोय असं कधीच झालं नाही. मी कधीही त्यांना भेटायला जातो आणि शिक्षण सुरु होतं. त्यांनी मला अगदी मुलासारखं वाढवलं आहे.
सध्या ‘अजिंठा’ या चित्रपटासाठी ते माझ्याकडे गातायत. मला वाटतंय ‘हे गीत जीवनाचे’ नंतर पहिल्यांदाच ते चित्रपटासाठी गातायत. त्यांनी माझ्याकडून चाल समजून घेतली, त्यावर मी जेवढा विचार केला नसेल तेवढा त्यांनी केलाय, त्याच्या शंभरेक तालमीसुद्धा केल्यात! ते नुसते गायक किंवा संगीतकार नाहीत तर एक विचारवंत, लेखकसुद्धा आहेत. त्यांचा भाषेचा सेन्स अतिशय उत्तम आहे. होतं.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
बोकील, शांताराम
संपादक केबिनबद्ध नसावा, त्याने दीनदलितांच्या, भूमिपुत्रांच्या, पीडितांच्या हितासाठी आणि धर्मनिरपेक्षतेचा आधार घेऊन भाषा-धर्म-जाती-प्रदेशवादाच्या नावाखाली राजकारणाला विरोध करण्यासाठी कृतिशील असले पाहिजे, अशी आग्रही भूमिका घेणारा कार्यकर्ता-पत्रकार, शांताराम बोकील यांच्या निधनाने काळाच्या पडद्याआड गेला आहे. सातारा जिल्ह्य़ातील कोरेगाव हे गोष्टीवेल्हाळ शांताराम बोकील यांचे जन्मगाव.
विद्यार्थीदशेपासून बोकील शेती आणि शेतीच्या प्रश्नाकडे ओढले गेले. त्यांच्यावर पं. नेहरू आणि यशवंतराव चव्हाण यांच्या विचाराने प्रेरित होऊन ते काँग्रेसचे कट्टर कार्यकर्ते झाले. काँग्रेसी कार्यकर्ता होण्याचे समर्थनही करण्याचे धाडस बोकील यांनी पत्रकार झाल्यावर जाहीरपणे केले. या कार्यकर्ता होण्याने शेतीचे प्रश्न समजून घेताना त्यामागचे राजकीय भान बोकील यांना आले. सातारा जिल्ह्य़ातील म्हसवड या गावी सहा दशकांपूर्वी शेतकरी कुळाचा हक्क डावलला जाण्याविरुद्ध मोठे आंदोलन उभे झाले, त्यात क्रांतिसिंह नाना पाटील आणि माजी आमदार तुषार पवार यांच्यासोबत शांताराम बोकीलही आघाडीवर होते. या यशस्वी आंदोलनानंतर बोकील पत्रकारितेकडे वळले आणि तेथेच रमले. ‘पुढारी’ या दैनिकातून ग. गो. जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांची १९६० साली सुरू झालेली पत्रकारिता २००१ पर्यंत अखंड सुरू राहिली. या काळात शांताराम बोकील यांनी गोव्यात ‘नवप्रभा’, विदर्भात ‘नागपूर पत्रिका’, ‘लोकमत’ आणि ‘जनवाद’, औरंगाबाद आणि नांदेडच्या ‘लोकपत्र’ तसेच, कोल्हापूरच्या ‘पुढारी’ या दैनिकांचे कार्यकारी संपादकपद सांभाळत असताना महाराष्ट्रातील कृषी जगताचे साक्षेपी भाष्यकार-संपादक अशी ख्याती संपादन केली. उपसंपादक आणि सहाय्यक संपादक म्हणून नोकरी करताना आणि कार्यकारी संपादक म्हणून वृत्तपत्राचे नेतृत्व करताना शांताराम बोकील यांनी, पं. नेहरू तसेच यशवंतराव चव्हाण यांच्यावरील निष्ठा आणि शेतकऱ्यांशी असलेल्या बांधिलकीशी प्रतारणा केली नाही. या तीन मुद्यांवर मतभेदाचे प्रसंग उद्भवले तेव्हा नोकरी सोडण्याचा बाणेदारपणा बोकील यांनी दाखवला. संपादक म्हणून वैपुल्याने वावरताना राज्याच्या ज्या भागात गेले तेथील अभ्यास हे त्यांचे अविभाज्य अंग झाले. ते एक छान शिक्षकही होते. त्यांची शिकवण्याची पद्धत मात्र कठोर होती. सहकाऱ्यांच्या भाषाविषयक आणि अन्य चुका दाखवताना त्यांची जीभ दांडपट्टय़ाच्या वेगाने वार करत असे. मात्र त्यात व्यक्तिगत विखार नसे; बोकील क्षणार्धात समजदार शिक्षकाच्या भूमिकेत शिरत आणि भाषा, व्याकरण, शैली, एखाद्या प्रतिपाद्य विषयावरील त्यांच्याकडील माहितीचा खजिना रिता करत. पत्रकारिता समरसून शिकवण्याच्या त्यांच्या या तळमळीची आठवण त्यांच्यासोबत काम केलेले अनेक सहकारी आजही काढतात. पानाच्या टपरीपासून ते बडय़ा राजकीय धेंडांपर्यंत बोकीलांचा वावर ‘डॉमिनेटिंग’ शैलीत पण सहज असे. अशा बडय़ा धेंडाने बोलताना एखादा तपशील चुकीचा दिला तर त्याला फाडकन सुनावण्यास बोकील कचरत नसत. शेती आणि शेतकरी तसेच, धर्मनिरपेक्ष लोकशाही आणि मुस्लिमद्वेषाचे धोकादायक वळणावर पोहोचलेले राजकारण हे बोकील यांच्या लेखनाचे, वक्तृत्वाचे मुख्य विषय असत. या विषयांवर त्यांची शैली तडजोडवादी कधीच नव्हती. त्यामुळेच पत्रकार म्हणून त्यांना स्थैर्य प्राप्त झाले नाही आणि आर्थिकदृष्टय़ाही संपन्नता दिली नाही, याबद्दल काहीशी कटुता शांताराम बोकील यांना होती. पण त्यापेक्षा जास्त खंत महाराष्ट्राने त्यांचे प्रतिपादन नीट ऐकले नाही, याची होती आणि त्यापेक्षा किती तरी जास्त पट वैषम्य या देशाने नेहरूवादाची कास सोडल्याचे होते. बोकील सर्वधर्मसहिष्णू धर्मनिरपेक्षतेचे पुरस्कर्ते होते. ही धर्मनिरपेक्षता म्हणजे जात निरपेक्षताही आहे आणि नेहरूवाद तसेच यशवंतरावांचे विचार हाच त्याचा आधार आहे, अशी त्यांची पक्की धारणा होती. जातीरहित धर्मनिरपेक्षतेचे स्वप्न साकार होण्याचे समाधान राजकारण्यांनी बोकील यांना लाभू दिले नाही ते नाहीच!
डान्स हाच भगवानदादा यांचा “प्लस पाइंट’ होता. नाचता नाचता हळूवारपणे अलगद खांदे उडवण्याची त्यांची अफलातून शैली प्रचंड लोकप्रिय ठरली. सुपरस्टार अमिताभ बच्चन, कमल हसन आदी कलाकारांनी भगवानदादा यांची हीच नृत्यशैली सही सही उचलली.
प्रभाकर पेंढारकर हे चित्रतपस्वी भालजी पेंढारकरांचे सुपुत्र असलेल्या पेंढारकर यांनी अनेक दर्जदार चित्रपटांची निर्मिती केली.
अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील आंतरराष्ट्रीय जादूगार परिषदेच्या कोलकाता शाखेला सरकार यांचे नाव देण्यात आले आहे. जादू विश्वातील ‘ऑस्कर’ समजला जाणारा ‘द स्पिंक्स’ हा अमेरिकेचा प्रतिष्ठित पुरस्कार सरकार यांना १९४६ आणि १९५४ असा दोन वेळा लाभला.
Copyright © 2025 | Marathisrushti