(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

  • अनुताई बाळकृष्ण वाघ

    अनुताई वाघ ह्या आदिवासी क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्त्या व शिक्षणतज्ञ अशी ख्याती असलेल्या समाजसेविका.

    त्या पुण्यातील हुजूरपागा शाळेत १३ वर्षे शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. महात्मा गांधीजींच्या “खेडयाकडे चला” या आदेशाने प्रेरित होऊन १९४५ साली ग्रामसेविकांच्या शिबिरात दाखल झाल्या. तेथे ज्येष्ठ शिक्षणतज्ञ ताराबाई मोडक यांच्याशी भेट झाली. बोर्डी येथे बालवाडीत शिक्षिका म्हणून अनुताईंनी काम केले. त्याकाळात बालवाडीत मुले येत नसल्यामुळे अनुताईंनीच मुलांच्या अंगणात जायचे ठरवले. त्यातूनच आंगणवाडी या संकल्पनेचा जन्म झाला.

    १९५६ पासून त्यांनी ठाणे जिल्ह्यातील कोसबाड येथे शिक्षणकार्य केले. विशेष म्हणजे आजूबाजूच्या परिसराला जुळतील अशी बडबड गीते त्याचबरोबर “कोसबाडच्या टेकडीवरून” , “कुरणशाळा” , “टिल्लूची करामत”, अशी पुस्तके लिहिली. तसंच शिक्षण पत्रिका या मासिकाचे संपादन देखील केले.

    अनुताई वाघ यांना आदर्श शिक्षिका पुरस्कार, दलित मित्र, आदर्श माता, सावित्रीबाई फुले बालकल्याण राष्ट्रीय पुरस्कार, जमनालाल बजाज, दीनानाथ मंगेशकर प्रतिष्ठानचा आशा भोसले पुरस्कार, रमाबाई केशव ठाकरे या पुरस्कारांसोबतच भारत सरकारच्या “पद्मश्री” या किताबाने देखील सनमानित करण्यात आले होते.

    दैनिक गावकरी च्या पुरवणीवरुन संपादित

    अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

  • अनंत जनार्दन करंदीकर

    पत्रकार, केसरीचे संपादक, लेखक अनंत जनार्दन करंदीकर यांचा जन्म ३० डिसेंबर १९०१ रोजी झाला.

    वैदिक आर्याचे ज्योतिर्विज्ञान आणि वैदिक देवतांचे पुनदर्शन, गांधी-मुस्लीम कौन्स्पिरन्सी, दुसरे महायुध्द पूर्वार्ध हे ग्रंथ तसेच क्रांतिवादी टिळक या नावाने टिळकांचे चरित्र लिहिले.

    ## Anant Janardan Karandikar

  • नेल्सन मंडेला – जन्मशताब्दी

    दक्षिण आफ्रिकेचे सुदैव असे की, जेंव्हा सत्तापालट झाला तेंव्हा त्या देशाला मंडेला सारखा सहिष्णू, समंजस आणि व्यवहारी नेता मिळाला. त्यामुळेच नव्या राजवटीत कुठेही अनागोंदी झाली नाही आणि संक्रमण शांततेत पार पडले. इतर आफ्रिकन देशांचा अनुभव बघता, मंडेला यांचे नेतृत्व खरोखरच प्रेरणादायी असेच म्हणायला हवे.

  • प्रसिद्ध मानवशास्त्रज्ञा इरावती कर्वे

    प्रसिद्ध मानवशास्त्रज्ञा इरावती कर्वे यांचे पूर्वाश्रमीचे नाव इरावती करमरकर. त्यांचा जन्म १५ डिसेंबर १९०५ रोजी झाला. त्या महर्षी धोंडो केशव कर्वे ह्यांच्या स्नुषा व फर्ग्युसनचे माची प्राचार्य दि. धों. कर्वे ह्यांच्या पत्नी होत. त्यांचा जन्म ब्रह्मदेशातील एका मध्यमवर्गीय महाराष्ट्रीय कुटुंबात म्यिंजान येथे झाला. त्यांचे वडील त्यावेळी तेथे अभियंत्याचे काम करीत होते.

    इरावती कर्वे यांचे यांचे शिक्षण पुण्यातील हुजूरपागा शाळेत झाले. १९२२ साली त्या मॅट्रिक पास झाल्या, १९२६ साली फर्ग्युसन महाविद्यालयातून तत्त्वज्ञान विषय घेऊन बी.ए. (ऑनर्स) झाल्या. त्यावेळी त्यांना रँग्लर र. पु. परांजपे ह्यांचे बहुमोल साहाय्य लाभले. पुढे त्यांनी डॉ. घुर्ये ह्यांच्या मार्गदर्शनाखाली ‘चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण’ ह्या विषयावर प्रबंध लिहून एम्‌. ए. ची पदवी मिळविली व पुढील शिक्षणासाठी त्या जर्मनीला गेल्या.

    ‘मनुष्याच्या डोक्याच्या कवटीची नेहमीची असमप्रमाणता’ ह्या विषयावर प्रबंध लिहून बर्लिन विद्यापीठातून पीएच्‌.डी. पदवी त्यांनी घेतली. तेथे असताना त्यांचा दि. धों. कर्व्यांशी परिचय झाला व त्याचे विवाहात रूपांतर झाले. काही वर्षे त्यांनी श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठात कुलसचिवाचे काम केले.

    १९३९ मध्ये पुण्याच्या डेक्कन कॉलजेमध्ये समाजशास्त्र व मानवशास्त्र ह्या विषयांच्या प्रपाठक म्हणून त्यांची नेमणूक झाली. ह्या विभागाच्या त्या अखेरपर्यंत विभागप्रमुख होत्या. १९५५ साली लंडन विद्यापीठात व्याख्याता म्हणून एका वर्षासाठी त्यांनी पद भूषवले. मानववंशशास्त्र या विषयावर त्यांनी बरेच अध्ययन केले. आणि कुटुंब संस्थेवर आधारलेला ‘किनशिप ऑर्गनायझेशन इन इंडिया’ हा त्यांनी लिहिलेला ग्रंथ जगन्मान्यता पावला.

    ‘मराठी लोकांची संस्कृती’, ‘आमची संस्कृती’, ‘युगांत’, ‘धर्म’, ‘संस्कृती’, ‘महाराष्ट्र ’ एक अभ्यास इत्यादी सदंर्भातील त्यांचे ग्रंथ प्रसिद्ध आहेत. ‘परिपूर्ती’, ‘भोवरा’, ‘गंगाजळ’ हे त्यांचे ललित संग्रह. इरावतीबाईंची भाषा साधी, सोपी, प्रसन्न आणि हलकासा विनोदाचा शिडकाव करणारी.

    संवेदनक्षम, भावोत्कटता हे त्यांच्या ललित लेखनाचे वैशिष्ट्य होते. तर टवटवीत तरलता ही वाचकाच्या मनाला प्रफुल्लित करते. मराठी लघुनिबंधाच्या विकासाचा एक टप्पा म्हणून इरावतीबाईंच्या लेखनाकडे पाहिले जाते.

    इरावती कर्वे यांनी केवळ खोलीत बसून संशोधनात्मक अभ्यास किंवा लेखन केले असे नाही, तर त्यांनी संशोधनासाठी भारतभ्रमण केले, अनेक वर्षे पंढरीची वारीही केली, अनेक जत्रा-यात्रा जवळून अनुभवल्या.

    समाजाला ’गोधडी’ची उपमा देऊन त्यांनी त्यामागील व्यापक अर्थ सांगितला. ‘वेगवेगळ्या रंगांच्या आकारांच्या तुकड्यांनी मिळून गोधडी हे अखंड वस्त्र तयार होते, त्याप्रमाणेच समाजातील निरनिराळी माणसे एकत्र येऊन समाज निर्माण होतो, माणसे एकमेकांच्या जवळ येतात, जोडली जातात, एकमेकांच्यात मिसळतात, व पुन्हा तुटली जातात, तरीही त्यांची समाजातील वीण मात्र पक्की असते.’ असा समर्पक विचार त्यांनी मांडला.

    ललित व संशोधनात्मक-वैचारिक अशा दोन्ही प्रकारचे लेखन त्यांनी विपुलतेने केले. वैचारिक लेखनाबरोबरच स्त्रीची सहृदयता, तरल सौजन्यशीलता, चिंतन या गुणांसह ललितलेखनही त्यांनी तितक्याच ताकदीने केले आहे. ’परिपूर्ती’, ’भोवरा’ व ’गंगाजल’ ही काही उदाहरणे होत.

    ’ललितगद्याच्या अग्रदूत’ असे त्यांना म्हटले जाई. अतिशय लवचीक, स्वाभाविक भाषाशैलीमुळे त्यांचे गद्य अधिकच खुले. इरावतीबाईंनी मराठी व इंग्रजीतूनही लेखन केले. महाभारतावरील ’युगान्त’ या त्यांच्या ग्रंथास १९६८ साली साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त झाला. ’युगान्त’ मध्ये त्यांनी महाभारतातील व्यक्तिरेखा अद्वितीय दृष्टिकोनातून मांडल्या आहेत. या ग्रंथातून त्यांच्यातील स्त्री, संशोधिका व लेखिका एका वेगळ्याच उंचीवरून आपल्याला भेटते.

    मराठी लोकांची संस्कृती, धर्म, हिंदूंची समाजरचना, महाराष्ट्र एक अभ्यास, Hindu Society An Interpretation, Maharashtra Its Land & People, Bhils of West Khandesh अशी मौल्यवान ग्रंथसंपदा त्यांच्या नावावर आहे. एक ज्ञानभाषा म्हणून त्यांनी इंग्रजी भाषेचे महत्त्व ओळखले होते. त्यांचा संस्कृत भाषेचाही मोठा अभ्यास होता. रामायण-महाभारताची संस्कृतमधील रचना, प्रसिद्ध कवींची संस्कृत काव्ये, असंख्य सुभाषिते – असे त्यांचे पाठांतर होते. इरावती कर्वे यांचे ११ ऑगस्ट १९७० रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • शॉटगन म्हणजेच प्रसिद्ध अभिनेते शत्रुघ्न सिन्हा

    शॉटगन म्हणजेच प्रसिद्ध अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांचा जन्म ९ डिसेंबर १९४५ रोजी झाला. शत्रुघ्न सिन्हा हे बिहारच्या उच्च शिक्षित कुटुंबातील सदस्य आहेत. चारही बंधूंची नावे राम, भरत, शत्रुघ्न आणि लक्ष्मण अशी आहेत. वडिलांची इच्छा नसतानाही ते पुण्याला आले होते. फिल्म्स & टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटची प्रवेश परीक्षा तो उत्तीर्ण झाला होते. या संस्थेत राजकपूर भेट द्यायला आले होते. भेटीचा कार्यक्रम उरकल्यावर जाताना त्यांनी शत्रूला त्याच्या मित्रांसह मुंबईला शुटींग पाहण्यासाठी बोलवले. ते तिथे जाऊन त्यांना भेटले. जुहूमधील मा.शत्रुघ्न यांच्या बंगल्याचे नावही ‘रामायण’ आहे. त्यांच्या मुलांची नावे लव आणि कुश आहेत.

    शत्रुघ्न सिन्हा यांनी १९६९ मध्ये `साजन’ चित्रपटाद्वारे सिनेमासृष्टीत पाऊल ठेवले होते. त्यांनी आतापर्यंत २०० हिंदी चित्रपटांसह बंगाली आणि पंजाबी चित्रपटांतही काम केले आहे. त्यांच्या सिनेमामधील अनेक डॉयलॉग आजही प्रसिद्ध आहेत. कालीचरण, विश्वनाथ, ब्लॅकमेल, दोस्ताना, शान आणि काला पथर हे त्यांची काही नावाजलेले सिनेमे आहेत. चित्रपटात काम केल्यानंतर सध्या ते राजकारणात कार्यरत असून सध्या बिहार तालुक्यात पाटणा साहिब क्षेत्राचे लोकसभेचे खासदार होते. अभिनेता म्हणून लोकप्रिय झालेल्या शत्रुघ्न सिन्हा यांनी राजकारणातही जगन्मैत्री टिकवण्याचा प्रयत्न केला. पत्रकार भारती प्रधान यांनी सुमारे सात वर्षांपर्यंत विविध शहरांमध्ये शत्रुघ्न सिन्हा आणि त्यांच्या कुटुंबातील लोकांशी चर्चा करून शत्रुघ्न सिन्हा यांच्या जीवन, प्रेम आणि करिअरवर ‘एनिथिंग बट खामोश’ नावाचे पुस्तक लिहिले आहे. शत्रुघ्न एका चित्रपटात आपल्या भारदस्त आवाजामध्ये ‘खामोश’ म्हणाले होते. तेव्हापासून ते विविध सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये जनतेच्या आग्रहाखातर ‘खामोश’ हा डायलॉग म्हणतात.

    सिनेस्टार काही प्रमाणात आपल्या प्रयत्नातून आणि काही प्रमाणात चाहत्यांच्या सहकार्याने स्वत:ची प्रतिमा तयार करतो. शत्रुघ्नसारख्या बडबड्या व्यक्तीच्या प्रतिमेसोबत ‘खामोश’ शब्द कसा काय जोडला गेला, हे कुणालाही कळालेले नाही. आपल्या सुरुवातीच्या संघर्षाच्या काळात एकमेकांचे घनिष्ठ मित्र राहिलेल्या शत्रुघ्न आणि अमिताभ यांच्यात नंतर कटुता आली. त्यांनी यश जोहर यांचा पहिला चित्रपट ‘दोस्ताना’मध्ये एकत्र काम केले होते.

    शत्रुघ्न यांनी रिना रॉयसोबत प्रेमप्र करण गाजले होते, पण लग्न पूनम यांच्यासोबत केले. १९६८ मध्ये पूनम या मिस यंग इंडिया म्हणून निवडली गेल्या होत्या. पूनम यांनी जोधा-अकबर’मध्ये तिने बादशहाच्या आईची भूमिका अत्यंत विश्वासार्हतेने साकारली आहे. शत्रुघ्न यांचा स्वभाव बडबड्या असला, तरी पूनम शांत स्वभावाच्या म्हणून ओळखल्या जातात.

    संजीव वेलणकर पुणे
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट.

  • शाम जयवंत देशमुख

    शिवसेनेच्या स्थापनेपासून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विश्वासू सैनिकांपैकी एक असलेले श्री शामराव देशमुख हे मुंबईतील सीकेपी बॅंकेचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान ज्येष्ठ संचालक आहेत.

  • डॉ. संजय गोविंदराव पोहरकर

    डॉ. संजय गोविंदराव पोहरकर हे लाखनी, या भंडारा जिल्ह्यामधील गावामध्ये वास्तव्यास असणारे प्रतिभावंत साहित्यीक, व कलाकारी वृत्तीचे कवी आहेत. शिक्षण कला व साहित्य या एकमेकांस बर्‍यापैकी पुरक असलेल्या प्रांतांमध्ये त्यांचा राबता लक्षणीय स्वरूपाचा आहे. पेश्याने शिक्षक, आवडीने साहित्यीक व उत्तुंग प्रतिभेने कवीत्व स्वीकारलेल्या पोहरकरांचे व्यक्तिमत्व या तिनही क्षेत्रांवर साज चढवणारेच आहे.

  • आत्माराम रावजी देशपांडे उर्फ कवी अनिल

    मुर्तिजापूर येथे शालेय शिक्षण पूर्ण केल्यावर ते १९१९ मध्ये पुणे शहरास आले. त्यांचा जन्म ११ सप्टेंबर १९०१ रोजी मुर्तिजापूर येथे झाला.फर्ग्युसन महाविद्यालय येथे कलाशाखेचा पदवी अभ्यासक्रम पूर्ण केला. पदवी मिळवल्यावर भारतीय कलांचा अभ्यास करण्यासाठी कोलकाता इथे प्रयाण केले. ह्याबाबत अब्रिंद्रनाथ ठाकूर आणि नंदलाल बसु ह्यांचे मार्गदर्शन त्यांना मिळाले. त्यानंतर कवी अनिल यांनी १९३५ साली विधिशाखेची पदवी घेतली, सनद घेतल्यावर त्यांनी वकिलीचा व्यवसाय सुरु केला. त्यांची १९४८ साली मध्यप्रदेश सरकारतर्फे सामाजिक शिक्षण संस्थेचे उप-मुख्याधिकारी म्हणून नेमणूक झाली. तसेच पाठोपाठ १९५६ साली राष्ट्रीय मूलभूत शिक्षण केंद्र, दिल्ली इथे मुख्याधिकारी या, आणि पुढे १९६१ साली भारत सरकारच्या समाज शिक्षण मंडळाचे सल्लागार ह्या पदांवर नेमणुका झाली.

    कवी अनिल यांनी हे असे मार्गक्रम करत असतानाच मराठी वाङ्मयात महत्त्वाचे योगदान दिले. कवी अनिल हे मराठीत मुक्तछंदाचे प्रवर्तक म्हणून अधिक प्रसिद्ध असले, तरी त्यांनी प्रचलित केलेला 'दशपदी' हा काव्यप्रकार देखील तितकाच लक्षणीय आहे. सुनीत ज्याप्रमाणे चौदा ओळींचे असते, तशाच दशपदी कवितेत दहा ओळी असतात. अनिलांच्या दशपदींमध्ये मुख्यतः एखाद्या निसर्गचित्राचे शब्दांकन किंवा मनाच्या भावावस्थेचे चित्रण केले आहे. त्यांच्या 'तळ्याकाठी' आणि 'जुई' या दोन दशपदी कविता खूप गाजल्या. मा.अनिल यांच्या दशपदींमध्ये मुख्यतः एखाद्या निसर्गचित्राचे शब्दांकन किंवा मनाच्या भावावस्थेचे चित्रण केले असे. अनिल यांना १९७९ ची साहित्य अकादमीची फेलोशिप प्रदान करण्यात आली होती. कवी अनिल यांचे निधन ८ मे १९८२ रोजी झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

  • संपदा जोगळेकर-कुलकर्णी

    मुंबई विद्यापीठातून एम.ए. ही पदवी संपादित केलेल्या संपदा जोगळेकर ह्या सध्या पुणे विद्यापीठात पी.एच.डी. करत आहेत. त्यांनी आपले शिक्षण मो.ह. विद्यालय व जोशी बेडेकर महाविद्यालय येथून पूर्ण केले. संपदा जोगळेकर यांनी आजपर्यंत १५ दूरदर्शन मालिका, पाच दैनंदिन मालिकातसेच “शर्यत”व “उदय” या दोन चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे.

  • हळुवार मनाचा कलंदर माणूस

    संगीतकार सी. रामचंद्र अर्थात 'अण्णा' यांच्याबद्दलचे सुप्रसिद्ध पण विखुरलेले किस्से एकत्र गुंफले की एक विलक्षण असं मिश्रण तयार होतं. वेगवेगळ्या रंगांची वेगवेगळ्या झाडांवरची फुलं एका गुच्छात बांधली की त्याचं बहुरंगीपण जसं आकर्षक होतं तसंच !

    "पतंगा" या चित्रपटाची गाणी तयार होत असताना 'राजेंद्रकृष्ण' यांनी एक ओळ लिहीली, 'ओ दिलवालॊ दिलका लगाना अच्छा है' ! खरं म्हणजे किती छान आणि सरळ अर्थ होता या ओळीचा! पण शेजारी बसलेल्या अण्णांना गंमत करायची लहर आली . ही ओळ एेकून, हातातल्या ग्लासकडे पहात, अण्णा खट्याळपणे म्हणाले, "पर कभी कभी! मग काय विचारता? गाण्याचा सगळा नूरच एकदम पालटून गेला ... "किसीकी खातिर जान जलाना अच्छा है - पर कभी कभी!" "दिलमें किसीका प्यार बसाना अच्छा है - पर कभी कभी" ...... अण्णांच्या चेष्टेखोर स्वभावामुळे एका धमाल गाण्याचा जन्म झाला.

    "चित्रपटाची सगळीच्या सगळी गाणी (आणि पार्श्वसंगीत) दहा दिवसात तयार झाली पाहिजेत" या "आजाद"च्या निर्मात्याच्या 'आदेशा'चं पालन करण्यासाठी सी. रामचंद्र व राजेंद्रकृष्ण मद्रासला रवाना झाले खरे पण या दोघांनी पहिले नऊ दिवस 'आवडत्या छंदा'त बुडवले ! निर्माते टेन्शनमधे ! मग शेवटच्या दिवशी (म्हणजे रात्री) जोडी 'बसली'! नऊ सुंदर गाणी जन्मली ! निर्माते टेन्शनमधून 'आजाद' आणि श्रोते गाण्यांच्या माधुर्यात कायमचे "कैद!"

    बरं अश्या 'बिनधास्त- 'हॅपी-गो-लकी'- वृत्तीच्या माणसाला 'perfection' शी काय देणं घेणं असं आपल्याला वाटतं . पण इथं अण्णा आपल्याला चकवतात.

    मोहोब्बत ही न जो समझे या तरल गाण्याचं रेकॉर्डिंग, तलतच्या तलम आवाजात पूर्ण झालं होतं. शूटिंग मात्र नंतर होतं. सी रामचंद्र सहज सेटवर गेले तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की हा सेट गाण्याच्या चालीशी पूर्णपणे विसंगत आहे. शांतारामबापूंनी तर सेटवर बराच पैसा खर्च केला होता. सेट बदलायचा तर त्यांचा पैसा वाया जाणार होता. पण सी रामचंद्रनी गाण्याची चाल व सेट यातली विरुपता "बापूंना" पटवली आणि पूर्ण सेट बदलायला लावला.

    कधी कधी 'खट्याळ युक्त्या' योजून ते स्वतःला हवं ते साध्य करत. "साजन" या चित्रपटातली गाणी नायक 'अशोककुमार'ने म्हणू नयेत असं त्यांना मनापासून वाटत होतं. पण अशोककुमार पडला सुपरस्टार! त्याला ही गोष्ट सांगायची कोणाची हिंमत नव्हती. शेवटी अण्णांनी शक्कल लढवली. 'अशोककुमार'च्या वेगवेगळ्या शूटिंगच्या तारखा मिळवल्या आणि गाण्याची रेकॉर्डिंगज् बरोबर त्याच तारखांना ठरवू लागले . रेकॉर्डिंगला दरवेळी 'नाही' म्हणणं अशोककुमारला अवघड वाटू लागलं तेव्हा तो वैतागून म्हणाला, 'दुसऱ्या कोणाकडून तरी गाऊन घ्या'. अण्णांना हेच हवं होतं. त्यांनी 'आज्ञाधारकपणे' रफीच्या आवाजात गाणी रेकॉर्ड केली.

    पण हा कलंदर माणूस 'आतून' खूप हळवा होता. नौशादजी गंभीर आजारी होते तेव्हा सी रामचंद्र त्यांना म्हणाले, 'तुम्ही लवकर बरे ह्वावं म्हणून मी रोज आमच्या देवाला प्रार्थना करतो'. तेव्हा नौशाद म्हणाले की त्यापेक्षा मी लवकर 'जावं' अशी प्रार्थना करा म्हणजे माझी वेदनांतून सुटका होईल आणि त्याचबरोबर तुमची 'competition' सुद्धा कमी होईल. अण्णा म्हणाले, अहो पण तुम्ही आहात म्हणून तर आमच्या हातून काही चांगली निर्मिती होते - तुमच्या समोर टिकाव लागावा म्हणून ! तुम्ही गेलात तर आम्ही आळशी होऊ!' हे ऐकून नौशाद गहिवरले !

    लताबरोबर वितुष्ट आल्यावर सी रामचंद्र यांच्या अनेक मित्रांनी त्यांना सुचवलं की त्यांनी लताशी 'समझोता' करावा. 'जी गोष्ट एस् डी बर्मन आणि शंकर यांनी केली ती अण्णांनी का करु नये?' पण अशा वेळी त्यांचा 'मोडेन पण वाकणार नाही' हा बाणा जागृत व्हायचा आणि ते उसळून म्हणायचे, 'समझोता तर तिने केला पाहिजे . मी तह करायला तिनं मला घडवलेलं नाही - मी तिला घडवलयं!' कदाचित, लता किती उंचीवर पोहोचली आहे हे त्यांना कळूनही वळलं नसावं.

    या ब्रेकअप नंतर काही वर्षांनी घडलेला प्रसंग :
    अनिल बर्वे एका संध्याकाळी अण्णांना भेटायला त्यांच्या घरी गेले होते. अण्णा एकटेच बसले होते. समोर टेबलावर त्यांची आवडती 'बॅगपाईपर' होती. पण ते नेहमीच्या मूडमधे नव्हते. उदास वाटत होते. बर्वेनी विचारलं, 'अण्णा, काय झालं ?' तेव्हा म्हणाले, 'अरे गळ्याच्या उपचारांसाठी लता लंडनला गेलीय. खूप काळजी वाटतेय रे ! या जगात गाणारे गळे खूप आहेत पण शहनाईचा स्वर फक्त लताच्या गळ्यात आहे !' अण्णांमधल्या सच्च्या कलावंताचं दर्शन घडवणारे हे उद्गार आहेत !

    लता-सी रामचंद्र वितुष्टाचा 'फायदा' मिळावा या हेतूने एका मासिकाचे उपसंपादक अण्णांकडे आले व म्हणाले, 'लतापेक्षा आशा श्रेष्ठ आहे' यावर मी एक फीचर करत आहे, तुम्ही बोला त्यात'!
    तेव्हा, 'तुम्हाला संगीतातलं काडीइतकं सुद्धा समजत नाही' असं म्हणून अण्णांनी त्यांची बोळवण केली.

    अण्णा 'साई-सावली' मध्ये रहायला आल्यावर प्रभाकर मोने गमतीने म्हणाले, "अहो तुमचा फ्लॅट चौथ्या मजल्यावर ! जिना अरुंद , लिफ्ट नाही! वर माणूस मेला तर 'बॉडी' खाली आणणं पण अवघड".

    अण्णा नेहमीच्या 'श्टाईल'मधे म्हणाले, "पर भैय्या हम तो बाहर के बाहरही मरके जानेवाले है" .. आणि त्यांनी आपला शब्द पाळला. डिसेंबर 1981 च्या शेवटच्या आठवड्यात, के.ई.एम्. मध्ये अॅडमिट झालेल्या अण्णांनी 5 जानेवारी 1982 या दिवशी हॉस्पिटलमधेच प्राण सोडला. त्यांचं शव अंत्यदर्शनासाठी साई-सावलीत खालीच ठेवलं आणि हजारो चाहत्यांचा सोबतीनं सरळ 'चंदनवाडी'कडे रवाना झालं.

    -- धनंजय कुरणे
    कोल्हापूर

    9325290079