(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

  • मराठी अभिनेत्री दिपाली सय्यद

    दिपाली सय्यद म्हणजेच दिपाली भोसले लग्ना नंतर ती दिपाली सय्यद झाली. तिचा जन्म १ एप्रिल १९७८ रोजी पाटणा, बिहार येथे झाला. सुरवातीपासुनच एक अभिनेत्री होण्याचे तिचे स्वप्न होते. दिपाली सय्यदचे बालपण मुंबईत गेले. दिपालीने नालंदा विद्यापीठातुन फाईन आर्ट्सची पदवी संपादन केलेली आहे. अभिनय क्षेत्रातील तिचा प्रवास मालिकांमधुन सुरु झाला. बंदीनी, समांतर या तिच्या अभिनय कारकिर्दीतील सुरवातीच्या मालिका. त्यानंतर अनेक चित्रपट, मालिका, शोज, नाटक, टिव्ही शोज, जाहिराती यातुन ती सातत्याने झळकत राहिली.

    दिपाली जाऊ तिथे खाऊ, चश्मेबहाद्दर, लग्नाची वरात लंडनच्या दारात या चित्रपटांमधील तिच्या भुमिकांसाठी विशेष करुन ओळखली जाते. मात्र तिला खऱ्या अर्थाने लोकप्रियता जत्रा चित्रपटातील ये गो ये मैना.. या गाण्यातून मिळाली. करायला गेलो एक, लाडी गोडी, होऊन जाऊ दे, मला एक चानस हवा, ढोलकीच्या तालावर, वेलकम टु जंगल, हे मिलन सौभाग्याचे, माझ्या नवर्याची बायको, उचला रे उचला, काय करु न कसं करु, दुर्गा म्हंत्यात मला, काळशेकर आहेत का ?, मास्तर एके मास्तर, मुंबईचा डबेवाला, सासु नंबरी जावई दस नंबरी हे तिचे तिने अभिनय केलेले इतर चित्रपट. तर दुर्वा, अफलातुन या हिंदी मालिकांमधुनही ती चमकली आहे. याशिवाय तिने आतापर्यंत पाच सहा भोजपुरी चित्रपटातून भूमिका साकारल्या आहेत.

    ३१ मे २००८ रोजी दिपाली दिग्दर्शक बॉबी खान यांचेबरोबर विवाहबध्द झाली असुन लग्नानंतरचे तिचे नांव सोफीया जहांगीर सय्यद असे आहे. दिपालीने अहमदनगर मतदार संघातुन सन २०१४ मध्ये निवडणुक लढवलेली होती. दिपाली सय्यदने नगर जिल्ह्यातील “गुंडेगाव ” या ठिकाणी ‘दिपाली सय्यद-भोसले फाऊंडेशन’च्या माध्यमातून वृद्ध आणि अनाथ मुलांसाठी आश्रम उभारले आहे.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • संपादक विनायक सदाशिव वाळिंबे

    विचारवंत पत्रकार, अभ्यासू संपादक विनायक सदाशिव वाळिंबे यांचा जन्म ११ ऑगस्ट १९२८ रोजी झाला.

    विनायक सदाशिव वाळिंबे उर्फ वि. स. वाळिंबे उभ्या महाराष्ट्राला माहीत आहेत ते विचारवंत पत्रकार, अभ्यासू संपादक आणि मुख्य म्हणजे म्हणजे ‘पुलं’च्या शब्दांत सांगायचं झालं तर अत्यंत ‘वाचनीय लेखक’ म्हणून! या दोनच शब्दांत ‘पुलं’नी त्यांच्या सर्व लेखनाचं सार सांगितलंय. उमेदवारीचा काळ ‘अग्रणी’ दैनिकात, ‘रोहिणी’ मासिकात, नंतर ‘प्रभात’ आणि ‘ज्ञानप्रकाश’ वृत्तपत्रात काढल्यानंतर, वाळिंबे यांनी आपल्या पत्रकारितेचा महत्त्वाचा सर्व काळ पुण्यात ‘केसरी’ वृत्तपत्रात काढला. त्यांच्या सुहृदांनी त्यांच्यावर लिहिलेल्या लेखांचा संग्रह ‘उमदा लेखक, उमदा माणूस’ या नावाने प्रसिद्ध आहे. त्याचं संपादन डॉ. अरुणा ढेरे यांनी केलं आहे.

    गरुडझेप, हिटलर, इंदिरा गांधी बंगलोर ते रायबरेली, इस्रायलचा वज्रप्रहार, नेताजी, ऑपरेशन थंडर, पराजित-अपराजित, सत्तावन्न ते सत्तेचाळीस, सावरकर, श्री शिवराय, स्टॅलिनची मुलगी, व्होल्गा जेव्हा लाल होते, १९४७, वॉर्सा ते हिरोशिमा, स्वातंत्र्यवीर अशी त्यांची अनेक पुस्तकं प्रसिद्ध आणि वाचकप्रिय आहेत. वि. स. वाळिंबे यांचे २२ फेब्रुवारी २००० रोजी निधन झालं.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • मराठी चित्रपट दिग्दर्शक उमेश कुलकर्णी

    समाजातील घटनांवर तिरकस कटाक्ष टाकत विनोदाची शैली हाताळणारा उमदा मराठी चित्रपट दिग्दर्शक म्हणजे उमेश कुलकर्णी. चाकोरीबाहेरचे काहीतरी करतानाच मनोरंजनाचा बाज न बिघडवता चित्रपट रंगवण्यात त्यांचा हातखंडा आहे.

  • पोर्तुगीज सत्तेला खिंडार पाडणारे वीर चिमाजी अप्पा

    १७ फेब्रुवारी १७३९ रोजी मराठ्यांनी चिमाजी अप्पाच्या नेतृत्त्वाखाली खुद्द वसईवर चाल केली. चालून येत असलेली फौज पाहून पोर्तुगीजांनी आपली शिबंदी वसईच्या किल्ल्यात घेतली व वसईचा वेढा सुरू झाला. मराठ्यांनी शिताफीने पूर्ण किल्ल्याभोवती घेरा घातला व किल्ल्याची पूर्ण नाकेबंदी करून टाकली.

  • संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ गायिका-अभिनेत्री विदुषी कीर्ती शिलेदार

    वयाच्या दहाव्या वर्षी शिलेदारांच्या ‘त्रिपात्री’ ‘सौभद्र’ पासून कीर्ती शिलेदारांचे संगीत रंगभूमीवर पदार्पण झाले. ‘संगीत सौभद्र’ या नाटकातील नारदाची भूमिका त्यांनी प्रथमच केली आणि रसिक प्रेक्षकांची मने जिंकली. संगीत आणि अभिनय याचे धडे घेत असतानाच आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मराठी या विषयातील ‘बी.ए. ‘ची पदवीही कीर्ती शिलेदार यांनी मिळविली.

  • अभिनेते टॉम अल्टर

    ज्येष्ठ चित्रपट, टीव्ही आणि नाट्य अभिनेते टॉम अल्टर यांचा जन्म २२ जून १९५० मसुरी येथे झाला. सोनेरी केस, निळे डोळे आणि टॉम अल्टर या नावामुळे चटकन अमेरिकन किंवा ब्रिटिश वाटणारा हा ज्येष्ठ अभिनेता-लेखक जन्माने आणि मनाने मात्र पक्का भारतीय होता.

  • केशव तानाजी मेश्राम

    ७८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, कथालेखक, कादंबरीकार, कवी आणि समीक्षक असणारे केशव तानाजी मेश्राम यांचा जन्म २४ नोव्हेंबर, १९३७ रोजी अतिशय गरीब कुटुंबात झाला. बालपण अत्यंत कष्टात गेले.

  • ठुमरी विश्वाची सम्राज्ञी शोभा गुर्टू

    शोभा गुर्टू ह्या शास्त्रीय संगीतात पारंगत तर होत्याच, परंतु उपशास्त्रीय संगीत गायकीवर त्यांचे विशेष प्रभुत्व होते. त्यांचे अभिनय अंगाने ठुमरी गायन रसिकप्रिय होते. त्यांचा जन्म ८ फेब्रुवारी १९२५ रोजी झाला.लोकांनी त्यांना 'ठुमरी सम्राज्ञी' म्हणून नावाजले होते. शोभा गुर्टूंचे लग्नाअगोदरचे नाव भानुमती शिरोडकर. संगीताचे प्रारंभिक शिक्षण त्यांना आपली आई व नृत्यांगना मेनकाबाई शिरोडकर यांचेकडून मिळाले. मेनकाबाईंनी गाण्याचे शिक्षण जयपूर घराण्याच्या उस्ताद अल्लादिया खान यांचेकडून घेतले होते. शोभाताईंचे शास्त्रीय संगीताचे औपचारिक शिक्षण त्या लहान असतानाच उस्ताद भुर्जी खान यांचेकडे सुरू झाले. ते उस्ताद अल्लादिया खानांचे धाकटे सुपुत्र होत. शोभाताईंची ग्रहणशक्ती व प्रतिभा यांमुळे भुर्जी खानांच्या कुटुंबाने ह्या मुलीस आपल्या परिवाराचा जणू हिस्साच बनविले. नंतर त्या उस्ताद नथ्थन खानांकडे संगीत शिकू लागल्या. उस्ताद घम्मन खान हे शोभाताईंच्या आईला, मेनकाबाईंना त्यांच्या मुंबई येथील घरी ठुमरी - दादरा व इतर उपशास्त्रीय संगीताचे प्रकार शिकवायला यायचे. त्यांच्याकडेही शोभाताई संगीत शिकल्या.

    ठुमरी, दादरा, कजरी, होरी, चैती इत्यादी उपशास्त्रीय संगीत प्रकार हे शोभाताईंची खासियत होते. आपल्या गायनात शास्त्रीय संगीतातील आलापी त्या खुबीने वापरत असत. गायिका बेगम अख्तर व उस्ताद बडे गुलाम अली खान यांच्या गायकीचा त्यांच्यावर विशेष प्रभाव होता. शोभाताईंच्या ठुमरी गायनाचे असंख्य चाहते होते. त्यांनी मराठी व हिंदी भाषा चित्रपटांतही पार्श्वगायन केले होते. त्यांनी सर्वप्रथम ज्या हिंदी चित्रपटासाठी पार्श्वगायन केले तो म्हणजे कमाल अमरोहींचा पाकिजा (१९७२) होय. फागुन (१९७३) मध्ये त्यांनी 'बेदर्दी बन गए कोइ जाओ मनाओ सैंयां' हे गीत गायले. मैं तुलसी तेरे आँगन की (१९७८) साठी त्यांनी गायलेल्या 'सैंया रूठ गए' गाण्याबद्दल त्यांना फिल्मफेअरचे उत्कृष्ट पार्श्वगायिकेचे नामांकन मिळाले होते. 'सामना' व 'लाल माती' ह्या मराठी चित्रपटांसाठी त्यांनी पार्श्वगायन केले होते. गझल, मराठी नाट्य संगीत या गायन प्रकारांतही त्यांनी श्रोत्यांची दाद मिळविली. त्यांच्या अनेक ध्वनिमुद्रिका प्रकाशित झाल्या आहेत. २७ सप्टेंबर २००४ रोजी शोभा गुर्टू यांचे निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

  • एस.डी. उर्फ सचिन देव बर्मन

    "महान" या एकाच शब्दात ज्यांचे वर्णन करता येईल असे संगीतकार सचिन देव बर्मन उर्फ एस.डी. त्यांचा जन्म १ ऑक्टोबर १९०६ रोजी झाला. एस.डी. बर्मन सर्वार्थाने दादाच होते. खरं म्हणजे त्रिपुराच्या राजघराण्यात वाढलेल्या सचिनदाना संगीताची गोडी लागावी आणि त्या अंकुराचा .वटवृक्ष व्हावा हा एक अद्भुत चमत्कार होता पण तो घडला! आकाशात बसलेल्या गंधर्वमंडळींना कदाचित त्या राजपुत्राच्या प्रतिभेची कल्पना असावी, म्हणूनच राजघराण्याच्या विरोधात जाऊन गाणे शिकण्याचे धाडस त्यांनी दाखवले. १९३० च्या दशकात त्यांनी रेडिओ आणि बंगाली संगीतात भरपूर मुसाफ़िरी केली आणि १९४४ मध्ये अशोक कुमारांच्या काही चित्रपटांसाठी संगीत देण्यासाठी मुंबई गाठली. पुढील काही वर्षात त्यांना यश मिळालेही पण हळव्या मनाच्या बर्मन दादांना मुंबईची स्पर्धा रुचली नाही आणि ते .कलकत्त्याला परत जाण्यासाठी अगदी रेल्वेमध्ये बसलेही होते पण तसे होणे नव्हते, त्याना मनधरणी करून परत नेण्यात आले आणि पुढचा इतिहास आहे!

    देव आनंदच्या नवकेतन बॅनर साठी सचिनदांनी पहिल्यांदा 'अफसर' ला संगीत दिले आणि पुढची चोवीस वर्षे नवकेतनचा चित्रपट आणि बर्मनदांचे संगीत हे समीकरण बनले. बाजी, जाल, टॅक्सी ड्रायवर, मुनिमजी, पेयिंग गेस्ट, सोलवा साल, काला बाजार, बात एक रात की, तेरे घर के सामने, गाईड, ज्वेल थीफ, प्रेम पुजारी.. पन्नास आणि साठच्या दशकामधले हे सुमधुर संगीत असलेले चित्रपट, एका पेक्षा एक सुंदर सांगीतिक अनुभव आहेत! सचिनदांचे संगीत काळाच्या चौकटीत कधीच बसणारे नव्हते. जितका त्यांची शास्त्रीय संगीतावर आणि बंगाली लोकसंगीतावर पकड होती, तितकेच त्यांचे वेस्टर्न वरती प्रेम होते, त्यांचे संगीत प्रवाही होते म्हणून आजही ते आउटडेटेड वाटत नाही. त्यांच्या संगीतामध्ये मूड्स दडलेले असतात, एकाच चित्रपटात ते विविध .जॉनर वेगवेगळ्या मूड्स मध्ये वेगवेगळ्या गायकांकडून गाउन घेत, त्यामुळे त्यांचे संगीत कधीच एकसुरी झाले नाही.

    हरहुन्नरी किशोर कुमारला त्यानी देवचा आवाज बनवला. किशोर कुमारला आराधना मधून त्यांनीच शिखरावर नेऊन बसवले पण ब्लॅक अँड व्हाईट स्क्रीनवरचा देव आणि त्याला किशोरचा आवाज - अतुलनीय! पेईंग गेस्ट मधले खट्याळ 'छोड दो आंचल' असो किंवा तीन देवीया मधले चार्मिंग 'ख्वाब हो या कोई हकिकत', देवचा नायिकेभोवती पिंगा घालणारा नायक किशोरने अचूक टीपला!
    मोहम्मद रफी हा देवाने केवळ स्वतः गाता येत नसावे म्हणून आपल्यासाठी पाठवलेला देवदूत होता. सचिनदानी जर देवच्या हॅपी गो लकी इमेज साठी किशोरला वापरले असेल तर 'अपसेट' देव साठी रफी साहेबांइतका तरल आवाज स्वाभाविक होता. गाईड मधले अजरामर गायकीचा नमुना असलेले 'दिन ढल जाए' असो की आशा भोसले सोबतचे 'अच्छा जी मैं हारी चलो मान जाओ ना' असो, रफी साहेबानी त्यांच्या गळ्यातली नशीली तार देव साठीच राखून ठेवली होती! हिंदी सिनेसंगीतामधली काही अजरामर डुयेट्स 'दिल पुकारे आरे आरे', 'तेरे मेरे सपने' असो किंवा बेधुन्द 'खोया खोया चांद' असो पडद्यावरचा देव आणि दैवी आवाजात गाणारे रफी - आजही 'सिनॉनिमस' आहेत. हेमंतकुमारांना हिंदीत आणण्याचे श्रेयही सचिनदांना जाते - देव साठी!

    सोलवा साल मधले 'हैं अपना दिल तो आवारा' आणि ती हारमॉनिका किंवा 'बात एक रात की' मधले हॉँटिंग 'ना तुम हमे जानो', हेमंतदाच्या खर्जातल्या आवाजाला बर्मदानी देवआनंद साठी अचूक वापरले. जरी रफी आणि किशोर देव आनंदसाठी ठरलेले आवाज होते तरी सचिनदानी गाण्याला भाव देणारे गायकच नेहमी वापरले. 'टॅक्सी ड्रायवर' मधले तलत मेहमूदच्या तरल गळ्यातले 'जाए तो जाए कहाँ' दुसर्या कुणी इतक्या उत्कटतेने कदाचितच गायले असते. सचिनदा आणि देव आनंद यांची गाणी म्हणजे वेगवेगळ्या इमोशन्सचा रंगीबेरंगी कॅनव्हास आहे. बाजी साठी साहिर लुधियानवि ने एक सुंदर गजल लीहली होती - सचिनदानी तिला क्लब सॉँग बनवले, पण काय बनवले .. 'तद्बीर से बिगडी हुई तक्दीर बना ले, अपने पे भरोसा है तो यह दाव लगा ले' . पदार्पणापासून अखेरपर्यंत आघाडीवर राहिलेले एस.डी.बर्मन एकमेव संगीतकार असावेत. किशोरकुमार यांना सर्वप्रथम पार्श्वीगायनाची संधी दादा बर्मन यांनीच दिली. ते किशोरदांना आपला दुसरा पुत्र मानत. किशोरदा व महमद रफी या अत्युच्च शिखरावरील पार्श्वंगायकांना जवळजवळ समान संख्येत गीते देणारेही ते एकमेव संगीतकार होत. देव आनंद हे त्याचे ठळक उदाहरण होय. ‘मिली’ चित्रपटातील ‘बडी सुनी सुनी है’ हे सचिनदा रुग्णालयात असताना ध्वनिमुद्रित झालेले गीत किशोरदांच्या काही सर्वोत्कृष्ट गीतांपैकी एक आहे. सचिनदांनी १४ हिंदी आणि १३ बंगाली चित्रपटांसाठी पार्श्वागायन केले. एस.डी. बर्मन यांचे ३१ ऑक्टोबर १९७५ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट / Ganesh Shelke

    एस.डी.यांची काही गाणी
    https://www.youtube.com/watch?v=q21zbX-NHy0

  • चित्रकार दीनानाथ दलाल

    दलाल १९३८च्या सुमारास बा. द. सातोस्कर यांच्या सागर प्रकाशनासाठी काम करू लागले. मामा वरेरकर यांच्या ‘वैमानिक हल्ला’ या पुस्तकासाठी दलालांनी पहिले मुखपृष्ठ केले. त्याच टिपणात नेमकेपणाने म्हटले आहे, पुस्तकाची मुखपृष्ठे आणि आतील चित्रे म्हणजे, फक्त सजावट नसते, तर पुस्तकाचा आशय दृश्य प्रतिमांनी समृद्ध करणारी, पुस्तकाला व्यक्तिमत्त्व देणारी, पुस्तकाशी संवादी अशी ती नवनिर्मिती असते. याची जाणीव दलालांच्या मुखपृष्ठांनी प्रथम दिली.