जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
डॉ. मेधा मेहेंदळे हे आयुर्वेदिक औषध क्षेत्रातील एक अग्रगण्य नाव. तन्वी या ब्रॅन्डनेम खाली त्यांनी बनविलेली औषधे आज महाराष्ट्रातल्या घराघरात पोहोचली आहेत.
May 3, 2014
पत्रपंडित प्रभाकर पाध्ये यांची पत्नी असलेल्या कमल पाध्ये यांनी “बंध अनुबंध” या दर्जेदार आत्मचरित्राद्वारे कधीही पुसली न जाणारी ओळख व किर्ती प्राप्त केली. त्यांच्या विलोभनीय लेखनकौशल्यांद्वारे त्यांनी त्यांच्या जीवनात त्यांना आलेले अनुभव, व त्यांच्या पतीदेवांच्या गुणदोषांवर अचूक टिपणी यांची सुरेख गुंफण साधत, या कादंबरीला साहित्य विश्वात एका उंचीवर नेऊन ठेवले होते.
दैनिक गावकरी च्या पुरवणीवरुन संपादित
January 3, 2015
राक्षसी महत्वाकांक्षा ‘ ह्या नाटकासाठी गोव्यात मुद्दाम दत्तोबा भोसले यांना आणले. ते केशवराव भोसले यांचे बंधू होते. त्यावेळी ‘ कंदन ‘ ची भूमिका मामांना आयत्या वेळी करावी लागली. मामांचे काम पाहून दत्तोबा भोसले इतके खूष झाले की त्यांनी मामांना आनंदाने खांद्यावर घेऊन रंगपटात नेले .
September 12, 2021
ग.रा.कामत यांनी मराठीत राजा परांजपे, राजा ठाकूर यांच्या चित्रपटासाठी काम केले. त्यांनी लिहिलेले ‘पेडगावचे शहाणे’, ‘शापित’ हे मराठी चित्रपट खूप गाजले.कन्यादान हा त्यांचा आणखी एक गाजलेला मराठी चित्रपट. ‘सावरकर’ चित्रपटाचेही सुरवातीचे लेखन त्यांनी केले होते, द.ग.गोडसे आणि म.वि.राजाध्यक्ष यांच्या लेखांचं संकलन व संपादन केलेले ‘शमानिषाद’ हे कामत यांचे पुस्तक प्रकाशित झाले आहे.
March 13, 2022
इटावा घराण्याचे आंतरराष्ट्रीय सतार वादक उस्ताद शाहिद परवेझ यांचा जन्म १४ ऑक्टोबर १९५८ रोजी झाला. ते इटावा घराण्याचे सातव्या पिढीचे प्रतिनिधीत्व करतात. ते भारतात सर्वात सुप्रसिद्ध तरुण सतार वादक, मानले जातात. मुंबईत जन्मलेले शाहिद परवेझ यांचे वडील अजीज खान हे सुद्धा इटावा प्रतिनिधित्व करत असत.
शाहिद परवेझ यांचे आजोबा सतार आणि सूरबहार वादक उस्ताद वहीद खान. अजीज खान यांनी शाहिद परवेझ यांना पहिले अनेक वर्ष आधी तबला प्रशिक्षण दिले व नंतर सतारीचे प्रशिक्षण.
शाहिद परवेझ यांनी देशात आणि अमेरिका, युरोप, युएसएसआर, कॅनडा, आफ्रिका, मध्य-पूर्व आणि ऑस्ट्रेलिया मध्ये अनेक मैफिली केल्या आहेत. भारत सरकारने शाहिद परवेझ यांना पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवले आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
November 7, 2017
मोगॅम्बो खूश हुआ'...'त्या' भारदस्त आवाजातील हे तीन शब्द कानांवर पडले की समोरच्याचा थरकाप झालाच म्हणून समजा. त्यांचा जन्म २२ जून १९३२ रोजी झाला. 'मि. इंडिया' या सिनेमात मा.अमरिश पुरी यांनी साकारलेली मोगॅम्बोची व्यक्तिरेखा विसरणे केवळ अशक्य. अशा एकापेक्षा एक सरस खलनायकी व्यक्तिरेखा, चरित्र भूमिका साकारणारे मा.अमरीश पुरी हे जुन्या काळातले प्रसिद्ध हिंदी चित्रपट कलाकार मा.मदन पुरी यांचे धाकटे भाऊ. अमरीश यांना हिंदी चित्रपटांमध्ये नायक बनायचं होतं म्हणून त्यांनी पंजाब सोडून मुंबई गाठली. मोठ्या भावाने सरळ सांगितलं की मी अजिबात मदत करणार नाही, जे काही या क्षेत्रात करायचं ते स्वतःच्या जोरावर करायचं.
नायक बनण्याच्या अमरीश यांच्या प्रयत्नांना यश मिळालं नाही. मग त्यांनी पृथ्वी थिएटर्समधल्या नाटकांमध्ये कामं करायला सुरुवात केली. तिथे मोठ्या दिग्दर्शकांकडे त्यांनी काम केलं. अगदी इंदिरा गांधी, अटल बिहारी वाजपेयी अमरीश यांची नाटकं बघायला आवर्जून येत. मग हळूहळू अमरीश यांनी आपला मोर्चा परत एकदा हिंदी चित्रपटांकडे वळवला. सुरुवातीलाच चांगल्या दिग्दर्शकांचे चित्रपट अमरीश यांना मिळू लागले आणि हळूहळू त्यांनी आपले पाय हिंदी चित्रपटात घट्ट रोवायला सुरुवात केली. त्यांच्या कारकिर्दीबद्दल नव्याने लिहायची काहीच आवश्यकता नाही. भारदस्त आवाज, भेदक नजर आणि करारी, देखणे रुप असलेले मा. अमरिश पुरी यांनी हिंदी सिनेमासृष्टीवर अनेक वर्षे राज्य केले. मा.अमरिश पुरी यांना बॉलिवूड सिनेमांमध्ये हीरो बनायचे होते. मात्र त्यांच्या नशीबात काही वेगळेच लिहिले होते. ते हीरो नाही मात्र बॉलिवूडमधील प्रसिद्ध खलनायक बनले. अमरिश पुरी यांनी आपल्या तीस वर्षांच्या कारकिर्दीत सर्वाधिक नकारात्मक भूमिका साकारल्या.
पाश्चिमात्य प्रेक्षकांमध्येही अमरिश पुरी लोकप्रिय अभिनेते आहेत. स्टीवन स्पिलबर्ग यांच्याबरोबरील 'इंडियाना जोन्स' या हॉलिवूड सिनेमातील मोला रामची भूमिका आणि 'टेंपल ऑफ डूम' या सिनेमातील भूमिकेसाठी प्रेक्षक त्यांना कधीही विसरु शकत नाही. त्यांची खलनायकाची प्रतिमा सामान्य नागरिकांमध्ये एवढी परिणामकारक बनली होती की त्यांच्या मुलाचे मित्र जेव्हा घरी येत तेव्हा अमरीश यांच्यासमोर नुसतं जायलाही घाबरत असत. खऱ्या आयुष्यात मात्र अमरीश अतिशय साधे, मन मिळावू, मृदू स्वभावाचे, आपल्या कुटुंबात रमणारे असे होते. आपल्या वडिलांविषयी राजीव पुरी यांनी एका मुलाखतीत सांगितले होते, की ''पापा तारुण्याच्या काळात हीरो होण्यासाठी मुंबईत आले होते. त्यांचे थोरले बंधू मदन पुरी सिनेसृष्टीत कार्यरत होते. निर्मात्यांनी त्यांना सांगितले, की त्यांचा चेहरा हीरोसारखा नाहीये. त्यामुळे ते खूप निराश झाले होते. मा.अमरिश पुरी यांचे १२ जानेवारी २००५ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट
January 12, 2018
प्राथमिक शिक्षण तिथेच घेऊन पुढे मा.दिनकर पाटील हे माध्यमिक शिक्षणासाठी कोल्हापूरला आले. कोल्हापूरला ते आपल्या मामाकडे राहात. त्यांचा जन्म ६ नोव्हेंबर १९१५ रोजी कोल्हापूर जिल्ह्यातल्या चिकोडी तालुक्यातील बेनाडी या गावात झाला. दिनकररावांचे वडील दत्ताजीराव हे कोर्ट-कचेरीच्या कामासाठी कायम फिरस्तीवर असत. कोल्हापुरात त्या वेळी राजाराम हायस्कूल, प्रायव्हेट हायस्कूल, सिटी हायस्कूल व विद्यापीठ हायस्कूल अशा शाळा होत्या. दिनकर द. पाटील यांचा वडीलांना विद्यापीठ हायस्कूलचे ‘भक्ती ईश्वेराची-सेवा मानवाची’ हे ब्रीदवाक्य इतके आवडले, की त्यांनी दिनकरचे नाव त्याच शाळेत घातले. या शाळेत त्या वेळी मा.विनायक व मा.गजानन जागीरदार हे शिक्षक होते. मा. विनायक विद्यार्थ्यांना देशप्रेमाच्या कविता शिकविताना एखाद्या जहाल देशभक्ताप्रमाणे विलक्षण तेजाने तळपत. त्यांनी विद्यार्थ्यांना कवितेची गोडी लावली व त्यांच्यावर ‘साहित्याचे संस्कार’ घडविले. त्या काळात शाळा-कॉलेजातील सर्व विद्यार्थ्यांचे आवडते लेखक होते - वि. स. खांडेकर आणि ना. सी. फडके. विद्यापीठ हायस्कूलमधील साहित्याने झपाटलेले ‘साहित्यप्रेमी’ दर रविवारी विनायकांच्या घरी जमत. मा. विनायक त्यांना ‘किलरेस्कर’ मासिकात छापून आलेल्या फडके-खांडेकरांच्या कथा वाचून दाखवत. अशा प्रकारे दिनकरमधला साहित्यिक मा. विनायकांनी घडविला. पुढे उच्च शिक्षणासाठी दिनकरने राजाराम कॉलेजात प्रवेश घेतला. तिथे कादंबरीकार ना. सी. फडके व ‘प्रेमाचे शाहीर’ कवी माधवराव पटवर्धन ऊर्फ माधव ज्यूलियन त्यांना शिकवायला होते. त्यांच्या प्रेरणेने दिनकर लिहायला लागला.
राजाराम कॉलेजच्या ‘राजारामियन’ या मासिकाचे संपादक म्हणून त्यांनी काम केले. विद्यार्थीदशेतच त्यांनी सेवक, सत्यवादी अशा कोल्हापूरच्या वर्तमानपत्रातून लिहायला सुरुवात केली आणि लवकरच ‘किलरेस्कर’ मासिकाच्या कथास्पर्धेत दिनकरला ‘एरिना’ या कथेसाठी पहिला पुरस्कार मिळून तो मान्यवर लेखक झाला. याच सुमारास दिनकर ‘शारदा मंडळ’ नावाची एक साहित्य संस्था चालवित होते. त्या संस्थेने एकदा मुलींची वक्तृत्व स्पर्धा ठेवली. त्या स्पर्धेत मुलींच्या शाळेतली सुमन शिंदे नावाची विद्यार्थिनी पहिली आली. दिनकर ‘शारदा मंडळा’चे प्रमुख असल्यामुळे, त्यांचा सुमनशी परिचय झाला. पुढे तो इतका वाढला, की दिनकर चक्क सुमनच्या प्रेमात पडला आणि त्याने तिच्याशी लग्न करायचे ठरवले. दिनकरच्या वडिलांना हे प्रेमप्रकरण समजले, तेव्हा ते चिडले, पण दिनकर आपल्या निर्णयावर ठाम होता, त्यामुळे वडलांनी त्याला घराबाहेर काढले. मा. विनायक यांना हे समजताच त्यांनी दिनकरला बोलावून घेतले व त्यांच्या ‘हंस पिक्चर्स’मध्ये सहायक म्हणून दाखल करून घेतले. तेव्हापासून म्हणजे, सन १९४१ पासून ते विनायकांच्या मृत्यूपर्यंत म्हणजे १९४७ पर्यंत सुमारे सहा वर्षे दिनकर विनायकांकडे होते. विनायकांच्या ‘हंस पिक्चर्स’ चे रूपांतर ‘नवयुग’मध्ये झाले व पुढे नवयुग बंद पडल्यावर, विनायकांनी स्वत:ची ‘प्रफुल्ल पिक्चर्स’ ही नवी चित्रसंस्था कोल्हापूरच्या शालिनी स्टुडिओत सुरू केली.
‘प्रफुल्ल पिक्चर्स’चे ‘माझे बाळ’, ‘गजाभाऊ’ व ‘चिमुकला संसार’ हे चित्रपट निघाले. दुसर्या् जागतिक महायुद्धामुळे त्या वेळच्या ब्रिटिश सरकारने प्रत्येक चित्रपट संस्थेने ‘युद्ध प्रचार’ करणारा चित्रपट काढलाच पाहिजे, असा फतवा काढला. त्या वेळी विनायकांनी ‘बडी माँ’ या चित्रपटाची निर्मिती केली. ‘भारतमाता ही आपली आई आहे व तिचे रक्षण करताना प्राणार्पण करणे हा तिच्या पुत्राचा धर्म आहे’- असा ‘बडी माँ’चा विषय होता. या चित्रपटाची गाणी इतकी चांगली होती, की त्याच्या ध्वनिमुद्रणाच्या वेळीच एका धनिक इसमाने तो प्रचंड किमतीत विकत घेतला. त्या पैशातून मग विनायकांनी ‘प्रफुल्ल पिक्चर्स’चे मुंबईला स्थलांतर केले. ‘प्रफुल्ल’चा सारा स्टाफ विनायकांनी मुंबईला आणला. त्या सर्वांची त्यांनी मुंबईला नाना चौकातील शंकरशेठवाड्यात राहायची सोय केली. दिनकररावही त्यांच्याबरोबर मुंबईला आले. मुंबईत विनायक ‘प्रफुल्ल’चा ‘मंदिर’ नावाचा एक चित्रपट तयार करीत होते. याचवेळी दिनकररावांच्या आयुष्याला कलाटणी देणारा एक अतिशय हृद्य प्रसंग घडला. जुन्या ‘हंस पिक्चर्स’चे व्यवस्थापक वामनराव कुलकर्णी हे विनायकरावांना भेटायला मुंबईला आले होते. तिथे त्यांना दिनकररावसुद्धा भेटले. दिनकररावांची व त्यांची जुनी ओळख होती. त्यांनी सहज दिनकररावांना विचारले, ‘तुझ्याकडे एखादी ठणठणीत स्टोरी आहे का?
‘खणखणीत म्हणजे’? दिनकररावांनी विचारले.. ‘अरे, खणखणीत म्हणजे बंद्या रुपयासारखी वाजणारी..’ वामनराव. ‘अच्छा.ऽ म्हणजे जिच्यावर चित्रपट धंदा करेल अशी!’ दिनकरराव.
‘करेक्ट! नाही तर मग हा धंदा करायचाच कशाला?’ वामनराव.
दिनकररावांची ‘वाघ्यामुरळी’ नावाची एक ग्रामीण कथा त्या वेळी ‘किलरेस्कर’ मासिकात प्रसिद्ध झाली होती. त्यांनी ती वामनरावांना दाखवली. त्यांना ती आवडली. त्यांना त्यांच्या ‘मंगल पिक्चर्स’ या नवीन चित्रसंस्थेसाठी पहिलाच चित्रपट काढायचा होता. या चित्रसंस्थेचे सूत्रधार होते बाबूराव पेंढारकर. त्यांनाही ही कथा खूप आवडली. इतकी की त्यांनी या चित्रपटाचे पटकथा-संवाद दिनकररावांनीच लिहावे, अशी इच्छा व्यक्त केली. दिनकरराव त्या वेळी विनायकांकडे ‘मंदिर’च्या कामात व्यस्त होते. त्यांनी विनायकांकडे पंधरा दिवस रजा मागून कोल्हापूरला जाऊन आपल्या ‘वाघ्यामुरळी’ या कथेवरून पटकथा-संवाद लिहून काढले. चित्रपटाचे नाव ठरले - ‘जय मल्हार’.
बाबूराव पेंढारकरांच्या मनात या नव्या चित्रपटाचे दिग्दर्शनही दिनकररावांनीच करावे, असे होते. बाबूरावांनी मग विनायकरावांना भेटून तशी परवानगी मागितली. कारण, दिनकरराव त्या वेळी विनायकरावांकडे काम करीत होते; पण विनायकरावांनी बाबूरावांना स्पष्ट सांगितले - ‘दिनकर माझा सहायक आहे. त्याला दिग्दर्शक मीच करणार!’ नियतीचा खेळच इतका विचित्र असतो, की विनायकरावांचे हे शब्द लवकरच निराळ्या अर्थाने खरे झाले. मंदिर पूर्ण होण्याआधीच विनायकरावांचे निधन झाले. त्यांच्या मृत्यूमुळे अपुरा राहिलेला ‘मंदिर’ पूर्ण करण्याची जबाबदारी शांतारामबापूंनी दिनकररावांवर सोपवली. आणि अशा रीतीने विनायकरावांनी आपल्या मृत्यूचे मोल देऊन आपला शब्द खरा केला. त्यांनीच दिनकररावांना दिग्दर्शक केले!
‘मंदिर’पासून दिनकरराव दिग्दर्शक झाले, तर ‘जय मल्हार’पासून ते कथा-पटकथा-संवाद लेखक झाले. ‘जय मल्हार’पासून मराठीत लावणीप्रधान ग्रामीण चित्रपटांचे युग सुरू झाले. मराठी चित्रपट समीक्षक गमतीने म्हणाले, ‘जय मल्हार’पासून मराठी चित्रपट पाटलाच्या वाड्यात घुसला!’
दिग्दर्शनाबाबतीत दिनकरराव विनायकरावांचे शिष्य होते. त्या वेळी दिग्दर्शनाच्या बाबतीत - भालजी पेंढारकर स्कूल, व्ही. शांताराम स्कूल व विनायक स्कूल ऐनभरात होते. दिनकरराव दिग्दर्शक म्हणून जरी ‘विनायक स्कूल’चे असले, तरी संवाद लिहिताना त्यांना भालजींची खटकेबाज शैली अनुकरणीय वाटली. दिनकररावांनीच एका ठिकाणी लिहून ठेवलेय - ‘अनुकृती हा बाल्याचा, अनुरक्ती हा तारुण्याचा आणि अनुभूती हा प्रौढत्वाचा आत्मा असतो. या न्यायाने आताशा माझी म्हणून एक खटकेबाज संवादाची भाषा तयार झाली आहे. बाबांना (भालजी) ती पसंत पडली असावी. कारण, एकदा ते माझ्या माघारी बोललेले मला कुणी तरी सांगितले, बाबा म्हणाले होते - ‘माझे शिष्यत्व सांगणारे कुणी असोत नसोत; पण माझा खरा शिष्य कोणी शोभत असेल, तर दिनकर पाटीलच!’
खरी गंमत पुढेच आहे. भालजींनी त्यांच्या स्वत:च्या ‘मायबहिणी’ या चित्रपटाची पटकथा-संवाद दिनकररावांना लिहायला सांगितले. (कथा भालजींची होती) इतकेच नाही, तर त्या चित्रपटाचे दिग्दर्शनही दिनकररावांवरच सोपवले होते. त्यावर दिनकररावांनी गमतीने लिहिलेय - ‘एकलव्याप्रमाणे बाबांचे शिष्यत्व मी पत्करले होते खरे, माझी तयारी पाहून गुरुदक्षिणेपोटी बाबांनी माझा अंगठाच कापून मागायला हवा होता. पण तसे काही न करता या आधुनिक द्रोणाचार्याने आपले धनुष्यच मला बहाल करून टाकले होते!’ ‘राम राम पाव्हणं’ या चित्रपटापासून दिनकररावांनी चित्रनिर्मिती सुरू केली. त्यांच्या ‘उदय कला चित्र’ व ‘दिनकर चित्र’ तर्फे नंतर त्यांनी ‘पाटलाचा पोर’, ‘तारका’, ‘मूठभर चणे’, ‘कुलदैवत’, ‘भैरवी’ अशा अनेक चित्रपटांची निर्मिती केली. दिनकर पाटलांनी आपल्या पन्नास वर्षांच्या कारकिर्दीत शंभरहून अधिक चित्रपटांचे लेखन व सुमारे पन्नास चित्रपटांचे दिग्दर्शन (यात दहा अनुबोधपट होते) केले. साहित्यक्षेत्रातही त्याची कर्तबगारी उल्लेखनीयच म्हणावी लागेल.
पाच नाटके, दोन एकांकिका संग्रह, चार कथासंग्रह, चार व्यक्तिचित्रांचे संग्रह, ‘रूपेरी पडदा’, ‘तंत्रमंत्र’ हे चित्रपटविषयक पुस्तक आणि ‘पाटलाचा पोर’ हे आत्मचरित्र अशी त्यांची ‘साहित्यसंपदा’ आहे. दिनकर द. पाटलांच्या उमज पडेल तर, प्रेम आंधळं असतं व ते माझे घर या चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्कार लाभले. जवळपास पन्नास चित्रपटांचे दिग्दर्शन व शंभराहून अधिक चित्रपटांचे लेखन इतके प्रचंड काम करणारे मा.दिनकर पाटील हे मराठीतील एकमेव ‘साहित्यिक दिग्दर्शक’ असावेत. त्यांना ग. दि. माडगूळकर पुरस्कार, जनकवी पी. सावळाराम पुरस्कार आणि व्ही. शांताराम पुरस्कार असे मानाचे पुरस्कार लाभले. चित्रपट महामंडळाच्या ‘चित्रभूषण पुरस्कारा’चेही ते मानकरी होते. मा.दिनकर पाटील यांचे २१ मार्च २००५ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट / मधू पोतदार
दिनकर पाटील यांचे चित्रपट
वरदक्षिणा
https://www.youtube.com/watch?v=E7nTbu5nm9o
उमज पडेल तर
http://www.dailymotion.com/video/xv8jdm_umaj-padel-tar_people
मल्हारी मार्तंड
http://www.dailymotion.com/video/xv5iza_malhari-martand_shortfilms
जय मल्हार
https://www.youtube.com/watch?v=y49H5kUndXU
November 6, 2017
प्राध्यापक असलेले रज्जू भैया संघाच्या कार्य व प्रचारासाठी उ.प्र. मध्ये बसने प्रवास करत असत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पुढील वर्षापासून संघाची पहिली सैनिकी शाळा सुरू करणार आहे. या शाळेचे नाव राजेंद्र सिंह यांच्या नावावरून ‘रज्जू भैय्या सैनिक विद्या मंदिर’ असे असणार आहे.
January 29, 2022
पाटील, (डॉ.) जगन्नाथ
कोल्हापूरच्या राधानगरी तालुक्यातील तिटवे या लहानशा गावातून डॉ. जगन्नाथ पाटील यांचा शैक्षणिक क्षेत्रातील जो प्रवास सुरू झाला, तो आता ‘एशिया पॅसिफिक क्वॉलिटी नेटवर्क’ (एपीक्यूएन) या आंतरराष्ट्रीय संस्थेचे अध्यक्ष या महत्त्वाच्या मुक्कामावर पोहोचला आहे. उच्चशिक्षण क्षेत्रातील गुणवत्तेचे मापन आणि गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न, अशा दुहेरी उद्देशाने किमान ४२ देशांत कार्यरत असलेल्या या संस्थेच्या अध्यक्षपदाची सूत्रे ऑस्ट्रेलियाच्या डॉ. अँटनी स्टेला यांच्याकडून गेल्याच आठवडय़ात डॉ. पाटील यांनी स्वीकारली आणि
‘युनेस्को अथवा जागतिक बँकेकडून वाढीव निधी मिळाला म्हणजे आपण वाढलो, असे होत नाही.. वाढीसाठी निराळा विचार करावाच लागेल’, अशा अर्थाचा संदेशही प्रमुखपदावरून दिला. इथवर मजल मारण्याइतका अनुभव गेल्या दहा-बारा वर्षांत त्यांनी कमावला आहे, हेही विशेष. शिवाजी विद्यापीठातून १९९४ साली बी.एस्सी. झालेल्या जगन्नाथ यांनी पुढे याच विद्यापीठात पत्रकारिता व संज्ञापनाचे (कम्युनिकेशन) शिक्षण घेतले. १९९६ मध्ये याच विद्यापीठातून पत्रकारितेतील मास्टर्स मिळवून त्यांनी पुढली पाच वर्षे शिक्षण-संज्ञापनातील पीएच.डी.साठी अभ्यास केला. यानंतरच्या काळात, शिवाजी विद्यापीठात सहायक कुलसचिव पदावर कार्यरत असताना देशभरच्या उच्चशिक्षण संस्थांचे मूल्यांकन करणाऱ्या ‘नॅक’मध्ये त्यांची नियुक्ती झाली. ‘नॅक’मध्ये आधी सहायक सल्लागार, मग उपसल्लागार आणि पुढे प्रादेशिक समन्वयक या नात्याने ते कार्यरत राहिले. या कार्यकाळात ५०० वर महाविद्यालयांच्या मूल्यांकनाचे समन्वयन त्यांनी केले. नॅकमधूनच ‘एपीक्यूएन’साठी काम करण्याची संधी त्यांना सात वर्षांपूर्वी पहिल्यांदा मिळाली. तेथे त्यांनी २००७ मध्ये मेलबर्न (ऑस्ट्रेलिया), क्वालालंपूर (मलेशिया) आणि हाँगकाँग येथे, शिक्षण संस्थेच्या गुणवत्ता मूल्यांकनात विद्यार्थी-सहभाग कसा असू शकेल याच्या कार्यशाळा घेतल्या. जागतिक बँक, युनेस्को यांनी निधी दिलेल्या या प्रकल्पांवर काम करताना, कामाची प्रक्रिया अधिकाधिक प्रगत करण्यावर जगन्नाथ यांचा मोठा भर असे. महाराष्ट्रातील गावांतसुद्धा दर्जेदार उच्चशिक्षण मिळावे, अशी कळकळही डॉ. पाटील यांना आहे.
August 5, 2017
अपनालय. मुंबई शहरातील गलिच्छ वस्त्यांमध्ये, झोपडपट्टय़ांमध्ये सुमारे ४० वर्षांपासून काम करीत असलेली सेवाभावी संस्था. उद्दिष्ट अगदी साधं. कुपोषण दूर करणं. डॉ. अभय बंग समितीचा अहवाल येईपर्यंत मुंबई-पुण्यासारख्या महानगरांमध्ये कुपोषणाची समस्या असू शकते, यावर कुणी विश्वासच ठेवायला तयार नव्हतं. पण बंग समितीनं हा आकडा ५६ हजारांच्या घरात जाऊ शकतो असं मत अधिकृतपणानं नोंदवलं आणि सरकार खाडकन जागं झालं.
सुदूर ग्रामीण भागामध्ये जशी प्राथमिक आरोग्य केंद्रं असतात, तशी आरोग्य केंद्रं महानगरांमधल्या उपेक्षित वस्त्यांमध्ये नाहीत याविषयीची चिंता बंग समितीनं त्या अहवालात व्यक्त केली होती. मुंबईत सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल्स आहेत, महापालिकांचे दवाखाने आहेत, मॅटर्निटी होम्स आहेत, लसीकरण केंद्रं आहेत पण तळागाळातील गोरगरीबांना परवडतील अशी प्राथमिक आरोग्य सुविधा केंद्र नाहीत, ही गोष्ट महाराष्ट्रासारख्या प्रगतशील राज्याला शोभणारी नाही, यावर बंग समितीनं तीव्र नाराजीही व्यक्त केली होती. २००५ साली एका झोपडपट्टीत कुपोषणानं झालेल्या मृत्युची दखल प्रसिद्धी माध्यमांनी गंभीरतेनं घेतल्यानंतर शासनानं मुंबईमध्ये ११०० आंगणवाडय़ा स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता. पण या आंगणवाडय़ांना सरकार ना जागा देऊ शकलं होतं, ना शिक्षक. अशीच स्थिती प्राथमिक आरोग्य सेवा केंद्रांची असल्याबद्दल बंग समितीनं नाराजी व्यक्त केलेली होतीच. सरकारी नियुक्ती स्वीकारायला एकही डॉक्टर तयार होत नसल्याबद्दल खंत व्यक्त करताना शासनानं यावर ठोस उपाययोजना करायला हवी असं मत समितीनं मांडलं होतं. बंग समितीनं कुपोषणाच्या गंभीरतेकडे लक्ष वेधण्या आधीपासूनच खरं तर अपनालयानं या विषयात काम सुरू केलं होतं. १९७२ साली अपनालयाची स्थापना झाली. आज मुंबई महानगरातील दहा प्रमुख झोपडपट्टय़ांमध्ये अपनालयाची केंद्रं आहेत. त्यांचं काम चालतं ते प्रामुख्यानं कचरा गोळा करणाऱ्यांच्या वस्त्यांमध्ये. दिवसभर कचरा गोळा करायचा, संध्याकाळी तो आणून कचरा गोळा आणि खरेदी करणाऱ्या भंगारवाल्यांकडे जमा करायचा, आणि हातावर पडतील तेवढे पैसे घेऊन पोटाची खळगी भरायची, हेच या कामगारांचं जीवन. पैसे मिळाले तर मिळाले, नाहीतर एखादा दिवस पाणी पिऊनच उपाशीपोटी काढायचा ही स्थिती. पण हे पाणी पिऊन पोटाची खळगी भरणं कोवळ्या मुलांना कसं चालायचं. त्यांचं पोट जाळण्यासाठी मग त्यांना अंगावर पाजायचं एवढंच त्यांच्या हातात उरणारं. आईच जिथे उपाशी, कुपोषित तिथे त्या मुलांचं पोषण व्हायचं कसं. गेल्या सहा महिन्यात मुंबई शहरातल्याच एका उपेक्षित वस्तीत १७ बालकांचे मृत्यु झाल्याची दुर्घटना घडली ती याच परिस्थितीतून. नॅशनल इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट स्कीम या केंद्र सरकारच्या योजनेअंतर्गत अपनालयाचे ज्ञानेश्वर तरवडे आणि त्यांची ऐंशी सहकाऱ्यांची टीम या मुलांच्या देखभालीची, त्यांना स्वच्छ पाणी, सकस आहार मिळेल याची, कचरावेचक महिलांचे बचतगट चालवून त्यांना पुरेसा रोजगार मिळेल याची काळजी घेतच आहेत. पण त्याचबरोबर हजार-बाराशे कुटुंबांचं नियमित आरोग्य सर्वेक्षण, एडसग्रस्तांची देखभाल, क्षयरूग्णांसाठी औषधोपचार आदींचा अंतर्भाव त्यात आहेच. जो मुंबईत पैसा कमावतो त्याचेसाठीच सोयीसुविधा ही स्थिती योग्य नाही, जीवनदायी सुविधा सर्वाना सारख्याच हव्यात, हेच तर अपनालयाचं ध्येय आहे.
---------------------------------
From Aniket
ज्ञानेश्वर तरवडे हे मुंबईमधील झोपडपट्टयांमध्ये अत्यंत हालाखीच्या परिस्थितींमध्ये गुजराण करणार्या हजारो कचरावेचक मजूरांच्या कल्याणाकरिता अपनालय नावाची सेवाभावी संस्था चालवित आहेत. १९७२ मध्ये अपनालयाची सुरूवात अगदी मोजक्या प्रमाणात व घरगुती स्वरूपात झालेली होती. आज तरवडे व त्यांच्या ८० सहकार्यांच्या निरपेक्ष व सेवाभावी मेहेनतीमुळे अपनालयाचा वृक्ष भलताच बहरला आहे व मुंबईतल्या दहा प्रमुख झोपडपट्टयांमध्ये तो असंख्य निराधार कुटुबांना मायेची सावली देत आहे. मुंबईतल्या झोपडपट्टीवासीयांच्या सानिध्यात राहून त्यांचा संघटित आवाज सरकारपर्यंत पोहोचविणे, त्यांच्या वस्त्यांचे आरोग्य सर्वेक्षण करून रोग्यांना योग्य ते औषधोपचार पुरविणे, लहान मुलांना सकस आहार, आरोग्यदायी वातावरण, निर्मळ पाणी व पोषणद्रव्यांचा पुरवठा करणे व त्यासाठी वेगवेगळ्या सरकारी योजनांचा अधिकतम लाभ घेणे असे त्रिवेणी लक्ष्य डोळ्यांशी ठेवून तरवडेंची ही संस्था गरिबांच्या विकासकार्यांमध्ये अव्वल बनली आहे. याशिवाय क्षयरोग, व एड्स अशा महाभयंकर रोगांनी पिडीत रूग्णांना मानसिक, वैद्यकिय, व आर्थिक सुविधा उपलब्ध करून देण्याचा महत्वाकांक्षी उपक्रमदेखील सध्या यशस्वीपणे सुरू करण्यात आलेला आहे. या सर्व उपक्रमांची मांडणी, अंमलबजावणी, व त्याकरिता लागणारे भांडवल उभी करण्याची कसरत, व ही कसरत प्रभावीपणे वठविण्यासाठी आवश्यक असलेली कला त्यांना चांगलीच अवगत झालेली आहे.
August 5, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti