जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
मराठी बालसाहित्यात अत्यंत गाजलेल्या फास्टर फेणे या कथानायकाचे शिल्पकार म्हणजेच भास्कर भागवत.
गायिका पद्मा वाडकर यांचा जन्म १९ जून १९७२ रोजी झाला.
पद्मा वाडकर या मुळच्या केरळच्या आहेत. त्यांनीही अनेक गाणी गायली आहे. दहा वर्षाच्या असताना पद्मा या आचार्य जियालाल वसंत (सुरेशजी यांचे गुरु) यांच्या कडे गाणे शिकत होत्या. १९८५ मध्ये गुरुजींचे निधन झाल्यावर त्या सुरेशजींच्या संपर्कात आल्या. रूपारेल कॉलेज शिकत असताना कॉलेजला दांडी मारून त्या सुरेशजींच्या रियाझाला जात असत. त्या काळात त्या दोघांचे प्रेम जमले व सुरेश वाडकर यांनी १९८८ मध्ये पद्मजा वाडकर यांच्यासोबत लग्न केले.
या वाडकर दाम्प्त्याला दोन मुली असून जिया आणि अनन्या अशी त्यांची नावे आहेत.
पद्मा वाडकर यांचा 'मोरे पिया' अल्बम प्रसिद्ध आहे. यामध्ये सुरेश वाडकर आणि सोनू निगम यांचा सहभाग आहे.
झी टीव्हीवर प्रसारित झालेल्या ‘सा रे गा मा पा लिटिल चॅम्प्स’या प्रसिद्ध गायन रिॲलिटी स्पर्धेत त्यांनी परीक्षक म्हणून काम केले आहे.
त्या एक संगीत शिक्षिका असून आणि सुरेश वाडकर यांच्या अकादमीची सर्व धुरा सांभाळ आहेत त्या या अकादमीच्या उपप्राचार्य आहेत.
-- संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
मद्रासमधल्या त्या कसोटीत पहिल्या दिवशीच्या उपाहारापर्यंतच्या खेळातच टिकाकारांची तोंडे गप्प झाली होती. दिलिप सरदेसाईसोबत फारुख इंजिनिअर सलामीला आला होता आणी सलामीच्या पहिल्याच डावात त्याने वेस्ली हॉल, चार्ली ग्रिफिथ, दस्तुरखुद्द सोबर्स आणी लान्स गिब्ज ह्यांचे डोळे पांढरे केले होते. उपाहारावेळी तो ९४ धावांवर नाबाद होता आणी संघाच्या धावा होत्या बिनबाद १२५.
भारतीय चित्रपटसृष्टीतील जुन्या काळातील आघाडीचे प्रमुख गीतकार मजरुह सुलतानपुरी यांचा जन्म १ आक्टोबर १९१९ रोजी झाला.
आझमगड गावात एक तरुण हकिमीचा व्यवसाय करायचा. याला शायरीची मनापासून आवड. अडल्यानडल्या रुग्णांची सेवा करताना याची शायरी सुरूच असायची. याच्या शायरीच्या जादूने रुग्णाचा निम्मा आजार कमी व्हायचा. या शायरीच्या वेडातूनच हसरालूल हसन पुढे मजरुह सुलतानपुरी झाला. मजरुह म्हणजे जखमी किंवा घायाळ करणारा. मजरुहच्या गीतांनी रसिकांना प्रेमळ जखमा दिल्या. त्याच्या गीताच्या जादूने कर्णसेनांना घायाळ केले. प्रसिद्ध निर्माते-दिग्दर्शक ए. आर. कारदार यांनी एका मुशायर्यात हसन यांची शायरी ऐकली. त्या वेळी ते ‘शहाजहान’ चित्रपटाच्या निर्मितीत होते. त्यांनी हसन ऊर्फ मजरुह सुलतानपुरीला गीतलेखन करण्याची ऑफर दिली. मजरुह यांनी नकार देण्याचा प्रश्नच नव्हता. मजरुहने लेखणी उचलली आणि कागदावर शब्द उमटवले... ‘गम दिये मुस्तकिल, कितना नाजूक है दिल... ये न जाना... हाये हाये ये जालिम जमाना.’ ‘शहाजहान’चे संगीतकार नौशाद यांनी वाहवा केली. नौशाद यांनी त्या खुशीतच चाल बांधली. पुढे कुंदनलाल सैगल यांच्या दर्दभर्यान आवाजाने मजरुह यांच्या शब्दाला आगळे गहिरेपण दिले. मजरुह यांच्या या पहिल्या गीतरूपी रेशमी बाणाने रसिकांना घायाळ केले. हे कमी की काय, म्हणून मजरुहने पुढील गाण्यांची सुरुवात केली, ‘जब दिल ही टूट गया, हम जी कर क्या करे...’ तिच्या एका नकाराने, सर्वस्व हरपल्याची भावना मजरुह यांनी अशी व्यक्त केली. सैगलच्या आवाजातला या शब्दांतला दर्द काळीज पिळवटणारा ठरला. मजरुह यांच्या घायाळ करणार्या कारकीर्दीचा प्रारंभच असा धडाक्यात झाला. साध्या, सोप्या परंतु काळजाला भिडणार्याळ शब्दांची सुरेख गुंफण ही मजरुह यांच्या लेखणीची वैशिष्ट्ये. पर्शियन शब्दांचा समर्पक वापर त्यांनी चपखलपणे केला. याच वैशिष्ट्यांमुळे चार पिढ्या त्यांच्या गीतांच्या चाहत्या बनल्या. मजरुह यांच्या ‘शायराना’ स्वभावामुळे जवळपास सर्वच संगीतकारांबरोबर त्यांचे सुरेल नाते जमले. ‘शहाजहान’मध्ये काळीज चिरणारे वर्णन करणारी त्यांची लेखणी ‘आरपार’च्या वेळी मात्र प्रेमळ आणि हळवी झाली. तो आणि ती यांच्या नजरेच्या भाषेला, ‘कभी आर कभी पार लागा तीर ए नजर...’ असा रेशमी बाणाचा उपमात्मक आविष्कार झाल्यानंतर ‘बाबूजी धीरे चलना...’मधून प्रेमात कशी जपून पावले टाकायची, याची एवढी मधाळ जाणीव मजरुहच देऊ जाणे. मग ओपींचे ठेकेदार संगीत आणि मजरुह यांचे शब्द यांची कानसेनांना भुरळ पाडणारी जुगलबंदी सुरू झाली. ‘सीआयडी’मध्ये याचा प्रत्यय आला. ‘लेके पहला पहला प्यार...’ अशी प्रेमाची ग्वाही असो, ‘कहीं पे निगाहे कहीं पे निशाना...’मधली सूचकता असो, ‘आँखों ही आँखों में इशारा हो गया...’मधला जीवन जगण्याचा मार्ग असो; मजरुह यांच्या गीतांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. त्यानंतर लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांच्या ‘दोस्ती’ला मजरुह यांच्या गीतांनी जो अर्थ प्राप्त झाला, त्याला तोडच नव्हती. ‘चाहूंगा मैं तुझे साँज सबेरे’, ‘मेरी दोस्ती मेरा प्यार...’, ‘राही मनवा दुख की चिंता...’ या गाण्यांनी इतिहास रचला. त्यानंतर मजरुहची जोडी जमली ती चतुरस्र आरडी बर्मनबरोबर. ‘ओ मेरे सोना...’, ‘आजा आजा मैं हूँ प्यार तेरा...’(तीसरी मंजिल), ‘पिया तू अब तो आजा...’, ‘चढती जवानी...’, ‘कितना प्यारा वादा...’, ‘दिलबर दिल से प्यारे...’, ‘गोरिया कहां तेरा देस रे...’(कांरवा), ‘चुरा लिया है...’, ‘लेकर हम दीवाना दिल...’, ‘आपके कमरे मे...’, ‘मेरीसोनी...’(यादों की बारात), ‘क्या हुआ तेरा वादा...’, ‘बचना ए हसीनों...’, ‘चांद मेरा दिल...’, ‘ए लडका हाय अल्ला...’ (हम किसीसे कम नहीं), ‘निसुल्ताना रे...’, ‘तुम बिन जाऊं कहां...’(प्यार का मौसम), ‘होगा तुम से प्यारा कौन...’, ‘पूछो ना यार क्या हुआ...’(जमाने को दिखाना है) ही या कॉम्बिनेशनची कामगिरी. आनंद-मिलिंद, जतीन-ललित यांच्या संगीताने नटलेली मजरुह यांची अनेक गाणी गाजली. अष्टपैलुत्व हे त्यांच्या लेखणीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य. चित्रपटातील सिच्युएशननुसार गीतलेखन करण्यात मजरुह यांचा हातखंडा. ‘तेरे मेरे मिलन की रैना...’(अभिमान)मधला भाव वेगळा, तर ‘जाइए आप कहां जायेंगे...’(मेरे सनम)मधला लडिवाळ गोडवा पुन:पुन्हा ऐकावासा वाटणारा. ‘रात अकेली है...’(ज्वेल थीफ)मधले आव्हान कानाला सुखावणारे, तर ‘रहे ना रहे हम...’(ममता)मधले औदासीन्य विचार करायला लावणारे. कारकीर्दीच्या प्रारंभीच्या काळात कम्युनिस्ट चळवळीत भाग घेणाऱ्या मजरुह यांनी एकदा पंडित नेहरूंबद्दल अनुदारात्मक काव्य केले. त्याबद्दल त्यांना तुरुंगवासही झाला. कोणताही भाव असो, कोणताही रस असो; तो भाव, रस आपल्या लेखणीने समृद्ध करण्याचे कसब मजरुह सुलतानपुरी यांच्या कडे होते. मा.मजरुह सुलतानपुरी हे दादासाहेब फाळके पुरस्कार मिळवणारा पहिला गीतकार! मा.मजरुह सुलतानपुरी यांचे २४ मे २००० रोजी निधन झाले. आपल्या समुहातर्फे मा.मजरुह सुलतानपुरी यांना आदरांजली.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
व्ही. शांताराम हे नांव उच्चारताच डोळ्यासमोर येतो तो चित्रपटाचा पडदा आणि त्यावर व्ही. शांताराम या नांवाखाली गाजलेले एक एक चित्रपट. व्ही. शांताराम यांचे पूर्ण नांव शांताराम वणकुद्रे. वयाच्या १९ व्या वर्षीच ते महाराष्ट्र फिल्म कंपनीत दाखल झाले.
जिम्बे या वाद्याला भारतामध्ये नावारूपाला आणणारे तसेच आंतराष्ट्रीय पातळीवर संगीतामध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेले व उस्ताद अल्लाराखा यांचे सुपुत्र आणि उस्ताद झाकीर हुसेन यांचे लहान भाऊ असलेले सुप्रसिद्ध संगीतकार तौफिक कुरेशी यांनी संगीत क्षेत्रात स्वतःच्या प्रतिभेचा ठसा उमटवला. त्यांचा जन्म ९ ऑगस्ट १९६२ रोजी झाला. उस्ताद अल्लाराखा आणि उस्ताद झाकीर हुसेन हे त्यांचे गुरु होत. त्यांच्या घरी मोठमोठे कलाकार यायचे.
पं. रविशंकरजी, पं. हरिप्रसादजी, पं. शिवकुमारजी, उस्ताद अमजद अलीजी, उस्ताद अली अकबर खांसाहेब असे. त्यांना नुसते पाहणे, त्यांच्या चर्चा ऐकणे, हाही त्यांचा मोठा रियाझ होता. पर्क्युशनिस्ट म्हणून जगभरात नाव कमावलेल्या तौफिक कुरेशी यांना या वाद्याचे अनभिषिक्त सम्राट मानले जाते. एक उत्कृष्ट तबला व ताल वादक असलेल्या कुरेशी यांनी संगीतकार म्हणूनही नाव कमावले आहे.
अभिजात भारतीय संगीतातील पारंपारिकता आणि त्यातील आधुनिकता यांची सांगड कुरेशी यांनी घातलेली आहे. त्यांनी सिनेसृष्टीत अनेक वर्षे विविध तालवाद्य्ो वाजवली आहेत. २००० मध्ये त्यांचा ‘ऱ्हिधून’हा नवा अल्बम आला. त्यात त्यांनी ‘ऱ्हिदमचे, तालाचे वेगळे प्रयोग केले आहेत. उस्ताद अल्लाराखा यांनी त्यात अनेक वर्षांनी गायन केले होते.‘ऱ्हिधून’अल्बमने तौफिक कुरेशी यांची नवी ओळख निर्माण झाली. ग्रॅमी अॅवॉर्डप्राप्त ‘ग्लोबल ड्रम प्रोजेक्ट’या अल्बममधील त्यांच्या सहभागाची आणि त्यांनी सादर केलेल्या वादनाची जागतिक पातळीवर दखल घेतली गेली आहे. पर्क्युशन वाद्याच्या क्षेत्रात स्वतःचा दबदबा निर्माण केलेले तौफिक या वाद्यावरील त्यांच्या पकडीमुळे आणि सादरीकरणाच्या आपल्या वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीमुळे नेहमीच प्रेक्षकांच्या मनात जागा पटकावून बसले आहेत.
जयपूर-अतरौली घराण्याच्या गायिका गीतिका वर्दे-कुरेशी या तौफिक कुरेशी यांच्या पत्नी होत. १९९३ साली उभयतांनी परस्परांचे आयुष्यभराचे जोडीदार म्हणून नव्या प्रवासाला सुरुवात केली. नझरिया, हम अपने, मीरा, तुम बिन, ले आयिले हे त्यांचे अल्बम गाजलेले आहेत. तौफिक कुरेशी व गीतिका वर्दे यांचा मुलगा शिखरनाद हा तबला वादक आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
इटावामध्ये करीमुद्दीन आसिफ उर्फ के. आसिफ यांचे वडील फाजल करीम हे डॉक्टर होते. त्यांचा जन्म १४ जून १९२२ रोजी झाला.चित्रपट क्षेत्रात करिअर करण्यासाठी के. असीफ नंतर मुंबईला गेले. तेथे त्यांनी फेमस फिल्म लॅब येथे नोकरी केली. त्यांच्या मनात चित्रपट काढण्याचे खूळ होते. या संस्थेचे मालक सिराज अली हकीम यांनी त्यांच्या गोष्टी ऐकून त्यास भांडवल द्यायचे कबूल केले. त्या वर त्यांनी फूल नावाचा एक चित्रपट काढला व त्या चित्रपटाने चांगला व्यवसाय केला. त्यानंतर त्याने आपले नाव के. आसिफ असे केले. त्याच्या वाचण्यात मुगल-ए-आझम नावाचे नाटक आले.
मुघल-ए-आझम’ या चित्रपटाचा इतिहास.
‘‘१९२२ साली इम्तियाझ अली ताज या लेखकाने लिहिलेलं ‘अनारकली’ हे नाटक लाहोरमध्ये सादर झालं. के. आसिफ यांनी ते पाहिलं आणि त्यानं ते एवढे भारावले, की यावर आपण सिनेमा बनवायचाच, या ध्यासानं त्यांना पछाडलं. पण मनात आलं म्हणून सिनेमा बनवता येत नाही. त्यासाठी अनेक गोष्टी जुळून याव्या लागतात. १९४० मध्ये के. आसिफ यांचं हे स्वप्न सत्यात येईल अशी आशा निर्माण झाली. निर्माते शिराझ अली यांच्या साथीने त्यांनी या चित्रपटाचं काम सुरू केलं. मात्र, बॉम्बे टॉकिजमध्ये या चित्रपटाचं चित्रीकरण सुरू व्हायला प्रत्यक्षात १९४६ साल उजाडलं. चंद्रमोहन (अकबर), डी. के. सप्रू (सलीम) आणि नर्गिस (अनारकली) हे त्यात प्रमुख भूमिकेत होते. चित्रपट काहीसा मार्गी लागत असतानाच १९४७ साली भारत-पाकिस्तान फाळणी झाली आणि चित्रपटाचं काम थंडावलं. शिराझ अली पाकिस्तानला निघून गेले. त्यांनी के. आसिफ यांना सुचवलं, की तुम्ही उद्योगपती शापूरजी पालनजी यांना भेटा, ते या सिनेमाला फायनान्स करतील. खरं तर शापूरजी पालनजींचा सिनेसृष्टीशी काहीच संबंध नव्हता. परंतु तरीही त्यांनी चित्रपटाच्या निर्मितीची जबाबदारी स्वीकारली याचं कारण- त्यांचं इराणी कनेक्शन आणि अकबरबद्दल त्यांना वाटणारी आपुलकी. म्हणून त्यांनी अट घातली की, चित्रपटाचं नाव ‘मुघल-ए-आझम’ ठेवायचं. खरं तर ही सलीम-अनारकली यांची प्रेमकहाणी; परंतु निर्मात्यांच्या आग्रहाखातर सिनेमाचं नाव ठेवलं गेलं- ‘मुघल-ए-आझम’!’’ ‘‘पण अडचणी इथंच संपल्या नाहीत. सिनेमातील कलाकार चंद्रमोहन यांचं दरम्यान निधन झालं. त्यामुळे हा चित्रपट डबाबंद करावा लागला. आणि पुन्हा नव्यानं दिलीपकुमार, मधुबाला, पृथ्वीराज कपूर, दुर्गा खोटे आदी कलाकार घेऊन चित्रपटाचं चित्रीकरण सुरू झालं. या सिनेमाच्या निर्मितीवर तेव्हा सुमारे सव्वा कोटी रुपये खर्च झाले. प्यार किया तो डरना क्या या एकाच गाण्यासाठी त्यांनी ३५ लाख रूपयांचा सेट उभारला. या एका गाण्यावरच झालेल्या खर्चात तेव्हा एक सिनेमा निघाला असता असं म्हटलं जातं. वेगवेगळ्या कारणास्तव हाही सिनेमा बरीच वर्षे रखडला. चित्रपटाच्या निर्मितीखर्चानं निर्माते मेटाकुटीस आले. पण के. आसिफना आपल्या भव्य-दिव्य स्वप्नापुढे कशाची तमा नव्हती. शेवटी एकदाचा चित्रपट तयार झाला. प्रदर्शितही झाला. पुढचा इतिहास सर्वानाच ज्ञात आहे. मुंबईत ५ ऑगस्ट १९६० रोजी मराठा मंदिर चित्रपटगृहात तो झळकताना अॅ डव्हान्स बुकिंगसाठीच्या प्रचंड धक्काबुक्कीत एकावर चाकूने हल्ला झाल्याचा किस्सा आजही रंगवून सांगितला जातो. फर्स्ट डे फर्स्ट शोसाठी तर हत्तीवरून वाजत-गाजत प्रिंट आणत. मुळचा हा कृष्णधवल चित्रपट (अपवाद फक्त प्यार किया तो डरना क्याफ गाण्याचा) २००३ च्या दिवाळीत रंगीत स्वरूपात दिवाळीच्या दिवशी प्रदर्शित करतानाही इरॉस चित्रपटगृहात त्याची प्रिंट अशीच हत्तीवरून आणली होती. मराठा मंदिरला सलग तीन वर्षे तो हाऊसफुल्ल गर्दी खेचत होता. ‘शोले’ येई तो ‘मुघल-ए-आझम’चा हा विक्रम अबाधित राहिला. त्याकाळी एकाच वेळी देशातल्या १५० चित्रपटगृहांत हा सिनेमा प्रदर्शित केला गेला. हाही तेव्हाचा विक्रम होता. उत्पन्नाचे नवे मापदंड ‘मुघल-ए-आझम’ ने निर्माण केले. हा चित्रपट पूर्ण झाला व एक अजरामर कलाकृती निर्माण झाली. मा.के. आसिफ यांच्या मा.सितारादेवी या पत्नी. मा.के.आसिफ यांचे ९ मार्च १९७१ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
के.आसिफ यांचा मुघल-ए- आझम चित्रपट.
https://www.youtube.com/watch?v=WLKUdiTCrkg.
अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या घराण्यात चारशे वर्षेपासुन समाजप्रबोधनाच्या कार्याची वंशपरंपरा आहे. त्यांच्या घराण्याचे मूळचे आडनांव 'शेंडे'असे होते. त्यांच्या भूतकाळातल्या आठव्या पिढीतील पूर्वज गोविंद चिंतामण शांडिल्य ऊर्फ शेंडे हे धर्मजागृतीचे काम स्वेच्छेने करायचे. त्याकाळचे दर्यासारंग कान्होजी आंग्रे यांनी त्यांना सन्मानाने 'धर्माधिकारी'अशी पदवी दिली. तेंव्हापासून आजतागायत त्यांचे घराणे धर्माधिकारी हे आडनांव लावत आले आहेत आणि त्याला समर्पक असे धर्मजागृतीचे काम करीत आले आहेत. अप्पासाहेब धर्माधिकारी यांनी आपल्या पित्याकडून प्रेरणा घेऊन सेवाव्रत घेतले आणि ते अव्याहतपणे चालवले आहे. त्यांचा जन्म १४ मे १९४६ रोजी झाला. त्यांचे पिता नारायण विष्णु धर्माधिकारी हे महाराष्ट्रातील ज्येष्ठ व प्रसिद्ध समर्थ दासबोधाचे निरूपणकार, अध्यात्म, शिक्षण, आरोग्य, समाजप्रबोधन, व्यसनमुक्ती क्षेत्रात निरलसपणे कार्य करणारे नानासाहेब यांचे जगभरात लाखो अनुयायी आहेत.
धर्माचरणाविषयी बोलतांना त्या अनुषंगाने अज्ञान, अंधश्रध्दा, भेदाभेद, व्यसनासक्ती, स्त्रियांवरील अत्याचार आदि दुष्ट प्रवृत्तींचे उच्चाटन करून समाजाला सन्मार्गाला लावण्याची शिकवण ते देत आले. आधुनिक संदर्भात दासबोधाच्या कमालीच्या सोप्या निरूपणातून विकारी मनांची मशागत करताना निर्व्यसनी समर्थ समाजाचे स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी त्यांनी आयुष्य वेचले. या कामासाठी त्यांनी १९४५ साली रायगड जिल्ह्यातील रेवदंडा येथे श्री समर्थ आध्यात्मिक प्रासादिक सेवा समिती स्थापन केली. या संस्थेद्वारे त्यांनी जगभरात अध्यात्माचा प्रसार केला. त्याच्या शाखा आज भारताबाहेरील अनेक देशांपर्यंत पसरल्या आहे.
आप्पासाहेब धर्माधिकारी यांनीही अथक परिश्रम घेऊन, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या सर्वांगीण पुरु षार्थाची ओळख त्यांनी, स्वत:ची ओळख विसरलेल्या समाजाला करून दिली. बैठकांच्या मौखिक निरूपणाच्या माध्यमातून त्यांनी आरोग्यसंपन्न समाजनिर्मितीची प्रक्रिया सुरू केली आहे. मा.अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या सामाजिक कार्याची दखल घेवून डॉ.डी.वाय.पाटील विद्यापीठाने त्यांना डी लिट पदवी बहाल दिली आहे. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना सामाजिक क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार दिला आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
साहित्य व राजकारण क्षेत्रातील पुढारी, साहित्य सम्राट नरसिंह चिंतामण (तात्यासाहेब) केळकर यांनी टिळकांच्या निधनानंतर तब्बल १२ वर्षे केसरीच्या संपादकपदाची धुरा वाहिली.
संगीतकार यशवंत देव यांच्याकडे ते भावगीत शिकले होते, पण पुढे प्रकाशन व्यवसायाचा व्याप वाढल्यामुळे रामदास भटकळांना गाण्याकडे फारसे लक्ष देता आले नाही.
Copyright © 2025 | Marathisrushti