जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
त्यांचा जन्म १० फेब्रुवारी १८०३ रोजी झाला. मुंबईच्या १९ व्या शतकातील इतिहासाचे प्रणेते म्हणून मा. नाना शंकरशेट यांना ओळखले जाते. जगन्नाथ शंकरशेट यांचे खरे नाव नाना मुरकुटे. मुरकुटे कुटुंब हे मुळातच सधन. नानांचे एक पूर्वज बाबूलशेट हे कोकणातून १८ व्या शतकात मुंबईत आले.
म्हैसूरच्या १७९९ च्या टिपू-इंग्रज युद्धात वडिलांना खूप पैसा मिळाला. आई भवानीबाई नानांच्या लहानपणीच वारली. नानांनी तिच्या स्मरणार्थ पुढे भवानी शंकर मंदिर व एक धर्मशाळा गोवालिया तलावाजवळ बांधली. वडील गेल्यावर तरुणपणीच त्यांच्यावर प्रपंचाची व व्यापाराची सर्व जबाबदारी पडली. मा.नाना शंकरशेट हे त्या शतकातील मुंबईच्या प्रमुख व्यापाऱ्यांमध्ये गणले जात. नानांनी आपला व्यापार इतका पद्धतशीरपणे वाढवला, की त्यांनी अल्पावधीत प्रचंड पैसा मिळवला. तोही सचोटीने आणि आपली विश्वासार्हता कायम राखून. त्यांचे नाव आणि त्यांची विश्वासार्हता एवढी पक्की होती, की अरब, अफगाण आणि अन्य परदेशी व्यापारी बँकांकडे आपली संपत्ती ठेवण्याऐवजी नानांकडे ठेवत असत, असे म्हटले जाई. १९ व्या शतकाच्या मध्यापर्यंत मुंबईतील असे एकही क्षेत्र नव्हते ज्यावर मा.नानांच्या कर्तृत्वाचा ठसा उमटला नाही. समाजकारण, समाज सुधारणा, प्रशासन, विकास, धार्मिक रुढी अशा सर्व क्षेत्रांत नानांनी भरीव कामगिरी बजावली. नानां त्यांवर सर जमशेटजी जिजिभाईंची छाप पडली होती. हिंदवासियांत शिक्षणाचा प्रसार झाला पाहिजे, यासाठी एल्फिन्स्टनने १८२२ मध्ये हैंदशाळा व शाळापुस्तक मंडळी काढली, त्यांचे आधारस्तंभ नानाच होते. ही पहिली शैक्षणिक संस्था स. का. छत्रे यांच्या साह्याने स्थापिली. पुढे हिचे १८२४ मध्ये बाँम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीत रूपांतर झाले.
एल्फिन्स्टननंतर उच्च शिक्षणाच्या सोयीसाठी ४,४३,९०१ रुपयांचा एल्फिन्स्टन फंड जमविण्यात आला. त्याचे नाना हे विश्वस्त राहिले. या संस्थेचे एल्फिन्स्टन कॉलेज झाल्यावर (१८३७) तिला एल्फिन्स्टन इन्स्टिट्यूट म्हणण्यात येऊ लागले. १८५६ मध्ये महाविद्यालय व विद्यालय पृथक झाले.बोर्ड ऑफ एज्युकेशनची स्थापना १८४१ मध्ये झाली. बोर्डातील तीन एतद्देशीय सभासदांत सतत सोळा वर्षे नाना निवडून आले. १८५५ मध्ये त्यांनी विधी महाविद्यालयाचा पाया घातला. सर ग्रँटच्या मृत्यूनंतर ग्रँट मेडिकल कॉलेजची १८४५ मध्ये स्थापना करून येथे आंग्ल वैद्यक-शिक्षणाची सोय त्यांनी केली.
मुंबई कायदे मंडळाच्या आरंभीच्या सभासदांत ते प्रमुख होते. नानांचे सामाजिक कार्यही मोठे होते. त्यांनी सतीच्या चालीस बंदी घालणाऱ्या कायद्यास पाठिंबा दिला. सर्वांना शिक्षण मिळाले पाहिजे, या तत्त्वावर स्त्रीशिक्षणास प्राधान्य दिले. भारतीयांना कलाशिक्षण मिळावे, म्हणून सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टच्या स्थापनेत सक्रिय भाग घेतला. याशिवाय ग्रँड ज्यूरीत भारतीयांचा समावेश व्हावा, तसेच जस्टिस ऑफ द पीस अधिकार भारतीयांस मिळावा, यासाठी त्यांनी खटपट केली व काही अधिकार मिळविले. मुंबईच्या प्रशासनात कार्यरत असताना त्यांनी आरोग्यव्यवस्था, विहिरी, तलाव वगैरे योजना अंमलात आणल्या. गँस कंपनी सुरू केली; धर्मार्थ दवाखाना काढून तसेच पुढे जे. जे. हॉस्पिटलचा पाया घालून त्यांनी रुग्णसेवेस चालना दिली. बाँबे स्टीम नॅव्हिगेशन कंपनीची स्थापना, मुंबई-ठाणे रेल्वेचा प्रारंभ, नाटकांचे प्रेक्षागृह, सोनापूरच्या स्मशानभूमीचे रक्षण याही गोष्टींचे श्रेय नानांनाच द्यावे लागेल. विशेष म्हणजे बोरीबंदर ते ठाणे पहिली रेल्वेगाडी १८५३ मध्ये धावली, तिचे कार्यालय नानांच्या राहत्या घरातच होते. मा.नाना आणि गिरगाव यांचे नाते नानांच्या अंतापर्यंत अतूट राहिले. गिरगावचा नानांनी अक्षरश: कायापालट केला. गिरगावातला नानांचा वाडा आज अस्तित्वात नाही, त्याजागी आता आधुनिक वास्तू उभी आहे. पण या जुन्या वाडय़ाचा इतिहास, त्या वाडय़ाला भेट दिलेली महनीय मंडळी, नानांचे देवघर, दिवाणखाना आणि दारावरची घंटा आणि तिचा नाद या सर्वाना कालपरवापर्यंत दंतकथांचे स्वरूप होते. मा. नानांच्या निधनानंतर मा.नानांच्या स्मरणार्थ मॅट्रिकला संस्कृत विषयात पहिल्या येणाऱ्या विद्यार्थास शंकरशेट शिष्यवृती देण्यात येऊ लागली. मा.नाना शंकरशेट यांचे ३१ जुलै १८६५ निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- इंटरनेट
पूर्वाश्रमीच्या इंदिरा दीक्षित असलेल्या इंदिरा संतांनी लहान मुलांच्या कथा लिहून आपल्या लिखाणाला प्रारंभ केला.
त्यांचा जन्म ४ जानेवारी १९१४ रोजी झाला. शिक्षकीपेशात असलेल्या इंदिरा संतांनी लहान मुलांच्या कथा लिहून आपल्या लिखाणाला प्रारंभ केला. १९५०च्या दशकात त्यांनी स्त्रीवादी कविता लिहण्यावर आपले लक्ष केंद्रित केले. आई, पत्नी, मुलगी या नात्यांतून भारतीय स्त्रीचे दिसणारे खडतर जीवन त्यांनी आपल्या कवितांमधून हळुवारपणे मांडले आहे.
प्रेम, जीवनातील व्यथा, संघर्षातून आलेले अनुभव, निसर्ग, भक्तीभाव, स्त्रीत्वाच्या वेदना,मानवी नाती असे नानाविध विषय त्यांच्या काव्यातून बहरत जातात कधी ओठावर हसू आणतात तर कधी डोळ्यात पाणी ! त्यांच्या आयुष्याच्या विविध वळणावर आलेली संकटे अन त्यावर त्यांनी केलेली मात याचे ठसे इंदिरा संत यांच्या कवितात जागोजागी आढळतात. इंदिरा संत आणि त्याचे पती ना. मा. संत या दोघांच्या कवितांचा एकत्रित असा संग्रह 'सहवास' या नावाने १९४० ला प्रसिद्ध झाला.
विशुद्ध रूपातील इंदिरा संत यांची कविता टीकाकार तसेच काव्यरसिकांनी उचलून धरली. आजमितीस इंदिरा संत यांची सुमारे पंचवीस पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. रमेश तेंडुलकर यांनी इंदिरा संत यांच्या निवडक कविता 'मृण्मयी' नावाने १९८२ साली संपादित करून प्रसिद्ध केल्या आहेत. मा.इंदिरा संत यांचे १३ जुलै २००० रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
इंदिरा संत यांची कविता.
कुणी निंदावे त्यालाही
करावा मी नमस्कार
कुणी धरावा दुरावा
त्याचा करावा सत्कार
काही वागावे कुणीही
मीच वागावे जपून
सांभाळण्यासाठी मने
माझे गिळावे मीपण
कित्येकांना दिला आहे
माझ्या ताटातील घास,
कितिकांच्या डोळ्यातील
पाणी माझ्या पदरास!
आज माझ्या आसवांना
एक साक्षी ते आभाळ
मनातील कढासाठी
एक अंधार प्रेमळसंत
पूर्ण नाव गोविंद परशुराम नगरकर; परंतु पंडितराव याच नावाने प्रसिद्ध. त्यांचा जन्म २६ डिसेंबर १९१० रोजी झाला. लहानपणापासूनच पंडितरावांचा गायनाकडे कल होता. सुप्रसिद्ध गायक-नट विष्णुपंत पागनीस यांच्याकडे प्रथम आणि नंतर पुणे येथील भारत गायन समाजात त्यांनी शास्त्रोक्त गायनाचा अभ्यास केला. मित्रमंडळीच्या आणि चाहत्यांच्या वर्तुळात पंडितरावांनी गायिलेल्या गीतांचा बोलबाला झाल्यामुळे ओडियन कंपनीने त्यांच्या काही गीतांच्या ध्वनिमुद्रिका प्रकाशित केल्या. त्यांपैकी ‘जा के मथुरा’, ‘बोल हसरे बोल प्यारे’, ‘रामरंगी रंगले मन’ इ. गीतांच्या ध्वनिमुद्रिका बऱ्याच लोकप्रिय झाल्या.
आकाशवाणीच्या मुंबई केंद्राशी त्यांचा संबंध सुरुवातीपासून होता. हरिभाऊ शुक्ल यांच्या मंगला नाटकात काम करून पंडितरावांनी नाट्यसृष्टीत प्रवेश केला. पुढे सुलोचना पालकर हिच्या सहकार्याने पंडितरावांनी १९३४ साली ‘सुलोचना संगीत मंडळी’ या नाट्यसंस्थेची स्थापना केली व १९३७ पर्यंत कंपनीच्या नाट्यप्रयोगांत नायकाच्या भूमिका केल्या. संशयकल्लोळ तसेच खाडिलकर यांचे संगीत त्रिदंडी-संन्यास ही नाटके ‘सुलोचना संगीत मंडळी’ करीत असे. त्यांशिवाय मृच्छकटिक, मानापमान, सौभद्र, लग्नाची बेडी, ना. सी. फडक्यांचे संजीवन इ. नाटकेही या संस्थेने रंगमंचावर आणली होती. १९३७ मध्ये कंपनी बंद पडली. नंतर दामुअण्णा जोशी यांच्या ‘कला-विलास’ च्या देहूरोड या नाटकात पंडितरावांनी काम केले. त्यातील ‘मी गातो नाचतो’ हे पंडितरावांचे गाणे खूपच गाजले.
शेवटी १९७६ मध्ये रांगणेकरांच्या पिकली पाने या गद्य नाटकात त्यांनी भूमिका केली व ही त्यांची शेवटचीच भूमिका ठरली. लग्नाची बेडी, एकच प्याला मधल्या संगीत भुमिका ते शेवटपर्यंत करत होते. मी गातो नाचतो आनंदे.. अशी काही भावगीते पण त्यांनी गायली. व्ही. शांताराम यांच्या अमरभूपाळी या चित्रपटातील होनाजीच्या भूमिकेसाठी पंडितरावांनी न्याय दिला. त्या बोलपटात लता मंगेशकर आणि पंडितराव यांनी गायिलेली ‘घनःश्याम सुंदरा’ ही भूपाळी अविस्मरणीय ठरली. मधुर आवाज, मार्दवता, तल्लीनता आणि भावमधुरता हे त्यांच्या गायनातले उल्लेखनीय गुण होते. पंडितराव नगरकर यांचे २८ जुलै १९७७ निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट
नांदी' हे नाटक हृषिकेश जोशी यांनी मराठी रंगभूमीवरील आणले. चार निर्माते, दहा कलाकार आणि २३ व्यक्तिरेखा हाच मुळात या वेगळा प्रयोग होता. नाट्यसंमेलनात झालेले हे नाटक त्यांनी आता व्यावसायिक रंगभूमीवर आणले आहे आत्तापर्यंत गाजलेल्या काही नाटकांचे कोलाज करून त्यातून मराठी रंगभूमीचे एकंदर चित्र तयार करण्याचा हृषिकेश जोशी यांचा हा यशस्वी प्रयत्न अत्यंत स्तुत्य आहे. यलो, हरीशचंद्राची फॅक्टरी,देऊळ, भारतीय, रंगभूमी, चीटर,पोश्टर गर्ल अशी काही हृषिकेश जोशी यांचे गाजलेले चित्रपट. ‘केबीसी’ला लेखक असतो हे कोणाच्या कल्पनेतही नव्हते. मराठी केबीसी पहिल्या तीन भागांमध्येच स्पर्धकांची ओळख, त्यासाठी वापरण्यात आलेली काव्ये, छोटी छोटीच पण आकर्षक वाक्ये यांनी सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले. हे हृषिकेश जोशी लिहिले होते. हृषिकेश जोशी केबीसीसाठी स्क्रीप्ट लिहिले आहे हे आपणापैकी खूप कमी जणाना माहित असेल. ‘स्टार प्रवाह’वर होत असलेल्या विकता का उत्तर या नव्या को-या गेम शोमध्ये हृषिकेश जोशी हे थोड्याथोडक्या नाही, तर तब्बल ५२ भूमिकांमध्ये होते.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ.इंटरनेट
रवि शंकर यांचे वडील श्याम शंकर विद्वान व कायदेतज्ज्ञ होते. त्यांचा जन्म ७ एप्रिल १९२० रोजी झाला. त्यांचे पूर्ण बालपण वडिलांच्या गैरहजेरीतच गेले. त्यांची आई हेमाङ्गिनी यांनी त्यांचे पालन केले. थोरले भाऊ उदय शंकर हे विख्यात भारतीय नर्तक होते. ते पॅरिस येथे राहत. १९३० साली रवि शंकर आईसोबत पॅरिस येथे गेले. त्यांचे आठ वर्षांचे शालेय शिक्षण तेथेच झाले. १९३८ साली, वयाच्या अठराव्या वर्षी रविशंकर यांनी उस्ताद अलाउद्दीन खान यांच्याकडे शिक्षण सुरू केले. शिक्षणकाळात ते उस्ताद साहेबांचे वडील व आजचे प्रसिद्ध सरोदवादक अली अकबर खान यांच्याशी परिचीत झाले. त्यांनतर त्या दोघांनी अनेक ठिकाणी एकत्र जुगलबंदी केली. उस्ताद अलाउद्दीन खान यांच्याकडिल शिक्षण १९४४ पर्यंत चालले. १९३९ साली अमदावाद शहरात प्रथम खुली मैफल केली. १९४५ सालापासूनच रविशंकराच्या साङ्गीतिक सृजनशीलतेचे भ्रमण इतर शाखांमध्येही सुरू झाले. त्यांनी बॅलेसाठी संगीत रचना व चित्रपटासाठी संगीत दिग्दर्शन सुरू केले. त्याकाळातील गाजलेले चित्रपट धरत्री के लाल व नीचा नगर या चित्रपटांचे संगीत दिग्दर्शन त्यांनी केले. इक्बाल यांच्या सारे जहासे अच्छा या गीतास त्यांनी दिलेले संगीत अतिशय लोकप्रिय ठरले. इ.स. १९४९ साली रवि शंकर दिल्लीच्या ऑल इन्डिया रेडिओत संगीत दिग्दर्शक म्हणून रूजू झाले. याच काळात त्यांनी वाद्य वृन्द चेम्बर ऑर्केस्ट्रा स्थापन केला. १९५० ते १९५५ सालात रवि शंकर यांनी सत्यजित राय यांच्या अपु त्रयी - (पथेर पांचाली, अपराजित व अपुर संसार) या चित्रपटांना संगीत दिले. यानंतर त्यांनी चापाकोय़ा , चार्ली व सुप्रसिद्ध गांधी चित्रपटांस संगीत दिले. १९६२ साली पन्डित रवि शंकर यांनी किन्नर स्कुल ऑफ म्युझिक, मुंबई व १९६७ साली किन्नर स्कुल ऑफ म्युझिक, लॉस ऍन्जलेस स्थापन केली. रवि शंकर यांचे संगीत व्यक्तित्व दुमुखी होते. सतारवादक व संगीतकार अशी ती दोन रूपे होती. सतारवादक म्हणून ते परंपरावादी व शुद्धतावादी; पण संगीतकार म्हणून उन्मुक्तपणा अशा रूपात वावरत. १९६६ साली त्यांनी प्रसिद्ध पाश्चात्य संगीतकार जॉर्ज हॅरिसन यांच्या सोबत जॅझ, अभिजात पाश्चात्य संगीत व लोकसङ्गीत अशा विविध प्रवाहांवर काम केले. १९५४ साली सोव्हिएत युनियनमधील मैफिल ही त्यांची पहिली आंतरराष्ट्रीय मैफिल. त्यानंतर १९५६ साली त्यांनी युरोप अमेरिकेत नेक कार्यक्रम केले. यात एडिनबर्ग फेस्टिव्हल, रॉयल फेस्टिव्हल हॉल अशा प्रतिष्ठेच्या मंचांचा समावेश आहे. १९६५ साली बीटलसच्या जॉर्ज हॅरिसन यांनी सतार शिकण्यास सुरूवात केली. या काळात त्यांचे हॅरिसन यांच्याशी प्रस्थाप्त झालेले मैत्रीपूर्ण संबंध त्यांना आंतरराष्ट्रीय मंचांची पायरी चढवण्यास मदतभूत ठरले. जॉर्ज हॅरिसन हे रवी शंकरांचे पॉप जगतातील "मेन्टर" (पालक) मानले जातात. रवि शंकर यांचे ११ डिसेंबर २०१२ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
१९६१ साली ते पुण्यात आले आणि एक वर्षाचा डिप्लोमा कोर्स करुन, रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमिक शाळेत शिक्षक म्हणून रूजू झाले. त्यावेळी पुणे विद्यापीठातून त्यांनी कायद्यात बॅचलर डिग्री मिळवली आणि पुढे पुणे विद्यापीठातून मास्टरचेही शिक्षण पूर्ण केले. १९६४ मध्ये अवघ्या २० वर्षाच्या वयात त्यांनी ‘भारती विद्यापीठ’ ही शैक्षणिक संस्था स्थापन केली.
मॉडेलिंगपासून त्यांनी आपल्या करिअरला सुरुवात केली होती. त्यानंतर त्याने टार्झनमध्ये मुख्य भूमिका साकारली. 1996 ते 1997 मध्ये बीच ऑन एयर झालेल्या टार्झन सीरीजच्या 22 एपिसोडमध्ये ज्यो ने प्रेक्षकांवर छाप सोडली. ज्यो ने टार्झनसह अमेरिकन साइबॉर्ग स्टील वॉरिअर, स्टील फ्रंटियर, वॉरहेड आणि टीव्ही मालिका वेवॉच आणि कोनान द ॲडव्हेंचरमध्ये काम केले होते. 2018मध्ये आलेल्या समर ऑफ 67मध्ये तो झळकला होता. ज्यो ने ग्वेनसोबत लग्न केले होते. दोघेही ब्रेंटवुडमध्ये आपल्या दोन मुलींसोबत रहात होते.
सलमान खान हा प्रसिध्द चित्रपटलेखक सलीम खान यांचा मुलगा. सलमान खानचा जन्म२७ डिसेंबर १९६५ रोजी झाला.सलमान यांनी बॉलिवुडमध्ये पदार्पण केले तेव्हा त्याच्याकडे आजच्यासारखी शरीरयष्टी नव्हती. सडपातळ शरीरयष्टीचा हा मुलगा उद्याचा मोठा स्टार होईल अशी कल्पनाही कोणी केली नव्हती. 'बिवी हो तो ऐसी' या चित्रपटातून बॉलिवुडमध्ये पदार्पण करणा-या सलमान यांचा दुसराच चित्रपट 'मैंने प्यार किया' सुपरडूपर हिट झाला. या चित्रपटाच्या गाण्यांबरोबरच सलमान यांनी या चित्रपटातून आपले अभिनयाचे नाणेही खणखणीत वाजवून दाखवले आणि बॉलिवुडला एक नवा स्टार मिळाला. बॉलिवूडमध्ये दबंगची ओळख याच चित्रपटातून चाहत्यांना झाली. सलमान यांचा वॉंटेड, दबंग, दबंग-२ आणि एक था टाइगर या सर्व चित्रपटानी बॉक्स ऑफिसवर १०० कोटी पेक्षा ही जास्तीचा गल्ला केला. या चित्रपटाच्या व्यतिरिक्त सलमान खान यांनी साजन, हम आपके हैं कौन, तेरे नाम आणि हम दिल दे चुके सनम या सारख्या चित्रपटांमध्ये दमदार कामगिरी केली आहे. तसेच सलमानने रियलिटी शो ‘दस का दम’ आणि ‘बिग बॉस’ द्वारे टी.व्हीवर आपली हजेरी लावून चाहत्याना भुरळ घातली. तसेच बॉलिवूडच्या दबंगला दुसऱ्याच्या चित्रपटात काम करण्यासाठी निर्मात्यांना तब्बल ५० कोटी रुपये मोजावे लागतात. सलमान खान यांचे ‘एस.के.बी.एच’ प्रॉडक्शन म्हणजेच सलमान खान बिंग ह्यूमन प्रॉडक्शन या नावाने त्याची स्वत:ची प्रॉडक्शन कंपनी आहे. या प्रॉडक्शन कपंनीची सुरुवात सलमानने २०११ मध्ये केली होती. या प्रॉडक्शन कपंनी द्वारे पहिला चित्रपट ‘चिल्लर पार्टी’ बनवण्यात आला या चित्रपटाने तीन राष्ट्रीय पुरस्कार मिळवले. सलमान खान बिंग ह्यूमन नावाने सामाजिक संस्था देखील चालवतो. त्याच प्रमाणे बॉलिवूडचा दबंग गणपती बाप्पाचा भक्त आहे. सलमान चे चाहते त्याला सोशल नेटवर्किंग साईट द्वारे शुभेच्छा देत आहे. सलमान आजचा सुपरस्टार असला तरी, तो इतक्या सहजतेने इथपर्यंत पोहोचलेला नाही. सलमान यांनी आयुष्यात अनेक चढ-उतार अनुभवले, खस्ता खालल्ल्या. काळवीट शिकार प्रकरण, हिट अँण्ड रन प्रकरणामुळे त्याच्या डोक्यावर नेहमीच अटकेची टांगती तलवार राहिली.
संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३
संदर्भ :- इंटरनेट
विधान परिषदेच्या अमरावती पदवीधर मतदारसंघाच्या झालेल्या निवडणुकीत प्रा. बी. टी. देशमुख यांचा पराभव झाल्याने, प्रदीर्घ काळ सुरू असलेल्या शैक्षणिक चळवळीचा आणि विदर्भाच्या अनुशेषाच्या संसदीय संघर्षांचाही पराभव झाला आहे. भाऊराव तुळशीरामजी उपाख्य बी. टी. देशमुख नावाची चळवळ १९६० साली अमरावतीच्या शैक्षणिक क्षेत्रात सुरू झाली आणि पाहता पाहता या चळवळीने राजकारण, समाजकारण अशा विविध क्षेत्रात संचार सुरू केला.
विद्यार्थी असतानाच संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत बी. टी. सहभागी झाले. बी. टीं.च्या घरी अठराविश्वे दारिद्रय़ होते. पण, तरूण वयापासूनच परिस्थितीला शरण न जाता संघर्षरत राहण्याची बी.टीं.ची वृत्ती होती. शिक्षण आणि संयुक्त महाराष्ट्राची चळवळ, अशा दोन्ही आघाडय़ांवर सक्रिय राहण्यासाठी पोट किमान भरलेले असावे, ही मूलभूत गरज होती आणि ती भागवण्यासाठी भाऊराव नावाचा हा युवक चक्क कंपोझिटरचे म्हणजे छापखान्यात अक्षरे जुळवण्याचे काम करत असे. कंपोझिटरची ही नोकरी करत करतच राज्यशास्त्र या विषयात एम.ए. ची पदवी संपादन केली आणि राज्यशास्त्राचे प्राध्यापक म्हणून शिक्षण क्षेत्रात पाऊल टाकले. तो काळ शिक्षकी पेशासाठी कमी वेतन आणि प्रामाणिकपणे विद्यादानाचा होता. विद्यादान करणाऱ्यांना चरितार्थासाठी येणाऱ्या अडचणी स्वत: अनुभवताना बी. टीं. मधला चळवळ्या जागा झाला. त्यातूनच महाविद्यालयीन शिक्षकांच्या मागण्यांसाठी विदर्भभर आंदोलन उभारण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. नेतृत्वासाठी नैतिक पातळीवर असणारे स्वच्छ चारित्र्य त्यांच्याजवळ होतेच. त्यामुळे शिक्षक चळवळीचे नेतृत्व त्यांच्याकडे आपसूकपणे चालत आले. नागपूर विद्यापीठ शिक्षक संघाचे (नुटा) १९७३ पासून आजपर्यंत ते अध्यक्ष आहेत. सलग एखाद्या चळवळीचे ३७ वर्षे अध्यक्षपद भूषवले जाण्याचा हा विक्रमच असावा! ‘नुटा’चे अध्यक्षपद सांभाळत असतानाच महाराष्ट्र प्राध्यापक महासंघाचे अध्यक्षपदही त्यांच्याकडे अपरिहार्यपणे आले. चळवळी उभारतानाही विद्यादानाच्या व्रतापासून बी. टी. क्षणभरही ढळले नाहीत. प्राध्यापकपदाच्या नोकरीतून अधिकृतरीत्या निवृत्त होईपर्यंत म्हणजे ३०-३२ वर्षे बी.टी. नियमितपणे शिकवत असत. केवळ रस्त्यावर संघर्ष करून शिक्षकांचे प्रश्न सोडवता येणार नाही, म्हणून १९८० साली बी.टीं.नी विदर्भ पदवीधर मतदारसंघातून महाराष्ट्र विधान परिषदेत प्रवेश केला. अमरावती विद्यापीठाची स्थापना करण्यासाठी बी.टीं.नी विधिमंडळात सर्व संसदीय अस्त्रांचा वापर केला. हे विद्यापीठ स्थापन झाल्यावर म्हणजे १९८६ मध्ये हा मतदारसंघ अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघ म्हणून ओळखला जाऊ लागला. या मतदारसंघातून सलग पाच वेळा बी.टी. विधान परिषदेवर विजयी झाले. ३० वर्षांच्या संसदीय जीवनात त्यांची प्रतिमा अभ्यासू आमदार म्हणून राहिली. शिष्टाचाराचा, वर्तनाचा कोणताही तोल ढळू न देणारा आणि तरी अत्यंत आक्रमक आमदार म्हणून बी. टी. देशमुख यांची कारकीर्द तेजस्वी राहिली, तशीच ती निष्कलंकही राहिली. याच संयत आक्रमकतेच्या जोरावर शिक्षकांचे अनेक प्रश्न सोडवण्यात बी.टीं.ना यश आले. एखाद्या विषयावर बी. टी. बोलायला लागले तर संपूर्ण सभागृहात पूर्ण शांतता असे. दहा-बारा वर्षांत बी.टी. आणि नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने सभागृहात विदर्भाच्या अनुशेषाच्या निवारणासाठी जो ‘संसदीय संघर्ष’ उभारला गेला, त्याची नोंद सुवर्णाक्षरांनी होईल. विदर्भाच्या विकासाच्या निधीवर डल्ला मारणाऱ्यांना देशमुख-गडकरी या दुकलीने अक्षरश: सळो की पळो करून सोडले. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यावर गडकरी दिल्लीला गेले आणि विकासाच्या संसदीय लढाईची जबाबदारी एकटय़ा बी.टीं. वर आली. एकाच वेळी संसदीय आणि उच्च न्यायालय अशा दोन पातळ्यांवर एकहाती ही लढाई बी.टी. लढत होते. बी.टीं.च्या पराभवामुळे विधान परिषदेतील या लढाईचे नेतृत्वच संपले आहे, असे नव्हे तर या लढाईची धार अतिशय बोथट झाली आहे. विधान परिषद निवडणुकीतील बी.टी. देशमुख यांच्या पराभवाचा अर्थ इतका असा व्यापक आहे आणि विदर्भाचे केवढे मोठे नुकसान झालेले आहे, हे स्पष्ट करणारा आहे. बी.टी. देशमुख तन आणि मनाने चळवळे आहेत. वयाच्या सत्तरीतही चैतन्याने फुललेलेच आहेत. ते हार मानणार नाहीत. आता पुन्हा रस्त्यावरचा संघर्ष सुरू करतील. त्यांच्या पुढच्या लढाईला शुभेच्छा!
Copyright © 2025 | Marathisrushti