जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
“शास्त्रीय मराठी व्याकरण‘ हा सुमारे एक हजार पृष्ठांचा ग्रंथ मोरो केशव दामले यांनी लिहिला. त्यांचे व्याकरण पुढील मराठी व्याकरणकारांस आधारभूत ठरले. त्यांच्या ग्रंथात असंख्य उदाहरणे, असंख्य शब्द गटवारीने उपलब्ध करून दिले आहेत. हे व्याकरणाच्या क्षेत्रातील मोठे काम म्हटले गेले.
संजय खापरे यांनी आपल्या रुपेरी पडद्यावरील वाटचाल महेश मांजरेकर यांच्या ‘प्राण जाये पर शान ना जाये’ या हिंदी चित्रपटापासून सुरु केली. त्यानंतर खापरे यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत रॉकी हॅण्डसम या चित्रपटातही काम केले. आपल्या कारकिर्दीत संजय खापरे यांनी जत्रा, गाढवाचं लग्न, टाटा बिर्ला आणि लैला, अजब लग्नाची गजब गोष्ट, अग्निपरिक्षा, भाऊचा धक्का, काकस्पर्श, फक्ता लढ म्हणा, प्रियतमा, लयभारी, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, वॉण्टेड बायको नं 1, मर्डर मेस्त्री, दगडी चाळ, गलबत, डिस्को सन्या, फॅमिली कट्टा, झाला बोभाटा, नगरसेवक, तलाव, मेमरी कार्ड, बे एके बे या चित्रपटातून अभिनय केला आहे.
आपल्या अफाट अष्टपैलू अभिनयाच्या गुणांनी नाट्य-चित्रसृष्टीवर कायमस्वरूपी ठसा उमटवणारे गंभीर प्रवृतीचे अभिनेते निळू फुले यांचा जन्म २५ जुलै १९३१ रोजी पुणे येथे झाला.
निलकांत कृष्णाजी फुले उर्फ निळूभाऊ सुरवातीच्या काळात वानवडीच्या लष्करी महाविद्यालयात माळीकाम करत असत. हे पिढीजात काम करताना त्यांना मनापासून आनंद मिळत होता. याच क्षेत्रात करिअर करायचा त्यांचा विचार होता. मात्र, आर्थिक अडचणीमुळं त्यांना नर्सरी उघडता आली नाही. तेव्हा मिळणाऱ्या ८० रुपये पगारातले दहा रुपये निळूभाऊ राष्ट्रसेवा दलाला देत होते.
१९५७ च्या सुमारास संयुक्त महाराष्ट्र लढ्याच्या वेळी निळूभाऊंनी सेवादलासाठी येऱ्यागबाळ्याचे काम नोहे हे नाटक लिहिलं. या नाटकामुळं निळूभाऊंचे नाव झालं. मग त्यांनी माळीकाम सोडून पूर्णवेळ अभिनय क्षेत्रात येण्याचा निर्णय घेतला.
राम नगरकरांसोबत त्यांनी कथा अकलेच्या कांद्याची हे वगनाट्य गाजवलं. महाराष्ट्रभरात या दोघांचे नाव झालं. अनंत मानेंच्या एक गाव बारा भानगडी या तमाशापटात निळूभाऊंना सिनेमातील पहिला ब्रेक मिळाला. या सिनेमात त्यांनी साकारलेल्या झेले अण्णांच्या भूमिकेनं त्यांना मराठी चित्रसृष्टीची कवाडं खुली झाली.
पुढं १९७२ मध्ये निळूभाऊंनी विजय तेंडुलकरांचं सखाराम बाइंडर या नाटकात काम केले आणि या नाटकानं इतिहास घडवला. त्यांना स्वतःलाही बाइंडर आणि दळवींच्या सूर्यास्तमधले अप्पाजी या भूमिका विशेष आवडायच्या. अप्पाजी ही भूमिका तात्त्विक दृष्ट्या त्यांच्या प्रत्यक्ष जीवनातील मूल्यांशी साधर्म्य सांगणारी होती, म्हणूनही असेल.
बाइंडर नंतर तेंडुलकरांच्याच सामनामध्ये निळूभाऊंना हिंदूराव धोंडे पाटील साकारण्याची संधी मिळाली.शांतारामबापूंच्या पिंजरामुळं डॉ. श्रीराम लागूंचं मोठं नाव झालं होतं. सामनात निळूभाऊंचा सामना त्यांच्याशीच होता. प्रेक्षकांना मात्र या दोन नटश्रेष्ठांची जुगलबंदी पाहण्याचा अपूर्व योग लाभला.
वास्तविक पिंजरात निळूभाऊ होतेच. त्यांची भूमिका छोटी होती. मात्र, मास्तरांकडं पाहून केवळ कुत्सितपणे हसणं एवढीच कामगिरी त्यांनी अशी जबरदस्त साकारली होती, की हे केवळ निळूभाऊच करू जाणे. मास्तर म्हणजे डॉ. लागू संतापून एकदा निळूभाऊंच्या जोरात मुस्कटात भडकावतात, हा प्रसंग म्हणजे त्या चित्रपटातील एक हायपॉइंट ठरला होता. निळूभाऊंच्या अभिनय सामर्थ्याची प्रचिती डॉ. लागूंना तेव्हाच आली होती. त्यामुळं सामना करताना दोघांनाही मजा आली. हिंदूरावची भूमिका निळूभाऊ अक्षरशः जगले. तेव्हा महाराष्ट्रात सहकार क्षेत्रातून ग्रामीण भागात होत असलेले बदल आणि या साखरसम्राटांकडून सुरू झालेला सत्तेचा गैरवापर हा मुद्दा प्रभावी होता. तेंडुलकरांनी हिंदूरावची भूमिका जबरदस्त लिहिली होती. या भूमिकेला निळूभाऊंनी पुन्हा एकदा समर्थपणे न्याय दिला.
सामना चित्रपटानंतर निळूभाऊंकडं अशाच पद्धतीच्या भूमिकांची रांग लागली. सगळेच चित्रपट काही एवढे दर्जेदार नसायचे. निळूभाऊंचाही पोटापाण्याचा व्यवसाय असल्यानं येतील त्या भूमिका कराव्या लागायच्या. बहुतेक वेळा टिपिकल खलनायक रंगवावा लागे. त्यात मग नायिकेच्या पदराला हात घालण्याचा प्रसंग अनेक वेळा यायचा. एरवी अत्यंत सच्छिल असलेल्या निळूभाऊंना वारंवार नायिकेवर बलात्कार करण्याचा सीन शूट करावा लागायचा. मराठी सिनेमांतल्या नायिकाही त्याच त्या असायच्या. कोल्हापुरातल्या मुक्कामात शेवटी ते वैतागून दिग्दर्शकाला म्हणाले, अरे, गेल्या तीन सिनेमांत मी तेच करतोय आणि बाईही तीच. निदान या खेपेला बाई तरी बदला...
एक किस्सा सांगतात की एका मराठी कलाकाराने निळूभाऊंना घरी जेवायला बोलावलं होतं. त्या वेळी त्या कलावंताच्या आईनं, असल्या नालायक माणसाला मी जेवायला वाढणार नाही, असं म्हणून त्यांना जेवणही नाकारलं होतं. ही त्यांच्या भूमिकेची ताकद होती.
त्यांच्या या नेहमीच्या पठडीतून बाहेर काढून, त्यांना एकदम प्रोटॅगनिस्टची भूमिका देण्यासाठी पुन्हा जब्बार पटेल धावून आले. अरुण साधूंच्या मुंबई दिनांक आणि सिंहासन या दोन कादंबऱ्यांवर आधारित सिंहासन या चित्रपटात दिगू टिपणीस या पत्रकाराची भूमिका निळूभाऊंच्या वाट्याला आली. सत्ताकेंद्राच्या अत्यंत जवळ राहून, सिंहासनाचा सर्व खेळ तटस्थपणे पाहणाऱ्या दिगूची भूमिका निळूभाऊंनी समरसून केली. या चित्रपटाचा शेवट मंत्रालयाच्या बाहेर खदाखदा हसत सुटलेल्या दिगूवर होतो. निळूभाऊंनी त्या हसण्यात त्या व्यवस्थेविषयीची सर्व प्रतिक्रिया एवढी टोकदारपणे व्यक्त केली होती, की तो चेहरा आजही डोळ्यांसमोरून हलत नाही.
जब्बार पटेलांच्या बहुतेक सिनेमांत निळू फुले असायचेच. मग तो जैत रे जैत असो, की एक होता विदूषक असो.
निळू फुले यांनी थोडे-फार हिंदी सिनेमेही केले. 'कुली'मध्ये ते अमिताभसमोर तेवढ्याच ताकदीनं उभे राहिले. महेश भटच्या 'सारांश'मध्येही त्यांना खलनायक साकारायला मिळाला. पण निळू फुले हिंदीत फार रमले नाहीत. त्यांना आपल्या गावरान मराठी सिनेमांचा ठसकाच अधिक भावत असावा.
निळू फुले यांच्या व्यक्तित्वाचा आणखी एक विशेष म्हणजे ते निव्वळ अभिनेते नव्हते. त्याहीपलीकडं जाणारी,खऱ्या आयुष्यातली माणूस नावाची एक वास्तववादी भूमिका ते अगदी समरसून जगत होते. महात्मा फुल्यांचा वारसा सांगणारे एक सामाजिक अंग निळूभाऊंना होते. सर्वसामान्य, गोरगरीब जनतेविषयी त्यांना कळवळा होता. शबनम, झब्बा अशा साध्या वेषात एरवी ते तसेही कार्यकर्ताच वाटत. राष्ट्रसेवा दल, डॉ राममनोहर लोहिया यांच्या विचारांची बांधिलकी त्यांनी आयुष्यभर जपली. सामाजिक कृतज्ञता निधी, अंधश्रद्धा निर्मूलन समिती अशा विविध उपक्रमांना, संघटनांना त्यांचा सक्रिय पाठिंबा असे.
निळू फुले यांना अनेक पुरस्कार मिळाले त्यात महाराष्ट्र शासनातर्फे अभिनयासाठी सलग ३ वर्षे साहित्य संगीत अकादमीचा पुरस्कार, 'सूर्यास्त' या नाटकाकरिता नाट्यदर्पण हा पुरस्कार,जयंतराव टिळक जीवनगौरव पुरस्कार यांचा समावेश आहे.
निळू फुले यांचे १३ जुलै २००९ रोजी निधन झाले.
निळू फुले यांची कारकीर्द
गाजलेली लोकनाट्ये
कथा अकलेच्या कांद्याची, कुणाचा कुणाला मेळ नाही, पुढारी पाहिजे, बिन बियाचे झाड, मी लाडाची मैना तुमची, राजकारण गेलं चुलीत, लवंगी मिरची कोल्हापूरची, वगैरे.
गाजलेले मराठी चित्रपट
अजब तुझे सरकार, आई (नवीन), आई उदे गं अंबाबाई, आघात, आयत्या बिळावर नागोबा, एक गाव बारा भानगडी, एक रात्र मंतरलेली, एक होता विदुषक, कडकलक्ष्मी, कळत नकळत, गणानं घुंगरू हरवलं, गल्ली ते दिल्ली, चटक चांदणी, चांडाळ चौकडी, चोरीचा मामला, जगावेगळी प्रेमकहाणी, जन्मठेप, जिद्द, जैत रे जैत, दिसतं तसं नसतं, दीड शहाणे, धरतीची लेकरं, नणंद भावजय, नाव मोठं लक्षण खोटं, पटली रे पटली, पदराच्या सावलीत, पायगुण, पिंजरा, पुत्रवती, पैज, पैजेचा विडा, प्रतिकार, फटाकडी, बन्याबापू, बायको असावी अशी, बिन कामाचा नवरा, भन्नाट भानू, भालू, भिंगरी, भुजंग, मानसा परीस मेंढरं बरी, मालमसाला, मुक्काम पोस्ट ढेबेवाडी, राघुमैना, राणीने डाव जिंकला, रानपाखरं, रावसाहेब, रिक्षावाली, लाखात अशी देखणी, लाथ मारीन तिथं पाणी, वरात, शापित, सतीची पुण्याई, सर्वसाक्षी, सवत, सहकारसम्राट, सामना, सासुरवाशीण, सोबती, सोयरीक, सिंहासन, सेनानी साने गुरूजी, सोंगाड्या, हर्या नार्या जिंदाबाद, हळदी कुंकू, हीच खरी दौलत.
गाजलेले हिंदी चित्रपट
कूली, जरा सी जिंदगी, दिशा, दुनिया, नरम गरम, प्रेम प्रतिज्ञा, मशाल, सारांश, सौ दिन सास के
गाजलेली नाटकं, जंगली कबूतर, बेबी, रण दोघांचे, सखाराम बाईंडर, सूर्यास्त.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
जेष्ठ रंगकर्मी मोहनदास सुखटणकर यांचा जन्म २१ नोव्हेंबर १९३० गोव्यातील माशेल येथे झाला. मोहनदास सुखटणकर यांचे पणजोबा, आजोबा आणि वडील हे त्या काळातील प्रख्यात वैद्य. मोहनदास यांचे प्राथमिक आणि मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण माशेल आणि म्हापसा येथे झाले. म्हापशाच्या ‘सारस्वत विद्यालय’ या मराठी शाळेत इयत्ता दुसरीत शिकत असताना त्यांनी पहिल्यांदाच एका छोटया नाटुकलीत काम केले.
त्या नाटुकलीचे नाव होते, ‘खोडकर बंडू’. अभिनय येतो म्हणून नाही, तर वर्गात सतत बडबड करतो म्हणून, आरोंदेकर मास्तरांनी त्या नाटुकलीत काम करायची त्यांना शिक्षा केली होती. त्या नाटुकल्याच्या निमित्ताने मोहनदास सुखटणकरांच्या गालाला जो पहिल्यांदा रंग लागला तो कायमचा. नाटुकलीत खोडकर बंडूची प्रमुख भूमिका करून ज्या वेळी त्यांनी बक्षीस पटकावले, त्या वेळी प्रेक्षकांनी त्यांच्या धिटाईचे कौतुक केले. या नाटुकलीमुळेच सुखटणकरांना नाटकाची गोडी लागली. त्या निमित्ताने आपल्याला मुळातच अभिनयाची आवड होती याची जाणीवही त्यांना झाली.पुढे गोव्यात ‘अँग्लो-पोर्तुगीज इन्स्टिटय़ूट’ या हायस्कूलमध्ये शिकत असताना शाळेच्या वार्षिक संमेलनातून तीन ते चार वर्ष स्व-लिखित कोकणी प्रहसनांतून मोहनदासांनी विनोदी भूमिका साकारल्या व पारितोषिकेही मिळवली.
तेव्हा अभिनयात करिअर करायचे आहे, असे काही त्यांच्या मनात नव्हते. पण छंद म्हणूनच सुखटणकर सारे करीत होते. त्यांच्या गांधीवादी विचारांच्या मामांचे एक सांगणे असायचे, आयुष्यात छंद जोपासावेत, पण मुख्य कामाकडे दुर्लक्ष करून नाही. मामांचे विचार त्यांच्यावर बिंबले ते कायमचे. त्यामुळे अभिनयाचा छंद जोपासताना सुखटणकरांनी शाळेच्या अभ्यासाची कधीही हेळसांड केली नाही. गावी मॅट्रिकच्या परीक्षेचे केंद्र नसल्याने १९५० मध्ये ते परीक्षेसाठी मुंबईला आले. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने मॅट्रिक झाल्यानंतर त्यांनी नोकरीची शोधाशोध सुरू केली. ‘बर्मा शेल’ मध्ये लेखी परीक्षा व मुलाखतीत यशस्वी झाले, पण वैद्यकीय चाचणीत कमी वजन भरल्याने त्यांना नोकरी मिळाली नाही. बॅलार्डपिअर येथून चर्चगेटला चालत निघाले असताना मुंबईत राहून काय करायचे, पुन्हा गोव्याला जाऊ या असा विचार त्यांच्या मनात घोळायला लागला. फ्लोरा फाउंटनजवळ ते आले असता एक गाडी थांबली.
गाडीत ‘इकॉनॉमिक टाइम्स’चे सहसंपादक डी. के. रांगणेकर होते. रांगणेकर कुटुंब मूळचे गोव्याचे असल्याने ते सुखटणकर कुटुंबीयांना ओळखत होते. विचारपूस झाल्यानंतर रांगणेकर यांनी त्यांना गाडीत बसायला सांगितले व त्यांना चष्म्याच्या काचा व फ्रेम बनविणाऱ्या ‘माँटेक्स कॉर्पोरेशन’ कंपनीच्या मालकांकडे घेऊन गेले. ‘याला नोकरी द्या’ अशी विनंती मालकाला केली. येथे ‘टंकलेखक’ म्हणून सुमारे सहा महिने त्यांनी नोकरी केली. १ एप्रिल १९५१ मध्ये ‘ओरिएन्टल इन्शुरन्स’ मध्ये ते ‘लिपिक’ म्हणून लागले आणि ३० नोव्हेंबर १९९० मध्ये महामंडळाच्या सेवेतून ‘प्रसिद्धी अधिकारी’ म्हणून निवृत्त झाले. नोकरी करत असताना ते जयहिंद महाविद्यालयातून ‘अर्थशास्त्र’ विषय घेऊन ‘बी.ए.’ झाले.
महाविद्यालयाच्या पहिल्याच वर्षी डॉ. चारुशीला गुप्ते यांनी जयहिंद मराठी वाङ्मय मंडळाची स्थापना करून सुखटणकरांना सचिव बनवले. या वाङ्मय मंडळांतर्गत विविध कार्यक्रम झाले.. महाविद्यालयाच्या वसतिगृहासाठी ‘लग्नाची बेडी’ हे नाटक करून मंडळाने निधी जमा केला. त्यार नाटकात मोहनदास यांनी ‘गोकर्ण’ची भूमिका साकारली होती. आत्माराम भेंडे, आशा भेंडे, बबन प्रभू ही व्यावसायिक रंगभूमीवर काम करणारी माणसेही त्यात होती.
त्यानंतर सुखटणकर विविध एकांकिका स्पर्धांमधून भाग घेऊ लागले. त्यांनी एकांकिकांतून फक्त विनोदी भूमिकाच केल्या नाहीत, तर गंभीरही केल्या. ‘वहिनी’ या एकांकिकेत त्यांनी ‘वल्लभ’ची गंभीर भूमिका रमाकांत देशपांडे यांच्या दिग्दर्शनाखाली साकारली.
‘मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालया’च्या स्पध्रेत चारुशीला गुप्ते यांच्या ‘आम्ही सारेच वेडे’चा प्रयोग झाला. त्यात सुखटणकरांनी एका प्रौढाची विनोदी भूमिका वठवून उत्कृष्ट अभिनयासाठी असलेले पारितोषिक मिळवले. भारतीय विद्याभवनात ‘आंतर महाविद्यालयीन नाट्यस्पर्धा’ व्हायच्या. तिथे सुखटणकरांनी ‘भाऊबंदकी’त काम केले आणि. गंगाधर गाडगीळांच्या ‘वेडयांचा चौकोना’तही केले.. या दोन्ही नाटकांसाठी त्यांना बक्षीस मिळाले.१९५८ साली बी. ए. झाल्यावर मोहनदास सुखटणकर मुंबईतच ‘गव्हर्नमेंट लॉ कॉलेज’मध्ये शिकू लागले.आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेत या कॉलेजने सादर केलेल्या ‘बळी’ आणि ‘लाल गुलाबाची भेट’ या एकांकिकांसाठी त्यांना अभिनयाची प्रशस्तीपत्रके मिळाली. १९५९ साली महाराष्ट्र राज्य नाटय स्पर्धेत ‘इंडियन नॅशनल थिएटर’ने ‘अशीच एक रात्र येते’ हे प्रा. प्रभाकर ताम्हाणे यांचे नाटक सादर केले.
त्यात भय्यासाहेब वकील ही एक अत्यंत महत्त्वाची भूमिका मोहनदास सुखटणकरांनी वठवली. या नाटकात त्यांच्याबरोबर प्रसिद्ध लेखिका विजया पाटील यांनी काम केले होते, तर भय्यासाहेब वकिलाच्या मुलीची भूमिका मीनल मडकईकर यांनी केली होती. या नाटकाच्या प्रयोगाला ‘दी गोवा हिंदू असोसिएशन’चे कार्यकर्ते उपस्थित होते. त्यांनी सुखटणकरांनाला गाठून ‘तू गोव्याचा. आमच्या संस्थेत तू असलंच पाहिजेस,’ वगैरे गोष्टी सुनावल्या, आणि त्यांना ‘दी गोवा हिंदू असोसिएशन’मध्ये घेतले.
मोहनदास सुखटणकर यांच्या आयुष्यात आणि नाटय़ प्रवासात ‘धि गोवा हिंदू असोसिएशन’ला खूपच महत्त्वाचे स्थान आहे. या संस्थेत अगोदर त्यांनी कलाकार म्हणून प्रवेश केला आणि नंतर ‘कार्यकर्ता’ भूमिकेत वावरले. संस्थेच्या बहुतेक नाटकांमधून मोहनदास सुखटणकर यांनी कामं केलीत. ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ या नाटकात स्त्रीपात्र सोडून त्यांनी बहुतेक भूमिका साकारल्या. मोहनदास सुखटणकर यांनी चाळीस नाटकांमधून कामं केली आहेत. मत्स्यगंधा (चंडोल) , लेकुरे उदंड झाली (दासोपंत ), अखेरचा सवाल (हरिभाऊ), दुर्गी (मोरोबा नाडकर्णी), स्पर्श (नाटेकर), आभाळाचे रंग (आबा) ही काही त्यांची गाजलेली नाटकं.
नाटकांप्रमाणेच त्यांनी ‘कैवारी’, ‘जावई माझा भला’, ‘चांदणे शिंपीत जा’, ‘थोरली जाऊ’, ‘वाट पाहते पुनवेची’, ‘जन्मदाता’, ‘पोरका’, ‘प्रेमांकुर’, ‘निवडुंग’ आदी मराठी चित्रपटांतही काम केले आहे. आकाशवाणी मुंबई केंद्रांवरील अनेक श्रुतिका, नभोनाटय़ यातही ते सहभागी झाले. मुंबई दूरदर्शन केंद्रावरील विविध नाटके, ‘गजरा’ या कार्यक्रमात ते होते. ‘दामिनी’, ‘बंदिनी’, ‘महाश्वेता’ या त्यांच्या निवडक मराठी मालिका तर ‘आनंदी गोपाळ’, ‘सिंहासन’, ‘नई दुनिया’ या हिंदूी मालिका. पण दूरचित्रवाहिन्यांवरील मालिकेत ते फारसे रमले नाहीत. नाटककार वि. वा. शिरवाडकर यांचा निकटचा सहवास त्यांना लाभला. शिरवाडकर यांचे मोठे ऋण आपल्यावर असल्याचे ते मानतात.
शशी मेहता यांच्यासह सुखटणकर यांनी शिरवाडकर यांच्या नाटकातील स्वगते, कविता यांचा समावेश असलेला ‘शब्दकळा कुसमाग्रजांच्या’ हा कार्यक्रम सादर केला. कुसुमाग्रज यांच्या सूचनेवरूनच ‘गोवा हिंदू’ने गोव्यात १९८१ ‘स्नेहमंदिर’ वृद्धाश्रम उभारला. रामकृष्ण नायक यांच्याबरोबर सुखटणकर यांचेही या कामात योगदान आहे. साहित्य, सांस्कृतिक, नाटय़ क्षेत्रातील दिग्गजांचा सहवास त्यांना लाभला. पु. ल. देशपांडे, पं. भीमसेन जोशी, मंगेश पाडगावकर, वसंत बापट, शंकर वैद्य, सुधीर मोघे, वसंत कानेटकर, भास्कर चंदावरकर, जयवंत दळवी, व. पु. काळे आदी मंडळी या ना त्या निमित्ताने अनेकदा त्यांच्या घरी आली आहेत.
मोहनदास सुखटणकर यांना राजहंस प्रतिष्ठान' या संस्थेतर्फे देण्यात येणारा 'राजहंस पुरस्कार' , नाट्यक्षेत्राची ५०हून अधिक वर्षे सेवा केल्याबद्दल मुंबईच्या ’आम्ही गोवेंकर’ या प्रतिष्ठित संस्थेकडून जीवनगौरव पुरस्कार असे पुरस्कार मिळाले आहेत.
संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
काही वर्षे 'प्रभात' व 'लोकमान्य' वृत्तपत्रांचे उपसंपादक म्हणून काम केल्यावर ते 'युनायटेड स्टेट्स इन्फर्मेशन सर्व्हिसेस' (यू.एस.आय.एस.) मध्ये रुजू झाले. त्यांचा जन्म १४ ऑगस्ट १९२५ रोजी झाला. इंग्लिश साहित्य भारतीय भाषांमध्ये उपलब्ध व्हावे यासाठी त्या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी प्रयत्न केले. त्यांनी कधीच ‘मी लेखक आहे’ अशी ऐट घरात ठेवली नाही. ते स्वत: पत्नी-मुलांमध्ये आपल्या साहित्याविषयी बोलत नसत, परंतु कोणी त्याबद्दल बोलले तर निमूट ऐकून घेत. त्यांचा स्वभाव याला कारणीभूत असेल. अनेकांना आत्मस्तुती आवडते. पण जयवंत दळवींसारख्या मोठय़ा साहित्यिकाला कोणी आपली स्तुती केली तर संकोचल्यासारखे वाटायचे.
जयवंत दळवींच्या साहित्यात पारदर्शकताच जाणवते. त्यांच्या संपूर्ण साहित्यात त्यांच्या आरवलीच्या घराचे, गावाचे नि एकूणच कोकणातील लोकांचे प्रतिनिधित्व करणा-या माणसांचे चित्रण आढळते. जवळजवळ (कविता सोडून) लेखनाचे सर्व प्रांत काबीज करून आपली वेगळी ओळख त्यांनी निर्माण केली. त्यांचा स्वत:बद्दलचा प्रांजळपणा त्यांच्या कथा, कादंबरी नाटकांतूनच नव्हे तर त्यांच्या विनोदी लेखनातूनही जाणवतो. अरविंद गोखले यांच्या ‘उभा जन्म उन्हात’ या कथेवर त्यांनी नाटक लिहून नाटय़ लेखनाला सुरुवात केली. सांगली, कोल्हापुरातील पाच प्रयोगांनंतर ते मुंबईला लागले.
तिकीटविक्री होईना म्हणून पदरचे शंभर- दीडशे खर्चून चार-चार, पाच-पाच जिने चढून फु कट पास वाटले. प्रयोगाला गर्दी जमली. मंगेश पाडगावकर पासावरचे नाटक पाहूनही कंटाळले, वैतागले आणि ‘दळवी, हे बंद करा!’ नाटक हा तुमचा प्रांत नाही! भाषणे आणि नाटके तुम्हाला जन्मात जमणार नाहीत असे सांगितले. पैकी पहिले खरे होते (दळवींच्या भिडस्त स्वभावामुळे) पण दुसरे दळवींनी खोटे पाडले. ‘सभ्य गृहस्थ हो!’ हे नाटक लिहिले. ते यशस्वी झाले. पण पहिल्या पडलेल्या नाटकाबद्दलचे सगळे आक्षेप, सगळय़ा टीका त्यांनी खिलाडूवृत्तीने स्वीकारल्या. त्यांच्या ब-याच कथा, कादंब-या, नाटकांतून वेडसर- वेडगळ स्तरावरची माणसे दिसतात. त्यावरही खूप पत्रे, प्रतिक्रिया.
सतीश दुभाषी या प्रख्यात नटवर्याने एकदा गंभीरपणे सांगितलंही, ‘दळवी, मी सांगतो म्हणून राग मानू नका!’ पण एके दिवशी तुम्हाला वेड लागेल! तुम्ही सावध राहा! तुम्हाला या वेडय़ा माणसांचे इतके वेड आहे की, ती माणसे एकदा तुम्हाला वेड लावतील. तुम्ही तो नाद सोडा!’ या बोलण्याचा आपल्यावर झालेला परिणाम १९८४ च्या कदंब दिवाळी अंकातील आपल्या लेखात अत्यंत विनोद बुद्धीने चित्रित केला आहे. त्यांच्यातील खोडकर व्रात्य मूल त्यांच्या साहित्यातून जाणवते. त्यांची विनोदबुद्धी नि खिलाडूपणा जाणवणे त्याचबरोबर एक साहित्यिक शैली! मृत्यूकडेही त्यांनी त्याच खेळकरपणे पाहिले.
जयवंत दळवींनी आत्मचरित्र लिहावे असे अनेकांना वाटे. मात्र दळवी आत्मचरित्र लिहिण्याच्या पूर्ण विरोधात होते. स्वत:संबंधी जे जे आठवते ते लिहायचे अशी आत्मचरित्र लिहिण्यामागची लेखकाची कल्पना असते. पण पृष्ठभागावर येणा-या आठवणी म्हणजे आत्मचरित्र नसून अंतरंग खरवडत जाऊन उमटणे हे कठीण कर्म म्हणजे आत्मचरित्र!
मनातील सुप्त इच्छा, आकांक्षा, आशा वासना – ज्यांचा सभ्य संस्कृतीत उच्चारही करता येत नाही ते लिहिणे म्हणजे खरे आत्मचरित्र! मात्र आत्मसमर्थनासाठी आत्मचरित्रे लिहिली जातात-ती एकांगी असतात आणि स्वत:च स्वत:ला दिलेली प्रशस्तिपत्रे असतात असे दळवींचे मत होते. मा.जयवंत दळवी यांनी ठणठणपाळ या टोपणनावाने काही वृत्तपत्रीय स्तंभलेखन केले होते. मा.जयवंत दळवी यांचे १६ सप्टेंबर १९९४ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ:-प्रहार/ विकिपीडिया
जयवंत दळवी यांनी लिहिलेल्या चित्रपट कथा / पटकथा
उत्तरायण (इ.स. २००५) (’दुर्गी’वर आधारित), चक्र (इ.स. १९८१), रावसाहेब (इ.स. १९८६)
जयवंत दळवी यांनी लिहिलेल्या कथांवर आधारित काही एकांकिका
चिमण (नाट्यरूपांतर- गिरीश जयवंत दळवी), डॉ.तपस्वी (नाट्यरूपांतर- जयवंत दळवी), प्रभूची कृपा ((नाट्यरूपांतर गिरीश जयवंत दळवी)
छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वसामान्य मावळ्यांना बरोबर घेऊन स्वराज्याचे धोरण बांधले आणि हिदवी स्वराज्य स्थापन केल्यावर जी नवरत्ने घडवली त्या प्रत्येकाच्या कर्तृत्वाला इतिहासात तोड नाही.
डॉ. शंकर दयाळ शर्मा यांना अनेक मानसन्मान मिळाले. भारतीय विद्यापीठांसह लंडन व केंब्रिज विद्यापीठाने त्यांना सन्मान्य डॉक्टरेट पदव्या देऊन गौरविले. पहिला श्री. चंद्रशेखरेंद्र सरस्वती राष्ट्रीय पुरस्कारही त्यांना देण्यात आला होता.
इंग्रजी चौथीचा वर्ग. जाणिवेचे आकलन नुकतेच व्हायला लागले होते. आयुष्यातील आकांक्षा, महत्त्वाकांक्षेचे धुमारे फुटू लागले होते. एक दिवस वर्गात शिक्षकांनी विद्यार्थ्यांना प्रश्न विचारला, ‘‘तू कोण होणार रे ?’’ प्रत्येक विद्यार्थी उठून उत्तर देत होता. कोणी सांगितलं, ‘‘टिळक’’ कोणी ‘‘डॉक्टर’’ तर कोणी ‘‘कवी’’ पण त्यात एक मुलगा म्हणाला, ‘‘मी यशवंतराव होणार !’’आत्मविश्वासाची, आत्मप्रत्ययाची जाणीव इतक्या लहान वयात ज्यांना झाली होती ते यशवंतराव चव्हाण !
स्वातंत्र्योत्तर महाराष्ट्रातील बदलत्या सामाजिक-सांस्कृतिक जाणिवांवर मूलभूत चिंतन करणाऱ्या, हाताच्या बोटांवर मोजता येणाऱ्या विचारवंतांमध्ये डॉ. आ. ह. साळुंखे यांचे नाव घ्यावेच लागते. कोल्हापूर येथे या आठवडय़ात त्यांना प्रदान केल्या जाणाऱ्या छत्रपती शाहू पुरस्कारामुळे त्यांच्या वैचारिक प्रवासाला एक प्रागतिक अधिष्ठान लाभले आहे. महाराष्ट्राच्या भविष्याबाबत त्यांच्या अध्यक्षतेखालील समितीने तयार केलेले सांस्कृतिक धोरण थोरामोठय़ांकडून वाखाणले गेले.
सांगली जिल्हय़ात खाडेवाडीसारख्या छोटय़ा गावात १९४३ मध्ये शेतकरी कुटुंबात साळुंखे जन्माले. आयुष्यभर नांगर ओढत, पाण्याच्या पखाली वाहण्याचेच काम करावे लागता कामा नये याची पक्की जाणीव आ. ह. साळुंखे यांना असली पाहिजे; डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुद्ध ही त्यांची केवळ दैवते नव्हती, तर त्यांच्या विचारांची आणि त्यासाठी झालेल्या सामाजिक प्रवासाची त्यांना अगदी लहान वयातच ओढ लागलेली होती. संत तुकारामांच्या बंडखोर विचारांना समाजाने कसे अलगद उचलले आणि त्यांच्या बंडखोरीलाही कशी समाजमान्यता मिळाली, याचा अनुभव डॉ. आ. ह. साळुंखे यांना लहान वयातच आला.
भारतीय संस्कृतीबद्दलची जिज्ञासा पुरी करण्यासाठी केवळ समाजविज्ञानाच्या अंगाने जाता कामा नये, त्यासाठी साहित्याची उपासना महत्त्वाची आहे, याचे भान ठेवत, साळुंखे यांनी शिवाजी विद्यापीठात बी.ए.च्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेताना संस्कृत विषय ‘स्पेशल’ला घेतला होता. या परीक्षेत ते विद्यापीठात प्रथम आले. एम. ए. च्या परीक्षेतही त्यांनी संस्कृत आणि मराठी या विषयांत स्वतंत्ररीत्या प्रावीण्य मिळवले. संस्कृत आवडीचा विषय असल्याने ‘चार्वाक दर्शनाचा चिकित्सक अभ्यास’ या विषयात संशोधन करून त्यांनी पीएच.डी. ही संपादन केली. शिवाजी विद्यापीठाच्या संस्कृत अभ्यास मंडळाचे अध्यक्ष, वाङ्मय विद्याशाखेचे अधिष्ठाता या नात्याने डॉ. साळुंखे यांनी संस्कृत आणि मराठी भाषेच्या अध्यापनाच्या क्षेत्रात बत्तीस वर्षे केलेली उल्लेखनीय कामगिरी जेवढी महत्त्वाची तेवढीच, कदाचित काकणभर सरस असलेली त्यांची ग्रंथसंपदा आहे. महाराष्ट्राला पहिल्यापासूनच नवनव्या विचारांचे आकर्षण राहिलेले आहे.
वैचारिक प्रबोधनाच्या क्षेत्रात महाराष्ट्र सतत आघाडीवर राहिला. संत तुकाराम, संत चोखामेळा, संत सावतामाळी यांच्यासारख्या आधुनिकतेला स्पर्श करणाऱ्या विचारवंत संतपरंपरेनंतर महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. आंबेडकर अशी एक वैचारिक परंपरा महाराष्ट्रात निर्माण झाली आणि तिच्यावर पालनपोषण झालेले अनेक विचारवंत त्या विचारांमध्ये स्वत:ची भर घालून नवा सिद्धान्त मांडण्याचा प्रयत्न करत असतात. डॉ. साळुंखे यांचे या क्षेत्रातील कार्य अत्यंत मौलिक स्वरूपाचे आहे. समाजाला विचारप्रवृत्त करून योग्य त्या मार्गापर्यंत नेण्यासाठी सातत्याने समाजाचा आणि त्यातील आडव्या-उभ्या धाग्यांच्या विणीचा अभ्यास करणाऱ्या मोजक्या विचारवंतांमध्ये डॉ. साळुंखे यांचे नाव यासाठीच घ्यावे लागते.
‘गुलामांचा आणि गुलाम करणाऱ्यांचा धर्म’, ‘सर्वोत्तम भूमिपुत्र- गौतम बुद्ध’, ‘बळीवंश’, ‘तुळशीचे लग्न : एक समीक्षा’, ‘विद्रोही तुकाराम : समीक्षेची समीक्षा’, ‘आस्तिकशिरोमणी चार्वाक’, ‘धर्म की धर्मापलीकडे’, ‘म. फुले आणि धर्म’, ‘मनुस्मृतीच्या समर्थकांची संस्कृती’ अशी त्यांच्या ग्रंथांची शीर्षके जरी पाहिली, तरीही त्यांच्या वैचारिक क्षेत्रातील विस्तृत कामगिरीचा अंदाज येतो. तीसहून अधिक संख्येने प्रकाशित झालेली त्यांची ग्रंथसंपदा म्हणजे महाराष्ट्राच्या सामाजिक घडामोडींच्या इतिहासाचा आढावाच आहे. आपण चळवळीतराहावे आणि त्यातून समाजप्रबोधन करावे, अशी ऊर्मी डॉ. साळुंखे यांनाही होणे स्वाभाविक होते.
धर्माच्या ऐतिहासिक गरजेपेक्षा वेगळा विचार करण्याच्या क्षमतेमुळेच शिवधर्म या नवीन विचारांची उकल करण्याची आवश्यकता त्यांना भासली. प्रखर बुद्धिमत्ता आणि त्याची साक्षेपी मांडणी करणाऱ्या आ. ह. साळुंखे यांनी लिहिलेल्या ‘तुझ्यासह आणि तुझ्याविना’ या एका अप्रतिम ललित लेखनाचा उल्लेख अपरिहार्य आहे. पती-पत्नीच्या सहजीवनातील अतिशय तरल आणि भावुक नात्यांचा त्यांनी केलेला उलगडा म्हणजे त्यांच्या साहित्यिक उंचीचा एक आगळा नमुना आहे. डॉ. साळुंखे यांच्या वैचारिक प्रवासाला शुभेच्छा देत असतानाच त्यांच्या मौलिक कार्याची दखल सर्व सामाजिक प्रवाहांतील जाणत्यांनी घेणे तितकेच गरजेचे आहे.
प्रकृती आपल्याला कधीकधी जाणवते पण विकृती मात्र आपल्या शरीरात खोलवर चोच खुपसून बसलेली असते. ती कधी आपली खुपसलेली चोच खसकन बाहेर काढेल याचा नेम नसतो. त्यांच्या ‘ चानी ‘ कादंबरीचा शेवट बघीतला की ती ‘खसकन’ बाहेर आलेली चोच जाणवते. तर दुसरीकडे आपण त्यांची ‘ रात्र काळी घागर काळी ‘ वाचताना ‘ पार हबकून जातो
Copyright © 2025 | Marathisrushti