जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
जिश्नू संन्याल हे क्रिडाक्षेत्राला लाभलेलं ठाण्यातील रत्न असून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर बॅडमिंटन खेळाद्वारे स्वत:चे व पर्यायाने ठाणे शहराचे नाव उज्ज्वल करणारे व्यक्तिमत्व आहे.
आता ती मैफलही सुनीसुनी!
बऱ्याच वर्षांपूर्वीची संध्याकाळ. शास्त्रीय संगीताच्या एका मैफलीत एक उंच, सावळे व्यक्तिमत्व दाखल झाले. चालणे, डौल ‘नमवी पहा भूमी हा चालताना’ असे. कुतूहल चाळवले ते मैफलीत दाद देण्याची रीत पाहून. लहान-सहान जागांनाही जाणकारीने पण हळुवारपणे तर कधी ‘क्या बात है.’ अशी मोकळी दाद. मैफल संपल्यावर जेवणाआधीच्या ‘मैफली’त ओळख झाली- मी दत्ता मारुलकर! त्यांचे स्फुट लिखाण अनेकदा वाचले होते. थोडय़ाच वेळात ‘अरे-तुरे’वर आलो. नंतर दत्ता घरचाच झाला.
माणसे त्यांना जास्त आवडायची का संगीत हा प्रश्नच. सदैव गप्पांचा फड जमवण्याची आवड व जागरण करण्याची अमर्याद ताकद. सैन्यातली नोकरी त्याने प्रामाणिकपणे केली पण साहित्य-संगीतापासून दूर असणाऱ्या जगात तो रमू शकला नाही. १०/११ वर्षांतच त्याने सैन्यातून बाहेर पडत खासगी नोकरी पत्करली. त्या निमित्त दिल्ली, इंदूर, मुंबई, अहमदाबाद व शेवटी पुणे अशी भटकंती केली. पुण्यात मात्र तो स्थिरावला. नोकरीत कसूर नाही पण उरलेला वेळ गाणी ऐकणे, त्या समुदायात वावरणे, पुस्तके वाचणे असा ‘आनंदी आनंद गडे.’ वाचन, विशेषत: ललित मराठी वाचन हे दत्ताने प्रयत्नपूर्वक जपले होते.कादंबरी, नाटक, कथा, कविता अशा ललित साहित्याच्या प्रांगणात तो सुजाण वाचक म्हणून वावरायचा, त्यातली सौंदर्यस्थळे गप्पांच्या बैठकीत दाखवायचाही. मुळात तल्लख पण परिस्थितीमुळे महाविद्यालयीन जीवनाला पारखा असल्याने इंग्रजी ललित-वैचारिक लेखनापासून आपण बाजूला पडलो, ही त्याला खंत होती. ती उणीव भरून काढायला असे वाचन असलेल्या मित्रांकडून तो कुतूहल शमवायचा. कुतूहल लहान मुलांमध्ये असते तसे, सदैव जागरूक असे. दत्तामध्ये लपलेले हे ‘बालक’ कधी जागे होईल याचा अंदाज कधीच आधी येत नसे. मात्र अशा प्रसंगी त्रागा, वैताग या बरोबर ‘माता दिसली समरी विहरत’ याचा प्रत्यय येत असे. दत्ताचा कुठलाच मित्र, या ‘गेट आऊट’ ते ‘पुन्हा तोंड पाहणार नाही’ अशा रॅपिड फायर वर्षांवापासून वाचला नसेल. त्यातल्या त्यात सौम्य म्हणणे ‘आय अॅम सॉरी पण.’ असे यायचे. हे क्षणिक आहे, पुढच्या २/३ मिनिटांत गाडी पुन्हा रुळावर अशी खात्री- अनुभव गाठीशी असल्याने दत्ताशी मैत्री तुटणे अशक्य होते.
‘गाणे ऐकणे’ या नादापायी त्याने किती प्रवास केला, त्या क्षेत्रातल्या एकेका शिखरासोबत संवाद साधला, अनेक ठिकाणी जवळीकही झाली याची मोजदाद त्यालाही अशक्य होती. ललित साहित्याच्या डोळस वाचनाने, त्याही क्षेत्रात व्यक्तिगत ओळखी असल्याने प्रसन्न शैली त्याने कमावली होती. त्याच्या लेखनाचे संग्रह प्रकाशित झाले. संगीतावर जाणकारीने लिहिणारा-बोलणारा अशी प्रतिष्ठाही दत्ताला मिळाली. नोकरीच्या ठिकाणी घडलेल्या मालक-मजूर तंटय़ामागच्या तणावामधले नाटय़ रंगवणारी कादंबरी हे त्याचे पहिले स्वतंत्र ग्रंथलेखन.
कुठेतरी, केव्हातरी ‘संगीत’ या त्याच्या पंचप्राणाशी संबंधित स्वतंत्र ग्रंथनिर्मितीवर हा प्रवास त्याला घेऊन जाणार होता. तो योग आला आणि ‘गानसरस्वती’सारखे लक्षणीय पुस्तक आले. मात्र या निर्मितीनंतरचा अनुभव त्याला एकीकडे मनस्ताप देणारा तर दुसरीकडे आर्थिक नुकसान करणारा ठरला. या सर्व प्रकरणातले क्लेश त्याने पचवले. तिथे जन्म झाला ‘स्वरहिंदोळे’ या पुस्तकाचा. भारतीय संगीतविश्वातल्या सात शिखरांची शब्दचित्रे रेखाटताना दत्ताची लेखणी बहरली.
नंतर श्रीनिवास खळ्यांच्या सांगीतिक चरित्राला हात घातला गेला. यासाठी खूप धावपळ, परिश्रम केले पण ग्रंथ प्रकाशित झालेला पाहण्यास तो नाही.
एकदा माणूस आपला म्हटला, की त्याच्यासाठी दत्ता खस्ता खायला नेहमीच तयार असायचा. ओळखीच्या कुणाच्या आयुष्यातला, कुटुंबातला जीवघेणा प्रसंग कळला तर तो विव्हल होत असे. हे हळवेपण त्याच्या निखळ माणूसपणाचा भाग होते, पारदर्शी होते. एक-दोन वेळा आलेल्या अनुभवांमुळे असे वाटले होते की, आजाराला दत्ता हळवा आहे. प्रसंग किरकोळ होते. मात्र ही समजूत त्याच्या शेवटच्या आजारात खोटी ठरली. मधुमेह सोबती होता. बऱ्याचदा प्रकरण मर्यादेबाहेरही जाई.
दत्ताच्या सैन्य सोडल्यानंतरच्या आयुष्यातल्या अनेकानेक जागा फुलल्या त्या पुष्पावहिनींमुळे. शेवटची अनेक वर्षे घरची आर्थिक आवक, घर सांभाळणे, मुलींची लग्ने, दत्ताचा लोकसंग्रह असा सर्व व्याप शांतपणे सांभाळत पुन्हा स्वत:चे वाचन-महत्त्वाच्या कार्यक्रमांना उपस्थिती असे सर्व करायला लागणारी ऊर्जा वहिनींकडे कुठून येत होती हे मला आजही कोडेच आहे.
दत्ताचा उल्लेख संगीत समीक्षक म्हणून व्हायचा. व्याख्यानांमध्ये त्याची शैली हरिदासी कीर्तन परंपरेच्या सर्व वैशिष्टय़ांसह प्रकट व्हायची. असे चित्रदर्शी लिखाणही त्याचे वैशिष्टय़. वसंतराव देशपांडय़ांवरील लेखात दत्ताने, ‘स्वर्गात भरलेल्या संगीतसभेत वसंतराव नसल्याने रंग भरेना म्हणून ब्रह्मदेवाच्या आज्ञेने वसंतरावांना तिकडे बोलावून घेतले गेले’, असे चित्र रंगविले होते. अशा सभा सध्या तिथे वारंवार भरत असणार. दत्ताचे श्वास असलेले कुमार गंधर्व, माणिकताई, मोगूबाई कुर्डीकर, जितेंद्र अभिषेकी, शोभा गुर्टू. असे गायक व पु.ल., रामूभय्यांसारखे रसिक जाणकार यांच्या सभेत वसंतराव गात आहेत आणि एका जीवघेण्या ‘जागेवर’ मंडपातून दाद निनादताना ‘बहोत अच्छे’, ‘क्या बात है’ अशी उंच आवाजात ‘ठाण्’ स्वरात साद घातली जाईल ती या ‘हरितात्या’चीच असेल. ती जाणवून आजही त्याच्याशी बोलावे म्हणून अनेकदा हात फोनपर्यंत जातोच. दत्ता मारुलकर यांचे १२ फेब्रुवारी २००८ रोजी निधन झाले.
#DattaMarulkar
वयाच्या आठव्या वर्षापासून त्यांचे हिंदुस्तानी संगीताचे शिक्षण सुरू झाले. त्यांचा जन्म ५ ऑक्टोबर १९६९ रोजी झाला. त्यांना सुरुवातीचे सांगीतिक धडे घरातून, आई शोभा अभ्यंकर यांच्याकडून मिळाले. पं. गंगाधरबुवा पिंपळखरे यांच्याकडूनही मार्गदर्शन घेतले. हिराबाई बडोदेकर आणि वसंतराव देशपांडे यांनी त्यांना जसराजांकडे शिकायला पाठविण्याची शिफारस केली. जसराजांचे शिष्यत्व स्वीकारल्यानंतर त्यांची संगीत दिनचर्या संपूर्णत: बदलली. गुरु-शिष्य परंपरेनुसार त्यांचे शिक्षण चालू झाले. जसराजांच्याबरोबर भारतभर दौरे, संगीत मैफिलींमध्ये त्यांना साथ-संगत आणि त्याचवेळी हिंदुस्तानी संगीतातील अभिजात स्वरांचे धडे, अशा नानाविध मार्गांनी त्यांची सांगीतिक प्रगती होत होती. अकराव्या वर्षी संगीताची पहिली मैफल गाजविणाऱ्या संजीव अभ्यंकरांनी त्यानंतर देशभरातील विविध महोत्सवांमध्ये आपल्या गायकीची छाप पाडली.
ते जेव्हा जसराजांकडे राहत होते तेव्हा आपले आपण उठून शिष्यांनी रियाजाच्या खोलीत रियाज सुरू करावा, अशी जसराजांची शिकवण होती. त्यांच्या घराच्या गच्चीत रियाजाची छोटी खोली होती. तिथे जाऊन ते गायला बसायचे, त्यांना मनात येईल तेव्हा जसराज यायचे आणि शिकवायचे. त्यांनी शिकवलेले सकाळ, दुपार, संध्याकाळ असे तीन वेळा गायचे असा नियम होता. त्या त्या वेळचे राग म्हणायचे. मधल्या वेळात संजीव क्रिकेट खेळायला मामाकडे जायचे. रोज तेव्हा चार ते साडेचार तास गायन व्हायचे. त्यावेळी गळा तयार करायचा होता त्यामुळे सगळे राग गळ्यावर चढवायचा रियाज असायचा.
देशभरातील प्रख्यात संगीत महोत्सवच नाहीत, तर अमेरिकेत, कॅनडा, ऑस्ट्रेलिया व पूर्व आफ्रिका या भागांतही संजीव अभ्यंकरांची गायकी पोचली आहे.
शास्त्रीय गायनासोबत आजकाल ते स्वत:च्या स्वतंत्र अल्बममधील अभंग, भजने, भावगीते असे प्रकारही सादर करतात हे लक्षात येत आहे. या सुगम संगीतावरही त्यांच्या सुरेल गायकीची मोहर उमटली आहे. हा त्यातील विशेष उल्लेखनीय भाग ठरावा. हिंदी-मराठी भजने आणि बंदिशींच्या अनेक कॅसेट आणि सी.डीच्या माध्यमांतून देशभरातील संगीतरसिकांच्या घरांत त्यांचे नाव पोचले आहे. स्वतःच्या काही बंदिशी रचून स्वतंत्र ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न ही त्यांनी केला. 'माचिस', 'निदान', 'दिल पे मत ले यार' अशा चित्रपटांसाठी त्यांनी पार्श्वगायन केले आहे. 'गॉडमदर' चित्रपटातील गाण्यासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. पं. संजीव अभ्यंकर हे आजचे आघाडीचे नव्या दमाचे चतुरस्र गायक म्हणून परिचित आहेत.
विविध रागांचा विविधांगी अभ्यास करत त्यांनी मेहनतीतून आज नवीन पिढीतील महत्त्वाचे गायक म्हणून स्थान मिळवलं आहे. पं. जसराज यांचे पट्टशिष्य आज अगदी कीर्ती शिखरावर विराजमान आहेत म्हटले तरी अतिशयोक्ती होणार नाही. अतिशय गोड गळा, पल्लेदारपणा आणि स्वरांचा दाणेदारपणा ही त्यांची गानवैशिष्टय़े त्यांच्या कोणत्याही कार्यक्रमातून लक्षात येतात. पं. संजीव अभ्यंकर आणखी एक वैशिष्टय़ सांगता येईल की, बहुतांश कार्यक्रमात ते नव्या रागांचा नवा संच निवडतात. पं. जसराज जीवनगौरव पुरस्कार, सूररत्न यांसारख्या अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. मध्य प्रदेश शासनाने ‘कुमार गंधर्व पुरस्कार’ देऊन त्यांना गौरवले आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
संजीव अभ्यंकर यांच्या वेबसाईटवर त्यांचे सर्व गायन आपणास ऐकता येते.
http://www.sanjeevabhyankar.com
“बारा बलुतेदार, तडीपार, सांगावा, गावशीव” आदी कथासंग्रह, “पारधी, हातभट्टी, झोपडपट्टी या कादंबर्या, तसेच “आज इथं उद्या तिथं” हे त्यांचे ललित लेखसंग्रह मराठीत मोलाचे मानले जातात.
वयाच्या सातव्या वर्षी दिनकर कैकिणी यांनी एका संगीत सोहळ्यात उस्ताद अल्लादिया खान, उस्ताद फैय्याज खान व उस्ताद अब्दुल करीम खाँ या तीन संगीत दिग्गजांचे गाणे ऐकले. त्यांचा जन्म २ ऑक्टोबर १९२७ रोजी झाला. उस्ताद फैय्याज खानांचे गाणे ऐकल्यावर ते इतके प्रभावित झाले की त्यांनी तिथेच संगीत कलेची साधना करण्याचा व फैय्याज खानांच्या गायनशैलीला आत्मसात करण्याचा निश्चय केला. त्यांचे प्रथम संगीत गुरू पतियाळा घराण्याचे पं. के. नागेश राव हे होते. त्यानंतर त्यांनी दोन वर्षे ग्वाल्हेर घराण्याच्या पं. ओंकारनाथ ठाकूर यांच्याकडे संगीत शिक्षण घेतले.
वयाच्या अकराव्या वर्षी त्यांनी लखनौच्या मॉरिस कॉलेजात (भातखंडे संगीत संस्थान विश्व विद्यालयात) प्रवेश घेतला. तिथे त्यांना पं. विष्णू नारायण भातखंडे व उस्ताद फैय्याज खान यांचे शिष्य पं. श्रीकृष्ण नारायण रातंजनकर यांच्याकडून संगीताची तालीम मिळाली. ह्या अतिशय कठीण प्रशिक्षणात एस. सी. आर. भट्ट, चिदानंद नगरकर, के. जी. गिंडे यांसारख्या आपल्या अन्य सहाध्यायांबरोबर कैकिणींनी संगीताचा कसून अभ्यास केला. त्याचा परिणाम म्हणूनच की काय, इ.स. १९४३ मध्ये त्यांना संगीतातील पदवीसोबत ख्याल गायनासाठी मानाचे समजले जाणारे भातखंडे सुवर्णपदक प्राप्त झाले.
त्यांनी १९४६ साली आपले संगीत कार्यक्रम करण्यास सुरुवात केली. एक गायक व संगीत प्रशिक्षक म्हणून त्यांनी देशोदेशींचे दौरे केले. संगीत क्षेत्रात त्यांनी अनेक मानाची पदे भूषविली. इ.स. १९५४ सालापासून त्यांनी आकाशवाणीवर सुरुवातीस रचनाकार व नंतर निर्माता म्हणून काम पाहिले. ते भारताच्या सूचना व प्रसारण मंत्रालयाच्या प्रबंध विभागाचे सहायक संचालक होते. त्यानंतर ते दीर्घ काळासाठी मुंबई येथील भारतीय विद्या भवन च्या संगीत व नृत्य शिक्षापीठाचे प्राचार्य पदी नियुक्त होते. अनेक वेगवेगळ्या समित्यांमध्ये त्यांचा समावेश होता, तसेच विविध परीक्षा मंडळांतही त्यांचा सहभाग होता. १९७४ साली भारत सरकारतर्फे त्यांना युगोस्लाव्हिया आणि पूर्व जर्मनी येथे पारंपरिक भारतीय संगीत या विषयाचे अभ्यासक म्हणून पाठवण्यात आले होते. तेथील विद्यापीठांमध्ये तसेच सांस्कृतिक केंद्रांमध्ये त्यांनी आपली कला सादर करण्याबरोबरच व्याख्यानेही दिली होती.
कैकिणींनी ख्याल, ध्रुपद, धमार, ठुमरी व भजन शैलींत शेकडो नवीन रचना केल्या व अनेक नवे राग बांधले. त्यांनी समूह गायनासाठीही विविध रचना बांधल्या, 'मीरा' (१९७९) या चित्रपटात पार्श्वगायन केले, तसेच पंडित रविशंकर यांच्या सहयोगाने 'डिस्कव्हरी ऑफ इंडिया' ह्या बॅले नृत्यनाटिकेला संगीत दिले. त्यांनी बंदिशींवर 'रागरंग' नावाचे पुस्तकही लिहिले आहे. स्वरचित राग आणि बंदिशींवरील त्यांच्या ध्वनिमुदिकाही प्रकाशित झाल्या आहेत. संजीवनी भेलांडे, आरती अंकलीकर-टिकेकर, उदित नारायण, निषाद बाक्रे, सुधींद भौमिक यांसारखे शिष्य त्यांनी घडवले आहेत. गायक, संगीतकार आणि गुरू अशा वेगवेगळ्या भूमिका त्यांनी पार पाडल्या. कैकिणींचे सर्व कुटुंब संगीत साधनेत आहे. त्यांच्या पत्नी शशिकला ह्या नभोवाणी गायिका होत्या व भवन्स संगीत व नृत्य महाविद्यालयाच्या मुख्याध्यापिका पदावरून निवृत्त झाल्या. त्यांचे धाकटे पुत्र योगेश साम्सी हे नामवंत तबला वादक असून त्यांच्या कन्या आदिती कैकिणी उपाध्या या शास्त्रीय संगीत गायिका आहेत. सुप्रसिध्द गायक पं. दिनकर कैकिणी यांचे सुपुत्र असलेले योगेश सम्सी यांनी उस्ताद अल्लारखॉं यांचेकडे २३ वर्षे तबल्याची तालीम घेतली आहे. आजवर अनेक ज्येष्ठ गायकांना यशस्वी साथ संगत केली आहे. तसेच अनेकवेळा स्वतंत्र तबदा वादनाचे कार्यक्रमही केले आहेत.
पं.दिनकर कैकिणी यांचे १७ डिसेंबर १९५६ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट
२०१९ मध्ये लिओनेल मेसी सर्वात श्रीमंत फुटबॉलपटू ठरला आहे. २०१९ मध्ये कमाई मध्ये अर्जेंटीनाचा फुटबॉलर लियोनेल मेस्सी प्रथमच पोर्तुगालच्या ख्रिस्तियानो रोनाल्डोला मागे टाकून पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याने गेल्या वर्षभरात तब्बल ८८१.७२ कोटी (१२.७ कोटी डॉलर) एवढी कमाई केली.
मायकेल जॅक्सन नावाचे एक भन्नाट आणि बेभान, चित्तथरारक आणि अचाट तुफान मनात आणि तनात १९८० ते १९९५ या काळात ते तुफान घोंघावले.त्यांचा जन्म २९ ऑगस्ट १९५८ रोजी झाला.मायकेल जॅक्सनमध्ये अशी काय ‘मॅजिक’ होती, असे काय गूढ होते, की ज्यामुळे प्रभुदेवा, मिथुन चक्रवर्तीपासून राज ठाकरेंपर्यंत आणि युरोपपासून जपानपर्यंत, जवळजवळ जगभरचे तत्कालीन तरुण-तरुणी त्याच्या प्रभावाखाली आले होते? मायकेल जॅक्सनची विलक्षण ऊर्जा? त्याचा झपाटा? त्याच्या ‘साँग-डान्स’मधील इलेक्ट्रिकल चार्ज? त्याचा आवाज? गाण्याच्या ओळी? मायकेल नावाची मॅजिक जगभर पसरली ती त्याच्या १९८३च्या ‘थ्रिलर’ या थरारक अल्बमनंतर. त्याच्या लाखो चाहत्यांना त्याच्या गाण्यांमधले शब्द व त्यांचे संदर्भ समजतही नसत. परंतु असेही कित्येक कोटी तरुण होते, की जे त्याची गाणी, नृत्य, हावभाव आणि वैचित्र्यपूर्ण भासणारे पदन्यास या सर्वाचे सहीसही अनुकरण करायचा प्रयत्न करीत असत.
मायकेल जॅक्सन अजिबात न आवडणाऱ्यांचाही एक मोठा वर्ग होता. पण साधारणपणे तो वर्ग तेव्हा पन्नाशीच्या आसपास वा पलीकडे गेला होता. तरुण वर्गातही थोडेफार ‘अॅाण्टी-जॅक्सन’ होते, पण चाहत्यांचा दबदबा (आणि दहशत!) इतकी प्रचंड होती, की त्या ‘विरोधकांचा’ आवाज त्या अफलातून आणि कान भेदून जाणाऱ्या तडाखेबंद ड्रम्सच्या ध्वनी-प्रतिध्वनींमध्ये पूर्णपणे बुडून जात असे. ज्यांना ‘जॅक्सन फिनॉमिनन’ने कधीच संमोहित केलेले नव्हते, त्यांना त्याची ‘मॅजिक’ही उमजली नव्हती आणि आता सुरू झालेले ‘ग्लोबल मोर्निग’ ही उमजलेले नाही.
मायकेल जॅक्सन ही अगदी चपखल असे ‘अमेरिकन फिनॉमिनन’ होते. त्याच्या अगोदर असेच तुफान एल्विस प्रिस्ले या नावाने अमेरिकेत आणि मग जगभर पसरले होते; पण प्रिस्लेच्या काळात टेलिव्हिजन आणि खासगी वाहिन्या आजच्यासारख्या जगभर फोफावल्या नव्हत्या. कम्प्युटर आणि इंटरनेट क्रांतीच्या दोन दशके अगोदर एल्विसचे पर्व होते. त्या दोघांच्या ‘ब्रॅण्ड’चा बाज जरी वेगळा असला तरी एक पर्व संपले आणि काही वर्षांतच दुसरे पर्व सुरू झाले असे म्हणण्यासारखी स्थिती होती. विशेष म्हणजे आज जगभर अमेरिका ओळखली जाते ती केवळ त्यांच्या व्हिएतनाम-अफगाणिस्तान-इराक येथील हिंस्र कारवायांमुळे नव्हे; तर हॉलिवूड-एल्विस- मायकेल जॅक्सन अशा ‘मॅजिक मेकर्स’मुळे अमेरिकेत निर्माण होणारी अशी तुफाने झपाटय़ाने ‘लेजंड्स्’ होतात. हा हा म्हणता ती ‘लेजंड्स्’ जगभरच्या लोकांच्या मनाचा कब्जा घेतात. त्यांचे वर्णन योग्य-अयोग्य, चूक-बरोबर, नैतिक-अनैतिक अशा निकषांवर करणे म्हणजे तो हंगामा, ते ‘फिनॉमिनन’, ते अनोखे चैतन्य न समजून घेण्यासारखे आहे.
अमेरिकेतील अशी ‘फिनॉमिना’ झपाटय़ाने कॉर्पोरेट रूप धारण करतात. हा हा म्हणता ती ‘ग्लोबल कॉर्पोरेट्स्’ बनतात. एकदा अशी ‘लेजंड्स्’ जागतिक कॉर्पोरेट झाली, की त्यात अब्जावधी डॉलर्स गुंतवले जातात, कोटय़वधी लोक त्यांचे ग्राहक होतात, त्या संशोधनातून एक सामूहिक झिंग तयार होते; मग ती झिंग मार्केट केली जाते, सीडी-डिव्हीडीज्, कॅसेट्स्, टी. व्ही. चॅनल्सच्या माध्यमातून ती झिंग घराघरात पोहोचते- लहान मुले आणि तरुण-तरुणी त्यात इतके दंग होतात, की त्यांच्या पालकांना हे कळेनासे होते, की ‘या पिढीला कशाने झपाटले आहे?’ भुताने झपाटल्यावरही माणूस (म्हणजे तरुण-तरुणी) जसे वागणार नाही तसे वर्तन पाहून काही पालक भयभीत होतात. तेही स्वाभाविकच म्हणावे लागेल. मायकेल जॅक्सनच्या (आणि इतरही ‘डान्स-साँग शोज्’च्या) वेळेस ज्या प्रकारच्या आर्त किंकाळ्या, अश्रूपात, छाती बडवून घेत त्याबरोबरच होणारा अक्षरश: लाखो चाहत्यांचा भन्नाट नाच हे सर्व वरकरणी वेताळाने झपाटल्यासारखेच वाटते/ दिसते. त्याच्या मरणानंतरही तो ‘पेनकिलर’ घेऊन मरण पावला, की हृदयविकाराच्या झटक्याने यावर वादंग सुरू झाला आहे. मायकेल जॅक्सनचे निधन २५ जून २००९ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट / लोकसत्ता
भारतातील सर्वात वयस्कर क्रिकेटपटू वसंत रायजी यांचा जन्म २६ जानेवारी १९२० रोजी झाला.
रायजी यांनी १९४० च्या दशतकात ९ प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये २७७ धावा केल्या होत्या. त्यात ६८ ही त्यांची सर्वोत्तम खेळी होती. त्यांनी मुंबई आणि बडोदा संघाचे प्रतिनिधित्व केले आहे.
आयुष्याच्या खेळपट्टीवर नाबाद शतक नावावर लावणारे ते केवळ दुसरेच भारतीय क्रिकेटपटू आहेत. त्यांच्याआधी डी.बी. देवधर यांनी वयाची शंभरी पूर्ण केलेली होती.
वसंत रायजी हे क्रिकेटपटू बनले याचे श्रेय त्यांचे वडील नायसदराय रायजी यांचे. एम.एम. रायजी अँड सन्स ही त्यांची चार्टर्ड अकाऊन्टसीची फर्म होती तरी त्यांनी वसंत व त्यांचे बंधू मदन यांना क्रिकेट खेळण्यासाठी प्रोत्साहित केले मात्र केवळ हौस म्हणूनच त्यांनी क्रिकेट खेळावे, त्याला आपला व्यवसाय बनवू नये, आपल्या फर्ममध्ये त्यांनी मदत करावी अशी त्यांची इच्छा होती.
त्यांच्या आई जयश्री या गांधीवादी विचाराच्या. मिठाच्या सत्याग्रहासह स्वातंत्र्याच्या चळवळीत त्यांनी भाग घेतला. दोन वेळा तुरुंगवासही सोसला. मात्र मुलांना त्यांनी याची माहिती होऊ न देता त्यांचे लक्ष त्यांनी शिक्षण आणि खेळावरच राहू दिले.
रायजी यांनी १९३३ मध्ये मुंबई जिमखाना मैदानावर पहिला कसोटी सामना पाहिला तेंव्हा ते फक्त १३ वर्षांचे होते. त्या सामन्यात लाला अमरनाथ यांनी ११८ धावांची शतकी खेळी केली होती या खेळीने त्यांचे क्रिकेटकडे आकर्षण वाढवले. विशीत असतांना रायजी यांना दोन रणजी सामन्यांसाठी मुंबईच्या संघात संधी मिळाली पण चांगली कामगिरी न झाल्याने त्यांनी संघातील स्थान गमावले. त्यावेळी मुंबईच्या क्रिकेटमध्ये खूप स्पर्धा होती. त्यामुळे संघातील स्थान गमावल्याचे आपल्याला फारसे वैषम्य नाही असे ते सांगतात. विजय मर्चंट व एल.पी. जय यांच्यासोबत मैत्रीच्या आठवणीही ते सांगतात.
पुढे त्यांना बडौदा संघाकडूनही खेळायचे निमंत्रण आले. त्यांचे आजोबा बडोदा संस्थानचे दिवाण होते आणि वसंत यांचा जन्म बडोद्याचा असल्याचे समजले तेंव्हा बडोदा क्रिकेटच्या आयोजकांनी त्यांच्याशी संपर्क साधला आणि वसंत रायजी यांनी बडोद्यासाठी पहिल्याच डावात ६८ आणि ५३ धावांच्या खेळी केल्या.
दरम्यान त्यांचे चार्टर्ड आकाउन्टन्सीच्या शिक्षणासाठी इंग्लंडलाही जाणे झाले. तिथे इंडियन जिमखानासाठी सलामी फलंदाज म्हणून ते बरेच सामने खेळले. पण मुंबईच्या तुलनेत तेथील क्रिकेट फारसे दर्जेदार नव्हते.
वसंत यांच्या क्रिकेट वेडाबद्दल पन्ना सांगतात की, क्रिकेट हेच त्यांचे आयुष्य होते. त्यांच्या श्वासाश्वासात क्रिकेट होते. प्रत्येक विकेंडला ते क्रिकेट क्लब आॕफ इंडियामध्ये जायचे आणि मित्रांसोबत क्रिकेटवर भरपूर गप्पा व्हायच्या. थिओ ब्रागान्झा यांच्या खेळांशी संबंधीत पुस्तकांच्या दुकानालाही ते नियमीत भेट द्यायचे. एकावेळी वसंत यांच्या संग्रहात तिनशेपेक्षा अधिक क्रिकेटशी संबंधीत पुस्तके होती. मात्र कामाकडे त्यांनी कधी दुर्लक्ष केले नाही. कामाच्या वेळी काम आणि खेळाच्या वेळी खेळ हे त्यांचे तत्व होते असे पन्ना सांगतात.
वसंत यांचे बंधू मदन हेसुध्दा उपयुक्त अष्टपैलू क्रिकेटपटू होते. मदनसह आनंदजी डोसा व उदय मर्चंट या मित्रांसोबत त्यांनी १९३६ मध्ये जॉली क्रिकेटर्स क्लबची स्थापना केली. १९५१ मध्ये या क्लबने कांगा लीग जिंकली. १९५६ मध्ये एका सामन्यात क्रिकेट क्लब आॕफ इंडियासाठी फलंदाजी करतांना त्यांनी ड्राईव्हचा एक फटका एवढ्या ताकदीने मारला की, समोरच्या यष्टींचे तुकडेच पडले होते. या आठवणीत रमताना हसत हसत वसंत सांगतात की यष्टी कशी तुटली ते मला कळलीच नाही पण आठवणीसाठी ती माझ्याकडे देण्याची विनंती आयोजकांना केली होती. अजुनही त्यांच्या घरातील शोकेसमध्ये ती यष्टी ठेवण्यात आली आहे.
सी. के. नायडू व सर डॉन ब्रॕडमन हे त्यांचे आवडते क्रिकेटपटू. सर डॉन यांच्याशी त्यांचा पत्रव्यवहारसुध्दा होता आणि ती पत्रे त्यांनी आॕस्ट्रेलिया स्थित आपल्या मुलीकडे दिली आहेत. ब्रॕडमन यांना त्यांनी आॕटोग्राफ मागितला होता आणि त्याला त्यांनी प्रतिसादही दिला. त्यातून त्यांची मैत्री झाली. आपल्या प्रत्येक पुस्तकाची एक प्रत ते सर डॉन यांना पाठवत असतात.
क्रिकेट खेळणे थांबविल्यावर वसंत रायजी यांनी या खेळाचे इतिहासतज्ज्ञ म्हणूनही भूमिका बजावली. रायजी यांची क्रिकेटची कारकीर्द फार मोठी नव्हती पण त्यांना लेखनाची प्रचंड आवड होती. ती आवड सचोटीने जोपासत त्यांनी अनेक पुस्तके लिहिली होती. त्यात सी. के. नायडू यांच्या चरित्राचाही समावेश आहे. २०१० मध्ये आलेले ‘क्रिकेट मेमाॕयर्स’ हे त्यांचे शेवटचे पुस्तक होते.
वसंत रायजी यांचे १३ जून २०२० रोजी निधन झाले.
संकलन: संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
कर्नाटकातील कारवार जिल्ह्यात जन्मलेल्या जयश्री गडकर यांनी बालकलाकार म्हणून अभिनयाची कारकिर्द सुरू केली. त्यांचा जन्म २१ फेब्रुवारी १९४२ रोजी कणसगिरी, कारवार जिल्ह्यात झाला.व्ही. शांताराम यांच्या ‘झनक झनक पायल बाजे’ या चित्रपटात एका गाण्यात संध्या यांच्यामागे समूहात नृत्य करणारी एक युवती असा मा.जयश्रीजींचा प्रवास सुरू झाला व पुढे जाऊन जयश्री गडकर नावाचा एक अलौकिक इतिहास आकाराला आला. ‘आलिया भोगासी’ या चित्रपटापासून त्यांची नायिका म्हणून कारकीर्द सुरू झाली. त्यांच्या महत्त्वाच्या चित्रपटांच्या नावांत ‘सांगत्ये ऐका’, ‘अवघाची संसार’, ‘मानिनी’, ‘रंगपंचमी’, ‘शाहीर परशुराम’, ‘बाप माझा ब्रह्मचारी’, ‘मोहित्यांची मंजुळा’, ‘सवाल माझा ऐका’, ‘वैशाख वणवा’, ‘साधी माणसं’, ‘पाटलाची सून’, ‘एक गाव बारा भानगडी’, ‘जिव्हाळा’, ‘घरकुल’, ‘सुगंधी कट्टा’ यांचा समावेश होतो, पण अशा केवळ चित्रपटांच्या नावानेच त्यांचे मोठेपण मोजणे त्यांच्यावर अन्यायकारक ठरेल. तमाशाप्रधान ग्रामीण चित्रपटाची नायिका अशी त्यांची ‘ओळख’ घट्ट झाली असता त्या शहरी भूमिकेला न्याय देऊ शकणार नाहीत, अशा होणाऱ्या चर्चेला त्यांनी ‘मानिनी’ चित्रपटातूनच चोख उत्तर दिले. दिग्दर्शक अनंत माने यांच्या १९ चित्रपटांतून त्यांनी भूमिका केल्या व त्यांना त्या आपल्या गुरू मानत. त्यांना त्या अण्णा म्हणत. हंसा वाडकर यांच्यानंतर तमाशा - लावणीपटात त्यांची जागा कोण भरून काढेल आणि सोज्वळ, सात्विक भूमिका करणा-या सुलोचनाबाईंच्या जागी कोणाला घ्यावं, या प्रश् नांना जयश्री गडकर यांनी आपल्या चतुरस्त्र आणि कसदार अभिनयाने उत्तर दिलं. अष्टपैलू अभिनेत्री असाच यांचा वावर मराठी चित्रपटसृष्टीत राहिला. ‘सांगत्ये ऐका’, ‘ सवाल माझा ऐका’, ‘ एक गाव बारा भानगडी ’ यांसारखे तमाशापट, ‘ मानिनी’ , वैशाख-वणवा ’ सारखे सोज्वळ चित्रपट तर ‘ मोहित्यांची मंजुळा’ सारखे ऐतिहासिक चित्रपटात त्यांनी विविधांगी भूमिका केल्या होत्या. अभिनय क्षेत्रातल्या त्यांच्या कार्याबद्दल त्यांना महाराष्ट्र शासनाचा २००३ सालचा व्ही. शांताराम पुरस्कार, विविध चित्रपटांसाठी राज्य आणि राष्ट्रीय पुरस्कारही मिळाले होते. मराठी चित्रपट महामंडळातर्फेही त्यांना चित्रभूषण ' जीवनगौरव पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले होते. अभिनेते बाळ धुरी यांची ती पत्नी होती. मा.जयश्री गडकर यांचे २९ ऑगस्ट २००८ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
जयश्री गडकर यांची गाणी.
‘बुगडी माझी सांडली गं जाता साताऱ्याला’
‘गेला हटकून बाई भरल्या बाजारात’
‘बाई बाई मनमोराचा कसा पिसारा फुलला’
‘तरुणपणाच्या रस्त्यावरचं पहिलं ठिकाण नाक्याचं’
‘फड सांभाळ तुऱ्याला ग आला’
‘पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा’
‘माळ्याच्या मळ्यामदि पाटाचं पानी जातं’
ऐरनीच्या देवा तुला ठिनगी ठिनगी न्हाऊ दे’
‘कशी गौळण राधा बावरली’
‘चढाओढीनं चढवीत होते’
‘नाचू किती लाजू किती कंबर लचकली’
राम नगरकर हे नाव आपल्यापुढे आलं ते एक नट म्हणून. तेही एक विनोदी नट म्हणून प्रख्यात अभिनेते राम नगरकर यांनी मराठी रंगभूमी आणि असंख्य चित्रपटांमधून लाखो रसिकांना खळखळून हसविले. त्यांचा जन्म ५ एप्रिल १९३० रोजी झाला. ‘रामनगरी’ हे त्यांच्या आत्मकथनाचे धम्माल विनोदी पुस्तकही खूप गाजले. महाराष्ट्र शासनासह अनेक संस्थांनी या पुस्तकाला पुरस्कार देऊन गौरविले. ‘रामनगरी’ ला पुलंची प्रस्तावना आहे. त्यामुळेच हे पुस्तक तमाम मराठी जनतेने डोक्यावर घेतले. या पुस्तकावरून ‘रामनगरी’ या हिंदी सिनेमाचीही निर्मिती झाली होती व त्यात अमोल पालेकर हे प्रमुख भूमिकेत होते. हे सर्व होत असताना ‘रामनगरी’ हा एकपात्री कार्यक्रम १९८० साली मा.राम नगरकर यांनी सुरु केला. याचे देशविदेशात एक हजाराहून जास्त प्रयोग केले. त्यांनाही प्रचंड प्रतिसाद मिळाला. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा वेगळा ठसा नेहमीच पाहायला मिळाला. स्वतःची थट्टा-मस्करी करणाऱ्या या कलावंताने आपल्या अदाकारीने श्रोत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले.‘‘ दादा कोंडके, निळू फुले हे नगरकरांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग होते. १९९५ साली मा.राम नगरकर यांच्या निधनानंतर त्यांचे चिरंजीव वंदन नगरकर यांच्यातील कलागुण ओळखून ख्यातनाम अभिनेते निळू फुले यांनी प्रोत्साहन दिल्यामुळे वंदन नगरकर यांनी ‘रामनगरी’ ला पुन्हा रंगभूमीवर आणले आहे. त्यांनीही रामनगरीचे असंख्य प्रयोग केले आहेत. रामनगरी हे राम नगरकर यांचे आत्मचरित्र खूपच गाजले आहे.
राम नगरकर यांचे ८ जून १९९५ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Copyright © 2025 | Marathisrushti