जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
मामासाहेबांच्या ठायी पौर्वात्य व पाश्चिमात्य तत्त्वज्ञानाचा गाढा व तुलनात्मक अभ्यास आणि अनुभव यांचा अपूर्व संगम झाला होता. त्यांनी वयाच्या पंचावन्नाव्या वर्षांपर्यंत कॉलेजात विद्यार्थ्यांना शिकवण्याचे काम केले. दिवसा ते काम; व ते संपल्यावर श्रीज्ञानेश्वरी संबंधीच्या कीर्तनाद्वारे समाजात नैतिक व धार्मिक शिक्षण देण्याचे त्यांचे कार्य सुरू होई. ते आयुष्यभर अखंड चालू होते. शाळा-कॉलेजातील विद्यार्थी असोत, अशिक्षित वारकरी असोत किंवा व्यसनी, वाममार्गाला लागलेला मनुष्य असो, त्यांनी समाजाची पातळी उंचावण्याचे महान कार्य सातत्याने केले.
एक चित्रपट १४ वर्षे!
पाकिजा प्रदर्शित झाला १९७२ साली, पण खरंतर त्याची सुरुवात झाली १९५८ मध्ये. पाकिजा बनायला १४ वर्षांचा वेळ लागण्याचे मुख्य कारण होते ते दिग्दर्शक कमाल अमरोही आणि त्यांची पत्नी असलेली पाकिजाची नायिका मीनाकुमारी यांच्यातील तणाव आणि नंतर तलाक. खरंतर हा चित्रपट पूर्णच झाला नसता, पण सुनील दत्त आणि नर्गिस यांच्या मध्यस्थीनंतर अखेर दोघे पुन्हा एकत्र काम करण्यास तयार झाले आणि चित्रपट पूर्ण झाला. प्रदीर्घ खंडानंतर चित्रपटाला पुन्हा सुरुवात झाली, तोपर्यंत मीनाकुमारीला व्याधींनी घेरले होते. पण त्याची पर्वा न करता तिने चित्रीकरण पूर्ण केले. मात्र तिच्या आजारपणाची आणि वाढलेल्या वयाची छाया चित्रपटातील काही मोजक्या दृश्यांत आणि ‘तीर ए नजर’सारख्या गाण्यात दिसते. १९७२ साली चित्रपट प्रदर्शित झाला आणि दुर्दैवाने काही दिवसांतच मीनाकुमारीचे निधन झाले. सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये हा चित्रपट फार चालला नव्हता. नंतर चित्रपट हिट झाला. पडद्यावरच्या आणि प्रत्यक्षातल्या अशा दोन्ही भूमिकांमध्ये मीनाकुमारीच्या वाट्याला दु:ख आणि वंचनाच आली. पाकिजाचे संगीत गुलाम मोहम्मद यांचे. पण चित्रपट पूर्ण व्हायच्या आधीच त्यांचे निधन झाले. त्यामुळे चित्रपटाचे पार्श्व संगीत नौशाद यांनी दिले आणि तीन गाणीही केली. पण ‘चलते चलते’सह बहुतेक प्रसिद्ध गाणी गुलाम मोहम्मद यांची. असे म्हणतात की, गुलाम मोहम्मद यांना त्यासाठी फिल्मफेअर पुरस्कार न दिल्याच्या निषेधार्थ प्राण यांनी त्यांना त्यावर्षी मिळालेला खलनायकाचा पुरस्कार स्वीकारायला नकार दिला होता.
विश्राम ढोले
संकलन संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
तो आणि त्याच्या मित्रांनी २००१ साली त्यांनी लॅरी सँगर आणि इतर ह्यांच्या सोबतीने विकिपीडियाची स्थापना केली. विकिपीडिया म्हणजे ओपन कन्टेन्ट एनसायक्लोपेडिया.
मन्सूरांचे आरंभीचे शिक्षण ग्वाल्हेर घराण्याचे बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर यांचे शिष्य पं. नीळकंठबुवा यांच्याकडे झाले. जयपूर घराण्याचे उस्ताद अल्लादियाखाँ यांचे पुत्र मंजीखाँ आणि भूर्जीखाँ यांच्याकडे त्यांनी पुष्कळ वर्षे तालीम घेतली. त्यांचा जन्म ३१ डिसेंबर १९१० रोजी झाला. विशेषत: मंजीखाँ यांच्या प्रतिभावंत पण बंडखोर गायकीचा मन्सूरांच्या शैलीवर विलक्षण प्रभाव दिसून येतो. मन्सूर यांनी अवघड गायकीला मुलायमपणा आणला व लोकभिमुख संगीत दर्जेदार नसते, हा विचार चुकीचा ठरविला. जयपूर घराण्याचे महाराष्ट्रातील संस्थापक उस्ताद अल्लादियाखाँ, त्यांचे सुपुत्र मंजीखाँ यांचं वास्तव्य काही वर्ष मुंबईत होतं.
मंजीखाँ फ्रेंचब्रिजजवळच्या हाजी कासमवाडीत राहत. मल्लिकार्जुन मन्सूरांना तिथे त्यांची तालीम मिळाली. या तालमीविषयी मन्सूर म्हणत असत, “दररोज सकाळी `ते’ तालीम चाले. एक राग कितीही दिवस चालला असला तरी त्याचं रोजचं स्वरुप वेगळंच असे…. मंजीखाँ साहेबांचं गाणं मला नागाच्या विषाप्रमाणे चढलं.” मंजीखाँ यांच्याप्रमाणेच मन्सूर मराठी भावगीते उत्तम गात. ‘ही रात सवत बाई’ या त्यांच्या भावगीताने त्यांनी एके काळी सार्या् महाराष्ट्राला सुखविले. नाट्यगीते, ठुमर्याण आणि भजने मन्सूर उत्तम गात. पुर्वी ते संगीत कानडी नाटकांतून कामे करीत व आपल्या गायनाने कन्नड रशिकांना मुग्ध करीत. स्वच्छ, निकोप व सुरेल आवाज, उत्तम दमसास, लयकारीवरचे प्रभुत्व आणि रागमांडणीचे कल्पनाकौशल्य त्यांच्या गायनात प्रामुख्याने जाणवते. अनेक अनवट रागांचा त्यांच्या गायकीमध्ये अंतर्भाव होतो. उदा. त्रिवेणी, बिहारी, देवसाख इ. राग मल्लिकार्जुन मन्सूर मोठ्या अधिकाराने मांडतात. विद्वत्ता व रसिकता यांचे सुमधूर संमीलन म्हणजे मन्सूरांचे गाणे होय. पं. मल्लिकार्जुन मन्सूर भारतीय संगीताच्या क्षेत्रातले उच्चकोटीचे गायक होते. घराणेदार गायकीचे दर्शन घडवणारी त्यांची गायकी शुद्धता, सूक्ष्मता या बरोबरच भावात्मक अभिव्यक्तीसाठी प्रसिद्ध होती.
भारत सरकारने मल्लिकार्जुन मन्सूर यांना ‘पद्मश्री’ व ‘पद्मभूषण’ देऊन त्यांचा गौरव केला. कालिदास पुरस्कार मल्लिकार्जुन मन्सूर यांना लाभला. कर्नाटक विद्यापीठाने संगीत विभागाचे सन्माननीय प्रमुखत्व मन्सूरांना दिले होते. त्यांचे पुत्र राजशेखर मन्सूर आणि मट्टीगट्टी हे त्यांचे प्रमुख शिष्य होत. त्यांनी नन्न रसयात्रे हे आत्मचरित्र झाले आहे, त्यात संगीतसाधनेसाठी त्यांनी घेतलेले अपार कष्ट, गुणग्राहकता, गुरू प्रेम आणि कलावंताला शोभणारी नम्रता प्रकर्षाने दिसून येते. मल्लिकार्जुन मन्सूर १२ सप्टेंबर १९९२ यांचे रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
संदर्भ:- इंटरनेट / मराठी विश्वकोश
गुलाम अली यांचे नाव त्यांच्या वडलांनी बडे गुलाम अली खाँ यांच्यापासून प्रेरित होऊन ठेवले. ख्यातनाम गझल गायक गुलाम अली यांचा जन्म ५ डिसेंबर १९४० रोजी झाला. गुलाम अली थोडे मोठे झाल्यावर बडे गुलाम अली खाँ यांच्याकडे त्यांना शिष्य बनवण्यासाठी वडलांनी चकरा मारायला सुरुवात केली. बडे गुलाम हे त्या काळचे सर्वात मोठे आणि अत्यंत व्यग्र असे व्यक्तिमत्त्व होते.
गुलाम अली यांनी आपल्या एका जुन्या मुलाखतीत सांगितलं होतं, की त्यांचे वडील त्यांना पहाटे पाच वाजता उठवायचे. नाही उठले तर काठीने मारून उठवायचे. का, तर बडे गुलाम अली खाँचे नाव खराब होऊ नये. तेव्हा ते पाच वर्षांचे होते. बरेच दिवस गेल्यावर एके दिवशी बडे गुलाम अली खाँ त्यांच्या घरी आले आणि त्यांच्या वडलांच्या असंख्य बिनत्यांची आबरू ठेवण्यासाठी गुलाम अली यांना ‘काहीतरी गा’ असे म्हणाले. त्यांनी धीर करून ‘सैयाँ बोलो तनिक मोसे रहियो न जाए’ ही ठुमरी गायली. गाणं संपताच बडे गुलाम यांनी पंधरा वर्षांच्या छोट्या गुलामला मिठी मारली आणि त्यांना आपला गंडा बांधला.
तथापि, बडे गुलाम खरोखरीच अतिशय व्यग्र असल्याने त्यांचे तीन बंधू बरकत अली खाँ, मुबारक अली खाँ आणि अमानत अली खाँ यांनी त्यांचे प्रशिक्षण पूर्ण केले. १९६० साली गुलाम अली यांनी लाहोर आकाशवाणीवर गायक म्हणून कारकिर्दीची सुरवात केली. त्यानंतर त्यांना गझल गायक म्हणून भारत, पाकिस्तान व जगात अमाप लोकप्रियता मिळाली. गुलाम अलीजी एक मेहबूब गजल गायक आहेत. पाकिस्तानातील गजलचे बादशहा मेहदी हसन यांच्या नंतरच्या पुढच्या पिढीचे आणि समर्थ गजल गायक आहेत. त्यांच्या ‘चुपके चुपके’ने तीन दशकांपूर्वी लावलेले वेड अद्याप ओसरायला तयार नाही.
हिंदुस्थानी ठुमरी गायकीची शैली गजलच्या फॉर्मसाठी यशस्वीपणे वापरणाऱ्या गुलाम अली यांनी शेकडो गजला गायल्या आहेत. त्यातील एक निवडणे हे इतर गजलांवर अन्याय केल्याशिवाय शक्य नाही. गुलाम अली व आशा भोसले यांचा मिराज ए गझल हा अल्बम फारच सुंदर आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या असणार्या श्रीमती प्रतिभाताई देवीसिह पाटील २५ जुलै २००७ ते २५ जुलै २०१२ या दरम्यान भारताच्या राष्ट्राध्यक्षा होत्या.
स्वातंत्र्यवीर सावरकरांचे संपूर्ण कुटुंब स्वातंत्र्याच्या होमकुंडात होरपळून निघाले होते. नातेवाईक, सगेसोयरे, अगदी जवळच्या लोकांनी सुद्धा त्यांना दूर लोटले होते. सरकारी ससेमिरा मागे लागल्यावर तर लोकांनी त्याच्याकडे जाणेयेणे, बोलणे टाळले होते. क्रांतीवीर गणेश दामोदर तथा बाबाराव सावरकर हे स्वा. विनायक दामोदर सावरकर यांचे थोरले बंधू.
बाळकृष्ण प्रधान आणि दादर येथील इंडियन एज्युकेशन सोसायटी यांचे नाते अतूट असे होते. इतके की प्रधान सर म्हणजे इंडियन एज्युकेशन सोसायटीचा चालता बोलता इतिहासच होते.
२९ मार्च १९१८ रोजी जन्मलेल्या प्रधानांचे प्राथमिक शिक्षण जुन्या जंजिरा संस्थानातील बोरली पंचायतन इथे, तर माध्यमिक शिक्षण ठाण्यातील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये झाले. वयाच्या १९ व्या वर्षी ते मॅट्रिक, तर १९४१ सालात राम नारायण लोहिया कॉलेजातून बी.एससी. झाले.
सुरुवातीचा काही काळ त्यांनी इंडिया युनायटेड मिल आणि दिल्ली केमिकल क्लॉथमध्ये केमिस्ट म्हणून काम केले. परंतु त्यांचा स्वाभाविक ओढा शिक्षणक्षेत्राकडे होता. त्यामुळे १९४८ सालापासून त्यांनी अध्यापनाचे काम केले.
विज्ञान आणि गणित हे विषय ते अतिशय तळमळीने शिकवित असत. वांद्रे येथील न्यू इंग्लिश स्कूल आणि इंडियन एज्युकेशन सोसायटीच्या वाशी येथील न्यू बॉम्बे हायस्कूलमध्ये त्यांनी प्राचार्य म्हणून काम केले. बहुआयामी व्यकिमत्त्व असलेले प्रधान सर हाडाचे शिक्षक होते. तळमळीने आपला विषय शिकविणे हा त्यांचा सहजस्वभाव होता. विज्ञान आणि गणित यांबाबत आपल्या विद्यार्थ्यांमध्ये आवड निर्माण होण्यासाठी धडपडणार्या प्रधान सरांनी अखिल भारतीय शिक्षण परिषदांमध्ये एक तपाहून अधिक काळ सक्रिय सहभाग घेतला. तर १९५० ते १९६५ या काळात त्यांनी 'एज्युकेशन फॉर इंटरनॅशनल अंडरस्टँडिंग' या विषयावरील चर्चासत्रांमध्ये सातत्याने भाग घेतला.
एस.एस.सी. मंडळाच्या विभागीय आणि राज्यस्तरावरील अभ्यासक्रम समितीतही त्यांनी काम केले. १९७२ सालाच्या सुमारास महाराष्ट्रात विज्ञान व गणित या विषायांच्या अभ्यासक्रमात क्रांतिकारक बदल सुचविण्यात आले. त्यावेळेस गणिताच्या अभ्यासक्रमातील बदलांच्या संकल्पना प्रधान सरांनी उचलून धरल्या आणि त्याबाबतच्या चर्चांमध्येही त्यांनी भाग घेतला. शालेय पातळीवरील विज्ञान-गणित या विषयांतील बदल हे बदलत्या काळानुरूप होत आहेत आणि त्याच्या तपशिलाबाबत मतभेद असले तरी तत्त्व म्हणून आपण ते बदल स्वीकारले पाहिजेत, असे प्रधान सरांचे म्हणणे होते. आपली ही मते त्यांनी १९७६ साली झालेल्या 'नॅशनल फोरम ऑफ टिचर सेमिनार ऑन प्रॉब्लेम्स ऑफ एज्युकेशन' या विषयावरील सेमिनारमध्ये मांडली.
त्यांच्या शिक्षणविषयक दृष्टिकोनाची दखल राष्ट्रीय पातळीवर घेतली गेली. त्यांच्या शिक्षणसेवेचे कौतुक करण्यात आले. 'निर्मळ बुद्धीत ओलावा असतो आणि निर्मळ हृदयात बुद्धीचा प्रकाश असतो' असे आपल्या विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबविणार्या प्रधान सरांनी तत्त्वनिष्ठ आणि शाश्वत मूल्यांची आयुष्यभर जोपासना केली. असा हा शिक्षणव्रती १९ जानेवारीला काळाच्या पडद्याआड गेला आणि शिक्षणक्षेत्रातले एक नामवंत व्यक्तिमत्व हरपले.
(संदर्भ : महाराष्ट्र टाईम्समधील नोंद हे सदर)
नगरसेवक, महापौर, आमदार, विरोधी पक्षनेते, मुख्यमंत्री ते केंद्रात मंत्री आणि लोकसभेचे अध्यक्ष असा त्यांचा प्रवास आहे. प्रचंड गरिबीतूनही त्यांनी केलेला प्रवास, त्यासाठी उपसलेले कष्ट आणि त्यांना मिळालेले यश थक्क करणारे आहे.
व्यंकटेश बळवंत पेंढारकर ऊर्फ बापूराव पेंढारकर हे मराठी रंगभूमीवर स्त्रीभूमिका करणारे प्रसिद्ध नट, गायक आणि वादक होते. बापूराव हे केशवराव भोसले ह्यांनी स्थापन केलेल्या ललित कलादर्श ह्या नाट्यसंस्थेचे अध्वर्यू होते.
Copyright © 2025 | Marathisrushti