जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
हिदुस्थानी संगीतातील जयपूर घराण्याचे श्रेष्ठ गायक मल्लिकार्जुन मन्सूर यांचा जन्म १ जानेवारी १९११ रोजी झाला. मन्सूरांचे आरंभीचे शिक्षण ग्वाल्हेर घराण्याचे बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर यांचे शिष्य पं. नीळकंठबुवा यांच्याकडे झाले. जयपूर घराण्याचे उस्ताद अल्लादियाखाँ यांचे पुत्र मंजीखाँ आणि भूर्जीखाँ यांच्याकडे त्यांनी पुष्कळ वर्षे तालीम घेतली. मन्सूर यांनी अवघड गायकीला मुलायमपणा आणला व लोकभिमुख संगीत दर्जेदार नसते, हा विचार चुकीचा ठरविला. जयपूर घराण्याचे महाराष्ट्रातील संस्थापक उस्ताद अल्लादियाखाँ, त्यांचे सुपुत्र मंजीखाँ यांचं वास्तव्य काही वर्ष मुंबईत होतं. मंजीखाँ फ्रेंचब्रिजजवळच्या हाजी कासमवाडीत राहत.
मल्लिकार्जुन मन्सूरांना तिथे त्यांची तालीम मिळाली. या तालमीविषयी मन्सूर म्हणत असत, “दररोज सकाळी `ते’ तालीम चाले. एक राग कितीही दिवस चालला असला तरी त्याचं रोजचं स्वरुप वेगळंच असे…. मंजीखाँ साहेबांचं गाणं मला नागाच्या विषाप्रमाणे चढलं.” मंजीखाँ यांच्याप्रमाणेच मन्सूर मराठी भावगीते उत्तम गात. ‘ही रात सवत बाई’ या त्यांच्या भावगीताने त्यांनी एके काळी सार्यां महाराष्ट्राला सुखविले. नाट्यगीते, ठुमर्याण आणि भजने मन्सूर उत्तम गात. पुर्वी ते संगीत कानडी नाटकांतून कामे करीत व आपल्या गायनाने कन्नड रशिकांना मुग्ध करीत. स्वच्छ, निकोप व सुरेल आवाज, उत्तम दमसास, लयकारीवरचे प्रभुत्व आणि रागमांडणीचे कल्पनाकौशल्य त्यांच्या गायनात प्रामुख्याने जाणवते. अनेक अनवट रागांचा त्यांच्या गायकीमध्ये अंतर्भाव होतो.
उदा., त्रिवेणी, बिहारी, देवसाख इ. राग मल्लिकार्जुन मन्सूर मोठ्या अधिकाराने मांडत. मा.मन्सूर यांचे गाणे म्हणजे विद्वत्ता व रसिकता यांचे सुमधूर संमीलन असे. पं. मल्लिकार्जुन मन्सूर भारतीय संगीताच्या क्षेत्रातले उच्चकोटीचे गायक होते. घराणेदार गायकीचे दर्शन घडवणारी त्यांची गायकी शुद्धता, सूक्ष्मता याबरोबरच भावात्मक अभिव्यक्तीसाठी प्रसिद्ध होती. भारत सरकारने मा.मल्लिकार्जुन मन्सूर यांना ‘पद्मश्री’ व ‘पद्मभूषण’ देऊन त्यांचा गौरव केला.
मध्य प्रदेश सरकारने १९८१ पासून सुरू केलेला, एक लाख रूपायांचा कालिदास सन्मान प्रशस्ती पुरस्कार सर्वप्रथम मल्लिकार्जुन मन्सूर यांना लाभला. तद्वतच कर्नाटक विद्यापीठाने संगीत विभाग सुरू करून त्या विभागाचे सन्माननीय प्रमुखत्व मन्सूरांना दिले आहे. आपली संगीतविद्या मुक्तपणे मन्सूर तेथे देत असतात. त्यांचे पुत्र राजशेखर मन्सूर आणि मट्टीगट्टी हे त्यांचे प्रमुख शिष्य होत. त्यांनी नन्न रसयात्रे हे आत्मचरित्र झाले आहे, त्यात संगीतसाधनेसाठी त्यांनी घेतलेले अपार कष्ट, गुणग्राहकता, गुरूप्रेम आणि कलावंताला शोभणारी नम्रता प्रकर्षाने दिसून येते. मल्लिकार्जुन मन्सूर यांचे १२ सप्टेंबर १९९२ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
विठ्ठल गंगाराम चापके हे भारत सरकारच्या खत कारखान्यात संशोधनात्मक काम पाहतात.
जेष्ठ मराठी, हिंदी अभिनेत्री सुहासिनी मुळे यांचा जन्म २० नोव्हेंबर १९५१ रोजी पटणा येथे झाला. डॉक्यूमेंट्री फ़िल्मसाठी प्रसिद्ध असलेल्या विजया मुळे यांच्या कन्या.
वयाच्या सोळाव्या वर्षी 'भुवन शोमा' या सिनेमात त्यांनी पहिल्यांदा अभिनय केला. सत्यजीत राय यांनी 'भूवन शामा' या सिनेमातील नायिका सुहासिनी मुळे यांच्याविषयी म्हटले होते, की एक चांगली अभिनेत्री सिनेमाच्या प्रत्येक फ्रेममध्ये नसली तरीदेखील प्रत्येक ठिकाणी तिची उपस्थिती जाणवते. त्यानंतर अभिनय करण्याऐवजी कॅनडात गेल्या आणि कृषी अध्ययन करण्याचा निर्णय घेतला. अॅग्रीकल्चरमध्ये पदवीप्राप्त केल्यानंतर भारतात परतून शेतक-यांची मदत करण्याचा निर्णय घेतला. मात्र भारतात परतल्यानंतर हे काम जुळून आले नाही. मग मास कम्युनिकेशनमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन करुन दुरदर्शनवर काही दिवस काम केले. मात्र येथेही मन न रमल्यामुळे लवकरच राजीनामा दिला. त्यांनी अनेक डॉक्युमेंट्रीसुद्धा बनवल्या आहेत. सुहासिनी मुळे यांनी गुलजार यांच्या 'हुतुतु' या सिनेमात अभिनय केला होता. या सिनेमासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.
आशुतोष गोवारिकर यांच्या 'लगान'मध्ये आमिर खानच्या आईची भूमिका केली होती. त्यांनी 'दिल चाहता है' या चित्रपटात काम केले होते. सुहासिनी मुळे यांनी 'जोधा अकबर','बिग ब्रदर', 'पेज 3', 'ये तेरा घर ये मेरा घर', 'लव' ,'भुवन शोम' या या सिनेमांमध्ये काम केले. टीव्हीवर 'देवों के देव...महादेव', 'विरासत', 'देश की बेटी नंदिनी' आणि 'एवरेस्ट' या मालिकांमध्ये त्या झळकल्या आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून त्या फिल्म इंडस्ट्रीत कार्यरत आहेत. त्यांनी ४ वेळा डॉक्यूमेंट्री फ़िल्मसाठी राष्ट्रीय पुरस्कार जिंकला आहे. सुहासिनी मुळे यांनी अनेक वर्षे एकटी घालवल्यानंतर वयाच्या साठाव्या वर्षी भौतिकशास्त्रज्ञ अतुल गुर्टु यांच्यासोबत लग्न केले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
आज श्रेष्ठ गायिका मा.किशोरी आमोणकर यांचे निधन झाले.
किशोरी आमोणकर यांचा जन्म १० एप्रिल १९३१ रोजी झाला. त्यांना आदराने 'गानसरस्वती' असे संबोधले जाई.
त्यांच्या आई म्हणजे प्रख्यात गायिका मा.मोगूबाई कुर्डीकर. मा.किशोरी आमोणकर यांनी आपल्या आईकडून संगीताचे ज्ञान तर घेतलेच, शिवाय विविध संगीत घराण्यांच्या गुरूंकडूनही मार्गदर्शन घेतले. त्या मुंबईच्या एलफिन्स्टन कॉलेजमध्ये शिकल्या.
त्यांचे पती मा.रवी आमोणकर हे अध्यापन क्षेत्रात होते. त्या श्री राघवेंद्र स्वामींच्या भक्त होत्या.
किशोरीताईंनी १९५० चे दरम्यान आपल्या व्यावसायिक कारकीर्दीस प्रारंभ केला. हिंदी चित्रपट 'गीत गाया पत्थरोंने' साठी त्यांनी पार्श्वगायन केले आहे. १९९१ मध्ये प्रसारित झालेल्या 'दृष्टी' ह्या हिंदी चित्रपटाचे संगीत दिग्दर्शनही त्यांनी केले होते. मा.किशोरी आमोणकर या त्यांच्या शास्त्रीय तसेच उपशास्त्रीय गायनासाठी प्रसिद्ध होत्या. ख्याल गायकी बरोबरच त्या ठुमरी, भजन इत्यादी गायन प्रकारांना प्रभावीपणे सादर करत. कंठसंगीतावर वर्षानुवर्षे कठोर परिश्रम, सराव आणि अंगभूत प्रतिभेमुळे किशोरीताईंचे गाणे कसदार होते व रसिकांच्या हृदयाचा ठाव घेते. त्यांनी आजवर देशोदेशी आपले संगीत कार्यक्रम केले असून भारतातील प्रमुख संगीत महोत्सवांत त्यांना आपली कला सादर करण्यासाठी सन्मानपूर्वक बोलावले जात असे. त्यांनी 'स्वरार्थरमणी - रागरससिद्धान्त' हा संगीतशास्त्रावरील ग्रंथ लिहिला आहे.
आरती अंकलीकर, माणिक भिडे, पद्मा तळवलकर, अरुण द्रविड, सुहासिनी मुळगांवकर, रघुनंदन पणशीकर, मीरा पणशीकर, मीना जोशी, नंदिनी बेडेकर, विद्या भागवत, माया उपाध्याय, किशोरीताईंची नात तेजश्री आमोणकर, व्हायोलिन वादक मिलिंद रायकर यांसह अनेक कलावंत किशोरीताईंच्या शिष्यवर्गांत मोडतात.
किशोरी आमोणकर यांना मराठीसृष्टी परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली.
-- संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
किशोरी आमोणकर यांचे गायन
अवघा रंग एक झाला.
https://www.youtube.com/watch?v=5p5hy-2AjTA
https://www.youtube.com/watch?v=FglVACXnQIk
https://www.youtube.com/watch?v=VylhIJF50sI
https://www.youtube.com/watch?v=zLgXP-WvXLM
https://www.youtube.com/watch?v=ddimw49-waw
https://www.youtube.com/watch?v=RSba7WebiXo
“अनंततनय” नावाने काव्यलेखन करणारे दत्तात्रेय अनंत आपटे.
“श्री महाराष्ट्र शारदामंदिर” या कवींसाठी स्थापन झालेल्या संस्थेचे ते आधारस्तंभ होते. “हृदयतरंग (भाग १ ते ३), पद्यदल आणि “श्रीमत तिलक-विजय” हे लो. टिळकांचे ओवीबद्ध चरित्र आदी काव्यपुस्तके त्यांच्या नावावर आहेत.
११ जून १९२९ रोजी त्यांचे निधन झाले.
# Dattatrey Narayan Apte
# आपटे दत्तात्रेय अनंत
पुण्यामध्ये एक 'आगळे वेगळे' ज्योतिषी आहेत. त्यांचे भविष्य कथन अचूक आणि सकारात्मक असते. पण त्यांच्या मते ज्योतिषामध्ये कांही अनीष्ट प्रथा आहेत. 'कर्मकांड' या नावाने या प्रथा आजही अस्तित्वात आहेत. शापित पत्रिका, कालसर्प योग, नारायण नागबळी, मंगळ दोष, ग्रह दोष, नक्षत्र दोष, साडेसाती, वास्तू दोष ही ती 'कर्मकांडे' आहेत. त्यांच्या मते प्रत्यक्षात अशी कोणतीही कर्मकांडे अस्तित्वात नाहीत. ही सर्व काल्पनिक किंवा मानव निर्मित आहेत.तसेच देवाची शांत, ग्रह शांत,नक्षत्र शांत यातील 'शांत' या शब्दाला त्यांचा विरोध आहे. त्यांच्या मते पृथ्वीवरील कोणीही माणूस एवढा महान किंवा शक्तिवान झालेला नाही की तो एखाद्या देवाची, ग्रहाची किंवा नक्षत्राची शांत करू शकेल.तो फार फार तर त्यांची 'पूजा' करू शकेल. त्यामुळे कुठलीही 'शांत' ही शेवटी एक 'पूजा' असते. अशा प्रकारच्या पूजांना किंवा धर्म कार्यांना त्यांचा विरोध नाही. पण कर्मकांडांना त्यांचा सक्त विरोध आहे. ही कर्मकांडे व शांती म्हणजे ज्योतिष शास्त्रातील अंध श्रद्धा आहे असे त्यांचे म्हणणे आहे. अनेक लोक अशी कर्मकांडे व शांती करण्यासाठी वारेमाप पैसे खर्च करीत असतात. पण त्याचा उपयोग होत नसतो. ही कर्मकांडे व शांती म्हणजे ज्योतिषांना व धर्म कार्य करणाऱ्या गुरुजींना पैसे मिळवून देण्याची साधने बनली आहेत. ज्योतिषातील या अनीष्ट प्रथा व अंध श्राधेविरुध्ध आवाज उठविण्याचे व जन जागृती करण्याचे काम त्यांनी सुरु केले आहे. हे प्रवाहाच्या विरुध्ध पोहाण्यासारखे आहे याची त्यांना जाणीव आहे.आपणही आपल्या परीने त्यांच्या या कार्याला हातभार लावायचा प्रयत्न करू या!
या ज्योतिषाचे नाव नंदकिशोर जकातदार असे आहे.
-- उल्हास हरी जोशी
January 10, 2011
यशवंत सीताराम आपटे उर्फ नानासाहेब आपटे हे मुळचे साताऱ्याजवळील सायगावचे. त्यांचा जन्म २२ डिसेंबर १९०९ रोजी झाली. नानासाहेबांचे आईवडील प्लेगने गेले त्यामुळे पुण्यात आजोबांकडे आजोळी आले, शिक्षण पुण्यातच घेतले व पुणेकर झाले. नानासाहेब आपटे यांनी नोकरी कधीच केली नाही. पुण्यात बी.ए.पर्यंत शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी पुण्यातच डेक्कन जिमखान्यावर आज जिथे जिमखाना पोस्ट ऑफिस आहे त्याच्याच ओळीत एक दुकान घेऊन, स्टेशनरी सामानाचा व्यवसाय केला. नंतर ६०२ सदाशिव, या सदाशिव पेठ हौदाजवळच्या आपल्या राहण्याच्या ठिकाणी रस्त्यालगतच्या जागेत त्यांनी ‘रेकॉर्ड लायब्ररी’ हा अभिनव उपक्रम सुरू केला. तिथे हिंदी, मराठी रेकॉर्डस ऐकायला लोक यायचे. तिथे एका खोलीत बसून लोकांना आपल्या पसंतीची गाणी अल्पदरात ऐकायला मिळायची. त्या दुकानाच्या आतल्या बाजूला असलेल्या खोलीत रेडिओ-दुरुस्ती आणि विक्री ही कामे चालायची.
नानासाहेब आपटे यांना असल्या गोष्टींसाठी लागणारे तंत्रज्ञानही न शिकता अवगत होते. १९४० च्या दशकात काही काळ मा.नानासाहेबानी अमेरिकन मोटारसायकलींची एजन्सी घेतली होती. त्यांनी ‘म्युझिक’ या नावाची एक रेकॉर्ड लायब्ररी १९४३-४४ च्या सुमारास साताऱ्यातपण उघडली होती. नानासाहेब आपटे उपक्रमशील असल्यामुळे त्याची झेप रेकॉर्ड लायब्ररीपुरती मर्यादित राहिली नाही. त्यांनी सातारकरांसाठी साताऱ्यात बालगंधर्व, गजाननराव वाटवे, गोविंद कुरवाळीकर यासारख्या लोकप्रिय गायकांचे गाण्याचे कार्यक्रमही आयोजित केले होते. पुढे १९४२ मध्ये त्यांनी रेडीओची एजन्सी घेऊन त्यांचा तंत्रज्ञान क्षेत्रात प्रवेश केला. त्यासाठी त्यांनी रेडीओ सर्व्हीसिंगचा अमेरिकन पोस्टल कोर्स त्या काळी केला. त्यांनी रेडीओच्या तंत्राचा अभ्यास करून “आकाशवाणी “ नावाचे पुस्तक १९५० साली लिहून प्रसिद्ध केले.
दुसऱ्या महायुद्धामुळे रेडीओची आयात बंद झाल्याने पर्यायी व्यवसाय म्हणून भानुविलासमध्ये नाटकाचे वेळी आणि संभाजी उद्यानात मनोरंजनासाठी ग्रामोफोन रेकॉर्ड्स वाजवण्याचे कंत्राट घेतले व त्यातूनच रेकॉर्ड लायब्ररी आणि ध्वनिक्षेपण(लाउडस्पीकर) या व्यवसायाची मुहूर्तमेढ केली. त्याकाळी कार्यक्रमाच्या वेळी कर्णे वापरले जात. नानासाहेबांनी त्यात बदल करून बॉक्स स्पीकर वापरात आणले. नानासाहेब आपटे हे तंत्रज्ञानाचे पाईक होते. ते काळाच्या पुढे दोन पावले असत.
गजानन वाटवे, सुधीर फडके यांची व नानासाहेबांची रेकार्डसच्या निमित्ताने मैत्री होतीच, गजानन वाटवे, सुधीर फडके कार्यक्रमासाठी ध्वनी व्यवस्थेचे काम नानासाहेबांना मिळू लागले. या व इतर कलाकाराकडून कार्यक्रमासाठी ध्वनी व्यवस्था नानांचीच उत्तम असा विश्वास त्यांनी मिळवला. यामुळे १९५२ मध्ये सवाई गंधर्व पुण्यतिथी ची व्यवस्था साहजिकच नानासाहेबांकडे आली त्यानंतर १९५४ मध्ये खादी ग्रामोद्योग प्रदर्शनाचे उद्घाटन राष्ट्रपती डॉ. राजेन्द्रप्रसाद यांचे हस्ते झाले, या कार्यक्रमासाठी ध्वनी व्यवस्थेचे काम त्यांच्या कडे आले व हे अत्यंत मोठे आणि जबाबदारीचे काम यशस्वी झाले. त्यानंतर ललकारची पुण्यातील सास्कृंतिक क्षेत्रात घोड दौड सुरु झाली. साहजिकच पुणेकर नानासाहेबांना ललकार”चे नानासाहेब आपटे या नावाने ओळखू लागली.
नानासाहेब आपटे यांना सर्वदूर लोकप्रियता आणि आर्थिक स्थैर्य दिले ते ध्वनिक्षेपण क्षेत्रातील त्यांच्या कामगिरीमुळे. त्यांच्या लाऊडस्पीकर्सच्या व्यवसायाचे ‘ललकार’ हे नाव जवळजवळ शिकागो या ध्वनिक्षेपण व्यवसायातील दुसऱ्या एका प्रसिद्ध नावाइतकेच गाजले. सवाई गंधर्व महोत्सव, सुधीर फडके यांचे गीत-रामायणाचे कार्यक्रम, भीमसेन, वसंतराव देशपांडे यांचे गायनाचे कार्यक्रम, मोठमोठे समारंभ, भाषणे, असे कित्येक कार्यक्रम ललकारने पुरवलेल्या ध्वनिक्षेपण सेवेच्या साह्य़ाने झाले आहेत. ललकार म्हणजे निर्दोष, समाधानकारक सेवा असे समीकरणच झाले होते. जसजशी मोठी कामे येऊ लागली त्याबरोबरीने अधिक चांगल्या कामाची अपेक्षा होऊ लागली. नानासाहेबांना माणसाबरोबर तांत्रिकतेची पण ओढ होती. नानांनी नवीन मोठ्या शक्तीचे अम्प्लीफायार्स वापरायला सुरवात केली.
त्या बरोबरीने नवे मायक्रोफोन आणले. स्पीकर बॉक्सेस स्वतः बनवून घेत असत. त्यासाठी देवदार लाकूड वापरत. ते आपल्या सहकार्यांना ट्रेनींग देत असत. माईक सेट करताना वोल्युम कंट्रोल बंद करायची सवय सर्व ऑपरेटरना लावत असत. त्या काळी लाउड स्पीकर मधून शिट्या येणे हे नॉर्मल होते. प्रत्येक वेळी स्पीकरची व माईकची जागा याचा अंदाज घेऊनच सर्व व्यवस्था का करावी लागे की ज्यामुळे फीडब्याक/ शिट्या येणार नाहीत. पूर्वी एक /दोन माईक असले की पुरत पण मोठ्या कार्यक्रमासाठी ४/५ माईक लावणे, अवघड होते. अम्प्लीफायारला १/२ माईकचीच सोय असे. नानांनी ५ माईक लावता येणारे अम्प्लीफायार बनवून घेतले. राष्ट्रपती ,पंतप्रधान यांचे कार्यक्रमासाठी मुख्य वक्त्यासाठी २ माईक लागत. एकाच स्टॅडवर २ माईक त्यांनी एक आडवी पट्टी लावुन व्यवस्था केली आजही ती सर्वत्र वापरली जाते. त्या काळी पुण्यात नाटके मांडव वजा थेअटर मध्ये होत. संगीत नाटकांना व्यवस्था करताना अनेक क्लुप्त्या नानासाहेब वापरत.
मंदारमाला मध्ये शेवटच्या जुगलबंदीच्या जलशात राम मराठे व प्रसाद सावकार यांचे समोर पानदानात माईक ठेवून अत्यंत उत्तम प्रकारे सर्वांना ऐकण्याची व्यवस्था होई. सवाई गंधर्व महोत्सवासारख्या ठिकाणी वीज गेल्यावर लगेच बॅटरी वर स्पीकर चालू राहण्याची व्यवस्था करून नानासाहेबांनी सर्वांची व संयोजकाची वाहवा मिळवली होती. गीतरामायण गाताना बाबूजींना काटेकोर व्यवस्था लागे. माईक व दिवे यांची विशेष योजना नानासाहेब करुन देत. स्टीरीओ सिस्टीमचा पाया पुण्यात प्रथम नानासाहेबांनी महेशकुमार यांच्या ऑर्केस्ट्राचे वेळी घातला.
बालगंधर्व रंगमंदिरात किशोरकुमार यांच्या कार्यक्रमाचे आधी त्यांनी स्वतः येऊन ट्रायल घेऊन ललकारला शाबासकी दिली होती. या व्यवसायामुळे नानासाहेब आपटे यांचे गायन, वादन आणि इतर क्षेत्रातील अनेक दिग्गजांशी संबंध आला. त्याच्यापैकी अनेक जणांशी घरगुती संबंधही निर्माण झाले. संगीत नाटकासाठी गायक कॉर्डलेस माईकचा उपयोग हल्ली सर्वत्र केला जातो. नानासाहेबांच्या मनात हीच कल्पना १९६० पासून होती. पण त्या काळी तंत्रज्ञान इतके पुढारलेले नसल्याने ती त्यावेळी प्रत्यक्षात येऊ शकली नाही. नानासाहेबांनी घातलेला तंत्र ज्ञानाचा पाया त्यांचे अनेक शिष्य आजही पुढे नेत आहेत.त्यात प्रामुख्याने श्री वामन रहाळकर, प्रदीप माळी,खांबे बंधू जॉन पाटोळे इत्यादींचा उल्लेख करावा लागेल. ललकारच्या यशात दिग्गज कलाकार आणि रसिक यांच्या असलेल्या जिव्हाळ्या बरोबर नानासाहेबांनी अत्यंत कष्टाने वेळोवेळी आत्मसात केलेले तंत्रज्ञान पण तेवढेच महत्वाचे !!!
नानासाहेब आपटे यांचे २० मार्च २००० साली निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट / आपटे परिवार
पॉंडेचरीमधील स्पर्धेत दिव्या देशमुख या नागपूरच्या चिमुरडीने सात वर्षांखालील विद्यार्थ्यांच्या बुद्धिबळ स्पर्धेत राष्ट्रीय जेतेपद पटकावले आणि तिची विजयी घोडदौड सुरु झाली. त्यानंतर अवघ्या दोन वर्षांत जगातील सर्वांत कमी वयाची वुमन फिडे मास्टर हा किताब तिच्या नावावर नोंदला गेला आहे. नुकत्याच चेन्नई येथे झालेल्या नऊ वर्षांखालील मुलींच्या २७ व्या राष्ट्रीय स्पर्धेत दिव्याने विजेतेपद पटकावले.
दिव्या देशमुख यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा. नोंद या सदरात प्रकाशित झालेला 'दिव्य' त्वाची जेथ प्रचीती हा लेख पुढील पानावर वाचा.
दिव्या देशमुख यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा. नोंद या सदरात प्रकाशित झालेला 'दिव्य' त्वाची जेथ प्रचीती हा लेख वाचा.
य.गो. जोशी (यशवंत गोपाळ जोशी) हे मराठीतील उत्तम लेखक आणि पटकथालेखक होते. ’अन्नपूर्णा’, ’वहिनींच्या बांगड्या’, ’शेवग्याच्या शेंगा’, ’माझा मुलगा’ या यशस्वी मराठी चित्रपटांच्या कथा आणि पटकथा य.गो. जोशींच्या होत्या..
७८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, कथालेखक, कादंबरीकार, कवी आणि समीक्षक असणारे केशव तानाजी मेश्राम यांचा जन्म २४ नोव्हेंबर, १९३७ रोजी अतिशय गरीब कुटुंबात झाला. बालपण अत्यंत कष्टात गेले.
Copyright © 2025 | Marathisrushti