जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
एक महिला असूनही चंद्रकला कदम या बेधडकपणे गुन्हेगारी जगतातील संशयितांना पकडण्यासाठी आपल्या कलेच्या माध्यमातून गुन्हेगारांची हुबेहूब रेखाचित्रे रेखाटून आपली कला समाजकार्य म्हणून जोपासत आहेत. काही गुन्ह्यांतील संशयित गुन्हेगारांची रेखाचित्रे काढून त्यांना यशस्वीरीत्या पकडून देण्यामध्ये चंद्रकला कदम यांच्या रेखाचित्रांची आजवर पोलिसांना पुरेपूर मदत मिळाली आहे
जयशंकर दानवे यांनी सिनेसृष्टी उत्कृष्ट खलनायक व चरित्र अभिनेता म्हणून गाजवली तर नाट्यसृष्टीत ते उत्कृष्ट नाट्यदिग्दर्शक व खलनायक म्हणून प्रसिद्धीस आले. राजकपूरना प्रथम “वाल्मिकी” चित्रपटात नारदाचा मेकअप करून हिंदी सिनेसृष्टीला शो मन देणारे अशी त्यांची ओळख होती. आपल्या कारकिर्दीत त्यांनी एकूण ६५ चित्रपट आणि १३४ नाटके केली.
महाराष्ट्राच्या लोककलांचे ज्येष्ठ अभ्यासक अशी ओळख लाभलेले डॉ. प्रकाश खांडगे यांनी साहित्य आणि शिक्षण क्षेत्र यांची लोककला आणि लोकसाहित्याशी सांगड घालण्याची अवघड कार्य प्रदीर्घ काळ तर केलेच आहे, पण अनेक तमाशा शिबिरांचे यशस्वी संचालक म्हणून पदाची जबाबदारी त्यांनी पार पाडलेली आहे.
यशवंत देव म्हणजे शब्दप्रधान गायकी. त्यांचा जन्म १ नोव्हेंबर १९२६ रोजी झाला. त्यांच्या घरात वडिलांच्या रूपातच गाणे होते. तेच त्यांचे पहिले गुरू. देवांचे वडील विविध वाद्ये वाजवण्यात पटाईत होते पण त्यांतही तबल्यावर त्यांचे जास्त प्रेम होते. त्यांच्याचकडून देवांना तालाचे बाळकडू मिळाले. जी.एन जोशी आणि गजाननराव वाटवे ह्यांच्या शब्दप्रधान गायकीमुळेच यशवंत देव सुगम संगीताकडे वळले.
यशवंत देव यांचा प्रवास गाण्यातून कवितेकडे झाला. आजतागायत अनेक नाटके आणि चित्रपटासाठी गाणी लिहिली, संगीत दिले. त्याचप्रमाणे बालकविता, विडंबन, विनोदी काव्यप्रकारही लिहिले. यशवंत देवांनी हिंदी चित्रपटसृष्टीतले दिग्गज संगीतकार अनिल विश्वास यांना आपले गुरू मानले होते. आकाशवाणीवर सुगम संगीत विभागात सतारवादक म्हणून त्यांनी कारकीर्द सुरू केली. मुंबई आकाशवाणी केंद्रावर त्यांनी सादर केलेला ‘ भावसरगम ’ हा कार्यक्रम चांगलाच गाजला. त्या द्वारेच, संगीतकार, गायक आणि कवी ही त्यांची ओळख महाराष्ट्राला झाली. शब्दप्रधान गायकीचे उद्गाते, अशी त्यांनी स्वतःची प्रतिमा निर्माण केली. आचार्य रजनीश यांच्या लेखनाचा त्यांनी केलेला भावानुवादही रसिकांना आवडला.
यशवंत देव जसे एक संगीतकार आहेत तसेच ते एक उत्तम गायकही आहेत आणि त्याहीपुढे जाऊन ते एक अतिशय समर्थ असे कवीसुद्धा आहेत. त्यांनी रचलेली कैक गाणी ह्याची साक्ष देतील. जीवनात ही घडी अशीच राहू दे, श्रीरामाचे चरण धरावे दर्शन मात्रे पावन व्हावे, अशी धरा असे गगन कधी दिसेल का?, कोटि कोटि रूपे तूझी कोटी सूर्य चंद्र तारे, तू नजरेने हो म्हटले पण वाचेने वदणार कधी, प्रिया आज माझी नसे साथ द्याया, स्वर आले दुरुनी, जुळल्या सगळ्या त्या आठवणी, अरे देवा तुझी मुले अशी का रे भांडतात, कुणी एकत्र नांदती कुणी दूर दहा हात, अशी ही दोन फुलांची कथा, एक शिवाच्या पदी शोभते एक शवाच्या माथा....अशी एकाहून एक सरस गाणी देवांनी रचलेली आहेत. ह्यातील काही चित्रपटांसाठी, तर काही भावगीत-भक्तिगीत म्हणून रचलेली आहेत. मा.यशवंत देवांनी कैक हिंदी मराठी चित्रपटांना संगीत दिले आहे. तसेच बावनखणी, चारचौघी, सख्खे शेजारी, घनश्याम नयनी आला अशासारख्या जवळपास ३०-४० नाटकांचेही त्यांनी संगीतदिग्दर्शन त्यांनी केले होते. ग.दि. माडगुळकरांचे गीतरामायण जसे सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केले, तसे माडगुळकरांच्या सचिन शंकर बॅले ग्रुपने सादर केलेल्या "कथा ही रामजानकीची" या नृत्यनाटिकेला यशवंत देव यांनी संगीत दिले होते. चिंतनशील कलाकार असणारे यशवंत देव एका फार मोठय़ा सांगीतिक कालखंडाचे साक्षीदार आहेत. स्वत:सोबत अनेकांची कारकीर्द घडताना त्यांनी जवळून पाहिली आहे. १९५१ मध्ये ते सतारवादक म्हणून एच. एम. व्ही.त नोकरीला लागले.
लता मंगेशकर, वसंत प्रभू, पी. सावळाराम तसेच आशा भोसले यांची गाणी या काळात पुढे येत होती. हे सर्व देवांना जवळून बघायला मिळाले. एच. एम. व्ही. च्या नोकरीने देवांना अनुभवसमृद्ध केले. देव साहेबांनी मोजक्याच चित्रपटांना संगीत दिले. त्याबद्दल त्यांच्या मनात कोणतीही खंत नाही. आपल्याला चित्रपट क्षेत्रात संगीत दिग्दर्शक म्हणून कामे अर्थात ज्या काही चित्रपटांचे संगीत दिग्दर्शन त्यांनी केले त्यातली त्यांची कामगिरी चोख होती. त्याचा आनंदही त्यांना लाभला होता. म्हणूनच ‘जीवनात ही घडी अशीच राहू दे’ (‘कामापुरता मामा’- गीत व संगीत- यशवंत देव) हे लता मंगेशकरांच्या आवाजातलं अजरामर गीत जन्माला आलं. पुलंमुळे ते गीतकार झाले. ‘झालं-गेलं विसरून जा’ या चित्रपटाची गाणी विलक्षण गाजली.
एच. एम. व्ही.ने स्टाफ कमी केल्यामुळे देवांची नोकरी सुटली. दरम्यान, त्यांनी गाण्याचा क्लास सुरू केला. ते स्वत: खऱ्या अर्थाने गायक नाहीत. तरुणपणात फुटलेला आवाज कधीच सांधता आला नाही, असं ते स्वत:च सांगतात. त्यावर मात करण्याचे प्रयत्नही त्यांनी केले. त्यांच्या शिष्यवर्गातील एक नामवंत नाव म्हणजे प्रख्यात पाश्र्वगायिका सुमन कल्याणपूर. (तेव्हाच्या सुमन हेमाडी!) त्यांची देवांच्या संगीत दिग्दर्शनाखालील ‘मधुवंतीच्या सुरासुरातून’, ‘श्रीरामाचे चरण धरावे’, ‘पक्षिणी प्रभाती चारियासी जाये’ ही गाजलेली गाणी त्यांनी गायली.
या गाण्यांना चाली लावताना आपली मन:स्थिती कशी होती, हेही देव विशद करताना म्हणतात, ‘गीताला सूर आपल्या डोक्यात शोधण्यापेक्षा त्या गीताच्या शब्दांतच ते दडलेले असतात हे जाणवलं. शब्दांतच सूर शोधायचे असतात हे सत्य विजेसारखं डोळ्यांसमोर आणि डोक्यात चमकलं!’’ म्हणूनच पुढच्या काळात देवांचं ‘जर कविता चांगली असेल तर त्यात चाल असतेच. मी ती फक्त शोधून काढतो!’ हे वाक्य फार गाजलं. ते नेहमी चांगल्या कवितेच्या शोधात असतात. यातूनच ‘शब्दप्रधान गायकीचे उद्गाते’ हे बिरूद त्यांना बहाल झालं. 'दिवस तुझे हे फुलायचे', 'पाऊस कधीचा पडतो', 'तिन्ही लोक आनंदाने', 'जीवनात ही घडी', 'क्षितिजावर खेळ विजेचा' अशा अनेक भावगीतांचे / चित्रपट गीतांचे / नाट्यगीतांचे संगीतकार, 'प्रिया आज माझी', 'स्वर आले दुरुनी', इ. गीतांचे कवी, 'शब्दप्रधान गायकी', 'रियाजाचा कानमंत्र', 'कृतज्ञतेच्या सरी', 'पत्नीची मुजोरी' अशा अनेक पुस्तकांचे लेखक मा. ‘प्रतिभावंत गीत-संगीतकार यशवंत देव’ हे अशोक चिटणीस यांनी पुस्तक लिहिले आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
जीवतंत्रज्ञानासारख्या आधुनिक विषयातील संशोधनात स्वत:चे आगळे स्थान निर्माण करणार्या पुणे विद्यापीठाच्या प्राणीसास्त्र विभागातील वरिष्ठ प्राध्यापक डॉ. दीप्ती देवबागकर विज्ञान प्रसारकही आहेत. विज्ञान लोकाभिमुख करण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न वाखाणण्याजोगे आहेत. जनुकाचे कामकाज बदलल्यामुळे कॅन्सरच्या पेशंटांवर होणारे परिणाम कसे कमी करता येतील, यावर त्या महत्वपूर्ण संशोधन सध्या करीत आहेत.
डॉ. दीप्ती देवबागकर यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा. नोंद या सदरात प्रकाशित झालेला विज्ञानप्रसाराचा डीएनए हा लेख पुढील पानावर वाचा.
डॉ. दीप्ती देवबागकर यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा. नोंद या सदरात प्रकाशित झालेला विज्ञानप्रसाराचा डीएनए हा लेख वाचा.
मास्टर दत्ताराम म्हणजेच दत्ताराम वळवईकर. साहित्यसंघाच्या’कौन्तेय’, ’दुसरा पेशवा’, ’भाऊबंदकी’ , ’वैजयंती’ , ’राजकुमार’ यांसारख्या नाटकांत नटवर्य नानासाहेब फाटक, दुर्गा खोटे, मामा पेंडसे यांसारख्या बुजुर्ग अभिनेत्यांबरोबर तोडीस तोड भूमिका करून दत्तारामांनी ‘नटवर्य’ हे बिरुद मिळवले. पुढे ‘ललितकलादर्श’ च्या’दुरितांचे तिमिर जावो’, ‘पंडितराज जगन्नाथ’, ‘पडछाया’ या नाटकांतील त्यांच्या भूमिका गाजल्या.
आज १५ सप्टेंबर..आज 'दूरदर्शन' या केंद्र सरकारने सुरू केलेल्या देशातील पहिल्या दूरचित्रवाणी वाहिनीचा वाढदिवस
१५ सप्टेंबर, १९५९ रोजी एक छोटासा ट्रान्समीटर व स्टुडिओ यांच्या साह्याने दूरदर्शनचे काम चालू झाले. राजधानीत दूरदर्शनची ही मुहूर्तमेढ रोवली जाताना ज्येष्ठ साहित्यिक पु. ल. देशपांडे यांचा त्यात मोलाचा वाटा होता. दुरदर्शनचे पहिले संचालक होते प्रत्येक मराठी माणसाचे लाडके व्यक्तिमत्व पु. ल. देशपांडे!!! पु.लं. नीच "दुरदर्शन" हे नाव सुचवले.
दूरदर्शनवरुन बातमीपत्राची नियमित सेवा १९६५ पासून सुरु झाली. १९७२ मध्ये दूरदर्शन सेवा मुंबईत आली. १९७५ मध्ये चेन्नई, श्रीनगर, अमृतसर व लखनौ या शहरांमध्ये दूरदर्शनचे प्रसारण सुरु झाले. उपग्रहाद्वारे सामाजिक शिक्षण अथवा अत्याधुनिक तंत्रज्ञानातून सामाजिक शिक्षण देण्याचा पहिला प्रयोग भारतात केला. सॅटेलाईट इंस्ट्रक्शनल टेलेव्हिजन एक्सपरीमेंट ची चाचणी १९७५-७६ या वर्षी घेण्यात आली. याद्वारेच जगात प्रथमच सामाजिक शिक्षणाचा प्रचार घरोघरी करण्यात आला. १९८२ मध्ये दिल्ली आणि अन्य ट्रान्समिटर्स दरम्यान उपग्रहांमार्फ़त प्रसारण सुरु करण्यात आले.
१९८२ मध्ये टीव्ही रंगीत झाला. पंतप्रधानांचे लाल किल्ल्यावरचे भाषण देश पाहू लागला आणि 'नॅशनल ब्रॉडकास्टर' ही दूरदर्शनची ओळख रुजली. 'ऑल इंडिया रेडिओ'च्या सावलीतून दूरदर्शन बाहेर आले.१९८५ नंतर घरोघरी दूरचित्रवाणी संच दिसू लागले. आणि मालिकांविषयीच्या चर्चा रंगू लागल्या. चिमणराव आणि गुंड्याभाऊ, चाळ नावाची वाचाळ वस्ती, गोट्या, बंदिनी, एक शुन्य शुन्य, सर्जा राजा, प्रतिभा आणि प्रतिमा, ज्ञानदीप, आमची माती आमची माणसं या मालिका ज्ञान, माहिती आणि निखळ मनोरंजन देण्याचं काम करीत होत्या. व्यत्यय नावाची पाटीही चांगलाच भाव खावून जायची. हिंदीतल्या बुनियाद, हमलोग, ये जो है जिंदगी, रजनी, तमस, रामायण, महाभारत, द वर्ल्ड धिस वीक, दर्पण या मालिकांनी तर मनोरंजनाच्या विश्वात अफाट प्रेक्षक वर्ग मिळवला. अनंत भावे, प्रदीप भिडे, शम्मी नारंग, अविनाश कौर सरीन यांचे आत्मविश्वासाने परिपूर्ण असलेले वृत्तनिवेदन दर्शकांना भारावणारे असेच होते. गेल्या दोन दशकांत झालेल्या संज्ञापन क्रांतीमुळे दूरदर्शनचा भारतातला एकाधिकार संपत गेला. नंतर सगळ्या राष्ट्रीय चर्चांमध्ये दूरदर्शनचे स्थान नगण्य होत गेले. सरकारने दूरदर्शनमध्ये चैतन्य यावे, यासाठी 'प्रसार भारती'ची स्थापना केली. देशात ९० टक्क्यांहून अधिक लोकसंख्येपर्यंत कोणतेही खासगी चॅनल जात नाही. दूरदर्शन मात्र जाते. याशिवाय, दूरदर्शनकडे देशभरात ४६ स्टुडिओंचे जाळे आहे. इतके विशाल जाळे कोणत्याही खासगी वाहिनीकडे नाही. असे असूनही दूरदर्शनचा समाजमनावर फारसा प्रभाव आज नाही. असे का, याचे आत्मपरीक्षण करायला हवे. सरकारच्या विरोधात फारशा न जाणाऱ्या पण वस्तुनिष्ठ बातम्या हे दूरदर्शनचे खरे शक्तिस्थान होते. गेल्या दशकभरात दूरचित्रवाणी हा मीडियाचा सर्वाधिक जाहिराती व त्यामुळे उत्पन्न मिळणारा अवतार झाला आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.म.टा./इंटरनेट
बडोद्याहून इ.स. १९४० मध्ये मुंबईत आल्यानंतर बॉम्बे आर्ट सोसायटी गॅलरीमध्ये बाबा पाठक यांनी भरविलेले प्रदर्शन खूप गाजले होते. हा काळ स्वातंत्र्यसमराचा होता. त्यापासून अलिप्त राहणे शक्य नव्हते. त्यामुळे त्यांनी पुण्यात आल्यावर स्वातंत्र्यचळवळीत उडी घेतली. त्यांच्या अटकेचे वॉरंट निघाल्यावर बाबा काही वर्ष भूमिगत राहिले.
भास्कर चंदावरकर यांची संगीतातले उत्तम जाणकार, देशी वाण सांभाळणारा पण परदेशी संगीताची जाण असणारा संगीतकार म्हणून ओळख कायम राहणार आहे.‘ घाशिराम कोतवाल ’ हे नाटक, ‘ सामना ’ , ‘ सिंहासन ’ सारखे चित्रपट अजरामर करण्यामध्ये भास्कर चंदावरकर यांच्या संगीताचा अविभाज्य वाटा आहे.
राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त अभिनेता अतुल कुलकर्णीचे नाव मराठी चित्रपटसृष्टीत आदराने घेतले जाते. आत्तापर्यंत ७ भाषांमधून ६० पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केलेल्या अतुलने अनेक मानसन्मान प्राप्त केले. हा संवेदनशील अभिनेता सामाजिक आणि राजकीय घडामोडींवर आपल्या लेखांद्वारे आणि मुलाखतींमध्ये रोखठोक मते मांडतांना पाहायला मिळतो. ‘हे राम’, ‘चांदनी बार’, ‘खाकी’, ‘पेज ३’, ‘रंग दे बसंती’, ‘वळू’, ‘नटरंग’, ‘पोपट’, ‘एका प्रेमाची गोष्ट’सारख्या चित्रपटांमधून त्याने लक्षवेधी भूमिका साकारल्या आहेत.
Copyright © 2025 | Marathisrushti