जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
सातार्यात स्वातंत्र्यपूर्व काळात जन्मलेला एक मुलगा हुषारी आणि इच्छाशक्तीच्या बळावर लंडनमध्ये अर्थशास्त्रातील पीएच . डी . मिळवतो आणि पुढे कॅनडाचे मानवी हक्क आयुक्त हे पद भूषवीत जगभरातील मानवी हक्क यंत्रणांवर आपला ठसा उमटवतो, हे कर्तृत्व अपवादात्मकच. भाऊसाहेब उबाळे या एका मराठी माणसाच्या नावे ते जमा असावे, ही महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद बाब.
भाऊसाहेबांचे वडील सरकारी कर्मचारी असले, तरी स्वातंत्र्य आंदोलनात त्यांचा सहभाग होता. महात्मा गांधींच्या नेतृत्वाखालील आंदोलनाच्या मूल्यांचे भाऊसाहेबांवर बालवयातच संस्कार झाले. कॉलेज शिक्षणासाठी ते मुंबईत आले. नोकरी करीत त्यांनी पदवी शिक्षण पूर्ण केले. पुढे काही काळ त्यांनी सरकारी नोकरीही केली. पुढे गाठीला फारसे पैसे नसतानाही त्यांनी लंडनला प्रयाण केले. उबाळे यांनी तेथे अर्थशास्त्रातील पीएच. डी. मिळवली. या काळात त्यांनी पत्रकारिताही केली.
१९७५ मध्ये त्यांनी कॅनडाला जाण्याचा निर्णय घेतला. मात्र पात्रता असूनही त्यांना तेथे सुमारे दोन वर्षे कारकुनाखेरीज अन्य नोकरी दिली गेली नाही. हा अर्थातच वांशिक भेदभावाच्या मनोवृत्तीचा परिणाम होता. उबाळे यांनी समाजातील सर्व घटकांशी संपर्क वाढवण्यास सुरुवात केली होती. त्या काळात ईस्ट इंडियन्स तसेच पाकिस्तानी स्थलांतरितांच्या विरोधात कॅनडात हिंसक दंगे होत होते. उबाळे यांनी या हल्ल्यांचा तपशीलवार अभ्यास करून अहवाल तयार केला. पत्रकारितेतील अनुभवाचा वापर करीत, त्यांनी एका लहान मुलीच्या हस्ते तो जाहीर सभेत सरकारला 'सादर' केला . 'अहवालात काय आहे हे मला कळत नाही, पण माझं भविष्य त्यावर अवलंबून आहे,' हे त्या मुलीचं विधान माध्यमांनी उचलून धरलं आणि नंतर खुद्द पंतप्रधानांनी जाहीर सभेत या अहवालातील सर्व शिफारशी स्वीकारल्या ! 'उबाळे अहवाल' म्हणूनच तो ओळखला जातो. कॅनडातील समाजातील बहुविधता जपतानाच, त्यातील विविध वांशिक गटांत भावनिक एकजिनसीपणा आणणे, संधीच्या समानतेचे तत्त्व रुजविणे, याकरिता उबाळे कार्यरत राहिले.
कॅनडा सरकारनेही देशाचे मानवी हक्क आयुक्त तसेच वांशिक संबंध आयुक्त या पदांवर त्यांची नियुक्ती करून, त्यांच्या कल्पकतेचा आणि तळमळीचा सुयोग्य वापर करून घेतला. गरिबी निर्मूलन हा मानवी हक्कांचाच अविभाज्य भाग आहे, यावर त्यांचा भर होता. त्यामुळे मानवी हक्क चळवळीबरोबरच, 'इंटरनॅशनल सेंटर फॉर पॉव्हर्टी इरॅडिकेशन' ही संस्थाही त्यांनी स्थापन केली होती आणि त्यातून ग्रामीण विकासाला चालना देणारी कामे केली जात होती.
कॅनडात १९७५ सालापासून वास्तव्य असलेल्या आणि तेथील राजकीय - सामाजिक जीवनात प्रतिष्ठेचे स्थान मिळवलेल्या भाऊसाहेबांनी जगाचा निरोप घेतला तो मात्र त्यांच्या मायदेशात आणि त्यांचे माध्यमिक शिक्षण जेथे झाले त्या पुण्यात.
(संदर्भ : महाराष्ट्र टाईम्समधील नोंद हे सदर)
मनमोहन यांचे मूळ नाव गोपाळ नरहर नातू. पण लोककवी मनमोहन या नावानेच ते महाराष्ट्रला माहीत आहेत. त्यांचा जन्म ११ नोव्हेंबर १९११ रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील माणगाव या गावी झाला.
शब्दांच्या गोडव्याने गीताला मधाळ करणारा हा कवी. सहज साधे शब्द, मनाला आनंद देणारी आणि जीभेवर रेंगाळत ठेवणारी त्यांची गाणी आजही ऐकायला ताजीतवानी वाटतात. मैत्रिणींनो सांगू नका नाव घ्यायला हे त्यांचं अतिशय गाजलेलं गाणं आजही नववधूला लाजवते. मा.मनमोहन नातू यांनी लिहिलेले हे गीत, मा.वाटवे यांची चाल आणि शब्द.
‘मैत्रिणींनो सांगू नका नांव घ्यायला..’
नववधूला स्त्रीसुलभ भावनेमुळे मैत्रिणींच्या गराडय़ात पतीचे नाव घेताना वाटणारा लज्जायुक्त संकोच या गीतात आढळतो. ही संकोचाची भावना कवी मनमोहनांच्या शब्दांत पुरेपूर दिसून येते. या गीतातल्या नानाविध प्रश्नांतून ती अभिव्यक्त झाली आहे. ही नववधू शालीन आहे. सुसंस्कृत घरातली आहे. हे गाणे म्हणजे तिने मैत्रिणींशी केलेले हितगूजच आहे..
‘मैत्रिणींनो सांगू नका नांव घ्यायला नका विचारू स्वारी कशी?
दिसे कशी अन् हासे कशी?
कसं पाडलं मला फशी?
कशी जाहले राजीखुशी?
नजीक येता मुहूर्तवेळा, काय बोललो पहिल्या भेटी
कसे रंगले स्वप्न पहाटी? कशी रंगली लाली ओठी?
कसा जाहला जीव खुळा? मैत्रिणींनो..
अर्थ उलगडे समरसतेचा, सुटे उखाणा संसाराचा
छंद लागला मजला त्यांचा,
धुंद बने बुलबुल जिवाचा
घरी यायची झाली वेळां, मैत्रिणींनो..’
राधे तुझा सैल आंबाडा, बापूजींची प्राणज्योती... ह्या त्यांच्या गाजलेल्या रचना. अतिशय साधं रहाणीमान असलेला हा कवी आपल्या कवितेत मनातील प्रतिबिब उभं करत असे. ते लिहितात, राजकीय पुरुषांची कीर्ती, मुळीच मजला मत्सर नाही । आज हुमायुन बाबरापेक्षा, गलिब हृदये वेधित राही । युगायुगांचे सहप्रवासी, अफुच्या गोळ्या, उद्धार, शिवशिल्पांजली हे त्यांच्या नावावर असलेले काव्यसंग्रह. मा.मनमोहन यांचे पुस्तक वा पुस्तिकारूपाने प्रसिद्ध झालेले अनेक काव्यसंग्रह आहेत. त्यातले ‘ताई तेलीण’, ‘सुनीतगंगा’, ‘कॉलेजियन’, ‘शंखध्वनी’, ‘अफूच्या गोळ्या’, ‘दर्यातील खसखस’, ‘कुहू-कुहू’, ‘शिव शिल्पांजली’ हे संग्रह प्रसिद्ध आहेत. ‘दर्यातील खसखस’ या पुस्तकाचे प्रकाशक आर. बी. समुद्र लिहितात- ‘उदयोन्मुख कविपंचकात मनमोहन या तरुण व प्रतिभासंपन्न कवीचे स्थान फार वरचे आहे. आपल्या प्रखर बुद्धीने आणि विशिष्ट मनोवृत्तीने काव्यरचना करून त्यांनी प्रचलित काव्यपद्धतीला विजेचे धक्के दिले आहेत. त्यांच्याइतकी सुंदर प्रेमगीते मराठीत दुसऱ्या कोणत्याही कवीला लिहिता आली नाहीत.’ कवी ज. के. उपाध्ये यांना गुरुस्थानी मानणाऱ्या कवी मनमोहनांची कविता स्वतंत्र होती. त्यांच्या कविता तर उत्तम होत्याच; परंतु ध्वनिमुद्रिकांमधील भावगीतांतून त्यांना जास्त नाव मिळालं. वाटवे यांनी त्यांच्या काही कविता स्वरबद्ध केल्या आणि ती गाणी लोकप्रिय झाली. सर्व विषयांना आपल्या कवितेत स्पर्श करणारे लोककवी पत्नीच्या निधनानंतर आपल्या भावना शब्दबद्ध करताना म्हणतात. वृंदावनातील तुळस जळाली, मागे उरल्या दगडविटा, त्यांनी एके ठिकाणी म्हटले आहे,‘कलेवर कवीचे जाळू नका हो,जन्मभर तो जळतच होता. फुले तयावर माळू नका हो,जन्मभर होत फुलतच होता’ यात ते स्वतःबद्दलच्या भावना हृदयस्पर्शी शब्दात व्यक्त करताना ते दिसतात. मनमोहन नातू यांचे ७ मे १९९१ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
मोगॅम्बो खूश हुआ'...'त्या' भारदस्त आवाजातील हे तीन शब्द कानांवर पडले की समोरच्याचा थरकाप झालाच म्हणून समजा. त्यांचा जन्म २२ जून १९३२ रोजी झाला. 'मि. इंडिया' या सिनेमात मा.अमरिश पुरी यांनी साकारलेली मोगॅम्बोची व्यक्तिरेखा विसरणे केवळ अशक्य. अशा एकापेक्षा एक सरस खलनायकी व्यक्तिरेखा, चरित्र भूमिका साकारणारे मा.अमरीश पुरी हे जुन्या काळातले प्रसिद्ध हिंदी चित्रपट कलाकार मा.मदन पुरी यांचे धाकटे भाऊ. अमरीश यांना हिंदी चित्रपटांमध्ये नायक बनायचं होतं म्हणून त्यांनी पंजाब सोडून मुंबई गाठली. मोठ्या भावाने सरळ सांगितलं की मी अजिबात मदत करणार नाही, जे काही या क्षेत्रात करायचं ते स्वतःच्या जोरावर करायचं.
नायक बनण्याच्या अमरीश यांच्या प्रयत्नांना यश मिळालं नाही. मग त्यांनी पृथ्वी थिएटर्समधल्या नाटकांमध्ये कामं करायला सुरुवात केली. तिथे मोठ्या दिग्दर्शकांकडे त्यांनी काम केलं. अगदी इंदिरा गांधी, अटल बिहारी वाजपेयी अमरीश यांची नाटकं बघायला आवर्जून येत. मग हळूहळू अमरीश यांनी आपला मोर्चा परत एकदा हिंदी चित्रपटांकडे वळवला. सुरुवातीलाच चांगल्या दिग्दर्शकांचे चित्रपट अमरीश यांना मिळू लागले आणि हळूहळू त्यांनी आपले पाय हिंदी चित्रपटात घट्ट रोवायला सुरुवात केली. त्यांच्या कारकिर्दीबद्दल नव्याने लिहायची काहीच आवश्यकता नाही. भारदस्त आवाज, भेदक नजर आणि करारी, देखणे रुप असलेले मा. अमरिश पुरी यांनी हिंदी सिनेमासृष्टीवर अनेक वर्षे राज्य केले. मा.अमरिश पुरी यांना बॉलिवूड सिनेमांमध्ये हीरो बनायचे होते. मात्र त्यांच्या नशीबात काही वेगळेच लिहिले होते. ते हीरो नाही मात्र बॉलिवूडमधील प्रसिद्ध खलनायक बनले. अमरिश पुरी यांनी आपल्या तीस वर्षांच्या कारकिर्दीत सर्वाधिक नकारात्मक भूमिका साकारल्या.
पाश्चिमात्य प्रेक्षकांमध्येही अमरिश पुरी लोकप्रिय अभिनेते आहेत. स्टीवन स्पिलबर्ग यांच्याबरोबरील 'इंडियाना जोन्स' या हॉलिवूड सिनेमातील मोला रामची भूमिका आणि 'टेंपल ऑफ डूम' या सिनेमातील भूमिकेसाठी प्रेक्षक त्यांना कधीही विसरु शकत नाही. त्यांची खलनायकाची प्रतिमा सामान्य नागरिकांमध्ये एवढी परिणामकारक बनली होती की त्यांच्या मुलाचे मित्र जेव्हा घरी येत तेव्हा अमरीश यांच्यासमोर नुसतं जायलाही घाबरत असत. खऱ्या आयुष्यात मात्र अमरीश अतिशय साधे, मन मिळावू, मृदू स्वभावाचे, आपल्या कुटुंबात रमणारे असे होते. आपल्या वडिलांविषयी राजीव पुरी यांनी एका मुलाखतीत सांगितले होते, की ''पापा तारुण्याच्या काळात हीरो होण्यासाठी मुंबईत आले होते. त्यांचे थोरले बंधू मदन पुरी सिनेसृष्टीत कार्यरत होते. निर्मात्यांनी त्यांना सांगितले, की त्यांचा चेहरा हीरोसारखा नाहीये. त्यामुळे ते खूप निराश झाले होते. मा.अमरिश पुरी यांचे १२ जानेवारी २००५ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट
डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन यांचा जन्म २१ जानेवारी १८९४ रोजी झाला. माधव जूलियन मराठी भाषेतील कवी, रविकिरण मंडळाचे संस्थापक सदस्य होते. मा.माधव जूलियन हे फारसी आणि इंग्रजीचे प्राध्यापक होते. इंग्लिश कवी शेले याने रचलेल्या ज्यूलियन आणि मडालो या कवितेवरून यांनी "जूलियन" असे टोपणनाव धारण केले. (माधव त्र्यंबक पटवर्धनांचे जूलियन नावाच्या मुलीवर प्रेम होते. तिच्याशी प्रेमभंग झाल्यानंतर तिची आठवण म्हणून त्यांनी माधव जूलियन हे टोपण नाव घेतले हीच माहिती लोकप्रसिद्ध आहे). याशिवाय ’गॉड्ज गुड मेन’ या कादंबरीतील नायिका ’ज्युलियन’ या व्यक्तिरेखेवरून माधवरावांनी ज्युलियन हे वाव उचलले असेही सांगितले जाते.
गझल व रुबाई हे काव्यप्रकार फारसीतून मराठीत प्रथम आणण्याचे श्रेय माधवराव पटवर्धनांना देण्यात येते. माधव ज्युलियनांनी दित्जू, मा.जू. आणि एम्. जूलियन या नावांनीही लिखाण केले आहे. त्यांनी कविवर्य भा.रा. तांबे यांच्या कवितांचे संकलन आणि संपादन केले आहे. पटवर्धनांनी कवितांशिवाय भाषाशास्त्रीय लेखनही केले.
सोप्या व शुद्ध मराठी लेखनाचे पुरस्कारणाऱ्या पटवर्धनांनी भाषाशुद्धि-विवेक हा ग्रंथ लिहिला. ह्या ग्रंथात कालबाह्य ठरलेल्या शेकडो मराठी शब्दांची सूची समाविष्ट आहे. माधव त्र्यंबक पटवर्धनांना त्यांच्या ’छंदोरचना’ या ग्रंथासाठी मुंबई विद्यापीठाने १ डिसेंबर १९३८ रोजी डी.लिट्. ही सन्माननीय पदवी दिली. मुंबई विद्यापीठाने मराठी साहित्यासाठी दिलेली ही पहिली डी.लिट. होती. २९ नोव्हेंबर १९३९ रोजी माधव ज्युलियन यांचे निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ विकिपीडीया
स्वामी स्वरूपानंद यांनी आयुष्यभर ज्ञानेश्वरीतील आध्यात्मिक विचार सुबोधपणे साधकांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न केला. “मृत्यू पावलो आम्ही” या शब्दात स्वतःच्या मृत्यूचा अनुभव तारखेनिशी नोंदवला. भगवान विष्णूचे त्यांना साक्षात दर्शन झाले होते.
एकदा पुण्यात रस्त्यावर माईना एक मुलगा रडत बसलेला दिसला, त्याला त्याचे नाव दीपक गायकवाड एवढेच सांगता येत होते. माई मुलाला घेऊन पोलीस स्टेशनला गेल्या व त्यांनी तक्रार नोंदवून घेतली नाही आणि हुसकून लावले. माईंनी मात्र मुलाला सांभाळण्याचे ठरवले, निराश्रीतांचे जगणे किती भयंकर असते ते त्यांनी अनुभवले होते. ते या मुलांच्या वाट्याला येऊ नये ही त्यांची इच्छा होती.
मद्रासमधल्या त्या कसोटीत पहिल्या दिवशीच्या उपाहारापर्यंतच्या खेळातच टिकाकारांची तोंडे गप्प झाली होती. दिलिप सरदेसाईसोबत फारुख इंजिनिअर सलामीला आला होता आणी सलामीच्या पहिल्याच डावात त्याने वेस्ली हॉल, चार्ली ग्रिफिथ, दस्तुरखुद्द सोबर्स आणी लान्स गिब्ज ह्यांचे डोळे पांढरे केले होते. उपाहारावेळी तो ९४ धावांवर नाबाद होता आणी संघाच्या धावा होत्या बिनबाद १२५.
दहा चित्रपटांतील साध्या सोप्या शब्दातल्या परंतु अर्थपूर्ण गीतांमुळे शांताराम आठवले यांना प्रसिद्धी मिळाली. त्यांच्या गीतांमुळेच अनेक चित्रपट यशस्वी झाले, चित्रपटरसिकांनी त्यांच्या गीतांसाठी चित्रपट पाहिले, समीक्षकांनीही त्यांची गीते नावाजली.
खेड्यामधले घर कौलारू”,”या कातर वेळी ”हि अनिल भारती यांनी लिहिलेली आणि मधुकर पाठक यांनी स्वरबद्ध केलेली मालतीबाईंची गाणी खूप गाजली.
चाकोरीबध्द रंगभूमीच्या बाहेर जाऊन विचार करणारा दिग्दर्शक म्हणून त्यांची ओळख होती. हॅल्मेट,कालचक्र, उद्याचा संसार, आपलं बुवा असं आहे, सूर्याची पिल्ले, अखेरचा सवाल, कालचक्र, कार्टी प्रेमात पडली अशा नाटकांचे दिग्दर्शन दामू केंकरे यांनी केले होते.
Copyright © 2025 | Marathisrushti