(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • मराठी लेखिका व सामाजिक कार्यकर्त्या सुनीता देशपांडे

    मराठी लेखिका व सामाजिक कार्यकर्त्या सुनीता देशपांडे यांचा जन्म ३ जुलै १९२५ रोजी झाला. पु.ल. आणि सुनीताबाई यांनी ओरिएंटल हायस्कुलात शिक्षक म्हणून काम केले होते. पु. ल. देशपांडे आणि सुनीताबाईंचे लग्न १२ जून १९४६ रोजी झाले. करारी व्यक्तिमत्त्वाच्या व शिस्तीच्या भोक्त्या सुनीताबाई या पुलंची मूक सावली म्हणूनच केवळ वावरल्या नाहीत तर पुलंच्या जडणघडणीतही त्यांचा अत्यंत क्रियाशील वाटा होता. पुलंचे व्यक्तिमत्त्व साहित्य, एकपात्री प्रयोग, चित्रपट, नाटक, संगीत या क्षेत्रांत तळपत असताना सुनीताबाई प्रकाशझोतात फारशा नव्हत्या. खरे तर सुनीताबाईंनी पुलंबरोबर अनेक नाटक आणि चित्रपटांतूनही भूमिका केल्या होत्या.

    ‘वंदे मातरम्’ या त्यांच्या पहिल्याच मराठी चित्रपटात त्यांनी नायिकेची भूमिका केली. ‘बटाटय़ाची चाळ’, ‘वाऱ्यावरची वरात’ या पुलंच्या प्रयोगातही त्यांनी भूमिका केल्या होत्या. असे असूनही कलावंत म्हणून त्यांची फारशी दखल घेतली गेली नव्हती. नंतर या दोघांनी बा. भ. बोरकर, आरती प्रभू, बा. सी. मर्ढेकर आदी कवींच्या काव्यांचा मागोवा घेणारे जाहीर कार्यक्रम सुरू केले तेव्हा सुनीताबाईंची खऱ्या अर्थाने सर्वसामान्य रसिकांना ओळख झाली. कविता हा त्यांचा जीव की प्राण होता. मराठीतील अनेक कवींच्या अनेक कविता त्यांना तोंडपाठ होत्या. या काव्यप्रेमातूनच जाहीर काव्यवाचनाचा हा कार्यक्रम साकारला होता.

    १९९० मध्ये ‘आहे मनोहर तरी’ हे आपल्या व पुलंच्या सहजीवनाचा मागोवा घेणारे त्यांचे पुस्तक प्रसिद्ध झाले आणि त्याने साहित्य वर्तुळात तसेच पुलंच्या चाहत्यांमध्ये खळबळ उडवून दिली. लेखिका म्हणून हे त्यांचे पहिले पुस्तक तडाखेबंद खपले व गुजराथी आणि इंग्रजीत अनुवादित झाले तरी त्याला पुलंसारख्या दिग्गज लेखकाच्या नावाचेच वलय होते. त्यानंतर मात्र ‘मण्यांची माळ’, ‘मनातलं अवकाश’ आणि ‘सोयरे सकळ’ या त्यांच्या पुस्तकांनी त्यांची साहित्यिक म्हणून स्वतंत्र ओळख निर्माण झाली होती.. ‘प्रिय जी. ए.’ हे त्यांचे प्रकाशित झालेले शेवटचे पुस्तक.

    त्यांचे अत्यंत आवडते लेखक असलेल्या जी. ए. कुलकर्णीना त्यांनी वेळोवेळी लिहिलेल्या पत्रांचा हा संग्रह म्हणजे मराठी साहित्यातील एक अत्यंत वेगळे असे दालन ठरले आहे. पुलंच्या ठायी असलेल्या कलंदर वृत्तीला गोंजारत त्यांच्या सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणाऱ्या सुनीताबाईंनी त्यांच्या दातृत्वासही सामाजिक जोड दिली. सुनीताबाईंच्या व्यक्तिमत्त्वातच सामाजिक सहवेदना असलेला एक कलावंत दडला होता. त्यामुळे लोकांची दु:खे एका कलावंताच्या नजरेने टिपल्यामुळेच त्यांच्या पुढाकाराने पु. ल. देशपांडे फाऊंडेशनची संकल्पना पुढे आली आणि विविध क्षेत्रांत महत्त्वाचे काम करणाऱ्या अनेक संस्थांना या फाऊंडेशनच्या माध्यमातून एक कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या देणग्या मिळू शकल्या.

    अनिल अवचट यांचे मुक्तांगण, पाल्र्याचा लोकमान्य सेवा संघ, मराठी विज्ञान परिषद, ग्रामायन यासारख्या अनेक संस्थांना पुल - सुनीताबाईंनी अक्षरश: लाखो रुपयांच्या देणग्या दिल्या. त्या प्रत्येकवेळी त्याची वाच्यता होणार नाही, याची खबरदारीही त्यांनी घेतली. त्यासाठी या दाम्पत्याने साधी राहणी पसंत केली. सुनीता देशपांडे यांचे ७ नोव्हेंबर २००९ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ:- इंटरनेट

  • बॉलीवूडचा विनोदी अभिनेता देवेन वर्मा

    बॉलीवूडमधील लोकप्रिय विनोदी अभिनेता देवेन वर्मा यांचा आज जन्मदिवस. त्यांचा जन्म २२ आक्टोबर १९३७ रोजी झाला

    देवेन वर्मा यांनी अनेक चित्रपटांत विनोदी भूमिका अतिशय खूबीने वठवल्या होत्या.

    हिंदी चित्रपटसृष्टीत ‘अंगूर’, ‘खट्टामिठा’ या चित्रपटांमधील देवेन वर्मा यांच्या भूमिका गाजल्या होत्या. विनोदाचे टायमिंग साधण्यात हातखंडा असलेल्या देवेन यांना ‘चोरी मेरा काम’, ‘चोर के घर चोर’ आणि ‘अंगूर’ या चित्रपटांतील भूमिकांसाठी फिल्मफेअरच्या सर्वोत्कृष्ट हास्यकलाकाराच्या श्रेणीत सन्मानित करण्यात आले होते.

    देवेन वर्मा यांनी १५० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले होते. चमत्कार, जुदाई, इश्क, चोर के घर चोर, अंगुर, खट्टा-मीठा, कोरा कागज, चोरी मेरा काम यातील देवेन वर्मा यांच्या भूमिका गाजल्या होत्या. ‘दोस्त असावा तर असा’, ‘हा खेळ सावल्यांचा’ या मराठी चित्रपटांतही त्यांनी काम केले होते.

    त्यांनी स्वतःचे प्रॉडक्शन हाऊस सुरु करत काही चित्रपटांची निर्मिती व दिग्दर्शनही केले होते.

    देवेन वर्मा यांचे २ डिसेंबर २०१४ रोजी निधन झाले.

    -- संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३

  • वसंत तांबे

    वसंत तांबे हे रा.स्व. संघाचे सक्रिय कार्यकर्ते आणि अर्थात जुनेजाणते आधारस्तंभ. १९८७ ते १९९७ अशी १० वर्षे त्यांनी सांभाळलेली मुंबई महानगर कार्यवाहपदाची जबाबदारी, कोकण प्रांताचे प्रचार विभागप्रमुख म्हणून केलेले काम, विश्व संवाद केंद्र, रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीसारख्या संस्थांच्या उभारणीतला सहभाग अशा कामांतून संघाला त्यांनी दिलेले योगदान मोलाचे होते.

    तांबे यांचे लहानपण पुण्यात गेले. तेव्हापासून ते संघाचे सक्रिय कार्यकर्ते बनले. व्यवसायाने सिव्हिल इंजिनीअर असलेल्या तांबे यांनी मुंबईत आल्यानंतरही आपले कार्य सुरूच ठेवले. नायगाव नगराचे संघचालक म्हणून, मुंबई महानगर कार्यवाह म्हणून त्यांनी इथे कार्यकर्त्यांची मोठी फळी उभी केली. सगळ्यांचे ऐकून घेऊन, सगळ्यांना एकत्र घेऊन संघटना उभी करण्याचे कसब, उत्तम वक्ता आणि संवादक असलेल्या तांबे यांच्या ठायी होते.

    वनवासी कल्याण आश्रमाच्या कामाला आकार देण्यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले. त्या काळात मुंबईच्या नायगावातील त्यांचे घर कार्यकर्त्यांसाठी केंद्रच बनले होते. आदिवासी मुलांना मुंबईत आणणे, त्यांना शिकवणे, मुंबई फिरवणे वगैरे कामे ते करत. महाराष्ट्रभरातील कार्यकर्त्यांना त्यांचा मोठा आधार होता. १९९५च्या सुमारास उभ्या राहिलेल्या विश्व संवाद केंद्राच्या कामात, तसेच रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या उभारणीतही त्यांनी आपल्या विचारांचे योगदान दिले होते.

    महिलांच्या राजकीय कामांमध्ये सहभागी करून घेण्याबाबतच्या त्यांच्या सकारात्मक विचारांची दखल संघाकडून अखिल भारतीय स्तरावरही घेतली गेली. १९९३ साली किल्लारीच्या भूकंपामधील नुकसान त्यांनी आपल्या परीने भरून काढण्याचा प्रयत्न केला. जनकल्याण समितीच्या वतीने तेथील भूकंपग्रस्तांसाठी बांधलेल्या घरांची डिझाइन्स त्यांनी तयार केली. त्यांचे अलीकडचे महत्त्वाचे काम म्हणजे, त्यांच्या संकल्पनेतून साकारलेली 'फोरम फॉर इंटिग्रेटेड नॅशनल सिक्युरिटी' ही संस्था. तिचे काम आज राष्ट्रीय स्तरावर सुरू असून अनेक निवृत्त लष्करी अधिकारी त्यात कार्यरत आहेत.

    वसंतरावांचे वैयक्तिक आयुष्य साहित्य, संगीत यांनी समृद्ध होते. ते उत्तम तबलावादक होते. शास्त्रीय संगीताचे दर्दी होते. 'विचार करण्यासारखे काही', 'ज्येष्ठपर्व', 'प्रश्न प्रश्न प्रश्न', 'दक्षिण दिग्दर्शन' ही पुस्तके त्यांनी लिहिली. त्यांचे लेखनकार्यही अखेरपर्यंत सुरू होते.

    (संदर्भ : महाराष्ट्र टाईम्समधील नोंद हे सदर)


  • उमादेवी ते टूणटूण – गायिका ते हिन्दी चित्रपटसृष्टीतील पहिली विनोदी अभिनेत्री

    …… …. .पण तो सीन करताना तिच्या वजनाने ती कॉटमध्ये पडते . तेव्हा दिलीपकुमार हसला व म्हणाला “ अरे इस  टूणटूण को कोई उठाओ” तिला ते नाव आवडले व तिने आपले नामकरण टूणटूण केले.आपल्या शारीरिक व्यंगांवर विनोद करून घेणे सोपी गोष्ट नाही.

  • गुलजार

    हिंदी चित्रपटसृष्टीवर गेली अनेक वर्षे कवी, गीतकार, लेखक, दिग्दर्शक अशा विविध भूमिकांमध्ये आपला अमीट छटा उमटवणाऱ्या गुलजार यांचा जन्म १८ ऑगस्ट १९४३ रोजी झाला.

    गुलजार यांचे खरे नाव संपूर्णासिंह कालरा! चित्रपटसृष्टीत नाव चमकण्यापूर्वी संपूर्णानंद सिंह कालरा हे मोटार मेकॅनिक होते. गुलजार यांनी आयुष्यभर शायरीवर प्रेम केले, जीवतोड केले, शायरीसाठी त्यांनी संपूर्ण आयुष्य वेचले, रात्ररात्र जागून काढल्या. खाजगी आयुष्यात वादळं आलीत, तरी गुलजार यांनी शायरी कधीच थांबवली नाही. स्वत:च्या बायकोपेक्षाही त्यांनी शायरीवर जास्त प्रेम केलं. उच्च कोटीची, प्रचंड भावनाप्रधान असलेली शायरी त्यांनी लिहिली. लोकजीवनाशी जुळलेल्या वैविध्यांनी नटलेल्या रचना गुलजार यांनी रचल्या.

    लेखक, गीतकार, निर्माता, दिग्दर्शक म्हणून आपला खास ठसा मा.गुलजार यांनी चित्रपटसृष्टीत उमटवला. गुलजार यांनी बिमल रॉय यांच्या १९६२ सालच्या ‘बंदिनी’ पासून सिनेकारकीर्दीला प्रारंभ केला होता. बिमल रॉय हेच त्यांचे गुरू! संपूर्णानंदाचा गुलजार कसा झाला? याची कहानी रंजकच आहे. ‘मेरे साजनऽ है उस पार...’वाले ख्यातनाम संगीतकार सचिनदेव बर्मन एकदा मोटार मेकॅनिक असलेल्या संपूर्णानंदाकडे गाडी सुधरविण्यासाठी आले होते. संपूर्णानंदाशी बोलता बोलता त्याच्यात दडलेला शायर आणि त्याची विलक्षण प्रतिभा सचिनदांनी हेरली. सचिनदा तेव्हा बिमल रॉय यांच्या ‘बंदिनी’साठी काम करीत होते. बंदिनीचे गीतकार शैलेंद्र होते. मात्र, या चित्रपटातील एका दृश्यावर शैलेंद्र यांचे कोणतेच गीत बिमल रॉय यांना हजम होत नव्हते. अशा स्थितीत सचिनदांना संपूर्णानंदाची आठवण आली आणि संपूर्णानंदाची बिमल रॉय यांच्याशी भेट घालून देण्याचा निश्चतय त्यांनी केला. परंतु, अडचण अशी होती की, बिमलदा कुणाचेही म्हणणे सहजतेने कधीच स्वीकारत नव्हते. सचिनदांनाही आपले म्हणणे त्यांच्यासमोर मांडण्यापूर्वी दहादा विचार करावा लागत असे. ‘‘जे होईल, ते होईल, पाहू पुढची पुढं,’’ म्हणत त्यांनी संपूर्णानंदाची भेट बिमल रॉय यांच्याशी घालून दिली व आश्चनर्य म्हणजे, संपूर्णानंदामधील प्रतिभा पाहून ते देखील प्रभावित झाले आणि ‘बंदिनी’चे गाणे संपूर्णानंदांना मिळाले. ‘मोरा गोरा अंग लई ले... मोहे श्याम रंग देई दे, छुप जाऊंगी रात ही मे, मोहे पी का रंग देई दे...’ हे गाणं संपूर्णानंदानं रचलं आणि हे गाणं एवढं हिट झालं की, ते रसिकांच्या ओठी आजही आहे. लतादीदींनी स्वरबद्ध केलेलं हे गीत आणि एस.डींनी चढवलेला संगीतसाज, यामुळं हे गाणं अधिकच नटलं. हे गाणं हिट होताच संपूर्णानंद रातोरात हिट झाले व ‘गुलजार’ हे नाव देशभरात पोहोचलं. यानंतर गुलजार यांना बिमल रॉय यांनी आपला सहायक बनविले. म्हणून गुलजार हे बिमल रॉय यांना आपला गुरू मानतात.

    बिमल रॉय यांच्या मृत्यूनंतर गुलजार यांनी हृषीकेश मुखर्जी यांच्यासोबत काम केले. ही जोडी चित्रपटसृष्टीत यशस्वी जोड्यांपैकीच एक महत्त्वाची जोडी आहे. हृषीकेशदांसाठी गुलजार यांनी सर्वप्रथम संवाद ‘आनंद’साठी लिहिलेत. ‘आनंद’साठी गुलजार यांना सर्वोत्कृष्ट संवाद लेखकाचा फिल्मफेअर मिळाला होता. या चित्रपटातलं मुकेश यांच्या आवाजातलं राजेश-अमिताभ या दोन सुपरस्टार्सवर चित्रित ‘मैने तेरे लिए ही सात रंग के सपने चुने...’ गुलजार यांच्या कलमातूनच रचलं गेलं होतं. हृषीदांसोबत गुलजार यांनी बावर्ची, गुड्डी, मिली, नमक हराम, गोलमाल, अभिमान यांसारखे चित्रपट केलेत. मात्र, या जोडीला नजर लागली. नंतर दोघांमध्ये मतभेद झालेत व ‘यापुढे सोबत काम करायचे नाही,’ असा निर्णय त्यांनी घेतला. गुलजार यांनी स्वतंत्र मार्ग निवडला. त्यांनी स्वत: चित्रपट निर्मिती करायला प्रारंभ केला. स्वत:च्या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद गुलजार स्वत:च लिहायचे.

    संजीव कुमार आणि जया भादुरी हे दोघेही त्यांचे आवडीचे कलावंत! या दोघांच्या सुंदर अभिनयाने नटलेला ‘कोशिश’ हा गुलजार यांचाच चित्रपट होता. ‘कोशिश’ला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. संजीव कुमार यांच्यासोबत गुलजार यांनी ‘आँधी’, ‘मौसम’, ‘कोशिश’, ‘परिचय’, ‘अंगूर’, ‘नमकीन’ असे चित्रपट केले. याशिवाय त्यांनी जितेंद्र, विनोद खन्ना, अमोल पालेकर, नसिरुद्दिन शहा आदी कलांवतांसोबतही चित्रपट बनविले. ‘परिचय’मध्ये ‘जम्पिंग जॅक’ जितेंद्रला त्यांनी घेतले, तेव्हा सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. जितेंद्र यांची इमेज पाहता ते गंभीर अभिनय करूच शकणार नाही, असा सर्वांचाच कयास होता. गुलजार यांनी या सर्व कयासांना दूर सारत जितेंद्रला गंभीर भूमिका करायला लावली व जितेंद्र यांनी गंभीर तसेच सुंदर अभिनयाचा ‘परिचय’ देताना भूमिकेचं सोनं करून टाकलं. ‘मुसाफिर हू यारो, न घर है ना ठिकाणा...’ हे गाणे अजूनही तोंडावर आहे.

    ‘ट्रॅजेडी क्वीन’ मीनाकुमारी यांच्याशी गुलजार यांचं नातं भावनात्मक होतं. मीनाकुमारीने मृत्यूपूर्वी आपल्या सर्व डायऱ्या आणि शायरी गुलजार यांना सोपविली होती. गुलजार यांनी त्यावर संपादकीय संस्कार करून तिची शायरी प्रकाशित करण्याचे पुण्याचे काम केले. ‘बेनझीर’ चित्रपटाच्या सेटवर मीनाकुमारीशी त्यांची भेट झाली होती. तेव्हा गुलजार हे बिमल रॉय यांचे सहायक होते. गुलजार यांनी मीनाकुमारीला ‘मेरे अपने’मध्ये झळकवले होते. मीनाकुमारीने १९७२ साली जीवनयात्रा संपविली होती. मात्र, मीनाकुमारीच्या आठवणींनी ते आजही व्याकुळच होतात. ‘कोई होता जिसको अपना, हम अपना कहलाते यारो...पास न सही दूर ही होता, लेकिन होता कोई अपना...हे ‘मेरे अपने’तलं गुलजार यांचं गीत भावदर्द जागवतात.

    १९८८ साली ‘मिर्झा गालिब’ व ९३ साली ‘किरदार’ या छोट्या पडद्यावरील मालिका त्यांनीच केल्या होत्या. ‘चौरस रात (लघुकथा संग्रह)’, ‘जानम’ (कवितासंग्रह ) एक बूंद चॉंद (कवितासंग्रह), रावी पार (कथासंग्रह), रात चॉंद और मै, रात पश्मीने की, खराशें आदी त्यांची प्रमुख पुस्तके आहेत. भारतीय चित्रपटसृष्टीतले गुलजार यांचे योगदान वाघाचे आहे आणि त्यांना ‘भारतीय शायरीचं विद्यापीठ’चं म्हणायला हवं! चित्रपटाकडून ते आता त्याच्या पहिल्या प्रेमाकडे- साहित्याकडे वळले आहेत. केवळ स्वत:च्या लेखनापाशी न थांबता ते आता दुसऱ्यांच्या साहित्यातही लक्ष घालता आहे. त्यांनी कुसुमाग्रजांच्या कवितेचा अनुवाद केला आहे. ते लेखक म्हणून जगत नसतात आणि माणूस म्हणून जगत असतो तेव्हाही आनंदानं जगतो.

    सत्तरीच्या आसपास तो कॉम्प्युटर शिकले आणि आता ते रोज इंटरनेट वापरतात. भल्या सकाळी टेनिस खेळण्याचा त्यांचा ‘हेल्दी’ क्रम गेली तीस वर्षे अखंड चालू आहे. त्यांना उत्तमोत्तम खाण्यापिण्याची आवड आहे. डायबेटिसमुळे बंगाली मिठाई खाता येत नाही, हे त्यांचे दु:ख आहे.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ:-इंटरनेट
    https://www.youtube.com/watch?v=F3hX-yNPb2E

  • गजलनवाज भीमराव पांचाळे

    भीमराव पांचाळे यांनी ख्याल, ठुमरी, भक्तिसंगीत, नाट्यसंगीत, भावगीत असे सर्व प्रकारचे शास्त्रीय-उपशास्त्रीय व सुगम गायन केले आहे. भीमराव पांचाळे यांची गाण्याची पद्धत ही आशयप्रधान गायकी स्वरूपातील आहे असे मानले जाते.

  • प्रख्यात अभिनेता यतीन कार्येकर

    यतीन कार्येकर हे आपल्या सगळ्यांच्या ओळखीचं नाव आहे. यतीन कार्येकर हे मराठीतील जेष्ठ अभिनेत्री ज्योत्स्ना कार्येकर यांचे सुपुत्र आहेत.

  • शिवसेनेचे नेते अनंत तरे

    ठाण्यात सलग तीन वेळा महापौरपद भूषविण्याचा विक्रम अनंत तरे यांच्या नावावर आहे. त्यांनी १९९३ मध्ये पहिल्यांदा महापौरपद भूषविलं.

  • अलबेला’ फेम मास्टर भगवान

    डान्स हाच भगवानदादा यांचा “प्लस पाइंट’ होता. नाचता नाचता हळूवारपणे अलगद खांदे उडवण्याची त्यांची अफलातून शैली प्रचंड लोकप्रिय ठरली. सुपरस्टार अमिताभ बच्चन, कमल हसन आदी कलाकारांनी भगवानदादा यांची हीच नृत्यशैली सही सही उचलली.

  • गदीमा उर्फ ग.दि.माडगूळकर

    गदीमांचे शिक्षण आटपाडी, कुंडल आणि औंध येथे. त्यांचा जन्म १ ऑक्टोबर १९१९ रोजी झाला. गदीमांना लहानपणापासून लिहिण्याची, नकला करण्याची आवड होती. तिचा उपयोग झाला. ‘हंस पिक्चर्स’ ह्या चित्रसंस्थेच्या, मा. विनायक दिग्दर्शित ब्रह्मचारी ह्या गाजलेल्या चित्रपटात काही छोट्या भूमिका करून माडगूळकरांनी आपल्या चित्रपटक्षेत्रातील कारकीर्दीचा आरंभ केला. सुप्रसिद्ध साहित्यिक वि. स. खांडेकर ह्यांचे लेखनिक म्हणूनही त्यांनी काही काळ काम केले. त्या निमित्ताने खांडेकरांच्या संग्रहातली पुस्तके त्यांना वाचावयास मिळाली; खूप लिहावेसे वाटू लागले; त्यांच्या कवितालेखनालाही वेग आला. नवयुग चित्रपट लि. ह्या चित्रसंस्थेत के. नारायण काळे ह्यांच्या हाताखाली साहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करण्याची संधी माडगूळकरांना मिळाली, तेव्हा चित्रकथेची चित्रणप्रत कशी तयार करतात, हे त्यांना अगदी जवळून पहावयास मिळाले. तसेच आचार्य अत्रे ह्यांच्या सोप्या पण प्रासादिक गीतरचनेचा आदर्श त्यांच्या समोर राहिला. पुढे नवहंस पिक्चर्सच्या भक्त दामाजी आणि पहिला पाळणा ह्या चित्रपटांची गीते लिहिण्याची संधी मिळाली. पुढे राजकमल पिक्चर्सच्या लोकशाहीर रामजोशी ह्या चित्रपटाची कथा-संवाद आणि गीते त्यांनी लिहीली; त्यात एक भूमिकाही केली. ह्या चित्रपटाला फार मोठी लोकप्रियता लाभली.

    त्यानंतर कवी आणि लेखक अशा दोन्ही नात्यांनी माडगूळकर हे मराठी चित्रसृष्टीचा एक भक्कम आधार बनले. गीतकार, कथासंवादकार आणि अभिनेते म्हणून दीडशेहून अधिक मराठी आणि कथासंवादकार म्हणून पंधरा हिंदी चित्रपटांसाठी त्यांनी काम केले. त्यांनी मराठी चित्रपटांसाठी लिहिलेली गीते चैत्रबन ह्या नावाने संग्रहीत आहेत, तसेच त्यांनी लिहिलेल्या काही तीन चित्रकथा ही मराठी चित्रकथाही पुस्तकरूपाने प्रसिद्ध झालेली आहे. युद्धाच्या सावल्या ह्या नावाचे एक नाटक त्यांनी लिहिले होते; तथापि ते फारसे यशस्वी झाले नाही. माडगूळकरांच्या कवितेवर ज्ञानेश्वर, नामदेव, तुकाराम आदी संतांच्या कवितेप्रमाणेच पंडिती आणि शाहिरी कवितेचेही सखोल संस्कार झाले होते, ह्याचा प्रत्यय त्यांनी चित्रपटांसाठी लिहिलेल्या सुंदर घाटाच्या, सोप्या परंतु प्रभावी गीतांतूनही येतो. त्यांच्या कवितेतील अस्सल मराठमोळेपणामागेही हेच संस्कार उभे असल्याचे दिसते. त्याचप्रमाणे लोकगीतांच्या लोभस लयतालांनी त्यांची गीते नटलेली असत. उत्तम समरगीते आणि बालगीतेही त्यांनी लिहिली.

    मराठी रसिकांनी माडगूळकरांच्या काव्यरचनेला मनःपूर्वक प्रतिसाद दिला आणि त्यांच्या गीत रामायणाने तर कीर्तीचा कळस गाठला; त्यांना ‘महाराष्ट्र वाल्मीकी’ ही सन्माननीय पदवी लोकांनी स्वयंस्फूर्तीने दिली. गीतरामायणाच्या गायनाचे शेकडो कार्यक्रम झाले व अजूनही होत आहेत. अन्य भारतीय भाषांत त्याचे अनुवादही झाले. गदीमा हे उत्तम चरित्र अभिनेतेही होते. पुढचं पाऊल, लाखाची गोष्ट, पेडगावचे शहाणे, वऱ्हाडी आणि वाजंत्री ह्या चित्रपटांत त्यांनी केलेल्या भूमिका संस्मरणीय ठरलेल्या आहेत. त्यांच्या चित्रपटकथा वैविध्यपूर्ण असून त्यांचे संवाद सोपे पण प्रत्ययकारी होत्या. गदिमांनी तब्बल १५८ मराठी चित्रपटांसाठी कथालेखन केले, यातील अनेक चित्रपटांच्या कथा-पटकथा व संवादही त्यांच्याच लेखणीतून उतरले. मात्र त्यांचा संचार केवळ मराठी चित्रसृष्टीतच नव्हता, तर हिंदीतही त्यांनी स्वतंत्र स्थान निर्माण केले होते. त्यांच्या कथेवर सुमारे २५ हिंदी सिनेमांची निर्मिती झाली असून त्यात ‘तुफान और दिया’, ‘दो आँखे बारह हाथ’, ‘नवरंग’, ‘गुंज उठी शहनाई’, ‘आदमी सडक का’ आदींचा समावेश आहे. गुरुदत्त यांच्या गाजलेल्या ‘प्यासा’ची मूळ कथाही गदिमांचीच होती, तर राजेश खन्नाचा ‘अवतार’ व अमिताभ-राणी मुखर्जीच्या ‘ब्लॅक’ची मूळ कथाही गदीमा यांचीच.

    गदिमांचा उल्लेख कोणी महाकवी असा केला, की ते गमतीने म्हणत असत- अहो, मी महाकवी नाही, महाकाय कवी आहे! त्यांच्या जोगिया, मंतरलेले दिवस, चैत्रबन इ. अनेक पुस्तकांना महाराष्ट्र शासनाची पारितोषिके मिळाली. भारत सरकारने पद्मश्री देऊन त्यांचा सन्मान केला. १९७३ मध्ये यवतमाळ येथे भरलेल्या मराठी साहित्यसंमेलनाचे अध्यक्षपद त्यांना देण्यात आले होते. महाराष्ट्र राज्याच्या विधानपरिषदेचे ते काही काळ नियुक्त सदस्य होते; तसेच महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृति मंडळाचेही ते सदस्य होते.

    ग.दि.माडगूळकर यांचे १४ डिसेंबर १९७७ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.विकिपीडिया
    संदर्भ.शशांक गिरडकर /gadima.com