जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
एन. दत्ता यांचा जन्म १२ डिसेंबर १९२७ रोजी झाला. वसंत देसाईंचा सन्माननीय अपवाद वगळता बहुसंख्य संगीतकारांनी इंग्रजी आद्याक्षरांचा आसरा घेत मराठीपण लपविण्याचा प्रयत्न केला. के. दत्ता (कोरगावकर) सी. रामचंद्र (चितळकर) दत्ताराम(वाडकर), सुधीर (फडके) यांसारख्या मराठमोळ्या संगीतकारांनी आपली आडनावे खुबीने लपवीत या क्षेत्रात मुसंडी मारली. हिंदी सिनेमात एन. दत्ता हे नाव प्रथितयश संगीतकारांच्या श्रेणीत आदराने घेतलं जावं अशी नेत्रदीपक सांगीतिक कामगिरी त्यांच्या नावावर जमा आहे. एकापेक्षा एक सरस व यादगार गाणी एन. दत्तांनी या चित्रपटात दिली आहेत. एन. दत्ता यांचे खरे नाव दत्ता नाईक.
एन. दत्तांचं नाव घेताच, कर्णमधुर संगीताने नटलेल्या ‘मिलाप’, ‘मरीन ड्राइव’, ‘चंद्रकांता’, ‘साधना’, ‘धूल का फूल’, ‘ब्लॅककॅट’, ‘धरमपुत्र’, ‘ग्यारह हजार लडकियां’, ‘काला समुंदर’ व ‘चांदी की दीवार’सारख्या हिंदी, तर ‘मधुचंद्र’, ‘अपराध’ व ‘बाळा गाऊ कशी अंगाई’ सारख्या मराठी चित्रपटांची मालिकाच डोळ्यांपुढून तरळून जाते. मा.एन. दत्ता हे गोवेकर अगदी लहानपणापासूनच गोवन व पोर्तुगीज लोकसंगीत सातत्याने कानावर पडत असल्याने जात्याच संगीतात रस असणारे दत्ता नादावून गेले नसल्यासच नवल. शालान्त परीक्षेनंतर त्यांनी थेट मुंबई गाठली व देवधर संगीत विद्यालयात संगीताचे रीतसर शिक्षण घेतले. सुरुवातीला काही काळ संगीतकार हेमंत केदार यांच्याकडे काम केल्यानंतर गुलाम हैदर यांच्याकडे मिळालेल्या समृद्ध अनुभवामुळे त्यांच्यातील प्रगल्भ संगीतकार अधिकाधिक बहरत गेला. त्या वेळी गुलाम हैदर बॉम्बे टॉकीज व व फिल्मस्तानच्या चित्रपटांचे संगीत करीत असत. स्वातंत्र्यपूर्व काळात होत असलेल्या देशभक्तिपर मेळ्यातून एन. दत्तांना आगळ्यावेगळ्या ढंगातील गाणी गाताना सचिनदेव बर्मन यांनी ऐकले होते व आपल्याकडे साहाय्यक म्हणून काम करण्याची ‘ऑफर’ही दिली होती. फाळणीनंतर गुलाम हैदर पाकिस्तानात निघून गेले व सचिनदेव फिल्मस्तानचे संगीतकार बनले. त्यानंतर एन. दत्ता त्यांचे साहाय्यक बनले. सचिनदांच्या ‘अफसर’, ‘एक नजर’, ‘नौजवान’, ‘टॅक्सी ड्रायव्हर’, ‘मुनीमजी’ ते थेट ‘देवदास’पर्यंत त्यांनी सचिनदांकडे साहाय्यक संगीतकाराची धुरा समर्थपणे सांभाळली. या काळातल्या एस.डी. बर्मन यांच्या कित्येक चालींवर एन. दत्तांच्या शैलीचा प्रभाव दिसून येतो.
एस.डी. बर्मन यांच्या ‘बुजदिल’ मधील लताबाईंचं शास्त्रीय सुरावटीतील ‘झन झन झन पायल बाजे’ हे लोकप्रिय गाणं एन. दत्ता यांचं असल्याची चर्चा त्या काळी सर्वत्र होत होती. पुण्यातील एका समारंभात पु.ल. देशपांडेंनी एन. दत्ता यांचे नाव न घेता या गाण्याचे श्रेय एका मराठी माणसाचे असल्याबद्दल गौरवोद्गार काढले होते. लता मंगेशकरांबरोबर महेंद्र कपूरने गायलेलं ‘तेरे प्यार का आसरा चाहता हूं’ हे शायरी ढंगातलं युगुलगीत व ‘धडकने लगी दिल के तारों की दुनिया’ हे महेंद्र कपूर व आशाभोसलेच्या स्वरातलं चिरतरुण प्रेमगीत एन. दत्तांनी अप्रतिम सुरावटीत बांधलं आहे. ‘तू हिंदू बनेगा न मुसलमान बनेगा’ हे अर्थपूर्ण गाणं रफीच्या, तर ‘कासे कहूं मन की बात’ हे गाणं सुधा मल्होत्राच्या अजरामर गाण्यांपैकी एक समजलं जातं. ‘झुकती घटा गाती हवा सपने जगाए.’ या कर्णमधुर गाण्याच्या मुखडय़ाची चाल गजानन वाटवेंच्या ‘फांद्यावरी बांधिले गं मुलींनी हिंदोळे पंचमीचा सण आला डोळे माझे ओले’ या गाण्यावर बेतलेली आहे, हे एका मुलाखतीत एन. दत्तांनी सांगितले होते. बी.आर. चोप्रांचा ‘साधना’ हा चित्रपट एन. दत्तांच्या कारकिर्दीच्या दृष्टीने ‘टर्निग पॉइंट’ होता. या चित्रपटात त्यांनी मुजरा, कव्वाली, भक्तिगीत, प्रेमगीत व सामाजिक आशयाची गाणी देऊन आपलं अष्टपैलुत्व सिद्ध केलं होतं.
लता मंगेशकर यांच्या स्वरात ‘कहोजी तुम क्या खरीदोगे’ हा साहिरच्या अभिजात काव्याने नटलेला मुजरा एन. दत्तांच्या लाजवाब प्रतिभेचा उत्तुंग आविष्कारच म्हणावा लागेल. मोहम्मद रफी आणि बलवीरने गायलेल्या ‘आज क्यों हमसे परदा है’ या कव्वालीला रसिकांचा उदंड प्रतिसाद लाभला. रफीने आशा भोसलेबरोबर गायलेलं ‘संभल ऐ दिल तडपने और तडपाने से क्या होगा’ या अवीट गोडीच्या गाण्याची खुमारी औरच होती. ‘औरत ने जनम दिया मर्दों को’ हे ठाय लयीतलं अजरामर गाणं एन. दत्तांच्या मुकुटात मानाचं शिरपेच खोवून गेलं. ‘साधना’मुळे एन. दत्तांचं नाव प्रथितयश संगीतकारांच्या बरोबरीने घेतलं जाऊ लागलं. १९५९ साली आलेल्या ‘ब्लॅक कॅट’ चित्रपटात ‘सितारे राह तकते है चले आओ’, ‘नशे में तुम नशेमे हम’, ‘कौन मुझे रोके कौन मुझे टोके’ यांसारखी चांगली गाणी एन. दत्ता यांनी दिलेली असली तरी हा चित्रपट आठवतो तो लता मंगेशकरांनी गायलेल्या ‘मैं तुम्हीसे पुछती हूं’ या सदाबहार गाण्यामुळेच! त्यांनी तेरा मराठी चित्रपटांना संगीत दिले होते. १९८० साली प्रदर्शित झालेला ‘चेहरे पे चेहरा’ हा त्यांचा अखेरचा चित्रपट. महाराष्ट्र शासनाने नागरी पुरस्कार देऊन त्यांना गौरविले होते. मा.एन.दत्ता राहत असलेल्या अंधेरी भागातील त्यांच्या निवासस्थानाजवळच्या रस्त्याला मुंबई महापालिकेने ‘एन. दत्ता पथ’ असे नाव देऊन त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे. एन. दत्ता यांचे ३० डिसेंबर १९८७ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर
संदर्भ :- इंटरनेट
मा.एन. दत्ता यांनी संगीत दिलेली काही चित्रपटगीते.
हे चिंचेचे झाड दिसे मज चिनार वृक्षापरी
निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला गं बाई
धुंदीत गाऊ मस्तीत राहू
माझ्या मनी प्रियाची मी तार छेडिते, संसार मांडते
निळे गगन, निळी धरा
तेरे प्यार का आसरा चाहता हूं
कासे कहूं मन की बात
मूळच्या बंगालच्या असणार्या सुमन कल्याणपूर यांचा जन्म, आजच्या बांगलादेशाची राजधानी ढाक्का येथे २८ जानेवारी १९३७ साली झाला. सुमन हेमाडी हे त्यांचे माहेरचे नाव. रामानंद कल्याणपूर यांच्याशी विवाहबध्द झाल्यावर त्या मुंबईत आल्या. दहा वर्ष वेगवेग़ळ्या गुरूंकडून संगीत शिकत असतांनाच अनेक कार्यक्रमांतून गायनाची संधीही सुमन कल्याणपुर यांना मिळत गेली.
मार्क झुकरबर्गचे वडिल इलियट हे व्यवसायाने डेन्टिस्ट तर आई मानसपोचारतज्ञ आहेत. त्यांचा जन्म १४ मे १९८४ रोजी झाला. वयाच्या १२ व्या वर्षापासुनच मार्कला कॉम्प्युटर प्रोग्रॅमिंग मध्ये रस निर्माण झाला होता. मुलाची कॉम्प्युटर मधली आवड बघुन मार्कच्या वडिलांनी त्याच्यासाठी खासगी शिक्षकाची नियुक्ती केली. लहानपणी केवळ मजा म्हणुन मार्कने अनेक कॉम्प्युटर गेम्स तयार केले होते. लहान वयातच त्याने अटारी बेसिक वापरायला सुरवात केली. त्याने घरात एकमेकांना संदेश देण्यासाठी एक प्रोग्रॅम विकसित केला. याचा उपयोग त्याच्या वडिलांच्या दवाखान्यात रुग्णांना त्यांचा नंबर आला आहे हे सुचित करण्यासाठी केला गेला. या नेटवर्कला ‘झुकनेट’ असं नाव दिले गेलं. नवनवीन प्रोग्रॅम लिहणं हा तर झुकरबर्गसाठी छंदच झाला होता. मार्कने हार्वर्ड विदयापीठात कॉम्प्युटर सायन्स आणि टेक्नॉलॉजी या शाखेत प्रवेश घेवुन आपल्या माहाविदयालयीन जीवनाला सुरवात केली. या काळात मार्कने गंमत म्हणुन ‘फेसमस’ हा प्रोग्रॅम तयार केला. यात पोस्ट केलेल्या फोटोंवर विदयार्थ्यांनी आपलं मत मांडायचं होतं. पण हा प्रोग्रॅम काही दिवसातच बंद पडला. परवानागी शिवाय फोटो वापरल्याबद्द्ल झुकरबर्गवर टिकाही झाली अणि त्याला माफीही मागावी लागली. परंतु हाच प्रयत्न झुकरबर्गला फेसबुकच्या निर्मितीसाठी प्रेरणादायी ठरला. मार्क शिकत असलेल्या अॅसकॅडमीत विदयार्थ्यांची माहिती आणि फोटोज संकलित केलेली डिरेक्टरी असायची त्याला फेसबुक असे म्हटलं जायचे यावरुनच साईटला ‘फेसबुक’ असं नाव दिलं गेलं असं म्हटलं जाते. मार्क झुकरबर्ग यांनी फेसबुक चालू करण्याआधी 'फेसबुक'ची संपूर्ण योजना आपली मैत्रीण प्रिशिलाला(जी नंतर पत्नी झाली.) समजावून सांगितली. प्रिशिलाने देखील मार्क झुकरबर्गला सगळ्या कामात मदत करण्याचे आश्वासन दिले. झुकरबर्गने 'फेसबुक'साठी शिक्षण सोडले.
'फेसबुक' सुरु झाल्यानंतर पहिला युजर म्हणून प्रिशिलाने रजिस्ट्रेशन केले. वेबच्या दुनियेत क्रांती घडवणाऱ्या झुकरबर्गचे यश त्याच्या वयाच्या मानाने कितीतरी मोठे आहे, यशाची एकेक पायरी चढत असताना मोठया उद्योगसमुहांकडुन येणाऱ्या ऑफर्स डावलून फेसबुक ने आपली यशस्वी घोडदौड सुरु ठेवली. मला अणि माझ्या सहकाऱ्यांना केवळ पैसा महत्वाचा नसुन लोकांना जास्तीत जास्त चांगली सेवा देण्याचे उद्दिष्ट्य आहे. “My aim is making world open” असं त्याने एक मुलाखतीत म्हटलं आहे. सध्या जगात १.७१ अब्ज फेसबुकचे युजर्स आहेत. फेसबुकमुळे शाळा-कॉलेज मधले मित्रमैत्रिणी पुन्हा एकमेकांच्या संपर्कात आले. मित्राचा मित्र, मैत्रिणीची मैत्रीण, तिची बहिण, तिचा भाऊ, सख्ये, चुलत - निलत अगदी शेजारी राहणारे ताई, माई, दादा सुध्दा ही लिस्ट तर हजारांवर जाऊन पोहचते. ज्यांना रोजच काय पण अनेक वर्षात भेटता आले नाही किंवा ज्यांच्या भेटीची शक्यताही दुरापास्त आहे त्यांना आता आपण रोज भेटतो फेसबुकवर. या सगळ्याच्या सुखदु;खात जरी आपल्याला प्रत्यक्षपणे सामील होता आलं नाही तरी अप्रत्यक्षपणे सामील होण्याची सोय फेसबुक ने उपलब्ध करुन दिली आहे. एरव्ही सामाजिक, राजकीय विषयांवर टिका, टिपण्णी करणं ही पत्रकार आणि नेते मंडळीचीच मक्तेदारी समजली जायची पण फेसबुकमुळे सामान्य माणुस या विषयांवर आपलं मत हिरीरीने मांडू लागला. फेसबुकमुळे प्रत्येकाला हक्काचं व्यासपीठ मिळालं. मार्क झुकरबर्गची लव्हस्टोरी त्याच्यासारखीच 'हटके' आहे. झुकरबर्ग १४ वर्षांपूर्वी पहिल्यादा आपल्या पत्नी प्रिशिला हिला भेटला होता. पहिल्या भेटीतची प्रिशिलावर झुकरबर्गला जीव जडला होता. मार्क झुकरबर्ग आणि प्रिशिला हार्वर्ड युनिव्हर्सिटीत शिक्षण घेत होते. दोघे २००३ मध्ये एका पार्टीत सहभागी झाले होते. झुकरबर्ग वॉशरूमबाहेर उभा होता. तितक्यात त्याचे लक्ष रांगेत उभ्या असलेल्या एका युवतीकडे गेले. ती युवती म्हणजेच प्रिशिला चान. झुकरबर्ग व प्रिशिलाचे हाय- हॅलो झाले. हळूहळू दोघांत चांगली गट्टी जमली. दोघे दररोज भेटू लागले. मैत्री अन् मैत्रीचे रुपांतर प्रेमात कसे झाले, हे दोघांनीही कळले नाही. झुकरबर्ग व प्रिशिलाने १९ मे २०१२ ला विवाह केला. मार्क आणि प्रसिला यांनी आपल्या मुलीच्या जन्मानंतर त्याच्या नावावर असलेले ९९ टक्के शेअर्स म्हणजेच ४५०० कोटी डॉलर दान केले. आजमितीला मार्क झुकरबर्ग हा जगातला सर्वात कमी वयाचा अब्जाधीश आहे. मार्क झुकरबर्गची संपत्ती ४१.२ अब्ज डॉलर आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
अहिल्याताई व रांगणेकर नोव्हेंबर १९६२ ते २९ एप्रिल १९६६ पर्यंत ‘भारत संरक्षण कायद्या’खाली अटकेत होते. या काळात कैदी स्त्रियांचे प्रश्न सोडविण्यासाठी अहिल्याताईंनी २१ दिवसांचा उपवास करून त्यांना सवलती मिळवून दिला. एकदा अमेरिकन वकिलातीसमोर निदर्शने करत असता तिथली पाटी त्यांच्या डोळ्यांना लागली. या घटनेमुळे त्यांचे डोळे कायमचे अधू झाले. तशाही स्थितीत पुढे सुमारे २०-२५ वर्षे त्या कुणाचीही सोबत अथवा हातात काठी न घेता मुंबईत फिरत असत. यानंतर अहिल्याताई व मृणाल गोरे या जोडगोळीने महागाई प्रतिकारसमितीची स्थापना करण्यात पुढाकार घेतला. महिलांच्या कर्तबगारीचा एक नवा इतिहास घडवला.
सिडने शेल्डन हा अनेक यशस्वी नाटक, चित्रपट, लिहणारा सुप्रसिद्ध एक लेखक, निर्माता, दिग्दर्शक होता. त्याने आपल्या ओघवत्या शैलीने अनेक कादंबर्याथ लिहुन अक्षरशः जगाला वेड लावले,
(१८९२-१९७३)
ठाणे जिल्हातील निसर्गरम्य आदिवासी परिसरात ग्रामिण बालशिक्षणाचे यशस्वी प्रयोग करणार्या शिक्षणसंशोधक. राज्य विधानसभेच्या सदस्य. त्यांचे कार्य असंख्य कार्यकर्त्यांना व सेवाभावी संस्थाना प्रेरणादायी ठरले. अनेक बालपुस्तकांचे, नियतकालिकांचे लेखन व संपादन त्यांनी केले. बालशिक्षिकांचे प्रबोधन. शिक्षिकांचे प्रशिक्षण, संशोधन हे त्यांच्या कामाचे इतर पैलू होते. अंगणवाडी, कुरणशाळा, विकारवाडी अशा नवनवीन कल्पना त्यांनी रूजवल्या.
प्रसिद्ध बासरीवादक, संगीतज्ञ, संहितालेखक, जाहिरातलेखक आणि इंग्रजी भाषेचे प्राध्यापक अजित सोमण यांचा जन्म ६ ऑगस्ट १९४७ रोजी झाला.
अजित सोमण यांचे मराठी, हिंदी, इंग्रजी व संस्कृत या भाषांवर प्रभुत्व होते. तळेगाव येथील इंद्रायणी महाविद्यालय, तसेच स.प. महाविद्यालय, गरवारे महाविद्यालय, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ येथे इंग्रजी तसेच रानडे इन्स्टिट्यूट येथे पत्रकारिता, तर सिम्बायोसिस येथे अजित सोमण यांनी Creative writing and Mass communication अशा विषयांचे अध्यापन केले.
पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्रात त्यांनी १५ वर्षांहून अधिक काळ अप्लाईड म्युझिक, म्युझिक ॲप्रीसिएशन हे विषय शिकवले. या अभ्यासक्रमासाठी पाठ्यपुस्तक म्हणून वापरल्या जाणाऱ्या 'संगीत' या पुस्तकाचे ते सहलेखक होते. सोमण यांनी लिहिलेल्या अनेक जिंगल्स व जाहिराती प्रसिद्ध झाल्या. "ऊंचे लोग ऊंची पसंद", "चवीनं खाणार त्याला केप्र देणार", " या वर्षी पु.लंची दिवाळी तुमच्या घरी ", "सकाळ घरात आला की, आजोबांपासून नातवापर्यंत सासूपासून सुनेपर्यंत सगळ्यांचा स्वार्थ एकदम जागा होतो", " प्रत्येक कुटुंबासाठी-कुटुंबातील प्रत्येकासाठी सकाळ" या काही त्यांच्या गाजलेल्या जाहिराती आहेत.
बासरी वादक म्हणून अजित सोमण यांनी अनेक मोठ्या कलाकारांबरोबर काम केले. सुधीर फडके, यशवंत देव, पं.हृदयनाथ मंगेशकर, श्रीधर फडके, आनंद मोडक, सुधीर मोघे, पं. बिरजू महाराज, पं. कालीचरण महोपात्र, पंडिता रोहिणी भाटे, प्रभा मराठे, डॉ.सुचेता चापेकर, मनीषा साठे, पार्वती दत्ता, रोशन दात्ये यांच्याबरोबर विविध कार्यक्रमांमध्ये त्यांनी बासरीची साथ केली. 'सखी मंद झाल्या तारका', 'ही वाट दूर जाते ' यांसारख्या अनेक प्रसिद्ध गाण्यांमध्ये किंवा इंडो जॅझ ग्रुपच्या अँटीग्रॅव्हिटी, बुगी फॉर हनुमान या मध्ये अजित सोमण यांनी बासरी वाजवली आहे. अजित सोमण यांनी अनेक लघुपटांसाठी पार्श्वसंगीत दिले आहे.
युजीसीच्या अंतर्गत तयार केलेल्या "राग रंजन" या मालिकेच्या आखणीपासून ते संहितालेखनापर्यंत सर्व काम अजित सोमण यांनी केले होते. या मालिकेला राष्ट्रीय पारितोषिक मिळाले. सोमणांच्या चाहत्यांत बिरजू महाराज, प्रभा मराठे, रोहिणी भाटे पार्वती दत्ता तसेच संगीत क्षेत्रातील अनेक नामवंतांचा समावेश होता. स्वरानंद, सुगम, आशा पब्लिसिटी अशा संस्थांचे अजित सोमण यांनी विश्वस्त अध्यक्ष म्हणून काम पाहिले. दिग्दर्शक अजित सातभाई यांनी अजित सोमण यांच्यावर एक लघुपट केला आहे. अनेक औद्योगिक, शैक्षणिक, वैद्यकीय, राजकीय, सांगीतिक लघुपटांसाठी तसेच अनेक दृकश्राव्य कार्यक्रमांसाठी सोमण यांनी संहिता लिहिल्या आहेत.
त्यांनी 'राऊ' सारख्या मालिकेसाठी आणि 'देवी अहिल्याबाई' या चित्रपटासाठी गीतलेखन केले. 'एक होता विदूषक' चित्रपटातील तराणा अजित सोमण यांनी लिहिला होता.
'टोकन नंबर', 'या आमुच्या हसऱ्या घरात' सारख्या मालिकांचे शीर्षकगीत व NDA चे स्फूर्तिगीत सोमण यांनी लिहिले होते. 'लाखाची गोष्ट', 'गुळाचा गणपती', 'गाभारा' या गाजलेल्या चित्रपटांची इंग्रजी उपशीर्षके सोमण यांची होती. अजित सोमण यांनी कथक नृत्यासाठी अनेक बॅले, ठुमऱ्या लिहिल्या आहेत. संगीत, जाहिरात, शिक्षण, साहित्य अशा क्षेत्रांत लक्षणीय कामगिरी करून ठसा उमटविणारे बासरीवादक अजित सोमण यांच्या स्मृत्यर्थ विविध क्षेत्रातील प्रतिभावंतांचा सोमण परिवारातर्फे दरवर्षी स्वरशब्दप्रभू पुरस्काराने सन्मान करण्यात येत असतो. तसेच उदयोन्मुख कलाकाराला त्यांच्या नावाची शिष्यवृत्तीही देण्यात येते.
आजवर हा पुरस्कार सुधीर गाडगीळ, अरुण काकतकर, मनीषा साठे, रमाकांत परांजपे, सुधीर मोघे, श्रीधर फडके यांना मिळाला आहे. तसेच अजित सोमण यांच्या स्मृत्यर्थ ललित कला केंद्रातील सर्वोत्तम विद्यार्थी किंवा विद्यार्थीनीचा सोमण परिवारातर्फे दरवर्षी 'स्वरशब्दप्रभू’ शिष्यवृत्ती देऊन सन्मान करण्यात येतो. अजित सोमण यांचे २ फेब्रुवारी २००९ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
आपल्या अभिनयाने आणि प्रभावी दिग्दर्शनाने मराठी सिनेनाट्य सृष्टीत आगळी छाप पाडणारे ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक विनय आपटे यांचा जन्म १७ जून १९५१ रोजी झाला.
अभिनय, दिग्दर्शन आणि नेपथ्य यांची चांगली जाणकारी असलेले रंगकर्मी म्हणून प्रसिद्ध असलेले विनय आपटे गेली चाळीस वर्ष मराठी रंगभूमीवर कार्यरत होते. विद्यार्थीदशेत विद्यार्थी संघटनांसाठी काम करता करता ते रंगभूमीवर आले. विजय बोंद्रे यांनी त्यांना रंगभूमीवर आणले. राज्य नाट्य स्पर्धेत त्यांनी ‘मेन विदाऊट शॉडो’ हे नाटक केले. या नाटकासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनयाचे पारितोषिक मिळाले. त्यानंतर त्यांनी लागोपाठ तीन वर्षे राज्य नाट्य स्पर्धेत दिग्दर्शनाचे पारितोषिक मिळवून हॅटट्रिक केली. ‘थिएटर ऑफ अॅीव्हेलिबिलटी’ आणि नंतर ‘बहिष्कृत’ या एकांकिकामध्ये समुहाचा नेपथ्य म्हणून वापर करून त्यांनी आगळा प्रयोग केला.
नाट्यदिग्दर्शक आणि निर्माता म्हणूनदेखील प्रसिद्ध होते. मा.विनय आपटे यांची कारकीर्द मुंबई दूरदर्शनवर निर्माता म्हणून सुरू झाली. मुंबईत दूरदर्शनची सुरुवात झाल्यानंतर त्यांनी अनेक वर्ष नाटक विभाग सांभाळला. दूरदर्शनसाठी त्यांनी ‘गजरा’सारख्या अनेक कार्यक्रमांचीही निर्मिती केली. नाटके, युववाणी अशा अनेक दर्जेदार कार्यक्रमांची निर्मिती त्यांनी केली होती. छबिलदासच्या प्रायोगिक नाटकांतूनही सुरुवातीला त्यांनी अभिनय केला होता. भारदस्त आवाजाची देणगी लाभलेल्या आपटे यांनी विविध माहितीपट, जाहिराती यांनाही आपला आवाज दिला होता. तसेच अनेक कार्यक्रमांचे सूत्रसंचालनही त्यांनी केले होते.
महेश मांजरेकर, श्रीरंग गोडबोले, सुनील बर्वे, सचिन खेडेकर, अतुल परचुरे, सुकन्या कुलकर्णी यांना व्यावसायिक नाटकांत व दूरदर्शन मालिकांमध्ये आपटे यांनी प्रथम संधी दिली होती. ‘मी नथुराम बोलतोय’ या बहुचर्चित आणि गाजलेल्या नाटकाचे दिग्दर्शन त्यांनी केले होते. विजय तेंडुलकर यांच्या ‘मित्राची गोष्ट’ ‘अॅनन्टीगनी’ या प्रायोगिक नाटकांतूनही त्यांनी अभिनय केला होता. त्यांच्या ‘एका लग्नाची गोष्ट’मधील त्यांची बाबाची भूमिका खूप लोकप्रिय झाली होती. तर ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘दुर्वा’ या मालिकेत ते काम केले होते. तसेच त्यांनी ‘गांधी’, ‘सत्याग्रह’, ‘चांदनी बार’, ‘धमाल’, ‘आंदोलन’ यासारख्या हिंदी चित्रपटात व काही हिंदी मालिकांमध्येही त्यांनी काम केले होते.
‘दुसरा सामना’, ‘वन रूम किचन’, ‘चंद्र जिथे उगवत नाही’, ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’, ‘रानभूल’, ‘कबड्डी कबड्डी’, ‘डॅडी आय लव्ह यू’ ही त्यांनी काम केलेली काही गाजलेली नाटके होती, तर ‘कुसुम मनोहर लेले’, ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ सारख्या नाटकांचे दिग्दर्शनही त्यांनी केले. ‘रानभूल’ या नाटकात त्यांनी फिरत्या रंगमंचाचा वापर केला होता. नाटककार प्र. ल. मयेकर यांच्याबरोबर त्यांची चांगली जोडी जमली होती. ‘गणरंग’ ही व्यावसायिक नाटकांची निर्मिती करणारी संस्थाही स्थापन केली होती. अखिल मराठी नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले होते. गंगाराम गवाणकर यांच्या ‘करायचं ते दणक्यात’ या चित्रपटाचे दिग्दर्शनही त्यांनी केले होते. मा.विनय आपटे यांचे ७ डिसेंबर रोजी २०१३ निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ.इंटरनेट
त्यांची गाजलेली नाटके
रानभूल, डॅडी आय लव्ह यू, तुमचा मुलगा करतो काय?, कबड्डी कबड्डी, शुभ बोल तो नाऱ्या, अफलातून.
गाजलेले चित्रपट
एक चालीस की लास्ट लोकल, सत्याग्रह, आरक्षण, राजनीती, जोगवा.
आज तब्बल साठहून अधिक वर्षांच्या तपश्चर्येतून संवादिनी या वाद्याला प्रतिष्ठा मिळवून देणारे आणि अनेक दिग्गज गायक-वादकांना आपल्या अलौकिक प्रतिभेने समर्थ साथ देऊन मैफली रंगविणारे ज्येष्ठ संवादिनीवादक अप्पा जळगावकर.....
श्रुतीप्रधान भारतीय संगीतात मिंडयुक्त स्वर आणि श्रुती केवळ सारंगीसारख्या तंतुवाद्यातूनच मिळू शकतात, या कल्पनेने संवादिनीला दुय्यम वागणूक देण्यात येत असताना संवादिनीमधून स्वरविकास करून या वाद्याला प्रतिष्ठा मिळवून देण्याचे मोलाचे काम जळगावकर यांनी केले आणि त्यामुळेच संगीत नाटक अकादमीचा मानाचा पुरस्कार मिळविणारे ते पहिलेच संवादिनीवादक ठरले. त्यांचा जन्म १ जानेवारी १९२२ रोजी जालना येथे झाला. अप्पा जळगावकर सुरूवातीला हे ध्रुपद गायकी करायचे. मुळात अप्पांची आवड म्हणजे धृपद गायकी. धृपद गायकीच्या मैफलीमध्ये त्यांचे मन रमायचे, पण कर्मधर्म संयोगाने अप्पा संवादिनीवादन करू लागले. त्यांनी बाळकृष्ण चिखलेकर आणि उस्ताद छब्बू खॉं यांच्याकडून संगीताचे शिक्षण घेतले, पण संवादिनी वादनाचे कोणाकडून प्रशिक्षण घेतले नाही.
एकलव्याप्रमाणे कठोर रियाज करीत संवादिनी वादनात त्यांनी प्राविण्य प्राप्त केले. अशा स्थितीतच अप्पांनी संवादिनीवादनात स्वतःचे असे अढळ स्थान प्रस्थापित केले. ५० वर्षांपूर्वी ते पुण्यात आले आणि पुणेकरच होवून गेले. पुण्यात आल्यावर त्यांची ओळख स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी यांच्याशी झाली. इथेच त्यांच्या जीवनाला नवी कलाटणी मिळाली. तो जणू काही "स्वर आणि सूरां'चा मिलाफ होता. त्यानंतर पंडितजींच्या बहुतांशी मैफलीत अप्पांनी आपल्या बहारदार हार्मोनिअम वादनाने रंग भरले. पंडित भीमसेन जोशींच्या बहुतांशी मैफलीत ते आपल्या बहारदार हार्मोनियम वादनाने सप्तरंग भरत होते.
अप्पा जळगांवकरांनी उस्ताद बडे गुलाम अली खॉं, पंडित कुमार गंधर्व, पं. वसंतराव देशपांडे, पंडित भीमसेन जोशी, जसराज, रोशनआरा बेगम, माणिक वर्मा, किशोरी आमोणकर, ओंकारनाथ ठाकूर, गंगुबाई हनगळपासून ते आताच्या पिढीतील पं. मुकुल शिवपुत्र कोमकळ्ळीमठ, राहुल देशपांडे अशा दिग्गज गायकांना अप्पांनी संवादिनीची सुरेल साथ केली होती. तसेच रोहिणी भाटे यांच्यासारख्या नृत्यांगनांनाही जळगावकर यांनी तितकीच तोलामोलाची साथ दिली. पं. कुमार गंधर्व यांचे चिरंजीव, व सुप्रसिद्ध गायक पंडित मुकुल शिवपुत्र कोमकळ्ळीमठ हे अप्पा जळगांवकरांचे जावई.
हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत क्षेत्रात केलेल्या भरीव कामगिरीबद्दल संगीत नाटक अकादमी, आय.टी.सी. संगीत रिसर्च अकादमी यांसारख्या ख्यातनाम संस्थांनी पुरस्कार देऊन अप्पा जळगांवकर यांचा यथोचित गौरव केला आहे. तसेच ‘स्वरविभूषण’ आणि ’स्वर-लय-ताल रत्न पुरस्कारा’नेही त्यांना सन्मानित करण्यात आले होते. अप्पांनी भारतात जवळ जवळ सर्व ठिकाणी आपली कला सादर केली होती, तसेच अमेरिका, युरोप, श्रीलंका, बांगला देश असे अनेक परदेश दौरेही त्यांनी केले होते. त्यांच्या हार्मोनियम वादनाच्या ध्वनिफिती, सी.डी देखील प्रकाशित झालेल्या आहेत.
अप्पा जळगावकर यांचे १६ सप्टेंबर २००९ रोजी निधन झाले.
अप्पा जळगावकर यांचे संवादिनीवादन.
https://www.youtube.com/watch?v=j0cZearkZss
https://www.youtube.com/watch?v=fXvijeN-m-w
https://www.youtube.com/watch?v=Qi26eVirOhw
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट
अरेस्टेड डेव्हलपमेंट, द ऑफिस, दिल तो बच्चा है जी, देसी बॉईज यांसारख्या अनेक लोकप्रिय चित्रपटांमध्ये ओमीने उत्कृष्ट भूमिका साकारल्या.
Copyright © 2025 | Marathisrushti