जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
श्रीकांत सिनकर हे नाव ज्यांना माहीत असेल, त्यांना ते बहुधा पोलीस चातुर्यकथा नि तश्याच पद्धतीच्या कादंबऱ्यांच्या संदर्भात माहीत असण्याची शक्यता जास्त आहे. पण सिनकर हे त्यापलीकडेही काही लिहून गेले.
स्मिता शेवाळे… विलक्षण बोलका, भावदर्शी चेहरा ही तिची ओळख…
केदार शिंदे दिग्दर्शित ‘यंदा कर्तव्य आहे’ या चित्रपटातून स्मिता शेवाळेनं मराठी इंडस्ट्रीत पदार्पण केलं आणि या इंडस्ट्रीला एक सोज्वळ, लोभस, घरंदाज चेहरा मिळाला. २००६ साली प्रदर्शित झालेल्या या सिनेमाची जादू आजही तितकीच टिकून आहे हेच या सिनेमाचं यश सांगता येईल. यंदा कर्तव्य आहे हा सिनेमा स्मितासाठी टर्निंग पॉइंट ठरला आणि यानंतर तिने मागे वळून बघितलंच नाही. अनेक मराठी सिनेमे, मालिका यातील अभिनयातून तिने रसिकमन जिंकलं…
रुपेरी पडदा आणि छोटय़ा पडद्यावर आपल्या अभिनयातून रसिकमन जिंकलेल्या स्मिताला काहीकाळ अभिनय क्षेत्रापासून दूर राहावं लागलं ते तिच्या वैयक्तिक कारणामुळे. लग्नानंतर बराच काळ तिने चित्रपटातून ब्रेक घेतला होता. आई, पत्नी, सून, मुलगी आणि एक व्यावसायिक अभिनेत्री या सगळ्या रूपांना न्याय देता देता स्मिताची दमछाक झाल्याचं ती सांगत असतानाच हा ब्रेक अवघ्या अडीज ते तीन वर्षांत संपवून तिने नव्या जोमाने आणि ताकदीने अभिनय क्षेत्रात पुनरागमन केलं. ‘कनिका’ या हॉरर चित्रपटातून तिने साकारलेल्या छोटय़ा मात्र ठळक भूमिकेमुळे तिच्या अभिनयातले वेगळे पैलू पाहायला मिळाले.
स्मिताने इंडस्ट्रीत ब्रेक घेण्यापूर्वी म्हणजेच २०१४ साली तिचे फोटोशूट करण्याची संधी मला मिळाली होती. शूट नेमकं काय असेल, त्याचा लूक कसा असेल हे स्मिताशी बोलून शूटची तारीख नक्की करण्यात आली. स्मिताचा सोज्वळ, लोभस, घरंदाज चेहरा लक्षात घेऊन तिच्यासाठी वेशभूषा, त्यातील रंगसंगती, दागिने, मेकअप, हेअर हे सारं काही ठरवण्यात आलं होतं. स्मिताशी माझ्या स्टायलिस्ट आणि कॉस्च्युम डिझायनरने त्यासंबंधित संपर्क करून नेमका तिला कशा पद्धतीने प्रेझेंट केलं जाईल याचा अंदाज दिला होता. शूटच्या दिवशी आम्ही ठरल्याप्रमाणे भेटलो आणि शूटला सुरुवात केली. पारंपरिक वेशभूषा, कलाकुसरीने सजलेले दागिने, त्यावरचा मराठमोळा साज आणि नयनरम्य शृंगार यातून स्मिताचा मोहक चेहरा अधिकच उठून दिसत होता. स्मिताच हे लोभस रुपडं मी कॅमेराबद्ध करण्याचा प्रयत्न मी करत होतो. हे शूट चांगलं तीन-साडे तीन तास चाललं.
वृत्तपत्रासाठी हवे असलेल्या फोटोंचा साचा ठरलेला होता त्यानुसार सुरुवातीला वृत्तपत्राची गरज असलेले फोटो मी आधी टिपले. नंतर त्याच मराठमोळ्या पेहरावात फुल लेन्थ, मिड लेन्थ, हेडशॉटस असे काही फोटो घेतले. फ्लॅट लायटिंग करून फोटो टिपल्यानंतर स्मिताच्या चेहऱयाचे वेगळ्या लायटिंगमध्ये काही फोटो मला टिपता आले. यावेळी ब्लॅक ऍण्ड व्हाईट फोटो टिपण्याचा मोह मला आवारात आला नाही. या ब्लॅक ऍण्ड व्हाईट पोट्रेट्समध्ये स्मिता अधिक खुललेली दिसली. शूट सुरू होऊन साधारणपणे तीन तास झाले असावेत. स्मिताचे पारंपरिक वेषभूषेतले फोटो टिपल्यानंतर तिचे मॉडर्न लूकमधले फोटो टिपण्यासंबंधित तिच्याशी मी बोललो. स्मिताला संकल्पना आवडली आणि आम्ही लगेच छोटा ब्रेक घेऊन पुढच्या शूटच्या तयारीला लागलो.
माझ्या स्टायलिस्ट आणि कॉस्च्युम डिझायनरशी बोलून आम्ही लगेचच तिच्यासाठीचा नवा मॉडर्न लूक ठरवला. लाल रंगावर काळ्या रंगाची डिझाईन असलेला वनपीस स्मितासाठी यावेळी आम्ही निवडला. आधीच्या पारंपरिक वेशभूषेला संपूर्णपणे तडा देणारा हा तिचा लूक होता. यासाठी तिला मेकओव्हर करावा लागणार होता. मेकअप, हेअर हे सारं काही नव्याने करायला साधारणपणे दीड तास गेला. स्मिता या मॉर्डन लूकमध्येही अतिशय सुंदर दिसत होती. तिच्या बोलक्या चेहऱयाने हा लूकदेखील तितकाच खुलवून आणला होता.
स्मिता शूटच्यावेळी मदतशीर होती. तिला सांगितलेले पोजेस ती देत होतीच शिवाय त्यात वेगळेपणा कसा आणता येईल यासाठीही तिची धडपड सुरू होती. सुरुवातीला तिचे काही रंगीत फोटो टिपल्यानंतर लायटिंग बदलून ड्रमॅटिक म्हणजे प्रकाश आणि सावलीचा खेळ करून केलेल्या लायटिंगमध्ये तिचे काही ब्लॅक ऍण्ड व्हाईट फोटो मी टिपले. यापूर्वीच्या शूटच्यावेळी स्मिताच्या पेहरावाला अनुसरून तिचा शृंगार केला होता. कपाळावर अर्ध चंद्रकोर टिकली, गळ्यात भव्य हार, दागिने, नाकात नथ असा सारा शृंगार असलेल्या स्मिताचा चेहरा मी आधी टिपला होता. यानंतरच्या मॉर्डन लूकमध्ये मात्र तिने काहीच शृंगार केला नव्हता. तरीहीदेखील तिचा हा चेहरा आधीच्या चेहऱयाएवढा किंबहुना त्याहून अधिक खुललेला दिसत होता, हे विशेष. तिच्या ही चेहऱयाची जादू यावेळी मला अनुभवता आली.
स्मिताचं शूट सुरू करण्यापूर्वी मेकअपच्यावेळी स्मिताशी मनमुराद गप्पा झाल्या. केदार शिंदेचा ‘यंदा कर्तव्य आहे’ हा सिनेमा म्हणजे तिच्यासाठी अभिनयाची कार्यशाळाच ठरल्याचं ती सांगते. मोजके सिनेमे ठरवून करणाऱया कलाकारांपैकी एक अशी स्मिताची ओळख करून देता येईल. कोणताही सिनेमा निवडण्यापूर्वी त्या सिनेमाचा अभ्यास, त्यातील बारकावे लक्षात घेऊन मगच ती सिनेमे निवडते आणि एकदा का सिनेमा निवडला की मेहनत घ्यायची तिची तयारी असते हे तिच्या बोलण्यातून वेळोवेळी जाणवत होते.
धनेश पाटील
dhanuimages@gmail.com
शब्दांचे जादूगार, अंधारावर ममत्वाचा अधिकार गाजवणारे आणि कवितेला "सखी' म्हणून आपल्या अस्तित्वातच सामावून घेणारे कवी म्हणजे सुधीर मोघे. त्यांचा जन्म ८ फेब्रुवारी १९३९ रोजी सांगली जिल्ह्यातील किर्लोस्करवाडी येथे झाला.खरे म्हणजे ते एक कवीच पण आपल्या कवितेची अभिव्यक्ती इतर माध्यमातून करायला देखील मागे राहिले नाहीत आणि म्हणूनच त्यांनी गीतकार, संगीतकार, लेखक, चित्रकार, लघुपट निर्माते, दिग्दर्शक अशा अनेक भूमिकातून आपले कवित्व मांडले. सुधीर मोघे यांचे महाविद्यालयीन शिक्षण पुणे येथे. पदवीचे शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी कविता लेखनास सुरुवात केली. १९७२ मध्ये ते पुण्यात कायमच्या वास्तव्यास आले. तेव्हा त्यांनी ‘स्वरानंद प्रतिष्ठान’च्या ‘आपली ओळख’ या कार्यक्रमातून निवेदनास सुरुवात केली. स्वरानंद प्रतिष्ठानच्या माध्यमातून भावगीतांचा कोश तयार करण्याचे काम मोघे यांनी हाती घेतले होते. कोश जवळपास पूर्ण होण्याच्या मार्गवर होता. आपल्या निवेदन शैलीतून त्यांनी निवेदनाचा मापदंड उभा केला. दरम्यान, त्यांचे ‘नक्षत्रांचे देणे’ व ‘स्मरणयात्रा’ हे दोन कार्यक्रम प्रचंड लोकप्रिय झाले. प्रत्येक वर्षी किमान एक चित्रपट करावा अशी त्यांची अपेक्षा होती.
चित्रपट गीतलेखन, संगीत दिग्दर्शन, ललित लेखन, पटकथा व संवाद लेखन, रंगमंचीय आविष्कार अशा अनेक प्रांतांत आपला ठसा उमटवला. सहजसुंदर शब्दरचना करणारे कवी-गीतकार म्हणून त्यांची ओळख होती. त्यांचे ‘आत्मरंग’, ‘गाण्याची वही’, ‘पक्ष्यांचे ठसे’, ‘लय’, ‘शब्द धून’, ‘स्वतंत्रते भगवती’ असे कवितासंग्रह प्रकाशित झाले आहेत. त्यांनी पन्नासहून अधिक चित्रपटांसाठी गीतलेखन केले. तसेच त्यांनी अनेक गाण्यांना संगीतही दिले. दूरदर्शन व आकाशवाणीसाठी त्यांनी अनेक कार्यक्रम केले. फिटे अंधाराचे जाळे, सांज ये गोकुळी, एकाच या जन्मी जणू, रंगुनी रंगात सा-या, गोमू संगतीनं, आला आला वारा अशी एकापेक्षा एक सरस गीते त्यांनी लिहिली.
साहित्य व संगीत क्षेत्रातील अतुलनीय योगदानासाठी त्यांना अनेक मानसन्मान मिळाले. महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्कृष्ट गीतकाराचा पुरस्कार त्यांनी तब्बल चार वेळा पटकावला होता. नाट्यअभिनेते मा.श्रीकांत मोघे हे सुधीर मोघे यांचे थोरले बंधू.
सुधीर मोघे यांचे निधन १५ मार्च २०१४ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
सुधीर मोघे यांच्या कविता संग्रह: ‘आत्मरंग’, ‘गाण्याची वही’, ‘पक्ष्यांचे ठसे’ - ३ हून अधिक आवृत्त्या, ‘लय’ - एकाहून अधिक आवृत्त्या, ‘शब्द धून’, ‘स्वतंत्रते भगवती.’ गद्य : ‘अनुबंध’, ‘गाणारी वाट’, ‘निरांकुशाची रोजनिशी.’ सुधीर मोघे यांचे चित्रपट गीते
‘आत्मविश्वास’, ‘एक डाव भुताचा’, ‘कळत-नकळत’,‘चौकट राजा’, ‘जानकी’, ‘पुढचं पाऊल’, ‘राजू’, ‘लपंडाव’, ‘शापित’, ‘सूर्योदय’,‘हा खेळ सावल्यांचा.’ संगीत दिलेली गीते : ‘अज्ञात तीर्थयात्रा’, ‘भन्नाट रानवारा मस्तीत शीळ’, ‘भेटशील केव्हा माझिया जीवलगा’, ‘माझे मन तुझे झाले’,‘रंगुनी रंगात सार्या.
सुधीर मोघे यांचे संगीत दिग्दर्शन ‘कशासाठी प्रेमासाठी’ (मराठी चित्रपट), ‘सूत्रधार’ (हिंदी चित्रपट), ‘स्वामी’, ‘अधांतरी’, ‘नाजुका’ (मराठी मालिका), ‘हसरतें’, ‘डॉलर बहू’, ‘शरारते’ (हिंदी मालिका).
दियाने कॉलेज शिक्षण चालू असतानाच मॉडेलिंगला सुरूवात केली. २००० सालच्या फेमिना मिस इंडिया सौंदर्यस्पर्धेत दियाने तिसरे स्थान मिळवले. भारतातर्फे २००० मिस आशिया पॅसिफिक स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या दियाने ही स्पर्धा जिंकली. तिचा जन्म ९ डिसेंबर १९८१ रोजी हैदराबाद येथे झाला.
याच कार्यक्रमात दियाला मिस ब्युटिफूल स्माइल, द सोनी च्वॉइस अवॉर्डनेही सन्मानित करण्यात आले. त्यानंतर दियाने बॉलिवूडकडे येण्यास सुरुवात केली. दियाने ‘रहना है तेरे दिल में’ या चित्रपटातून तिच्या करिअरला सुरुवात केली. या चित्रपटात तिच्या अपोझिट आर. माधवन बघावयास मिळाला. वास्तविक या चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर फारशी कमाल दाखविली नाही, परंतु चित्रपटाच्या संगीताने आजही प्रेक्षकांवर मोहिनी घातलेली आहे. त्यानंतर दियाने ‘दिवानापन’ आणि सलमान खानसोबत ‘तुमको न भूल पाएंगे’ या चित्रपटांमध्ये काम केले.
सलमानने अनेक अभिनेता, अभिनेत्री आणि कम्पोजरला इंडस्ट्रीमध्ये संधी दिली आहे. त्यापैकीच एक नाव अभिनेत्री दिया मिर्झाचे आहे. दिया मिर्झाला इंडस्ट्रीत सलमानेच आणले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरेनट
१० एप्रिल २०१७ रोजी जाधव यांना पाकिस्तानमधील फील्ड जनरल कोर्ट मार्शलने फाशीची शिक्षा सुनावली. १८ मे २०१७ रोजी आंतरराष्ट्रीय न्यायालयाने या खटल्यावरील अंतिम निर्णयासाठी अगोदर दिलेल्या फाशीला स्थगिती दिली. १७ जुलै २०१९ रोजी आंतरराष्ट्रीय न्यायालयाने जाधव यांच्या सुटकेसाठीचे भारताचे अपील फेटाळून लावले आणि पाकिस्तानला फाशी स्थगित करण्याचे आदेश दिले.
डॉ. राजन रेळेकर यांनी १९९२ साली ठाण्यात स्वत:चा स्वतंत्र वैद्यकीय व्यवसाय सुरु केला. १९९७ साली डॉ. राजन यांनी “समर्थ नर्सिंग होम” हे स्वत:चे रुग्णालय सुरु केले. १९९२ पासून डॉ. राजन हे कळव्याच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात सेवा देत आहेत.
ग्लॅमर आणि फॅशनची उत्तम समज फार थोडय़ा कलाकारांना असते. नेहा पेंडसेचे नाव यामध्ये सर्वात वर घ्यावे लागेल.
मराठी इंडस्ट्रीत ग्लॅमर कॅरी करता येईल अशा मोजक्या अभिनेत्री आहेत. कॉस्च्यूमचा योग्य सेन्स असणं आणि ते तितक्याच सहजपणे कॅरी करणं हे इंडस्ट्रीतल्या फार मोजक्या कलाकारांना जमलं आहे. या कलाकारांच्या यादीतलं नेहा पेंडसे हे वरच्या यादीतलं नाव. ग्लॅमरस नेहा पेंडसेचं नाव मराठीसोबतच हिंदी, तामीळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड अशा विभिन्न भाषांतून दमदार अभिनय सादर करणारी खमकी अभिनेत्री म्हणून घेतलं जातं. अभिनय क्षेत्रात यशाचा आलेख कायम चढता ठेवलेल्या नेहाने सिनेमा निर्मितीतही पदार्पण करत इंडस्ट्रीला दर्जेदार कलाकृती दिली आहे.
‘मुंबई फॅशन शो’ या व्यावसायिक इव्हेंटसाठी मला काही मॉडेल्सचे फोटोशूट करायचे होते. याच वेळी नेहाचं फोटोशूट करायची संधी मला चालून आली. व्यावसायिक आणि एडिटोरियल अशी दोन्ही कामे एकाच दिवशी करायची असल्याने स्टुडिओमध्ये साधारणपणे 18 ते 20 जणांची टीम माझ्यासोबत होती. सकाळी लवकर नेहाचं शूट तिच्याशी बोलून आम्ही प्लॅन केलं तर त्यानंतर व्यावसायिक शूट. नेहाशी फोटोशूटसंबंधित बोलणं झाल्यावर तिने सगळ्यात आधी विचारलेला प्रश्न म्हणजे ‘‘थीम काय असेल?’’ या प्रश्नातच नेहाची अभ्यासू वृत्ती दिसून आली.
यात ती कामाच्या बाबतीत किती पर्टिक्युलर आहे हे समजतं. 99 टक्के कलाकार एडिटोरियल फोटोशूटची थीम काय असेल वा त्यांना नेमकं काय करायचं आहे हे विचारत नाहीत. अनेकदा शूट हे ते सध्या करत असलेल्या शूटच्या लोकेशनवर अन्यथा त्यांच्या घरी करण्याचा आग्रह धरतात. त्यामुळे फोटोग्राफरला हवी असलेली थीम वा मेकओव्हर करता येतोच असं नाही. त्यातही अनेकदा शूटिंगच्या कपडय़ात आणि तिथल्याच लोकेशनला शूट केल्याने फोटोशूट हे फार कृत्रिम वा कोरडे होतात. त्यात फोटोग्राफरला हवा असलेला जीव त्याला टाकता येत नाही. त्यात अनेकदा शूटसाठी म्हणजेच व्हिडीओसाठी केलेला मेकअप हा त्रासाचा ठरतो आणि मग फोटो मिळूनही त्यातला गोडवा निघून जातो. नेहाच्या बाबतीत हे सारं काही घडणार नाही हे तिच्याशी बोलताना अगदी पहिल्याच वाक्याला मला समजल्याने मी थोडा आनंदात होतो. नेहाला थीम सांगितली. नेहाचं कॉस्च्यूम काय असेल, त्यासंबंधित मेकअप काय असेल आणि हेअरस्टाईल कशी असेल या सगळ्याची माहिती माझ्या टीमने दिली होती. नेहाला कॉस्च्यूम आणि इतर माहिती दिली होती. मात्र त्यातही तिने तपशीलवार ती समजून घेऊन त्यातले बारकावे जाणून घेतले होते.
‘हॉट ऍण्ड ग्लॅमरस’ या शब्दांना साजेसं ठरेल असं नेहाचं फोटोशूट करायचं ठरलं. हे शूट प्रत्यक्षात आणण्यासाठी माझी टीम अहोरात्र झटत होती. त्यानुसार कॉस्च्यूम डिझायनर, स्टायलिस्ट, मेकअप आणि हेअर डिझायनर आणि असिस्टंट अशी तगडी ब्रिगेडच या शूटच्या कामास लागली होती. पांढऱया रंगाचा शर्ट आणि एक हॉट पॅण्ट यात तिचे एक्स्प्रेशन टिपणारं एक फोटोशूट आम्ही आधी केलं. हाय की (प्रखर प्रकाशातली) या प्रकारातलं हे शूट होत. यात नेहाचा पूर्ण फोटो (फुल फिगर फ्रेम) मला कॅमेराबद्ध करायचा होता, तर त्यानंतर लगेच लाईटिंगमध्ये बदल करत लो की (मंद प्रकाशातली) फोटोग्राफी करण्याचं ठरलं. याच कॉस्च्यूमला थोडं आणखी ग्लॅमर लूक देत तिचं बॅकलेस फोटोशूट आम्ही केलं. अर्थातच या सगळ्यात नेहाची कम्फर्ट लेव्हल लक्षात घेऊन हे शूट प्रत्यक्षात आणण्यात मला आणि माझ्या टीमला यश मिळालं.
शूट करताना आमच्यात – नेहा, मी, माझी स्टायलिस्ट दिव्या तांदळे – सतत संवाद होत होते. प्रत्येक लाईटिंगला, तिच्या बदललेल्या पोजेसला, प्रोफाईलला आणि या सगळ्याच गणित मांडत मी टिपलेल्या फोटोवर आमच्यातले संवाद व्हायचे. शूट सुरू केल्यानंतर मध्ये फार कमी वेळ आम्ही ब्रेक घेतला होता. प्रचंड इच्छाशक्ती आणि ऊर्जा असलेल्या मॉडेलसोबत काम करताना नेहमीच फोटोग्राफरला एक वेगळा आनंद होत असतो. त्यात सगळ्यात जास्त आनंद असतो तो मिळालेल्या वेळेचा अधिकाधिक उपयोग करत जास्तीत जास्त व्हेरिएशन्सवर काम करता आलं याचा.
नेहानं अभिनयाच्या क्षेत्रात आपलं पहिलं पाऊल टाकलं ते बालवयातच. ठाण्याच्या रामनाथ थळवळ यांच्या उन्हाळी शिबिरात वयाच्या सातव्या वर्षी पिटुकली नेहा दाखल झाली आणि इथेच तिच्यावर अभिनयाचे संस्कार झाले. गुरू रामनाथ यांच्याकडे शिकत असतानाच एकता कपूरच्या बालाजी प्रॉडक्शनसाठी नेहा बालकलाकार म्हणून निवडण्यात आली आणि तिचा अभिनय क्षेत्रात श्रीगणेशा झाला. बालाजी प्रॉडक्शनच्या ‘कॅप्टन हाऊस’ या मालिकेतून नेहा छोटय़ा पडद्यावरून झळकली आणि त्यानंतर तिने मागे वळून बघितलेच नाही. अनेक मालिकांतून बालकलाकाराची भूमिका साकारत असलेल्या नेहाला शिक्षण आणि अभिनय या दोन्हीपैकी नेमकं एक काय निवडायचं याचा निर्णय तिने वयाच्या तेराव्या वर्षीच घ्यावा लागला आणि अभिनय क्षेत्रातच पूर्णवेळ राहण्याचा निर्णय तिने घेतला. अर्थातच हा धाडसी निर्णय घेण्यामागे तिच्या कुटुंबीयांचा वाटा अधिक होता हे ती नमूद करते.
अनेक हिंदी मालिकांतून काम करत असलेल्या नेहाला ‘हसरते’ या मालिकेने चेहरा दिला आणि तिचं एक वेगळं अस्तित्व या क्षेत्रात निर्माण झालं. गुरू रामनाथ थळवळ यांच्यामुळेच नेहाने मराठी इंडस्ट्रीत पाऊल टाकल्याचं ती आदराने सांगते. अभिनयाचा प्रवास एका वेगळ्याच वेगाने करणाऱया नेहाचं सिनेमा निर्मितीचं स्वप्न पूर्ण झालं ते बायोस्कोप या मराठी सिनेमामुळे. या सिनेमासोबतच तिचे आणखी काही नवे प्रोजेक्टस् या वर्षी लवकरच प्रदर्शित होणार असल्याचं ती आनंदाने सांगते.
धनेश पाटील
dhanauimages@gmail.com
रमाकांत देसाई हलकाच रनअप घेऊन क्रीझपाशी आल्यावर आपली करामत दाखवत असत. हनीफ मोहम्मद यांच्यासारख्या नावाजलेल्या फलंदाजाला एकाच मालिकेत देसाईंनी चार वेळा तंबूत धाडले होते. १९६०-६१च्या त्या मालिकेत पाकिस्तानच्या गोटात देसाईंनी खळबळ उडविली होती. एवढेच नव्हे तर हनीफ यांना ‘देसाईंचा बकरा’ म्हणून हिणवले जाऊ लागले.
संजीवनी मराठे कवयित्री तर होत्याच, शिवाय कविसंमेलनात स्वत:च्या कविता सुरेल आवाजात त्या गातही असत. शाळकरी वयातच त्या कविता लिहू लागल्या. तरुण वयात घरचा विरोध असताना त्यांनी रामभाऊ मराठे यांच्याशी विवाह केला होता. १९३२ साली कोल्हापूरला भरलेल्या साहित्यसंमेलनात त्यांचा काव्यक्षेत्रात प्रवेश झाला. त्यांचा पहिला कवितासंग्रह ‘काव्यसंजीवनी’ त्याच वर्षी प्रकाशित झाला. पुढे ‘राका,’ ‘संसार’, ‘छाया’, ‘चित्रा’, ‘चंद्रफूल’, ‘मी दिवाणी’ ‘आत्मीय’ अशा अनेक कवितासंग्रहातून आणि ‘भावपुष्प’ व ‘परिमला’गीतसंग्रहांतून त्यांची काव्यजीवनातील वाटचाल रसिकांना अनुभवता आली. संजीवनी मराठे यांच्या कविता तरल आणि संजीवक स्वप्नांची निर्मिती करणारी आहे. संजीवनी मराठे यांच्या कविता आणि गीते यांनी मराठी मनाला एकेकाळी मोहिनी घातली होती.
संजीवनी मराठे यांच्या बालकविताही लक्षवेधी आहेत. बालमनाची संवेदनशीलता लक्षात घेऊन त्यांनी शिशुगीते, कुमारगीते लिहिली आहेत. त्यात वात्सल्यभावनेचा परिपोष आढळतो. त्याचबरोबर मुलांचे खेळकर, चंचल, निरागस भावजीवन त्यात प्रतिबिंबित झालेले दिसते. मुलांशी संवाद साधत लिहिलेल्या या गीतांमध्ये गोडवा आहे. ‘बरं का ग आई’ आणि ‘नको बाई रुसू’ हे त्यांचे बालगीत संग्रह प्रसिद्ध आहेत. त्याशिवाय त्यांच्या काही कवितासंग्रहांमध्येही बालगीतांचा समावेश आहे. त्यांची ‘या गडे हासू या, या गडे नाचू या, गाऊ या मंगलगान,’ तसेच ‘सोनियाचा पाळणा, रेशमाचा दोर ग मधोमध विसावला, माझा चित्तचोर ग’ ही गाणी आजही लोकांच्या आठवणीत राहिलेली आहेत.
संजीवनीबाईंवर भा. रा. तांबे यांच्या भावगीतांचाही प्रभाव होता. आणखीही एका कवीचा त्यांच्यावर प्रभाव होता, तो कवी म्हणजे रवींद्रनाथ टागोर. टागोरांच्या ‘गीतांजली’ आणि ‘गार्डनर’मधील निसर्गरूपात परमतत्त्व पाहण्याच्या दृष्टीचा ठसा संजीवनीबाईंच्या कवितांमध्येही जाणवतो. संजीवनीबाईंच्या कविता वाचताना काळाच्या अंतरावरून तिच्या काही मर्यादा जाणवतात आणि ते साहजिकही आहे. आज मराठीतील स्त्रीकाव्य वेगळय़ा टप्प्यावर आहे. पण म्हणून त्यांच्या कवितेच्या परंपरेतील संदर्भखुणा विसरता येणे शक्य नाही. किंबहुना संजीवनीबाई, पद्मा गोळे, सरिता पदकी आणि शांता किलरेस्कर यांनी पुण्यात ‘साहित्यप्रेमी भगिनी मंडळ’ ही संस्था स्थापन करून आपली दूरदृष्टी व्यक्त केलेली आहे. संजीवनी मराठे यांचे १ एप्रिल २००० रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ:- इंटरनेट
“स्वरगंगेच्या काठावरती वचन दिले तू मला” , “पालखीचे भोई” अशा एकाहून एक सरस तसंच दर्जेदार काव्यरचनांची निर्मिती करणारे प्रसिध्द कवि व साहित्यिक शंकर वैद्य यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील ओतूरमध्ये १५ जून १९२८ रोजी झाला.
Copyright © 2025 | Marathisrushti