(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • थोर साहित्यिक व गीतकार शांताराम आठवले

    शांताराम आठवले यांचे वडील ग्वाल्हेरच्या सरदार शितोळे यांचे पुण्यातील कारभारी होते. त्यांचा जन्म २१ जानेवारी १९१० रोजी झाला. शांताराम आठवल्यांचे शिक्षण पुण्याच्या भावेस्कूल मध्ये झाले. “बेबंदशाही,“शिवसंभव” या सारख्या नाटकात अभिनय व दिग्दर्शन करुन ती क्षेत्रेही आठवल्यांनी शाळेत असतानाच गाजवली. सुप्रसिद्ध कादंबरीकार ह.ना.आपटे यांची व आठवलेंची पत्र मैत्री होती. त्यांच्या कवितांचा पहिला संग्रह “एकले बीज” या नावाने १९३८ साली म्हणजे ते प्रभातकवी झाल्यानंतर प्रसिद्ध झाला. त्या पाठोपाठ १९४० साली “बीजांकुर” हा दुसरा प्रसिद्ध झाला. “सकाळ”, “स्वराज्य” ”अश्या वर्तमानपत्रात तर “मनोहर”, “वांग्मयशोभा” यांसारख्या मासिकांमधून व “शालापत्रक” या लहान मुलांच्या मासिकात त्यांच्या कविता नेहमी प्रसिद्ध होत असत. “ प्रभात फिल्म कंपनी आपटे यांच्या 'भाग्यश्री' या कादंबरीवर आधारित चित्रपट तयार करू इच्छित होती. भेटीत त्या योजनेवर शिक्कामोर्तब झाले. चित्रपटाचे नाव ठरले “अमृतमंथन”.

    शांताराम आठवलेंच्या साध्या सोप्या काव्यरचनेने आपटे खूपच प्रभावित झाल्यामुळे त्यांनी अमृतमंथन चित्रपटाची गीते लिहिण्यासाठी आठवले यांचे नाव सुचवले आणि सुदैव असे की ते मान्यही झाले. मा.शांताराम आठवले यांना प्रभातमध्ये गीतकार, पद्यलेखक आणि सहाय्यक दिग्दर्शक अशी जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली. 'अमृतमंथन' नंतर “संत तुकाराम”,“कुंकू”,“गोपालकृष्ण”,“माझा मुलगा”,“संत ज्ञानेश्वर”,“शेजारी”,“संत सखू”,“दहा वाजता” आणि “रामशास्त्री” या प्रभात चित्रपटांसाठी आठवले यांनी गीते लिहिली. काव्य, भाषेचा गोडवा, साधेपणा आणि सोपेपणा राखायचे अवघड काम शांताराम आठवले यांनी केल्या मुळेच त्यांचे स्थान “मराठी चित्रपटगीतांचे आद्यकवी” असे आहे. त्यांच्या अशा नाव लौकिकामुळे त्यांना, प्रभातच्या चालकांच्या परवानगीने, “भरतभेट”,“आपले घर” अशा काही प्रभात बाहेरच्या चित्रपटांसाठीही गाणी लिहावी लागली यामध्ये भाग्यरेखा”,“बेलभंडार”,“झंझावात”, “वहिनीच्या बांगडया”, “शेवग्याच्या शेंगा”,“आई मला क्षमा कर”,“पडदा”,“सुभद्राहरण”,“वावटळ” या चित्रपटांचा समावेश आहे.

    शांताराम आठवले यांनी “शांतिचिया घरा”,“बकुळफुले”,“वनातली वाट”,“कुंडलीनी जगदंबा”,“सुखाची लिपी”,“ओंकार रहस्य” आणि “प्रभातकाल” या सारखी एकापेक्षा एक सरस पुस्तके लिहिली.याशिवाय त्यांच्या भाव कविता, चारोळ्या, बालगीते यासारखे वाङ्मय देखील लोकप्रिय ठरले आहेत. मा.शांताराम आठवले २ मे १९७५ रोजी यांचे निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९३२२४०१७३३
    संदर्भ. इंटरनेट/ janasampark.com

    शांताराम आठवले यांची अधिक माहिती वेब साईट http://www.shantaramathavale.com

  • शतकातला श्रेष्ठ कलावंत, महानायक, अंग्री यंग मॅन – “अमिताभ बच्चन” !

    आज महानायक मा.अमिताभ बच्चन यांचा आज ७५वां वाढदिवस. त्यांचा जन्म. ११ ऑक्टोबर १९४२. तरूण कलाकारांना हेवा वाटेल अशी एनर्जी त्यांच्यात आजही बघायला मिळते. या वयातही ते सतत काम करतात.
    'शतकातला श्रेष्ठ कलावंत' हे वर्णन अभिमानानं मिरवण्याचा सर्वाधिकार अमिताभ बच्चन यांच्याकडे सुरक्षित आहे. १९७०च्या दशकात ते हिंदी सिनेमात आले आणि रुपेरी पडद्यानं कात टाकली. अभिनय, कथावस्तू, संगीत या सगळ्याच गोष्टी बदलल्या. बच्चन यांच्या सिनेमांनी पाच पिढ्यांवर गारुड टाकलं. इतर अनेक कलावंत आले आणि निसर्गाच्या नियमानुसार मावळलेसुद्धा. अमिताभ बच्चन मात्र आजही या देशाच्या मातीत, इथल्या लोकसंस्कृतीत पाय घट्ट रोवून उभे आहेत. अन् तेवढ्याच तडफेनं आणि ऊर्जेनं काम करत आहेत. हे पाहिलं की, विजय तेंडुलकरांच्या पुस्तकाचं शीर्षक आठवतं :'हे सर्व कोठून येतं?'
    मा.अमिताभ बच्चन यांच्या वडिलांचे मूळ आडनाव श्रीवास्तव असले तरी बच्चन या टोपणनावाने ते कविता प्रसिद्ध करीत असत. चित्रपटसृष्टीत प्रवेश करताना अमिताभ यांनी हे टोपणनाव आडनाव म्हणून वापरायला सुरुवात केली आणि पुढे संपूर्ण कुटुंबाचेच बच्चन हेच आडनाव व्यवहारात रूढ झाले.प्रसिद्ध हिंदी साहित्यिक सुमित्रानंदन पंत यांनी बच्चन कुटुंबातल्या या बाळाचं ‘अमिताभ’ या नावानं बारसं केले होते, अमिताभ बच्चन यांचे शिक्षण अलाहाबादच्या ज्ञानप्रबोधिनी आणि बॉईज हायस्कूल येथे, तर महा विद्यालयीन शिक्षण नैनितालच्या शेरवूड महाविद्यालयात झाले आणि त्यानंतर दिल्लीच्या किरोडीमल महा विद्यालयातून त्यांनी विज्ञानाची पदवी संपादन केली. त्यांनी आपल्या कारकीर्दीच्या सुरुवातीला कोलकाता येथे एका कंपनीत काम केले. नंतर चित्रपटात संधी शोधण्यासाठी ते मुंबईत दाखल झाले.
    मुंबईत त्यांना ख्वाजा अहमद अब्बास यांच्या सात हिंदुस्थानी या चित्रपटात सर्वप्रथम भूमिका मिळाली. त्यानंतर हृषीकेश मुखर्जी दिग्दर्शित आनंद या चित्रपटात त्यावेळचे लोकप्रिय सुपरस्टार राजेश खन्ना यांच्या समवेत काम करण्याची त्यांना संधी मिळाली. त्यांनी आनंदमधील भूमिकेचे सोने केले. त्यावर्षीचा सर्वोष्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कारही त्यांना मिळाला. नमक हराम या चित्रपटातील त्यांची भूमिकाही लक्षवेधी ठरली. त्या पाठोपाठ आलेला जंजीर चित्रपटातील पोलीस इन्स्पेक्टरची त्यांची भूमिका विशेष गाजली आणि येथूनच त्यांची "अंग्री यंग मॅन" ची प्रतिमा जनमानसात प्रस्थापित झाली. प्रचलित समाजव्यवस्थेच्याविरोधात बंडखोरी व क्रोध व्यक्त करणाऱ्या संतप्त युवकाचे प्रतिनिधित्व त्यांनी पडद्यावर आपल्या भूमिकांद्वारे केले. त्यामुळे त्यांच्या भूमिका रसिकांना आपल्याशा वाटल्या. उंच शरीरयष्टी, भेदक डोळे, भारदस्त घनगंभीर आवाज आणि गहिरी भावगर्भ अभिनयशैली यांमुळे बच्चन यांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. ते लवकरच 'सुपरस्टार' पदावर पोचले व रूपेरी पडद्यावर जणू अमिताभ युग सुरू झाले.
    आजतागायत त्यांच्याइतकी लोकप्रियता अन्य कोणत्याही अभिनेत्याला लाभलेली नाही. बच्चन हे त्यांच्या काळात भारतातील सर्वाधिक मानधन घेणारे अभिनेते होते. अमिताभ बच्चन चित्रपटात असले म्हणजे चित्रपट आर्थिक दृष्ट्याही फायदेशीर ठरणार, असा चित्रपट उद्योगाचा वर्षानुवर्षांचा अनुभव होता. आतापर्यंत त्यांनी सुमारे १६८ चित्रपटांतून भूमिका केल्या असून त्यांचे मनमोहन देसाई, प्रकाश मेहरा, यश चोप्रा यांसारख्या दिग्दर्शकांबरोबर केलेले चित्रपट विशेष गाजले. त्यांच्या यशस्वी, लोकप्रिय चित्रपटाच्या यादीत अभिमान, दीवार, शोले, कभी कभी, अमर अकबर अँथनी, मुकद्दर का सिकंदर, त्रिशूल, डॉन, काला पत्थर, नसीब, लावारीस, सिलसिला, नमकहलाल, कुली, शराबी, अग्निपथ यांसारख्या अनेक चित्रपटांचा उल्लेख करता येईल.
    मा. अमिताभ बच्चन यांनी १९ चित्रपटांसाठी पार्श्वगायनही केले आहे. मि. नटवरलाल या चित्रपटातील पार्श्वगायनासाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला आहे. धीरगंभीर, भारदस्त आवाज हे बच्चन यांचे आणखी एक वैशिष्ट्य. आपल्या भारदस्त आवाजाचा वापर त्यांनी भूमिका साकारताना तर केलाच, शिवाय काही चित्रपटांना त्यांनी आपल्या भारदस्त आवाजात पार्श्व-निवेदनही दिले आहे. त्यांत भुवनशोम, शतरंज के खिलाडी, लगान आदी चित्रपटांचा उल्लेख करता येईल. ज्येष्ठ अभिनेत्री जया भादुरी याच्याशी १९७३ मध्ये त्यांचा विवाह झाला.
    १९८४ मध्ये ते अलाहाबाद लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले. त्यांचे मताधिक्यही विक्रमी ठरले. राजकारणातली त्यांची कारकीर्द मात्र त्यांना मानवली नाही. १९८२ साली कुली या चित्रपटाच्या चित्रीकरणाप्रसंगी त्यांना अपघात झाल्याने त्यांची प्रकृती गंभीर झाली; त्यावेळी त्यांच्यासाठी त्यांच्या चाहत्यांनी देशभर प्रार्थना, नवस केले व शुभेच्छा दिल्या. आतापर्यंत त्यांना १४ वेळा फिल्मफेअर पुरस्कार, तर दोन वेळा उत्कृष्ट अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाले असून, १९८४ मध्ये पद्मश्री, २००१ मध्ये पद्मभूषण आणि २०१५ साली पद्मविभूषण पुरस्कार प्रदान करून भारत सरकारने या महानायकाचा गौरव केला आहे. या शिवाय अनेक मानद उपाध्याही त्यांना मिळाल्या आहेत. विदेशांतही त्यांचे सन्मान झाले आहेत. त्यांनी १९९६ मध्ये अमिताभ बच्चन कॉर्पोरेशन लि. ही चित्रपटनिर्मितिसंस्था स्थापन केली होती. आर्थिक नुकसानीमुळे त्यांना ती बंद करावी लागली.
    २००० मध्ये 'कौन बनेगा करोडपती' या दूरचित्रवाणीवरील प्रश्नमंजुषा मालिकेने त्यांच्या लोकप्रियतेत अधिकच भर घातली. दूरचित्रवाणीवरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कसे करावे, याचा आदर्श वस्तुपाठच बच्चन यांनी आपल्या निवेदनानेघालून दिला. वाढत्या वयानुसार बच्चन यांनी आपल्या भूमिकांचा बाज बदलला असला, तरी त्यांचा अभिनय उत्तरोत्तर अधिकाधिक परिपक्व होत गेलेला दिसून येतो. अमिताभ बच्चन यांची कारकीर्द अद्यापही चालू असून वयाच्या पंचाहत्तरीतही ते तरुणांना लाजवेल अशा उत्साहात कार्यरत आहेत. गेली १७ वर्षे ते केबीसी साठी सूत्रसंचालन करत आहेत.
    फक्त काम करत नाही तर वेगळ्या भूमिकांच्या शोधात ते असतात. चला जाणून घेऊया बॉलिवूडमधील सर्वात ‘तरूण’ आणि लोकप्रिय अभिनेत्याच्या अभिनय प्रवासबद्दल....
    अमिताभ बच्चन यांनी ‘सात हिंदुस्थानी’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली असली तरी त्यांचा पहिला सिनेमा १९६९ साली आलेला ‘भूवा शोमे’ हा होता. या सिनेमात त्यांनी व्हॉईस ओव्हर आर्टीस्ट म्हणून काम केले होते. या सिनेमाला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. अमितजींना खरी लोकप्रिय आणि ओळख मिळाली ती १९७३ साली आलेल्या ‘जंजीर’ या सिनेमातून. या सिनेमापासून तयार झालेली त्यांची अ‍ॅंग्री यंग मॅन इमेज आजतागायत कायम आहे.
    पहिला पगार ८०० रूपये -
    करिअरच्या सुरूवातीच्या दिवसात अमिताभ बच्चन यांनी आकाशवाणीमध्ये अनाऊंसर म्हणून नोकरीसाठी अर्ज केला होता. पण त्यांना त्यांच्या आवाजामुळे नकार देण्यात आला होता. त्यानंतर त्यांनी कोलकातामध्ये एका कंपनीत सुपरवायझर म्हणून नोकरी केली. तेव्हा त्यांना महिन्याला ८०० रूपये पगार होता. त्यावेळी दिलीप कुमार आणि आशा पारेख या हे त्यांचे आवडते कलाकार होते.
    ७ फ्लॉपनंतर पहिला हिट सिनेमा -
    १९६९ ख्वाजा अहमद अब्बास यांच्या ‘सात हिंदुस्थानी’ सिनेमात त्यांना पहिली संधी मिळाली. हा सिनेमा फ्लॉप झाला. त्यानंतर त्यांनी आणखी २० सिनेमांमध्ये काम केले. पण तेही फ्लॉप झाले. पण ‘जंजीर’ सिनेमाने त्यांचं नशीब बदललं.
    पद्मश्री आणि पद्मभूषण पुरस्कार -
    १९८४ मध्ये अमिताभ बच्चन यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर २००१ मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलंय. अमिताभ बच्चन यांना एकूण ७ फिल्मफेअर पुरस्कार मिळाले आहेत.
    राजकारणात अपयश -
    अमिताभ बच्चन यांनी राजकारणातही नशीब आजमावलं. पण त्यांना तिथे यश आलं नाही. नंतर ते इलाहाबादचे खासदारही राहिले होते. पुढच्या तीन वर्षात त्यांनी राजीनामा दिला होता.
    रेखा-जया नव्हत्या पहिलं प्रेम -
    अमिताभ बच्चन यांच्या जवळच्या मित्राने खुलासा केला होता की, जया किंवा रेखा त्यांचं पहिलं प्रेम नव्हत्या. त्यांचा एका महाराष्ट्रीय मुलीवर जीव जडला होता. एका ब्रिटीश कंपनीत ही मुलगी काम करत होती. अमिताभ आणि ती मराठी मुलगी एकाच कंपनीच काम करत होते. अमिताभ यांना तिच्याही लग्नही करायचं होतं. मात्र तिने त्यांना नकार दिला. त्यानंतर अमिताभ हे मुंबईत आले.
    रोज ओढायचे सिगारेट -
    अमिताभ बच्चन तरूणपणी सिगारेट ओढायचे. त्यासोबतच ते मद्यही प्यायचे. पण त्यानंतर त्यांनी सगळं बंद केलं. आता ते शुद्ध शाकाहारी आहेत.
    पेन आणि घडाळ्यांचे शौकीन -
    अमिताभ बच्चन यांना पेन गोळा करण्याचा हौस आहे. त्यांच्याकडे वेगवेगळे १००० पेक्षा जास्त पेन आहेत. त्यासोबतच त्यांना घडाळ्यांचीही आवड आहे. एकदा घातलेली घड्याळ ते पुन्हा घालत नाहीत.
    दोन्ही हाताने लिहितात -
    अमिताभ बच्चन यांना इंजिनिअर व्हायचं होत. त्यासोबतच त्यांना इंडियन एअरफोर्समध्ये भरती व्हायचं होतं. पण ते शक्य झालं नाही. त्यांची खासियत म्हणजे ते दोन्ही हाताने लेखन करू शकतात.
    २४०० कोटींची संपत्ती -
    मीडिया रिपोर्टनुसार, अमिताभ बच्चन यांच्याकदे तब्बल २४०० कोटींची संपत्ती आहे. त्यासोबतच त्यांच्याकडे ११ लक्झरी कार्स आहेत.
    संदर्भ:- इंटरनेट
    - गणेश उर्फ अभिजित कदम

  • ज्योती चांदेकर

    मराठी सिने-नाट्य क्षेत्रातील एक चतुरस्त्र अभिनेत्री म्हणजे ज्योती चांदेकर.

    पुण्याच्या सरस्वती नाट्यमंदिरात शिकताना केवळ आवड म्हणून ज्योती चांदेकर यांनी तिथल्या नाट्यवाचन स्पर्धांमध्ये भाग घ्यायला सुरुवात केली. याच वाचनावेळी बाबा ओक यांनी ज्योती यांची गुणवत्ता हेरुन त्यांना' सुंदर मी होणार' या नाटकासाठी विचारलं. त्यांच्या नाटकातल्या कलाकाराची झालेली अडचण लक्षात घेऊन ज्योती यांनी अवघ्या १४ व्या वर्षी रंगमंचावर पाऊल ठेवलं आणि अल्पावधीतच ती हौस न उरता त्यांचं प्रोफेशन बनलं. या नाटकातलं त्यांचं काम पाहून 'नाट्यसंपदा' च्या प्रभाकर पणशीकर यांनी आपल्या 'बेइमान' या नाटकासाठी विचारणा केली. ज्योती तिथेही उभ्या राहिल्या त्या बदली खेळाडू म्हणूनच. यावेळी त्यांचा सहकलाकार होते सतीश दुभाषी. नवोदित ज्योती यांच्यांवर शाबासकीची पहिली थाप पडली ती दुभाषी यांच्याकडूनच.

    मुंबईतल्या नाटकांमध्ये चुणूक दाखवतानाच, त्यांनी आपलं मूळ गाव पुणे मात्र सोडलं नाही.'थ्री स्टार्स' या बाबूराव गोखले यांच्या संस्थेतून 'वर्‍हाडी माणसं', 'स्वयंसिद्धा', 'प्रेमा तुझा रंग कसा ?' आदी अनेक नाटकं केली. घरातल्या दोन धाकट्या बंधूंची असलेली जबाबदारी लक्षात घेऊन ज्योती यांनी त्याकाळी ऑर्केस्ट्रामधून आपलं नृत्यकौशल्यही दाखवलं. अनेक लोकनाट्यातून काम केलं. परंतु, अभिनेत्री म्हणून मोठी लोकमान्यता त्यांना मिळाली ती १९७५ साली आलेल्या 'रखेली' या नाटकामुळे. अरुण सरनाईकही या नाटकात मुख्य भूमिका करत. हे नाटक होतं आशयघन. पण त्या काळी 'प्रौढांसाठी' च्या नाटकांचं पेव फुटलं होतं. त्यात हे नाटक विनाकारण भरडलं गेलं असलं, तरी ज्योती यांच्या कामाचं कौतुक होत होतं. त्यानंतर 'श्रीचिंतामणी', 'सुयोग' आदी बड्या संस्थांमधून त्यांनी अनेक नाटकं केली. 'नाट्यदर्पण', 'रंगदर्पण' आदी अनेक पुरस्कारांवर आपलं नाव कोरलं.

    अनेक नाटकांतून त्यांच्या अभिनयाचा धडाका सुरू असतानाच, आठ वर्षांपूर्वी आलेल्या 'मित्र' नाटकानंतर मात्र तब्येतीच्या कारणास्तव ज्योती यांनी नाट्यसृष्टीतून काढता पाय घेतला. पुढे पाचेक वर्षं ज्योती पुण्यातच होत्या. त्यांचं मोठं कमबॅक झालं ते 'सुखान्त' या सिनेमातून. यातील भूमिकेसाठी 'मटा सन्मान', 'झी' यांसह अनेक पुरस्कार पटकावले. त्यानंतर मात्र ज्योती यांनी मागे वळून पाहिलं नाही. समोर आलेल्या संधीचं त्यांनी सोनं केलं. ही त्यांची दुसरी इनिंग होती. त्यानंतर आलेल्या 'मी सिंधुताई सपकाळ', 'पाऊलवाट' या सिनेमांमधल्या भूमिकांसाठी त्यांना सहाय्यक अभिनेत्रीसाठीचे अनेक पुरस्कार मिळाले. आगामी काळात त्यांचे आणखी काही सिनेमे येणार आहेत. पुण्यात राहून ज्योती यांनी हे योगदान कोणताही गाजावाजा न करता दिलं आहे. गेल्या ४५ वर्षांचं त्यांचं नाट्य, सिनेसृष्टीतील योगदान लक्षात घेऊन अ. भा. चित्रपट महामंडळाने त्यांचा 'चित्रकर्मी' पुरस्काराने उचित गौरवच केला आहे.

    (संदर्भ : महाराष्ट्र टाईम्समधील नोंद हे सदर)


  • त्यांच्या प्रतिभेला सलाम !!

    १९७६ साली कराडला साहित्य संमेलन झाले त्याचे मावळते अध्यक्ष होते पु. ल. देशपांडे आणि उगवत्या अध्यक्षा होत्या दुर्गा भागवत. संध्याकाळी एक कवी संमेलन होतं आणि सूत्रसंचालक होते पु.ल. आणि त्यामुळेच, त्या कवी संमेलनात एक खेळीमेळीचं वातावरण होतं.

    त्यावेळी हिंदी चित्रपट सृष्टीतले एक मोठे कवी साहीर लुधियानवी मंचावर आले. ते म्हणाले- "अभी मैं जो हिंदी कविता सुनाने जा रहा हुँ उसका कोई मराठी तर्जुमा जरा बताए।"

    पु.ल. नी समोरच बसलेल्या माडगूळकरांना वर बोलावलं. आणि म्हणाले, "साहीरजींनी आत्ता काय सांगितलं ते तर तुम्ही ऐकलंच, पण ह्या मराठी रूपांतरात माझी एक अट आहे. ह्या रूपांतरात एक असा मराठी शब्द हवा ज्याला भारतातल्या कोणत्याही भाषेत प्रतिशब्द नाही". असा विश्वास होता पुलंचा मित्रावर.

    मग साहीरजींनी तो शेर ऐकवला -

    "एक बात कहु राजा किसीसे ना कहिओ जी,
    एक बात कहु राजा किसीसे ना कहिओ जी,
    रातभर रहिओ, सबेरे चले जइयो जी।
    सेजिओ पे दिया जलाना हराम हैं,
    खुशियों में, जलनेवालों का क्या काम है?
    अँधेरे में रेह के जड़ाओ, मजा पियो जी,
    रातभर रहिओ सबेरे चले जइयो जी।"

    आणि साहीरजींचा शेवटचा "जी" पूर्ण होईपर्यंत माडगूळकरांचं पूर्ण मराठी रुपांतर झालं होतं.

    "एक अर्ज सुना दिलवरा, मनीच मनी ठेवा जी,
    एक अर्ज सुना दिलवरा, मनीच मनी ठेवा जी
    ओ रातभर तुम्ही राव्हा, झुंझुरता तुम्ही जावा जी
    सेजेशी समई मी लावू कशाला?
    जुळत्या जीवालागी जळती कशाला?
    अंधाऱ्या राती इष्काची मजा घ्यावी जी,
    रातभर तुम्ही राव्हा, झुंझुरता तुम्ही जावा जी".

    ह्यातील 'झुंझुरता' ह्या शब्दाला इतर कोणत्याही भाषेत प्रतिशब्द नाही… ह्याला म्हणतात प्रतिभा.

    आणि हा किस्सा इथेच संपत नाही. ह्याच्याही वरची कडी म्हणजे पु.ल. नी त्याचवेळी तिथे पेटी मागवली, तिथल्या तिथे ह्या कवितेला चाल लावली आणि तिथल्यातिथे ती गाउन दाखवली.

  • अब्दुल रहमान अंतुले (बॅरिस्टर)

    अब्दुल रहमान अंतुले (बॅरिस्टर)

    तडाखेबाज निर्णय घेऊन ते धडाकेबाजपणे अंमलात आणणारे मुख्यमंत्री म्हणून बॅरिस्टर अब्दुल रहमान अंतुले यांची ख्याती आहे. आपल्या अल्प कारकिर्दीत देखील त्यांनी स्वत:मधल्या कुशल प्रशासकाची जाणीव करुन दिली.

  • स्वातंत्र्यसेनानी कृषिसंशोधक पांडुरंग खानखोजे

    स्वातंत्र्यसेनानी कृषिसंशोधक – इंग्रजांची जगातून सत्ता उलथवून टाकण्याचे स्वप्न अगदी बालपणापासून पाहणारा एक मुलगा संशोधन करून मेक्सिकोला अन्नधान्याबाबत स्वयंपूर्ण बनवतो. असा हा स्वातंत्र्यसेनानी कृषिसंशोधक म्हणजे पांडुरंग सदाशिव खानखोजे.

  • अब्दुल करीम खाँ

    आज ११ नोव्हेंबर..आज हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतातल्या किराणा घराण्याचे प्रवर्तक अब्दुल करीम खाँ यांची जयंती.
    अब्दुल करीम खाँ यांचा जन्म ११ नोव्हेंबर १८७२ रोजी झाला.
    अब्दुल करीम खाँ यांचे वडील काले खान हे गुलाम अलींचे नातू होत. अब्दुल करीम खाँ साहेबांनी आपले काका अब्दुल्ला खान व वडील काले खान यांचेकडे सांगीतिक शिक्षण घेतले. त्यांचे दुसरे काका नन्हे खान यांचेही मार्गदर्शन त्यांना लाभले. गायनाबरोबरच त्यांनी सारंगी, सतार, वीणा व तबलावादनात नैपुण्य प्राप्त केले. अब्दुल करीम खाँ साहेबांना म्हैसूर राज दरबारात गायनासाठी निमंत्रित करण्यात आले होते. तिथे त्यांची गाठ कर्नाटकी संगीतातील अनेक सुप्रसिद्ध गायक प्रभृतींशी पडली. त्यांच्या गायनाचा प्रभाव अब्दुल करीम खाँ साहेबांच्या गायकीवरही पडला. त्यांनी कर्नाटकी संगीताचा कसून अभ्यास केला. कर्नाटकी संगीतातील अनेक वैशिष्ट्ये त्यांच्या गायकीतही दिसून येत असत. ते फक्त उत्तर भारतातच नव्हे तर दक्षिण भारतातही आपल्या गाण्यासाठी लोकप्रिय होते. दक्षिण भारतात त्यांना अनेक ठिकाणांहून गाण्याचे कार्यक्रम करण्यासाठी खास बोलाविले जाई. त्यांनी दाक्षिणात्य कवी त्यागराजयांच्या कृतीही ध्वनिमुद्रित केल्या आहेत.. अनेकदा लोक तिथे त्यांच्या गळ्यात मोठमोठे हार घालून त्यांचे स्वागत करण्याबरोबर त्यांची मिरवणूकही काढत असत. खाँ साहेब वैयक्तिक आयुष्यात मात्र अतिशय साधे होते. म्हैसूर राज दरबारी ते नित्य नियमाने हजेरी लावत असत. त्यांना तिथे 'संगीत रत्न' उपाधी देऊन गौरविण्यात आले. म्हैसूरच्या वाटेवर ते धारवाडला आपल्या भावाकडे मुक्काम करत असत. तिथेच त्यांनी आपले ख्यातनाम शिष्य सवाई गंधर्व यांना गाणे शिकविले. इ.स. १९०० मध्ये आठ महिने त्यांनी सूरश्री केसरबाई केरकर यांनाही गाणे शिकविले. पुढे केसरबाईंनी गायन क्षेत्रात खूप नाव कमावले. १९१३ मध्ये अब्दुल करीम खाँ साहेबांनी पुणे येथे आर्य संगीत विद्यालयाची स्थापना केली. येथे ते भविष्यातील गायक तयार करू लागले. अब्दुल करीम खाँ साहेबांना वाद्यांविषयीही कमालीचा जिव्हाळा होता. ते वाद्ये दुरुस्त करण्यात पटाईत होते. त्यांच्याजवळ वाद्ये दुरुस्तीसाठी लागणारी सामग्री सदैव असे. मिरज येथील नामवंत सतार व तानपुरा बनविणारे कारागीर देखील त्यांचा सल्ला शिरोधार्थ मानत व अनेकदा त्यांचे मार्गदर्शन घेत असत. आर्य संगीत विद्यालयाची दुसरी शाखा १९१७ मध्ये मुंबई येथे सुरू झाली. परंतु ती दोन - तीन वर्षांपलीकडे जास्त टिकली नाही. नंतर ते मिरज येथे स्थायिक झाले.

    अब्दुल करीम खाँ साहेबांच्या शिष्यांत सवाई गंधर्व, सुरेशबाबू माने, बाळकृष्णबुवा कपिलेश्वरी, दशरथबुवा मुळे, रोशन आरा बेगम, हिराबाई बडोदेकर इत्यादी प्रतिभावंत गायकांचा समावेश होतो.

    त्यांच्या 'जमुना के तीर', 'गोपाला करुणा क्यूं नही आवे', 'पिया के मिलन की आस', 'नैना रसीले', 'पिया बीन नही आवत चैन' यांसारख्या अजरामर ध्वनिमुद्रणांनी आजही ते रसिकांच्या हृदयात घर करून आहेत. दर वर्षी त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ऑगस्ट महिन्यात मिरज येथे मोठा संगीत महोत्सव साजरा होतो. भारतातील नामी कलावंत तेव्हा येऊन आपली कला सादर करतात व उस्तादांच्या प्रती आपला आदर व्यक्त करतात. *मा.अब्दुल करीम खाँ * यांचे २७ ऑक्टोबर १९३७ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • ब्राझीलियन फुटबॉलपटू काका

    काका हा २००७ मध्ये बॅलोन डी ओर पुरस्कार जिंकणारा व त्याच साली फीफाचा सर्वोत्तम खेळाडू (‘प्लेअर ऑफ द इयर’) या पुरस्काराने गौरवण्यात आलेला खेळाडू होत. त्याला हा पुरस्कार देण्यासाठी स्वत: पेले हजर होते, हा ब्राझीलच्या फुटबॉलचा मान म्हणायला हवा.

  • संयमाचा द्राविडी प्राणायाम

    राहुल द्रविडच्या जागवलेल्या काही आठवणी. द्वारकानाथ संजगिरी यांच्या 'थर्ड अंपायर' या पुस्तकातून सारांशरूपाने!

    बर्फापेक्षा थंड काही असू शकतं का ?
    होय. होय. होय! राहुल द्रविडचं डोकं !!
    याआधी आपण पाहिलंय की चेंडू फिरणाऱ्या खेळपट्टीवर त्याने इराणी कप मुंबईच्या हातून कसा पळवला ते! एक मुंबईचा खेळाडू मला सांगत होता, "अरे, तो फलंदाजीला जातानाच बरोबर बेडिंग, कपडे, टूथब्रश वगैरे घेऊन गेलाय, असं वाटत होत. त्या सामन्यात लक्ष्मण अप्रतिम खेळला, पण द्रविडचं अस्तित्व हा त्या विजयाचा पाया, ढाचा, कळस वगैरे सर्व होतं. मी तेव्हा त्याला फोनवर म्हटलं होतं, "आईकडून दृष्ट काढून घे. आपल्याकडे क्रिकेटमध्ये दृष्ट फार लवकर लगते."
    त्याच्या फलंदाजीला दृष्ट लागून चालणार नव्हतं.

    सचिन-राहुल हे भारतीय संघाचे श्वास होते. दोघेही एक-एक नाकपुडी! एक चोंदली तर दुसरी प्राणवायू पुरवते. एकेकाळी सचिन गेला कि श्वास कोंडायचा. द्रविड असला की श्वास कोंडणार नाही, असं वाटायचं. २००३ च्या विश्वकपात सचिन बल्ल्याने काव्य लिहून जायचा, पण शेवटी निबंध कोणीतरी लिहावा लागतो. ती जबाबदारी राहुल पूर्ण करायचा.

    हे पद्य आणि गद्य हेच आपल्या क्रिकेटचं अभिजात साहित्य आहे. तेच दोघांनी प्रसवलं.
    बरं, द्रविड पूर्वीप्रमाणे बसची वाट पाहावी तसा एखाद्या धावसंख्येवर पुढच्या धावेची वाट पाहात ताटकळत उभा राहात नाही. धाव ही कष्टाने मिळणारी बस नाही. ती वाट पाहात उभी असलेली कॅब आहे आणि तरीही त्याच्या फलंदाजीएवढी शाश्वती भारतीय संघात कुणाचीही देता येत नाही. द्युतात धर्मराजाने राहुलची विकेट लावली असती तर शकुनी हरला असता... धर्मराज नाही. त्याची फलंदाजी हा ट्रान्समध्ये जाण्याचा प्रकार आहे. अभ्यासात तो हुशार आहे, असं त्याची आई सांगते. 'अभ्यासाला बस' असं राहुलला म्हणे कधी सांगावचं लागलं नाही. 'राहुल द्रविड स्क्वेअर कट मारतो तशी त्याच्या गालावर कधी मारायला लागलीय का?' माझ्या गालावरच्या जुना जखमा आठवून मी त्याच्या बाबांना विचारलं. ते म्हणाले, ''साधी रागावण्याची वेळसुद्धा त्याने कधी येऊ दिली नाही. तो क्रिकेट खेळायला लागल्यावर सुद्धा शेवटचे दोन महिने फक्त अभ्यासावर लक्ष केंद्रित करायचा. त्यामुळे क्लास मिळवायचा.'' बारावीत राहुलने त्याच्यासमोर असलेले अनेक शैक्षणिक पर्याय टाळून क्रिकेटपटू व्हायचं ठरवलं. तिथंही 'क्लास' मिळवला. आपण कधीतरी अधून मधून द्रविड जास्त बचावात्मक झाला की वैतागायचो. त्याच्या आई-बाबांना काय वाटत असेल? ते म्हणाले, ''आम्ही वृत्तीने सर्वच शांत आहोत. राहुलचं शतक झालं की आनंद होतो, पण हुरळून जात नाही किंवा अपयश फार मनाला लावून घेत नाही. कधीतरी मी त्याला विचारतो 'त्यावेळी असा का शॉट खेळलास? असा खेळायला हवा होतास'. तो फक्त हसतो. पण मला माहीत असतं तो यशापयशाचा अभ्यास करतो. ही त्याची अभ्यासू वृत्ती लहानपणापासूनच पाहिलीय. आजही तो विवेकानंद वाचत असतो.''

    काही दोन-चार क्रिकेटर्सचा अपवाद सोडला तर इतरांना विवेकानंदांच्या फोटोखेरीज त्यांच्या बद्दल इतर माहिती नसावी.
    राहुलच्या पेशन्सची एक गोष्ट. राहुलच्या आईने सांगितलेली. त्याच्या लग्नाच्या वेळी त्याच्या घरच्यांना असं वाटत होतं की लग्न हे साग्रसंगीत व्हावं. कारण त्याची मुंज साग्रसंगीत झाली होती. मुंजीत त्याला सोन्याचं जानवं सुद्धा घातलं होतं. पण राहुलचा आधी अशा विधींना विरोध होता. पण त्याच्या आईने त्याला सांगितलं की तेवढं माझ्यासाठी ऐक. हे विधी चार दिवस चालले होते. पण राहुल या खेळपट्टीवरून देखील हलला नाही.

    कळलं तुम्हाला त्याचा पेशन्स कुठून आला?
    मी आयुष्यात स्वतःच्या लग्नाचा अल्बम सोडून फक्त राहुलच्या लग्नाचा पूर्ण अल्बम पाहिलाय. एरवी लग्नाचा अल्बम म्हटलं की माझ्या अंगावर काटा येतो. त्या अल्बममध्ये मात्र फोटोफोटोत मला राहुलच्या पेशन्सच्या खुणा दिसत होत्या. शेवटी मैदानावरही लग्नच असतं. ते धावांशी असतं. मुंडावळ्यांऐवजी पॅड्स, ग्लोव्हज असतात. उलट मैदानावरचे विधी पेशन्सची जास्तच परीक्षा घेतात.

    द्वारकानाथ संजगिरी
    संकलन. संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३

  • पंडित उल्हास कशाळकर

    उल्हास कशाळकर यांना अखिल भारतीय पातळीवरील ‘क्रिटिक असोसिएशन’च्या मानाच्या पुरस्काराने गौरवले गेले आहेत. त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार २००८ साली प्राप्त झाला होता.