जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
कवयित्री बहिणाबाई चौधरी यांची पुण्यतिथी
बहिणाबाईंचा जन्म २४ ऑगस्ट १८८० रोजी झाला.
बहिणाबाईंना लिहिता येत नव्हते, त्यामुळे त्यांनी केलेल्या अनेक कविता कुणी लिहून न ठेवल्यामुळे काळाच्या ओघात नष्ट झाल्या. त्या निरक्षर होत्या; तथापि त्यांच्यापाशी जिवंत काव्यरचनेची निसर्गदत्त प्रतिभा होती. ज्यात त्यांचे सारे आयुष्य गेले, ते शेतकाम आणि घरकाम करता करता उत्स्फूर्तपणे त्या ओव्या रचून गात असत. सोपानदेव चौधरी आणि त्यांचे एक आप्त ह्यांनी जमेल तेव्हा त्या वेळोवेळी तेथल्या तेथे उतरून घेतल्या आणि जपल्या. लिहिता न येणाऱ्या बहिणाबाई अहिराणीत आपल्या कविता रचत व त्यांचे पुत्र सोपानदेव चौधरी त्या कागदावर लिहून ठेवत. महाराष्ट्रातील कवी सोपानदेव चौधरी हे बहिणाबाईंचे पुत्र. बहिणाबाईंच्या मृत्यूनंतर बहिणाबाईंचे सुपुत्र कविवर्य सोपानदेव व त्यांचे मावसबंधू श्री. पितांबर चौधरी यांनी लिहून घेतलेली बहिणाबाईंची गाणी हस्तलिखित स्वरूपात होती. आपल्या आईच्या मृत्यूनंतर तिच्या चीजवस्तू पाहताना हे हस्तलिखित सोपानदेवांच्या हाती लागले. ह्या कविता सोपानदेवांनी आचार्य अत्रे ह्यांना दाखविल्या. अत्रे उद्गारले, "अहो हे तर बावनकशी सोनं आहे! हे महाराष्ट्रापासून लपवून ठेवणं हा गुन्हा आहे!’,आणि अत्र्यांनी त्या कविता प्रकाशित करण्यात पुढाकार घेतला. अत्रे ह्यांच्या विस्तृत प्रस्तावनेसह बहिणाबाईंची गाणी १९५२ मध्ये प्रकाशित झाली आणि ‘धरत्रीच्या आरशामधी सरग’ (स्वर्ग) पाहणाऱ्या ह्या कवयित्रीचा महाराष्ट्रास परिचय झाला. ह्या काव्यसंग्रहात बहिणाबाईंच्या फक्त ३५ कविता आहेत; परंतु कवित्वाची कोणतीच जाणीव मनात न ठेवता, केवळ सहजधर्म म्हणून रचिलेली त्यांची बरीचशी कविता वेळीच लेखनिविष्ट न झाल्याने त्यांच्याबरोबरच नाहीशी झालेली आहे. बहिणाबाईंच्या कविता वऱ्हाडी-खानदेशीत, त्यांच्या मातृबोलीत, रचिलेल्या आहेत.त्यांच्या कवितांचे विषय माहेर, संसार; शेतीची साधने, कापणी, मळणी इ. कृषिजीवनातील विविध प्रसंग; अक्षय्य तृतीया, पोळा, पाडवा इ. सणसोहळे; काही परिचित व्यक्ती, असे आहेत. या साऱ्यांबद्दल त्यांच्या मनात विलक्षण आत्मीयता होती असे त्यांच्या काव्यातून दिसून येते.
‘असा राजा शेतकरी, चालला रे आलवानी (अनवाणी) देखा त्याच्या पायाखाले, काटे गेले वाकीसनी.
तल्लख स्मरणशक्ती, सूक्ष्म निरीक्षण, उपजत विनोदबुद्धी, जीवनातील सुखदुःखांकडे समभावाने पाहू शकणारे शहाणपण आणि जगण्यातून कळलेले तत्त्वज्ञान ही त्यांच्या कवित्वाची वैशिष्ट्ये होत. ‘आला सास, गेला सास, जीवा तुझं रे तंतर, अरे जगनं-मरनं एका सासाचं अंतर!’ किंवा ‘लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते’ अशा किमान शब्दात अर्थाची कमाल गाठणारे शब्द, ‘अरे संसार संसार - जसा तवा चुल्यावर आधी हाताले चटके - तव्हा मीयते (मिळते) भाकर’ किंवा ‘देव कुठे देव कुठे - आभायाच्या आरपार देव कुठे देव कुठे - तुझ्या बुबुयामझार’. एखाद्या मोठ्या ग्रंथाचा विषय असणारे जीवनाचे तत्त्वज्ञान त्या साध्या, सोप्या, आणि कमी शब्दांत सहजपणे सांगून गेल्या आहेत. मा.बहिणाबाई चौधरी यांचे ३ डिसेंबर १९५१ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर, पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- विकीपीडीया
डॉक्टर म्हणून झोपडपट्टीत दवाखाना चालविताना उपचारासाठी येणाऱ्या स्त्रियांचे वास्तव दर्शन त्यांना झाले आणि त्यांचे शब्द कवितेतून प्रकटले आहेत.
करंदीकर, (प्रा.) अभय
संगणक आणि माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात पदवी, पदव्युत्तर पदवी शिवाय पीएच.डी. मिळालेली व्यक्ती सर्वसाधारणपणे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील एखाद्या नामांकित कंपनीमध्ये अतिवरिष्ठ पदावर गडगंज पगारनिशी रूजू होते. मग काही वर्षांतच सीइओपदापर्यंत पोहोचते किंवा स्वतची कंपनी सुरू करते. या सर्व गोष्टी प्रा. अभय करंदीकर यांनी सहज शक्य होत्या. मात्र त्या मार्गाने न जाण्याचा निर्णय त्यांनी जाणीवपूर्वक घेतला. मूळ शिक्षणामध्येच त्यांना अधिक रस होता.
कालच घोषित झालेल्या भौतिकशास्त्रातील संशोधनासाठी प्रदान केल्या जाणाऱ्या मानाच्या डॉ. विक्रम साराभाई पुरस्कारातील पाच मान्यवरांमध्ये प्रा. अभय करंदीकर यांचा समावेश आहे. स्वत:ची शैक्षणिक आवड जोपासतानाच ज्ञानदानाचे पवित्र कार्य करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय त्यांनी घेतला. शालेय शिक्षण ग्वाल्हेरला झाल्यानंतर उच्च शिक्षणासाठी ते बाहेर पडले. कानपूर आयआयटीमधून त्यांनी इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग (१९८६) पूर्ण केले. नंतर एम.टेक (१९८८) व पीएच.डी.ही (१९९५) पूर्ण केली. मध्यंतरीचा काही काळ त्यांनी पुण्याला सी-डॅकमध्येही काम केले. सी-डॅकमध्ये असताना हाय परफॉर्मन्स कॉम्प्युटिंग ग्रुपचे मुख्य समन्वयक म्हणूनही त्यांनी काम पाहिले. सध्या ते आयआयटी पवईमध्ये इलेक्ट्रिकल इंजिनिअिरग विभागात प्राध्यापक असून टाटा टेलिसव्र्हिसेसच्या निधीतून साकारलेल्या सेंटर फॉर एक्सलन्स इन टेलिकॉमचे समन्वयक आहेत. त्यापूर्वी एम. टेक पूर्ण केल्यानंतर ते भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत (इस्रो) रूजू झाले होते. इस्रोच्या अहमदाबाद येथील पीआरएलमध्ये त्यांनी काम पाहिले. माहिती तंत्रज्ञान विषयातील या पीएच.डी.नंतर मात्र त्यांच्या कामाला अधिक आयाम मिळाले. सध्या ते एकाच वेळेस सहा महत्त्वाच्या विषयांवर प्रगत संशोधन करीत आहेत. वायरलेस नेटवर्कमधील कंट्रोल आणि परफॉर्मन्स मॉडेिलग, वायर्ड आणि वायरलेस नेटवर्क मधील रिसोर्स अॅलोकेशन आणि सेवेतील दर्जा, नेक्स्ट जनरेशन वायरलेस नेटवर्क, को-ऑपरेटिव्ह रीले आणि सेल्फ ऑर्गनायझिंग नेटवर्क, करियर इथरनेट आणि मोबाईल बॅकहॉल, ग्रामीण भागातील वायरलेस नेटवर्क असे हे संशोधनाचे प्रमुख सहा विषय आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आयआयटीच्या विद्यार्थ्यांचा एक चमू या विषयांवर काम करतो आहे. ग्रामीण भागातील वायरलेस नेटवर्क हा विषय सर्वाधिक महत्त्वाचा आहे. कारण भारतासारख्या देशांत दूरसंवाद क्रांती खऱ्या अर्थाने तळागाळात पोहोचवायची असेल तर त्यासाठी आपल्याला वायरलेस नेटवर्कवर भर द्यावा लागणार आहे. सध्या त्यांचे डिजिटल कम्युनिकेशन थिअरीवरही प्रगत संशोधन सुरू आहे. करंदीकर व त्यांच्या चमूने केलेल्या कामाची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवरही घेतली गेली. इन्स्टिटय़ूट ऑफ इलेक्ट्रिकल अॅण्ड इलेक्ट्रिकल इंजिनिअर्स ही महत्त्वाची संस्था डिजिटल नेटवर्किंग आणि इतर संबंधित बाबींमधील प्रमाणके ठरविण्याचे काम करते. करंदीकर यांच्या नेतृत्त्वाखालील चमूने यातील एक महत्त्वाचे आंतरराष्ट्रीय प्रमाणक निश्चित करण्याची महत्त्वाची भूमिका बजावली आहे. प्रा. करंदीकर प्रमुख असलेल्या सेंटरमध्ये टेलिकॉम क्षेत्रातील महत्त्वपूर्ण संशोधन सुरू आहे. संशोधनाचेही दोन प्रमुख प्रकार असतात. एक पूर्णपणे शक्षणिक स्वरूपाचे आणि दुसरे प्रयोगात्मक प्रत्यक्षात येणारे. प्रा. करंदीकर यांचा विशेष म्हणजे त्यांना शक्षणिक संशोधनाबरोबरच प्रत्यक्षातील त्याच्या उपाययोजनांमधील संशोधनामध्येही तेवढाच रस आहे. आयआयटीतील प्राध्यापकांचा विशेष म्हणजे अनेक महत्त्वाच्या स्टार्ट-अप कंपन्यांच्या स्थापकांमध्ये त्यांचा समावेश असतो. ही बाब प्रा. करंदीकर यांनाही लागू आहे. इसोडस नेटवर्क्सच्या उभारणीत त्यांचा मोलाचा सहभाग आहे. ही कंपनी आपल्या देशात तसेच एशिया- पॅसिफिक परिक्षेत्रात मेट्रो इथरनेटच्या क्षेत्रात कार्यरत आहे. आता जाहीर झालेला डॉ. साराभाई संशोधन पुरस्कार म्हणजे त्यांच्या आजवरच्या संशोधनावर उमटलेली राष्ट्रीय मोहोरच आहे.
रामभाऊंनी ’संतवाणी’ मधील ‘तीर्थ विठ्ठल’, ‘माझे माहेर पंढरी’, ‘पंढरी निवासा’, ‘अणुरेणीया थोकडा’ हे पंडित भीमसेन जोशींकडून गाऊन घेतलेले अभंग खूपच लोकप्रिय झाले. ह्याबरोबरच ‘दिसलीस तू’, ‘डाव भांडून मांडून मोडू नको’ आणि ‘सखी, मंद झाल्या तारका’ ही सुधीर फडक्यांनी गायलेली भावगीते प्रचंड गाजली.
अर्थशात्र, संगीत, साहित्य, राजकारण, समाजशास्त्र आणि कम्प्युटरसारख्या क्षेत्रात सहजपणे मुशाफिरी करणारे अच्युत गोडबोले यांचा जन्म १५ ऑगस्ट १९५० रोजी अंमळनेर येथे झाला.
अच्युत गोडबोले यांनी विज्ञान, संगणक तंत्रज्ञान आणि व्यवसाय या विषयांवर त्यांनी प्रामुख्याने लेखन केले आहे. अच्युत गोडबोले यांचे बालपण प्रमुख्याने सोलापूर शहरात गेले. शाळेत असताच त्यांनी विज्ञान आणि गणितात मोठे प्राविण्य मिळवले. दहावीच्या परीक्षेत ते बोर्डात सोळावे आले. त्यांच्यावर लहानपणापासून त्यांच्या श्रीराम पुजारी सरांचा विलक्षण प्रभाव होता.
गंमत म्हणजे ते शाळा-कॉलेजमधले शिक्षक नव्हते; पण आयुष्यात जगावं कसं आणि समृद्ध कसं व्हावं हे गोडबोले त्यांच्याकडून शिकले. मराठी आणि विशेषतः इंग्लिश पुस्तकं, शास्त्रीय गायन, विविध खेळ, कविता, गाणी या साऱ्यांची ओळख पुजारी सरांमुळे झाली आणि गोडबोले यांचं आयुष्यच बदलून गेलं आणि तिथपासून ते चौफेर वाचू, ऐकू लागले. त्याचाच फायदा त्यांना पुढे प्रचंड लेखन करताना झाला.
पुढे भारतीय तंत्रज्ञान संस्थेतून (आयआयटी) त्यांनी रसायन अभियांत्रिकीची पदवी मिळविली. चमकदार शैक्षणिक पार्श्वभूमीनंतर गोडबोले यांनी समाजसेवेत आपला काळ व्यतित केला. आदिवासींना हक्क मिळवून देण्याच्या लढ्यात त्यांनी मुख्य भूमिका बजावली. अच्युत गोडबोले यांनी मराठीतून वृत्तपत्रे नियतकालिकांसाठी विपुल प्रमाणात लेखन व स्तंभलेखन केले आहे.
अच्युत गोडबोले यांच्याकडे आयटी उद्योगाचा ३५ हून अधिक वर्षाचा अनुभव आहे आणि ते पटनी कॉम्प्युटर सिस्टिम्स, सिंटेल, एलएन्डटी इन्फोटेक, अपार आणि दिशा या कंपन्यांचे व्यवस्थापक राहिलेले आहेत. गोडबोले मराठी व इंग्रजी भाषेतील लेखनासाठी प्रसिद्ध आहेत. ते सर्व शैलीतील विपुल लेखनकार आहेत आणि त्यांनी अनेक भाषांतील संकल्पनांचे मराठीत रुपांतर केले आहे.
अच्युत गोडबोले यांचे संगणकावरील ‘संगणकयुग’, संगीतावरील ‘नादवेध’, व्यवस्थापनावरील ‘बोर्डरूम’, विज्ञानावरील ‘किमयागार’, अर्थशास्त्रावरील ‘अर्थात’, गुलामगिरीवरील ‘गुलाम’, नॅनोटेक्नॉलॉजीवरील ‘नॅनोदय’, स्टीव्ह जॉब्ज या तंत्रज्ञाचे आत्मचरित्र ‘स्टीव्ह जॉब्ज’, मानसशास्त्रावरील ‘मनात’, चंगळवादावरील ‘चंगळवादाचे थैमान’, गणितावरील ‘गणिती’ आणि त्यांचे आत्मचरित्र ‘मुसाफिर’ अशी अनेक पुस्तकं गाजली आहेत. अच्युत गोडबोले यांच्या कारकिर्दीचा वेध त्यांनी या पुस्तकात घेतला आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
ही व इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.
https://www.youtube.com/watch?v=ebFe4p-i4WE
https://www.youtube.com/watch?v=ADxWkMyaN-Y
https://www.youtube.com/watch?v=ASIHzaE5o3Y
श्रीराम भिकाजी वेलणकर हे भारतीय टपालखात्याच्या ‘पिन कोड’ प्रणालीचे जनक होते. श्रीराम भिकाजी वेलणकर हे ब्रिटिशांच्या राज्यात आयसीएसंच्या लेखी परीक्षेत पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले तरीही त्यांना पोस्ट आणि टेलीग्राफ खात्याच्या तोंडी परीक्षेत ठरवून अनुत्तीर्ण करण्यात आले होते.
रिओ ऑलिम्पिकमध्ये नेत्रदीपक कामगिरी करणारी जिम्नॅस्टिकपटू दीपा कर्माकर चा जन्म ९ ऑगस्ट १९९३ रोजी त्रिपुराची राजधानी अगरतळा येथे झाला.
भारताची 'जिमनॅस्ट क्वीन' अशी तिची ओळख असलेल्या दीपा कर्माकरने जेव्हा पहिल्यांदा जिम्नॅस्टिक स्पर्धेत भाग घेतला होता तेव्हा तिच्याकडे जोडेदेखील नव्हते. वयाच्या सहाव्या वर्षापासून ती जिम्नॅस्टिक कोच बिश्वेशर नंदी यांच्या मार्गदर्शनात ट्रेनिंग घेत आहे. जन्मापासूनच दीपाचे पाय फ्लॅट आहे आणि जिम्नॅस्टिक सारख्या खेळासाठी हे बाधक असतं. असे पाय असणार्यांनना उडी मारल्यानंतर जमिनीवर लँड करताना बॅलेस करण्यात त्रास झेलावा लागतो. परंतू दीपाने अथक परिश्रम आणि अभ्यासाने आपली ही कमी दूर केली. २००७ च्या राष्ट्रीय खेळांमध्ये शानदार प्रदर्शनानंतर दीपाचा उत्साह वाढला आणि ती अधिक अभ्यास करू लागली. दीपाने २०१४ मध्ये कॉमनवेल्थ गेम्समध्ये कांस्य पदक जिंकले होते.
२०१४ च्या राष्ट्रकुल स्पर्धेत कांस्यपदक जिंकल्यानंतर दिपा कर्माकरच्या नावाची चर्चा सूरू झाली होती. पण, तिला प्रसिद्धी मिळवून दिली ती ऑलिम्पिक स्पर्धेतील ऐतिहासिक कामगिरीनंतर... शांत, लाजरी, स्वतःच्याच कोशात राहणारी दिपा स्टार बनली. पण, तिने आपले पाय जमिनीवरच ठेवले.
२०१५ च्या आशियाई जिम्नॅस्टीक्स अजिंक्यपद स्पर्धेत आणखी एक कांस्यपदक जिंकणा-या दिपाला २०१७ मध्ये पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले. दुखापतीनंतर ती बराच काळ स्पर्धेपासून दूर होती आणि तिने वर्ल्ड चँलेंज स्पर्धेतील सुवर्णपदकाने कमबॅक केले.
रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत दैदिप्यमान कामगिरी करणाऱ्या दीपा कर्माकरने भारताला जिमनॅस्टचे वेड लावलं. तिच्यामुळे जिमनॅस्टीक या खेळाकडे गांभीर्यानं पाहिलं जाऊ लागलं. मागल्या वर्षी संपन्न झालेल्या वर्ल्ड चँपियनशिपमध्ये तिने प्रोडूनोवा जिम्नॅस्टमध्ये अंतिम पाचामध्ये जागा बनवली आणि आंतरराष्ट्रीय जिम्नॅस्टिक संघाने तिला विश्व स्तरीय जिम्नॅस्टच्या पंक्तीत बसवले. दीपा कर्माकरनं आतापर्यंत राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर एकूण ७७ हून अधिक पदकांची कमाई केली आहेत आणि त्यात ६७ सुवर्णपदकं आहेत. FIG आर्टिस्टीक जिमनॅस्टीक जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी ती पहिलीच भारतीय खेळाडू आहे. तिच्या या कामगिरीची दखल 'बार्बी डॉल' या प्रसिद्ध कंपनीनंही घेतली आणि त्यांनी चक्क दीपा कर्माकरच्या रूपाची बार्बी डॉल तयार केली आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
रयतेचे राजे राजर्षी शाहू महाराज यांचा जन्म २६ जून १८७४ रोजी झाला.
महाराष्ट्रातील करवीर तथा कोल्हापूर संस्थानचे प्रागतिक अधिपती आणि थोर समाजसुधारक. प्राथमिक शिक्षण, जातिभेद-निवारण, अस्पृश्यता-निवारण इ. सुधारणांचे पुरस्कर्ते. त्यांचा जन्म कागलच्या जहागीरदार घाटगे घराण्यात जयसिंगराव आणि राधाबाई ह्या दांपत्याच्या पोटी झाला. त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव यशवंतराव. चौथ्या शिवाजींच्या अकाली निधनानंतर ते १७ मार्च १८८४ रोजी कोल्हापूरच्या गादीवर दत्तक गेले. राजकोट व धारवाड येथे त्यांचे शिक्षण झाले. सर फ्रेझर व रघुनाथराव सबनीस यांसारखे गुरू त्यांना मिळाले. विद्यार्थिदशेत त्यांनी इंग्रजी, संस्कृत, इतिहास, राज्यशास्त्र इ. विषयांचा अभ्यास केला. त्यांना २ एप्रिल १८९४ रोजी राज्याधिकार प्राप्त झाला. तत्पूर्वी बडोद्याच्या गुणाजीराव खानविलकर यांच्या लक्ष्मीबाई या कन्येबरोबर त्यांचा विवाह झाला. त्यांना राजाराम व शिवाजी हे दोन मुलगे आणि राधाबाई (आक्कासाहेब) व आऊबाई या दोन कन्या झाल्या. त्यांनी प्रशासन-यंत्रणेनची पुनर्ररचना करून भास्करराव जाधव, दाजीराव विचारे, आ.ब.लठ्ठे यांसारख्या बहुजन समाजातील कर्तबगार व गुणी व्यक्तींना अधिकारावर नेमण्यास सुरुवात केली. १८९७-९८ साली प्रथम दुष्काळ व नंतर प्लेग अशी संकटे कोसळली. तरुण शाहूंनी धैर्याने त्यांवर मात केली. १९०२ साली सातव्या एडवर्डच्या राज्यारोहणानिमित्त त्यांनी युरोपचा दौरा केला. तेथील भौतिक प्रगतीचा मोठा प्रभाव त्यांच्यावर पडला; त्यामुळे त्यांचे अनुभवविश्व समृद्ध झाले. कोल्हापुरात वेदोक्त प्रकरणाचा स्फोट झाला. कोल्हापुरातील ब्रह्मवर्गाने शाहूंचे क्षत्रियत्व नाकारून त्यांना शूद्र म्हटले आणि त्यांना वेदमंत्राचा अधिकार नाकारला. यातून वेदोक्ताच्या संघर्षाचे पडसाद सर्व महाराष्ट्रभर उमटले. लो. टिळकांनी ब्रह्मवर्गाची बाजू घेतल्याने प्रकरण इरेस पडले. शाहूंनी वेदोक्ताचा अधिकार नाकारणाऱ्या राजोपाध्यांची व शंकराचार्यांची वतने जप्त केली. ब्रह्मवर्गाने हे प्रकरण व्हाइसरॉयपर्यंत नेले; पण शेवटी शाहूंचीच सरशी झाली. कोल्हापुरातील ब्रह्मवर्गास त्यांच्याशी समेट करावा लागला, पण महाराष्ट्रातील ब्रह्मवर्ग शेवटपर्यंत त्यांच्या विरोधातच राहिला. कुलकर्णी-वतन बरखास्ती, सत्यशोधक जलशांना शाहूंचा पाठिंबा या बाबींमुळे तर हा विरोध वाढतच गेला.
वेदोक्त प्रकरणातील अनुभवावरून, भिक्षुकशाहीच्या जाळ्यातून मुक्त झाल्याशिवाय उच्चवर्णियांची धार्मिक व सामाजिक मक्तेदारी नष्ट होणार नाही, अशी शाहूंची धारणा झाली होती. परिणामी ते म. फुल्यांच्या सत्यशोधक विचारसरणीकडे आकृष्ट झाले. त्यांनी उघडपणे त्यांचे अनुयायीत्व स्वीकारले नसले, तरी सत्यशोधक तत्त्वांना त्यांचा पाठिंबा होता. त्यांच्या प्रोत्साहनामुळे महाराष्ट्रात सत्यशोधक समाजाचे पुनरुज्जीवन झाले. पारंपरिक भिक्षुकशाहीच्या वर्चस्वाला शह देण्यासाठी त्यांनी कोल्हापुरात ब्राह्मणेतर पुरोहितांची निर्मिती करण्यासाठी ‘श्री शिवाजी वैदिक स्कूल' ची स्थापना केली आणि मराठ्यांसाठी स्वतंत्र ‘क्षात्रजगद्गुरू' पद निर्माण करून त्यावर सदाशिवराव पाटील या उच्चविद्याविभूषित तरुणास नेमले. धार्मिक व सामाजिक क्षेत्रांत हा एक अभिनव प्रयोग होता.
शाहूंनी आर्यसमाज व थिऑसॉफिकल सोसायटी या संस्थांनाही आश्रय दिला. वेदांवरील श्रद्धा व जातिभेदाला विरोध, या आर्यसमाजाच्या तत्त्वांमुळे त्यांनी स्वत:ला ‘आर्यसमाजी' म्हणून घोषित केले; तथापि त्याच्या ते आहारी गेले नाहीत. अर्यसमाजाच्या गुरुकुलाची स्थापना झाली. पुढे राजाराम कॉलेज आर्यसमाजाकडे चालविण्यासाठी दिले गेले.
बहुजन समाज शिकून शहाणा झाल्याशिवाय त्यांचे दारिद्र, अज्ञान व अंधश्रद्धा नष्ट होणार नाहीत, हे जाणून शाहूंनी शिक्षणाच्या, विशेषतः प्राथमिक शिक्षणाच्या प्रसारावर भर दिला. त्यानुसार त्यांनी आपल्या संस्थानात सक्तीच्या मोफत प्राथमिक शिक्षणाचा कायदा केला आणि तो अमलात आणला. प्रत्येक खेड्यात प्राथमिक शाळा सुरू केली. प्राथमिक शिक्षणावर या संस्थानात होणारा खर्च मोठा होता.
खेड्यापाड्यांतील मुलांना उच्चशिक्षणाची सुविधा मिळावी, म्हणून शाहूंनी कोल्हापुरात मराठा, जैन, लिंगायत, मुस्लीम, सुतार, नाभिक, महार, चांभार-ढोर इ. जातिजमातींसाठी वसतिगृहे स्थापन केली. शिवाय नासिक, पुणे, नगर, नागपूर इ. अन्य ठिकाणी त्यांच्या प्रेरणेने व साहाय्याने अनेक वसतिगृहे सुरू झाली. त्यांच्या या उपक्रमामुळे महाराष्ट्रातील अनेक पिढ्या शिकून तयार झाल्या. मागासलेल्या जातींत शिक्षणाबद्दल फारशी आस्था नसल्याने व त्याचे कारण शिक्षण घेऊनही सरकारी नोकरी लाभण्याची शक्यता नसल्याने शाहूंनी २६ जुलै १९०२ रोजी कोल्हापूर संस्थानातील ५०% शासकीय नोकऱ्या मागासलेल्या वर्गासाठी राखीव ठेवल्याचा जाहीरनामा काढला. राखीव जागांचे धोरण अमलात आणणारे शाहू हे हिंदुस्थानातील पहिले राज्यकर्ते ठरले. अस्पृश्यतेचे उच्चाटन हे शाहूंनी आपले जीवितकर्तव्य मानले. संस्थानातील शाळा, पाणवठे, विहिरी, दवाखाने, कचेऱ्या इ. सार्वजनिक ठिकाणी अस्पृश्यता पाळण्यास त्यांनी कायद्याने प्रतिबंध केला. त्यासाठी अनेक वटहुकूम जारी केले. त्यांनी अस्पृश्यांना सरकारी नोकरीत घेतले. समाजातील तलाठ्यासारख्या प्रतिष्ठेच्या जागा दिल्या. त्यांच्यापैकी अनेकांना माहूत, हूलस्वार, पोलीस, स्वत:चे मोटारचालक म्हणून नेमले. महार-वतन खालसा करून महारांची वेठबिगारीतून आणि गुन्हेगार मानल्या गेलेल्या जातींची ‘हजेरी' पद्धतीतून मुक्तता केली. फासेपारधी, कोरवी, माकडवाले यांसारख्या भटक्या व विमुक्त जातींना जवळ करून त्यांचे जीवन स्थिर केले. त्यांना आपले रक्षक म्हणून नेमले. खेड्यापाड्यांतील बलुतेदारांनाही त्यांच्या बलुतेपद्धतीतून मुक्त करून त्यांना समाजातील सर्व उद्योगधंदे खुले केले. जोगिणी व देवदासी प्रथेस प्रतिबंध करणार कायदा जारी केला. याच सुमारास शाहूंची डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी भेट झाली. बाबासाहेबांच्या मूकनायक या वृत्तपत्रास व पुढे त्यांच्या इंग्लंडमधील उच्चशिक्षणास त्यांनी अर्थसाहाय्य केले. माणगाव व नागपूर येथील अस्पृश्यता निवारण परिषदांत बाबासाहेबांबरोबर सहभागी होऊन अस्पृश्यांना त्यांचा ‘खरा पुढारी' मिळाल्याबद्दल त्यांनी त्यांचा गौरव केला. अस्पृश्यतेबरोबरच जातिभेदाशी शाहूंनी अखेरपर्यंत संघर्ष केला. आंतरजातीय विवाह हा जातिभेदावर रामबाण उपाय वाटून त्यांनी आंतरजातीय विवाहास कायदेशीर मान्यता दिली. स्वत: पुढाकार घेऊन अनेक आंतरजातीय (धनगर-मराठा) विवाह घडवून आणले. तसेच बालविवाहास प्रतिबंध करून नोंदणी विवाहाचा कायदा जारी केला. घटस्फोटास व विधवापुनर्विवाहास कायदेशीर मान्यता दिली. कुटुंबात होणाऱ्या शारीरिक व मानसिक छळांपासून स्त्रीला संरक्षण देणारा कायदाही त्यांनी मंजूर केला. मागासलेल्या वर्गांतील मुलींना व स्त्रियांना मोफत शिक्षणाची सुविधा निर्माण केली. सामाजिक सुधारणांबरोबरच शाहूंनी शेतीस व उद्योगधंद्यांस प्रोत्साहन दिले. अनेक कृषी व औद्योगिक प्रदर्शने भरविली. पन्हाळ्यावर चहा, कॉफी, रबर यांच्या लागवडींचे प्रयोग केले. कृषी उत्पादनासाठी शाहूपुरी, जयसिंगपूर यांसारख्या बाजारपेठा वसविल्या. त्यामुळे कोल्हापूर ही गुळाची बाजारपेठ म्हणून देशात प्रसिद्ध पावली. शाहूंनी कोल्हापुरात कारखानदारीचा पाया रचला. ‘शाहू मिल' ची स्थापना करून आधुनिक वस्त्रोद्योगास त्यांनी चालना दिली. शाहूंनी बांधलेले राधानगरीचे धरण कृषी क्षेत्रात संस्थानचा कायापालट करणार उपक्रम ठरला. संस्थानी मुलखातील हे सर्वांत मोठे धरण बांधून त्यांनी आपले संस्थान सुजलाम्-सुफलाम् करून टाकले. शाहूंनी ‘सहकारी संस्थांचा कायदा' करून सहकारी चळवळीची मुहूर्तमेढ रोवली.
शाहूंनी संगीत, नाट्य, चित्रकला, मल्लविद्या आदी कलांना राजाश्रय देऊन महाराष्ट्रात कलेच्या क्षेत्रात स्पृहणीय कामगिरी केली. अल्दियाखॉं, हैदरबक्षखॉं, भूर्जीखॉं, सुरश्री केसरबाई, गानचंद्रिका अंजनीबाई मालपेकर अशा अनेक गायक-गायिकांनी शाहूंच्या आश्रयाने अखिल भारतीय कीर्ती संपादन केली. त्यांनी अनेक नाटक कंपन्यांना व गुणी कलावंतांना आश्रय दिला. बालगंधर्व व संगीतसूर्य केशवराव भोसले हे थोर कलावंत शहूंनीच महाराष्ट्राला दिले. संगीत व नाट्यकलेच्या जोपासनेसाठी त्यांनी कोल्हापुरात भव्य पॅलेस थिएटर (केशवराव भोसले नाट्यगृह) बांधले. त्याच्या शेजारीच खुल्या नाट्यगृहाचीही सोय केली. शाहूंच्या दरबारात आबालाल रहिमानसारखा महान चित्रकार कलावंत होऊन गेला. बाबूराव पेंटर, दत्तोबा दळवी प्रभृती चित्रकारांना त्यांचे प्रोत्साहन मिळाले. मल्लविद्येच्या प्रांतात शाहूंनी संस्थानासह सर्व देशांतील मल्लांना उदार आश्रय दिला. रोमच्या आखाड्याच्या धर्तीवर कोल्हापुरात कुस्तीचे मैदान बांधले. त्यांच्या कारकीर्दीत कोल्हापूर ही ‘मल्लविद्येची पंढरी' बनली. खुद्द शाहू हे मल्लांचे मल्ल म्हणून प्रसिद्ध होते. यांशिवाय त्यांनी कोल्हापुरात साठमारी हा हत्तीचा खेळ सुरू केला. शिकार तर त्यांचा आवडीचा छंद होता. पट्टीचा शिकारी म्हणून त्यांचा लौकिक होता.
शाहूंच्या सामाजिक कार्याचा गौरव म्हणून कानपूर येथे कुर्मी क्षत्रिय सभेने त्यांना ‘राजर्षी' पदवी बहाल केली (१९१९). त्यांच्या कार्यामुळे दलित-पतितांचा उद्धारक, रयतेचा राजा म्हणून त्यांची प्रतिमा जनसामान्यात निर्माण झाली. या राजाने अज्ञानी बहुजन समाजाला जागृत करण्याचे व्रत अखेरपर्यंत सांभाळले. अखेरच्या दिवसांत द्वितीय चिरंजीव शिवाजी यांच्या अपघाती निधनाने ते खचून गेले.
शाहू महाराज यांचे ६ मे १९२२ रोजी निधन झाले. त्यांच्यानंतर त्यांचे पुत्र राजाराम महाराज कोल्हापूरच्या गादीवर आले.
-- संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
महाभारतातील स्त्रीशक्ती, स्वातंत्र्यवीर सावरकर, योगेश्वर कृष्ण, सीता, दुर्योधन, रामायणातील राजकारण, विनोबा भावे, ज्ञानेश्वरी, अवसेचे चांदणे, कानडा तो विठ्ठलू, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वरांचा प्रतिभाविलास भाग १ आणि २. ज्ञानेश्वरांचा चित्विलासवाद, ज्ञानेश्वरांचा नारायणीयधर्म, पसायदान, समाधीसोहळा, ज्ञानेश्वरांचा भक्तीयोग भाग १ आणि २, अमृतसरिताः संस्कृत साहित्याचा आस्वादक प्रवाह, या त्यांच्या अत्यंत अभ्यासपूर्ण आणि विचारप्रवण ध्वनिफिती आहेत.
ललिता पवार यांच्या व्यक्तिमंत्त्वात एकप्रकारचा नैसर्गिक खानदानी रुबाब असल्यामुळे त्यांच्या आवाजात हुकमी लय आहे आणि चेहर्यावरील विशिष्ट प्रकाराचा भाव असल्यामुळे खानदानी, तडफदार, सोजवळ तसेच प्रेमळ आणि खाष्ट अशा विरोधी भूमिकांही त्या यशस्वीपणे साकार करू शकल्या व त्यामध्ये नैसर्गिकता देकील पहायला मिळली.
Copyright © 2025 | Marathisrushti