जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
केदार शिंदे हा शाहीर साबळे यांचा नातू. त्या मुळे त्याला लहानपणापासून पासूनच कलेची आवड होती. त्यांचा जन्म १६ जानेवारी १९७३ रोजी झाला. त्याने आपल्या कारकिर्दीची सुरुवात 'महाराष्ट्राची लोकधारा' या कार्यक्रमापासून केली. त्यानंतर त्याने भारत जाधव आणि अंकुश चौधरीबरोबर एक एकांकिका केली होती. केदार शिंदे याने व्यावसायिक नाटकांच्या क्षेत्रात 'बॉम्ब-ए-मेरी-जान' या नाटकाने पहिलं पाऊल टाकलं. ह्या नाटकाला फारसं यश मिळाले नाही. पण त्यानंतर आलेल्या त्याच्या जवळजवळ सर्व नाटकांनी व्यावसायिक यश मिळवलं. या नाटकांमध्ये 'आमच्या सारखे आम्हीच', 'मनोमनी', श्रीमंत दामोदरपंत', 'तू तू मी मी', विजय दिनानाथ चव्हाण', 'आता होऊनच जाऊ दे', 'सही रे सही', 'लोच्या झाला रे', 'गोपाला रे गोपाला' ह्यांचा समावेश होतो. त्याने मुख्यतः खळखळून हसवणारी विनोदी नाटकेच केली आहेत. दूरदर्शन मालिका आणि चित्रपट करतानाही त्याने हीच गोष्ट काटेकोरपणे पाळली आहे. त्यामुळे "केदार शिंदे=धमाल कॉमेडी" हे एक समीकरणच बनलंय.नाट्यसुष्ट्रीमध्ये भरघोस यश मिळवल्यानंतर त्याने पुढचं पाऊल टाकलं ते दूरदर्शन मालिकांच्या क्षेत्रात. इथेही त्याने 'हाउसफुल्ल', 'हसा चटकफु', 'श्रीयुत गंगाधर टिपरे', 'जगावेगळी', 'साहेब, बिवी आणि मी', 'घडलंय बिघडलंय' या झी मराठीवरील मालिकांमधून प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन केलं.
त्याचा पहिला चित्रपट 'अगं बाई... अरेच्या' म्हणजे मराठी चित्रपट सुष्ट्रीतील एकप्रकारची क्रांतीच होती. ह्या चित्रपटामध्ये मराठी चित्रपटसुष्ट्रीत पहिल्यांदाच 'आईटेम साँगचा वापर करण्यात आला होता. ह्या गाण्याचं नृत्य-दिग्दर्शन बॉलीवूडमधील प्रसिद्ध नृत्य-दिग्दर्शक फराह खान हिने केलं होतं, तर या गाण्यामध्ये सोनाली बेंद्रे नाचली होती. ह्या चित्रपटाने तुफान यश मिळवलं. ह्यानंतरही केदारने 'जत्रा', 'यंदा कर्तव्य आहे' यासारखे हिट चित्रपट दिले. त्याने २०१० मध्ये हिंदी चित्रपटसुष्ट्रीमध्येही पदार्पण केलं. त्याने तब्बू आणि शर्मन जोशी प्रमुख भूमिकेत असलेला 'तो बात पक्की' या चित्रपटच दिग्दर्शन केलं. परंतु या चित्रपटाला फारसं व्यावसायिक यश मिळाले नाही. केदार शिंदेने दिग्दर्शित केलेल्या गुजराती नाटकाचा शुभारंभ ऑगस्ट मध्ये मुंबईत झाला. 'नाटक ना नाटक नु नाटक' असं या गुजराती नाटकाचे नाव असून 'द प्ले दॅट गोज राँग' या गाजलेल्या अमेरिकन नाटकाचा हा अधिकृत रिमेक आहे. बॉलिवूडस्टार शर्मन जोशीनं या नाटकाची निर्मिती केली आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट
रमेश सहगल जे इश्क पे जोर नहीं (१९७०), समाधी (१९५०) आणि शोला और शबनम (१९६१) साठी प्रसिद्ध होते. रमेश सहगल चित्रपट दिग्दर्शक होते तसेच त्यांनी निर्माता, कथा लेखक, संवाद लेखक आणि पटकथा लेखक म्हणूनही काम केले.
लहानपणी गुलशकुमार वडिलांच्या दुकानावर ज्यूस विक्रीत त्यांना मदत करत होते. त्यांचा जन्म ५ मे १९५१ रोजी झाला. येथूनच त्यांना उद्योगाचे धडे मिळाले आणि त्यातील रस वाढत गेला. ते २३ वर्षांचे असताना त्यांनी कुटुंबियांच्या मदतीने एक दुकान खरेदी केले आणि रेकॉर्डर्स आणि ऑडिओ कॅसेट विक्री सुरु केली. त्यानंतर पुढे त्यांनी नोएडा येथे स्वतःची कंपनी सुरु केली आणि म्युझिक इंडस्ट्रीमध्ये स्वतःची वेगळी छाप निर्माण केली.
गुलशन कुमारांनी त्यांच्या कॅसेट बिझनेसला 'सुपर कॅसेट इंडस्ट्रिज लिमिटेड' हे नाव दिले. याच कंपनीला टी-सीरीज नावानेही ओळखले जाते. गुलशन कुमारांनी ओरिजनल गाणी दुसऱ्या गायकांच्या आवाजात रेकॉर्ड करुन त्या कॅसेट कमी किंमतीत विक्री करण्यास सुरुवात केली होती. त्याचवेळी त्यांनी भक्ती संगीताकडेही मोर्चा वळवला.
देवा-धर्माची गाणी रेकॉर्ड करुन ती त्यांनी प्रसिद्ध केली. काही गाणी ते स्वतः गात होते. ७० च्या दशकात गुलशन कुमार यांच्या कॅसेटची डिमांड वाढत गेली आणि म्यूझिक इंडस्ट्रीमध्ये ते यशस्वी बिझनेसमध्ये गणले जाऊ लागले. ऑडिओ कॅसेट्समध्ये यशस्वी झाल्यानंतर गुलशन कुमार फिल्म इंडस्ट्रीकडे वळले आणि त्यासाठी ते मुंबईला पोहोचले. बॉलिवूडमध्ये बस्तान बसविल्यानंतर ते हिंदू पौराणिक कथांवर आधारित चित्रपट आणि सीरियल्स देखील प्रोड्यूस करु लागले.
फिल्म इंडस्ट्रीमध्ये यशस्वी झाल्यानंतर गुलशन कुमार यांनी त्यांच्या कमाईचा एक हिस्सा सामाजिक कामासाठी देण्यास सुरुवात केली. वैष्णोदेवीचे ते निस्सीम भक्त होते. त्यांनी वैष्णोदेवीच्या भक्तांसाठी भंडारा सुरु केला होता. आजही तो भंडारा अविरत सुरु आहे. या भंडाऱ्याच्या माध्यमातून भक्तांना मोफत भोजन दिले जाते गुलशन कुमार यांनी वैष्णोदेवीची अनेक गाणी गायली आहेत. गुलशन कुमार यांचे १२ ऑगस्ट १९९७ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ:- इंटरनेट
आनंद अभ्यंकर यांचे शालेय शिक्षण नागपूरच्या सरस्वती हायस्कूलमध्ये झाले. शाळा, महाविद्यालयात किंवा गणेशोत्सवात नाटक बसवून त्या माध्यमातून अभ्यंकर यांनी छोट्या-छोट्या नाटकांमधून मराठी रंगभूमीवर प्रवेश केला. महाविद्यालयीन शिक्षणासाठी ते पुण्यात आले. त्यांचा जन्म २ जून १९६३ रोजी झाला. त्यांची रंगभूमीच्या क्षेत्रातील खरी कारकीर्द पुण्याला सुरू झाली. गरवारे महाविद्यालयात त्यांनी वाणिज्य शाखेत पदवी मिळवली. त्यानंतर त्यांनी व्यवस्थापन शास्त्राचेही शिक्षण घेतले. बजाज ऑटोमध्ये काही काळ त्यांनी नोकरी केली. मुंबईत आल्यावर उमेदवारीच्या काळात मोहन जोशी यांच्या साथीने त्यांनी कामासाठी संघर्ष केला.
शिक्षण आणि नोकरीच्या काळात त्यांनी काही नाट्य संस्थांसाठी काम करण्यास सुरुवात केली. ‘कुर्यात सदा टिंगलम्’द्वारे त्यांनी मराठी रंगभूमीवर पदार्पण केले. त्यानंतर भक्ती बर्वे यांच्याबरोबर ‘आई रिटायर होतेय’, आनंद म्हसवेकर लिखित-दिग्दर्शित ‘चॉइस इज युवर्स’ अशा नाटकांमध्ये त्यांनी उल्लेखनीय भूमिका साकारल्या. ‘वादळवाट’, ‘असंभव’, ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’, ‘फू बाई फू’, ‘मला सासू हवी’, ‘शुभंकरोती’, ‘या गोजिरवाण्या घरात’ आणि सह्याद्री वाहिनीवरील गोंदवलेकर महाराजांच्या मालिकेच्या माध्यमातून अभ्यंकर घराघरात पोहोचले. तर ‘वास्तव’, ‘जिस देश में गंगा रहता हैं’, ‘अकलेचे कांदे’, तेरा मेरा साथ रहें, ‘मातीच्या चुली’, ‘चेकमेट’, ‘कुंकू लावते माहेरचं’, ‘ही पोरगी कोणाची’, ‘पप्पू कांट डान्स साला’, ‘आनंदाचे झाड’, ‘आयडियाची कल्पना’, ‘जन्म’, ‘बालगंधर्व’ ,‘स्पंदन’ अशा चित्रपटांतही त्यांनी भूमिका केल्या. आनंद अभ्यंकर यांचे २३ डिसेंबर २०१२ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
मराठी रंगभूमीवरील ज्येष्ठ नाटककार अनंत विष्णू म्हणजेच बाबुराव गोखले यांचा जन्म १५ सप्टेंबर १९१६ रोजी झाला.
बाबुराव गोखले, राजा गोसावी, शरद तळवलकर यांनी गाजवलेलं एव्हरग्रीन अस्सल दर्जेदार विनोदी म्हणजे नाटक ‘करायला गेलो एक’ त्यांचं गाजलेलं नाटक ‘करायला गेलो एक’ म्हणजे मनोरंजनाचा खच्चून भरलेला मसालाच!
नव्या पिढीला बाबूराव गोखले यांची नाटके परिचित नाहीत, पण किमान डझनभर नाटकांनी त्यांनी रसिकांना हसविले. त्यात ‘करायला गेलो एक’ हा एक मास्टरपीसच. ‘अन् झालं भलतच’, ‘रात्र थोडी सोंग फार’, ‘नाटक झाले जन्माचे’, ‘पतंगावरी जीवन माझे’, ‘पाप कुणाचे शाप कुणाला’, ‘ते तसे तर मी अशी’, ‘झालं गेलं गंगेला मिळालं’, ‘खुनाला वाचा फुटली’, ‘संसार पाहावा मोडून’, ‘थांबा-थांबा घोळ आहे’, ‘पुत्रवती भव’, ‘पेल्यातील वादळ…’ त्यातली ही काही नाटके. जी नावापासूनच ‘नाट्य’मय ठरलेली. आता ‘करायला गेलो एक’ हे नाटक १९५५ च्या सुमारास रंगभूमीवर पुण्याच्या ‘श्रीस्टार’तर्फे आणलेलं. याच्या लेखनासोबतच दिग्दर्शन आणि भूमिकाही बाबूरावांनी केलेली.
पहिल्या प्रयोगात शरद तळवलकर, शीला गुप्ते, राजा गोसावी, प्रभाकर मुजुमदार, इंदिरा चिटणीस, इंदू मुजुमदार यांच्या भूमिका होत्या. यातल्या हीरोची म्हणजे हरिभाऊ हर्षेची मध्यवर्ती भूमिका भाऊ बिवलकर यांनी केलेली. ‘नटसम्राट’ नाटकातील विठोबा, ‘भावबंधन’ मध्ये महेश्वपरी, ‘लग्नाची बेडी’तला अवधूत या भूमिका भाऊंनी केलेल्या. पुढे काही प्रयोगांत शरद तळवलकर यांनी पत्रकार शंखनाद व हरिभाऊच्या भूमिका केल्या.
फिल्मस्टार राजा गोसावी यांनीही हरिभाऊची भूमिका केली होती. रवींद्र स्टार्स, श्री स्टार्स या संस्थांतर्फे त्यांनी स्वत:ची व इतर नाटककारांची नाटके रंगभूमीवर आणली. त्यांचा 'वारा फोफावला' हा कवितासंग्रह, 'करायला गेलो एक', ' संसार पाहावा मोडून', 'अन् झालं भलतंच', 'नवरा म्हणून नये आपला', 'रात्र थोडी सोंगे फार' इत्यादी नाटके प्रसिद्ध आहेत.
बाबुराव गोखले यांचे २८ जुलै १९८१ रोजी निधन झाले.
-- संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
चाळीस वर्षांवरील गायकांसाठीच्या झी सारेगमपच्या पर्वाच्या उपविजेत्या अनुजा वर्तक या ठाणे शहराला अभिमान वाटणार्या व्यक्तींमधील एक ! कल्याण गायन समाज येथे पं. वसंतराव गोसावी यांच्याकडे वर्तक यांनी शास्त्रीय संगीताचे प्राथमिक शिक्षण घेतले.
काही काळ नानासाहेबांच्या दरबारात कारकुनी काम केल्यानंतर १८५७ साली त्यांची पेशव्यांचे सेनापती म्हणून निवड करण्यात आली आणि इथून सुरु झाला १८५७ साली नानासाहेब पेशवे, लक्ष्मीबाई यांच्या सोबत इतर सैन्याला सोबती घेऊन त्यांनी इंग्रजांविरुद्ध आघाडी उभारली. त्यांची ही आघाडी इंग्रजांवर जबरदस्तीने बरसली की त्यांनी अल्पावधीतच महत्त्वाची ठाणी इंग्रजांकडून काबीज केली. या कामगिरीमध्ये तात्या टोपेंची लढाऊ वृत्ती निर्णायक ठरली. १८५७ च्या या उठावाचा इतका जबरदस्त परिणाम शेष भारतावर झाला की अनेक ठिकाणी बंडाचे लोण वाऱ्यासारखे पसरले.
ओमप्रकाश भंडारी हे कमर जलालाबादी यांचे मूळ नाव. अमृतसरनजीकचे जलालाबाद हे त्यांचे मूळ गाव.
कमर यांना लहानपणापासूनच कवितेची आवड. लहानपणी त्यांच्या या छंदाला वेडेपणा म्हणून हिणवण्यात आले. मात्र अमर नावाच्या एका शायराने कमर यांच्या शब्दांतील जादू हेरली. त्यांनी कमरच्या काव्यलेखनाला प्रोत्साहन दिले. कमर शिक्षणासाठी लाहोरला गेले. शिक्षण घेत असतानाच पत्रकारितेकडे ओढा वाढला. लाहोरच्या अनेक नियतकालिकांतून त्यांची मुशाफिरी चाले. मात्र चित्रपटांचे वेड आणि आकर्षण स्वस्थ बसू देत नव्हते. त्यातच मनासारखे लिखाण करता यावे, यासाठी त्यांनी स्वत:चे ‘स्टार’ नावाचे चित्रपटविषयक साप्ताहिक सुरू केले. मात्र चित्रपटांबद्दल लिहिण्यापेक्षा चित्रपटांसाठी लिहावे, ही ईर्षा वरचेवर उचंबळून येत होती. चित्रपटाच्या या वेडानेच पुढे त्यांना पुण्यात आणले. दलसुख पांचोली तेव्हा ‘जमीनदार’ नावाच्या चित्रपटात व्यग्र होते. त्यांनी कमरविषयी ऐकले होते. ‘जमीनदार’च्या गीतलेखनाची जबाबदारी त्यांनी कमरवर टाकली. कमरने मग ‘दुनिया मे गरीबों को आराम नहीं मिलता...’ अशा आशयघन गाण्यातून सर्वांना बेचैन केले. या संधीने कमरला चित्रपटसृष्टीचे दरवाजे खुले झाले. कमर या प्रतिभावंताला मग विष्णुपंत दामले-फत्तेलाल-व्ही. शांताराम यांच्या ‘प्रभात फिल्म्स’मध्ये संधी मिळाली.
‘चाँद’ या चित्रपटाचे गीतलेखन त्यांनी केले. ‘चाँद’चे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हुस्नलाल-भगतराम या पहिल्या संगीतकार जोडीने दिलेले संगीत. यातील ‘दो दिलों को ये दुनिया मिलने नहीं देती’, ‘मेरे दिलरुबा आ जा’ आणि ‘ए दिल मुझे रोने दो’ ही कमर यांची गाणी चांगलीच गाजली. नंतर ‘प्रभात’च्या अनेक चित्रपटांसाठी कमर यांनी संवाद, गीतलेखन केले. ‘प्रभात’च्या अस्तानंतर कमर यांचे सूर जुळले ते फेमस स्टुडिओशी. ओघवती शैली, सरळसाधे परंतु काळजाला भिडणारे शब्द, भाव-भावनांना उपमांनी सजवलेला साज व त्यातून सहज लयीत गुंफलेल्या शाब्दिक फुलो-यातून रसिकांच्या हृदयाला घातलेला हात हे कमर जलालाबादी या शायराचे आगळेवेगळे वैशिष्ट्य.
इक दिल के टुकडे हजार हुए, कोई यहाँ गिरा कोई वहाँ गिरा, बहते हुए आँसू रुक न सके, कोई यहाँ गिरा कोई वहाँ गिरा..(प्यार की जीत)मधली प्रेमभंगाची भावना, त्याच चित्रपटातले ओ दूर के जानेवाले वादा न भूल जाना, रोते हुई अंधेरी तुम चांद बन के आना...मधली प्रेमाची भावना हीच तर आहे कमर यांच्या लेखणीची जादू. संगीतकार ओ. पी. नय्यर यांच्याशी कमर यांची वेव्हलेंथ ख-या अर्थाने जुळली होती. पिया पिया न लागे मोरा जिया(फागुन), मैं सोया अंखियाँ मीचे, तेरी जुल्फों के नीचे, इक परदेसी मेरा दिल ले गया (फागुन), छून-छून घुंगरू बोले (पतंगा), छोटा सा बलमा, मैं बंगाली छोकरा, मेरा नाम चिन-चिन चू (हावडा ब्रीज), आइए मेहेरबां बैठिए जानेजां (हावडा ब्रीज), रुक रुक कहा चली दीवानी अशा अनेक माइलस्टोन गीतरचना कमर-ओपी या कॉम्बिनेशनचे प्रत्यंतर देतात. ओपींनंतर कमरचे सूर जुळले ते संगीतकार कल्याणजी-आनंदजी यांच्याशी. डम डम डिगा डिगा, मौसम भीगा भीगा, छलिया मेरा नाम, मेरे टूटे हुअेय दिल से, तेरी राहों में खडे हैं (छलिया), मंै तो एक ख्वाब हूँ, इस ख्वाब से तू प्यार न कर (हिमालय की गोद में), तुम ही मेरे मीत हो (प्यासे पंछी), दीवानों से ये मत पूछो (उपकार) अशी अनेक अवीट गोडीची गाणी या कॉम्बिनेशनने दिली. ‘शहीद भगतसिंग’मध्ये सरफरोशी की तमन्ना... सारखे देशभक्तिपर गीत लिहिणा-या कमर यांनी हमने तेरी जफा का वफा नाम रख दिया (चले हैं ससुराल) असा टोकाचा भावही अनेक गाण्यांतून व्यक्त केला.
पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे आपल्या गीतरूपी चांदण्यातून कमर जलालाबादी यांच्या गाण्यांनी नेहमीच रसिकांच्या मनाला शीतलता दिली. मात्र प्रेमात धोका देणा-यांना खडसावण्यात त्यांच्या लेखणीने कधीच कसूर केली नाही. दोनों ने किया था प्यार मगर, मुझे याद रहा तू भूल गयी (महुआ) अशा कमर म्हणजे चंद्र किंवा पौर्णिमेचा चंद्रमा. चंद्राची शीतलता, चंद्राला ग्रहण लागल्यानंतरचा विरक्त भाव, टिपूर चांदण्यातील प्रेमळ झुळूक आणि अर्थपूर्ण गीतांतून चंद्रप्रकाशाचा हवाहवासा शिडकावा कमर जलालाबादी यांच्या प्रत्येक गीतातून अनुभवाला येतो. ‘कमर’ गीतांच्या चांदण्याने रसिकांच्या मनाचे अंगण नेहमीच चमकत राहील. ‘दिन है सुहाना आज पहली तारीख है, खुश है जमाना आज पहली तारीख है’ हे गाणे अजून ही एक तारीखेला रेडीओ सिलोन लागते. ते गाणे कमर जलालाबादी यांचेच. सुधीर फडके यांच्या संगीताने सजलेल्या आणि किशोरकुमारच्या आवाजाने नटलेल्या या गाण्याचे रसिकांच्या मनात वेगळे स्थान आहे.
रसिकांच्या मनातील भाव-भावनांना सोप्या, आशयसंपन्न शब्दांत गुंफणारा गीतकार हीच कमर जलालाबादी यांची खरीखुरी ओळख होती. कमर जलालाबादी यांचे निधन ९ जानेवारी २००३ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट/ अजय कुलकर्णी
हरहुन्नरी कलावंत आणि घराघरात पोहोचलेल्या ‘चिंटू’ या चित्रमालिकेचे निर्माते प्रभाकर वाडेकर यांचा जन्म ८ ऑगस्ट १९५६ रोजी झाला.
प्रभाकर वाडेकर यांचे शिक्षण नू. म. वि. प्रशाला आणि बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालय येथे झाले. शालेय वयापासून नाटकात काम करणाऱ्या प्रभाकर यांनी महाविद्यालयीन दशेत काळाच्या पुढची नाटके रंगमंचावर सादर करून पुरुषोत्तम करंडक स्पर्धा गाजविली. ‘अर्थ काय बेंबीच्या विश्वचक्री’, ‘मंथन’ आणि ‘ओंडका’ या एकांकिका त्यांनी सादर केल्या. ‘ड्रॉपर्स’ या संस्थेमध्ये अनंत कान्हो कुलकर्णी दिग्दर्शित ‘कोसळे आज इथे देव्हारा अर्थात मेलो मेलो मेलो ड्रामा’ या नाटकात प्रभाकर आणि सुहास कुलकर्णी ही जोडगोळी होती. अरुण काकतकर यांची निर्मिती व दिग्दर्शन असलेल्या ‘म्हातारीचा काळ’नाटकाचे लेखन वाडेकर यांनी केले होते. पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत त्यांना लेखन, अभिनय आणि दिग्दर्शन अशी तिन्ही बक्षिसं एकाच वर्षी मिळाली होती.
चारुहास पंडित यांची चित्रे आणि प्रभाकर वाडेकर यांची कथा यातून साकारणारा चिंटू दैनिक सकाळमधून दररोज भेटीला यायचा. भोपाळ दुर्घटनेच्यावेळी त्यांनी आणि चारूहास पंडित यांनी एक चित्रमालिका वृत्तपत्रामध्ये चालवली. याच वेळी त्यांची जोडी जमली आणि 'चिंटू'ची कल्पना साकार झाली. चिंटू वाचणे ही फक्त लहानग्यांची नाही, तर अनेक मोठ्यांचीही नेहमीची सवय होती. म्हणूनच २१ नोव्हेंबर १९९१ पासून नियमित भेटणारा चिंटू अनेकांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाला होता. मध्ये दोन वर्ष हा चिंटू सकाळमधून लोकसत्तेत गेला होता. पुन्हा तो सकाळमध्ये प्रसिद्ध होऊ लागला. तो कुठेही असला तरी त्याच्यावरील प्रेम तसूभरही कमी झाले नव्हते.
पुढे चिंटू www.chintoo.com या साइटवरून इंटरनेटवर भेटू लागला. तसेच २०१२ मध्ये त्यावर एक सिनेमाही प्रसिद्ध झाला. एक्स्प्रेस वृत्तसमुहात जाहीरात व्यवस्थापक म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते. टिव्ही मालिका, एकांकिंका यांच लेखनही केले. प्रभाकर वाडेकर यांचे १५ जुन २०१३ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- इंटरनेट
गोव्यातील बोरी हे सुभाष भेंडे यांचे गाव. त्यांचे शिक्षण सांगली व पुण्यात झाले होते. त्यांचा जन्म १४ ऑक्टोबर १९३६ रोजी झाला. त्यांनी अर्थशास्त्र विषयात डॉक्टरेट मिळवली होती. ते मुंबईच्या कीर्ती महाविद्यालयात अर्थशास्त्राचे प्राध्यापक होते. गोवा मुक्तिसंग्रामानंतर प्रकाशझोतात आलेल्या साहित्यिकांपैकी ते एक होते. २००३ साली कराड, महाराष्ट्र येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. तसेच वळवयी येथे झालेल्या २१ व्या गोमंतक मराठी साहित्य संमेलनाचेही ते अध्यक्ष होते.
प्रा. सुभाष भेंडे यांनी आपल्या अमेरिकावारीनंतर ’गड्या आपुला गाव बरा’ या शीर्षकाचा एक लेख लिहिला होता. तो महाराष्ट्रातील बारावीच्या पाठ्यपुस्तकासाठी निवडला गेला.
सुभाष भेंडे यांचे २० डिसेंबर २०१० रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट
Copyright © 2025 | Marathisrushti