जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
मराठी लेखक डॉ. राजन गवस यांचा जन्म २१ नोव्हेंबर १९५९ रोजी झाला. राजन गवस यांनी भाऊं पाध्ये यांच्या साहित्यावर पीएच. डी. केलेली आहे. राजन गवस यांनी साधारण ऐंशीच्या दशकात लिहायला सुरुवात केली. कविता, कथा, कादंबरी आणि ललित लेखन अशा मार्गावरून त्यांची लेखणी चालत राहिली. या सा-याच लेखनात राजन गवस यांच्या लेखनाचे तीन पैलू प्रामुख्यानं नजरेत भरतात. त्यांची विश्वजवात्सल्य आणि कारुण्यानं भरलेली आणि भारलेली दृष्टी, निर्णयच नव्हे तर मतही न देता वास्तवाच्या तटस्थ पण कलात्मक दर्शनानं वाचकावर दाखवलेला विश्वा स आणि तिसरं म्हणजे कृषिप्रधान जगण्याकडे एकाच वेळी आतून येणा-या जाणिवेने आणि दूरस्थ तटस्थपणे (क्वचितप्रसंगी आत्मटीकेनेदेखील) पाहण्याची क्षमता. या तीन पैलूंमध्ये उपजतच अंतर्विरोध आहेत, ताण आहेत; पण ते संतुलित करणं हेच राजन गवस यांचं कौशल्य आहे. उदाहरणार्थ, पहिला पैलू कारुण्य आणि विश्ववात्सल्य. म्हणजे गवस आपल्या कथेतल्या वरकरणी खल किंवा चूक वागणार्याल पात्रांचीही टर किंवा खिल्ली उडवत नाहीत, निवेदनकर्त्याला मिळणारा उपजत फायदा घेत अशा पात्रांच्या चुका सव्याज त्यांच्या पदरात टाकत नाहीत. दोनच उदाहरणं घेऊ या. ‘भंडारभोग’ या जोगत्याच्या जीवनावरच्या कादंबरीत सुरुवातीच्या भागात क‘व्वा वगैरे पात्रं अंधश्रद्धेनं अत्यंत अडाणी, चुकीचं आणि अन्याय्य वागत असतानादेखील गवस यांच्यातला निवेदक अशा पात्रांचा उपहास करत नाही.
संपूर्ण तादात्म्यानं आणि सहानुभावानं त्यांचं चित्रण करतो. दुसरं उदाहरण- ‘तणकट’ कादंबरीत गौतम वगैरे पात्रं उघड उघड चुकीच्या मार्गानं आणि अल्पावधीत मोठा लाभ मिळवण्यासाठी गैरमार्गावर जातात, पण गवस यांचा निवेदक कोणतीही बाजू घेत नाही, उलट त्या त्या पात्राला समजून घ्यायचं आवाहनच करतो वाचकाला. हे दुर्मिळ आहे. करुणेबरोबरच आढळणारी ही तटस्थता चकित करणारी आहे. कारण त्यांच्या तथाकथित नायकालादेखील झुकतं माप द्यायचा आक्रस्ताळा उपद्व्याप इथे नाही. शक्यतो मतं बनवण्याचं स्वातंत्र्य वाचकालाच द्यायचं परिपक्व भान दाखवतात गवस. अजून एक अंतर्विरोध म्हणजे कधी राजन गवस यांचा नायक किंवा निवेदक कृषिसंस्कृतीचं प्रतिनिधित्व करतो, तर कधी त्या संस्कृतीपासून दूर गेलेल्या, अपराधगंड बाळगणार्या व्यक्तींचं प्रतिनिधित्व करतो. या दोन्ही भूमिका कित्येकदा एकमेकांविरुद्ध उभ्या असतात, पण गवस यातही आपलं निर्णायक मत लादत नाहीत हे विशेष.
राजन गवस यांनी प्रामुख्याने तीन-चार विषयांवर लिहिलं आहे. सर्वप्रथम म्हणजे ‘देवदासी’ आणि ‘जोगते’ या अनिष्ट रूढींच्या भयावह वास्तवाचं चित्रण. ‘चौंडकं’, ‘भंडारभोग’ या कादंब-या आणि ‘खांडुक’, ‘हुंदका’ यासारख्या कथांमधून ते प्रगटतं. दुसरा विषय म्हणजे गावपातळीवर चालणारं पंचायती, सोसायट्या वगैरेमधलं राजकारण आणि त्याला असलेली जातीयतेची डूब. ‘धिंगाणा’, ‘कळप’, ‘तणकट’ या कादंब-या आणि ‘ठराव’, ‘नवाचं तीन चतुर्थांश’ वगैरे कथांतून हे चित्रण प्रभावीपणे आलं आहे. एकूणच गावगाड्याचं प्रभावी चित्रण इथे दिसतं. तिसरं म्हणजे ग्रामजीवनापासून दुरावलेल्या सुशिक्षित माणसांचा अपराधगंड हे आशयसूत्र त्यांच्या अनेक कथांचा विषय झालं आहे, आणि याचबरोबर आत्मनिर्भर होऊ पाहणारी स्त्री हाही त्यांच्या अनेक कथांचा विषय आहे. ‘रिवणावायली मुंगी’, ‘तळ’, ‘घुसमट’ अशा अनेक कथा स्त्रीकेंद्री आशय व्यक्त करतात. एकूणच, हरवत चाललेली मूल्यं, निसर्ग आणि माणूसपण हे त्यांच्या ललित लेखनचे विषय आहेत. बाईचं जगणं मात्र नेहमीच त्यांच्या लेखनाच्या केंद्रस्थानी आहे.
भालचंद्र नेमाडे, भाऊ पाध्ये आणि रंगनाथ पठारे यांच्या साहित्यावर राजन गवस यांनी बारकाईनं अभ्यास करून समीक्षात्मक लेखन-संपादन केलं आहे. गवस यांच्या साहित्यात मांडणी आणि अभिव्यक्तीवर कळत-नकळतपणे या साहित्यिकांचा प्रभाव पडलेला दिसतोच. विशेषत: ‘चौंडकं’ आणि ‘भंडारभोग’ या सुरुवातीच्या कादंब-यांनंतरच्या लेखनाबाबत हे विशेष जाणवतं. ‘धिंगाणा’ कादंबरीतलं पहिलं वाक्य ‘आमचा बाप मला उपकाराखातर जेवाय घालतो हा त्याचा समज’ असं आहे. ही मानसिकता नेमाडे यांच्या नायकाची वाटते. या कालखंडातल्या गवस यांच्या कादंब-यांवर या परात्म, हताश नायकाने केलेल्या दंभस्फोटांची गडद छाया आहे. या लेखनाला अनुकरण किंवा प्रभाव यापलीकडे जाऊन बघायला हवं. त्यात एका विशिष्ट वाङ्मयीन दृष्टीचा डोळस स्वीकार दिसतो आणि ‘तणकट’च्या निमित्ताने आपली स्वत:ची वाट ओळखण्याचा ठळक प्रयत्नही दिसतो. या दृष्टीनं ‘कळप’ या कादंबरीची अर्पणपत्रिका आवर्जून बघावी अशी आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट/ संजय भास्कर जोशी
दिग्गीराजा अशी ओळख असलेले दिग्विजय सिंह हे जवळजवळ ५० हून अधिक वर्षे भारतीय राजकारणात सक्रिय आहेत.
दिग्विजय सिंह यांचे प्राथमिक शिक्षण डेली कॉलेज इंदूर येथून झाले. यानंतर, श्री गोविंदराम यांनी इंदूरच्या सेसरिया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स येथून त्यांनी अभियांत्रिकी पदवी घेतली.
गोविंद मोरेश्वर पेंडसे उर्फ आप्पा पेंडसे यांचा जन्म १७ नोव्हेंबर १९१० रोजी बडोद्याजवळील व्यास गावी झाला.
आप्पा पेंडसे यांचा जन्म बडोद्यात झाला असल्याने गुजराती भाषेतून त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले. घरातील आर्थिक अडचणीमुळे त्यांना नोकरीच्या शोधात ते मुंबईला आले. मुंबईत आल्यावर त्यांनी वृत्तपत्रसृष्टीत प्रवेश केला. ‘विविधवृत्त’, सिनेसाप्ताहिक तारकांमध्ये उपसंपादक, संपादक अशी कामे त्यांनी केली. त्याचबरोबर निर्माते दादासाहेब तोरणे, बाबूराव पै, पांडुरंग नाईक, मास्टर विनायक, बाबूराव पेंढारकर यांसारख्या नामवंत कलाकारांच्या प्रदीर्घ मुलाखती घेतल्या व त्या प्रसिद्ध केल्या. नर्मविनोदी आणि तिरकस शैलीने त्यांनी विविधवृत्त साप्ताहिकातून चित्रपटांची परीक्षणे लिहिली. त्यांच्या लेखणीने चित्रपटांच्या परीक्षणात एक स्वतंत्र ठसा उमटला होता. त्यांची परीक्षणे त्या काळात खूपच गाजली होती. पुढे त्यांनी लोकसत्तामधून ‘एक्स्प्रेस टॉवर’वरून आणि महाराष्ट्र टाईम्समधून ‘हजरत सलाम घ्यावा’ अशा लोकप्रिय लेखमाला लिहिल्या.
आप्पा पेंडसे १९५८ सालात मुंबई महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून गेले. तसेच मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, मुंबई मराठी पत्रकार संघ यांच्या जडणघडणीत त्यांचा फार मोठा वाटा होता. बाबूराव पै यांच्या ‘चूल आणि मूल’ या चित्रपटात ते नायक म्हणून चमकले. तसेच ‘झंझावात’ आणि ‘जन्माची गाठ’ या चित्रपटांतही ते प्रमुख भूमिकेत होते.
आप्पा पेंडसे यांनी मुंबई दूरदर्शनवरून दादा साळवी, वनमाला, स्नेहप्रभा प्रधान इत्यादी चित्रपट कलावंताच्या मुलाखती घेतल्या. त्या प्रेक्षकांच्या दीर्घकाळ स्मरणात राहिल्या होत्या.
आप्पा पेंडसे यांचे २६ जून १९८० रोजी निधन झाले.
-- संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट/द.भा. सामंत/विवेक चरित्रकोश
पुणे.
मास्टर अविनाश उर्फ गणपतराव मोहिते यांचे शालेय शिक्षण मिरज येथेच इयत्ता पहिलीपर्यंत झाले. त्यांचा जन्म १ जानेवारी १९०९ मिरज येथे झाला. वडील लक्ष्मणरावांना संगीताची आवड होती. संगीताचे भीष्माचार्य बाळकृष्णबुवा इचलकरंजीकरांकडे ते थोडीफार गायकी शिकले होते. गणपतरावांना २ भाऊ आणि ५ बहिणी. मोठा बळवंत हा बळवंतराव मराठे यांच्या ‘हिंदी नाटक मंडळीत’ बालनट होता. मधला शंकर हा जनुभाऊ निमकरांच्या ‘स्वदेश हितचिंतक मंडळीत होता. पुढे लक्ष्मणरावांनी शंकर आणि गणूला संगीतसूर्य केशवराव भोसले यांच्या ‘ललितकलादर्श’मध्ये दाखल केले. ललितकलादर्शच्या ‘शापसंभ्रम’ मध्ये गणूने महाश्वेताच्या मैत्रिणीचे काम केले. मराठी संगीत रंगभूमीची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या किर्लोस्कर संगीत मंडळीतील दीनानाथ मंगेशकर, चिंतामणराव कोल्हटकर आणि कृष्णराव कोल्हापुरे यांनी ‘किर्लोस्कर’मधून बाहेर पडून नवीन नाटय़संस्था काढण्याचे ठरविले. १८ जानेवारी १९१८ रोजी बोरिवली येथे या नवीन ‘बलवंत संगीत मंडळी’ची स्थापना झाली. या तीन प्रमुख कलाकारांबरोबरच अन्य कलाकारांचीही संस्थेला आवश्यकता होती.
शंकर आणि गणू या बालनटांची कीर्ती ऐकून कृष्णराव कोल्हापुरे यांनी त्यांना ‘बलवंत’मध्ये आणले. ज्या बलवंत संगीत मंडळीने गणूचे आयुष्यच बदलून टाकले, उजळून टाकले त्या कंपनीत गणू वयाच्या दहाव्या वर्षीच दाखल झाला.
नाटय़ाचार्य अण्णासाहेब (बळवंत) किर्लोस्कर आणि लोकमान्य टिळक यांच्या नावाचा सार्थ अभिमान बाळगणारी बलवंत कंपनी राष्ट्रकार्यातही अग्रेसर होती. कंपनीच्या स्थापनेनंतर लगेचच लोकमान्य टिळकांच्या होमरूल चळवळीच्या फंडासाठी आयोजित केलेल्या ‘पुण्यप्रभाव’ या नाटकाच्या प्रयोगाला स्वत: लोकमान्य टिळक हजर होते. या नाटकात युवराजाची भूमिका करताना गणूच्या ‘भुलूनिया खलजनालापा’ ‘दुर्दैवे हेतू झाला’ ‘अंतरि खेद भरे’ या पदांना आणि भूमिकेला श्रोत्यांची भरपूर दाद मिळाली. पदांना ‘वन्समोअर’ मिळाले. मध्यंतरात लोकमान्यांनी गणूचे विशेष कौतुक करताना म्हटले,‘युवराजाची सुंदर भूमिका करणऱ्या या मुलाचे कौतुक करावेसे वाटते. याला काहीतरी द्यायला हवे. पण मी हा असा! काय देऊ या मुलाला?’
टिळक असे म्हणताहेत तोच त्यांच्या शेजारच्या खुर्चीवर बसलेल्या गृहस्थांनी आपली सोन्याची अंगठी काढून टिळकांच्या हातात दिली. ‘‘या सद्गृहस्थांनी दिलेली ही अंगठी मी या मुलाला बक्षीस देतो,’’ असे म्हणून टिळकांनी ती अंगठी गणूच्या बोटात घातली.
पुढे १९३१ मध्ये झालेल्या बलवंतच्या स्वातंत्र्यवीर सावरकरलिखित ‘संगीत संन्यस्त खड्ग’ या नाटकाच्या वेळीही नलिनीच्या अप्रतिम भूमिकेबद्दल स्वातंत्र्यवीरांनी त्यांचे कौतुक केले. शासकीय पुरस्कारांकडून सदैव उपेक्षित राहिलेल्या गणपतरावांना लोकमान्य आणि स्वातंत्र्यवीरांनी केलेले हे कौतुक कोणत्याही पुरस्कारापेक्षा मोठे वाटत असे.
१९१८ ते १९४० या बलवंत कंपनीच्या कार्यकाळात गणपतरावांनी कंपनीचे मुख्य कलाकार दीनानाथ मंगेशकर, चिंतामणराव कोल्हटकर, कृष्णराव कोल्हापुरे यांच्याबरोबर प्रामुख्याने स्त्री भूमिका केल्या. शारदा, उग्रमंगल, भावबंधन, राजसंन्यास, संन्यस्त खड्ग, ब्रह्मकुमारी इ. नाटकातील त्यांच्या भूमिका रसिकांना पसंत पडल्या. दीनानाथांच्या सहवासात आणि त्यांच्याकडून मिळालेल्या संगीत शिक्षणाने गणपतरावांची कला बहरली. बलवंत कंपनीच्या मालकांनी कपंनी बंद करून ‘बलवंत पिक्चर्स’ ही चित्रपटनिर्मिती संस्था काढली. दीनानाथांचा प्रयत्न यशस्वी झाला नाही तरी ‘कृष्णार्जुन युद्ध’, ‘ठकीचं लग्न’, ‘भक्त पुंडलिक’, ‘अंधेरी दुनिया’ या चित्रपटातील गणपतरावांच्या भूमिका रसिकांना भावल्या. यातील काही चित्रपटांना त्यांनी संगीतही दिले. दीनानाथांच्या अकाली निधनानंतर त्यांनी मो. ग. रांगणेकराच्या ‘आशीर्वाद’, ‘कुलवधू’ इ. नाटकात प्रमुख भूमिका केल्या. अत्रे पिक्चर्सच्या ‘पायाची दासी’ या चित्रपटाच्या वेळी आचार्य अत्रे यांनी त्यांना ‘मा.अविनाश’ हे नाव दिले आणि तेच पुढे रूढ झाले. मास्टर अविनाश यांचे मंगेशकर कुटूंबियांशी त्यांचे घनिष्ठ सबंध होते. दिनानाथ मंगेशकरांच्या पडत्या काळात त्यांनीच हात दिला. दीनानाथांनंतर ह्रदयनाथ, लतादीदींना त्यांनी आपल्या अंगाखांद्यावर खेळवलं. दीनानाथांचेही गणपतराव हे प्रिय शिष्य सहकारी होते. १९४२ साली दीनानाथांच्या निधनाच्या वेळी गणपतराव पुण्यात नव्हते. दीनानाथांनी मृत्यूपूर्वी आपल्या या प्रिय शिष्याची आठवण काढताना,
‘इतुके कळवि आजि माझ्या गुरुला’
‘मरताही भय नाही शिवले कचाला’
या विद्याहरण नाटकातील पदात थोडा पदल करून
‘इतुके कळवि आजि माझ्या गणूला
मरताही भय नाही शिवले दिनाला’
असा निरोप गणूसाठी ठेवला.
संगीत आणि नाटय़क्षेत्रातून अकाली, अकारण निवृत्ती घेतलेल्या गणपतरावांनी १९५३-५७ मध्ये तळेगाव दाभाडे येथे ‘अशोक सहकारी शेतकरी संघा’च्या माध्यमातून सामुदायिक शेतीचा प्रयोग केला. त्यानंतर मात्र सांगली येथे जाऊन वानप्रस्थ जीवन ते व्यतीत करू लागले. सांगलीकरांनी त्यांचा योग्य तो सन्मान करताना ‘‘विष्णुदास भावे पुरस्कार’, ‘सांगली भूषण’ हे पुरस्कार त्यांना दिले. तरी शासकीय सन्मान त्यांच्या योग्यतेनुसार मिळणे आवश्यक होते ते त्यांना मिळाले नाहीत. शासनदरबारी त्यांची उपेक्षा झाली हे शल्य त्यांच्या मित्रपरिवाराला आणि चाहत्यांना अस्वस्थ करणारे आहे. मास्टर अविनाश हे संगीत आणि नाटय़क्षेत्राचा चालताबोलता इतिहास आणि शतकाचा साक्षीदार होते. मास्टर अविनाश यांचे निधन ३ एप्रिल २००९ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट/ डॉ. रवींद्र घांगुर्डे
व्यक्तिवेध : एम. एल. टहलियानी
शुक्रवार, ७ मे २०१०
२६/११ चा खटला हा कसाबमुळे जसा लक्षात राहणार आहे तसाच तो, हा खटला चालविणारे विशेष न्यायालयाचे निर्भीड न्यायाधीश एम. एल. अर्थात मदन लक्ष्मणदास टहलियानी यांच्यामुळेही लक्षात राहणार आहे. खटल्याच्या निकालपत्रावर टहलियानी यांची खास छाप पाहायला मिळते. विशेषत: दोन महत्त्वाच्या बाबींमध्ये. अनलॉफुल अॅक्टिविटीज अॅक्टच्या कलम१६ अन्वयेदेखील कसाबला मृत्युदंडाची शिक्षा होऊ शकते, असा युक्तिवाद करण्यास विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम विसरले होते. हा मुद्दा स्वत टहलियानी यांनी लक्षात आणून दिला. केवळ युक्तिवादावर निर्णय न देता, कायद्याचा सारासार विचार करून निर्णय देणारा न्यायाधीश आदर्श मानला जातो. शिवाय कंदहार प्रकरणाचा उल्लेखही न्यायाधीश टहलियानी यांनी केला. त्या वेळेस मौलाना मसूद याला दहशतवाद्यांच्या ताब्यात देऊन त्यांनी ओलीस ठेवलेल्या देशवासीयांची सुटका करावी लागली होती. कसाबला फाशी दिल्यास अशा प्रकारच्या मानहानीकारक प्रसंगाला देशाला भविष्यात सामोरे जावे लागणार नाही; अर्थात त्याला फाशी देण्याशिवाय पर्याय नाही, असा महत्त्वपूर्ण उल्लेख टहलियानी यांनी केला. या दोन्ही महत्त्वाच्या बाबींच्या निमित्ताने टहलियानी यांनी आदर्शाचा एक नवा पायंडाच न्यायदानाच्या क्षेत्रात घालून दिला आहे. टहलियानी यांचे घराणे मूळचे राजस्थानातील. रोजगाराच्या निमित्ताने महाराष्ट्रात आल्यानंतर चंद्रपूर जिल्ह्य़ातील मूल येथे ते स्थायिक झाले. न्या. टहलियानी यांचा जन्म मात्र राजस्थानातला. नागपूर येथे इयत्ता दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करून नागपूर विद्यापीठातूनच त्यांनी कायद्याची पदवी संपादन केली. गोंदिया येथे वकिलीची एक वर्षांची उमेदवारी केल्यावर ते चंद्रपूरला गेले. नामवंत वकील दादासाहेब देशकर यांच्या हाताखाली त्यांनी वकिलीचे धडे गिरवले. गडचिरोली, वडसा, सिरोंचा इत्यादी ठिकाणी सरकारी वकील म्हणून त्यांनी काम पाहिले. नंतर मुंबईमध्ये महानगर दंडाधिकारी म्हणून त्यांनी काम पाहिले. वांद्रे न्यायालयापासून त्यांनी सुरुवात केली. अतिरिक्त प्रधान न्यायाधीश म्हणून काम करत असतानाच कसाबच्या खटल्यासाठी विशेष न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून त्यांची नेमणूक झाली. यापूर्वी सीबीआयचे अनेक खटले त्यांच्यासमोर चालले. त्याचप्रमाणे कॅसेटकिंग गुलशन कुमार हत्या आणि कामगार नेते दत्ता सामंत हत्या या खटल्यांचीही सुनावणी न्या. टहलियानी यांच्यासमोर झालेली आहे. तपासात ढिलाई दाखविलेली असेल तर पोलिसांवर बरसणारे टहलियानी यापूर्वी अनेकांनी पाहिले आहेत. किंबहुना पोलिसांना धारेवर धरणारे न्यायाधीश म्हणूनच ते अधिक प्रसिद्ध आहेत. सध्याच्या जगात न्यायाधीशांनीही ‘अपडेट’ होण्याची गरज आहे. बदलत्या काळासोबत नव्या बाबी शिकत, कायद्याचा सारासार विचार करून निवाडा करेल तोच उत्तम न्यायाधीश, असे विधान अलीकडेच भारताच्या सरन्यायाधीशांनी केले होते. ही व्याख्या त्यांनी न्या. टहलियानी यांच्याकडे पाहूनच केली असावी! तांत्रिक बाबी आल्या की सहसा न्यायालयीन अधिकारी गोंधळून जातात मात्र न्या. टहलियानी यांच्यासमोर अशा बाबी येतात तेव्हा, ‘गृहपाठ’ व्यवस्थित केलेला नसेल तर समोरच्या अधिकाऱ्याची ‘शाळा’च घेतली जाते. याचा प्रत्यय तर कसाबच्या या खटल्यामध्येही सर्वाना आला. दहशतवाद्यांशी संपर्क साधण्यासाठी व्हीओआयपी या अद्ययावत यंत्रणेचा वापर करण्यात आला होता. त्या वेळेस समोर आलेल्या साक्षीदारापेक्षाही अधिक ज्ञान त्या संदर्भात त्यांनाच होते. त्याचप्रमाणे सायबर क्राइम सेलचे अधिकारी साक्षीसाठी आले, त्याही वेळी याचा प्रत्यय आला. ई-मेल हॅकिंग कसे घडते, याबाबतची माहिती तुम्ही कशी शोधली, अशी विचारणा टहलियानी यांनी केली. त्यावर अशा प्रकारचा शोध घेणाऱ्या अनेक वेबसाइटस् उपलब्ध आहेत, असे मोघम उत्तर त्या अधिकाऱ्याने दिले; मात्र त्यानंतरच्या संवादातही त्यांनाच अधिक विश्वासार्ह माहिती असल्याचे स्पष्ट झाले. न्यायालयातही अनेकदा त्यांनी सांगितले आहे की, कोणतीही पाश्र्वभूमी नसताना मी स्वतच कोणाचीही मदत न घेता संगणक- इंटरनेट आदी सारे शिकलो आहे. फक्त शिकलो असेच नव्हे तर ते वापरतोही. शिवाय आजही रोज काही तरी शिकत असतो.. सकाळी मरिन ड्राइव्हवर मॉर्निग वॉक, शक्य झाल्यास रात्रीही एक फेरी मारायला त्यांना आवडते. एरवी कामाच्या बाबतीत कडक शिस्तीचे न्यायाधीश म्ङणून ते ओळखले जातात. या कडक शिस्तीचा त्रासही काही वेळा त्यांच्या कर्मचाऱ्यांना होतो. मात्र कामे वेळच्या वेळीच व्हायला हवीत, असा त्यांचा कटाक्ष असतो. याच खटल्यात अगदी सुरुवातीच्या काळात काही बाबी वेळच्या वेळी न झाल्याने त्यांनी कर्मचाऱ्यांना धारेवर धरले होते. मात्र नंतर कर्मचाऱ्यांनी खासगीत त्यांची भेट घेऊन कामे व्यवस्थित करण्याचे त्यांना आश्वासन दिले आणि जाहीरपणे न्यायालयात सुनावणे टाळावे, अशी त्यांना विनंती केली. ती त्यांनी मोठय़ा मनाने मान्यही केली. त्यानंतर न्यायालयात कर्मचाऱ्यांना अशा प्रसंगास कधीच सामोरे जावे लागले नाही. माणूस म्हणूनही ते आपल्या सहकाऱ्यांची चांगली काळजी घेतात, असा अनुभव आहे. त्याचप्रमाणे चांगले वरिष्ठ असतील, तर कर्मचारीही स्वतमध्ये चांगले बदल घडवून आणतात हे कर्मचाऱ्यांनीही दाखवून दिले. कर्तव्यकठोर अशी त्यांची प्रतिमा असली तरीही दुसऱ्या बाजूस ते पर्यावरणप्रेमी म्हणूनही सर्वाना चांगले परिचित आहेत. वृक्षवेलींत ते रमतात. झाडांची निगा राखणे हा त्यांचा आवडता छंद आहे. म्हणूनच तर त्यांनी आर्थर रोड कारागृहाच्या आवारातच असलेल्या विशेष न्यायालयाच्या मागच्या बाजूस झाडे लावली असून तिथे भेंडी व इतर काही भाज्यांचीही लागवड केली आहे. त्यांचे हे पर्यावरणप्रेमही त्यांच्या कर्तव्यकठोरतेइतकेच लक्षात राहते. याशिवाय अनेक गोष्टींतून त्यांची कामाप्रती असलेली निष्ठा या खटल्यादरम्यान अनेकांच्या लक्षात आली. सार्वजनिक बांधकाम विभागाने याच ठिकाणी आर्थर रोडमध्ये असलेले न्यायालय सुसज्ज करण्याचा निर्णय घेतला तेव्हा, अगदी सुरुवातीपासून म्हणजे त्याचे डिझाइन कसे असावे इथपासून ते पार त्याला अंतिम रूप प्राप्त होईपर्यंत दररोज स्वत ते प्रत्यक्ष ठिकाणी येऊन कामावर लक्ष ठेवत. वास्तविक ते काम इतर कोणाच्याही हाती सोपवणे त्यांना सहज शक्य होते. मात्र हा खटला लवकर सुरू व्हावा आणि लवकरात लवकर तो निकालातही निघावा, असा त्यांचा कटाक्ष होता. त्यामुळे त्यांनी कधीही, सुनावणीदरम्यानदेखील, वेळ वाया जाऊ दिला नाही. वेळ वाया जातो आहे, असे एकदोनदा लक्षात आले तेव्हा त्यांनी अभियोग पक्ष आणि आरोपींचे वकील दोघांनाही कडक शब्दांत तंबी दिली होती. त्यांना सिंधी उत्तम येते. घरी संभाषणाची भाषा सिंधीच. त्यांचे उर्दूचे ज्ञानही उत्तम आहे. कसाबशी संवाद साधणे त्यामुळेच त्यांना सोपे जात असे. .आणि अनेक वर्षे महाराष्ट्रातच गेल्याने त्यांचे मराठीचे ज्ञानही तेवढेच उत्तम आहे. सुनावणीदरम्यान क्षीरसागर नावाच्या अधिकाऱ्याने साक्ष देताना आपले नाव ‘शीरसागर’ असे सांगितले, तेव्हा त्यांनी त्याला पुन्हा विचारले, ‘तुमचे नाव क्षीरसागर की, शीरसागर?’ त्यावर त्याने ‘शीरसागर’ असे सांगितल्यानंतर त्यांनी त्याला ‘क्षीरसागर’चा अर्थ समजावून सांगितला! त्यांच्या उत्तम मराठीचा प्रत्ययही असाच वेळोवेळी खटल्यादरम्यान उपस्थितांना अनुभवता आला. वर्तमानपत्रांचे वाचन हाही त्यांचा आवडता छंद आहे. रात्री ते विदेशी वर्तमानपत्रांच्या वेबसाइटस् आवर्जून पाहतात. खटला पारदर्शीपणे जगासमोर जाईल आणि त्या माध्यमातून भारतीय न्यायव्यवस्थेची निष्पक्ष व स्वच्छ प्रतिमाही जगासमोर जाईल, असे त्यांनी कटाक्षाने पाहिले, ही भारतीय नागरिक म्हणून आपल्या सर्वासाठी अभिमानास्पद बाब आहे!
दादा चांदेकर या नावाने प्रसिद्ध असलेले मराठी संगीत दिग्दर्शक. त्यांचा जन्म १९ मार्च १८९७ रोजी कोल्हापूर येथे झाला. त्यांचे वडील मिरजेच्या राजेसाहेबांकडे संगीतकार म्हणून नोकरीस होते. लहानपणीच ते वडिलांकडून पेटीवादन शिकले. पुढे दादांनी मिरजेतील प्रसिद्ध संगीतशिक्षक नीलकंठबुवा जंगम यांचे शिष्यत्व पत्करले. वयाच्या बाराव्या वर्षीच ते कीर्तनात साथ देऊ लागले. १९१४ मध्ये त्यांनी किर्लोस्कर कंपनीत प्रवेश केला. त्यानंतर बलवंत संगीत मंडळी, विश्वनाथ संगीत मंडळी, इ. नाट्यसंस्थांत त्यांनी साथीदार म्हणून उत्कृष्ट कार्य केले. ते १५ वर्षे नाट्यसृष्टीत होते. १९३१ नंतर दादांनी साताऱ्याला संगीतशिक्षक म्हणून २-३ वर्षे शिकविण्या केल्या. नंतर कोल्हापूर सिनेटोनमध्ये त्यांची ऑर्गनिस्ट म्हणून नियुक्ती झाली. १९३५ साली भालजी पेंढारकरदिग्दर्शित कालियामर्दन या चित्रपटात संगीत दिग्दर्शक म्हणून त्यांना पहिली संधी मिळाली. १९३७ मधील प्रिन्स शिवाजी प्रॉडक्शन्सच्या स्वराज्य सीमेवर या यशस्वी ऐतिहासिक चित्रपटाचे संगीतही दादांचेच होते; परंतु त्यांचे खरे नाव झाले ते हंस पिक्चर्सच्या मा. विनायकदिग्दर्शित ब्रह्यचारी या अत्यंत यशस्वी चित्रपटामुळे. या चित्रपटातील दादांची सर्व गाणी लोकप्रिय झाली. 'यमुना जळी खेळू खेळ कन्हैय्या' या मीनाक्षीने गायिलेल्या गाण्याने तर त्या काळी (१९३८) चित्रपट-रसिकांना वेडच लावले होते. यानंतर दादांनी लपंडाव, अर्धांगी, मोरूची मावशी, ब्रह्मघोटाळा, छाया, अमृत, सासरमाहेर इ. चाळिसांहून अधिक चित्रपटांना संगीत दिले. त्यांत बहुतेक मराठी व काही हिंदी चित्रपटही होते. 'नटली चैत्राची नवलाई' हे पहिली मंगळागौरमधील लता मंगेशकरने गायिलेले त्यांचे आणखी एक लोकप्रिय गीत; परंतु ज्या जयमल्हार (१९४७) चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीत लावणीप्रधान चित्रपटांचा पाया घातला, त्या चित्रपटातील अस्सल लावणी ढंगाचे संगीतही दादा चांदेकरांचेच होते.
काळे गोरे, ब्रह्मचारी, अशी रंगली रात्र पैजेची, जीव सरला पीळ उरला आदी नाटकांचे संगीतनियोजन त्यांनीच केले. ते उत्तम हार्मोनियमवादक होते. पुणे आकाशवाणीवर संगीतदिग्दर्शक आणि संगीतपरीक्षक म्हणून बरेच दिवस त्यांनी काम केले. मा.दादा चांदेकर यांचे २७ जानेवारी १९७६ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.मराठी विश्वकोश
जन्म. १४ ऑक्टोबर १९३६
गोव्यातील बोरी हे सुभाष भेंडे यांचे गाव. त्यांचे शिक्षण सांगली व पुण्यात झाले होते. त्यांनी अर्थशास्त्र विषयात डॉक्टरेट मिळवली होती. ते मुंबईच्या कीर्ती महाविद्यालयात अर्थशास्त्राचे प्राध्यापक होते. गोवा मुक्तिसंग्रामानंतर प्रकाशझोतात आलेल्या साहित्यिकांपैकी ते एक होते.
२००३ साली कराड, महाराष्ट्र येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. तसेच वळवयी येथे झालेल्या २१ व्या गोमंतक मराठी साहित्य संमेलनाचेही ते अध्यक्ष होते.
प्रा. सुभाष भेंडे यांनी आपल्या अमेरिकावारीनंतर ’गड्या आपुला गाव बरा’ या शीर्षकाचा एक लेख लिहिला होता. तो महाराष्ट्रातील बारावीच्या पाठ्यपुस्तकासाठी निवडला गेला.
सुभाष भेंडे यांचे २० डिसेंबर २०१० रोजी निधन झाले.
प्रभाकर पणशीकर उर्फ पंत यांचे नाव उच्चारताच डोळयांसमोर अनेक व्यक्तिरेखा उभ्या राहतात. त्यांचा जन्म १४ मार्च १९३१ रोजी झाला. लखोबा लोखंडे, औरंगजेब, प्रो. विद्यानंद अशा कितीतरी भूमिका पंतांनी आपल्या अभिनय सामर्थ्याने अजरामर करून ठेवल्या आहेत. प्रल्हाद केशव अत्रेलिखित 'तो मी नव्हेच' ह्या नाटकात साकार केलेल्या पाच वेगवेगळ्या भूमिकांमुळे मा.प्रभाकर पणशीकर हे महाराष्ट्रात प्रसिद्ध झाले. 'इथे ओशाळला मृत्यू' ह्या संभाजीराजांच्या मृत्यूवरील आधारित नाटकातील औरंगजेबाची भूमिकादेखील पंतानी अजरामर केली. जवळजवळ ५० वर्षे मा.प्रभाकर पणशीकर यांनी रंगभूमीची इमाने-इतबारे सेवा केली.
घरच्यांचा विरोध पत्करूनही पंत या क्षेत्रात उतरले होते. 'हा तोंडाला रंग फासून घरच्यांच्या तोंडाला काळं फासतो', असा घरच्यांनी आरोप करूनही पंतांचे चित्त विचलीत झाले नाही. सुरुवातीला मो. ग. रांगणेकर यांच्या 'नाटयनिकेतन' संस्थेत पंत पडेल ते काम करत राहिले. एखाद्या कलाकाराच्या गैरहजेरीत पंतांना त्या कलाकाराची भूमिका करणे भाग पडायचे. पण ह्या भूमिका अगदीच नगण्य होत्या आणि त्यामुळे त्या भूमिका करणारे प्रभाकर पणशीकर लोकांच्या लक्षात राहणे शक्यच नव्हते. तरीही पोटापाण्याकरता पंत पडेल ते काम करत राहिले. 'राणीचा बाग', 'कुलवधू' यांसारख्या नाटकांतून भूमिका केल्यावर मात्र पणशीकर नाटयनिकेतन मध्ये चांगलेच स्थिरावले. 'तो मी नव्हेच' हे आचार्य अत्रे लिखित नाटक जेव्हा नाटयनिकेतन संस्थेतर्फे करायचे ठरले.
तेव्हा नाटकातील प्रमुख भूमिका करणारा नट हा संस्थेतला असावा म्हणजे तो आपल्या आवाक्यात राहील, अशा धोरणी भूमिकेतून पणशीकरांनीच ही भूमिका करावी असा रांगणेकरांनी हट्ट धरला. आचार्य अत्रेंना सुरुवातीला हा निर्णय मान्य नव्हता. पण रांगणेकरांच्या हट्टापुढे अत्रेंचे काही चालले नाही आणि ती भूमिका पणशीकरांना मिळाली. नंतर मात्र 'तो मी नव्हेच' मधला खलनायकी लखोबा लोखंडे पणशीकरांनी असा काही रंगवला की, लखोबा लोखंडे आणि पणशीकर यांचे घट्ट नातेच बनले. प्रभाकर पणशीकरांशिवाय 'तो मी नव्हेच' या नाटकाचा विचार करणे त्या काळीही कोणाला शक्य झाले नाही. 'तो मी नव्हेच'चा फिरता रंगमंच ही पंतांची कल्पना. भूतकाळातील कोणतीही घटना ते इतक्या तपशिलवार सांगत की जणू त्या घटना कालपरवाच घडल्या असाव्यात.
बरोबरीच्या लोकांना सोबत घेऊन पुढे जाणारे अशी पंतांची ख्याती होती. नाटकांच्या निमित्ताने त्यांनी अख्खा महाराष्ट्र पालथा घातला होता. वसंत कानेटकरांचं 'इथे ओशाळला मृत्यू' हे नाटक त्यांनी संभाजीला न्याय मिळावा याकरता लिहिलं. पण प्रत्यक्षात जेव्हा ते रंगभूमीवर उभं राहिलं तेव्हा मात्र नाटकाचा पूर्ण प्रकाशझोत औरंगजेबाच्या भूमिकेतील पंतांवर स्थिरावला. संभाजीपेक्षाही त्या नाटकात औरंगजेब प्रभावी ठरू लागला. याविषयी त्यांना विचारताच ते म्हणत की, औरंगजेबाची भूमिका करताना त्या भूमिकेचा प्रत्येक पैलू समजून घेऊन तो लोकांसमोर यावा याकरता मी प्रयत्न केला होता. 'अश्रूंची झाली फुले' या नाटकातील प्रो. विद्यानंद पणशीकरांनी खूपच सुंदर साकार केला होता. ज्या काळी नाटकांचे दौरे करणं आजच्याइतकी सुखाची बाब नव्हती तेव्हापासून आत्तापर्यंत पंतांनी 'अश्रूंची झाली फुले' या नाटकाचे तब्बल ११११ प्रयोग केले आहेत. प्रा. विद्यानंद याची मानसिक द्विधावस्था खूप चांगल्या प्रकारे सादर केली होती. तसेच 'कटयार काळजात घुसली'च्या निमित्ताने संगीत नाटकाचं पुनरुज्जीवन हेही पंतांचं रंगभूमीला दिलेलं कॉन्ट्रीब्युशन.
'तो मी नव्हेच'च्या अभूतपूर्व यशानंतर पणशीकरांनी मोहन वाघ आणि वासुदेव कोल्हटकर यांच्या साथीने 'नाटयसंपदा' ही नाटय संस्था स्थापन केली. 'अश्रूंची झाली फुले', 'कटयार काळजात घुसली', 'इथे ओशाळला मृत्यू', 'थँक्यू मि. ग्लाड', 'मला काही सांगायचंय' यांसारखी नाटकं त्यांनी नाटयसंपदा या आपल्या संस्थेद्वारे रंगभूमीवर आणली. 'कट्यार काळजात घुसली' हे संगीत नाटक नाट्यरसिकांनी अक्षरश: डोक्यावर घेतले. मराठीसोबतच गुजराती व कन्नड भाषेतही त्यांनी आपली अभिनय प्रतिभा दाखवली. चार मराठी चित्रपट, चार मराठी मालिका यांसोबतच एक इंग्रजी मालिका केल्या आणि रेडिओसाठी तर असंख्य नाट्यवाचने केली. त्यांना महाराष्ट्र सरकारतर्फे राज्य रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला होता. मा.प्रभाकर पणशीकर यांचे १३ जानेवारी २०११ रोजी निधन झाले.
प्रभाकर पणशीकर यांची नाटके
मोहिनी, मदनाची मंजिरी, अमृत झाले जहराचे, सुवर्णतुला, अश्रूंची झाली फुले, गारंबीचा बापू. कट्यार काळजात घुसली, इथे ओशाळला मृत्यू, मला काही सांगायचंय, वीज म्हणाली धरतीला, संत तुकाराम, तो मी नव्हेच, विकत घेतला न्याय, महारामी पद्मिनी, लागी करेजवा कटार (हिंदी), होनाजी बाळा, बेईमान, प्रश्नक नाजूक आहे, तो राजहंस एक, त्या कातरवेळी, तीन लाखांची गोष्ट, थॅंक यू मि. ग्लाड, तुझी वाट वेगळी, राजसन्यास, भटाला दिली ओसरी, पुत्रकामेष्टी, मी मालक या देहाचा, निष्पाप, अवनु नानल्ला (कानडी-तो मी नव्हेच), जिथे गवतास भाले फुटतात, किमयागार, घर अण्णा देशपांडेंचं.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
आदित्य ओक यांनी अनेक कार्यक्रमांमध्ये उल्लेखनीय सहभाग नोंदवला आहे, तसंच अनेक चित्रपटांचं संयोजनही केलं आहे. ‘बालगंधर्व’सारख्या चित्रपटाचं संगीत संयोजन केले आहे.
२० जानेवारी २०१७ मध्ये रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले. डोनाल्ड ट्रम्प हे लोकप्रिय पण तितकंच वादग्रस्त व्यक्तिमत्व. एक उद्योगपती ते राजकारणी असा ट्रम्प यांचा प्रवास आहे. एका जमान्यात डोनाल्ड ट्रम्प एक उद्योगपती म्हणून प्रसिद्ध होते.
Copyright © 2025 | Marathisrushti