(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

  • विनोदी अभिनेत्री सुप्रिया पाठारे

    ‘कुलवधू’ या गाजलेल्या मालिकेतून सुप्रिया पाठारे यांची छोट्या पडद्यावर एन्ट्री झाली. या मालिकेत त्या खलनायिकेच्या रुपात दिसल्या होत्या त्यानंतर जागो मोहन प्यारे या मालिकेतही त्यांची मुख्य भूमिका होती.

  • नाटककार मो. ग. रांगणेकर

    बहुरंगी आणि बहुढंगी अशा मिष्कील व्यक्तिमत्त्वाच्या मोतीराम गजानन रांगणेकर उर्फ मो.ग.रांगणेकर यांची १९२४ साली संपादक या नात्याने कारकीर्द सुरू झाली.

    त्यांचा जन्म १० एप्रिल १९०७ रोजी झाला. वयाच्या अवघ्या तेविसाव्या वर्षी एक कवडी नसतानाही स्वत:चे साप्ताहिक काढले. ‘तुतारी’, ‘वसुंधरा’, ‘चित्रा’, ‘आशा’ ही त्यांची गाजलेली साप्ताहिके, त्याचप्रमाणे ‘अरुण’, ‘सत्यकथा’, ‘नाट्यभूमी’ ही त्यांची गाजलेली मासिके होत. संपादक या नात्याने नाना प्रकारचा मजकूर लिहिणे, व्यवस्थापक म्हणून जाहिराती मिळवणे, साप्ताहिकाचा प्रसार करण्यासाठी निरनिराळे मार्ग शोधणे यासाठी त्यांनी अफाट मेहनत घेतली. प्रत्येक अंकात काहीतरी नावीन्यपूर्ण, आकर्षक लेख असावेत यासाठी त्यांची धडपड असे. साप्ताहिकांसाठी बातम्या मिळविण्यासाठी नाटक कंपन्यांमधून फेरफटका मारत असल्याने रांगणेकरांनी झालेल्या ओळखींचा उपयोग करून नाटक कंपनी काढण्याचा विचार पक्का केला आणि ‘नाट्यनिकेतन’ या संस्थेची स्थापना केली. १९४० साली पहिले नाटक लिहिले त्याचे नाव ‘आशीर्वाद’. या नाटकाच्या निर्मितीच्या वेळी केशवराव दाते यांच्याशी मतभेद झाल्याने रांगणेकर नाटककाराबरोबर दिग्दर्शक म्हणूनही मान्यता पावले. आशीर्वाद, कुलवधू, नंदनवन, अलंकार, माझे घर, वहिनी, एक होता म्हातारा, कोणे एके काळी, मोहर इ. नाटके रांगणेकरांनी लिहिली आणि दिग्दर्शितही केली. याखेरीज ‘भटाला दिली ओसरी’ हे विनोदी नाटक तसेच ‘सीमोल्लंघन’ आणि ‘कलंकशोभा’ या कादंबर्या,ही लिहिल्या. ‘औटघटकेचा राजा’ या चित्रपटाची कथा लिहिली. ‘सुवर्णमंदिर’ हा संगीत बोलपट तयार केला. ग्रामोफोन रेकॉर्डस्च्या क्षेत्रात नवनवीन प्रयोग केले. ते उत्तम चित्रकारही होते. चित्रकार हळदणकरांकडे त्यांचे चित्रकलेचे शिक्षण झाले होते. वयाच्या १५-१६ व्या वर्षी त्यांनी चित्ता फाइट म्हणून काढलेले चित्र पूर्वीच्या काड्यापेटीवर येत असे. रांगणेकरांचे बहुरंगी व्यक्तिमत्त्व होते. नाट्यनिकेतन या संस्थेलाही नाट्यक्षेत्रात महत्त्वाचे स्थान निर्माण झाले होते. नट निर्माण करण्याचे एक पीठ अशी नाट्यनिकेतनची ख्याती होती. नाट्यनिकेतनच्या नाटकात काम करून अनेक नटनट्यांनी लौकिक संपादन केला होता. सध्या लोकप्रिय असलेला एकांकिका हा नाट्यप्रकार १९४७ सालीच रांगणेकरांनी नाट्यनिकेतनतर्फे प्रेक्षकांची अभिरुची वाढविण्यासाठी तीन एकांकिका सादर करून केला.

    १९६८ साली ४९ व्या नाट्यसंमेलनाचे मो. ग. रांगणेकर हे अध्यक्ष होते.

    मो. ग. रांगणेकर यांचे १ फेब्रुवारी १९९५ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट / शुभदा दादरकर

  • प्रख्यात पटकथा लेखक, दिग्दर्शक नासीर हुसेन

    नासीर हुसेन यांच्या चित्रपटाचे प्रत्येकच गीत अप्रतिम असायचे. त्यांचा जन्म ३ फेब्रुवारी १९३१ रोजी झाला. नासीर हुसेन हे भोपाळवरून मुंबईला आले व शशाधर मुखर्जी यांच्या फिल्मीस्तान स्टुडीओत पटकथा आणि संवाद लेखक म्हणून नोकरीला लागले. तेव्हा ते कारदार साहेबांच्या सहाय्यकाची पण भूमिका निभावत होते. कारदार साहेब म्हणजे त्या काळातले नामवंत दिग्दर्शक. त्याकाळात मा.नासीर हुसेन यांनी ‘अनारकली’, मुनीमजी आणि ‘पेइंग गेस्ट’ या चित्रपटांचे पटकथा लेखन केले होते. १९५८ मध्ये अचानक शशाधर मुखर्जी यांना एक वेगळी आणि स्वतंत्ररीत्या दिग्दर्शनाची जबाबदारी दिली चित्रपट होता.. ‘तुमसा नही देखा’. या चित्रपटापासूनच शम्मी कपूर सिनेसृष्टीत प्रस्थापित झाले, सिनेमा खूप गाजला. त्यांचे यश बघून लगेच शशाधर मुखर्जी यांनी त्यांना दुसरा चित्रपट दिग्दर्शित करायला दिला. चित्रपट होता ‘दिल देके देखो’. या चित्रपटाचे विशेष असे कि यात दोन महिलांनी पदार्पण केले होते. या चित्रपटाची नायिका ‘आशा पारेख’ आणि दुसऱ्या संगीतकार ‘उषा खन्ना’. चित्रपट संगीतामुळे खूप गाजला होता. चित्रपट संगीतामुळे खूप गाजला होता. या चित्रपटानंतर ‘आशा पारेख’ नासीर हुसेन यांच्या प्रत्येक चित्रपटात होती अगदी १९७१ च्या ‘कारवा’ पर्यंत. ‘दिल देके देखो’ च्या यशानन्तर ‘नासीर हुसेन’ यांनी आपली स्वताची निर्मिती कंपनी ‘नासीर हुसेन फिल्म’ ची स्थापन केली आणि स्वतःच निर्माता दिग्दर्शक ची भूमिका निभावीत पहिला चित्रपट काढला देव साहेबांचा ‘जब प्यार किसी से होता है’, हा सुद्धा चित्रपट खूप गाजला होता. चित्रपटातील सर्व गाणी सुपरहिट होती. त्यांचा दुसरा चित्रपट होता ‘फिर वही दिल लाया हु’. या सर्व नावांवरून एक कल्पना येते कि नासीर हुसेन यांच्या चित्रपटात गाण्यांना किती महत्व होते आणि संगीत हा त्यांच्या चित्रपटाचा कळीचा मुद्दा होता तो अगदी ‘क़यामत से क़यामत तक’ पर्यंत. ‘फिर वही दिल लाया हु’ मध्ये त्यांनी आपल्या गुरुचा म्हणजे शशाधर मुखर्जी यांचा मुलगा ‘जॉय मुखर्जी’ यालाच आपला नायक म्हणून निवडले होते तर नायिका मा.आशा पारेखच होत्या. बंदा परवर थाम लो जिगर बन के प्यार फिर आया हु ....खिद मत मे आप की हुज़ूर फिर वोही दिल लाया हु ....'रफी ने हे गायलेले गाणे ...ओ. पी. नय्यर यांच खास रीदम....'मेलोडीयस गाणे'.....अशा अनेक ' सुमधुर ' 'क्लास्सिक' गाण्यांचा खजिना असलेला 'फिर वोही दिल लया हू...'हा खूप गाजला. मा.नासिर हुसेन हे निर्माता आणि दिग्दर्शक म्हणून चित्रपट बनवत. चमकदार, प्रणयप्रसंग, गीत, संगीत, रहस्य अशा वैशिष्ट्यांचे जब प्यार किसीसे होता है, तुमसा नही देखा, दिल देके देखो, यादों की बारात हे मा.नासिर हुसेन चित्रपट असत. पण त्यातही ‘तिसरी मंजिल’ वेगळाच मानला जातो. मा.‘मजरूह सुलतानपुरी’ हे मा.नासीर हुसेन यांचे आवडते गीतकार होते म्हणूनच सर्व तरुण वर्ग घेऊन काढलेला ‘क़यामत से क़यामत तक’ चे सुद्धा गाणी त्यांनी ७० वर्षांच्या मजरूह सुलतानपुरी यांच्या कडूनच लिहून घेतली होती. मा. नासिर हुसेन आपल्या काळातील एक यशस्वी निर्माते राहिले. त्यांचे पुत्र मंसूर खानदेखील यशाच्या शिखरावर पोहचले. आमीर खानसोबत मंसूर यांनी कयामत से कयामत तकच्या यशाचा इतिहास लिहिला. जो जीता वही सिकंदर, अकेले हम अकेले तुम आणि जोश चित्रपटांच्या यशानंतर मात्र ते दिग्दर्शनापासून दूर होत गेले. ताहिर हुसेन नासीर हुसेन यांचे भाऊ, त्यांच्या बरोबर ताहिर हुसेन यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. प्रारंभीच्या काळात त्यांनी नासीर हुसेन यांना निर्मिती आणि दिग्दर्शनात "तुमसा नही देखा', "दिल दे के देखो' अशा काही चित्रपटांसाठी मदत केली. आमिर खान चे मामा म्हणजे नासिर हुसेन.

    आशा पारेख यांचे नासिर हुसेन यांच्या बरोबर सोबत नाते होते. अनेक अभिनेत्यांबरोबर पडद्यावर रोमान्स करणा-या आशा पारेख यांना त्यांच्या खासगी आयुष्यात मात्र प्रेम प्राप्त होऊ शकले नाही. त्यांनी लग्न केले नाही. १९५९ मध्ये 'दिल दे के देखो' सिनेमात दिग्दर्शक नासिर हुसेन यांनी आशा पारेख यांना शम्मी कपूर यांच्यासोबत कास्ट केले होते. या सिनेमानंतर त्यांची जवळीक वाढली होती. मा.नासिर हुसेन यांच्याबरोबर आशा पारेख यांच्या प्रेमाची चर्चा इंडस्ट्रीत खूप रंगली. नासिर हुसेन यांचे निधन १३ मार्च २००२ रोजी झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

    नासिर हुसेन यांच्या चित्रपटातील गाणी

    https://www.youtube.com/watch?v=OeEYMFvcKok

    https://www.youtube.com/watch?v=iPpwwAGjySA

    https://www.youtube.com/watch?v=CC_Xndynj7E

  • वैशाली बापट

    वैशाली बापट ह्या मुंबईत राहणार्‍या व स्वावलंबनाची वेगळी वाट निवडलेल्या महिला असून त्या ‘वर्धमान ग्राफिक्स’ या मालाडमधील गाजलेल्या प्रिंटींग च्या कारखान्यामध्ये आपल्या कर्तुत्वाचा व कल्पनाशक्तीचा अनोखा संगम साधीत आहेत. या कंपनीमध्ये विवीध प्रकारची बॅनर्स, कलर प्रिंट आऊट्स यांचे वैविध्यपुर्ण प्रकार बनविले जातात. या कंपनीचा आर्थिक पट उलगडायचा झाला तर 1 कोटींच्या घरात तिला या व्यवसायातून उत्पन्न मिळते, व ह्या बहारदार घौडदौडीमागे वैशाली यांच्या निरंतर कष्टांचा मोलाचा वाटा आहे.

  • मधू चौगावकर

    पुरुषप्रधान संस्कृतीवर हल्ला चढविणार्‍या अनेक महिला आपल्या पाहण्यात येतात. परंतु ही रुळलेली वाट सोडून महिलांइतकाच पुरुषांचाही अभ्यास करुन समान सामाजिक व्यवस्थेसाठी मधू चौगावकर देशभरात काम करीत आहेत. स्त्री-पुरुष समानता खर्‍या अर्थाने प्रत्यक्षात यावी, यासाठी त्या स्वत:च्या घरापासूनच प्रयत्नशील झाल्या आहेत. युनिसेफच्या जेन्डर एम्पॉवरमेन्ट विषयीच्या कोअर समितीच्या त्या सदस्य आहेत.

    स्त्री-पुरुष समानतेसाठी

  • थोर साहित्यिक व गीतकार शांताराम आठवले

    शांताराम आठवले यांचे वडील ग्वाल्हेरच्या सरदार शितोळे यांचे पुण्यातील कारभारी होते. त्यांचा जन्म २१ जानेवारी १९१० रोजी झाला. शांताराम आठवल्यांचे शिक्षण पुण्याच्या भावेस्कूल मध्ये झाले. “बेबंदशाही,“शिवसंभव” या सारख्या नाटकात अभिनय व दिग्दर्शन करुन ती क्षेत्रेही आठवल्यांनी शाळेत असतानाच गाजवली. सुप्रसिद्ध कादंबरीकार ह.ना.आपटे यांची व आठवलेंची पत्र मैत्री होती. त्यांच्या कवितांचा पहिला संग्रह “एकले बीज” या नावाने १९३८ साली म्हणजे ते प्रभातकवी झाल्यानंतर प्रसिद्ध झाला. त्या पाठोपाठ १९४० साली “बीजांकुर” हा दुसरा प्रसिद्ध झाला. “सकाळ”, “स्वराज्य” ”अश्या वर्तमानपत्रात तर “मनोहर”, “वांग्मयशोभा” यांसारख्या मासिकांमधून व “शालापत्रक” या लहान मुलांच्या मासिकात त्यांच्या कविता नेहमी प्रसिद्ध होत असत. “ प्रभात फिल्म कंपनी आपटे यांच्या 'भाग्यश्री' या कादंबरीवर आधारित चित्रपट तयार करू इच्छित होती. भेटीत त्या योजनेवर शिक्कामोर्तब झाले. चित्रपटाचे नाव ठरले “अमृतमंथन”. शांताराम आठवलेंच्या साध्या सोप्या काव्यरचनेने आपटे खूपच प्रभावित झाल्यामुळे त्यांनी अमृतमंथन चित्रपटाची गीते लिहिण्यासाठी आठवले यांचे नाव सुचवले आणि सुदैव असे की ते मान्यही झाले. मा.शांताराम आठवले यांना प्रभातमध्ये गीतकार, पद्यलेखक आणि सहाय्यक दिग्दर्शक अशी जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली. 'अमृतमंथन' नंतर “संत तुकाराम”,“कुंकू”,“गोपालकृष्ण”,“माझा मुलगा”,“संत ज्ञानेश्वर”,“शेजारी”,“संत सखू”,“दहा वाजता” आणि “रामशास्त्री” या प्रभात चित्रपटांसाठी आठवले यांनी गीते लिहिली. काव्य, भाषेचा गोडवा, साधेपणा आणि सोपेपणा राखायचे अवघड काम शांताराम आठवले यांनी केल्या मुळेच त्यांचे स्थान “मराठी चित्रपटगीतांचे आद्यकवी” असे आहे. त्यांच्या अशा नाव लौकिकामुळे त्यांना, प्रभातच्या चालकांच्या परवानगीने, “भरतभेट”,“आपले घर” अशा काही प्रभात बाहेरच्या चित्रपटांसाठीही गाणी लिहावी लागली यामध्ये भाग्यरेखा”,“बेलभंडार”,“झंझावात”, “वहिनीच्या बांगडया”, “शेवग्याच्या शेंगा”,“आई मला क्षमा कर”,“पडदा”,“सुभद्राहरण”,“वावटळ” या चित्रपटांचा समावेश आहे. शांताराम आठवले यांनी “शांतिचिया घरा”,“बकुळफुले”,“वनातली वाट”,“कुंडलीनी जगदंबा”,“सुखाची लिपी”,“ओंकार रहस्य” आणि “प्रभातकाल” या सारखी एकापेक्षा एक सरस पुस्तके लिहिली.याशिवाय त्यांच्या भाव कविता, चारोळ्या, बालगीते यासारखे वाङ्मय देखील लोकप्रिय ठरले आहेत. मा.शांताराम आठवले २ मे १९७५ रोजी यांचे निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ :- janasampark.com
    शांताराम आठवले यांची अधिक माहिती वेब साईट http://www.shantaramathavale.com

  • चिरतरुण, चतुरस्त्र पार्श्वगायिका आशा भोसले

    आजही एखाद्या विशीतल्या तरुणाला मागे पाडेल, एवढी प्रचंड ऊर्जा, लगबग त्यांच्यात आहे. ८४ व्या वर्षीही त्यांच्यात गाण्याची, स्वर उंचावण्याची क्षमता एवढी आहे की, ऐकणारे थक्कच होतील. ‘ऐंशी वर्षांची म्हातारी बुढी अन् वय काय सांगते सोळा? आंधळा मारतो डोळा...’ या दादा कोंडकेंच्या गाण्यातील मर्म आशाताईंनी कर्तृत्वाने सार्थ करून दाखवले आहे.

    आशाताई अघोषित भारतरत्न’च आहेत, हे कोणताही संगीतरसिक नाकारणार नाही. लतादीदींसोबत कुण्याही गायिकेची तुलना होऊच शकत नाही, हे एकवेळ मान्य केले तरी,लतादीदींच्या तुलनेत आशा भोसलेंचे गानकर्तृत्व कुठेही मागे नाही. उलट आशा भोसले यांच्या सुरांना जी ‘शार्प धार’ आहे, जे माधुर्य आहे, शब्दफेकीची अनोखी नजाकत आहे, ते अन्य कोणत्याही गायिकेकडे नाही. गाण्यांची जेवढी व्हेरायटी; मग ते शास्त्रीय गीत असो, गज़ल असो, मादकगीत असो, भक्तिगीत-भावगीत असो, पॉपगीत-कॅबरेगीत असो,लावणी-ठुमरी असो वा कव्वाली असो; सादरीकरणाची खास शैलीतील विलक्षण हातोटी आशा भोसलेंनी जोपासली आहे, जी अन्य कुठल्याही गायिकेच्या वाट्याला आली नाही, याची पावती तर दस्तुरखुद्द लतादीदीही देतात! स्वतंत्र छाप आशाताईंनी संगीतविश्वाीच्या सुरील्या दुनियेत उमटवली, तेही लतादीदींसह शमशाद बेगम, गीता दत्त, नूरजहॉं, सुरैया यांसारख्या पट्टीच्या गायिका फिल्म इंडस्ट्रीमध्ये सक्रिय असताना! सर्वांत मोठी गोष्ट अशी की, आशा भोसले यांना वैवाहिक जीवनात, चित्रपटसृष्टीत जो संघर्ष करावा लागला, तेवढा अन्य कुठल्याही गायिकेला नाही! तब्बल सहा दशके रसिकमनावर गारूड घालणार्याज व आज वय वर्षे ८४ असतानाही तोच मधुर स्वर आशाताईंकडे आजही कायम आहे. मात्र, ‘मेलोडी क्वीन’ आशाताई यांचा सहा दशकांचा प्रवास अतिशय संघर्षपूर्ण, खडतर असाच राहिलेला आहे. प्रारंभी अतिशय वाईट दिवस त्यांनी आयुष्यात अनुभवलेले आहेत. वयाने जवळपास दुप्पट असलेल्या ज्या व्यक्तीवर नितांत प्रेम केले व लतादीदींसह घरातील सर्वांचाच कडाडून विरोध असताना त्यांचा रोष पत्करून आयुष्याचा जोडीदार म्हणून घरातून पळून जाऊन ज्याची मोठ्या विश्वारसाने निवड केली, त्याच्याचकडून म्हणजे गणपतराव भोसले यांच्याकडून विश्वाूसाला तडा गेल्यानंतर जिव्हाळ्याचे सर्वच लोक गमावल्याचे जे दिवस आशाताईंनी अनुभवले व त्यानंतरही त्या न डगमगता कुणाच्याही सहकार्याविना केवळ आपल्या गानकौशल्याच्या बळावर ज्या धीरोदात्तपणे उभ्या राहिल्या आणि प्रचंड यशस्वी झाल्या, त्याला खरोखरच तोड नाही! ‘संघर्षाचं प्रतीक’ म्हणूनही आशाताईंकडे पाहिल्यास ते वावगं ठरणार नाही. कारण ती वस्तुस्थिती आहे. त्यांच्या जागी अन्य दुसरी कुठलीही महिला राहिली असती, तर कदाचित कधीच आत्महत्या करून मोकळी झाली असती. कारण, पदरात दोन मुले टाकून व गर्भात एक बाळ सोडून गणपतराव भोसले व त्यांचे बंधू आशाताईंच्या जिवावर उठले होते.अतिशय घाणेरडी वागणूक मिळाल्याने आशाताईंनी ६० साली गणपतराव भोसले यांच्याशी घटस्फोट घेतला होता, हा सत्य परंतु कटु असा खाजगी इतिहास आहे. आपल्या इच्छेविरुद्ध आपल्याच स्वीय सचिवासोबत लग्न केले म्हणून संपूर्ण मंगेशकर कुटुंबाच्या कर्त्याकरवित्या लतादीदी यांचीही साथ-जिव्हाळा त्या गमावून बसल्या होत्या. गणपतराव हे लतादीदींचे स्वीय सचिव होते.लग्नाच्या वेळी आशाताईंचं वय १६ तर गणपतराव ३१ वर्षांचे होते. अशा कठीण दिवसांत आशाताईंनी कारकीर्द घडवायला प्रारंभ केला तेव्हा त्यांना अनेक खडतर, कटु अनुभवांचा सामना करावा लागला. कुणी गाणे गाण्याची संधी देत नसत, अन्य गायिकेने नकार दिलेली गाणी त्यांच्या वाट्याला येत असत, अल्प मानधनावर त्यांना टुकार गाणी गावी लागत असत. बी ग्रेड, सी ग्रेड नायिकांवर चित्रित असलेली गाणी त्यांना गावी लागत असत. हे सर्व आशाताईंच्या वाटेला प्रारंभी येत गेलं व आशाताईंनीही नशिबाचे भोग समजून ते स्वीकारलं. स्वीकारण त्यांना भागच होतं, परिस्थितीच तशी होती! मात्र त्यांनी, मिळालेल्या या प्रत्येक संधीचं सोन्यात रूपांतर केलं, असं की ‘देखनेवाले देखतेईच रह्य गये!’ प्रत्येक गाणं तन-मन ओतून असं काही तडाखेबाज गायलं की बस्सं़! आशाताईंच्या वाईट दिवसांमध्ये गुरुदत्त यांची पत्नी गीता दत्त, शमशाद बेगम, लता मंगेशकर या फिल्म इंडस्ट्रीतील टॉपच्या गायिका होत्या. पुढे पंचमदांची साथ मिळाल्यानंतर आशाताईंनी एकापेक्षा एक अशा गाण्यांची ज्या गोडव्याने बरसात केली, त्याने ‘चिंब’ झालेले रसिकमन कधीच ‘कोरडे’ होत नाही. लावणी, भावगीतं-भक्तिगीतं, गज़ल, पॉप, उडत्या चालीतली गाणी, लोकगीतं, कव्वाली, रवींद्र संगीत आदी सर्वांमध्ये आशाताईंनी अमिट मुद्रा उमटवली.

    १९४३ साली ‘माझा बाळ’ या चित्रपटात दत्ता डावजेकर यांनी संगीतबद्ध केलेल्या ‘चला चला नव बाळा...’या गाण्याने आशाताईंनी चित्रपट गायनाला प्रारंभ केला होता. ४८ साली हंसराज बहल यांच्या ‘चुनरियॉं’ या चित्रपटात ‘सावन आया...’हे गीत गाऊन आशाताईंनी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं होतं.५३ साली बिमल रॉय यांनी ‘परिणीता’साठी आशाताईंना संधी दिली, ५४ साली राज कपूर यांनी ‘बूट पॉलिश’मध्ये मोहम्मद रफी यांच्यासोबत ‘नन्हे मुन्ने बच्चे तेरे मुठ्ठी मे क्या है...’ गायला दिलं. पुढे ओ. पी. नय्यर यांनी ५६ साली ‘सीआयडी’साठी संधी देऊन आशादीदींच्या पदरात मोठं यश दिलं.

    ५७ साली ‘नया दौर’मध्ये ओपींच्या उडत्या चालीवर रफीसाहाबसोबतचं ‘मॉंग के साथ तुम्हारा’, ‘उडे जब जब जुल्फे तेरी’, हेमंतकुमार यांच्या संगीतातलं ‘जागृती’मधलं ‘दे दी हमे आझादी बिना खड्‌ग बिना ढाल, साबरमती के संत तुने कर दिया कमाल’, सी. रामचंद्र यांचा संगीतसाज आणि भरत व्यास यांनी रचलेलं ‘नवरंग’मधलं ‘आधा है चंद्रमा रात आधी’, ‘तू छुपी है कहॉंऽ मै तडपता यहॉं’, जयदेव यांचं संगीत असलेलं देव आनंद-साधनावरचं ‘हम दोनो’मधलं रोमॅण्टिक ‘अभी ना जाओ छोडकर के दिल अभी भरा नही’, ‘काला पानी’तलं देव आनंदला विनंती करणारं मधुबालाचं ‘अच्छा जी मै हारी चलो मान जाओ ना’,मदन मोहन यांनी संगीतबद्ध केलेलं ‘मेरा साया’तलं ‘झुमका गिरा रे’, ओपी-कमर जलालाबादींचं ५८ सालच्या ‘फागून’मधलं ‘एक परदेसी मेरा दिल ले गया, जाते जाते मिठा मिठा गम दे गया’, ‘तिसरी कसम’चं लोकगीतं ‘पान खाये सैया हमारो, सावली सुरतीयॉं होठ लाल लाल’, ‘किस्मत’मधलं शमशाद बेगमसोबतचं ‘कजरा मोहोब्बतवाला अखियों मे ऐसा डाला’, ‘पेईंग गेस्ट’मधलं चुलबुल्या नूतनला देव आनंद छेडतो तेव्हाचं ‘छोड दो आँचल जमाना क्या कहेगा’, ‘वक्त’मधलं ‘आगे भीऽ जाने ना तूऽ,पिछे भी जाने ना तू, जो भी है, बस यही एक पल है’, कोंबडी पकडणार्या’ ‘बांगडू’ किशोरदांसोबतचं ‘हाल कैसा है जनाब का’, ‘हावडा ब्रिज’मधलं ‘आईयेऽ मेहरबॉं’, झीनतवरचं ‘हरे रामा’तलं ‘दम मारो दम’, ओपींचं ‘चॉंद उस्मानी-किशोरदां यांच्यावरचं ‘बाप रे बाप’मधलं ‘पिया पिया पिया मोरा जिया पुकारे, हम भी चलेंगे सैया संग तुम्हारे’, शहरयार यांनी रचलेलं खय्याम यांनी संगीत दिलेलं ‘उमराव जान’मधलं ‘इन आँखो की मस्ती के, मस्ताने हजारों है’, ‘ये क्या जगहा है दोस्तो, ये कौनसा दयार है’, ‘तुमसा नही देखा’तलं ‘सर पे टोपी लाल, हाथ मे रेशम का रूमाल, हो तेरा क्या कहना’, ‘एक मुसाफिर एक हसीना’तलं ‘बहुत शुक्रिया बडी मेहरबानी’, नासिर हुसेन यांच्या ‘तिसरी मंझील’मधलं अतिशय गोड ‘ओ मेरे सोना रे सोना रे सोना रे, दे दुंगी जान जुदा मत होना रे’, ‘ओ हसीना जुल्फोवाली जानेजहॉं’, ‘आजा आजा मै हू प्यार तेरा’, ‘आदमी और इन्सान’मधलं ‘जिंदगी इत्तफाक है’, ‘अनहोनी’मधलं ‘मैने होठो से लगाई तोऽऽ हंगामा हो गया’, ‘बांगडू’सोबतचं ‘आशा’मधलं ‘इना मिना डिका’, ‘काश्मीर की कली’तलं ‘इशारों इशारों मे दिल लेनेवाले’, गुलजार यांचं ‘मेरा कुछ सामान, तुम्हारे पास पडा है’, हेलनच्या बहारदार नृत्यावरचं ‘कारवॉं’तलं ‘पिया तू अब तो आजा’, ‘मेरे सनम’चं ‘जाईये आप कहॉं जायेंगे, ये नजर लौटके फिर आयेंगी’, ‘ज्वेल थिफ’चं ‘रात अकेली है, बुझ गए दिये’, ‘शिकार’चं ‘पर्दे मे रहनें दो पर्दा ना उठाओ’, ‘द ग्रेट गॅम्बलर’मधलं अमिताभ-झीनतवरचं फॉरेनमध्ये होडीतलं रोमॅण्टिक ‘दो लफ्जों की हैऽऽ दिल की कहानी’,‘पुकार’मधलं ‘बचके रहना रे बाबाऽऽ बच के रहना रे’, परवीनबॉबीचं नृत्य असलेलं ‘जवानी जानेमन हसीन दिलरूबा’,‘हम किसी से कम नही’तलं ‘ये लडका हाये अल्ला कैसा है दिवाना’, ‘चुरा लिया है तुमने जो दिलको’, ‘मुकद्दर का सिकंदर’चं ‘ओ साथी रे तेरे बिना क्या जिना’, ‘लगान’चं ‘राधा कैसे ना जले’ अशी खूप मोठी गाणी आशाताईंची आहेत. मराठीत गदिमा-यशवंत देवांचं ‘उघडी नयन शंकरा, वसंत ये वनांतरी’, ‘सिंहासन’मधलं सुरेश भटांचं ‘उष:काल होता होता काळरात्र झाली’, बहिणाबाईंचं ‘अरे खोप्यामंधी खोपा सुगडिणीचा चांगला’, खेबुडकरांचं ‘सतीचं वाण’मधलं किती सांगू मी सांगू कुणाला आज आनंदी आनंद झाला’, ‘फटाकडी’तलं नांदगांवकरांचं ‘लोणावळा, खंडाळा, कोल्हापूरचा पन्हाळा, बेंगलोर गोवा नि काश्मीरला, कुठं कुठं जायाचं हनीमूनला’, हेमंतकुमार यांच्यासोबत गायलेलं सुधीर मोघेंचं ‘हा खेळ सावल्यांचा’मधलं ‘गोमू संगतीनं माझ्या तू येशील काय’, पी. सावळाराम यांचं ‘भालू’मधलं ‘गंध फुलांचा गेला सांगून तुझे नि माझे व्हावे मिलन, व्हावे मिलन’, सुधीर फडके उपाख्य बाबुजींसोबत गायलेलं खेबुडकरांचं ‘पान जागे फूल जागे, भाव नयनी जागला, चंद्र आहे साक्षीला, चंद्र आहे साक्षीला’, भटांचं ‘चांदण्यात फिरताना माझा धरलास हात’, शांता शेळके यांनी रचलेलं ‘जिवलगा, राहिले रे दूर घर माझे, पाऊल थकले, माथ्यावरचे जड झाले ओझे’,भा. रा. तांबेंचं वसंत प्रभूंच्या संगीतसाजातलं बाबुजींसोबत गायलेलं ‘तुझ्या गळा, माझ्या गळा गुंफू मोत्यांच्या माळा’...

    'राष्ट्रीय पुरस्कार', असंख्य 'फिल्मफेअर पुरस्कार', मध्य प्रदेश सरकारचा 'लता मंगेशकर पुरस्कार', 'महाराष्ट्र सरकारचे १५ पेक्षा जास्त पुरस्कार' आणि नुकताच २००८ मध्ये मिळालेला 'पद्मविभूषण पुरस्कार' - हे पुरस्कार आशाताईंना बहाल करण्यात आले आहेत. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे चित्रपट क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार ‘दादासाहेब फाळके सन्मान’ आशाताईंना २०००-२००१ मध्ये प्रदान करण्यात आला. भारत-पाकिस्तान असोसिएशनचा ‘नाईटिंगेल ऑफ एशिया’ हा पुरस्कार त्यांना प्राप्त झाला आहे. तसेच ब्रिटनचे तत्कालीन पंतप्रधान टोनी ब्लेअर यांच्या हस्ते, बी.बी.सी.आकाशवाणीच्या वतीने 'जीवनगौरव पुरस्कार'ही त्यांना देण्यात आला.

    आशाताईनी आजपर्यंत सुमारे ९०० चित्रपटांना आवाज दिला आहे. त्यांनी आत्तापर्यंत १४ भाषांमध्ये सुमारे १२००० गाणी गायली आहेत.

    आशाताईंचा जन्म ८ सप्टेंबर १९३३ रोजी झाला. आशाताईंना वाढदिवसाच्या शुभेच्छा.

    संजीव वेलणकर, पुणे.
    ९४२२३०१७३३

    संदर्भ - इंटरनेट

  • मराठी शाहीर व लोककलाकार विठ्ठल उमप

    मराठी शाहीर व लोककलाकार विठ्ठल उमप यांचा जन्म १५ जुलै १९३१ रोजी झाला. आपल्या भारूडाने समस्त मराठी रसिकांना वेड लावणा-या विठ्ठल उमप यांनी आपल्या बहुआयामी कलासाधनेने अवघ्या महाराष्ट्रावर मोहिनी घातली होती. राज्याच्या लोककलेला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यामध्ये लोकशाहीर विठ्ठल उमप यांचं मोठं योगदान आहे.
    विठ्ठल उमप यांचा मूळचा गळा विदर्भाचा असला, तरी नगर जिल्ह्यातील एका खेड्यात त्यांच्या घराण्याने भेदिकाची परंपरा सुरू ठेवली. विठ्ठल उमप यांचे वडील भेदिकाचे गायक पण उमप यांच्यावर भेदिकापेक्षा आंबेडकरी जलसा आणि सत्यशोधकी तमाशाचा विशेष प्रभाव पडला होता. मुंबईला उदरनिर्वाहासाठी आलेल्या उमप यांनी कामगार वस्तीत मेळ्यातून कामे केली. विठ्ठल उमप हे लोकशाहीर असले तरी त्यांना 'कवाल' म्हणूनच लोक पूर्वी ओळखत. पण नंतर मात्र त्यांनी वेगवेगळे प्रयोग करून, एक समर्थ लोककलावंत, अशी आपली ओळख निर्माण केली. लोकरंगभूमी, रंगभूमी, कव्वालीचे व्यासपीठ, काव्य संमेलने, रुपेरी पडदा, दूरचित्रवणीचा छोटा पडदा अशा अनेक माध्यमांमध्ये उमप यांचा सर्वत्र संचार होता.

    'आला कागुद कारभारणीचा' ही लावणी, 'ऐका मंडळी कान देऊनी तुम्हा सांगतो ठेचात कुडी आत्म्याचं भांडण झालं भारी जोरात', 'भूक लागलीया पाठी कशासाठी पोटासाठी', 'माझ्या आईचा गोंधळ', 'आईचा जोगवा', 'आरती श्रीगणेशा जगदीशा', 'वादळ वारा तुफान येऊ द्या', 'ये दादा आवर रे', 'फाटकी नोट मना घेवाची नाय', 'भाता मीठ नही टाक्या' अशा वेगवेगळ्या लोकगीतांच्या गायनाने विठ्ठल उमप यांनी आपला स्वतंत्र ठसा लोकगीताच्या क्षेत्रात उमटविला. 'माझी मैना गावाकडं राह्यली' या गाण्यानं तर अनेकांचे डोळे पाणावले.

    विठ्ठल उमपांनी अनेक कोळी गीते आणि भीम गीते रचली व गायली. त्यांनी लिहिलेल्या "जांभूळ आख्यान" या नाटकाचे आतापर्यंत ५०० हून अधिक प्रयोग झाले आहेत. १९८३ साली विठ्ठल उमप यांनी आयर्लंडमधील कॉर्क लोकोत्सव गाजविला होता. विठ्ठल उमप केवळ लोकगीत गायनापाशी थांबले नाहीत. त्यांनी लोकरंगभूमीसोबतच नागर रंगभूमीवर संचार ठेवला. 'अरे रे संसार', 'अबक दुबक', 'विठो रखुमाय', 'खंडोबाचं लगीन', 'जांभुळाख्यान' या चाकोरीबाहेरच्या नाटकांसोबतच 'हैदोस', 'बुद्धम्‌ शरणम्‌'सारखी नाटके त्यांनी वर्ज्य मानली नाहीत.

    विहीर, टिंग्या, सुंबरान,या चित्रपटांमध्ये व डॉ. जब्बार पटेल दिग्दर्शित डॉ. बाबासाहेब आंबेडकर या चित्रपटातूनही त्यांनी काम केले होते.लोककलेच्या सेवेसाठी आयुष्य वेचणा-या शाहीर विठ्ठल उमप यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं होतं.

    विठ्ठल उमप यांचे चिरंजीव आदेश, नंदेश आणि उदेश आता त्यांची परंपरा पुढे नेत आहेत. विठ्ठल उमप यांचे २६ नोव्हेंबर २०१० रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • चिंतनशील ज्येष्ठ गायिका डॉक्टर प्रभा अत्रे

    किराणा घराण्याच्या ज्येष्ठ, चिंतनशील गायिका डॉक्टर प्रभा अत्रे यांचा जन्म १३ सप्टेंबर १९३२ रोजी पुणे येथे झाला.

    आई-वडील शिक्षक असल्यामुळे घरची परिस्थिती बेताचीच होती. तरीही मुलीनं डॉक्टर व्हावं, अशी आई-वडिलांची तीव्र इच्छा होती, पण हॉस्टेलवर एकटीनं राहण्याची तयारी नसल्यामुळे त्यांना डॉक्टर होण्याचा नाद सोडावा लागला. शेवटी शास्त्र शाखेतली पदवी संपादन करून नंतर त्यांनी कायद्याचं शिक्षण घेतलं. खरं तर घरात संगीताची कुणालाच खास आवड नव्हती. संगीत घरात शिरले ते केवळ अपघातानेच. आईच्या आजारपणानं घर बेजार झाल्यामुळे कुणीतरी त्यांना पेटी शिकवण्याचा उपाय सुचवला. आईचं मन त्यात रमलं नाही, पण लेकीनं मात्र सूर पकडला आणि आयुष्यभर सुरांनीही प्रभाताईंना उत्तम साथ दिली.

    सुरुवातीच्या काळात विजय करंदीकरांच्या शिकवणुकीतून प्रभाताईंना सुरांची ओळख झाली. रागांशी परिचय झाला. ताल समजू लागला आणि ख्याल, ठुमरी, नाटय़गीत, भावगीत यांसारखे सगळे गानप्रकार त्या मैफलींमधून गाऊ लागल्या. त्यांनी ज्येष्ठ गायिका हिराबाई बडोदेकर व त्यांचे प्रतिभावंत बंधू सुरेशबाबू माने यांच्याकडे सातत्याने अनेक वर्षे शिक्षण घेतले. सुरेशबाबू व त्यांच्या मोठय़ा भगिनी हिराबाई बडोदेकर यांच्यावरील प्रभाताईंच्या गाढ श्रद्धेचाही प्रत्यय वाचकांना त्यांच्या लेखनातून वारंवार येतो. एके ठिकाणी त्या म्हणतात-

    ‘‘व्यवसायातल्या जीवघेण्या स्पर्धेत अनेकदा मन:शांती ढळण्याचे प्रसंग येतात. मैफल उखडल्यासारखी होते. रियाजानंही समाधान मिळत नाही. जीवनावरची श्रद्धा डळमळायला लागते आणि हलकेच बाबूराव आणि हिराबाई आपले सूर घेऊन मनात वस्तीला येतात. तेवढा एक क्षण पुरेसा होतो. मन पुन्हा उभारी घेतं. शांत परिसरात असलेल्या शिवालयातील शुचिर्भूतता रियाज करताना मला माझ्या सुरांतून जाणवायला लागते. जीवनावरची श्रद्धा पुन्हा दृढ व्हायला लागते.’’

    आकाशवाणी नागपूर केंद्र व मुंबई आकाशवाणीवर काही काळ संगीत विभाग प्रमुख म्हणून त्यांनी नोकरी केली. त्यानंतर मुंबईत एस.एन.डी.टी. विद्यापीठाच्या संगीत विभाग प्रमुख म्हणूनही जवळजवळ दहा वर्षे त्या कार्यरत राहिल्या. प्रतिभावंत गायिका, संगीत रचनाकार, लेखिका, प्राध्यापिका व विदुषी म्हणून मा.प्रभा अत्रे यांचा लौकिक आहे. ख्याल गायकी सोबत ठुमरी, दादरा, गझल, उपशास्त्रीय संगीत, नाट्य संगीत, भजन व भावसंगीत गायकीवरही मा.प्रभा अत्रे यांचे प्रभुत्व आहे. भारतीय शास्त्रीय संगीताचा जगभर प्रसार करण्याचे कामी त्यांचे मोठे योगदान गणले जाते. आपल्या कार्यक्रमांत त्या अनेकदा स्वतः रचलेल्या बंदिशी सादर करतात.
    प्रभाताईंनी अपूर्व कल्याण, मधुरकंस, पटदीप - मल्हार, तिलंग - भैरव, भीमकली, रवी भैरव यांसारख्या नव्या रागांची रचनाही केली आहे. तसेच किराणा घराण्याच्या गायकीत त्यांनी प्रथमच टप्पा गायनाचा परिचय करवून दिला. रंगमंचावर गाण्याचा प्रभावी आविष्कार कसा करावा त्याचे तंत्र त्यांनी हिराबाई बडोदेकर यांच्याकडून आत्मसात केले. मा.प्रभा अत्रे यांनी संगीत शारदा ,संगीत विद्याहरण, संगीत संशयकल्लोळ, संगीत मृच्छकटिक, बिरज बहू, लिलाव यांसारख्या संगीतिकांमध्ये प्रमुख स्त्री भूमिका केल्या होत्या. १९५५ पासून त्या देशोदेशी आपले गायनाचे कार्यक्रम सादर करत आहेत. भारतातील व विदेशांतील अनेक ख्यातनाम व महत्त्वपूर्ण संगीत महोत्सवांमध्ये त्यांचे कार्यक्रम सादर झाले आहेत. शास्त्रीय संगीताचा प्रसार जगभर व्हावा, या उद्देशाने डॉ. प्रभा अत्रे फाउंडेशन या संस्थेची त्यांनी केलेली स्थापना हे एक महत्वाचे पाऊल ठरले. डॉ. प्रभा अत्रे फाउंडेशन स्थापना आणि पुणे येथे ‘स्वरमयय गुरुकुलची’ स्थापना करुन, शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेणाऱ्या होतकरु विद्यार्थ्यांना त्या विशेष प्रोत्साहन देत आहेत. क्रियात्मक संगीत आणि संगीत संशोधन या दोन्ही गोष्टींचे मार्गदर्शन त्या करतात. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थ्यांनी डॉक्टरेट केली आहे. संगीतविषयक अनेक प्रकल्पांमध्ये, कार्यक्रमांमध्ये त्यांचा सहभाग असतो. त्यांचा खूप मोठा शिष्य परिवार आहे, त्यात परदेशातून आलेले शिष्यही आहेत. प्रत्यक्ष क्रियेबरोबर लेखन, वाचन, चिंतन आणि चर्चाही महत्वपूर्ण असल्याचे त्या आपल्या शिष्यवर्गाला सांगतात. त्यांनी स्वत:च्या स्वतंत्र शैलीत संगीतातील नवे राग निर्माण केले आहेत. आपल्या सांगीतिक प्रवासाचा आढावा घेणारी मा. प्रभा अत्रे यांचे ‘स्वरमयी’ हे आत्मचरित्र त्यांच्या स्वरांइतकीच आनंद देतात. आपल्या सांगीतिक वाटचालीचा आढावा घेणाऱ्या डॉ. प्रभा अत्रे यांनी लिहिलेल्या लेखांचे संकलन म्हणजे ‘स्वरमयी.’ त्यांच्या ‘स्वरमयी’ या पुस्तकाला उत्कृष्ट ग्रंथनिर्मितीचे महाराष्ट्र शासनाचे पारितोषिक लाभले आहे. जवळजवळ दोनशेच्यावर बंदिशी त्यांनी लिहिल्या असून ‘स्वराली, अंतस्वर’ ही त्यांची पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

    संगीत क्षेत्रातील उत्तम कामगिरीबद्दल ‘आचार्य अत्रे अॅवॉर्ड, संगीत नाटक अकादमी अॅवॉर्ड, स्वरसागर संगीत पुरस्कार, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका पुरस्कार, मुंबई दूरदर्शनचा ‘स्वररत्न’ पुरस्कार, मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर ऍ़वॉर्ड, मा. दीनानाथ मंगेशकर पुरस्कार, इत्यादी पुरस्कार देखील त्यांना मिळाले आहेत. भारत सरकारने पद्मश्री व पद्मविभूषण देऊन गौरव केला आहे.

    त्यांच्या काही रचना, जसे, मारू बिहाग रागातील 'जागू मैं सारी रैना', कलावती रागातील 'तन मन धन', किरवाणी रागातील 'नंद नंदन', ह्या विशेष पसंतीच्या रचना आहेत.

    -- संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

    मा. प्रभा अत्रे यांचे गायन

    https://www.youtube.com/watch?v=1zNuemR7KeA&t=24s
    https://www.youtube.com/watch?v=fKmSE252OUo
    https://www.youtube.com/watch?v=XaMW3iBoHfw
    https://www.youtube.com/watch?v=aPj8nRdJ3B8

  • नाट्यगुरु इब्राहिम अल्काझी सर

    अर्धवट शिक्षण सोडून ते इंग्लंडला गेले. त्यानी रॉयल अ‍ॅकॅडमी ऑफ ड्रॅमॅटिक आर्ट्‌स या लंडनमधील प्रसिद्ध संस्थेतून नाट्यविषयक पदवी मिळवली.