जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
लुकू सन्याल यांचे व्यक्तिमत्व, ‘दूरदर्शन’च्या छोटय़ा पडद्यापेक्षा मोठे होते. कोलकोता येथील न्यू थिएटर्सचे गायक व बंगाली अभिनेते पहाडी सन्याल यांच्या त्या कन्या. घरात नाटक सिनेमाचे वातावरण असल्याने, अगदी वयाच्या १३ व्या वर्षीपासूनच कोलकाता आकाशवाणीवरील नभोनाटय़ांमध्ये त्या आवाज देऊ लागल्या.
इंग्रजी विषय घेऊन बी.ए आणि एम.ए या पदव्या मिळवत असताना साक्षात् सत्यजित राय यांनी एका चित्रपटात (देबी) काम करशील का अशी विचारणा केली असूनही, ‘मी शिक्षणालाच महत्त्व देणार’ अशा शब्दांत लुकू यांनी नकार दिला होता. युरोपमध्ये काही काळ घालवून लुकू सन्याल मुंबईत आल्या. इथल्या केसी, नॅशनल, एमएमके या महाविद्यालयांत त्यांनी इंग्रजीच्या अध्यापक म्हणून काम केले. एमएमके महाविद्यालयातून, इंग्रजी विभाग प्रमुख या पदावरून त्या निवृत्त झाल्या होत्या यापैकी पहिल्या नोकरीसाठी ‘केसी’ मध्ये, मुंबईतील ‘आकाशवाणी भवना’च्या नजीकच जावे लागत असल्याने त्यांनी तिथेही प्रयत्न केला.
ऑडिशन देऊन त्या तिथेही नैमित्तिक वृत्तनिवेदिका म्हणून काम करीत. याच काळात एका जाहिरात संस्थेने, जाहिरातवजा माहितीपटासाठी आवाज देण्याची (व्हॉइसओव्हर) विचारणा केल्यावर त्यांनी ते काम सुरू केले व पुढे ‘फिल्म्स डिव्हिजन’साठी हिंदी-इंग्रजीत निवेदन लिहिण्यापर्यंत मजल मारली. हा अनुभव दूरदर्शनवर कामी आला. इंग्रजी बातम्या देणाऱ्या अगदी पहिल्या निवेदकांत त्या (गर्सन डिकून्हा, निर्मला माथन यांच्यासह) होत्या. प्रताप शर्मा, डॉली ठाकूर, सिद्धार्थ काक, हरीश भिमाणी, सरिता सेठी या पहिल्या फळीतील वृत्तनिवेदकांपैकी त्या एक होत्या. इंग्रजी भाषेवर प्रभुत्व, इंग्रजीचे स्पष्ट शब्दोच्चार हे त्यांचे वैशिष्टय़ होते.
त्यांची वेगळी ओळख प्रस्थापित होण्याचे कारण, त्यांची व्यावसायिकता हे होते. त्या स्वतःचा मेकअप तसेच वेशभूषा करीत. त्याबरोबरच, संबंधित भाषेतील व्यक्तींची नावे त्या भाषेत जशी उच्चारली जातात, तशी उच्चारण्याकडे त्यांचा कटाक्ष होता. या कालखंडातील असंख्य महत्त्वपूर्ण घडामोडींच्या साक्षीदार बनत त्यांनी त्या लोकापर्यंत पोहोचवल्या. इंदिरा गांधी यांची अटक, सचिनदेव बर्मन, बेगम अख्तर या दिग्गजांचे निधन या बातम्या त्यांनी वाचल्या. त्यांनी दिलेल्या एका मुलाखतीत आपल्या या कालखंडाच्या आठवणी सांगताना आणीबाणीच्या काळात बातम्या सांगणे किती आव्हानात्मक होते याचे वर्णन केले होते. इंग्रजी वृत्तनिवेदनाच्या खास शैलीसाठी त्या प्रसिद्ध होत्या.
‘‘काळाची पानं उलटता येतात, पण फाडून फेकून देता येत नाहीत’’ हे मराठी वाक्य, त्यातील ‘ळ’ सकट अगदी नीटसपणे उच्चारून १९८१ सालच्या ३१ डिसेंबर रोजी, तत्कालीन ‘मुंबई दूरदर्शन’च्या मराठी प्रेक्षकांनाही लुकू सन्याल यांनी आपलेसे केले होते. ‘गजरा’सारखा एक खास कार्यक्रमच त्या दिवशी लुकू यांच्या निवेदनातून सादर झाला होता आणि ‘‘मला मराठी बोलण्याची सवय नाही’’अशी दिलगिरी त्यांनी या निवेदनाच्या सुरुवातीलाच व्यक्त केली असली, तरी उच्चाराची एकही चूक त्यांनी केली नव्हती! त्यांचा इंग्रजीतला तो ‘हस्की’.. काहीसा घोगराच आवाज शुद्ध शब्दोच्चारणामुळे कोणत्याही भाषेत ऐकत राहावा असाच होता.
हा एकमेव मराठी अपवाद वगळता, लुकू सन्याल या जुलै १९७४ ते १४ ऑगस्ट १९८२ पर्यंत ‘मुंबई दूरदर्शनवरील एक इंग्रजी वृत्तनिवेदिका’ याच नात्याने प्रेक्षकांना माहीत होत्या. १४ ऑगस्ट १९८२ रोजी मुंबई दूरदर्शनच्या इंग्रजी बातम्या बंद झाल्या, त्या दिवशी अखेरच्या वृत्तनिवेदिका लुकू सन्यालच होत्या. लुकू संन्याल यांचे ७ ऑगस्ट २०१६ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- इंटरनेट
फडके, (डॉ.) अनंत
प्रसिद्ध भूशास्त्रज्ञ डॉ. अनंत फडके यांचे नुकतेच निधन झाले आणि त्यांच्या रूपाने देशातील भूशास्त्रीय वैशिष्टय़ांची जगाला ओळख करून देणारा एक अवलिया आपल्याला सोडून गेला. भारतात अनेक वैशिष्टय़पूर्ण नैसर्गिक, भौगोलिक गोष्टी असल्या तरी त्यांची जागतिक पातळीवर ओळख असतेच असे नाही. कारण आपल्यालासुद्धा त्यांची नेमकेपणाने माहिती नसते, मग जगाची गोष्ट तर लांबचीच! पण काही माणसांच्या प्रयत्नांमुळे ही माहिती जनसामान्यांपर्यंत आणि आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत पोहोचविणे शक्य झाले.
भूशास्त्राबाबत हे महत्त्वाचे काम डॉ. फडके यांनी शेवटपर्यंत सुरू ठेवले होते. महाराष्ट्रातील काळय़ा पाषाणाची (बेसॉल्ट) एक ओळख म्हणजे त्यातील पोकळय़ांमध्ये आढळणारी वैशिष्टय़पूर्ण खनिजे! त्यापैकी सर्वात महत्त्वाचा गट म्हणजे ‘झिओलाईट्स’ खनिजांचा! रंगाने, आकाराने आणि एकमेकांमध्ये गुंतलेल्या वैशिष्टय़पूर्ण रचनेने ही खनिजे अतिशय आकर्षक दिसतात. त्यांचे हे आकर्षक स्वरूप जगापर्यंत पोहोचविण्याचे काम करणाऱ्यांमध्ये डॉ. फडके यांचा समावेश होता. पण तेवढय़ावरच न थांबता त्यांनी या खनिजांचे संशोधन करून त्याचे गुणधर्म शोधण्याचे आणि वर्गवारी करण्याचे महत्त्वपूर्ण काम केले. त्यांचे हे कार्य जगभरातील भूशास्त्रज्ञांचे या खनिजांकडे लक्ष वेधण्यास उपयुक्त ठरले. काही दशकांपर्यंत ब्राझीलमधील अशा खनिजांना जगभरातून मागणी होती, पण आता त्यांच्या तोडीस तोड अशी महाराष्ट्रातील अशा खनिजांची गणना केली जाते. त्यांच्या अशा प्रयत्नांचा एक भाग म्हणून त्यांनी दोन खनिजे नव्याने जगाला माहिती करून दिली. त्याबाबतकाही तज्ज्ञांमध्ये मतभेद आहेत, पण त्यांची काही वैशिष्टय़े त्यांनी वेगळेपणाने दाखवून दिली. त्यातील एक म्हणजे- केळकराईट! आपले गुरू डॉ. के. व्ही. केळकर यांच्या विषयी आदर व्यक्त करण्यासाठीच त्यांच्या नावावरून या नव्या खनिजाला त्यांनी हे नाव दिले. पुण्यातील वाघोली येथे आढळणारे निळय़ा रंगाचे आकर्षक ‘कॅव्हेन्झाईट’ हे खनिज भारतात आढळत असल्याची पहिली नोंदही त्यांनी केली. नागपूरजवळील ‘सौसर’ नावाच्या रूपांतरित खडकांच्या सखोल अभ्यासाचे श्रेय, तसेच गुजरातमधील राजपिपळा, गरुडेश्वर येथे आढळणाऱ्या माशांचे ठसे शोधून काढण्याचे श्रेयसुद्धा त्यांच्याच नावावर आहे. आपल्याकडील गोष्टींना आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख मिळवून देण्यासाठी त्यांनी ऑस्ट्रिया, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, इग्लंड अशा अनेक देशांमधील भूशास्त्राच्या परिषदांमध्ये भाग घेतला आणि तिथे अनेक संशोधन प्रबंध वाचले. याच प्रयत्नांचा भाग म्हणून त्यांनी आंतरराष्ट्रीय नियतकालिकांसाठी संशोधनपर लेखनही केले. विविध देशांमधील प्रसिद्ध भूशास्त्रांसोबत एकत्रितपणे काम करूनही त्यांनी आपला हा उद्देश साध्य केला. महाराष्ट्रात आढळणाऱ्या खनिजांचा औद्योगिक वापर करता येईल का, यासाठीसुद्धा डॉ. फडके यांनी संशोधन केले. शीतीकरणाच्या (रेफ्रिजरेशन) प्रक्रियेत ‘क्लिनोप्टोलाईट’चा वापर करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. अशा प्रकारच्या संशोधनात मोठे यश मिळाले नसले, तरी खनिजांच्या या बाजूकडे लक्ष वेधण्यास त्यांचे कार्य निश्चितपणे उपयुक्त ठरले. भूशास्त्रातील खनिजशास्त्र, भूरचनाशास्त्र आणि ज्वालामुखीविज्ञान यांसारख्या विषयांतही त्यांचे योगदान मोठे आहे. १९५०च्या दशकात या विषयांमध्ये संशोधनाला विशेष वाव नसताना त्यांनी धडपड करून हे काम केले. संस्थात्मक पातळीवरही त्यांनी योगदान दिले. पुणे विद्यापीठात भूशास्त्र विभाग वाढविण्यात त्यांचा वाटा होताच, त्याचबरोबर अनेक विद्यार्थी घडविण्यातही त्यांनी हातभार लावला. निवृत्तीनंतरही आयुष्याच्या अगदी शेवटच्या आठवडय़ापर्यंत (वयाच्या ७४व्या वर्षांपर्यंत) ते सक्रिय होते. त्यांनी काही वर्षांपूर्वी ‘डेक्कन व्होल्कॅनोलॉजिकल सोसायटी’ची स्थापना केली. त्याद्वारे भूशास्त्र हा विषय सामान्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न ते करत होते. त्या दृष्टीने लोणारच्या विवरासंबंधी विस्तृत परिषद भरवून त्यांनी त्याच्या सर्व पैलूंवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला. परदेशात तेथील छोटी छोटी भूशास्त्रीय वैशिष्टय़े जपली जातात आणि त्यांची उत्तम प्रकारे नोंद केली जाते. याबाबत आपल्याकडे असलेली उणीव दूर करण्याच्या कामाला डॉ. फडके यांनी सुरुवात केली होती. त्यांच्या निधनामुळे हे कार्य अपूर्ण राहिले आहे. भूशास्त्रातील संशोधक व विद्यार्थ्यांनी हे कार्य पुढे सुरू ठेवले तर तीच खऱ्या अर्थाने डॉ. फडके यांना श्रद्धांजली ठरेल.
मैदानी आणि मर्दानी हे दोन शब्द महाराष्ट्राच्या मातीत खोलवर रुजले आहेत. त्यामुळे मराठी माणूस एकतर मैदानात मर्दूमकी गाजवतो नाहीतर मर्दानी छातीनं मैदान मारतो. असंच ठाण्यातलं एक व्यक्तीमत्व म्हणजे ४० वर्षं मैदानी खेळाच्या क्षेत्रात कार्यरत असलेले श्री. दत्ता चव्हाण होय.
ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर यांचा जन्म १५ डिसेंबर १९३५ रोजी झाला. ‘छबीदार छबी मी तोऱ्यात उभी’, ‘एक लाजरा न् साजरा’, ‘काय बाई सांगू’, ‘गोड गोजिरी लाज लाजरी’, ‘खेळ कुणाला दैवाचा कळला’, ‘शालू हिरवा’, ‘मुंगळा’, ‘मै तो आरती उतारू रे’ यासारखी असंख्य गीते आपल्या मधुर आवाजाने अजरामर करणाऱ्या उषाताई मंगेशकर यांचा संगीत प्रवास अलौकिक असाच आहे. लता मंगेशकर, आशा भोसले, ह्यांच्या बरोबरीने "उषा मंगेशकर" अशी स्वतंत्र मोहोर उमटविणाऱ्या उषाताईंनी अनेक एकलगीते, द्वंद्वगीत बालगीतं, भक्तीगीतं गायली आहेत आणि ठसकेबाज लावण्याही म्हणल्या आहेत. आरंभीच्या काळात त्यांचा गायनाकडे कल नव्हता.
मंगेशकर कुटुंबीय मुंबईत आल्यावर उषाताईंनी मणिपुरी नृत्याचे धडे घेतले. पुढील काळात ‘सुरेल कला केंद्र’च्या कार्यक्रमात गाणे म्हणण्याची संधी मिळाली. त्या कार्यक्रमात ‘बैजू बावरा’ चित्रपटातील शमशाद बेगम आणि लता मंगेशकर यांनी गाजवलेले द्वंद्वगीत त्यांनी गायले. त्यातील शमशाद बेगम यांचा गाण्यातील भाग हा मीनाताई मंगेशकर गायच्या व लतादीदींनी गायलेले शब्द हे उषाताई गायच्या.
उस्ताद बडे गुलाम अली खाँसाहेबांचे पट्टशिष्य पं. तुलसीदास शर्मा यांच्याकडे उषाताईंनी शास्त्रीय गायनाचे शिक्षण घेतले. उषाताई मंगेशकर आणि मीना खर्डीकर या दोघींनी संगीत दिलेला, १९९४ मध्ये प्रसिद्ध झालेला "पुन्हा एकदा" अल्बम, खूप गाजला होता, झिम्मड घाई, रात बहरली, सोन कंगनी, भिर भिर उडते, मायेच्या माहेरा ही गाणी खूप लोकप्रिय झाली. मीना खर्डीकर आणि उषाताई ह्यांचा अजून एक संयुक्त संगीताचा उपक्रम म्हणजे "लोक गणपती" ध्वनिफीत होय. विशेष म्हणजे "बाला मै बैरागन" ही आशाताई भोसले ह्यांच्या स्वरातील गाजलेल्या गाण्यांची ध्वनिफीत, ज्याच संगीत ह्या दोघींनी दिलं होतं.
मराठी, हिंदीसह गुजराती व नेपाळी भाषेतही गायन केलेल्या उषाताईंनी भक्तीगीत, भावगीत, लोकसंगीतापासून ते चित्रपट संगीतापर्यंतच्या सर्व प्रकारांत आपली सुरेल मोहोर उमटवली. लतादीदी आणि आशा भोसले यांची असंख्य गाणी रसिकांच्या ओठांवर रुळली आहेत. महाराष्ट्रामध्ये त्यांना "उषाताई" म्हणतात तर आसाममध्ये "उखादिदी" संबोधतात, गुजराथमध्ये "उषाबेन" ह्या सुप्रसिद्ध नावाने त्या लोकप्रिय आहेत.
उषाताई मंगेशकर यांची मोजकीच गाणी रसिकांना माहीत आहेत. उषाताई मंगेशकर यांना खरी प्रसिद्धी मिळाली ते जय संतोषी माँ या चित्रपटातील काही गाण्यांनंतर मे तो आरती उतारु रे या गाण्यांसाठी त्यांना फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट स्त्री गायिका पुरस्कारासाठी नामांकन करण्यात आले. नंतर त्यांचे मुंगळा हे गाणे व पिंजरा या चित्रपटातील गाणी तर लोकांच्या मनात अजून ही घर करून आहेत. त्यांनी दुरदर्शनसाठी फुलवंती या संगीत नाट्याची निर्मितीसुद्धा केली होती. "पवनाकाठचा धोंडी" "जैत रे जैत ह्या चित्रपटांची निर्मिती उषाताईंनी केलीय.
उषा मंगेशकर यांना मेहंदी अॅवॉर्ड, वेस्ट बंगाल क्रिटिक अॅवॉर्ड, सूरसिंगार अॅवॉर्ड, रोटरी अॅवॉर्ड, असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत. उषाताई उत्तम चित्रकारसुद्धा आहेत. अगदी लहानपणापासून त्यांना चित्रकलेत रुची होती. कोल्हापूरला चित्रकार बाबूराव पेंटर शेजारी राहायचे. स्वत: माई मंगेशकर यांची चित्रकला उत्तम होती, त्या उत्तम रांगोळ्या काढायच्या. मुंबईत आल्यावर उषाताईंची चित्रकला अभिनेता-निर्माता राज कपूर यांनी पाहिली. त्यांनी उषाताईंची चित्रे कलादिग्दर्शक एम. आर. आचरेकर यांना दाखविली.
आचरेकर व उषाताईंची भेट घडविली. आचरेकरांनी त्या चित्रांना दिलखुलास दाद दिली. उषाताईंनी सुर्यकांत मांढरे ह्यांचेकडून पावडर पेंटिंग शिकून घेतले. जलरंग आणि तैलरंग ह्या दोहोंमध्येही उषाताईंनी त्यांची करामत सिद्ध केलीय. पोर्ट्रेट हा तर उषाताईंचा हातचा विषय. त्यांनी चितारलेल्या डोळ्यातील भाव रसिकांना खिळवून ठेवतो. डोळ्यापासून रेखाटनाला प्रारंभ करून अवघं चित्रं भावपूर्ण करण्याचं कसब उषाताईंच्या हातात सामावलं आहे. अनेक पोर्ट्रेट त्यांनी साकारली आहेत. अनेक ध्वनिमुद्रिकांची वेष्टणं उषाताईंच्या कुंचल्यातून साकारलेली आहेत.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
उषा मंगेशकर यांची हिंदी मराठी गाणी.
https://www.youtube.com/watch?v=gaihS2h3p88
https://www.youtube.com/watch?v=pMg_ig8RDnA
https://www.youtube.com/watch?v=o9YgSspKNoA
संस्कृत व इंग्रजी भाषांच्या व्याकरणाचे अध्ययन करून आणि मराठी भाषेच्या रूपविचाराची स्वतंत्र प्रज्ञेने व्यवस्था लावून मराठी भाषेचे व्याकरण त्यांनी सिद्ध केले. ह्या व्याकरणाच्या अनेक आवृत्या निघाल्या. १८८१ मध्ये दादोबांनी आपल्या व्याकरणाच्या सातव्या आवृत्तीची पूरणिकाही प्रसिद्ध केली.
चित्रगुप्त यांचे संपूर्ण नाव चित्रगुप्त श्रीवास्तव. त्यांचा जन्म १६ नोव्हेंबर १९१७ रोजी झाला. त्यांनी एम. ए. (इकॉनॉमिक्स) ही पदवी घेऊन काही काळ प्राध्यापक म्हणून देखील काम केले. त्यांना संगीत व काव्य या क्षेत्रात रुची असल्यामुळे ते नशीब आजमाविण्यासाठी मुंबईत आले व अतिशय कष्ट करून एस. एन. त्रिपाठी यांच्याकडे असिस्टंट म्हणून काम केले. खऱ्या अर्थाने त्यांची कारकीर्द भाभी ह्य़ा चित्रपटापासून सुरू झाली. चित्रगुप्त यांनी एकूण ८२८ गाणी केली. मा.चित्रगुप्त यांनी प्रेमधवन, मजरुह सुलतानपुरी, साहिर, राजेंद्र कृष्ण व आनंद बक्षी इ. गीतकारांकडून गाणी लिहून घेतली. महमंद रफी व लता मंगेशकर यांच्या आवाजाचा टोन चित्रगुप्तांनी बरोबर वापरला व या कलाकारांची गाणी त्यामुळे अतिशय सुरेल वाटली.
एव्हीएम या दक्षिणेकडच्या बॅनरखाली त्यांनी अनेक चित्रपटांना संगीत दिले. लता मंगेशकर, महमंद रफी, आशा भोसले, तलत मेहमूद, मुकेश तसंच मन्नाडे इत्यादी गायकांच्या माध्यमातून त्यांनी सुरेल गाणी दिली. परंतु त्यांच्या वाटय़ाला सगळेच ‘बी’ ग्रेड सिनेमे आले. एकाही मोठय़ा हीरोचा चित्रपट (दिलीप, देव, राज कपूर) त्यांना मिळाला नाही. संगीत चांगले असूनसुद्धा त्यांना पाहिजे तेवढा सन्मान मिळाला नाही. परंतु एकटय़ा चित्रगुप्तांनी आपल्या संगीताच्या जोरावर ‘बी’ ग्रेड सिनेमांना तारून नेले. ‘बी’ ग्रेड सिनेमाचे निर्माते चित्रगुप्त यांच्या संगीतावर अतिशय खूश असत. कारण अशा चित्रपटांमध्ये चांगली गाणी असल्यामुळे ते चित्रपट यशस्वी होत असत.
भारत भूषण, चंद्रशेखर, अजित, सुनील दत्त, राजेंद्रकुमार हे त्यांच्या चित्रपटाचे नायक होते. तर कुमकुम, फरियाल, शकिला, श्यामा, माला सिन्हा, नंदा, मीनाकुमारी या नायिका होत्या. खऱ्या अर्थाने १९५७-१९६७ हे दशक चित्रपट संगीताच्या दृष्टीने भरभराटीचे होते. चित्रपट जरी चालले नसले तरी चित्रपटातील गाणी ही सतत रेडिओवर वाजत असत व लोकप्रिय होत असत. चित्रगुप्त यांचे निधन १४ जानेवारी १९९१ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
चित्रगुप्त यांची गाणी
https://www.youtube.com/watch?v=CB52wfw846U
अरविंद देशपांडे यांच्या बरोबरचा सुलभा देशपांडे याचा संसार हा दोघंही नाटकात असल्याने कधी गंभीर, तर कधी गमतीदार असायचा. कारण अरविंद कधी दिलेली वचनं पाळत नसत. मग दर वाढदिवसाला एक चिठ्ठी सुलभाताईंना मिळे. ‘मी तुझं देणं लागतो. एक सिल्कची साडी.’
मंगेशकर हे नांव जरी उच्चारलं तरी डोळ्यासमोर एकाहून एक संगीतरत्न असणारी पाचही भावंड उभी राहतात. लता, आशा, उषा, मीना आणि त्यांचे बंधू पंडित हृदयनाथ. पंडित हृदयनाथ यांचा जन्म २६ ऑक्टोबर १९३७ रोजी झाला.
नाटक, मालिका, चित्रपट अशा तिन्ही माध्यमांमधून वेगवेगळ्या भूमिका करणाऱ्या सुनील अभ्यंकर यांना नाटकात भूमिका करणेच अधिक आव्हानात्मक वाटते. अभिनयाचा खरा कस हा रंगमंचावरच लागतो असे त्यांचे मत आहे. त्यांच्या वाट्याला आता पर्यंत विनोदी अंगाने जाणाऱ्या भूमीकाच आल्या असल्यातरी त्यांना गंभीर भूमीका करणेही आवडते. एका गंभीर भूमिकेच्या प्रतीक्षेत ते आहेत. तसेच खलनायकी ढंगाची भूमिका करणेही त्यांना आवडते. मात्र अद्याप त्यांना तशी संधी मिळालेली नाही.
भाभा अणुसंशोधन केंद्र, मुंबई येथील निवृत्त शास्त्रज्ञ आणि मराठी विज्ञान परिषद पत्रिकेचे संपादक असलेले श्री वामनाचार्य हे वयाच्या पंचाहत्तरी नंतरही अत्यंत जोमाने अणि उत्साहाने कार्यरत आहेत. मराठी आडनावांचा मोठा संग्रह.
Copyright © 2025 | Marathisrushti