जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
अतुल कुलकर्णी हे मराठी चित्रपट व नाट्य अभिनेते आहेत. त्यांना हे राम चित्रपटातील श्रीराम अभ्यंकर या व्यक्तिरेखेसाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. याशिवाय पेज थ्री व रंग दे बसंती व नटरंग या चित्रपटांतील त्यांच्या भुमिकांनाही चिकित्सकांकडून दाद मिळाली. विविध मराठी चित्रपटातही त्यांनी काम केले आहे.
आग्रा गायकीमध्ये अनेक राग ठराविक पद्धतीने गायले जातात. काणेबुवाही अगदी त्या ठराविक पद्धतीनेच ते राग शिकवत. त्यामुळे ते तसेच गळ्यावर चढायचे. डोळस पद्धतीने गाणं ऐकायला आणि मग ते गायला काणेबुवांनी त्यांना शिकवलं. विलायत हुसेन खान साहेब इचलकरंजीला असताना काणेबुवांना जी तालीम द्यायचे ती बघण्याचं आणि अनुभवण्याचं भाग्य पं शरद जांभेकर यांना मिळाली होती.
कवि मंगेश पाडगावकर यांचा जन्म १० मार्च १९२९ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला येथे झाला. शाळेत असल्यापासूनच मराठीवर त्यांचं प्रेम जडलं आणि वयाच्या १४ व्या वर्षापासूनच ते कविता करू लागले. कविवर्य वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज आणि बा. भ. बोरकर यांचा त्यांच्यावर खूप प्रभाव होता. परंतु, पाडगावकर एका साच्यात कधीच अडकले नाहीत. त्यांनी स्वतःची शैली निर्माण करून मराठी साहित्यात आणि रसिकांच्या मनात वेगळं स्थान मिळवलं. स्वतः प्रेमळ व्यक्ती, प्रेमळ प्राध्यापक असल्यानं प्रेमकवितेवर त्यांचं विशेष प्रेम होतं. पण, भावगीतं, बालकविता, निसर्गकविता, चिंतनशील कविताही त्यांनी तितक्याच प्रभावीपणे केल्या होत्या. त्या सादर करण्याची त्यांची पद्धत तर अफलातून होती. पाडगावकर, विंदा करंदीकर आणि वसंत बापट या त्रयीनं ठिकठिकाणी काव्यवाचनाचे कार्यक्रम करून राज्याच्या कानाकोपऱ्यातील वाचकांना कवितेची गोडी लावली. सहजसोप्या शब्दांतून व्यक्त होणारे बोल आणि ओठांवर सहज रुळणाऱ्या कविता पाडगावकरांनी दिल्या. मंगेश पाडगांवकरांची कविता-गीतं म्हणजे मोगऱ्याची टपोरी फुलं. नियतीने पाडगांवकरांच्या प्रतिभेला कधीही धोका दिला नाही. त्यांचा हात सतत लिहिता ठेवला. आपल्या कवितेतली, गीतांतली आशयघनता सातत्याने टिकवलेला हा श्रेष्ठ कवी! त्यातल्या अनेक कवितांची गाणी झाल्यानं साहित्यासोबतच संगीत क्षेत्रातील मा.पाडगावकरांचं योगदानही मोठं आहे.
पाडगावकरांनी या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे' असं म्हणत मराठी रसिकांना प्रेम करायला शिकवले, जगण्याचं बळ देणारे... 'अशी पाखरे येती, आणिक स्मृति ठेवुनी जाती', अशा सहजसोप्या शब्दांत जीवनाचं सार सांगीतले.
ते आपल्या कवीतांनी तरुणाईला प्रेमात पाडत असत. 'प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं', असं म्हणणारे 'पाडगावकर आजोबा' कॉलेजमधल्या मुला-मुलींचे मित्रच होऊन जायचे. भावकविता, भावगीते, बालगीते, संगीतीका, नाटय़काव्य, गझल, वात्रटिका, सामाजिक उपरोधपर कविता, बोलगाणी आणि विडंबन अशा विविध साहित्य प्रकारातून मा.पाडगावकरांनी वाचकांना समृध्द केले.
पाडगांवकर यांनी ‘कधी बहर, कधी शिशिर, परंतु दोन्ही एक बहाणे. या त्यांच्या गीताच्या ध्वनिमुद्रणाची सांगीतलेली आठवण. ‘सुधीर फडक्यांनी केलेले शब्दांचे उच्चार ही एक थरारून टाकणारी गोष्ट होती. शब्द माझेच होते. त्यामुळे मला तरी त्या शब्दांचं नावीन्य नव्हतं. पण सुधीर फडक्यांच्या आवाजात ते ऐकताना माझेच शब्द आता मला नव्याने भेटत होते. ‘बहर धुंद वेलीवत यावा’ या ओळीतील ‘बहर’ आणि ‘धुंद’ या शब्दांतून व्यक्त होणारी तारुण्यातल्या फुलण्याची धुंदी.. ‘हळूच लाजरा पक्षी गावा’ या ओळीतील पक्ष्याच्या गाण्यातून व्यक्त होणारं कोणाचंतरी ते कोवळं लाजरेपण.. ‘आणि अचानक गळून पडावी विखरून सगळी पानं’ या ओळीतील निराशा आणि आधीच्या दोन ओळींतील विरोधाचं नातं- हे सारं सुधीर फडके इतक्या विलक्षण उत्कटतेनं प्रकट करत होते, की त्यांच्या गायनातून माझी कविता नव्याने जन्म घेत आहे असं मला वाटलं.
मंगेश पाडगावकरांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलं होतं. 'सलाम' या काव्यसंग्रहासाठी त्यांना १९८० मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. महाराष्ट्रातील दर्दी रसिकांच्या मनात स्थान मिळवलेल्या पाडगावकरांना २००८ मध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. त्यानंतर, २०१३ मध्ये पद्मभूषण पुरस्कारानं त्यांचा गौरव करण्यात आला होता. २०१० मध्ये दुबईत झालेल्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. महाराष्ट्र टाइम्सनंही पाडगावकरांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कारानं गौरवलं होतं. मंगेश पाडगावकर यांचे ३० डिसेंबर २०१५ रोजी निधन झालं.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
चंद्रकांत मांडरे यांचे मूळ नाव गोपाळ मांडरे. त्यांचा जन्म १३ ऑगस्ट १९१३ रोजी झाला.
बाबूराव पेंटरांनी चंद्रकांत यांना पहिले काम दिले. शेतकऱ्याचं आखूड धोतर, बंडी असा वेष त्यांच्या अंगावर चढविण्यात आला आणि त्याची सवय व्हावी म्हणून तब्बल महिनाभर तो तसाच ठेवण्यात आला. याचाच परिणाम म्हणजे "सावकारी पाश' या चित्रपटामधील चंद्रकांत यांचा अभिनय.
गोपाळाचं "चंद्रकांत' असं नामकरण करण्यात विख्यात दिग्दर्शक भालजी पेंढारकर यांचा पुढाकार होता. "राजा गोपीचंद' या हिंदी चित्रपटासाठी भालजींनी चंद्रकांत यांची निवड केली होती. या चित्रपटासाठी गोपाळऐवजी "चंद्रकांत' हे नाव लावण्यात आलं. "सावकारी पाश' या मूकपटात शेतकऱ्याच्या मुलाचं जे काम शांतारामबापूंनी केलं, ते बोलपटात चंद्रकांत यांना करायला मिळालं. "सावकारी पाश' हा पहिला वास्तववादी चित्रपट आणि त्यात काम करण्याची संधी चंद्रकांतना लाभली.
व्ही. शांताराम यांच्या "शेजारी' या चित्रपटापासून चंद्रकांत "प्रभात'मध्ये पूर्ण वेळ नेकरी करू लागले आणि त्यानंतर त्यांनी अनेक हिंदी-मराठी निर्माता, दिग्दर्शकांकडे पौराणिक, ऐतिहासिक, कौटुंबिक, ग्रामीण, सामाजिक अशा शंभराहून अधिक चित्रपटांतून वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या. "युगे युगे मी वाट पाहिली', "पवनाकाठचा धोंडी', "संथ वाहते कृष्णामाई' या चित्रपटांसाठी त्यांना पुरस्कार लाभले. "खंडोबाची आण' या चित्रपटासाठी त्यांना सातव्या राज्य चित्रपट महोत्सवात उत्कृष्ट अभिनेता पुरस्कार लाभला.
"रामराज्य' चित्रपटातील चंद्रकांतनी साकारलेला राम तर निव्वळ अविस्मरणीय ठरला. "स्वयंवर झाले सीतेचे'मध्ये तर ते रावण झाले होते. रामापासून रावणापर्यंतचा "ग्राफ' टिपणारा हा एकमेव कलावंत. केवळ सर्वसामान्य प्रेक्षकांनीच "रामराज्य' या चित्रपटाला डोक्यारवर घेतलं नाही तर महात्मा गांधींनाही हा चित्रपट आवडला होता. म. गांधी यांनी पाहिलेला हा एकमेव चित्रपट. अमोल पालेकरांचा "बनगरवाडी' हा चंद्रकांत यांनी केलेला शेवटचा चित्रपट.
चंद्रकांत मांडरे यांचे निधन १७ फेब्रुवारी २००१ रोजी झाले.
चंद्रकांत मांडरे यांचे उल्लेखनीय चित्रपट :- युगे युगे मी वाट पाहिली, पवनाकाठचा धोंडी, संथ वाहते कृष्णामाई, थोरातांची कमळा, छत्रपती शिवाजी, मीठभाकर, सांगत्ये ऐका, मोहित्यांची मंजुळा, धन्य ते संताजी धनाजी, खंडोबाची आण, बनगरवाडी
मुकेश अंबानी हे गेल्या नऊ वर्षांपासून भारतातील नंबर वनचे श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांच्या एकूण संपत्तीमध्ये दिवसेंदिवस वाढच होत असून सध्या त्यांची एकूण संपत्ती २२.७ अब्ज डॉलर इतकी झालेली आहे. मुकेश अंबानींचे वडील धीरूभाई अंबानी यांनी भुलेश्वर चाळमधील छोट्याशा खोलीत आपला बिझनेस सुरु केला होता. मुकेश व अनिल यांचे बालपण देखील याच खोलीत गेले. आज मुकेश अंबानी ‘एंटीलिया’मध्ये राहात असले तरी त्यांना भुलेश्वर चाळीतील घराचा विसर पडलेला नाही. एका इंटरव्ह्यूमध्ये मुकेश अंबानी यांनी भुलेश्वर चाळ व कुलाब्यातील फ्लॅटचा खास उल्लेखही केला होता.मुकेश अंबानींकडे तीन खासगी विमाने आहेत. त्यात ३३० कोटींचे एअरबस ३१९ कॉपरेरेट जेट, ४०१ कोटी रुपयांचे बोइंग बिजनेस जेट-२ आणि ९९ कोटी रुपयांचे मिनी जेट फॉल्कन ९०० ईएक्सचा समावेश आहे.
गदीमांचा जन्म १ ऑक्टोबर १९१९ रोजी झाला. गदीमांचे शिक्षण आटपाडी, कुंडल आणि औंध येथे. गणित विषयामुळे मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण होऊ शकले नाहीत. गदीमांना लहानपणापासून लिहिण्याची, नकला करण्याची आवड होती. तिचा येथे उपयोग झाला. ‘हंस पिक्चर्स’ ह्या चित्रसंस्थेच्या, मा. विनायक दिग्दर्शित ब्रह्मचारी ह्या गाजलेल्या चित्रपटात काही छोट्या भूमिका करून माडगूळकरांनी आपल्या चित्रपटक्षेत्रातील कारकीर्दीचा आरंभ केला. सुप्रसिद्ध साहित्यिक वि. स. खांडेकर ह्यांचे लेखनिक म्हणूनही त्यांनी काही काळ काम केले. त्या निमित्ताने खांडेकरांच्या संग्रहातली पुस्तके त्यांना वाचावयास मिळाली; खूप लिहावेसे वाटू लागले; त्यांच्या कवितालेखनालाही वेग आला. नवयुग चित्रपट लि. ह्या चित्रसंस्थेत के. नारायण काळे ह्यांच्या हाताखाली साहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करण्याची संधी माडगूळकरांना मिळाली, तेव्हा चित्रकथेची चित्रणप्रत कशी तयार करतात, हे त्यांना अगदी जवळून पहावयास मिळाले. तसेच आचार्य अत्रे ह्यांच्या सोप्या पण प्रासादिक गीतरचनेचा आदर्श त्यांच्या समोर राहिला. पुढे नवहंस पिक्चर्सच्या भक्त दामाजी आणि पहिला पाळणा ह्या चित्रपटांची गीते लिहिण्याची संधी मिळाली. पुढे राजकमल पिक्चर्सच्या लोकशाहीर रामजोशी ह्या चित्रपटाची कथा-संवाद आणि गीते त्यांनी लिहीली; त्यात एक भूमिकाही केली. ह्या चित्रपटाला फार मोठी लोकप्रियता लाभली. त्यानंतर कवी आणि लेखक अशा दोन्ही नात्यांनी माडगूळकर हे मराठी चित्रसृष्टीचा एक भक्कम आधार बनले. गीतकार, कथासंवादकार आणि अभिनेते म्हणून दीडशेहून अधिक मराठी आणि कथासंवादकार म्हणून पंधरा हिंदी चित्रपटांसाठी त्यांनी काम केले. त्यांनी मराठी चित्रपटांसाठी लिहिलेली गीते चैत्रबन ह्या नावाने संग्रहीत आहेत, तसेच त्यांनी लिहिलेल्या काही तीन चित्रकथा ही मराठी चित्रकथाही पुस्तकरूपाने प्रसिद्ध झालेली आहे. युद्धाच्या सावल्या (प्रयोग, १९४४) ह्या नावाचे एक नाटक त्यांनी लिहिले होते; तथापि ते फारसे यशस्वी झाले नाही. माडगूळकरांच्या कवितेवर ज्ञानेश्वर, नामदेव, तुकाराम आदी संतांच्या कवितेप्रमाणेच पंडिती आणि शाहिरी कवितेचेही सखोल संस्कार झाले होते, ह्याचा प्रत्यय त्यांनी चित्रपटांसाठी लिहिलेल्या सुंदर घाटाच्या, सोप्या परंतु प्रभावी गीतांतूनही येतो. त्यांच्या कवितेतील अस्सल मराठमोळेपणामागेही हेच संस्कार उभे असल्याचे दिसते. त्याचप्रमाणे लोकगीतांच्या लोभस लयतालांनी त्यांची गीते नटलेली असत. उत्तम समरगीते आणि बालगीतेही त्यांनी लिहिली. मराठी रसिकांनी माडगूळकरांच्या काव्यरचनेला मनःपूर्वक प्रतिसाद दिला आणि त्यांच्या गीत रामायणाने तर कीर्तीचा कळस गाठला; त्यांना ‘महाराष्ट्र वाल्मीकी’ ही सन्माननीय पदवी लोकांनी स्वयंस्फूर्तीने दिली. गीतरामायणाच्या गायनाचे शेकडो कार्यक्रम झाले व अजूनही होत आहेत. अन्य भारतीय भाषांत त्याचे अनुवादही झाले. गदीमा हे उत्तम चरित्र अभिनेतेही होते. पुढचं पाऊल, लाखाची गोष्ट, पेडगावचे शहाणे, वऱ्हाडी आणि वाजंत्री ह्या चित्रपटांत त्यांनी केलेल्या भूमिका संस्मरणीय ठरलेल्या आहेत. त्यांच्या चित्रपटकथा वैविध्यपूर्ण असून त्यांचे संवाद सोपे पण प्रत्ययकारी होत्या. गदिमांनी तब्बल १५८ मराठी चित्रपटांसाठी कथालेखन केले, यातील अनेक चित्रपटांच्या कथा-पटकथा व संवादही त्यांच्याच लेखणीतून उतरले. मात्र त्यांचा संचार केवळ मराठी चित्रसृष्टीतच नव्हता, तर हिंदीतही त्यांनी स्वतंत्र स्थान निर्माण केले होते. त्यांच्या कथेवर सुमारे २५ हिंदी सिनेमांची निर्मिती झाली असून त्यात ‘तुफान और दिया’, ‘दो आँखे बारह हाथ’, ‘नवरंग’, ‘गुंज उठी शहनाई’, ‘आदमी सडक का’ आदींचा समावेश आहे. गुरुदत्त यांच्या गाजलेल्या ‘प्यासा’ची मूळ कथाही गदिमांचीच होती, तर राजेश खन्नाचा ‘अवतार’ व अमिताभ-राणी मुखर्जीच्या ‘ब्लॅक’ची मूळ कथाही गदीमा यांचीच. गदिमांचा उल्लेख कोणी महाकवी असा केला, की ते गमतीने म्हणत असत- अहो, मी महाकवी नाही, महाकाय कवी आहे! त्यांच्या जोगिया, मंतरलेले दिवस, चैत्रबन इ. अनेक पुस्तकांना महाराष्ट्र शासनाची पारितोषिके मिळाली. भारत सरकारने पद्मश्री देऊन त्यांचा सन्मान केला. १९७३ मध्ये यवतमाळ येथे भरलेल्या मराठी साहित्यसंमेलनाचे अध्यक्षपद त्यांना देण्यात आले होते. महाराष्ट्र राज्याच्या विधानपरिषदेचे ते काही काळ नियुक्त सदस्य होते; तसेच महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृति मंडळाचेही ते सदस्य होते. गदिमा प्रतिष्ठानही काढण्यात आले आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.विकिपीडिया, शशांक गिरडकर
संगीत कार्यक्रमात (कॉन्सर्ट) धवनियंत्रणेचे तांत्रिक नियमन करणे म्हणजे मोठे आव्हान. कारण या साऊन्ड इंजिनीअरिंगवर कार्यक्रमाचा दर्जा ठरतो. या तंत्रज्ञानावर असलेल्या हुकमतीमुळे नितीन जोशी यांनी स्वत:चे स्थान निर्माण जेके. म्हणूनच शिवमणी, शुभा मृदुल यांच्यासारख्या कलाकारांना सोबत तेच हवे असतात...
मेरी आवाज सुनो
भारताचे सातवे पंतप्रधान सामाजिक कार्यकर्ते व राजनीतिज्ञ विश्वनाथ प्रताप सिंग यांचा जन्म २५ जून १९३१ रोजी झाला. भारताचे सातवे पंतप्रधान म्हणून असली तरी त्यांचे वडील राजे बहादूर रामगोपाल हे अलाहाबाद जिल्ह्यातील एका लहान संस्थानचे अधिपती विश्वनाथ प्रताप सिंग होते. वयाच्यापाचव्या वर्षी मंडाच्या संस्थानाधिपतींनी (ते सिंग यांचे चुलते होते) त्यांना दत्तक घेतले आणि योग्य ते शिक्षण दिले. त्यांचे दत्तकपिता १९४१ मध्ये वारले आणि व्ही. पी. सिंग मंडाचे अकराव्या वर्षीच राजे झाले.
संस्थान विलीन होईपर्यंत ते महाराजा होते. त्यांनी उच्चशिक्षण पुणे व अलाहाबाद विद्यापीठांत घेऊन बी.ए., बी.एस्सी. व एल्एल्.बी. पदव्या संपादन केल्या. विद्यार्थिदशेत ते वाराणसीतील उदयप्रताप महाविद्यालयात विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष होते . त्यांचा विवाह सीताकुमारी या शाही घराण्यातील युवतीशी झाला . त्यांना दोन अपत्ये आहेत. विनोबा भावेंच्या भूदान आंदोलनात त्यांनी सहभाग घेऊन आपल्या अखत्यारीतील पसाना हा ग्रामीण परिसर भूदान चळवळीस दान केला.त्यानंतर ते सक्रिय राजकारणाकडे वळले. ते १९६० मध्ये काँग्रेस पक्षात प्रविष्ट झाले. सुरुवातीस त्यांच्याकडे उत्तर प्रदेशातील उपचिटणीस, चिटणीस अशी पदे देण्यात आली. पुढे ते काँग्रेसतर्फे विधिमंडळावर निवडून आले. तसेच ते अलाहाबाद विद्यापीठाच्या कार्यकारी मंडळाचे सभासद होते.
त्यांच्याकडे १९७०-७१ मध्ये काँग्रेसचे प्रतोदपद देण्यात आले. पुढे केंद्रीय मंत्रिमंडळात ते उपवाणिज्य मंत्री, नंतर त्याच खात्याचे कॅबिनेट मंत्री झाले. या दरम्यानत्यांची राज्येसभेवर नियुक्ती करण्यात आली . त्यानंतर त्यांची लोकसभेवर निवड झाली. मध्यंतरी त्यांची उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून श्रीमती इंदिरा गांधींनी निवड केली. त्यांनी काही काळ उत्तर प्रदेश काँग्रेसचे अध्यक्षपद भूषविले (१९८४). त्यांची काँग्रेस पक्षाच्या कार्यकारिणीवर निवड झाली आणि पुन्हा ते लोकसभेवर निवडून गेले. त्यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात अर्थ(१९८४–८६) आणि संरक्षण ही खाती कार्यक्षम रीत्या सांभाळली. तथापि पंतप्रधानांशी मतभेद झाल्यामुळे त्यांनी त्यांच्यावर ‘तुमचे शासन अत्यंत भ्रष्टाचारी आहे’, असा आरोप केला. परिणामतः त्यांना काँग्रे स पक्षातून बाहेर पडण्याचा आदेश देण्यात आला.
त्यांनी जनमोर्चा या नवीन पक्षाची स्थापना केली. पुढे त्याचे विसर्जन जनता दलात करुन ते जनता दलातील एक प्रभावी नेते झाले. त्यानंतर समाजवादी जनता दल असे संयुक्त पक्षाचे नामकरण करण्यात आले (१९८८–९०). या पक्षाने सार्वत्रिक निवडणुकीत भरघोस यश मिळविले; पण स्वबळावर शासन स्थापण्याइतपत त्यांच्याकडे संख्याबळ नव्हते. म्हणून भा. ज. प. व कम्युनिस्ट पक्ष यांच्या सहकार्याने नॅशनल फ्रंट (राष्ट्री य आघाडी) स्थापण्यात आली. तिचे निमंत्रक व्ही. पी. सिंग होते. या आघाडीने त्यांना नेतृत्व दिले आणि व्ही. पी. सिंग पंतप्रधान झाले . त्यांनी अनेक सामाजिक सुधारणांच्या योजना मांडल्या. त्यांपैकी मंडल आयोगाने १९८० मध्ये इतर मागासवर्गीय समाजासाठी आरक्षण सुचविलेल्या २७ टक्क्यांचा समावेश होता. याविषयी काही नेत्यांनी व्ही. पी. सिंग यांची बाजू घेतली; पण काँग्रेससह अनेक पक्षांनी या विधेयकाला संसदेत विरोध केला.
उत्तर भारतात विशेषतः बिहार, उत्तर प्रदेश येथे अनेक विद्यार्थी नाराज झाले. शिवाय भा. ज. प. अध्यक्ष अडवानी यांना रथयात्रेच्या निमित्ताने अटक करण्यात आली होती. त्यामुळे भा. ज. प.ने व्ही. पी. सिंगांचा पाठिंबा काढून घेतला. परिणामी व्ही. पी. सिंग यांचे सरकार गडगडले आणि त्यांना पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यावा लागला. अखेर मंडल आयोगाचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात अन्वयार्थ आणि निर्णय यांकरिता प्रविष्ट झाले. सर्वोच्च न्यायालयाने १६ नोंव्हेंबर १९९२ रोजी व्ही. पी. सिंग यांचा या संदर्भातील सुधारणा ठराव काही फेरबदलांसह संमत केला. त्यामुळे त्यांची लोकप्रियता वाढली; तथापि प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते राजकारणातून अलिप्त राहिले. मंझिलसे जादा सफर हे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्घ आहे विश्वनाथ प्रताप सिंग यांचे २७ नोव्हेंबर २००८ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ.इंटरनेट
ही व इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.
जगातील सर्वोत्तम ऑलिम्पिक क्रीडा कुंभमेळ्यात भारताकरिता पहिले ऐतिहासिक वैयक्तिक पदक जिंकण्याचा पराक्रम कराडच्या खाशाबा दादासाहेब जाधव यांनी १९५२ च्या हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये केला होता. त्यांचा जन्म १५ जानेवारी १९२६ रोजी झाला.
महत्त्वाचे म्हणजे खाशाबाच्या पदकानंतर तब्बल ४४ वर्षे आपली वैयक्तिक पदकांची पाटी कोरी होती. कुस्तीतही पाच दशकांनंतर दुसरे पदक आले. फिनलंड देशाच्या राजधानीतील १५ व्या हेलसिंकी ऑलिम्पिक स्पर्धेत फ्रीस्टाईल बॅंटमवेट कुस्ती गटात कॅनडा, मेक्सिको, जर्मनीच्या मल्लांना चितपट करून कराडजवळील गोळेश्वर गावातील खाशाबांनी ऑलिम्पिक कांस्यपदक पटकावण्याची किमया २३ जुलै १९५२ रोजी घडवली. कुस्तीची पंढरी कोल्हापुरात राजाराम महाविद्यालयात बी.ए.चे शिक्षण घेत असतानाच खाशाबांनी १९४८ साली लंडन ऑलिम्पिकमध्ये सहावे स्थान पटकावले होते.
या ऑलिम्पि-कसाठी त्यांनी बोटीतून कंटाळवाणा प्रवास केला होता. ऑलिम्पिक पदकाचा निर्धार त्यांनी तेथेच केला होता. सलग चार वर्षे घाम गाळल्यानंतर त्यांची सुरुवातीला कुस्तीतील राजकरणामुळे निवडही झाली नव्हती. पंजाबच्या मल्लांनी आपल्या अन्यायाला वाचा फोडली तेव्हा खाशाबांनाही न्याय मिळाला. एक एक रुपया गोळा करून खाशाबांनी दुसरी ऑलिम्पिक वारी केली होती. कोल्हापूरच्या मराठा बॅंकेने त्यावेळी ३००० रुपयांचे कर्ज दिले नसते तर खाशाबांचा हेलसिंकीला जाण्याचा मार्ग बंद झाला असता. ही अडथळ्यांची शर्यत जिंकत हेलसिंकीत पोहोचलेल्या खाशाबांना ज्या दिवशी पदकाची लढत होती त्याच दिवशी प्रशिक्षकांनी खाशाबांना विश्रांती घेण्यास सांगून ते हेलिसिंकी शहरात फिरायला गेले होते. योगायोगाने खाशाबा स्पर्धेसाठी पोहोचले आणि त्यांनी पदकाची बाजी मारली.
पदकानंतर सहा वर्षे ते बेकार होते. अखेर महाराष्ट्र पोलीस दलात त्यांनी कशीबशी नोकरी मिळाली. तेथेही त्याच्या क्रीडाकौशल्याचा उपयोग कमीच करून घेण्यात आला. त्यांचे जन्मगाव गोळेश्वरकडे जाणाऱ्या रस्त्यावर ऑलिम्पिकच्या वर्तुळांसोबत प्रेरक स्तंभ उभा केला आहे. खाशाबा जाधव यांचे निधन १४ ऑगस्ट १९८४ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ.इंटरनेट / प्रा. संजय दुधाणे
खाशाबा जाधव यांच्यावर प्रा. संजय दुधाणे यांनी केलेली कविता
पंचरंगी ही वर्तुळे, सांगती आलिम्पिक गाथा।
मैत्री, मानवतेद्वारे क्रीडावीर रचति पदक कथा ।।1।।
जिंकुनी पहिलं मानाचं पदक, वाहिलं भारतभू चरणी।
खाशाबा आद्य ऑलिम्पिकवीर, जन्मती कराड भुवनी ।।2।।
रोवूनिया झेंडा मराठी मल्लविद्येचा, हेलसिंकी रणांगणी।
कॅनडा, जर्मनी मल्ल चित, ऐतिहासिक 23 जुलै 1952 दिनी ।।3।।
पहिला भारतीय, एकमेव मराठी वीर, कीर्ती दिगंतर।
ऑलिम्पिकवीरा नमन, प्रेरणेची मशाल उजळती अंबर ।।4।।
“हुसेन टू विजय कुलकर्णी” या चित्र मालिकेच्या माध्यमातून औरंगाबादचे चित्रकार विजय कुलकर्णी यांच्या चित्रांची मुंबई, दिल्ली, कोलकत्ता, गोवा, चेननई, कोचीन शहरांत प्रदर्शने भरली. अमूर्त चित्रशैलीने सुरुवात करणारे कुलकर्णी यांनी वळणावर मात्र अजिंठा चित्रशैलीचा अभ्यास सुरु केला व पुढील ३५ वर्षे याच चित्रशैलीने त्यांची ओळख बनविली.
अजिंठा स्कूल
Copyright © 2025 | Marathisrushti